Saturday, November 12, 2011

प्रवास.....

गेल्या आठवड्यात मायदेशातून परत आले माझ्या देशात.  दरवेळेला बसतो तसा सांस्कृतिक धक्का नाही बसला यावेळेस. कदाचित वर्षाच्या आत फेरी झाली म्हणून जाणवलं नसावं. प्रकर्षाने जाणवलं ते इतकंच की प्रवासात  सहप्रवासी संवाद साधायला अजिबात उत्सुक नाहीत. एअरपोर्ट ते पुणे के. के. ट्रॅव्हल्सने गेले. तीन तासाच्या प्रवासात अगदीच हु का चु न करता कसं बसणार म्हणून मी काही ना काही बोलायचा प्रयत्न करत होते पण बरोबरच्या प्रवाशांना काहीच रस नव्हता. बाजूला बसलेल्या बाई तर मराठी बोलेचनात. मला वाटलं खूप वर्ष परदेशात राहिलं की होतं ते झालं असावं याचं. पण त्या फक्त ८ दिवसांसाठी गेल्या होत्या दुसर्‍या देशात. शेवटी ड्रायव्हर आणि मी, आम्ही  मात्र जिव्हाळ्याच्या चार शब्दांची अदलाबदल केली. बाकी सारा प्रश्नोत्तरांचा खेळ. म्हणजे मला कुणीच काही  विचारलं नाही. मी विचारलेल्या प्रश्नांना फक्त उत्तरं दिली. तेवढ्याही त्या प्रवासात ड्रायव्हर महाशयांनी त्यांच्या बाजूला बसलेल्या प्रवाशाला विचारलं,
"तुम्ही शूज काढलेत का आत्ता?"
ते गोंधळलेच.
"हो, का?"
"वास मारतोय" असं म्हणत ड्रायव्हरनी खिडकी उघडली.
प्रतिक्षिप्त क्रिया होऊन मी पुढे पसरलेले पाय मागे घेतले :-).
प्रत्येकाला आपल्या पायाचा तर....ही शंका असणारच मनात. पण बाकी सारे स्थितप्रद्न्यासारखे बसण्यात यशस्वी झालेले दिसले. घर आलं आणि श्वास घेतला मोकळा. संपला एकदाचा प्रवास.
रत्नागिरीहून पुण्याला येताना तोच अनुभव. बाजूला बसलेली सहप्रवासी अगदी थंड स्वरात विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देत होती. बाकी फोनवर बोलणं, नाहीतर इ मेल तपासणं हेच अव्याहत.

परत येताना विमानातल्या १६ तासात मला आठवत राहिलं वीस पंचवीस वर्षापूर्वीच्या प्रवासाचं स्वरुप.  प्रवासात झालेल्या ओळखी, काही टिकलेल्या, बर्‍याच प्रवास संपल्या संपल्या विरुन गेलेल्या. पुसट होत गेलेले चेहरे, प्रसंग.....ते देखील एकाशी दुसर्‍याचा काही संबंध नसलेले.

बाहेरगावाहून रत्नागिरीला परत आलं की हमखास कुणीतरी आडगावात जाणारं असायचं गाडीत. स्टॅडवर वेळ काढायचा असायचा पाच सहा तास. अशा प्रवाशांचे ते पाच सहा तास गाडीत झालेल्या ओळखीवर  आमच्या घरी जायचे.

८३-८४ च्या आसपासची गोष्ट. परळ ते रत्नागिरी. काका (मावशीचा नवरा) आले होते पोचवायला बस स्थानकावर. नाव पाहून गाडीत बसणार तर ही गाडी नाहीच असं म्हणाले कंडक्टर. आम्ही आपले सारखे चौकशी करत. शेवटी कळलं तीच गाडी होती रत्नागिरीला जाणारी. गेली निघून. मग काकांनी चौकशीच्या तिथे धारण केलेला रुद्रावतार. शेवटी एस. टी. ने पैसे परत करण्याचं केलं मान्य. पण आता दुसरी समस्या. आरक्षण कुणा दुसर्‍याच्या नावाने केलेलं. पैसे त्याच्याच नावाने मिळणार. त्यानंतर बोरिवलीच्या ते रहात तिथल्या परिसरात प्रत्येकाला ठाऊक होतं की पाखर्‍यांच्या नावाने मनिअऑर्डर आली तर देसायांकडे पाठवायचं.

त्याही आधी म्हणजे गुजरात जवळच्या पालघरला आम्ही रहायचो तो काळ ७७-७८ सालचा. बहीण कोकणात गेली होती आजी आजोबांकडे. तेव्हा  फोन घराघरात नव्हता. परत येताना ओळखींच्या बरोबर ती मुंबईला येणार होती. माझे काका तिला पालघरला आणून सोडणार होते.
अख्खा दिवस पुतणीची वाट पहात काका  स्टॅडवर उभे. आत्ता आली गाडी तर.....या भितीने जेवणासाठीही त्यांना तिथून निघता येईना. कंटाळून संध्याकाळी शेवटी ते परत गेले. माझे वडिल संध्याकाळपर्यंत मुलगी आली नाही म्हणून रात्री त्यांच्या घरी पोचले. काका आणि वडिलांची वरात ओळखींच्यांच्या घरी. पाहातात तर तिथे सगळी जेवत बसलेली. गाडी कोकणातून सहा तास उशीरा सुटली होती. पण एकमेकांशी संपर्क साधायला मार्गच नव्हता काही.

त्यावेळचा प्रवास, त्यातून घडलेले किस्से त्या त्या वेळेस फारसे महत्वाचे वाटले नव्हते नक्कीच. पण आता मात्र त्या क्षणांची मजा औरच वाटते; विशेषत: हल्ली होणार्‍या प्रवासात तसं काही घडतच नाही तेव्हा.......

4 comments:

  1. माणसांनी प्रवासासाठी जितके जास्त पैसे मोजलेले असतात तेवढ्या प्रमाणात माणसं कमी बोलतात असा माझाही अनुभव. अनारक्षित डब्यात अजूनही शब्दान्चीच नाही तर खाद्यपदार्थांचीही देवाणघेवाण होते आजही.

    पण 'अनोळखी माणसांवर विश्वास ठेवू नका' हे आजकाल कानीकपाळी ओरडल जात दहशतवादाच्या धास्तीतून - त्याचाही परिणाम असावा हा. आणि काही लोक नुसत त्यांच्याकडे पाहून हसलं तर 'पगार काय मिळतो' इतक्या खोलात चौकशी करायला लागतात असाही अनुभव आहे.

    पूर्वी पुस्तक आणि मोबाईल नसल्याने लोकांना एकमेकांशी बोलायला पर्याय नसायचा बहुतेक .... आता तो पर्याय आहे आणि काही लोक तोही निवडतात इतकच!

    ReplyDelete
  2. aativas - हं, हेच कारण मला तिथेही सांगत होते पण इतका घुमेपणा धास्तीने? नाही पटलं आणि पटवून घ्यायचं ठरवलं की वाटतं किती वेगवेगळ्या अनुभवांना मुकतात ही माणसं. त्यावेळीही पुस्तकं असायची वाचायला. हातात एखादं पुस्तक किंवा कुठल्यातरी स्थानकावर घेतलेला एखादा अंक आपल्या सोबतीला असला तरी कुणी गप्पा मारायला सुरुवात केली की समोरचा त्यात सामील व्हायचा क्वचित आजूबाजूचेही.

    ReplyDelete
  3. मोहना आवडला तुझा ब्लोग. लिखाणातला साधेपणा हा भावतोच. तेच तुझ्या लिखाणातून परत अनुभवायला मिळालं

    aativas म्हणतोय ते पटलं.

    ReplyDelete
  4. आत्तापर्यंतच्या भारतभेटीच्या प्रवासात २ अनुभव छान आले. पहिले गेलो २००४ साली. तेव्हा विमानात एक मराठी बाई होती. ती पुण्याचीच.तिचे नाव फाटक. आम्ही दोघे व ती पाय मोकळे करण्याकरता विमानात एका बाजुला उभे राहिलो होतो. तेव्हा ओळख झाली आणि आम्ही तिघे मराठीतून गप्पा मारायला लागलो. खूप छान गप्पा मारत होतो. शेवटी हवाईसुंदरी म्हणाली जरा हळू गप्पा मारा. बाकीचे लोक झोपलेत. मग आम्ही तिघे म्हणालो पण की हिचे काय जाते? तिच्यामध्ये तर आम्ही जाण्यायेण्यात अडथळा होत नाही ना. बाजूला तर उभे आहोत. शिवाय इतर प्रवाशांचे आमच्या गप्पांकडे अजिबात लक्षही जात नसेल आणि आवाजही पोहोचत नसेल. प्रत्येकजण आपापल्या कार्यात मग्न असतात ना.

    दुसरा अनुभव गेल्यावर्षीचा. भारतातून परत येताना विमानतळावर दोघे नवरा बायको भेटले. त्यांचे आडनाव सरदेसाई. तेही असेच दिलखुलास बोलत होते. मराठीतून बोललो. त्यांनी सांगितले की आम्ही यावेळी ३-४ महिने पुण्यात होतो आणि आवडीची बरीच नाटके पाहिली. त्यांच्याकडे मोबाईल नव्हता आणि आमच्याकडेही. खूप छान वाटले.

    ReplyDelete

तुम्हाला माझ्या लिखाणाबद्दल काय वाटतं हे जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल. एखादी छोटीशी प्रतिक्रिया लिहणा‍र्‍याला खूप उत्साह देते. मग कळवाल ना मला तुम्हाला काय वाटलं वाचून ते? तुमच्या प्रतिक्रियेने मला कदाचित आणखी विषय सुचतील, सुधारणेला वाव मिळेल आणि मुख्य म्हणजे आपली ओळख होईल.