Thursday, October 3, 2013

मी काय करु...


"अहो, मीनाचा फोन होता."
वर्तमानपत्रातलं डोकं बाहेर न काढता अण्णांनी हुंकार दिला.
"उन्हाळ्याच्या सुट्टीत बोलावते आहे." अण्णांनी फक्त वर्तमानपत्र थोडं बाजूला करत वत्सलाबाईंकडे नजर टाकली.
"नाही, म्हणजे मुलांना सुट्टी लागली आहे ना. त्याच्यांकडे लक्ष द्यायला कुणीतरी पाहिजे म्हणत होती."
"वत्सला, हे नवीन आहे का तुला? दरवर्षी जातोच की आपण तिकडे मुलावर लक्ष पाहिजे म्हणून. आणि तुम्ही दोघंही आहात इथे तर छोटीला पण काढते पाळणाघरातून म्हणाली असेल."
"काय करायचं मग? आता झेपत नाही ही उस्तवारी. म्हणजे सुरुवात प्रवासापासूनच होते. कल्पनेनंच नको वाटतं." दुखरे पाय चोळत त्या तिथेच टेकल्या.
"नाही जमणार सांग. तिकडे असतात चांगली पाळणाघरं आणि काय ते त्यांचे समरकॅम्प पण असतात त्यात घाल म्हणावं मोठ्याला."
"सांगितलं. खूप महाग पडतं म्हणे ते. भारतात पाठवून देते मुलांना. एखादी दिवसभराची बाई लाव, पैसे देईन म्हणते आहे."
"काय नालायक मुलं आहेत ही. पैसे फेकले आमच्या तोंडावर की झालं. त्याचं सगळं केलंच आपण. आता पार साता समुद्रापलिकडे जाऊन बसली आहेत. उन्हाळ्यात तिथे जाऊन त्यांच्या मुलांना सांभाळायचं.  इथे आम्हाला कोण सांभाळणार? झाली म्हणावं आमची देखील वयं आता.  दे तो फोन इकडे. मीच सांगतो तिला." वत्सलाबाई उठल्या नाहीत. म्हणता म्हणता एक घाव दोन तुकडे करतील. ते सांधायला पुन्हा सगळी मानसिक शक्ती घालवायची ती आपण.  अण्णांनीही परत वर्तमानपत्रात डोकं खुपसलं.  वत्सलाबाईंच्या मनाला थकव्याने एकदम वेढा घातला.

मीनाच्या वागण्याचं त्यांना राहून राहून आश्चर्य वाटत होतं. आता हे दरवर्षीचं झालं होतं. जून महिना जवळ आला की त्या अस्वस्थ व्हायच्या. मीनाचा फोन घेऊच नये असं होऊन जायचं. पण किती ठरवलं तरी सगळं त्याचक्रमाने घडायचं. अडीच तीन महिन्यांनी भारतात परत यायला निघताना प्रत्येकवेळी त्या तिथून येताना बजावून नाही का यायच्या,
’आता पुढच्या वेळेस तुझी तू सोय बघ गं बाई. नाही हो झेपत आम्हाला हा प्रवास, पुन्हा घरीही तशी दिवसभर उठबस होते ना, त्यांने अगदी थकून जायला होतं.’ त्यांना सगळी वाक्य जशीच्या तशी आठवली. पण दरवेळी उगाच मुलीचं मन कशाला दुखवा, नातवंडाचं मायेने कोण करणार म्हणून परदेशवारी व्हायचीच. पण हल्ली हल्ली मनात एक सल दाटून यायला लागला होता.  वाटायचं,  मायेने करतो आहोत त्याचा फायदा तर घेत नाही ना ही? जिथे तिथे हिशोबाने वागणं, त्यापुढे आमच्या त्रासाची, दुखण्याखुपण्याची पर्वा वाटत नाही की डोळ्यावर कातडंच ओढून बसली आहे?  एक वर्ष अण्णांचीच तब्ब्येत बरी नव्हती तेव्हा जमलं नाही जायला, तर मोठ्याला दिलं पाठवून इकडे. काय धावपळ उडाली. मीना म्हणते तशा बायका थोड्याच मिळतात आजकाल. मिळाल्या तरी त्यांची  तंत्र सांभाळावी लागतात. शेवटी नाशिकच्या लेकीला बोलवून घ्यायला लागलं. तिने केलं सगळं पण गरज पडली की तिचाच कसा उपयोग होतो ते सांगायला विसरली नाही.  दरवर्षी मीनाच्या मदतीला झेपत नसताना का धावता हा नेहमीचा प्रश्न विचारायलाही विसरली नाहीच.


मुली मोठ्या होत असताना दुसर्‍याचा विचार करायला शिका हे मनात रुजवायचं राहूनच गेलं का?  कधी कुठल्या कामाला हात लावू दिला नाही, अडचणी कळू दिल्या नाहीत ते अभ्यासात अडथळा नको म्हणून. पण त्यामुळेच सगळं  विनासायास मिळतं, आपल्या मनासारखंच झालं पाहिजे हीच सवय लागली. स्वत:पुरतं पाहिलं की संपलं असं वागणं, विशेषत: मीनाचं. काय चुकलं आपलं? मुलींनी स्वावलंबी बनावं एवढंच होतं मनात. पण ते करता करता रोवलं गेलेलं महत्वाकांक्षेचं रोपटं आडवं तिडवं फोफावलं. मीनाच्या धिटाईचं, हुशारीचं कौतुक करता करता ती म्हणेल ती पूर्व असंच होत गेलं.  त्याचा फायदा ती तिच्या नकळत घ्यायला शिकली असं तर झालं नाही ना? ती कर्तृत्ववान निघाली. इंजिनिअर होऊन स्वत:च्या हिमतीवर परदेशात शिक्षणासाठी गेली. पण हे एवढंच पुरे असतं? कर्तृत्ववान बनविता बनविता माणूस  घडवायचं राहूनच गेलं का?. कुणाची चुक? का घरोघरी हे असंच होतं? त्याचं त्यानाच ठरवता येईना.

"चहा करतोय मी माझ्यासाठी. तुला हवा आहे का?" अण्णांनी  विचारलं तशा त्या विचारांतून बाहेर आल्या.

>>>
"काय झालं? येते आहे का मग तुझी आई?" मयुरेशच्या प्रश्नावर मीना काहीच बोलली नाही.
"त्यांचं नक्की होत नसेल तर आईला पाहतो जमतंय का."
"आता तिला विचारलं आहे ना. तिचं कळू दे. मग बघू."
"पण हो, नाही काहीतरी म्हणाल्या असतील ना?"
"काही बोलली नाही. कंटाळते हल्ली ती दरवर्षीच्या प्रवासाला."
"तुझा पण अट्टाहास का तुझ्याच आईला बोलावण्याचा?"
"निश्चिंतं राहता येतं मग. तुझी आई आली की तिच्यावर जास्त ताण पडू नये याची काळजी घेण्याचाच ताण येतो माझ्या मनावर."
"हे अतिच तुझं.  बघ, तुझं तू ठरव. परत माझे आई, बाबाच करतात असं ऐकवू नकोस म्हणजे झालं." तिने नुसतीच मान उडवली. मयुरेशने आठवड्याचे कपडे यंत्रात धुवायला टाकले तसं भाजी चिरता चिरता तिचं मनंही एका लयीत मागे पुढे होत राहिलं.
खरं तर आईने मागच्या वेळेस बजावून सांगितलं होतं पुन्हा नाही यायला जमणार म्हणून. पण मग करायचं काय? आजी आजोबा आले की किती खुश असतात दोघं. आता आणखी थोडी वर्ष. मोठी झाली की रहातीलच एकटी. समर कॅम्प, पाळणाघर दोन्हीचा खर्च खूप.  पुन्हा पैशांनी प्रेम थोडंच मिळतं? आई आली की तिच्या हातचे चविष्ट पदार्थ पण मिळतात चाखायला. पण मागच्यावेळेला आईने एका मैत्रीणीकडेच बोलून दाखवलं, झेपत नाही असं सांग म्हणे आमच्या वतीने मीनाला. तिने तेव्हा मैत्रीणीलाच म्हटलं होतं,
’नको सांगू मला. मनाला लागून राहतं.’ मैत्रीण गप्प बसली. आईचा राग आला होता.  खरंच त्यांना इतकं नको वाटतं इकडे यायला? मुलांचं जबाबदारीने, प्रेमाने त्यांच्याइतकं कोण करणार? आणि दोन महिन्याचा तर प्रश्न. भारतात गेले की आरामच आराम. पोळ्या करायला, भाज्या चिरायला बाई आहे, दोघंच्या दोघं तर असतात.  इथे निदान आमचा सहवास मिळतो, अधूनमधून फिरवून आणतोच की दोघांना. बाहेर जातो जेवायला. तिकीटाचा खर्च तर मी करुच देत नाही  म्हणजे आई, बाबांची तयारी असते पण मी बोलावलं आहे तर मी थोडीच करु देईन. मीही नोकरी करते तर एवढं तर हक्काने करु शकतेच. मग तरीही आई, बाबा का नाही खुश? आईला मुळी कशात समाधानच नाही. आणि बाबा. ते म्हणजे एकदम रोखठोक.  चिडले की तोफ. स्पष्ट बोलून मोकळे.  मागे एकदा म्हणाले होतेच की भारतात त्यांचे मित्र त्यांना बेबीसीटर म्हणून चिडवतात. दुर्लक्ष करा म्हटलं तर म्हणाले, पण ते खरंच आहे ना?

 काय खरं, काय खोटं तेच समजेनासं झालं आहे.  आणि आता इतक्या उशीरा कुठे नावं नोंदवणार समरकॅम्पमध्ये, जागा शिल्लक नसणारच.  चिरलेली भाजी फोडणीला टाकत तिने कॅलेंडर पाहिलं. आई, अण्णाचं किती तारखेचं  आरक्षण करणं  सोयीचं पडेल याचा विचार करत मीनाने  त्यांचा नंबर फिरवायला सुरुवात केली.



Monday, August 19, 2013

शिर्षकाविना :(

माझ्या मुलाच्या मित्राच्या मैत्रीणीला (Roommate)  भारतात आलेल्या अनुभवाबद्दलचा हा दुवा. त्याचा मित्र त्याला याबद्दल काय वाटतं असं विचारत होता.

वाचल्यावर आधी लाज वाटली, राग आला, आणि मग नुसत्याच आठवणी. शाळा, महाविद्यालय, रस्ते, लोकल, गर्दी  अशा ठीकाणी पचवलेलं सारं आजूबाजूला उभं राहिलं. डोळे मारणं, धक्के देणं, ओठांवरुन जीभ फिरवणं, सहेतूक स्पर्श...  आपलंच तर काही चुकत नाही ना या जाणीवेने त्याबद्दल काही न बोलता मनातच दाबून ठेवलेलं सारं आठवलं.

आपण संस्कारांना महत्त्व देतो. मग अशावेळी हे संस्कार जातात कुठे? की ही सगळी अशिक्षित असं करणारी? पण तसं म्हटलं तर संस्कार आणि सुशिक्षितपणाचं नातं आहे का? नसावं, कारण चांगल्या, चांगल्या घरातल्या, सुशिक्षित मुलाचं, लोकाचं हे असं वागणं असतं. मग हा नक्की कशाचा परिणाम आहे? कसं बदलायचं हे सारं?

Tuesday, August 6, 2013

तळ्यात मळ्यात


(बृहनमहाराष्ट मंडळ वृत्तांतात (BMM Vrutta) माझ्या दरमहिन्याआड प्रसिद्ध होणार्‍या लेखातील १ ला 
लेख.)

भल्यामोठ्या बॅगा  पेलत, धापा टाकत तिसर्‍या मजल्यावरच्या दारासमोर दामले कुटुंब उभं होतं. इमारतीसाठी लिफ्ट  नाही याचा पुन्हा एकदा केतनला वैताग आला. पण आत्ता नानांना भेटायची आतुरता जास्त होती. केतनने अधीरतेने दरवाज्याची घंटा दोन तीन वेळा वाजवली.
"अरे आलो आलो लेकांनो. दम धरा जरा." नानांचा दमदार आवाज दाराच्या फटीतून बाहेर ऐकू आला तसा केतन खूश झाला.
"तीच ऐट आहे बघ बाबांच्या आवाजात. खणखणीत आवाज एकदम. वय फिरकलेलंच नाही त्यांच्या आजूबाजूला." मीराकडे पाहत केतन म्हणाला. मीरा नुसतीच हसली. तोपर्यंत नानांनी दार उघडलं होतं. केतन त्यांच्या मिठीत अलगद सामावला. मीरा आणि मुलं कौतुकाने ती भेट पाहत होते. आवाज खणखणीत असला तरी नानाचं थकलेपण मीराच्या नजरेतून सुटलं नाही. ती तिथेच नमस्कारासाठी वाकली. नाना एकदम खूश झाले,
"सुखी भव." मीराला मनापासून आशीर्वाद देत नातवंडांच्या पाठीवर त्यांनी कौतुकाची  थाप मारली.  अरे, आत तर या आधी असं म्हणत दारापासून नाना बाजूला झाले.

आत पाऊल टाकलेली  मीरा नुसतीच खोलीकडे पाहत राहिली. पसारा, नुसताच पसारा सर्वत्र. जागा मिळेल तिथे काही ना काही पडलेलं होतं.   गरम गरम चहाचा कप आयता मिळावा, थोडा वेळ निवांत पडावं असं तिला मनापासून वाटत होतं. केतनच्या हट्टाखातर  माहेरी, मुंबईत न थांबता मिळेल त्या विमानाने ती सगळी सुरतला पोचली होती. तिथून गाडीने नवसारी. समोरचा पसारा पाहून हे आवरल्याशिवाय विश्रांती घेणं आपल्याला जमणार नाही हे तिला ठाऊक होतं. टापटिपीचं विलक्षण वेड असलेल्या नानी गेल्यावर घराची झालेली अवस्था पाहून तिचा जीव गलबलला. तिच्या चेहर्‍यावरचे भाव निरखीत नाना म्हणालेच,
"मीरा बेटा, तू नको लक्ष देऊ पसार्‍याकडे. ब्रम्हचार्‍याची मठी अशीच असायची. त्यातून ताराबाईंना बोलावलं होतं साफसफाई करायला, पण अजून जमलेलं दिसत नाही त्यांना यायला. येतील. तुम्ही आधी बसा रे बाबांनो. मी चहा टाकतो फक्कडसा." नानांची लगबग पाहून केतन हसला.
"नाना, तुम्हीच बसा. आता सून आली आहे ना दिमतीला. तीच करेल  तुमच्यासाठी फक्कडसा चहा."
शहाणाच आहे, स्वत: करावा की इतकं आहे तर...मनातले विचार मनातच दाबून ती घाईघाईने चहा करायला वळली. डायनिंग टेबलावर टाचणी ठेवायला जागा नव्हती. एकीकडे टेबला आवारायला घेत तिने चहाचं आधण ठेवलं.
चहा पिता पिता सगळी नानांशी गप्पा मारायला बसली. नानींच्या आठवणीने गहिवरली. गेल्या वर्षी नानी अचानक गेल्या, त्यातून नाना, केतन अजूनही सावरले नव्हते. नानां आता एकटेच राहत होते. पंचाऐंशी ओलांडलेल्या नानाचं  आपल्याकडे येऊन न राहणं मुलांना नापसंत असलं तरी मीरा समजू शकत होती. जिथे सारं आयुष्य गेलं ते सोडून कुठे जायचं या वयात? आणि स्वत:चं घर तीच आपली हक्काची कुटी.

बापलेकाच्या गप्पा रंगल्या होत्या.  मुलंही संभाषणात सहभागी झाली.   प्रवासाची चौकशी झाली, कोण फोन करतं, कोण कोण भेटतं, लग्न, मुंजीत कुणाच्या भेटी झाल्या, नातेवाईक, शेजारी पाजारी सगळे कसे आहेत असे काही ना काही विषय निघत राहिले. गप्पांना अंत नाही असं वाटत असतानाच हळूहळू संभाषण मंदावलं. मुलं तिथून उठली. केतन संगणका समोर जाऊन बसला. मीरा आणि नानाच तिथे राहिले तसं मीराला राहवलं नाही.
"नाना, ठाऊक आहे तुम्ही नाहीच म्हणाल; पण चला नं आमच्याबरोबर. कबूल नाही केलंत तरी घराची दशा पाहून तुमचीही अवस्था कळते आहे मला."
"नको बेटा अशी गळ घालूस. ती असताना येत होतोच ना अधूनमधून. आता नवसारी सोडून कुठे जावंसं नाही वाटत. तू म्हणते आहेस यातच सारं काही आलं. आता काही जास्त दिवस उरलेले नाहीत माझे."
म्हणूनच...असं म्हणावंसं वाटलं तिला पण डोळ्याच्या कडेला जमू पाहणारे अश्रू लपवीत ती उठलीच,
"थोडावेळ पडते. ताराबाई नाही आल्या तर जेवणाचं बघावं लागेल नं...." असं काहीसं पुटपुटत.

पलंगावर पडल्यापडल्या ती विचारात गढून गेली. डोळा लागतो आहे असं वाटतानाच फोन वाजला तसं आपसूकच तिचं लक्ष त्या बोलण्याकडे वळलं.
नानांच्या लेकीचा फोन असावा,
"दादा कॉम्प्युटरवर करतोय काहीतरी. मीरा पडते म्हणाली जरा. मुलं? त्याचं फोनवर  काहीतरी चालू आहे." नणंदेने काय विचारलं त्याचा अंदाज तिला नानांच्या उत्तरावरून येत होता.
"नाही, नाही. झाल्या की गप्पा गोष्टी. पंधरा वीस मिनिटं. हो, मग प्रत्येकजण लागला आपापल्या उद्योगांना. मी? मी काय करणार? बसलो आहे नेहमीसारखा." नानांच्या आवाजात तक्रारीचा सूर मिसळला. मीराला उगाचच अपराधी वाटलं. जेमतेम अर्धा तास संमेलन भरल्यासारखा गोंधळ होता हॉलमध्ये. संभाषणातले विषयच संपल्यावर नुसतं समोरासमोर बसून करायचं काय? आल्याआल्या जो उत्साह असतो, भेटण्याची अनिवार ओढ असते त्याची पूर्तता झाली की काय उरलं? उरलेले दोन आठवडे आता तेच. चहा घेत, जेवताना थोडंफार काही बोलणं होणार, भेटायला येतील कुणी ना कुणी, थोडंफार फिरणं, खरेदी. ती तिच्या आई, बाबांकडे राहायला जाणार. एक दोन दिवस तिच्या माहेरी केतन येऊन राहणार. पुन्हा नवसारीत काही दिवस आणि मग संपला मुक्काम. केतनला नानांची ओढ आणि तिला माहेरची या एकाच कारणाने भारतभेट होते. इथे येऊन रोजची फक्त पाच दहा मिनिटं आपण एकमेकांशी बोलणार की संपलं. हे असं का व्हायला लागलं आहे? असं नव्हतं पूर्वी. किती पत्र लिहायची ती दोन्ही घरी. लिहिलेल्या पत्रांच्या उत्तराची दोघंही आतुरतेने वाट पाहायचे. केतन तर रोज संध्याकाळी मराठी गाण्याच्या कॅसेट लावून बसायचा, आठवणीत रमायचा. आलटून पालटून पंधरा दिवसांनी दोघांपैकी एकाच्या घरी फोन करून त्यांनाच एकमेकांना खुशाली कळवायला सांगायची. दोन अडीच वर्षांनी गेलं की मनात साचलेलं सारं उतू जायचं, आनंदाला उधाण यायचं. गप्पा,  तास न तास, दिवस दिवस रंगायच्या, शेजारी पाजार्‍यांबद्दलच्या उखाळ्यापाखाळ्या, नातेवाइकांची ख्याली खुशाली ऐकणं, भारतातल्या घडामोडी यात आला दिवस कसा संपायचा तेही कळायचं नाही. कधी संपलं हे सारं?

इंटरनेट आलं, इ मेलचा जमाना सुरू झाला, पण त्याचं सूत काही वृद्ध मंडळीशी जमत नव्हतं.  दोन्हीकडून फोन करणं सोपं, स्वस्त झालं तेव्हा समीकरणं बदलली. वरचे वर फोन व्हायला लागले. मग पत्र मागे पडली. फोनवर रोजची ख्यालीखुशाली, पाककृत्या, जेवणाचे बेत... सगळं बोलणं होऊन जाई.  स्काइप आलं तसं आयुष्याला नवीन वाटा फुटल्या,
"बरं झालं बाई, आपण दोन्हीकडे कॉम्प्युटर घेऊन देऊ,  आई, बाबां, नानांना पाहिल्याचं समाधान मिळेल." दोन्हीकडची म्हातारी माणसं आपल्याला हे नवीन तंत्र कसं जमेल या धाकधुकीत असतानाच कॉम्प्युटर थडकला देखील.  इमारतीतली उत्साही मुलं आजी आजोबांना मदत करायला सरसावली. हळूहळू ते तंत्रही साधलं आणि मग अमेरिका - भारत अंतराची दरी बुजून गेली.

पण  दीड दोन वर्षांनी इथे आल्यावर बोलायला, गप्पांचे फड जमायला काही उरलंच नाही. काय सांगू, काय नकोची असोशी राहिली नाही. सगळं फोन, स्काइपने आधीच पोचलेलं एकमेकांकडे. प्रत्यक्ष भेटीचा आनंद काही क्षण मग उरलेला वेळ नाना म्हणाले तसा. खरंच काय गमावलं आणि काय मिळवलं आहे आपण? नक्की कुठल्या गोष्टीत सुख जास्त होतं की ते मानण्यावर शेवटी? पत्र, अधूनमधून फोन आणि मग चातकासारखी वाट पाहत  दीड दोन वर्षांनी झालेली भेट,  गप्पांनी भरलेला, आठवणींनी भिजलेला प्रत्येक दिवस की रोजच्या घाईगडबडीत एक दोन मिनिटं ’आवाज’ ऐकायला म्हणून केलेला फोन, रविवारी कामं उरकता उरकता स्काइपवरचं दर्शन आणि मग ही अशी भेट.  नानांना, आई, बाबांना यातलं खरंच काय आवडत असेल? वाटत असेल त्यांना की चाललंय हेच ठीक, मुलाबाळांची खुशाली रोजच्या रोज कळते, दर आठवड्याला गावातच असल्यासारखं पाहायला मिळतं, गप्पा नाही रंगल्या इथे आल्यावर तरी आजूबाजूला असणारं त्याचं अस्तित्वच पुरेसं आहे की अधूनमधून केलेले फोन, भावनेने ओथंबलेली पत्र आणि भेटायला आले की सतत आजूबाजूला घुटमळणं, किती बोलू न काय करू असं होऊन जाणं. काय भावत असेल नक्की त्यांना? विचारावं...? नकोच.

मीरा विचारात गढून गेली. बराचवेळ. अचानक पर्याय सापडल्याच्या आनंदात ती उठली. नानांचा भरल्या घरातला एकटेपणा पुसून टाकायचं तिने मनाशी पक्कं केलं. पत्ते खेळायला सर्वांना बसवयाचंच असं ठरवून ती  उत्साहाने बाहेरच्या खोलीत डोकावली.

हा लेख लोकसत्तेच्या ’चतुरंग’ पुरवणीतही प्रसिद्ध झाला आहे. दुवा - http://www.loksatta.com/chaturang-news/story-of-nana-and-his-family-219898/





Saturday, August 3, 2013

पिंपळपान (फ्रेंडशिप डे निमित्त)

पाठीवरचं जड दप्तर, लाल रिबीनींनी घट्ट बांधलेल्या वेण्या  
रमत गमत शाळेला पोचणं
गप्पा, हसणं खिदळणं, वाद घालणं
कित्ती कित्ती गोष्टी आपण एकत्र केल्या
मग, कधी कधी
रुसवे, फुगवे, भांडणं, हेवा, कागाळ्या 
मी तुझ्याशी बोलत नाही म्हणता, म्हणता
कधी एकदा बोलतो
अबोल्याच्या दिवसात काय झालं ते सांगतो
असं होवून जाणं
असे ते दिवस!
पाहता पाहता भूतकाळात हरवले!
विस्मृतीच्या गर्तेत अडकले
फ्रेंडशीप डे ला आठवणी
काढण्यापुरते उरले!
पण तरीही पिंपळपानासारखे
मनाच्या पानात वर्षानुवर्ष जपले!

माझ्या पिंपळपानात दडलेल्या देवरुख, कणकवली, पालघर, रत्नागिरी.....सार्‍या मैत्रीणींना

हॅपी फ्रेंडशीप डे!

Thursday, July 25, 2013

तुझं माझं जमेना...

(बृहनमहाराष्ट्र मंडळाच्या (BMM) स्मरणिकेतील माझा विनोदी लेख)


 "आई  रात्रभर गाडीत राहायचं? कसली मज्जा येईल."
"अगं हरवलो आहोत आपण. मजा कसली सुचते आहे तुला." माझ्या सुरावरून नूराची कल्पना आलीच तिला. तितक्यात फोन वाजला. न पहाता नवर्‍याचाच असणार या खात्रीने नेहमीप्रमाणे खेकसले,
"काय हेऽऽऽ? किती वेळा फोन केला."
"मॅम..."
"ऑ...?" नवरा नाही हा. माझे पुढचे शब्द घशात अडकले.
"कॉलिंग फ्रॉम एटी. अ‍ॅन्ड टी." कोणतीतरी नवीन योजना असणार.
"धिस इज नॉट द राइट टाइम टू कॉल मी." मी घाईघाईत म्हटलं.
"मॅम..." आवाजातल्या गोडव्याला दाद देण्याची मन:स्थिती नव्हतीच.
"सर, आय अ‍ॅम नॉट इंटरेस्टेड." धाडकन फोन आपटला.
"आई, तू बाबाशी बोलतेस तशी ओरडलीस त्या काकावर."
"बरोबर, त्या काकालापण वाटलं असेल, चुकून बायकोला फोन केला की काय." मुलगी खदखदून हसली.
आरशातून तीक्ष्ण कटाक्ष फेकला तसं तोंड वाकडं करत तिने खिडकीकडे नजर वळवली.
दोन मैलाऐवजी बावीस मैल प्रवास करून शेवटी चुकून दोघी आपोआप घरी पोचलो.
"जी. पी. एस. न्यायचा. स्मार्ट फोन घे म्हणून कधीचा सांगतोय." नवर्‍याचं हल्लीचं नवीन अस्त्र बाहेर आलं. ते न लागल्यासारखं केलं, पण नकळत मन पार मागे, नकाशे घेऊन गाडीत बसायचो तिथपर्यंत पोचलं.

"कॉम्प्रमाईज विथ देम"
"सॉरी, नो कॉम्प्रमाईज. इफ यू वॉट यू कॅन कॉल द अ‍ॅथॉरिटी"  मोटेल व्यवस्थापक आणि टॅक्सी चालकाचा वाद चालू होता. सॅनफ्रनस्किस्को ते सॅटारोझा असं टॅक्सीचं भाडं दोनशे डॉलर्स झालं होतं. चालक दिडपड मागत होता तर मोटेलचे व्यवस्थापक नियमाप्रमाणे घ्यायला सांगत होते.  दोनशे म्हटल्यावर माझ्या पोटात खड्डा पडला, त्याचे  दीडपट... मनातल्या मनात हिशोब चालू झाला.  भांडण ऐकायचं की हिशोब करायचा? त्यात त्या दोघांच्या  उच्चाराची प्रचंड गंमत वाटत होती. भारतात आम्ही  बिल क्लिंटनचं भाषण लागलं की अपूर्वाईने  ऐकायला बसायचो (नुसतंच पाहायचो) तेवढाच माझा अमेरिकन इंग्लिशशी संबंध त्यामुळे  ’कसे इंग्लिशमध्ये भांडतायत बघ...’ अशा  नजरेने मी नवर्‍याकडे पाहत होते. तो आपला पाकिटातले डॉलर्स पुन्हा पुन्हा तपासत होता.  पाचच मिनिटात पोलिसांची गाडी हजर झाली. आता त्यांच्या ऐटदार पोषाखाकडे पाहत मी मंत्रमुग्ध. हे सगळं असंच चालू राहावं असं वाटायला लागलं.  पण मी कुरकूर न करता उभी आहे हे पाहून नवर्‍याला काहीतरी गोंधळ आहे याची जाणीव झाली.  बायको नक्की कशावर भाळली आहे  या  कोड्याने त्याच्या कपाळावर एक आठी उभी राहिली. आठ्या एकाच्या दोन  आणि दोनाच्या काहीपट व्हायच्या आत सगळं आटोपलं आणि वेगवेगळ्या अर्थी आम्ही तिघांनी निःश्वास सोडले.

अमेरिकन  भूमीवरच्या या पहिल्या प्रसंगाची उजळणी करत मोटेलच्या मऊ  गाद्यांवर अंग टाकलं. सकाळी खिडकीतून बाहेर पाहिलं. कार्ट पडलेली दिसली.  अमेरिकेत गाड्या जुन्या झाल्या की रस्त्यावर टाकून देतात हे  लहानपणी ऐकलं होतं तेव्हापासून आपण त्यातली एखादी उचलून आणावी असं वाटायचं. मी नवर्‍याला जोरात हलवलं.
"काहीतरी हातगाडी सारखं पडलंय बघ. आपण आणू या?"
"अं...काऽऽऽय?" असं काहीसं पुटपुटत त्याने कूस वळवली.
" इकडे लोकं गाड्या टाकून देतात ना, तशी गाडी असावी असं वाटतंय. जरा वेगळीच आहे पण आणते मी."  त्याचं घोरणं म्हणजे मूक संमती असं माझं सोयीस्कर गृहीतक. कुणी बघत नाही हे पाहून पहिली ’चकटफू’ गाडी मोटेलच्या दारासमोर लावली.  त्याने ती पाहिली आणि हबकलाच,
"अगं ही सामानाची गाडी आहे. तुला कसं बसता येईल यात? आणि ते फुकट बिकट सोडा आता."  तो चांगलाच चिडलेला.
"मग सामान आणू यातून." वैतागाने त्याच्या तोंडातून शब्दही फुटेना. राग आला, नक्की काय करावं ते कळत नसलं की तो मूक धोरण स्वीकारतो. कार्ट घेऊन आमची वरात थोड्याच वेळात बाजारात  निघाली.

रस्त्यात माणसं फार नव्हतीच पण गाडीतली लोकं कुतहलाने आमच्याकडे पाहतं होती.
"भारतीय नसावेतच इथे. सगळे पाहतायत." मला एकदम माधुरी दीक्षित झाल्यासारखं वाटत होतं. नवर्‍याला असं कधी कोणासारखं झाल्यासारखं वाटत नाही. तो कायम तोच असतो.
"तू  भुरळल्यासारखी चालू नकोस. आपण भारताचं प्रतिनिधित्व करतो परदेशात येऊन हे विसरू नकोस."
 "चालते आहे की नीट."
"हवेत असल्यासारखी चालते आहेस."
"मी नेहमी तशीच चालते, शाळेत उड्या मारत चालते म्हणायचे मला."
"इथे नका मारू तशा उड्या."
"आधी माहीत होतं ना कशी चालते ते? मग..." विषय वेगळ्या दिशेने वाहू लागला तो पर्यंत  दुकानापाशी आलो म्हणून थांबावं लागलं आणि त्या नजरांमधला छुपा अर्थ कळला. इतर लोकं कार्टमधून सामान आणून गाड्यांत भरत होते. जिथे तिथे कार्ट आवाराच्या बाहेर नेऊ नका असं लिहिलेलं. मग ती कार्ट आमच्या मोटेलपर्यंत कशी पोचली? कुणीतरी माझ्यासारखंच.....?

कार्ट सोडून देताना जड झालं मन. परत निघालो तेव्हा लक्षात आलं की रस्त्यात तुरळक दिसणारी माणसं तोंडभरून हसतात.  इकडे तिकडे बघत आपलं लक्षच नाही असं भासवत ओळखीच्या लोकांनाही टाळण्याची स्वदेशातली कला इथे उपयोगी पडणार नाही. आधी अवघडल्यासारखं, मग जिवणी ताणून चेहर्‍यावर मोकळं हास्य ठेवत मोटेलमध्ये पोचलो. पण तोपर्यंत तोंड इतकं दुखायला लागलं की हुप्प करून गप्प राहावंसं वाटायला लागलं.  नवरा मात्र एकदम खूश होता. सारखं आपलं, रस्त्यावर रस्त्यावर चल... सुरू झालं त्याचं.

दुसर्‍या दिवशी नवर्‍याचा मित्र आला. तोही नवीनच होता  पण जुना झाल्यासारखा वागत होता.  रस्ता ओलांडायचा धडा देणार होता. आम्ही, आणि त्याने पकडून आणलेले एक दोन नवखे त्याच्या मागून निघालो. रस्ता ओलांडण्याच्या जागी आलो आणि त्याने कॉग्रेसच्या पुढार्‍यासारखा हात वर केला 'थांबा'.  सगळे पावलांना ब्रेक दाबल्यासारखे जागच्या जागी खिळले.
एकदम पावलं जड झाली. भरधाव वेगाने धावणार्‍या मोटारी, रस्त्यावर कर्फ्यू असल्यासारखा माणसांचा शुकशुकाट आणि लाल, पिवळा, हिरवा असे झटपट बदलणारे दिवे; रस्ता फक्त वाहनांसाठीच चा सूर लावून दटावतायत असंच वाटत होतं. यातून पलीकडे जायचं कसं? मित्राने खाबांवरचं बटण दाबलं.  माणसाची आकृती दिसायला लागली. टेचात, त्याने आता निघा अशी खूण केली. मी लांब उडीच्या शर्यतीत भाग घेतल्यासारखी रस्त्यावर उडी टाकली. माझ्या मागून बाकीच्यांनी चार पावलं टाकली आणि भयाने  थरकाप उडाला. लाल हात डोळे मिचकावल्यासारखा थांबण्याची खूण करायला लागला. नजर टाकू तिथे  चारी बाजूने खदखदा हसणार्‍या गाड्या आमच्याकडे पाहतं उभ्या. आता काय करायचं? मागे जायचं की पळत पुढे? आमच्यातले निम्मे आले तसे मागे गेले, उरलेले धावत पुढे. मी थोडं मागे पुढे केलं आणि  नवर्‍याच्या मागून पुढे धावले. पलीकडे जाऊन मागे गेलेले परत येतील याची वाट पाहत उभे राहिलो, तितक्यात पाहिलं की आमच्याबरोबर रस्त्यावर उतरलेली  अमेरिकन माणसं हलत डुलत मजेत येत होती.
त्यांच्या त्या हलत डुलत चालीचं रहस्य कळायला मात्र बरेच दिवस लागले. तोपर्यंत वॉकिग सिग्नल दिसला  की अरे, चलो, चलो म्हणत आम्ही सगळे धावण्याच्या शर्यतीत भाग घेतल्यासारखं पळत सुटायचो. कधीतरी  वाहन चालनाचा परवाना वाचताना  कळलं की लाल हात डोळे मिचकावायला लागतो ते रस्त्यावर पाऊल न टाकलेल्यांसाठी. हे कळल्यावर मग आम्हीही कुणाच्या बापाचं काय जातं थाटात......चालायला लागलो.

मोटेलचे दिवस संपले आणि अपार्टमेंटमध्ये राहायला आलो. मोठा प्रश्न पडला, या घरात कपडे वाळत कुठे घालायचे? इथली माणसं काय करतात कोण जाणे. सारखी मेली स्विमिंग पुलामध्ये धपाधप उड्या मारताना तर दिसतात. यांच्या ओल्या कपड्याचं काय? बाल्कनीतून स्विमिंग पुलाजवळ अर्धवस्त्र नार्‍यांकडे बघत मी विचारात गुरफटले. तितक्यात ’ हे ’ आलेच.
"स्विमिंग पूल बघायचाय?" माझा खोचक प्रश्न.  पण तो माझ्या बाजूला उभा राहून  निसर्ग सौंदर्य पाहण्यात इतका मग्न झाला की प्रश्न त्याच्यापर्यंत पोचलाच नाही. ती संधी साधून म्हटलं,
"कपडे धुवायचे आहेत."
"मी आणतो ना धुऊन."
"तू?" मी नुसतीच अवाक होऊन पाहत राहिले. स्विमिंग पूल  दारूसारखा चढला की काय?
"अगं पुलाच्या बाजूलाच असतं यंत्र कपडे धुवायचं. तिथे येतात धुता."
"तरीच" मी माझ्या नजरेत ’तरीऽऽऽच’  मधला भाव आणला.
"अरे पण पैसे, आय मीन डॉलर्स?"
"पंचाहत्तर सेंट मध्ये कितीही कपडे धुता येतात."
"बाप रे, मग रांगच असेल मोठी"
"यंत्र नाही गं यंत्रे असतात तिथे."
"बरं बरं कळलं." असं म्हणत मी भारतातून आणलेली सगळी पोतडी रिकामी केली.
"एवढे कपडे?" तो दचकलाच ढीग पाहून.
"७५ सेंट मध्ये कितीही धुता येतात ना?" तो कपडे घेऊन घाटावर म्हणजे... यंत्राच्या दिशेने गेला.

मी जेवणाच्या तयारीसाठी आत वळले.  पोळीसाठी कुणीतरी ऑल परपज फ्लॉवर मिळतं ते वापरायचं म्हणून सांगितलं होतं. आम्हीही बिनदिक्कत पोतंच आणलं. मी खा किती खायच्या त्या पोळ्या या थाटात आणि नवरा घे गं बाई तुझी एकदाची कणीक या आनंदात.  त्याच उत्साहात मी ते पोतं उघडलं.
’अगं बाई इकडची कणीक पांढरीशुभ्र असते की काय?’ अमेरिकेचं सगळंच बाई पांढरं या कौतुकात मी पिठाकडे पाहत राहिले, विचारायला कुणी नव्हतं म्हणून पिठालाच विचारल्यासारखं. पाणी घातलं तर त्या पिठाचं पिठलं झालं. पोळ्याऐवजी आंबोळ्या मिळाल्या आणि आम्ही आपले, नाहीतरी आंबोळ्या होतच नाहीत फारशा तर खाऊया आता असं दोन महिने ते पीठ संपेपर्यंत म्हणत राहिलो.

घरात रुळलो तसे काही वर्षांनी बाहेरच्या जगात रुळायचा ध्यास लागला आणि मी अमेरिकेतल्या शाळेत बदली शिक्षक (Substitute) म्हणून शिकवायला जायचा बेत जाहीर केला. खिजवल्यासारखा हसला नवरा. तिकडे केलं  दुर्लक्ष पण मुलगा म्हणाला,
"आई, तू गणित शिकवणार शाळेत जाऊन?"
"मग? शिकलेली आहे मी भारतात."
"पण तुला नाणी कुठे येतात ओळखता?"
"तुला कुणी सांगितलं?"
"मी क्वार्टर मागितलं की तू एकेक नाणं काढून त्याच्यावरचं चित्र बघतेस, चित्र कुणाचं ते कळत नाही तुला."
"हे बघ, गांधीजी असतात का त्या नाण्यावर? नाही ना? मग कसं ओळखणार रे?"
"पण मग कशाला बघतेस चित्र?"
"तुला काय करायचं आहे?"
"क्वार्टर म्हणून डाईम देतेस असं सांगत होतो."
 पहिले धडे नाण्याचे घ्यावे लागणार हे लक्षात आलं. नाणी पुठ्ठ्यावर चिकटवून खाली नावं लिहिली. मुलांसमोर फजिती नको.

पहिला दिवस. दुसरीचा वर्ग. मार्च महिन्यातला सेंट पॅट्रीक डे.
गोष्ट वाचून दाखवायची होती. तसं सुरळीत चाललं होतं. Leprechaun इथे गाडी अडली. उच्चार लेप्रचॉन की लेप्रचन? का काहीतरी वेगळाच? मी  एकदा हा एकदा तो, दोन्ही उच्चार करत गाडी हाकली. घरी येऊन म्हटलं आज लेपरचनची गोष्ट सांगितली. मुलाचं आपलं खुसखुस, खुसखुस.
"हसू नको. नीट सांग काय ते."
"लेप्रीकॉन आहे ते" वर म्हणाला, "तू माझ्या वर्गावर येऊ नको. घरीच शिकव मला काय असेल ते."

निमूटपणे मी त्याचा वर्ग टाळला. दुसर्‍या दिवशी थेट संगीताच्या वर्गावर.  सारेगमप ही मला कधी सुरात म्हणता आलं नाही तिथे मी काय संगीत शिकवणार आणि तेही इंग्लिशमध्ये.
मी कार्यालयात गेले. माझे थरथरणारे हात, भेदरलेला आवाज याने काही फरक पडला नाही,
"आज वेळ मारून ने. उद्या कुणालातरी आणतो आम्ही."
धक्काच बसला, माझं काम वेळ मारून नेणं होतं.  मेलं, घरी तसंच, इथेही तेच. कुण्णाला म्हणून किंमत नाही माझ्या कामाची.
रागारागातच वर्गात  सूर लावला. दिवसभर भारंभार मुलं येत होती संगीत शिकायला.  आऽऽऽऽ लावता लावता थकून जायला झालं.  कुणी काही विचारलं की थातूर मातूर उत्तरं देऊन भागत नाही, उलट सुलट विचारत राहतात ही पोरं. एकदा बिंगं फुटतंय असं वाटलं तसं एका मुलाला वर्गाच्या बाहेर काढलं. तो हटून बसला.
"मिस, मी का जायचं वर्गाच्या बाहेर?"
"मला तोंड वर करून विचारतो आहे कार्टा. जा म्हटलं की व्हायचं बाहेर."  तो हटूनच बसला. कारण सांगितलं तसा शेवटी गेला बाहेर. थोड्यावेळाने एक उंच शिडशिडीत माणूस दारावर टकटक करत.
’हा शिक्षक की पालक?’ विचार मनात येतोय तोच तो म्हणाला,
"बरं दिसत नाही मूल बाहेर, आत घे त्याला."
'बरं दिसायला काय ती झाडाची कुंडी आहे?'  हे मनातल्या मनात
मी घरात नाही पण बाहेर जरा टरकूनच वागते. तू कोण सांगणारा वगैरे न विचारता मुकाट्याने त्याला आत घेतलं. नंतर कळलं की शाळेचा प्रिन्सिपॉल होता तो किडकिड्या.

त्यानंतर रोज रात्री इंग्लिश गाणी शिकण्याचा सपाटा लावला मी घरी, कारण इतकं सगळं होऊनही त्या शाळेने माझी सलग पंधरा दिवसासाठी संगीत शिक्षिका म्हणून नेमणूक करून टाकली होती. मुलं कितपत शिकली देवजाणे पण मला बरीच गाणी यायला लागली आणि नवरा, मुलगा दोघांना जी काही इतर गाणी येत तीही विसरले ते दोघं. नवरा तर म्हणाला,
"तसा मी बरा कमावतोय की, तुला खरंच गरज आहे का गाणीबिणी शिकवण्याची?" मी उत्तर न देता मोठ्याने गाणं म्हणत राहिले.

सगळी गोरी मुलं मला तरी सारखीच दिसतात.  त्यामुळे एखाद्या भारतीय मुलाला मी माझं ’लक्ष्य’ बनवायची मैदानावर जाताना.  तिथेही थोडाफार गोंधळ होतोच. सगळी दाक्षिणात्य मुलंही मला एकसारखीच वाटतात.  त्या दिवशी मुलांना खेळायला घेऊन गेले मैदानावर. कसं कोण जाणे पण बाहेर जाताना नेलेली मुलं आत येताना बदलली. ती सुद्धा मुकाट्याने, चलाऽऽऽ म्हटल्यावर रांग करून उभी राहिली आणि आली आपली माझ्याबरोबर. वर्गापाशी पोचल्यावर कुणाचं तरी धाडस झालं,
"मिस...."
"मिस एम" माझ्या नावाची आठवण करून दिली मी.  नुसतं मिस काय...., आदर  म्हणून नाही कार्ट्यांना.
"आम्ही तुमच्या वर्गातली मुलं नाही."
"ऑ?" मला पुढे काय बोलावं ते कळेना. दातखिळी बसल्यागत विचारलं,
"मग माझा वर्ग कुठे आहे? आणि तुमच्या शिक्षिकेला कळलं नाही तुम्ही माझ्याबरोबर निघालात ते?"
"ती सुद्धा तुमच्यासारखीच आहे."
काळजातली धडधड लपवीत विचारलं,
"म्हणजे बदली शिक्षक का?"
"हो."
 हुऽऽऽऽश
आम्ही दोघी बदली शिक्षिकांनी परत मुलांची अदलाबदल केली.

रडत खडत मी बदली शिक्षिकेचं कार्य पार पाडत होते. घरी आले की नवरा आणि मुलगा जादूच्या गोष्टी ऐकायला तयार असल्यासारखी सज्ज असायची. नवरोजी चहाचा आयता कप हातात देत श्रवण भक्तीला तयार. रोज एका चहाच्या कपावर इतकी करमणूक?  त्यांना त्याची फार सवय व्हायला लागली तसा त्यांचा तो आनंद माझ्या पचनी पडेना त्यामुळे एक दिवस हे शिकवण्याचं महान कार्य सुरू केलं तसंच ते बंदही केलं ते दुसर्‍या साहसाला सुरुवात करण्यासाठी.

चाचपडत पावलं टाकायला सुरुवात केलेली ही भूमी आता आम्हाला आमचीच वाटते. नवर्‍यासारखं नातं आहे माझं आणि अमेरिकेचं. म्हणजे, तुझं नी माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना....आम्ही अमेरिकेला ढीग नावं ठेवू पण भारतातले नातेवाईक, मित्रमंडळी  अमेरिकेबद्दल वेडंवाकडं बोलले की नकळत मुलांची कड घेतो तशी या ही देशाची घेतली जाते. असे हे इथले ऋणानुबंध, मायदेशाइतकेच घट्ट!

Sunday, June 23, 2013

बस थांबा

"आई, पट्टा काढू?"
"काढ."
"पण पोलिस आला तर?"
"मग नको काढू."
"पण मला काढायचा आहे."
"कर बाई तुला काय करायचं असेल ते." नेहमीप्रमाणे संभाषणाच अंत.
मी गाडी बसथांब्याजवळच्या सायकल लेनमध्ये थांबवली होती. बसथांब्यावरुन लेकाला आणायचं होतं. जवळपास गाडी थांबवायला जागा नव्हती त्यामुळे हा पर्याय. पण खात्री नव्हती असं थांबवणं कायदेशीर आहे की नाही, तितक्यात.
"आई, पण पोलिसानी पकडलं तर?"  लेक पट्ट्याबद्दल विचार करत होती, मी चुकीच्या जागी  गाडी थांबवली आहे त्याचा.
"बघू. खोटं बोलावं लागेल."
"पण तसं करायचं नसतं, खरं सांगितलं तर  देतील तुला सोडून. तू मला तसंच सांगतेस ना की खरं सांग, मी ओरडणार नाही."
वास्तवात आयुष्य इतकं सरळ नाही वगैरे सांगत बसले असते तर दोन तासांची निश्चिंती. पुन्हा लेकीसमोर नाईलाजाने का होईना पण कधी कधी खोटं का बोलावं लागतं याचे धडे देणं म्हणजे जरा अतिच. तरीही घोडं दामटवत म्हटलं,
"ते नंतर बोलू. फक्त वेळ आलीच तर त्याच्यांसमोर तू खोटं का सांगते आहेस असं म्हणू नकोस."

नाराजीने तिने हुंकार भरला. या सगळ्या यातायातीपेक्षा कुठेतरी लांबवर नेऊन थांबवावी असा विचार करते आहे तोच बाजूला गाडी उभी राहिली. कोण थांबलं अगदी असं चिकटून म्हणून पहाते तोच गाडीवर रंगीबेरंगी दिवे चमकायला लागले आणि माझ्या डोळ्यांसमोर काजवे. आता दोनसे अडिचशे डॉलर्सचा भुर्दंड, घरी नवरा त्याला पोलिसांनी गाठल्यावर मी केलेल्या सरबत्तीचा सूड घेणार, मुलगी, तरी आईला मी म्हणतच होते.... सुरु करणार आणि मी, त्यावेळेस काय केलं असतं तर बरं झालं असतं असं म्हणत सगळ्यांची डोकी काही दिवस खाणार.  सगळ्या विचारांनी एकाच वेळी डोक्यात गर्दी केली. खरं तर त्या रंगीबेरंगी दिव्यांकडे मस्त पाहत बसावसं वाटतं एरवी, म्हणजे ते दुसर्‍यांचा पाठलाग करत असतात तेव्हा, पण आत्ता नुसते अंगावर धावून येत होते. सगळे विचार मनात खोलवर दडपून खिडकीतून बाजूच्या खिडकीत पाहिलं. चेहर्‍यावरची घाबरगुंडी गॉगलमुळे लपली असावी.
"गाडी बंद पडली आहे का?"
"नाही नाही." काय कारण द्यावं या विचारात मी फक्त एकाचवेळी तोंडाने आणि मानेने नाही नाही करत राहिले.
"मग काय झालं आहे?" पोलिस नावाच्या बागुलबुवांनी शांतपणे विचारलं.
आधी ते दिवे बंद करा ना असं म्हणावसं वाटत होतं. पोटात गोळा आला आहे भितीने असं सांगावसं वाटत होतं त्याऐवजी शब्द   बाहेर पडले,
"पायात एकदम गोळा आला म्हणून थांबले आहे दोन मिनिटं." असं कसं सुचलं अचानक? मला खोटं बोलायला जमलं या आनंदात माझा चेहरा घरातल्यांचा पचका झाल्यावर खुलतो त्यापेक्षा कितीतरीपटीने खुलला. खोटं पचलं तर आणखी तो आणखी खुलणार हे निश्चित, मग कदाचित त्या चमचमत्या दिव्यांपेक्षा माझाच चेहरा चम चम चमकणार... एकदम काळजी वाटली. म्हटलं, मग पायात गोळा आला आहे असं वाटणारच नाही पोलिसमहाशयांना. केविलवाणा चेहरा करत पाय बाहेरुन दिसत नसला तरी हलवून, आई गं, ओ, अं, ऊ...असे वेगवेगळे आवाज काढत कण्हत राहिले. पोलिसांनाही तशी घाई नसावी. शांतपणे  पूर्ण शब्द कधी बाहेर येतात याची वाट पहात ते बसून.
"मी दोन मिनिटं थांबते इथेच."  आता कण्हणं पुरे असं वाटल्यावर चेहर्‍यावर पृथ्वीवरचं सगळं दु:ख एकवटलं.
"बरं बरं. कितीही वेळ थांबा. पायात गोळा ठेवून गाडी चालवू नका."  चमचमणारे दिवे मालवून पोलिस महाशय मार्गाला लागले.

"आई, माझा श्वास थांबला."
"काय?...." थरथरणारे हात, पाय  स्थिर करत घाबरुन मागे बघितलं.
"पोलिस बघून. आणि ते काका तुला घेऊन गेले तर म्हणून."
लेकिचा श्वासच थांबल्याने मी खोटं बोलले ते तिच्या लक्षात आलं नव्हतं. नाहीतर इथे भूमिका उलट्या होऊन अर्धा तास खोटं का बोलू नये ह्याचे धडे आईला लेकिकडून. ते टळलं या विलक्षण आनंदाने मी गाडी भरधाव सोडली.  एखाद्या अतिमहत्वाच्या व्यक्तीला जायला जागा देतात त्याप्रमाणे रस्त्यावर माझी एकट्याचीच गाडी आहे असं वाटत होतं, कसले आवाज नाहीत, आजूबाजूला कुणी नाही. शांतता एकदम. दोनशे डॉलर्स वाचले, खोटं पचलं, लेकिला  खोटं बोलले हे कळलं नाही...  आनंद नुसता मनात उसळी मारत होता.

 घरी पोचले आणि लक्षात आलं. मी लेकाला आणायला तिथे गेले होते. गाडीत तो नव्हताच. पुन्हा गाडी वळवली. परत जाताना मात्र या वेळेला सुटले पण मागच्यावेळेस एकदा (नव्हे दोनदा) पोलिसांनी कसं पकडलंच ते आठवत राहिलं.

Tuesday, June 11, 2013

प्रश्न आणि प्रश्न!

"आता तू कधी येणार भारतात?" भारतात परत जाण्यासाठी निघताना बहिणीने विचारलं
"पाहू, तशी ओढ नाही राहिली आता. आई, भाऊच (वडिल) नाहीत ना." दोघींही एकमेकींच्या भावना समजल्यासारख्या गप्प झालो. उगीचच, आपण बहिणी आहोतच एकमेकींना असलं काही  ती म्हणाली नाही किंवा आता तुम्ही दोघी बहिणी आहात, तुमच्यासाठी येईन असं मी तोंडदेखलं म्हटलं नाही. आई वडिल गेले की इतकं पोरकेपण येतं हे ते गेल्यानंतरच कळावं यासारखं माणसाचं दुर्देव नाही हेच खरं.

बहीणीने विचारला तोच प्रश्न तसा खूप जणं फोनवर विचारतात, आम्ही आहोत ना चा दिलासा देतात. मावश्या, काका, मावस, आते भावडं सगळेच. आई वडिलांनी सगळी नाती जपली, त्याचांच वारसा आम्ही राखला याचा कोण अभिमान आम्हाला. आणि तरीही भारतात केव्हा येणार म्हटलं की ती दोघं नाहीत म्हणून जाऊच नये असं वाटतं तेव्हा दाटून येतो उदासपणा, नैराश्य.

भारताची वारी करुन एखादं वर्ष झालं की पुन्हा तिकडे जायचे वेध लागायचे यापूर्वी. शेवटी भारत मायभूमी आहे, सगळे तिकडेच तर आहेत, इतक्या वर्षानंतर सासर, माहेर असं वेगळं उरतच नाही. हे जे सगळं म्हटलेलं, वाटलेलं, अनुभवलेलं.... विरुन गेलं क्षणात? कुठे गेल्या या भावना का त्या खर्‍या नव्हत्याच? खरंच एखाद्या गोष्टीचं समीकरण बदलून जातं असं कायमचं?

प्रश्न आणि प्रश्न!

Tuesday, April 16, 2013

सांत्वन

मैत्रिणीची आई अचानक गेली.  शब्दांनी सांत्वन होत नाही,  जिवलग परत येत नाही हे खरं असलं तरी आठवणीने फोन केला की त्या व्यक्तीला बरं वाटतं या भावनेने तिला फोन केला. पुन्हा ती भारतात मी अमेरिकेत त्यामुळे इतक्या लांबून मुद्दाम फोन केला यानेच तिला गहिवरून आलं.  म्हटलं,
"अगं करायलाच हवा. किती हक्काने ये जा असायची आमची तुमच्या घरात. काकूंचा हसरा, शांत चेहरा, चविष्ट पदार्थ सगळं अजून ताजं आहे मनात. खूप माणसं जोडली तुझ्या आई बाबांनी. नातेवाइकाचंही येणं जाणं असायचं सारखं तुमच्याकडे. सगळे आले असतील ना?"
तिच्या स्वरात कडवटपणा आला.
"आले गं सगळे. पण कशासाठी हाच प्रश्न पडला."
"म्हणजे?" मला काय बोलावं कळेना.
"अगं कोकणात आले होते ना सगळे. कुणाला तयार सांदणं घ्यायची होती, कुणाला कुळथाचं पीठ,  भाजाणी, कुणीतरी कुणालातरी कितीतरी वर्षांनी भेटलं होतं त्यामुळे गप्पा झोडायच्या होत्या. तिथेच कुणालातरी शिवणाचे नमुने हवे होते. सगळं आमच्यासमोर. आईला जाऊन फक्त काही दिवस झालेले असताना. आम्हाला काय वाटेल हा विचार कुणाच्याच मनात डोकावला नसेल का गं?"

तिने मलाच प्रश्न विचारला. उत्तर नव्हतंच. फार विचार करू नकोस म्हटलं आणि फोन ठेवला. खूप रडले. कळत नव्हतं की मी कशासाठी रडते आहे. काकूंच्या जाण्याच्या दु:खाने, माणसातल्या हरवलेल्या संवेदनशीलतेच्या दर्शनाने की हे असंच चालायचं या कल्पनेने, मनाला आलेल्या हतबलतेने! 



माझ्या चविष्ट जगाला भेट द्यायला विसरु नका.


Friday, March 22, 2013

दिवस

"आज आपण रेस्टॉरंट ’डे’ करुया?" माझ्या प्रश्नावर आणि थंड गॅसकडे नजर टाकत घरात वेगवेगळ्या प्रत्तिक्रिया उमटल्या,
मुलगी आनंदाने चित्कारली. मुलाने स्मार्ट फोनवर सगळ्यात महागडं रेस्टॉरंट शोधायला सुरुवात केली. नवरा निर्विकार नजरेने पहात राहिला. नजर निर्विकार असली तरी मन नसतं. त्यामुळे त्या नजरेतला छुपा भाव मला कळलाच.
’कमाल आहे, सरळ सांगावं ना जेवण केलेलं नाही. हे ’डे’ वाढवण्याचं काय खुळ, एकदा सुरु झाला म्हणजे दर आठवड्याला हा ’रेस्टॉरंट डे’ असेल. आधीच भारंभार दिवस लक्षात ठेवावे लागतात.’ त्याच्या मनातले भाव समजल्यासारखं म्हटलं, अरे आज ना ... मासिकाच्या संपादकाचं पत्र आलं आहे,
’दर महिन्याला कोणतातरी ’दिवस’ येतो. तर पुढच्या वर्षीसाठी वेगवेगळ्या ’दिवसां’ वर लिहाल का? असं विचारलं आहे.’
"मग? तू आधीच लिहून ठेवले होतेस ना सगळ्या दिवसांवर लेख?"
"हो, पण मला एन. पी. आर. मुळे एक नवीन दिवस कळला आहे."
बापरे हा शब्द तोंडातून बाहेर न काढण्याचा शहाणपणा त्याच्याकडे आहेच, तो नुसतं,
"अच्छा" म्हणाला. तेवढ्या बळावर मी तो दिवस कोणता ते सांगून टाकलं.
"अरे आज कवी दिवस आहे. म्हटलं कवी दिवस आणि रेस्टॉरंट डे एकत्र करु. म्हणजे माझी कविता वाचून दाखवता येईल, तुम्हाला खाण्याचा आनंद, मला श्रोते मिळाल्याचा. नंतर त्यावर लिहिताही येईल."
"आई, मरु दे आज नकोच रेस्टॉरंट." मुलीने एकदम माघारच घेतली.
"पिझ्झा मागवतो मी. आम्ही दोघं राहू घरी. भांडणार नाही. तू आणि बाबा जा रेस्टॉरंटमध्ये. बाबाला निवांत ऐकता येईल कविता तुझी." पोटाची व्यवस्था करत सुपुत्राने पळ काढला. नवर्‍याचा चेहरा पहाण्यासारखा झाला. त्याने सोफ्यावर बसकण मारली आणि बोटाने आकडेमोडच सुरु केली एकदम.
’मदर्स डे, फादर्स डे, महिला डे, शिक्षक डे, व्हॅलेनटाईन डे, आता हा कवी डे...’ त्याची बोटं अपुरी पडली तर? मुलीने आपलीही बोटं लागलीच तर असावीत म्हणून त्याच्यासमोर धरुन ठेवली. त्या धक्क्यातून तो सावरला थोड्यावेळाने. पण कोडं पडल्यासारखा म्हणाला,
"हा असा एकेकच दिवस का साजरा करतात या प्रत्येक नावाने. त्यादिवशी जे प्रेम, आदर, कौतुक सगळं व्यक्त करतो आपण त्या त्या ’दिवस’ असलेल्या व्यक्तीचं ते रोज  आपल्या वागण्यात दिसलं तर काय बहार येईल ना? म्हणजे मग ही भानगडच उरणार नाही."

"भानगड म्हणजे काय रे? आणि बहार म्हणजे?" मुद्दा सोडून दुसरंच काहीतरी उकरण्यात दोन्ही पोरं वस्ताद. मी मात्र रेस्टॉरंट मध्ये वाचायची कविता पुन्हा एकदा डोळ्याखालून घातली. रेस्टॉरंट डे नाही झाला तरी घरातल्या घरात कवी डे तरी...

Wednesday, February 27, 2013

मॉन्स्यु (?) लझार (Monsieur Lazhar)


 चित्रपटाची सुरुवात होते ती माध्यमिक शाळेतला विद्यार्थी सायमन मधल्या सुट्टीनंतर इतर मुलांच्या आधी वर्गाच्या दिशेने जात आहे या दृश्याने. वर्गाचं दार उघडण्यापूर्वी त्याचं लक्ष दाराच्या आयताकृती काचेतून आत जातं आणि धक्कादायक दृश्यांने तो क्षणभर जागीच खिळतो.  गळफास लावून आत्महत्या केलेली वर्गशिक्षिका. सायमन सुन्न मनाने भिंतीला पाठ टेकून उभा राहतो, घंटा वाजायला लागते तेव्हा  सैरभैरपणे धावत सुटतो. कॅमेरा स्थिर असतो, आपण फक्त सायमनच्या पावलांचे आवाज ऐकत रहातो. त्यानंतर दिसतात ती मैदानातून परत आलेली मुलं, त्यांच्या शिक्षिका त्यांना वर्गात न जाण्याच्या देत असलेल्या सूचना आणि पुन्हा बाहेर जाणारी मुलं. ॲलिस मात्र या गोंधळातूनच हळूच दाराच्या फटीतून आत डोकावते.  पुन्हा एकदा गळफास लावून घेतलेली शिक्षिका आपल्याला दिसते. लांबून. तिचा चेहरा पूर्ण चित्रपटात कधीही दाखवलेला नाही.

शाळा या दु:खद घटनेतून  बाहेर येण्यासाठी मार्ग शोधत रहाते. भिंतीना नवा रंग दिला जातो.  मुलांनी मोकळेपणे बोलावं म्हणून शाळेतर्फे  मानसोपचारतज्ञाची नेमणूक होते.  दरम्यान, आत्महत्या केलेल्या मार्टिनच्या जागी कुणाला नेमावं या पेचात असतानाच बशिर लझार वर्तमानपत्रात बातमी वाचून बदली शिक्षकाच्या जागेसाठी  शाळेत येतात.  शाळेत घडलेल्या आत्महत्येच्या प्रसंगानंतर काम करायला यायलाही कुणी धजावत नसतं त्यामुळे त्वरित, फारसा विचार न करता लझारची नेमणूक होते.

शिक्षक म्हणून शांत, प्रामाणिक असलेले लझार  आणि ’त्या’ वर्गातल्या मुलांचे सूर मात्र  जुळत नाहीत. फ्रेंच उच्चारातील फरकामुळे अडचणी येत रहातात. त्यातच शिक्षक, पालक सारेच झालेल्या घटनेबद्दल मौन बाळगून आहेत. वर्गातही याबाबत बोलू नये अशा लझारना सूचना आहेत. मुलाने केलेल्या खोडीबद्दल लझारनी मारलेल्या हलक्याश्या टपलीबद्दल त्यांना कोणत्याही कारणासाठी मुलांना स्पर्श न करण्याची ताकिद प्राचार्याकडून मिळते.

मार्टिनच्या आत्महत्येचा परिणाम  प्रत्येकावर झालेला आहे. लझारना मुलांनी मन मोकळं करावं असं वाटतं.  शेवटी या विषयाबद्दल ’ब्र’ ही न काढण्याची सूचना धुडकावून मुलांना बोलायला उद्युक्त करण्याचे प्रयत्न जारी राखतात, मात्र सहशिक्षिकेने सुचवूनही स्वत:च्या जीवनाबद्दल मौन बाळगतात.

 वर्गातली सगळीच मुलं अस्वस्थ आहेत.  सक्त ताकिद असूनही लझार मुलांना ’बोलतं’ करतात. मुलं म्हणतात,
 "प्रत्येकाला वाटतं मार्टिनच्या आत्महत्येने आमच्या मनावर परिणाम झाला आहे पण खरं तर मोठ्यांच्या मनावरच तो तसा झाला आहे."
ॲलिसच्या भावना आपल्यालाही गलबलून टाकतात. हिंसा या विषयाबद्दल बोलताना अचानक  ती म्हणते,
"ही तीच शाळा आहे की जिथे मिस मार्टिनने स्वत:ला गळफास लावून घेतला. कधी कधी वाटतं, मिस मार्टिननी त्यांच्या कृतीने चुकीचा संदेश  का दिला आम्हाला? आम्ही चुक केली की शिक्षा मिळते तशी मला मिस मार्टिनला शिक्षा द्यावीशी वाटते चुकीची गोष्ट केल्याबद्दल. पण आता ती कशी देणार?" ती बोलत असताना सायमन अस्वस्थ होत जातो.
लझारना ॲलिसचे मनोगत पूर्ण शाळेत प्रसिद्ध करावंसं वाटतं, पण प्राचार्यांना मात्र ॲलिसच्या मनोगतात उद्धटपणाची झाक दिसते. मार्टिनचा अनादर वाटतो. लझार म्हणतात,
"कोणालाही जीवन संपवाव असं वाटतं यासारखी दु:खद घटना नाही आणि  शिक्षकी पेशा असलेली व्यक्ती त्यासाठी शाळा निवडते ह्याबद्दल मनात विषाद दाटून येतो. शाळेत गळफास लावून मुलांच्या बाबतीत मिस मार्टिनने जे केलं तो अनादर आहे. मुलांच्या भावविश्वाचा केलेला अनादर."

 सायमनचं वागणंही विचित्र होत चाललेलं आहे. त्याला शिक्षा करावी की नाही यावर शिक्षक, प्राचार्य कुणामध्येही एकमत नाही. लझार, मिस मार्टिनच्या कृतीमुळे सायमन अस्वस्थ आहे, त्याच्या मनावर या घटनेचा विपरीत  परिणाम झाला आहे हे कळकळीने पटवून द्यायचा प्रयत्न करतात पण याबाबत कुणीही त्यांच्याशी सहमत नाही. काही काळाने सायमनच्या  वागण्यातल्या विसंगतीचा उलगडा होतो तेव्हा मुलं किती पटकन स्वत:ला परिस्थितीबद्दल दोष देतात, जबाबदार धरतात ते पाहून हेलावून जायला होतं.

 लझारना शेवटी ती शाळा सोडून जाण्यासाठी भाग पाडलं जातं. अगदी ताबडतोब. का...? मुलांचा निरोप घेण्याची त्यांची विनंती प्राचार्य नाईलाजाने मान्य करतात. काय होतं या शेवटच्या प्रसंगात? का आग्रह असतो  लझार यांचा विद्यार्थ्यांचा निरोप घेण्याचा ...?

फिलीप फलारड्यू लिखित आणि दिग्दर्शित फ्रेंच भाषेतील हा चित्रपट आहे. युरोपमधील विनोदी कलाकार म्हणून ओळखल्या जाणार्‍या फेलाग या नटाने लझारची भूमिका केली आहे. तर सोफी नेलसी आणि एमलिन निरॉन या दोन मुलांनी ॲलिस आणि सायमनच्या भूमिका सुंदररित्या साकारल्या आहेत.

परकिय भाषेतील भाषांतरीत संवाद वाचताना चित्रपटातील दृश्य पुढे सरकून जातं म्हणून चित्रपट पहाण्याची उत्सुकता वाढावी इतपत ही  कथेची ओळख.


(हा चित्रपट नेटफ्लिक्स वर आहे)

Tuesday, February 19, 2013

आकाशवाणी

काही वर्षापूर्वी, रत्नागिरीला गेले तेव्हा आवर्जून आकाशवाणीत गेले. सगळ्यांची भेट होईल, जिथे काम केलं ती जागा  पुन्हा पहावी, ’ऑन एअर’ चा लाल दिवा डोळ्यात साठवावा, गप्पा झाडायचो त्या भोजनालयात जाऊन पुन्हा हसावं खिदळावं असं काही बाही मनात होतं. पण अवकळा पसरलेलं ते केंद्र विषादाचा चरा उमटवून गेलं मनावर. मी काम करत असतानाची सगळी जणं कामाच्या वेळा वेगळ्या असल्याने ठरवूनही तिथे एकत्र भेटणं कठीणच होतं.  जिथे हक्काने ’आवाज’ फुटायचा तिथे मनातल्या भावना शब्दाने व्यक्त कराव्याशा वाटल्याच नाहीत.  सरकारी आकाशवाणी केंद्रांची अवस्था आता कशी आहे याची कल्पना नाही, पण सात आठ वर्षापूर्वी फार बिकट होती.
परतीच्या मार्गावर ’आकाशवाणी’ मनात पिंगा घालत राहिलं. पार शाळेच्या उंबरठ्यापाशी घेऊन गेलं.

रात्री साडेनऊला लागणारं कॉफीहाऊस, प्रपंच मालिका, सकाळी सात, दुपारी दिड, संध्याकाळी सात आणि रात्री आठ वाजता लागणार्‍या प्रादेशिक आणि राष्ट्रीय बातम्या.
कॉफी हाऊसमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे, विजय कदम आणि भाग्यश्री जोशी. हसत खेळत युवावर्गांच्या गप्पागोष्टी असायच्या ह्या. प्रपंच मध्ये प्रभाकर पंत, मीना वहिनी आणि टेकाडे भावजी. त्यातल्या मीना वहिनी म्हणजे नीलम प्रभु (करुणा देव), आवाज आणि उच्चारांचा त्यांच्या इतका प्रभावी वापर केलेलं कुणी पाहिलं नाही मी अद्यापपर्यंत.  त्यांनी केलेल्या  एका श्रुतिकेतील मुलगी, मध्यमवयीन आणि वृद्ध स्त्रीचे आवाज ऐकून मला कितीतरी दिवस दुसरी नीलम प्रभु व्हायचं होतं :-).

जुन्या आठवणींबरोबर आकाशवाणीत काम करत असतानाचेही दिवस पिंगा घालत राहिले. ज्या जगाचं आकर्षण होतं त्या जगात डोकावयला मिळालं. काम करायला मिळालं. सुरुवातीला आकर्षण होतं ते आकाशवाणीची गाडी पहाटेच्या कामाच्या वेळेला न्यायला घरी येते त्याचं. कुण्णीतरी अगदी मोठ्ठं झाल्यासारखं वाटायचं गाडीत बसताना. आकाशवाणीत पोचलं की कार्यक्रम काय काय आहेत ते पहायचे, पटापट निवेदन लिहायचं आणि कार्येक्रमाचं सारं सामान घेऊन स्टुडिओत. खाक खुक करुन आवाज नीट आहे ना हे पाहिलं की पहिल्या कार्यक्रमाची तबकडी घालून ठेवायची. आणि मग ’ऑन एअर’ चा लाल दिवा कधी लागतोय त्याकडे नजर ठेवून बसायचं. एकदा का तो दिवा लागला की आपले आपण, म्हणजे  काही गोंधळ होईपर्यंत. तसा तो व्हायचाही अनेकदा. आवाजात चढ उतार आणत सगळं काही बोलून झालं की अचानक गडबडीने तंत्रज्ञ आत घुसायचे. बटनं चुकीची दाबल्यामुळे किंवा न दाबताच बोलल्याने श्रोत्यांनी काहीही ऐकलेलं नसायचं. मग, माफ कराही अशा झोकात यायचं की काही तरी फार मोठं श्रोत्यांना सांगतोय असा आव यायचा त्यात.

निवेदकांमध्ये आपापसात स्पर्धा असायची ती सूर मनी रंगती आणि आपली निवड हा संगीताचा कार्यक्रम सादर करताना. अस्सं काही निवेदन असायचं ना प्रत्येकाचं. एकतर श्रोत्यांकडून वाहवा मिळावी हा हेतू आणि कार्येक्रम अधिकार्‍यांकडून मिळणारी श्रेणीही महत्तवाची.
एक आठवण कायमची मनात रुतली आहे. गाणं होतं, ती गेली तेव्हा.... दोन ओळी ऐकून पूर्ण गाणं काय आहे याचा अंदाज घ्यायचा आणि निवेदन लिहायचं. ती गेली तेव्हा पाऊस निनादत होता.... या गाण्याला माझं निवेदन होतं ते प्रेयसी प्रियकराला भेटून निघाली आहे अशा अर्थीचं. वयाच्या २१, २२ वीशीचा हा परिणाम. निवेदन संपलं, गाणं सुरु झालं. आणि हातापायातलं त्राणंच गेलं. ती आई होती म्हणूनी.... ऐकलं आणि काय गोंधळ केला आहे ते लक्षात आलं. कहर म्हणजे, एकाच गाण्याकडे निवेदक किती वेगळ्या दृष्टीने बघू शकतो याचं श्रोत्यांना कौतुक वाटलं होतं.

आकाशवाणी रत्नागिरीहून मुंबईला गेले. कामावर हजर होण्यापूर्वी साहेबांची भेट घ्यावी म्हणून त्यांच्या खोलीत गेले. टेबलाची रचना विचित्र होती की माझा गोंधळ उडाला होता कुणास ठाऊक. खोलीत कुणीच नव्हतं. मी एका खुर्चीवर बसले. थोड्यावेळाने साहेब आले. मी उठून उभी राहिले आणि हात जोडून नमस्कार केला. पुन्हा बसले. ते आपले उभेच. काहीतरी चुकतय असं वाटत होतं पण काय ते कळत नव्हतं. काही वेळ असं बोलणं झालं आणि मी म्हटलं,
"सर, तुम्ही बसा ना." ते म्हणाले,
"तुम्ही माझ्या खुर्चीवर बसला आहात."
"ऑ?" विजेचा धक्का बसल्यासारखी उठले. मुंबई आकाशवाणीची सलामीची भेट झडली ती अशी.

एकदा कोणतातरी कार्येक्रम ध्वनिमुद्रित केला होता. चुकून त्यावर आणखी एक कार्यक्रम टेप केला. मग पुन्हा त्या कलाकारांना बोलवून ध्वनिमुद्रण, मुंबईसारख्या ठीकाणी पुन्हा सर्वांना एकत्र आणण्यासाठी केलेली शाब्दीक कसरत अजूनही आठवते.

एक ना अनेक प्रसंग काही हसवणारे, महान कलाकारांची भेट झाल्याचा आनंद मिळवून देणारे, काही हातपाय गाळणारे तरीही सगळे मंतरलेले...


(इंद्रधनु - तुझ्या पोस्टमुळे या आठवणींना उजाळा मिळाला. धन्यवाद.)

Thursday, February 14, 2013

वयाची ऐशीतैशी...

मंडळाचा कार्यक्रम छान रंगला. आलेल्या पाहुण्यांना पुष्पगुच्छ देण्यासाठी तरुण कार्यकत्याने मीनलच्या नावाचा पुकारा केला,
"आता मी मीनलताईंना विनंती करतो...."
मीनलच्या आजूबाजू्ला असलेल्या आम्ही मीनलताई म्हटल्यावर फिस्सऽऽऽ करुन हसलो. ती पण पदर फलकावित, ताईऽऽ काय..., किती स्वत:ला लहान समजायचं ते असं काहीसं पुटपुटत पुष्पगुच्छ देण्यासाठी गेली.
मीनल परत येऊन बसल्यावर ताई, माई, अक्का असे विनोद करुन झाले. आणि मग मनात तेच घोळत राहिलं.

घरी आल्याआल्या मेकअप पुसला. चेहरा खसखसा धुवून न्याहाळते आहे तोच लेक डोकावली.
"किती निरीक्षण करते आहेस स्वत:चं."
"अगं पिल्लूऽऽऽ..."
"इऽऽऽऽऽऽऽऽ, पिल्लू काय गं, मी काय आता लहान आहे का?"  पिल्लूला पंख कधी फुटतील याची घाई.
"अगं केस पांढरे झाले आहेत का काय ते पाहते आहे."
" ग्रेसफुली एजिंग आई, ग्रेसफुली एजिंग. पांढरे केस चांगले दिसतात, कशाला ते रंग बिंग लावायचे?."
"ए, ते  ग्रेसफुली एजिंग नट्यानांच शोभतं हं. म्हणजे सगळे उपाय करायचे, उपाशी तपाशी राहून शरीर थकवायचं पण तरी वय वाढणं काही थांबवता येत नाही की असं म्हणायचं.  वा  रे वा (इथे मी मुलीला ओरडते तशी त्या अदृश्य अनामिक नटीला ओरडले). आणि केस पांढरे होण्याचा आणि वयाचा काही संबंध नसतो." आपल्या दु:खावर आपणच  मलमपट्टी केलेली बरी.

"बरं, तुला इमेल आलं आहे बघ. ’पंखा’ आहे तुझा. लिहलय, मला ’अहो, जाहो’ नका म्हणू, मी तुमच्यापेक्षा लहान आहे." दु:खावर मीठ चोळणार्‍या त्या वाक्याने मी मुलीला, माझं इ मेल तू कशाला वाचतेस हे ही विचारायला विसरले.
"ह्यांना कसं काय कळतं कोण जाणे, मी मोठी आणि त्या लहानच असणार ते." लेक ढिम्म उभी बघून मला चेव चढला. " आमचं मेलं सगळं जगासमोर मांडलेलं. तरी बरं, संकेतस्थळांवर फोटो पाळण्यात असतानाचे टाकले आहेत. उभं राहून फोटो काढायचा तर एक पाय पुढे धरुन तो काहीसा वाकवून, मग पोट आत घेऊनच उभी राहते. या कसरती कमी म्हणून की काय चीजऽऽऽ म्हणताना नुकत्याच दि्सायला सुरुवात झालेल्या डोळ्याच्या बाजूच्या  एक दोन (?) सुरकुत्या दिसणार नाहीत असं हसायचं. इतकं करुन्ही  कशा या बायका माझं वय काढतात, स्वत:ला लहान समजतात?"  एखादी शोकांतिका समोर घडत असल्यासारखा चेहरा झाला असावा माझा.
"अगं आई तू लिहतेस ना, त्यातून कळतं तुझं वय. म्हणजे मुलांच्या वयाचे उल्लेख असतात ना त्यावरुन."
मोट्ठा शोध लागला असं वाटलं, चला यापुढे लेखनातून मुलं वगैरे बाद एकदम. खूप आनंद झाला समस्या शोधून उपाय केल्याचा म्हणजे  ’सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही......’  संपल्यासारखं वाटलं. पण काही क्षणच. प्रश्न पडला, मग मी लिहू तरी काय? माझी ही इतकी ’गुणी’ मुलंच तर सातत्याने विषय पुरवत असतात भलतंसलतं वागून माझ्या लेखनाला. माझ्या विनोदाचं मर्मस्थानच नष्ट केल्यासारखं होईल अशाने. तितक्यात लहान मुलाची समजूत घातल्यासारखी मुलगी म्हणाली.
"पण खरं तर तू आहेस त्यापेक्षा पाच वर्षानी लहान दिसतेस ते त्यांना कसं माहित असणार ना? ते वाचक आहेत प्रेक्षक नव्हेत."
"खरंच? म्हणजे काय वय वाटत असेल गं माझं?" उत्तर काय येतं याची धाकधूक होती परिक्षेला बसल्यासारखी.  पण त्यातून तरुन निघाल्याचा आनंद वाढवतील ती आपली मुलं कसली.  गणिताची बोंब असल्यासारखा लेकीचा हिशोब चुकला. माझ्या वयातली पाच वर्ष कमी होण्याऐवजी दहा वाढली. माझ्या एकाचवेळी पडलेल्या, लटकलेल्या, रागावून लाल झालेल्या चेहर्‍याकडे पाहून धोक्याचा इशारा तिने अलगद झेलला. विषयाचं तोंड दुसरीकडे फिरवण्याचा चतुरपणा ती वडिलांकडून शिकली आहेच.

"आई, तुझं बाई काही समजत नाही.  इकडे सर्वांनी तुला अगं तुगं करावं असं वाटतं, पण आपण मागच्यावेळी पुण्यात दुकानात गेलो होतो....."
ती काय विचारणार ते लगेच कळलं. पोरगासा दुकानदार.

"इकडे ये." हातातली थप्पी दाखवत तो म्हणाला. नुकत्याच मिसरुड फुटलेल्या मुलाकडून,  ए......ऐकल्यावर  मस्तक फिरलंच.
"मी काही शाळकरी पोरगी नाही. तुम्ही अगं तुगं का करताय?" फुत्कारत प्रश्न टाकला. तो हसला.
"नाही, जीन्समध्ये असलं कुणी की अहो, जाहो नाही करायचं असं बाबांनी बजावलं आहे." कुठे गेला तो तुझा बाबा हा प्रश्न  मी न विचारताही त्याने  जोखला.
"बाबा संध्याकाळी येतात दुकानात."
भरपूर कपडे पाहायचे पण घ्यायचं काहीच नाही. मी मनोमन बदला घ्यायचा ठरवलं आणि तस्संच केलंदेखील.
दोन पौंड वजन कमी केल्यासारखा आनंद झाला बदला घेतल्यावर. त्या आनंदात तरळत नवथर उत्साहात दुकानाच्या पायर्‍या उतरले. आत्ताही चेहर्‍यावर तसे भाव आले असावेत.
"आई...." मुलीने लक्ष वेधलं.
"अगं ते वेगळं. म्हणजे बघ कंडक्टर, रोजच्या कामवाल्या आजी, भाजीवाली सगळे कितीही मोठे असले तरी त्यांनी आपल्याला अगं तुगं करुन कसं चालेल?"
"असंही असतं? आमच्या इंग्लिशमध्ये सगळ्यांसाठी सारखाच नियम असतो."
"हं... ते वेगळं." उत्तर न सुचून पुन्हा ते वेगळं चा सूर पकडला मी.

सध्या माझी मोहीम सगळ्या ब्लॉग ना भेटी द्यायच्या, खालच्या कॉमेंट्स वाचायच्या आणि खुषीने उड्या मारायच्या अशी आहे. म्हणजे प्रत्येकजण या अनुभवातून कधीना कधी जातोच तर हे समाधान त्या खुषीच्या उड्यांमागे.
काही ब्लॉगर्सची आधीच विनंती असते ’अगं/ अरे’ म्हणायची, नाहीतर काही ठीकाणी
मला कृपया ’अहो’ म्हणू नका,  ’सर काहीतरीच वाटतं बुवा’ अशी आर्जवे,
त्याला छोट्यांनी
’नाही तुम्ही मोठे आहात/मोठ्या आहात, मी लहान आहे’  ची जोडलेली पुष्टी. मग ब्लॉगर्सचा प्रश्न
’तुला कसं कळल’
’पोस्ट वाचून.....’ वाचकाचं उत्तर.

रोज भेटणारी कितीतरी माणसं, त्यांनी आपल्याला ’अगं तुगं, अरे’ केलेलं चालत नाही आपल्याला, पण ब्लॉगवरच्या कधीही न पाहिलेल्या मंडळीना मात्र आपला आग्रह किंवा अधूनमधून भेटणार्‍या मैत्रीणींच्या मैत्रीणींनी ही आपल्याला अगं तुगं करावं ही अपेक्षा.... एकूणच लहानांना मोठं व्हायचा ध्यास, मोठ्यांना लहान म्हणवून घ्यायचा सोस आणि लहानांना आपण कित्ती ’ज्युनिअर’ हे ’सिनियर्स’ ना ठणकावून सांगायची घाई..........कीती ही गुंतागुत?

Tuesday, February 12, 2013

माझंही मत...

मुलाबरोबर दिल्लीच्या ’त्या’ घटनेबद्दल बोलत होते. तो एक वर्षाचा असल्यापासून आम्ही भारताबाहेर आहोत त्यामुळे म्हटलं तर तो अभारतीयच पण मुळ भारतीय असल्याचा अभिमान बाळगत तो भारत कसा बदलायला हवा या गुंगीत खूपवेळा असतो. जी वेडी स्वप्न १७ वर्षाचे असताना आम्ही पाहिली तेच आता त्याचं वय, त्यामुळे तोही तेच करतो आहे हे कळतं तरी थोडी वादावादी, तू भारतात रहात नाहीस, तुला तिथली परिस्थिती माहित नाही वगैरे आल्यावर तो म्हणाला,
"तो तुझा देश आहे तसा माझाही."
"अरे पण आम्ही जन्मलो, वाढलो तिथेच. पंचवीशीनंतर पडलो बाहेर."
"पण मी भारताबद्दल बराच अभ्यास केला आहे. तिथल्या चालू घडामोडी माहित असतात मला."
या चर्चेतून तो म्हणाला,
"ठीक आहे. मला काय वाटतं ते मी माझ्या ब्लॉगवरच लिहतो."
"बरं" म्हणून तो विषय संपला.

त्यानंतर कधीतरी त्याच्या मनातले विचार इथे उमटले. त्याने लिहलेली ही पोस्ट, इंग्लिशमध्ये. वाचून आपली मतं त्याच्याच ब्लॉगवर नोदवलीत तर आनंद होईल.

हा त्याच्या ब्लॉगचा दुवा - http://www.chicagoindy.com/2013/01/thoughts-on-2012-delhi-gang-rape.html

तसंच कुणाला ठाऊक आहे का इंग्लिश ब्लॉग कुठे जोडता येतात जसे आपण मराठी जोडले आहेत तसे?

Tuesday, January 22, 2013

मुलांना घरातील कामाचे पैसे...?

सगळ्या मैत्रींणी जमलो होतो. मुलांवरुन बोलताना एकजण म्हणाली,
"मी मुलांना प्रत्येक कामाचे पैसे देते. थोड्या पैशात किती कामं होतात."
"म्हणजे किती आणि कोणती कामं?" माझं कुतुहुल जागृत झालं.
"डिशवॉशरमधली भांडी लावली की ५० सेंट, केर नेऊन टाकला की २५ सेंट, स्वत:ची खोली आवरली की ७५सेंट अशी छोटी छोटी किती कामं असतात  घरात."
पहिला विचार मनात तरळला तो सुट्टे पैसे खूप ठेवायला लागत असतील मग :-) हा. नंतर हेवा वाटला तो स्वत:ची खोली आवरल्याबद्दल पैसे मिळतात  पठ्ठ्यांना याचा आणि  शेवटी प्रश्न पडला की त्या पैशाचं तिसरी चौथीतली ही मुलं करणार काय? एकदा का पैसे हातात आले की त्यांना काय पाहिजे ते घेणासाठी ती हट्ट करणारंच. त्यावर ती म्हणाली.
"हो ना, दुकानात गेलो की  गोळ्या, नाहीतर बबलगम घेतात मुलं त्या पैशातून."
"कष्ट करुन मिळवलेल्या पैशांनी हे घ्यायचं म्हणजे तू चुकीची सवय लावतेयस असं नाही वाटत?"
"नाही. गोळ्या, बबलगम रोज खाणं बरोबर नाही हे तर माहितच आहे त्यांना. हळूहळू पैसे अशा गोष्टींवर खर्च करु नयेत हे ही कळेल."
"मग ती पण तुला पैसे देतात?"
"कसले?"
"तू जेवण करतेस रोज त्याच्यांसाठी, शाळेसाठी डबा देतेस, गाडीने इकडे तिकडे नेतेस.... खूप मोठी यादी होईल."

 मैत्रीणीचं म्हणणं आपली कामं होत असतील तर या गोष्टीचा बाऊ करण्यात अर्थ नाही. पैसे देऊन आपण त्यांना स्वावलंबन शिकवतो, ते कसे वापरायला हवेत याचं शिक्षण देतो.

माझं म्हणणं, ही जी कामं आहेत ती मुलांनी घर त्याचंही आहे या भावनेतूनच, स्वत:ची कामं स्वत:च करायला हवीत या जाणीवेतून किंवा आई, बाबांना मदत म्हणून करायला हवीत, पैसे मिळतात म्हणून नाही. आणि ती भावना पालक म्हणून आपणच त्यांच्या मनात रुजवली पाहिजे. तुम्हाला काय वाटतं?

Monday, January 14, 2013

फेसबुक हे असं...

फॅमिली डॉक्टरकडे गेले होते,  सगळ्या फॅमिलीला घेऊन. निघताना, गाव सोडतोय म्हटल्यावर डॉक्टर म्हणाल्या,
"कीप इन टच"
"तुम्ही फेसबुकवर आहात का?" संपर्कात रहायचं तर तेच प्रभावी साधन आहे  हा त्यामागे माझा विचार.
डाव्या, उजव्या हाताला असलेल्या दोन्ही मुलांच्या रागीट्ट नजरा टाळण्यासाठी डॉक्टरांवर दृष्टी केंद्रीत केली. नाही म्हणजे मुलीने  एकदा विचारलं होतं,
"आई, तू ऑफिसचं काम फेसबुकवर करतेस का?" आणि नवरा, मुलाचं  ठाम मत आहे की फेसबुकचं व्यसन आहे मला.
तर डॉक्टरांनी फेसबुक म्हणजे निव्वळ वेळखाऊ, रिकामटेकड्यासाठी कसं आहे ते सांगायला सुरुवात केली. मी आपलं,
या, या...राईट....यस, यस....पण आम्ही पण कामधंदे करुनच फेसबुक वापरतो, किंवा ते करता करता वापरतो....असे अस्फुट उदगार काढत किल्ला लढवायचा प्रयत्न केला. तो त्यांच्या आवाजापुढे, ठाम मतांपुढे पडला.

पण खरंच फेसबुक हे आयुर्विम्याला जसा पूर्वी पर्याय नव्हता तसंच आहे की नाही? जगातल्या सगळ्या बातम्या फेसबुकवर वाचता येतात. वर्तमानपत्रं त्यापुढे किस झाड की पत्ती. बातम्या वाचून कोपरखळ्याही मारता येतात. आवडलं आवडलं करत शेजार्‍या पाजार्‍यांच्या घरात घुसता येतं, त्यांच्या जगात, त्यांना आवडलेल्या कुणाच्याही घरात डोकावता येतं, म्हणजे परदेशात रहाताना भारतातला जो ’जिवंतपणा’ आपण ’मिस’ करत असतो तो बसल्या जागी एका उंदराच्या साथीने अनुभवता येतो. लोक एखादंच असं वाक्य टाकतात ’पोस्ट’ म्हणून की लहानपणी कोडं सोडवायला सरसावयचो तसं काय म्हणायचं असेल बरं या पोस्टमधून असं म्हणत कोडं सोडवण्याची मज्जा अनुभवता येते. राजकिय मतभेद वाचून  इतकी करमणूक होते की आपलं मत काय होतं तेच विसरायला होतं. आजारी पडलेल्याला हमखास उपाय सुचवता येतात, पाककृत्या कळतात.  कोण कुणाकडे कुणाबरोबर कधी गेलं होतं त्याचा सुगावा लागतो. एक ना अनेक किती गुण गावेत या फेसबुकचे?

थोडक्यात डोक्याला खूप खुराक देतं हे फेसबुक. आपलं व्यक्तिमत्वं अगदी चतुरस्त्र होऊन जातं...
फेसबुक हे असं, पूर्वी आयुर्विम्याला पर्याय नव्हता तसं...

Friday, January 4, 2013

सीमारेषा

महाविद्यालयीन जीवनाबद्दल गोष्टी चालल्या होत्या लेकाशी. त्याचं हे पहिलं वर्ष आमच्यापासून दूर रहाण्याचं.
"मुलं दारु, सिगरेट पितात/ओढतात का तिकडे?" दोन तीन महिने मनात असलेला प्रश्न चाचपडल्यासारखा बाहेर आला. तो हसला अवघडल्यासारखा. पुढच्या प्रश्नाची कल्पना त्याला आधीच आली असावी.
"हो."
"सर्रास?"
"ते मला नाही माहित."
"हं"
" मी पण असतो का त्यात असं विचारायचं आहे ना तुला? मग विचार ना तेच."
मी हसून म्हटलं,
"एकदम तुझा पारा चढायला नको ना म्हणून साधारण चित्र काय आहे ते विचारावं असं वाटलं."
"क्वचित. म्हणजे एक दोनदा थोडीशी घेऊन बघितली आहे."
माझा चेहरा पाहण्यासारखा झाला.
"सिगरेट?" न रहावून विचारलंच
"अजिबात नाही."
माझी चुळबुळ, अस्वस्थपणा वाढला असावा.
"आई, मी प्रामाणिकपणे सांगतोय. सगळीच मुलं करतात हे पण आई वडिलांना खरं सांगत नाहीत."
"अच्छा" म्हणून मी ते संभाषण संपवलं.

एक दोन दिवस अस्वस्थतेत गेले. हे चांगलं नाही वगैरे उपदेश कसा करायचा किंवा करायचा की नाही या विचारात.
"मला एक समजत नाही की तुम्ही पालक दारु पिऊ नका, लग्नाशिवाय शारिरिक संबंध येता कामा नयेत असा धोशा लावता पण मुलांना मोह टाळता आलाच नाही तर त्यांनी काय करायचं ते सांगत नाही."
"म्हणजे?"
"पिण्याचे परिणाम काय काय होऊ शकतात, एकावेळी कमीत कमी म्हणजे नक्की किती घ्यावी, सवयीचं व्यसनात रुपांतर कसं होऊ शकतं, ते झालं तर त्याचे शरिरावर होणारे परिणाम. किंवा गाडी चालवू नका, जो गाडी चालवणार असेल तो दारु पिणार नाही याची दक्षता घ्या, शारिरिक संबंधाबद्दल काळजी घेतली नाही तर काय होऊ शकतं. त्यातून निर्माण होणारे रोग अशा कितीतरी गोष्टी तुम्ही सांगत नाही. आम्हाला महाविद्यालयात ही माहिती देण्यासाठी खास तास आणि परिक्षा असते."
मी फक्त ऐकत होते. महाविद्यालयांची जागरुकता आवडली याबाबतची.
"तू काळजी करु नकोस. मला हे असं करायला वेळच मिळत नाही."
"तू म्हणतोस ते खरं आहे. पण तू आत्ता सांगितलंस तसं करणं म्हणजे पालकांना, आपण अशी माहिती देऊन मुलांना उत्तेजन तर देत नाही ना असंही वाटतं."
"पण नुसतं दारु पिऊ नका, मादक पदार्थांच्या आहारी जाऊ नका असं सांगून तरी काय उपयोग? का ते माहित असलं की मुलं जास्त विचार करतील ना या गोष्टी करताना?"

मी काही बोलले नाही. मुलांशी बोलताना मित्रमैत्रीण व्हावं पण त्याचवेळी पालक म्हणून त्यांनी आपल्याला आदर दाखवावा ही जी आपली अपेक्षा असते त्यातली सीमारेषा इतकी धुसर आहे की ती केव्हाही भंग पावेल असं वाटतं खूपवेळा.

Thursday, January 3, 2013

बदल

महाविद्यालयीन काळात  तावातावाने मारलेल्या गप्पा, मांडलेले विचार आणि त्यातून निर्माण झालेली ही कविता. कविता 'पाडण्याचा' छंद होता त्या काळातली. आज कित्येक वर्ष उलटली तरी सगळं जैसे थे च आहे असं वाटायला लावणारी.

तुम्हाला खोटं वाटेल
पण हल्ली सारं जगच बदललंय
सगळं कसं छान, छान होत चाललंय
माणूस माणसाप्रमाणे वागतोय
देश उन्नतीकडे झेपावतोय!
माणुसकीचाही पूर आलाय
सार्‍या देशाचा नूरच बदललाय
आदर्शवाद अस्तित्वात आलाय
बलात्कार, खून, भ्रष्टाचार हे शब्दच
मुळी नष्ट झाले आहेत
मी म्हटलं ना,
तुम्हाला हे खोटं वाटेल
तसंच झालंय,
समोरचा  माणूस 
विचित्र नजरेने पाहतोय,
कुणापाशी तरी कुजबुतोय
ही वेडी अशीच फिरत असते
अक्रीतासारखं बडबडत राहते!