Thursday, December 11, 2014

प्रश्न

एकदा एका आईला वाटलं
आपण जे अनुभवलं नाही ते 
मुलांना मिळावं
मोकळेपणाने त्यांनी आयुष्य उपभोगावं!

मुलाचा चेहरा उजळला
देहभर ट्यॅट्यु ची नक्षी तो ल्याला
दारुचे ग्लास  रिचवत राहिला
नाईट लाइफच्या धुंदी चा कैफ
शरीरात मुरला 
स्वातंत्र्याचा स्वैराचार हवेत उधळला!

एके दिवशी मुलगा घेऊन आला एका मुलीला
म्हणाला,
कळत नाही लिव्ह इन रिलेशनशिप की लग्न
पण ठरवायला हवं हिच्या गर्भातल्या जीवाचं भवितव्य
माता वदली,
तुला जे वाटेल तेच योग्यं
मी काही बोलणं म्हणजे माझ्याच नियमाचा भंग!

बहिणीने भावाचा कित्ता गिरवला
बाळाच्या आगमनाचा सुगावा लागला
माता वदली,
चल, तुझ्या बॉयफ्रेंडच्या घरी जाऊ
बॉयफ्रेंड आला दारात, बाजूला त्याची आई!
तुझ्या घरच्यासारखं वातावरण आमच्याकडे नाही
लग्नाच्या आधी पोरंबाळं आम्ही होऊ देत नाही.
मुलगी भडकली, आईला म्हणाली,
कुमारी माता होऊ की गर्भपात करु?
माता थबकली, चिंतेत बुडाली
नियमाचा भंग करु  की तुला वाटेल तेच योग्यं म्हणू...?

Wednesday, December 3, 2014

मंडळोमंडळी

राधाने पलंगाच्या बाजूला ठेवलेली डायरी उघडली.
... दिवाळीच्या कार्यक्रमात मी छान गाणं म्हटलं.  ते गाणं आईने आल्याआल्या टी.व्ही. वर लावलंही. आम्ही सगळेच उत्साहाने पहायला, ऐकायला लागलो. पण माझं गाणं ऐकूच येत नव्हतं. आजूबाजूच्या गोंधळाचा, इतरांचा आवाज माझ्या आवाजाहून मोठा होता. माझं गाणं कुणी ऐकलंच नाही म्हणायचं तर. आई चिडली. म्हणाली, फक्त स्वत:च्या  मुलांचे कार्यक्रम पहातात लोकं. ते झालं की झालं गप्पाष्टक सुरू. पण इतरांचे कार्यक्रम चालू असतात तेव्हा ती पण गप्पा मारत असतेच की बाजूला बसलेल्या मावशीशी. मी तिला तसं म्हटलं तर आणखी चिडली. ते वेगळं असं काहीतरी पुटपटली. पण मग मी कशाला म्हटलं तिथे जाऊन गाणं? मला तर बाकीची मुलं पूर्ण वेळ  दंगा करत होती त्यांच्याबरोबर खेळायला आवडलं असतं. बाबा आणि आईच गाणं ऐकणार असतील तर त्या साठी देवळाच्या रंगमंचावर कशाला जायला हवं? घरी रोज  जवळ जवळ १ महिना गाणं म्हणण्याचा सराव आई करून घेतंच होती की.

दिवाळीच्या कार्यक्रमाबद्दल  काय वाटलं ते राधाने चार वाक्यात तिच्या वहीत बंदिस्त केलं आणि क्षणात ती झोपलीही.

*************************
नरेनने घरी आल्या आल्या भारतात फोन केला. तिथल्या नाटकवेड्या मित्रमंडळीपैंकी कुणाशीतरी कार्यक्रमानंतर बोलणं हा त्याचा आवडता छंद. शाळेपासून एकत्र अभिनय केलेली त्याची मित्रमंडळी त्याच क्षेत्रात कार्यरत होती. त्याच्यांशी बोललं की मन शांत व्हायचं नरेनचं. आत्ताही मनातली मळमळ बाहेर पडली. "अरे, चाळीस मिनिटांचा कार्यक्रम केला आज दिवाळीच्या कार्यक्रमात. मजा नाही रे येत तिकडच्यासारखी. इथले कार्यक्रम म्हणजे सगळा हौसेचा मामला. आमच्याच कार्यक्रमाचं ऐक, आवाज, आवाज असं लोकांनी म्हटलं की आम्ही कलाकारांनी आवाज चढवायचे. थोडावेळ सगळं सुरळीत, मग पुन्हा तेच. कार्यक्रम चालू असतानाच वैताग यायला लागला होता. सगळ्यांनी सरावासाठी काढलेला वेळच डोळ्यासमोर येत होता. कार्यक्रम धड ऐकूच जाणार नसेल तर कशाला करायचा? तरी रेटत नेला शेवटपर्यंत आम्ही सर्वांनी. पण त्यातली मजा गेली ती गेलीच. मुळात कार्यक्रमात खरा रस असणारी मंडळी मूठभर. ती बसतात पुढच्या काही रागांमध्ये. उरलेल्यांचा कल स्नेहसंमेलनाला आल्यासारखा. रंगमंचार काय चालू आहे यात रस नसतोच त्यांना. आमच्या कलाकारांनी नंतर मंडळाच्या कार्यकारिणीला घेरलंच. आगपाखड केली. वर्षानुवर्ष हेच चालू आहे. माहीत आहे ना नीट ऐकू येण्याचा प्रश्न येतो दरवेळेस. मग दुसरीकडे का नाही करत? मंडळ आणि देऊळ हेच समीकरण का? नाहीतर आधीच जाहीर करा ना फक्त ध्वनिमुद्रित कार्यक्रमच करा म्हणून. करा फक्त नाच गाण्यांचा कार्यक्रम. आणि तसाही कुणाला काय फरक पडतोय? पहातं कोण नी ऐकतं कोण अशी परिस्थिती. उगाच वेळ फुकट गेला. डोक्याला ताप नुसता. आता पुन्हा पुन्हा तेच सांगू नका,  बाहेर कार्यक्रम करा म्हटलं तर पैशाचा प्रश्न येतो म्हणे. अरे, सभासदांकडून घेता ना तो पैसा वापरा की. करायचा कार्यक्रम तर दर्जेदार करायला नको का? नाहीतर मग जेवण आणि गप्पा असंच ठेवा ना कार्यक्रमाचं स्वरूप. हे आणि अशा प्रकारचं सगळं एकेक करून प्रत्येकजण बोलत होता.  कार्यकारिणीतली माणसं मुकाट ऐकत होती. मला तर वाटलं, कार्यक्रमाला आलेल्या लोकांना अख्ख्या दिवाळीच्या कार्यक्रमात हाच कार्यक्रम अधिक आवडला असेल. सगळी जमली होती ऐकायला." नरेनच्या डोळ्यासमोर फोन ठेवल्यावरही दिवाळीची फटफजिती आणि मंडळाच्या कार्यकारिणीबरोबरची बोलाचाली चांगलीच नाचत होती.
**************************
तबला करून टाकतात लोकं मंडळाच्या कार्यकारिणीवर असलं की. वर्षानुवर्ष आवाज पोचत नाही ही अडचण आहेच. ती सोडवायचा प्रयत्नही करतोय आम्ही. आमच्यापरीने मार्ग काढतो पण येऊन जाऊन पब्लिक झापणार आम्हालाच. कौतुकाचे शब्द नाहीतच. तो साला नरेन पारगावकर आणि त्याचे ते सगळे कलाकार वचावचा ओरडत होते. असं रंगमंचावर ओरडला असतात ना तर तुमचा कार्यक्रम छान ऐकू गेला असता असं सांगायला हवं होतं. पण जाऊ दे. तुम्ही कामं करताय ना मग ऐकाही मुकाट तुम्हीच.  आणि बाहेर करा म्हणे कार्यक्रम. देऊळच कशाला हवं दरवेळेस? एकामागून एक प्रश्न नुसते. प्रश्न सरळ असले तरी उत्तरं अवघड आहेत.  थांब पुढच्या वेळेला तुलाच भाग पाडतो कार्यकारिणीवर यायला मग करा पाहिजे ते. तेव्हा कळेल कशा लोकांच्या मागण्या, दबाब असतो ते. राजकारणच असतं इथेही हे काय माहीत नाही का लेको तुम्हाला? कार्यकारिणीवर नसणार्‍या लोकांच्या मतांचा कसा प्रभाव असतो ते समजायला चालवाच तुम्ही मंडळ पुढच्यावेळेला.  आपलेच दात आपलेच ओठ याची प्रचिती आली की बसाल गप्प. आणि सगळं उच्च दर्जाचं पाहिजे ना, मग मंडळाला पैसे देताना कुरकूर का करता? वर्षाचे पैसे वाढवले  तरी बोंबलणार तुम्ही लोकं.  तोंडाची वाफ झाली दवडून सगळ्यांसमोर. अख्ख्या मंडळाला एक चर्चेचा विषय दिलात बरं पारगावकर तुम्ही. आता पुढचे दोन तीन महिने हा विषय सगळ्यांकडच्या मेजवान्यांना तोंडी लावणं म्हणून पुरणार.... चांगलं केलंत हो, दिवाळी सार्थकी लावलीत.... मनातले विचार कृतीत उतरवल्यागत शेवटची खुर्ची दाणकन भितींशी आपटून केशव देवळाच्या बाहेर पडला.
**************************
नाना सरवटे, मंडळाचे नाना आजोबा संथपणे बाहेर पडले. मनात पाहिलेल्या कार्यक्रमाची उजळणी नाही म्हटलं तरी चालू होतीच. नेमेची येतो....सारखा यावेळचाही दिवाळीचा कार्यक्रम.   मुलांचा किलबिलाट, मोठ्यांचं हसणं, खिदळणं, गप्पा. पण मजा राहिली नाही आता. म्हणजे कार्यक्रमापासूनच सुरुवात झाली. नेहमीप्रमाणे सुरुवात व्हायलाच उशीर. लोकांची वाट पहात वेळेवर आलेल्यांवर अन्याय करतात हे कसं समजत नाही?  एकदा कार्यक्रम दिलेल्या वेळेवर सुरु होतो हे कळलं की पाळतील वेळा पुढच्या वेळेस. पण लक्षात कोण घेतो? आणि मराठी लोकांचा कार्यक्रम म्हटल्यावर सारा कार्यक्रम मराठीतून असेल असं वाटलं होतं. इथे तर मुलांच्या कार्यक्रमांची सुरुवातच हिंदी गाण्याच्या नाचावर झाली. एवढी एवढीशी मुलं कंबरा हलवून नाचतात. विनोदीच वाटत होतं. एकातरी शेंबड्याला त्यातला एखादा तरी शब्द समजत असेल तर शप्पथ. ते होतंय तितक्यात घरच्या देवासमोर म्हणायचं अथर्वशीर्ष रंगमंचावर  येऊन एखादं कार्ट म्हणून दाखवणार. आई, वडिलांची हौस. दुसरं काय? कीर्तन, तमाशा सारं एकाच जागी असं वाटून गेलं क्षणभर. गेली तीस वर्ष गावातच रहाणारे नाना आजोबा गाडीपाशी पोचले. विचारातच त्यांनी  गाडीचं दार ओढलं. आता सवयीने येऊन बसायचं कार्यक्रमांना हेच खरं. ओळखीची जुनी माणसं तर फार फिरकतच नाहीत. तरी कुणी आलं असलं तर म्हणून बसल्या बसल्या ओळखीचा चेहरा धुंडाळायचा. तशी ही नवीन पिढी बरी आहे. मान देतात, विचारपूस करतात. पण ते तितकंच. नवीन ओळखी अशा कुणाशी होत नाहीत. मग बसायचं खुर्चीवर ठिय्या देऊन. पूर्वी कसं, मोजकी कुटुंब, छोटासा कार्यक्रम आणि चहा फराळ झाला की संपली दिवाळी. घरगुतीपणा होता त्यात आणि तोच भावायचा जास्त. आता सगळेजण स्पर्धा असल्यासारखे कार्यक्रम सादर करतात,  तास न तास. जेवणाचा घोळ घालतात. आणि माणसं तर इतकी वाढली आहेत की जत्रा भरल्यासारखी वाटते. नवीन येणार्‍या माणसाचं काही खरं नाही. म्हणजे जत्रेत ओळखी होणार तरी कशा? बसलेली असतात बिचारी हरवललेल्या मुलांसारखी.  पुढच्या वर्षी  फिरकतच नाहीत पुन्हा.  मग आम्ही तयारच मंडळात लोक येत नाही म्हणायला.  आम्ही आपले येतो ते घरी बसून करायचं काय म्हणून. पण घरीच बसावं असं वाटायला लागलं आहे. म्हणजे झालंय काय की  हे संस्कृतीचं वेड अजीर्ण होत चाललं आहे. लादतात नुसते कार्यक्रम एकामागून एक. आणि ही असली अर्धवट संस्कृती किती दिवस उराशी बाळगायची? नीट धरा नाहीतर पूर्णपणे सोडून तरी द्या.... नाना आजोबांनी दिव्यांच्या माळा लावून सजवलेल्या देवळाकडे दृष्टी टाकत गाडी चालू केली. देवळापासून संथ गतीने गाडी दूर दूर जायला लागली पण विचारांचा घोळ कमी न होता नाना आजोबांच्या मनात  सोसाट्याच्या वार्‍यासारखा घोंघावतच राहिला...


http://bmmonline.org/sites/default/files/BMM/BMM/BMM_Newsletter_Dec2014.pdf

Tuesday, December 2, 2014

लेकाच्या... ची कथा

फोन घणघणायला लागला. लेकाच्या फोनसाठी आम्ही विशिष्ट आवाज निवडला होता. खरं तर लगेच फोन उचलू म्हणून तसं केलं होतं. पण घरचाच तर आहे, करेल परत असं म्हणून कुणीच आजकाल ढिम्म हलत नव्हतं. आज मात्र मी तातडीने उचलला. घरातली बाकीची Thanksgiving च्या सुट्टीबद्दल परमेश्वराचे आभार मानत झोपा काढत होती. मला करण्यासारखं काही नसल्याने आलेला फोन तरी वेळेवर उचलावा म्हटलं.
"आई, अग तो मेला, तो मेला, म्हणजे मी मारलं त्याला ठार." चिरंजीव फोनवर आनंदातिशायाने किंचाळत होते. मेला या शब्दाने थिजल्यासारखं होऊन शब्दच फुटेना माझ्या तोंडून.
"आई..."
"अरे, काय केलंस तू? आणि खिदळतोस काय असा?" मी त्याच्यापेक्षा जोरात किंचाळले. तो आनंदाने, मी घाबरुन.
"आधी शांत हो आई, एकदम शांत. आता सांग. मी कोणत्या मोहिमेवर होतो सध्या?" क्षणभर काही आठवेना. म्हणजे, एखादा तास कसा बुडवायचा, सलग १५ तास झोपायचं, आई, बाबांना, शिक्षकांना शेंडी कशी लावायची, फुकट कुठे काय मिळतं त्याचा मागोवा घ्यायचा अशा महाविद्यालयीन मुलांच्या ज्या मोहिमा असतात त्यातलीच एखादी असणार हे नक्की. पण सध्याची कुठली? चुकीचं सांगितलं की एक व्याख्यान. भूमिका बदलल्या होत्या. पूर्वी मुकाटपणे तो आमचं ऐकायचा, आता आम्ही त्याचं.
"अगं उंदीराला पळता भुई थोडी करुन टाकणार नव्हतो का मी?" माझ्या डोक्यात एकदम उंदीर शिरला आणि त्याची Thanks Giving सुट्टीची मोहिम आठवली.

सुट्टीचा पहिला दिवस:
"आई, आज उंदीर दिसला. ईऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ."
"उंदराला कसला घाबरतोस?" त्याने सोयीस्करपणे विषय बदलला.
"टायलरमुळे झालंय. त्याचीच खोली घाण असते. कुठेही बसून खातो शहाणा. अन्न शोधत येतो मग उंदीर"
"चिरंजीव..." काहीही न बोलता त्याला मला काय म्हणायचं ते कळलं.
"तुझ्या हाताखाली १६ वर्ष राहिलो. काय बिशाद आहे माझी स्वच्छता न ठेवण्याची?" पुढे त्याचं हॅहॅहॅ करुन हसणं.
"चिरंजीव..." पुढचं कळल्यासारखं त्याने पुन्हा विषय थोपवला.
"बरं, बरं ते वेगळं. पण काल स्वयंपाकघराच्या मोरीत सगळं पाणी तुंबलं होतं. मी ते तसंच ठेवलं आणि टायलरला टेक्स्ट केलं. तर तो म्हणायला लागला. तू पालापाचोळा खातोस. पालकचं पान दिसतंय."
"मग?"
"मग काय? मी फक्त पालकचं पान काढलं तिथून. बाकी उरलेलं त्याने स्वच्छ करावं."
"पण तो बाजूच्याच खोलीत होता ना? मग बोलायचं त्याच्याशी."
"हॅ, काहीतरीच काय?"
"नाहीतर बाई किंवा बुवाच का नाही तुम्ही स्वच्छतेसाठी लावत?"
"अगं असं काय म्हणतेयस तू आई॓?" त्याला चांगलाच धक्का बसला.
"रोज एकमेकांना छळण्यापेक्षा ते बरं ना?"
"१६ वर्षात तू काय हे शिकवलं आहेस? आपली कामं आपण करावी असं सांगायचीस तू. आपण कधी बाई लावून घर स्वच्छ नाही केलं. तो घाण करणार आणि बाई मी लावू? काहीहीऽऽऽ."
"अरे..."
"मी नंतर बोलतो."

दिवस दुसरा:
"भारतात असतात का उंदीर?" सध्या उंदीर आमचे दिवस चांगलेच कुरतडत होता.
"असतात की."
"आजोबांकडे होते?"
"हो, दोन चार पाळले होते. मांजरासारखे बसलेले असायचे की."
"आई, तू पण ना. पण आई, आज फक्त मी, उंदीर आणि घर! कल्पनाच चित्तथरारक वाटतेय."
"टायलर?"
"तो गेलाय सुट्टीसाठी. मी शोधून काढलंय तो उंदीर कुठून येत असेल ते.  तो आत येवू नये म्हणून बेकींग सोडा, व्हिनेगरचं मिश्रण एकत्र करुन कापडाचा बोळा भिजवला आणि त्याच्या प्रवेशद्वाराशी खुपसलाय."
"अरे, वासाने मेला तर? कुबट वास येईल."
"नाही तो पळून जाईल. आणि मेला तर कॉलेजला कळवेन. ते करतात व्यवस्था पुढची."

दिवस तिसरा:
"तो मेला, मेला, मी मारला..." इथून पुढे वर लिहिलेलं सारं काही झालं. आता प्रत्यक्ष रणभूमीवर.
"अगं, घरी आलो तर वाट बघत असल्यासारखा दारात होता. याचा अर्थ ते भोक बुजवलं तेव्हा तो आतच होता. त्याला बाहेर पडताच आलं नाही."
"तुझी वाट बघत होता. नमस्कार, चमत्कार झाले की नाही?"
"झाले. मी जोरात किंचाळलो, तो घाबरुन लपून बसला. आम्ही एकमेकांशी असेच बोलतो."
"आला की नाही बाहेर?"
"टायलरच्या टॉवेलखाली लपला. तो पण हुशार. बाहेर आलं की आत्मबलिदान हे ठाऊक होतंच त्याला. १५ मिनिटं आम्ही तसेच एकमेकांच्या समोर. अगदी, मारेन किंवा मरेन असंच ठरवलं होतं मी पण."
"बापरे, पण उंदरानेच तुला मारलं असतं तर?" माझ्या विनोदाकडे, सांगितलेल्या कामाकडे दुर्लक्ष करतो त्याप्रमाणे करत तो म्हणाला.
"आईऽऽ ऐक पुढे. मी हातमोजे चढवले, बुरखा घातला. हातात झाडू होतीच."
"हे सगळं कशासाठी?"
"त्याला मारताना तो अंगावर चाल करुन आला तर? मला त्याचा स्पर्श नको व्हायला ना." उंदराबरोबरच्या लढाईची तयारी जय्यत होती.
"तो टायलरच्या टॉवेलच्या वासानेच अर्धमेला झाला बहुतेक. पडला एकदाचा बाहेर. हाणलं त्याला. पळाला. पुन्हा हाणलं. आणि मेला, मेला एकदाचा. अखेर मारलं मी त्याला." उंदराबरोबरची लढाई चिरंजीव जिंकले होते.
"तो धारातीर्थी पडलेला उंदीर कुठे आहे आता?"
"का? फोटो काढून पाठवू? मग तू फेसबुकवर टाकणार असशील."
"हॅ, काहीतरीच काय?" मी म्हणायचं म्हणून म्हटलं पण कल्पना काही वाईट नव्हती.
"त्याचे अंत्यसंस्कार करणार आहे मी."
"म्हणजे नक्की काय?"
"त्याला टायलरच्या टॉवेलमध्ये गुंडाळणार. पांढरं कापड मिळालंच ना अनायसे. नंतर बाहेर नेऊन कचर्‍याच्या पेटीत त्याला विसावा देणार. त्याचं अंतिम विसाव्याचं स्थान."
"शाब्बास चिरंजीव. असेच पराक्रम गाजवत रहा."
"चल, ३ दिवस झोपलो नव्हतो उंदराच्या भितीने. आता Thanksgiving च्या सुट्टीबद्दल परमेश्वराचे आभार मानतो आणि २ दिवसांनी उठतो." चिरंजीवानी फोन ठेवला. सुट्टीतल्या करमणुकीबद्दल मीही चिरंजीवाचे आभार मानले आणि दिनक्रमाला सुरुवात केली.

Tuesday, November 11, 2014

पाश


(मी जवळून अनुभवलेल्या सत्यघटनेवर आधारित कथा . ही कथा मायबोलीच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली आहे.)

"पैकं भरून टाका सायबांचं."

दरडावलेला आवाज ऐकून शरद सावध झाला.
"कोण बोलतंय? आणि हळू बोला. ओरडू नका."

"आमदार निवासात वस्तीला व्हता नवं तुजा भाव. त्यो पैका भरून टाक पटकिनी आसं म्हनतोय मी."

"एकेरीवर येऊ नका आणि आधी कोण बोलताय ते सांगा. माझा भाऊ आमदार निवासात राहत नाही."

"राहात व्हऽऽऽता. तुज्याकडं जो आकडा येईल त्यवडा पैका भरून टाकायचा. 'माजा काई संबंद न्हाई' आसं म्हनायचं नाय. कललं? कललं का नाय तुला मी काय बोलून राह्यलो त्ये?"

"हे बघा, मी पोलिसांकडे तक्रार नोंदवतो तुमची. बसा मग खडी फोडत, म्हणजे समजेल."

"तू माला धमकी द्याया लागला व्हय? आँ? मला धमकी देतो काय? गपगुमान सांगितलं त्ये कर. आन् हा, तुज्या पोराबालांना जपून रहाया सांग. नाय म्हंजी कदी कुनाला अपघात व्हायाचा येकादा. आता येल काय सांगून येतीया व्हय?"

शरदनं फोन आपटला आणि संतापानं तो तिथल्या तिथे येरझारा घालत राहिला. काही सुचेना तसं बाजूला पडलेलं वर्तमानपत्र त्यानं पुढ्यात ओढलं. डोळे अक्षरांवरून फिरत होते पण मनात धमकीचे शब्द घुमत होते, दादाबद्दल विचार येत होते. दादानं लावला असेल का कुणाला तरी हा फोन करायला? दादाची इतकी दुर्दशा खरंच कशी झाली आणि कधी? घरातल्याच माणसांना छळून, त्रास देऊन हा काय साध्य करतो आहे?

त्याच्याचमुळं अकाली प्रौढत्व आलं माथी. कायमचं. मोठ्या मुलाच्या ज्या काही जबाबदार्‍या दादानं निभावायच्या त्या येऊन पडल्या अंगावर. काही आपसूक, काही स्वत:हून ओढवून घेतलेल्या. आणि आतातर अगदी दादाचीसुद्धा. नातं नाकारलं तरी ते बंध तोडता येत नव्हते. त्याची कर्मं निस्तरतानाही काचलेला दोर पूर्ण तुटू नये असंच वाटत राहिलं कायम. उसवलेले धागे जोडणं चालूच राहिलं. पाश नाकारताच आले नाहीत. पण आज दादानं टोक गाठलं. नाही जमणार आता. दादाच्या वागण्याचे रागलोभ वाटण्यापलीकडे त्याचं वागणं जात चाललं आहे. याच मुलाचं घराण्याचा कुलदीपक म्हणून काय कौतुक व्हायचं. त्यात तो परदेशी गेलेला पहिलाच मुलगा तळेकरांच्या घरातला. त्या काळी, जवळजवळ चाळीस वर्षांपूर्वी.

धोपेश्वरची घाटी चढून येणार्‍या दादाकडे अंगणात उभं राहून घरातली सगळी मुलं उत्सुकतेनं पाहत होती. घाटी चढून आलं की जेमतेम आठ-दहा घरांची वाडी. शेजारीपाजारी सगळे तळेकरच. असं ना तसं काहीतरी प्रत्येकाशी नातं एकमेकांचं. सगळ्यांच्याच घरांमधून उत्सुक नजरा बाहेर खिळल्या होत्या. पांढरंशुभ्र धोतर नेसून आप्पा व्हरांड्यात लाकडी दांड्याला धरून उभे होते. सुनेची आणि लेकाची वाट पाहणार्‍या आप्पांच्या चेहर्‍यावर प्रसन्न हसू होतं. माई हातात मीठमोहर्‍या घेऊन उभी होती. वैजू नवीन फ्रॉक घालून मिरवीत होती. दादा आणि वहिनीची पुसटशी आकृती लांबवरून दिसली. मुलं पायर्‍या उतरून अंगणात नाचायला लागली, दादाच्या नावानं त्यांनी आरोळ्या ठोकायला सुरुवात केली. "अरे, दम धरा रे पोरांनो", असं दटावणीच्या स्वरात पुटपुटत आप्पा पुढे झाले. कपाळावर आडवा हात धरून डोळ्यावर येणारं ऊन लपवीत घाटीच्या दिशेने पाहत राहिले. दादावहिनी गड्याच्या मागून धापा टाकत चढ चढत होते. गड्याच्या डोक्यावर दोन-तीन बॅगा एकावर एक चढवलेल्या आणि दोन हातात दोन पिशव्या अडकवलेल्या. सामानाकडे पाहायचं की दादा आणि वहिनीकडे तेच मुलांना समजेनासं झालं होतं. बरीच वर्षं परदेशात राहिलं की रंग गोरा होतो असं सगळ्यांनी ऐकलं होतं. सहा वर्षांनी दोघं भारतात येत होते. दादावहिनीला भेटायला, पहायला सगळेच उतावळे झाले होते.

दोघं अगदी दाराशी येईपर्यंत उत्सुक डोळे त्यांच्यावर रोखले होते. वैजू उगाचच लाजत वहिनीच्या बाजूला जाऊन उभी राहिली. रमाकांत मोठाले डोळे करून दादाकडे पाहत होता. माईने मीठमोहर्‍या ओवाळून टाकल्यावर दोघं आत आली. हातपाय धुऊन त्यांचा चहा होईपर्यंत दोघांच्या हालचालींचा वेध घेत सगळी कसंबसं इकडेतिकडे करत राहिली. चहाचे कप खाली ठेवल्या ठेवल्या दोघांभोवती घर जमा झालं.

वहिनी बॅगा उघडून आणलेल्या भेटवस्तू ज्याच्या त्याच्या हाती सोपवत होती. वैजू तिच्यासाठी आणलेले सुंदर फ्रॉक पाहून हरखली. रमाकांत, शरदसाठी शर्ट आणि घरासाठी रेडिओ. माई, आप्पा रेडिओ लावून बसले. नवीन कपडे घालून सगळी मुलंही त्याभोवती कोंडाळं करून बसली. थोड्याच दिवसांत नव्याची नवलाई संपली पण रेडिओची मात्र सर्वांना इतकी सवय झाली की सकाळच्या बातम्या, संध्याकाळचे कार्यक्रम, रात्रीच्या श्रुतिका, भाषणं - काही ना काही ऐकायला सगळेजण रेडिओभोवती रोज कोंडाळं करून बसायला लागले. दादा आणि वहिनी धोपेश्वरला असेपर्यंत कॅनडाबद्दल किती आणि काय ऐकू असं होऊन गेलं होतं सार्‍यांना. तिकडच्या हिमवृष्टीबद्दल तर कोण कुतूहल होतं सगळ्यांच्याच मनात. दादावहिनींनी कॅमेर्‍यात बंदिस्त केलेले क्षण पाहताना सगळे रंगून गेले. कॅनडाचं चित्र प्रत्येकानं दादावहिनीकडून ऐकलेल्या वर्णनांनी आपापल्या मन:पटलावर रेखाटलं, कायमचं बंदिस्त केलं.

दादा परत आला होता तो कायमचा. पुन्हा कॅनडात न जाण्याचं ठरवून. आता तो कोल्हापूरला स्थायिक होणार होता. आल्या आल्या त्यानं रमाकांत, वैजू, शरद यांच्याबद्दलचे बेत ठरवायला सुरुवात केली. शरद शिक्षणासाठी रत्नागिरीला होताच. वैजूचं लग्न आणि रमाकांतचा महाविद्यालयीन खर्च दादा करणार होता. माईआप्पांनी धोपेश्वर सोडावं, कोल्हापूरला यावं असा आग्रहच त्यानं धरला, तो मात्र आप्पांनी पूर्ण केला नाही. ते दोघं धोपेश्वरलाच राहिले.

दोन-तीन वर्ष भर्रकन गेली. शरद शिक्षण संपवून कमवायला लागला. चिपळूणला स्थायिक झाला. वैजूचं लग्न झालं, रमाकांतचं शिक्षण पूर्ण होऊन तोही नोकरीला लागला. माईआप्पा खूश होते. अधूनमधून दादाकडे, शरदकडे जाऊन रहात होते. या सगळ्याला खीळ बसली ती वैजूच्या आलेल्या पत्रानं.

आप्पांचा त्या पत्रावर काही केल्या विश्वास बसेना. येऊन जाऊन तर होते सारेजण दादाकडे. मग कधी शंका कशी आली नाही? आणि आता आतातर दादा आला होता कॅनडाहून. तो इथे स्थिर झाला, भावंडांनाही त्यानंच मार्गी लावलं, आता प्रपंचातून मुक्त व्हायचं असे मनसुबे रचत असताना हे काय अचानक? परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा ते सुचेना तसं माई, आप्पा पत्र घेऊन चिपळूणला आले. आजही ते पत्र शरदला जसंच्या तसं आठवत होतं.


ती. आप्पा आणि माई,
शि. सा. न. वि. वि.
माझं पत्र पाहून आश्चर्य वाटेल. कितीतरी दिवस येऊन जायचा विचार करते आहे पण जमलं नाही. या वेळेला पत्र लिहिणं अवघड वाटतं आहे. तुमच्या मनाला त्रास होईल असं काही लिहू नये असं वाटतंय पण इलाज नाही. दादाबद्दल लिहायचं आहे. कशी सुरुवात करू आणि काय लिहू तेच समजत नाही. वहिनीनं मला चांगलंच तोंडघशी पाडलंय.

मध्यंतरी दुकान अगदीच चालेनासं झालं होतं. पुढे काय ह्या चिंतेत असतानाच हे कोल्हापूरला कामाकरता गेले होते, तेव्हा दादाची भेट झाली. बोलण्याबोलण्यातून आमच्या परिस्थितीचा अंदाज आला दादाला. दादानं मदतीचं आश्वासन दिलं. मध्ये एकदा तो ओणीला येऊन गेला. वहिनीदेखील आली होती. सकाळी येऊन संध्याकाळी परत गेले दोघं. वहिनी निघताना म्हणाली की मी जर माझे सोन्याचे दागिने दिले तर ती तीन महिन्यात दुप्पट करून देईल. मला आश्चर्यच वाटलं पण तिनं मला अगदी सविस्तर पटवून दिलं. ती हे कसं करणार आहे त्याबद्दल सांगून उदाहरणं दिली. विचार करून मी आधी एक सुंकलं होतं ना माझं शाळेत असल्यापासूनचं, ते दिलं. म्हटल्याप्रमाणे दुप्पट सोनं मला तिनं अगदी महिन्याभरातच दिलं. तीच आली होती घेऊन. मी तिलाच ते सोनं विकून पैसे घेतले. खूप आनंद झाला. दुकानाला मदत झाली ना! जाताना मी तिला माझे लग्नातले दागिने दिले. जवळजवळ सात तोळे सोनं. चौदा तोळे सोनं मिळेल ते आधीसारखंच वहिनीलाच विकायचं, त्या पैशामुळे दुकान फार पटकन उभं राहील पुन्हा, असा विचार केला.

आज या गोष्टीला सहा महिने होऊन गेले. मी तिला पत्रं पाठवून थकले. प्रत्येक पत्राचं उत्तर येतं लगेच. त्यात असतात भरघोस आश्वासनं, माझ्याबद्दलची चिंता, वहिनी मला कशी मदत करतेय त्याबद्दलची खात्री. माझ्या मनात भीतीनं घर केलं आहे. ह्यांना मी हे अजून सांगितलेलं नाही. आप्पा, हे लिहितानाच माझ्या डोळ्यांसमोर तुमचा चेहरा येतोय. मी ह्यांना का नाही सांगितलं हा प्रश्न पडलाय ना तुम्हाला? वहिनीनं चार-चार वेळा बजावून सांगितलं होतं की तिने हा व्यवसाय नव्यानेच सुरू केला आहे, नवखी आहे ती यामध्ये, त्यामुळे लगेच कुठे बोलू नये मी. 'काम झाल्याशिवाय कुणाकडेही, अगदी ह्याच्यांकडे देखील बोलू नकोस' असं पुन्हा पुन्हा तिने सांगितलं त्यामुळे मी गप्प राहिले. आता मी काय करू? सगळे मार्ग संपल्यासारखे वाटतायत. वहिनीला मी हेदेखील लिहिलं होतं की दुपटीचं वगैरे जाऊ देत. तू मला फक्त माझे दागिने परत कर. आता जानेवारी जवळ आला आहे. संक्रांतीला अंगावर दागिने दिसले नाहीत तर ह्यांच्या लक्षात येणारच. काय उत्तर देऊ मी? दादालासुद्धा लिहिलं मी पत्र. तो म्हणतो तुझी वहिनी शब्द पाळेल. एवढंच दरवेळेस. मला सांगा नं काय करू मी?

तुमची,
सौ. वैजू.

पत्र वाचून शरदलाही आश्चर्य वाटलं, धक्का बसला. आप्पांशी बोलून त्यानं लगेच हालचाली करायला सुरुवात केली. रमाकांतला पत्र पाठवून कोल्हापूरला यायला सांगितलं. शरद आणि रमाकांत एकदमच कोल्हापूरला जाऊन पोचले. वैजूही ओणीहून कोल्हापूरला आली. सर्वांना अचानक पाहून दादावहिनीला आश्चर्य वाटलं पण खूप आनंदही झाला. काय करू नं काय नको असं होऊन गेलं. त्यांच्या आनंदात तिघांना सहभागी होणं जमत नव्हतं आणि दागिन्यांचा विषय काढणं अवघड वाटत होतं.

शेवटी दोन-तीन दिवस गेल्यावर दुपारची जेवणं झाली आणि रमाकांतनं विषय काढला.

"दादा, आम्ही खरंतर एका कामासाठी आलो आहोत तुझ्याकडे."
"अरे, मग इतका वेळ वाट कशाला पाहिली? आल्या आल्या सांगायचं ना."
"वहिनीनं वैजूला तिचे दागिने दुप्पट करायचं वचन दिलं होतं."
"बरोबर. ती करणारच आहे ते. काय गं?"
"हो, म्हणजे आज करतेच मी ते काम." वहिनीनं हसून उत्तर दिलं.
"नक्की काय करणार आहेस तू वहिनी? असे दागिने दुप्पट वगैरे नाही करता येत."
"येतात. कॅनडात होतो आम्ही तेव्हापासून एका माणसाला ओळखत होतो. तोही इथे आला आहे कायमचा. मी माझेही दागिने घेतले आहेत ना दुप्पट करून त्याच्याकडून."
"आम्ही दोघं येतो बरोबर. त्या माणसाची भेट घडवून दे." रमाकांत म्हणाला.
"मी जाऊन येते आज आणि कधी भेटायला येऊ ते विचारते. वेळ ठरवून गेलेलं बरं."
"फोन कर ना. दोन-दोन खेपा कशाला? नाहीतर एकत्रच जाऊ आपण." शरदला वहिनीचा उत्साह पाहून चीड येत होती.
"नाही, मला त्या बाजूला मैत्रिणीकडे जायचं आहे. आधी विचारून ठेवते तो माणूस घरी कधी असेल ते आणि मग जाऊ एकदम."
सगळे गप्प राहिले. वैजूनं मात्र वहिनीबरोबर जायचा हेका धरला पण नाना कारणं देत तिलाही थोपवलं वहिनीनं.

वहिनी आणि दादा एकदमच बाहेर पडले. वैजू, रमाकांत, शरद दिवसभर त्यांची वाट पाहत घरात बसून. कंटाळलेल्या, वैतागलेल्या शरदनं वैजूवर आगपाखड केली.
"तू काय अक्कल गहाण टाकली होतीस का दागिने देताना? असे दुप्पट होऊन मिळाले खरंच तर सगळ्या जगानं हेच नसतं का केलं?"
"चुकलं माझं. पण गरज आहे रे पैशांची आम्हाला. वहिनी, दादा मला फसवतील अशी पुसटशी शंकादेखील आली नाही."
"मुळात या दोघाचं हे काय चालू आहे? दागिने दुप्पट करून वहिनीला काय मिळत असेल? पैसे? किती? आणि करायचा काय असा मिळवलेला पैसा? इतकी वर्ष कॅनडात होते तर आर्थिक परिस्थिती व्यवस्थित असणारच ना?" रमाकांतला दादा आणि वहिनी असं का करत आहेत तेच कळत नव्हतं.

"त्यांनाच विचारायला हवं. दोघांनींही काढता पाय घेतलेला दिसतोय. संध्याकाळ व्हायची वेळ आली. आपण बसू भजन करत." शरदला दादाची भयंकर चीड येत होती.

दार वाजलं तसं वैजू उठली. दोघं आले असावेत परत असंच वाटलं तिघांना.
"तळेकर पाहिजे होते." दारात अपरिचित गृहस्थ उभे होते. बरोबर एक स्त्री. बायको असावी.

"ते नाहीत घरी. काही काम होतं?" शरद पुढे झाला.
"तुम्ही कोण?"
"मी भाऊ त्यांचा. कोण आलं होतं म्हणून सांगू दादाला?"
"आम्ही आत आलो तर चालेल का? तुमच्याशी बोललं तर..."
"या ना." शरद बाजूला झाला तसं ते जोडपं आत आलं. अस्वस्थ हालचाली करत उभं राहिलं. रमाकांतने दोघांना बसायचा आग्रह केला.
"सांग आता त्यांना, काय झालं ते. म्हणजे आम्ही काही तुमच्या भावाची तक्रार करत आहोत असं नाही पण..." ते गृहस्थ खुर्चीवर बसत म्हणाले.
"माझा स्वेटर, जॅकेट, पर्स बनविण्याचा व्यवसाय आहे. तळेकर वहिनी म्हणाल्या, तिकडे कॅनडात याला खूप भाव मिळेल. २०,००० रुपयांचा माल तयार करून मागितला. १०,००० रुपये दिले. उरलेले पंधरा दिवसांत देते असं सांगून सगळा माल घेऊन गेल्या. पैसे अजून आलेच नाहीत. चांगल्या ओळखीच्या म्हणून मी असा माल दिला. नाहीतर चुकूनसुद्धा पैसे मिळाल्याशिवाय मी काही हातात ठेवत नाही. फसवलं हो चांगलंच."
"इतक्या चकरा मारल्या हिने. दारच उघडत नाहीत. रोज रडत घरी येते. सुरुवातीलाच मला विचारलं असतं तर ओळख पाळख बाजूला ठेव म्हटलं असतं. कंटाळून शेवटी मी आलो आज. तुम्ही नसता तर सरळ पोलिसचौकीत जाणार होतो."
शरदनं त्यांचं नाव, फोन नंबर लिहून घेतला. दादाला निरोप देण्याचं आश्वासन दिलं तसं ते दोघं निघून गेले.

"चला, वैजू तू एकटीच नाहीस अडकलेली यात समाधान मान आता. आहेत तुझ्यासारखी मूर्ख माणसं." रमाकांत म्हणाला तशी वैजू चिडली.
"रम्या, तू जास्त शहाणपणा करू नकोस. मी चुकले हे मान्य केलंय ना. आता काही मदत करता येते ते पाहणार आहेस की मला मूर्ख ठरवण्यात आनंद मानणार आहेस तू?"
"हे दोघं कॅनडाला जाऊन हेच कौशल्य शिकून आले की काय?" शरदच्या प्रश्नावर रमाकांत हसला.
"स्मगलिंग तर नसतील ना करत? त्यात कुठेतरी फसले असतील. आता सगळं निस्तरायला पैसे पाहिजेत. मग घाला टोप्या अशा ज्याला त्याला."
"काय असेल ते असेल. पण सख्ख्या बहिणीला असं लुबाडायचं? वहिनीतर इतकी प्रेमळ. दादापेक्षा ती जवळची वाटायची. कधी शंका पण आली नाही ती फसवेल अशी." वैजूला आता रडायलाच यायला लागलं होतं.
"बोलून पाहू दादा आणि वहिनीशी दोघं एकत्र असताना. त्यांना पैशाची मदत हवी असेल तर ती करू. पण थांबवा म्हणावं हे आता. आज ते जोडपं आलं. अजून कुणाला फसवलं असेल तर? तळेकरांच्या नावाला चांगलंच काळं फासणार हा दादा." शरदचा संताप संताप होत होता.

संध्याकाळी काळोख पडता पडता दोघं घरी आले. शरद वाटच पाहत होता.
"दादा, अरे काय हे. सकाळी बाहेर पडलेला तू. आत्ता परत येताय दोघं. काय दागिने घडवून आणलेत की काय?"
"हे बघ शरद, चिडू नकोस तू. उद्यापर्यंत वैजूचे दागिने देतो परत. मग तर झालं?"
"अरे, आज आणणार होतास ना? आता उद्यावर गेलं. कोणाकोणाच्या तोंडाला अशी पानं पुसली आहेस रे?"
"कुणाच्याही नाही. असे भलते सलते आरोप करू नकोस."
"एक जोडपं येऊन गेलं मगाशी. त्यांनी जे सांगितलं त्यावरून तरी तसंच वाटलं."
"कोण आलं होतं?" वहिनीच्या चेहर्‍यावर प्रश्नचिन्ह होतं.
"वैजूसारखं आणखी कुणीतरी. फसलेलं तुझ्या गोड बोलण्याला."
"शरद, आम्ही कुणालाही फसवलेलं नाही. देणार आहोत वैजूचे दागिने." वहिनीनं शरदच्या कडवट स्वराकडे दुर्लक्ष करत म्हटलं.
"कधी? किती दिवसांनी? वैजूला पैशाची नड आहे हे माहीत असूनही दागिने घेतलेत. आणि दादा, तू पण वहिनीला सामील आहेस का?"
"सामील? आम्ही काही कुणाला फसवण्याचा घाट घातलेला नाही. उद्या वैजूचे दागिने करू परत." दादानं शांतपणे सांगितलं.
"आणि त्या जोडप्याचे पैसे?"
"त्यांची काळजी तुला कशाला? बोलेन मी त्याच्यांशी आणि देईन त्यांचे पैसे त्यांना. खरंच दुप्पट दागिने दिसले की स्वत:चे घेऊन येऊ नका म्हणजे झालं."
"काय वेड लागलेलं नाही आम्हाला. वैजूचे दागिने परत मिळेपर्यंत आम्ही रहातो इथेच." रमाकांत ठामपणे म्हणाला. वहिनी एकदम रडायलाच लागली.
"तू कशाला रडतेस वहिनी? आम्ही राहू नये इथे असं वाटतंय का?" रमाकांतला वहिनीच्या अचानक हुंदके देऊन रडण्याचं कारणच समजेना.
"रहा रे. घरचीच तर आहात सगळी. पण आपलीच माणसं आपल्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाहीत याचं वाईट वाटलं. घरातलेच असं वागतात मग बाहेरच्यांनी टोकलं तर काय नवल. एक हे तेवढे माझ्या बाजूनं ठाम उभे आहेत." डोळ्याला पदर लावत वहिनी पुन्हा रडायला लागली तसा शरदचा तोल ढळला.

"दादा तुझ्या बाजूनं उभा आहे की तुला सामील ते कळायचं आहे वहिनी. आणि स्वत:च्या नणंदेला लुबाडलंस तेव्हा विसर पडला का तुला आपल्या माणसांचा? कमाल आहे, गेली सहा वर्ष घरात, नातेवाइकांमध्ये कोण कौतुक चालायचं तुमच्या परदेशी असण्याचं. आमच्या दृष्टीनं तुम्ही दोघं हीरो होता आणि परत आल्यापासून काय चालवलंय हे तुम्ही? तळेकरांच्या नावाला काळिमा नाही फासलात म्हणजे मिळवली."

"शरऽऽऽद!" दादा जोरात ओरडला तसा शरद एकदम गप्प झाला.
"काळिमा फासला म्हणे! काळिमा फासायला तळेकरांच्या घरातल्यांनी काय अटकेपार झेंडे फडकवले आहेत?"
"नाही, अटकेपार झेंडे नाही लावलेले पण अब्रूचे धिंडवडे निघतील असंही कुणी वागलेलं नाही आत्तापर्यंत. ते तू करणार असं दिसत आहेच. नाहीतर वहिनी."
"गप्प बस रे. मोठी वहिनी आहे ती तुमची! आणि काय सारखं तिला बोलताय दोघं? वैजूचे दागिने आहेत ना, मग त्या दोघी बघतील काय ते. मोठा भाऊ, वहिनी म्हणून आदर दाखवायचा सोडून बोलताय आपलं तोंडाला येईल ते." दादा तडतड करत तिथून उठला.

चार दिवस राहूनही दागिने परत मिळाले नाहीत. शरद, रमाकांतचा वहिनी आणि दादाच्या साळसूदपणामुळे अंगाचा तिळपापड होत होता, वैजूच्या मुळूमुळू रडण्याचा वैताग यायला लागला होता. शेवटी तिघं आपापल्या मुक्कामी रवाना झाले. शरद मात्र चिपळूणला न जाता धोपेश्वरला गेला. जे काही कोल्हापूरला घडलं ते त्यानं माईआप्पांच्या कानावर घातलं. कितीतरी वेळ शरद काय सांगतो आहे त्यावर आप्पांचा विश्वास बसेना. ते निराश झाले. हताश होत रेडिओवर चालू असलेलं मंद संगीत बटण पिरगाळीत त्यांनी खाडकन बंद केलं.

"मसणात घाला ह्या दादाने आणलेल्या गोष्टी. फॉरेनात जाऊन हेच शिकून येतात की काय? माझ्या हयातीत आपल्या घरातलं आजपर्यंत कुणीही असं वागलेलं नाही. शरद, आता सगळा भरवसा तुझ्यावर. तूच सांग काय करायचं? नाहीतर असं करू. जमिनीचा एक तुकडा विकून टाकतो. वैजूकडे जाऊन परिस्थितीबद्दल स्पष्ट बोलतो. जावईबापूंची मी वैजूच्या वतीनं माफी मागतो. तिच्या स्त्रीधनाचे पैसे देऊ आपण जावईबापूंना. उपयोगही होईल दुकानासाठी. बाकी उरतील ते दादाकडे देऊ."

बोलता बोलता आप्पा थांबले. क्षणभर विचार करून म्हणाले, "नको, त्याच्या हातात नको द्यायला पैसा. त्याच्याबरोबर जाऊ प्रत्येकाच्या घरी. झाल्या प्रकाराची माफी मागू आणि देणं देऊन टाकू. पण लोकांचे शिव्याशाप नको रे आपल्याला. इतकी वर्ष सचोटीने काढली. दादानं धुळीला नको मिळवायला आपलं नाव."

"अहो, आपण दोघं जाऊ या का कोल्हापूरला? काहीतरी अडचणीत सापडले असणार दोघं. तुम्ही धीर द्या. आधार देऊ याची खात्री द्या. मग बोलतील पोरं, मोकळी होतील."

माईच्या बोलण्यावर शरदनं मान डोलावली.
"पहा प्रयत्न करून. आम्ही हरलो. काही नाकारतही नाही आणि परतही देत नाही. तुमच्याशी बोलतील कदाचित मोकळेपणानं." कोल्हापूरला कधी जायचं ते ठरवून शरद चिपळूणला गेला.

ठरल्याप्रमाणे चार दिवसांनी माईआप्पांना घेऊन तो कोल्हापूरला पोचला. दादा हरखलाच दोघांना पाहून. बरोबर शरदला पाहिल्यावर मात्र त्याला कल्पना आली. पण तसं जाणवू न देता त्यानं तिघांचं स्वागत केलं. माईआप्पा अवघडून बसले.

"माई, तुमच्याच घरी आला आहात. आता एक-दोन महिने मस्त आराम करा. आप्पा, तुमच्यासाठी ढीगभर पुस्तकं आहेत वाचायला. वेळ कसा जाईल ते समजणार नाही. रंकाळा आपल्या घराच्या अगदी जवळ आहे. आजच घेऊन जाईन म्हणजे रोजच्या रोज चक्कर मारायला जाता येईल तुमचं तुम्हाला." दादानं हक्कानं सांगितलं. पुन्हा तेच. दोघं इतकी लाघवीपणाने बोलत होती की विषय कसा काढावा तेच माईआप्पांना कळेना.

चहाचा घोट घेत शेवटी आप्पा म्हणाले, "बाबा रे, आम्ही विश्रांतीसाठी नाही आलेलो. तुमचं दोघांचं जे काही चाललं आहे ते ऐकून राहावलं नाही म्हणून आलो. काय ऐकतोय मी दादा तुम्हा दोघांबद्दल? हे बघ, कशात काही अडकला असशील तर सांग लगेच. मी येण्यापूर्वी जमीन विकण्यासाठी गिर्‍हाइक पाहून आलेलो आहे. किती पैसे देणं आहेस?"

"शरदनं चांगलं काम केलेलं दिसतंय. काय रे, इथून गेलास ते धोपेश्वर गाठलंस ना? कशातही अडकलेलो नाही आम्ही. सगळं व्यवस्थित होईल. तुम्ही काळजी करू नका. वैजूला तिचे दागिने लवकरच देऊ कबूल केल्याप्रमाणे." पुन्हा पुन्हा वहिनी आणि दादानं आश्वासन दिलं. शेवटी माईआप्पांनी विश्वास टाकला आणि काही दिवस कोल्हापूरला विश्रांतीसाठी रहाण्याचंही ठरवलं. शरद चिपळूणला परत आला.

ती माईआप्पांची शेवटची खेप बहुधा कोल्हापूरची. त्यानंतर दादा आणि वहिनीनं कोल्हापूरच सोडलं. माईला दादाचा ठावठिकाणा शोधून काढायचा ध्यास लागलेला. आल्यागेल्याला ती दादाबद्दल विचारत राही. धोपेश्वरला आलेल्या देणेकर्‍यांच्या तगाद्यांनी आप्पा खचले, अचानक दहा वर्षांनी म्हातारे दिसायला लागले, एकेकाची देणी फेडत राहिले. शरद आणि रमाकांत आपल्या परीने त्यांना कधी विरोध करत राहिले, तर कधी न रहावून मदत.

त्या दिवशी गणपतीच्या निमित्तानं सारे जमले होते. पाच दिवस म्हटलं तर कसे गेले हेही समजलं नाही. आरास रचण्याची गडबड, बेंबीच्या देठापासून ओरडून आरत्या म्हणण्याचा खटाटोप, संध्याकाळी चहा पिऊन झाल्यावर रवळनाथाच्या दर्शनाला जाणं, पडवीत पत्त्यांचा अड्डा जमवणं असं सगळं चालू असलं तरी प्रत्येकाच्या मनात विचारांची खळबळ होती. विसर्जन झालं, जेवणं आटोपली आणि सुपारी कातरत आप्पा अंगणातल्या बाजेवर पायाची घडी घालून बसले. एकेक करून सगळीच आजूबाजूला येऊन बसली. माईंनी दुधाचा कप आप्पांच्या समोर धरला.

"घर अगदी भरून गेल्यासारखं झालं हो आज. छान वाटलं. दादा आला असता तर जिवाला शांतता लाभती." बाजूच्या पायरीवर टेकत माई म्हणाल्या.

"आम्ही सर्व आहोत त्यात आनंद मान ना माई." वैजू म्हणाली तसं आप्पांनी चमकून तिच्याकडे पाहिलं.

"नाहीतर काय? त्या दादाला नाही कुणाची फिकीर आणि हिचा आपला सतत दादाच्या नावाचा जप. आप्पा, अनायसे माईनेच विषय काढला आहे दादाचा तर माझ्या मनातलं बोलतेच आता." वैजूचा स्वर, आवेश पाहून ती आता आणखी काय सांगणार या शंकेनं आप्पांचा जीव धास्तावला. सगळेचजण शांत झाले.
"आप्पा, दादा तुमचा मुलगा आहे, त्यासाठी तुमचा जीव तुटणार हे ओघानं आलंच पण जमिनीचा एक तुकडा विकू म्हणता म्हणता फक्त एक तुकडाच तुमच्यासाठी शिल्लक राहिला असं होऊन जाईल. मी माझ्या दागिन्यांवर कधीच पाणी सोडलंय. माझ्या घरच्यांचीही तुम्ही काळजी करू नका. घेतले का ह्यांनी पैसे तुम्ही घेऊन आलात तेव्हा? पण आता हे अपराधीपण सोडा. त्या दोघांच्या वागण्याला स्वत:ला जबाबदार धरू नका. दादावहिनीने काहीही संबंध ठेवलेला नाही आपल्याशी तर का तुम्ही त्यांची देणी फेडताय? आधी वाईट वाटायचं पण तुम्ही असे परिस्थितीला शरण जाताय ते बघून राग येतो आता मला. काढून टाका ना आपल्या आयुष्यातून दादाला आता. खूप झालं. भोगला एवढा त्रास पुरे झाला." वैजू काकुळतीने विनवीत होती. गणपतीच्या निमित्तानं सारी भावंडं जमली होती ती ह्या विषयाचा सोक्षमोक्ष लावायचा ठरवूनच.

"आपलेच दात आपलेच ओठ, पोरी. तुझ्या घरचे मोठ्या मनाचे. पण बाकीच्यांचे तळतळाट आपल्या घराण्याला नकोत म्हणून करतोय हे सारं."
"कशाला पण? सगळीकडे तुमचं किंवा आमचं नाव-पत्ता देणार हा दादा पण त्याचा ठावठिकाणा कळू देतोय का? आणि आपल्या परीनं आपण केले प्रयत्न. आता बास." शरद न रहावून बोलला.
"मध्ये दोघं माझ्याकडे रहायला आली होती." रमाकांतच्या बोलण्यावर सगळ्यांनीच चमकून त्याच्याकडे पाहिलं.
"हो, खरं सांगतोय. मलाही दया आली. रहायला जागा नाही. रेल्वेस्टेशनवर झोपतो रात्री असं वहिनी डोळ्यात पाणी आणून सांगत होती. रहावलं नाही मला."
"अरे, मग आहेत कुठे आता? घेऊन यायचंस ना दोघांना." माईच्या स्वरातला ओलावा जाणवला तसा वैजूचा राग उफाळून आला.
"हेच. आपलं हळवेपण घात करतं आहे आपला आणि त्यांचाही. आता इतकं बोलले मी, एवढं ऐकते आहेस आणि तरी निघालीस लगेच धोपेश्वरला बोलवायला. तू सुद्धा कमाल केलीस रमाकांत. कशाला ठेवून घेतलंस?"
"अगं, सख्खा भाऊ आहे तो आपला. वहिनीनं खूप लाड केले आहेत आपले आपण लहान असताना. ते सगळं आठवलं म्हणून एक-दोन दिवस रहा म्हटलं पण त्याआधी शरदशी बोललो."
"हो. मी पण म्हटलं राहू दे. पण तिथेही पुन्हा रंग दाखवलेच त्यांनी आपले."
"काय केलं?" आप्पांच्या आवाजाला कंप सुटला.
"रमाकांतच्याच घरातलं सामान चोरीला जायला लागलं."
"हद्द झाली दादापुढे. हे आपलंच रक्त आहे ना हो?" आप्पांच्या आवाजातली असहायता शरदचं काळीज चिरून गेली.
"रमाकांतनं मग त्यांना तिथून जायला भाग पाडलं." शरदनं पटकन म्हटलं.
"आता कुठे आहेत?" माईने विचारलं आणि रमाकांत चिडला.
"कमाल आहे माई तुझी. तोंडाला काळं फासलं आपल्या. आपण सारेच निस्तरतो आहोत त्यांचे उद्योग. आप्पांवर तर कफल्लक व्हायची वेळ आणली आहे त्यानं आणि तरी माई, तुला ते कुठे आहेत ह्याची चिंता पडली आहे?"

"ओरडू नकोस रे असा. आत्ता वैजूनं फटकारलं. आता तू. चुकलंच माझं. पोटचा गोळा आहे रे बाबांनो शेवटी. येते माया आड. विचार करत रहाते, बाबा काय चुकलं आमचं? पाठवायला नको होतं की काय परदेशात? आणि काही चुकलं असेल तर मग तुम्ही सगळी कशी व्यवस्थित आहात? कितीतरी वेळा वाटतं, की तो गुंतला ह्यात त्याच्या बायकोमुळे. पण मग हा गप्प का रहातो ते समजत नाही. कुठल्या जन्माचं पाप भोगतो आहोत आम्ही कोण जाणे. अब्रूनं राहिलो आतापर्यंत आणि आता काय वेळ आणली आहे या मुलानं. पण नाळ नाही रे तुटत. काळजी वाटते, प्रश्न पडतात. पुन्हा हे विचारायची भीती. चिडता ना तुम्ही सगळेच. तुम्हाला आमच्या पोटातलं ओठावर आणलं त्याचा इतका त्रास होत असेल तर आता नाही हो नाव काढायची दादाचं." माईनं एकदम पड खाल्ल्यावर कुणाला काय बोलावं ते सुचेना. पण रमाकांतनंच सूत्रं हातात घेतली.

"खरंच आता सोडा त्याचं नाव. तुम्हालाच त्रास होतो. मानसिक, आर्थिक दोन्ही बाजूंनी. आणि वहिनीला एकटीला का दोष देता? आपला तो बाब्या असं नका करू. यामध्ये दोघांचाही तितकाच हात आहे. जे काही चाललं आहे त्यावरून आपलंच नाणं खणखणीत असल्याचा दावा करण्यात काही अर्थ नाही. आपल्याला माहीत होता तो हा दादा नाही. किती खेपा मारल्या, दोघांना बोलतं करायचा प्रयत्न केला. वहिनीच्या माहेरच्यांनी पण काय कमी प्रयत्न केले का? पण दोघंही दाद देत नाहीत. एखाद्याला चिखलात रुतायचंच असेल तर नाही गं बाहेर काढता येत माई. आपलाच पाय त्यांच्याबरोबर खोलात जातो, चिखल अंगावर उडायला लागतो..."

रमाकांतचं बोलणं तोडत आप्पा म्हणाले, "मी बोलत नाही म्हणून चिडता. ती बोलते म्हणूनही तिच्यावर चिडता. काय असं वागता रे आमच्याशी? आता एकदा आमची दोघांची बाजू सांगूनच टाकतो. दादाबद्दल सांगता, तक्रारी करता तेव्हा अपराधी वाटतं, त्रास होतो. वाटतं, आपल्या ह्या दिवट्यामुळं बाकीच्या मुलांना का हा त्रास, व्याप? भाऊ झाला म्हणून तुम्ही किती आपलं नुकसान करून घ्यायचं? आता खरंच कंटाळा आला आहे या परिस्थितीचा. रात्ररात्र डोळा लागत नाही. विचार पाठ सोडत नाहीत. रक्तातूनच आलं आहे की काय हे असं वागणं या शंकेनं आपल्या घरात कुणी असं पूर्वी वागलं होतं का याची मन सतत चाचपणी करत रहातं. बाहेर तोंड दाखवायची तर सोयच राहिलेली नाही. कुठेही गेलं की दादाची चौकशी असतेच नातेवाइकांच्या घोळक्यात. आपल्या अगदी जवळच्या नातेवाइकांना तो कुठल्याशा देवळापाशी भेटायला बोलावतो आणि ते जातात. बरं त्यांना दोष काय देणार? त्यांना काही ह्या गोष्टींची झळ लागलेली नाही. त्यानं बोलावलं, भेटावंसं वाटलं म्हणून गेलो भेटायला म्हणतील. खाजवून खरूज काढल्यासारखं करतात रे. फाजील उत्सुकता दिसते बोलण्यातून, डोकावते डोळ्यांतून. आव मात्र असतो काळजीचा. थकलो आता. तुम्हीच सांगा काय करायचं ते." आप्पा बोलायचं थांबले. शरद आणि रमाकांतनं एकमेकांकडे नजर टाकली.

"मी आणि रमाकांतनं खूप विचार केलाय याबाबतीत. असं वाटतंय की वर्तमानपत्रात देऊन टाकायचं, आमचा ह्या व्यक्तीशी काही संबंध नाही म्हणून."
"अरे, काहीतरीच काय. नको रे इतकं टोक गाठायला." वैजूलाच रहावलं नाही.
"मग रहा तसेच. ज्यालात्याला त्या नालायकाचा पुळका. अरे, बघायला या. माझं घर अक्षरश: धुऊन काढलं आहे दोघांनी. आता माझा जम बसला आहे तर लग्न कर म्हणून मागे लागली होतीस ना माई? तुमच्या मोठ्या चिरंजीवांनी सगळं घर खाली केलं आहे. आता पुन्हा जमवाजमव करेपर्यंत कुठला करतो आहे लग्नाचा विचार. एक दिवस जरा बाहेर गेलो तर ट्रक आणून सगळं सामान न्यावं ह्या दोघांनी? सख्ख्या भावाला लुबाडतात, तुझं वाटोळं केलं, आप्पांवर या वयात कफल्लक व्हायची वेळ आली, नातेवाइकांमध्ये, ओळखीपाळखीच्या लोकांमध्ये मान खाली घालावी लागते विषय निघाला की. कुणी नवीन माणूस समोर आलं की भीती वाटते, दादा याचं काही देणं तर लागत नाही ना अशी शंका येते. आणि तू म्हणते आहेस टोक गाठायला नको. ठरवा मग तुम्ही काय करायचं ते नाहीतर बसा देणी फेडत, नशिबाला बोल लावत." रमाकांतचा स्वर टिपेला पोचला.

वाद, चर्चा, चिडचीड होऊन शेवटी रमाकांतनं दादाशी तळेकरांच्या घरातील कोणत्याही व्यक्तीचा काही संबंध नाही, असं निवेदन वर्तमानपत्रात दिलं. त्यादिवशी धोपेश्वरच्या तळेकरांच्या घरात सुतक असल्यासारखं वातावरण होतं. शरदला याची कल्पना असल्यामुळे तो मुद्दाम दोन-तीन दिवस रहायला आला होता. ते वर्तमानपत्र हातात घेऊन रडणार्‍या माईची समजूत घालणं कठीण झालं त्याला.

"माई, आपण सर्वांनी एकत्र मिळून घेतलेला हा निर्णय आहे."
"हो, मला मेलीला मत आहे कुठं! तुम्ही बोलायचं, मी मान डोलवायची. पण असं निवेदन देऊन संबंध संपत नाही पोरांनो. खरं सांगा, संपतो असा संबंध?"
आप्पांनी बायकोकडे नजर टाकली.
"कायदेशीरदृष्ट्या संपतो. त्याच्या कुठल्याही वागण्याला, फसवणुकीला आपण जबाबदार नाही. जमिनीच्या व्यवहाराला त्याच्या स्वाक्षरीची गरज नाही, आपलं जे काही आहे त्यातला वाटा त्याला मिळणार नाही."
"जीव गुंतला आहे त्याचा संबंध कसा संपवायचा?" डोळ्यात येणारे अश्रू लपवीत माईंनी विचारलं.
"आपला जीव गेला की." कठोर स्वरात आप्पा उत्तरले.
"अहो, असं काय बोलता?"

"खरं तेच सांगतो आहे माई. थोडीथोडकी नाही, जवळजवळ पंधरा वर्ष तरी झाली असतील दादाशी संबंध तुटून. जो येतो तो त्याची देणी फेडण्यापुरता. आता एक लक्षात ठेवा. त्याचं नांवही काढू नका. एकदातरी आला का आपल्याला भेटायला तो? दुखलंखुपलं विचारायला? कुणीतरी सांगतं आपल्याला, दादरला दिसला होता, पुण्यात आला होता. इकडे जाऊन भेटून आलो त्याला. आता इतक्या ठिकाणी हा जातो मग आपल्याला भेटावं असं वाटू नये त्याला एकदाही? आता तर घरात फोनही आलाय. फोन करावासा नाही वाटला. आता आपण पिकली पानं याची जाणीव असेलच ना त्यालाही. तोच पोचला आता पन्नाशीला."

"घाबरत असेल हो शरदला, रमाकांतला. वैजूला तोंड दाखवायची लाज वाटत असेल."
"वैजूला फसवलं तेव्हा घाबरला नाही तो? आणि आपल्याला भेटायला आला तर काय आपण लगेच सर्वांना बोलावून घेणार आहोत? म्हणावं तर पोलीसही त्याच्या मागावर नाहीत. संबंध संपले हेच अंतिम सत्य आहे. दोघं कुठेतरी आहेत, आपले आपण जगतायत यावर आता समाधान माना. आणि एक करा. येताजाता मुलांसमोर दादाची चौकशी करू नका. रागावतात मुलं. त्यांना वाटतं, ती इतकं करतात आपल्यासाठी, दादाच्या गुन्ह्यांवरही सतत पांघरूण घालतात आणि आपण मात्र त्याचीच आठवण काढत रहातो."

धमकीचा फोन आल्यापासून हातात धरलेल्या वर्तमानपत्रातली अक्षरं पुसट होत हे सारे प्रसंग ठळकपणे चित्रित होत होते शरदच्या मनात. आप्पांनी दादाचं नाव आता या घरात पुन्हा काढायचं नाही असं माईला बजावून सांगितलं त्यानंतर काही दिवसांनी दोघंही त्याच्याकडे चिपळूणला कायमचे वास्तव्याला आले. आणि खरंच निश्चय केल्यासारखं दोघांनी पुन्हा दादाच्या नावाचा उल्लेखही केला नाही. या ना त्या मार्गानं रमाकांतनं पोचवलेल्या निरोपामुळे एकदा अखेर आप्पांशी बोलायला म्हणून दादाचा फोन आला. आप्पा, माईंशी निदान एकदा तरी त्यानं बोलावं म्हणून चालवलेली धडपड होती ती भावंडांची. पण आप्पांनी त्याच्याशी बोलायलाच नकार दिला. माईची इच्छा असावी पण आप्पांना घाबरुन तिनं नाही म्हटलं असावं असंच वाटलं होतं तेव्हा सर्वांना. आप्पा गेल्यानंतर किती वेळा सगळ्यांनी तिला दादाला शोधायचा प्रयत्न करायचा का विचारलं होतं. पण त्यालाही तिनं ठाम नकार दिला. माईच्या शेवटच्या क्षणी घरातल्या प्रत्येकाला वाटत होतं ती दादाची चौकशी करेल, म्हणजे तशी तिनं ती करावी अशी प्रत्येकाचीच अपेक्षा होती. पण तिनं मौनव्रत धारण केलं. का केलं असेल तिनं असं? जात्या जिवाला एक तपाहून अधिक काळ नजरेलाही न पडलेल्या मुलाची चिंता असणारच. बाकी मुलांचं जीवन फुललं, बहरलं आणि एकाचं अकाली भरकटलं त्याचाच विचार तिच्या मनी अखंड राहिला हे नक्की. मग का नाही तिनं ते व्यक्त केलं? केवळ इतर मुलांचा धाक? त्यांना दुखवू नये ही इच्छा? की आयुष्याच्या अशा पायरीवर ती उभी होती जिथे आता फक्त मृत्यू समीप होता, पैलतीर डोळ्यांना खुणावत होता? त्यापुढे इतरांचं अस्तित्व पुसट होत गेलं असावं? हा प्रश्न आता अनुत्तरीतच रहाणार हे नक्की असलं तरी शरदचं हृदय अधूनमधून कासावीस करून टाकी.

आणि आज हे नव्यानं सुरु झालेलं धमकीचं सत्र. कधी नव्हे तो एक हताशपणा शरदला वेढून गेला. आप्पा म्हणाले होते, दादाशी काही संबंध राहिला नाही निवेदन दिल्यानंतर आपल्या बाजूनं. पण हे झालं आपलं. त्याच्या बाजूनं काय? त्याच्या दृष्टीनं आपण सर्व भावंडंच आहोत अजून. त्याच्या स्वार्थासाठी का होईना तो अप्रत्यक्षरीत्या आपल्याला घट्ट धरुन आहेच. पन्नाशी पार केली तरी याचे उद्योग निस्तरायचं नशीबातून सुटत नाही. आता आणखी किती दिवस, वर्षं हे असंच चालू रहाणार या विचारानं शरदच्या कपाळावरच्या आठ्या गडद झाल्या.

पुन्हा फोन वाजला तसा तिरमिरीत शरद उठला. पलीकडच्या माणसाला बोलायची संधीही न देता ओरडला.
"बंद करा धमक्यांचे फोन करणं. किती पैसे दिले आहेत तुम्हाला त्या तळेकरांनी आमची झोप उडवण्यासाठी?"
"अरे शरद, मी रमाकांत बोलतोय."
"तू आहेस होय. मला वाटलं..."
त्याचं वाक्य तोडत रमाकांत म्हणाला, "धमकीचा फोन. हो ना?"
"तुला कसं कळलं? का तुला पण आला होता?"
"म्हणूनच तुला केला लगेच. कुणीतरी गावठी भाषेत बोलत होतं. आमदार निवासाचे पैसे भरा, भावाला सांगा मुलाबाळांची काळजी घ्या. रस्त्यात एखादा अपघात... असं काही बाही बोलत होता तो माणूस."
"कळलं. मी बोलतो तुझ्याशी नंतर. ही कधीची उभी आहे. माझा चढलेला आवाज ऐकून घाबरली असेल."
"बरं ठेवतो मी. पण मुलांशी बोलून घे. समजावून सांग त्यांना." रमाकांतने फोन ठेवला.

"रमाकांत होता. त्या आधी धमकीचे फोन. दादानं आता मात्र टोक गाठलं आहे. मुलांना अपघात होऊ शकतो अशी गर्भित धमकी देतोय. स्वत:चं धाडस नाही. भाडोत्री गुंडांचा पर्याय वापरतोय मूर्ख." शैलाकडे बघत शरदनं काय घडतंय ते सांगून टाकलं. शैला घाबरुन बसलीच बाजूच्या दिवाणावर.

"तुम्ही पैसे भरून टाका. उगाच नसती डोकेदुखी नको."

"किती वेळा भरू पैसे? आणि हे काय शेवटचं आहे का? तो किंवा मी गेलो की मगच संपणार हे सगळं असं दिसतंय. या ना त्या मार्गानं दादाचे उद्योग निस्तारतो आहोत आपण सगळेच. कितीतरी वर्षं. त्याच्या काळजीनं खंगून आप्पामाई गेले, आम्ही भावंडही असेच भरडत रहाणार त्याची किंवा आमची अखेर होईपर्यंत. थकत चालले आहेत आता देह आणि मनही. पण ही दादाची थेरं काही बंद होत नाहीत."

"अपघाताची धमकी, मुलांना काही होईल हे पहिल्यांदाच आहे. ती दोघं कोणत्या थराला जाऊ शकतील याची निशाणीच म्हणायला हवी ना ही?"
"अशा धमक्यांना आपण भीक घातली तर हे दुष्टचक्र कधी संपणारच नाही. काहीतरी करायला हवं आता निर्वाणीचं."
"अहो, तरुण मुलं आहेत आपली. दादाला धडा शिकवायला जाल आणि एक म्हणता एक होऊन जायचं. आणि हे बघा, मी सांगून ठेवते तुम्हाला एकदाच आणि शेवटचं. या तुमच्या भानगडीतून माझ्या मुलांना काही झालं तर कुणालाच माफ करणार नाही मी. कळलं ना?" शैला एकदम रडकुंडीला आली.
"अगं, मला तरी आवडेल का आपल्या मुलांना काही झालं तर? पोकळ धमक्या आहेत एवढंच म्हणायचं होतं मला."
"आणि त्या तशा नसतील तर?" शरद एकदम गप्प झाला. असा विचारच डोकावला नव्हता मनात. शैलाच्या शब्दांनी शरदच्या अंगावर काटा आला.
"परत फोन येऊ दे. विचारतोच त्याला कोण पैसे देतं आहे फोन करून धमक्या देण्यासाठी. आणि हा दादा... समोर तर येऊ दे कधी. नाहीसाच करून टाकेन." शरदचे डोळे संतापानं रक्त साकळल्यासारखे लाल झाले. दोघं एकमेकांकडे बघत विचारात गुंतून गेले. बराचवेळ. आणि अचानक शरदनं दचकून फोनकडे पाहिलं. फोन पुन्हा एकदा वाजत होता…

Friday, October 24, 2014

शोध

(’मायबोली’ च्या दिवाळी अंकासाठी लिहिलेली कथा )

बस सोल्ल्याच्या फाट्यावर थांबली. घाईघाईत सुयशने रहस्यकथेचं पुस्तक सॅकमध्ये ठेवलं. निखिल, त्याचा मामेभाऊ त्याला घ्यायला आला होता.
"आयला तू अगदी हीरोच दिसतोस."
"म्हणजे कसा?" सुयशने केसाची झुलपं उडवित विचारलं.
"ए, लगेच भाव खाऊ नकोस. चल आता."
"कसं जायचं?" सॅक पाठीवर अडकवून सुयश तयार होता.
"चालत. अर्ध्या तासात पोचू."
"ठीक आहे. चल ना मग." दोघं लांब लांब ढांगा टाकत चालायला लागले.
"मागच्यावेळेस आलो होतो तेव्हा चौथीत होतो. वेगळंच वाटतं आहे गाव आता."
"अरे गाव काय बदलणार. आता तू मोठा झालास त्यामुळे वाटत असेल तसं." निखिल हसत म्हणाला.
"तू कबूल केलं आहेस फोनवर. लक्षात आहे ना?" सुयशने खात्री करण्यासाठी विचारलं.
"आहे की. आता आहेस ना आठ दहा दिवस मग दाखवतोच."
"दाखव. उगाचच काहीही थापा मारत असतोस."
"पैज लावू या? मग चड्डी पिवळी करू नकोस." सुयश जोरात हसला.
"तू अगदी मामासारखा बोलतोस. घाणेरडा आहेस. पण खरंच  असलं काही नसतं यार." सुयशला निखिलचं म्हणणं पटतच नव्हतं.
"तुला पुरावाच पाहिजे ना? आज रात्री जागायची तयारी ठेव."
"चालेल. दाखवच तू मला." थोडावेळ दोघं न बोलता रस्ता तुडवत राहिले. तांबड्या मातीच्या त्या रस्त्यावर चिटपाखरूही नव्हतं. एका बाजूला डोंगर दुसर्‍या बाजूला खळाळणारी तारी नदी.
"तुला ते सावे काका आठवतात का?"
"सावे काका? कोण हे?"
"आहेत. विसरलास तू. त्यांनी या रस्त्यावर मला ते, तसं दाखवलं होतं."
"ते, तसं?"
"भूत रे."
"रस्त्यावर भूत?"
"हो. म्हणाले पहायचं आहे ना. दाखवतोच. मग घाबरायचं नाही. घाबरलो होतो पण म्हटलं बघू तर."
"मग?"
"मग काय? अरे, दिवसा उजेडी एकदम अंधार झाला. डोळे ताणून ताणूनही काही दिसत नव्हतं. त्यातच कुणाच्या तरी किंकाळ्या, आरडाओरडा, कुणीतरी जोराजोराने हाका मारत होतं पण कुणाला ते काही केल्या कळत नव्हतं.  मागे पुढे नुसती माणसंच माणसं आहेत, घेराव घातलाय सगळ्यांनी असं वाटायला लागलं."
"खरंच? घाबरलास तू?"
"हो. सावेकाकापण दिसेनासे झाले. मग ओरडायला लागलो. बेंबीच्या देठापासून ओरडलो. तर एकदम प्रकाश. बाजूला काका. नुसतेच हसत होते. एकदम शांत."
"हीप्नोटाइज केलं असेल त्यांनी तुला."
"नाही. भूतच होती ती."
"अरे कसं शक्य आहे. कुणीही बनवतं तुला यार."
दोघांचा वाद रंगला तो घराजवळचा वहाळ  येईपर्यंत. पाण्याने पार तळ गाठला होता. दगडांवरून उड्या मारता मारता सुयशने जोरात विचारलं.
"आज रात्रीचं पक्कं ना?"
"एकदम. सगळीकडे निजानीज झाली तरी आपण बसून रहायचं पडवीत. रात्री बारानंतर बघच तू..."
"ठरलं तर." बोलता बोलता ते घरी पोचलेच.  दिवसभर मामा, मामीने सुयशचा ताबा घेतला. मामा सर्वांची ख्यालीखुशाली विचारत राहिला. मागच्या वेळेस तो आला तेव्हाच्या आठवणी रंगात आल्या. गोठ्यात बांधलेल्या गायी, परसातला भाजीपाला, मागचं भाताचं शेत इकडून तिकडे तो नुसता हुंदडत राहिला ते रात्रीचं जेवण होईपर्यंत.


"ए, बोअर झालो यार. किती वेळ बसायचं असं?" सुयशला कंटाळा यायला लागला, थोडीशी भितीही वाटायला लागली होती. आजूबाजूला गुडुप अंधार. कुठेतरी लांबवर एखादा मिणमिणता दिवा, मध्येच कुत्र्याचं केकाटणं,  अंगणात अचानक अवतरलेला सैरावरा धावणारा उंदीर, घरासमोर अक्राळविक्राळ फांद्या विस्तारुन उभी राहिलेली झाडं, रातकिड्यांची किरकिर...... त्या भयाण वातावरणात काही बोललं तरी आवाज उगाचच घोगरा व्हायला लागला.
"झोपा रे आता. किती वेळ बसणार आहात?" काळोखात माजघरात झोपलेल्या मामाचा आवाज एकदम घुमला. दोघंही दचकलेच. निखिलने बसल्या बसल्या मागे वळून पाहिलं.
"तुम्ही झोपा बाबा. आम्ही बसलोय इथे."
"दार घे ओढून पूर्ण."
निखिलने दार पूर्ण ओढलं. आता  दोघांनाही भिती वाटायला लागली.
"चल रे. आपण झोपू या." सुयश कुजबुजला.
"नको रे. आता दिसतीलच बघ दिवे." निखिल उठायला तयार नव्हता.  दोघांची नजर सारखी  दृष्टी पडेल तिथे दिसणार्‍या उंच, अक्राळ विक्राळ वाढलेल्या झाडांकडे जात होती, त्यातून  चेहर्‍यांचे चित्र विचित्र आकार, माणसांच्या आकृत्या असं काही बाही प्रकट व्हायला लागलं होतं.
"तो बघ, तो बघ. एक दिवा गेला." निखिल कुजबुजला. सुयशने मान उंच करून पहायचा प्रयत्न केला.
"काजवा असेल."
"अजून एक. आता आणखी दोन. बघ, बघ." निखिलने केलेल्या बोटाच्या दिशेने सुयश पहात राहिला. डोळे ताणून दूरवर दिसणार्‍या त्या ज्वाळांकडे पहाताना पलित्यांखाली माणूस दिसतंय का ते पहाण्याचा तो आटोकाट प्रयत्न करत होता. आपसूक तो निखिलच्या जवळ सरकला.
"काय रे? फाटली का?"
"छ्या, पण कुणी पलिते धरले आहेत ते का दिसत नाही?"
"कारण ते अंधातरी आहेत."
"कायतरी पचकू नकोस. कुणीतरी धरलेले आहेत."
"दिसतंय का कुणी?"
"काळोख आहे म्हणून दिसत नाही."
"रात्रीचे बारा वाजून गेले आहेत. इतक्या रात्री माणसं काय करणार तिकडे?"
"तिकडेच रहात असतील."
"बावळट आहेस. कुणी रहात नाही तिकडे. उद्या दिवसा जाऊ आपण. तूच बघ."
"ते पलिते असे नाच केल्यासारखे का फिरतायत?"
"कारण भुतं नाचतायत. च्यायला, सांगत होतो ना  तुला की बरोब्बर बारा वाजले की हे असं सुरु होतं. आता दोन मिनिटात नाहीसं होईल."
"चल, जाऊन बघू या?" सुयशला एकदम चेव चढला.
"पोचायला अर्धा तास लागेल. त्याआधी ते बंद होईल. गावातल्या लोकांनी पण जाऊन बघितलं आहे. तिथे जाऊन बसलं तर काय पण होत नाही. लांबूनच पहायला मिळतं. पण तुला ती जागाच बघायची तर उद्या चक्कर मारु." निखिल म्हणाला.
"नाही. उद्या रात्रीच जाऊ. बारा वाजता." सुयश उठलाच तिथून. कसलं भूत आणि कसलं काय. फालतूपणा. त्याचा या पलित्यांवर अजिबात विश्वास बसला नव्हता.

"अरे, दोघं नका जाऊ बाबा तिकडे रात्रीचे."
"मामा, तू पण ना. भूत बीत असलं काही नसतं. मला काय वाटतं माहितीये का?" सगळ्यांच्या माना नकारार्थी माना हलल्या.
"यू. एफ. ओ. असेल."
"युएफो?" मामा गोंधळला.
"उडत्या तबकड्या म्हणतोय तो." निखिलने स्पष्टीकरण दिलं.
"उडत्या तबकड्या? सोल्ल्यात?" मामाला हसू आवरेना.
"मामा हसणं थांबव ना. आज कळेलच रात्री मग बघ."
"बरं बरं, मी पण येईन तुमच्याबरोबर सोबतीला. पण आधीच सांगतो आपण तिथे गेलो की काहीही दिसत नाही." मामाने विषय संपवलाच.

"आयला, अख्खं कोकण भुताखेतांनीच भरलेलं आहे असं वाटायला लागलं आहे."  सुयश शंकराच्या मंदिरात एकटाच जाऊन आला. परत आल्याआल्या निखिलला काय सांगू आणि काय नको असं होऊन गेलं त्याला.
"काय झालं?"
"देवळाकडे जाताना वाटेत तो उभा देव लागतो बघ. तिथून पुढे गेलं की देऊळ..."
"लेका, उभा जन्म इथे गेलाय माझा आणि तो उभा देव कुठे, देऊळ कुठे सांगायला लागला आहेस." निखिलला सुयशच्या बोलण्याचा रोख समजेना.
"ऐक ना. देवळात जाता जाता उभ्या देवाशी थांबलो. तिथे वरच्या बाजूला दगडावर एक पोरगा बसला होता. त्याने लै भारी गोष्ट सांगितली. म्हणजे देवळाच्या पलीकडे नदी आहे. नदीच्या बाजूने रस्ता जातो.  आडवाट आहे आणि तसा शुकशुकाटच असतो कायम त्या वाटेवर.  तिथून गेलं तर एक बाई आणि मुलगी  हटकून थांबवतेच कुणालाही. पत्ता विचारते खालच्या वाडीतल्या देशमुखांचा. तो पोरगा भेटला ना त्याचा मुंबईचा पाहुणा गेला होता, खरं आहे का त्याची खात्री करायला.  आणि दिसली की ती बाई आणि मुलगी त्यालाही. त्याने पत्ता सांगितला. गप्पा पण मारल्या.  ती  भूतं  नव्हती, माणसंच होती याची खात्री पटली त्याला.  सायकलवर बसला आणि निघाला गडी. मागे वळून बघायचं नाही असं सांगितलेलं ना म्हणून मुद्दाम मागे वळून पाहिलं. रस्ता ओसाड. बाई नाही, मुलगी नाही. नजर पोचेल तिथपर्यंत चिटपाखरुही नव्हतं. घाबरला. तर्हाट मारली सायकल. घरी आला आणि चार दिवस ताप."
"सगळ्या वाडीला ठाऊक आहे ही गोष्ट." निखिल थंडपणे म्हणाला.
"चल ना आपण जाऊ."
"तिन्हीसांजेलाच जावं लागतं. पाठवणार नाही कुणी आपल्याला घरातून."
"आता ते पलिते तरी कुठे दिसले. काहीही नसतं बाबा असलं."
"तुला आधीच सांगितलं होतं तिथे गेलं तर काही दिसत नाही म्हणून."
"बरं ठीक आहे. तू त्या रस्त्यावर येणार की नाही ते सांग."
"बाबांना विचारावं लागेल."
"सगळीकडे मामा कशाला? तो पोरगा म्हणालाय मी येईन पाहिजे तर."
"अरे त्याचं नाव सांग आधी."
"विसरलो रे. आज तू पण चल ना देवळात. असला तिथे तर भेटेल."
"बरं बघू. पण तुला ते तसलं तर घरातही बघता येईल."
"म्हणजे?"
"महापुरुषाची चक्कर असते घरातून."
"महापुरुष?"
"घराण्याचा मूळ पुरुष असतो तो."
"अच्छा."
"अमावास्येच्या दिवशी येऊन जातो."
"दिसतो?"
"नाही. पण रात्री लावलेली दाराची कडी उघडलेली असते. आणि वरच्या माळ्यावर झोपलास ना तर रात्री कुणी तरी उठवतं गदगदा हलवून."
"काय खतरनाक गोष्टी सांगता राव तुम्ही." सुयशला गंमत वाटायला लागली होती.
"अजून सांगतो ना पुढे." निखिलला चेव चढला.
"नको." सुयशने उडवून लावलं.

नंतरचे दोन दिवस सुयशबरोबर जाणं निखिलला जमलंच नाही. नारळ सोलायचे होते, शेजारच्या वाडीत पोचवायचे होते. फणस झाडावरून उतरवायचे होते.  सुयशने त्याच्याबरोबर थोडावेळ राहिला पण शंकराच्या मंदिराने त्याला वेड लावलं होतं. जाता जाता तो पोरगा भेटायचाच. त्याच्याशी गप्पा मारायच्या. देवळात पोचलं की मस्त पुस्तक वाचत बसायचं.  तिथल्या नीरव शांततेत रहस्यकथेच्या पुस्तकातलं वातावरण जिवंत झाल्यासारखं वाटायचं. त्याचा मग तो नित्यक्रमच होऊन गेला. म्हणता म्हणता सुट्टी संपलीही.  घरातल्या सगळ्यांचा निरोप घेऊन तो निघाला. निखिल त्याच्याबरोबर राजापूरपर्यंत येणार होता. सुयशला गाडीत बसवून, राजापूरची कामं आटपून निखिल सोल्ल्याला परतणार होता. सुयश गाडीत चढला. खिडकीच्या गजांना धरुन  निखिल त्याच्याशी बोलत राहिला.
"आता पुढच्या मे महिन्यात ना?"
"बघू, पण तुम्ही मुंबईला दिवाळीत याल ना?"
"येऊ की."
"आणि पुढच्या वेळेस भुतं दाखवली नाहीस तर मान्य करावं लागणार आहे तुला असलं काही नसतं म्हणून कळलं ना?" सुयशने एक वर्ष  वाढवून दिलं होतं निखिलला. दरम्यान त्यालाही जरा या विषयावर संशोधन करायला अवधी मिळणार होता.
"नक्की यार. बघ पुढच्या वेळेस तुझा नक्की विश्वास बसणार."
"ते शंकराचं देऊळ मात्र भारी आहे एकदम. जाम आवडलंय मला. आणि तो पोरगा. कायम वाटेवर कुठेतरी भेटायचाच. आयला, अरे त्याचा निरोप घ्यायचा राहिलाच. तू सांग त्याला भेटला की."
"तू नाव कुठे सांगितलं आहेस त्याचं."
"अरे हो, सांगितलंच नाही ना मी नाव त्याचं. अव्या."
"अव्या? अरे पूर्ण नाव सांग ना."
"अविनाश रे. अविनाश  चव्हाण."
"अविनाश चव्हाण?" डोळे फाडून  निखिल सुयशकडे पहात राहिला.
"अरे असा काय पहातोस? काय झालं?" सुयशला निखिल त्याच्याकडे असा का बघतोय ते समजेना.
"तू काय म्हणालास? त्या मुलाचं नाव काय सांगितलस?"
"काय पहिल्यांदा हे नाव ऐकतोयस का? अविनाऽऽश." खिडकीच्या दांड्यावर धरलेला निखिलचा हात एकदम बाजूला झाला.  हातापायातलं त्राणच गेलं त्याच्या.
"अरे, काय झालं? तू असा भूत बघितल्यासारखा काय करतोयस? तेच नाव सांगितलं त्याने." निखिलचा चेहरा पांढराफटक का पडलाय तेच सुयशला कळत नव्हतं.
"निखिल अरे, काय झालं तुला? पटकन बोल रे. गाडी चालू होतेय. बोल ना. अरे, बोल पटकन..." सुयशचं बोलणं संपेपर्यत गाडी चालू झालीच. निखिल जीवाच्या आकांताने गाडीच्या मागून धावला. सुयश खिडकीतून वळून वळून मागे पहात होता.  चिरक्या आवाजात निखिल ओरडला,
"सुयश, अरे अविनाश चव्हाण गेल्या वर्षी साप चावून वारला. तू भूत पाहिलंस सुयश. तू भूत पाहिलंस........"

Monday, October 13, 2014

चाळीशीतला साक्षात्कार :-)

चाळीशी उंबरठ्यावर (आहेत कुठे आता उंबरठे?) आली तेव्हा ’धडधड’ वाढली होती. तिथपर्यंत पोचणार्‍याला खरं तर स्वत:ला जाणीवच नसते पण आजूबाजूची तुम्हाला ते जाणवून देण्यात फार तत्पर असतात. पण आता कळतंय ही चाळीशी किती लाभदायक असते. खालील फायदे तुम्हीही घेतले असतील किंवा इतर फायदे असतील तर लिहायला विसरु नका. वाटचाल तिथपर्यंत व्हायची असेल तर फायद्याची नोंद घ्या 
• हल्ली अगदी विसरायलाच होतं बाई हा महामंत्र जपत कितीतरी कामं टाळता येतात.
• आज बाहेरच जायचं का जेवायला? जळ्ळी मेली ती चाळीशी, जीव अगदी नकोसा केलाय असं वारंवार म्हणता येतं.
• कोणता ना कोणता अवयव सतत दुखता ठेवून उंटावरुन शेळ्या हाकता येतात. सोफ्यावर बसल्या बसल्या घरातली सर्वजण मुकाट कामं करतायत (त्यांची कारणं वेगळी असतात) हे पहाण्यासाठी चाळीशीच गाठावी लागते.
• फडताळाचं (पॅन्ट्री) दार उघडलं की तिथपर्यंत का पोचलो ते आठवत नाही त्यामुळे आतल्या काहीतरी स्वादिष्ट वस्तूवर तिथेच ताव मारत आधीचं काम विसरुन जाता येतं.
• चिडचिड, थकवा, वैताग, सगळं पोरं आणि नवर्‍यावर काढून झालं की आरामात म्हणता येतं बहुतेक मेनोपॉज सुरु होण्याची लक्षणं. हे सगळं घरातली नेहमी, ’विनाकारण’ करत असते असं म्हणतात, त्याला काहीतरी ’नाव’ दिल्याचा आनंद उपभोगता येतो.
• टी. व्ही. चं रिमोट, बेकींग इन्स्ट्रक्शन, पदार्थांमधले घटक ज्या काही ’बारीक’ अक्षरात लिहलेल्या गोष्टी वाचून करायच्या असतात त्या बिनदिक्कत दुसर्‍यावर चष्मा सापडत नाही म्हणून घालता येतात.

आणि जेव्हा सर्व व्यवस्थित असतं तेव्हा, माझी चाळीशी झाली तरी करतेय, नाहीतर तुमचं साठीला आल्यासारखं सुरु असतं असं खिजवताही येतं...

Thursday, October 2, 2014

दोन ध्रुवांवर

"तू कधी नोकरी केली नाहीस ना या देशात?" दिप्तीने ऐकून न ऐकल्यासारखं केलं पण पुन्हा तोच प्रश्न रमाने
विचारला. तिने नुसती नकारार्थी मान हलवली. पण मन अस्वस्थ झालं ते झालंच. कोण कुठे नोकरी करतं, कुणाला घरी बसणं किती अशक्य वाटतं तर कुणाची तरी कायम आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असल्याची टिमकी हे नेहमीचं गु्र्‍हाळ सुरु होणार.  ती पुढच्या संभाषणातले सगळे विषय निर्विकारपणे ऐकत राहिली. भडका उडाला तो गाडीत बसल्यावर,
"काय समजतात या बायका  स्वत:ला? इतकं कमी लेखतात ना घरी रहाणार्‍यांना. तू कधी नोकरी केली नाहीस का म्हणे. नाही केली तर हिच्या *** काय जातं? गेला सुट्टीचा दिवस वाया. कशाला आणतोस रे अशा लोकांकडे?"
"मी कुठे आणतो? सगळा गोतावळा तुझाच आहे दिप्ती." शांतपणे निलेश गाडी चालवत राहिला. घरी पोचेपर्यंत दिप्ती अखंड बडबड करत तिचा वैताग व्यक्त करत राहिली. रात्री डोळा लागेपर्यंत चाललेल्या विचारांनी  दुसर्‍या दिवशीही पाठपुरावा सोडला नाही. रविवारची सकाळ असूनही ती लवकर उठली. निलेश खाली येईपर्यंत तिचं सगळं आवरुन झालं होतं. टी. व्ही. चालू करुन ती बसली.

धावायला बाहेर पडणार्‍या निलेशने दिप्तीकडे कटाक्ष टाकला.
"काय झालं?"  न कळून दिप्तीने विचारलं.
"काही नाही."
"मग असा काय बघतोस?"
"तू आता काय करणार आहेस?"
"का?"
"मराठी मालिका चालू रहाणार असेल जेवायला बसेपर्यंत."
"हो." दिप्तीच्या आवाजात तुटकपणा आला.
"हं..." निलेशची पावलं दाराकडे वळली पण  दिप्ती भडकलीच.
"काय झालं हं करायला? कधीची उठलेय. सगळं आटपून झालंय. कामं बाजूला टाकून नाही टी.व्ही. समोर बसत."
"मला नाही आवडत सकाळी सकाळी हे सुरु झालेलं."
"नाही आवडत तर नाही. बाहेर गेलं की नोकरी करत नाही म्हणून ऐकायचं, घरी तुमच्या कुणाच्या मनासारखं वागत नाही म्हणून ऐकायचं. आयुष्य असं ऐकून घेतच संपणार."
"तू  काल रमा बोलली ते अजून घेऊन बसली आहेस? कमाल आहे. यामुळेच तू सुखी नसतेस कधी. सोडून द्यायला शिक. आयुष्य कसं जगायचं ते आपलं आपणच ठरवायचं."
"हो ना, मग माझ्या मालिका बघण्यावर का घसरलास? बघू दे की सुखासुखी."
"ते वेगळं."
"वा, म्हणजे  सोयीप्रमाणे सगळं. पुरे झाले तुझे धडे."
"ठीक आहे.  कर तुला काय पाहिजे ते." निलेश तडकला.
"का? आता का? आधी काहीतरी बोलायचं आणि मग कर तुला काय पाहिजे ते म्हणून मोकळं व्हायचं. वाऽऽ हे चांगलं आहे तुझं..." दिप्ती तारस्वरात ओरडली पण उत्तर द्यायला निलेश थांबला नाही. दिप्तीच्या कानावर दार धाडकन बंद झाल्याचा आवाज आदळत राहिला.

धावता धावता दिप्तीबद्दलच निलेशचे विचार चालू होते. कुठे कुणाकडे जाऊन आलं की हमखास असं काहीतरी घडायचं. इतकं जर मनाला खुपतं कुणी नोकरीबद्दल विचारलं की तर ती नोकरीसाठी का प्रयत्न करत नाही हे न उलगडलेलं कोडं त्याने पुन्हा एकदा सोडवायला घेतलं. या देशात येऊन झाला की पंधरा वर्षाहून अधिक काळ. पण दिप्तीच्या मनातली अमेरिकेत कायमचं वास्तव्य करायचं या निर्णयाची अढी गेलेलीच नाही.  सतत धुसफुस घरात. सुरुवातीला घडी बसेपर्यंत नाही म्हटलं तरी सहा सात वर्ष गेलीच. मुलं लहान, कामाच्या स्वरुपामुळे फिरती मागे लागलेली. यात ती भरडली गेली पण एका ठिकाणी स्थिर झाल्यावर स्वत:चा जम बसवायला काहीच हरकत नव्हती. पण तिने तसा प्रयत्न केलाच नाही. मुलांमध्ये रमली म्हणावं तर तो संध्याकाळी घरी आला की मुलांवर खेकसणारी दिप्तीच समोर येई. त्यावरुन काही बोललं की त्याच्यावर तोफ. काय केलं म्हणजे दिप्तीला सुख मिळेल हेच त्याला कळत नव्हतं. एकदा शांतपणे दिप्तीशी बोलून मार्ग काढायला हवा हे ठरवून मुलं नसताना त्याने तिला बोलतं करायचा प्रयत्न केला. धावण्याच्या वेगाबरोबर तो प्रसंगही उड्या मारत त्याच्या मनात फिरायला लागला.
"तुझ्याशी बोलायचं आहे."
"बोल ना. परवानगी कशाला हवी?" हातातलं काम बजूला ठेऊन ती म्हणाली. तिच्या गोड स्वराने काय बोलायचं आहे तेच विसरला तो. हे असंच नेहमी. किती पटकन चिडते, वैतागते तितकीच पटकन शांतही होते. सगळ्या भावना तीव्रपणे व्यक्त करणं हाच स्वभाव आहे का हिचा?
"दिपू, कधी होणार गं तू मोठी?"
"म्हणजे?"
"लहान मुलांसारखी वागत असतेस, क्षणात चिडचिड, वसवस, आदळआपट तर क्षणात ते विसरुन लाघवी वागतेस."
"हे बोलायचं होतं तुला?" खळखळून हसत तिने विचारलं.
"नाही, वेगळंच बोलायचं होतं." आता त्याला विषयाला वेगळं वळण नको होतं. "आता तू नोकरीचा विचार करावास असं वाटतं. मला ठाऊक आहे.  इथे येऊन स्थिरावण्यात वेळ गेला. पण आता करु शकतेस तू तुला काय पाहिजे ते. म्हणजे नोकरीच असं नाही. छंद जोपास, शिक पुढे. जे तुला वाटत असेल ते. पेंटींग शिकवायला सुरुवात कर, नाहीतर गायनाचे वर्ग. खूप संधी आहेत तुझ्यासाठी "
"दहा वर्ष गेली आहेत मधे. कोण देईल मला नोकरी. आणि मलाच करायची नाही आता."
"ठीक आहे. मग पेंटींग, गायन शिकवणं?"
"नको."
"का?"
"नको म्हटलं ना."
"अगं पण काही कारण? आणि नसेल काही करायचं तर नको करु पण दिवसभर त्या मालिका बघत रहायचं आणि नंतर इथून तिथून इथे रहातोय, भारतात परत जात नाही म्हणून कसं तुझं नुकसान होतंय ते ऐकवणं तरी सोडून दे.  सुखी रहा एवढंच म्हणायचं आहे मला. आता मुलं मोठी झाली आहेत. ती पण वैतागतात तुझ्या अशा वागण्याने."
"ते मुलं सांगतील. तू नको. आत्तापर्यंत नुसती म्हणत राहिले पण आता उठते आणि जातेच मी भारतात."
"जा." निलेशच्या तोंडून इतक्या पटकन निघालं की दिप्तीला त्याच्या एकदम ’जा’ म्हणण्यावर काय बोलावं ते सुचेना.  डोळे डबडबलेच तिचे. काही न बोलता ती तिथून उठून गेली. निलेश तसाच बसून राहिला. काय बोलायचं ठरवलं आणि कुठून कुठे गेलं संभाषण. आताही त्याला तो प्रसंग जसाच्या तसा आठवत होता. रागाच्या भरात तो बोलला खरा पण इतकी वर्ष झाली तरी दिप्ती ते विसरायला तयारच नाही. विचारांच्या नादात त्याचा धावण्याचा  वेग वाढला.

दार बंद झाल्याचा आवाज दिप्तीच्या कानात घुमत राहिला. तिचं मन मालिका पहाण्यावरुन उडालं. कुठून कुठे पोचला दोघांचा संसार. भारतातून येताना किती सहज सगळं सोडून आली होती ती निलेश सोबत. पुन्हा परतायचंच आहे लवकर याच भावनेने. पण नंतर इतर अनेकांप्रमाणे  चक्रव्युहात अडकून गेली. मनातली खदखद मग या ना त्या मार्गे बाहेर पडत राहिली. तिरकं बोलायचं, नाराजी दर्शवायची हा कधीतरी याच काळात स्वभाव बनून गेला. मला कधी इथे रहायचंच नव्हतं म्हणत ती  इथेच राहिली.  आपण काही करत नाही ही बोच उराशी बाळगून. त्यात कुठेतरी असे काही प्रसंग घडायचे की मन अस्वस्थ होऊन जायचं. नोकरी करणार्‍या आणि न करणार्‍या असे गटच झाले होते इथल्या छोट्याशा डबक्यात. सुरुवातीला  पेंटींग, गायन, वाचन अशा विषयांवर ती काही ना काही  बोलायची. पण अशा कलांना तुम्ही नोकरी करुन करत असाल तरच किंमत, नाहीतर हे छंद म्हणजे रिकामटेकड्यांचे उद्योग असा भाव जाणवायचा तिला इतरांच्या बोलण्यात. मग सगळं हळूहळू मागे पडत गेलं. रसच उडाला. पूर्वी हाताशी असलेल्या वेळाचं  करायचं काय हा प्रश्न असे पण इंटरनेटनच्या आगमनाने तो प्रश्न सोडवला.  लॅपटॉप नाहीतर टी. व्ही. वर मराठी, हिंदी मालिका नाहीतर चित्रपट. हळूहळू तेच तिचं जग झालं. भारतात पोचल्यासारखं वाटायचं या मालिका पाहताना.  तिच्या टी. व्ही. पहाण्यावरुन मुलं, निलेश काहीतरी बोलायचेच. त्यामुळे त्या मालिका लावल्या की ती स्वत:वरच चिडायची.  पण ते पहाणं सोडवायचंही नाही. तिला निलेश बरोबरचा कितीतरी वर्षापूर्वी घडलेला प्रसंग आठवला. त्यावेळेस पहिल्यांदा वैतागून तो म्हणाला होता. जायचं तर जा तू भारतात. मग चढत्या क्रमाने याच स्वरुपाचे प्रसंग घडत राहिले. पण नाही झालं खरं धाडस. म्हणजे एकटंच कसं जायचं? तिकडे जाऊन काय करायचं? आपण गेल्यावर निलेश येईल परत? मुलांचं काय? माहेरची काय म्हणतील? नातेवाईकांमध्ये किती चर्चा होईल या विचारातच ती गुरफटून राहिली. वर्षानुवर्ष. मुलं मोठी झाली. पंखात बळ आल्यावर उडून गेली. निलेश तर म्हणायचा, तिच्या अशा वागण्यामुळे सगळ्यांनी अगदी लांब नोकर्‍या शोधल्या आहेत. खरं काय, खोटं काय कोण जाणे. पण ती मात्र इथेच होती नक्की काय करायचं होतं हे कधीच न समजल्यासारखी. द्विधा!

निलेश घाम पुसत घराबाहेर उभा होता. आता तरी निवळली असेल की आत गेलं की पुन्हा मागच्या पानावरुन तेच सुरु? काही झालं की  सारखं आपलं ’भारतात परत गेले असते तर...’ या पोकळ धमक्यांपेक्षा खरंच का जात नाही दिप्ती भारतात कायमची? सर्वांनाच शांतपणा मिळेल असं त्याला दरवेळेला वाटायचं. पण ते वाटणंही तेवढ्यापुरतंच. बोललोय की तिला हे. आणि खरा राग येतो तो तिच्या टी. व्ही. पहाण्यापेक्षा तिच्या कलागुणांचा ती उपयोग करत नाही याचा.  विचार करुन डोकं भणभणून गेलं निलेशचं. दार उघडून तो आत आला.  दिप्तीने  चहाचा कप पुढे केला. तिची बदललेली मनस्थिती पाहून त्याला आश्चर्य वाटलं पण आनंदही झाला.  आधीचं सारं विसरुन तो हसला.
"तू नाही घेत?" खुर्चीवर बसत त्याने विचारलं.
"घेते ना. आणि आज सुट्टीच आहे तर नाटकाला जाऊ या का कुठल्यातरी?"
तो काहीच बोलला नाही.
"ऐकलंस ना?" तिने जोरात विचारलं. तिच्या आनंदावर विरजण घालणं जीवावर आलं त्याच्या.
"इच्छा आहे गं. पण काम करावं लागणार आहे. म्हणजे काल पूर्ण नाही झालं ऑफिसमध्ये, ते संपवायचं आहे."
"बरं. ठीक आहे." दिप्तीची नाराजी शब्दात डोकावलीच.
"अगं समजून घे ना."
"मी कुठे काय म्हटलं? तू दिवसरात्र काम करत रहा. मी रिकामटेकडी. काय करायचं तेच समजेनासं झालंय. वेळ घालवायला शोधलेले मार्गही चालत नाहीत. चालू दे. मी काही बोलत नाही..." दिप्तीचा पारा चढला. निलेशने चहा अर्धवटच टाकला आणि टेबलावर ठेवलेला लॅपटॉप उचलून काही न बोलता तो कामाच्या खोलीत गेला.  धाडकन दार बंद झालं. बंद दाराकडे दिप्ती पहात राहिली. एकाच घरातली इन मिन दोन माणसं दोन ध्रुवांवर उभी होती. कायमची!


http://bmmonline.org/sites/default/files/BMM/BMM/BMM_Newsletter_Oct2014.pdf



Friday, August 1, 2014

सीमारेषा

"साकेत तू काय घेणार? व्हिस्की, वाइन, बिअर..." परेशकाकाच्या प्रश्नावर साकेतने आईकडे पाहिलं. साकेतने
इथे सगळ्यांमध्ये नाही घेतली तर बरं असं वाटत असतानाच  आजूबाजूला हास्याचे फवारे उडाले. झालं, साकेतने हो म्हटलं तर नंतर त्याबद्दलच  चर्चा रंगणार, श्रावणीच्या मनात विचार तरळला. तितक्यात गिरीशच म्हणाला,
"घे रे बाबा तुला काय पाहिजे ते. माझ्याकडून हिरवा दिवा." साकेतने प्रश्नार्थक नजरेने पाहिलं तसं स्पष्टीकरण देत गिरीश म्हणाला,
"म्हणजे ग्रीन सिग्नल रे." साकेत हसला.
"नको."
"आईला घाबरतोयस का?" परेशने श्रावणीकडे पहात विचारलं.
"मला कशाला घाबरेल तो? त्याच्या बाबानेच परवानगी दिली आहे ना." श्रावणी हसून म्हणाली आणि  वाइनचा ग्लास तिने तोंडाला लावला.
साकेतनेही अवघडत परेशकाकाने दिलेला ग्लास हातात घेतला.
"कॉलेजमध्ये पण घेतोस का?" रागिणी मावशीच्या प्रश्नाला साकेतने उत्तर देण्याआधीच ती म्हणाली,
"आम्ही दोन्ही मुलांना सांगितलं आहे. घ्यायची तर आमच्या समोर. कॉलेजमध्ये अजिबात नाही. जे काही कराल ते आम्हाला कळलं म्हणजे झालं." श्रावणीने साकेतकडे  कटाक्ष टाकला. पुसटसं हसू त्याच्या चेहर्‍यावर पसरल्यासारखं वाटलं तिला.  तिने रागिणीच्या बोलण्यावर मान डोलवली.

रागिणीचे शब्द श्रावणीच्या मनात घोळत होते. खरचं तिची मुलं फक्त त्यांच्या उपस्थितीतच घेत असतील? कॉलेजसाठी या मुलांना बाहेर रहावं लागतं. तिथे इतर मित्र मैत्रीणी बरोबर असताना मोह टाळता येत असतील? साकेत काय करत असेल? लगेच हा विषय नको म्हणून दोन तीन दिवस ती या विषयावर काही बोलली नाही. पण त्या दिवशी कॉलेजचाच विषय सुरु झाल्यावर तिने  संधी साधली.
"मुलं दारु, सिगरेट पितात/ओढतात का तिकडे? नाही म्हणजे आम्ही काही इथे शिकलेलो नाही. त्यामुळे वातावरणाची कल्पना नाही ना म्हणून विचारते आहे." साकेत  हसला.
"रागिणी मावशी जे बोलली त्यामुळे विचारते आहेस ना?"
"अगदी तसंच काही नाही."
"तसंच आहे आई. आणि तुला सांगतो आम्ही सगळी ’देसी’ मुलं पालकांना जे ऐकायला आवडेल तेच सांगत असतो."
"म्हणजे?"
"तुला खरंच वाटतं रागिणी मावशीच्या मुली कॉलेजमध्ये दारुला हातही लावत नसतील?"
"मला नाही माहित."
"एक तर मुलींनी दारु पिण्याचं प्रमाण मुलांपेक्षा जास्त आहे कॉलेजमध्ये. आणि आपण हात सुद्धा लावत नाही असं त्या सांगत असतील मावशीला तर ते साफ खोटं असणार. सगळी मुलं घेतातच गं कधी न कधी."
"तू?"
"हो घेतो. आणि हे लगेच कबूल करतो आहे कारण ते रेल्वे रुळ ओलांडायचं झाल्यापासून मी तुम्हाला जे खरं आहे तेच सांगतो हे विसरु नकोस तू." श्रावणीचं लक्ष  त्याच्या बोलण्यावरुन उडालं.  साकेतने तिचं मन एकदम भूतकाळात ढकललं. साकेत खेळायला जायचा मित्रांबरोबर. दुसरीत असेल. सात वाजता घरी परत यायचं आणि रेल्वे रुळ ओलांडून पलिकडच्या मैदानात जायचं नाही असं बजावलेलं होतं त्याला. एकदा सात वाजता तो आला नाही म्हणून ती बघायला गेली तर सगळी मुलं पलीकडच्या मैदानावर खेळायला गेलेली. श्रावणीला बघून तो बावचळला. राग आलेला असूनही तिने तो गिळला. गिरीश आला की मगच दोघं मिळून बोलू साकेतशी असं ठरवून ती  साकेतला घेऊन मुकाट्याने  घरी आली.  मुलांना आपणहून परवानगी दिली नाही तर ती लपूनछपून त्यांना पाहिजे ते करतातच, त्यासाठी खोटं बोलतात हे ह्या प्रसंगाने त्यांना दाखवून दिलं. दोघांनी झाल्या गोष्टीचा शांतपणे विचार करुन  दुसर्‍या दिवसापासून रुळ ओलांडून मैदानावर खेळायला जायची परवानगीही दिली. खोटं बोलायचं नाही. खरं सांग. चुकीचं वागला असलास तरी आम्ही तू असं का केलंस ते समजून घ्यायचा प्रयत्न करु याची त्याला खात्री दिली. तेव्हापासून साकेत मोकळेपणाने त्यांच्याशी सगळं बोलत होता.
"आई, लक्ष कुठे आहे तुझं." ती एकदम भानावर आली.
"बागेचा प्रसंग आठवत होते. जाऊ दे ते. पण रोज घेतोस का रे तू?"
"नाही गं. फक्त शुक्रवारी. ते सुद्धा एखाद्याच."
"सिगरेट?" न रहावून तिने विचारलं.
"अजिबात नाही."
श्रावणीची चुळबूळ, अस्वस्थपणा वाढला असावा.
"आई, मी प्रामाणिकपणे खरं तेच सांगतोय गं."
"अच्छा" म्हणून साकेतचं बोलणं ऐकत राहिली.

श्रावणीचे एक दोन दिवस अस्वस्थतेत गेले. आपले कॉलेजचे दिवस वेगळे होते. साकेतच्या बाबतीत  काळ आणि देश दोन्ही बदललेलं आहे त्यामुळे नसती भिती, अंदाज बांधण्यात काय अर्थ? आणि आता जिथे आपणही मित्र मैत्रिणींबरोबर  ड्रिंकची चव चाखतो तिथे मुलांना काही शिकवायला जाणं म्हणजे... पण कॉलेजमध्ये वय, संगत यामुळे कुठे थांबायचं हे कळलं नाही या मुलांना तर याचीच भिती वाटते आणि ती बोलून दाखवायलाच हवी असं तिला वाटत होतं. शेवटी तिने तो विषय काढलाच.
"आई,  आता इतकं बोलतोच आहोत आपण तर एक विचारु?"
"विचार ना, परवानगी कशाला हवी?"
"तुम्ही सगळे पालक ना असं करु नका, तसं करु नका चा सूर लावता नेहमी. मला एक समजत नाही की तुम्ही पालक दारु पिऊ नका, व्यसनाच्या आहारी जाऊ नका, लग्नाशिवाय शारीरिक संबंध येता कामा नयेत असा धोशा लावता पण मुलांना मोह टाळता आलाच नाही तर त्यांनी काय करायचं ते का सांगत नाही?"
"म्हणजे?"
"पिण्याचे परिणाम काय काय होऊ शकतात, एकावेळी कमीत कमी म्हणजे नक्की किती घ्यावी, सवयीचं व्यसनात रुपांतर कसं होऊ शकतं, ते झालं तर त्याचे शरीरावर होणारे परिणाम, किंवा गाडी चालवू नका, जो गाडी चालवणार असेल तो दारु पिणार नाही याची दक्षता घ्या, शारीरिक संबंधाबद्दल काळजी घेतली नाही तर काय होऊ शकतं, त्यातून निर्माण होणारे रोग अशा कितीतरी गोष्टी तुम्ही सांगत नाही. आम्हाला महाविद्यालयात ही माहिती देण्यासाठी खास तास आणि परीक्षा असते. पण पालकांनी पण बोलायला नको का हे आमच्याशी?"
श्रावणी ऐकत राहिली.  काय करायला नको ची यादी तयारच होती तिच्याकडे पण नाहीच आवरला मोह तर काय खबरदारी घ्यायला पाहिजे ते सांगावं की नाही याबद्दल मन:स्थिती द्विधा होती, आणि किती म्हटलं तरी काही गोष्टी नाही येत इतक्या स्पष्ट बोलता, पोटची मुलं असली तरी. बोलणारा आणि ऐकणारा दोघंही संकोचतातच. त्यामुळेच मनातलं शब्दांवाटे बाहेर येत नव्हतं हेच खरं. ती काहीच बोलली नाही तसं साकेतच म्हणाला,
"तू काळजी करु नकोस. मला हे असं करायला वेळच मिळत नाही."
"आणि कॉलेजमध्ये शिक्षणासाठी जातो आपण हे लक्षात ठेवलं की झालं." तिच्या बोलण्यावर साकेत हसला.
"आई तुम्ही कधी कॉलेजमध्ये मजा केलीच नाहीत का?"
"केली ना. पण मजेच्या व्याख्या बदलत जातात स्थळकाळानुसार. पालकांची मानसिकताही बदलते. आणि तू म्हणालास त्याबद्दल विचार करत होते.  तू आत्ता सांगितलंस तसं करणं म्हणजे पालकांना, आपण अशी माहिती देऊन मुलांना उत्तेजन तर देत नाही ना असंही वाटतं."
"पण नुसतं दारु पिऊ नका, मादक पदार्थांच्या आहारी जाऊ नका, कुणाशी शारीरिक संबंध ठेवू नका असं सांगून तरी काय उपयोग? का ते माहीत असलं की मुलं जास्त विचार करतील ना या गोष्टी करताना?"

श्रावणी स्वत:चं  तरुणपण तपासत राहिली. मुलांबरोबर पालकत्वही काळानुसार बदलत चाललं आहे. आपल्या आई वडिलांनी शिस्त, संस्कार दिले. मनातलं त्याच्यांशी बोलू शकतो हा विश्वासही दिला तरी काही गोष्टी सांगायची, विचारायची लाजच वाटायची. ते जे मधलं अवघडलेपण आपण अनुभवलं ते आपल्या मुलांनी नको अनुभवायला असं श्रावणीला वाटत होतं, नाही म्हटलं तरी ते होणारच हे कळत असलं तरी. पण साकेतच्या बाबतीत त्याने स्वत:हून नाही सांगितलं तरी त्याबद्दल विचारलं की तो खरं तेच सांगेल ह्याची तिला खात्री होती. पण तरीही साकेतच्या आजच्या बोलण्यावरुन वाटत होतं की मुलांशी मित्रत्वाचं नातं राखणं आणि त्याचबरोबर पालक म्हणून त्यांनी आपला मान ठेवावा, आदर दाखवावा  असं वाटणं यातली सीमारेषा इतकी धूसर आहे की ती केव्हाही भंग पावेल. पण खरंच ही  सीमारेषा धूसर आहे की तिची व्याख्या  बदलणं, ती समाजमान्य होणं आवश्यक आहे? या प्रश्नाचं उत्तर ज्याचं त्यानं अनुभव घेतच सोडवायचं हेच अंतिम सत्य  असलं तरी श्रावणीचं मन त्या प्रश्नाचं उत्तर शोधत राहिलंच...


Monday, July 14, 2014

गवतकाप्याची गोष्ट

रॉजर  गेल्या गेल्या मला एकदम उत्साहच चढला.  इस्टोरी भन्नाट होती त्याची. घाईघाईत मुलाला फोन लावला,
"अरे एका कैद्याची ओळख झाली."
"तू काय तुरुंगात आहेस?" लेकानेही अधूनमधून मी सुट्टीसाठी तुरुंगात जात असेनच या खात्रीने विचारलं.
"तो आला होता घरी."
"आता तुझी कैद्यांशी मैत्री? आई, तू लिहितेस हे मान्य पण विषय मिळावेत म्हणून हे असं...."
"पुरे रे. आधी ऐक तर."  मी त्याला माळीबुवांची गोष्ट सांगायला सुरुवात केली.  त्या आधी थोडी पार्श्वभूमी सांगते. काय आहे, सध्या आम्ही वर्षाच्या कराराने कुणी आमचं अंगण हिरवंगार राखेल का याच्या शोधात आहोत. त्यामुळे येऊन जाऊन घरी भावी माळी टपकत  असतात.

"वर्षाचा करार केलात तर १२०० डॉलर्समध्ये गवत कापेन."
"नाहीतर?"  कुणी ’तर’ म्हटलं की लगेच  ’नाहीतर’ आठवतोच. त्यामुळे पटकन आलंच ते तोंडून.
"१७०० डॉलर्स "  आमचे कदाचित होऊ पाहणारे भावी माळीबुवा म्हणाले. १२००  डॉलर्स म्हटल्यावरच माझ्या डोळ्यासमोर चित्र विचित्र गवत फिरायला लागलं होतं. १७०० म्हटल्यावर विचारक्रियाच गोठली.  गवत कापायचं, वाढवायचं, पुन्हा कापायचं आणि यासाठी १२०० डॉलर्स? पुन्हा कापण्याआधी ते वाढवायला कितीतरी पिंप पाण्याचे फवारे मारायचे ते वेगळेच. डोळे गरागरा फिरवू की नुसतंच ’या राईट’ म्हणून खोडसाळ हसू चेहर्‍यावर आणू या विचारात मी तशीच उभी राहिले. तेवढ्यात नवरोजींनी पायावर कुर्‍हाड मारली.
"खत पाणी, जंतूनाशक फवारे, बी बियाणं, फुल झांड..." डोक्याला फेटा गुंडाळून, बैलगाडीत बसायला तयार असलेला एखादा शेतकरीच उभा आहे बाजूला की काय असं वाटलं. पुन्हा पुन्हा बघून खात्री करुन घेतली. मग खेकसले,
"अरे थांब ना. तूच कशाला त्याला  सगळी कल्पना देतोस?"  मराठीतून ओरडले पण इंग्लिश माळ्याला हावभाव आणि स्वराची भाषा समजलीच. चेहर्‍यावर निरागस हसू आणत तो म्हणाला,
"ये समदं करावं लागतं ताई...आनी बी हाये."
"आता काय?" त्या आनी बी बरोबर पैसे पण आलेच.  ते आकडे १२०० डॉलर्स मध्ये की १७०० डॉलर्स मध्ये  वाढवू? आमच्याकडे  नवर्‍याला खर्चात पडायची घाई असते. उकरुन उकरुन व्यावसायिकाला याचा दर, त्याचा दर विचारायचा, त्याचा वेळ घ्यायचा, आपला खर्च करायचा. ते झालं की मौनव्रत धारण करायचं. किती चाट खिशाला असा चेहरा करुन बसायचं. तो एकदा बसला की उठत नाही आणि ऐकलेलं सारं विसरुन गेल्यावर पुढे कृती होत नाही हे सवयीने कळल्यामुळे मीच घोडं पुढे दामटवते.
"इतके पैसे जाणार असतील तर आपणच का नाही करत ही कामं?" एकदम त्याचा चेहरा खुलतो.
"तसं काही ते कठीण नसतं. करु मग आपणच."
यातला ’आपण’ म्हणजे ’फक्त तू’ असतो.  बायकोसाठी क्वचित प्रसंगी दाखविला जाणारा हा आदर कशासाठी असतो हे कळायला मला खूप वर्ष लागली. मी आपली मग काय तर सगळे नुसते लुबाडायला बसले आहेत. करु आपणच असं म्हणत मान डोलावते, आणि मग ती सगळी कामं करता करता, मान काय अख्खं शरीर डुगडुगायला लागतं.

आणि आपणच करायचं हे तर  वेगवेगळे माळीबुवा सगळ्या कामाचा खर्च सांगा मग ठरवतो कुणाला काम द्यायचं ते असं करुन कशाला बोलावून ठेवलेले? त्यात कोण, कशाला, कधी यात गोंधळ. आता एकच काम वेगवेगळे माळी किती डॉलर्समध्ये करतील हे विचारायचं असताना, याची कामाची यादी चढत्या फोडणीसारखी प्रत्येकासाठी वेगळीच. ती काय बायको आहे हे पण करुन टाक म्हणून सांगायला? पैसे वाढणारच ना? मग तुलना कशी करायची? त्यात दरवेळेला आधीच जाहीर करायचं आम्हाला स्वस्तातल्या स्वस्तात करायचं आहे काम. हे एकदा का त्या माळीबुवांना समजलं की ते दुप्पट दर सांगणार आणि मग स्वस्त करणार इतकं साधं समीकरण, पण लक्षात कोण घेतो?

तर एकेक किल्ला ढासळत  असतानाच रॅंडी माळीबुवावर मात्र आम्ही खुश झालो.
"काय ते ज्ञान." नवरा म्हणाला,
"काय तो उत्साह." मी टाकलं आपलं असंच; पटकन माळी  ठरावा म्हणून.
"खरं आहे पण आपल्या चेहर्‍यावरचे भाव बघून हे लोक आकडे टाकतात, मागे घेतात, फिरवतात." जुगार खेळत असल्यासारखा नवरा बोलला. पण आता मला रॅंडी हातातून जाऊ द्यायचा नव्हता.
"हो पण हा नाही तसा वाटला. एकूणच खूप कमी पैशात करायला तयार झाला आहे. चांगला दिसतोय." मला अगदी काम झालंच सारखा उमाळा आला. तेवढ्यात दार वाजलं.  दारात आंडदांड माणूस उभा. अजून एक माळी? मी तसं विचारणार तेवढ्यात तोच म्हणाला,
"आत्ता तुमच्या घरासमोर लाल रंगाची गाडी उभी होती."
"हो, पण..." (बरं मग? तुला काय करायचं आहे?)
"कोण होता तो?"
"पण तुम्ही कोण?"
"त्या माणसाचं नाव काय?"
"कुठल्या?"
"लाल गाडीतल्या." रॅंडी रॅंडी जप चालला होता आमचा. पण या माणसाचा आविर्भाव पाहून ते नाव काही केल्या आठवेना.
"रॉय"
"नक्की?"
"नाही म्हणजे..."
" रॅडींच गं." र, रा ने सुरु होणारी सगळी नावं नवर्‍याला एकदम प्रिय. रॅंडी, रॉडनी....मराठीतल्या शिव्या दिल्यासारखं वाटतं त्याला ही नावं घेताना.
"रँडीऽऽऽ" पुन्हा आपला उगाचच नारा ठोकला त्याने आतून.
"तुम्ही फसले जावू नये म्हणून सावध करायला आलो आहे." आता मात्र नवरोजी उठले. आयुष्यात बायको आल्यानंतर एक फसवणुक झाली होतीच, आता आणखी नको रे बाबा या आवेगात बाहेअर आले.  रॅंडी महाशय सुरुवातीला थोडं काम करतात, मग सामानासाठी पैसे घेऊन जातात ते पुन्हा येतच नाहीत, अधूनमधून तुरुंगांच्या फेर्‍या करुन आले आहेत. अशी रॅंडीची कर्मगाथा रॉजरने सांगितली. पण तुम्ही कोण? तुम्हाला कसं कळलं रॅंडी आमच्याकडे आला आहे हे प्रश्न मनात येण्याआधी लक्षात आलं,
च्यक, च्यक. कसली संधी फुकट घालवली. तुरुंगातून सुटून आलेल्या माणसाबरोबर आपण बोललो, बागेत फिरलो आणि एक, एक फोटो नाही घेतला फेसबुकवर टाकायला? रे कर्मा माझ्या.  हे बोलले असते नवर्‍याजवळ तर माझ्या ’फेस’ चं काय झालं असतं कुणास ठाऊक.

रॉजर गेल्या गेल्या मला एकदम उत्साहच चढला.  घाईघाईत मुलाला फोन लावला,
"अरे एका कैद्याची ओळख झाली."
"तू काय तुरुंगात आहेस?" लेकानेही अधूनमधून मी सुट्टीसाठी तुरुंगात जात असेनच या खात्रीने विचारलं.
"हो घरी कंटाळा आला की जाते तिकडे."
"हा हा हा. काय विनोद मारलास. पण सांग पुढे. " मग मी त्याला माळीबुवांची  पूर्ण गोष्ट सांगितली.
"यात खूप लुप होल्स आहेत."
"मराठी, मराठी." एक जरी इंग्लिश शब्द वापरला की आमच्या घरातलं हे घोषवाक्य आहे. ते मी घाईघाईने पूर्ण केलं.
"अगं, तो जो हितकर्ता आला होता तो तरी खरा कशावरुन?"
 रहस्यकथेची सुरुवात... मी मनात म्हटलं आणि चिरंजीव काय म्हणतात ते ऐकत राहिले. बोलणं थांबलं तेव्हा न रहावून शंका विचारली,
"तू अर्थतज्ञ होणार आहेस की वकील?" माझ्या या कुजकट प्रश्नाचा वास त्याला आलाच.
"विषय काय आहे आई? माझं उज्वल भवितव्य की कैदी?" चिरंजीवांनी तावातावाने वाद घालायला सुरुवात केली.
तो थोपवता थोपवता नाकीनऊ येतायत  तेवढ्यात त्याला अचानक त्या कैद्याचा पुळका आला.
"त्याची नीट माहिती काढा, तुरुंगातून सुटून त्याला खूप वर्ष झाली असतील, नंतर काही गुन्हा केला नसेल तर त्याची चुक त्याला कळली  आहे. त्याला संधी मिळालीच पाहिजे. आपणच असं वागून पुन्हा त्यांना गुन्हेगारीकडे वळवतो. समाज सुधारणार कसा मग?"
तू आहेस ना, तू सुधार. सारखी सारखी सगळी कामं तुम्ही बापलेक माझ्यावर काय सोपवता हे मनातल्या मनात पुटपुटत मी म्हटलं,
"अरे पण मला फक्त माळी हवा आहे रे. फक्त एक माळीऽऽऽऽऽऽऽ " माझ्या आवाजात घायकुती, रडकुंडी सारं काही होतं.
"मिळेल, मिळेल गं आई. तू नीट चौकशी कर आणि कैद्याचा माळी बनव."
कैद्याचा माळी? तो कसा बनवायचा? पण त्याचं तोंड बंद करायला मी  म्हटलं.
"बनवते."
फोन ठेवला तर नवरा बसला होताच.
"काय झालं?"
"कैद्याचा माळी बनवायचा आहे."
मुलाशी बोलून झाल्यावर ही नेहमी असं का बोलते असा चेहरा केला त्याने.
"आपल्याला नक्की कोण हवं आहे? माळी? कैदी? कैद्याचा माळी बनवायचा की माळ्याला कैदी करायचं? का हे दोन स्वतंत्रच ठेवायचे? पण मग कशासाठी? नाहीतर आपली आपणच करायची का ही कामं?" माझ्या प्रश्नांच्या सरबत्तीवर नवर्‍याने  नेहमीचं शस्त्र उगारलं. मौन व्रत धारण केलं.

आणि तितक्यात दार वाजलं तसं अजून एका नव्याने आलेल्या माळ्याचं स्वागत करायला मी धावले...

Sunday, June 15, 2014

आठवणी

शाळा, नाटकाचा सराव, मैदानावरचे खेळ
यातून अभ्यासाला नसायचा वेळ
पण भाऊ तुम्ही होतात,
अभ्यास राहिला आहे म्हणून गलितगात्र झाल्यावर
तुम्ही पुरा केलात!
हातात ठेवायचात वही
म्हणायचात,
घ्या हे, लिहलं आहे, तुझं काम केलं आहे
आता निघा...!

कधी चिडायचात, खोटं बोललो की ओरडायचात
कामं टाळली की वैतागायचात
पण चला, बॅडमिंटन खेळू या म्हटलं की तयारीतच असायचात!

भारतात आलं की जाऊन येऊ कुठेतरी म्हणून
फिरायला जायचे दौरे काढायचात,
तुमच्या गडगडाटी हसण्याने घर  भरल्यासारखं व्हायचं
आनंदाचं झाड घरातच रुजल्यासारखं वाटायचं!

तुम्ही म्हणाला असतात,
वा, वा लक्षात ठेवलंस का सगळं
आता पोरांना नको सांगूस
नाहीतर बसवतील बाबाला अभ्यासाला
मिळतील शिव्या सासर्‍याला! :-).

भाऊ, तुमच्या आठवणींसाठी ’फादर्स डे’ ची आवश्यकता नाहीच तरी त्या दिवसानेच मला माझ्या भावना शब्दात मांडता आल्या. सगळ्या बाबांना शुभेच्छा - आजचा दिवस मुलांसमवेत अगदी ’धम्माल’ दिवस व्हावा प्रत्येकाचा.