Wednesday, December 2, 2015

नातं

"हा हा म्हणता आला की निघायचा दिवस." खचून भरलेली, करकचून बांधलेली बॅग भितींपाशी ठेवली. एकाच बॅगेचं बंधन घातल्याबद्दल एअरलाईन्सचे मनातल्या मनात आभार मानले. सोफ्यावर टॅबलेटमध्ये डोळे खुपसलेल्या, टेबलावर लॅपटॉपमध्ये जवळ जवळ घुसलेल्या नवर्‍याकडे नजर टाकली. पुन्हा म्हटलं,
"चला, निघणार मी उद्या." आईचं व्याकुळ हृदय, नवर्‍यासाठीची विरहवेदना वगैरे वगैरे सगळं डोळ्यातून दाखवण्याचा प्रयत्न केला. पण माझ्या अभिनयक्षमतेचं कौतुक करायला कुणीच राजी नव्हतं.  मग म्हटलं आवाज ऐकला की नजरा वर वळतील. हुंदके काम बजावतील. काहीतरी विचित्र आवाज ऐकल्यासारखं दचकून दोघांनी वर पाहिलं.
मुलगी घाईघाईने येऊन मिठी मारुन, एक दोन पापे देऊन पुन्हा टॅबलेटकडे वळली. नवर्‍याने तेवढीही तसदी न घेता :-) मान पुन्हा लॅपटॉपमधे टाकली.
"बाहेरच सोडेन एअरपोर्टच्या. का यायला हवं आत?" याचं हे नेहमीचं. कामं उरकायची नुसती.
"बघ, तुल सोयीचं पडेल ते कर." विषय संपवला तरी मला सोयीचं होईल ते तो कसं करेल या विचारात रात्र सरली.

सकाळी सकाळी तिघांनी चेहर्‍यावरच्या खर्‍या भावना लपवित साश्रु नयनांनी एकमेकांना निरोप दिला. मुलीचे, आई नाही तर काय धिंगाणा घालता येईल याचे बेत सुरु झाले असावेत, नवर्‍याच्या ’ आता काय वाट्टेल ते करु’ च्या यादीत काय काय भर पडली कोण जाणे. मी देखील रांधा, तुमचं तुम्ही घ्या, भांडी डिशवॉशरमध्ये विसळून घाला आणि कुणीतरी लावा रे धुतलेली ती भांडी डिशवॉशरमधून असं ठणाणा बोंबलण्याच्या  काढून ह्या माझ्या रोजच्या कामगिरीवरुन मुक्तता मिळाल्याच्या आनंदात विमानतळाच्या दिशेने प्रस्थान केलं. पण ३ -३ माणसांना एकाचवेळी इतकं सुख द्यायला बहुधा एअरलाइनला जड गेलं असावं.
"आजचं विमान रद्द." तीन शब्दांची १ ओळ कितीजणांचं भावविश्व कोलमडून टाकते त्याचं प्रत्ययकारी दर्शन एकमेकांना ताबडतोब झालं.
मुलगी,
"आज जाणार नाहीस तू?" विश्वाचं सारं दु:ख तिच्या आवाजात उतरलं होतं.
नवरा,
"असं करु, दुसरं कुठलं विमान मिळतं का पाहू." आधीच वेगात असलेली गाडी त्याने आणखीन वेगाने पळवायला सुरुवात केली.
"अरे ती काय एस. टी. आहे का? ही नाही तर ती पकडायला?"
"हे बघ, तुझं पुढचं विमान जाणारच आहे. तिथपर्यंत कसं पोचायचं हे पाहायचं आता." नवर्‍याचा कधी नव्हे तो इतका पक्का निर्धार पाहून कौतुकाचं भरतंच आलं मला. ह्या त्याच्या निर्धाराला योग्यं दिशा द्यायला हवी अशी खुणगाठ बांधत मी नुसतीच मान डोलवली. विमानतळावर जाऊन आम्ही आपापल्यापरिने तिथल्या आधीच उद्धट असलेल्या कर्मचारी बाईला जितकं जेरीला आणता येईल तितकं आणायचं काम केलं. पण खिंड काही लढवता आली नाही. माझं निघणं एक दिवस लांबलं ते लांबलंच.
"तुझं आणि विमानाचं नातं असंच आहे. दरवेळेला असं काहीतरी होतं." नवरा कुरकुरला आणि आमची यात्रा पुन्हा घराच्या दिशेने वळली. तिघांची कितीतरी स्वप्न एकाचवेळी भंग केल्याचं पाप  एअरलाईन्सच्या माथ्यावर पुन्हा एकदा पडलं.

घरी आलो तेव्हापासून घरातलं प्रत्येकजण पुन्हा पुन्हा एअरलाईन्सच्या वेबसाईटवर दुसर्‍या दिवशीचं विमान वेळेवर आकाशात झेपावणार आहे याची खात्री खरुन घेतंय. सांगेनच तुम्हाला, मी निघाले की नाही :-)

Monday, October 19, 2015

झलक

 ’वेषांतर’ एकांकिकेची झलक.



वेषांतर: तामिळनाडू मधील अळमग्गळ नावाचं एक खेडं. जेमतेम पाचशे उंबरठे असलेलं. इथल्या एका पडीक अवस्थेतल्या वाड्यात वेषांतर एकांकिकेतील नाट्य घडतं. वाड्यातील शास्त्रीबुवा मूळचे गोमंतक. उपजिविकेसाठी पार दक्षिणेत येऊन स्थिरावलेले. मराठी भाषिक तरुणींच्या आगमनाने मुलखातलं कुणीतरी भेटल्याचा शास्त्रीबुवांना आनंद होतो. पण हा आनंद क्षणभुंगुर ठरावा अशा घटना घडत राहतात. घडणारं सारं प्रत्येकाच्याच दृष्टीने अकल्पनीय,धक्कादायक. निर्माण झालेल्या वादळाला कसं तोंड देतात या वाड्यातील व्यक्ती?  सत्यघटनेवर आधारित एकांकिका.

Monday, October 12, 2015

काळीज कुरतडणारी वेदना


"आर यू ख्रिश्चन?" या प्रश्नावर ज्यांनी माना डोलवल्या, उभे राहिले त्यांच्यावर "गुड, विदीन अ मिनिट यु विल सी गॉड" असं म्हणत त्या तरुणाने गोळ्या झाडल्या. ऑरेगन राज्यातील एका आडगावातील कम्युनिटी कॉलेजमधील अनेक तरुण जीव नाहक प्राणाला मुकले. या वर्षात विद्येच्या आवारात घडलेली ही ४५ वी घटना. दरवेळेसारखाच पुन्हा एकदा ’गन कंट्रोल’ हा विषय चघळला जाईल ते पुढची घटना घडेपर्यंत. मोजणंही कठीण होऊन जावं इतक्यांदा हे असे प्रसंग घडतायत या देशात. दरवेळेला भयभीत चेहर्‍याची मुलं शरण आल्यासारखी दोन हात डोक्याच्या मागे धरुन आवाराच्या बाहेर पडतात. पोलिस, ॲम्युबलन्सेस, प्रसारमाध्यमांसमोर हमसाहमशी रडणारे तरुण जीव आणि पोटच्या जीवांच्या काळजीने धावत पळत पोचलेले पालक हे असं दृश्य दुर्देवाने वारंवार पाहायला मिळतं. दरवेळेला कुणाच्यातरी माथेफिरुपणामुळे निष्पाप मुलांना, त्यांच्या शिक्षकांना प्राण गमवावा लागतो. धक्कादायक म्हणण्याच्या पलिकडे गेलं आहे हे.
शाळांमध्ये होणार्‍या गोळीबारांबद्दल चर्चा सुरु झाली की हमखास ती पोचते १९९९ सालापर्यंत. २० एप्रिल १९९९ साली कॉलोरॅडो राज्यातील लिटीलटन कोलंबाईन हायस्कूल मध्ये दोन तरुणांनी अंदाधुंद केलेल्या गोळीबारात १३ मुलं मारली गेली तर ३० हून अधिक जखमी झाली. ह्या घटनेने देश हादरला पण त्या आधी आणि नंतरही सातत्याने हे सत्र चालूच आहे. २००७ साली व्हर्जिनिया पॉलिटेक्नीक मध्ये झालेल्या गोळीबारात ३२ मुलं आणि शिक्षक मारले गेले. या घटनांचा गाजावाजा जास्त झाला कारण मृत्यू पावलेल्या मुलांची संख्या. इतर ठीकाणी बळी गेलेल्यांची संख्या कमी असली तरी शाळेत होणार्‍या गोळीबारांच्या संख्येत वाढच होत चालली आहे. वर उल्लेख केलेल्या घटनांचे पडसाद हळूहळू हवेत विरतायत तोच २०१२ साली सॅंडीहूक प्राथमिक शाळेतली २० चिमुरडी मुलं आणि ६ शिक्षक अशाच गोळीबाराला हकनाक बळी पडले. या घटनेने सारा देश सुन्न होऊन गेला. त्यानंतर म्हणजे, १ ऑक्टोबर २०१५ ला घडलेला हा वर्षभरातला ४५ वा गोळीबार. प्रत्येकवेळेला मारेकर्‍यांने हे का केलं असावं याचा शोध, सोशल नेटवर्कवरचा मारेकर्‍याचा वावर, त्याने वेळोवेळी व्यक्त केलेली मतं, फोटो यावरुन बांधला जाणारा अंदाज यालाही अंत नाही. यात भर म्हणून आता कधी गोळीबार करणार्‍या मुलांच्या पालकांना, त्यांचं आपल्या मुलांवर नियत्रंण नाही म्हणून, सरकारला, शाळा मुलांचं रक्षण करु शकली नाही म्हणून, काही ठीकाणी शाळेतील कर्मचार्‍यांना, सरतेशेवटी आता बंदूक उत्पादक तसंच २५ कंपन्यांना चित्रपट आणि संकेत स्थळांवर खेळल्या जाणार्‍या खेळांमुळे मुलं हिंसकतेचा मार्ग चोखाळतात म्हणून काही पालकांनी कोर्टात खेचलं आहे. या सार्‍यातून अशा घटनांना आळा घातला जाऊ शकेल असा मार्ग खरंच सापडणार आहे की त्यातही स्वत:च्या फायद्याचा रंग आहे हे उमजणं आतातरी कठीण आहे. काळच ते ठरवील. दरवेळेला अशा घटनांची कारणमीमांसा शोधण्याचा प्रयत्न होत राहतो. निघालेल्या निष्कर्षातून उपायाची अमंलबजावणी किती वेळा होते हा भाग वेगळा. राजकारणाचे रंग इतके गडद आहेत की त्यातून ’गन कंट्रोल’ सारखे सर्वसामान्यांच्या दृष्टीने सहजसाध्य असणारे उपाय किती जणांचे बळी गेल्यावर होणार ते राजकारणीच जाणोत. तोपर्यंत हे असे प्रसंग वारंवार सर्वांच्या वाट्याला किती दिवस येत राहणार याचाच विचार मन कुरतडत राहणार. ह्याच पार्श्वभूमीवर गोळीबार करणार्‍या काही तरुणांच्या आई - वडिलांच्या मनाचा प्रसारमाध्यमांनी घेऊ पाहिलेला वेध महत्वाचा ठरावा.
कोलंबाईन हायस्कूल मधील गोळीबार करणार्‍या डिलनच्या आई - वडिलांनी त्या घटनेनंतर जवळ जवळ १५ वर्षांनी ’फार फ्रॉम द ट्री’ या पुस्तकासाठी अॲड्रुयु सोलोमनला मुलाखत दिली. प्रसारमाध्यमांनी वेळोवेळी संपर्क साधूनही इतके दिवस मौन बाळगलेल्या सुझनने अखेर आपलं मन मोकळं केलं. गुन्हा करणार्‍या मुलांच्या पालकांकडे सर्वात प्रथम दोषी म्हणून पाहिलं जातं. पालक म्हणून या मुलांचे आई - वडिल काय करत होते असं म्हटलं जातं. डिलनची आई सुझन यावर सांगते, की जेव्हा कोलंबाईन शाळेत गोळीबार झाला तेव्हा डिलनच्या मित्राचा, डिलनचा पत्ता लागत नाही हे सांगण्यासाठी फोन आला. त्यावेळेस आपला मुलगाच यात सहभागी असेल अशी पुसटशी शंकाही मनाला शिवली नाही. पण सुझन घरी येईपर्यंत घराला पोलिसांनी वेढा घातला होता. हताशपणे या सार्‍याला सामोरं जाताना इतक्या जणांच्या मृत्यूला आपला मुलगा कारणीभूत ठरला यावर विश्वास ठेवणं सुझनला कठीण जात होतं. डिलनबद्दल सांगताना ती म्हणते, ’चार चौघांच्या मुलांसारखाच तोही वाढला. किंबहुना त्याची ओळख हुशार मुलगा म्हणूनच होती. जी गोष्ट करेल ती मन लावून करणारा मुलगा होता तो. वडिलांबरोबर तास न तास बुद्धीबळ खेळणं हा त्याचा आवडता छंद. पालक म्हणून आमच्या समोर कधीच कोणतीही आव्हानं त्याने उभी केली नाहीत. व्हिडीओ गेम्स, स्वत:च्या खोलीत तास न तास काढणं हे जी इतर मुलं या वयात करतात तेच तोही करत होता. एकमेव प्रसंग होता तो, कधीतरी रात्री त्याने आणि एरिकने रस्त्याच्या कडेला उभी असलेली गाडी उघडल्याचा. त्याची शिक्षाही त्याने भोगली होती. मात्र त्यावरुन तो हे टोक गाठेल किंवा ही त्याच्यातील विक्षिप्तपणाची लक्षणं आहेत अशी शंकाही आली नाही.’
डिलनच्या या कृत्यानंतर सुझनच्या मनात कितीतरी वेळा आत्महत्येचा विचार डोकावून गेला. तिचं बाहेर जाणं बंद झालं, नोकरीवर पुन्हा रुजू होऊनही कामातलं लक्ष उडालं. तिच्या वेळी अवेळी रडण्याने आजूबाजूच्या लोकांची अवस्था अवघड होऊन जाई. ते जाणवत असूनही तिला जोरजोरात रडावंसं वाटे. आडनाव सांगण्याचीही शरम वाटायला लागली. रेडिओ, टीव्ही लावण्याचं बळ गेलं. आपल्या मुलाने असं करावं यावर विश्वास ठेवणं जितकं कठीण जात होतं तितकाच पालक म्हणून डिलन आणि एरीकचे आई - वडिलच गुन्हेगार आहेत असा प्रसार माध्यमांतून आळवला जाणारा सूरही सुझनचं काळीज भेदून टाकत होता. मुलाखतकर्त्याला ती सांगते, ’माझं मुल गमावल्याचा शोकही मी करु शकत नव्हते अशी अवस्था होती. काय चुकलं माझं? लाड केले जास्त की फार जास्त स्वातंत्र्य दिलं? नक्की काय चुकलं की त्याने असं वागावं? पालक म्हणून आमचं काय चुकलं ह्या प्रश्नाचं उत्तर कधीच मिळणार नाही का? हे कृत्य करण्याच्या थोडे दिवस आधी मी त्याचा हात तळव्यात धरुन माझं त्याच्यावरचं प्रेम व्यक्त केलं होतं, आई म्हणून त्याचा अभिमान वाटतो हे सांगायला विसरले नव्हते. याचाच विपरित परिणाम झाला असेल? माझ्या अपेक्षांना तो पुरा पडणार नाही हे तर त्याच्या मनाने घेतलं नसेल? खूप विचार करते तेव्हा आता मनातल्या मनात मीच त्याची क्षमा मागते कारण, कदाचित त्याला माझ्या मदतीची गरज असेल हे ओळखण्यात मी अपयशी ठरले.’ हे सांगून त्या गोळीबारात बळी पडलेल्या काही पालकांनी संपर्क साधला तो क्षण गहीवरुन टाकणारा असल्याचं ती सांगते. या गोळीबारात ठार झालेल्या मुलांच्या आई - वडिलांनी जेव्हा त्यांची भेट घेतली तेव्हा गहिवरलेल्या डिलन आणि एरिकच्या आई - वडिलांनी मुलांनी आपल्याला मुर्ख बनवल्याची भावना व्यक्त केली.

सॅंडी हुक प्राथमिक शाळेत गोळीबार केलेल्या घटनेतला गुन्हेगार होता अॲडम लान्झा. याच्या बाबतीत मात्र त्याचे वडिल त्याचं वेगळेपण नमूद करतात. लहानपणी लक्षात न आलेलं अॲडमचं वेगळेपण तो माध्यमिक शाळेत जायला लागल्यावर जाणवायला लागलं. काहीतरी चुकत होतं. अॲडम एक्कल कोंडा व्हायला लागला, नजर टाळायला लागला. त्याची झोप हरवली. शाळेत येऊन गोळीबार करणार्‍यापूर्वी स्वत:च्या आईला ठार मारणार्‍या अॲडम बाबत पालक म्हणून त्याची आई कमी पडली हे मात्र ते अमान्य करतात. अॲडम वडिलांबरोबर राहत नसला तरी अॲडमच्या आईने त्याच्यावर उपचार व्हावेत म्हणून प्रयत्न केला होता. मात्र आपल्याला उपचाराची गरज आहे हे मान्यच नसणार्‍या अॲडमचा उपचारांना दिला जाणारा प्रतिसाद उत्साहवर्धक नव्हता. मानसोपचार तज्ञांकडे त्याने कधीच मोकळेपणाने आपल्याला काय वाटतं ते सांगितलं नाही. यामुळेच पालक म्हणून आपण काही निराळं करु शकलो असतो हे त्यांना मान्य नाही. या सार्‍याचा वडिल म्हणून झालेल्या परिणामाबद्दल ते म्हणतात, ’रात्री खूपदा एकच स्वप्न पडतं. ज्यात दाराच्या पलिकडे कुणीतरी संतप्त नजरेने आपल्याकडे पाहतंय असं वाटतं. त्या चेहर्‍याकडे पाहिल्यावर माझी गाळण उडते. विचार केल्यावर लक्षात येतं की दारात उभा असलेला तो चेहरा अॲडमचा असतो आणि अॲडमच्या हातून प्राण गमावलेल्या मुलांचं मी प्रतिनिधित्व करत असतो. त्यामुळे माझी भितीने गाळण उडते. ’
वरील २ उदाहरणं सोडल्यास आत्तापर्यंत शाळेच्या आवारात घडलेल्या गोळीबाराच्या घटनांतून गुन्हेगारांचे पालक फारसे बोलते झालेले दिसत नाहीत. जे झाले ती घरं आपल्यासारखीच मध्यमवर्गीय वातावरणाची वाटतात. ते सांगतात त्यापेक्षा खरंच काही पालक म्हणून ते वेगळं करु शकले असते असं वाटत नाही. मग ही मुलं अशी का वागतात या प्रश्नाची उकल तशीच राहते. मुलांच्या कर्मांचं ओझं वाहण्याखेरीज पालकांसाठी अशाने काही पर्यायच उरत नाही. मग नक्की प्रतिबंध तरी कसा करणार या गोष्टींना? बंदूक नियत्रंण? मानसिक विकृतीचा वेळीच शोध आणि त्यावर त्वरित योग्यं उपचार? सळसळत्या तरुणाईला अयोग्यं मार्गाकडे जाण्यापासून रोखणं? मुलांमध्ये होत असलेल्या सुक्ष्म फरकाचीही नोंद घेऊन त्यांना बोलतं करणं? प्रश्नांच्या जंजाळातून खात्रीलायक नसले तरी हे काही मार्ग दिसतात. प्रश्न आहे तो त्या मार्गावर पाऊल टाकण्याचा. कधी होणार हे, कोण करणार आणि कसं?


लोकसत्तेच्या, ११ ऑक्टोबरच्या ’लोकरंग’ मध्ये हा लेख प्रसिद्ध झाला आहे.   दुवा:काळीज कुरतडणारी वेदना

Monday, September 21, 2015

मोकळे केस

"बाबा" बागेत खेळणारी माझी चिमुरडी धावत धावत माझ्या दिशेने येत होती. मी पाहत राहिलो तिच्या केसांकडे. कापलेल्या कुरळ्या केसांचं टोपरं इतकं गोड दिसत होतं. मला येऊन घट्ट बिलगली. तिला जवळ घेत मी पापा घेतला तसं तिने माझ्या गालांवर ओठ टेकले.
"काय रे पिल्ला?" लेकीच्या केसातून माझे हात मायेने हात फिरले.
"बाबा, मला तू आवडतोस."
"हो? का गं?"
"आवडतोस." लेक आणखी बिलगली. मी तिच्या लाडिक स्वरात रमून गेलो. ती पुन्हा खेळायला गेली. आणि मनात काही बाही विचार घोळायला लागले. मिटलेल्या डोळ्यांसमोर ’ती’ उभी राहिली.

गिरगावच्या आमच्या इमारतीत दाराबाहेर उभं राहिलं की पलिकडच्या इमारतीत अगदी समोरच्या घरात राहणारी ’ती’. तिच्या घरातला पलंग खिडकीला लागून होता. जेव्हा पाहावं तेव्हा पाठमोरीच बसलेली दिसायची. काय करत असायची दिवसभर त्या पलंगावर बसून कोण जाणे. पण नजरेला पडायचे ते तिचे मोकळे सोडलेले काळेभोर लांबसडक केस. अधूनमधून ती त्याचा आंबाडा बांधायची. पण थोड्याच वेळात ते सुटायचे. किती वेळा मी कठड्याला टेकून कधीतरी तिचा चेहरा दिसेल म्हणून वाट पाहिली. खूपदा वाटायचं रस्ता ओलांडला की तिची इमारत. हाकेच्या अंतरावर. जावं खाली धाडधाड पायर्‍या उतरुन आणि शिरावं तिच्या इमारतीत, मग घरात. निदान त्या मोकळ्या केसा मागचा चेहरा एकदा तरी दिसावा. कधीतरी माझी बहिण येऊन उभी राहायची बाजूला.
"शिट्टी मार ना. मग बघेल ती वळून मागे." बहिणीला माझी प्रतिक्षा एव्हाना समजली होती.
"वा, काय डोकं चाललंय. खालच्या गोंधळात माझी शिट्टी तिच्यापर्यंत पोचेल तरी का?"
"हे बरं आहे तुझं. मदत करायला गेले तर अक्कल काढतोस माझी." आम्हाला वाद घालायला कारण काही लागायचं नाहीच. त्या वादात कधीतरी लक्षात यायचं ’ती’ तिथून उठून गेली. बहिण पुटपुटायची.
"आईला दाखव रे ती मुलगी एकदा."
"का? मी प्रेमा बिमात नाही पडलेलो हा तिच्या. चेहरासुद्धा नाही पाहिलेला अजून."
"केस पाहतोस ना?"
"ते तर तू पण बघतेस. आवडतात की नाही तुलाही ते मोकळे केस पाहायला?"
"भावड्या म्हणूनच म्हणतेय आईला दाखवूया ती मुलगी एकदा." मी तिची अक्कल पुन्हा काढायच्या आधीच ती घाईघाईने म्हणाली.
"मला अजिबात मोकळे केस सोडायला देत नाही आई म्हणून म्हणतेय. एकदा त्या मुलीला बघच म्हणावं. सतत केस मोकळे." आमचं हे बोलणं आईच्या कानावर अर्थात पडलेलं असायचं. ती आतूनच ओरडायची.
"सोडा केस मोकळे आणि फिरा इकडे - तिकडे. जेवणात केस मिळाला म्हणून माझ्यावर डाफरु नका. सांगून ठेवतेय आधीच."

त्या मुलीचे ते मोकळे केसच कायम लक्षात राहिले. चेहरा कधीच दिसला नाही. पण अगदी तसेच लांब केस असलेली बायको मात्र मिळाली मला. पहिल्यांदा तिच्या केसांवर गजरा माळला तो आनंद काही औरच. गावी गेलेलो त्यावेळेस. रमत गमत संध्याकाळच्या वेळेला गडनदीच्या पुलावर जाऊन उभे राहिलो. खूप वेळ. पुलाखालून वाहणार्‍या पाण्याकडे एकटक नजरेने पाहत बसलो होतो दोघं. इतक्यात घंटा वाजली म्हणून मान वळवून पाहिलं. सायकलवरुन गजरे घेऊन चालला होता चिंद्या. सुंरगीच्या फुलांचा वास मन अगदी मोहवून टाकत होता. दोन - तीन होते त्याच्याकडे. उत्साहाने त्याने एक बायकोच्या हातात ठेवला. तो निघून गेल्या गेल्या संधिप्रकाशात माळला मी तिच्या केसांवर. त्या सुवासाने जसं वेड लावलं तसं रात्री गजरा काढून ठेवल्यावर तिच्या मोकळ्या केसांनी. केसांना वेढून राहिलेला तो सुरंगीचा गंध अजूनही माझ्या आजूबाजूला दरवळतोय.

कधीतरी माझ्या बायकोने तिचे ते लांबलचक केस आधुनिक दिसणं अनुभवावं म्हणून छोटे करुन टाकले. आता ते नेहमीकरताच मोकळे असतात, तसंही आता आजूबाजूला मोकळे केसच दिसतात म्हणा. म्हटलं तर मोकळे केस सर्वत्र सारखेच पण स्थळ, वेळ, जागा आणि मोकळे केस सोडलेली व्यक्ती, त्या केसांमध्ये अडकलेल्या माणसाचं भावविश्व किती बदलून टाकते. मोकळ्या केसांकडे पहाण्याची दृष्टी, स्पर्श किती वेगवेगळा असतो नाही? विचारांच्या नादात होतो तितक्यात माझी चिमुरडीने पुन्हा येऊन बिलगली. सवयीने तिच्या कुरळ्या, आखूड पण मोकळ्या केसातून हात फिरवायला लागलो आणि भटकून आलेलं मन एकदम जाग्यावर आलं.
"छान दिसतायत तुझे मोकळे केस." मी कौतुकाने म्हटलं. लेकीने मान डोलवली आणि मैत्रीणींच्या दिशेने खेळायला ती धावत सुटली.

(सुदर्शन रंगमंचच्या ओंकार सिन्नरकरच्या विनंतीवरुन त्यांच्या साहित्य मंडळात झालेल्या कार्यक्रमासाठी 'मोकळे केस' या विषयावर लिहलेला लेख/गोष्ट - मोहना प्रभुदेसाई जोगळेकर)

Friday, September 11, 2015

वेषांतर

नुकत्याच म्हणजे १५ ऑगस्टला दरवर्षीप्रमाणे आम्ही २ एकांकिका सादर केल्या.  मी लिहिलेली  ’वेषांतर’ ही एकांकिका सत्यघटनेवर आधारित आहे. संगीत, प्रकाशयोजना, ध्वनि, नेपथ्य, सशक्त कथा आणि अनुभवी कलाकार या सार्‍याचा सुंदर मिलाफ आणि रसिक प्रेक्षकांनी खचाखच भरलेलं प्रेक्षागृह  यामुळे ४ महिने आम्ही सर्वांनी केलेल्या श्रमांचं सार्थक झाल्यासारखं वाटलं.  तुम्हा सर्वांसाठी ’वेषांतर’ एकांकिकेचे फोटो या दुव्यावर:

 https://marathiekankika.wordpress.com/

Saturday, August 1, 2015

व्यक्तिचित्रे

बृहनमहाराष्ट्र वृत्तासाठी लिहीत असलेल्या लेखमालिकेतील हा माझा शेवटचा लेख.

अत्यानुधिक तंत्रज्ञानामुळे संवाद साधणं सोपं आता सहज सोपं होऊन गेलं आहे. परदेशात जाणं, ताबडतोब तिथे रुळणं ही नवलाईची गोष्ट राहिलेली नाही. पण हे झालं हल्ली हल्लीच्या काळात. ज्यांना इथे येऊन दशकं उलटली आहेत त्यांच्यासाठी मधल्या काळातील ही स्थित्यंतरं अचंबित करणारी आहेत. तरीदेखील असं वाटतं की ही प्रगती घडत असताना अनुभवाचं, प्रश्नाचं स्वरुप बदलत गेलं तरी मानवी मन मात्र तेच राहिलं. कधी अनाकलनीय तर  काहीवेळा ठोकताळे मांडता येणारं. प्रत्येकाचे अनुभव आणि प्रश्न वेगळे तसे ते अनुभवण्याचे, प्रश्न सोडवण्याचे मार्गही विविध. या सार्‍याचा वेध घेण्याचा प्रयत्न मी या लेखमालिकेतून केला.

मी अमेरिकेत आले तो काळ आणि आताचा काळ यात खूप फरक आहे. १९९५ च्या दरम्यान भारतात  संपर्क साधण्याचे मार्ग म्हणजे फक्त पत्र आणि फोन. साधारण त्या काळात जे इथे आले त्यांना नक्की आठवत असेल, फोन करायचा तर  MCI किंवा AT&T  हेच दोन पर्याय बहुतांशी उपलब्ध होते. दर मिनिटाला आपण ७५ सेंट खर्च करतोय याचं भान ठेवायला लागायचं. पत्र पाठवलं की पोचायला तीन आठवडे, उत्तर यायला तीन आठवडे. आपल्याकडून भारतातून आलेल्या पत्राला अगदी एक दोन दिवसात उत्तर लिहिलं गेलं तरी तिकडून तसं होईलच याची खात्री नसे. मायदेश सोडून आलेले आपण भावनिक गुंतवणुकीत अधिक गुंतलेले. तिकडे त्यांच्या दैनंदिन जीवनात फारसा फरक पडलेला नसायचा. मला आठवतंय, सासर - माहेरच्या सख्ख्या नातेवाइकांव्यतिरिक्त, मावश्या, मामा, मैत्रिणी झाडून सार्‍यांना तेव्हा मी पत्र लिहीत असे. मग  प्रतिसादाबद्दल आशा - निराशेचा खेळ चालू राही.  हळूहळू इ मेलचा जमाना आला. पण घरातल्या वयस्कर मंडळीना इ मेल कसं वापरायचं कुठे ठाऊक होतं? ते पत्राकडे डोळे लावून बसलेले असत. फोनचे दर स्वस्त झाल्यावर मग मात्र फोन मुळे हळूहळू पत्र लेखन कमी आणि  नंतर जवळजवळ  बंदच झालं. फोननंतर आता स्काइप, फेसटाइम, व्हॉट्सअॲप, गूगल टॉक....अशा अत्यानुधिक तंत्रांनी मात्र क्रांतीच केली. या सार्‍यामुळे आपल्या आयुष्यात झालेल्या बदलांचा मागोवा म्हणजेच ही लेखमालिका होती.

तळ्यात मळ्यात: आधुनिक तंत्रज्ञानामुळे आपण संवाद तर हरवून बसलेलो नाही ना ही जी शंका प्रत्येकाच्या मनात डोकावते त्यावरुन ’तळ्यात मळ्यात’ ची कल्पना सुचली.  दामले कुटुंबांवरचा हा लेख. केतन, मीरा आणि मुलं नानांच्या, केतनच्या वडिलांच्या घरी येतात. आईच्या निधनानंतर आग्रह करुनही अमेरिकेत न आलेल्या वडिलांना भेटायला केतन वर्षभराने भारतात येतो.  केतनच्या मनात नानांना भेटायची अनिवार ओढ  आहे. नानाही त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसलेले.. घरी आल्या या सार्‍याचं प्रतिबिंब प्रत्येकाच्या वागण्यात उमटतं. पण थोड्याच वेळात केतन आणि मुलं आपापले लॅपटॉप, फोन घेऊन बसतात. नानांचा नाराजीचा सूर जाणवतो आणि मीराला त्यांच्या मनातला एकटेपणा तीव्रपणे बोचतो. संपर्कात रहाण्याच्या आधुनिक साधनांबद्दल आनंद मानायचा की प्रत्यक्ष भेटीतली मजा त्यामुळे पटकन संपुष्टात येते याचं दु:ख हा प्रश्न मीराला छळत रहातो आणि निदान त्या क्षणीतरी नानांचा एकटेपणा घालवायचा मार्ग तिला सापडतो. असा या लेखाचा विषय होता. माझी खात्री आहे की अनेकांनी अंशतः तरी हे अनुभवलेलं असणारच. (बृहनमहाराष्ट्र वृत्त: ऑगस्ट २०१३)
मी काय करु?: अर्थाजन आलं की बचतही आलीच. पण याचा कधीकधी अतिरेक होतो आणि आपलेच जीवलग त्यात पोळले जातात हे लक्षातही येत नाही. यावरुनच हा लेख सुचला.
नोकरी करणारी मीना, आपल्या आई वडिलांना दर वर्षी मुलांना सुट्ट्या लागल्या की अमेरिकेत बोलवून घेते. डे केअर, आफ्टर स्कूल हे पर्याय असतानाही पैसे वाचवण्याच्या नादात, आईला आता झेपत नाही, तिची इच्छाही नाही हे जाणवूनही आजी आजोबांचा सहवास मुलांना मिळावा हे निमित्त पुढे करते. लेखातील, मीरा,  तिचे आई - बाबा, मीराचा नवरा, या सार्‍यांनाच प्राप्त परिस्थितीबद्दल पडलेला प्रश्न म्हणजेच, ’मी काय करु?’ (बृहनमहाराष्ट्र वृत्त:  ऑक्टोंबर २०१३)

कृतज्ञ: वर्षानुवर्ष परदेशात राहूनही आपल्या मनाचं पारडं मायभूमीकडे जास्त झुकलेलं असतं. कर्मभूमीचं काय? हे अनेकदा मनात येतं. त्याच विषयावरचा हा लेख.
समाजसेविका असलेल्या इराला अनिकेत जेव्हा भारतातल्या संस्थेला मोठी देणगी द्यायची इच्छा व्यक्त करतो तेव्हा सखेद आश्चर्य वाटतं. मातृभूमीच्या ऋणात रहायला हवंच पण कर्मभूमी विसरु नये हे अनिकेतला पटवून ती द्यायचा प्रयत्न करते.  इरा हे पटवून देते तेव्हा जे जग आपल्या समोर उभं करते ते मला महत्त्वाचं वाटलं. इथेही सारं काही आलबेल नाही आणि आपण ते बदलायला हातभार लाऊ शकतो ह्याचाच दाखला म्हणजे तिचं या क्षेत्रातील काम. हा लेख शारलटमध्ये गेली कितीतरी वर्ष समाजसेवा करणार्‍या मैत्रिणीच्या अनुभवावरून लिहिला. (बृहनमहाराष्ट्र वृत्त: डिसेंबर २०१३)

बोनसाय: महत्त्वाकांक्षी स्त्री आता नवलाची बाब राहिलेली नाही. एकमेकांच्या सहाय्याने आपली महत्त्वाकांक्षा उत्तम रितीने जोपासणारे पती - पत्नीही आता अगदी सहज दिसून येतात. पण तडजोडीची तयारी दोन्ही बाजूने नसते तेव्हा  परिस्थितीच्या चक्रात भरडल्या जाणार्‍या मुलांवर जो परिणाम होतो तो या लेखाचा विषय.
डिपेंडंट व्हिसावर आलेली स्वाती स्वत:च्या शिक्षणाला अमेरिकेत वाव दिसत नाही म्हटल्यावर केदारची इच्छा नसताना मुलाला, मंदारला घेऊन  भारतात ’ट्रायल’ म्हणून  परत जायचा निर्णय घेते. सततच्या वाद - विवाद आणि चर्चेतून ती स्वत:च्या निर्णयावर ठाम रहाते. केदार मात्र अनेक कारणांसाठी अमेरिकेतच रहातो. तो भारतात येण्याची आतुरतेने  वाट पहाणार्‍या  मंदारच्या मनावर, वागणुकीवर होणारा परिणाम म्हणजेच ’बोनसाय’  लेख. (बृहनमहाराष्ट्र वृत्त: फेब्रुवारी २०१४)

इच्छा: मृत्युची सावली पडलेल्या घरातलं शोकदायक वातावरण आणि भेटायला येणार्‍यांचं वागणं याचा होणारा मनस्ताप आपण ऐकलेला, अनुभवलेला असतो. पण घरातलेही काही जीवलगाच्या जाण्याचं दु:ख विसरतात तेव्हाची घरातल्या प्रत्येकाची मानसिक स्थिती दर्शविणारा लेख.
निलेश हा परदेशी रहाणारा आई - दादांचा मुलगा. स्मिता, सुनिल ही त्याची भारतातली भावंडं. अमेरिकेतून दादांच्या निधनानंतर दिवसांसाठी आलेला मुलगा आणि त्याची भारतातील भावंडं यांच्यामध्ये होणारे वाद, दोषारोप, उणीदुणी काढणं पाहून अखेर मुलांची आई फक्त एकच मागणं मुलांकडे मागते. तोच लेख ’इच्छा’. (बृहनमहाराष्ट्र वृत्त: एप्रिल २०१४)

रिंगण: आयुष्यात असे काही क्षण येतात की आपण रिंगणात अडकून पडलो आहोत असं वाटायला लागतं. तशाच एका प्रसंगातून जाताना या लेखातील रमाकांतच्या शोधयात्रेच्या प्रवासाचा वेध म्हणजे हा लेख.
भारतात कायमसाठी परत चाललेला संतोष रमाकांतना भेटायला येतो आणि ३० वर्षाहून अधिक काळ इथे राहिलेल्या रमाकांतचं मन आपल्या अमेरिकेत येण्याच्या निर्णयामागची कारणं शोधायला लागतं. आई - वडिलांची इच्छा? समाजात प्राप्त होणारी प्रतिष्ठा? की स्वत:चाच निर्णय या प्रश्नांचा गुंता सोडवणार्‍या मनाचा शोध म्हणजे म्हणजे ’रिंगण’. (बृहनमहाराष्ट्र वृत्त: जून २०१४)

सीमारेषा: परदेशात मूल वाढवताना कधी ना कधी, मायदेशीच असतो तर हा प्रश्न आणि तिथलं आणि इथलं ही  तुलना कधी उघड उघड तर कधी मनातल्या मनात केली जातेच. गिरीश, श्रावणी त्यांच्या मुलांच्या बाबतीत अशा एका प्रसंगाला सामोरे जातात आणि जर इथे राहिलो नसतो तर, भारतात असतो तर ह्या जर- तर ने श्रावणी  अस्वस्थ होते पण त्यांचा तरुण मुलगा, साकेतच त्यांची अस्वस्थता घालवायला मदत करतो. दोन पिढ्या आणि त्यांची मानसिकता आणि वेगवेगळ्या देशात मूल वाढवणं यावरचा  लेख म्हणजे ’सीमारेषा’. (बृहनमहाराष्ट्र वृत्त: ऑगस्ट २०१४)

दोन ध्रुवांवर - परदेशात गृहीणी असणं कधीकधी किती अवघड होऊन जातं यावर प्रकाश टाकणारा हा लेख.
नोकरी न करणारी सीमा आणि सतत कामाच्या व्यापात अडकलेला निलेश यांच्या संसाराची कथा म्हणजे दोन ध्रुवांवर. परिस्थितीला दोष देता देता, निलेशला दोषी मानणारी, त्याने परिस्थितीतून काढलेल्या मार्गांचा अवलंब करायला नकार देणारी सीमा आणि सीमाला आनंदी ठेवण्यासाठी धडपडणारा पण चुकत जाणारा निलेश. कोंडीत सापडल्यासारखं आयुष्य जगताना त्यांनी स्वत:साठी निर्माण केलेलं स्थान म्हणजेच, ’दोन ध्रुवावर’ हा लेख.  (बृहनमहाराष्ट्र वृत्त: ऑक्टोबर २०१४)

मंडळोमंडळी: भारताच्या बाहेर पडलं की मराठी माणूस एकत्र येतो आणि मंडळाची स्थापना होतेच. या मंडळांवरचा हा लेख. गावोगावी असणार्‍या महाराष्ट्र मंडळात सामील होण्याची प्रत्येक मराठी माणसाची कारणं वेगळी असतात. कधी मुलांसाठी, कधी ओळखी व्हाव्यात म्हणून तर कधी मुलांना, स्वत:ला व्यासपीठ मिळावं या हेतूने मंडळाचं सभासदत्व घेतलं जातं. पण मंडळाचा कारभार आणि लोकांची मानसिकता सर्वत्र सारखीच. राधा नावाच्या एका लहानग्या मुलीच्या, तसंच नाटकवेड्या नरेन आणि मंडळाच्या कार्यकारीणीच्या नजरेतून मंडळांच्या मानसिकतेचा वेध घेणारा लेख ’मंडळोमंडळी’.  (बृहनमहाराष्ट्र वृत्त: डिसेंबर २०१४)

अळवावरचे थेंब: हातातून निसटून गेलेले क्षण अळवावरच्या पाण्यासारखे घरंगळून गेलेले असतात. तसंच आयुष्यातल्या घटनांचंही. त्याच कल्पनेवरचा हा लेख.
प्रणिता आणि तिच्या दोन मुली, तितिशा आणि दिशा.   स्पर्धेच्या युगात त्यांनी मागे पडू नये म्हणून घाण्याला जुंपल्यागत सतत कुठल्या ना कुठल्या गोष्टीत त्यांना अडकवून टाकलेल्या आई - बाबांना या मुलींनी घातलेलं साकडं म्हणजे ’अळवावरचे थेंब’ हा लेख.
(बृहनमहाराष्ट्र वृत्त: फेब्रुवारी २०१५)

धागे: परदेशात रहाताना मायभूमीतील आपल्या जीवलगांशी मुलांची जवळीक रहावी यासाठी आपण अतोनात प्रयत्न करत असतो. आशा - निराशेच्या या खेळात कधीतरी दिसणार्‍या प्रकाशाच्या तिरीपिने हरखून जायला कसं होतं यावरचा हा लेख.
 भारतातल्या नातेवाइकांपासून मुलगा अलिप्त असतो याचा सल बाळगणारे केतकी - सारंग.  नीलला त्यांच्याबद्दल ओढ वाटावी यासाठी वर्षानुवर्ष प्रयत्न करणारी केतकी. अखेर नील महाविद्यालयीन शिक्षणासाठी बाहेरगावी गेल्यावर सगळे मार्ग खुंटल्यासारखे वाटत असतानाच नील अचानक एक सुखद धक्का देतो त्याची कथा सांगणारा लेख म्हणजे, ’धागे’.
(बृहनमहाराष्ट्र वृत्त: एप्रिल २०१५)

Thursday, July 23, 2015

परवाना

काल प्रेमपत्र आलं सरकारचं. हल्ली कुणाची पत्रच येत नाहीत त्यामुळे सरकारचं तर सरकारचं. कुणाला तरी झाली आठवण असं म्हणत नाचवत नाचवत ते पत्र पेटीतून घरात आणलं. चष्मा लावला तरी काय लिहलंय ते दिसेना तेव्हा दार उघडलं. पत्र उन्हात धरलं आणि एकदा थोडं जवळ, एकदा लांब असं करत कुठल्या कोनातून नीट वाचता येईल याचा अंदाज घेत वाचायला सुरुवात केली. हे रामा, डोळ्यांचीच परिक्षा घेणार होते म्हणे. "लायसन्स रिन्यूअल" गाडी चालवण्याच्या परवान्याची मुदत संपत आली. द्या परिक्षा पुन्हा. खुणा ओळखा, डोळे चांगले असल्याची खात्री पटवा. सुतकी चेहर्‍याने ते प्रेमपत्र पुन्हा पुन्हा वाचलं.

परिक्षा म्हटलं की आधीच घाबरगुंडी उडालेली असते आणि द्यायच्या तरी किती या परिक्षा.  सरकारी खात्यातली लोकं आपलं ओझं त्यांच्या खांद्यावर असल्यासारखा चेहरा करुन बसलेली पाहिली की पास होणारेही धाडधाड नापास होत असतील.  या देशात पहिल्यांदा अशी परिक्षा द्यायला गेले तेव्हा कणकवली, रत्नागिरीत दिलेल्या ’परिक्षा’ लक्षात होत्या. 8 आकडा तर काढायचा, आहे काय नी नाही काय असं म्हणत गाडीत बसले. बाजूला परिक्षक दार उघडून बसला आणि मग मात्र  गोंधळ सुरु झाला. एकतर या देशात नवीन, त्याचे उच्चार मला कसे समजायचे आणि मी बोललेलं त्याला कसं समजायचं. मी पेचात पडले. तोही त्याच पेचात असावा. चेहरा हुप्प करुन बसला होता.
’स्ट्रेट’ एका शब्दात दिलेले हुकूम पाळायची मला कधीच सवय नव्हती. संदर्भासहित स्पष्टीकरण असलं तरच जमतं बाई. तो पुढे काही बोलेल याची क्षणभर वाट पाहिली आणि विचारलं.
"स्ट्रेट.. यु मीन आय हॅव टू ड्राइव्ह स्ट्रेट?"
"लेफ्ट..." तो खेकसला. विचारता विचारता पुढे नेलेली गाडी मी घाबरुन एकदम लेफ्टली.
"ब्रेक, ब्रेक." तो माझ्यापेक्षा घाबरला असावा. फाटल्यासारखा ओरडला आणि अमेरिकन माणसाला कसं घाबरवलं या आनंदात मी जोरात ब्रेक दाबला. गाडी कशी कुणास ठाऊक पुन्हा जिथून सुरुवात झाली होती तिथेच आली होती. त्याने धाडकन दार उघडलं. तो श्वास वर खाली करत थोडावेळ तसाच बसून राहिला. धाप लागल्यासारखा. मला कळेना आता उतरायचं की तसंच बसून राहायचं, पास की नापास? त्याच्या लाल झालेल्या चेहर्‍याकडे हळूच पाहत विचारलं.
"आर यू ओके?"
"आय आस्क्ड यू टेक लेफ्ट."
"यस. ॲड आय डिड टेक लेफ्ट."
"थॅक गॉड." मग कशाला भडकला हा माणूस? मी हसून पाहिलं.
"यू डिड नॉट गो टू लेफ्ट लेन." तो गुरगुरल्यागत पुटपुटला.
"फॉर व्हॉट?"
"टू टेक  अ लेफ्ट टर्न..."
"असं जायचं असतं?" चुकून मराठीत विचारलं आणि त्याने खाऊ की गिळू नजरेने माझ्याकडे पाहिलं.
"सॉरी." आता नापास होणार या कल्पनेनं मला धाप लागली. तोपर्यंत त्याची धाप नष्ट झाली होती. तो गाडीतून उतरला. मी त्याच्या मागून मागून. सावित्रीच्या मनात यमाच्या मागून जाताना काय काय विचार येत असतील ते मला आत्त्ता कळत होतं.  आता, ’या पुन्हा’ सांगणार या तयारीतच त्याने दिलेला कागद डोळ्यासमोर धरला.  आनंदाने त्यालाच मिठी मारावीशी वाटली तरी शहाणपणा करुन त्याला अधिक पेचात न पाडता विजयी चेहर्‍याने मी माझा मोर्चा नवर्‍याच्या दिशेने वळवला. आता ही काय दिवे लावणार असा चेहरा करुन तो दूर कुठेतरी कोपर्‍यात लपला होता.

त्यानंतर सरकारला अशी अधूनमधून आठवण होतंच असते. मग व्हा सज्ज पुन्हा परिक्षा द्यायला. करा गोंधळ, निस्तारा असं चालू होतं. चुकीच्या वर्गात गेलो, चुकीचा पेपर लिहिला, चुकीच्या विषयाचा अभ्यास केला, परिक्षा काल आणि आपण आज तिथे गेलो अशी स्वप्न परिक्षा होईपर्यंत पडत राहतात. पुन्हा एकदा शाळेत गेल्याचा अनुभव आमचं हे सरकार देतं ते काय कमी आहे. चला लागा आता तयारीला....

Thursday, July 16, 2015

माझ्या मैत्रीणीची...

नुकतीच श्रीदेवीला, माझ्या मैत्रीणीला नोकरी लागली. ती नोकरीच्या शोधात बरेच महिने होती. नोकरी मिळवण्यासाठी काय काय करु शकतात लोकं याबद्दलचं माझं ज्ञान तिच्या नोकरी संशोधन काळात पीएचडी मिळवण्याइतपत वाढलं.
"आज मुलाखत द्यायला यायची आहे."
"यायची आहे? म्हणजे तुला मुलाखत द्यायला जायचं आहे का?"
"नाही फोनवर आहे ना मुलाखत. नाव माझं पण मुलाखत ती देईल. म्हणून ’यायची’ म्हटलं." हे असं चालतं ही ऐकीव माहीती उदाहरणासकट समोर आल्यावर बसलेला धक्का न दर्शविता मी ’अधिक’ माहितीसाठी बाजारात भाजी घ्यायला गेल्यासारखं विचारलं,
"सध्या काय दर आहे?"
"काम फत्ते झालं तर 500 डॉलर्स." ती ज्या कामासाठी या मुलाखती देत होती तेच मी पण करते त्यामुळे आपणही या ’बिझनेस’ मध्ये घुसून जोडधंदा सुरु करावा का असा विचार मनात चमकून गेला. तो चेहर्‍यावरही दिसला असावा.
"तू देशील का मुलाखत? मला काय तिला द्यायचे ते तुला देईन." माझं पापभीरु मन शहारलंच. असली बेकायदेशीर कामं आम्ही ’मराठी’ लोक करत नाही (?) हे ठसवायला घाईघाईत म्हटलं,
"नको नको, मला नाही अशा मार्गाने पैसे मिळवणं बरं वाटत. आणि तसंही माझ्याकडे भरपूर पैसे आहेत." म्हटलं आणि ती आता मग ते पैसे मला दे म्हणाली तर म्हणून घाबरले.
आधी तिची मुलाखत ती दुसरी देणार म्हणून घाबरले, आता माझ्याकडचे भरपूर पैसे तिने मागितले तर म्हणून पुन्हा घाबरले. माझं हे घाबराघुबरी प्रकरण संपेपर्यंत तिला नोकरी लागलीही. आणि काम करायला ती माझ्याच कार्यालयात रुजूही झाली....

एका दिवसानंतर...
कार्यालयात कसलातरी उग्र दर्प पसरला होता. बरीचजणं काम सोडून त्याची चौकशी करण्याकरता इकडे तिकडे करत होती. सहा सात जण वास सहन होत नाही म्हणून घरुन काम करायची परवानगी मिळवावी का याची चर्चा करण्यात मग्न झाले. थोड्याच वेळात त्यात ते यशस्वीही झाले. कार्यालय ओस पडलं. आम्ही आपले एकदोघं जण टकटक करत संगणक बडवत होतो. एकदम माझ्या लक्षात आलं, कालच नव्याने रुजू झालेली श्रीदेवी कुठे दिसत नाही. हिला आधीच समजलं की काय आज घरुन काम करता येईल म्हणून. आम्ही जेमतेम तिघंजणं उरलो होतो. पोनीटेलला विचारलं,
"श्रीदेवी कुठे आहे?"
"सिरी इज नॉट कमिंग बॅक."
धक्काच बसला.
"का? कालच तर तिचा पहिला दिवस होता. "
"हो, पण नो कम्युनिकेशन स्किल्स म्हणून शी गॉट फायर्ड यस्टरडे ओन्ली." मला तिच्या अशा येण्याचं आणि जाण्याचं प्रचंड दु:ख झालं. आली काय नी गेली काय. घरी गेल्या गेल्या मी तिच्याघरी धावले. खरं तर म्हणायचं होतं, बघ असले उद्योग करावेतच कशाला. नोकरी काय कधी ना कधी मिळालीच असती. केवढी नामुष्कीची गोष्ट आहे ही एकाच दिवसात हायर आणि फायर, उगाचच सार्‍या भारतीयाबद्दल पण मत.... पण नुसतीच लटकलेल्या चेहर्‍याने मी तिच्यासमोर उभी राहिले. तिने माझ्या पाठीवर थोपटलं,
"अगं इतकं काय मनाला लावून घेतेस. मिळेल मला नोकरी. एक दिवसाचा अनुभव माझ्या दृष्टीने खूप मोठा आहे. या एका वर्षाच्या अनुभवामुळे उद्याच एक मुलाखत आहे...."

Wednesday, June 24, 2015

एकांकिका

दरवर्षीप्रमाणे यंदाही एकांकिकांची तयारी जोरात सुरु आहे. पाहायला आलात तर नक्की आवडेल.


वेषांतर:
तामिळनाडू मधील अळमग्गळ नावाचं एक खेडं. जेमतेम पाचशे उंबरठे असलेलं. इथल्या एका पडीक अवस्थेतल्या वाड्यात वेषांतर एकांकिकेतील नाट्य घडतं. वाड्यातील शास्त्रीबुवा मूळचे गोमंतक. उपजिविकेसाठी पार दक्षिणेत येऊन स्थिरावलेले. मराठी भाषिक तरुणींच्या आगमनाने मुलखातलं कुणीतरी भेटल्याचा शास्त्रीबुवांना आनंद होतो. पण हा आनंद क्षणभुंगुर ठरावा अशा घटना घडत राहतात. घडणारं सारं प्रत्येकाच्याच दृष्टीने अकल्पनीय,धक्कादायक. निर्माण झालेल्या वादळाला कसं तोंड देतात या वाड्यातील व्यक्ती?
कलाकार : रणजित गुर्जर, मेघनाकुलकर्णी, सुप्रिया गरुड, मोहना जोगळेकर, बोस सुब्रमणी.

धोबीपछाड – कुस्तीमधला एक डाव. काळ बदलला, साधनं बदलली तसं डावपेचांचं स्वरुप बदललं. रंगमंचावरचा धोबीपछाडही असाच. या डावात कुस्तीपटू आहेतस्वत:ला यम म्हणविणारे दोघं. हे दोघं रंगमंचावरच शड्डू ठोकून उभे ठाकतात. सावित्री- सत्यवान भूमिका करायची की नाही या संभ्रमात पडतात. तेवढ्यातदुसरा यमदूतही उभा ठाकतो. नाटकातलं नाटक रंगायला लागतं. अखेर कोण होतं चितपट? यम की यम? आणि कोण होतं यमदूत…? विनोदी एकांकिका - धोबीपछाड.
कलाकार: संदीप कुलकर्णी, सचिन कुलकर्णी, प्रशांत सरोदे, प्रिती सुळे, चिन्मय नाडकर्णी, गिरीश भावठाणकर.
अधिक माहिती:

Tuesday, June 2, 2015

जागो हिंदुस्तानी

रंगमंचावर  रंग दे बसंती चोला हे गाणं सुरु झालं आणि एका कडव्याला त्यातील गाण्याच्या ओळी म्हणत  गायक रंगमंचावरुन खाली उतरले, मंचावरचे दिवे अंधुक होत गेले आणि उजळलेल्या प्रेक्षागृहात गायकांमधील एक  कलावंत प्रेक्षकांमधील आजींच्या चरणांशी वाकला. आजींनी डोळ्यांमधून ओघळणारे अश्रू पुसत गायकाला आशीर्वाद दिला. आपल्या मनात अढळ स्थान निर्माण केलेली गाणी तितक्याच ताकदीच्या गायकांकडून ऐकण्यात प्रेक्षक रमलेले असतानाच या प्रसंगाने सार्‍यांचीच मनं भारावून गेली. कार्यक्रम होता कोल्हापूरच्या स्वरनिनाद संस्थेचा जागो हिंदुस्तानी.


जागतिकीकरणाने सगळीच समीकरणं बदलली. कोणतंही गाणं इंटरनेटवर आता सहज उपलब्ध आहे. भारतातून सांस्कृतिक कार्यक्रम परदेशात येण्याचं प्रमाणही प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे, नाटक, संगीत, वादन, चित्रपट अशा कार्यक्रमांची रेलचेल चालू असते. सादरकर्त्यांची आणि पाहणार्‍यांची अभिरुचीही बदलली आहे. मग आवर्जून पहावं असं जागो हिंदुस्तानीमध्ये काय आहे? या कार्यक्रमाचं वेगळेपण कशात आहे? जागो हिंदुस्तानीचं यश आहे ते रंगमंचावर निवेदन आणि गायनाच्या साथीने रसिकांना आठवणींच्या राज्यात नेणं, विस्मृतीत जात चाललेल्या घटनांचा हात हाती घेऊन, प्रसंगाना उजाळा देत अलगद त्या काळात नेऊन सोडणं तर काहीवेळा आपल्या ऐकण्यात, माहितीत नसलेला एखादा प्रसंग, घटना डोळ्यासमोर जसा घडला तसा उभा करणं यामध्ये आहे. दोन - अडीच तासाचा हा कार्यक्रम आपल्याला एका वेगळ्या विश्वात नेतो, गत आणि वर्तमान काळाची सैर चालू रहाते ती नव्या - जुन्या गाण्यांच्या साथीने. अभिमान, खेद, हळहळ, चुटपूट, स्फूर्ती, उत्साह अशा सार्‍या भावना या वाटेवर आपल्या सोबतीने येत रहातात आणि एक अविस्मरणीय कार्यक्रम पाहिल्याचं समाधान मनात  तरळत रहातं.
जागो हिंदुस्तानी कार्यक्रमात निवेदक भूषण शेंबेकर आपल्या डोळ्यासमोर प्रत्येक प्रसंग ताकदीने उभा करतात. भूत - वर्तमानाची पानं अलगद उलगडत राहतात. प्रत्येक प्रसंग आपल्या डोळ्यासमोर उभा करण्यात ते यशस्वी होतात. उधमसिंग ह्यांनी पंजाबच्या गव्हर्नर मायकल ओव्हायरची जालियनवाला हत्याकांडाला जबाबदार धरत गोळ्या झाडून हत्या केली. हा प्रसंग ऐकताना उधमसिंगांनी दिलेला कबुलीजबाब ऐकताना आपला उर  अभिमानाने  भरुन येतो. प्लासीच्या विजयानंतरच्या जल्लोषात पराजित हिंदुस्तानी काय करु शकत होते याबद्दल त्या मिरवणुकीत सामील असलेल्या परकीयाचे शब्द ऐकताना चुटपूट लागते, खेद वाटतो. निवेदनातून येणार्‍या या अशा आणि अनेक घटना ऐकता ऐकता  सर्वांच्याच मनात प्रसंगांची गर्दी व्हायला लागते. देशासाठी लढलेल्या, प्राण गमावलेल्या अनामिक वीरांच्या बलिदानाची आठवण येऊन हळहळ वाटते आणि स्वातंत्र्यानंतरच्या कालावधीनंतरचा भारत नजरेसमोर आला की आपण काय काय गमावलं, कुठून कुठे पोचलो ह्याचा हिशोब मन मांडायला लागतं. 

भारत १९९७ साली स्वातंत्र्याचं ५० वे वर्ष साजरं करत असताना निर्माते सुनील सुतार आणि दिग्दर्शक सुरेश शुक्ल यांनी आपल्या स्वरनिनाद या संस्थेतर्फे जागो हिंदुस्तानी चा पहिला प्रयोग रंगमंचावर आणला. आणि त्यानंतर सातत्याने त्यांचे प्रयोग भारतभर चालू आहेत. या कार्यक्रमाला नेपथ्य आहे ते भारतीय ठेव्याचं,  रेखाटनं आहेत ती ऐतिहासिक ठिकाणांची. उत्कृष्ट प्रकाशयोजनेमुळे ह्या रेखाटनांचा ३D परिणाम छान साधला जातो. 

स्वरनिनादने गेले २६ वर्ष सातत्याने गर्जा महाराष्ट्र, देस मेरा रंगीला, गीत बहार, लख लख चंदेरी, शब्द सुरांच्या झुल्यावर असे वेगवेगळे हिंदी, मराठी गीतांचे कार्यक्रम भारतभर सादर केले आहेत.

जागो हिंदुस्तानी हा जो कार्यक्रम सध्या अमेरिकेत चालू आहे त्याचे भारतात आत्तापर्यत सर्वत्र प्रयोग झाले आहेत. वाघा सरहद्दीवरही हा कार्यक्रम झाला आहे याचा प्रामुख्याने उल्लेख करावासा वाटतो. इतकंच नाही तर तुरुंगातील कैद्यांना घेऊन त्यांच्याकडूनच हा कार्यक्रम करुन घेण्याचा आगळावेगळा प्रयोगही स्वरनिनादने यशस्वीरीत्या केला. २ राष्ट्रीय तर २ राज्य पातळीवरच्या पुरस्काराने हा कार्यक्रम सन्मानित झालेला आहे. उत्कृष्ट संगीत, गाणी, नेपथ्य, प्रकाशयोजना असलेला हा दोन - अडीच तासांचा कार्यक्रम आपल्याला खिळवून टाकतो.  गाण्यातील भावना थेट हृदयापर्यंत पोचवणारे समर्थ गायक यात आहेत. आणि सध्याच्या काळातील कार्यक्रमांच्या बदललेल्या स्वरुपाच्या पार्श्वभूमीवर संदेशे आते है, फिर भी दिल है हिंदुस्तानी, बोलो मेरे संग,  भारत के रहनेवाला, ए मेरे वतन के लोगो, सारे जहॉंसे अच्छा, वंदे मातरम अशी एकापेक्षा एक सरस गीतं असलेला हा कार्यक्रम पहाताना आपण वेळेचं भान विसरुन जातो. म्हणूनच म्हणावंसं वाटतं, ध्वनी - प्रकाश - नेपथ्य - गायन - वादन - निवेदनाचा जमलेला सूर म्हणजे जागो हिंदुस्तानी हा कार्यक्रम. प्रत्येकाने एकदा तरी अनुभवून डोळे आणि कान तृप्त करावेत असा!  


BMM वृत्तमध्ये प्रसिद्ध - http://bmmonline.org/sites/default/files/BMM/BMM/2015_6_BMMVrutta_MohanaJoglekararticle.pdf

Wednesday, May 20, 2015

झलक

गेल्या ८ महिन्यांपासून मी मराठी वर्ग घ्यायला सुरुवात केली. खेळ, अभिनय, भेंड्या या  पद्धती वापरुनच मुलांना मराठीची गोडी लावायची हे सुरुवातीपासूनच नक्की केलं होतं. वेगवेगळ्या खेळांमधून शिक्षण हे माझं शिकवण्याचं सूत्र कसोशीने गेले ८ महिने पाळलं त्यामुळेच सुरुवातीला आई - बाबांमुळे आलेली मुलं नंतर नंतर  उत्साहाने स्वत:हून यायला लागली.

मुलांनी रंग, आकडे, वार म्हणून दाखवले. दोन प्रवेश स्वत:च्या कल्पनेने सादर केले. चंपक मधील पंख्याची गोष्ट कधीतरी वर्गात सांगितली होती त्यावरुन मुलांनी मराठीतून अतिशय सुंदर प्रवेश सादर केला. दुसरा प्रवेश  एका विद्यार्थ्याच्या मनातील कल्पना होती. त्या कल्पनेला मूर्त रुप मुलांनीच दिलं. खूप छान वाटलं सर्व मुलांना आत्मविश्वासाने मराठी बोलताना पाहून.  अर्थात पालकांचींही मराठी टिकवण्याची धडपड त्या मागे आहेच. त्यामुळे मुलांचं कौतुक आणि पालकांचे आभार!

या वर्षीच्या शेवटच्या दिवशी मुलांनी आपलं ’मराठी’ त्यांच्या आई - बाबांना दाखविलं.

पर्णिकाने देखील विनोदी किस्से सांगत कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. त्या कार्यक्रमाची ही छोटीशी झलक.



Wednesday, April 1, 2015

धागे

नील महाविद्यालयीन शिक्षणासाठी दुसर्‍या गावात राहायला गेला. त्याची तिथली व्यवस्था लावताना इतर प्रश्नांबरोबर आता त्याचा भारतातल्या नातेवाईकांशी, विशेषत: आजी, आजोबांशी संपर्क कसा राहणार हा प्रश्न केतकीच्या मनात वारंवार यायला लागला. संपर्काची आधुनिक साधनं आजी, आजोबांना ठाऊक नव्हती आणि नील आवर्जून फोन करेल याची केतकीला खात्री नव्हती. पण आधी तो दुसर्‍या गावी रुळणं महत्वाचं होतं. मग पाहू त्याने भारतातल्या मंडळीशी कसं संपर्कात रहायचं ते हाच विचार केतकीने केला. सुरुवातीला मनात आलेल्या शंका, प्रश्न हळूहळू मागे पडत गेले ते नील उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी घरी येईपर्यंत. नील घरी आला आणि घर भरल्यासारखं झालं. तसा असायचा सारखा बाहेरच. मित्रांमध्ये, धावायला असं काही ना काही चालू असायचं. पण तरीही त्याचं गावात असणंही केतकी, सारंगला पुरेसं होतं. तो घरी आल्यापासून पहिल्यांदाच  निवांत गप्पा मारत तिघं बसले आणि एकदम नील म्हणाला.

"एकेक करुन सगळ्यांना फोन करतो भारतात. खूप दिवसात बोललोच नाही कुणाशी." केतकी पाहत राहिली. तिच्यादॄष्टीने हा सुखद आश्चर्याचा धक्का होता. गेल्या चार महिन्यात अनेकवेळा मनात येऊनही तिने काही विचारलं नव्हतं आणि आज अचानक नीलच स्वत:हून फोन करण्याबाबत म्हणत होता.
"खरंच? कर फोन. मी बोलते तेव्हा सगळेच चौकशी करतात तुझी. तूच फोन केलास तर खूप आनंद होईल सगळ्यांनाच. पण आज एकदम कसं काय वाटलं तुला?" न रहावून तिने विचारलंच.
"अगं या वेळेला भारतात एकटाच नाही का जाऊन आलो. त्यामुळे कसं प्रत्येकाशी ’कनेक्ट’ झाल्यासारखं वाटतंय. एरवी कायम तुमच्याबरोबर शेपटासारखा असायचो मी." तिला हसायला आलं. शेपटासारखा! मुलगा योग्यं उपमा पण द्यायला शिकला होता. खरं तर त्याला एकटं भारतात पाठवायचं की नाही यावर किती चर्चा, वाद झाले होते घरात. केतकी तब्बल ३ आठवडे नीलला एकटं पाठवायला बिलकूल तयार नव्हती. पण सारंगला नीलची कल्पना एकदम पसंत पडली. नीलला जिथे जिथे फिरायचं होतं तिथे तिथे सुदैवाने नातेवाईकही होते. तो राहणार त्यांच्याकडेच होता पण त्याला फिरायचं मात्र एकट्यानेच होतं. नेमकी त्याबाबत ती सांशंक होती.
"आई, बारावीत आहे मी. मोठा झालोय. आणि काही अडचण आलीच तर आहेच ना प्रत्येक ठिकाणी कुणी ना कुणी. तू मात्र सगळ्यांना बजावून सांग हे. नाहीतर कुणी सोडणार नाही एकटं मला." केतकी शेवटी तयार झाली. नील ठरल्याप्रमाणे एकटा भारतात जाऊनही आला. महाराष्ट्रातल्या किल्ल्याचं त्याला अप्रूप होतं, शाळा पाहायच्या होत्या. त्याच्या मनातलं सर्व काही करुन झालं. सगळ्या नातेवाईकांना आवर्जून भेटला आणि अनपेक्षितपणे इतक्या वर्षात जे घडलं  नव्हतं ते घडून आलं. त्याच्या मनात भारत, भारतातल्या नातेवाईकांबद्दल बंध निर्माण झाले. आपुलकी वाटायला लागली. तिला मनस्वी आनंद झाला. विरत चाललेले धागे जुळायला लागल्याचं समाधान वाटत होतं.  नाहीतर आता आतापर्यतचं चित्र फार वेगळं होतं. तिच्या मनात भूतकाळ्यातल्या एकेक प्रसंगाची दाटी व्हायला लागली.

दोन चार वर्षापूर्वीचीच तर गोष्ट.
"अरे फोन कर ना भारतात. आजी, आजोबा वाट पाहत असतील." पाच सहा वेळा केतकीने आठवण केल्यावर नीलने फोन लावला.
दोन मिनिटात संभाषण संपलं सुद्धा.
"हे काय, बोलला नाहीस? आजी नव्हती?"
"बोललो की."
"काय?"
"आई काय गं. किती प्रश्न. दोघांनी विचारलं कसा आहेस? अभ्यास कसा चाललाय? मी पण ते कसे आहेत ते विचारलं."
"आणि?"
"आणि काही नाही. मग संपलं बोलणं. बंद केला फोन." नील काहीतरी पुटपुटत निघून गेला. केतकी पाहत राहिली. म्हटलं तर गेली चार पाच वर्ष तरी हे असंच चालू होतं. सतत मागे लागलं की शेवटी तो फोन उचलायचा. त्यातही आपणच करतो फोन, तिकडून येतात का कुणाचे ही कुरकूर असायचीच.  शिंग फुटल्याची लक्षणं म्हणून ती दुर्लक्ष करायला लागली.

नीलच्या लहानपणी भारताच्या दर दोन वर्षांनी होणार्‍या खेपा म्हणजे निसटून गेलेला काळ पकडण्याची खटाटोप. नीलला घेऊन ती भारतात गेली की हे दुरावलेपण मिटवून टाकायची धडपड सुरु व्हायची. नीलच्या चुलत, मावस भावंडांची आजी आजोबांशी जितकी जवळीक असायची तितकीच ती नील बरोबरही असावी हा एकच ध्यास मनाला लागायचा. मग त्या दिशेने तिचे प्रयत्न सुरु व्हायचे. आजोबा अभ्यास घेतायत ना, जा मग नील तूही बस तिथेच, आजीबरोबर भाजी आणायला जा, सुचेल ते जमेल ते करुन दोन वर्षातलं दूरस्थपण मिटवून टाकायचा अट्टाहास असायचा. परत आलं की मग ती नीलला या ना त्या परीने जास्तीत जास्त गप्पा मारायला भाग पाडायची फोनवर.  गाणं म्हण, गोष्ट सांग कुठूनतरी त्याने सर्वांशी बोलावं, त्याचं कौतुक आपण ऐकावं असं वाटायचं तिला. नातवंडं असली तरी सहवास नसेल तर जे  अंतर राहतं ते दूर करण्याचा तिच्यापरीने  प्रयत्न करत राहिली.  दोन्ही घरी केतकीच संभाषणाचे विषय सुचवायची. अभ्यास, खेळ, पुस्तकं, प्रवास एक ना अनेक. नीलला पण दोन्ही घरातल्या आजी, आजोबांचे रोजचे कार्यक्रम सांगून ती त्याबद्दल त्याला बोलायला भाग पाडायची. पण हे सगळं वरवरचं आहे असं तिला आतून आतून जाणवायला लागलं. आठवड्यातून एकदा फोन,  दिड दोन वर्षांनी तीन चार आठवड्यांसाठी केलेली भारतवारी आणि अधूनमधून आलेले आजी आजोबा एवढ्या पुंजीवर तिला तिच्या आजी, आजोबांबरोबर असलेल्या नात्यासारखं नातं, नीलचं त्याच्या आजी आजोबांशी पण व्हायला हवं होतं.  प्रत्येक फोन संभाषणानंतर नात्याचे धागे विरळ होत चालले आहेत की काय या जाणीवेने ती व्याकूळ व्हायला लागली. अमेरिकेतच लहानाचा मोठा झालेला नील स्वत:च्या विश्वात रमायला लागला होता. अगदी जवळचे नातेवाईक सोडले तर तसा तो इतरांना ओळखत तरी कुठे होता? स्काइप, फेसटाइममुळे एकमेकांना पाहिल्याचं समाधान मिळायला लागलं पण संभाषण तितपतच.  कुठेतरी काहीतरी हरवलं होतं, जाणवत होतं पण कळत नव्हतं. मग नेहमीचीच धडपड, खटपट, कारणांचा शोध, भूतकाळात डोकावणं. आणि त्यानंतर अचानक नीलचं भारतात एकट्याने फिरुन येणं. तिला आत्ताही त्याच्याबरोबर झालेला संवाद आठवला.

"यावेळेला मी भारतात एकटाच गेलो तर?" अठरा वर्षाच्या नीलकडे ती पाहत राहिली.
"एकटाच म्हणजे?"
"नेहमी आपण सगळे एकत्र जातो. मला एकट्याला जायचं आहे. सगळीकडे स्वत: जायचं आहे."
"अरे, इतकं सोपं नाही एकट्याने फिरणं. तुला मराठी येत असलं तरी कळेल लगेच कुणालाही परदेशातून आला आहेस ते. नकोच त. कुणी फसवलं, तू हरवलास, नकोच ते."
"नाही होणार. मला फिरायचं आहे. महाराष्ट्र बघायचा आहे." केतकी सांशक होती पण सारंगने नीलची कल्पना उचलून धरली आणि खरंच म्हटल्याप्रमाणे तो एकटा गड, किल्ले करुन आला. नातेवाईकांना भेटला. सगळ्यांचं केद्रस्थान तो होता. केतकी, सारंग असले की काय कसा काय अभ्यास? बरा आहेस ना? इतकंच संभाषण व्हायचं. पण यावेळेला तो सर्वांकडे एकेक दिवस का होईना राहिला होता. त्याच्या अमेरिकेन जीवनशैलीबद्दल, कॉलेज, मित्र मैत्रींणीबद्दल, रहाणीमानाबद्दल सर्वांना प्रचंड उत्सुकता होती. तोही मोकळेपणाने माहिती देत राहिला. नकळत बंध जुळले गेले. नील परत आला तोच मुळी भारतीय असल्याचा अभिमान बाळगत.  शिवाजीमहाराजांनी घडवलेला इतिहास केतकी, सारंगने पुन्हा त्याच्याकडून ऐकला. आजोळच्या गावी काय काय सुधारणा करता येतील याचे बेत त्याने केले. गेल्या अनेक वर्षांत झालेल्या असंख्य भारत भेटीने जे साधलं नव्हतं ते त्याने एकट्याने केलेल्या भारत वारीने साध्य झालं होतं. दोघंही कौतुकाने तो म्हणेल ते ऐकत होते आणि आज तर तो सगळ्यांना फोन करायचं म्हणत होता.  प्रेमाचे धागे विरताहेत की काय असं वाटत असतानाच ते जुळून यायला लागलेले दिसले आणि केतकी समाधानाने नीलच्या म्हणण्याला मान डोलवत राहिली.

 http://bmmonline.org/sites/default/files/BMM/BMM/BMM_Newsletter_April2015.pdf

Tuesday, March 3, 2015

गोंधळ

लहानपणापासून मला मासांहारी व्हायचं होतं. कुणी करु नको, खाऊ नको असं सांगितल्यावर ते करावंसं वाटतं ना तसाच तो प्रकार होता. मांसाहार करायचा नाही म्हणजे काय? करणारच. असं मी आईला ठणकावून सांगितलं.
"घाला काय तो गोंधळ. पण बाहेर." असा आईनेही निर्वाणीचा इशारा दिला. पण तो काळ बाहेर गोंधळ घालण्यासारखा नव्हता आणि बाहेर गोंधळ घालायचा म्हणजे काय आणि कुठे तेही  धड समजलंच नाही त्यामुळे मी प्रत्येक मैत्रिणीच्या घरी जाऊन  मला मांसाहार करायचाय असं जाहीर केलं. कुण्णाला म्हणून पाझर फुटला नाही. सगळ्या आया तुझी आई नाय म्हणते ना मग नको गं बाय भरीला घालू... असं काहीतरी पुटपुटत मागे हटायच्या. अखेर एकदा मधल्या सुट्टीत एका मैत्रिणीने हळूच लपवून आणलेलं अंडं पुढे केलं. मी ते तिच्या हेतूबद्दल शंका असूनही मोती मिळाल्यासारखं ते हातात धरलं.
"खाऊ?" अंड्यात आई जगदंबेचा चेहरा दिसायला लागला होता पण अखेर मैदानात अंडं आलं होतं त्यावर तुटून पडण्याची इच्छा तीव्र होती.
"खरंच खाऊ ना?" धीर मिळवायला मी मैत्रिणीकडे पाहिलं.
"खा ना. तुझ्यासाठी पळवून आणलंय घरातून आणी आता खाऊ का काय विचारतेस? भेदरट." मैत्रिणीने मर्मावर बोट ठेवण्याचा धर्म पार पाडला. मी तिचा राग अंड्यावर काढला. कचकन चावा घेतला. आणि आजूबाजूच्या जमलेल्या कोड्याळ्यांतून चित्कार उमटले,
"ईऽऽऽ, बावळटच आहेस, अगं असं नाही खायचं..." थू थू करत मी गडबडीने टरफलं तोंडातून हवेत उडवली. माझी मांसाहार करण्याची पद्धत बघून कोंडाळं नाहीसंच झालं.  मग लक्षात आलं आधी हे सोलायचं असतं, फळांसारखंच की. अंडं आवडलं. पण दुसर्‍यादिवशी शाळेत स्वागत होतं ते प्रत्येकाच्या फिदीफिदी, फिदीफिदी....ने.  सगळी माझ्याकडे पाहून का हसत होती ते रहस्य उलगडलं माझ्या गुप्तहेरांनी. अंजू, आशा ने सांगितलं की संपूर्ण शाळेत कुणीतरी दवंडी पिटलेली आहे की ते अंडं कोंबडीचं नव्हतंच बदकाचं होतं.  मला तसा काही फार फरक पडला नाही. कोंबडी काय, बदक काय अंडं मिळालं ना? पण आता कोंबडीच्या अंड्यामागे मी लागले.

कुणीच हाती लागत नव्हतं. कोंबडी नाही, बदक नाही.  आई उदार झाली आणि बाहेर गोंधळ घाला म्हणाली तरी तो घालता येणार नाही याची व्यवस्था तिने व्यवस्थित केली होती. त्यामुळे  बदकाचं एक अंडं खाऊन, मला मी मासांहारी आहे अशा बढाया बरीच वर्ष माराव्या लागल्या. अखेर माझ्या आईने म्हटलेला गोंधळ बाहेर काय, अचानक घरातच पोचला. लग्न ठरलं आणि तिचा भावी जावई निघाला पक्का मासांहारी. आता मात्र मी कोंबडी, मासे, मटण अशीच स्वप्न पाहायला लागले. म्हटलं, घाल रे करुन खायला मला तू. नाहीतर आई म्हणते तसा आपण दोघं बाहेर घालू गोंधळ . पण कसलं काय, राजेंचं फर्मान आलं, ’शिकून घे’. आणि मी तणतणत घरोघरी मासे खाणार्‍या गावात कुठे मासांहारी पदार्थ करायचं शिक्षण मिळतं का याचा शोध घ्यायला लागले. कोकाट्यांच्या क्लासात कसं फाडफाड इंग्रजी बोलायला शिकवत तसं झटपट मासे, मटण... पण नुकतंच लग्न झालेल्या मैत्रिणीने मोलाचा सल्ला दिला,
"तो म्हणाला नी निघालीस काय लगेच मूर्खासारखी शिकायला. डोक्यावर बसेल." या विधानाची खात्री अनुभवी बायकांनी दिली आणि "अस्सा क्लास बिस नाही बाई आमच्या गावात आणि घरात तर अंडं सुद्धा चालत नाही आमच्या." असं ठणकावून सांगून टाकलं. नवर्‍याला तेवढ्यावर लग्न मोडायचं असतं की नाही ठाऊक नव्हतं त्यामुळे लग्न बंधनात अडकलो.

सुखाने नांदू लागलो, बाहेर गोंधळ घालू लागलो. घरी गोंधळ घालायचा तर आधी  तयारी मलाच करावी लागेल म्हणून ’गोंधळ बाहेर घाला’ म्हणायला मलाही माझ्या आईसारखंच भारी म्हणजे भारीच आवडायला लागलं. आणि अचानक एके दिवशी मी जसं माझ्या आईला विचारलं होतं तसा प्रश्न लेकीने विचारला.
"बीफ का खायचं नाही?"
"कारण आपण शाकाहारी आहोत."
"म्हणजे?" तिचे एकशब्दी प्रश्न रोखठोक, मुद्द्याला हात घालणारे असतात. आमची उत्तरं, काय उत्तर दिलं तर खपेल याचा अंदाज घेत घेत दिलेली. त्यामुळे प्रश्नोत्तरांचा तास सुरु झाला की भारीच गडबड उडते घरात. त्यात नवरोजी बर्‍यांचदा गोत्यात आणणारीच स्पष्टीकरणं देत असतात. आताही तेच झालं.
"म्हणजे आपण फक्त चिकन, मासे खातो. तेही बाहेर. घरी नाही."
"का?"
"का म्हणजे काय?" त्याला पटकन उत्तर सुचेना.
"थांब मी सांगतो. खरं तर चिकन पण बंद करायला हवं. बीफ तर नाहीच नाही."  मुलगा बाह्या सरसावत गोंधळात सामील होणार आणि  त्याने पाहिलेल्या माहितीपटांचे पुरावे देत सगळ्या अन्नांची चिरफाड करणार हे लक्षात आलं. त्यामुळे विषयात वेगळाच रंग भरण्याचं कार्य नवर्‍याने केलं.
"कारण गायीच्या पोटात ३२ कोटी देव असतात."  लेकीचा चेहरा पाहण्यासारखा झाला. मुलाला मध्येमध्ये बोललेलं अजिबात चाललं नाही.  त्याने खिजवल्यासारखं त्याच्या बाबाला विचारलं.
"इतके देव गायीच्या पोटात का राहतात आणि मावतात कसे? त्यांना पण जागेचा प्रश्न भेडसावतो की काय?" चर्चेला भलतंच वळण लागलं होतं. घरातल्या दोन जबाबदार व्यक्तींना उत्तरं सुचेनाशी झाली. तो मोका साधत मुलगी म्हणाली,
"आणि इतके देव  गायीच्या पोटात असतात मग त्यातला एकही देव आपल्या घरात कसा नाही?" नवर्‍याने तरी मी सांगत होतो, जरा तरी देवाचं बघ, नमस्कारापुरता तरी ठेव एखादा देव घरात, ’लुक’ दिलं. मी  पती हाच परमेश्वर असा भाव चेहर्‍यावर आणून त्याला पाघळवायचा प्रयत्न केला.
"कारण देव मनात असला की झालं." घाईघाईत लेकीलाही उत्तर देऊन टाकलं.
"पण मग तो गायीच्या पोटात कशाला गेला?"
"अगं बाई, गाय म्हणजे गो धन, शेतकरी..." माझं जे काही सुरु झालं ते थांबलं तेव्हा कळलं की तिने ऐकणं कधीच सोडून दिलं होतं. पण एकदम शांतता निर्माण झाल्यामुळे तिलाही भाषण संपलं असावं याचा अंदाज आला,
"तर मुद्दा काय, आपण बीफ खायचं नाही..."
"बरोबर."

मग लहानपणी मी जे केलं होतं तेच तिनेही केलं. माझ्या आईच्या भूमिकेत आता मी शिरले आणि म्हटलं,
"ठीक आहे. ठणकावून सांगणं, वाद घालणं आणि पाय आपटणं झालं असेल तर आता माझं ऐक." उपकार कर्त्याची भूमिका घेऊन तिने माझ्याकडे पाहिलं.
"बोल."
"जो काही गोंधळ घालायचा तो बाहेर. समजलं?" काही न कळल्यासारखं ती माझ्याकडे पाहत राहिली. मग तिला एकदम साक्षात्कार झाला.
"ठीक आहे. चालेल." आनंदाचा चित्कार काढून मुलगी गोंधळ घालायला बाहेर पडली.

Monday, February 2, 2015

अळवावरचे थेंब

"नाही, नाही, त्याचं कारण आहे फार सोपं झालं आहे सगळं आता.... " प्रणिताने मान मागे करुन पाहिलं.
तावातावाने पारकर काका आपलं मत मांडत होते.
"काय सोपं झालं आहे काका? " तिने उत्सुकतेने विचारलं.
"अगं तुमची सर्वांचीच मुलं अस्खलित मराठीत बोलतात ना त्यावरुन म्हणत होतो. "
"सर्वांची? "
"अगदी सर्वांची नाही पण निदान काही जणांची. काय आहे, आता मराठी शाळा आहेत, चित्रपट पहाता येतात,  गुगल आहेच.  एकूणच साधनांची उपलब्धता हाताशी अगदी सहज आहे त्यामुळे मराठी टिकवणं सोपं आहे असं म्हणायचं होतं. "
"पण काका महत्वाचं आहे ते घरी मराठी बोलणं. त्याचा आणि या साधनांचा काहीच संबंध नाही. " काका हसले.
"तू खुर्ची सरसावून बसलीस ना तेव्हाच आता मी तोंडघशी पडणार हे कळलं होतं. " प्रणिताबरोबर बाकी सारेच हसण्यात सामील झाले.
"खरं आहे तुझं पोरी. तेच राहून गेलं आमचं त्यामुळे मुलांची नाळ जोडली गेलीच नाही भाषेशी. या देशात आलो त्याला ३० वर्षाहून अधिक काळ लोटला. आलो तेव्हा गावात मराठी फक्त आम्हीच.  वाटायचं, या भूमीत वाढायचं तर इथलंच होऊन गेलं पाहिजे. आपोआप मुलांना तसंच वाढवलं गेलं.   जुनी वस्त्र काढून नवी चढवल्यासारखं आम्हीही सगळं अडगळीत टाकलं. भाषा, चालीरीती सारंच. आमचं जे झालं तेच बहुतेक जणाचं. मग हळूहळू मराठी माणसं वाढली, सांस्कृतिक जाणिवांचं भान आलं. पण तरीही ते मर्यादित राहिलं ते स्थलांतरित झालेल्या आमच्यासारख्यांपर्यंतच. इथेच जन्मलेली आमची मुलं कोरडीच राहिली. ती कधी कधी म्हणतात, आम्हाला आवडलं असतं मराठी बोलता आलं असतं तर तेव्हा काय गमावलं ते लक्षात येतं. त्यामुळे तुमच्या पिढीचं  कौतुक वाटतं. सारं जपून ठेवता आहात. प्रणिता तुझ्यामुळे मनातलं बोललो आज. एरवी थोडासा बचावात्मक पवित्रा घेतला जातोच नाही म्हटलं तरी. त्याचाच भाग होता तो सारं सोपं झालं आहे म्हणण्याचा. "  पारकर काकांनी तोंड फोडलेल्या  विषयावरच मग गप्पा रंगत गेल्या.

प्रणिता स्वत:वरच खूश होती. पारकर काकांनी केलेल्या कौतुकाने घरातलं मराठीपण टिकवण्याचं सार्थक झाल्यासारखं वाटत होतं.  मुलींभोवतीच तिचं विश्व होतं. तिला जे मिळालं होतं ते आणि नव्हतं तेही मुलींना मिळावं यासाठी  धडपड चालू होती तिची. दोन्ही मुली अष्टपैलू होत्या. नाच, गाणं, चित्रकला, बुद्धिबळ, खेळ... काही येत नाही असं नव्हतं. मुलींनी अष्टपैलू होणं हे तिचं ध्येयच होतं.  धावपळ व्हायची पण हे युगच असं आहे. स्पर्धेचं. त्यात टिकायचं तर अभ्यासाबरोबर सारं काही जमायला हवंच म्हणून तिचे अथक प्रयत्न चालू होते. पारकर काकासारखं व्हायला नको. आपल्याकडून काही राहिलं म्हणून मुलांचे बोल नकोत, आपल्या मनात खंत नको. तिने स्वत:च्या मनाची पुन्हा पुन्हा खात्री करुन घेतली.  कुठे काही चुकतंय असं वाटलं नाही तेव्हा  तिला मनापासून आनंद झाला. कधी एकदा पारकर काकांशी झालेलं बोलणं  मुलींना आणि त्यांच्या बाबाला सांगतोय हे असं होऊन गेलं.

"पारकर काका कौतुक करत होते तुमचं. " प्रणिताच्या बोलण्यावर तितिशा आणि दिशाने प्रश्नार्थक चेहर्‍याने एकमेकींकडे पाहिलं.
"मराठी बोलता, लिहिता, वाचता ना दोघी म्हणून. " प्रणिताच्या आवाजातल्या उत्साहावर दोघींच्या नुसत्या हुंकाराने  पाणी पडलं. तरीही चिकाटीने तिने घडलं ते सांगितलं.
"मग? तुम्हाला दोघींना काय वाटतं? "
"तुला आम्हाला काय वाटतं ते खरंच ऐकायचं आहे? "
"नक्की. पण  पोचलो आपण तुमच्या गाण्याच्या वर्गापाशी. उतरा पटकन. नंतर बोलू. " गाडी थांबवत प्रणिता म्हणाली. तितिशा आणि दिशा दोघी हातातलं सामान घेऊन उतरल्या. त्यांचा सराव होईपर्यंत कामं उरकून घ्यावीत या विचाराने तिने गाडी वळवली. तासाभरात पुन्हा इथे यायला हवं. इथूनच दोघींना बास्केट बॉल खेळायला नेऊन सोडायचं. पुन्हा काहीतरी काम आटपून न्यायला यायचं. घरी जायला नक्की आठ वाजून जाणार. जाता जाताच वाटेत थांबावं कुठेतरी खाऊन घ्यायला. बाबासाठी काहीतरी न्यावं लागेल फक्त. कामांची, वेळेची  गणितं तिचं मन सोडवत राहिलं.

घरी आल्याआल्या ठरवल्यासारखं मुलींनी विषय काढला.
"सांगू आम्हाला काय वाटतं? "
सोफ्यावर निवांत बसून टी. व्ही. चं बटण दाबणारी प्रणिता गोंधळली.
"कशाबद्दल? "
"मगाशी तू विचारत होतीस ना? बाबा तू पण ऐक रे. " दोघींनी आईने जे गाडीत सांगितलं होतं ते सांगून बाबाला पण चर्चेत सामील केलं.
"आता आमचं मत सांगतो. पारकर काकांसारखं तुमचं पण चुकतंय. "  एकदम तोंडघशी पडल्यासारखं झालं.  प्रणिताला राग आला दोघींचा.   पण कसोशीने शांत रहात ती मुली पुढे काय बोलतायत ते ऐकत राहिली.
"म्हणजे मराठीचं नाही म्हणत. मराठीसाठी मुद्दाम काही करावं लागलंच नाही. पहिली ओळख मराठीचीच तर झाली आणि घरात आपण मराठीत बोलतो याचा आम्हालाच अभिमान वाटतो, जवळीक वाटते तुमच्याबद्दल. सार्‍याच मराठी बोलणार्‍यांबद्दल. पण बाकीच्या गोष्टींबद्दल आमची मतं मांडायची आहेत आम्हाला दोघींना. "  आई, बाबा काहीच बोलत नाहीत ते पाहून दोघी पुढे बोलत राहिल्या.
"शाळेत जायला लागल्यापासून आम्ही कधी घरी नसतोच. हे शिका, ते शिका, इतर भारतीय मुलांशी तुलना हेच असतं कायम.  सहावीत गेल्यापासून तर श्वास घ्यायलाही वेळ नाही अशी अवस्था झाली आहे.  आता, कॉलेजच्या प्रवेशासाठी हे करायला हवं, ते करायला हवं, शाळेच्या, मंडळाच्या कार्यक्रमात भाग घे, हे जमायलाच हवं, ते न करुन कसं चालेल. तितिशा करते म्हणून मी आणि मी करते म्हणून ती. तुम्ही तर अष्टपैलू नव्हता पण तरी हुशार आहात. आम्हा दोघींनाही सारखं काहीतरी करायला भाग पाडत असतेस तू आई. आणि बाबा तू पण. "
"ए, मला नका बुवा मध्ये पाडू. " वातावरणातला ताण हलका करण्यासाठी बोलला खरा बाबा. पण दोघी चिडल्याच.
"नको तेव्हा मजा करु नकोस बाबा. आज आम्ही सांगणारच आहोत आम्हाला काय वाटतं ते. "
"आई तू जशी दमतेस ना आम्हाला सतत इकडे तिकडे घेऊन जायला. तितक्याच आम्ही दमतो.  तुमच्या दोघांच्या अपेक्षेप्रमाणे आम्हाला यश मिळालं नाही, गोष्टी जमल्या नाहीत तर या विचारानेच निराश व्हायला होतं. आम्ही दोघी आताशी फक्त आठवीत आहोत आणि आमच्या कॉलेजच्या प्रवेशासाठी तुम्ही दोघं इतकी चर्चा करता, लोकांकडून माहिती मिळवता की  वाटतं पुढे शिकायलाच नको म्हणजे सारं काही आपोआप टळेल. एकदा एखादी तरी उन्हाळ्याची सुट्टी, शनिवार, रविवार असे हवेत की आम्ही फक्त  झोपा काढू. तुम्ही तुमच्या लहानपणीच्या गोष्टी सांगता ना तेव्हा आम्हाला तुमचा हेवा वाटतो.  आम्हाला तुमचं लहानपण हवं आहे.  खेळायचं आहे घराबाहेर तास न तास, भटकायचं आहे निरर्थक, सायकल दामटवायची आहे.  तुमच्याबरोबर पत्ते खेळायचे आहेत, गोष्टी ऐकायच्या आहेत, दंगा मस्ती करायची आहे, पदार्थ करायला शिकायचे आहेत. " प्रणिता आणि बाबा दोघंही आपल्या लेकींकडे पहात राहिले. इतकं साचलं होतं यांच्या मनात? दोघंही मूक होऊन गेले.
"खूप बोललो ना आम्ही. रागावलात? " दोघींनी गळ्यात हात टाकले. प्रणिताने डोळ्यातून येणारं पाणी लपवलं. कसनुसं हसून ती नकारार्थी मान डोलवत राहिली.
"आम्हाला ठाऊक आहे हे सारं तुम्ही आमच्यासाठी, आम्ही आयुष्यात पुढे यावं, यशस्वी व्हावं म्हणून करताय. पण आम्हाला काय पाहिजे ते कुणी विचारलंच नाही कधी, सांगायला गेलं तरी दुर्लक्ष किंवा आमचं चुकीचं हे पटवून देणं, तुमच्या दृष्टीने चुकीचं असलं तरी कधीतरी आमच्या मनासारखंही करुया ना. आई, बाबा आम्हाला तुमचा वेळ पाहिजे. तुमच्याबरोबर वेळ घालवायचा आहे आम्हाला. आपल्या चौघांना एकत्र करता येईल अशा गोष्टी करायच्या आहेत. पारकर आजोबांच्या हातून मुलांना मराठी शिकवायचं राहून गेलं तसं तुमच्या हातून, आम्हाला तुमचा वेळ आणि निर्णय स्वातंत्र्यं द्यायचं राहून गेलं आहे आई, बाबा. " प्रणिता आपल्या मोठ्या झालेल्या लेकींकडे पहात राहिली. अळवावरच्या थेंबासारखे निसटून गेलेले क्षण  परत आणणं शक्य नव्हतं पण पारकरकाकांमुळे आज मुलींनी त्याचं मन मोकळं केलं होतं, आपल्याला काय पाहिजे ते सांगितलं होतं. आता कुणाची इच्छा पूर्ण करायची हे ठरवायचं होतं. जमेल त्यांना काय हवं ते द्यायला? नकळत तिने बाबाकडे पाहिलं. तेच प्रश्नचिन्ह घेऊन तोही तिच्याकडे पहात होता.

मुलींच्या पाठीवर थोपटून तिने टी. व्ही. चालू केला आणि मेंदूचा ताबा विचारांनी घ्यायच्या आधीच त्या कार्यक्रमात डोकं खुपसलं.


मोहना जोगळेकर
बृहनमहाराष्ट्र वृत्तसाठी लिहित असलेल्या लेखमालिकेतील लेख.

 वृत्ताचा दुवा:
http://bmmonline.org/sites/default/files/BMM/BMM/BMM_Newsletter_Feb2015.pdf