Thursday, June 9, 2011

कालचक्र

अतिप्रगत देशात सुधारणाचं वारंही जवळपास पोहोचू  न देणारी जवळजवळ पाव मिलियन लोकवस्ती आहे हे अविश्वसनीय सत्य आहे. अमेरिकेतल्या पेनसेल्व्हिनिया आणि ओहायो या भागात आमिश नावाची ही जमात आहे. आपल्याकडच्या शेतकी जीवनाशी अगदी किंचित साधर्म्य साधणार्‍या या जमातीच्या चालीरिती फार वेगळ्या आहेत. यामुळेच सर्वसामान्य अमेरिकन आणि पर्यटकांच्या दृष्टिनेही हा समाज म्हणजे एक आकर्षण आहे. अतिशय वेगळ्या पार्श्वभूमीवर घडत जाणारी  कालबाह्य संस्कृती जोपासणार्‍या समाजात घडलेली ही नाट्यंमय कथा.


मराठी रेडिओवर नुकतीच प्रसारित झाली. त्याचा हा दुवा -
http://www.marathiradio.com/kaalchakra060511.mp3

त्याचबरोबर मराठी रेडिओचाही -
http://marathiradio.com


Tuesday, June 7, 2011

फेसबुक आणि खोटा चेहरा... कदाचित तुमचाही!

"त्या मुलांनी हे का केलं ते मला कदाचित कधीच कळणार नाही. अश्लिल, हादरवून सोडणारं आणि चांगल्या गोष्टीवरचा विश्वास समुळ नष्ट करणारं. माझ्या वाट्याला आलं ते, फसवं फेसबुक खातं बंद करता येत नाही यातून आलेली निराशा, दु:ख, राग,  वैताग आणि क्षणा क्षणाला नष्ट होत जाणारा आत्मविश्वास."  ही कहाणी, शब्द सुझनचे. पण हे फेसबुक किंवा कोणत्याही आंतरजालावर (सोशल नेटवर्किंग) असणार्‍या कुणाच्याही बाबतीत घडू शकतं. तेव्हा सावधान. सुझनची गोष्ट ही माझी किंवा अगदी तुमचीही होवू शकते.

 रहस्यकथा आणि नाट्यलेखन करणार्‍या सुझन स्वत:ला प्रथितयश मानत नाहीत.  त्यांचं नाव सर्वांनी ऐकलं असेल असंही त्यांना वाटत नाही.  आणि तरीही परदेशातल्या कुणालातरी त्यांच्या नावे फेसबुक खातं तयार करता आलं ही वस्तुस्थिती आहे. सुझनमात्र फेसबुकमध्ये योग्य ठीकाणी खुणा करुन  खाजगीपणा जपल्याच्या समाधानात होत्या. कुणीतरी त्यांच्या नावाचं खातं आधीच तयार केलं आहे याची त्यांना कल्पनाच नव्हती.  नग्न देहावरती सुझनचा चेहरा वापरण्याचा किळसवाणेपणा आणि त्या सोबत येणार्‍या असंख्य गोष्टी... यावरुनच हे आंतरजाल जग किती धोकादायक आहे हे लक्षात येतं, तरीही आपण मात्र आपल्याबाबतीत हे होणार नाही असं समजून आपले, आपल्या कुटुंबाचे फोटो वेगवेगळ्या संकेतस्थळांवर/खात्यांवर  प्रदर्शित करतो. आपल्या मित्रमैत्रीणींनी, नातेवाईकांनी ते पहावेत या इच्छेने. केव्हा केव्हा काळजीपूर्वक खाजगीपणा जपण्याची सर्व खबरदारी घेऊन तर कधीतरी नकळत कोण जाणार आहे उगाचच माझ्या वाट्याला असं वाटून तेवढीही तसदी घेतली जात नाही.

सुझनना तर फेसबुकचं काडीमात्रही आकर्षण नव्हतं. त्यांच्या नवीन पुस्तकाच्या प्रकाशनच्या दरम्यान जनसंपर्क अधिकारी वायली यांनी चाहत्यांच्या संख्येत वाढ करण्यासाठी फेसबुक उत्तम आहे ह्याची कल्पना दिली तेव्हा प्रथम त्यांची तयारीच नव्हती. वेळ फुकट घालवायचं एक ठिकाण असंच त्यांचं फेसबुकबद्दल मत होतं पण आधुनिकतेला बाजूला सारताना साहित्य जगतात एकटं पडण्याच्या भितीने त्यांनी फेसबुकवर जायचं मान्यं केलं.

सुरुवातीचा आठवडा जुन्या परिचिताशी  संपर्क साधण्यात कसा गेला ते  कळलंही नाही. आणि अचानक एक दिवस वायलीचं ई मेल आलं, विषय अधोरेखित होता   - फेसबुक. सुझनना वाटलं आधुनिक जगात प्रवेश झाल्याबद्दल स्वागत करणारं पत्र असेल. पण तसं नव्हतं. ते पत्र होतं त्यांच्या दुसर्‍या खात्याबद्दल. लिहलं होतं.
"गुगल केल्यावर तुमचं जे खातं येतं ते पाहून  बेचैन व्हायला झालं. तुम्हाला हे कळवणंही त्रासाचं वाटलं तरी तुमच्या कानावर जावं म्हणून  कळवित आहे."
ते खातं पाहून सुझनना धक्काच बसला. स्वत:च्या चेहर्‍यावरचे अश्लिल, संभोगासाठी उद्युक्त करणारे भाव पाहून शरमेने मेल्याहून मेल्यासारखं झालं. काही काळ सुन्नावस्थेत गेला.  हा चेहरा त्यांचा कधीतरी वर्तमानपत्रात आलेला, कुठल्यातरी संकेत स्थळावर असलेला होता. सुझनना काय करावं या प्रश्नाने घेरुन टाकलं.  मुळात संगणक प्रकाराशी फार सख्यं  नाही. आणि आता हे काय वाढून ठेवलं होतं? कुणाशी संपर्क साधला की  ते फोटो, खातंच नाहीसं होईल?  समोर ’फेसबुक फॉर डमीज’  पडलेलं. त्यातले दूरध्वनीक्रमांक त्यांनी तातडीने फिरवले, पण उपयोग झाला नाही.  त्यांना एकदम  नेहमीच्या रस्त्यावर येता जाता फेसबुकचं  पाहिलेलं कार्यालय आठवलं. दूरध्वनिकार्यालयात फोन करुन त्या कार्यालयाची माहिती मिळते का ते पहाण्याचा अयशस्वी प्रयत्न त्यांनी केला.  हे खातं त्यांनी फेसबुकवर यायच्या आधीचं होतं. याचाच अर्थ कुणी त्यांचं नाव ’गुगल’ केलं की हे असे फोटो, प्रतिक्रिया प्रथम पहायला मिळणार. सगळय़ा असफल प्रयत्नांनंतर एकच करता येण्यासारखं होतं. फसव्या फेसबुक खात्यावर जायचं, तिथे तुम्ही असल्याचं खात्री करणारं जे चित्र असतं त्यावर टिचकी मारुन आपल्या खर्‍या फेसबुकचा दुवा द्यायचा.  सुझननी त्यांच्या मित्रमैत्रीणींना, नातेवाईकांना सार्‍यांनाच ही विनंती केली.

"रोज सकाळी उठल्याउठल्या धडधडत्या अंतकरणाने मी संगणक उघडे. फेसबुकच्या संचालकांकडून काही प्रतिसाद नव्हताच आणि माझं नकली खातं नष्ट होण्याची लक्षणं नव्हती. पोलिसांशी संपर्क साधला. पण त्यांच्याकडे तक्रार काय नोंदवणार? नुकसान काय झालं म्हणून सांगणार? माझं हे रुप पाहून लोकांनी पुस्तक विकत घेणं बंद केलं म्हणायचं? याला पुरावा कुठून आणायचा? पोलिस काही करु शकले नाहीत. फेसबुक प्रशासनालाही अगणित ईमेल केली. प्रत्येकवेळी तोच पुस्तकी प्रतिसाद. तुमची तक्रार पोचली. हो पण पुढे काय?" अतिशय विषण्ण अवस्थेतला हा त्यांचा प्रश्न.

पुढे काय? या प्रश्नाने  सुझनची झोप उडाली. संभाषणात लक्ष लागेना. लेखन तर बंदच पडलं. मुलं कशी वाढत होती, काय खात पित होती याचं भान नष्ट झालं.  त्याचं निराशेने ग्रासलेले मन उभारी घेईना.   सगळ्याचा कडेलोट मैत्रीणीबरोबर फिरायला बाहेर पडल्यावर झाला.
"तुझं नाव गुगल केलं मी आज" मैत्रीणीच्या बोलण्याने सुझनचा चेहरा कसानुसा झाला.
"तुला क्षणभरही वाटलं......" पुढचं बोलणं मैत्रीणीकडून यावं, तिने ती शक्यताही नाकारावी असं वाटत असतानाच मैत्रीणीने नुसतेच खांदे उडवले, शरमलेल्या चेहर्‍याने ती म्हणाली,
"तूच असशील असं नाही वाटलं पण....."
२० वर्ष ओळखत होत्या त्या दोघी एकमेकींना, पण तरीही मैत्रीणीच्या मनाला ही शंका चाटून जावी यात सुझनना फार मोठा पराभव वाटला.  एक चांगली व्यक्ती, लेखिका म्हणून लोकांनी ओळखावं यासाठी वेचलेले क्षण धुळीला मिळाले. रॅगिंगमुळे मुलं आत्महत्येपर्यंत का पोचतात हे कळलं तेव्हा असं त्यांना वाटतं.  अस्वस्थ मनस्थितीत सुझननी याबाबत पाऊल उचलायचं निश्चित केलं. त्यांनी आपल्या वकिल पुतण्याला याबाबत लक्ष घालावं म्हणून  विनंती केली. एका आठवड्यात फेसबुककडून काही कळलं नाही तर काय करायचं ते बेनने, त्यांच्या पुतण्याने निश्चित केलं पण त्याआधी सुझनना त्यांनी जे सांगितलं ते सुझनच्या कल्पनेपलिकडचं होतं. स्वत:च्या फसव्या खात्यावरिल शव्द न शब्द वाचायचा,  तिथे असणार्‍या सर्वांचे चेहरे / फोटो नीट पहायचे आणि कुणा परिचिताचं हे काम नाही ना याची खात्री करायची.
"हे वाचण्याचं काम म्हणजे कुणीतरी बर्फाच्या लादीवर फेकून दिल्यासारखं होतं. गुदरमवून टाकणारी भितीची एक थंडगार लाट शरिरातून गेल्यासारखं. तिथे काय नव्हतं माझ्याबद्दल. संभोग वर्णनं, अश्लिल चित्र आणि माझ्या नावाने लिहलेले प्रतिसाद..., किळसवाणे, शरीर सुखासाठी आमंत्रित करणारे, त्याबद्दल सल्ला विचारणारे. यातल्या काही मित्र, मैत्रीणींची संख्या हजारांवर होती. याचाच अर्थ माझे हे फोटो खूप लोकांनी पाहिले असण्याची शक्यता नाकारता येत नव्हती." एकेक शब्द उच्चारतानाही त्यांचे कान, गाल शरमेने लाल होतात.

न समजणारं संगीत, भाषा, दूरदर्शनवरील कार्यक्रम असं करत  हा प्रकार कोणत्या देशातून चालू असावा एवढा  शोध लागला, नंतर शहर आणि शेवटी शाळा. मान्यवर शाळा. पण सुझन त्या शाळेचं नाव सांगत नाहीत.  शाळेच्या संकेतस्थळावर त्या मुलांचे चेहरे पाहिले तेव्हा त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली, बदला घ्यावासा वाटायला लागला,  त्या मुलांचे गळे दाबावेत ही भावना दृढ झाली. पण काही क्षणच. भान आलं तेव्हा त्यांना आपण असा विचार करु शकतो, ही पातळी गाठू शकतो याचीच शरम  वाटली.  विषण्ण मनस्थितीत त्यांनी चर्चच्या पाद्रींचा सल्ला घेतला. त्यांच्या उत्तराने त्या अचंबित झाल्या. त्यांना त्रास देणार्‍या मुलांना क्षमा करण्याचा विचारही करु नये असं त्यांनी सांगिंतलं. त्यांच्या पुढे दोन पर्याय होते. त्या मुलांना असा काही धडा शिकवायचा की ती आयुष्यातून उठतील. त्यांच्या देशाचे कायदे खूपच कडक होते आणि या गुन्ह्यासाठी तुरुंगवास हा एकच पर्याय होता. अमेरिकेत पैशाचं नुकसान भरुन काढण्यासाठी त्या मुलांवर त्या खटला करु शकल्या असत्या पण ते खर्चिक  होतच आणि पुरावा? या मुलांनी त्यांच्या अंतरात्म्याचा एक तुकडा तोडला, आत्मविश्वास धुळीला मिळवला याकरता अजूनतरी खटला नाही दाखल करता येत याची सुझनना कल्पना होती.  सुझनपुढे खटला हा एक पर्याय होता नाहीतर पूर्णत: दुसरा मार्ग. शेवटी तोच त्यांनी स्वीकारला. त्यांनी त्या मुलांच्या शाळेच्या मुख्याध्यापकांना ई मेल पाठवलं, विस्ताराने लिहलं. खूप विस्ताराने आणि त्यात फेसबुक खातं बंद व्हावं ही मागणी केली.

दुसर्‍याच दिवशी मुख्याध्यापकांचं पत्र आलं. त्यांनी हा प्रकार लक्षात आणून दिल्याबद्दल सुझनचे आभार मानले होते आणि फेसबुकचं खातं बंद होईल याची खात्री. आणि तसं ते झालं. त्यांच्या ’मीच का?’ या प्रश्नाचं उत्तर कुणालाच देता आलं नाही. त्या मुलांनाही. मुख्याध्यापकांनीही मुलांना हाच प्रश्न वारंवार विचारल्याचं सुझनना लिहलं होतं. अनुत्तरित प्रश्न. त्या मुलांच्या दृष्टीने सुझन म्हणजे एक खेळणं होतं,  मुखवटा! नाव, चेहरा याच्याशी त्यांना काही देणंघेणं नव्हतं. चेंडू हवेत उडवला, काही काळ त्याच्याशी खेळलं आणि त्यांचा त्यातला रस संपला. सुझन म्हणतात,
"आणि हेच फार भितीदायक वाटतं मला. इंटरनेटमुळे इतक्या सहसहजी माणसाचं खेळणं बनून जातं. बदनामीही अशी होवू शकते की माणूस आयुष्यातून उठेल."

अगदी खरं, आज हे सुझनच्याबाबतीत झालं. कदाचित तेच उद्या आपल्या बाबतीत होवू शकतं, आपल्या मुलांच्या बाबतीत. सुझन म्हणतात,
"तुमचं नाव, चेहरा... आणि त्याचं हे असं होतं. खरच असं झालं की ही लहानसहान बाब उरत नाही हे मी अनुभवाने सांगते.  आणि त्यामुळेच मी मुख्याध्यापकांना एक विनंती केली. अशी विनंती की त्याचे परिणाम, शेवट मला कधीच कळणार नाहीत."
काय केलं त्यांनी?  मुलांना शिक्षा देण्याची मुख्याध्यापकांना विनंती केली पण अगदी वेगळ्या तर्‍हेची. त्यांच्या या कृतीमुळे सुझनवर काय परिणाम झाले हे त्या मुलांनाच नाही तर पालकांनाही कळावं ही अट घातली त्यांनी. आपल्या  हुशार, मान्यवर शाळेत जाणार्‍या मुलांचं कर्तुत्व आणि त्याचे सुझनवर झालेले परिणाम दोन्ही त्यांना कळावेत याकरता ते खातं मुलांच्या सोबत बसूनच पालकांनी पहावं ही अट घातली.

खरच  शिकली  ती मुलं धडा? झाला बदल त्यांच्या वृत्तीत? पाहिलं ते अश्लिल वर्णनांनी, चित्रांनी भरलेलं खातं त्यांच्या पालकांनी? सुझनना त्याची कल्प्नना नाही. त्या म्हणतात.
"माझं चारित्र्यहनन केलं त्यांनी. फार कठीण होतं ते परत मिळवणं. पण मिळवलं मी झगडून. हतबलता, हात पाय गळणे याचा खरा अर्थ कळला मला. सुडाने पेटून उठणं म्हणजे काय हे कळलं तसंच क्षमा करण्यातून काय समाधान मिळतं हेही कळलं. आणि हेच कारण आहे त्या मुलांची नावं न सांगण्याचं किंवा त्यांच्या देशाचं नाव न घेण्याचं. त्यांच्या हातून कळत नकळत झालेल्या चुकीमुळे त्याचं भवितव्यच नष्ट व्हावं असं नाही मला वाटत. त्यांची नावं सांगितली तर झोप उडेल माझी. क्षमेला काही अर्थ उरणार नाही. आता मी शांत चित्ताने झोपू शकते, आणि लिहिते. लिहिती राहू शकते."