Friday, December 14, 2012

काय चाललं आहे हे...

एका तरुण मुलाची आई त्याच्या बंदुकीच्या गोळीला बळी पडते. तिथून तो ती ज्या शाळेत शिकवत असते त्या प्राथमिक शाळेत जातो. आईच्या वर्गातले चिमुकले जीव बंदुकीच्या गोळीने टिपतो. कोण विचारणार जाब या कृत्याचा? आणि कुणाला? जाब विचारायला तो मुलगाही या जगात नाही, त्याची आईही. आता आम्ही फक्त चर्चा करायच्या यव करायला हवं आणि त्यव करायला हवं....

असं काही झालं की आठवतं ते १९९९ मधील लिटलटन कोलोरॅडो येथील घटना. दोन विद्यार्थ्यांमुळे जीवाला मुकलेली माध्यमिक शाळेतील १२ मुलं. २००७ साली तरुण माथेफिरुच्या गोळ्यांना बळी पडलेली व्हर्जिनिया टेकमधील ३२ तरुण मुलं आणि अशाच घटना एकामागून एक, अनेक.  त्यानंतर त्याची कारणमीमांसा शोधली जाते, उपाय शोधले जातात, काही काही प्रत्यक्षात राबवले जातात आणि मग पुन्हा हे असं.....कधी थांबणार आणि कसं?

या जगाचा, जग न बघताच निरोप घेतलेल्या त्या चिमुरड्यांच्या आई वडिलांच्या दु:खाच्या कल्पनेने जीव कालवतो, डोळे आसवांनी चिंब होतात. त्यांना देव हे दु:ख झेलण्याचं सामर्थ्यं देवो हीच प्रार्थना!


http://www.washingtonpost.com/

Tuesday, December 11, 2012

लग्नाविना सहजीवन

भारताबाहेर राहणारी शनिवारी संध्याकाळी बर्‍यांचदा जेवायला एकत्र भेटतात तेव्हा हमखास कुणीना कुणी नुकतंच मायदेशातून परत आलेलं असतं. चर्चेचा ओघ, माघारी सोडून आलेला भारत आता किती बदलला आहे इकडे वळतो. तिथला चंगळवाद, वेष, मुलाचं वागणं आणि हल्ली हल्ली ’लिव इन रिलेशनशिप - लग्नाविना सहजीवन’. 

एकंदरीत आत्तापर्यंत होणार्‍या या चर्चांमधून हे जसं सुप्रीम कोर्टाने मान्य केलं आहे तसंच समाजमान्यही झालं आहे असं वाटत होतं, पण अगदीच कुणी कसं माहीत नाही आपल्याला असं सहजीवन असणारे असाही एक प्रश्न मनात डोकावायचा. 

काल दिवाळी २०१२ चा लोकसत्ता वाचला आणि मनात खूप शंका निर्माण झाल्या लग्नाविना राहणार्‍यांच्या मुलाखती वाचून. लेखात आधीच नमूद केलं आहे की अपरिहार्यता हे बहुतेकाचं कारण आहे लग्नाविना सहजीवनाचं. घटस्फोट घेतल्यानंतर पुन्हा त्या फंदात पडायला नको अशी माणसं ही व्यवस्था स्विकारतात किंवा मग पहिल्या लग्नापासून फारकत मिळत नसल्याने नाईलाजाने एकत्र रहाणारी. मुलाखतीतील बहुतांशी सर्वांची नावं बदलली आहेत, अशी जोडपी आपण विवाहीत आहोत असंच सांगतात असाही उल्लेख आहे. 

बहुतेक वेळा पाश्चात्यांचं अनुकरण म्हणूनही अशा रुजू पाहणार्‍या प्रथांवर खापर फोडलं जातं. पण अमेरिकेत तर लग्न करायचं की नाही हे ठरविण्यासाठी दोघं एकत्र रहात असतात आणि कधी ना कधी ती लग्न होतात, म्हणजे लग्नाशिवाय सहजीवन सुरु करायचं हा हेतू नसतोच. लग्नासाठी जोडीदार योग्यं आहे की नाही हे अजमावण्यासाठी हे सहजीवन सुरु होतं. या देशात जेव्हा घटस्फोटाचं प्रमाण वाढलं तेव्हा निर्माण झालेला हा पर्याय आहे. 

मग भारतातील लग्नाविना सहजीवनामागे अपरिहार्यता हेच कारण असेल तर तो लग्नसंस्थेला खरंच पर्याय आहे का?