Tuesday, April 16, 2013

सांत्वन

मैत्रिणीची आई अचानक गेली.  शब्दांनी सांत्वन होत नाही,  जिवलग परत येत नाही हे खरं असलं तरी आठवणीने फोन केला की त्या व्यक्तीला बरं वाटतं या भावनेने तिला फोन केला. पुन्हा ती भारतात मी अमेरिकेत त्यामुळे इतक्या लांबून मुद्दाम फोन केला यानेच तिला गहिवरून आलं.  म्हटलं,
"अगं करायलाच हवा. किती हक्काने ये जा असायची आमची तुमच्या घरात. काकूंचा हसरा, शांत चेहरा, चविष्ट पदार्थ सगळं अजून ताजं आहे मनात. खूप माणसं जोडली तुझ्या आई बाबांनी. नातेवाइकाचंही येणं जाणं असायचं सारखं तुमच्याकडे. सगळे आले असतील ना?"
तिच्या स्वरात कडवटपणा आला.
"आले गं सगळे. पण कशासाठी हाच प्रश्न पडला."
"म्हणजे?" मला काय बोलावं कळेना.
"अगं कोकणात आले होते ना सगळे. कुणाला तयार सांदणं घ्यायची होती, कुणाला कुळथाचं पीठ,  भाजाणी, कुणीतरी कुणालातरी कितीतरी वर्षांनी भेटलं होतं त्यामुळे गप्पा झोडायच्या होत्या. तिथेच कुणालातरी शिवणाचे नमुने हवे होते. सगळं आमच्यासमोर. आईला जाऊन फक्त काही दिवस झालेले असताना. आम्हाला काय वाटेल हा विचार कुणाच्याच मनात डोकावला नसेल का गं?"

तिने मलाच प्रश्न विचारला. उत्तर नव्हतंच. फार विचार करू नकोस म्हटलं आणि फोन ठेवला. खूप रडले. कळत नव्हतं की मी कशासाठी रडते आहे. काकूंच्या जाण्याच्या दु:खाने, माणसातल्या हरवलेल्या संवेदनशीलतेच्या दर्शनाने की हे असंच चालायचं या कल्पनेने, मनाला आलेल्या हतबलतेने! 



माझ्या चविष्ट जगाला भेट द्यायला विसरु नका.