Tuesday, June 11, 2013

प्रश्न आणि प्रश्न!

"आता तू कधी येणार भारतात?" भारतात परत जाण्यासाठी निघताना बहिणीने विचारलं
"पाहू, तशी ओढ नाही राहिली आता. आई, भाऊच (वडिल) नाहीत ना." दोघींही एकमेकींच्या भावना समजल्यासारख्या गप्प झालो. उगीचच, आपण बहिणी आहोतच एकमेकींना असलं काही  ती म्हणाली नाही किंवा आता तुम्ही दोघी बहिणी आहात, तुमच्यासाठी येईन असं मी तोंडदेखलं म्हटलं नाही. आई वडिल गेले की इतकं पोरकेपण येतं हे ते गेल्यानंतरच कळावं यासारखं माणसाचं दुर्देव नाही हेच खरं.

बहीणीने विचारला तोच प्रश्न तसा खूप जणं फोनवर विचारतात, आम्ही आहोत ना चा दिलासा देतात. मावश्या, काका, मावस, आते भावडं सगळेच. आई वडिलांनी सगळी नाती जपली, त्याचांच वारसा आम्ही राखला याचा कोण अभिमान आम्हाला. आणि तरीही भारतात केव्हा येणार म्हटलं की ती दोघं नाहीत म्हणून जाऊच नये असं वाटतं तेव्हा दाटून येतो उदासपणा, नैराश्य.

भारताची वारी करुन एखादं वर्ष झालं की पुन्हा तिकडे जायचे वेध लागायचे यापूर्वी. शेवटी भारत मायभूमी आहे, सगळे तिकडेच तर आहेत, इतक्या वर्षानंतर सासर, माहेर असं वेगळं उरतच नाही. हे जे सगळं म्हटलेलं, वाटलेलं, अनुभवलेलं.... विरुन गेलं क्षणात? कुठे गेल्या या भावना का त्या खर्‍या नव्हत्याच? खरंच एखाद्या गोष्टीचं समीकरण बदलून जातं असं कायमचं?

प्रश्न आणि प्रश्न!