Monday, August 19, 2013

शिर्षकाविना :(

माझ्या मुलाच्या मित्राच्या मैत्रीणीला (Roommate)  भारतात आलेल्या अनुभवाबद्दलचा हा दुवा. त्याचा मित्र त्याला याबद्दल काय वाटतं असं विचारत होता.

वाचल्यावर आधी लाज वाटली, राग आला, आणि मग नुसत्याच आठवणी. शाळा, महाविद्यालय, रस्ते, लोकल, गर्दी  अशा ठीकाणी पचवलेलं सारं आजूबाजूला उभं राहिलं. डोळे मारणं, धक्के देणं, ओठांवरुन जीभ फिरवणं, सहेतूक स्पर्श...  आपलंच तर काही चुकत नाही ना या जाणीवेने त्याबद्दल काही न बोलता मनातच दाबून ठेवलेलं सारं आठवलं.

आपण संस्कारांना महत्त्व देतो. मग अशावेळी हे संस्कार जातात कुठे? की ही सगळी अशिक्षित असं करणारी? पण तसं म्हटलं तर संस्कार आणि सुशिक्षितपणाचं नातं आहे का? नसावं, कारण चांगल्या, चांगल्या घरातल्या, सुशिक्षित मुलाचं, लोकाचं हे असं वागणं असतं. मग हा नक्की कशाचा परिणाम आहे? कसं बदलायचं हे सारं?