Thursday, October 2, 2014

दोन ध्रुवांवर

"तू कधी नोकरी केली नाहीस ना या देशात?" दिप्तीने ऐकून न ऐकल्यासारखं केलं पण पुन्हा तोच प्रश्न रमाने
विचारला. तिने नुसती नकारार्थी मान हलवली. पण मन अस्वस्थ झालं ते झालंच. कोण कुठे नोकरी करतं, कुणाला घरी बसणं किती अशक्य वाटतं तर कुणाची तरी कायम आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असल्याची टिमकी हे नेहमीचं गु्र्‍हाळ सुरु होणार.  ती पुढच्या संभाषणातले सगळे विषय निर्विकारपणे ऐकत राहिली. भडका उडाला तो गाडीत बसल्यावर,
"काय समजतात या बायका  स्वत:ला? इतकं कमी लेखतात ना घरी रहाणार्‍यांना. तू कधी नोकरी केली नाहीस का म्हणे. नाही केली तर हिच्या *** काय जातं? गेला सुट्टीचा दिवस वाया. कशाला आणतोस रे अशा लोकांकडे?"
"मी कुठे आणतो? सगळा गोतावळा तुझाच आहे दिप्ती." शांतपणे निलेश गाडी चालवत राहिला. घरी पोचेपर्यंत दिप्ती अखंड बडबड करत तिचा वैताग व्यक्त करत राहिली. रात्री डोळा लागेपर्यंत चाललेल्या विचारांनी  दुसर्‍या दिवशीही पाठपुरावा सोडला नाही. रविवारची सकाळ असूनही ती लवकर उठली. निलेश खाली येईपर्यंत तिचं सगळं आवरुन झालं होतं. टी. व्ही. चालू करुन ती बसली.

धावायला बाहेर पडणार्‍या निलेशने दिप्तीकडे कटाक्ष टाकला.
"काय झालं?"  न कळून दिप्तीने विचारलं.
"काही नाही."
"मग असा काय बघतोस?"
"तू आता काय करणार आहेस?"
"का?"
"मराठी मालिका चालू रहाणार असेल जेवायला बसेपर्यंत."
"हो." दिप्तीच्या आवाजात तुटकपणा आला.
"हं..." निलेशची पावलं दाराकडे वळली पण  दिप्ती भडकलीच.
"काय झालं हं करायला? कधीची उठलेय. सगळं आटपून झालंय. कामं बाजूला टाकून नाही टी.व्ही. समोर बसत."
"मला नाही आवडत सकाळी सकाळी हे सुरु झालेलं."
"नाही आवडत तर नाही. बाहेर गेलं की नोकरी करत नाही म्हणून ऐकायचं, घरी तुमच्या कुणाच्या मनासारखं वागत नाही म्हणून ऐकायचं. आयुष्य असं ऐकून घेतच संपणार."
"तू  काल रमा बोलली ते अजून घेऊन बसली आहेस? कमाल आहे. यामुळेच तू सुखी नसतेस कधी. सोडून द्यायला शिक. आयुष्य कसं जगायचं ते आपलं आपणच ठरवायचं."
"हो ना, मग माझ्या मालिका बघण्यावर का घसरलास? बघू दे की सुखासुखी."
"ते वेगळं."
"वा, म्हणजे  सोयीप्रमाणे सगळं. पुरे झाले तुझे धडे."
"ठीक आहे.  कर तुला काय पाहिजे ते." निलेश तडकला.
"का? आता का? आधी काहीतरी बोलायचं आणि मग कर तुला काय पाहिजे ते म्हणून मोकळं व्हायचं. वाऽऽ हे चांगलं आहे तुझं..." दिप्ती तारस्वरात ओरडली पण उत्तर द्यायला निलेश थांबला नाही. दिप्तीच्या कानावर दार धाडकन बंद झाल्याचा आवाज आदळत राहिला.

धावता धावता दिप्तीबद्दलच निलेशचे विचार चालू होते. कुठे कुणाकडे जाऊन आलं की हमखास असं काहीतरी घडायचं. इतकं जर मनाला खुपतं कुणी नोकरीबद्दल विचारलं की तर ती नोकरीसाठी का प्रयत्न करत नाही हे न उलगडलेलं कोडं त्याने पुन्हा एकदा सोडवायला घेतलं. या देशात येऊन झाला की पंधरा वर्षाहून अधिक काळ. पण दिप्तीच्या मनातली अमेरिकेत कायमचं वास्तव्य करायचं या निर्णयाची अढी गेलेलीच नाही.  सतत धुसफुस घरात. सुरुवातीला घडी बसेपर्यंत नाही म्हटलं तरी सहा सात वर्ष गेलीच. मुलं लहान, कामाच्या स्वरुपामुळे फिरती मागे लागलेली. यात ती भरडली गेली पण एका ठिकाणी स्थिर झाल्यावर स्वत:चा जम बसवायला काहीच हरकत नव्हती. पण तिने तसा प्रयत्न केलाच नाही. मुलांमध्ये रमली म्हणावं तर तो संध्याकाळी घरी आला की मुलांवर खेकसणारी दिप्तीच समोर येई. त्यावरुन काही बोललं की त्याच्यावर तोफ. काय केलं म्हणजे दिप्तीला सुख मिळेल हेच त्याला कळत नव्हतं. एकदा शांतपणे दिप्तीशी बोलून मार्ग काढायला हवा हे ठरवून मुलं नसताना त्याने तिला बोलतं करायचा प्रयत्न केला. धावण्याच्या वेगाबरोबर तो प्रसंगही उड्या मारत त्याच्या मनात फिरायला लागला.
"तुझ्याशी बोलायचं आहे."
"बोल ना. परवानगी कशाला हवी?" हातातलं काम बजूला ठेऊन ती म्हणाली. तिच्या गोड स्वराने काय बोलायचं आहे तेच विसरला तो. हे असंच नेहमी. किती पटकन चिडते, वैतागते तितकीच पटकन शांतही होते. सगळ्या भावना तीव्रपणे व्यक्त करणं हाच स्वभाव आहे का हिचा?
"दिपू, कधी होणार गं तू मोठी?"
"म्हणजे?"
"लहान मुलांसारखी वागत असतेस, क्षणात चिडचिड, वसवस, आदळआपट तर क्षणात ते विसरुन लाघवी वागतेस."
"हे बोलायचं होतं तुला?" खळखळून हसत तिने विचारलं.
"नाही, वेगळंच बोलायचं होतं." आता त्याला विषयाला वेगळं वळण नको होतं. "आता तू नोकरीचा विचार करावास असं वाटतं. मला ठाऊक आहे.  इथे येऊन स्थिरावण्यात वेळ गेला. पण आता करु शकतेस तू तुला काय पाहिजे ते. म्हणजे नोकरीच असं नाही. छंद जोपास, शिक पुढे. जे तुला वाटत असेल ते. पेंटींग शिकवायला सुरुवात कर, नाहीतर गायनाचे वर्ग. खूप संधी आहेत तुझ्यासाठी "
"दहा वर्ष गेली आहेत मधे. कोण देईल मला नोकरी. आणि मलाच करायची नाही आता."
"ठीक आहे. मग पेंटींग, गायन शिकवणं?"
"नको."
"का?"
"नको म्हटलं ना."
"अगं पण काही कारण? आणि नसेल काही करायचं तर नको करु पण दिवसभर त्या मालिका बघत रहायचं आणि नंतर इथून तिथून इथे रहातोय, भारतात परत जात नाही म्हणून कसं तुझं नुकसान होतंय ते ऐकवणं तरी सोडून दे.  सुखी रहा एवढंच म्हणायचं आहे मला. आता मुलं मोठी झाली आहेत. ती पण वैतागतात तुझ्या अशा वागण्याने."
"ते मुलं सांगतील. तू नको. आत्तापर्यंत नुसती म्हणत राहिले पण आता उठते आणि जातेच मी भारतात."
"जा." निलेशच्या तोंडून इतक्या पटकन निघालं की दिप्तीला त्याच्या एकदम ’जा’ म्हणण्यावर काय बोलावं ते सुचेना.  डोळे डबडबलेच तिचे. काही न बोलता ती तिथून उठून गेली. निलेश तसाच बसून राहिला. काय बोलायचं ठरवलं आणि कुठून कुठे गेलं संभाषण. आताही त्याला तो प्रसंग जसाच्या तसा आठवत होता. रागाच्या भरात तो बोलला खरा पण इतकी वर्ष झाली तरी दिप्ती ते विसरायला तयारच नाही. विचारांच्या नादात त्याचा धावण्याचा  वेग वाढला.

दार बंद झाल्याचा आवाज दिप्तीच्या कानात घुमत राहिला. तिचं मन मालिका पहाण्यावरुन उडालं. कुठून कुठे पोचला दोघांचा संसार. भारतातून येताना किती सहज सगळं सोडून आली होती ती निलेश सोबत. पुन्हा परतायचंच आहे लवकर याच भावनेने. पण नंतर इतर अनेकांप्रमाणे  चक्रव्युहात अडकून गेली. मनातली खदखद मग या ना त्या मार्गे बाहेर पडत राहिली. तिरकं बोलायचं, नाराजी दर्शवायची हा कधीतरी याच काळात स्वभाव बनून गेला. मला कधी इथे रहायचंच नव्हतं म्हणत ती  इथेच राहिली.  आपण काही करत नाही ही बोच उराशी बाळगून. त्यात कुठेतरी असे काही प्रसंग घडायचे की मन अस्वस्थ होऊन जायचं. नोकरी करणार्‍या आणि न करणार्‍या असे गटच झाले होते इथल्या छोट्याशा डबक्यात. सुरुवातीला  पेंटींग, गायन, वाचन अशा विषयांवर ती काही ना काही  बोलायची. पण अशा कलांना तुम्ही नोकरी करुन करत असाल तरच किंमत, नाहीतर हे छंद म्हणजे रिकामटेकड्यांचे उद्योग असा भाव जाणवायचा तिला इतरांच्या बोलण्यात. मग सगळं हळूहळू मागे पडत गेलं. रसच उडाला. पूर्वी हाताशी असलेल्या वेळाचं  करायचं काय हा प्रश्न असे पण इंटरनेटनच्या आगमनाने तो प्रश्न सोडवला.  लॅपटॉप नाहीतर टी. व्ही. वर मराठी, हिंदी मालिका नाहीतर चित्रपट. हळूहळू तेच तिचं जग झालं. भारतात पोचल्यासारखं वाटायचं या मालिका पाहताना.  तिच्या टी. व्ही. पहाण्यावरुन मुलं, निलेश काहीतरी बोलायचेच. त्यामुळे त्या मालिका लावल्या की ती स्वत:वरच चिडायची.  पण ते पहाणं सोडवायचंही नाही. तिला निलेश बरोबरचा कितीतरी वर्षापूर्वी घडलेला प्रसंग आठवला. त्यावेळेस पहिल्यांदा वैतागून तो म्हणाला होता. जायचं तर जा तू भारतात. मग चढत्या क्रमाने याच स्वरुपाचे प्रसंग घडत राहिले. पण नाही झालं खरं धाडस. म्हणजे एकटंच कसं जायचं? तिकडे जाऊन काय करायचं? आपण गेल्यावर निलेश येईल परत? मुलांचं काय? माहेरची काय म्हणतील? नातेवाईकांमध्ये किती चर्चा होईल या विचारातच ती गुरफटून राहिली. वर्षानुवर्ष. मुलं मोठी झाली. पंखात बळ आल्यावर उडून गेली. निलेश तर म्हणायचा, तिच्या अशा वागण्यामुळे सगळ्यांनी अगदी लांब नोकर्‍या शोधल्या आहेत. खरं काय, खोटं काय कोण जाणे. पण ती मात्र इथेच होती नक्की काय करायचं होतं हे कधीच न समजल्यासारखी. द्विधा!

निलेश घाम पुसत घराबाहेर उभा होता. आता तरी निवळली असेल की आत गेलं की पुन्हा मागच्या पानावरुन तेच सुरु? काही झालं की  सारखं आपलं ’भारतात परत गेले असते तर...’ या पोकळ धमक्यांपेक्षा खरंच का जात नाही दिप्ती भारतात कायमची? सर्वांनाच शांतपणा मिळेल असं त्याला दरवेळेला वाटायचं. पण ते वाटणंही तेवढ्यापुरतंच. बोललोय की तिला हे. आणि खरा राग येतो तो तिच्या टी. व्ही. पहाण्यापेक्षा तिच्या कलागुणांचा ती उपयोग करत नाही याचा.  विचार करुन डोकं भणभणून गेलं निलेशचं. दार उघडून तो आत आला.  दिप्तीने  चहाचा कप पुढे केला. तिची बदललेली मनस्थिती पाहून त्याला आश्चर्य वाटलं पण आनंदही झाला.  आधीचं सारं विसरुन तो हसला.
"तू नाही घेत?" खुर्चीवर बसत त्याने विचारलं.
"घेते ना. आणि आज सुट्टीच आहे तर नाटकाला जाऊ या का कुठल्यातरी?"
तो काहीच बोलला नाही.
"ऐकलंस ना?" तिने जोरात विचारलं. तिच्या आनंदावर विरजण घालणं जीवावर आलं त्याच्या.
"इच्छा आहे गं. पण काम करावं लागणार आहे. म्हणजे काल पूर्ण नाही झालं ऑफिसमध्ये, ते संपवायचं आहे."
"बरं. ठीक आहे." दिप्तीची नाराजी शब्दात डोकावलीच.
"अगं समजून घे ना."
"मी कुठे काय म्हटलं? तू दिवसरात्र काम करत रहा. मी रिकामटेकडी. काय करायचं तेच समजेनासं झालंय. वेळ घालवायला शोधलेले मार्गही चालत नाहीत. चालू दे. मी काही बोलत नाही..." दिप्तीचा पारा चढला. निलेशने चहा अर्धवटच टाकला आणि टेबलावर ठेवलेला लॅपटॉप उचलून काही न बोलता तो कामाच्या खोलीत गेला.  धाडकन दार बंद झालं. बंद दाराकडे दिप्ती पहात राहिली. एकाच घरातली इन मिन दोन माणसं दोन ध्रुवांवर उभी होती. कायमची!


http://bmmonline.org/sites/default/files/BMM/BMM/BMM_Newsletter_Oct2014.pdf



Friday, August 1, 2014

सीमारेषा

"साकेत तू काय घेणार? व्हिस्की, वाइन, बिअर..." परेशकाकाच्या प्रश्नावर साकेतने आईकडे पाहिलं. साकेतने
इथे सगळ्यांमध्ये नाही घेतली तर बरं असं वाटत असतानाच  आजूबाजूला हास्याचे फवारे उडाले. झालं, साकेतने हो म्हटलं तर नंतर त्याबद्दलच  चर्चा रंगणार, श्रावणीच्या मनात विचार तरळला. तितक्यात गिरीशच म्हणाला,
"घे रे बाबा तुला काय पाहिजे ते. माझ्याकडून हिरवा दिवा." साकेतने प्रश्नार्थक नजरेने पाहिलं तसं स्पष्टीकरण देत गिरीश म्हणाला,
"म्हणजे ग्रीन सिग्नल रे." साकेत हसला.
"नको."
"आईला घाबरतोयस का?" परेशने श्रावणीकडे पहात विचारलं.
"मला कशाला घाबरेल तो? त्याच्या बाबानेच परवानगी दिली आहे ना." श्रावणी हसून म्हणाली आणि  वाइनचा ग्लास तिने तोंडाला लावला.
साकेतनेही अवघडत परेशकाकाने दिलेला ग्लास हातात घेतला.
"कॉलेजमध्ये पण घेतोस का?" रागिणी मावशीच्या प्रश्नाला साकेतने उत्तर देण्याआधीच ती म्हणाली,
"आम्ही दोन्ही मुलांना सांगितलं आहे. घ्यायची तर आमच्या समोर. कॉलेजमध्ये अजिबात नाही. जे काही कराल ते आम्हाला कळलं म्हणजे झालं." श्रावणीने साकेतकडे  कटाक्ष टाकला. पुसटसं हसू त्याच्या चेहर्‍यावर पसरल्यासारखं वाटलं तिला.  तिने रागिणीच्या बोलण्यावर मान डोलवली.

रागिणीचे शब्द श्रावणीच्या मनात घोळत होते. खरचं तिची मुलं फक्त त्यांच्या उपस्थितीतच घेत असतील? कॉलेजसाठी या मुलांना बाहेर रहावं लागतं. तिथे इतर मित्र मैत्रीणी बरोबर असताना मोह टाळता येत असतील? साकेत काय करत असेल? लगेच हा विषय नको म्हणून दोन तीन दिवस ती या विषयावर काही बोलली नाही. पण त्या दिवशी कॉलेजचाच विषय सुरु झाल्यावर तिने  संधी साधली.
"मुलं दारु, सिगरेट पितात/ओढतात का तिकडे? नाही म्हणजे आम्ही काही इथे शिकलेलो नाही. त्यामुळे वातावरणाची कल्पना नाही ना म्हणून विचारते आहे." साकेत  हसला.
"रागिणी मावशी जे बोलली त्यामुळे विचारते आहेस ना?"
"अगदी तसंच काही नाही."
"तसंच आहे आई. आणि तुला सांगतो आम्ही सगळी ’देसी’ मुलं पालकांना जे ऐकायला आवडेल तेच सांगत असतो."
"म्हणजे?"
"तुला खरंच वाटतं रागिणी मावशीच्या मुली कॉलेजमध्ये दारुला हातही लावत नसतील?"
"मला नाही माहित."
"एक तर मुलींनी दारु पिण्याचं प्रमाण मुलांपेक्षा जास्त आहे कॉलेजमध्ये. आणि आपण हात सुद्धा लावत नाही असं त्या सांगत असतील मावशीला तर ते साफ खोटं असणार. सगळी मुलं घेतातच गं कधी न कधी."
"तू?"
"हो घेतो. आणि हे लगेच कबूल करतो आहे कारण ते रेल्वे रुळ ओलांडायचं झाल्यापासून मी तुम्हाला जे खरं आहे तेच सांगतो हे विसरु नकोस तू." श्रावणीचं लक्ष  त्याच्या बोलण्यावरुन उडालं.  साकेतने तिचं मन एकदम भूतकाळात ढकललं. साकेत खेळायला जायचा मित्रांबरोबर. दुसरीत असेल. सात वाजता घरी परत यायचं आणि रेल्वे रुळ ओलांडून पलिकडच्या मैदानात जायचं नाही असं बजावलेलं होतं त्याला. एकदा सात वाजता तो आला नाही म्हणून ती बघायला गेली तर सगळी मुलं पलीकडच्या मैदानावर खेळायला गेलेली. श्रावणीला बघून तो बावचळला. राग आलेला असूनही तिने तो गिळला. गिरीश आला की मगच दोघं मिळून बोलू साकेतशी असं ठरवून ती  साकेतला घेऊन मुकाट्याने  घरी आली.  मुलांना आपणहून परवानगी दिली नाही तर ती लपूनछपून त्यांना पाहिजे ते करतातच, त्यासाठी खोटं बोलतात हे ह्या प्रसंगाने त्यांना दाखवून दिलं. दोघांनी झाल्या गोष्टीचा शांतपणे विचार करुन  दुसर्‍या दिवसापासून रुळ ओलांडून मैदानावर खेळायला जायची परवानगीही दिली. खोटं बोलायचं नाही. खरं सांग. चुकीचं वागला असलास तरी आम्ही तू असं का केलंस ते समजून घ्यायचा प्रयत्न करु याची त्याला खात्री दिली. तेव्हापासून साकेत मोकळेपणाने त्यांच्याशी सगळं बोलत होता.
"आई, लक्ष कुठे आहे तुझं." ती एकदम भानावर आली.
"बागेचा प्रसंग आठवत होते. जाऊ दे ते. पण रोज घेतोस का रे तू?"
"नाही गं. फक्त शुक्रवारी. ते सुद्धा एखाद्याच."
"सिगरेट?" न रहावून तिने विचारलं.
"अजिबात नाही."
श्रावणीची चुळबूळ, अस्वस्थपणा वाढला असावा.
"आई, मी प्रामाणिकपणे खरं तेच सांगतोय गं."
"अच्छा" म्हणून साकेतचं बोलणं ऐकत राहिली.

श्रावणीचे एक दोन दिवस अस्वस्थतेत गेले. आपले कॉलेजचे दिवस वेगळे होते. साकेतच्या बाबतीत  काळ आणि देश दोन्ही बदललेलं आहे त्यामुळे नसती भिती, अंदाज बांधण्यात काय अर्थ? आणि आता जिथे आपणही मित्र मैत्रिणींबरोबर  ड्रिंकची चव चाखतो तिथे मुलांना काही शिकवायला जाणं म्हणजे... पण कॉलेजमध्ये वय, संगत यामुळे कुठे थांबायचं हे कळलं नाही या मुलांना तर याचीच भिती वाटते आणि ती बोलून दाखवायलाच हवी असं तिला वाटत होतं. शेवटी तिने तो विषय काढलाच.
"आई,  आता इतकं बोलतोच आहोत आपण तर एक विचारु?"
"विचार ना, परवानगी कशाला हवी?"
"तुम्ही सगळे पालक ना असं करु नका, तसं करु नका चा सूर लावता नेहमी. मला एक समजत नाही की तुम्ही पालक दारु पिऊ नका, व्यसनाच्या आहारी जाऊ नका, लग्नाशिवाय शारीरिक संबंध येता कामा नयेत असा धोशा लावता पण मुलांना मोह टाळता आलाच नाही तर त्यांनी काय करायचं ते का सांगत नाही?"
"म्हणजे?"
"पिण्याचे परिणाम काय काय होऊ शकतात, एकावेळी कमीत कमी म्हणजे नक्की किती घ्यावी, सवयीचं व्यसनात रुपांतर कसं होऊ शकतं, ते झालं तर त्याचे शरीरावर होणारे परिणाम, किंवा गाडी चालवू नका, जो गाडी चालवणार असेल तो दारु पिणार नाही याची दक्षता घ्या, शारीरिक संबंधाबद्दल काळजी घेतली नाही तर काय होऊ शकतं, त्यातून निर्माण होणारे रोग अशा कितीतरी गोष्टी तुम्ही सांगत नाही. आम्हाला महाविद्यालयात ही माहिती देण्यासाठी खास तास आणि परीक्षा असते. पण पालकांनी पण बोलायला नको का हे आमच्याशी?"
श्रावणी ऐकत राहिली.  काय करायला नको ची यादी तयारच होती तिच्याकडे पण नाहीच आवरला मोह तर काय खबरदारी घ्यायला पाहिजे ते सांगावं की नाही याबद्दल मन:स्थिती द्विधा होती, आणि किती म्हटलं तरी काही गोष्टी नाही येत इतक्या स्पष्ट बोलता, पोटची मुलं असली तरी. बोलणारा आणि ऐकणारा दोघंही संकोचतातच. त्यामुळेच मनातलं शब्दांवाटे बाहेर येत नव्हतं हेच खरं. ती काहीच बोलली नाही तसं साकेतच म्हणाला,
"तू काळजी करु नकोस. मला हे असं करायला वेळच मिळत नाही."
"आणि कॉलेजमध्ये शिक्षणासाठी जातो आपण हे लक्षात ठेवलं की झालं." तिच्या बोलण्यावर साकेत हसला.
"आई तुम्ही कधी कॉलेजमध्ये मजा केलीच नाहीत का?"
"केली ना. पण मजेच्या व्याख्या बदलत जातात स्थळकाळानुसार. पालकांची मानसिकताही बदलते. आणि तू म्हणालास त्याबद्दल विचार करत होते.  तू आत्ता सांगितलंस तसं करणं म्हणजे पालकांना, आपण अशी माहिती देऊन मुलांना उत्तेजन तर देत नाही ना असंही वाटतं."
"पण नुसतं दारु पिऊ नका, मादक पदार्थांच्या आहारी जाऊ नका, कुणाशी शारीरिक संबंध ठेवू नका असं सांगून तरी काय उपयोग? का ते माहीत असलं की मुलं जास्त विचार करतील ना या गोष्टी करताना?"

श्रावणी स्वत:चं  तरुणपण तपासत राहिली. मुलांबरोबर पालकत्वही काळानुसार बदलत चाललं आहे. आपल्या आई वडिलांनी शिस्त, संस्कार दिले. मनातलं त्याच्यांशी बोलू शकतो हा विश्वासही दिला तरी काही गोष्टी सांगायची, विचारायची लाजच वाटायची. ते जे मधलं अवघडलेपण आपण अनुभवलं ते आपल्या मुलांनी नको अनुभवायला असं श्रावणीला वाटत होतं, नाही म्हटलं तरी ते होणारच हे कळत असलं तरी. पण साकेतच्या बाबतीत त्याने स्वत:हून नाही सांगितलं तरी त्याबद्दल विचारलं की तो खरं तेच सांगेल ह्याची तिला खात्री होती. पण तरीही साकेतच्या आजच्या बोलण्यावरुन वाटत होतं की मुलांशी मित्रत्वाचं नातं राखणं आणि त्याचबरोबर पालक म्हणून त्यांनी आपला मान ठेवावा, आदर दाखवावा  असं वाटणं यातली सीमारेषा इतकी धूसर आहे की ती केव्हाही भंग पावेल. पण खरंच ही  सीमारेषा धूसर आहे की तिची व्याख्या  बदलणं, ती समाजमान्य होणं आवश्यक आहे? या प्रश्नाचं उत्तर ज्याचं त्यानं अनुभव घेतच सोडवायचं हेच अंतिम सत्य  असलं तरी श्रावणीचं मन त्या प्रश्नाचं उत्तर शोधत राहिलंच...