Thursday, June 27, 2019

कथाकथन - अध्यक्षीय भाषण

कथाकथन या विषयावर माझे चार (?) शब्द.

माझ्या मराठी शाळेच्या संकेतस्थळावर भाषण आणि कथाकथन ’ऐकता’ येईल - https://bit.ly/2FBThrw

कथाकथन हा शब्द खर्‍याअर्थी आपल्या रोजच्या आयुष्यात सतत आपल्या आजूबाजूला घोटाळत असतो. एखादा प्रसंग, किस्सा बोलता बोलता आपण सांगतो ते खरंतर कथाकथनच आहे फक्त त्याचं स्वरुप छोटं - मोठं असू शकतं. तुम्ही ती गोष्ट, किस्सा किती रंगवून सांगता यावर त्या कथनाची रंगत अवलंबून असते. यामुळेच कथाकथन हा प्रकार अस्तित्वात आला असावा. जो मुळात आपल्या सर्वांच्याच अंगात भिनलेला आहे. विचार केलात तर लक्षात येईल की तसं म्हटलं तर आपण ही भूमिका रोजच निभावत असतो. कधी यशस्वीरित्या तर कधी धडपडत. त्याचंच विस्तारित स्वरुप कथाकथन.

कथाकथन म्हटलं की मला एक प्रसंग नेहमी आठवतो. साधारण १९९१ मधली ही गोष्ट आहे.  माझे वडील जिल्हापरिषदमध्ये कार्यकारी अभियंता  होते. गणपत्तीनिमित्त कार्यक्रम असावा बहुतेक. गिरीजा किर, वि. आ. बुबा या दोघांच्या कथाकथनाचा. ऑफिसच्या आवारातल्या गॅरेजमध्ये कार्यक्रम होता. आता नवल वाटतं, गॅरेजमध्ये कार्यक्रम होता त्याचं. हौसेपोटी गाड्या हलवून कर्मचार्‍यांनी छानसं व्यासपीठ उभारलं होतं. जिल्हापरिषदचे सारे कर्मचारी आणि जवळपासची लोकं कार्यक्रमाला हजर होती. गॅरेजच्या समोर गर्दी करुन रस्त्यावरच सगळे बसलेले. आमच्या क्वार्टर्स समोरच होत्या. घराच्या पायरीवर पथारी पसरुन कार्यक्रम पाहायला आम्ही बहिणी, आई बसलो. आपापल्यापरीने सगळे जय्यत तयारीत होते.  पण कार्यक्रम काही सुरु होईना. हळूहळू कुजबूज सुरु झाली. वि. आ. बुवा बसलेले दिसत होते. गिरीजा कीरांची वाट पाहत असणार. तेवढ्यात ऑफीसमधलं कुणीतरी आमच्या घराच्या दिशेने यायला लागलं. वडिलांकडे असणार म्हणून सरकून आम्ही त्यांना आत जायला जागा करुन दिली. पण ते म्हणाले.
"मोहना तुझ्याशी बोलायचंय." गोंधळून मी पाहतेय तेवढ्यात ते म्हणाले,
"गिरीजाताई काहीकारणास्तव येऊ शकत नाहीत. तू कर आज कथाकथन. वि. आ. बुवा आलेले आहेत. तुझं आणि त्यांचं कथाकथन करु." गिरीजा कीरांच्या जागी मी? त्यांचं आभाळमाया पुस्तक मी वाचलं होतं. भारावून गेले होते आणि प्रचंड उत्सुकतेने त्यांची वाट पाहात होते. त्याऐवजी मी करायचं कथाकथन? माझी पुंजी फार थोडी होती. स्पर्धांमधली बक्षिसं आणि गणपतीउत्सवात रत्नागिरीकरांसमोर केलेलं कथाकथन. त्यावेळेस महाविद्यालयातले आम्ही तिघं चौघं या स्पर्धांमध्ये आघाडीवर होतो त्यामुळे जिकडे तिकडे गोष्टी सांगायला असायचो.  पण आज मला एकट्याने कथाकथन करायचं होतं तेही गिरीजा किर यांच्या जागी. हातापायला कापरं सुटलं. पण जिल्हापरिषदेचा कर्मचारीवर्ग कुठूनकुठून आलेला. गर्दी झालेली. कार्यक्रम रद्द करता येणार नव्हता कारण वि. आ. बुवा आलेले होते. पण ते एकट्याने पूर्ण कार्यक्रम सादर करु शकत नव्हते.  वि. आ. बुवांची एक कथा झाली आणि मी उभी राहिले. गिरीजा कीरांच्या ’मित्रा’ कथेने मला अनेक बक्षिसं मिळवून दिली होती. त्याच कथेन सुरुवात केली.  माझ्या शब्दांची गाडी धाडधाड करत सुटली. कथा सुरु कधी झाली आणि कधी संपली तेच कळलं नाही इतका वेग होता त्या कथेला. त्यावेळेला मी नुकतीच आकाशवाणीत निवेदिका म्हणून काम करायला सुरुवात केली होती. दुसर्‍यादिवशी आकाशवाणीत कार्यक्रमाला आलेल्या कुणीतरी माझ्या कथाकथनाची नक्कल करुन दाखवली त्यावेळेस सुटलेल्या गाडीची कल्पना आली....पण प्रसिद्ध लेखिकेच्या जागी, प्रसिद्ध लेखकासमवेत आयत्यावेळी केलेलं हे कथाकथन होतं. तर बघा, नकळत तुमचेही कान टिपत होते ना माझं बोलणं? हेच तर असतं कथेचं कथन.

आमची पिढी मोठी झाली ती व. पु. काळे, पु. ल. देशपांडे, शंकर पाटील, द. मा. मिरासदार यांच्या कथाकथनाच्या कॅसेट ऐकत. ही नावं मी सांगतेय तेव्हा लक्षात येतं की यामध्ये स्त्री कथाकथनकार नाहीत. का? खरं सांगायचं तर फार विचारच केला नव्हता कधी. पण आज कथाकथन या विषयावर बोलायचं आहे म्हटल्यावर हे प्रकर्षाने जाणवतंय. स्त्री कथाकथनकार होत्या, त्यांचे कार्यक्रम होत होते पण कॅसेट रुपात आलेले पुरुष कथाकथनकार जास्त होते. मला आठवतंय, व. पु. काळेंची शिष्या मुग्धा चिटणीसचं कथाकथन त्यावेळेस आमच्यासारख्या महाविद्यलयीन विद्यार्थ्यांमध्ये प्रिय होतं. निलम प्रभु यांच्या ’पप्पा’ कथेच्या सादरीकरणाला कोण विसरेल? पण त्यांचं हे कथाकथन व. पु. काळेंबरोबर होतं. स्वतंत्रपणे केलेलं नव्हतं. तरीही आज इतक्या वर्षांनीही पप्पा कथेमधील ती आणि नानासाहेब देशमुख यांचा विसर पडत नाही. दत्तक मुलगी आणि नानासाहेब यांच्या आयुष्यातील गुंतागुंत निलम प्रभु इतक्या प्रभावीपणे आपल्यापर्यंत पोचवतात की ही कथा काळजात घर करुन बसते. कथा सांगणं हे कौशल्य आहे यात कथा निवड आणि श्रोता महत्वाचा. आपल्यासमोरचा वयोगट, त्यांची आवड - निवड हा मोठा भाग त्यात आलाच पण कोणत्याही कथेत ’कथा’ असायला हवी. रंजकता हवी. थोडक्यात ज्या कथेला उत्तम सुरुवात, मध्य आणि शेवट असेल अशा कथेत श्रोता रंगतो. कथाकथन करताना प्रेक्षकांचा अंदाज घेत आयत्यावेळी बदल करता आले पाहिजेत. हे सोपं नाही पण कठीणही नाही. अनुभवाने जमणार्‍या या गोष्टी आहेत.  कथाकथन सादर करताना खूपजणांचा गोंधळ उडतो. कथेतील पात्रांचे आवाज बदलायचे असतात असा समज असतो. पण प्रत्यक्षात तुम्ही स्त्री, पुरुष असा आवाजात बदल न करता, आवाजात चढ - उतार करुन ते पात्र डोळ्यासमोर उभं करायचं असतं. ते केलं नाही, तर त्याचं स्वरुप एकपात्री प्रयोग असं होतं.

अजूनही स्त्री कथाकथनकार म्हटलं की मुग्धा चिटणीस, निलम प्रभु, गिरीजा कीर  ही काही नावं ठळकपणे आठवतात. २० वर्षाहून अधिक काळ भारताबाहेर असल्याने नविन नावं मला ठाऊक नाहीत किंवा कानावर पडलेली नाहीत. हा विचार मनात आला की वाटतं, जर खरंच एकूणच कथाकथन हा प्रकार कमी झाला असेल तर तो माध्यमांच्या बदलामुळे झाला असावा. गोष्टी सांगणार्‍यामधे मुळात गोष्टी वाचण्याची आवड बहुतेकवेळा असतेच. पण इतर माध्यमांच्या प्रभावामुळे वाचन कमी झाल्यामुळे कथाकथन कमी झालं असावं.  वाचनाची आवड हा मुद्दा बाजूला ठेवला तर आपलं किंवा इतरांचं लेखन आपण कथाकथनाने दुसर्‍यांपर्यंत पोचवू शकतो. न वाचणारी मंडळीही गोष्टी उत्साहाने ऐकतात.  हाच विचार घेऊन मी माझ्या मेल्टिंग पॉट आणि नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ’रिक्त’ कथासंग्रहाबाबत केला. कथाकथनाचे कार्यक्रम केले. त्यामुळे माझ्या कथा मी श्रोत्यांपर्यंत पोचवली आणि त्यामुळे पुस्तकाबद्दलही उत्सुकता निर्माण झाली. लेखक म्हणून हेच तर हवं असतं ना आपल्याला? लेखकाला आपलं किंवा आपल्याला आवडलेलं इतरांचं लेखन इतरांपर्यंत पोचावं असं वाटत असतं. त्यासाठी कथाकथन हा उत्तम मार्ग आहे असं मला वाटतं.

पूर्वी कथाकथनाचे कार्यक्रम होत असत. कॅसेटस निघत असत. आता समाजमाध्यमं  बदलली आहेत. काळानुसार बदलत  लोकापर्यंत पोचण्याचे मार्ग आपण शोधले पाहिजेत. किंबहुना कथा लोकांपर्यंत पोचवण्याचे मार्ग आता अधिक सुलभ झाले आहेत. ते वापरणं आपल्याच हातात आहे. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे storytel. भारतात storytel app ला छान प्रतिसाद मिळतोय. त्याद्ववारे अनेक पुस्तकं आपण आता ऐकू शकतो. podcast हा दुसरा मार्ग. यासाठी आपण पट्टीचे कथाकथनकार नसलो तरी ऑडॅसिटीसारखी अॲप्स वापरुन आपल्या आवाजाला चढ उतार देता येतात.  youtube आहेच. ही सारी माध्यमं अशी आहेत की बसल्या जागी मराठी भाषिकांपर्यंत तुम्ही जगाच्या कानाकोपर्‍यात पोचू शकता. लेखक एकत्र येऊन असे कार्यक्रम  प्रत्यक्ष किंवा यामार्गे सादर करु शकतात. अगदी घरगुती स्वरुपात कथाकथनाचे कार्यक्रम करता येतील. वाचनालयात कथाकथन करता येईल. कथा ऐकायला कुणालाही आवडतं. सादरकर्त्याला आपली कथा उत्तम प्रकारे लोकांसमोर पोचवण्यासाठी कथाकथन करणं शिकलं पाहिजे. यासाठी सध्याच्या माध्यमांचाच उपयोग कसा करायचा हे आव्हान लेखकांनी झेललं पाहिजे. व्यक्तीगतपातळीवर किंवा एकत्रितपणे!

मार्ग बदलले तर लेखकांना आणि कथाकथनाला दिवस चांगले येतील अशी आशा, अपेक्षा करुन मी थांबते. पुन्हा एकदा यानिमित्ताने कथाकथनाबद्दल विचार करायला आणि तुमच्यासमोर माझे विचार मांडायला संधी दिल्याबद्दल मोहन कुलकर्णी यांची मी आभारी आहे. धन्यवाद.

Tuesday, May 14, 2019

होरपळ बालमनांची


"तू बातमी ऐकली असशील म्हणून फोन केला." मैत्रिणीचा फोन आला तेव्हा मी गाडी चालवत होते.  रेडिओवरआमच्या गावातल्या, शार्लटमधील विद्यापीठातल्या गोळीबाराबद्दलची बातमी सुरु झाली आणि पोटात गोळाच आला.  तेवढ्यात मैत्रिणीचा फोन आला. तिची मुलगी तिथेच शिकायला आहे. ती सुखरुप असल्याचं कळलं आणि जीव भांड्यात पडला. आजूबाजूची, ओळखीच्यांची  मुलं तिथे शिकायला त्यामुळे नक्की काय झालं ते कळेपर्यंत, सर्वांची खुशाली कळेपर्यंत चैन पडणार नव्हतं. विद्यापीठाच्या आवारात जायला - यायला ताबडतोब बंदी घातली होती. बंदी उठेपर्यंत विद्यार्थीवर्ग आपापल्या वर्गात होता. घरी मुलांनी खुशालीचे  टेक्स्ट केल्यानंतर फोन बंद होते. एका धाडसी मुलाच्या कृतीमुळे या हल्ल्यात कमी जिवितहानी झाली. दोन जण जिवाला मुकले तर चारजण जखमी झाले. या दोनजणापैंकी एक होता रायली होवेल. रायली जिवाची पर्वा न करता मारेकर्‍यावर चालून गेला. स्वत:च्या जिवाचं मोल देत रायलीने मारेकर्‍याला जमिनीवर लोळवलं, तिथे असलेली इतर मुलं रायलीच्या मदतीला धावली. पडलेल्या मारेकर्‍याला त्यांनी धरुन ठेवलं. पण पडता पडता मारेकर्‍याने झाडलेल्या गोळीत रायली मृत्यूमुखी पडला. २१ वर्षाच्या रायली होवेलच्या कौतुकास्पद कामगिरीबद्दल बोलताना प्रत्येकाचेच डोळे भरुन येतात, शब्द अपुरे पडतात. पळा, लपा किंवा धैर्याने मारेकर्‍याचा सामना करा ही तीन सूत्र हिंसेला तोंड देण्याच्या प्रशिक्षणात मनावर बिंबवली जातात. यातील रायलीने निवडलेल्या पर्यायाचं त्याच्या आई - वडिलांना आश्चर्य वाटत नाही तसंच त्याला ओळखणार्‍या सर्वांनाच.  त्याच्या कामगिरीचा सन्मान करण्यासाठी सरकारनेही उचित पाऊल उचललं. सरकारी इतमामात गावी परतलेल्या रायलीच्या पार्थिवाची वाट पाहत नागरिक दोन तास  साश्रू नयनांनी उभे होते. 


अमेरिकेन जनतेपुढील ही समस्या गावागावात प्रत्येक घराच्या दारासमोर उभी आहे. आपल्या गावात, शाळेत असा प्रकार होणार नाही हा निव्वळ भ्रम राहिलेला आहे. UNCC मधील घडलेल्या घटनेआधी काही महिने आधी माझ्या मुलीच्या शाळेतला हा प्रसंग. ७ वीत शिकणार्‍या एका भारतीय विद्यार्थ्याने वर्गातल्या बाकावर लिहिलं. "I’ll get the guns by Thursday. Pitch in $200 for 5 Swisses." मुलांनी खोटं बोलणं, मारामारी करणं, इतरांना चिडवणं, वर्गातल्या बाकांवर, भिंतींवर मुलामुलींची नावं लिहिणं एवढीच मजल या वयात मुलं गाठतात असं गृहीत धरणं कालबाह्य झाल्यासारखं ही वाक्य वाचताना वाटलं होतं. या भारतीय विद्यार्थ्याने लिहिलेल्या या संदेशाचं  कुणीतरी छायाचित्र घेतलं आणि बातमी सर्वत्र पसरली. मुलाची चौकशी सुरू झाली. गंभीर स्वरूपाची हरकत असेल तर मुलांना तीन दिवस शाळेत यायला मनाई केली जाते पण त्याच दरम्यान  फ्लोरिडा राज्यातील  शाळेत घडलेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे या प्रसंगाचे पडसाद तीव्र होते त्यामुळेच परिणामही. मुख्याध्यापकांनी झालेल्या घटनेची पोलिसांकडून चौकशी होऊन जास्तीत जास्त शिक्षा सुनावली जाईल याची ग्वाही दिली. त्याचाच परिणाम म्हणून ३ दिवस शाळेत न येण्याच्या शिक्षेवर न थांबता या मुलाला सुधारणागृहात दाखल केलं गेलं. या मुलाची पुढची शैक्षणिक प्रगती गोठल्यासारखीच आहे.  सुधारगृहाचा ठप्पा लागल्यावर त्याच्याकडे पाहण्याची दृष्टी बदलली जाणार, त्याला मिळणारी वागणूक बदलणार, महाविद्यालयीन प्रवेश ही तर पार पुढची गोष्ट झाली. ही आम्ही जवळून पाहिलेली घटना. अशावेळेस  पालकांना मन घट्ट करुन अशी परिस्थिती उद्भवली  तर काय करायचं यावर मुलांशी बोलावं लागतं. मुलांच्या डोळ्यातले, मनातले प्रश्न वाचताना आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देताना नको वाटतं, जीव तुटतो.   कुणी कुणाचा जीव कसं घेऊ शकतं या निरागस प्रश्नाला उत्तर देताना या  कोवळ्या मनांना, अजाण मुलांना आपण अकाली  प्रौढत्वाकडे वळवतोय ही जाणिव वेदनादायी असते. पण या काळाचं हे वास्तव आहे. अशा घटना आणि मुलांवर होणारी कारवाई याचं प्रमाण शाळांतून खूप मोठं आहे. दुर्देवी घटनांची नक्कल मुलांना का करावीशी वाटत असेल? मुलं माध्यमातून या गोष्टी पाहत असतात, ऐकत असतात त्याचा नकळत मनावर परिणाम होत असावा का? असंच आपणही करावं असं वाटत असेल का?  शाळांना सातत्याने घडणार्‍या अशा घटनांमुळे यावर कडक कारवाई करणं भागच आहे . पण विद्यार्थ्यांना गंमत म्हणून केलेल्या उद्योगाच्या परिणामाची कल्पना तरी असेल का?  अशा घटना घडल्या की मन विषण्ण होतं. नानाविध उपायांची चर्चा होते. शिक्षकांच्या हातात बंदूका सोपवायला हव्यात या अंतिम निष्कर्षालाही बर्‍यांचदा खूपजणं  येतात.  पण शिक्षकांनी शिकवायचं की बंदूक चालवायला शिकून मुलांच्या सुरक्षिततेचीही काळजी करायची हा प्रश्नही त्याबरोबर येतोच.

मुळात मुलांच्या हातात बंदुका येतातच कशा हा सर्वसामान्य लोकांना पडणारा प्रश्न. कायद्याने वयाच्या १८ व्या वर्षांपर्यंत बंदूक विकत घेता येत नाही. आता तर काही राज्यात २१ ही वयोमर्यादा झाली  आहे पण यातून पळवाटा आहेतच. सर्वेक्षणातून जवळजवळ ६०% विद्यार्थ्यांनी बंदूक पाहिजे असेल तर सहज मिळू शकते अशी कबुली दिली आहे. बर्‍यांचदा घरातील मोठ्या माणसाची बंदूक मुलांच्या हातात पडते.  कधी हातात आलेल्या बंदुकीचा सहज वापर केला जातो. कधी मानसिक विकृतीमुळे बंदूक वापरली जाते तर काही वेळेला केवळ बढाई मारण्यासाठी शाळेत मुलं बंदूक आणतात. बर्‍याचदा आधीच कुणाच्यातरी लक्षात येतं आणि त्यांच्या हातातील बंदूक काढून घेतली जाते. कारवाई होते. पण जेव्हा असं होत नाही तेव्हा कितीतरी निष्पाप कळ्या उमलण्याआधीच संपतात. अंदाधुंद गोळीबार करुन ही मुलं काय साध्य करतात हा जसा प्रश्न आहे तसंच पूर्वी झालेल्या गोळीबारांचा पद्धतशीर अभ्यास करुन हिंसेची तीव्रता कशी वाढेल याचं व्यवस्थित नियोजन करण्याची  मुलांची मानसिकता चिंताजनक आहे. २००७ साली व्हर्जिनिया पॉलीटेक्निक मध्ये झालेल्या गोळीबारात ३२ मुलं आणि त्यांचे काही शिक्षक मारले गेले. या मुलाने आधीच्या गोळीबाराचा सखोल अभ्यास केला होता आणि अधिक मुलांचे बळी जाण्यात ती मुलं कुठे कमी पडली हे पाहून त्याप्रमाणे नियोजन करण्याची काळजी घेतली होती.

२०१२ साली सॅंडीहूक  प्राथमिक शाळेतली २० चिमुरडी मुलं आणि ६ शिक्षक अशाच गोळीबाराला हकनाक बळी पडले. पण यावेळेस जे झालं ते केवळ पुरेशी काळजी घेऊनही नविन आणि त्यादिवशी वर्गावर असलेल्या बदली शिक्षिकेला याबद्दल माहिती नसल्याने कारण जशी गोळीबाराची संख्या वाढली आहे त्याप्रमाणेच अशा परिस्थितीत काय पावलं उचलायला हवीत त्यासाठी केल्या जाणार्‍या प्रयत्नांचीही. याही शाळेत प्रशिक्षण दिलं होतंच. पण ज्या वर्गातील मुलं बळी पडली त्यातील एका वर्गात  शिक्षिका नविन होती. काहीतरी विपरीत घडतंय ही सूचना मिळताच तिने वर्गाचं दार  लावण्याऐवजी प्रथम  मुलांना बाकड्याखाली लपवलं. त्यानंतर दार बंद करायला ती गेली तोपर्यंत बंदूकधारी मुलाने दार उघडलं. मुलं कुठे आहेत या त्याच्या प्रश्नावर तिने वर्गात कुणी नाही हे उत्तर दिलं. त्या मुलाने तिच्यावर  गोळी झाडली आणि लपलेल्या चिमुरड्यांचा भयाने थरकाप उडाला.  मुलं सैरभैर झाल्यासारखी धावली. आणि बंदूकधारी मुलाने अंदाधुंद गोळीबार केला. काही मुलांचा जीव वाचला काहींनी जीव गमावला.  दुसर्‍या वर्गात फक्त त्यादिवशी शिकवण्यासाठी आलेली शिक्षिका होती. दुर्देवाने तिच्याकडे दाराला कुलूप लावण्यासाठी किल्ली नव्हती. प्रशिक्षणातील सर्व बाबी योग्यं तर्‍हेने अमलात आणल्यामुळे इतर वर्गातील मुलं सुरक्षित राहिली आणि या दोन वर्गातील बहुतेक मुलांचा अंत झाला.

अशा घटना आता दैनदिन जीवनाच्या घटक होऊ लागल्या आहेत पण याची सुरुवात झाली ती २० एप्रिल  १९९९ साली  कोलोरॅडो राज्यातील लिटीलटन कोलंबाईन हायस्कूल मध्ये दोन तरुणांनी अंदाधुंद केलेल्या गोळीबारात १३ मुलं मारली गेली तर ३० हून अधिक जखमी झाली तिथून. या नंतर अनेक राज्यात शाळांना अशा प्रसंगांना सामोरं जायला लागलं आहे, लागत आहे. जिथे जिथे जिवितहानीचं प्रमाण जास्त आहे त्या घटनांची माहिती माध्यमातून लोकांपर्यंत पोचली, त्याची चर्चा होत राहिली. आत्तापर्यंत ७००० हून अधिक मुलं यात बळी पडली आहेत. यावर उपाय शोधण्याचे अथक प्रयत्न चालूच आहेत. बंदुकांवर नियंत्रण आणणं हा महत्वाचा उपाय NRA नॅशनल रायफल असोसिएशनच्या  वर्चस्वामुळे आणि त्यात गुंतलेल्या सर्वांच्या हितसंबंधामुळे  दरवेळी मोडीत निघतो. पोटचे जीव गमावल्यावर पालक पेटून उठतात, कायद्यात बदल करण्यासाठी धडपडतात. त्यांना सर्वसामान्य साथ द्यायचा प्रयत्न करतात. यात भर पडली आहे विद्यार्थ्यांची.  मुलंही आता जाब विचारायला लागली आहेत, विरोधाची पावलं उचलत आपला आवाज मोठ्यापर्यंत पोचवण्याचा  प्रयत्न करत आहेत. त्याचं उदाहरण म्हणजे, March of Our Lives. गेल्यावर्षी विद्यार्थ्यांनीच सुरु केलेली ही संघटना त्यांच्या पिढीला ज्या असुरक्षिततेला तोंड द्यावं लागतंय ते बदलण्याचा निश्चय करुन प्रयत्न करत आहे. मागच्यावर्षी फ्लोरिडा राज्यातील डग्लस शाळेत घडलेल्या दुर्देवी घटनेतून या लढ्याची सुरुवात झाली आहे.   सरकारने या समस्येवर पावलं उचलावीत यासाठी विद्यार्थी जिवाचं रान करत आहेत.  शस्त्र नियंत्रण कायद्यात बदल आणि शस्त्र विक्री अगोदर त्या व्यक्तीची पूर्ण चौकशी. या दोन मुख्य मागण्या पुर्‍या होत नाहीत तोपर्यंत ही चळवळ चालूच ठेवण्याचा विद्यार्थ्यांचा निर्धार आहे March of Our Lives ची अलिकडची  चित्रफित हृदयद्रावक  आहे. या चित्रफितीत एका कार्यालयात गोळीबाराला तोंड कसं द्यायचं त्याचं प्रशिक्षण सुरु होताना दाखवलं आहे.  प्रशिक्षणासाठी तज्ज्ञ म्हणून निमंत्रित केलेली व्यक्ती पाहून कर्मचार्‍यांना जसा धक्का बसतो तसाच चित्रफित पाहणार्‍यालाही. ती तज्ज्ञ व्यक्ती आहे, शाळकरी मुलगी!   ही छोटी मुलगी प्रौढांना गोळीबाराला तोंड द्यायला काय करायचं ते  सांगताना दाखविली आहे.  शेवट होतो त्या मुलीच्या शिक्षिकेने सांगितलेल्या खालील ओळींनी.

"Lockdown, lockdown let's all hide,

Lock the doors and stay inside,

Crouch on down, don't make a sound,

And don't cry or you'll be found."

जनरेशन लॉकडाऊन असं या चित्रफितीचं नाव आहे.


अमेरिकन शालेय जीवनात, अभ्यास आणि विविध विषयांचं ज्ञानार्जन  हा जसा अविभाज्य भाग आहे तसं हिंसेला तोंड देण्याचं प्रशिक्षण हा विषयही आता अनिवार्य झाला आहे. चुकीच्या हातांमध्ये बंदूक पडू नये याबाबात कायदा करण्याऐवजी राजकारणी मुलांना प्रशिक्षण मिळत आहे यातच समाधान मानत आहेत. बाह्य घटकांकडे बोट दाखवताना जी मुलं या मार्गावर पाऊल टाकतात त्यांचे पालक मुलांची मनं ओळखायला कमी पडत आहेत ते का,  त्या मुलांचे शिक्षक, मित्रमैत्रिणी यांनाही अशा मुलांच्या मनांचा थांगपत्ता लागत नाही तो का याकडेही लक्ष देणं भाग आहे. या समस्येवर  नक्की उपाय काय हे काळच ठरवेल पण तोपर्यंत किती बालमनं यात होरपळून निघणार, किती आपल्या जीवाला मुकणार हाही प्रश्न अनुत्तरीतच राहणार!