Sunday, June 23, 2013

बस थांबा

"आई, पट्टा काढू?"
"काढ."
"पण पोलिस आला तर?"
"मग नको काढू."
"पण मला काढायचा आहे."
"कर बाई तुला काय करायचं असेल ते." नेहमीप्रमाणे संभाषणाच अंत.
मी गाडी बसथांब्याजवळच्या सायकल लेनमध्ये थांबवली होती. बसथांब्यावरुन लेकाला आणायचं होतं. जवळपास गाडी थांबवायला जागा नव्हती त्यामुळे हा पर्याय. पण खात्री नव्हती असं थांबवणं कायदेशीर आहे की नाही, तितक्यात.
"आई, पण पोलिसानी पकडलं तर?"  लेक पट्ट्याबद्दल विचार करत होती, मी चुकीच्या जागी  गाडी थांबवली आहे त्याचा.
"बघू. खोटं बोलावं लागेल."
"पण तसं करायचं नसतं, खरं सांगितलं तर  देतील तुला सोडून. तू मला तसंच सांगतेस ना की खरं सांग, मी ओरडणार नाही."
वास्तवात आयुष्य इतकं सरळ नाही वगैरे सांगत बसले असते तर दोन तासांची निश्चिंती. पुन्हा लेकीसमोर नाईलाजाने का होईना पण कधी कधी खोटं का बोलावं लागतं याचे धडे देणं म्हणजे जरा अतिच. तरीही घोडं दामटवत म्हटलं,
"ते नंतर बोलू. फक्त वेळ आलीच तर त्याच्यांसमोर तू खोटं का सांगते आहेस असं म्हणू नकोस."

नाराजीने तिने हुंकार भरला. या सगळ्या यातायातीपेक्षा कुठेतरी लांबवर नेऊन थांबवावी असा विचार करते आहे तोच बाजूला गाडी उभी राहिली. कोण थांबलं अगदी असं चिकटून म्हणून पहाते तोच गाडीवर रंगीबेरंगी दिवे चमकायला लागले आणि माझ्या डोळ्यांसमोर काजवे. आता दोनसे अडिचशे डॉलर्सचा भुर्दंड, घरी नवरा त्याला पोलिसांनी गाठल्यावर मी केलेल्या सरबत्तीचा सूड घेणार, मुलगी, तरी आईला मी म्हणतच होते.... सुरु करणार आणि मी, त्यावेळेस काय केलं असतं तर बरं झालं असतं असं म्हणत सगळ्यांची डोकी काही दिवस खाणार.  सगळ्या विचारांनी एकाच वेळी डोक्यात गर्दी केली. खरं तर त्या रंगीबेरंगी दिव्यांकडे मस्त पाहत बसावसं वाटतं एरवी, म्हणजे ते दुसर्‍यांचा पाठलाग करत असतात तेव्हा, पण आत्ता नुसते अंगावर धावून येत होते. सगळे विचार मनात खोलवर दडपून खिडकीतून बाजूच्या खिडकीत पाहिलं. चेहर्‍यावरची घाबरगुंडी गॉगलमुळे लपली असावी.
"गाडी बंद पडली आहे का?"
"नाही नाही." काय कारण द्यावं या विचारात मी फक्त एकाचवेळी तोंडाने आणि मानेने नाही नाही करत राहिले.
"मग काय झालं आहे?" पोलिस नावाच्या बागुलबुवांनी शांतपणे विचारलं.
आधी ते दिवे बंद करा ना असं म्हणावसं वाटत होतं. पोटात गोळा आला आहे भितीने असं सांगावसं वाटत होतं त्याऐवजी शब्द   बाहेर पडले,
"पायात एकदम गोळा आला म्हणून थांबले आहे दोन मिनिटं." असं कसं सुचलं अचानक? मला खोटं बोलायला जमलं या आनंदात माझा चेहरा घरातल्यांचा पचका झाल्यावर खुलतो त्यापेक्षा कितीतरीपटीने खुलला. खोटं पचलं तर आणखी तो आणखी खुलणार हे निश्चित, मग कदाचित त्या चमचमत्या दिव्यांपेक्षा माझाच चेहरा चम चम चमकणार... एकदम काळजी वाटली. म्हटलं, मग पायात गोळा आला आहे असं वाटणारच नाही पोलिसमहाशयांना. केविलवाणा चेहरा करत पाय बाहेरुन दिसत नसला तरी हलवून, आई गं, ओ, अं, ऊ...असे वेगवेगळे आवाज काढत कण्हत राहिले. पोलिसांनाही तशी घाई नसावी. शांतपणे  पूर्ण शब्द कधी बाहेर येतात याची वाट पहात ते बसून.
"मी दोन मिनिटं थांबते इथेच."  आता कण्हणं पुरे असं वाटल्यावर चेहर्‍यावर पृथ्वीवरचं सगळं दु:ख एकवटलं.
"बरं बरं. कितीही वेळ थांबा. पायात गोळा ठेवून गाडी चालवू नका."  चमचमणारे दिवे मालवून पोलिस महाशय मार्गाला लागले.

"आई, माझा श्वास थांबला."
"काय?...." थरथरणारे हात, पाय  स्थिर करत घाबरुन मागे बघितलं.
"पोलिस बघून. आणि ते काका तुला घेऊन गेले तर म्हणून."
लेकिचा श्वासच थांबल्याने मी खोटं बोलले ते तिच्या लक्षात आलं नव्हतं. नाहीतर इथे भूमिका उलट्या होऊन अर्धा तास खोटं का बोलू नये ह्याचे धडे आईला लेकिकडून. ते टळलं या विलक्षण आनंदाने मी गाडी भरधाव सोडली.  एखाद्या अतिमहत्वाच्या व्यक्तीला जायला जागा देतात त्याप्रमाणे रस्त्यावर माझी एकट्याचीच गाडी आहे असं वाटत होतं, कसले आवाज नाहीत, आजूबाजूला कुणी नाही. शांतता एकदम. दोनशे डॉलर्स वाचले, खोटं पचलं, लेकिला  खोटं बोलले हे कळलं नाही...  आनंद नुसता मनात उसळी मारत होता.

 घरी पोचले आणि लक्षात आलं. मी लेकाला आणायला तिथे गेले होते. गाडीत तो नव्हताच. पुन्हा गाडी वळवली. परत जाताना मात्र या वेळेला सुटले पण मागच्यावेळेस एकदा (नव्हे दोनदा) पोलिसांनी कसं पकडलंच ते आठवत राहिलं.

Tuesday, June 11, 2013

प्रश्न आणि प्रश्न!

"आता तू कधी येणार भारतात?" भारतात परत जाण्यासाठी निघताना बहिणीने विचारलं
"पाहू, तशी ओढ नाही राहिली आता. आई, भाऊच (वडिल) नाहीत ना." दोघींही एकमेकींच्या भावना समजल्यासारख्या गप्प झालो. उगीचच, आपण बहिणी आहोतच एकमेकींना असलं काही  ती म्हणाली नाही किंवा आता तुम्ही दोघी बहिणी आहात, तुमच्यासाठी येईन असं मी तोंडदेखलं म्हटलं नाही. आई वडिल गेले की इतकं पोरकेपण येतं हे ते गेल्यानंतरच कळावं यासारखं माणसाचं दुर्देव नाही हेच खरं.

बहीणीने विचारला तोच प्रश्न तसा खूप जणं फोनवर विचारतात, आम्ही आहोत ना चा दिलासा देतात. मावश्या, काका, मावस, आते भावडं सगळेच. आई वडिलांनी सगळी नाती जपली, त्याचांच वारसा आम्ही राखला याचा कोण अभिमान आम्हाला. आणि तरीही भारतात केव्हा येणार म्हटलं की ती दोघं नाहीत म्हणून जाऊच नये असं वाटतं तेव्हा दाटून येतो उदासपणा, नैराश्य.

भारताची वारी करुन एखादं वर्ष झालं की पुन्हा तिकडे जायचे वेध लागायचे यापूर्वी. शेवटी भारत मायभूमी आहे, सगळे तिकडेच तर आहेत, इतक्या वर्षानंतर सासर, माहेर असं वेगळं उरतच नाही. हे जे सगळं म्हटलेलं, वाटलेलं, अनुभवलेलं.... विरुन गेलं क्षणात? कुठे गेल्या या भावना का त्या खर्‍या नव्हत्याच? खरंच एखाद्या गोष्टीचं समीकरण बदलून जातं असं कायमचं?

प्रश्न आणि प्रश्न!