Tuesday, January 22, 2013

मुलांना घरातील कामाचे पैसे...?

सगळ्या मैत्रींणी जमलो होतो. मुलांवरुन बोलताना एकजण म्हणाली,
"मी मुलांना प्रत्येक कामाचे पैसे देते. थोड्या पैशात किती कामं होतात."
"म्हणजे किती आणि कोणती कामं?" माझं कुतुहुल जागृत झालं.
"डिशवॉशरमधली भांडी लावली की ५० सेंट, केर नेऊन टाकला की २५ सेंट, स्वत:ची खोली आवरली की ७५सेंट अशी छोटी छोटी किती कामं असतात  घरात."
पहिला विचार मनात तरळला तो सुट्टे पैसे खूप ठेवायला लागत असतील मग :-) हा. नंतर हेवा वाटला तो स्वत:ची खोली आवरल्याबद्दल पैसे मिळतात  पठ्ठ्यांना याचा आणि  शेवटी प्रश्न पडला की त्या पैशाचं तिसरी चौथीतली ही मुलं करणार काय? एकदा का पैसे हातात आले की त्यांना काय पाहिजे ते घेणासाठी ती हट्ट करणारंच. त्यावर ती म्हणाली.
"हो ना, दुकानात गेलो की  गोळ्या, नाहीतर बबलगम घेतात मुलं त्या पैशातून."
"कष्ट करुन मिळवलेल्या पैशांनी हे घ्यायचं म्हणजे तू चुकीची सवय लावतेयस असं नाही वाटत?"
"नाही. गोळ्या, बबलगम रोज खाणं बरोबर नाही हे तर माहितच आहे त्यांना. हळूहळू पैसे अशा गोष्टींवर खर्च करु नयेत हे ही कळेल."
"मग ती पण तुला पैसे देतात?"
"कसले?"
"तू जेवण करतेस रोज त्याच्यांसाठी, शाळेसाठी डबा देतेस, गाडीने इकडे तिकडे नेतेस.... खूप मोठी यादी होईल."

 मैत्रीणीचं म्हणणं आपली कामं होत असतील तर या गोष्टीचा बाऊ करण्यात अर्थ नाही. पैसे देऊन आपण त्यांना स्वावलंबन शिकवतो, ते कसे वापरायला हवेत याचं शिक्षण देतो.

माझं म्हणणं, ही जी कामं आहेत ती मुलांनी घर त्याचंही आहे या भावनेतूनच, स्वत:ची कामं स्वत:च करायला हवीत या जाणीवेतून किंवा आई, बाबांना मदत म्हणून करायला हवीत, पैसे मिळतात म्हणून नाही. आणि ती भावना पालक म्हणून आपणच त्यांच्या मनात रुजवली पाहिजे. तुम्हाला काय वाटतं?

Monday, January 14, 2013

फेसबुक हे असं...

फॅमिली डॉक्टरकडे गेले होते,  सगळ्या फॅमिलीला घेऊन. निघताना, गाव सोडतोय म्हटल्यावर डॉक्टर म्हणाल्या,
"कीप इन टच"
"तुम्ही फेसबुकवर आहात का?" संपर्कात रहायचं तर तेच प्रभावी साधन आहे  हा त्यामागे माझा विचार.
डाव्या, उजव्या हाताला असलेल्या दोन्ही मुलांच्या रागीट्ट नजरा टाळण्यासाठी डॉक्टरांवर दृष्टी केंद्रीत केली. नाही म्हणजे मुलीने  एकदा विचारलं होतं,
"आई, तू ऑफिसचं काम फेसबुकवर करतेस का?" आणि नवरा, मुलाचं  ठाम मत आहे की फेसबुकचं व्यसन आहे मला.
तर डॉक्टरांनी फेसबुक म्हणजे निव्वळ वेळखाऊ, रिकामटेकड्यासाठी कसं आहे ते सांगायला सुरुवात केली. मी आपलं,
या, या...राईट....यस, यस....पण आम्ही पण कामधंदे करुनच फेसबुक वापरतो, किंवा ते करता करता वापरतो....असे अस्फुट उदगार काढत किल्ला लढवायचा प्रयत्न केला. तो त्यांच्या आवाजापुढे, ठाम मतांपुढे पडला.

पण खरंच फेसबुक हे आयुर्विम्याला जसा पूर्वी पर्याय नव्हता तसंच आहे की नाही? जगातल्या सगळ्या बातम्या फेसबुकवर वाचता येतात. वर्तमानपत्रं त्यापुढे किस झाड की पत्ती. बातम्या वाचून कोपरखळ्याही मारता येतात. आवडलं आवडलं करत शेजार्‍या पाजार्‍यांच्या घरात घुसता येतं, त्यांच्या जगात, त्यांना आवडलेल्या कुणाच्याही घरात डोकावता येतं, म्हणजे परदेशात रहाताना भारतातला जो ’जिवंतपणा’ आपण ’मिस’ करत असतो तो बसल्या जागी एका उंदराच्या साथीने अनुभवता येतो. लोक एखादंच असं वाक्य टाकतात ’पोस्ट’ म्हणून की लहानपणी कोडं सोडवायला सरसावयचो तसं काय म्हणायचं असेल बरं या पोस्टमधून असं म्हणत कोडं सोडवण्याची मज्जा अनुभवता येते. राजकिय मतभेद वाचून  इतकी करमणूक होते की आपलं मत काय होतं तेच विसरायला होतं. आजारी पडलेल्याला हमखास उपाय सुचवता येतात, पाककृत्या कळतात.  कोण कुणाकडे कुणाबरोबर कधी गेलं होतं त्याचा सुगावा लागतो. एक ना अनेक किती गुण गावेत या फेसबुकचे?

थोडक्यात डोक्याला खूप खुराक देतं हे फेसबुक. आपलं व्यक्तिमत्वं अगदी चतुरस्त्र होऊन जातं...
फेसबुक हे असं, पूर्वी आयुर्विम्याला पर्याय नव्हता तसं...

Friday, January 4, 2013

सीमारेषा

महाविद्यालयीन जीवनाबद्दल गोष्टी चालल्या होत्या लेकाशी. त्याचं हे पहिलं वर्ष आमच्यापासून दूर रहाण्याचं.
"मुलं दारु, सिगरेट पितात/ओढतात का तिकडे?" दोन तीन महिने मनात असलेला प्रश्न चाचपडल्यासारखा बाहेर आला. तो हसला अवघडल्यासारखा. पुढच्या प्रश्नाची कल्पना त्याला आधीच आली असावी.
"हो."
"सर्रास?"
"ते मला नाही माहित."
"हं"
" मी पण असतो का त्यात असं विचारायचं आहे ना तुला? मग विचार ना तेच."
मी हसून म्हटलं,
"एकदम तुझा पारा चढायला नको ना म्हणून साधारण चित्र काय आहे ते विचारावं असं वाटलं."
"क्वचित. म्हणजे एक दोनदा थोडीशी घेऊन बघितली आहे."
माझा चेहरा पाहण्यासारखा झाला.
"सिगरेट?" न रहावून विचारलंच
"अजिबात नाही."
माझी चुळबुळ, अस्वस्थपणा वाढला असावा.
"आई, मी प्रामाणिकपणे सांगतोय. सगळीच मुलं करतात हे पण आई वडिलांना खरं सांगत नाहीत."
"अच्छा" म्हणून मी ते संभाषण संपवलं.

एक दोन दिवस अस्वस्थतेत गेले. हे चांगलं नाही वगैरे उपदेश कसा करायचा किंवा करायचा की नाही या विचारात.
"मला एक समजत नाही की तुम्ही पालक दारु पिऊ नका, लग्नाशिवाय शारिरिक संबंध येता कामा नयेत असा धोशा लावता पण मुलांना मोह टाळता आलाच नाही तर त्यांनी काय करायचं ते सांगत नाही."
"म्हणजे?"
"पिण्याचे परिणाम काय काय होऊ शकतात, एकावेळी कमीत कमी म्हणजे नक्की किती घ्यावी, सवयीचं व्यसनात रुपांतर कसं होऊ शकतं, ते झालं तर त्याचे शरिरावर होणारे परिणाम. किंवा गाडी चालवू नका, जो गाडी चालवणार असेल तो दारु पिणार नाही याची दक्षता घ्या, शारिरिक संबंधाबद्दल काळजी घेतली नाही तर काय होऊ शकतं. त्यातून निर्माण होणारे रोग अशा कितीतरी गोष्टी तुम्ही सांगत नाही. आम्हाला महाविद्यालयात ही माहिती देण्यासाठी खास तास आणि परिक्षा असते."
मी फक्त ऐकत होते. महाविद्यालयांची जागरुकता आवडली याबाबतची.
"तू काळजी करु नकोस. मला हे असं करायला वेळच मिळत नाही."
"तू म्हणतोस ते खरं आहे. पण तू आत्ता सांगितलंस तसं करणं म्हणजे पालकांना, आपण अशी माहिती देऊन मुलांना उत्तेजन तर देत नाही ना असंही वाटतं."
"पण नुसतं दारु पिऊ नका, मादक पदार्थांच्या आहारी जाऊ नका असं सांगून तरी काय उपयोग? का ते माहित असलं की मुलं जास्त विचार करतील ना या गोष्टी करताना?"

मी काही बोलले नाही. मुलांशी बोलताना मित्रमैत्रीण व्हावं पण त्याचवेळी पालक म्हणून त्यांनी आपल्याला आदर दाखवावा ही जी आपली अपेक्षा असते त्यातली सीमारेषा इतकी धुसर आहे की ती केव्हाही भंग पावेल असं वाटतं खूपवेळा.

Thursday, January 3, 2013

बदल

महाविद्यालयीन काळात  तावातावाने मारलेल्या गप्पा, मांडलेले विचार आणि त्यातून निर्माण झालेली ही कविता. कविता 'पाडण्याचा' छंद होता त्या काळातली. आज कित्येक वर्ष उलटली तरी सगळं जैसे थे च आहे असं वाटायला लावणारी.

तुम्हाला खोटं वाटेल
पण हल्ली सारं जगच बदललंय
सगळं कसं छान, छान होत चाललंय
माणूस माणसाप्रमाणे वागतोय
देश उन्नतीकडे झेपावतोय!
माणुसकीचाही पूर आलाय
सार्‍या देशाचा नूरच बदललाय
आदर्शवाद अस्तित्वात आलाय
बलात्कार, खून, भ्रष्टाचार हे शब्दच
मुळी नष्ट झाले आहेत
मी म्हटलं ना,
तुम्हाला हे खोटं वाटेल
तसंच झालंय,
समोरचा  माणूस 
विचित्र नजरेने पाहतोय,
कुणापाशी तरी कुजबुतोय
ही वेडी अशीच फिरत असते
अक्रीतासारखं बडबडत राहते!