Friday, October 24, 2014

शोध

(’मायबोली’ च्या दिवाळी अंकासाठी लिहिलेली कथा )

बस सोल्ल्याच्या फाट्यावर थांबली. घाईघाईत सुयशने रहस्यकथेचं पुस्तक सॅकमध्ये ठेवलं. निखिल, त्याचा मामेभाऊ त्याला घ्यायला आला होता.
"आयला तू अगदी हीरोच दिसतोस."
"म्हणजे कसा?" सुयशने केसाची झुलपं उडवित विचारलं.
"ए, लगेच भाव खाऊ नकोस. चल आता."
"कसं जायचं?" सॅक पाठीवर अडकवून सुयश तयार होता.
"चालत. अर्ध्या तासात पोचू."
"ठीक आहे. चल ना मग." दोघं लांब लांब ढांगा टाकत चालायला लागले.
"मागच्यावेळेस आलो होतो तेव्हा चौथीत होतो. वेगळंच वाटतं आहे गाव आता."
"अरे गाव काय बदलणार. आता तू मोठा झालास त्यामुळे वाटत असेल तसं." निखिल हसत म्हणाला.
"तू कबूल केलं आहेस फोनवर. लक्षात आहे ना?" सुयशने खात्री करण्यासाठी विचारलं.
"आहे की. आता आहेस ना आठ दहा दिवस मग दाखवतोच."
"दाखव. उगाचच काहीही थापा मारत असतोस."
"पैज लावू या? मग चड्डी पिवळी करू नकोस." सुयश जोरात हसला.
"तू अगदी मामासारखा बोलतोस. घाणेरडा आहेस. पण खरंच  असलं काही नसतं यार." सुयशला निखिलचं म्हणणं पटतच नव्हतं.
"तुला पुरावाच पाहिजे ना? आज रात्री जागायची तयारी ठेव."
"चालेल. दाखवच तू मला." थोडावेळ दोघं न बोलता रस्ता तुडवत राहिले. तांबड्या मातीच्या त्या रस्त्यावर चिटपाखरूही नव्हतं. एका बाजूला डोंगर दुसर्‍या बाजूला खळाळणारी तारी नदी.
"तुला ते सावे काका आठवतात का?"
"सावे काका? कोण हे?"
"आहेत. विसरलास तू. त्यांनी या रस्त्यावर मला ते, तसं दाखवलं होतं."
"ते, तसं?"
"भूत रे."
"रस्त्यावर भूत?"
"हो. म्हणाले पहायचं आहे ना. दाखवतोच. मग घाबरायचं नाही. घाबरलो होतो पण म्हटलं बघू तर."
"मग?"
"मग काय? अरे, दिवसा उजेडी एकदम अंधार झाला. डोळे ताणून ताणूनही काही दिसत नव्हतं. त्यातच कुणाच्या तरी किंकाळ्या, आरडाओरडा, कुणीतरी जोराजोराने हाका मारत होतं पण कुणाला ते काही केल्या कळत नव्हतं.  मागे पुढे नुसती माणसंच माणसं आहेत, घेराव घातलाय सगळ्यांनी असं वाटायला लागलं."
"खरंच? घाबरलास तू?"
"हो. सावेकाकापण दिसेनासे झाले. मग ओरडायला लागलो. बेंबीच्या देठापासून ओरडलो. तर एकदम प्रकाश. बाजूला काका. नुसतेच हसत होते. एकदम शांत."
"हीप्नोटाइज केलं असेल त्यांनी तुला."
"नाही. भूतच होती ती."
"अरे कसं शक्य आहे. कुणीही बनवतं तुला यार."
दोघांचा वाद रंगला तो घराजवळचा वहाळ  येईपर्यंत. पाण्याने पार तळ गाठला होता. दगडांवरून उड्या मारता मारता सुयशने जोरात विचारलं.
"आज रात्रीचं पक्कं ना?"
"एकदम. सगळीकडे निजानीज झाली तरी आपण बसून रहायचं पडवीत. रात्री बारानंतर बघच तू..."
"ठरलं तर." बोलता बोलता ते घरी पोचलेच.  दिवसभर मामा, मामीने सुयशचा ताबा घेतला. मामा सर्वांची ख्यालीखुशाली विचारत राहिला. मागच्या वेळेस तो आला तेव्हाच्या आठवणी रंगात आल्या. गोठ्यात बांधलेल्या गायी, परसातला भाजीपाला, मागचं भाताचं शेत इकडून तिकडे तो नुसता हुंदडत राहिला ते रात्रीचं जेवण होईपर्यंत.


"ए, बोअर झालो यार. किती वेळ बसायचं असं?" सुयशला कंटाळा यायला लागला, थोडीशी भितीही वाटायला लागली होती. आजूबाजूला गुडुप अंधार. कुठेतरी लांबवर एखादा मिणमिणता दिवा, मध्येच कुत्र्याचं केकाटणं,  अंगणात अचानक अवतरलेला सैरावरा धावणारा उंदीर, घरासमोर अक्राळविक्राळ फांद्या विस्तारुन उभी राहिलेली झाडं, रातकिड्यांची किरकिर...... त्या भयाण वातावरणात काही बोललं तरी आवाज उगाचच घोगरा व्हायला लागला.
"झोपा रे आता. किती वेळ बसणार आहात?" काळोखात माजघरात झोपलेल्या मामाचा आवाज एकदम घुमला. दोघंही दचकलेच. निखिलने बसल्या बसल्या मागे वळून पाहिलं.
"तुम्ही झोपा बाबा. आम्ही बसलोय इथे."
"दार घे ओढून पूर्ण."
निखिलने दार पूर्ण ओढलं. आता  दोघांनाही भिती वाटायला लागली.
"चल रे. आपण झोपू या." सुयश कुजबुजला.
"नको रे. आता दिसतीलच बघ दिवे." निखिल उठायला तयार नव्हता.  दोघांची नजर सारखी  दृष्टी पडेल तिथे दिसणार्‍या उंच, अक्राळ विक्राळ वाढलेल्या झाडांकडे जात होती, त्यातून  चेहर्‍यांचे चित्र विचित्र आकार, माणसांच्या आकृत्या असं काही बाही प्रकट व्हायला लागलं होतं.
"तो बघ, तो बघ. एक दिवा गेला." निखिल कुजबुजला. सुयशने मान उंच करून पहायचा प्रयत्न केला.
"काजवा असेल."
"अजून एक. आता आणखी दोन. बघ, बघ." निखिलने केलेल्या बोटाच्या दिशेने सुयश पहात राहिला. डोळे ताणून दूरवर दिसणार्‍या त्या ज्वाळांकडे पहाताना पलित्यांखाली माणूस दिसतंय का ते पहाण्याचा तो आटोकाट प्रयत्न करत होता. आपसूक तो निखिलच्या जवळ सरकला.
"काय रे? फाटली का?"
"छ्या, पण कुणी पलिते धरले आहेत ते का दिसत नाही?"
"कारण ते अंधातरी आहेत."
"कायतरी पचकू नकोस. कुणीतरी धरलेले आहेत."
"दिसतंय का कुणी?"
"काळोख आहे म्हणून दिसत नाही."
"रात्रीचे बारा वाजून गेले आहेत. इतक्या रात्री माणसं काय करणार तिकडे?"
"तिकडेच रहात असतील."
"बावळट आहेस. कुणी रहात नाही तिकडे. उद्या दिवसा जाऊ आपण. तूच बघ."
"ते पलिते असे नाच केल्यासारखे का फिरतायत?"
"कारण भुतं नाचतायत. च्यायला, सांगत होतो ना  तुला की बरोब्बर बारा वाजले की हे असं सुरु होतं. आता दोन मिनिटात नाहीसं होईल."
"चल, जाऊन बघू या?" सुयशला एकदम चेव चढला.
"पोचायला अर्धा तास लागेल. त्याआधी ते बंद होईल. गावातल्या लोकांनी पण जाऊन बघितलं आहे. तिथे जाऊन बसलं तर काय पण होत नाही. लांबूनच पहायला मिळतं. पण तुला ती जागाच बघायची तर उद्या चक्कर मारु." निखिल म्हणाला.
"नाही. उद्या रात्रीच जाऊ. बारा वाजता." सुयश उठलाच तिथून. कसलं भूत आणि कसलं काय. फालतूपणा. त्याचा या पलित्यांवर अजिबात विश्वास बसला नव्हता.

"अरे, दोघं नका जाऊ बाबा तिकडे रात्रीचे."
"मामा, तू पण ना. भूत बीत असलं काही नसतं. मला काय वाटतं माहितीये का?" सगळ्यांच्या माना नकारार्थी माना हलल्या.
"यू. एफ. ओ. असेल."
"युएफो?" मामा गोंधळला.
"उडत्या तबकड्या म्हणतोय तो." निखिलने स्पष्टीकरण दिलं.
"उडत्या तबकड्या? सोल्ल्यात?" मामाला हसू आवरेना.
"मामा हसणं थांबव ना. आज कळेलच रात्री मग बघ."
"बरं बरं, मी पण येईन तुमच्याबरोबर सोबतीला. पण आधीच सांगतो आपण तिथे गेलो की काहीही दिसत नाही." मामाने विषय संपवलाच.

"आयला, अख्खं कोकण भुताखेतांनीच भरलेलं आहे असं वाटायला लागलं आहे."  सुयश शंकराच्या मंदिरात एकटाच जाऊन आला. परत आल्याआल्या निखिलला काय सांगू आणि काय नको असं होऊन गेलं त्याला.
"काय झालं?"
"देवळाकडे जाताना वाटेत तो उभा देव लागतो बघ. तिथून पुढे गेलं की देऊळ..."
"लेका, उभा जन्म इथे गेलाय माझा आणि तो उभा देव कुठे, देऊळ कुठे सांगायला लागला आहेस." निखिलला सुयशच्या बोलण्याचा रोख समजेना.
"ऐक ना. देवळात जाता जाता उभ्या देवाशी थांबलो. तिथे वरच्या बाजूला दगडावर एक पोरगा बसला होता. त्याने लै भारी गोष्ट सांगितली. म्हणजे देवळाच्या पलीकडे नदी आहे. नदीच्या बाजूने रस्ता जातो.  आडवाट आहे आणि तसा शुकशुकाटच असतो कायम त्या वाटेवर.  तिथून गेलं तर एक बाई आणि मुलगी  हटकून थांबवतेच कुणालाही. पत्ता विचारते खालच्या वाडीतल्या देशमुखांचा. तो पोरगा भेटला ना त्याचा मुंबईचा पाहुणा गेला होता, खरं आहे का त्याची खात्री करायला.  आणि दिसली की ती बाई आणि मुलगी त्यालाही. त्याने पत्ता सांगितला. गप्पा पण मारल्या.  ती  भूतं  नव्हती, माणसंच होती याची खात्री पटली त्याला.  सायकलवर बसला आणि निघाला गडी. मागे वळून बघायचं नाही असं सांगितलेलं ना म्हणून मुद्दाम मागे वळून पाहिलं. रस्ता ओसाड. बाई नाही, मुलगी नाही. नजर पोचेल तिथपर्यंत चिटपाखरुही नव्हतं. घाबरला. तर्हाट मारली सायकल. घरी आला आणि चार दिवस ताप."
"सगळ्या वाडीला ठाऊक आहे ही गोष्ट." निखिल थंडपणे म्हणाला.
"चल ना आपण जाऊ."
"तिन्हीसांजेलाच जावं लागतं. पाठवणार नाही कुणी आपल्याला घरातून."
"आता ते पलिते तरी कुठे दिसले. काहीही नसतं बाबा असलं."
"तुला आधीच सांगितलं होतं तिथे गेलं तर काही दिसत नाही म्हणून."
"बरं ठीक आहे. तू त्या रस्त्यावर येणार की नाही ते सांग."
"बाबांना विचारावं लागेल."
"सगळीकडे मामा कशाला? तो पोरगा म्हणालाय मी येईन पाहिजे तर."
"अरे त्याचं नाव सांग आधी."
"विसरलो रे. आज तू पण चल ना देवळात. असला तिथे तर भेटेल."
"बरं बघू. पण तुला ते तसलं तर घरातही बघता येईल."
"म्हणजे?"
"महापुरुषाची चक्कर असते घरातून."
"महापुरुष?"
"घराण्याचा मूळ पुरुष असतो तो."
"अच्छा."
"अमावास्येच्या दिवशी येऊन जातो."
"दिसतो?"
"नाही. पण रात्री लावलेली दाराची कडी उघडलेली असते. आणि वरच्या माळ्यावर झोपलास ना तर रात्री कुणी तरी उठवतं गदगदा हलवून."
"काय खतरनाक गोष्टी सांगता राव तुम्ही." सुयशला गंमत वाटायला लागली होती.
"अजून सांगतो ना पुढे." निखिलला चेव चढला.
"नको." सुयशने उडवून लावलं.

नंतरचे दोन दिवस सुयशबरोबर जाणं निखिलला जमलंच नाही. नारळ सोलायचे होते, शेजारच्या वाडीत पोचवायचे होते. फणस झाडावरून उतरवायचे होते.  सुयशने त्याच्याबरोबर थोडावेळ राहिला पण शंकराच्या मंदिराने त्याला वेड लावलं होतं. जाता जाता तो पोरगा भेटायचाच. त्याच्याशी गप्पा मारायच्या. देवळात पोचलं की मस्त पुस्तक वाचत बसायचं.  तिथल्या नीरव शांततेत रहस्यकथेच्या पुस्तकातलं वातावरण जिवंत झाल्यासारखं वाटायचं. त्याचा मग तो नित्यक्रमच होऊन गेला. म्हणता म्हणता सुट्टी संपलीही.  घरातल्या सगळ्यांचा निरोप घेऊन तो निघाला. निखिल त्याच्याबरोबर राजापूरपर्यंत येणार होता. सुयशला गाडीत बसवून, राजापूरची कामं आटपून निखिल सोल्ल्याला परतणार होता. सुयश गाडीत चढला. खिडकीच्या गजांना धरुन  निखिल त्याच्याशी बोलत राहिला.
"आता पुढच्या मे महिन्यात ना?"
"बघू, पण तुम्ही मुंबईला दिवाळीत याल ना?"
"येऊ की."
"आणि पुढच्या वेळेस भुतं दाखवली नाहीस तर मान्य करावं लागणार आहे तुला असलं काही नसतं म्हणून कळलं ना?" सुयशने एक वर्ष  वाढवून दिलं होतं निखिलला. दरम्यान त्यालाही जरा या विषयावर संशोधन करायला अवधी मिळणार होता.
"नक्की यार. बघ पुढच्या वेळेस तुझा नक्की विश्वास बसणार."
"ते शंकराचं देऊळ मात्र भारी आहे एकदम. जाम आवडलंय मला. आणि तो पोरगा. कायम वाटेवर कुठेतरी भेटायचाच. आयला, अरे त्याचा निरोप घ्यायचा राहिलाच. तू सांग त्याला भेटला की."
"तू नाव कुठे सांगितलं आहेस त्याचं."
"अरे हो, सांगितलंच नाही ना मी नाव त्याचं. अव्या."
"अव्या? अरे पूर्ण नाव सांग ना."
"अविनाश रे. अविनाश  चव्हाण."
"अविनाश चव्हाण?" डोळे फाडून  निखिल सुयशकडे पहात राहिला.
"अरे असा काय पहातोस? काय झालं?" सुयशला निखिल त्याच्याकडे असा का बघतोय ते समजेना.
"तू काय म्हणालास? त्या मुलाचं नाव काय सांगितलस?"
"काय पहिल्यांदा हे नाव ऐकतोयस का? अविनाऽऽश." खिडकीच्या दांड्यावर धरलेला निखिलचा हात एकदम बाजूला झाला.  हातापायातलं त्राणच गेलं त्याच्या.
"अरे, काय झालं? तू असा भूत बघितल्यासारखा काय करतोयस? तेच नाव सांगितलं त्याने." निखिलचा चेहरा पांढराफटक का पडलाय तेच सुयशला कळत नव्हतं.
"निखिल अरे, काय झालं तुला? पटकन बोल रे. गाडी चालू होतेय. बोल ना. अरे, बोल पटकन..." सुयशचं बोलणं संपेपर्यत गाडी चालू झालीच. निखिल जीवाच्या आकांताने गाडीच्या मागून धावला. सुयश खिडकीतून वळून वळून मागे पहात होता.  चिरक्या आवाजात निखिल ओरडला,
"सुयश, अरे अविनाश चव्हाण गेल्या वर्षी साप चावून वारला. तू भूत पाहिलंस सुयश. तू भूत पाहिलंस........"

Monday, October 13, 2014

चाळीशीतला साक्षात्कार :-)

चाळीशी उंबरठ्यावर (आहेत कुठे आता उंबरठे?) आली तेव्हा ’धडधड’ वाढली होती. तिथपर्यंत पोचणार्‍याला खरं तर स्वत:ला जाणीवच नसते पण आजूबाजूची तुम्हाला ते जाणवून देण्यात फार तत्पर असतात. पण आता कळतंय ही चाळीशी किती लाभदायक असते. खालील फायदे तुम्हीही घेतले असतील किंवा इतर फायदे असतील तर लिहायला विसरु नका. वाटचाल तिथपर्यंत व्हायची असेल तर फायद्याची नोंद घ्या 
• हल्ली अगदी विसरायलाच होतं बाई हा महामंत्र जपत कितीतरी कामं टाळता येतात.
• आज बाहेरच जायचं का जेवायला? जळ्ळी मेली ती चाळीशी, जीव अगदी नकोसा केलाय असं वारंवार म्हणता येतं.
• कोणता ना कोणता अवयव सतत दुखता ठेवून उंटावरुन शेळ्या हाकता येतात. सोफ्यावर बसल्या बसल्या घरातली सर्वजण मुकाट कामं करतायत (त्यांची कारणं वेगळी असतात) हे पहाण्यासाठी चाळीशीच गाठावी लागते.
• फडताळाचं (पॅन्ट्री) दार उघडलं की तिथपर्यंत का पोचलो ते आठवत नाही त्यामुळे आतल्या काहीतरी स्वादिष्ट वस्तूवर तिथेच ताव मारत आधीचं काम विसरुन जाता येतं.
• चिडचिड, थकवा, वैताग, सगळं पोरं आणि नवर्‍यावर काढून झालं की आरामात म्हणता येतं बहुतेक मेनोपॉज सुरु होण्याची लक्षणं. हे सगळं घरातली नेहमी, ’विनाकारण’ करत असते असं म्हणतात, त्याला काहीतरी ’नाव’ दिल्याचा आनंद उपभोगता येतो.
• टी. व्ही. चं रिमोट, बेकींग इन्स्ट्रक्शन, पदार्थांमधले घटक ज्या काही ’बारीक’ अक्षरात लिहलेल्या गोष्टी वाचून करायच्या असतात त्या बिनदिक्कत दुसर्‍यावर चष्मा सापडत नाही म्हणून घालता येतात.

आणि जेव्हा सर्व व्यवस्थित असतं तेव्हा, माझी चाळीशी झाली तरी करतेय, नाहीतर तुमचं साठीला आल्यासारखं सुरु असतं असं खिजवताही येतं...

Thursday, October 2, 2014

दोन ध्रुवांवर

"तू कधी नोकरी केली नाहीस ना या देशात?" दिप्तीने ऐकून न ऐकल्यासारखं केलं पण पुन्हा तोच प्रश्न रमाने
विचारला. तिने नुसती नकारार्थी मान हलवली. पण मन अस्वस्थ झालं ते झालंच. कोण कुठे नोकरी करतं, कुणाला घरी बसणं किती अशक्य वाटतं तर कुणाची तरी कायम आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असल्याची टिमकी हे नेहमीचं गु्र्‍हाळ सुरु होणार.  ती पुढच्या संभाषणातले सगळे विषय निर्विकारपणे ऐकत राहिली. भडका उडाला तो गाडीत बसल्यावर,
"काय समजतात या बायका  स्वत:ला? इतकं कमी लेखतात ना घरी रहाणार्‍यांना. तू कधी नोकरी केली नाहीस का म्हणे. नाही केली तर हिच्या *** काय जातं? गेला सुट्टीचा दिवस वाया. कशाला आणतोस रे अशा लोकांकडे?"
"मी कुठे आणतो? सगळा गोतावळा तुझाच आहे दिप्ती." शांतपणे निलेश गाडी चालवत राहिला. घरी पोचेपर्यंत दिप्ती अखंड बडबड करत तिचा वैताग व्यक्त करत राहिली. रात्री डोळा लागेपर्यंत चाललेल्या विचारांनी  दुसर्‍या दिवशीही पाठपुरावा सोडला नाही. रविवारची सकाळ असूनही ती लवकर उठली. निलेश खाली येईपर्यंत तिचं सगळं आवरुन झालं होतं. टी. व्ही. चालू करुन ती बसली.

धावायला बाहेर पडणार्‍या निलेशने दिप्तीकडे कटाक्ष टाकला.
"काय झालं?"  न कळून दिप्तीने विचारलं.
"काही नाही."
"मग असा काय बघतोस?"
"तू आता काय करणार आहेस?"
"का?"
"मराठी मालिका चालू रहाणार असेल जेवायला बसेपर्यंत."
"हो." दिप्तीच्या आवाजात तुटकपणा आला.
"हं..." निलेशची पावलं दाराकडे वळली पण  दिप्ती भडकलीच.
"काय झालं हं करायला? कधीची उठलेय. सगळं आटपून झालंय. कामं बाजूला टाकून नाही टी.व्ही. समोर बसत."
"मला नाही आवडत सकाळी सकाळी हे सुरु झालेलं."
"नाही आवडत तर नाही. बाहेर गेलं की नोकरी करत नाही म्हणून ऐकायचं, घरी तुमच्या कुणाच्या मनासारखं वागत नाही म्हणून ऐकायचं. आयुष्य असं ऐकून घेतच संपणार."
"तू  काल रमा बोलली ते अजून घेऊन बसली आहेस? कमाल आहे. यामुळेच तू सुखी नसतेस कधी. सोडून द्यायला शिक. आयुष्य कसं जगायचं ते आपलं आपणच ठरवायचं."
"हो ना, मग माझ्या मालिका बघण्यावर का घसरलास? बघू दे की सुखासुखी."
"ते वेगळं."
"वा, म्हणजे  सोयीप्रमाणे सगळं. पुरे झाले तुझे धडे."
"ठीक आहे.  कर तुला काय पाहिजे ते." निलेश तडकला.
"का? आता का? आधी काहीतरी बोलायचं आणि मग कर तुला काय पाहिजे ते म्हणून मोकळं व्हायचं. वाऽऽ हे चांगलं आहे तुझं..." दिप्ती तारस्वरात ओरडली पण उत्तर द्यायला निलेश थांबला नाही. दिप्तीच्या कानावर दार धाडकन बंद झाल्याचा आवाज आदळत राहिला.

धावता धावता दिप्तीबद्दलच निलेशचे विचार चालू होते. कुठे कुणाकडे जाऊन आलं की हमखास असं काहीतरी घडायचं. इतकं जर मनाला खुपतं कुणी नोकरीबद्दल विचारलं की तर ती नोकरीसाठी का प्रयत्न करत नाही हे न उलगडलेलं कोडं त्याने पुन्हा एकदा सोडवायला घेतलं. या देशात येऊन झाला की पंधरा वर्षाहून अधिक काळ. पण दिप्तीच्या मनातली अमेरिकेत कायमचं वास्तव्य करायचं या निर्णयाची अढी गेलेलीच नाही.  सतत धुसफुस घरात. सुरुवातीला घडी बसेपर्यंत नाही म्हटलं तरी सहा सात वर्ष गेलीच. मुलं लहान, कामाच्या स्वरुपामुळे फिरती मागे लागलेली. यात ती भरडली गेली पण एका ठिकाणी स्थिर झाल्यावर स्वत:चा जम बसवायला काहीच हरकत नव्हती. पण तिने तसा प्रयत्न केलाच नाही. मुलांमध्ये रमली म्हणावं तर तो संध्याकाळी घरी आला की मुलांवर खेकसणारी दिप्तीच समोर येई. त्यावरुन काही बोललं की त्याच्यावर तोफ. काय केलं म्हणजे दिप्तीला सुख मिळेल हेच त्याला कळत नव्हतं. एकदा शांतपणे दिप्तीशी बोलून मार्ग काढायला हवा हे ठरवून मुलं नसताना त्याने तिला बोलतं करायचा प्रयत्न केला. धावण्याच्या वेगाबरोबर तो प्रसंगही उड्या मारत त्याच्या मनात फिरायला लागला.
"तुझ्याशी बोलायचं आहे."
"बोल ना. परवानगी कशाला हवी?" हातातलं काम बजूला ठेऊन ती म्हणाली. तिच्या गोड स्वराने काय बोलायचं आहे तेच विसरला तो. हे असंच नेहमी. किती पटकन चिडते, वैतागते तितकीच पटकन शांतही होते. सगळ्या भावना तीव्रपणे व्यक्त करणं हाच स्वभाव आहे का हिचा?
"दिपू, कधी होणार गं तू मोठी?"
"म्हणजे?"
"लहान मुलांसारखी वागत असतेस, क्षणात चिडचिड, वसवस, आदळआपट तर क्षणात ते विसरुन लाघवी वागतेस."
"हे बोलायचं होतं तुला?" खळखळून हसत तिने विचारलं.
"नाही, वेगळंच बोलायचं होतं." आता त्याला विषयाला वेगळं वळण नको होतं. "आता तू नोकरीचा विचार करावास असं वाटतं. मला ठाऊक आहे.  इथे येऊन स्थिरावण्यात वेळ गेला. पण आता करु शकतेस तू तुला काय पाहिजे ते. म्हणजे नोकरीच असं नाही. छंद जोपास, शिक पुढे. जे तुला वाटत असेल ते. पेंटींग शिकवायला सुरुवात कर, नाहीतर गायनाचे वर्ग. खूप संधी आहेत तुझ्यासाठी "
"दहा वर्ष गेली आहेत मधे. कोण देईल मला नोकरी. आणि मलाच करायची नाही आता."
"ठीक आहे. मग पेंटींग, गायन शिकवणं?"
"नको."
"का?"
"नको म्हटलं ना."
"अगं पण काही कारण? आणि नसेल काही करायचं तर नको करु पण दिवसभर त्या मालिका बघत रहायचं आणि नंतर इथून तिथून इथे रहातोय, भारतात परत जात नाही म्हणून कसं तुझं नुकसान होतंय ते ऐकवणं तरी सोडून दे.  सुखी रहा एवढंच म्हणायचं आहे मला. आता मुलं मोठी झाली आहेत. ती पण वैतागतात तुझ्या अशा वागण्याने."
"ते मुलं सांगतील. तू नको. आत्तापर्यंत नुसती म्हणत राहिले पण आता उठते आणि जातेच मी भारतात."
"जा." निलेशच्या तोंडून इतक्या पटकन निघालं की दिप्तीला त्याच्या एकदम ’जा’ म्हणण्यावर काय बोलावं ते सुचेना.  डोळे डबडबलेच तिचे. काही न बोलता ती तिथून उठून गेली. निलेश तसाच बसून राहिला. काय बोलायचं ठरवलं आणि कुठून कुठे गेलं संभाषण. आताही त्याला तो प्रसंग जसाच्या तसा आठवत होता. रागाच्या भरात तो बोलला खरा पण इतकी वर्ष झाली तरी दिप्ती ते विसरायला तयारच नाही. विचारांच्या नादात त्याचा धावण्याचा  वेग वाढला.

दार बंद झाल्याचा आवाज दिप्तीच्या कानात घुमत राहिला. तिचं मन मालिका पहाण्यावरुन उडालं. कुठून कुठे पोचला दोघांचा संसार. भारतातून येताना किती सहज सगळं सोडून आली होती ती निलेश सोबत. पुन्हा परतायचंच आहे लवकर याच भावनेने. पण नंतर इतर अनेकांप्रमाणे  चक्रव्युहात अडकून गेली. मनातली खदखद मग या ना त्या मार्गे बाहेर पडत राहिली. तिरकं बोलायचं, नाराजी दर्शवायची हा कधीतरी याच काळात स्वभाव बनून गेला. मला कधी इथे रहायचंच नव्हतं म्हणत ती  इथेच राहिली.  आपण काही करत नाही ही बोच उराशी बाळगून. त्यात कुठेतरी असे काही प्रसंग घडायचे की मन अस्वस्थ होऊन जायचं. नोकरी करणार्‍या आणि न करणार्‍या असे गटच झाले होते इथल्या छोट्याशा डबक्यात. सुरुवातीला  पेंटींग, गायन, वाचन अशा विषयांवर ती काही ना काही  बोलायची. पण अशा कलांना तुम्ही नोकरी करुन करत असाल तरच किंमत, नाहीतर हे छंद म्हणजे रिकामटेकड्यांचे उद्योग असा भाव जाणवायचा तिला इतरांच्या बोलण्यात. मग सगळं हळूहळू मागे पडत गेलं. रसच उडाला. पूर्वी हाताशी असलेल्या वेळाचं  करायचं काय हा प्रश्न असे पण इंटरनेटनच्या आगमनाने तो प्रश्न सोडवला.  लॅपटॉप नाहीतर टी. व्ही. वर मराठी, हिंदी मालिका नाहीतर चित्रपट. हळूहळू तेच तिचं जग झालं. भारतात पोचल्यासारखं वाटायचं या मालिका पाहताना.  तिच्या टी. व्ही. पहाण्यावरुन मुलं, निलेश काहीतरी बोलायचेच. त्यामुळे त्या मालिका लावल्या की ती स्वत:वरच चिडायची.  पण ते पहाणं सोडवायचंही नाही. तिला निलेश बरोबरचा कितीतरी वर्षापूर्वी घडलेला प्रसंग आठवला. त्यावेळेस पहिल्यांदा वैतागून तो म्हणाला होता. जायचं तर जा तू भारतात. मग चढत्या क्रमाने याच स्वरुपाचे प्रसंग घडत राहिले. पण नाही झालं खरं धाडस. म्हणजे एकटंच कसं जायचं? तिकडे जाऊन काय करायचं? आपण गेल्यावर निलेश येईल परत? मुलांचं काय? माहेरची काय म्हणतील? नातेवाईकांमध्ये किती चर्चा होईल या विचारातच ती गुरफटून राहिली. वर्षानुवर्ष. मुलं मोठी झाली. पंखात बळ आल्यावर उडून गेली. निलेश तर म्हणायचा, तिच्या अशा वागण्यामुळे सगळ्यांनी अगदी लांब नोकर्‍या शोधल्या आहेत. खरं काय, खोटं काय कोण जाणे. पण ती मात्र इथेच होती नक्की काय करायचं होतं हे कधीच न समजल्यासारखी. द्विधा!

निलेश घाम पुसत घराबाहेर उभा होता. आता तरी निवळली असेल की आत गेलं की पुन्हा मागच्या पानावरुन तेच सुरु? काही झालं की  सारखं आपलं ’भारतात परत गेले असते तर...’ या पोकळ धमक्यांपेक्षा खरंच का जात नाही दिप्ती भारतात कायमची? सर्वांनाच शांतपणा मिळेल असं त्याला दरवेळेला वाटायचं. पण ते वाटणंही तेवढ्यापुरतंच. बोललोय की तिला हे. आणि खरा राग येतो तो तिच्या टी. व्ही. पहाण्यापेक्षा तिच्या कलागुणांचा ती उपयोग करत नाही याचा.  विचार करुन डोकं भणभणून गेलं निलेशचं. दार उघडून तो आत आला.  दिप्तीने  चहाचा कप पुढे केला. तिची बदललेली मनस्थिती पाहून त्याला आश्चर्य वाटलं पण आनंदही झाला.  आधीचं सारं विसरुन तो हसला.
"तू नाही घेत?" खुर्चीवर बसत त्याने विचारलं.
"घेते ना. आणि आज सुट्टीच आहे तर नाटकाला जाऊ या का कुठल्यातरी?"
तो काहीच बोलला नाही.
"ऐकलंस ना?" तिने जोरात विचारलं. तिच्या आनंदावर विरजण घालणं जीवावर आलं त्याच्या.
"इच्छा आहे गं. पण काम करावं लागणार आहे. म्हणजे काल पूर्ण नाही झालं ऑफिसमध्ये, ते संपवायचं आहे."
"बरं. ठीक आहे." दिप्तीची नाराजी शब्दात डोकावलीच.
"अगं समजून घे ना."
"मी कुठे काय म्हटलं? तू दिवसरात्र काम करत रहा. मी रिकामटेकडी. काय करायचं तेच समजेनासं झालंय. वेळ घालवायला शोधलेले मार्गही चालत नाहीत. चालू दे. मी काही बोलत नाही..." दिप्तीचा पारा चढला. निलेशने चहा अर्धवटच टाकला आणि टेबलावर ठेवलेला लॅपटॉप उचलून काही न बोलता तो कामाच्या खोलीत गेला.  धाडकन दार बंद झालं. बंद दाराकडे दिप्ती पहात राहिली. एकाच घरातली इन मिन दोन माणसं दोन ध्रुवांवर उभी होती. कायमची!


http://bmmonline.org/sites/default/files/BMM/BMM/BMM_Newsletter_Oct2014.pdf