Showing posts with label लेख. Show all posts
Showing posts with label लेख. Show all posts

Thursday, July 22, 2021

अंतराळ भरारीचे कोंदण

 ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांच्या ब्लू ओरिजिन कंपनीच्या प्रवासी यानाचा अवकाशातील ११ मिनिटांचा
प्रवास अनेकार्थांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे.  वॉली फंक ही ८२ वर्षांची स्त्री अंतराळवीर आणि नेदरलॅडचा १८ वर्षीय ऑलिव्हर डेमेन. सर्वात वयस्कर आणि सर्वात तरुण अंतराळवीर. जेफ आणि मार्क बेजोस या बंधूसमवेत या दोघांनी अंतराळ सफर केली. 

वॉली फंक नासाच्या (National Aeronautics and Space Administration)  पहिल्या १३ स्त्री अंतराळ प्रवासाच्या प्रशिक्षणार्थीपैकी एक. मर्क्युरी १३ या नावानेही या स्त्री अंतराळवीरांची ओळख आहे. या स्त्रियांनी विविध चाचण्यांतून स्वतःला सिद्ध केलं. काहीवेळा पुरुष अंतराळ प्रशिक्षणार्थींनाही त्यांनी  मागे टाकलं. मात्र नासाने कधीही या स्त्री वैमानिकांना अंतराळात जाण्याची  संधी दिली नाही. याबाबत नासाकडे बोट दाखवलं जात असलं तरी हे प्रशिक्षण नासाचं होतं हा गैरसमज असल्याचं म्हणतात. ज्या चाचण्या नासाने अंतराळवीरांसाठी स्वीकारल्या होत्या त्या चाचण्यांचा जनक लवलेस. लवलेसनी पुरुषांइतकीच अंतराळात प्रवास करण्याची  स्त्रीची क्षमता आहे का हे पाहण्यासाठी हे प्रशिक्षण दिलं. शारिरिक, मानसिक, बौद्धिक सार्‍या पातळ्यांवर स्त्रिया पुरुषांइतक्याच अंतराळ प्रवासाला सक्षम आहेत हे  अगणित चाचण्यांच्या आधारे त्यांनी सिद्धही केलं. मात्र नासाने पुढील काही चाचण्यांसाठी लागणारी मदत लवलेसनी विनंती करूनही नाकारली. नासाने स्त्रियांना अंतराळात पाठवण्याचा विचारच केला नव्हता त्यामुळे लवलेसना माघार घ्यावी लागली.   

या प्रशिक्षणात समाविष्ट झालेल्या स्त्रियांचं अंतराळ प्रवासाचं स्वप्न धुळीला मिळाल्यावर त्यांनी आपल्या प्रवासाचा मार्ग बदलला. प्रत्येकीने वेगवेगळ्या क्षेत्रात  पाऊल टाकलं. वॉली फंकनी जग फिरून येण्याचं ठरवलं. काही वर्षांनी त्या वैमानिक झाल्या, विमान चालवण्याचं प्रशिक्षण देऊ लागल्या आणि अखेर अपघातग्रस्त विमानांच्या तपासणीचं आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने येणार्‍या अडचणींचा अभ्यास करून त्यावर सरकारला उपाय सुचवण्याचं काम त्या करू लागल्या. आतापर्यंत १९,६०० तास त्यांनी उड्डाण केलं आहे तर ३,००० वैमानिकांना प्रशिक्षण दिलं आहे. 

१९६१ साली नासाने स्त्रियांचा विचारही अंतराळकक्षेत जाण्यासाठी केला नव्हता त्यामुळे वॉली फंक आणि तिच्याबरोबरीने प्रशिक्षणात भाग घेतलेल्याचा प्रवास सुरू होण्याआधीच संपला. अखेर नासातर्फे १९८३ साली  सॅली राइड अंतराळात प्रवास करणारी पहिली स्त्री ठरली तरी १९९५ पर्यंत यान चालवण्याची जबाबदारी स्त्रियांवर नासाने सोपवली नाही. एलिन कोलिन्स ही पहिली स्त्री जिने यान चालवलं. एलिनने वॉली फंक आणि इतर स्त्री अंतराळवीरांना या उड्डाणांच्यावेळी आमंत्रित केलं होतं. तब्बल ६० वर्षानंतर वॉली फंक यांचं अंतरिक्षात झेपावण्याचं स्वप्न साकार झालं ते न्यू शेफर्ड यानामुळे आणि जेफ बेजोसनी प्रवासासाठी आमंत्रित केल्यामुळे!

ऑलिव्हर डेमेन या नेदरलॅडच्या १८ वर्षांच्या मुलाला अनपेक्षितपणे ही संधी मिळाली. ब्लू ओरिजिन कंपनीने तिकिटाचा लिलाव बारा जूनला जगभरात सुरू केला आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. १५९ देशांतून ७,६०० लोकांची अंतराळात जाण्यासाठी वाट्टेल तितके पैसे मोजण्याची तयारी होती. बोलीचा आकडा वाढत गेला आणि २८ दक्षलक्ष डॉलर्सला  तिकीट विकलं गेलं. ऑलिव्हर यानंतरच्या यानातून अंतराळात जाणार होता पण आयत्यावेळेला ज्या माणसाने तिकिट जिंकलं त्या ग्राहकाने वेळ जुळत नसल्याने माघार घेतली आणि ऑलिव्हरची वर्णी या पहिल्यावहिल्या प्रवासी यानात लागली. अंतराळात जाणारा सर्वात तरुण मुलगा म्हणून त्याचं नाव नोंदलं गेलं.

उरलेल्या दोन प्रवाशात स्वतः जेफ बेजोस आणि त्यांचा भाऊ मार्क बेजोस.  अपोलो ११ हे यान चंद्रावर गेल्याला जुलै महिन्यात ५२ वर्ष झाली. हाच मुहूर्त साधून आज या व्यावसायिक यानाने यशस्वी अंतराळ प्रवास पार पाडला. या अंतराळप्रवासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी अॲमेझॉनचा राजीनामा देणार्‍या जेफ बेजोससाठी आजचं उड्डाण यशस्वी उद्योगाची मुहूर्तमेढ रोवल्याची चिन्ह आहेत. आता लवकरच पुन्हा हे यान अंतरिक्षात झेपावेल. अंतरिक्षात झेपावण्याची तुमचीही इच्छा असेल तर तुम्हाला फक्त $200,000 किंवा थोडेसे जास्त पैसे भरावे लागतील.

या मोहिमेबद्दल अर्थातच टिकेचं वादळही उठलं आहे. २०२० च्या अध्यक्षीय निवडणूकीला उभ्या राहिलेल्या बर्नी सॅन्डर्सनी आपली नाराजी आधीच तीव्र शब्दात व्यक्त केली आहे. ’पृथ्वीवरच्या सर्वात श्रीमंत गणल्या जाणार्‍या अमेरिकेसारख्या देशात लोकांना रोजच्या उदरनिर्वाहाची भ्रांत आहे, वैद्यकिय उपचार घेण्याकरता त्यांच्याकडे पैसे नाहीत पण त्याचं कुणाला काय? जगातली  श्रीमंत व्यक्ती अंतरिक्षात झेपावली आहे. अब्जाधीशांनी करही तेवढाच भरला पाहिजे.’ अशा अर्थी त्यांनी ट्विट केलं आहे.

बेजोसना मात्र भविष्यकाळाकडे नागरिक आणि प्रजातीचा दृष्टिकोन ठेवून म्हणून पाहण्याची आवश्यकता वाटते. आज आपण जे करतोय तो पुढच्या पिढीसाठी अंतरिक्षात काम करण्याचा पाया असेल आणि पृथ्वीवरच्या समस्या त्यामुळे काही प्रमाणात सुटतील असं त्यांना वाटतं.

२० जुलैच्या यशस्वी अंतराळ सफरीनंतर नवं क्षेत्र जेफना खुणावत असलं तरी जेफ बेजोसना तीव्र स्पर्धेलाही तोंड द्यावं लागणार आहे याची चिन्ह कधीच दिसू लागली आहेत. स्पेसएक्सचे इलॉन मस्क, व्हर्जिन गलॅक्टिकचे रिचर्ड ब्रॅनसन यांनी आधीच एक पाऊल पुढे टाकलेलं आहे.  गेल्याच आठवड्यात रिचर्ड ब्रॅनसननी अवकाशात झेप घेतली होती. तेही त्यांच्यावर होणार्‍या टिकेला तोंड देताना, त्याचं ध्येय मंगळावर मनुष्यवस्तीला हलवण्याचं असल्याचं सांगतात. मनुष्य हा एकाच ग्रहावरचा प्राणी असता कामा नये असं त्यांना वाटतं. 

आणि आजच ब्लू ओरिजिनाने  तिकिटविक्रीतून आलेल्या २८ दशलक्ष डॉलर्सपैकी १९ दशक्षलक्ष डॉलर्स अंतराळ संबंधित सेवाभावी संस्थांना देण्याचं जाहीर केलं आहे. यातील एक संस्था आहे अॲस्त्राफिमेना (AstraFemina) इथे संशोधन आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील स्त्रिया एकत्रितपणे काम करून मुलींपुढे आदर्श उभा करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. 

ब्लू शेफर्ड अंतरिक्षात झेपावून ११ मिनिटात परतही आलं. त्यातून प्रवास केलेल्या चौघांना एका अविस्मरणीय अनुभवाची सफर घडली. सर्वसामान्यांना थेट प्रक्षेपणाचा आनंद अनुभवता आला.  कितीही टिका झाली तरी आता गर्भश्रीमंतांना अंतराळाचा रस्ता खुला झाला आहे हे नाकारण्यात अर्थ नाही. आपल्यासारख्या सर्वसामान्यांनी अशावेळी ८२ वर्षाच्या  वॉली फंकला तिच्या अथक प्रयत्नांचं, चिकाटीचं फळ ६० वर्षांनी का होईना मिळालं यात आनंद मानायला हवा, साजरा करायला हवा, वय हा नुसता आकडा आहे हे खर्‍या अर्थी सिद्ध करणार्‍या या तरुणीला मानाचा मुजरा आणि पुन्हा पुन्हा अंतराळात झेपावण्याच्या तिच्या कामनेला पूर्तीची सदिच्छा!

सकाळमधील लेखाचा दुवा:

https://www.esakal.com/global/jeff-bezos-space-trip-11-minutes-know-details-ssy93





Tuesday, May 14, 2019

होरपळ बालमनांची


"तू बातमी ऐकली असशील म्हणून फोन केला." मैत्रिणीचा फोन आला तेव्हा मी गाडी चालवत होते.  रेडिओवरआमच्या गावातल्या, शार्लटमधील विद्यापीठातल्या गोळीबाराबद्दलची बातमी सुरु झाली आणि पोटात गोळाच आला.  तेवढ्यात मैत्रिणीचा फोन आला. तिची मुलगी तिथेच शिकायला आहे. ती सुखरुप असल्याचं कळलं आणि जीव भांड्यात पडला. आजूबाजूची, ओळखीच्यांची  मुलं तिथे शिकायला त्यामुळे नक्की काय झालं ते कळेपर्यंत, सर्वांची खुशाली कळेपर्यंत चैन पडणार नव्हतं. विद्यापीठाच्या आवारात जायला - यायला ताबडतोब बंदी घातली होती. बंदी उठेपर्यंत विद्यार्थीवर्ग आपापल्या वर्गात होता. घरी मुलांनी खुशालीचे  टेक्स्ट केल्यानंतर फोन बंद होते. एका धाडसी मुलाच्या कृतीमुळे या हल्ल्यात कमी जिवितहानी झाली. दोन जण जिवाला मुकले तर चारजण जखमी झाले. या दोनजणापैंकी एक होता रायली होवेल. रायली जिवाची पर्वा न करता मारेकर्‍यावर चालून गेला. स्वत:च्या जिवाचं मोल देत रायलीने मारेकर्‍याला जमिनीवर लोळवलं, तिथे असलेली इतर मुलं रायलीच्या मदतीला धावली. पडलेल्या मारेकर्‍याला त्यांनी धरुन ठेवलं. पण पडता पडता मारेकर्‍याने झाडलेल्या गोळीत रायली मृत्यूमुखी पडला. २१ वर्षाच्या रायली होवेलच्या कौतुकास्पद कामगिरीबद्दल बोलताना प्रत्येकाचेच डोळे भरुन येतात, शब्द अपुरे पडतात. पळा, लपा किंवा धैर्याने मारेकर्‍याचा सामना करा ही तीन सूत्र हिंसेला तोंड देण्याच्या प्रशिक्षणात मनावर बिंबवली जातात. यातील रायलीने निवडलेल्या पर्यायाचं त्याच्या आई - वडिलांना आश्चर्य वाटत नाही तसंच त्याला ओळखणार्‍या सर्वांनाच.  त्याच्या कामगिरीचा सन्मान करण्यासाठी सरकारनेही उचित पाऊल उचललं. सरकारी इतमामात गावी परतलेल्या रायलीच्या पार्थिवाची वाट पाहत नागरिक दोन तास  साश्रू नयनांनी उभे होते. 


अमेरिकेन जनतेपुढील ही समस्या गावागावात प्रत्येक घराच्या दारासमोर उभी आहे. आपल्या गावात, शाळेत असा प्रकार होणार नाही हा निव्वळ भ्रम राहिलेला आहे. UNCC मधील घडलेल्या घटनेआधी काही महिने आधी माझ्या मुलीच्या शाळेतला हा प्रसंग. ७ वीत शिकणार्‍या एका भारतीय विद्यार्थ्याने वर्गातल्या बाकावर लिहिलं. "I’ll get the guns by Thursday. Pitch in $200 for 5 Swisses." मुलांनी खोटं बोलणं, मारामारी करणं, इतरांना चिडवणं, वर्गातल्या बाकांवर, भिंतींवर मुलामुलींची नावं लिहिणं एवढीच मजल या वयात मुलं गाठतात असं गृहीत धरणं कालबाह्य झाल्यासारखं ही वाक्य वाचताना वाटलं होतं. या भारतीय विद्यार्थ्याने लिहिलेल्या या संदेशाचं  कुणीतरी छायाचित्र घेतलं आणि बातमी सर्वत्र पसरली. मुलाची चौकशी सुरू झाली. गंभीर स्वरूपाची हरकत असेल तर मुलांना तीन दिवस शाळेत यायला मनाई केली जाते पण त्याच दरम्यान  फ्लोरिडा राज्यातील  शाळेत घडलेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे या प्रसंगाचे पडसाद तीव्र होते त्यामुळेच परिणामही. मुख्याध्यापकांनी झालेल्या घटनेची पोलिसांकडून चौकशी होऊन जास्तीत जास्त शिक्षा सुनावली जाईल याची ग्वाही दिली. त्याचाच परिणाम म्हणून ३ दिवस शाळेत न येण्याच्या शिक्षेवर न थांबता या मुलाला सुधारणागृहात दाखल केलं गेलं. या मुलाची पुढची शैक्षणिक प्रगती गोठल्यासारखीच आहे.  सुधारगृहाचा ठप्पा लागल्यावर त्याच्याकडे पाहण्याची दृष्टी बदलली जाणार, त्याला मिळणारी वागणूक बदलणार, महाविद्यालयीन प्रवेश ही तर पार पुढची गोष्ट झाली. ही आम्ही जवळून पाहिलेली घटना. अशावेळेस  पालकांना मन घट्ट करुन अशी परिस्थिती उद्भवली  तर काय करायचं यावर मुलांशी बोलावं लागतं. मुलांच्या डोळ्यातले, मनातले प्रश्न वाचताना आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देताना नको वाटतं, जीव तुटतो.   कुणी कुणाचा जीव कसं घेऊ शकतं या निरागस प्रश्नाला उत्तर देताना या  कोवळ्या मनांना, अजाण मुलांना आपण अकाली  प्रौढत्वाकडे वळवतोय ही जाणिव वेदनादायी असते. पण या काळाचं हे वास्तव आहे. अशा घटना आणि मुलांवर होणारी कारवाई याचं प्रमाण शाळांतून खूप मोठं आहे. दुर्देवी घटनांची नक्कल मुलांना का करावीशी वाटत असेल? मुलं माध्यमातून या गोष्टी पाहत असतात, ऐकत असतात त्याचा नकळत मनावर परिणाम होत असावा का? असंच आपणही करावं असं वाटत असेल का?  शाळांना सातत्याने घडणार्‍या अशा घटनांमुळे यावर कडक कारवाई करणं भागच आहे . पण विद्यार्थ्यांना गंमत म्हणून केलेल्या उद्योगाच्या परिणामाची कल्पना तरी असेल का?  अशा घटना घडल्या की मन विषण्ण होतं. नानाविध उपायांची चर्चा होते. शिक्षकांच्या हातात बंदूका सोपवायला हव्यात या अंतिम निष्कर्षालाही बर्‍यांचदा खूपजणं  येतात.  पण शिक्षकांनी शिकवायचं की बंदूक चालवायला शिकून मुलांच्या सुरक्षिततेचीही काळजी करायची हा प्रश्नही त्याबरोबर येतोच.

मुळात मुलांच्या हातात बंदुका येतातच कशा हा सर्वसामान्य लोकांना पडणारा प्रश्न. कायद्याने वयाच्या १८ व्या वर्षांपर्यंत बंदूक विकत घेता येत नाही. आता तर काही राज्यात २१ ही वयोमर्यादा झाली  आहे पण यातून पळवाटा आहेतच. सर्वेक्षणातून जवळजवळ ६०% विद्यार्थ्यांनी बंदूक पाहिजे असेल तर सहज मिळू शकते अशी कबुली दिली आहे. बर्‍यांचदा घरातील मोठ्या माणसाची बंदूक मुलांच्या हातात पडते.  कधी हातात आलेल्या बंदुकीचा सहज वापर केला जातो. कधी मानसिक विकृतीमुळे बंदूक वापरली जाते तर काही वेळेला केवळ बढाई मारण्यासाठी शाळेत मुलं बंदूक आणतात. बर्‍याचदा आधीच कुणाच्यातरी लक्षात येतं आणि त्यांच्या हातातील बंदूक काढून घेतली जाते. कारवाई होते. पण जेव्हा असं होत नाही तेव्हा कितीतरी निष्पाप कळ्या उमलण्याआधीच संपतात. अंदाधुंद गोळीबार करुन ही मुलं काय साध्य करतात हा जसा प्रश्न आहे तसंच पूर्वी झालेल्या गोळीबारांचा पद्धतशीर अभ्यास करुन हिंसेची तीव्रता कशी वाढेल याचं व्यवस्थित नियोजन करण्याची  मुलांची मानसिकता चिंताजनक आहे. २००७ साली व्हर्जिनिया पॉलीटेक्निक मध्ये झालेल्या गोळीबारात ३२ मुलं आणि त्यांचे काही शिक्षक मारले गेले. या मुलाने आधीच्या गोळीबाराचा सखोल अभ्यास केला होता आणि अधिक मुलांचे बळी जाण्यात ती मुलं कुठे कमी पडली हे पाहून त्याप्रमाणे नियोजन करण्याची काळजी घेतली होती.

२०१२ साली सॅंडीहूक  प्राथमिक शाळेतली २० चिमुरडी मुलं आणि ६ शिक्षक अशाच गोळीबाराला हकनाक बळी पडले. पण यावेळेस जे झालं ते केवळ पुरेशी काळजी घेऊनही नविन आणि त्यादिवशी वर्गावर असलेल्या बदली शिक्षिकेला याबद्दल माहिती नसल्याने कारण जशी गोळीबाराची संख्या वाढली आहे त्याप्रमाणेच अशा परिस्थितीत काय पावलं उचलायला हवीत त्यासाठी केल्या जाणार्‍या प्रयत्नांचीही. याही शाळेत प्रशिक्षण दिलं होतंच. पण ज्या वर्गातील मुलं बळी पडली त्यातील एका वर्गात  शिक्षिका नविन होती. काहीतरी विपरीत घडतंय ही सूचना मिळताच तिने वर्गाचं दार  लावण्याऐवजी प्रथम  मुलांना बाकड्याखाली लपवलं. त्यानंतर दार बंद करायला ती गेली तोपर्यंत बंदूकधारी मुलाने दार उघडलं. मुलं कुठे आहेत या त्याच्या प्रश्नावर तिने वर्गात कुणी नाही हे उत्तर दिलं. त्या मुलाने तिच्यावर  गोळी झाडली आणि लपलेल्या चिमुरड्यांचा भयाने थरकाप उडाला.  मुलं सैरभैर झाल्यासारखी धावली. आणि बंदूकधारी मुलाने अंदाधुंद गोळीबार केला. काही मुलांचा जीव वाचला काहींनी जीव गमावला.  दुसर्‍या वर्गात फक्त त्यादिवशी शिकवण्यासाठी आलेली शिक्षिका होती. दुर्देवाने तिच्याकडे दाराला कुलूप लावण्यासाठी किल्ली नव्हती. प्रशिक्षणातील सर्व बाबी योग्यं तर्‍हेने अमलात आणल्यामुळे इतर वर्गातील मुलं सुरक्षित राहिली आणि या दोन वर्गातील बहुतेक मुलांचा अंत झाला.

अशा घटना आता दैनदिन जीवनाच्या घटक होऊ लागल्या आहेत पण याची सुरुवात झाली ती २० एप्रिल  १९९९ साली  कोलोरॅडो राज्यातील लिटीलटन कोलंबाईन हायस्कूल मध्ये दोन तरुणांनी अंदाधुंद केलेल्या गोळीबारात १३ मुलं मारली गेली तर ३० हून अधिक जखमी झाली तिथून. या नंतर अनेक राज्यात शाळांना अशा प्रसंगांना सामोरं जायला लागलं आहे, लागत आहे. जिथे जिथे जिवितहानीचं प्रमाण जास्त आहे त्या घटनांची माहिती माध्यमातून लोकांपर्यंत पोचली, त्याची चर्चा होत राहिली. आत्तापर्यंत ७००० हून अधिक मुलं यात बळी पडली आहेत. यावर उपाय शोधण्याचे अथक प्रयत्न चालूच आहेत. बंदुकांवर नियंत्रण आणणं हा महत्वाचा उपाय NRA नॅशनल रायफल असोसिएशनच्या  वर्चस्वामुळे आणि त्यात गुंतलेल्या सर्वांच्या हितसंबंधामुळे  दरवेळी मोडीत निघतो. पोटचे जीव गमावल्यावर पालक पेटून उठतात, कायद्यात बदल करण्यासाठी धडपडतात. त्यांना सर्वसामान्य साथ द्यायचा प्रयत्न करतात. यात भर पडली आहे विद्यार्थ्यांची.  मुलंही आता जाब विचारायला लागली आहेत, विरोधाची पावलं उचलत आपला आवाज मोठ्यापर्यंत पोचवण्याचा  प्रयत्न करत आहेत. त्याचं उदाहरण म्हणजे, March of Our Lives. गेल्यावर्षी विद्यार्थ्यांनीच सुरु केलेली ही संघटना त्यांच्या पिढीला ज्या असुरक्षिततेला तोंड द्यावं लागतंय ते बदलण्याचा निश्चय करुन प्रयत्न करत आहे. मागच्यावर्षी फ्लोरिडा राज्यातील डग्लस शाळेत घडलेल्या दुर्देवी घटनेतून या लढ्याची सुरुवात झाली आहे.   सरकारने या समस्येवर पावलं उचलावीत यासाठी विद्यार्थी जिवाचं रान करत आहेत.  शस्त्र नियंत्रण कायद्यात बदल आणि शस्त्र विक्री अगोदर त्या व्यक्तीची पूर्ण चौकशी. या दोन मुख्य मागण्या पुर्‍या होत नाहीत तोपर्यंत ही चळवळ चालूच ठेवण्याचा विद्यार्थ्यांचा निर्धार आहे March of Our Lives ची अलिकडची  चित्रफित हृदयद्रावक  आहे. या चित्रफितीत एका कार्यालयात गोळीबाराला तोंड कसं द्यायचं त्याचं प्रशिक्षण सुरु होताना दाखवलं आहे.  प्रशिक्षणासाठी तज्ज्ञ म्हणून निमंत्रित केलेली व्यक्ती पाहून कर्मचार्‍यांना जसा धक्का बसतो तसाच चित्रफित पाहणार्‍यालाही. ती तज्ज्ञ व्यक्ती आहे, शाळकरी मुलगी!   ही छोटी मुलगी प्रौढांना गोळीबाराला तोंड द्यायला काय करायचं ते  सांगताना दाखविली आहे.  शेवट होतो त्या मुलीच्या शिक्षिकेने सांगितलेल्या खालील ओळींनी.

"Lockdown, lockdown let's all hide,

Lock the doors and stay inside,

Crouch on down, don't make a sound,

And don't cry or you'll be found."

जनरेशन लॉकडाऊन असं या चित्रफितीचं नाव आहे.


अमेरिकन शालेय जीवनात, अभ्यास आणि विविध विषयांचं ज्ञानार्जन  हा जसा अविभाज्य भाग आहे तसं हिंसेला तोंड देण्याचं प्रशिक्षण हा विषयही आता अनिवार्य झाला आहे. चुकीच्या हातांमध्ये बंदूक पडू नये याबाबात कायदा करण्याऐवजी राजकारणी मुलांना प्रशिक्षण मिळत आहे यातच समाधान मानत आहेत. बाह्य घटकांकडे बोट दाखवताना जी मुलं या मार्गावर पाऊल टाकतात त्यांचे पालक मुलांची मनं ओळखायला कमी पडत आहेत ते का,  त्या मुलांचे शिक्षक, मित्रमैत्रिणी यांनाही अशा मुलांच्या मनांचा थांगपत्ता लागत नाही तो का याकडेही लक्ष देणं भाग आहे. या समस्येवर  नक्की उपाय काय हे काळच ठरवेल पण तोपर्यंत किती बालमनं यात होरपळून निघणार, किती आपल्या जीवाला मुकणार हाही प्रश्न अनुत्तरीतच राहणार!

Thursday, November 8, 2018

बिगुल दिवाळी अंक - दुसरी बाजू.

बिगुल दिवाळी अंकातील लेख - दुसरी बाजू:  https://goo.gl/6MGwkT


लेखातील काही अंश:




Tuesday, February 9, 2016

ट्रम्प नावाचं बेफाम वादळ

राजकारणावर तज्ञ व्यक्ती अभ्यासपूर्ण लिहितात, बोलतात तसंच  सर्वसामान्यही या विषयावर जिव्हाळ्याने,
हिरीहिरीने मत प्रदर्शित करतात. बहुतांशी सर्वांचं  राजकारणाबद्दल स्वतंत्र आणि ठाम मत असतं आणि प्रत्येकाला ते हक्काने मांडायलाही आवडतं.  अगदी हेच सध्या अमेरिकेतील निवडणुक उमेदवारांच्या बाबतीत चालू आहे.  ओबामांची ८ वर्षाची कारकीर्द आता संपणार आहे. ८ नोव्हेंबर २०१६ ला अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष निवडून येतील. रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक पक्षातील अंतिम उमेदवार कोण ते फेब्रुवारी ते जून या दरम्यान  निश्चित होईल. सध्या वेगवेगळ्या राज्यातील उमेदवारांमध्ये होणार्‍या चर्चासत्रातून कोणता उमेदवार कोणत्या राज्यात पुढे आहे याची चाचपणी सुरु आहे. सुरुवातीला डेमोक्रॅटिक पक्षातून हिलरी क्लिंटन निवडणुकीला उभ्या राहणार आहेत का नाही याची प्रचंड उत्सुकता जनमानसात होती, त्यांनी तो निर्णय घेतल्यावर  इतर उमेदवारातून अंतिमत: त्यांची निवड होईल का या प्रश्नाची चर्चा व्हायला लागली आणि अचानक सर्वांचा रोख वळला तो  रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डॉनल्ड ट्रम्प यांच्याकडे.

रिपब्लिकन पक्षांमधून जेब बुश (माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांचे बंधू) यांच्यासह ११ उमेदवार या चुरसीमध्ये सामील झालेले आहेत. हिलरी क्लिंटन यांच्या विरुद्ध यातील समर्थपणे कोण उभं ठाकतं याबद्दल उलट - सुलट मतप्रदर्शन होत असतानाच डॉनल्ड ट्रम्पनी रिंगणात उडी मारली. त्यांनी ही उडी घेतली ती बहुधा मैदान गाजवण्याच्याच इराद्याने.  विरुद्ध असला तरीही डेमोक्रॅटीक पक्ष डॉनल्ड ट्रम्पवर खूश आहे. कारण? डॉनल्ड ट्रम्प तोंड उघडतात ते चौफेर फटकेबाजी करण्यासाठीच.  त्यामुळे रिपब्लिकन पक्षातील इतर उमेदवारांकडे कुणाचं लक्षच जात नाही. त्यांची मतं, योजना जनतेच्या मनात फार काळ रेंगाळत नाहीत कारण डॉनल्ड ट्रम्प सनसनाटी विधान करुन स्वत:कडे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी होतात. या चौफेर फटकेबाजीतील ताजं  उदाहरण म्हणजे बेकायदेशीर रित्या मेक्सिकन लोकांनी अमेरिकेत प्रवेश करु नये म्हणून सीमेवर भिंत बांधण्याची त्यांनी केलेली घोषणा. या घोषणेने अमेरिकेत खळबळ माजली. मेक्सिकन जनतेत अर्थातच असंतोष पसरला.  काहीजण खूष झाले तर काहींना डॉनल्ड ट्रम्प ’... तारे तोडतायत’ असं वाटलं. प्रत्येकाला या भिंत बांधणीबद्दल आपलं  मत व्यक्त करावंसं वाटायला लागलं.  अगदी प्राथमिक शाळेत जाणारा विद्यार्थीही या  घोषणेने पेचात पडला. या मुलाने लिहिलेला  निबंधच त्याच्या शिक्षिकेने प्रसिद्ध केला. हा छोटा मुलगा म्हणतो,
"मला स्वप्न पडलं की डॉनल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष होणार नाहीत पण ते झाले तर आशियाई, मेक्सिकन आणि आफ्रिकन लोकांना त्यांच्या देशात परत जावे लागेल.  या देशात फक्त १२००० लोक राहतील. बरेच भारतीय अभियंते (इंजिनिअर) आहेत. ते इथे नसतील तर तंत्रज्ञान नसेल. आणि तंत्रज्ञान नसेल तर नेटफ्लिक्स नसेल. अशा देशात आवडेल राहायला तुम्हाला? अर्थात नाही!"  गमतीचा भाग सोडला तरी डॉनल्ड ट्रम्प ही वल्ली चर्चेचा विषय होण्यात यशस्वी झाली आहे.

कोण आहेत हे ट्रम्प? यशस्वी उद्योजक आणि करोडपती!  दूरदर्शनवरच्या त्यांच्या  ’अॲप्रेंटीस’ या कार्यक्रमामुळे ते घराघरात पोचले.  १६ ते १८ व्यावसायिक या कार्यक्रमात भाग घेतात, स्वत:ला सिद्ध करण्यासाठी.  प्रत्येक भागाच्या शेवटी ट्रम्प त्यातील एकाला काढतात तेच  ’यू आर फायर्ड’ म्हणत. हे त्यांचं वाक्य खूप प्रसिद्ध झालं तसा त्यांचा एक घाव दोन तुकडे हा खाक्याही. निवडणुकीच्या रिंगणातही ते मांडत असलेली विधानं लोकांकरता एकाचवेळी खळबळजनक, धक्कादायक तशीच मनोरंजकही आहेत .

ट्रम्प त्यांच्या बोलण्याने लोकांची करमणूक करतात त्याचवेळी एखाद्या गटाला नाखूष. मेक्सिकन लोकांनी अमेरिकेत प्रवेश करु नये म्हणून सीमेवर भिंत बांधायचं ते जाहिर करुनच ते थांबले नाहीत तर त्याचबरोबर  मेक्सिकन अमली पदार्थ या देशात आणतात, त्यांच्यामुळे या देशातले गुन्हेगार वाढतात आणि ते बलात्कारी आहेत असं त्यांना वाटतं. काही मोजकेच सभ्य मेक्सिकन या देशात आहेत असं म्हणून त्यांनी मेक्सिकन लोकांचा रोष ओढवून घेतला आहे. मेक्सिकन जनते नंतर ते मुसलमानांवर ताशेरे झोडतात. जोपर्यंत अमेरिकन नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अंधातरी आहे तोपर्यंत मुसलमान लोकांना अमेरिकेत येण्यासाठी बंदी घालावी या विधानाने अमेरिकेत तर खळबळ माजलीच पण ब्रिटीश सरकारला ट्रम्पना ब्रिटनमध्ये प्रवेश करण्यास बंदी आणावी की काय असं वाटून गेलं. देशाच्या भविष्याच्या बाबतीत त्यांच्या योजना ह्या अशा आहेत पण त्या पूर्णत्वाला कशा जातील या बाबत निश्चित आराखडा त्यांच्याकडे नाही त्यामुळे वास्तवापासून फारकत घेतल्यागत त्यांची योजना आणि विधानं आहेत असं मानलं जातं. हे कमी असल्यासारखं रिपब्लिकन पक्षातर्फे उभे असलेले ट्रम्प राजकारणातील व्यक्तींना वेळोवेळी आपण पैसे दिल्याचं अभिमानाने सांगतात आणि त्यांना पाहिजे ती कामं  देखील या व्यक्ती त्यामुळे करतात याचा दाखला देतात. हिलरी क्लिंटनना पैसे दिल्याचे ते मान्य करतात तेव्हा ट्रम्प यांचं कोणतं काम हिलरीनी केलं असेल असा साहजिकच प्रश्न मनात येतो. त्यावर ते सांगतात की मी हिलरीना लग्नाला हजर राहण्याचं आमंत्रण दिलं आणि विरुद्ध पक्षातील असूनही हिलरी ते नाकारु शकल्या नाहीत.

हल्लीच आयोवा येथील रिपब्लिकन पक्षाच्या वाद - विवाद सभेत सहभागी होण्याचं नाकारत त्यांनी मोठा जुगार खेळला आणि तो जिंकलाही. आयोवा येथील वाद - विवाद हा उमेदवारांसाठी अतिशय महत्वाचा मानला जातो. कारण तेथील प्राथमिक निवडणुक जिंकणारा उमेदवार राष्ट्राध्यक्ष होतो असा बर्‍याच वेळा आलेला अनुभव. पण इथे येण्याचंच त्यांनी  नाकारलं ते मेगन केली या स्त्री वार्ताहारामुळे. आधीच्या एका वाद - विवादात  मेगनने त्यांच्याशी संवाद साधताना म्हटलं, की ते राजकीय व्यक्तींप्रमाणे तोलून मापून न बोलता त्यांना जे वाटतं ते बोलतात यामुळे लोकप्रिय आहेत पण कधीकधी हे बोलणं हिनपातळीकडे झुकतं. हे स्पष्ट करताना त्यांचे स्त्रियांबद्दलचे उद्गगार मेगननी त्यांना ऐकवले. त्यांनी स्त्रियांना डुक्कर, कुत्री आणि आळशी म्हटल्याची मेगननी आठवण करुन दिली. त्याला प्रत्युत्तर देताना डॉनल्डनी प्रसारमाध्यमातील रोझी ओडानल्डबद्दलच आपण तसं म्हटलं आहे असं सांगितलं. पण ते खरं नाही आणि सर्वच स्त्रियांबद्दल त्यांचं तसं मत असल्याचं मेगन यांनी ठामपणे सांगितल्यापासून डॉनल्डनी मेगन यांच्याशी कोणत्याही पद्धतीने संपर्क येऊ न देण्याचं ठरवलं. त्याचीच परिणिती म्हणून आयोवा मध्ये पुन्हा एकदा मेगन केलीच प्रश्नकर्त्या असणार हे समजल्यावर या चर्चासत्राला हजर न राहण्याचा निर्णय घेतला. ट्रम्प यांच्या अनुपस्थितीत आयोवा येथील रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांचा  वाद - विवाद किती लोकं पाहतील? ट्रम्पनी ते नसल्याने लोकांचा या वाद - विवादामधला रस नाहीसा होईल असं म्हटलं आणि प्रत्यक्षात तसं झालंही. गेल्या उन्हाळ्यात रिपब्लिकन पक्षातील उमेदवारांचं वाद - विवाद सत्र २४ मिलियन लोकांनी पाहिलं तर आयोवातील वाद - विवाद  सत्र फक्त १३ मिलियन लोकांनी. कहर म्हणजे आयोवातील ही वाद - विवाद सभा जिंकली कुणी या प्रश्नाचं उत्तर पाहता निवडणूक पूर्व गोष्टी किती मनोरंजक आहेत याची खात्री पटते. सर्वसामान्यांच्या मते हा वाद - विवाद खर्‍या अर्थी जिंकला तो मेगन केलींच्या कृत्रिम पापण्यांनी!

ट्रम्प हे इतकं वादग्रस्त व्यक्तिमत्व असूनही ते लोकप्रियतेच्या शिखरावर  सातत्याने का आहेत आणि खरंच ते राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात असं कितीजणांना वाटतं? ते लोकप्रिय आहेत ते त्यांच्या वक्तव्यांमुळे. लोकांची प्रचंड करमणूक त्यांच्या उद्गगारांनी होत असल्यामुळे आता ट्रम्प काय बोलणार या प्रतीक्षेत लोक असतात. राजकारणाशी काडीचाही संबंध नसताना ते राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात असंही मानणारे असंख्य आहेत. त्यांना पाठिंबा असणार्‍यांच्या मते ते उत्तम व्यावसायिक आहेत त्यामुळे व्यवस्थापनचा उत्कृष्ट अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. डॉनल्ड राष्ट्राध्यक्ष झाले तर सीमेवर नुसतीच भिंत  बांधणार नाहीत तर त्याचा खर्च मेक्सिकन सरकारकडून घेण्याचा त्यांचा मानस आहे यामुळेही जनता खूष आहे. ते व्यावसायिक असल्याने नोकर्‍या निर्माण करण्याचा दांडगा अनुभव देशाचा कारभार हाकताना नक्कीच कामी येईल, या देशात नोकर्‍यांची उपलब्धता वाढेल याची खात्री अनेकांना आहे. त्यांच्या कंपनीचं अनेकवेळ दिवाळं निघूनही त्यातून ते बाहेर आले याचाच अर्थ ते पुनर्बाधणी करु शकतात.  ते राष्ट्राध्यक्ष झाले तर व्हाईट हाऊस मधील कामात गर्क होतील आणि वेळेच्या अभावी त्यांचा आता कंटाळवाणा झालेला ’अॲप्रेंटीस’ कार्यक्रम बंद करावा लागेल अशी स्वप्न पाहणारेही काहीजण आहेत.

घोडामैदान फार लांब नाही. रिपब्लिकन पक्ष त्यांना राष्ट्राध्यक्ष पदासाठी उमेदवारी देतो की नाही ते लवकरच कळेल. ८ वर्षापूर्वी रिपब्लिकन पक्षातील सारा पेलन नावाच्या वादळाने देशात खळबळ माजवली होती. याच सारा पेलन डॉनल्ड ट्रम्पना पाठिंबा देत त्यांच्या पाठीशी नुकत्याच उभ्या राहिल्या आहेत. एका वादळाची दुसर्‍या वादळाला साथ. आता डॉनल्ड ट्रम्प नावाचं हे वादळ आणखी कोणाकोणाला झोडपतं ते पाहत राहायचं. दुसरं काय!

http://www.loksatta.com/lekha-news/popular-donald-trump-1199210/

Wednesday, January 27, 2016

लॉटरी!

अमेरिकेत गेल्या आठवड्यापासून सरकारी लॉटरीच्या आकड्यात ती अद्याप न जिंकल्याने भर पडत चालली आहे तशीच ती विकत घेणार्‍यांच्या संख्येतही. १.५ बिलियन डॉलर्स!  लागली लॉटरी तर? फक्त २ डॉलर्समध्ये मिळणार्‍या एका तिकिटाला जिंकण्याची शक्यता किती? तर २९० मिलियन तिकिटातून एक. तरी दरवर्षी जवळ जवळ ७० बिलियन लोक लॉटरी तिकिट खरेदी करतात. या वेळेलाही प्रत्येकाला आपणही जिंकू शकू असा विश्वास वाटायला लागलाय. बातम्या पाहताना आम्हीदेखील घरात लॉटरी लागली तर काय करु याचे बेत करुन टाकले. लहानपणी वडील दर महिन्याला लॉटरीचं तिकीट घ्यायचे. कधी ५० रुपयांच्या वर लॉटरी लागली नाही तरी महाराष्ट्र राज्य लॉटरीचं तिकीट घरात यायचं. रोज लॉटरीच्या बातम्या पाहून आज आपणही तिकीट आणूया असा बेत करुन टाकला. पण लॉटरी जीवनात आनंद घेऊन येते की  शेवटी आनंद हा मानण्यावर हेच खरं?

अमेरिकेत, पॉवर बॉल आणि मेगा मिलियन ही  लॉटरींची दोन मोठी नावं. १९९२ साली सुरु झालेला पॉवरबॉल कमीत कमी ४० मिलियनचा तर १९९६ सालापासून सुरु असलेली मेगा लॉटरीची  कमीत कमी रक्कम १५ मिलियन डॉलर्स  असते. पॉवर बॉलचं १ तिकिट २ डॉलर्सला तर मेगा मिलियनच्या एका तिकिटाची किंमत १ डॉलर. सध्या कुणाकडेच विजेते आकडे नसल्याने पॉवरबॉलची रक्कम वाढत चालली आहे. दर बुधवारी आणि शनिवारी निकाल जाहीर होतो. ६९ चेंडूमधले ५ आकडे जुळले तर तुमचं नशीब उजळतं. पण त्या व्यतिरिक्त असणारा आणखी १ चेंडू तुमचं आयुष्य बदलून टाकणारा ठरतो. या भाग्यशाली चेंडूवरचा आकडा आणि उरलेले ५ आकडे तंतोतंत जुळले की झालात तुम्ही मिली किंवा बिलि नअर.

देशात विकली जाणारी सगळीच्या सगळी तिकिटं विकत घेतली तरीही लॉटरीतून तुम्हाला फायदाच होऊ शकतो इतकी मिळणारी लॉटरीची रक्कम जास्त आहे. सर्व तिकिटांची किंमत आहे ५८४ मिलियन डॉलर्स आणि यावेळची लॉटरी आहे ९३० मिलियन डॉलर्सची.  अडचण इतकीच की इतकी सगळी तिकिटं विकत घेणं एखाद्या व्यक्तीला शक्यच नाही. पूर्ण देशात तिकिट विक्री होते. प्रत्येक ठीकाणाहूनची सर्व तिकिटं घेणं निव्वळ अशक्य. तरीही फेब्रुवारी १९९२ मध्ये काही  कंपन्यांनी एकत्र येऊन हे करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला ज्यात सर्वांना मिळून २.५ मिलियन डॉलर्सचीच तिकटं विकत घेता आली. पण लॉटरीसाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवल्या गेल्याच.  अशीच एक घडली २००५ साली. पॉवरबॉलच्या लॉटरीचे ११० लोकांचे ५ आकडे तंतोतंत जुळले आणि  जवळजवळ २० मिलियन डॉलर्सही या ११० जणांना मिळाले. काहीतरी गोंधळ असल्याची शंका अधिकार्‍यांना आली. आणि लवकरच त्याचं रहस्यही उलगडलं. न्यूयॉर्क मधील वोनटोन कंपनीने त्यांच्या बिस्किटांतून (फॉरच्यून कुकीज) ६ आकडे नशीबवान म्हणून वितरित केले होते आणि प्रत्यक्षात ते खरंच तसे निघालेही. पाच आकडे तर जुळले. जर सहावा आकडाही जुळला असता तर ह्या ११० लोकांना बिलिनिअर होण्याची संधी लाभली असती. बिस्किटांतला ६ वा आकडा होता ४० आणि लॉटरीमधील आकडा होता ४२.

मात्र आत्तापर्यंत जितक्या लोकांना लॉटरी लागली त्यातील फार कमी जणांनी ती खर्‍या अर्थी उपभोगली. बाकीच्यांना लॉटरीबरोबर आलेले ताण - तणाव झेपले नाहीत. अनपेक्षित धनलाभाने आयुष्यं खर्‍या अर्थी बदलतं. कधी सुखी जीवनाच्या मार्गावर पाऊल पडतं तर कधी हा पैसा डोकेदुखी होऊन जातो. अचानक तुमचं आयुष्य प्रकाशझोतात येतं. असंख्य समाजसेवी संस्था, उपचारांसाठी आर्थिक मदतीची अपेक्षा असणार्‍या रोग्यांचे नातेवाईक, गुंतवणुकीसाठी गळ घालणार्‍या कंपन्यां असे कितीतरी फोन वेळी अवेळी घणघणायला लागतात, कधीही न पाहिलेल्या नातेवाइकांचा जीवनात अलगद शिरकाव होतो, मित्र - मैत्रीणींची जवळीक नको तितकी वाढायला लागते. अशी एक ना अनेक उदाहरणं.

२००५ साली लॉटरी जिंकल्यावर लुईसने आपली स्वप्न पूर्ण केली. नवीन घर घेतलं. दाराशी नवीन गाडी आली. लुईसच्या नवर्‍याने, किथने बेकरीतली नोकरी सोडली आणि दिवस अंगावर यायला लागला. मन रमविण्यासाठी तो दारुकडे वळला. व्यसनाधीन झाला. दारुच्या व्यसनातून तो प्रयत्नपूर्वक बाहेर तर पडला पण जेम्स नावाच्या अनोळखी गृहस्थाने  नफ्याचं आमिष दाखवीत वेगवेगळ्यात धंद्यात त्याला पैसे गुंतवायला भाग पाडलं. त्याने गुंतवलेले सगळे धंदे नामशेष झाले. हातातला पैसा संपला तसा पुन्हा तो दारुकडे वळला. आत्तापर्यंत साथ देणारी त्याची पत्नीही कंटाळून वेगळी झाली. बेकरीतील कामगाराचं साधंसुधं जीवन पैसा आल्यावर रसातळाला गेलं आणि आलेल्या ताणातून, दारुने केलेल्या शारीरिक हानीमुळे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने किथचं २०१० साली निधन झालं.

केली रॉजरने ३ मिलियन डॉलर्सची लॉटरी जिंकल्या जिंकल्या नातेवाईक आणि मित्र मैत्रिणींवर गाडी, घर अशा महागड्या भेटवस्तूंचा वर्षाव केला. कपडे, सुंदरतेचा हव्यास बाळगत त्या पायी केलेल्या अतोनात उधळपट्टीतून  हाती आलेला पैसा केव्हा वाहून गेला  ते केलीला समजलंही नाही. मित्र - मैत्रिणींना आनंद मिळावा ही तिची इच्छा असली तरी लवकरच प्रत्येकजण तिच्या पैशावर डोळा ठेवून तिच्याशी मैत्री करत आहेत असं तिला वाटायला लागलं. आलेल्या अनुभवांनी निराश होत दोनवेळा आत्महत्येचा प्रयत्नही तिने केला आणि अखेर सर्व पैसा गमावल्यावर आता मोलकरणीची कामं करणारी केली लॉटरीपायी आलेले अनुभव विसरुन आनंदी जीवन जगण्याची इच्छा व्यक्त करते.

५५ वर्षाच्या कत्रांटदार कंपनीचे अध्यक्ष असलेल्या व्हिटेकरनी ३१५ मिलियन डॉलर्सची लॉटरी जिंकली तेव्हाच त्यातील बरीचशी रक्कम देणगी, ट्रस्ट यासाठी राखली इतकंच नाही तर जिथून त्यांनी हे तिकिट घेतलं होतं त्या दुकानातील कर्मचारी स्त्रीलाही त्यांनी घर, गाडी आणि रोख रक्कम दिली. असं असताना मग काय चुकलं? व्हिटेकर मित्र - मैत्रिणींसमवेत आनंद साजरा करायला वेगवेगळ्या क्लबमध्ये जायला लागले, दारुच्या अधीन झाले, जुगाराचा नाद लागला. मुलीला, नातीला वेळोवेळी आवश्यकता नसताना ते पैसे देत राहिले आणि त्यांच्याबरोबरीने त्या दोघी अमली पदार्थांच्या आहारी गेल्या.  त्यातच दोघींनी आपला जीव गमावला.  सुखासीन आयुष्य जगणार्‍या व्हिटेकर कुटुंबाचं आयुष्य लॉटरीच्या पैशांनी धुळीला मिळालं.

३१ मिलियन डॉलर्सची लॉटरी अब्राहमनी जिंकली. सुरुवातीची ३ वर्ष  सुखसमाधानातही गेली. पण अचानक एके दिवशी त्यांचा मृतदेह सापडला. त्यांचा खून करणार्‍या स्त्रीला अटक झाल्यावर अब्राहमनी लॉटरी जिंकल्यावर त्यांच्याशी मैत्री करुन जवळजवळ २ मिलियन डॉलर्सला त्यांना लुबाडल्याचं आणि नंतर मारल्याचं कबूल केलं. शिकागो येथील उरुज खानही  लॉटरी लागल्यानंतर महिन्याभरात मॄतावस्थेत सापडले. भारतातून आलेल्या खान कुटुंबाचं जीवन सुखी म्हणावं असंच. उरुजना असलेला लॉटरीचा नाद सोडल्यास. लॉटरी लागल्यावर मिळालेल्या पैशाचं काय करायचं याबद्दल त्यांच्या कुटुंबात वाद - विवाद होते आणि त्यातूनच त्यांना विष घालून मारण्यात आलं असावं अशी शंका असली तरी त्यांच्या मारेकर्‍याचा शोध अद्याप लागलेला नाही.

बिलींच्या आयुष्यानेही लॉटरीमुळे वेगळ्या मार्गावर वाटचाल सुरु केली. मोठ्या घरात राह्यला जायचं घरातल्या सर्वांचंच स्वप्न पूर्ण झालं. बायको, मुलांना नवीन गाड्या घेऊन देता आल्या. इतकंच नाही नातेवाइकांनाही त्यांनी खूश ठेवलं. कुणालाही मदतीची गरज असली की रोख पैसे देण्याची त्यांची तयारी असे. लवकरच त्यांच्या लक्षात आलं की प्रत्येकालाच त्यांची गरज आहे आणि इतक्या सर्वांना एकट्याने पुरं पडणं निव्वळ अशक्य. पण ते जमेल तशी मदत करत राहिले. पत्नीबरोबर सतत दुसर्‍यांना अशी पैशाची मदत करण्याबद्दल त्यांचे वाद व्हायला लागले आणि अखेर लॉटरी जिंकल्यावर केवळ दीड वर्षात निर्माण झालेल्या ताण तणावांनी आपलं जीवन संपवून त्यांनी सगळ्याला पूर्ण विराम दिला.

अर्थात लॉटरीचा पैसा व्यवस्थित गुंतवून, आपला दिनक्रम व्यवस्थित सांभाळणारीही माणसं अनेक आहेत. एमा आणि ल्युक त्यातलेच एक. ल्यूक आणि एमा मॅकडोनल्ड मध्ये काम करता करता प्रेमात पडले पण स्वतंत्र घरासाठी दोघांचा एकत्रित पगारही पुरेसा नसल्याने पालकांच्या घरीच त्यांना राहावं लागत होतं. मिलियन डॉलर्सची लॉटरी लागल्यावर नोकरी सोडायची नाही हा निश्चय काही काळापुरता टिकला. पण मुलाबरोबर वेळ घालवण्याला दोघांनी प्राधान्य दिलं, त्याचबरोबर नोकरीचा राजीनामा. पण काही दिवसातच सहकारी, नोकरी यांच्या आठवणीने चैन पडेनासं झालं. ल्यूकने पुन्हा जुन्याच जागी नोकरीला सुरुवात केली. लॉटरी पैशावर मिळणारं व्याजंही त्या दोघांच्या पगारापेक्षा जास्त होतं पण दैनंदिन जीवन न बदलता लॉटरीच्या पैशाचा आनंद उपभोगणं दोघांना जास्त सुखावह वाटलं.

रॉबिनसनने लॉटरी जिंकल्यावर शाळेतील शिक्षकांमुळे प्रेरित होऊन मुलांसाठी कार्यशाळा उभी करण्यासाठी लॉटरीतील बरीचशी रक्कम देऊ केली. आज २० वर्षानंतर ती कार्यशाळा उत्तमरीत्या चालविली जात आहे. बर्‍याच जणांनी मुलांच्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी पैसे गुंतवले तर काहीजणांनी आपल्याला लॉटरी लागली आहे हे काही महिने इतरांना कळू न देता पुढचे ताण टाळण्याचा प्रयत्न केला.  बहुतेकांनी सामाजिक जाणिवेने आपल्याला मिळालेल्या रकमेतील बरेच पैसे देणगी म्हणून देण्याला प्राधान्य दिलं.  थोडक्यात काही जण आधीही आनंदी होतेच. श्रीमंतही झाले. मनाने होतेच आता आर्थिक दृष्ट्याही.

खरंच पैशाने आयुष्यात आनंदाचा शिरकाव होतो का? यावर झालेल्या संशोधनातून असं सिद्ध झालं आहे की पगारवाढ झाली की नक्कीच सुखात भर पडते पण एका विशिष्ट वाढीनंतर त्याचा फारसा परिणाम जाणवत नाही. किंबहुना पैशाने सुख विकत घेता येत नाही ह्याचाच पैशाचा ओघ स्वत:कडे वळल्यावर बहुतेकांना शोध लागतो.

आणि तरीही आपण लॉटरी लागली तर... हे स्वप्न पाहणं विसरत नाही!

पूर्वप्रसिद्ध - लोकसत्ता - चतुरंग पुरवणी - http://www.loksatta.com/lekh-news/lottery-1192070/

Saturday, January 16, 2016

ग्लोबल कोकणी - अमेरिकन मंचावर...

(लोकमतच्या वर्धापन दिनानिमित्त प्रसिद्ध झालेल्या ग्लोबल कोकणी विशेषांकातील माझा लेख.)

"आय हॅव टू पिक अप द रोल." वाटेत घोकून घोकून पाठ केलेलं वाक्य म्हटलं आणि विक्रेतीच्या चेहर्‍यावरचे गोंधळलेले भाव बघून मी बावचळले.
"रोल?" तिने चमत्कारिक उच्चारात विचारलं.
"यस." मी तोंड वेडंवाकडं करत उच्चार केला. गोर्‍यांशी बोलताना तोंड थोडं वाकडं केलं की आपल्या फ्लाइंग राणीच्या वेगाला जरा खीळ बसते आणि आपण काय बोलतोय ते त्यांना समजतं असा एक फंडा कुठूनतरी माझ्या डोक्यात शिरला होता. तो वापरायची ही पहिली संधी. माझं तोंड बराचवेळ वाकडंच राहिलं पण तिला काही रोल म्हणजे काय ते समजेना. कुठून ही दुर्बुद्धी सुचली कोण जाणे.  या देशात पाऊल टाकलं आणि आठवड्याच्या आत रोल आणायला बाहेर. काय करणार? विमानतळापासून फोटो काढायला सुरुवात केली होती. विमानातल्या  संडासाचंही अप्रूप होतं २० वर्षापूर्वी. रोल पटकन संपलाच त्यामुळे. आता फोटो भारतात पाठवून देण्याची घाई. तरी नवरा म्हणत होता,
"जरा टी. व्ही. बघ थोडेदिवस. त्या टी. व्ही. तली माणसं जशी बोलतात ना तशीच बोलतात ही सगळी. त्यांचं कळायला लागलं तरी आपलं बोलणं त्यांना कळणं हे पण लढाईवर जाण्यासारखंच असतं. तेव्हा सबुर!" पण नवर्‍याचं न ऐकणं हा पत्निधर्म निभावत मी आखाड्यात उतरले. आता रोल, रोल करता करता नवराच काय, माझी  शाळाही आठवली. कणकवलीच्या एस. एम. ज्युनिअर महाविद्यालयात शुक्ल सर इंग्रजी बोला, इंग्रजी बोला म्हणून कानीकपाळी ओरडायचे तो सल्ला ऐकला नाही याचा पश्चाताप व्हायला लागला. अखेर माझ्या आणि विक्रेतीच्या मध्ये असलेल्या अभेद्य भितींतून म्हणजे काचेच्या लांबलचक टेबलावरुन बोट दाखवत, खाणाखुणा करत तिच्या पाठीमागे असलेल्या मोठ्या कपाटातल्या वरतून चौथ्या रांगेतल्या कप्प्यात असलेला कॅमेरा तिला दाखविण्यात मी यशस्वी झाले. मग तो कॅमेरा हातात धरुन, फोटो काढण्याची कृती करत, रोलची जागा दाखवण्याचा कार्यक्रम पार पडला. अखेर तिला मला काय हवंय ते समजलं आणि ती आनंदातियाशाने किंचाळली,
"यु मीन फिल्म?" आता मी गोंधळले. ही लोकं रोलला फिल्म म्हणतात? पण तोंड वाकडं करत बोलण्याची माझी खुमखुमी थंडावली होती. आता ती जे काही देईल ते रोल म्हणून वापरायला मी तयार होते. रोल घेऊन घरी आले आणि नवर्‍याला म्हटलं,
"शाळेत शिक्षकांचं ऐकायला हवं होतं रे."
"आम्ही ऐकायचो." त्याचा शांतपणा ढळला नाही.
"मी माझ्याबद्दल बोलतेय."
"बरं, बरं पण इतकं का भाग्यं उजळलं शिक्षकांचं?"
"हे बघ, तुला माहितीच आहे. माझं काही तुझ्यासारखं शिकण्याचं माध्यम इंग्रजी नव्हतं. मराठी माध्यमातून शिकलेली, कोकणात जन्मलेली, वाढलेली मी."
"तू पालघरला होतीस ना? ते कुठे कोकणात?"
"तू म्हणजे ना. काही वर्ष होतो रे पालघरला. पण जन्म कणकवलीचा, प्राथमिक शिक्षण देवरुखच्या भोंदे शाळेत, उच्चमाध्यमिक कणकवलीच्या एस. एम. हायस्कूलमधून आणि त्यानंतर कणकवली महाविद्यालयात.  महाविद्यालयीन आणि उच्चमहाविद्यालयीन रत्नागिरीला गोगटे जोगळेकर महाविद्यालयात. फक्त माध्यमिक शिक्षण पालघरच्या आर्यन एज्युकेशन मध्ये. म्हणजे अमेरिकेत यायच्या आधीचं आयुष्य जवळजवळ कोकणातच गेलं ना?"
"पण हे तू मला का ऐकवते आहेस?"
"कधी वाटलंच नव्हतं ना  परदेशात येईन म्हणून. इंग्रजी हीच बोलण्याची भाषा होऊन जाईल याची कल्पनाही केली नव्हती. तुझ्याबरोबर म्हणून या देशात पाऊल टाकलं पण तिकडे जशी माझी स्वत:ची ओळख होती आकाशवाणी, लेखन, अभिनय या माध्यमातून  तशीच इथेही ती व्हायला हवी असं वाटतं. पण सुरुवात उच्चारांपासून आणि इंग्रजी बोलण्याच्या आत्मविश्वासाच्या अभावापासून होतेय ना म्हणून वाटतंय ऐकायला हवं होतं शिक्षकांचं. आम्हाला इंग्रजीचे शिक्षक नेहमी म्हणायचे अभ्यासापुरतं इंग्रजी शिकू नका. ते वापरा, बोला. कुठेही तग धरता येईल त्यामुळे. आज ते पटलं."
"तुझ्या शिक्षकांना कळवून टाक हे. बरं वाटेल त्यांना. आणि इतकं काही कठीण नाही इंग्रजीची सवय करणं. जमेल तुला." त्याने विषय संपवला. माझ्या मनात मात्र बराचवेळ अमेरिकेला येईपर्यतचा काळ फेर धरत राहिला.

वेगवान आयुष्य मागे पडून अचानक शांतपणाने प्रवेश केला होता. नव्या देशाची, नवीन जगाची अपूर्वाई होती तशीच इथे कसं रुळणार याची धास्तीही. H4 वर आल्याने नोकरी करता येणार नव्हती, काही शिकायचं म्हटलं तर त्या त्या राज्यात किमान १ वर्ष राहिल्यानंतरच शिक्षणाचा खर्च कमी होऊ शकत होता. २ च वर्ष भारतीय कंपनीने पाठवलं होतं तर फारशी कशाची चिंता न करता हे नवं जग अनुभवावं असंही वाटत होतं. शेवटी सुरुवातीला तेच केलं. हातात लेखणी होती. रत्नागिरी आकाशवाणीसाठीचं लेखन, रत्नभूमीसाठी महाविद्यालयीन जीवनात चालवलेलं ’तरुणाई’ सदर, आमचं दिनांक साठी केलेलं लेखन आणि अधूनमधून सकाळ, रत्नागिरी टाईम्स, साप्ताहिक सकाळ, लोकसत्ता तसंच विविध मासिकांमधून लिहिलेले लेख, कविता, कथा या बळावर अमेरिकेतले अनुभव वेगवेगळ्या स्वरुपात कागदावर उतरायला लागले. १९९५ च्या काळात लेखन पोस्टाने किंवा तत्कालिक घडामोडींवरील लेख वर्तमानपत्रांना फॅक्सने पाठवणे हे दोनच मार्ग होते. लिहिण्यासारखं खूप होतं. त्यात दिवस पुरेनासे झाले. दरम्यान नवर्‍याच्या नोकरीमुळे भटकंतीही चालू होती. अमेरिकेतल्या राज्याराज्यामधलं जीवन म्हटलं तर एकसारखंच पण तरीही किती वेगळे पैलू असलेलं आहे ते जाणवायला लागलं. अमेरिकन मित्र, मैत्रीणींबरोबरच इतर देशातल्या लोकांशीही  मैत्री व्हायला लागली. भारतात महाराष्ट्रापुरतं मर्यादित असलेलं अनुभवविश्व व्यापक झालं. लेखनातून व्यक्त होत राहिलं. त्याचाच परिपाक म्हणजे,  उन्मेष प्रकाशनाने प्रसिद्ध केलेला ’मेल्टिंग पॉट’ हा कथासंग्रह, ज्याला कोमसापचा उत्कृष्ट कथासंग्रहाचा पुरस्कार प्राप्त झाला. पाहता पाहता २ वर्षांची आणखी काही वर्ष झाली आणि अजून काही वर्ष इथेच राहायचं ठरल्यावर नोकरीचे आणि इथल्या प्रवाहात सामील होण्यासाठी  लागणार्‍या शिक्षणाचे वेध लागले. संगणकीय शिक्षणाला तेव्हाही तेवढंच महत्व होतं पण ते आवडेल की नाही याची खात्री नव्हती त्यामुळे आधी छोटे छोटे कोर्स करुन अंदाज घ्यायचं ठरवलं. वयाच्या ३० शी नंतर पुन्हा महाविद्यालयात पाऊल टाकायचं आणि तेही पूर्णपणे परक्या देशात या विचारानेच अस्वस्थपणा आला होता. अस्वस्थ मनाने वर्गात प्रवेश केला आणि क्षणात तो पळालाही. माझ्या आई - वडिलांच्या वयाचे विद्यार्थी पाहून मी अगदीच बालवयात महाविद्यालयात आल्याची खात्री झाली आणि एक वेगळाच आत्मविश्वास आला. नंतर वर्ग शिक्षक आणि विद्यार्थ्यांमुळे तो टिकलाही. इथल्या शिक्षणाचा ढाचा वेगळा आहे. प्रात्यक्षिकांवर जास्त भर असतो, पाठांतरापेक्षा विषय समजण्याला महत्त्व आणि शिस्तीपेक्षा मित्रत्वाचा मार्ग स्वीकारला जातो. एकमेकांच्या अडचणी ओळखून त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जातो. त्यासंदर्भात अजूनही एक आठवण मनात ताजी आहे.
मुलाला सांभाळणारी मुलगी त्या दिवशी येऊ शकली नाही तेव्हा शेवटचा पर्याय म्हणून मुलगा माझ्याबरोबर आला तर चालेल का असं मी मिस्टर स्मिथना घाबरत घाबरत विचारलं. तात्काळ त्यांनी होकार भरला. मुलाला घेऊन वर्गात पाऊल ठेवलं आणि मिस्टर स्मिथनी माझ्याकडे हसून पाहिलं. तिथेच थांबायला लावलं.
"आज आपल्या वर्गात एक छोटा दोस्त आला आहे." पूर्ण वर्गाला मिस्टर स्मिथनी माझ्या मुलाची ओळख करुन दिली. ६ वर्षाच्या माझ्या मुलाने लाजत लाजत ’हाय’ केलं. वर्ग होता महाविद्यालयाचा आणि मुलं होती वय वर्ष ३० पासून ७५ च्या आसपास. तो दिवस त्याच्यासाठी आणि माझ्यासाठीही कायमचा स्मरणात राहिला

शिक्षण चालू असतानाच नोकरीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्र आली.   मी शिकता शिकता बदली शिक्षकांची तात्पुरती नोकरी करायचं ठरवलं. त्या वेळेला शिक्षकांची आवश्यकता आहे असं सतत टी. व्ही. वर आवाहन असायचं. म्हटलं, जमलं तर करुन पाहू.   मुलगा म्हणाला,
"आई, तू  शिकवणार शाळेत जाऊन?"
"मग? शिकलेली आहे मी भारतात."
"पण तुला नाणी कुठे येतात ओळखता?"
"तुला कुणी सांगितलं?"
"मी क्वार्टर मागितलं की तू एकेक नाणं काढून त्याच्यावरचं चित्र बघतेस, चित्र कुणाचं ते कळत नाही तुला."
"हे बघ, गांधीजी असतात का त्या नाण्यावर? नाही ना? मग कसं ओळखणार रे?"
"पण मग कशाला बघतेस चित्र?"
"उद्योग नाही म्हणून. पुढे बोल."
"क्वार्टर म्हणून डाईम देतेस असं सांगत होतो."
"भारतातली नाणी आणून दे मला. बघ किती पटकन ओळखते ते. तू अभ्यासाला बस आता."
त्याला घालवला खरा, पण शिकवायला सुरुवात केल्यावर इथली शिक्षणपद्धती, शिकवण्यातील पद्धतशीरपणा, प्रयोग, वेगळेपणा याचा सुखद अनुभव घेतानाच काही गमतीदार प्रसंगही घडले.

शाळेचा पहिलाच दिवस. दुसरीचा वर्ग. मार्च महिन्यातला सेंट पॅट्रीक डे.
गोष्ट वाचून दाखवायची होती. तसं सुरळीत चाललं होतं. Leprechaun इथे गाडी अडली. उच्चार लेप्रचॉन की लेप्रचन? का काहीतरी वेगळाच. मी  एकदा हा एकदा तो, दोन्ही उच्चार करत गाडी हाकली. घरी येऊन म्हटलं आज लेपरचनची गोष्ट सांगितली. मुलाचं आपलं खुसखुस, खुसखुस.
"हसू नको. नीट सांग काय ते."
"लेप्रीकॉन आहे ते" वर म्हणाला,
"तू माझ्या वर्गावर येऊ नको. घरीच शिकव मला काय असेल ते."
त्याच्या नाही पण दुसर्‍या वर्गांवर जाण्याची माझी चिकाटी दांडगी. दुसर्‍या दिवशी गेले तर संगीताचा वर्ग.  मराठीतही संगीताचा गंध नसताना एकदम इंग्रजीत संगीत कसं शिकवायचं?
मी कार्यालयात गेले. माझे थरथरणारे हात, भेदरलेला आवाज याने काही फरक पडला नाही,
"आज वेळ मारून ने. उद्या कुणालातरी आणतो आम्ही."
उडालेच, बदली शिक्षकाचं माझं हे काम वेळ मारून नेणं होतं?  मेलं, घरी तसंच, इथेही तेच. कुणाला म्हणून किंमत नाही माझ्या कामाची... आलीया भोगासी!
त्यानंतर रोज रात्री इंग्लिश गाणी शिकण्याचा सपाटा लावला मी घरी कारण दुसर्‍या दिवशी आणखी कुणाला तरी न आणता वेळ मारुन न्यायला त्यांनी मलाच तिथे ठेवलं. शाळेने माझी सलग पंधरा दिवसासाठी संगीत शिक्षिका म्हणून नेमणूक करून टाकली. पोरं कितपत शिकली देवजाणे पण मला बरीच गाणी यायला लागली आणि नवरा, मुलगा दोघांना जी काही इतर गाणी येत तीही विसरले ते दोघं. नवरा तर म्हणाला,
"तसा मी बरा कमावतोय की, तुला खरंच गरज आहे का गाणीबिणी शिकवण्याची?" मी उत्तर न देता मोठ्याने गाणं म्हणत राहिले आणि आगळेवेगळे अनुभव घेत  ३ वर्ष शिक्षक म्हणून कार्यरत राहिले.

दरम्यान हातात पदवी आली होती. जिथे शिकत होते तिथेच आधी इंटर्नशिप करुन वेब प्रोग्रॅमर म्हणून स्थिर झाले. महाविद्यालयात असलेले जवळजवळ १८० वेगवेगळे विभाग आणि त्यांची संकेतस्थळं तयार करणं, अद्ययावत ठेवणं हे आमच्या गटाचं काम. कार्यालयात सर्वांना नावानेच संबोधण्याच्या प्रथेमुळे आपसूकच जवळीक निर्माण होते.  एकमेकांना सांभाळून, अडीअडीचणी ओळखून मार्ग काढणं महत्वाचं मानलं जातं. कोणत्याही कामाचं व्यवस्थित नियोजन,  कागदावर सारा आराखडा करणं हे सुरुवातीला फार कंटाळवाणं वाटायचं पण त्याचमुळे ठरल्याप्रमाणे काम  पार पाडलं जातं आणि त्याचा दर्जाही उत्तम राखता येतो हे लक्षात आलं आणि तेच अंगवळणीही पडलं.

एकीकडे नोकरी बरोबरच लेखनही चालू असतानाच अभिनयाची मूळ आवड स्वस्थ बसू देत नव्हती. कणकवलीच्या नाथ पै एकांकिकांमधून आधी शालेय गटातून, नंतर बागेश्री संस्थेतून काम करुन मिळवलेली अभिनयाची बक्षिसं, रत्नागिरीच्या जिज्ञासा संस्थेतून गाजवलेल्या अनेक स्पर्धांच्या आठवणी स्वस्थ बसू देत नव्हत्या. त्यातूनच ’अभिव्यक्ती’ या नाट्यसंस्थेची निर्मिती झाली. दरवर्षी व्यावसायिक रंगमंच भाड्याने घेऊन दोन एकांकिकाचं सादरीकरण सुरु झालं. दिग्दर्शन, अभिनय, नेपथ्य, काहीवेळा एकांकिका लेखन, जाहीरात, तिकीट विक्री अशा सगळ्या बाजू नवर्‍याच्या आणि माझ्या मुलांच्या मदतीने  तसंच येथील स्थानिक कलाकारांच्या मदतीने सांभाळत गेली ८ वर्ष दरवर्षी इथे एकांकिका सादर करतोय. त्याला मराठी प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद उत्साह वाढवणारा आहे.

मागे वळून पाहताना जाणवतं ते हेच की परक्या देशात १९९५ च्या आसपास मुळं रुजवणं सोपं नक्कीच नव्हतं. आतासारखी संपर्काची आधुनिक साधनं नव्हती. १५ दिवसांनी भारतात फोन व्हायचे. पत्र पाठवलं की ३ आठवडे आतुरतेने उत्तराची वाट पाहण्यात जायची. पण हा परका देश ’आपला’ कधी होऊन गेला तेच समजला नाही. भारतात कुणी अमेरिकेबद्दल ऐकीव माहितीवर तारे तोडले की तळमळीने आम्ही खर्‍या परिस्थितीची जाणीव करुन देतो आणि इकडे आमच्या सहकार्‍यांनी, अमेरिकेन मित्र, मैत्रिणींनी भारताबद्दल काही शेरे मारले की त्याच कळकळीने गैरसमज दूर करण्याच्या प्रयत्नाला लागतो. दोन्ही देश आमचेच. एक कर्मभूमी, दुसरी मातृभूमी!

Monday, October 12, 2015

काळीज कुरतडणारी वेदना


"आर यू ख्रिश्चन?" या प्रश्नावर ज्यांनी माना डोलवल्या, उभे राहिले त्यांच्यावर "गुड, विदीन अ मिनिट यु विल सी गॉड" असं म्हणत त्या तरुणाने गोळ्या झाडल्या. ऑरेगन राज्यातील एका आडगावातील कम्युनिटी कॉलेजमधील अनेक तरुण जीव नाहक प्राणाला मुकले. या वर्षात विद्येच्या आवारात घडलेली ही ४५ वी घटना. दरवेळेसारखाच पुन्हा एकदा ’गन कंट्रोल’ हा विषय चघळला जाईल ते पुढची घटना घडेपर्यंत. मोजणंही कठीण होऊन जावं इतक्यांदा हे असे प्रसंग घडतायत या देशात. दरवेळेला भयभीत चेहर्‍याची मुलं शरण आल्यासारखी दोन हात डोक्याच्या मागे धरुन आवाराच्या बाहेर पडतात. पोलिस, ॲम्युबलन्सेस, प्रसारमाध्यमांसमोर हमसाहमशी रडणारे तरुण जीव आणि पोटच्या जीवांच्या काळजीने धावत पळत पोचलेले पालक हे असं दृश्य दुर्देवाने वारंवार पाहायला मिळतं. दरवेळेला कुणाच्यातरी माथेफिरुपणामुळे निष्पाप मुलांना, त्यांच्या शिक्षकांना प्राण गमवावा लागतो. धक्कादायक म्हणण्याच्या पलिकडे गेलं आहे हे.
शाळांमध्ये होणार्‍या गोळीबारांबद्दल चर्चा सुरु झाली की हमखास ती पोचते १९९९ सालापर्यंत. २० एप्रिल १९९९ साली कॉलोरॅडो राज्यातील लिटीलटन कोलंबाईन हायस्कूल मध्ये दोन तरुणांनी अंदाधुंद केलेल्या गोळीबारात १३ मुलं मारली गेली तर ३० हून अधिक जखमी झाली. ह्या घटनेने देश हादरला पण त्या आधी आणि नंतरही सातत्याने हे सत्र चालूच आहे. २००७ साली व्हर्जिनिया पॉलिटेक्नीक मध्ये झालेल्या गोळीबारात ३२ मुलं आणि शिक्षक मारले गेले. या घटनांचा गाजावाजा जास्त झाला कारण मृत्यू पावलेल्या मुलांची संख्या. इतर ठीकाणी बळी गेलेल्यांची संख्या कमी असली तरी शाळेत होणार्‍या गोळीबारांच्या संख्येत वाढच होत चालली आहे. वर उल्लेख केलेल्या घटनांचे पडसाद हळूहळू हवेत विरतायत तोच २०१२ साली सॅंडीहूक प्राथमिक शाळेतली २० चिमुरडी मुलं आणि ६ शिक्षक अशाच गोळीबाराला हकनाक बळी पडले. या घटनेने सारा देश सुन्न होऊन गेला. त्यानंतर म्हणजे, १ ऑक्टोबर २०१५ ला घडलेला हा वर्षभरातला ४५ वा गोळीबार. प्रत्येकवेळेला मारेकर्‍यांने हे का केलं असावं याचा शोध, सोशल नेटवर्कवरचा मारेकर्‍याचा वावर, त्याने वेळोवेळी व्यक्त केलेली मतं, फोटो यावरुन बांधला जाणारा अंदाज यालाही अंत नाही. यात भर म्हणून आता कधी गोळीबार करणार्‍या मुलांच्या पालकांना, त्यांचं आपल्या मुलांवर नियत्रंण नाही म्हणून, सरकारला, शाळा मुलांचं रक्षण करु शकली नाही म्हणून, काही ठीकाणी शाळेतील कर्मचार्‍यांना, सरतेशेवटी आता बंदूक उत्पादक तसंच २५ कंपन्यांना चित्रपट आणि संकेत स्थळांवर खेळल्या जाणार्‍या खेळांमुळे मुलं हिंसकतेचा मार्ग चोखाळतात म्हणून काही पालकांनी कोर्टात खेचलं आहे. या सार्‍यातून अशा घटनांना आळा घातला जाऊ शकेल असा मार्ग खरंच सापडणार आहे की त्यातही स्वत:च्या फायद्याचा रंग आहे हे उमजणं आतातरी कठीण आहे. काळच ते ठरवील. दरवेळेला अशा घटनांची कारणमीमांसा शोधण्याचा प्रयत्न होत राहतो. निघालेल्या निष्कर्षातून उपायाची अमंलबजावणी किती वेळा होते हा भाग वेगळा. राजकारणाचे रंग इतके गडद आहेत की त्यातून ’गन कंट्रोल’ सारखे सर्वसामान्यांच्या दृष्टीने सहजसाध्य असणारे उपाय किती जणांचे बळी गेल्यावर होणार ते राजकारणीच जाणोत. तोपर्यंत हे असे प्रसंग वारंवार सर्वांच्या वाट्याला किती दिवस येत राहणार याचाच विचार मन कुरतडत राहणार. ह्याच पार्श्वभूमीवर गोळीबार करणार्‍या काही तरुणांच्या आई - वडिलांच्या मनाचा प्रसारमाध्यमांनी घेऊ पाहिलेला वेध महत्वाचा ठरावा.
कोलंबाईन हायस्कूल मधील गोळीबार करणार्‍या डिलनच्या आई - वडिलांनी त्या घटनेनंतर जवळ जवळ १५ वर्षांनी ’फार फ्रॉम द ट्री’ या पुस्तकासाठी अॲड्रुयु सोलोमनला मुलाखत दिली. प्रसारमाध्यमांनी वेळोवेळी संपर्क साधूनही इतके दिवस मौन बाळगलेल्या सुझनने अखेर आपलं मन मोकळं केलं. गुन्हा करणार्‍या मुलांच्या पालकांकडे सर्वात प्रथम दोषी म्हणून पाहिलं जातं. पालक म्हणून या मुलांचे आई - वडिल काय करत होते असं म्हटलं जातं. डिलनची आई सुझन यावर सांगते, की जेव्हा कोलंबाईन शाळेत गोळीबार झाला तेव्हा डिलनच्या मित्राचा, डिलनचा पत्ता लागत नाही हे सांगण्यासाठी फोन आला. त्यावेळेस आपला मुलगाच यात सहभागी असेल अशी पुसटशी शंकाही मनाला शिवली नाही. पण सुझन घरी येईपर्यंत घराला पोलिसांनी वेढा घातला होता. हताशपणे या सार्‍याला सामोरं जाताना इतक्या जणांच्या मृत्यूला आपला मुलगा कारणीभूत ठरला यावर विश्वास ठेवणं सुझनला कठीण जात होतं. डिलनबद्दल सांगताना ती म्हणते, ’चार चौघांच्या मुलांसारखाच तोही वाढला. किंबहुना त्याची ओळख हुशार मुलगा म्हणूनच होती. जी गोष्ट करेल ती मन लावून करणारा मुलगा होता तो. वडिलांबरोबर तास न तास बुद्धीबळ खेळणं हा त्याचा आवडता छंद. पालक म्हणून आमच्या समोर कधीच कोणतीही आव्हानं त्याने उभी केली नाहीत. व्हिडीओ गेम्स, स्वत:च्या खोलीत तास न तास काढणं हे जी इतर मुलं या वयात करतात तेच तोही करत होता. एकमेव प्रसंग होता तो, कधीतरी रात्री त्याने आणि एरिकने रस्त्याच्या कडेला उभी असलेली गाडी उघडल्याचा. त्याची शिक्षाही त्याने भोगली होती. मात्र त्यावरुन तो हे टोक गाठेल किंवा ही त्याच्यातील विक्षिप्तपणाची लक्षणं आहेत अशी शंकाही आली नाही.’
डिलनच्या या कृत्यानंतर सुझनच्या मनात कितीतरी वेळा आत्महत्येचा विचार डोकावून गेला. तिचं बाहेर जाणं बंद झालं, नोकरीवर पुन्हा रुजू होऊनही कामातलं लक्ष उडालं. तिच्या वेळी अवेळी रडण्याने आजूबाजूच्या लोकांची अवस्था अवघड होऊन जाई. ते जाणवत असूनही तिला जोरजोरात रडावंसं वाटे. आडनाव सांगण्याचीही शरम वाटायला लागली. रेडिओ, टीव्ही लावण्याचं बळ गेलं. आपल्या मुलाने असं करावं यावर विश्वास ठेवणं जितकं कठीण जात होतं तितकाच पालक म्हणून डिलन आणि एरीकचे आई - वडिलच गुन्हेगार आहेत असा प्रसार माध्यमांतून आळवला जाणारा सूरही सुझनचं काळीज भेदून टाकत होता. मुलाखतकर्त्याला ती सांगते, ’माझं मुल गमावल्याचा शोकही मी करु शकत नव्हते अशी अवस्था होती. काय चुकलं माझं? लाड केले जास्त की फार जास्त स्वातंत्र्य दिलं? नक्की काय चुकलं की त्याने असं वागावं? पालक म्हणून आमचं काय चुकलं ह्या प्रश्नाचं उत्तर कधीच मिळणार नाही का? हे कृत्य करण्याच्या थोडे दिवस आधी मी त्याचा हात तळव्यात धरुन माझं त्याच्यावरचं प्रेम व्यक्त केलं होतं, आई म्हणून त्याचा अभिमान वाटतो हे सांगायला विसरले नव्हते. याचाच विपरित परिणाम झाला असेल? माझ्या अपेक्षांना तो पुरा पडणार नाही हे तर त्याच्या मनाने घेतलं नसेल? खूप विचार करते तेव्हा आता मनातल्या मनात मीच त्याची क्षमा मागते कारण, कदाचित त्याला माझ्या मदतीची गरज असेल हे ओळखण्यात मी अपयशी ठरले.’ हे सांगून त्या गोळीबारात बळी पडलेल्या काही पालकांनी संपर्क साधला तो क्षण गहीवरुन टाकणारा असल्याचं ती सांगते. या गोळीबारात ठार झालेल्या मुलांच्या आई - वडिलांनी जेव्हा त्यांची भेट घेतली तेव्हा गहिवरलेल्या डिलन आणि एरिकच्या आई - वडिलांनी मुलांनी आपल्याला मुर्ख बनवल्याची भावना व्यक्त केली.

सॅंडी हुक प्राथमिक शाळेत गोळीबार केलेल्या घटनेतला गुन्हेगार होता अॲडम लान्झा. याच्या बाबतीत मात्र त्याचे वडिल त्याचं वेगळेपण नमूद करतात. लहानपणी लक्षात न आलेलं अॲडमचं वेगळेपण तो माध्यमिक शाळेत जायला लागल्यावर जाणवायला लागलं. काहीतरी चुकत होतं. अॲडम एक्कल कोंडा व्हायला लागला, नजर टाळायला लागला. त्याची झोप हरवली. शाळेत येऊन गोळीबार करणार्‍यापूर्वी स्वत:च्या आईला ठार मारणार्‍या अॲडम बाबत पालक म्हणून त्याची आई कमी पडली हे मात्र ते अमान्य करतात. अॲडम वडिलांबरोबर राहत नसला तरी अॲडमच्या आईने त्याच्यावर उपचार व्हावेत म्हणून प्रयत्न केला होता. मात्र आपल्याला उपचाराची गरज आहे हे मान्यच नसणार्‍या अॲडमचा उपचारांना दिला जाणारा प्रतिसाद उत्साहवर्धक नव्हता. मानसोपचार तज्ञांकडे त्याने कधीच मोकळेपणाने आपल्याला काय वाटतं ते सांगितलं नाही. यामुळेच पालक म्हणून आपण काही निराळं करु शकलो असतो हे त्यांना मान्य नाही. या सार्‍याचा वडिल म्हणून झालेल्या परिणामाबद्दल ते म्हणतात, ’रात्री खूपदा एकच स्वप्न पडतं. ज्यात दाराच्या पलिकडे कुणीतरी संतप्त नजरेने आपल्याकडे पाहतंय असं वाटतं. त्या चेहर्‍याकडे पाहिल्यावर माझी गाळण उडते. विचार केल्यावर लक्षात येतं की दारात उभा असलेला तो चेहरा अॲडमचा असतो आणि अॲडमच्या हातून प्राण गमावलेल्या मुलांचं मी प्रतिनिधित्व करत असतो. त्यामुळे माझी भितीने गाळण उडते. ’
वरील २ उदाहरणं सोडल्यास आत्तापर्यंत शाळेच्या आवारात घडलेल्या गोळीबाराच्या घटनांतून गुन्हेगारांचे पालक फारसे बोलते झालेले दिसत नाहीत. जे झाले ती घरं आपल्यासारखीच मध्यमवर्गीय वातावरणाची वाटतात. ते सांगतात त्यापेक्षा खरंच काही पालक म्हणून ते वेगळं करु शकले असते असं वाटत नाही. मग ही मुलं अशी का वागतात या प्रश्नाची उकल तशीच राहते. मुलांच्या कर्मांचं ओझं वाहण्याखेरीज पालकांसाठी अशाने काही पर्यायच उरत नाही. मग नक्की प्रतिबंध तरी कसा करणार या गोष्टींना? बंदूक नियत्रंण? मानसिक विकृतीचा वेळीच शोध आणि त्यावर त्वरित योग्यं उपचार? सळसळत्या तरुणाईला अयोग्यं मार्गाकडे जाण्यापासून रोखणं? मुलांमध्ये होत असलेल्या सुक्ष्म फरकाचीही नोंद घेऊन त्यांना बोलतं करणं? प्रश्नांच्या जंजाळातून खात्रीलायक नसले तरी हे काही मार्ग दिसतात. प्रश्न आहे तो त्या मार्गावर पाऊल टाकण्याचा. कधी होणार हे, कोण करणार आणि कसं?


लोकसत्तेच्या, ११ ऑक्टोबरच्या ’लोकरंग’ मध्ये हा लेख प्रसिद्ध झाला आहे.   दुवा:काळीज कुरतडणारी वेदना

Monday, September 21, 2015

मोकळे केस

"बाबा" बागेत खेळणारी माझी चिमुरडी धावत धावत माझ्या दिशेने येत होती. मी पाहत राहिलो तिच्या केसांकडे. कापलेल्या कुरळ्या केसांचं टोपरं इतकं गोड दिसत होतं. मला येऊन घट्ट बिलगली. तिला जवळ घेत मी पापा घेतला तसं तिने माझ्या गालांवर ओठ टेकले.
"काय रे पिल्ला?" लेकीच्या केसातून माझे हात मायेने हात फिरले.
"बाबा, मला तू आवडतोस."
"हो? का गं?"
"आवडतोस." लेक आणखी बिलगली. मी तिच्या लाडिक स्वरात रमून गेलो. ती पुन्हा खेळायला गेली. आणि मनात काही बाही विचार घोळायला लागले. मिटलेल्या डोळ्यांसमोर ’ती’ उभी राहिली.

गिरगावच्या आमच्या इमारतीत दाराबाहेर उभं राहिलं की पलिकडच्या इमारतीत अगदी समोरच्या घरात राहणारी ’ती’. तिच्या घरातला पलंग खिडकीला लागून होता. जेव्हा पाहावं तेव्हा पाठमोरीच बसलेली दिसायची. काय करत असायची दिवसभर त्या पलंगावर बसून कोण जाणे. पण नजरेला पडायचे ते तिचे मोकळे सोडलेले काळेभोर लांबसडक केस. अधूनमधून ती त्याचा आंबाडा बांधायची. पण थोड्याच वेळात ते सुटायचे. किती वेळा मी कठड्याला टेकून कधीतरी तिचा चेहरा दिसेल म्हणून वाट पाहिली. खूपदा वाटायचं रस्ता ओलांडला की तिची इमारत. हाकेच्या अंतरावर. जावं खाली धाडधाड पायर्‍या उतरुन आणि शिरावं तिच्या इमारतीत, मग घरात. निदान त्या मोकळ्या केसा मागचा चेहरा एकदा तरी दिसावा. कधीतरी माझी बहिण येऊन उभी राहायची बाजूला.
"शिट्टी मार ना. मग बघेल ती वळून मागे." बहिणीला माझी प्रतिक्षा एव्हाना समजली होती.
"वा, काय डोकं चाललंय. खालच्या गोंधळात माझी शिट्टी तिच्यापर्यंत पोचेल तरी का?"
"हे बरं आहे तुझं. मदत करायला गेले तर अक्कल काढतोस माझी." आम्हाला वाद घालायला कारण काही लागायचं नाहीच. त्या वादात कधीतरी लक्षात यायचं ’ती’ तिथून उठून गेली. बहिण पुटपुटायची.
"आईला दाखव रे ती मुलगी एकदा."
"का? मी प्रेमा बिमात नाही पडलेलो हा तिच्या. चेहरासुद्धा नाही पाहिलेला अजून."
"केस पाहतोस ना?"
"ते तर तू पण बघतेस. आवडतात की नाही तुलाही ते मोकळे केस पाहायला?"
"भावड्या म्हणूनच म्हणतेय आईला दाखवूया ती मुलगी एकदा." मी तिची अक्कल पुन्हा काढायच्या आधीच ती घाईघाईने म्हणाली.
"मला अजिबात मोकळे केस सोडायला देत नाही आई म्हणून म्हणतेय. एकदा त्या मुलीला बघच म्हणावं. सतत केस मोकळे." आमचं हे बोलणं आईच्या कानावर अर्थात पडलेलं असायचं. ती आतूनच ओरडायची.
"सोडा केस मोकळे आणि फिरा इकडे - तिकडे. जेवणात केस मिळाला म्हणून माझ्यावर डाफरु नका. सांगून ठेवतेय आधीच."

त्या मुलीचे ते मोकळे केसच कायम लक्षात राहिले. चेहरा कधीच दिसला नाही. पण अगदी तसेच लांब केस असलेली बायको मात्र मिळाली मला. पहिल्यांदा तिच्या केसांवर गजरा माळला तो आनंद काही औरच. गावी गेलेलो त्यावेळेस. रमत गमत संध्याकाळच्या वेळेला गडनदीच्या पुलावर जाऊन उभे राहिलो. खूप वेळ. पुलाखालून वाहणार्‍या पाण्याकडे एकटक नजरेने पाहत बसलो होतो दोघं. इतक्यात घंटा वाजली म्हणून मान वळवून पाहिलं. सायकलवरुन गजरे घेऊन चालला होता चिंद्या. सुंरगीच्या फुलांचा वास मन अगदी मोहवून टाकत होता. दोन - तीन होते त्याच्याकडे. उत्साहाने त्याने एक बायकोच्या हातात ठेवला. तो निघून गेल्या गेल्या संधिप्रकाशात माळला मी तिच्या केसांवर. त्या सुवासाने जसं वेड लावलं तसं रात्री गजरा काढून ठेवल्यावर तिच्या मोकळ्या केसांनी. केसांना वेढून राहिलेला तो सुरंगीचा गंध अजूनही माझ्या आजूबाजूला दरवळतोय.

कधीतरी माझ्या बायकोने तिचे ते लांबलचक केस आधुनिक दिसणं अनुभवावं म्हणून छोटे करुन टाकले. आता ते नेहमीकरताच मोकळे असतात, तसंही आता आजूबाजूला मोकळे केसच दिसतात म्हणा. म्हटलं तर मोकळे केस सर्वत्र सारखेच पण स्थळ, वेळ, जागा आणि मोकळे केस सोडलेली व्यक्ती, त्या केसांमध्ये अडकलेल्या माणसाचं भावविश्व किती बदलून टाकते. मोकळ्या केसांकडे पहाण्याची दृष्टी, स्पर्श किती वेगवेगळा असतो नाही? विचारांच्या नादात होतो तितक्यात माझी चिमुरडीने पुन्हा येऊन बिलगली. सवयीने तिच्या कुरळ्या, आखूड पण मोकळ्या केसातून हात फिरवायला लागलो आणि भटकून आलेलं मन एकदम जाग्यावर आलं.
"छान दिसतायत तुझे मोकळे केस." मी कौतुकाने म्हटलं. लेकीने मान डोलवली आणि मैत्रीणींच्या दिशेने खेळायला ती धावत सुटली.

(सुदर्शन रंगमंचच्या ओंकार सिन्नरकरच्या विनंतीवरुन त्यांच्या साहित्य मंडळात झालेल्या कार्यक्रमासाठी 'मोकळे केस' या विषयावर लिहलेला लेख/गोष्ट - मोहना प्रभुदेसाई जोगळेकर)

Friday, September 7, 2012

काही गोड तर काही कडू...

"आय   एम एक्स्ट्रिमली ऑफेंडेंड...." तलावाकाठचं घर बघायला आम्ही आत शिरलो आणि  विनसीने माझा दंड पकडला. माझी मान आश्चर्याने तिच्याकडे वळली. तिचा रागाने लालेलाल झालेला चेहरा, शरीराला सुटलेली सूक्ष्म थरथर... आपला गुन्हा काय हेच मला कळेना.
"तुझा मुलगा तुमच्या भाषेत बोलतोय."
’ऑ?’ तो केव्हा मराठी बोलत होता याच विचारात गुंतले क्षणभर. एकदम कोडं सुटलं. मी घाईघाईने म्हटलं,
"तसा काही हेतू नव्हता त्याचा किंवा आमचा कुणाचाच..." हळूहळू ती शांत झाली. विनसी आमची एजंट. घर विकत घ्यायचं ठरल्यावर तिच्याबरोबर फिरत होतो. परदेशात राहत असलो तरी आईशी बोलायचं ते मराठीतच हे ब्रीद वाक्य मुलांच्या मनावर पक्कं ठसलेलं आहे त्यामुळे पोरं मराठीत आणि तिला एकटं पडल्यासारखं वाटू नये म्हणून माझी उत्तरं इंग्लिशमध्ये अशी कसरत गाडीत झाली होतीच. पण अगदी थोडावेळ. म्हणजे सुरुवात व्हायची मराठीतून पण माझं इंग्लिश ऐकल्यावर उरलेलं सारं मुलं इंग्लिशमध्ये बोलायची. पण जे काही बोलणं मराठीत झालं त्याचं पर्यवसान असं होईल याची शंकाही आली नाही. विनसी माझ्यावर उखडलेली मुलाने पाहिलं. आता तो संतापला मनातून. पण आजीच्या वयाच्या माणसाला काही बोलायचं नाही एवढं तारतम्य त्याच्याकडे होतं. मुलीला काय झालं ते कळण्याएवढी ती मोठी नाही. ती तितक्यात काहीतरी मला सांगत आली, मराठीत. काय करावं ते सुचेना, मराठीतूनच तू इंग्लिश बोल हे त्या वेळेला कसं सांगणार? मी घाईघाईत तिला म्हटलं.
"शी डज नॉट लाइक इफ यू स्पीक इन इंग्लिश." मुलीने समजल्यासारखी भाषा बदलली. पुढे तिने दाखवलेली घरं यात्रिकपणेच पाहिली. घर शोधण्याचा उत्साह एकदम बारगळला.
नंतर तिचं क्षमा मागणारं इ मेल आलं. पण त्याला काय अर्थ?

एकीकडे मुलांनी आपली भाषा विसरू नये म्हणून प्रयत्न करायचा, आणि त्याचवेळेस ’फक्त घरी बोला हं मराठी आमच्याशी, बाहेर असलो की आमच्याशी इंग्लिशच बोलायचं’ असं सांगायचं म्हणजे इफ एल्स करून कार्यालयातली प्रोग्रॅमिंगची भाषा वापरल्यासारखंच की. मुलांचा संगणक केल्यासारखं. पुन्हा त्यातून त्यांना इंग्लिशमध्येच बोला म्हटलं की लगेच ती पण अस्त्र घेऊन तयार असतात,
"तूच तर सांगतेस आमच्याशी मराठीतच बोलायचं."
"अरे पण..." स्पष्टीकरण देतानाच वाटत राहतं  कळ दाबली की मराठी किंवा इंग्लिश अशी खेळण्यासारखी अवस्था तर करून टाकत नाही ना आपण त्यांची?.
मुलगा तर अशा वयात,
"हॅ, आता तर मुद्दामच मराठी बोलू आपण तिच्यासमोर. आणि तुम्ही पण ऐकून काय घेता?  ’फायर’ करा ना तिला." इथे अमेरिकन बाणा असतो त्याचा.
"स्पॅनिश बोलणार्‍या लोकांबरोबर काय केलं असतं तिने?  सांगितलं असतं का असं त्यांना?."
"घरं विकायची तर फ्रेंडलीपणा असायला नको का?"
"तिच्या जागी तुम्ही असतात तर तिने नसतं का तुम्हाला ’फायर’ केलं?’

एक ना अनेक मतं. आम्हाला वाटत राहतं, तिला जे सांगायचं ते  सौम्य शब्दात सगीतला असतं तर? तुम्ही घराबद्दल बोलत असाल तर इंग्लिशमध्येच बोला, म्हणजे मलाही समजेल काय मतं आहेत तुमची... असं काहीतरी. तिच्या वयाकडे, मेहनतीकडे पाहून आमचा काही जीव धजावत नाही तिला काही बोलण्याचा किंवा ’फायर’ करण्याचा.  मनातल्या मनात निषेध करत माझं तिच्याबरोबर घर बघणं चालूच राहतं.... आणि अचानक एक दिवस तिचं ईमेल येतं.
"मी सेवानिवृत्त होणार आहे लवकरच. त्याआधी तुम्हाला माझ्या बदली दुसरी एजंट देते. आणि एक लक्षात ठेवा. तुम्ही कस्टमर आहात. आवडली नाही एजंट तर यू कॅन फायर हर.... विनसी"

गेले तीन आठवडे माझा सतरा वर्षाचा मुलगा भारतात आहे. खूप फिरतोय, अंजिठा, वेरूळ, रायगड, बंगळूर, कितीतरी ठिकाणं आणि प्रत्येक ठीकाणच्या नातेवाईकांना भेटतोय. त्याचं कौतुक  होतंय तसंच त्याच्या मराठी बोलण्याचंही. विनसीची समस्या सोडवता आली नाही खरी, पण जेव्हा मराठीच्या कौतुकाची पावती मिळते तेव्हा बरं वाटतं, असं मनात म्हणत मी आपलं नुकतंच माझ्या मावसभावाचं इंग्लिशमधून आलेलं पत्र पुन्हा पुन्हा वाचत राहते.
You should be proud of your boy. Even I am unable to speak Marathi without using english words, however he spoke purely in marathi.Great, hats off to you.

याचसाठी केला होता अट्टाहास, त्याची काही गोड फळे तर काही कडू, एकाच नाण्याच्या दोन बाजू....


Thursday, August 30, 2012

दैनिक ’प्रहार’ मधील माझा लेख

’जिज्ञासा थिएटर्स’ या  रत्नागिरीतील संस्थेसाठी, दैनिक ’प्रहार’ साठी लिहलेले अनुभव. इथे फक्त मी काय केलं ते सांगण्याचं प्रयोजन नाही तर अभिनय, दिग्दर्शन करताना येणारे अनुभव हा महत्वाचा उद्देश आहे. हे अनुभव तुम्हालाही आवडतील ही अपेक्षा.

"अवं असं डोसक्यात राक घालून..."  रंगीत तालमीचे संवाद सुरु होते.  उत्साह, गडबड, हास्य विनोद असं वातावरण होतं. कलाकाराचे संवाद सुरु झाले की थोडीशी शांतता, कुजबुजते आवाज. आत्ताही प्रकाशव्यवस्थेसाठी एक दोन वाक्य प्रत्येक कलाकाराला म्हणायची होती. मी प्रकाशव्यवस्था करणार्‍या माझ्या नवर्‍याला, विरेनला हातवारे करुन सूचना देत होते. तितक्यात माझी तीन वर्षाची मुलगी मला येऊन फक्त बिलगली. बस, तेवढ्याने कलाकाराची तंद्री भंग पावली.
"आय कॅन्ट डू धिस...." रागाने लाल झाले ते. आजूबाजूला कुजबुजणारे, जोरजोरात सूचना देणारे सगळे आवाज बंद पडले. असह्य शांतता वातावरणात पसरली. काय करावं ते सुचेना. प्रसंगावधान राखून विरेनने दुसर्‍या कलाकाराला संवाद म्हणायची सूचना केली. तो कलाकारही शांत झाला. दुसर्‍या दिवशी प्रयोग, आदल्या दिवशी हा प्रकार. रात्रभर एकच प्रश्न मनाला छळत होता.
"कशाला पडतो या फंदात? फायदा तर काहीच नाही. वेळ आली तर आपलाच खिसा सैल सोडायचा, महिनेच्या महिने तन, मन, धन ओतायचं. आणि असा प्रसंग आला की मूग गिळून गप्प बसायचं. कशासाठी हे सगळं?"

दुसर्‍या दिवशी एकांकिका मस्त रंगल्या. पडद्यामागचे, पुढचे कलाकार असे  पिझ्झा खायला बसलो आणि त्या क्षणाला पुढच्या वर्षीच्या एकांकिकेचे बेत सुरु झाले. झालं गेलं सारं विसरुन पुन्हा ताजेतवाने झालो ते पुढच्या एकांकिकेसाठी.  इतकी असते ही नशा? कटु आठवणी पुसट होत पुन्हा पुन्हा त्याच मार्गाला नेणारी? नकळत मन मागे गेलं. नुसता अभिनय करण्याचं समाधान होतं त्या वेळेपर्यंत पोचलं, किंबहुना अभिनय म्हणजे काय हेही कळत नव्हतं तिथे जाऊन उभं राहिलं.  पालक मुलांना वेगवेगळ्या छंद वर्गात घालून पूर्ण गुंतवून टाकत नसत. शाळेतर्फे भाग घ्यायचा, शिक्षक म्हणतील ते करायचं, त्यावेळची ही गोष्ट.

"ऊठ, ऊठ" रात्री कधीतरी स्टेजवर डुलकी काढत बसलेल्या मुलांमधून बाईंनी उठवलं. कुणीतरी कळ दिल्यासारखं धडपडत उठून मी, ’मी ही ही एकटीच नाचते...’ हे गाणं म्हणत नाच केला तो पहिलीत असताना. देवरुखच्या भोंदे शाळेच्या पडवीसमोर पुढे फळ्या वगैरे घालून  वाढवलेलं स्टेज. शाळेतली कार्यक्रम करणारी मुलं मागे रांगेत बसलेली.  सर्वच मुलं रात्र बरीच झाल्याने  डुलक्या काढत होती . नाव पुकारलं  की उठायचं, नाच, गाणं असं काहीतरी उरकायचं आणि परत मागे जाऊन बसायचं...

त्यानंतर आम्ही देवरुखहून वडिलांच्या बदलीमुळे पालघरला आलो.  एक दिवस, मोगरे बाईंनी वर्गातल्या दोघा तिघांना शाळा सुटल्यावर भेटायला सांगितलं. तो दिवस आजही जसाच्या तसा लक्षात आहे. कोणी काय केलं आणि बाई किती ओरडणार हेच विचार मनात घोळवत ’त्या’ वर्गात पोचलो.
"शाळेचा रौप्यमहोत्सव आहे. तेव्हा दहा मिनिटांचा प्रवेश बसवणार आहोत." पालघर ठाणे जिल्ह्यात  गुजरातच्या सीमेवर आहे पण, नाटकांचा प्रभाव अजिबात नाही; निदान तेव्हा तरी नव्हता. त्यामुळे बाई  प्रवेश बसवणार म्हणजे नक्की काय करणार हे ही ठाऊक नव्हतं, अभिनय वगैरे गोष्टी फार दूरच्या. बाई काहीतरी करायला सांगताहेत ते करायचं इतकंच.
आज त्या प्रवेशातले आनंदीबाईचे फोटो पाहताना शाळेच्या मोठ्या मैदानावर उभारलेला रंगमंच, नऊवारी नेसलेली, नथ घातलेली आनंदीबाई, राघोबा, पेशवे  इतकंच डोळ्यासमोर येतं आणि नंतर घरी, शाळेत झालेलं कौतुक. त्यानंतर एखाद्या वर्षाने शाळेत केलेला टिळकांवरचा प्रवेश. मला टिळक केलं होतं आणि खुर्चीवरून उठताना धोतर सुटल्याने टिळक खुर्चीवरच बसून राहिले इतकं आठवतं.

वडिलांची बदली कणकवलीला झाल्यावर चित्र पालटलं. कोकण भाग नाट्यप्रेमी.  एस. एम. हायस्कूलच्या करंबेळकर बाई, लोखंडे आणि साळुंके सरांच्या तालमीत  नाथ पै एकांकिकेसाठी शाळेतर्फे एकांकिका नेत त्यामध्ये भाग घेणं सुरु झालं; तेव्हा स्पर्धेत भाग घेणं, अभिनय करणं त्यासाठी मेहनत घेणं म्हणजे काय ते समजायला लागलं.  पालघरला असं वातावरण कधीच पाहिलं नव्हतं त्यामुळे तर फार अप्रूप होतं या सार्‍या गोष्टींचं. बच्चू बर्वेची अफलातून दिवास्वप्ने, गजरा अशा एकांकिका त्या वेळेस स्पर्धेसाठी शाळेने केल्या. डिंसेबरच्या शेवटच्या आठवड्यात असणार्‍या या एकांकिका स्पर्धांवर स्पर्धकांनी आणि प्रेक्षकांनी असीम प्रेम केलं. जेव्हा जेव्हा अभिनयासाठी  पारितोषिक  मिळालं त्या वेळेस  झालेला आनंद अवर्णनीय होताच,  पण त्याचबरोबर शाळा सुटल्यावरच्या तालमी,  शिक्षकवर्गाने केलेलं कौतुक  हे  फार मोलाचं होतं.

काही वेळेस आनंद आणि निराशेचा अनुभव एकाचवेळी पदरी येतो. अबोल झाली सतारमधील  सविताच्या भूमिकेला नाथ पै एकांकिका स्पर्धेत मला पहिलं बक्षीस मिळालं, आनंद द्विगुणित झाला कारण स्त्री गटात दुसरं तिसरं पारितोषिक कुणालाही मिळालं नव्हतं. पण या आनंदाला गालबोट लागलं ते परिक्षकेच्या शब्दांनी.  एकांकिका, सतारवादक रमेशला झालेल्या अपघातानंतर रुग्णालयात सविता त्याच्यावर होणार्‍या शस्त्रक्रियेची वाट पहात असताना घडते. अपघात झालेल्या रमेशची बायको इतकी नटून थटून, सुंदर साडी नेसून कशी असा प्रश्न परिक्षक बाईंना पडला आणि प्रेक्षागृहात हास्याची लकेर उमटली. दीपक परब एकांकिकेचे दिग्दर्शक. हा दिग्दर्शनाचा भाग आहे, मी वाईट वाटून घेऊ नये असं म्हणत त्यांनी  माझी समजूत घातली. बहुधा परिकक्षकांबरोबरही ते बोलले असावेत. खरी हकिकत अशी होती की सविता रमेशच्या आवडीची साडी नेसून, नटून थटून तयार झालेली असते.  तो रस्ता ओलांडून त्याच्या सतार वादनासंदर्भात आलेल्या बातमीसाठी वर्तमानपत्र आणायला जात असताना ती गॅलरीत उभी असते. रस्त्यापलीकडच्या दुकानात तो वर्तमानपत्र घेतो आणि ते फडकवत भान विसरून रस्ता ओलांडतो. अपघात होतो. आता अश्या वेळेस ती साडी न बदलता असेल तशीच रुग्णालयात पोचणार ना? याचा उल्लेख एकांकिकेत अर्थातच आहे. हा अनुभव माझ्या मनावर खोल रुतून राहिला आणि नकळत तो पुढे उपयोगी पडत राहिला.

 एकांकिकेतल्या कामाचा आनंद घेत असतानाच  अविनाश मसुरेकरांनी बसवलेल्या मंतरलेली चैत्रवेल नाटकात पन्नाशीच्या आसपासच्या स्त्रीची,  अत्यंत करारी, काहीशी क्रुरपणाकडे वळणारी लीलाबाईंची भूमिका केली ती बहुधा अकरावीत असताना. प्रौढ बाईची रंगभूषा केल्यावर वेगळंच वाटायचं. या नाटकाचे खूप ठीकाणी प्रयोग झाले. बहुतेक ठिकाणी प्रयोगाला तुफान गर्दी असायची. गर्दीची नशा उतरली ती मसूर गावात. जेमतेम पाच पंचवीस लोकं भल्या मोठ्या नाट्यगृहात पाहिल्यावर नाटक कुणासाठी करायचं ह्या  चिंतेने सार्‍यानाच घेरलं.
"भरपूर लोकं समोर आहेत असं समजून आपापली भूमिका करायची." स्वत:ची निराशा लपवीत दिग्दर्शकांनी कानपिचकी दिली आणि त्या पाच पंचवीस प्रेक्षकांसाठी प्रत्येक कलाकाराने जीव ओतून काम केलं. खरं तर अविनाशनी सांगितलं त्याची अंमलबजावणी केली.
अपंग मुलीला सांभाळण्याचं काम करण्यासाठी आलेल्या लिलाबाई त्या मुलीचा आत्यंतिक द्वेष करतात. लिलाबाईंच्या कोड्यात टाकणार्‍या वागण्याचं रहस्य उलगडतं ते शेवटी. त्यानंतर लिलाबाईंबद्दल कीव, सहानुभुती वाटायला लागते. पण तोपर्यंत प्रेक्षकांच्या मनातला राग पराकोटीला पोचत असे.
नाटक संपल्यावर मला कुणी ओळखतच नसे याचं थोडंसं दु:ख होई पण तो रंगभूषेचा प्रभाव होता, रंगभूषाकाराला मिळालेली ती दादच. लिलाबाई अशी ओळख करून दिल्यावर आधी आश्चर्य आणि नंतर लिलाबाईंवर दगड टाकावेत असं वाटत होतं शेवटपर्यंत अशा भावना  प्रेक्षक व्यक्त करत. भूमिकेच्या पसंतीची ती वेगळीच पावती होती.

कणकवलीहून रत्नागिरीला आम्ही आलो त्या वर्षी जे. के. फाईल्सच्या ’वर्कर्स’ या सुहास भोळे लिखित आणि दिग्दर्शित एकांकिकेने नाथ पै स्पर्धेत बरीच बक्षिसं मिळवली होती. त्याचवेळेस मलाही अबोल झाली सतार एकांकिकेसाठी स्त्री कलाकारांमध्ये अभिनयाचं प्रथम पारितोषिक मिळालं. यामुळेच रत्नागिरीला आल्याआल्या सुहास भोळेंशी संपर्क साधता आला आणि फक्त दोन महिन्यात त्यांच्या पालखी एकांकिकेतून पुन्हा कणकवलीला स्पर्धेसाठी जाता आलं. नंतर त्यांच्या जिज्ञासा संस्थेतर्फे भिंत, दंगल अशा एकांकिका, प्रतिबिंब नाटक या सर्वाचे स्पर्धांसाठी आणि इतर ठिकाणी असंख्य प्रयोग केले.  बक्षिसं मिळवली. मंतरलेले दिवस होते. दंगलची भूमिका तर आठ दिवसात सुहासनी बसवली होती. शिर्के हायस्कूल मध्ये केलेल्या तालमी, नाटक, एकांकिकेसाठी सर्व कलाकारांनी केलेला प्रवास. गप्पा, गोष्टी, रुसवे फुगवे....मनाच्या कोपर्‍यात दडलेल्या आठवणी उलगडताना हे सारं पुन्हा अनुभवल्यासारखं वाटतं.  वटवट सावित्री, गाठ आहे माझ्याशी, माणूस नावाचं बेट, मोरुची मावशी अशी अनेक नाटकं, अविनाश फणसेकर, श्रीकांत पाटील अशा रत्नागिरीतील नामवंत दिग्दर्शकांबरोबर करता आली.  फणसेकर सरांनी त्यांच्या महाविद्यालयातील विद्यार्थिनींच्या एकांकिकेला दिग्दर्शन करण्याचीही संधी दिली तो दिग्दर्शनाचा पहिला अनुभव.

तेव्हा कधी जाणवलं नव्हतं ते पार साता समुद्राकडे आल्यावर जाणवतं. इतकी वर्ष नुसतं अभिनय करण्याचं सुख पदरी पडलं असं नाही तर सर्वांशी झालेली कायमस्वरुपी मैत्री हा ठेवा मला  मोलाचा वाटतो. यातल्या काही सहकलाकारांबरोबर आज इतक्या वर्षांनीही संपर्क आहे ही जाणीव सुखद आहे.

अमेरिकेत येऊन सतरा वर्ष झाली. सुरुवातीला छोट्य़ा गावात असताना कथाकथन, लेखन यावर अभिनयाची तहान भागवावी लागली.  काही वर्षापासून आम्ही म्हणजे मी आणि माझा नवरा विरेन, ’अभिव्यक्ती’ या आमच्या संस्थेतर्फे व्यावसायिक पातळीवर एकांकिका करतो.  भिंत, महाभारताचे उत्तर रामायण, खेळ, सांगायचं राहिलंच, वेषांतर, भेषांतर या एकांकिका आत्तापर्यंत आम्ही केल्या. अभिनय, दिग्दर्शन, नेपथ्य, रंगभूषा, नाट्यमंदिर आरक्षण, ध्वनी, संगीत, जाहीरात, तिकीट विक्री अशा अगणित बाजू सांभाळणं पार पडलं ते इथल्या मित्र मैत्रिणींच्या मदतीने. हे करत असताना गाठीशी जमते अनुभवाची पुंजी. माणसांचे स्वभाव उलगडत जातात, आपण केलेल्या चुका लक्षात येतात. दिग्दर्शनाची तारेवरची कसरत करताना तर वर उल्लेख केलेल्या सार्या दिग्दर्शकांची कमाल वाटत राहते.

 भारतात संस्था, कलाकार, प्रेक्षक यांची उणीव भासत नाही. परदेशात मोठी शहरं सोडल्यास साधारण १०० - १५० मराठी कुटुंब छोट्या गावांमध्ये असतात. केरीमध्येही तितकीच संख्या आहे.  इथे काम करणार्‍यांचा दृष्टिकोन हौस म्हणून अभिनय करण्याचा असतो. पण तिकिटं लावून प्रयोग करायचं ठरवलं की काय पर्याय? त्यामुळे हौशी कलाकारांकडून व्यावसायिक पातळीची अपेक्षा केली की कुरकुर होत राहते. दिग्दर्शक या नात्याने समाधान होईपर्यंत तो तो प्रसंग झोप उडवून टाकतो.

विनोदी प्रसंगात वाहवत जाऊन आमच्या एका कलाकाराने रंगमंचावर स्त्री कलाकाराशी केलेल्या लगटीने आम्हाला शहाणं केलं. नट रंगभूमीवर गेला की दिग्दर्शकाच्या हातात काही उरत नाही याची विदीर्ण करणारी जाणीव अशा प्रसंगी होते. असं काही घडतं तेव्हा मनात विचार तरळून जातो. त्या वेळेस आमच्या दिग्दर्शकांनाही वेगवेगळ्या प्रसंगाना तोंड द्यावं लागलं असणारच. आशा निराशेचा लपंडाव, कटू गोड प्रसंग हे या खेळाचे अविभाज्य भाग. पण तरीही पुन्हा त्याच उत्साहाने पुढच्या डावाची तयारी सुरु होते. एकदा तोंडाला रंग लागला की....हेच खरं, नाही का?

एकांकिका झलक पहाण्याचा दुवा -   http://marathiekankika.wordpress.com

Thursday, June 16, 2011

आपण ह्यांना पाहिलंत का?

रेडिओवरचं  सुमधुर संगीत एकदम थांबलं आणि तातडीचा संदेश त्यावर सुरु झाला. नकळतपणे मी गाडीचा वेग कमी केला. चक्रीवादळं, हिमवर्षाव अशा आकस्मिक संकटासाठी तातडीचा संदेश देणा‍र्‍या यंत्रणेचा वापर अमेरिकेत करतात (इर्मजन्सी अलर्ट सिस्टीम). दूरदर्शन, रेडिओ आणि आता सेल फोन  द्ववारे हा संदेश लोकांपर्यंत पोचतो.

याच यंत्रणेचा वापर २००३ पासून अमेरिकेने एक विशेष कारणासाठी सुरु केला. लहान मुलांचं अपहरण झाल्याची सूचना देण्यासाठी प्रथमच ही यंत्रणा राबवली गेली. आत्ताही बेपत्ता असलेल्या पाच वर्षाच्या मुलीसंदर्भात निवेदन होतं. मुलीचं वर्णन, संशयिताच्या गाडीचा नंबर ऐकत असतानाच रस्त्यावरच्या बिलबोर्डवरही (जाहीरातीचा बोर्ड) हीच माहिती झळकू लागली. ’अ‍ॅम्बर अलर्ट’! आत्तापर्यंत किती पटकन  असा  संदेश सर्वत्र प्रसारीत होतो याबद्दल दूरदर्शनवर ऐकलं होतं पण रस्त्यात, एकाचवेळी रेडिओवर ऐकायला आणि बिलबोर्डवर पहायला मिळण्याची ही पहिलीच वेळ. 

दुधाच्या खोक्यांवर, पोष्टाद्ववारे, स्थानिक जाहिरात पुस्तिका अशा विविध मार्गानी ही मुलं आपल्यासमोर येत राहातात. सर्व ठीकाणी हरवल्या दिवशीचा फोटो आणि वर्तमानकाळात ते मुल कसं दिसत असेल त्याचं रेखाचित्र असतं. आज बिलबोर्डवर अशी जाहिरात पाहिली आणि लहानपणी दूरदर्शनवर संध्याकाळी ’आपण ह्यांना पाहिलंत का?’ यातून हरवलेल्या व्यक्तिची माहिती दिली जात असे ती डोळ्यासमोर नाचली.

आपल्याकडेही आता अत्याधुनिक तंत्राचा वापर होत असेलच. पण सर्वसामान्यांच्या प्रयत्नातून सुरु झालेल्या अ‍ॅम्बर  अलर्ट ( AMBER = America's Missing: Broadcast Emergency Response) ची कहाणी ऐकून मन भारावून जातं. एका शोकांतिकेतून अद्यायावत तंत्रज्ञ्ज्ञानाचा वापर करुन सुरु झालेली ही स्तुत्य योजना.

पोलिसखात्याने सुरु केलेल्या या प्रयत्नाला प्रसारमाध्यमं, वहातुक यंत्रणा आणि वायरलेस कंपन्या साहाय्यं करतात. सामाजिक सेवा म्हणून वरिल यंत्रणा ही मदत पुरवितात. उद्देश अर्थातच हरवलेली मुलं ताबडतोब सुखरुप हाती लागावीत हा. अ‍ॅम्बर अलर्ट मुळे आतापर्यंत ५०० पेक्षा जास्त मुलांना वाचविण्यात यश आलं आहे. काही वेळेला तर अ‍ॅम्बर अलर्ट ऐकून अपहरणकर्त्यानी मुलांना सोडून दिल्याची उदाहरणं आहेत. ज्या अ‍ॅम्बरमुळे ही यंत्रणा सुरु झाली ती शोकांतिका चौदा वर्षापूर्वीची.
टेक्सास राज्यात आर्लिग्टन गावी नऊ वर्षाची शाळकरी अ‍ॅम्बर आणि तिचा भाऊ आजी आजोबांच्या अंगणात सायकल चालवित होते. अ‍ॅम्बरचा भाऊ घरात आल्यावर आजीने त्याला अ‍ॅम्बरला बोलावून आण म्हणून परत पिटाळलं. तो आत  आला ते ती सापडत नाही असं सांगतच. आजी, आजोबा दोघंही हाका मारत अंगणात आले. तोपर्यंत पोलिसही तिथे पोचले होते. अ‍ॅम्बरच्या आजी आजोबांना पोलिसांना पाहून आश्चर्य वाटलं.

दरम्यान घडलं होतं ते असं. त्यांच्या शेजारी राहणार्‍या गृहस्थानी अ‍ॅम्बरची किंचाळी ऐकली आणि ते बाहेर आले. एका अनोळखी इसमाने अ‍ॅम्बरला सायकलवरुन ओढून ट्र्कच्या पुढच्या सीटवर ढकललेलं त्यांनी पाहिलं, पण डोळ्याचं पातं लवतय न लवतय तोच भरधाव वेगाने तो ट्रक निघूनही गेला. त्या गृहस्थांनी आधी पोलीसांना  फोन केला, त्या इसमाची, गाडीची माहिती दिली. पोलिस तातडीने घटनास्थळी पोचले. विलक्षण वेगाने सारं काही घडलं होतं.

योगायोगाने त्याचवेळेस स्थानिक दूरदर्शन वाहिनी हलाखीचे दिवस आलेल्या कुंटुंबावर कार्यक्रम करीत होती. नेमका अ‍ॅम्बर आणि तिच्या आईचा त्यात समावेश होता. अ‍ॅम्बरचं बालपण, भावांबरोबरचं खेळणं हे सगळं दूरदर्शनवर पाहाताना लोकांसाठी अ‍ॅम्बर एक फोटो न राहाता स्वत:च्या घरातली चिमुरडी बनली होती. दूरदर्शन, नभोवाणी माध्यमांनी अ‍ॅम्बरला पळवल्याची बातमी दिल्यावर चार दिवस पोलिसांच्याबरोबरीने सारं गाव तिच्या शोध मोहिमेत सामील झालं. दूरदर्शन वाहिनीनेही त्यांच्याकडील सर्व माहिती, चित्रफीत पोलिसांकडे सुपुर्त केली.  या शोध मोहिमेचा शेवट मात्र दु:खद झाला. चौथ्या दिवशी अ‍ॅम्बरचं प्रेत घरापासून चार मैलांवर गटाराच्या पाईपमध्ये सापडलं. अद्यापही तिचा हत्येकरी सापडलेला नाही.

या तपासकार्यात आघाडीवर असलेले अधिकारी याबद्दल आठवण सांगताना म्हणतात की संध्याकाळी घरी आलं की त्यांना त्यांच्या मुलीच्या 'सापडली का अ‍ॅम्बर?' या प्रश्नाला सामोरं जावं लागे.
अ‍ॅम्बरच्या जाण्याने पोलिसखातं कुठे कमी पडलं, केलेल्या प्रयत्नापेक्षा  आणखी काही करता आलं असतं का याबद्दल झालेल्या उहापोहातून लक्षात आलं की ज्या वेगाने अपहरणाची बातमी प्रसारमाध्यमांमुळे पसरली त्याचाच वापर करुन अनेक मुलाचं आयुष्य वाचवता येईल. याचाच परिपाक म्हणजे अ‍ॅम्बर अलर्ट!

अ‍ॅम्बरच्या नावाने पोस्टाने काढलेल्या स्टॅम्प समारंभासाठी तिची आई नोरिस उपस्थित राहिली. त्यावेळेस केलेल्या भाषणात त्या म्हणाल्या,
"अ‍ॅम्बर अलर्टमुळे जेव्हा जेव्हा मुल घरी सुखरुप पोचतं तेव्हा तेव्हा ती माझी अ‍ॅम्बर असती तर या विचाराने ऊर दडपून जातो, कासावीस होतो; पण अ‍ॅम्बरमुळे अश्य़ा कितीतर अ‍ॅम्बर त्यांच्या आई वडिलांना सुखरुप परत मिळतात या जाणीवेने माझं दु:ख दडपून टाकायला मी शिकले आहे."
दहा वर्ष झाली, वीस वर्ष झाली तरी आता ही वेदना कायमची सोबत राहाणार असं म्हणणार्‍या या आईच्या दु:खाने आपलंही मन हेलावतं.

"अ‍ॅम्बर मोठी होताना पाहण्याचं भाग्य माझ्या भाग्यात लिहलेलं नव्हतं पण खेळताना ती बर्‍यांचदा शिक्षिका होई, बाहुल्यांची आई बने त्यांची काळजी घेई तेच नाही का ती आताही करत?" पाणावलेल्या डोळ्यांनी तिची आई विचारते. अ‍ॅम्बर अलर्टमुळे परत आलेली मुलं म्हणजे अ‍ॅम्बरच्या बाहुल्याचं असं त्यांना वाटतं.

अ‍ॅम्बर अलर्टच्या यशामुळे बर्‍याच राज्यात अमेरिकेत वेगवेगळ्या नावांनी ही योजना राबविली जाते. प्रत्येक ठीकाणी या योजनेला दिलेलं नाव म्हणजे त्या त्या मुलाच्या दु:खद शेवटाचं स्मरणच. मॉरगन अलर्ट, लुई अलर्ट, मायली अलर्ट ही त्यातील काही नावं. फक्त अमेरिकाच नाही तर कॅनडा, जर्मनी, ग्रीस, नेदरलॅड या देशांनीही ही योजना स्वीकारली आहे.


आधुनिक तंत्रन्यानाचा फायदा या सेवेला चांगलाच होत आहे. अलिकडे सेल फोन कुठून केला याची माहिती देणं कंपन्याना सक्तीचं आहे त्यामुळे मॅसेच्युसेट्स राज्यातील एका मुलीचा शोध तत्काळ लावण्यात पोलिसांना यश आलं. अ‍ॅम्बर अलर्ट करुन पोलिस त्या मुलीला सतत फोन करत होते. जितक्या वेळा फोन त्या मुलीकडून उचलला गेला तितक्या वेळेस कंपनी साधारण कोणत्या ठिकाणाहून तो कार्यरत होता त्याचा मागोवा घेऊ शकली. पोलिसांनी गुगल सर्चचा वापर करुनही ठावठिकाण्याचा अंदाज घेतला आणि ताबडतोब त्या जागेला वेढा घातला. फार थोड्या वेळात मुलीला ताब्यात घेण्यात यश मिळालं. 

अशीच एक घटना ग्रीस मधल्या लहानश्या गावातील.
शेतात काम करता करता वडिलाचं लक्ष उडालं आणि आजूबाजूला खेळणारा मुलगा कधी नजरेआड झाला तेच कळलं नाही. बरीच शोधाशोध करुन शेवटी त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्या देशात ते नुकतेच आलेले. मुलाला ग्रीक भाषेचा गंधही नव्हता, त्यामुळे परिस्थिती अधिक अवघड होती. अपघात किंवा अपहरण याच दोन शक्यता वाटत होत्या. जंग जंग पछाडूनही मुलगा सापडला नाही तेव्हा पोलिसांनी अ‍ॅम्बर अलर्टचा आधार घेतला. वाट चुकून तो मुलगा जवळच्याच समुद्रावर पोचला होता आणि परत यायचा मार्ग न सापडल्याने बावरलेल्या स्थितीत फिरत होता. तो मुलगा अ‍ॅम्बर अलर्टमुळे लोकांच्या लक्षात आला आणि घरी सुखरुप परतला.

अठरा वर्षाच्या आतील मुलांसाठी असलेली ही योजना म्हणजे अशा मुलांसाठी, त्यांच्या पालकांसाठी अ‍ॅम्बरने स्वत:चं आयुष्य गमावून एक प्रकारे दिलेलं संजीवनच नाही का?     

 

Tuesday, June 7, 2011

फेसबुक आणि खोटा चेहरा... कदाचित तुमचाही!

"त्या मुलांनी हे का केलं ते मला कदाचित कधीच कळणार नाही. अश्लिल, हादरवून सोडणारं आणि चांगल्या गोष्टीवरचा विश्वास समुळ नष्ट करणारं. माझ्या वाट्याला आलं ते, फसवं फेसबुक खातं बंद करता येत नाही यातून आलेली निराशा, दु:ख, राग,  वैताग आणि क्षणा क्षणाला नष्ट होत जाणारा आत्मविश्वास."  ही कहाणी, शब्द सुझनचे. पण हे फेसबुक किंवा कोणत्याही आंतरजालावर (सोशल नेटवर्किंग) असणार्‍या कुणाच्याही बाबतीत घडू शकतं. तेव्हा सावधान. सुझनची गोष्ट ही माझी किंवा अगदी तुमचीही होवू शकते.

 रहस्यकथा आणि नाट्यलेखन करणार्‍या सुझन स्वत:ला प्रथितयश मानत नाहीत.  त्यांचं नाव सर्वांनी ऐकलं असेल असंही त्यांना वाटत नाही.  आणि तरीही परदेशातल्या कुणालातरी त्यांच्या नावे फेसबुक खातं तयार करता आलं ही वस्तुस्थिती आहे. सुझनमात्र फेसबुकमध्ये योग्य ठीकाणी खुणा करुन  खाजगीपणा जपल्याच्या समाधानात होत्या. कुणीतरी त्यांच्या नावाचं खातं आधीच तयार केलं आहे याची त्यांना कल्पनाच नव्हती.  नग्न देहावरती सुझनचा चेहरा वापरण्याचा किळसवाणेपणा आणि त्या सोबत येणार्‍या असंख्य गोष्टी... यावरुनच हे आंतरजाल जग किती धोकादायक आहे हे लक्षात येतं, तरीही आपण मात्र आपल्याबाबतीत हे होणार नाही असं समजून आपले, आपल्या कुटुंबाचे फोटो वेगवेगळ्या संकेतस्थळांवर/खात्यांवर  प्रदर्शित करतो. आपल्या मित्रमैत्रीणींनी, नातेवाईकांनी ते पहावेत या इच्छेने. केव्हा केव्हा काळजीपूर्वक खाजगीपणा जपण्याची सर्व खबरदारी घेऊन तर कधीतरी नकळत कोण जाणार आहे उगाचच माझ्या वाट्याला असं वाटून तेवढीही तसदी घेतली जात नाही.

सुझनना तर फेसबुकचं काडीमात्रही आकर्षण नव्हतं. त्यांच्या नवीन पुस्तकाच्या प्रकाशनच्या दरम्यान जनसंपर्क अधिकारी वायली यांनी चाहत्यांच्या संख्येत वाढ करण्यासाठी फेसबुक उत्तम आहे ह्याची कल्पना दिली तेव्हा प्रथम त्यांची तयारीच नव्हती. वेळ फुकट घालवायचं एक ठिकाण असंच त्यांचं फेसबुकबद्दल मत होतं पण आधुनिकतेला बाजूला सारताना साहित्य जगतात एकटं पडण्याच्या भितीने त्यांनी फेसबुकवर जायचं मान्यं केलं.

सुरुवातीचा आठवडा जुन्या परिचिताशी  संपर्क साधण्यात कसा गेला ते  कळलंही नाही. आणि अचानक एक दिवस वायलीचं ई मेल आलं, विषय अधोरेखित होता   - फेसबुक. सुझनना वाटलं आधुनिक जगात प्रवेश झाल्याबद्दल स्वागत करणारं पत्र असेल. पण तसं नव्हतं. ते पत्र होतं त्यांच्या दुसर्‍या खात्याबद्दल. लिहलं होतं.
"गुगल केल्यावर तुमचं जे खातं येतं ते पाहून  बेचैन व्हायला झालं. तुम्हाला हे कळवणंही त्रासाचं वाटलं तरी तुमच्या कानावर जावं म्हणून  कळवित आहे."
ते खातं पाहून सुझनना धक्काच बसला. स्वत:च्या चेहर्‍यावरचे अश्लिल, संभोगासाठी उद्युक्त करणारे भाव पाहून शरमेने मेल्याहून मेल्यासारखं झालं. काही काळ सुन्नावस्थेत गेला.  हा चेहरा त्यांचा कधीतरी वर्तमानपत्रात आलेला, कुठल्यातरी संकेत स्थळावर असलेला होता. सुझनना काय करावं या प्रश्नाने घेरुन टाकलं.  मुळात संगणक प्रकाराशी फार सख्यं  नाही. आणि आता हे काय वाढून ठेवलं होतं? कुणाशी संपर्क साधला की  ते फोटो, खातंच नाहीसं होईल?  समोर ’फेसबुक फॉर डमीज’  पडलेलं. त्यातले दूरध्वनीक्रमांक त्यांनी तातडीने फिरवले, पण उपयोग झाला नाही.  त्यांना एकदम  नेहमीच्या रस्त्यावर येता जाता फेसबुकचं  पाहिलेलं कार्यालय आठवलं. दूरध्वनिकार्यालयात फोन करुन त्या कार्यालयाची माहिती मिळते का ते पहाण्याचा अयशस्वी प्रयत्न त्यांनी केला.  हे खातं त्यांनी फेसबुकवर यायच्या आधीचं होतं. याचाच अर्थ कुणी त्यांचं नाव ’गुगल’ केलं की हे असे फोटो, प्रतिक्रिया प्रथम पहायला मिळणार. सगळय़ा असफल प्रयत्नांनंतर एकच करता येण्यासारखं होतं. फसव्या फेसबुक खात्यावर जायचं, तिथे तुम्ही असल्याचं खात्री करणारं जे चित्र असतं त्यावर टिचकी मारुन आपल्या खर्‍या फेसबुकचा दुवा द्यायचा.  सुझननी त्यांच्या मित्रमैत्रीणींना, नातेवाईकांना सार्‍यांनाच ही विनंती केली.

"रोज सकाळी उठल्याउठल्या धडधडत्या अंतकरणाने मी संगणक उघडे. फेसबुकच्या संचालकांकडून काही प्रतिसाद नव्हताच आणि माझं नकली खातं नष्ट होण्याची लक्षणं नव्हती. पोलिसांशी संपर्क साधला. पण त्यांच्याकडे तक्रार काय नोंदवणार? नुकसान काय झालं म्हणून सांगणार? माझं हे रुप पाहून लोकांनी पुस्तक विकत घेणं बंद केलं म्हणायचं? याला पुरावा कुठून आणायचा? पोलिस काही करु शकले नाहीत. फेसबुक प्रशासनालाही अगणित ईमेल केली. प्रत्येकवेळी तोच पुस्तकी प्रतिसाद. तुमची तक्रार पोचली. हो पण पुढे काय?" अतिशय विषण्ण अवस्थेतला हा त्यांचा प्रश्न.

पुढे काय? या प्रश्नाने  सुझनची झोप उडाली. संभाषणात लक्ष लागेना. लेखन तर बंदच पडलं. मुलं कशी वाढत होती, काय खात पित होती याचं भान नष्ट झालं.  त्याचं निराशेने ग्रासलेले मन उभारी घेईना.   सगळ्याचा कडेलोट मैत्रीणीबरोबर फिरायला बाहेर पडल्यावर झाला.
"तुझं नाव गुगल केलं मी आज" मैत्रीणीच्या बोलण्याने सुझनचा चेहरा कसानुसा झाला.
"तुला क्षणभरही वाटलं......" पुढचं बोलणं मैत्रीणीकडून यावं, तिने ती शक्यताही नाकारावी असं वाटत असतानाच मैत्रीणीने नुसतेच खांदे उडवले, शरमलेल्या चेहर्‍याने ती म्हणाली,
"तूच असशील असं नाही वाटलं पण....."
२० वर्ष ओळखत होत्या त्या दोघी एकमेकींना, पण तरीही मैत्रीणीच्या मनाला ही शंका चाटून जावी यात सुझनना फार मोठा पराभव वाटला.  एक चांगली व्यक्ती, लेखिका म्हणून लोकांनी ओळखावं यासाठी वेचलेले क्षण धुळीला मिळाले. रॅगिंगमुळे मुलं आत्महत्येपर्यंत का पोचतात हे कळलं तेव्हा असं त्यांना वाटतं.  अस्वस्थ मनस्थितीत सुझननी याबाबत पाऊल उचलायचं निश्चित केलं. त्यांनी आपल्या वकिल पुतण्याला याबाबत लक्ष घालावं म्हणून  विनंती केली. एका आठवड्यात फेसबुककडून काही कळलं नाही तर काय करायचं ते बेनने, त्यांच्या पुतण्याने निश्चित केलं पण त्याआधी सुझनना त्यांनी जे सांगितलं ते सुझनच्या कल्पनेपलिकडचं होतं. स्वत:च्या फसव्या खात्यावरिल शव्द न शब्द वाचायचा,  तिथे असणार्‍या सर्वांचे चेहरे / फोटो नीट पहायचे आणि कुणा परिचिताचं हे काम नाही ना याची खात्री करायची.
"हे वाचण्याचं काम म्हणजे कुणीतरी बर्फाच्या लादीवर फेकून दिल्यासारखं होतं. गुदरमवून टाकणारी भितीची एक थंडगार लाट शरिरातून गेल्यासारखं. तिथे काय नव्हतं माझ्याबद्दल. संभोग वर्णनं, अश्लिल चित्र आणि माझ्या नावाने लिहलेले प्रतिसाद..., किळसवाणे, शरीर सुखासाठी आमंत्रित करणारे, त्याबद्दल सल्ला विचारणारे. यातल्या काही मित्र, मैत्रीणींची संख्या हजारांवर होती. याचाच अर्थ माझे हे फोटो खूप लोकांनी पाहिले असण्याची शक्यता नाकारता येत नव्हती." एकेक शब्द उच्चारतानाही त्यांचे कान, गाल शरमेने लाल होतात.

न समजणारं संगीत, भाषा, दूरदर्शनवरील कार्यक्रम असं करत  हा प्रकार कोणत्या देशातून चालू असावा एवढा  शोध लागला, नंतर शहर आणि शेवटी शाळा. मान्यवर शाळा. पण सुझन त्या शाळेचं नाव सांगत नाहीत.  शाळेच्या संकेतस्थळावर त्या मुलांचे चेहरे पाहिले तेव्हा त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली, बदला घ्यावासा वाटायला लागला,  त्या मुलांचे गळे दाबावेत ही भावना दृढ झाली. पण काही क्षणच. भान आलं तेव्हा त्यांना आपण असा विचार करु शकतो, ही पातळी गाठू शकतो याचीच शरम  वाटली.  विषण्ण मनस्थितीत त्यांनी चर्चच्या पाद्रींचा सल्ला घेतला. त्यांच्या उत्तराने त्या अचंबित झाल्या. त्यांना त्रास देणार्‍या मुलांना क्षमा करण्याचा विचारही करु नये असं त्यांनी सांगिंतलं. त्यांच्या पुढे दोन पर्याय होते. त्या मुलांना असा काही धडा शिकवायचा की ती आयुष्यातून उठतील. त्यांच्या देशाचे कायदे खूपच कडक होते आणि या गुन्ह्यासाठी तुरुंगवास हा एकच पर्याय होता. अमेरिकेत पैशाचं नुकसान भरुन काढण्यासाठी त्या मुलांवर त्या खटला करु शकल्या असत्या पण ते खर्चिक  होतच आणि पुरावा? या मुलांनी त्यांच्या अंतरात्म्याचा एक तुकडा तोडला, आत्मविश्वास धुळीला मिळवला याकरता अजूनतरी खटला नाही दाखल करता येत याची सुझनना कल्पना होती.  सुझनपुढे खटला हा एक पर्याय होता नाहीतर पूर्णत: दुसरा मार्ग. शेवटी तोच त्यांनी स्वीकारला. त्यांनी त्या मुलांच्या शाळेच्या मुख्याध्यापकांना ई मेल पाठवलं, विस्ताराने लिहलं. खूप विस्ताराने आणि त्यात फेसबुक खातं बंद व्हावं ही मागणी केली.

दुसर्‍याच दिवशी मुख्याध्यापकांचं पत्र आलं. त्यांनी हा प्रकार लक्षात आणून दिल्याबद्दल सुझनचे आभार मानले होते आणि फेसबुकचं खातं बंद होईल याची खात्री. आणि तसं ते झालं. त्यांच्या ’मीच का?’ या प्रश्नाचं उत्तर कुणालाच देता आलं नाही. त्या मुलांनाही. मुख्याध्यापकांनीही मुलांना हाच प्रश्न वारंवार विचारल्याचं सुझनना लिहलं होतं. अनुत्तरित प्रश्न. त्या मुलांच्या दृष्टीने सुझन म्हणजे एक खेळणं होतं,  मुखवटा! नाव, चेहरा याच्याशी त्यांना काही देणंघेणं नव्हतं. चेंडू हवेत उडवला, काही काळ त्याच्याशी खेळलं आणि त्यांचा त्यातला रस संपला. सुझन म्हणतात,
"आणि हेच फार भितीदायक वाटतं मला. इंटरनेटमुळे इतक्या सहसहजी माणसाचं खेळणं बनून जातं. बदनामीही अशी होवू शकते की माणूस आयुष्यातून उठेल."

अगदी खरं, आज हे सुझनच्याबाबतीत झालं. कदाचित तेच उद्या आपल्या बाबतीत होवू शकतं, आपल्या मुलांच्या बाबतीत. सुझन म्हणतात,
"तुमचं नाव, चेहरा... आणि त्याचं हे असं होतं. खरच असं झालं की ही लहानसहान बाब उरत नाही हे मी अनुभवाने सांगते.  आणि त्यामुळेच मी मुख्याध्यापकांना एक विनंती केली. अशी विनंती की त्याचे परिणाम, शेवट मला कधीच कळणार नाहीत."
काय केलं त्यांनी?  मुलांना शिक्षा देण्याची मुख्याध्यापकांना विनंती केली पण अगदी वेगळ्या तर्‍हेची. त्यांच्या या कृतीमुळे सुझनवर काय परिणाम झाले हे त्या मुलांनाच नाही तर पालकांनाही कळावं ही अट घातली त्यांनी. आपल्या  हुशार, मान्यवर शाळेत जाणार्‍या मुलांचं कर्तुत्व आणि त्याचे सुझनवर झालेले परिणाम दोन्ही त्यांना कळावेत याकरता ते खातं मुलांच्या सोबत बसूनच पालकांनी पहावं ही अट घातली.

खरच  शिकली  ती मुलं धडा? झाला बदल त्यांच्या वृत्तीत? पाहिलं ते अश्लिल वर्णनांनी, चित्रांनी भरलेलं खातं त्यांच्या पालकांनी? सुझनना त्याची कल्प्नना नाही. त्या म्हणतात.
"माझं चारित्र्यहनन केलं त्यांनी. फार कठीण होतं ते परत मिळवणं. पण मिळवलं मी झगडून. हतबलता, हात पाय गळणे याचा खरा अर्थ कळला मला. सुडाने पेटून उठणं म्हणजे काय हे कळलं तसंच क्षमा करण्यातून काय समाधान मिळतं हेही कळलं. आणि हेच कारण आहे त्या मुलांची नावं न सांगण्याचं किंवा त्यांच्या देशाचं नाव न घेण्याचं. त्यांच्या हातून कळत नकळत झालेल्या चुकीमुळे त्याचं भवितव्यच नष्ट व्हावं असं नाही मला वाटत. त्यांची नावं सांगितली तर झोप उडेल माझी. क्षमेला काही अर्थ उरणार नाही. आता मी शांत चित्ताने झोपू शकते, आणि लिहिते. लिहिती राहू शकते."

Wednesday, May 25, 2011

ती गेली तेव्हा.....

पेटन,
"मी तुझी आई. खूप काही बोलायचं आहे तुझ्याशी. बर्‍याच गोष्टी, बरेच विषय, क्रमवार कोणत्या कोणत्या विषयांबद्दल बोलायचं आहे ते लिहून ठेवलंय मी. फार वेळ नाही उरलेला. उद्या शस्त्रक्रिया. त्यानंतर किती वर्ष, किती दिवस....तीन तास नुसती बसून आहे मी. कल्लोळ उडालाय मनात विचारांचा. नाही सोडून जाता येणार मला हे जग असं. तू इतकी छोटी असताना तर नाहीच नाही. माझं प्रेम मी शब्दांनी नाही व्यक्त केलं आज तर कदाचित तुला ते कधीच समजणार नाही. काही गोष्टी ज्या बाबा तुला नाही शिकवू शकत, बोलू शकत नाहीत तुझ्याशी त्याबद्दल सांगायचं आहे. मी इथे असले तर तुला जवळ बसवून सांगेन पण नसले तरी.....  आहेच मी तुझ्याबरोबर, तुझ्या लग्नाच्या दिवशी, तुला मुलं होतील तेव्हा. माझं तुझ्याजवळ असणं जाणवेल तुला. सतत." छत्तीस वर्षाच्या एरनने स्तनाचा कर्करोग झाल्यावर तिच्या चिमुकलीसाठी ध्वनिमुद्रित केलेला हा एक संदेश... आणि असे कितीतरी, जवळजवळ १०० व्हिडिओ टेप्स.
"भावनाविवश असताना केस नको कापूस कधी.  मेकअप असा कर की तो केलाय असं वाटायला नको."
"तुला मोठं होवून जे काही बनायचं ते तू ठरव, मला वाटतं म्हणून किंवा बाबाला वाटतं म्हणून तुझं क्षेत्र निवडू नकोस."
"शाळेत कुणाच्या दबावाला बळी पडू नकोस."


कर्करोगाला तोंड देताना हातात राहिलेल्या चार पाच वर्षात एरनच्या मनात फक्त पेटन होती. पेटनसाठी तिने काय नाही केलं? वेदनेला तोंड देत, औषधांच्या मा‍र्‍याला, त्यांच्या परिणामांना प्रतिकार करत एरनने पेटनसाठी भेटवस्तू खरेदी करण्याचा चंग बांधला.  पेटन १६ वर्षाची होईपर्यंतच्या वाढदिवसांसाठी, प्रत्येक ख्रिसमससाठी, इतकंच नाही तर पेटनच्या लग्नप्रसंगी तिला द्यायची भेटही तयार आहे.

 डग आणी एरन दोघंही उच्चशिक्षित. आपापल्या कार्यक्षेत्रात स्थिरावलेली. सात वर्षाच्या संसारात पेटनचा प्रवेश झाला आणि दोन वर्षानी तिशी पार केलेल्या एरनच्या सुखी संसाराचं चित्र स्तनातल्या एका गाठीने, निदानाने बदललं. त्या क्षणाने तीही आमूलाग्र बदलली. मृत्यूच्या हाकेने तिचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला. रोजच्या जीवनातले छोटे क्षण किती अमूल्य असतात ते कळण्याची ती हाक. नाकारणं हातात नसलेली, तरीही ती लढली. उणीपुरी पाच वर्ष कर्करोगाशी सामना करता करता आपण इथे नाही हे गृहीत धरून पोटतिडकीने आपलं म्हणणं ध्वनिमुद्रित करणं सोपं नाहीच गेलं एरनला. आता दोन वर्षाची असलेली पेटन ध्वनिमुद्रण ऐकेल तेव्हा किती वर्षाची असेल, हातात किती वर्ष आहेत...सगळंच अंधातरी. फार थोड्या काळात एरनला तिच्या चिमुकलीचं १६ वर्षापर्यंतचं आयुष्य कल्पनेनं मनात साकारायचं होतं. त्या त्या वेळेस उद्भवणारे प्रश्न, शारीरिक बदल, मित्र मैत्रिणी, छंद, अभ्यास.....असे कितीतरी मुद्दे.  भावनावेग अनिवार होऊन तीन चार वेळा थांबून थांबून केलेलं पहिलं ध्वनिमुद्रण. पण नंतर सरावाने एरनने मुलीशी असा संवाद साधण्याचं  तंत्र अवगत केलं. स्वत:च्या वेदनेला विसरून पेटनच्या भवितव्यावर तिला लक्ष केंद्रित करायचं होतं. आता फक्त पेटन हेच लक्ष्य होतं तिचं आणि तिच्यावर आत्यंतिक प्रेम करणार्‍या डगचं.

मुलीसाठी सल्ला, मायेची पाखरण घालणार्‍या या संदेशातून एरनचं व्यक्तिमत्त्वंही उलगडत जातं, आपल्याला गुंतवून टाकतं. कर्करोगाचं निदान झालं आणि आयुष्य ढवळून निघालेल्या या दिवसांमध्ये कधीतरी डग आणि एरनने पुस्तक लिहायचाही निर्णय घेतला. ’लिव्हींग विथ द एंड इन माईंड’ हे त्या पुस्तकाचं नाव. मरणाआधी करायच्या गोष्टींची यादी कशी तयार हवी हेच सूत्र आहे या मागे.  क्षणभंगुर जीवनात मरणाचं नियोजन आपण विसरू नये ही त्यामागची धडपड. या निमित्ताने एरन प्रसारमाध्यमांपुढे आली आणि तिच्या आगळ्यावेगळ्या निश्चयाने  अनेकांच्या मनाला चटका लावून गेली.

१९९८ मध्ये एरन गेली, पण आपल्या मुलीसाठी कायमची इथेच राहिली ती असंख्य संदेश आणि आवाजाच्या रूपात.  ओप्राच्या स्मरणात राहिलेले पाहुणे या कार्यक्रमात गेल्या आठवड्यात एरनवर कार्यक्रम झाला आणि पुन्हा एकदा एरनच्या स्मृतींना उजाळा मिळाला. यावेळेला एरनची महाविद्यालयात शिकत असलेली पेटन प्रेक्षकांसमोर होती. एरनच्या निधनानंतर साडेचार वर्षांनी पुनर्विवाह केलेले तिचे बाबा आणि नवी आईदेखील.

या कार्यक्रमात आईच्या स्मृतींना उजाळा देताना पेटन सांगते,
"लहान असताना खूप वेळा आईचं ध्वनिमुद्रण ऐकायचे मी. पण जसजसं कळायला लागलं तसं आता भावनिकदृष्ट्या खूप कठीण जातं पाहणं." आता महिन्यातून एकदाच ती ध्वनिमुद्रण पाहते. एरनला आईच्या स्पर्शाची  उणीव भासतेच, तिच्याबरोबर वेळ घालवू शकत नाही याचं दु:ख होतंच. पण ती इथे नाही हे सत्य नाकारता येत नसलं तरी तिला तिचा आवाज ऐकता येतो. कधी काही प्रश्न पडला की उत्तर आईच्या आवाजातून मिळेल याची तिला खात्री आहे. आपल्याला वाटतात तसेच एखाद्या विषयावर आईचेही विचार असतील का ते अजमावायला आवडतं पेटनला.

बाबांनी पुन्हा लग्न करावं, माझ्या आयुष्यात आई असावी, स्त्री असावी हा देखील तिचाच आग्रह हे पेटन आवर्जून सांगते. पेटनला हे मान्य होणं, स्वीकार करणं जड जाईल ह्याची अर्थातच  एरनला कल्पना होती. एरनने केलेल्या ध्वनिमुद्रणात तिने म्हटलं आहे,
"बाबांनी लग्न करायला हवं पुन्हा, पेटन. मला माहित आहे अशी वेळ आली तर तुझ्या मनात अनेक  प्रश्न डोकावणार, बाबांच्या नवीन जोडीदाराला आई म्हणणं तुला जड जाणार, स्वीकारता येणार नाही आणि मुख्य म्हणजे मला काय वाटेल ह्या विचाराने तुझा जीव कासावीस होणार. पण तू हे स्वीकारायला हवंसं. तू तिला आई म्हटलस तरी चालेल गं. शेवटी तुझी खरी आई मीच नाही का? "

आतापर्यंत ऐकलेल्या असंख्य संदेशातून आणि उर्वरित संदेशात पेटनला दिसतो तो एकच संदेश, आईचं प्रेम.

एरनचा  शेवटचा म्हणजे तिच्या मृत्यूअगोदरचा संदेश पेटनने हल्लीच ऐकला.
"फार सुंदर प्रवास होता हा. प्रेम, स्वत:चा शोध,  कशाच्याच बदल्यात हे नाही बदलू शकत. हा प्रवास अनमोल होता. एकच विनंती आहे माझी आठवण ठेवा. मला जशी मानसिक शांतता लाभली तशी सर्वांना मिळावी. स्वर्गात मी तुमची वाट पाहीन. त्या वाटेवरचा माझा प्रवास जसा तुम्ही सुलभ केलात तसंच मीही तुमच्यासाठी आशेचा किरण होईन.  तुम्ही सर्वांनी भरभरून दिलेल्या प्रेम आणि जिव्हाळ्याबद्दल मी पेटन आणि डग ऋणी आहोत."

एरन आणि पेटनची कहाणी लिहिताना मला आठवतात, डोळ्यासमोर येतात माझ्या दोन मैत्रिणी.  नुकत्याच कर्करोगाशी लढता लढता हरलेल्या. एक भारतात, एक इथे अमेरिकेत. माझ्याच गावात. आपापल्या परीने, पद्धतीने तोंड देत होत्या दोघीही. मीच का, माझ्याच वाट्याला हे का ह्या अनुत्तरित प्रश्नाने त्यांना वेढलं असणारच. माझं नशीबच वाईट म्हणणारी माझी  भारतातली मैत्रीण, एकाच महाविद्यालयात शिकलेलो आम्ही, काही करता येत नाही या निराश भावनेने सोबतीला आली ती असाहाय्य हतबलता.  वाटत राहतं त्याही एरनसारख्याच भोवर्‍यात अडकलेल्या मनस्थितीतून गेल्या असणारच, त्यांची मुलं, आई वडील, नवरा प्रत्येकाचं दु:ख, वेदना कल्पनातीत. कुणास ठाऊक त्या दोघींना माहित होती का एरन आणि पेटनची गोष्ट? कदाचित भरल्या संसाराचा अवेळी निरोप घेताना मुलांसाठी कायमचा जवळ राहण्याचा एक अभिनव मार्ग म्हणून त्यांनीही उचललं असेल असं पाऊल, किंवा  सुचलीही असेल त्या दोघींना काहीतरी अगदी निराळी कल्पना.