Showing posts with label बी. एम. एम. लेखमाला. Show all posts
Showing posts with label बी. एम. एम. लेखमाला. Show all posts

Saturday, August 1, 2015

व्यक्तिचित्रे

बृहनमहाराष्ट्र वृत्तासाठी लिहीत असलेल्या लेखमालिकेतील हा माझा शेवटचा लेख.

अत्यानुधिक तंत्रज्ञानामुळे संवाद साधणं सोपं आता सहज सोपं होऊन गेलं आहे. परदेशात जाणं, ताबडतोब तिथे रुळणं ही नवलाईची गोष्ट राहिलेली नाही. पण हे झालं हल्ली हल्लीच्या काळात. ज्यांना इथे येऊन दशकं उलटली आहेत त्यांच्यासाठी मधल्या काळातील ही स्थित्यंतरं अचंबित करणारी आहेत. तरीदेखील असं वाटतं की ही प्रगती घडत असताना अनुभवाचं, प्रश्नाचं स्वरुप बदलत गेलं तरी मानवी मन मात्र तेच राहिलं. कधी अनाकलनीय तर  काहीवेळा ठोकताळे मांडता येणारं. प्रत्येकाचे अनुभव आणि प्रश्न वेगळे तसे ते अनुभवण्याचे, प्रश्न सोडवण्याचे मार्गही विविध. या सार्‍याचा वेध घेण्याचा प्रयत्न मी या लेखमालिकेतून केला.

मी अमेरिकेत आले तो काळ आणि आताचा काळ यात खूप फरक आहे. १९९५ च्या दरम्यान भारतात  संपर्क साधण्याचे मार्ग म्हणजे फक्त पत्र आणि फोन. साधारण त्या काळात जे इथे आले त्यांना नक्की आठवत असेल, फोन करायचा तर  MCI किंवा AT&T  हेच दोन पर्याय बहुतांशी उपलब्ध होते. दर मिनिटाला आपण ७५ सेंट खर्च करतोय याचं भान ठेवायला लागायचं. पत्र पाठवलं की पोचायला तीन आठवडे, उत्तर यायला तीन आठवडे. आपल्याकडून भारतातून आलेल्या पत्राला अगदी एक दोन दिवसात उत्तर लिहिलं गेलं तरी तिकडून तसं होईलच याची खात्री नसे. मायदेश सोडून आलेले आपण भावनिक गुंतवणुकीत अधिक गुंतलेले. तिकडे त्यांच्या दैनंदिन जीवनात फारसा फरक पडलेला नसायचा. मला आठवतंय, सासर - माहेरच्या सख्ख्या नातेवाइकांव्यतिरिक्त, मावश्या, मामा, मैत्रिणी झाडून सार्‍यांना तेव्हा मी पत्र लिहीत असे. मग  प्रतिसादाबद्दल आशा - निराशेचा खेळ चालू राही.  हळूहळू इ मेलचा जमाना आला. पण घरातल्या वयस्कर मंडळीना इ मेल कसं वापरायचं कुठे ठाऊक होतं? ते पत्राकडे डोळे लावून बसलेले असत. फोनचे दर स्वस्त झाल्यावर मग मात्र फोन मुळे हळूहळू पत्र लेखन कमी आणि  नंतर जवळजवळ  बंदच झालं. फोननंतर आता स्काइप, फेसटाइम, व्हॉट्सअॲप, गूगल टॉक....अशा अत्यानुधिक तंत्रांनी मात्र क्रांतीच केली. या सार्‍यामुळे आपल्या आयुष्यात झालेल्या बदलांचा मागोवा म्हणजेच ही लेखमालिका होती.

तळ्यात मळ्यात: आधुनिक तंत्रज्ञानामुळे आपण संवाद तर हरवून बसलेलो नाही ना ही जी शंका प्रत्येकाच्या मनात डोकावते त्यावरुन ’तळ्यात मळ्यात’ ची कल्पना सुचली.  दामले कुटुंबांवरचा हा लेख. केतन, मीरा आणि मुलं नानांच्या, केतनच्या वडिलांच्या घरी येतात. आईच्या निधनानंतर आग्रह करुनही अमेरिकेत न आलेल्या वडिलांना भेटायला केतन वर्षभराने भारतात येतो.  केतनच्या मनात नानांना भेटायची अनिवार ओढ  आहे. नानाही त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसलेले.. घरी आल्या या सार्‍याचं प्रतिबिंब प्रत्येकाच्या वागण्यात उमटतं. पण थोड्याच वेळात केतन आणि मुलं आपापले लॅपटॉप, फोन घेऊन बसतात. नानांचा नाराजीचा सूर जाणवतो आणि मीराला त्यांच्या मनातला एकटेपणा तीव्रपणे बोचतो. संपर्कात रहाण्याच्या आधुनिक साधनांबद्दल आनंद मानायचा की प्रत्यक्ष भेटीतली मजा त्यामुळे पटकन संपुष्टात येते याचं दु:ख हा प्रश्न मीराला छळत रहातो आणि निदान त्या क्षणीतरी नानांचा एकटेपणा घालवायचा मार्ग तिला सापडतो. असा या लेखाचा विषय होता. माझी खात्री आहे की अनेकांनी अंशतः तरी हे अनुभवलेलं असणारच. (बृहनमहाराष्ट्र वृत्त: ऑगस्ट २०१३)
मी काय करु?: अर्थाजन आलं की बचतही आलीच. पण याचा कधीकधी अतिरेक होतो आणि आपलेच जीवलग त्यात पोळले जातात हे लक्षातही येत नाही. यावरुनच हा लेख सुचला.
नोकरी करणारी मीना, आपल्या आई वडिलांना दर वर्षी मुलांना सुट्ट्या लागल्या की अमेरिकेत बोलवून घेते. डे केअर, आफ्टर स्कूल हे पर्याय असतानाही पैसे वाचवण्याच्या नादात, आईला आता झेपत नाही, तिची इच्छाही नाही हे जाणवूनही आजी आजोबांचा सहवास मुलांना मिळावा हे निमित्त पुढे करते. लेखातील, मीरा,  तिचे आई - बाबा, मीराचा नवरा, या सार्‍यांनाच प्राप्त परिस्थितीबद्दल पडलेला प्रश्न म्हणजेच, ’मी काय करु?’ (बृहनमहाराष्ट्र वृत्त:  ऑक्टोंबर २०१३)

कृतज्ञ: वर्षानुवर्ष परदेशात राहूनही आपल्या मनाचं पारडं मायभूमीकडे जास्त झुकलेलं असतं. कर्मभूमीचं काय? हे अनेकदा मनात येतं. त्याच विषयावरचा हा लेख.
समाजसेविका असलेल्या इराला अनिकेत जेव्हा भारतातल्या संस्थेला मोठी देणगी द्यायची इच्छा व्यक्त करतो तेव्हा सखेद आश्चर्य वाटतं. मातृभूमीच्या ऋणात रहायला हवंच पण कर्मभूमी विसरु नये हे अनिकेतला पटवून ती द्यायचा प्रयत्न करते.  इरा हे पटवून देते तेव्हा जे जग आपल्या समोर उभं करते ते मला महत्त्वाचं वाटलं. इथेही सारं काही आलबेल नाही आणि आपण ते बदलायला हातभार लाऊ शकतो ह्याचाच दाखला म्हणजे तिचं या क्षेत्रातील काम. हा लेख शारलटमध्ये गेली कितीतरी वर्ष समाजसेवा करणार्‍या मैत्रिणीच्या अनुभवावरून लिहिला. (बृहनमहाराष्ट्र वृत्त: डिसेंबर २०१३)

बोनसाय: महत्त्वाकांक्षी स्त्री आता नवलाची बाब राहिलेली नाही. एकमेकांच्या सहाय्याने आपली महत्त्वाकांक्षा उत्तम रितीने जोपासणारे पती - पत्नीही आता अगदी सहज दिसून येतात. पण तडजोडीची तयारी दोन्ही बाजूने नसते तेव्हा  परिस्थितीच्या चक्रात भरडल्या जाणार्‍या मुलांवर जो परिणाम होतो तो या लेखाचा विषय.
डिपेंडंट व्हिसावर आलेली स्वाती स्वत:च्या शिक्षणाला अमेरिकेत वाव दिसत नाही म्हटल्यावर केदारची इच्छा नसताना मुलाला, मंदारला घेऊन  भारतात ’ट्रायल’ म्हणून  परत जायचा निर्णय घेते. सततच्या वाद - विवाद आणि चर्चेतून ती स्वत:च्या निर्णयावर ठाम रहाते. केदार मात्र अनेक कारणांसाठी अमेरिकेतच रहातो. तो भारतात येण्याची आतुरतेने  वाट पहाणार्‍या  मंदारच्या मनावर, वागणुकीवर होणारा परिणाम म्हणजेच ’बोनसाय’  लेख. (बृहनमहाराष्ट्र वृत्त: फेब्रुवारी २०१४)

इच्छा: मृत्युची सावली पडलेल्या घरातलं शोकदायक वातावरण आणि भेटायला येणार्‍यांचं वागणं याचा होणारा मनस्ताप आपण ऐकलेला, अनुभवलेला असतो. पण घरातलेही काही जीवलगाच्या जाण्याचं दु:ख विसरतात तेव्हाची घरातल्या प्रत्येकाची मानसिक स्थिती दर्शविणारा लेख.
निलेश हा परदेशी रहाणारा आई - दादांचा मुलगा. स्मिता, सुनिल ही त्याची भारतातली भावंडं. अमेरिकेतून दादांच्या निधनानंतर दिवसांसाठी आलेला मुलगा आणि त्याची भारतातील भावंडं यांच्यामध्ये होणारे वाद, दोषारोप, उणीदुणी काढणं पाहून अखेर मुलांची आई फक्त एकच मागणं मुलांकडे मागते. तोच लेख ’इच्छा’. (बृहनमहाराष्ट्र वृत्त: एप्रिल २०१४)

रिंगण: आयुष्यात असे काही क्षण येतात की आपण रिंगणात अडकून पडलो आहोत असं वाटायला लागतं. तशाच एका प्रसंगातून जाताना या लेखातील रमाकांतच्या शोधयात्रेच्या प्रवासाचा वेध म्हणजे हा लेख.
भारतात कायमसाठी परत चाललेला संतोष रमाकांतना भेटायला येतो आणि ३० वर्षाहून अधिक काळ इथे राहिलेल्या रमाकांतचं मन आपल्या अमेरिकेत येण्याच्या निर्णयामागची कारणं शोधायला लागतं. आई - वडिलांची इच्छा? समाजात प्राप्त होणारी प्रतिष्ठा? की स्वत:चाच निर्णय या प्रश्नांचा गुंता सोडवणार्‍या मनाचा शोध म्हणजे म्हणजे ’रिंगण’. (बृहनमहाराष्ट्र वृत्त: जून २०१४)

सीमारेषा: परदेशात मूल वाढवताना कधी ना कधी, मायदेशीच असतो तर हा प्रश्न आणि तिथलं आणि इथलं ही  तुलना कधी उघड उघड तर कधी मनातल्या मनात केली जातेच. गिरीश, श्रावणी त्यांच्या मुलांच्या बाबतीत अशा एका प्रसंगाला सामोरे जातात आणि जर इथे राहिलो नसतो तर, भारतात असतो तर ह्या जर- तर ने श्रावणी  अस्वस्थ होते पण त्यांचा तरुण मुलगा, साकेतच त्यांची अस्वस्थता घालवायला मदत करतो. दोन पिढ्या आणि त्यांची मानसिकता आणि वेगवेगळ्या देशात मूल वाढवणं यावरचा  लेख म्हणजे ’सीमारेषा’. (बृहनमहाराष्ट्र वृत्त: ऑगस्ट २०१४)

दोन ध्रुवांवर - परदेशात गृहीणी असणं कधीकधी किती अवघड होऊन जातं यावर प्रकाश टाकणारा हा लेख.
नोकरी न करणारी सीमा आणि सतत कामाच्या व्यापात अडकलेला निलेश यांच्या संसाराची कथा म्हणजे दोन ध्रुवांवर. परिस्थितीला दोष देता देता, निलेशला दोषी मानणारी, त्याने परिस्थितीतून काढलेल्या मार्गांचा अवलंब करायला नकार देणारी सीमा आणि सीमाला आनंदी ठेवण्यासाठी धडपडणारा पण चुकत जाणारा निलेश. कोंडीत सापडल्यासारखं आयुष्य जगताना त्यांनी स्वत:साठी निर्माण केलेलं स्थान म्हणजेच, ’दोन ध्रुवावर’ हा लेख.  (बृहनमहाराष्ट्र वृत्त: ऑक्टोबर २०१४)

मंडळोमंडळी: भारताच्या बाहेर पडलं की मराठी माणूस एकत्र येतो आणि मंडळाची स्थापना होतेच. या मंडळांवरचा हा लेख. गावोगावी असणार्‍या महाराष्ट्र मंडळात सामील होण्याची प्रत्येक मराठी माणसाची कारणं वेगळी असतात. कधी मुलांसाठी, कधी ओळखी व्हाव्यात म्हणून तर कधी मुलांना, स्वत:ला व्यासपीठ मिळावं या हेतूने मंडळाचं सभासदत्व घेतलं जातं. पण मंडळाचा कारभार आणि लोकांची मानसिकता सर्वत्र सारखीच. राधा नावाच्या एका लहानग्या मुलीच्या, तसंच नाटकवेड्या नरेन आणि मंडळाच्या कार्यकारीणीच्या नजरेतून मंडळांच्या मानसिकतेचा वेध घेणारा लेख ’मंडळोमंडळी’.  (बृहनमहाराष्ट्र वृत्त: डिसेंबर २०१४)

अळवावरचे थेंब: हातातून निसटून गेलेले क्षण अळवावरच्या पाण्यासारखे घरंगळून गेलेले असतात. तसंच आयुष्यातल्या घटनांचंही. त्याच कल्पनेवरचा हा लेख.
प्रणिता आणि तिच्या दोन मुली, तितिशा आणि दिशा.   स्पर्धेच्या युगात त्यांनी मागे पडू नये म्हणून घाण्याला जुंपल्यागत सतत कुठल्या ना कुठल्या गोष्टीत त्यांना अडकवून टाकलेल्या आई - बाबांना या मुलींनी घातलेलं साकडं म्हणजे ’अळवावरचे थेंब’ हा लेख.
(बृहनमहाराष्ट्र वृत्त: फेब्रुवारी २०१५)

धागे: परदेशात रहाताना मायभूमीतील आपल्या जीवलगांशी मुलांची जवळीक रहावी यासाठी आपण अतोनात प्रयत्न करत असतो. आशा - निराशेच्या या खेळात कधीतरी दिसणार्‍या प्रकाशाच्या तिरीपिने हरखून जायला कसं होतं यावरचा हा लेख.
 भारतातल्या नातेवाइकांपासून मुलगा अलिप्त असतो याचा सल बाळगणारे केतकी - सारंग.  नीलला त्यांच्याबद्दल ओढ वाटावी यासाठी वर्षानुवर्ष प्रयत्न करणारी केतकी. अखेर नील महाविद्यालयीन शिक्षणासाठी बाहेरगावी गेल्यावर सगळे मार्ग खुंटल्यासारखे वाटत असतानाच नील अचानक एक सुखद धक्का देतो त्याची कथा सांगणारा लेख म्हणजे, ’धागे’.
(बृहनमहाराष्ट्र वृत्त: एप्रिल २०१५)

Wednesday, April 1, 2015

धागे

नील महाविद्यालयीन शिक्षणासाठी दुसर्‍या गावात राहायला गेला. त्याची तिथली व्यवस्था लावताना इतर प्रश्नांबरोबर आता त्याचा भारतातल्या नातेवाईकांशी, विशेषत: आजी, आजोबांशी संपर्क कसा राहणार हा प्रश्न केतकीच्या मनात वारंवार यायला लागला. संपर्काची आधुनिक साधनं आजी, आजोबांना ठाऊक नव्हती आणि नील आवर्जून फोन करेल याची केतकीला खात्री नव्हती. पण आधी तो दुसर्‍या गावी रुळणं महत्वाचं होतं. मग पाहू त्याने भारतातल्या मंडळीशी कसं संपर्कात रहायचं ते हाच विचार केतकीने केला. सुरुवातीला मनात आलेल्या शंका, प्रश्न हळूहळू मागे पडत गेले ते नील उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी घरी येईपर्यंत. नील घरी आला आणि घर भरल्यासारखं झालं. तसा असायचा सारखा बाहेरच. मित्रांमध्ये, धावायला असं काही ना काही चालू असायचं. पण तरीही त्याचं गावात असणंही केतकी, सारंगला पुरेसं होतं. तो घरी आल्यापासून पहिल्यांदाच  निवांत गप्पा मारत तिघं बसले आणि एकदम नील म्हणाला.

"एकेक करुन सगळ्यांना फोन करतो भारतात. खूप दिवसात बोललोच नाही कुणाशी." केतकी पाहत राहिली. तिच्यादॄष्टीने हा सुखद आश्चर्याचा धक्का होता. गेल्या चार महिन्यात अनेकवेळा मनात येऊनही तिने काही विचारलं नव्हतं आणि आज अचानक नीलच स्वत:हून फोन करण्याबाबत म्हणत होता.
"खरंच? कर फोन. मी बोलते तेव्हा सगळेच चौकशी करतात तुझी. तूच फोन केलास तर खूप आनंद होईल सगळ्यांनाच. पण आज एकदम कसं काय वाटलं तुला?" न रहावून तिने विचारलंच.
"अगं या वेळेला भारतात एकटाच नाही का जाऊन आलो. त्यामुळे कसं प्रत्येकाशी ’कनेक्ट’ झाल्यासारखं वाटतंय. एरवी कायम तुमच्याबरोबर शेपटासारखा असायचो मी." तिला हसायला आलं. शेपटासारखा! मुलगा योग्यं उपमा पण द्यायला शिकला होता. खरं तर त्याला एकटं भारतात पाठवायचं की नाही यावर किती चर्चा, वाद झाले होते घरात. केतकी तब्बल ३ आठवडे नीलला एकटं पाठवायला बिलकूल तयार नव्हती. पण सारंगला नीलची कल्पना एकदम पसंत पडली. नीलला जिथे जिथे फिरायचं होतं तिथे तिथे सुदैवाने नातेवाईकही होते. तो राहणार त्यांच्याकडेच होता पण त्याला फिरायचं मात्र एकट्यानेच होतं. नेमकी त्याबाबत ती सांशंक होती.
"आई, बारावीत आहे मी. मोठा झालोय. आणि काही अडचण आलीच तर आहेच ना प्रत्येक ठिकाणी कुणी ना कुणी. तू मात्र सगळ्यांना बजावून सांग हे. नाहीतर कुणी सोडणार नाही एकटं मला." केतकी शेवटी तयार झाली. नील ठरल्याप्रमाणे एकटा भारतात जाऊनही आला. महाराष्ट्रातल्या किल्ल्याचं त्याला अप्रूप होतं, शाळा पाहायच्या होत्या. त्याच्या मनातलं सर्व काही करुन झालं. सगळ्या नातेवाईकांना आवर्जून भेटला आणि अनपेक्षितपणे इतक्या वर्षात जे घडलं  नव्हतं ते घडून आलं. त्याच्या मनात भारत, भारतातल्या नातेवाईकांबद्दल बंध निर्माण झाले. आपुलकी वाटायला लागली. तिला मनस्वी आनंद झाला. विरत चाललेले धागे जुळायला लागल्याचं समाधान वाटत होतं.  नाहीतर आता आतापर्यतचं चित्र फार वेगळं होतं. तिच्या मनात भूतकाळ्यातल्या एकेक प्रसंगाची दाटी व्हायला लागली.

दोन चार वर्षापूर्वीचीच तर गोष्ट.
"अरे फोन कर ना भारतात. आजी, आजोबा वाट पाहत असतील." पाच सहा वेळा केतकीने आठवण केल्यावर नीलने फोन लावला.
दोन मिनिटात संभाषण संपलं सुद्धा.
"हे काय, बोलला नाहीस? आजी नव्हती?"
"बोललो की."
"काय?"
"आई काय गं. किती प्रश्न. दोघांनी विचारलं कसा आहेस? अभ्यास कसा चाललाय? मी पण ते कसे आहेत ते विचारलं."
"आणि?"
"आणि काही नाही. मग संपलं बोलणं. बंद केला फोन." नील काहीतरी पुटपुटत निघून गेला. केतकी पाहत राहिली. म्हटलं तर गेली चार पाच वर्ष तरी हे असंच चालू होतं. सतत मागे लागलं की शेवटी तो फोन उचलायचा. त्यातही आपणच करतो फोन, तिकडून येतात का कुणाचे ही कुरकूर असायचीच.  शिंग फुटल्याची लक्षणं म्हणून ती दुर्लक्ष करायला लागली.

नीलच्या लहानपणी भारताच्या दर दोन वर्षांनी होणार्‍या खेपा म्हणजे निसटून गेलेला काळ पकडण्याची खटाटोप. नीलला घेऊन ती भारतात गेली की हे दुरावलेपण मिटवून टाकायची धडपड सुरु व्हायची. नीलच्या चुलत, मावस भावंडांची आजी आजोबांशी जितकी जवळीक असायची तितकीच ती नील बरोबरही असावी हा एकच ध्यास मनाला लागायचा. मग त्या दिशेने तिचे प्रयत्न सुरु व्हायचे. आजोबा अभ्यास घेतायत ना, जा मग नील तूही बस तिथेच, आजीबरोबर भाजी आणायला जा, सुचेल ते जमेल ते करुन दोन वर्षातलं दूरस्थपण मिटवून टाकायचा अट्टाहास असायचा. परत आलं की मग ती नीलला या ना त्या परीने जास्तीत जास्त गप्पा मारायला भाग पाडायची फोनवर.  गाणं म्हण, गोष्ट सांग कुठूनतरी त्याने सर्वांशी बोलावं, त्याचं कौतुक आपण ऐकावं असं वाटायचं तिला. नातवंडं असली तरी सहवास नसेल तर जे  अंतर राहतं ते दूर करण्याचा तिच्यापरीने  प्रयत्न करत राहिली.  दोन्ही घरी केतकीच संभाषणाचे विषय सुचवायची. अभ्यास, खेळ, पुस्तकं, प्रवास एक ना अनेक. नीलला पण दोन्ही घरातल्या आजी, आजोबांचे रोजचे कार्यक्रम सांगून ती त्याबद्दल त्याला बोलायला भाग पाडायची. पण हे सगळं वरवरचं आहे असं तिला आतून आतून जाणवायला लागलं. आठवड्यातून एकदा फोन,  दिड दोन वर्षांनी तीन चार आठवड्यांसाठी केलेली भारतवारी आणि अधूनमधून आलेले आजी आजोबा एवढ्या पुंजीवर तिला तिच्या आजी, आजोबांबरोबर असलेल्या नात्यासारखं नातं, नीलचं त्याच्या आजी आजोबांशी पण व्हायला हवं होतं.  प्रत्येक फोन संभाषणानंतर नात्याचे धागे विरळ होत चालले आहेत की काय या जाणीवेने ती व्याकूळ व्हायला लागली. अमेरिकेतच लहानाचा मोठा झालेला नील स्वत:च्या विश्वात रमायला लागला होता. अगदी जवळचे नातेवाईक सोडले तर तसा तो इतरांना ओळखत तरी कुठे होता? स्काइप, फेसटाइममुळे एकमेकांना पाहिल्याचं समाधान मिळायला लागलं पण संभाषण तितपतच.  कुठेतरी काहीतरी हरवलं होतं, जाणवत होतं पण कळत नव्हतं. मग नेहमीचीच धडपड, खटपट, कारणांचा शोध, भूतकाळात डोकावणं. आणि त्यानंतर अचानक नीलचं भारतात एकट्याने फिरुन येणं. तिला आत्ताही त्याच्याबरोबर झालेला संवाद आठवला.

"यावेळेला मी भारतात एकटाच गेलो तर?" अठरा वर्षाच्या नीलकडे ती पाहत राहिली.
"एकटाच म्हणजे?"
"नेहमी आपण सगळे एकत्र जातो. मला एकट्याला जायचं आहे. सगळीकडे स्वत: जायचं आहे."
"अरे, इतकं सोपं नाही एकट्याने फिरणं. तुला मराठी येत असलं तरी कळेल लगेच कुणालाही परदेशातून आला आहेस ते. नकोच त. कुणी फसवलं, तू हरवलास, नकोच ते."
"नाही होणार. मला फिरायचं आहे. महाराष्ट्र बघायचा आहे." केतकी सांशक होती पण सारंगने नीलची कल्पना उचलून धरली आणि खरंच म्हटल्याप्रमाणे तो एकटा गड, किल्ले करुन आला. नातेवाईकांना भेटला. सगळ्यांचं केद्रस्थान तो होता. केतकी, सारंग असले की काय कसा काय अभ्यास? बरा आहेस ना? इतकंच संभाषण व्हायचं. पण यावेळेला तो सर्वांकडे एकेक दिवस का होईना राहिला होता. त्याच्या अमेरिकेन जीवनशैलीबद्दल, कॉलेज, मित्र मैत्रींणीबद्दल, रहाणीमानाबद्दल सर्वांना प्रचंड उत्सुकता होती. तोही मोकळेपणाने माहिती देत राहिला. नकळत बंध जुळले गेले. नील परत आला तोच मुळी भारतीय असल्याचा अभिमान बाळगत.  शिवाजीमहाराजांनी घडवलेला इतिहास केतकी, सारंगने पुन्हा त्याच्याकडून ऐकला. आजोळच्या गावी काय काय सुधारणा करता येतील याचे बेत त्याने केले. गेल्या अनेक वर्षांत झालेल्या असंख्य भारत भेटीने जे साधलं नव्हतं ते त्याने एकट्याने केलेल्या भारत वारीने साध्य झालं होतं. दोघंही कौतुकाने तो म्हणेल ते ऐकत होते आणि आज तर तो सगळ्यांना फोन करायचं म्हणत होता.  प्रेमाचे धागे विरताहेत की काय असं वाटत असतानाच ते जुळून यायला लागलेले दिसले आणि केतकी समाधानाने नीलच्या म्हणण्याला मान डोलवत राहिली.

 http://bmmonline.org/sites/default/files/BMM/BMM/BMM_Newsletter_April2015.pdf

Monday, February 2, 2015

अळवावरचे थेंब

"नाही, नाही, त्याचं कारण आहे फार सोपं झालं आहे सगळं आता.... " प्रणिताने मान मागे करुन पाहिलं.
तावातावाने पारकर काका आपलं मत मांडत होते.
"काय सोपं झालं आहे काका? " तिने उत्सुकतेने विचारलं.
"अगं तुमची सर्वांचीच मुलं अस्खलित मराठीत बोलतात ना त्यावरुन म्हणत होतो. "
"सर्वांची? "
"अगदी सर्वांची नाही पण निदान काही जणांची. काय आहे, आता मराठी शाळा आहेत, चित्रपट पहाता येतात,  गुगल आहेच.  एकूणच साधनांची उपलब्धता हाताशी अगदी सहज आहे त्यामुळे मराठी टिकवणं सोपं आहे असं म्हणायचं होतं. "
"पण काका महत्वाचं आहे ते घरी मराठी बोलणं. त्याचा आणि या साधनांचा काहीच संबंध नाही. " काका हसले.
"तू खुर्ची सरसावून बसलीस ना तेव्हाच आता मी तोंडघशी पडणार हे कळलं होतं. " प्रणिताबरोबर बाकी सारेच हसण्यात सामील झाले.
"खरं आहे तुझं पोरी. तेच राहून गेलं आमचं त्यामुळे मुलांची नाळ जोडली गेलीच नाही भाषेशी. या देशात आलो त्याला ३० वर्षाहून अधिक काळ लोटला. आलो तेव्हा गावात मराठी फक्त आम्हीच.  वाटायचं, या भूमीत वाढायचं तर इथलंच होऊन गेलं पाहिजे. आपोआप मुलांना तसंच वाढवलं गेलं.   जुनी वस्त्र काढून नवी चढवल्यासारखं आम्हीही सगळं अडगळीत टाकलं. भाषा, चालीरीती सारंच. आमचं जे झालं तेच बहुतेक जणाचं. मग हळूहळू मराठी माणसं वाढली, सांस्कृतिक जाणिवांचं भान आलं. पण तरीही ते मर्यादित राहिलं ते स्थलांतरित झालेल्या आमच्यासारख्यांपर्यंतच. इथेच जन्मलेली आमची मुलं कोरडीच राहिली. ती कधी कधी म्हणतात, आम्हाला आवडलं असतं मराठी बोलता आलं असतं तर तेव्हा काय गमावलं ते लक्षात येतं. त्यामुळे तुमच्या पिढीचं  कौतुक वाटतं. सारं जपून ठेवता आहात. प्रणिता तुझ्यामुळे मनातलं बोललो आज. एरवी थोडासा बचावात्मक पवित्रा घेतला जातोच नाही म्हटलं तरी. त्याचाच भाग होता तो सारं सोपं झालं आहे म्हणण्याचा. "  पारकर काकांनी तोंड फोडलेल्या  विषयावरच मग गप्पा रंगत गेल्या.

प्रणिता स्वत:वरच खूश होती. पारकर काकांनी केलेल्या कौतुकाने घरातलं मराठीपण टिकवण्याचं सार्थक झाल्यासारखं वाटत होतं.  मुलींभोवतीच तिचं विश्व होतं. तिला जे मिळालं होतं ते आणि नव्हतं तेही मुलींना मिळावं यासाठी  धडपड चालू होती तिची. दोन्ही मुली अष्टपैलू होत्या. नाच, गाणं, चित्रकला, बुद्धिबळ, खेळ... काही येत नाही असं नव्हतं. मुलींनी अष्टपैलू होणं हे तिचं ध्येयच होतं.  धावपळ व्हायची पण हे युगच असं आहे. स्पर्धेचं. त्यात टिकायचं तर अभ्यासाबरोबर सारं काही जमायला हवंच म्हणून तिचे अथक प्रयत्न चालू होते. पारकर काकासारखं व्हायला नको. आपल्याकडून काही राहिलं म्हणून मुलांचे बोल नकोत, आपल्या मनात खंत नको. तिने स्वत:च्या मनाची पुन्हा पुन्हा खात्री करुन घेतली.  कुठे काही चुकतंय असं वाटलं नाही तेव्हा  तिला मनापासून आनंद झाला. कधी एकदा पारकर काकांशी झालेलं बोलणं  मुलींना आणि त्यांच्या बाबाला सांगतोय हे असं होऊन गेलं.

"पारकर काका कौतुक करत होते तुमचं. " प्रणिताच्या बोलण्यावर तितिशा आणि दिशाने प्रश्नार्थक चेहर्‍याने एकमेकींकडे पाहिलं.
"मराठी बोलता, लिहिता, वाचता ना दोघी म्हणून. " प्रणिताच्या आवाजातल्या उत्साहावर दोघींच्या नुसत्या हुंकाराने  पाणी पडलं. तरीही चिकाटीने तिने घडलं ते सांगितलं.
"मग? तुम्हाला दोघींना काय वाटतं? "
"तुला आम्हाला काय वाटतं ते खरंच ऐकायचं आहे? "
"नक्की. पण  पोचलो आपण तुमच्या गाण्याच्या वर्गापाशी. उतरा पटकन. नंतर बोलू. " गाडी थांबवत प्रणिता म्हणाली. तितिशा आणि दिशा दोघी हातातलं सामान घेऊन उतरल्या. त्यांचा सराव होईपर्यंत कामं उरकून घ्यावीत या विचाराने तिने गाडी वळवली. तासाभरात पुन्हा इथे यायला हवं. इथूनच दोघींना बास्केट बॉल खेळायला नेऊन सोडायचं. पुन्हा काहीतरी काम आटपून न्यायला यायचं. घरी जायला नक्की आठ वाजून जाणार. जाता जाताच वाटेत थांबावं कुठेतरी खाऊन घ्यायला. बाबासाठी काहीतरी न्यावं लागेल फक्त. कामांची, वेळेची  गणितं तिचं मन सोडवत राहिलं.

घरी आल्याआल्या ठरवल्यासारखं मुलींनी विषय काढला.
"सांगू आम्हाला काय वाटतं? "
सोफ्यावर निवांत बसून टी. व्ही. चं बटण दाबणारी प्रणिता गोंधळली.
"कशाबद्दल? "
"मगाशी तू विचारत होतीस ना? बाबा तू पण ऐक रे. " दोघींनी आईने जे गाडीत सांगितलं होतं ते सांगून बाबाला पण चर्चेत सामील केलं.
"आता आमचं मत सांगतो. पारकर काकांसारखं तुमचं पण चुकतंय. "  एकदम तोंडघशी पडल्यासारखं झालं.  प्रणिताला राग आला दोघींचा.   पण कसोशीने शांत रहात ती मुली पुढे काय बोलतायत ते ऐकत राहिली.
"म्हणजे मराठीचं नाही म्हणत. मराठीसाठी मुद्दाम काही करावं लागलंच नाही. पहिली ओळख मराठीचीच तर झाली आणि घरात आपण मराठीत बोलतो याचा आम्हालाच अभिमान वाटतो, जवळीक वाटते तुमच्याबद्दल. सार्‍याच मराठी बोलणार्‍यांबद्दल. पण बाकीच्या गोष्टींबद्दल आमची मतं मांडायची आहेत आम्हाला दोघींना. "  आई, बाबा काहीच बोलत नाहीत ते पाहून दोघी पुढे बोलत राहिल्या.
"शाळेत जायला लागल्यापासून आम्ही कधी घरी नसतोच. हे शिका, ते शिका, इतर भारतीय मुलांशी तुलना हेच असतं कायम.  सहावीत गेल्यापासून तर श्वास घ्यायलाही वेळ नाही अशी अवस्था झाली आहे.  आता, कॉलेजच्या प्रवेशासाठी हे करायला हवं, ते करायला हवं, शाळेच्या, मंडळाच्या कार्यक्रमात भाग घे, हे जमायलाच हवं, ते न करुन कसं चालेल. तितिशा करते म्हणून मी आणि मी करते म्हणून ती. तुम्ही तर अष्टपैलू नव्हता पण तरी हुशार आहात. आम्हा दोघींनाही सारखं काहीतरी करायला भाग पाडत असतेस तू आई. आणि बाबा तू पण. "
"ए, मला नका बुवा मध्ये पाडू. " वातावरणातला ताण हलका करण्यासाठी बोलला खरा बाबा. पण दोघी चिडल्याच.
"नको तेव्हा मजा करु नकोस बाबा. आज आम्ही सांगणारच आहोत आम्हाला काय वाटतं ते. "
"आई तू जशी दमतेस ना आम्हाला सतत इकडे तिकडे घेऊन जायला. तितक्याच आम्ही दमतो.  तुमच्या दोघांच्या अपेक्षेप्रमाणे आम्हाला यश मिळालं नाही, गोष्टी जमल्या नाहीत तर या विचारानेच निराश व्हायला होतं. आम्ही दोघी आताशी फक्त आठवीत आहोत आणि आमच्या कॉलेजच्या प्रवेशासाठी तुम्ही दोघं इतकी चर्चा करता, लोकांकडून माहिती मिळवता की  वाटतं पुढे शिकायलाच नको म्हणजे सारं काही आपोआप टळेल. एकदा एखादी तरी उन्हाळ्याची सुट्टी, शनिवार, रविवार असे हवेत की आम्ही फक्त  झोपा काढू. तुम्ही तुमच्या लहानपणीच्या गोष्टी सांगता ना तेव्हा आम्हाला तुमचा हेवा वाटतो.  आम्हाला तुमचं लहानपण हवं आहे.  खेळायचं आहे घराबाहेर तास न तास, भटकायचं आहे निरर्थक, सायकल दामटवायची आहे.  तुमच्याबरोबर पत्ते खेळायचे आहेत, गोष्टी ऐकायच्या आहेत, दंगा मस्ती करायची आहे, पदार्थ करायला शिकायचे आहेत. " प्रणिता आणि बाबा दोघंही आपल्या लेकींकडे पहात राहिले. इतकं साचलं होतं यांच्या मनात? दोघंही मूक होऊन गेले.
"खूप बोललो ना आम्ही. रागावलात? " दोघींनी गळ्यात हात टाकले. प्रणिताने डोळ्यातून येणारं पाणी लपवलं. कसनुसं हसून ती नकारार्थी मान डोलवत राहिली.
"आम्हाला ठाऊक आहे हे सारं तुम्ही आमच्यासाठी, आम्ही आयुष्यात पुढे यावं, यशस्वी व्हावं म्हणून करताय. पण आम्हाला काय पाहिजे ते कुणी विचारलंच नाही कधी, सांगायला गेलं तरी दुर्लक्ष किंवा आमचं चुकीचं हे पटवून देणं, तुमच्या दृष्टीने चुकीचं असलं तरी कधीतरी आमच्या मनासारखंही करुया ना. आई, बाबा आम्हाला तुमचा वेळ पाहिजे. तुमच्याबरोबर वेळ घालवायचा आहे आम्हाला. आपल्या चौघांना एकत्र करता येईल अशा गोष्टी करायच्या आहेत. पारकर आजोबांच्या हातून मुलांना मराठी शिकवायचं राहून गेलं तसं तुमच्या हातून, आम्हाला तुमचा वेळ आणि निर्णय स्वातंत्र्यं द्यायचं राहून गेलं आहे आई, बाबा. " प्रणिता आपल्या मोठ्या झालेल्या लेकींकडे पहात राहिली. अळवावरच्या थेंबासारखे निसटून गेलेले क्षण  परत आणणं शक्य नव्हतं पण पारकरकाकांमुळे आज मुलींनी त्याचं मन मोकळं केलं होतं, आपल्याला काय पाहिजे ते सांगितलं होतं. आता कुणाची इच्छा पूर्ण करायची हे ठरवायचं होतं. जमेल त्यांना काय हवं ते द्यायला? नकळत तिने बाबाकडे पाहिलं. तेच प्रश्नचिन्ह घेऊन तोही तिच्याकडे पहात होता.

मुलींच्या पाठीवर थोपटून तिने टी. व्ही. चालू केला आणि मेंदूचा ताबा विचारांनी घ्यायच्या आधीच त्या कार्यक्रमात डोकं खुपसलं.


मोहना जोगळेकर
बृहनमहाराष्ट्र वृत्तसाठी लिहित असलेल्या लेखमालिकेतील लेख.

 वृत्ताचा दुवा:
http://bmmonline.org/sites/default/files/BMM/BMM/BMM_Newsletter_Feb2015.pdf

Wednesday, December 3, 2014

मंडळोमंडळी

राधाने पलंगाच्या बाजूला ठेवलेली डायरी उघडली.
... दिवाळीच्या कार्यक्रमात मी छान गाणं म्हटलं.  ते गाणं आईने आल्याआल्या टी.व्ही. वर लावलंही. आम्ही सगळेच उत्साहाने पहायला, ऐकायला लागलो. पण माझं गाणं ऐकूच येत नव्हतं. आजूबाजूच्या गोंधळाचा, इतरांचा आवाज माझ्या आवाजाहून मोठा होता. माझं गाणं कुणी ऐकलंच नाही म्हणायचं तर. आई चिडली. म्हणाली, फक्त स्वत:च्या  मुलांचे कार्यक्रम पहातात लोकं. ते झालं की झालं गप्पाष्टक सुरू. पण इतरांचे कार्यक्रम चालू असतात तेव्हा ती पण गप्पा मारत असतेच की बाजूला बसलेल्या मावशीशी. मी तिला तसं म्हटलं तर आणखी चिडली. ते वेगळं असं काहीतरी पुटपटली. पण मग मी कशाला म्हटलं तिथे जाऊन गाणं? मला तर बाकीची मुलं पूर्ण वेळ  दंगा करत होती त्यांच्याबरोबर खेळायला आवडलं असतं. बाबा आणि आईच गाणं ऐकणार असतील तर त्या साठी देवळाच्या रंगमंचावर कशाला जायला हवं? घरी रोज  जवळ जवळ १ महिना गाणं म्हणण्याचा सराव आई करून घेतंच होती की.

दिवाळीच्या कार्यक्रमाबद्दल  काय वाटलं ते राधाने चार वाक्यात तिच्या वहीत बंदिस्त केलं आणि क्षणात ती झोपलीही.

*************************
नरेनने घरी आल्या आल्या भारतात फोन केला. तिथल्या नाटकवेड्या मित्रमंडळीपैंकी कुणाशीतरी कार्यक्रमानंतर बोलणं हा त्याचा आवडता छंद. शाळेपासून एकत्र अभिनय केलेली त्याची मित्रमंडळी त्याच क्षेत्रात कार्यरत होती. त्याच्यांशी बोललं की मन शांत व्हायचं नरेनचं. आत्ताही मनातली मळमळ बाहेर पडली. "अरे, चाळीस मिनिटांचा कार्यक्रम केला आज दिवाळीच्या कार्यक्रमात. मजा नाही रे येत तिकडच्यासारखी. इथले कार्यक्रम म्हणजे सगळा हौसेचा मामला. आमच्याच कार्यक्रमाचं ऐक, आवाज, आवाज असं लोकांनी म्हटलं की आम्ही कलाकारांनी आवाज चढवायचे. थोडावेळ सगळं सुरळीत, मग पुन्हा तेच. कार्यक्रम चालू असतानाच वैताग यायला लागला होता. सगळ्यांनी सरावासाठी काढलेला वेळच डोळ्यासमोर येत होता. कार्यक्रम धड ऐकूच जाणार नसेल तर कशाला करायचा? तरी रेटत नेला शेवटपर्यंत आम्ही सर्वांनी. पण त्यातली मजा गेली ती गेलीच. मुळात कार्यक्रमात खरा रस असणारी मंडळी मूठभर. ती बसतात पुढच्या काही रागांमध्ये. उरलेल्यांचा कल स्नेहसंमेलनाला आल्यासारखा. रंगमंचार काय चालू आहे यात रस नसतोच त्यांना. आमच्या कलाकारांनी नंतर मंडळाच्या कार्यकारिणीला घेरलंच. आगपाखड केली. वर्षानुवर्ष हेच चालू आहे. माहीत आहे ना नीट ऐकू येण्याचा प्रश्न येतो दरवेळेस. मग दुसरीकडे का नाही करत? मंडळ आणि देऊळ हेच समीकरण का? नाहीतर आधीच जाहीर करा ना फक्त ध्वनिमुद्रित कार्यक्रमच करा म्हणून. करा फक्त नाच गाण्यांचा कार्यक्रम. आणि तसाही कुणाला काय फरक पडतोय? पहातं कोण नी ऐकतं कोण अशी परिस्थिती. उगाच वेळ फुकट गेला. डोक्याला ताप नुसता. आता पुन्हा पुन्हा तेच सांगू नका,  बाहेर कार्यक्रम करा म्हटलं तर पैशाचा प्रश्न येतो म्हणे. अरे, सभासदांकडून घेता ना तो पैसा वापरा की. करायचा कार्यक्रम तर दर्जेदार करायला नको का? नाहीतर मग जेवण आणि गप्पा असंच ठेवा ना कार्यक्रमाचं स्वरूप. हे आणि अशा प्रकारचं सगळं एकेक करून प्रत्येकजण बोलत होता.  कार्यकारिणीतली माणसं मुकाट ऐकत होती. मला तर वाटलं, कार्यक्रमाला आलेल्या लोकांना अख्ख्या दिवाळीच्या कार्यक्रमात हाच कार्यक्रम अधिक आवडला असेल. सगळी जमली होती ऐकायला." नरेनच्या डोळ्यासमोर फोन ठेवल्यावरही दिवाळीची फटफजिती आणि मंडळाच्या कार्यकारिणीबरोबरची बोलाचाली चांगलीच नाचत होती.
**************************
तबला करून टाकतात लोकं मंडळाच्या कार्यकारिणीवर असलं की. वर्षानुवर्ष आवाज पोचत नाही ही अडचण आहेच. ती सोडवायचा प्रयत्नही करतोय आम्ही. आमच्यापरीने मार्ग काढतो पण येऊन जाऊन पब्लिक झापणार आम्हालाच. कौतुकाचे शब्द नाहीतच. तो साला नरेन पारगावकर आणि त्याचे ते सगळे कलाकार वचावचा ओरडत होते. असं रंगमंचावर ओरडला असतात ना तर तुमचा कार्यक्रम छान ऐकू गेला असता असं सांगायला हवं होतं. पण जाऊ दे. तुम्ही कामं करताय ना मग ऐकाही मुकाट तुम्हीच.  आणि बाहेर करा म्हणे कार्यक्रम. देऊळच कशाला हवं दरवेळेस? एकामागून एक प्रश्न नुसते. प्रश्न सरळ असले तरी उत्तरं अवघड आहेत.  थांब पुढच्या वेळेला तुलाच भाग पाडतो कार्यकारिणीवर यायला मग करा पाहिजे ते. तेव्हा कळेल कशा लोकांच्या मागण्या, दबाब असतो ते. राजकारणच असतं इथेही हे काय माहीत नाही का लेको तुम्हाला? कार्यकारिणीवर नसणार्‍या लोकांच्या मतांचा कसा प्रभाव असतो ते समजायला चालवाच तुम्ही मंडळ पुढच्यावेळेला.  आपलेच दात आपलेच ओठ याची प्रचिती आली की बसाल गप्प. आणि सगळं उच्च दर्जाचं पाहिजे ना, मग मंडळाला पैसे देताना कुरकूर का करता? वर्षाचे पैसे वाढवले  तरी बोंबलणार तुम्ही लोकं.  तोंडाची वाफ झाली दवडून सगळ्यांसमोर. अख्ख्या मंडळाला एक चर्चेचा विषय दिलात बरं पारगावकर तुम्ही. आता पुढचे दोन तीन महिने हा विषय सगळ्यांकडच्या मेजवान्यांना तोंडी लावणं म्हणून पुरणार.... चांगलं केलंत हो, दिवाळी सार्थकी लावलीत.... मनातले विचार कृतीत उतरवल्यागत शेवटची खुर्ची दाणकन भितींशी आपटून केशव देवळाच्या बाहेर पडला.
**************************
नाना सरवटे, मंडळाचे नाना आजोबा संथपणे बाहेर पडले. मनात पाहिलेल्या कार्यक्रमाची उजळणी नाही म्हटलं तरी चालू होतीच. नेमेची येतो....सारखा यावेळचाही दिवाळीचा कार्यक्रम.   मुलांचा किलबिलाट, मोठ्यांचं हसणं, खिदळणं, गप्पा. पण मजा राहिली नाही आता. म्हणजे कार्यक्रमापासूनच सुरुवात झाली. नेहमीप्रमाणे सुरुवात व्हायलाच उशीर. लोकांची वाट पहात वेळेवर आलेल्यांवर अन्याय करतात हे कसं समजत नाही?  एकदा कार्यक्रम दिलेल्या वेळेवर सुरु होतो हे कळलं की पाळतील वेळा पुढच्या वेळेस. पण लक्षात कोण घेतो? आणि मराठी लोकांचा कार्यक्रम म्हटल्यावर सारा कार्यक्रम मराठीतून असेल असं वाटलं होतं. इथे तर मुलांच्या कार्यक्रमांची सुरुवातच हिंदी गाण्याच्या नाचावर झाली. एवढी एवढीशी मुलं कंबरा हलवून नाचतात. विनोदीच वाटत होतं. एकातरी शेंबड्याला त्यातला एखादा तरी शब्द समजत असेल तर शप्पथ. ते होतंय तितक्यात घरच्या देवासमोर म्हणायचं अथर्वशीर्ष रंगमंचावर  येऊन एखादं कार्ट म्हणून दाखवणार. आई, वडिलांची हौस. दुसरं काय? कीर्तन, तमाशा सारं एकाच जागी असं वाटून गेलं क्षणभर. गेली तीस वर्ष गावातच रहाणारे नाना आजोबा गाडीपाशी पोचले. विचारातच त्यांनी  गाडीचं दार ओढलं. आता सवयीने येऊन बसायचं कार्यक्रमांना हेच खरं. ओळखीची जुनी माणसं तर फार फिरकतच नाहीत. तरी कुणी आलं असलं तर म्हणून बसल्या बसल्या ओळखीचा चेहरा धुंडाळायचा. तशी ही नवीन पिढी बरी आहे. मान देतात, विचारपूस करतात. पण ते तितकंच. नवीन ओळखी अशा कुणाशी होत नाहीत. मग बसायचं खुर्चीवर ठिय्या देऊन. पूर्वी कसं, मोजकी कुटुंब, छोटासा कार्यक्रम आणि चहा फराळ झाला की संपली दिवाळी. घरगुतीपणा होता त्यात आणि तोच भावायचा जास्त. आता सगळेजण स्पर्धा असल्यासारखे कार्यक्रम सादर करतात,  तास न तास. जेवणाचा घोळ घालतात. आणि माणसं तर इतकी वाढली आहेत की जत्रा भरल्यासारखी वाटते. नवीन येणार्‍या माणसाचं काही खरं नाही. म्हणजे जत्रेत ओळखी होणार तरी कशा? बसलेली असतात बिचारी हरवललेल्या मुलांसारखी.  पुढच्या वर्षी  फिरकतच नाहीत पुन्हा.  मग आम्ही तयारच मंडळात लोक येत नाही म्हणायला.  आम्ही आपले येतो ते घरी बसून करायचं काय म्हणून. पण घरीच बसावं असं वाटायला लागलं आहे. म्हणजे झालंय काय की  हे संस्कृतीचं वेड अजीर्ण होत चाललं आहे. लादतात नुसते कार्यक्रम एकामागून एक. आणि ही असली अर्धवट संस्कृती किती दिवस उराशी बाळगायची? नीट धरा नाहीतर पूर्णपणे सोडून तरी द्या.... नाना आजोबांनी दिव्यांच्या माळा लावून सजवलेल्या देवळाकडे दृष्टी टाकत गाडी चालू केली. देवळापासून संथ गतीने गाडी दूर दूर जायला लागली पण विचारांचा घोळ कमी न होता नाना आजोबांच्या मनात  सोसाट्याच्या वार्‍यासारखा घोंघावतच राहिला...


http://bmmonline.org/sites/default/files/BMM/BMM/BMM_Newsletter_Dec2014.pdf

Thursday, October 2, 2014

दोन ध्रुवांवर

"तू कधी नोकरी केली नाहीस ना या देशात?" दिप्तीने ऐकून न ऐकल्यासारखं केलं पण पुन्हा तोच प्रश्न रमाने
विचारला. तिने नुसती नकारार्थी मान हलवली. पण मन अस्वस्थ झालं ते झालंच. कोण कुठे नोकरी करतं, कुणाला घरी बसणं किती अशक्य वाटतं तर कुणाची तरी कायम आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असल्याची टिमकी हे नेहमीचं गु्र्‍हाळ सुरु होणार.  ती पुढच्या संभाषणातले सगळे विषय निर्विकारपणे ऐकत राहिली. भडका उडाला तो गाडीत बसल्यावर,
"काय समजतात या बायका  स्वत:ला? इतकं कमी लेखतात ना घरी रहाणार्‍यांना. तू कधी नोकरी केली नाहीस का म्हणे. नाही केली तर हिच्या *** काय जातं? गेला सुट्टीचा दिवस वाया. कशाला आणतोस रे अशा लोकांकडे?"
"मी कुठे आणतो? सगळा गोतावळा तुझाच आहे दिप्ती." शांतपणे निलेश गाडी चालवत राहिला. घरी पोचेपर्यंत दिप्ती अखंड बडबड करत तिचा वैताग व्यक्त करत राहिली. रात्री डोळा लागेपर्यंत चाललेल्या विचारांनी  दुसर्‍या दिवशीही पाठपुरावा सोडला नाही. रविवारची सकाळ असूनही ती लवकर उठली. निलेश खाली येईपर्यंत तिचं सगळं आवरुन झालं होतं. टी. व्ही. चालू करुन ती बसली.

धावायला बाहेर पडणार्‍या निलेशने दिप्तीकडे कटाक्ष टाकला.
"काय झालं?"  न कळून दिप्तीने विचारलं.
"काही नाही."
"मग असा काय बघतोस?"
"तू आता काय करणार आहेस?"
"का?"
"मराठी मालिका चालू रहाणार असेल जेवायला बसेपर्यंत."
"हो." दिप्तीच्या आवाजात तुटकपणा आला.
"हं..." निलेशची पावलं दाराकडे वळली पण  दिप्ती भडकलीच.
"काय झालं हं करायला? कधीची उठलेय. सगळं आटपून झालंय. कामं बाजूला टाकून नाही टी.व्ही. समोर बसत."
"मला नाही आवडत सकाळी सकाळी हे सुरु झालेलं."
"नाही आवडत तर नाही. बाहेर गेलं की नोकरी करत नाही म्हणून ऐकायचं, घरी तुमच्या कुणाच्या मनासारखं वागत नाही म्हणून ऐकायचं. आयुष्य असं ऐकून घेतच संपणार."
"तू  काल रमा बोलली ते अजून घेऊन बसली आहेस? कमाल आहे. यामुळेच तू सुखी नसतेस कधी. सोडून द्यायला शिक. आयुष्य कसं जगायचं ते आपलं आपणच ठरवायचं."
"हो ना, मग माझ्या मालिका बघण्यावर का घसरलास? बघू दे की सुखासुखी."
"ते वेगळं."
"वा, म्हणजे  सोयीप्रमाणे सगळं. पुरे झाले तुझे धडे."
"ठीक आहे.  कर तुला काय पाहिजे ते." निलेश तडकला.
"का? आता का? आधी काहीतरी बोलायचं आणि मग कर तुला काय पाहिजे ते म्हणून मोकळं व्हायचं. वाऽऽ हे चांगलं आहे तुझं..." दिप्ती तारस्वरात ओरडली पण उत्तर द्यायला निलेश थांबला नाही. दिप्तीच्या कानावर दार धाडकन बंद झाल्याचा आवाज आदळत राहिला.

धावता धावता दिप्तीबद्दलच निलेशचे विचार चालू होते. कुठे कुणाकडे जाऊन आलं की हमखास असं काहीतरी घडायचं. इतकं जर मनाला खुपतं कुणी नोकरीबद्दल विचारलं की तर ती नोकरीसाठी का प्रयत्न करत नाही हे न उलगडलेलं कोडं त्याने पुन्हा एकदा सोडवायला घेतलं. या देशात येऊन झाला की पंधरा वर्षाहून अधिक काळ. पण दिप्तीच्या मनातली अमेरिकेत कायमचं वास्तव्य करायचं या निर्णयाची अढी गेलेलीच नाही.  सतत धुसफुस घरात. सुरुवातीला घडी बसेपर्यंत नाही म्हटलं तरी सहा सात वर्ष गेलीच. मुलं लहान, कामाच्या स्वरुपामुळे फिरती मागे लागलेली. यात ती भरडली गेली पण एका ठिकाणी स्थिर झाल्यावर स्वत:चा जम बसवायला काहीच हरकत नव्हती. पण तिने तसा प्रयत्न केलाच नाही. मुलांमध्ये रमली म्हणावं तर तो संध्याकाळी घरी आला की मुलांवर खेकसणारी दिप्तीच समोर येई. त्यावरुन काही बोललं की त्याच्यावर तोफ. काय केलं म्हणजे दिप्तीला सुख मिळेल हेच त्याला कळत नव्हतं. एकदा शांतपणे दिप्तीशी बोलून मार्ग काढायला हवा हे ठरवून मुलं नसताना त्याने तिला बोलतं करायचा प्रयत्न केला. धावण्याच्या वेगाबरोबर तो प्रसंगही उड्या मारत त्याच्या मनात फिरायला लागला.
"तुझ्याशी बोलायचं आहे."
"बोल ना. परवानगी कशाला हवी?" हातातलं काम बजूला ठेऊन ती म्हणाली. तिच्या गोड स्वराने काय बोलायचं आहे तेच विसरला तो. हे असंच नेहमी. किती पटकन चिडते, वैतागते तितकीच पटकन शांतही होते. सगळ्या भावना तीव्रपणे व्यक्त करणं हाच स्वभाव आहे का हिचा?
"दिपू, कधी होणार गं तू मोठी?"
"म्हणजे?"
"लहान मुलांसारखी वागत असतेस, क्षणात चिडचिड, वसवस, आदळआपट तर क्षणात ते विसरुन लाघवी वागतेस."
"हे बोलायचं होतं तुला?" खळखळून हसत तिने विचारलं.
"नाही, वेगळंच बोलायचं होतं." आता त्याला विषयाला वेगळं वळण नको होतं. "आता तू नोकरीचा विचार करावास असं वाटतं. मला ठाऊक आहे.  इथे येऊन स्थिरावण्यात वेळ गेला. पण आता करु शकतेस तू तुला काय पाहिजे ते. म्हणजे नोकरीच असं नाही. छंद जोपास, शिक पुढे. जे तुला वाटत असेल ते. पेंटींग शिकवायला सुरुवात कर, नाहीतर गायनाचे वर्ग. खूप संधी आहेत तुझ्यासाठी "
"दहा वर्ष गेली आहेत मधे. कोण देईल मला नोकरी. आणि मलाच करायची नाही आता."
"ठीक आहे. मग पेंटींग, गायन शिकवणं?"
"नको."
"का?"
"नको म्हटलं ना."
"अगं पण काही कारण? आणि नसेल काही करायचं तर नको करु पण दिवसभर त्या मालिका बघत रहायचं आणि नंतर इथून तिथून इथे रहातोय, भारतात परत जात नाही म्हणून कसं तुझं नुकसान होतंय ते ऐकवणं तरी सोडून दे.  सुखी रहा एवढंच म्हणायचं आहे मला. आता मुलं मोठी झाली आहेत. ती पण वैतागतात तुझ्या अशा वागण्याने."
"ते मुलं सांगतील. तू नको. आत्तापर्यंत नुसती म्हणत राहिले पण आता उठते आणि जातेच मी भारतात."
"जा." निलेशच्या तोंडून इतक्या पटकन निघालं की दिप्तीला त्याच्या एकदम ’जा’ म्हणण्यावर काय बोलावं ते सुचेना.  डोळे डबडबलेच तिचे. काही न बोलता ती तिथून उठून गेली. निलेश तसाच बसून राहिला. काय बोलायचं ठरवलं आणि कुठून कुठे गेलं संभाषण. आताही त्याला तो प्रसंग जसाच्या तसा आठवत होता. रागाच्या भरात तो बोलला खरा पण इतकी वर्ष झाली तरी दिप्ती ते विसरायला तयारच नाही. विचारांच्या नादात त्याचा धावण्याचा  वेग वाढला.

दार बंद झाल्याचा आवाज दिप्तीच्या कानात घुमत राहिला. तिचं मन मालिका पहाण्यावरुन उडालं. कुठून कुठे पोचला दोघांचा संसार. भारतातून येताना किती सहज सगळं सोडून आली होती ती निलेश सोबत. पुन्हा परतायचंच आहे लवकर याच भावनेने. पण नंतर इतर अनेकांप्रमाणे  चक्रव्युहात अडकून गेली. मनातली खदखद मग या ना त्या मार्गे बाहेर पडत राहिली. तिरकं बोलायचं, नाराजी दर्शवायची हा कधीतरी याच काळात स्वभाव बनून गेला. मला कधी इथे रहायचंच नव्हतं म्हणत ती  इथेच राहिली.  आपण काही करत नाही ही बोच उराशी बाळगून. त्यात कुठेतरी असे काही प्रसंग घडायचे की मन अस्वस्थ होऊन जायचं. नोकरी करणार्‍या आणि न करणार्‍या असे गटच झाले होते इथल्या छोट्याशा डबक्यात. सुरुवातीला  पेंटींग, गायन, वाचन अशा विषयांवर ती काही ना काही  बोलायची. पण अशा कलांना तुम्ही नोकरी करुन करत असाल तरच किंमत, नाहीतर हे छंद म्हणजे रिकामटेकड्यांचे उद्योग असा भाव जाणवायचा तिला इतरांच्या बोलण्यात. मग सगळं हळूहळू मागे पडत गेलं. रसच उडाला. पूर्वी हाताशी असलेल्या वेळाचं  करायचं काय हा प्रश्न असे पण इंटरनेटनच्या आगमनाने तो प्रश्न सोडवला.  लॅपटॉप नाहीतर टी. व्ही. वर मराठी, हिंदी मालिका नाहीतर चित्रपट. हळूहळू तेच तिचं जग झालं. भारतात पोचल्यासारखं वाटायचं या मालिका पाहताना.  तिच्या टी. व्ही. पहाण्यावरुन मुलं, निलेश काहीतरी बोलायचेच. त्यामुळे त्या मालिका लावल्या की ती स्वत:वरच चिडायची.  पण ते पहाणं सोडवायचंही नाही. तिला निलेश बरोबरचा कितीतरी वर्षापूर्वी घडलेला प्रसंग आठवला. त्यावेळेस पहिल्यांदा वैतागून तो म्हणाला होता. जायचं तर जा तू भारतात. मग चढत्या क्रमाने याच स्वरुपाचे प्रसंग घडत राहिले. पण नाही झालं खरं धाडस. म्हणजे एकटंच कसं जायचं? तिकडे जाऊन काय करायचं? आपण गेल्यावर निलेश येईल परत? मुलांचं काय? माहेरची काय म्हणतील? नातेवाईकांमध्ये किती चर्चा होईल या विचारातच ती गुरफटून राहिली. वर्षानुवर्ष. मुलं मोठी झाली. पंखात बळ आल्यावर उडून गेली. निलेश तर म्हणायचा, तिच्या अशा वागण्यामुळे सगळ्यांनी अगदी लांब नोकर्‍या शोधल्या आहेत. खरं काय, खोटं काय कोण जाणे. पण ती मात्र इथेच होती नक्की काय करायचं होतं हे कधीच न समजल्यासारखी. द्विधा!

निलेश घाम पुसत घराबाहेर उभा होता. आता तरी निवळली असेल की आत गेलं की पुन्हा मागच्या पानावरुन तेच सुरु? काही झालं की  सारखं आपलं ’भारतात परत गेले असते तर...’ या पोकळ धमक्यांपेक्षा खरंच का जात नाही दिप्ती भारतात कायमची? सर्वांनाच शांतपणा मिळेल असं त्याला दरवेळेला वाटायचं. पण ते वाटणंही तेवढ्यापुरतंच. बोललोय की तिला हे. आणि खरा राग येतो तो तिच्या टी. व्ही. पहाण्यापेक्षा तिच्या कलागुणांचा ती उपयोग करत नाही याचा.  विचार करुन डोकं भणभणून गेलं निलेशचं. दार उघडून तो आत आला.  दिप्तीने  चहाचा कप पुढे केला. तिची बदललेली मनस्थिती पाहून त्याला आश्चर्य वाटलं पण आनंदही झाला.  आधीचं सारं विसरुन तो हसला.
"तू नाही घेत?" खुर्चीवर बसत त्याने विचारलं.
"घेते ना. आणि आज सुट्टीच आहे तर नाटकाला जाऊ या का कुठल्यातरी?"
तो काहीच बोलला नाही.
"ऐकलंस ना?" तिने जोरात विचारलं. तिच्या आनंदावर विरजण घालणं जीवावर आलं त्याच्या.
"इच्छा आहे गं. पण काम करावं लागणार आहे. म्हणजे काल पूर्ण नाही झालं ऑफिसमध्ये, ते संपवायचं आहे."
"बरं. ठीक आहे." दिप्तीची नाराजी शब्दात डोकावलीच.
"अगं समजून घे ना."
"मी कुठे काय म्हटलं? तू दिवसरात्र काम करत रहा. मी रिकामटेकडी. काय करायचं तेच समजेनासं झालंय. वेळ घालवायला शोधलेले मार्गही चालत नाहीत. चालू दे. मी काही बोलत नाही..." दिप्तीचा पारा चढला. निलेशने चहा अर्धवटच टाकला आणि टेबलावर ठेवलेला लॅपटॉप उचलून काही न बोलता तो कामाच्या खोलीत गेला.  धाडकन दार बंद झालं. बंद दाराकडे दिप्ती पहात राहिली. एकाच घरातली इन मिन दोन माणसं दोन ध्रुवांवर उभी होती. कायमची!


http://bmmonline.org/sites/default/files/BMM/BMM/BMM_Newsletter_Oct2014.pdf



Friday, August 1, 2014

सीमारेषा

"साकेत तू काय घेणार? व्हिस्की, वाइन, बिअर..." परेशकाकाच्या प्रश्नावर साकेतने आईकडे पाहिलं. साकेतने
इथे सगळ्यांमध्ये नाही घेतली तर बरं असं वाटत असतानाच  आजूबाजूला हास्याचे फवारे उडाले. झालं, साकेतने हो म्हटलं तर नंतर त्याबद्दलच  चर्चा रंगणार, श्रावणीच्या मनात विचार तरळला. तितक्यात गिरीशच म्हणाला,
"घे रे बाबा तुला काय पाहिजे ते. माझ्याकडून हिरवा दिवा." साकेतने प्रश्नार्थक नजरेने पाहिलं तसं स्पष्टीकरण देत गिरीश म्हणाला,
"म्हणजे ग्रीन सिग्नल रे." साकेत हसला.
"नको."
"आईला घाबरतोयस का?" परेशने श्रावणीकडे पहात विचारलं.
"मला कशाला घाबरेल तो? त्याच्या बाबानेच परवानगी दिली आहे ना." श्रावणी हसून म्हणाली आणि  वाइनचा ग्लास तिने तोंडाला लावला.
साकेतनेही अवघडत परेशकाकाने दिलेला ग्लास हातात घेतला.
"कॉलेजमध्ये पण घेतोस का?" रागिणी मावशीच्या प्रश्नाला साकेतने उत्तर देण्याआधीच ती म्हणाली,
"आम्ही दोन्ही मुलांना सांगितलं आहे. घ्यायची तर आमच्या समोर. कॉलेजमध्ये अजिबात नाही. जे काही कराल ते आम्हाला कळलं म्हणजे झालं." श्रावणीने साकेतकडे  कटाक्ष टाकला. पुसटसं हसू त्याच्या चेहर्‍यावर पसरल्यासारखं वाटलं तिला.  तिने रागिणीच्या बोलण्यावर मान डोलवली.

रागिणीचे शब्द श्रावणीच्या मनात घोळत होते. खरचं तिची मुलं फक्त त्यांच्या उपस्थितीतच घेत असतील? कॉलेजसाठी या मुलांना बाहेर रहावं लागतं. तिथे इतर मित्र मैत्रीणी बरोबर असताना मोह टाळता येत असतील? साकेत काय करत असेल? लगेच हा विषय नको म्हणून दोन तीन दिवस ती या विषयावर काही बोलली नाही. पण त्या दिवशी कॉलेजचाच विषय सुरु झाल्यावर तिने  संधी साधली.
"मुलं दारु, सिगरेट पितात/ओढतात का तिकडे? नाही म्हणजे आम्ही काही इथे शिकलेलो नाही. त्यामुळे वातावरणाची कल्पना नाही ना म्हणून विचारते आहे." साकेत  हसला.
"रागिणी मावशी जे बोलली त्यामुळे विचारते आहेस ना?"
"अगदी तसंच काही नाही."
"तसंच आहे आई. आणि तुला सांगतो आम्ही सगळी ’देसी’ मुलं पालकांना जे ऐकायला आवडेल तेच सांगत असतो."
"म्हणजे?"
"तुला खरंच वाटतं रागिणी मावशीच्या मुली कॉलेजमध्ये दारुला हातही लावत नसतील?"
"मला नाही माहित."
"एक तर मुलींनी दारु पिण्याचं प्रमाण मुलांपेक्षा जास्त आहे कॉलेजमध्ये. आणि आपण हात सुद्धा लावत नाही असं त्या सांगत असतील मावशीला तर ते साफ खोटं असणार. सगळी मुलं घेतातच गं कधी न कधी."
"तू?"
"हो घेतो. आणि हे लगेच कबूल करतो आहे कारण ते रेल्वे रुळ ओलांडायचं झाल्यापासून मी तुम्हाला जे खरं आहे तेच सांगतो हे विसरु नकोस तू." श्रावणीचं लक्ष  त्याच्या बोलण्यावरुन उडालं.  साकेतने तिचं मन एकदम भूतकाळात ढकललं. साकेत खेळायला जायचा मित्रांबरोबर. दुसरीत असेल. सात वाजता घरी परत यायचं आणि रेल्वे रुळ ओलांडून पलिकडच्या मैदानात जायचं नाही असं बजावलेलं होतं त्याला. एकदा सात वाजता तो आला नाही म्हणून ती बघायला गेली तर सगळी मुलं पलीकडच्या मैदानावर खेळायला गेलेली. श्रावणीला बघून तो बावचळला. राग आलेला असूनही तिने तो गिळला. गिरीश आला की मगच दोघं मिळून बोलू साकेतशी असं ठरवून ती  साकेतला घेऊन मुकाट्याने  घरी आली.  मुलांना आपणहून परवानगी दिली नाही तर ती लपूनछपून त्यांना पाहिजे ते करतातच, त्यासाठी खोटं बोलतात हे ह्या प्रसंगाने त्यांना दाखवून दिलं. दोघांनी झाल्या गोष्टीचा शांतपणे विचार करुन  दुसर्‍या दिवसापासून रुळ ओलांडून मैदानावर खेळायला जायची परवानगीही दिली. खोटं बोलायचं नाही. खरं सांग. चुकीचं वागला असलास तरी आम्ही तू असं का केलंस ते समजून घ्यायचा प्रयत्न करु याची त्याला खात्री दिली. तेव्हापासून साकेत मोकळेपणाने त्यांच्याशी सगळं बोलत होता.
"आई, लक्ष कुठे आहे तुझं." ती एकदम भानावर आली.
"बागेचा प्रसंग आठवत होते. जाऊ दे ते. पण रोज घेतोस का रे तू?"
"नाही गं. फक्त शुक्रवारी. ते सुद्धा एखाद्याच."
"सिगरेट?" न रहावून तिने विचारलं.
"अजिबात नाही."
श्रावणीची चुळबूळ, अस्वस्थपणा वाढला असावा.
"आई, मी प्रामाणिकपणे खरं तेच सांगतोय गं."
"अच्छा" म्हणून साकेतचं बोलणं ऐकत राहिली.

श्रावणीचे एक दोन दिवस अस्वस्थतेत गेले. आपले कॉलेजचे दिवस वेगळे होते. साकेतच्या बाबतीत  काळ आणि देश दोन्ही बदललेलं आहे त्यामुळे नसती भिती, अंदाज बांधण्यात काय अर्थ? आणि आता जिथे आपणही मित्र मैत्रिणींबरोबर  ड्रिंकची चव चाखतो तिथे मुलांना काही शिकवायला जाणं म्हणजे... पण कॉलेजमध्ये वय, संगत यामुळे कुठे थांबायचं हे कळलं नाही या मुलांना तर याचीच भिती वाटते आणि ती बोलून दाखवायलाच हवी असं तिला वाटत होतं. शेवटी तिने तो विषय काढलाच.
"आई,  आता इतकं बोलतोच आहोत आपण तर एक विचारु?"
"विचार ना, परवानगी कशाला हवी?"
"तुम्ही सगळे पालक ना असं करु नका, तसं करु नका चा सूर लावता नेहमी. मला एक समजत नाही की तुम्ही पालक दारु पिऊ नका, व्यसनाच्या आहारी जाऊ नका, लग्नाशिवाय शारीरिक संबंध येता कामा नयेत असा धोशा लावता पण मुलांना मोह टाळता आलाच नाही तर त्यांनी काय करायचं ते का सांगत नाही?"
"म्हणजे?"
"पिण्याचे परिणाम काय काय होऊ शकतात, एकावेळी कमीत कमी म्हणजे नक्की किती घ्यावी, सवयीचं व्यसनात रुपांतर कसं होऊ शकतं, ते झालं तर त्याचे शरीरावर होणारे परिणाम, किंवा गाडी चालवू नका, जो गाडी चालवणार असेल तो दारु पिणार नाही याची दक्षता घ्या, शारीरिक संबंधाबद्दल काळजी घेतली नाही तर काय होऊ शकतं, त्यातून निर्माण होणारे रोग अशा कितीतरी गोष्टी तुम्ही सांगत नाही. आम्हाला महाविद्यालयात ही माहिती देण्यासाठी खास तास आणि परीक्षा असते. पण पालकांनी पण बोलायला नको का हे आमच्याशी?"
श्रावणी ऐकत राहिली.  काय करायला नको ची यादी तयारच होती तिच्याकडे पण नाहीच आवरला मोह तर काय खबरदारी घ्यायला पाहिजे ते सांगावं की नाही याबद्दल मन:स्थिती द्विधा होती, आणि किती म्हटलं तरी काही गोष्टी नाही येत इतक्या स्पष्ट बोलता, पोटची मुलं असली तरी. बोलणारा आणि ऐकणारा दोघंही संकोचतातच. त्यामुळेच मनातलं शब्दांवाटे बाहेर येत नव्हतं हेच खरं. ती काहीच बोलली नाही तसं साकेतच म्हणाला,
"तू काळजी करु नकोस. मला हे असं करायला वेळच मिळत नाही."
"आणि कॉलेजमध्ये शिक्षणासाठी जातो आपण हे लक्षात ठेवलं की झालं." तिच्या बोलण्यावर साकेत हसला.
"आई तुम्ही कधी कॉलेजमध्ये मजा केलीच नाहीत का?"
"केली ना. पण मजेच्या व्याख्या बदलत जातात स्थळकाळानुसार. पालकांची मानसिकताही बदलते. आणि तू म्हणालास त्याबद्दल विचार करत होते.  तू आत्ता सांगितलंस तसं करणं म्हणजे पालकांना, आपण अशी माहिती देऊन मुलांना उत्तेजन तर देत नाही ना असंही वाटतं."
"पण नुसतं दारु पिऊ नका, मादक पदार्थांच्या आहारी जाऊ नका, कुणाशी शारीरिक संबंध ठेवू नका असं सांगून तरी काय उपयोग? का ते माहीत असलं की मुलं जास्त विचार करतील ना या गोष्टी करताना?"

श्रावणी स्वत:चं  तरुणपण तपासत राहिली. मुलांबरोबर पालकत्वही काळानुसार बदलत चाललं आहे. आपल्या आई वडिलांनी शिस्त, संस्कार दिले. मनातलं त्याच्यांशी बोलू शकतो हा विश्वासही दिला तरी काही गोष्टी सांगायची, विचारायची लाजच वाटायची. ते जे मधलं अवघडलेपण आपण अनुभवलं ते आपल्या मुलांनी नको अनुभवायला असं श्रावणीला वाटत होतं, नाही म्हटलं तरी ते होणारच हे कळत असलं तरी. पण साकेतच्या बाबतीत त्याने स्वत:हून नाही सांगितलं तरी त्याबद्दल विचारलं की तो खरं तेच सांगेल ह्याची तिला खात्री होती. पण तरीही साकेतच्या आजच्या बोलण्यावरुन वाटत होतं की मुलांशी मित्रत्वाचं नातं राखणं आणि त्याचबरोबर पालक म्हणून त्यांनी आपला मान ठेवावा, आदर दाखवावा  असं वाटणं यातली सीमारेषा इतकी धूसर आहे की ती केव्हाही भंग पावेल. पण खरंच ही  सीमारेषा धूसर आहे की तिची व्याख्या  बदलणं, ती समाजमान्य होणं आवश्यक आहे? या प्रश्नाचं उत्तर ज्याचं त्यानं अनुभव घेतच सोडवायचं हेच अंतिम सत्य  असलं तरी श्रावणीचं मन त्या प्रश्नाचं उत्तर शोधत राहिलंच...


Wednesday, June 4, 2014

रिंगण

"ओळख राहू दे. या आमच्याकडे मुद्दाम." संतोषने हातात हात घेऊन प्रेमभराने थोपटला तसं रमाकांतना हसायला आलं.
"आता कुठलं येणं होतं आहे तिकडे. आत्ता आतापर्यंत येत होतो त्यालाही झाली चार वर्ष. पण आलोच तर भेटेन नक्की." संतोषच्या पाठीवर थाप मारून ते म्हणाले आणि विमलकडे पाहिलं न पाहिल्यासारखं करत पाणी प्यायला म्हणून उठले. पाणी प्यायचं निमित्त. संतोषच्या निर्णयाने आलेला अस्वस्थपणा रमाकांतना पाण्याच्या घोटाबरोबर गिळता आला तर पाहायचा होतं.

संतोष निघून गेला तसं पाठीमागे हात बांधून उगाचच ते येरझार्‍या मारत राहिले.  थकलेल्या शरीरात अचानक जोर आल्यासारख्या त्यांच्या फे‍र्‍या चालू होत्या. विमलपुढे मनाची घालमेल व्यक्त करावीशी वाटत होती, पण शब्द जुळवता येत नव्हते. विचार सैरावरा पळत होते ते धरून कोणत्या शब्दात मांडावेत तेच रमाकांतना कळत नव्हतं. असं कधी झालं नव्हतं. रमाकांतांसारखा व्यवहारी, हिशोबी माणूस भावनेत अडकला नव्हता आणि त्याचा सार्थ अभिमान बाळगत असताना अचानक हे काय होतं आहे ते त्याचं त्यांना समजेनासं झालं होतं. विमलताई त्यांच्या येरझार्‍याकडे शून्य नजरेने पाहत होत्या. त्यांची अस्वस्थता त्यांना कळत असली तरी हृदयापर्यंत पोचत नव्हती. त्यांच्याही मनात संतोषचेच विचार घोळत होते.
"हल्ली खूप जण परत जायला लागली आहेत भारतात. संतोष बघ, पंधरा वर्षांनी चंबूगबाळं आवरून निघाला आहे. मुलांना आजी आजोबांचा सहवास लाभावा, मुलीचं शिक्षण मायदेशी व्हावं या इच्छेने." विमल ताईंनी ओळखलं, संतोषने त्या दोघांचाही आजचा ’दिवस’ व्यापून टाकला आहे.
"चौतीस वर्ष होतील आपल्याला इथे. आता जावंसं वाटतं आहे परत? कायमचं?" स्वत:च्या आवाजात नकळत ओलावा निर्माण झाल्यासारखं वाटलं विमलताईंना.
"नाही. इथे का आलो हा प्रश्न पडला आहे."
"आत्तापर्यंत परत का जायचं नाही यावर बोलत राहायचात तास न तास.  इथलंच पारडं कसं जड आहे ते पटवून द्यायचात. मग आता हा प्रश्न का पडला आहे इतक्या वर्षांनी?"
"बर्‍यांचदा येतो हा प्रश्न मनात आणि दरवेळेला उत्तर वेगळं येतं. म्हणजे आपण आपल्या सोयीने उत्तरं शोधतो, त्यालाच बरोबर समजतो. पण आजच्या उत्तराने देहाला, मनाला अस्वस्थपणाने घेरलं आहे."
"संतोषने भारतात परत कायमचं जायचं ठरवलं आहे ते ऐकून?"
"तो एक निमित्त. ओळखीचा, आवर्जून भेटायला येणारा त्यामुळे आता पुन्हा भेट होईल न होईल म्हणून वाटतंच वाईट. पण हल्ली ही तरुण मुलं परत जाण्याचा निर्णय घेतात, तो पार पाडतात तेव्हा हा प्रश्न मनाला छळत राहतो. मध्यंतरीच्या काळातही जायचं म्हणा कुणी ना कुणी असा निश्चय करून. पण बरीच जण यायची परत एक दोन वर्षात. आपण हसायचो या मुलांना पण  कौतुकही वाटायचं, निदान प्रयत्न करून तरी पाहिला त्यांनी म्हणून. आणि ते परत आले की बरं वाटायचं आपला परत न जाण्याचा निर्णयच बरोबरच याची खात्री पटायची."
"मग आताच का अस्वस्थ झाला आहात?"
"आता ही मुलं जातात ती नाही येत परत. सगळं बदललं आहे म्हणतात, ज्या साठी आपण या देशात आलो ती  सगळी सुखं भारतात मिळतात आणि इथेही पूर्वीसारखी परिस्थिती राहिली नाही म्हणे. नोकरीची शाश्वती नाही, सतत प्रवास हे इथेही करायचंच तर मग भारतात निदान इथे मिळत नाही ते सुख अनुभवता येतं.  आई, वडील, भावंडांचा सहवास मिळतो. मुलांना आजी, आजोबांचा लळा लागतो. कधीतरी वर्षातून बोलावलं भेटीला, राहिले एक दोन महिने इतक्या तुटपुंज्या सहवासावर तहान नाही भागवावी लागत. नातेवाइकांच्या भेटीही लग्न, वाढदिवस अशा निमित्तानं होत राहतात. आणि मुलांना आपल्या संस्कृतीत वाढवल्याचं समाधानही मिळतं. ऐकलंस की तूही. संतोषच सांगत होता ना आपल्याला."
"संस्कृती?" विमलला एकदम हसू आलं. संस्कृती टिकवत असलो काही प्रमाणात तर आपणच टिकवतो आहोत इथे हे म्हणणं टाळलंच त्यांनी. उगाच विषयात विषय आणि डोक्याला आणखी एक भुंगा नको.
"हे पाहिलं की वाटतं गं, आता आपले तर परत जायचे मार्ग बंद झाले. आठवतंय, बाबा गेले तेव्हा अचानक सगळ्या वर्षांचा हिशोब मांडावासा वाटत होतं काही दिवस. भूतकाळ, भविष्यकाळाचं गणित सुटता सुटेना. आईने एकटंच तिकडे रहायचं ठरवलं तेव्हाही जीव तुटला होता पण आजच्यासारखं निराशेच्या गर्तेत लोटणारं उत्तर नव्हतं समोर आलं." विमलला रमाकांतच्या विचारांच्या दिशेचा प्रयत्न करूनही अंदाज येत नव्हता.
"बाबा, आई, बहिणी....एकेक करत सर्वांनी निरोप घेतला.  या देशात आयुर्मान जास्त आहे. कधी जुने फोटो काढून बसलो की वाटतं मीच खड्यासारखा उरलो आहे या सर्वांमधून. आता करायचं काय परत जाऊन? उरलंय काय तिथे? त्यामुळे  मन थांबतं ते इथे का आलो या प्रश्नावर."
रमाकांत हे वेगळंच काहीतरी बोलत होते. नेहमीचे काथ्याकूट झालेले विषय नव्हते. पण  हा विषयच कशाला हवा, आता राहिले आहेत कितीसे दिवस की अमेरिका, भारत करत राहायचं असं म्हणावंसं वाटत असूनही त्या मुकाट रमाकांतांचं मोकळं होणं झेलत राहिल्या.

"शाळेत असताना घरात परदेशात गेलेल्या नातेवाइकांचं कौतुक ऐकलेलं. सुभाषकाका कॅनडात होता. बाबांचा मामेभाऊ. कधीतरी चार पाच वर्षांनी यायचा भारतात. तो आला की घरी दारी, नातेवाइकांमध्ये तोच विषय. तिकडून आणलेल्या भेटी, त्याच्या मुलांचं अडखळत बोललेलं मराठी, फॉरेन रिटर्न म्हणून जळी स्थळी होत असलेलं कौतुक... तो आला की वाटायचं, जायला पाहिजे आपणही परदेशात. परत आलो की काय ऐट असते. त्या वेळेस कॅनडा, अमेरिका नाहीतर दक्षिण आफ्रिका नाहीच तर मग इंडोनेशिया हे देश ठरलेले."
"हो आमच्याकडेही होतं या फॉरेन रिटर्न मंडळीचं कौतुक. पण मला नाही कधी वाटलं की त्या कौतुकासाठी जावं परदेशात आपणही."
"मला ध्यासच लागलेला. आजूबाजूलाही डॉक्टरांच्या नावासमोर दिसायच्या ना परदेशातल्या पदव्या. कधी नुसतं सर्दी, खोकला झाला म्हणून तपासायला जायचं तरी बाबा म्हणायचे, एफ. आर. सी. एस. आहे. म्हणजे काय ते ठाऊक नव्हतं. पण त्यांच्या डोळ्यात जो आदर डोकावायचा ना एफ. आर. सी. एस. बद्दल तो पाहून वाटायचं, मी पण गेलो परदेशात तर काय अभिमान वाटेल बाबांना. बाबा कधी बोलले नव्हते तसं पण मी गृहीत धरलं. आलो जिद्दीने इथे. यशस्वी झालो. आणि सुभाष काकाला भाव असायचा तोच अनुभवला कितीतरी वर्ष भारतात गेलो की. येता जाता कौतुक."
"हे सगळं ठाऊक आहे मला. खूप वेळा बोललो आहोत. पण संतोषने भारतात परत जाण्याचं ठरवलं आणि इतकी अस्वस्थता आली तुम्हाला?"
"गुदमरतो जीव मला नक्की काय साध्यं करायचं  होतं याचं उत्तर शोधताना. इथे आल्यानंतर नुसतेच परत जायचे बेत करीत राहिलो मुलं मोठी होईपर्यंत. मुलं आता इथेच राहणार हे स्वीकारल्यावर परत न जाणंच कसं शहाणपणाचं होतं हे पटवत राहिलो. स्वत:ला, इतरांना. हळूहळू तर हा विषयही मागे पडत गेला. तसंही ते फार सोपं नव्हतं; निदान त्या वेळेस तरी. म्हणजे कुणी परत जायचं धाडस करायलाच धजत नव्हतं. पण संतोषसारखी परत जाणारी वाढली आहेत आता. तेव्हा वाटायला लागतं, मी का आलो इथे? तिथेच राहिलो असतो तर कदाचित परदेशात गेलो नाही ही एक खंत राहिली असती पण तेवढा एकच सल, दु:ख राहिलं असतं. आता... आणि इतकं करून प्रश्न पडतो की मी इथे आलो ते नक्की माझं स्वप्न होतं की बाबांची इच्छा मी पुरी केली? पण बाबा तर कधीही एका शब्दाने म्हणाले नव्हते मी परदेशात जावं म्हणून."

हळव्या झालेल्या रमाकांतकडे विमलताई पाहत राहिल्या.  देश सोडून जाणारा कधी ना कधी या कोड्यात गुरफटतोच. स्वत:ला शोधत राहतो, तपासत राहतो. पण हा देशच मला माझा वाटतो असं म्हणणार्‍या रमाकांतच्या मनात आजच का हे दाटून यावं ते त्यांना समजत नव्हतं. त्यांनी नाही का हा विषय मनाच्या अगदी आतल्या कोपर्‍यात हलवून अडगळीत टाकून दिला होता. कधी साफसफाई केल्यासारखी त्या त्यावरची धूळ झटकायच्या, पण मनातल्या मनात. स्वत:लाच बजावल्यासारखं त्या इथेच राहण्याच्या निर्णयाचं समर्थन करायच्या. आता इतक्या वर्षांनी तिच कारणं खरी आहेत असंही वाटायला नव्हतं का लागलं? मग आज हे का? कशासाठी. त्यांच्या नजरेतला प्रश्न कळल्यासारखं रमाकांत उत्तरले.
"मला समजत नाही ते हेच की मी माझं स्वप्न पूर्ण करत होतो की बाबाचं? का समाजाचं?"
"समाजाचं?"
"सुभाष काकाच्या कौतुकामुळे मी पाऊल टाकलं ते  न कळलेल्या वाटेवर, अज्ञाताच्या दिशेने. ती वाट कुठे संपते याचा विचारही डोकावला नाही कधी. पण मी आनंदी वाटसरू होतो, स्वप्न पाहणारा, ती पुरी करण्याचा ध्यास घेतलेला. माझं होत असलेलं कौतुक, आई, बाबांना माझा वाटणारा अभिमान, नातेवाईक, मित्र, शेजार्‍या पाजार्‍यांच्या डोळ्यातला हेवा या रिंगणात मी नकळतपणे कधीतरी फिरायला लागलो आणि पार अडकलोच. त्यातून जाग यायला इतकी वर्ष लागली. आणि आज  काहीतरी कायमचं निसटून गेल्यासारखं वाटतं आहे, कळेनासं झालं आहे की जे स्वप्न मी पुर्ण केलं ते नक्की होतं तरी कुणाचं?

बृहनमहाराष्ट्र मंडळाच्या अंकाच्या लेखमालिकेतील हा ५ वा लेख होता : -
http://www.bmmonline.org/sites/default/files/BMM/BMM/BMM_Newsletter_June2014.pdf

Wednesday, April 2, 2014

इच्छा

आज ’अगत्य’ बंगल्यात दादांची तिन्ही मुलं मुक्कामाला होती. किती वर्षांनी तिघं भावंडं एकत्र आली होती.
दादांना दर दिवाळीला वाटायचं, तिन्ही मुलं, सुना, जावई, नातवंडांनी घर भरून जावं. पण तसा योग कधी आलाच नव्हता. कुणा एकाची कायम अनुपस्थिती. प्रत्येकाची कारणंही पटण्यासारखी.  दादांना वाटायचं, लहानपणी थोडा धाक दाखवला की मुलं ऐकत तसं करुन सर्वांना एकत्र आणायला हवं. तो बेत पार पडलाच नाही कधी. आणि आज दादा गेल्यानंतर त्यांची इच्छा पूर्ण होत होती. दादांच्या जाण्याने तिघं भावडं घरी आली होती, पण दादा नव्हते. विचारांच्या नादात  निलेशचा डोळा लागला तितक्यात दार वाजलं. आतल्या खोलीत पडलेल्या सगळ्या भावंडांनी एकमेकांकडे नजर टाकली.
"कुणीतरी आलं भेटायला."
"दुपारचे दोन वाजले आहेत. कधीही कसे येतात?"
"अरे, ’हाक’ मारायला येणारे काय वेळ ठरवून येणार का?"
"निलेश, तू जातोस बाहेर? आम्ही पडलो आहोत जरा म्हणून सांग. नको वाटतं आता तेच तेच बोलणं. तुझ्याशी निदान काहीतरी वेगळा विषय असेल त्यांना बोलायला."
"माझ्याशी काय बोलणार वेगळं?"
"अमेरिका."  सुनील खिजवल्यासारखं म्हणाला तसा निलेश वैतागला.
"दादा गेले म्हणून भेटायला येतायत लोकं. अमेरिकेबद्दल ऐकायला नाही."
"हो पण बघच तू आता, अमेरिकेचा विषय निघतो की नाही, मग आईला घेऊन जाणार का विचारतील, इथे एकट्याच राहणार का त्या, घर विकायचं आहे का... आपण अजून विचारही केलेला नाही ते सगळं विचारण्याचं काम हे ’हाक’ मारायला येणारे करतायत. सात आठ दिवस तेच तर चाललं आहे. काल तर आईला कुणीतरी दादांची आठवण येते का म्हणूनही विचारलेलं ऐकलं मी."
निलेश मुकाट्याने बैठकीच्या खोलीत आला. ठरल्याक्रमाने सुनील म्हणाला तसं पारही पडलं. निलेशचं डोकं भणभणायला लागलं, खरंच सांत्वन करायला येतात माणसं की स्वत:चं कुतूहल शमवायला?

"तुला यातलं काही हवं आहे का बघ." दादांचे कपडे, फोटो, बॅगा असं सगळं काढून बसलेल्या भावंडांकडे निलेश पाहत राहिला.
"हे नंतर नाही का करता येणार?"
"कधी करायचं? तू जाशील निघून. मग कोण आवरणार?  दादांच्या आजारपणात खूप रजा झाल्या आहेत. इतक्यात परत यायला नाही जमणार आमच्यापैंकी कुणाला."
"अरे, मग राहू दे की तसंच सगळं. जेव्हा केव्हा येऊ तेव्हा एकत्र भेटू आणि ठरवू शांतपणे." सुनील हसला.
"शांतपणे? अरे, दोन वर्षांनी तू येतोस इथे ते दोन तीन आठवड्यांसाठी. इतकं वर्ष झाली. शांतपणाने कधी राहिला आहेस? दादांना बघायला यायला जमलं नाही तुला. पैसे पाठवून दिले की संपलं का सगळं?"
"का? पैशाचा उपयोग नाही झाला? दादांना भेटायला यायची इच्छा मारून मी  पैसे पाठवले. इथे येण्याजाण्याचा खर्च करण्यापेक्षा  दादांच्या उपचारांवर झाला तर ते या आजारपणातून वाचतील, ते बरे झाले की सावकाशीने भेटेन असा विचार केला.  मी नुकताच येऊन गेलो होतो आणि लगेचच हे आजारपण आलं म्हणून तसं आपणच ठरवलं ना?  डायलिसिस, किडनी ट्रान्सप्लॅट.... सतत काहीतरी चालू होतं ते काय फक्त तुमच्या पैशांनी शक्य होतं का? तुमचा भार कमी व्हावा ही देखील इच्छा होती माझी. पैसे दिले नसते तर तिथूनही म्हटलं असतंत, अमेरिकेत राहूनही आई वडिलांसाठी खर्च करता येत नाही."
"असं म्हटलं आहे का कुणी तुला?" स्मिताचा आवाज चढला.
"म्हणायला कशाला हवं? आल्यापासून ऐकतो आहे ना, मी यवं केलं, मी त्यंव केलं, तू होतीस म्हणून बरं, तू किती केलंस रे दादाचं, किती दिवस चाललं आहे आजारपण, धावपळ सतत... थोपटा नुसती एकमेकांची पाठ, मुद्दाम जाणवून देताय ना, गरजेला मी इथे नव्हतो ते. पैशाचं सोंग आणता आलं असतं का, उपयोग झाला ना पाठवलेल्या पैशांचा? पण एकाने तरी म्हटलं का, तुला दादा भेटले नाहीत याचं वाईट वाटतं,  तू पाठवलेल्या पैशांमुळे खूप सोय झाली. म्हटलं का? मला काय दादांना भेटायची इच्छा नव्हती का? आणि दादा गेल्या गेल्या निघाले आता घर खाली करायला. आवराआवरी करतायत म्हणे. आई आहे अजून हे विसरू नका. आपण आपलं किती सामान आणून ठेवलं आहे इथे. दादा म्हणायचेच, ’गोडाउन’ केलं आहे तुम्हा मुलांनी घराचं. आपण इथे राहत नसूनही ठेवलं ना त्यांनी सामान जपून. मग काल दादा गेले नाहीत तर आज बसायलाच हवं का सगळं आवरायला? मी काय घेऊ आणि तू काय नेतोस..."
"आम्ही जे केलं ते पण बोलायचं नाही का? तू तुझ्या पैशाचा माज दाखवू नकोस हा निलेश." सुनील तणतणला.
"आणि तुला वाटतं तसं इथे काही माणसं पैशाला पासरी नाही पडलेली. आम्हीच येऊन जाऊन करत होतो दादाचं. हॉस्पिटलमध्ये नेणं, आणणं, रक्तदाते शोधणं एक ना अनेक. नुसतं पैशाने नाही भागत. वेळ द्यावा लागतो." स्मिता फणफणली.
"वेळ, वेळ, वेळ. इथेच राहत असतो तर मीही दिला असता माझा वेळ. कळलं ना? ते शक्य नव्हतं म्हणून आर्थिक भार उचलायचा प्रयत्न केला. आणि सारखं तुम्ही किती करत होता त्याचे गोडवे नका  गाऊ. दादा, आई पण राबले आहेत तुमच्यासाठी तेवढेच. आताआता पर्यंत. कधीही फोन करा. कुणाच्या तरी गरजेला आई तिकडे गेलेली. बाबा एकटे घर सांभाळायला. आणि इतकं करून शेवटी मलाच धडे देताय.  तुमचं पण ना त्या भेटायला येणार्‍या माणसांसारखं झालं आहे. ती निदान बाहेरची तरी, घरातल्याच माणसांची वागायची ही तर्‍हा. मग कशाला हसायचं इतरांना? अमेरिकेत गेलो ते नोकरीसाठी पण आता वाटतं बरंच झालं.  तुमच्यापासून सुटका तरी झाली."

"निलेश गप्प बस एकदम. सुनील, स्मिता तुम्ही दोघंही. एक शब्द बोलू नका. अरे, ह्यांना जाऊन पुरते दहा दिवसही झालेले नाहीत तेवढ्यात तुमचे वाद सुरू. निदान माझी तरी लाज ठेवा."  आईच्या उपस्थितीची जाणीव झाल्यासारखे तिघंही एकदम गप्प झाले.
"नातेवाईक, शेजारीपाजारी, तुम्ही मुलं...मला ठाऊक आहे प्रत्येकजण कर्तव्य, जबाबदारी म्हणून सारं करता आहात. पण कुणी माझ्या मनाचा विचार करतं आहे का? पस्तीस वर्षांचा संसार. त्यांच्या मरणाची चाहूल लागल्यावर मला काय वाटलं असेल  याचा विचार आला का रे कधी तुमच्या मनात? चेहर्‍यावर हसू ठेवून वावरायचं, यातूनही ते वाचतील असं स्वत:च्याच मनाला बजावत राहायचं, त्यांना उभारी द्यायची. खचून जायला झालं रे. आता सहप्रवास संपला आहे आणि मावळतीच्या रस्त्यावर मी एकटी उभी आहे या कल्पनेनंच उन्मळून पडल्यासारखं झालं आहे.  कटकटी, हेवेदावे, वाद... नको आहे हे मला काहीही आता.

वाटतं, आपण सर्वांनी एकत्र बसावं, ह्यांच्या आठवणी काढाव्यात, तुम्ही तिघं लहान असतानाच्या आठवणी जागवाव्यात. किती दंगा करायचात, धुडगूस असायचा नुसता घरात. दादा ओरडायचे पण त्या धुडगुसात सामीलही व्हायचे, तुमच्याबरोबर खेळायचे, पत्त्यांचे डाव, बॅडमिंटन, गप्पांचे अड्डे... हौशी होते तुमचे दादा. मनात आलं की निघायचो आपण भटकंतीला. निलेश, सुनील तुम्ही निमित्त काढून स्मिताला हैराण करायचात, चिडवायचात, एकटं पाडायचात. मग दादा तिचे मित्र बनायचे. तिच्या बाजूने तुमच्याशी भांडायचे. तुमच्या प्रत्येकाच्या मनात असतील ना रे अशा आठवणी? मला वाटलं होतं. कधी नव्हे ती माझी तिन्ही मुलं एकत्र आली आहेत. जुने दिवस आठवू, दादांच्या आठवणीत रमू. पण नाही, तुमचं सारं लक्ष काम संपवण्याकडे आणि एकमेकांची उणीदुणी काढण्याकडे. मला ठाऊक आहे, आता माझं काय हा ही विचार मनात घोळत असणार. तुमच्या दृष्टीने निर्णय लवकर घेणं भाग आहे कारण निलेशला  अमेरिकेत परतायचं आहे, स्मिता आणि सुनीलला  मुंबई गाठायची आहे. हा विषय काढणार असाल तर आत्ताच सांगते. माझी काळजी करू नका. मी या घरातच राहणार आहे झेपतं आहे तोपर्यंत. झेपेनासं झालं की मी स्वत:हून सांगेन.  एवढ्या मोठ्या घराची  माझ्याच्याने उस्तवार नाही होणार. विकलेलं बरं. छोटासा फ्लॅट घेईन इथेच. नाही नाही, त्यासाठी तुम्हाला काहीही करावं लागणार नाही. तुमचे दादा असतानाच आम्ही काही गोष्टी ठरवून टाकल्या होत्या. घर विकायचं तेही मी पाहीन. विकून येतील ते पैसे मी असेपर्यंत बँकेत राहतील, मला लागले, आजारपण आलं तर त्यासाठी वापरता येतील. उरले तर नंतर तुम्ही वाटण्या करालच. दादा गेल्यागेल्या जे सुरू झालं ते मी गेल्यागेल्या होईलच याची खात्री आहे मला."

एका दमात बोलल्यामुळे त्या थांबल्या. तिघांनाही शरमल्यासारखं झालं. बराचवेळ कुणीच काही बोललं नाही. पण प्रत्येकाच्या  मनात आता दादांच्या आठवणी पिंगा घालत होत्या. निलेश आईजवळ सरकला. हळूच तिच्या खांद्याभोवती हात घालून त्याने तिला जवळ ओढलं.
"आई, उद्या दहावा दिवस आहे. काका, मामा, मावश्या सगळी येतील. तेव्हा रात्री आपण हेच करू. दादांच्या सुखद आठवणी जागवू. चालेल?" डबडबलेल्या डोळ्यांनी स्मिता, सुनील, निलेश आईकडे पाहत होते. तिने पसंतीची मान डोलवली तशी दादांच्या नसण्याने प्रत्येकाचा जीव गलबलून गेला.

रात्री पलंगावर पडल्या पडल्या तिघांच्या मनात आठवणींची गर्दी झाली होती. निदान त्या क्षणी तरी जबाबदारी, कर्तव्य, वाटणी, आवराआवरी हे सारे शब्द बाजूला पडले होते. डोळे मिटून दादांची तिन्ही मुलं लहान होऊन त्यांच्या कुशीत शिरली होती. आणि झोपेचं खोबरं झालेली तिन्ही लेकरांची आई, पलंगावर बसून आपल्या लेकरांच्या चेहर्‍यावर पसरलेली निरागस झाक, निष्पाप हसू डोळे भरून मनात साठवत होती.


बृहनमहाराष्ट्र वृत्तच्या लेखमालेतील हा माझा ५ वा लेख.
वृत्त दुवा -  http://bmmonline.org/sites/default/files/BMM/BMM/BMM_Newsletter_April2014.pdf



Thursday, October 3, 2013

मी काय करु...


"अहो, मीनाचा फोन होता."
वर्तमानपत्रातलं डोकं बाहेर न काढता अण्णांनी हुंकार दिला.
"उन्हाळ्याच्या सुट्टीत बोलावते आहे." अण्णांनी फक्त वर्तमानपत्र थोडं बाजूला करत वत्सलाबाईंकडे नजर टाकली.
"नाही, म्हणजे मुलांना सुट्टी लागली आहे ना. त्याच्यांकडे लक्ष द्यायला कुणीतरी पाहिजे म्हणत होती."
"वत्सला, हे नवीन आहे का तुला? दरवर्षी जातोच की आपण तिकडे मुलावर लक्ष पाहिजे म्हणून. आणि तुम्ही दोघंही आहात इथे तर छोटीला पण काढते पाळणाघरातून म्हणाली असेल."
"काय करायचं मग? आता झेपत नाही ही उस्तवारी. म्हणजे सुरुवात प्रवासापासूनच होते. कल्पनेनंच नको वाटतं." दुखरे पाय चोळत त्या तिथेच टेकल्या.
"नाही जमणार सांग. तिकडे असतात चांगली पाळणाघरं आणि काय ते त्यांचे समरकॅम्प पण असतात त्यात घाल म्हणावं मोठ्याला."
"सांगितलं. खूप महाग पडतं म्हणे ते. भारतात पाठवून देते मुलांना. एखादी दिवसभराची बाई लाव, पैसे देईन म्हणते आहे."
"काय नालायक मुलं आहेत ही. पैसे फेकले आमच्या तोंडावर की झालं. त्याचं सगळं केलंच आपण. आता पार साता समुद्रापलिकडे जाऊन बसली आहेत. उन्हाळ्यात तिथे जाऊन त्यांच्या मुलांना सांभाळायचं.  इथे आम्हाला कोण सांभाळणार? झाली म्हणावं आमची देखील वयं आता.  दे तो फोन इकडे. मीच सांगतो तिला." वत्सलाबाई उठल्या नाहीत. म्हणता म्हणता एक घाव दोन तुकडे करतील. ते सांधायला पुन्हा सगळी मानसिक शक्ती घालवायची ती आपण.  अण्णांनीही परत वर्तमानपत्रात डोकं खुपसलं.  वत्सलाबाईंच्या मनाला थकव्याने एकदम वेढा घातला.

मीनाच्या वागण्याचं त्यांना राहून राहून आश्चर्य वाटत होतं. आता हे दरवर्षीचं झालं होतं. जून महिना जवळ आला की त्या अस्वस्थ व्हायच्या. मीनाचा फोन घेऊच नये असं होऊन जायचं. पण किती ठरवलं तरी सगळं त्याचक्रमाने घडायचं. अडीच तीन महिन्यांनी भारतात परत यायला निघताना प्रत्येकवेळी त्या तिथून येताना बजावून नाही का यायच्या,
’आता पुढच्या वेळेस तुझी तू सोय बघ गं बाई. नाही हो झेपत आम्हाला हा प्रवास, पुन्हा घरीही तशी दिवसभर उठबस होते ना, त्यांने अगदी थकून जायला होतं.’ त्यांना सगळी वाक्य जशीच्या तशी आठवली. पण दरवेळी उगाच मुलीचं मन कशाला दुखवा, नातवंडाचं मायेने कोण करणार म्हणून परदेशवारी व्हायचीच. पण हल्ली हल्ली मनात एक सल दाटून यायला लागला होता.  वाटायचं,  मायेने करतो आहोत त्याचा फायदा तर घेत नाही ना ही? जिथे तिथे हिशोबाने वागणं, त्यापुढे आमच्या त्रासाची, दुखण्याखुपण्याची पर्वा वाटत नाही की डोळ्यावर कातडंच ओढून बसली आहे?  एक वर्ष अण्णांचीच तब्ब्येत बरी नव्हती तेव्हा जमलं नाही जायला, तर मोठ्याला दिलं पाठवून इकडे. काय धावपळ उडाली. मीना म्हणते तशा बायका थोड्याच मिळतात आजकाल. मिळाल्या तरी त्यांची  तंत्र सांभाळावी लागतात. शेवटी नाशिकच्या लेकीला बोलवून घ्यायला लागलं. तिने केलं सगळं पण गरज पडली की तिचाच कसा उपयोग होतो ते सांगायला विसरली नाही.  दरवर्षी मीनाच्या मदतीला झेपत नसताना का धावता हा नेहमीचा प्रश्न विचारायलाही विसरली नाहीच.


मुली मोठ्या होत असताना दुसर्‍याचा विचार करायला शिका हे मनात रुजवायचं राहूनच गेलं का?  कधी कुठल्या कामाला हात लावू दिला नाही, अडचणी कळू दिल्या नाहीत ते अभ्यासात अडथळा नको म्हणून. पण त्यामुळेच सगळं  विनासायास मिळतं, आपल्या मनासारखंच झालं पाहिजे हीच सवय लागली. स्वत:पुरतं पाहिलं की संपलं असं वागणं, विशेषत: मीनाचं. काय चुकलं आपलं? मुलींनी स्वावलंबी बनावं एवढंच होतं मनात. पण ते करता करता रोवलं गेलेलं महत्वाकांक्षेचं रोपटं आडवं तिडवं फोफावलं. मीनाच्या धिटाईचं, हुशारीचं कौतुक करता करता ती म्हणेल ती पूर्व असंच होत गेलं.  त्याचा फायदा ती तिच्या नकळत घ्यायला शिकली असं तर झालं नाही ना? ती कर्तृत्ववान निघाली. इंजिनिअर होऊन स्वत:च्या हिमतीवर परदेशात शिक्षणासाठी गेली. पण हे एवढंच पुरे असतं? कर्तृत्ववान बनविता बनविता माणूस  घडवायचं राहूनच गेलं का?. कुणाची चुक? का घरोघरी हे असंच होतं? त्याचं त्यानाच ठरवता येईना.

"चहा करतोय मी माझ्यासाठी. तुला हवा आहे का?" अण्णांनी  विचारलं तशा त्या विचारांतून बाहेर आल्या.

>>>
"काय झालं? येते आहे का मग तुझी आई?" मयुरेशच्या प्रश्नावर मीना काहीच बोलली नाही.
"त्यांचं नक्की होत नसेल तर आईला पाहतो जमतंय का."
"आता तिला विचारलं आहे ना. तिचं कळू दे. मग बघू."
"पण हो, नाही काहीतरी म्हणाल्या असतील ना?"
"काही बोलली नाही. कंटाळते हल्ली ती दरवर्षीच्या प्रवासाला."
"तुझा पण अट्टाहास का तुझ्याच आईला बोलावण्याचा?"
"निश्चिंतं राहता येतं मग. तुझी आई आली की तिच्यावर जास्त ताण पडू नये याची काळजी घेण्याचाच ताण येतो माझ्या मनावर."
"हे अतिच तुझं.  बघ, तुझं तू ठरव. परत माझे आई, बाबाच करतात असं ऐकवू नकोस म्हणजे झालं." तिने नुसतीच मान उडवली. मयुरेशने आठवड्याचे कपडे यंत्रात धुवायला टाकले तसं भाजी चिरता चिरता तिचं मनंही एका लयीत मागे पुढे होत राहिलं.
खरं तर आईने मागच्या वेळेस बजावून सांगितलं होतं पुन्हा नाही यायला जमणार म्हणून. पण मग करायचं काय? आजी आजोबा आले की किती खुश असतात दोघं. आता आणखी थोडी वर्ष. मोठी झाली की रहातीलच एकटी. समर कॅम्प, पाळणाघर दोन्हीचा खर्च खूप.  पुन्हा पैशांनी प्रेम थोडंच मिळतं? आई आली की तिच्या हातचे चविष्ट पदार्थ पण मिळतात चाखायला. पण मागच्यावेळेला आईने एका मैत्रीणीकडेच बोलून दाखवलं, झेपत नाही असं सांग म्हणे आमच्या वतीने मीनाला. तिने तेव्हा मैत्रीणीलाच म्हटलं होतं,
’नको सांगू मला. मनाला लागून राहतं.’ मैत्रीण गप्प बसली. आईचा राग आला होता.  खरंच त्यांना इतकं नको वाटतं इकडे यायला? मुलांचं जबाबदारीने, प्रेमाने त्यांच्याइतकं कोण करणार? आणि दोन महिन्याचा तर प्रश्न. भारतात गेले की आरामच आराम. पोळ्या करायला, भाज्या चिरायला बाई आहे, दोघंच्या दोघं तर असतात.  इथे निदान आमचा सहवास मिळतो, अधूनमधून फिरवून आणतोच की दोघांना. बाहेर जातो जेवायला. तिकीटाचा खर्च तर मी करुच देत नाही  म्हणजे आई, बाबांची तयारी असते पण मी बोलावलं आहे तर मी थोडीच करु देईन. मीही नोकरी करते तर एवढं तर हक्काने करु शकतेच. मग तरीही आई, बाबा का नाही खुश? आईला मुळी कशात समाधानच नाही. आणि बाबा. ते म्हणजे एकदम रोखठोक.  चिडले की तोफ. स्पष्ट बोलून मोकळे.  मागे एकदा म्हणाले होतेच की भारतात त्यांचे मित्र त्यांना बेबीसीटर म्हणून चिडवतात. दुर्लक्ष करा म्हटलं तर म्हणाले, पण ते खरंच आहे ना?

 काय खरं, काय खोटं तेच समजेनासं झालं आहे.  आणि आता इतक्या उशीरा कुठे नावं नोंदवणार समरकॅम्पमध्ये, जागा शिल्लक नसणारच.  चिरलेली भाजी फोडणीला टाकत तिने कॅलेंडर पाहिलं. आई, अण्णाचं किती तारखेचं  आरक्षण करणं  सोयीचं पडेल याचा विचार करत मीनाने  त्यांचा नंबर फिरवायला सुरुवात केली.



Tuesday, August 6, 2013

तळ्यात मळ्यात


(बृहनमहाराष्ट मंडळ वृत्तांतात (BMM Vrutta) माझ्या दरमहिन्याआड प्रसिद्ध होणार्‍या लेखातील १ ला 
लेख.)

भल्यामोठ्या बॅगा  पेलत, धापा टाकत तिसर्‍या मजल्यावरच्या दारासमोर दामले कुटुंब उभं होतं. इमारतीसाठी लिफ्ट  नाही याचा पुन्हा एकदा केतनला वैताग आला. पण आत्ता नानांना भेटायची आतुरता जास्त होती. केतनने अधीरतेने दरवाज्याची घंटा दोन तीन वेळा वाजवली.
"अरे आलो आलो लेकांनो. दम धरा जरा." नानांचा दमदार आवाज दाराच्या फटीतून बाहेर ऐकू आला तसा केतन खूश झाला.
"तीच ऐट आहे बघ बाबांच्या आवाजात. खणखणीत आवाज एकदम. वय फिरकलेलंच नाही त्यांच्या आजूबाजूला." मीराकडे पाहत केतन म्हणाला. मीरा नुसतीच हसली. तोपर्यंत नानांनी दार उघडलं होतं. केतन त्यांच्या मिठीत अलगद सामावला. मीरा आणि मुलं कौतुकाने ती भेट पाहत होते. आवाज खणखणीत असला तरी नानाचं थकलेपण मीराच्या नजरेतून सुटलं नाही. ती तिथेच नमस्कारासाठी वाकली. नाना एकदम खूश झाले,
"सुखी भव." मीराला मनापासून आशीर्वाद देत नातवंडांच्या पाठीवर त्यांनी कौतुकाची  थाप मारली.  अरे, आत तर या आधी असं म्हणत दारापासून नाना बाजूला झाले.

आत पाऊल टाकलेली  मीरा नुसतीच खोलीकडे पाहत राहिली. पसारा, नुसताच पसारा सर्वत्र. जागा मिळेल तिथे काही ना काही पडलेलं होतं.   गरम गरम चहाचा कप आयता मिळावा, थोडा वेळ निवांत पडावं असं तिला मनापासून वाटत होतं. केतनच्या हट्टाखातर  माहेरी, मुंबईत न थांबता मिळेल त्या विमानाने ती सगळी सुरतला पोचली होती. तिथून गाडीने नवसारी. समोरचा पसारा पाहून हे आवरल्याशिवाय विश्रांती घेणं आपल्याला जमणार नाही हे तिला ठाऊक होतं. टापटिपीचं विलक्षण वेड असलेल्या नानी गेल्यावर घराची झालेली अवस्था पाहून तिचा जीव गलबलला. तिच्या चेहर्‍यावरचे भाव निरखीत नाना म्हणालेच,
"मीरा बेटा, तू नको लक्ष देऊ पसार्‍याकडे. ब्रम्हचार्‍याची मठी अशीच असायची. त्यातून ताराबाईंना बोलावलं होतं साफसफाई करायला, पण अजून जमलेलं दिसत नाही त्यांना यायला. येतील. तुम्ही आधी बसा रे बाबांनो. मी चहा टाकतो फक्कडसा." नानांची लगबग पाहून केतन हसला.
"नाना, तुम्हीच बसा. आता सून आली आहे ना दिमतीला. तीच करेल  तुमच्यासाठी फक्कडसा चहा."
शहाणाच आहे, स्वत: करावा की इतकं आहे तर...मनातले विचार मनातच दाबून ती घाईघाईने चहा करायला वळली. डायनिंग टेबलावर टाचणी ठेवायला जागा नव्हती. एकीकडे टेबला आवारायला घेत तिने चहाचं आधण ठेवलं.
चहा पिता पिता सगळी नानांशी गप्पा मारायला बसली. नानींच्या आठवणीने गहिवरली. गेल्या वर्षी नानी अचानक गेल्या, त्यातून नाना, केतन अजूनही सावरले नव्हते. नानां आता एकटेच राहत होते. पंचाऐंशी ओलांडलेल्या नानाचं  आपल्याकडे येऊन न राहणं मुलांना नापसंत असलं तरी मीरा समजू शकत होती. जिथे सारं आयुष्य गेलं ते सोडून कुठे जायचं या वयात? आणि स्वत:चं घर तीच आपली हक्काची कुटी.

बापलेकाच्या गप्पा रंगल्या होत्या.  मुलंही संभाषणात सहभागी झाली.   प्रवासाची चौकशी झाली, कोण फोन करतं, कोण कोण भेटतं, लग्न, मुंजीत कुणाच्या भेटी झाल्या, नातेवाईक, शेजारी पाजारी सगळे कसे आहेत असे काही ना काही विषय निघत राहिले. गप्पांना अंत नाही असं वाटत असतानाच हळूहळू संभाषण मंदावलं. मुलं तिथून उठली. केतन संगणका समोर जाऊन बसला. मीरा आणि नानाच तिथे राहिले तसं मीराला राहवलं नाही.
"नाना, ठाऊक आहे तुम्ही नाहीच म्हणाल; पण चला नं आमच्याबरोबर. कबूल नाही केलंत तरी घराची दशा पाहून तुमचीही अवस्था कळते आहे मला."
"नको बेटा अशी गळ घालूस. ती असताना येत होतोच ना अधूनमधून. आता नवसारी सोडून कुठे जावंसं नाही वाटत. तू म्हणते आहेस यातच सारं काही आलं. आता काही जास्त दिवस उरलेले नाहीत माझे."
म्हणूनच...असं म्हणावंसं वाटलं तिला पण डोळ्याच्या कडेला जमू पाहणारे अश्रू लपवीत ती उठलीच,
"थोडावेळ पडते. ताराबाई नाही आल्या तर जेवणाचं बघावं लागेल नं...." असं काहीसं पुटपुटत.

पलंगावर पडल्यापडल्या ती विचारात गढून गेली. डोळा लागतो आहे असं वाटतानाच फोन वाजला तसं आपसूकच तिचं लक्ष त्या बोलण्याकडे वळलं.
नानांच्या लेकीचा फोन असावा,
"दादा कॉम्प्युटरवर करतोय काहीतरी. मीरा पडते म्हणाली जरा. मुलं? त्याचं फोनवर  काहीतरी चालू आहे." नणंदेने काय विचारलं त्याचा अंदाज तिला नानांच्या उत्तरावरून येत होता.
"नाही, नाही. झाल्या की गप्पा गोष्टी. पंधरा वीस मिनिटं. हो, मग प्रत्येकजण लागला आपापल्या उद्योगांना. मी? मी काय करणार? बसलो आहे नेहमीसारखा." नानांच्या आवाजात तक्रारीचा सूर मिसळला. मीराला उगाचच अपराधी वाटलं. जेमतेम अर्धा तास संमेलन भरल्यासारखा गोंधळ होता हॉलमध्ये. संभाषणातले विषयच संपल्यावर नुसतं समोरासमोर बसून करायचं काय? आल्याआल्या जो उत्साह असतो, भेटण्याची अनिवार ओढ असते त्याची पूर्तता झाली की काय उरलं? उरलेले दोन आठवडे आता तेच. चहा घेत, जेवताना थोडंफार काही बोलणं होणार, भेटायला येतील कुणी ना कुणी, थोडंफार फिरणं, खरेदी. ती तिच्या आई, बाबांकडे राहायला जाणार. एक दोन दिवस तिच्या माहेरी केतन येऊन राहणार. पुन्हा नवसारीत काही दिवस आणि मग संपला मुक्काम. केतनला नानांची ओढ आणि तिला माहेरची या एकाच कारणाने भारतभेट होते. इथे येऊन रोजची फक्त पाच दहा मिनिटं आपण एकमेकांशी बोलणार की संपलं. हे असं का व्हायला लागलं आहे? असं नव्हतं पूर्वी. किती पत्र लिहायची ती दोन्ही घरी. लिहिलेल्या पत्रांच्या उत्तराची दोघंही आतुरतेने वाट पाहायचे. केतन तर रोज संध्याकाळी मराठी गाण्याच्या कॅसेट लावून बसायचा, आठवणीत रमायचा. आलटून पालटून पंधरा दिवसांनी दोघांपैकी एकाच्या घरी फोन करून त्यांनाच एकमेकांना खुशाली कळवायला सांगायची. दोन अडीच वर्षांनी गेलं की मनात साचलेलं सारं उतू जायचं, आनंदाला उधाण यायचं. गप्पा,  तास न तास, दिवस दिवस रंगायच्या, शेजारी पाजार्‍यांबद्दलच्या उखाळ्यापाखाळ्या, नातेवाइकांची ख्याली खुशाली ऐकणं, भारतातल्या घडामोडी यात आला दिवस कसा संपायचा तेही कळायचं नाही. कधी संपलं हे सारं?

इंटरनेट आलं, इ मेलचा जमाना सुरू झाला, पण त्याचं सूत काही वृद्ध मंडळीशी जमत नव्हतं.  दोन्हीकडून फोन करणं सोपं, स्वस्त झालं तेव्हा समीकरणं बदलली. वरचे वर फोन व्हायला लागले. मग पत्र मागे पडली. फोनवर रोजची ख्यालीखुशाली, पाककृत्या, जेवणाचे बेत... सगळं बोलणं होऊन जाई.  स्काइप आलं तसं आयुष्याला नवीन वाटा फुटल्या,
"बरं झालं बाई, आपण दोन्हीकडे कॉम्प्युटर घेऊन देऊ,  आई, बाबां, नानांना पाहिल्याचं समाधान मिळेल." दोन्हीकडची म्हातारी माणसं आपल्याला हे नवीन तंत्र कसं जमेल या धाकधुकीत असतानाच कॉम्प्युटर थडकला देखील.  इमारतीतली उत्साही मुलं आजी आजोबांना मदत करायला सरसावली. हळूहळू ते तंत्रही साधलं आणि मग अमेरिका - भारत अंतराची दरी बुजून गेली.

पण  दीड दोन वर्षांनी इथे आल्यावर बोलायला, गप्पांचे फड जमायला काही उरलंच नाही. काय सांगू, काय नकोची असोशी राहिली नाही. सगळं फोन, स्काइपने आधीच पोचलेलं एकमेकांकडे. प्रत्यक्ष भेटीचा आनंद काही क्षण मग उरलेला वेळ नाना म्हणाले तसा. खरंच काय गमावलं आणि काय मिळवलं आहे आपण? नक्की कुठल्या गोष्टीत सुख जास्त होतं की ते मानण्यावर शेवटी? पत्र, अधूनमधून फोन आणि मग चातकासारखी वाट पाहत  दीड दोन वर्षांनी झालेली भेट,  गप्पांनी भरलेला, आठवणींनी भिजलेला प्रत्येक दिवस की रोजच्या घाईगडबडीत एक दोन मिनिटं ’आवाज’ ऐकायला म्हणून केलेला फोन, रविवारी कामं उरकता उरकता स्काइपवरचं दर्शन आणि मग ही अशी भेट.  नानांना, आई, बाबांना यातलं खरंच काय आवडत असेल? वाटत असेल त्यांना की चाललंय हेच ठीक, मुलाबाळांची खुशाली रोजच्या रोज कळते, दर आठवड्याला गावातच असल्यासारखं पाहायला मिळतं, गप्पा नाही रंगल्या इथे आल्यावर तरी आजूबाजूला असणारं त्याचं अस्तित्वच पुरेसं आहे की अधूनमधून केलेले फोन, भावनेने ओथंबलेली पत्र आणि भेटायला आले की सतत आजूबाजूला घुटमळणं, किती बोलू न काय करू असं होऊन जाणं. काय भावत असेल नक्की त्यांना? विचारावं...? नकोच.

मीरा विचारात गढून गेली. बराचवेळ. अचानक पर्याय सापडल्याच्या आनंदात ती उठली. नानांचा भरल्या घरातला एकटेपणा पुसून टाकायचं तिने मनाशी पक्कं केलं. पत्ते खेळायला सर्वांना बसवयाचंच असं ठरवून ती  उत्साहाने बाहेरच्या खोलीत डोकावली.

हा लेख लोकसत्तेच्या ’चतुरंग’ पुरवणीतही प्रसिद्ध झाला आहे. दुवा - http://www.loksatta.com/chaturang-news/story-of-nana-and-his-family-219898/