Showing posts with label अनुभव. Show all posts
Showing posts with label अनुभव. Show all posts

Tuesday, February 27, 2024

मराठी भाषा दिन

 "ही माझी अमेरिकन आई." माझ्या आईची मी शेजारच्या मेरीशी ओळख करुन दिली तेव्हा  प्रश्न पडला की आई आता हिच्याशी कसं बोलेल? इंग्रजी समजलं तरी बोलण्याची सवय नाही आणि प्रयत्न केला तरी तिचं बोलणं उच्चारामुळे मेरीला समजणार कसं? पण आई तिच्याशी मराठीतच बोलली. खूप बोलली. आमच्या मुलीच्या बारशाला फक्त कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या हे घोकून घोकून शिकलेल्या मेरीचं मराठीचं ज्ञान इतकंच. त्यामुळे आई बोलली त्यातलं मेरीला काय समजलं असेल अशा संभ्रमात मी असतानाच मेरी माझ्याकडे पाहून हसली. म्हणाली,

"युवर मॉम इज हॅपी दॅट आय ॲम हिअर फॉर यू.  ॲड शी इज नॉट वरीड अबाऊट यू नाऊ. इज दॅट राईट?" माझी आई जे काही बोलली त्याचं भाषांतर करायची आवश्यकताच भासली नाही. ४० शी पार केलेल्या मुलीची काळजी घ्यायला सांगणार्‍या आईकडे आणि ती घेण्याची हमी देणार्‍या मेरीकडे मी डोळ्यातले अश्रू आवरत पाहत राहिले. आईच्या आत्मविश्चासाचंही अमाप कौतुक वाटलं. तिला हिंदी, इंग्रजी समजत असलं, येत असलं तरी बोलायची सवय नव्हती पण त्यामुळे तिचं पार साता समुद्राकडे येऊनही अडलं नाही. या आधीही तसं ते कधीच कुठे अडलं नाही हे आधी कधी जाणवलं नव्हतं इतक्या प्रकर्षाने त्या क्षणी जाणवलं. तिला काय म्हणायचं ते ती व्यवस्थित मराठीतच बोलून समोरच्यापर्यंत पोचवायची आणि महत्त्वाचं म्हणजे त्याबद्दल कुठलाही न्यूनगंड न बाळगता.


आम्हा भावंडाचं लहानपण मात्र आम्हाला इंग्रजी माध्यमात घाला म्हणून  आई - वडिलांच्या मागे लागण्यात गेलं. वडिलांची नोकरी बदलीची. जिथे जाऊ तिथे इंग्रजी माध्यमाच्या शाळा असतीलच असं नाही त्यामुळे ते शक्यच नव्हतं आणि असतं तरी त्यांनी घातलं असतं की नाही कुणास ठाऊक.  इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालं नाही याची खंत बाळगत आता चाळीशीच्या आसपास असणारी एक अख्खी पिढी मोठी झाली.  आपल्याला नाही जमलं ते पोटच्या गोळ्यांना करायला लावावं या अलिखित नियमाचं पालन करत मुलांना आवर्जून आम्ही इंग्रजी माध्यमात शिकवलं. घरी बोलतातच की मराठी निदान शाळेत तरी शिकू देत इंग्रजी,  स्पर्धेच्या जगात मागे पडायला नको, उत्कर्ष कसा होईल, मुलांना ’व्यवहाराची’ भाषा आलीच पाहिजे हाच ध्यास आमच्या पिढीने जोपासला. मराठीची कास मुलांच्या हाती लागू दिलीच नाही.  आमच्या सारखे पालक बरेच आहेत  हे कळलं तेव्हा वेळ टळून गेली होती.  इंग्रजी माध्यमात न शिकल्याने काही फरक पडत नाही हे कळायलाही खूप काळ गेला.  पण हे लक्षात येईपर्यंत तसं खूप नुकसान आमचं आम्ही केलंच भरीला आमच्या मुलांचंही.  आम्ही शिकलो, नोकर्‍यांना लागलो, मराठी तर येतच होतं पण इंग्रजीही उत्तम जमायला लागलं.  इतकंच नाही तर मराठी आणि इंग्रजी, दोन्ही साहित्याचा उत्तम आस्वादही आमची पिढी घेऊ शकते ह्या गोष्टीचं महत्त्व आता समजतंय.  इंग्रजी माध्यमांच्या मुलांची ओढ इंग्रजी साहित्याकडे झुकलेली दिसते. मराठी साहित्य वाचण्याकडे त्यांचा कल कमी आढळतो. पण आमच्यासारखे पालक मुलांना इंग्रजी माध्यमात घालून खूश होते. आता मुलांची उत्तम प्रगती होईल, आत्मविश्वासामुळे यशाचं शिखर गाठतील, आमच्यासारखी खंत बाळगावी लागणार नाही याच आनंदात आम्ही मशगूल होतो. ज्या पालकांना इंग्रजी येत नव्हतं  ते तर आपल्या मुलांचं इंग्रजी ऐकताना हुरळून जात होते. पण नुसती इंग्रजी  भाषा येऊन यशाचं शिखर गाठता येत नाही किंवा आयुष्य सार्थकी लागत नाही हे कळलंच नाही कुणाला. मुलांना इंग्रजीतूनच शिकवायचं ह्या विचारसरणीची चूक आधी घराघरांना भोवली मग समाजाला. घरी बोलतातच की मराठी असं म्हणताना, घरातही मराठी बोलताना इंग्रजी शब्दांमध्ये अधूनमधून चवीला काजू, बेदाणे असल्यासारखे मराठी शब्द यायला लागले.  घरोघरच्या ह्या चुकीची  फळं समाजाला भोगायला लागली. वास्तवाचं भान येईपर्यंत मराठी शाळा हळूहळू बंदही पडायला लागल्या. ज्या चालू आहेत त्यांची परिस्थिती गंभीर आहे. या परिस्थितीत मुलांना मराठी शाळांमध्ये घालायचं म्हटलं तरी अवघड परिस्थिती झाली. त्यामुळे शिक्षणाचं माध्यम इंग्रजीच झालं.  मराठी बोलायचं तर इंग्रजीतून विचार करुन त्याचं भाषांतर व्हायला लागलं.  कुणाला जपून राहा असं सांगण्याऐवजी काळजी घे असं टेक केअरचं शब्दश: भाषांतर सर्रास वापरात आलं. मराठीचं स्वरुपच बदललं. राडा होईल घरी अशी वाक्य मालिकांमधून सर्रास ऐकायला लागली, जीव तळमळण्याऐवजी तडफडायला लागला. प्रसारमाध्यमांनी इंग्रजी मिश्रित मराठी आणि चुकीचं मराठी रुढ केलं. तेच दैनंदिन जीवनात वापरलंही जाऊ लागलं. भावना पोचल्याशी कारण, भाषेच्या शुद्धतेचं काय इतकं ही विचारसरणी बळावली. अखेर मराठीचा, मराठीचा योग्य वापर करण्याचा आग्रह धरणार्‍यांनी शरणागती पत्करली.  काळाबरोबर बदललेल्या मराठीशी जुळवून घ्यायला हवं असं म्हणत चुकीचं, इंग्रजी मिश्रित मराठी मनातल्या मनात सुधारुन घ्यायला ही माणसं शिकली.


आणि एक वेळ अशी आली की मराठी नष्टच होणार की काय अशी भिती मनात निर्माण व्हायला लागली, वाढली. इतकी वाढली की  ती मराठी ’दीन’ झाली.  दिवस साजर्‍या करण्याच्या आपण सुरु केलेल्या नवीन प्रथेत  एक दिवस ’मराठी’ ला मिळाला. राज्यसरकारही यासाठी पुढे सरसावलं आणि तो दिवस ठरला २७ फेब्रुवारी!  जागतिक मराठी भाषा दिन. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जयंतीच्या दिवशी  २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात यायला लागला. कोण हे कुसुमाग्रज आणि जयंती म्हणजे? असा  इंग्रजी माध्यमातल्या मुलांना प्रश्न पडला. तो सोडविण्याची जबाबदारी तर आता आपण उचलायलाच हवी. नाही का? इथे अमेरिकेत आमच्यासारखी अनेकजण आपली मातृभाषा मुलांना यावी, ती त्यांनी टिकवावी, वापरावी यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत.


 माझ्याकडे मराठी शिकायला येणार्‍या विद्यार्थ्यांना मराठी दिनाबद्दल सांगितलं तेव्हा असा दिवसही असतो याचंच नवल वाटलं मुलांना. कुसुमाग्रज ठाऊक नव्हते पण त्यांच्याबद्दल प्रचंड उत्सुकता मात्र होती. त्या उत्सुकतेमुळे माझ्या  आशा पल्लवित झाल्या आहेत.  मराठी भाषा दिन म्हणजे आपली भाषा समजणं, बोलता येणं इतका मर्यादित अर्थ नाहीच. नसावा. मुलांना कुसुमाग्रजांच्या कवितांची ओळख करुन द्यायची, त्यांचं साहित्य वाचून दाखवायचं असं ठरवून टाकलं. कदाचित यातून मराठी साहित्याबद्दल त्यांची उत्सुकता वाढेलही. आवड निर्माण होईल. व्यक्त होण्यासाठी मराठी लेखन प्रपंचही मांडतील कदाचित कुणी एखादं त्यातलं. होईल खरंच असं? की भ्रामक आशावाद?  आपल्याच हातून दुसरीकडे वळलेली ही वासरं  येतील पुन्हा कळपात? आमच्या पिढीने मुलांना जसं इंग्रजीकडे वळवलं तसंच पुन्हा मराठीकडे आणण्याचं कामंही आम्हीच करु शकतो हे नक्की. आपापल्या पिलांना मराठीच्या मार्गावर आणायचं घेईल कुणी मनावर? जमेल? नक्कीच. मनात आणलं तर होऊ शकतं हे आणि शेवटी कितीतरी गोष्टी आपल्याच हातात असतात. नाही का? 

Monday, October 16, 2023

एका लग्नाची गोष्ट

 

झाले बुवा एकदाचे लेकाचे दोनाचे चार हात. लेकाने आम्हाला जेव्हा फोनवर लाजत लाजत सांगितलं, 

"आई तू माझ्या मागे लागली होतीस ना लग्न कर म्हणून... ऐकलं आणि हृदय थबकलं, धडधडलं, काय-काय झालं. तोंडून शब्दच फुटेना.

तो म्हणाला,

"लग्न म्हटलं की इतकी का घाबरतेस? मी छान पाकिस्तानी मुस्लिम मुलीशी लग्न करणार आहे." आता हृदय नाही तर कमीत कमी फोन तरी खाली पडायला हवा होता पण सगळं जागच्याजागीच राहिलं. मला ऐकलेले किस्से मात्र आठवले. मुलगी कोण वगैरे न विचारता आधी मी त्याला म्हटलं.

"रात्रीचा घराबाहेर पडू नकोस. दार नीट लाव." मुलाला यात आई काहीतरी वेगळंच बोलतेय असंही वाटलं नाही इतकं ते त्याच्या सवयीचं होतं. तो घाबरला नाही म्हणून मीच घाबरत म्हटलं.

"अरे, त्या मुलीचे भाऊ येतील तुला मारायला नाहीतर तिचे वडील गुंड पाठवतील."

"आऽऽऽई" हा स्वर म्हणजे वादळापूर्वीची शांतता.

"बरं मग तिला पण तेच सांगू का? तुम्हीपण पर्णिकाला नाहीतर गुंडांना पाठवणार आहात का?"

"आम्ही आणि पर्णिका काय 'तसले' वाटलो  काय?" विचारलं आणि लक्षात आलं आपण त्या कोणा मुलीच्या घरच्यांना ’तसल्या’ त टाकलं. मग मी त्याचं एकदम अभिनंदनच केलं. शिकली आहे ना त्याची खात्री केली कारण आमच्यावेळी आई-वडील असंच म्हणायचे, कोणीही आणा पण शिक्षण झालेलं असलं पाहिजे. विचारता विचारता अजून एक लक्षात आलं.

"अरे, ते लोक जबरदस्तीने धर्म बदलतात. तू तुझा धर्म बदललास तर आम्हाला मेलास." हे जरा नाट्यमय झाल्यामुळे नाटकाची तालीम असल्यासारखा प्रॉम्प्टर (मराठी शब्द?) म्हणजे नवरा ओरडला. 

"कोणी कोणाला मेलेलं नाही. होऊन जाऊ दे." मग आम्ही मुलीला भेटायला रवानाच झालो. सहा तास गाडी चालवत पोचलो, भेटलो. भावी सासु म्हणून तिच्यावर प्रभाव टाकायला एका घोटाऐवजी दोन घोट अमृत घेतलं आणि ते जे चढलं आणि तरुणांना लाजवेल इतका तरुणपणा माझ्यात घुसला त्यावरुन आमच्या सुनबाई सासुबाईंचा धसकाच घेणार की काय असं मी सोडून उरलेल्या ३ जणांना वाटलं.

आता ही तशी गुप्त गोष्ट होती. लेक जोपर्यंत मेहविशला मागणी घालत नाही तोपर्यंत चुपचाप. दोन - तीन वर्षांनी झालं, करशील का लग्न?, हो करेन प्रकार आणि आम्ही उत्साहाने सार्‍या जगाला सांगितलं. इथून पुढे खरं नाट्य. ३ वर्षात न पडलेले सारे प्रश्न इतरांना पडले, त्यांचे प्रश्न रोज एक या धर्तीवर ऋत्विककडे पोचले.

"अरे, निकाह असा होतंच नाही. कबुल, कबुल, कबुल म्हटलंस की झालास तू मुसलमान." लेकही आता या सार्‍याला सरावला असावा.

"आमचा काझी मॉडर्न आहे." आता ही काय स्पर्धा होती का पण मी म्हटलं 

"आमचे गुरुजी आयआयटीत शिकलेले आहेत (कापसे गुरुजी, बरोबर ना?)

"म्हणजे?"

"काळजी करु नकोस. धर्मांची सरमिसळ होऊ देणार नाहीत दोघं. घेतील ते काळजी."

"आई, काळजी मी करत नाही. तुझे मित्रमैत्रिणी, नातेवाईक करतायत." भानावर आणायला पुत्र तयारीत.

"तुझ्या मुलांची नावं काय ठेवणार?" लेक प्रश्नपत्रिका सोडवायच्या तयारीतच.

"आम्हाला मुलं होतीलच हे तुम्हाला काय माहित?" 

"आगाऊ, असं उत्तर पोचवू का?"

"बरं, पुढचा प्रश्न. मुलांच्या धर्माचं काय?" 

"असा प्रश्न विचारतात लोक?" त्याला आश्चर्यच वाटत होतं पण मला ज्या प्रश्नाचं आश्चर्य वाटत होतं तो मी त्याला आधी सांगितला.

"अरे, मेहविशचं नाव बदलणार का असंही विचारतायत."  

"आई, असल्या भानगडीत पडू नकोस हा. तिच तुझं नाव बदलेल." लेकाने सासु - सूनेचे प्रेमळ संबंध कसे ताणले जातील ते डोळ्यासमोर आणलं.

"अरे माझं नावपण बदलू दिलं नव्हतं मी. तिचं बदलायचा विचार करणारी मी कोण?" हे मी माझं मलापण विचारलं. उत्तर मिळालं नाही. कोणाची नावं आडनावं आपण बदलायची नाहीत एवढंच कळलं.

आता माझी मुसलमान मैत्रीण सरसावली,

"कबुल, कबुल, कबुल शिवाय निकाह होतंच नाही आणि ते म्हटलं की धर्म बदललाच..." मला एकदम मुलगा नमाज पढतानाच दिसायला लागला. मग सरसावून आम्ही मुलांच्या ’मॉडर्न’ काझीची मुलाखत घेतली. सगळं आलबेल असल्याची खात्री केली. मुलांनीपण आमच्या गुरुजींची मुलाखत घेतली. सगळं आलबेल असल्याची मेहविशची खात्री झाली. तरीपण निकाहच्यावेळी दोनचार गुप्तहेर ठेवायचे आणि कबुल हा शब्द ऐकला की.... इथे गाडी अडली. काय करायचं ते ठाऊक नव्हतं पण वेळ पडली तर गुरुजी आहेतच असा ’फक्त’ बायका करतात तसा फार पुढचा विचार करुन टाकला. नवर्‍याने नेहमीप्रमाणे उगाच फालतू गोष्टीत वेळ घालवतेस सूर लावला. 

तर अशा अनेकांना पडलेल्या असंख्य प्रश्नांची उत्तरं सोडवत, कोणी कोणाचे धर्म न बदलता, नाव - आडनाव न बदलता ऋत्विक जोगळेकर आणि मेहविश जमाल बोहल्यावर चढले. चढताना बुरखा आणि मुंडावळ्या विसरले. बुरखा कोणालातरी आठवला म्हणून काहीक्षण आला, मुंडावळ्या पिशवतच राहिल्या तरी दोघांचे चार हात झाले. त्याला देशाच्या कानाकोपर्‍यातून आमचे आणि मुलांचे मित्रमैत्रिणी हजर राहिले, भारतातले आमचे नातेवाईक अगत्याने आले आणि हे कार्य सफळ संपन्न झाले. 


Tuesday, April 25, 2023

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र आणि माझी मुलाखत

 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात माझा साहित्यप्रवास या विषयावर आकाशवाणी रत्नागिरीने घेतलेली माझी मुलाखत. जिथे काम केलं तिथेच मुलाखत देण्याचा अनुभव रोमहर्षी होता. नक्की ऐका ही मुलाखत.

दुवा: https://youtu.be/li4oLY1XMHQ


Friday, February 11, 2022

आकाशवाणी पुणे मुलाखत जाहिरात

 

मराठी बोलताना मुलांचा होणारा गोंधळ, मराठी भाषा आमच्या घरात गुप्त भाषा कशी झाली, आमची (अभिव्यक्तीची) नाटकं,  माझं लेखन आणि आकाशवाणीतले दिवस यावर अगदी छोटीशी मुलाखत घेतली आहे विद्यागौरी ताम्हनकर हिने आकाशवाणी पुणेसाठी. नक्की ऐका:

 Android App - https://play.google.com/store/apps/details?id=com.parsarbharti.airnews

 IoS App - https://apps.apple.com/in/app/newsonair/id1450030867



Monday, September 27, 2021

अलास्काला जाऊ

खाण्यासाठी जगणारे आम्ही आणि जगण्यासाठी खाणारी आमची मुलं प्रवासाला निघाली की  घोळ व्हायला सुरुवात
होते. कधीकधी विमानंही त्यात सामील होतात. अॲकरेंजला जायला अटलांटा विमानतळावर वाट बघत बसलो आणि विमान कर्मचारी ओरडून, ओरडून विमानात कुणाला तरी शेंगदाण्यांचा त्रास होतो म्हणून चणेफुटाणे देणार नाही सांगायला लागली.

"हे काय, त्रास होत असेल त्यांना नका देऊ. आम्ही काय केलंय?" देणार नाही म्हटल्यावर एकदम हवंसं वाटायला लागतं.

"आई, तू इथेच खाऊन घे. विमानात चढलीस की खायला कधी मिळेल याचीच वाट बघत असतेस." लेकीने आयती संधी साधली आणि तिच्या कुसकटपणाकडे दुर्लक्ष करत मी विमानतळावर हादडून घेतलं. शेंगदाणे मिळणार नाहीत असं पुन्हा एकदा ऐकत विमानात जाऊन बसलो. उडायच्या आधी विमान चालायला लागलं आणि तोंड, नाक मुस्क्या बांधल्यासारखं झाकलेलं असलं तरी शेंगदाणे जळल्यासारखा वास यायला लागला. 

"काहीतरी जळतंय. तू हवाई सुंदरी  जीव कसा वाचवायचा सांगते ते ऐकतेस का?" लेकीच्या कानात कुजबूजले. कानातल्या बोळ्यांमुळे ते आत शिरलं नाही.

"विमान जळलं तरी कानात खुपसून गाणी ऐकत बसणार आहेस का?" दातओठ खात मी विचारलं. ती समोर बघत राहिली. आपत्कालीन सुटकेचा मार्ग शोधायचा की तसंच बसून राहायचं हे कळेना. 

"बाकी कुणाला कसा वास येत नाही?" मी  पुटपुटले. तेवढ्यात विमानात झालेल्या बिघाडाची घोषणा झाली. आता विमान जळलं तरी विमान जळतंय हा माझा अंदाज बरोबर ठरला यातच मी खूष होते.  लेकीनेही कानातले बोळे काढलेले बघितले आणि तिलाही मी माझा अंदाज कसा चुकत नाही ते ऐकवलं.  तासाभराने विमान उडालं.

हे विमान उडालं तरी भरवसा काय?  अॲकरेजला पोचेपर्यंत पोचलो तर पोचलो म्हणत अखेर आम्ही हवेत उडालो. तासाभरात ताणाचं प्रमाण इतकं वाढलं की प्रचंड भूक लागली. पोटपूजा होण्याची  नामोनिशाणी दिसेना. सात तासांच्या विमानात नुसते द्रव पदार्थ देऊन विमानवाले सकस आहाराचं महत्त्व पटवून देत होते. लेक फक्त पाणी पित होती आणि मी जितक्या फळांचे रस मिळतील तेवढे पित होते. खायला मिळणार नाही म्हटल्यावर पिण्याची इच्छा तीव्र! उतरलो की  कुठे खाता येईल याचे मनातल्या मनात मी बेत करुन टाकले. 

ॲकरेंजला लेक न्यायला आला तोच खुषीत.

"रात्रीच्या जेवणाचा प्रश्न मिटला. मी तुमच्यासाठी खायला करुन आणलंय. " 

"तू केलयंस?" या दोन शब्दांत तीव्र निराशा होती पण लेक स्वत:वर खूष होता. 

"हो. अलास्कात सगळं महाग असतं. बाहेर परवडणार नाही." आल्या विमानी परत जावं असं वाटायला लागलं. 

"बाहेरचं खायचं नाही मग काय मजा." मी फुरंगटले. मुलांनी सात्विक जीवनशैलीचे धडे दिले आणि मुकाट्याने हातात आलेलं घरगुती सॅडविच मी घशात घातलं. 

"बिंग बेंडला गेलो होतो तेव्हा दहा दिवस जे खाल्लं तेच परत?" आवंढा गिळत मी विचारलं.

"ते पिनट बटर होतं हे टोफरकी आहे." लेकाच्या नाकाला मिरच्या झोंबल्या.

"कसली फिरकी? काय तरी नावं पदार्थांची." मी टोफरकी तोंडात फिरवत पुढच्या दहा दिवसासाठी माझं तोंड तयार करत राहिले.

"अस्वलं असतात इकडे. फवारा घ्या. अस्वल आलंच समोर तर काय करायचं?" मी त्याला माकडचेष्टा करुन अस्वलाला पळवण्याचं प्रात्यक्षिक दाखवलं पण मुळात अस्वलांच्या जगात यायचंय कशाला असा कळीचा मुद्दाही उपस्थित केला.  अस्वल फवार्‍यासह आम्ही बाहेर पडलो आणि निसर्गात रममाण झालो. मुलाने सगळं ठरवलं होतं त्यामुळे सेंकदा सेंकदाला तो मस्त आहे ना असं विचारुन खात्री करत होता. अस्वल आगमनावर डोळा ठेवणं, लेकाने मस्त आहे का विचारण्याआधीच मस्त आहे म्हणणं यात इतकी तारांबळ उडाली. अलास्कात फक्त अस्वल नाहीतर मी फिरेन असं मी ठामपणे सांगितलं आणि तळ्याकाठी ठिय्या ठोकला. निसर्गसमाधी लावली. प्रत्येक दिवशी अस्वल दिसलं नाही की फवार्‍यासाठी खर्च केलेले ४० डॉलर्स अस्वलासारखे डोळ्यासमोर नाचायचे.

आम्ही प्रवासात भाड्याच्या गाडीने फिरतो आणि भाड्याच्या घरात तात्पुरते थांबतो. मुलं स्वयंपाकाचा ताबा घेतात आणि आठ - दहा दिवस सतत एकच पदार्थ खायला घालतात.  त्या एकाच पदार्थाला आम्ही रोजच्यारोज चविष्ट, मस्त, तू म्हणून इतके श्रम घेतलेस असंही म्हणतो. दर दोन दिवसांनी बाजाररहाट नावाचा एक कार्यक्रमही या प्रवासात असतो. जितकं अरबट चरबट दुकानात घेता येईल तेवढं मी घेते. फुकट गेलेली आई म्हणून मुलं नाकं मुरडतात आणि मुक्कामाला परत आलं की माझ्याआधी स्वत: सगळं फस्त करतात. 

"पुढच्यावेळी जरा चांगलं काहीतरी करा." टोफरकी तोंडात घोळवत मी पुटपुटले. होमर गावातून २ तासांच्या सफरीवर बोटीने जायचं होतं. धक्क्यावर भरपूर टपर्‍या आणि गंध दरवळत होते. आम्ही आपले टोफरकी खात बसलो होतो.

"आई, आपण खाण्यासाठी येत नाही फिरण्यासाठी येतो."  मुलं आलटून पालटून हे एक वाक्य फिरायला गेलो की कधीही ऐकवतात. 

"बरं, बरं आम्ही जरा बसतो इथे. तुम्ही या फिरुन बोटीची वेळ होईपर्यंत." मुलांची जोडी गेली आणि आम्ही नवरा - बायको ताडकन उठलो. आत्तापर्यंत  तो उगाचंच इकडे - तिकडे फिरत होता असं मुलांना वाटत होतं पण त्यांचा बाबा खाद्यपदार्थांची चाचपणी करुन आला होता.

"ती यायच्या आत उरकू." धक्क्यावरच्या सुग्रास पदार्थांच्या दिशेने आम्ही धाव घेतली,  ताव मारला. मुलं लांबून बघत असावीत. बाजूला येऊन उभी राहिली. 

"तुमच्यासाठीपण मागवलंय." मी साळसुदपणे म्हटलं.

"बिल." मुलाने  तरी आम्ही सांगत होतो नजरेने कागद फडफडावला. डोळे पांढरे व्हायची वेळ आली.

"तू किंमती बघितल्या नव्हत्यास?" अलास्कामध्ये प्रत्येक गोष्ट चौपट महाग असते. मुलांनी पढवलेली वाक्य म्हणत मी खाऊ की गिळू नजरेने  नवर्‍याकडे पाहिलं.

"तू खायला काय मिळतंय ते बघ, मुलांना पिटाळून गुपचूप खाऊ एवढंच म्हटलं होतंस." नवर्‍याने नेहमीप्रमाणे हात - पाय म्हणजे त्याचं जे काही या प्रकरणात अडकेल ते झटकलं.

"आता बोटीत काही मागवू नका." मुलाने त्याच्या मुलांना म्हणजे पालकांना सुनावलं. आम्ही माना डोलावून बोटीत खायला काय असेल याचा विचार करत राहिलो.

"कॅनाबिस कुठे मिळेल रे?" चमचमीत खाल्ल्याचे पैसे भरताना आमचे डोळे पांढरे झाले तसे कॅनाबिस विचारल्यावर मुलांचे डोळे विस्फारले.

"तुला गरज नाही. तू धुंदीतच असतेस नेहमी." नवर्‍याने त्याच्यामते सत्य सांगितलं आणि माझ्यामते नको तिथे नको ते बोलला. जागोजागी कॅनाबिसची छोटी छोटी दुकानं दिसायला लागली आणि मला प्रत्येकजण कॅनाबिस घेऊन गाडी चालवत असणार अशी शंका यायला लागली. आधीच अस्वल, मूस अशा प्राण्यांची धास्ती आता कॅनाबिस घेतलेल्या मनुष्यप्राण्यांचीही.  तेवढ्यात नवर्‍याने विचारलं.

"सारा पेलन कुठे राहते?" कॅनाबिसवरुन एकदम सारा पेलन!

"तिच्याकडे गेलं तर रशियाही दाखवेल ती आपल्याला." निवडणुकीच्या वेळी इतक्यावेळा ऐकलेलं होतं पेलनबाईंच्या अंगणात उभं राहिलं की रशिया दिसतं. आलोच आहोत तर बघावं.

"आपण फिरायला आलोय, सारा पेलनना बघायला नाही." सारा पेलनना भेटण्याचं नवर्‍याचं स्वप्न धुळीला मिळवलं. त्याने आपलं दु:ख निसर्गाच्या कुशीत लपवलं. निसर्ग हा असा असतो. कसंही करुन तो तुम्हाला आपलासा करतो. आजूबाजूचं जग विसरायला लावतो. आम्हीही कॅनाबिस न घेता धुंद झालो, रंगून गेलो!

 निसर्ग बोलला

 कवेत घे मजला!

 पृथ्वीसंगे प्रणय रंगला

 हिरवाईचा शेला खुलला!

 हिऱ्यानिळ्या जली डोंगर रमला

 हिम त्याच्या अंगी बागडला!

 भूलोकी सृष्टीचा देखावा सजला

 अलास्का स्वर्गीय गंधाने दरवळला!


(आम्ही अनुभवलं:

Matanuska Glacier guided tour, Exit pass glacier, Seward - Alaska Sea Life Museum, Kenaai Beach, Homer  - Rainbow Tour, Bishop Beach.

Alaska Wildlife Conservation Park, Denali NP.

निसर्गाच्या सानिध्यातून पुन्हा यावंसं वाटत नाही इतकं अलास्का सुंदर आहे. माणसांना माणसांची ओढ आहे. अगदी आपुलकीने स्थानिक गप्पा मारतात. राहण्याची ठिकाणंही रम्य होती. अलास्कामध्ये बहुतांश गोष्टी बाहेरुन येतात त्यामुळे सगळं  महाग आहे.)



Thursday, July 15, 2021

लेखक तुमच्या भेटीला

बृहनमहाराष्ट्र मंडळाच्या लेखक तुमच्या भेटीला या कार्यक्रमात मला भेटायला नक्की या.
भारतीय वेळ -  शनिवार, १७ जुलै, रात्री ९:३० वाजता. 
अमेरिका - शनिवार, १७ जुलै, सकाळी ११ CST.

Thursday, June 3, 2021

डॉ. गंगाधर आणि सुरेखा मद्दीवार

 जागतिक स्तरावर स्वयंसेवक म्हणून दीर्घकाळ कार्यरत असलेल्या अमेरिकेतील डॉ. गंगाधर आणि सुरेखा मद्दीवार यांच्या कार्याचा, अनुभवांचा दृकश्राव्य खजिना!

सेवाव्रती - डॉ. गंगाधर आणि सुरेखा मद्दीवार.
संवादक - मोहना जोगळेकर
काव्यपंक्ती - प्रमोद जोशी
गायन - ज्योती कुलकर्णी
शनिवार, ५ जून २०२१.
सकाळी ११ वाजता (EST)
भारत - रात्री ८:३० वाजता

नक्की पहा.

युट्युब दुवा: https://www.youtube.com/watch?v=e6k3FqrTxAw

Wednesday, March 17, 2021

त्सुनामी

"ती खूप आरडाओरडा करतेय. घरी घेऊन जाऊ शकाल का तिला?" हे शब्द ऐकले आणि काळजीत पडलेले आम्ही हसायलाच लागलो. नवर्‍याने फोन ठेवला,

"डॉक्टर म्हणतायत, ’त्सुनामी इज व्हेरी व्होकल.’ ती जवळ येऊ देत नाही कुणाला. घरी घेऊन जा. तुमच्या हातून नाही खाल्लं तरच परत आणा."  ’त्सुनामी’ हो, खरंच आमच्या मांजराचं नाव  त्सुनामी आहे. 

प्रत्येकाने हातातली कामं टाकली आणि एरवी आवरायला तास न तास लागणारी (मी सोडून) आमच्या घरातली मंडळी अक्षरश: दहाव्या मिनिटाला हॉस्पिटलसमोर उभे होतो. कोविडच्या काळातच बाईंनी केलेले उद्योग नडले होते. आत जायला परवानगी नव्हती. अर्धातास बाहेर वाट बघत उभे होतो. त्सुनामीला पिंजर्‍यातून बाहेर आणलं आणि बराच वेळ पंधरा दिवस त्सुनामीची काळजी कशी घ्यायला लागेल ते ऐकत होतो. त्सुनामीही पिंजर्‍यात निपचीत पडून होती. मी काहीतरी प्रश्न विचारला आणि  पिंजर्‍यात गडबड उडाली. त्सुनामीने आतमधून धडका द्यायला सुरुवात केली. वाघाची मावशी तेवढ्याशा जागेत सैरभैर होऊन गुरकावत होती.

"आपला आवाज आत्ता ऐकला तिने. आता नाही राहणार ती. चला, निघूया." आम्ही भरधाव वेगाने घरी पोचलो. कधी एकदा त्सुनामीची सुटका करतोय, तिला खाऊ घालतोय, जवळ घेतो असं झालं होतं. पिंजर्‍याचं दार उघडलं आणि बिचारीला तिच्या गळ्याभोवती बांधलेल्या नरसाळ्यामुळे पटकन आमच्याकडे येताही येईना. लेकीने भरून आलेल्या डोळ्यांनी आपला तळवा पुढे केला. तिच्या तळव्यावरचं खाणं हावरटासारखं क्षणार्धात त्सुनामीने गट्टही केलं.

’शी इज नॉट लेटींग अस टच हर ॲड नॉट इटींग’, ’शी इज व्हेरी व्होकल.’ आम्ही सगळेच डॉक्टरांची वाक्य जशीच्यातशी म्हणून त्सुनामीने त्यांना कसं नको जीव करून सोडलं असेल याची कल्पना करत होतो,  हसत होतो. एक दिवसही ती आम्हाला सोडून राहू शकत नाही, घरी आल्याआल्या कसं पटकन खाल्लं हे परत परत एकमेकांना सांगत होतो. तिच्या पुन्हा प्रेमात पडण्याच्या हा क्षण अवर्णनीय आहे. त्सुनामीच्या आमच्यावरच्या प्रेमाचा साक्षात्कार नव्याने झाल्यामुळे पुन्हा पुन्हा तिला जवळ घ्यायचा प्रयत्न करत होतो. तिला दोन आठवडे फिरण्याची, उड्या मारण्याची परवानगी नव्हती पण आम्हाला मात्र घरभर आनंदाने फिरावं, उड्या माराव्यात असं उत्कटतेने वाटत होतं. त्सुनामीला या सगळ्यातून का जावं लागलं हे सांगण्याआधी त्सुनामीचं आगमन आमच्याकडे कसं झालं ते सांगते.

"आणायचाच तर कुत्रा आणू तो माणसांवर प्रेम करतो. मांजरं फक्त  घरावर करतात." लहानपणापासून मांजरांना घर धार्जिणं हे ऐकलेलं.
"मांजरं स्वच्छ असतात. कुत्रे घाणेरडे." मुलीने पेचात टाकलं.
"असं असेल तर दोन्ही नको. इथे नियमपण खूप असतात." कुत्रा, मांजर की काहीच नको यावर बरीच चर्चासत्र झडली, गूगल चाचपणी झाली. लहानपणी आमच्याकडे खूप मांजरं होती, शेजार्‍यांचे किंवा आजूबाजूचे कुत्रे असायचे पण कायम वस्तीला असल्यासारखा प्राणी कधीच नव्हता. कोणता प्राणी येणार हे अखेर ठरलं. कुणाला तरी नको म्हणून किंवा त्यांचा छळ झाला म्हणून सुटका केलेल्यांपैकीच आणायचा हे मात्र एकमताने ठरलं होतं.  ’हयुमेन सोसायटी’ या संस्थेत शिरल्या शिरल्या कुत्रे आणि मांजरंच जिकडेतिकडे. मला पुन्हा कुत्रा हवासा वाटायला लागला. मांजरं तर काय आमच्याकडे होतीच लहान असताना पण माझ्या मनात हिचिकोचा पुतळा होता. मालकाचं निधन झाल्यावर त्याचा कुत्रा टोकियो स्थानकावर रोज ठरल्यावेळी वाट पाहत थांबायचा. हिचिको वारल्यावर तिथे आता त्याचा पुतळा आहे. मी तिथल्यातिथे मुलीला आणि नवर्‍याला कोपर्‍यात घेतलं.
"हे बघा आपण कुत्राच घेऊ."
"का पण? किती पटकन तू तुझी मतं बदलतेस." मुलगी एकदम माझ्या क्षणाक्षणाला बदलणार्‍या निर्णयांवर घसरली. आत्ता मला कुत्रा हवा होता त्यामुळे मी ते मनावर घेतलं नाही.
"मी मेल्यानंतर माझा पुतळा होण्याची कितपत शक्यता आहे?" मी दोघांच्या हृदयाला हात घातला.  निर्विकारपणे मुलगी म्हणाली.
"शून्य आहे अशी शक्यता. भलत्या आशेवर जगू नकोस."
"आम्हीच उभारू तुझा पुतळा. खूष?" नवरा आधीच मोठ्या मुष्किलीने कुत्र्या, मांजराचा वास सहन करत होता त्याला परिस्थितीतून पटकन सुटका हवी होती.
"ऐका ना. माझा नकोच पण माझ्या कुत्र्याचा पुतळा झाला तर चालेल." 
"अच्छा अच्छा हिचिकोसारखं. आई, अगं त्याचा मालकपण किती प्रेमळ होता." घरात मुलगी असण्याचा आनंद पुन्हा नवर्‍याच्या चेहर्‍यावर झळकला. माझा कुत्र्याचा आग्रह बाजूला फेकला गेला.

मांजरामागून मांजरं आम्ही बघितली. सगळीच आवडत होती पण घ्यायचं एकच होतं. आम्हाला विल्सन आवडला. तसा अर्ज आम्ही भरला. हो. अर्ज. अगदी उत्पन्नासहित सर्व माहिती त्यात भरणं आवश्यक. आता एकदा का हा अर्ज कार्यकारिणीच्या डोळ्याखालून गेला की आलाच विल्सन आमच्याघरी असं म्हणत आम्ही घरी परत आलो.
"एका दिवसात कळवतो आम्ही." असं त्यांनी सांगितलं आणि आवश्यक गोष्टींची यादी हातात दिली.  तशी गडबडच उडाली. नवजात बालकाच्या आगमनासारखीच ही तयारी होती. डॉलर्सचा आकडा जसा वाढत होता तशी माझी कुरकूरही.
"आमच्याकडे मांजरं खोक्यात राहायची. गोणत्यात घालून आणायचो. दूध, पोळी जे घालू ते खायची. तुम्ही अमेरिकन फारच स्तोम माजवता प्रत्येक गोष्टीचं." माझं अमेरिकनत्व आणि भारतीयत्व मी सोयीप्रमाणे वळवते हा मुद्दा यायच्या आत मी विल्सनच्या गुणगानाला सुरुवात केली. सांगितलेलं सामान धावाधाव करून आणलं. आता प्रतिक्षा सुरू. फोन काही येईना. चौकशीसाठी फोन केला. उडवाउडवीची उत्तरं मिळाली. मोठ्या मुष्किलीने दोन दिवस वाट पाहिली. तिसर्‍या दिवशी मुलीने बाबाला विल्सनला आणायलाच पाठवून दिलं. बाबा हात हलवत परत आला. "विल्सन कुठे आहे?" एखादा मुलगाच आणायला गेल्यासारखं मला सारखं विल्सन नावामुळे वाटत होतं.
"नाही देत ते विल्सन आपल्याला." बाबा आता त्याचे फक्त हातच हलवत नव्हता, निराशेने मानही उजवीकडून डावीकडे, डावीकडून उजवीकडे वळत होती.
"का पण?" विल्सन आपल्या आयुष्यात येणार नाही या कल्पनेनेच मुलीच्या काळजाचे शतश: तुकडे झाले. "माझ्यामुळे." आता खरंतर मला वाईट वाटायला हवं होतं पण नवर्‍यामुळे काहीतरी बिघडलं याचा आनंदच झाला. कारणं मरू देत. मुलीच्या हातून आता तो काही सुटत नाही हे तर समोरच दिसत होतं. विल्सनला विसरून जुगलबंदीवर मी लक्ष केंद्रित केलं.
"तू काय केलंस?" मुलीचा स्वर बाबाने नेहमीप्रमाणे काहीतरी घोळ घातला असाच होता. 
"मी प्रश्न विचारले होते त्यांना. आठवतंय?" बाबाने लेकीलाच विचारलं.
"काय विचारलं होतंस?"
"मला प्राण्यांच्या वासाने शिंका येतात असं सांगितलं होतं आणि खूप त्रास झाला तर विल्सनला परत आणून दिलं तर चालेल का असा प्रश्न विचारला होता. आठवलं?"
"हो. पण त्यांनी सांगितलं होतं तुमच्या शंका बिनदिक्कत विचारा. तुझी शंका बरोबर होती." मुलीने चक्क बाबाची बाजू घेतली त्यामुळे मलाही त्याचं बरोबर आहे हे पटलं. 
"म्हणूनच विल्सन येणार नाही." तो पडेल स्वरात म्हणाला.
"तू भांडला नाहीस त्यांच्याशी? आपण किती तयारी केली." मुलीचा चेहरा एवढुसा झाला. आम्ही तिलाच एकदा त्यांच्याशी बोलायला सांगितलं. पंधरा वर्षाच्या मुलीचा आवाज ऐकून बहुतेक त्यांनाही पाझर फुटला. विचार करून उद्या कळवतो असं आश्वासन तिला मिळालं. अस्वस्थ मनाने लेकीने इतर ठिकाणं शोधून काढली. तिचं मन मोडायचं नाही, एवढासा झालेला चेहरा जरा फुलेल म्हणून आम्हीही मांजरं बघायला बाहेर पडलो.
"इथे ’विंडो शॉपिंग’ च करा नाहीतर दोन दोन मांजरं घरी. लगेच देणार नाहीत ना?" विल्सन येईलच घरी असं माझं मन सांगत होतं.
"बोका आणि भाटी अशी जोडी बिलकूल नको. नाहीतर त्यांची बाळंतपणं आणि मग पिल्लाचं काय असा प्रश्न पडतो." मी माझी भूमिका कधी नव्हे ती ठामपणे मांडली.
"पिलं नाही होणार. आधीच ऑपरेशन करतात." मुलीचं दांडगं संशोधन होतं तर.
"आणि लगेच नको आणायला. बघून ठेवू. विल्सनचं समजलं की ठरवू." मी पुन्हा पुन्हा हे सांगून तिच्या मनाची तयारी करत होते.
"तोपर्यंत एखादं मांजर आवडलं आणि  गेलं तर?" मुलीला आता काही झालं तरी मांजर हवंच होतं.
"सगळी सारखीच तर दिसतात. ते गेलं तर दुसरं." या विधानाने काय घोडचूक केली ते लक्षात आलं.  रंग, जाती, वागणं, दिसणं यावर चर्चासत्र झालं आणि त्यानंतरच आम्ही बाहेर पडलो.

या संस्थेत दाराशीच दोन मुली चेहरा पाडून बसल्या होत्या.
"बघ, बहुतेक त्यांच्या आई - बाबांना मांजर हवंय. दोघींना ओढून आणलंय त्यांनी. मला आणलंत तसं. " मी पुटपुटले."त्या मांजर परत करायला आल्यायत." मुलगी कुजबुजली. माझा जीव एकदम भांड्यात पडला. नाही म्हटलं तरी मांजराला आम्ही रुळलो नाही, मांजर आम्हाला रुळलं नाही तर काय ही चिंता होतीच.
"बाबाच्या शिंका वाढल्या तर आपल्याला काळजी नाही." मी निःश्वास टाकून म्हटलं.
"तुम्ही ’एशियन’ घ्यायच्या आधीच परत कसं करता येईल याचा विचार का करता? प्राण्यांना तरी सोडा यातून." यात मला कितीतरी मुद्दे चुकीचे दिसत होते. जसं ती सगळ्या एशियन्सना एकाच पारड्यात टाकत होती.  चायनिजांपेक्षा स्वत:ला उच्च समजणार्‍या भारतीयांचा घोर अपमान त्यामुळे होत होता. स्वत:ला कट्टर ’अमेरिकन’ समजत होती. मांजर महत्त्वाचं होतं म्हणून मी मांजरांच्या दिशेने तोंड वळवलं. वेगवेगळ्या रंगांची, आकाराची, चेहर्‍याची मांजरं बघताना प्रेमातच पडायला झालं. आता घरातल्या सर्वांनी एकाच मांजराच्या प्रेमात पडलं तर काही बिघडलं असतं का? लगेचच तिघांना तीन वेगवेगळी मांजरं आवडली.
"दादाला फोन करून दाखवून घे नाहीतर त्याचा पापड मोडेल." मी गुंता आणखी वाढवत होते पण लेकीने लगेच जाहीर केलं.
"तो कुठे आपल्याबरोबर राहतो. मांजर माझं आहे. मी कॉलेजमध्ये जाताना बरोबर घेऊन जाणार."
"आधी मांजर येऊ दे घरी मग कॉलेजमध्ये नेण्याच्या गोष्टी." लेकीच्या उत्साहाला आवर घालत आवडलेलं मांजर त्यांच्या पिंजर्‍यातून काढण्याचा, त्यांनी आम्हाला बोचकारण्याचा, म्याव करून रागारागाने बघण्याचा कार्यक्रम पार पाडला.
"हेच, हेच मांजरांचं मला आवडत नाही. फारच फिस्कारतात." मी अगदीच नाराज झाले.
"म्हटलं की करा प्रेम अशी नसतात ती कुत्र्यांसारखी. स्वत:चं मत असतं त्यांना." लेकीने मांजरांचं समर्थन केलं.
"मांजरांना? मला वाटलं फक्त तुलाच असतं स्वत:चं मत." मी हळूच पुटपुटले. तिने लगेच तिचं मत जोरात व्यक्त केलं.
"असायलाच हवं आणि ते मांडताही आलं पाहिजे. सापांनासुद्धा स्वत:चं मत असेल." मी बघतच राहिले.
"साप कुठे आला आता यात? मांजरं पुरे की." प्राण्यांचा मित्रमेळावा जमेल की काय थोड्याच दिवसात या कल्पनेनेच धास्तावले मी.
"मांजर अडवतं सापाला असं तू सांगतेस ना नेहमी म्हणून साप आठवला. तोही मांजराला विरोध करतच असेल ना?"
"मला नाही बाई माहीत. मी कधी त्याला बोलावलं नाही मुद्दाम हे तपासायला." माझ्या निरागस वक्तव्यावर ’मूर्ख कुठली’ असा तिने चेहरा केला आणि मांजराला जवळ ओढलं. फोटाफोटी झाली, दादाला फोटो पाठवून त्याला आवडेल ते मांजर घ्यायचा निर्णय झाला.
"इथपर्यंत यायचं आपण, बघायची आपण आणि फोटोवरून ठरवणार तो?" हा अन्याय होता पण लोकशाहीत मतदानाने जिंकता येतं त्यामुळे त्या एका मतावर तीन मांजरांचं भविष्य अवलंबून होतं.
"हनीबनी" लेकाने शिक्कामोर्तब केलं. मी मनातल्या मनात आनंदाने उड्या मारल्या. वरवर म्हणाले,
"हनीबनी काय किंवा तुम्हाला आवडलेली मांजरं काय. शेवटी एका प्राण्याला घर मिळणं महत्त्वाचं."
"खोटारडी." लेक पुटपुटली तरी ते ऐकू न आल्यासारखं केलं.
"उद्याशिवाय मिळणार नाही ना? अर्ज भरायचा असेल ना? विल्सनचंही समजेल तोपर्यंत." मी खात्री करणार त्याआधीच हे प्रश्न विचारायला लेक गेली आणि आली ती उड्या मारतच.
"लगेच देतायत."
"नको, नको. लगेच नाही नेता येणार आपल्याला. विल्सनलापण आणायचं झालं तर?" तीन माणसांच्या घरात दोन मांजरांचा धुमाकूळ मला  दिसायला लागला.
"ते बघू नंतर." हनीबनीला आता घरी न्यायचं हेच लेकीने ठरवलं. बोका आणि भाटी घरात येणार या धास्तीत मी असतानाच हनीबनी तिच्या परडीत विसावलीही. एवढुशी. चार महिन्यांची. कागदपत्र भरत असतानाच दिडशे डॉलर्स देऊ ना असं विचारत नवर्‍याने  पैसे भरलेही.
"मला वाटलं फुकट आहे."
"तुला सगळंच फुकट पाहिजे असतं." मुलीने हटकलं.
"कुणालातरी नको म्हणून आपण घेऊन जातोय ना." दिडशे डॉलर्स माझ्या डोळ्यासमोर नाचत होते.
"आपल्याला हवी आहे हनीबनी म्हणून आपण घेऊन जातोय ना." लेकीने खडसावलं.
"दिडशे काय, तीनशे दे. माझ्या बापाचं काय जातंय." मी म्हटलं. नवरा लगेच पुढे झाला,
"तुझ्या बापाचं गेलं तर तिला काही फरक पडत नाही." त्याने लेकीला समजावलं.
"बाप म्हणजे काय?" लेकीने शांतपणे विचारलं. उत्तर देण्यातला फोलपणा लक्षात आला आणि हनीबनीला घेऊन आम्ही निघालो.

घरी येऊन हनीबनीच्या कौतुकात आम्ही मग्न होतोय तेवढ्यात विल्सनच्या घरून फोन खणखणला. माझ्या काळजाचा ठोकाच चुकला.
"आता?" मी धसकून विचारलं.
"आधी बघा तर काय म्हणतायत." तेवढ्यात व्हिडिओ कॉलवरून हनीबनीचं कौतुक करण्यात मग्न असलेले पुत्ररत्न म्हणाले.
"न्या म्हणत असतील तर आणूया विल्सनलाही. एखाद्याच्या तोंडचा घास नको हिरावून घ्यायला." मांजरच नको म्हणणारी मी विल्सनलाही आणायला तयार झाले. मुलीला दोन- दोन मांजरं घरात येणार म्हणून अपरिमित आनंद झाला. तिनेच फोन घेतला. काय बोलणं चालू आहे हे तिच्या चेहर्‍यावरुन लक्षात येत होतंच. 

"जाऊ दे. आपल्याकडे हनीबनी आहे ना." त्यांचा नकार तिला पचवता यावा म्हणून आम्ही म्हटलं आणि हनीबनीचं बारसं करू, नाव बदलू असंही सुचवलं. तिच्या मित्रमैत्रिणींना म्हणायला सोपं पाहिजे म्हणून मराठी नको हे जसं ठरलं तसं इंग्रजी नको हेही. नावाचा शोध सुरू झाला आणि अचानक  कधीतरी  त्सुनामी ठरलंही. पाहता पाहता त्सुनामी आम्हाला रुळली आणि आम्ही तिला. कुत्रा, मांजर कुणाच्या घरी पाहिल्यावरही नाकं मुरडणारे आम्ही त्सुनामीच्या प्रेमात पडलो. त्सुनामीच्या फिस्कारण्याचं, शेपटी हलवण्याचं, मागे मागे फिरण्याचं घरातल्या लहान मुलासारखं कोडकौतुक व्हायला लागलं. त्सुनामी लाडाने बिघडली आहे असं म्हणत एकमेकांकडे बोटही दाखवायला लागलो. कुत्रा आणि मांजर यांची तुलना अधूनमधून होत राहिली तरी ती उगाच एकमेकांना चिडवायला. त्सुनामीचं घरभर हैदोस घालत धावणं, तिच्या झाडावर सरसर चढणं, उंटासारखी पाठ करत आम्हाला तिच्याशी खेळायला लावणं यात रमून गेलो. पाहता पाहता वर्ष झालंही त्सुनामी आमच्या घरात येऊन.

सकाळी उठल्या उठल्या तिचं पायात येणं इतक्या सवयीचं झालं की ज्या दिवशी ती तशी आली नाही तेव्हा अगदीच अस्वस्थ व्हायला झालं. वाटलं, काहीतरी खाल्लं असेल, पोट बिघडलेलं दिसतंय. नंतर मात्र ती बसल्या जागेवरून उठेना. घाबरल्यावर प्रतिकारासाठी अंग फुलवतात तसं संपूर्ण शरीर फुललेलं. काय करावं कळेना. आम्ही डॉक्टरांकडे धावलो. एक्सरेतून तिने काय खाल्लं असेल ते काही कळेना. औषधं देऊन एक दिवस वाट पाहायचं ठरलं. रात्री आम्हाला उगाचच थोडं खातेय, बरी दिसतेय असं वाटत होतं. बहुतेक आमच्या मनाचं समाधान. तिने काहीतरी खाल्लं आहे हे नक्की होतं त्यामुळे ते काय या विचाराने हैराण झालो. ती पडलेलं काही खाईल अशी शक्यताच वाटत नव्हती कारण तसं आमच्या घरात प्रत्येकजण नीटनेटका असल्याने पसारा असा नसतोच. मग खालं काय, कुठे आणि कधी? उत्तर सापडत नव्हतं. दुसर्‍या दिवशी पुन्हा डॉक्टर. एका रात्रीत त्सुनामी इतकी हवालदिल झाली होती. हात लावू देत नव्हती, आवाज फुटत नव्हता. सकाळी माझ्या पायाशी येऊन बसलीच. डोळ्यात पाणी. आमचा जीव अगदी तुटला.  अपराधीही वाटत होतं. आपल्या हलगर्जीपणामुळे तिच्या पोटात काहीतरी अडकलं ही भावना फार वेदनादायी. आता डॉक्टरांनी वाट पाहू असं सांगितलं तरी आम्हाला थांबवेना. आमच्या डॉक्टरनी हॉस्पिटलमध्ये न्यायला सांगितलं. कोविड१९ मुळे अर्थातच आम्हाला आत प्रवेश नव्हता. 

एकदा तिला आत सोडल्यावर रात्री बारा वाजता नर्सकडून; शस्त्रक्रिया झाली आणि फोमचा तुकडा पोटातून काढला हे कळलं.  हा फोमचा तुकडा कुठे होता या विचाराने आम्ही हैराण. विचार करकरूनही लक्षात येईना. त्सुनामीबरोबर जेव्हा तो तुकडाही आला तेव्हा सारा उलगडा झाला. अधूनमधून ती कोट, स्वेटरच्या क्लॉजेटमध्ये जायची. तिथे मायक्रोव्हेव कार्टच्या मागे फोमची चटई होती. त्सुनामी जेव्हा जेव्हा तिथे जाई तेव्हा ती चटई कुरतडत असणार. आम्हाला  त्याचा पत्ताच नव्हता. मोठा तुकडा गेल्यावर कोणत्याच मार्गाने तो बाहेर पडेना. क्षकिरणांनीही (X - ray) काय खाल्लं ते कळलं नव्हतं.  अखेर शस्त्रक्रिया हाच शेवटचा मार्ग होता. शस्त्रक्रियेचा खर्च ऐकताना क्षणभर मन द्विधा झालं होतं पण खर्चापेक्षा तिचा जीव वाचणं महत्त्वाचं होतं, वेदनामुक्त होणं आवश्यक होतं. विमा न घेतल्याचा पश्चात्ताप झाला. भारतातल्या मांजरांच्या अनुभवांवरून आम्हाला तशी गरजच वाटली नव्हती. तिथली मांजरं दिवसभर घरात नसायची हे आम्ही विसरलोच होतो. 

"तिला घेऊन जा घरी. शी इज व्हेरी व्होकल ॲड नॉट लेटिंग अस टच." या वाक्याने आम्ही गहिवरलो तेवढ्यात पुढच्या
"तिने काहीतरी खाणं आवश्यक आहे. तुमच्या हातून खाईल. नाहीच खाल्लं तर परत आणा." या शब्दांनी आपल्या हातून नाही खाल्लं तर अशी भितीही वाटायला लागली. तिला परत आणतानाही तेच मनात होतं.

"काळजी करू नकोस आई. खाईल ती घरी आली की." लेकीने आश्वासन दिलं. घरी पोचलो. पिंजर्‍याचं दार उघडलं. त्सुनामीला तिच्या गळ्याभोवती बांधलेल्या नरसाळ्यामुळे पटकन आमच्याकडे येताही येईना. लेकीने भरून आलेल्या डोळ्यांनी आपला तळवा पुढे केला. तिच्या तळव्यावरचं खाणं हावरटासारखं क्षणार्धात त्सुनामीने गट्टही केलं आणि लेकीला, आम्हाला ती पुन्हापुन्हा चाटत राहिली. त्सुनामीच्या आणि आमच्या नात्यातले बंध नव्याने आम्हाला  कळले आणि  त्याक्षणी हजाराच्या आकड्यात केलेला तिच्या शस्त्रक्रियेचा खर्च अगदी क्षुल्लक वाटून गेला.












Monday, March 1, 2021

श्री ठाणेदारांची मुलाखत - youtube

 शनिवारी श्री ठाणेदारांची घेतलेली मुलाखत म्हणजे आनंदाचा ठेवा!  कितीतरी गोष्टींना वेळेअभावी फक्त स्पर्श 


करता आला.  २००५ साली ही ’श्री’ ची इच्छा हे पुस्तक हातात पडलं तेव्हा विलक्षण भारावून जायला झालं होतं. त्यांच्यासारखाच आपणही काहीतरी भलाथोरला उद्योगधंदा उभारावा असंही वाटून गेलं होतं. वेळेअभावी तो विचार लवकरच बाजूला पडला :-) पण पुस्तक मात्र कायमचं मनातला एक कोपरा अडवून राहिलं.

मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने मी  त्यांना त्यांच्या पुस्तकातला एखादा उतारा वाचून ते चित्रीत करुन पाठवतील का असं विचारलं आणि ते मुलाखतीसाठीच तयार झाले. इतकंच नाही तर त्यांचं दुसरं पुस्तकही ताबडतोब मला पाठवून दिलं. अधाशासारखी दोन्ही पुस्तकं मी परत वाचली. ठाणेदारांच्या जीवनप्रवासाने अचंबित होत राहिले. दीर्घकाळ लक्षात राहील अशी ही मुलाखत मला घ्यायला मिळाली याबद्दल ठाणेदारांचे मन:पूर्वक आभार. या निमित्ताने त्यांच्याशी आधी आणि नंतर झालेल्या गप्पा म्हणजे सकारत्मकतेचा आणि उत्साहाचा उत्सव!

ही मुलाखत पाहून त्यांची पुस्तकं वाचण्याची इच्छा कितीतरीजणांना व्हावी ही इच्छा आणि पुस्तकं वाचायची असतील तर मुलाखत पाहिली नसेल तर पाहा आणि प्रतिक्रियेत इमेल नोंदवा. पुस्तक लगेच तुमच्यापर्यंत पोचेल. श्री ठाणेदारांनी दोन्ही पुस्तकं तुमच्यासाठी उपलब्ध करुन दिली आहेत. विनामूल्य!

Youtube:

https://www.youtube.com/watch?v=MxQsMDgRfBs

Facebook:

https://www.facebook.com/CharlotteMarathiMandal/videos/1037898120037119/  


Wednesday, February 24, 2021

श्री ठाणेदार यांची मुलाखत - २७ फेब्रुवारी सकाळी ११ वाजता (EST)

 वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात विलक्षण चढ उतारांना जिद्द, चिकाटीने सामोरे गेलेले श्री ठाणेदार हे नाव सुपरिचित आहे ते त्यांची ही कहाणी सांगणार्या पुस्तकांनी. व्यवसाय, लेखन आणि आता राजकारण अशा वेगवेगळ्या प्रांतात आपल्या नावाची मोहोर उठवणार्या या व्यक्तिमत्त्वाला भेटू या २७ तारखेला ११ वाजता (EST) मराठी भाषा दिनानिमित्त!

शनिवार, दिनांक २७ फेब्रुवारी
वेळ - सकाळी ११ वाजता (America - East Coast Time )

Thursday, December 24, 2020

३५०० मैल

 ९ दिवस आणि ३५०० मैल गाडी हाकायची ठरली तेव्हा मी माझं Big Bend नावाचं राष्ट्रीय उद्यान घरातल्या घरातच करायचं ठरवलं पण दरवर्षीच्या नेमामध्ये कोविड काळ येऊ न देता कमी गर्दीच्या ठिकाणी जायचं, विमानाने न जाता गाडीने प्रवास करायचा या विचारावर मुलं ठाम होती. शेवटी गाडी कशी चालवायची याबद्दल हजार सूचना तोंडी दिल्यावर माझं समाधान झालं पण सूचना लिखित पाहिजेत अशी सूचना आली. त्यात ६ क्रमांकावर ओरडत बसायचं नाही ही सूचना मुलांनी घुसडवली आणि हल्लीच गाडी शिकलेल्या मुलीने घरातली ती सर्वोत्कृष्ट वाहन चालक असल्याचा निर्वाळाही दिला. 

गाडी प्रकरण संपतय तेवढ्यात कोविड काळ अंगावर आला. बाहेरचं खायचं नाही म्हणून जिथे जाऊ तिथे स्वयंपाक आपला आपणच करायचं ठरलं! स्वयंपाक आपला आपणच म्हटल्यावर पुन्हा माझा उत्साह थंडावला. बाहेर खायचं नाही तर कशाला करायचा प्रवास? माझ्या कुरकुरीला थोपवण्यासाठी मुलांनी स्वयंपाकाची बाजू सांभाळण्याची जबाबदारी स्वीकारली आणि पुढचे ९ दिवस एकावेळच्या जेवणात आम्ही रोज  दोन पिनट बटर सॅडविचेस खाल्ली. आई उगाचच बाऊ करते हे वाक्य प्रत्येक सॅडविच खाताना ’डेझर्ट’ म्हणून मला ऐकायला लागलं. 

दिवस पहिला - देशाच्या आरोग्यखात्याच्या सूचना तंतोतत पाळल्या या एका वाक्यात आमची तयारी सर्वांच्या लक्षात यावी.  शार्लट ते बर्मिंगहॅम राज्यातील अलाबामा. हा ६:३० तासांचा प्रवास आहे. गर्दीमुळे ८ तास लागले. वाटेत देहधर्म उरकायला गवतात जायचं की विसाव्याच्या थांब्यांवरचा माणसांचा संपर्क खपवून घ्यायचा याबाबतीत निश्चित धोरण ठरत नव्हतं. गाडीत आवाजांचं प्रदुषण वाढल्यावर ज्याने त्याने मग स्वत:चं धोरण स्वीकारण्याबाबत एकमत झालं. ८ तासांनी आम्ही अंग टाकायला Airbnb मध्ये म्हणजे राहण्याच्या ठिकाणी पोचलो. Airbnb च्या घर मालकाने कोविडला अनुसरुन घर आधीच ’सॅनेटाइझ’ केलेलं होतं. तरीही घरात पाऊल टाकल्याटाकल्या बरोबर घेतलेले ढीगभर ओले कागद (wipes) वापरुन पुन्हा स्वच्छ केलं. धुतलेली भांडी पुन्हा धुतली. मुलाने स्वयंपाक करण्यासाठी बाह्या सरसावल्या आणि कसलेल्या आचार्‍यासारखा पास्ता केला. मुलीने दुसर्‍या दिवशीच्या जेवणाची व्यवस्था (पिनट बटर सॅडविच) करुन टाकली.  जे घडेल ते पाहायचं, मिळेल ते गोड मानायचं हा मंत्र मी पाठ करत राहिले. रात्री पलंगावर पाठ टेकली ती पहाटे उठायचं आहे हे मनाशी घोळवत.

दिवस दुसरा - बर्मिंगहॅम ते टेक्सास राज्यातील क्लेबर्न. हा प्रवास १० तासांचा आहे. विरंगुळ्याचे क्षण निर्माण करणं भागच होतं.  मराठी शब्दांची अंताक्षरी खेळायचं ठरलं. मुलांचं मराठीचं ज्ञान उघडं पडल्यामुळे इंग्रजी शब्दांची अंताक्षरी खेळू या असं त्यांनी आव्हानच केलं. तिथे आमचं ज्ञानप्रदर्शन झालं. मुलं आणि पालक दोघांनाही फिट्टमफाट झाल्याचं समाधान या खेळाने दिलं. मुलांना मग देशांच्या नावाची अंताक्षरी खेळायची हुक्की आली.  काहीकाही देश नविनच निर्माण झाले आहेत की काय असं मला वाटलं. असतील बापडे असं मनात म्हणत मीही एकदोनदा माणसांची नावं घेऊन अशा नावांचे देश आहेत असं ठोकून दिलं. मुलांनाही हे नविनच देश असावेत असं वाटलं.  अंताक्षरी संपल्यावर  कुणीतरी टुम काढली, घरातल्या प्रत्येकाचा एकेक चांगला गुण आणि सुखद प्रसंग सांगण्याची. गाडीत अचानक शांतता नांदायला लागली ती मुक्कामाला पोचेपर्यंत. १० तासांनी क्लेबर्नमध्ये पोचलो तेव्हा गाडीतून सामानही काढायच्या आधी मी पर्समधून कॅमेरा काढला. हे घरच इतकं सुंदर होतं की सगळं काही टिपावं असं वाटत होतं. फोटोच फोटो काढून झाले; म्हणजे मी एकटीने काढले. कुणालाही त्यात रस नव्हता. लेक निसर्गाचे फोटो काढतो. फोटोत माणसं असल्याशिवाय निसर्ग कोणत्या गावचा ते कळत नाही हे काही त्याला पटत नाही. माणसं असलेला निसर्ग टिपण्यासाठी नाकं मुरडत  माझं सामानही खोलीत नेणार्‍या लेकरांची आणि नवर्‍याची छायाचित्र मी टिपली आणि पुन्हा एकदा पास्ता खाऊन आम्ही निद्राधीन झालो.

तिसरा दिवस - क्लेबर्नमधून टेक्सास राज्यातील सॅन्डरसन गावाकडे गाडी पळवायला सुरुवात केली. ५:३० तासांचा प्रवास. सुरळीत! काहीच घडलं नाही. ती वादळापूर्वीची शांतता होती हे संध्याकाळीच लक्षात आलं. सॅन्डरसनपासून मेक्सिको अगदी शेजार्‍याचं घर बघावं इतकं जवळ आहे. थोडे ताजेतवाने झालो आणि शेजार्‍याचं घर बघण्यासाठी पुन्हा तासभर प्रवास केला.  सुकलेली नदी पार केली की तिच्यापलिकडे दिसणारी खिंड म्हणजे मेक्सिको. मेक्सिको तिथून सुरु होत असलं तरी त्या बाजूला मानवी वस्ती नाही. हाताच्या अंतरावर मेक्सिको आहे ही भावना निर्माण होते इतकंच आणि तसंही कुणी जायचा प्रयत्न केलाच तर ते बेकायदेशीर आहे. भणाणत्या वार्‍यात आमची चार डोकीच तिथे होती. बाकी सारा उजाड माळ. उगाचच गस्त घालणारे कुणीतरी येतील,  बेकायदेशीरपणे मेक्सिकोतून अमेरिकेत प्रवेश केल्याबद्दल आम्हाला पकडतील असं वाटण्याएवढं गुढ वातावरण होतं. पलिकडे दिसणार्‍या मेक्सिकोच्या कातळाला चौकटीत बंदीस्त करण्यासाठी कॅमेरा काढला. ’फोटो’असं म्हटल्याम्हटल्या मुलांनी डोळे वटारले. "फोटो, फोटो काय सारखं. त्या क्षणाचा आनंद घ्यायचा असतो." आठवणी अशाच फोटोतून जपायच्या असतात, आता एकही फोटो काढणार नाही तुमचा असं ठणकावून सांगत तिघं पाठमोरे असतील तेव्हा फोटो काढायचे असं मी ठरवून टाकलं. बघत बसा स्व:ताच्या पाठी असंही मनातल्या मनात खिजवलं. ती रात्र Big Bend आता हाताच्या अंतरावर आहे या जाणीवेने आणि तीन दिवसांचा प्रवास सुखरुप पार पडल्याच्या आनंदात गेली. 

चौथा, पाचवा आणि सहावा दिवस - Big Bend राष्ट्रीय उद्यान - कोविड विचारात घेऊन मुद्दाम आम्ही हे ठिकाण निवडलं होतं. बर्‍याचदा रस्त्यावरुन फक्त आमचीच गाडी धावत होती. मैलोनमैल वस्ती नाही त्यामुळे इतर सोयीसुविधाही नाहीत. (पेट्रोल पंपावरच्या बाथरुम मात्र  सगळीकडे अतिशय स्वच्छ होत्या) याच कारणामुळे देशातील इतर ठिकाणांपेक्षा इथे तुलनात्मक गर्दी कमी असते असं मुलांनी शोधून काढलं होतं. खरंच गर्दी कमी होती. काही जागा कोविडमुळे बंद होत्या. तीन दिवस आता बाहेरचं जग विसरायचं होतं. निसर्ग हात पसरुन आजूबाजूला उभा होता त्याच्या कुशीत शिरलो.  निसर्गमय झालो.  मैलोनमैल पायी तुडवले, डोंगरमाथ्यांवर चढलो, नदीच्या पात्रात उड्या मारल्या,  डोंगरांनी वेढलेल्या मैदानावर तंबू (Tent) ठोकून राहिलो. रात्री ३ वाजता उठून तारांगण पाहिलं.  वाळूत आडवं पडून नजर तार्‍यांवर ठेवली की हळूहळू आपणच तारा होऊन गेल्यासारखं वाटायला लागतं तो अनुभव अविस्मरणीय आहे.  या राष्ट्रीय उद्यानातून मेक्सिको अगदी हाताच्या अंतरावर आहे हे सतत जाणवत राहतं. राष्ट्रीय उद्यानात पलिकडून मेक्सिकन प्रवेशही करतात पण जरी प्रवेश केला तरी उद्यानातून अमेरिकेच्या दिशेने बाहेर पडणं अशक्य आहे. जागोजागी चौक्या आहेत, रस्त्यावरही गस्त घालणार्‍या गाड्या दिसतात. उद्यानात काही ठिकाणं अशी आहेत की रितसर नदी ओलांडून होडीतून पलिकडे जाताही येतं.  तिथे पोचल्यावर पासपोर्टची आवश्यकता असते. कोविडमुळे सध्या हा मार्ग बंद केलेला आहे. मात्र मेक्सिकोतले विक्रेते होडीतून येऊन वस्तू विकायला ठेवतात पण तिथे थांबत नाहीत. वस्तूंबरोबर तिथेच ठेवलेल्या पांढर्‍या बाटलीत आपण पैसे ठेवायचे आणि वस्तू घ्यायची. दरही त्यावरच लिहिलेले होते.  हा दोन्ही बाजूंचा प्रामाणिकपणा अचंबित करणारा आहे. यातल्याच एका मार्गावर  नदीच्या पलिकडून मेक्सिकन लोक खाद्यपदार्थ विकत होते. काठावरुन आपण आपल्याला काय हवं ते सांगायचं (बोंबलायचं). त्यानंतर ते होडीतून  पदार्थ आणून देतात. भारतातल्या अनेकांना प्रश्न पडतो की ट्रम्पनी जी भिंत बांधली ती कुठे? खरंतर कुठेच नाही. जी बांधली ती अतिशय कमी लांबीची आहे. आधीच्या भिंतीची डागडुजी केली आहे त्याचाही समावेश ते त्यांनी बांधलेल्या ’भिंती’ त करतात. दुसरं म्हणजे ते जी भिंत बांधणार होते ती कॅलिफोर्निया राज्यात. त्यातलं तथ्य, वस्तुस्थिती ’गुगल’ केल्यावर कळेलच. आम्ही गेलो होतो टेक्सास या राज्यात. गर्दी टाळून पहाडांचं दर्शन घ्यायचं,  वाळवंट तुडवायचं, खिंडी आणि घळी पाहायच्या, त्यातून भटकायचं याचा अनुभव घ्यायचा असेल तर पुन्हा पुन्हा जावं असं आहे हे Big Bend नावाचं राष्ट्रीय उद्यान. Big Bend  हे नाव आग्नेय दिशेकडून ईशान्य दिशेकडे वाहणार्‍या नदीच्या प्रवाहाने निर्माण झालेल्या खिंडी, घळी, पहाड तसंच अमेरिका आणि मेक्सिको या नदीमुळे दुभागला गेला आहे त्यामुळे पडलेलं आहे.

सातवा दिवस - तीन दिवस उंडारुन, उनाडून अगदी ताजंतवानं व्हायला झालं. कोविडच्या वातावरणामुळे आलेली मरगळ कुठल्याकुठे पळाली. परतीचा प्रवास आम्ही वेगळ्या मार्गाने करणार होतो.  राष्ट्रीय उद्यानातून निघालो ते टेक्सास राज्यातल्या टेरलिंग्वा गावात राहायला थांबलो. हा  ५:५० तासांचा प्रवास होता. एव्हाना गाडी चालवायला, गाडीत तासनतास बसायला आणि भूक लागली की पिनट बटर सॅडविच खायला आम्ही सगळे सरावलो होतो.

आठवा दिवस - लुईझियाना राज्यातील न्यू ऑर्लिन्सला घालवणार होतो. पुन्हा एकदा एकदम १० तासांचा प्रवास होता. चौघं गाडी चालवत असल्यामुळे सुरुवातीला इतक्या प्रवासाचं आलेलं दडपणही एव्हाना नाहीसं होऊन गेलं. न्यू ऑर्लिन्स जवळ यायला लागलं आणि  रिकामे रस्ते पुन्हा गजबजायला लागले. निसर्गाचा वरदहस्त माणसांनी बाजूला ढकललेला क्षणोक्षणी जाणवायला लागलं. न्यू ऑर्लिन्सला पोचल्यावर आरोग्य खात्याचा, ’सुटी असली तरी एकत्र जमू नका’ हा इशारा फेटाळून लावलेला पदोपदी दिसत होता. इथे गाव फिरायचं, तिथले प्रसिद्ध पदार्थ खायचे एवढाच आमचा बेत होता. गर्दी पाहिल्यावर आम्ही सगळं लवकर आटोपतं घेतलं पण खाणं मात्र सोडलं नाही. विकत घेऊन गर्दी टाळून, लांब जाऊन यथेच्छ ताव मारला. इथून आम्ही आमचा प्रवास तसाच पुढे चालू ठेवला ते अलाबामा राज्यातील मॉन्टगोमेरी येईपर्यंत. रात्री इथे मुक्काम करुन मार्टीन ल्यूथर किंग जिथे राहायचे ते ठिकाण पाहायची इच्छा होती पण वेळेत बसत नव्हतं. 

नववा दिवस - अलाबामा राज्यातील मॉन्टगोमेरीहून आमचं गाव. नॉर्थ कॅरोलायनातील शार्लट. ६:३० तास प्रवास आणि मग संपली सुटी. अटलांटा सोडल्यावर रस्त्यावर दोन - तीन अपघात, वाहनांच्या वेगावर नियत्रंण ठेवण्यासाठी अनेक ठिकाणी दबा धरुन बसलेले पोलिस असंच दृष्य या ६:३० तासात जागोजागी होतं. नागरी सोयी सुविधा नसलेलं Big Bend अधिक मोहक होतं, मन:शांती देणारं होतं ते मागे टाकून आम्ही कुठे धावतोय असं वाटायला लागलं. एकदा का टेक्सास राज्यातील क्लेबर्न सोडलं की राष्ट्रीय उद्यानापर्यंतचा रस्ता म्हणजे निसर्गाचं राज्य आहे. कुठल्याच गावात माणसांची चाहूल विशेष जाणवत नव्हती आणि रस्त्यावर गाड्यांची गर्दीही नव्हती. सॅन्डरसनमध्ये तर माणसांपेक्षा ओसाड पडलेल्या घरांची संख्याच जास्त आहे. तिथे जवळच भुतांचं गावही आहे. Ghost Town - ओस पडलेलं गाव! ही अशी गावं, घरं दिसत होती तेव्हा पडक्या भिंतीमध्ये काय कहाणी दडली असेल असा प्रश्न पडत राहिला.  परतीच्या प्रवासात मन मागे धावत होतं, वाटेतलं काही ना काही आठवत होतं. धावणं चालूच होतं. मनाचं आणि गाडीचं. मन आणि गाडी विरुद्ध दिशेने! 

९ दिवसातले पाच - सहा  दिवस आमचे एका वेगळ्या जगात गेले. वर्षातली ही सुटी आम्ही चौघं एकत्र असतो त्यामुळे अधूनमधून होणार्‍या प्रवासापेक्षा या सुटीची वाट आम्ही सगळेच बघत असतो. यावेळेसही तेच. घरी आल्याआल्या पुन्हा पुढच्यावर्षीचे वेध!

पैसे बाटलीत ठेवा.
बेकायदेशीर प्रामाणिकपणा
















माझ्याकडे पाठ फिरवून मेक्सिकोत प्रवेश करता येईल का या विचारात उभे राहिलेले घरातले तीन खंदे 🙂 


त्या तिथे पलिकडे मेक्सिको

त्या तिथे पलिकडे मेक्सिको



Friday, October 30, 2020

मराठी अमेरिकन रेडिओ - ’मोर्चाला जायचं का?’

 मराठी अमेरिकन रेडिओसाठी ’मोर्चाला जायचं का?’ यामध्ये ऋत्विक, पर्णिका आणि माझ्या उदयनशी झालेल्या गप्पा. खरंतर गप्पा म्हणण्यापेक्षा आमच्यासारख्या भारताबाहेर राहणार्या पालकांच्या मुलांचे ऋत्विक आणि पर्णिका प्रतिनिधीच म्हणेन मी. इथल्या कितीतरी घरांमध्ये ऋत्विक, पर्णिकासारखी मतं असणारी, त्यांच्यासारखे अनुभव घेतलेली मुलं असतील आणि आमच्यासारखे, उदयनसारखे पालक.

उदयनने अचूक प्रश्न विचारले आहेत आणि कार्यक्रमाचं पार्श्वसंगीत श्रवणीय आणि समर्पक आहे. नक्की ऐका, तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कळू दे.


यातच माझ्या लेखक मित्राने, गौतम पंगूने त्याच्या अप्रतिम लेखाचा काही अंश वाचलेला आहे. त्यांनी आमच्यासारख्या भारतीयांना दिलेली उपमा मुद्दाम ऐकण्यासारखी आहे 🙂
पुढच्या भागात अमेरिकेतील लेखिका शिल्पा केळकर आणि तिची मुलगी अनुका सहभागी होणार आहेत. कोणताच भाग चुकवू नका. नक्की ऐका.

_________________________________
मराठी अमेरिकन रेडिओ सादर करत आहे,

“मोर्चाचा जायचं का? भाग १”

एक ज्वलंत चर्चा, अमेरिकेतल्या वंशभेदाबद्दल, भारतातून येऊन अमेरिकेत स्थायिक झालेल्या मराठी अमेरिकन समाजात या बाबत आणि एकंदरच अमेरिकेतल्या सामाजिक समस्यांबद्दल असलेल्या उदासिनता आणि अमेरिकेत जन्मलेल्या मराठी अमेरिकन मुलांमधे ह्या विषयाबद्दल असलेल्या आत्मियता आणि सक्रियते बद्दल....

दोन भागात मांडलेला एक वेगळा आणि महत्वाचा विषय. सादर करतो आहोत पहिला भाग. नक्की ऐका, इतरांनाही ऐकवा आणि प्रतिक्रिया कळवा.

Saturday, August 15, 2020

माझा पहिलावहिला लघुपट!

 माझा पहिलावहिला लघुपट. कथा माझी बाकी सारं म्हणजे पटकथा, संवाद, दिग्दर्शन कार्यशाळेतल्या नुकतीच शिंगं फुटायला लागलेल्या आणि शिंगं मारुन तयार झालेल्या सर्वाचं अर्थातच राजेश देशपांडेंच्या मार्गदर्शनाने.

नववीत असताना प्रकाश बुद्धीसागर आणि रमेश चौधरींची कार्यशाळा केली होती. तेव्हा हे प्रकरण नक्की काय असतं ते समजण्याची अक्कलही नव्हती पण कार्यशाळा संपताना एक अख्खी ’सुनीला पारनामे शाळेला चालली होती’ ही एकांकीका आम्ही सादर केली. त्यानंतर इतक्या वर्षांनी मी ही दुसरी कार्यशाळा केली तेव्हा आता खरंच काही नविन शिकायचं आहे का हा संभ्रम आणि आपणच एकटे केस काळे करुन वासरांमध्ये घुसत नाही ना अशीही शंका होती पण चंद्रकात कुलकर्णी, रवी जाधव .... अशी एकापेक्षा एक नावं आणि कोरोनाआधी गाजत असलेल्या हिमालयाची सावलीचे दिग्दर्शक राजेश देशपांडे; जे या कार्यशाळेचे संयोजकही. हे पाहिल्यावर मोह काही आवरेना!

zoom केल्यावर जीव शांत झाला. बत्तिसाव्या वर्षी अमेरिकेत पुन्हा शिकायला सुरुवात केल्यावर आपणही ’तरुण’ आहोत असं वाटलं होतं तसंच पुन्हा झालं . सगळी शिंगं असलेली ही कार्यशाळा म्हणजे धम्माल अनुभव होता आणि तो धम्माल अनुभव नक्की कसा होता हेच या लघुपटात आहे. शेवटपर्यंत पाहायला विसरु नका. टाळेबंदीच्या काळातही आमच्यातली काही वासरं शिंग मोडून अमेरिकेत कशी आली आहेत आणि काय उद्योग करायला ते पाहा या लघुपटात. गंधार बाबरेचं संकलन ’कमाल’ म्हणायला लावणारं आणि निलेश देशपांडेचं पार्श्वसंगीतही मधुर!

आपापल्या देशात, गावात, आपलं आपण आणि zoom वरुन एकत्रित प्रसगांचं चित्रिकरण. वेगळाच आणि काही प्रसंगाचं चित्रिकरण करताना ’अरे असं असतं होय, वॉव’ असे उद्गगार काढायला लावणारा हा अनुभव.



Saturday, July 11, 2020

आत्मसन्मानाची लढाई - सकाळ - सप्तरंग पुरवणी

कृष्णवर्णीय फ्लॉईडच्या पोलिसांकडून झालेल्या निर्घृण हत्येनंतर वर्णद्वेषविरोधी  निदर्शनांनी अमेरिका पेटून उठली. विशेषत: इथे वाढलेल्या स्थलांतरितांच्या मुलांनी, दुसर्‍या पिढीने पालकांना त्यांच्या तटस्थ भूमिकेचा विचार करायला भाग पाडलं आहे. स्थलांतरितांची ही दुसरी पिढी (आमची मुलं) कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही त्यांच्या कृष्णवर्णीय मित्रमंडळीना पाठिंबा देण्यासाठी  निदर्शनात भाग घेत आहेत, कृष्णवर्णीय संस्थांना मदत करत आहेत आणि त्याचवेळी पालकांना जाहिर पत्र लिहून, त्यांच्या भूमिकेला विरोध करत  याविषयावर बोलायला, विचार करायला उद्युक्त करत आहेत. त्याच विषयावरचा  लेख आहे.
                                                        

’स्पिरिट रॉक’ या शब्दातच त्याचा अर्थही सामावला आहे. ’ब्लॅक लाइव्ज मॅटर’ चळवळीला पाठिंबा दर्शविण्यासाठी माझ्या मुलीच्या शाळेत काही मुलांनी शाळेतल्या या दगडावर सुंदर संदेश लिहिले. जितक्या तळमळीने मुलांनी हे संदेश लिहिले तितक्याच पटकन त्यावर फुल्या मारून त्या संदेशाला, चळवळीला विरोध दर्शविण्याचीही खुमखुमीही कुणीतरी दाखवली. ’ब्लॅक’ खोडून तिथे ’ब्लु’ लिहिलं गेलं. प्राचार्यांनी या घटनेवर कडक टीका केली. मुलांवर कडक कारवाई केली जाईल असा इशारा दिला. यानंतर मात्र वेगळंच घडलं. ज्या प्राचार्यांनी तीव्र शब्दात मुलांना समज दिली त्यांनाच ’वर्णद्वेषी’ विधानं केल्याबद्दल निलंबित करण्यात आलं. पालक म्हणून आम्हाला अर्थातच धक्का बसला. मनात वादळ उठलं. आपल्या मुलांना ज्या शाळेत पाठवतो तिथले प्राचार्यच वर्णद्वेषी आहेत या वस्तुस्थितीने मन धास्तावलं. इतक्या वेळा कारणाकारणाने ऐकलेली प्राचार्यांची भाषणं आठवत राहिली, त्यांचे विचार आपल्याला परिचित आहेत हा भ्रमच होता की काय अशी शंका यायला लागली. त्यातही प्राचार्य निर्दोष आहेत असं सांगणारा एक गटही त्यांच्या बाजूने घोषणा देत उभा राहिला आणि त्याचवेळी निदर्शनं करणारा!

कृष्णवर्णीय फ्लॉईड पोलिसांच्या निघृणपणामुळे मृत्युमुखी पडला आणि अमेरिकेत वर्णद्वेषाविरोधी निदर्शनांचा उद्रेक उसळला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही संसर्गाचा विचारही न करता लोक रस्त्यावर उतरले यावरूनच त्याच्या तीव्रतेची जाणीव होत राहते. गावागावात या घटनेचे पडसाद उमटणं साहजिकच होतं. फक्त त्याच्या स्वरूपाची कल्पना कुणालाच नव्हती. भारतीय पालक नेहमीच अशाबाबतीत मुलांना सबुरीचा सल्ला देतात, स्वत: तटस्थ राहतात पण यावेळी स्थलांतरीतांच्या तरुण मुलांनी पालकांना नवी दृष्टी दिली. पालकांना त्यांच्या भूमिकेचा विचार करायला भाग पाडलं.

काही दिवसांपूर्वीच माझ्या मुलाने वर्णद्वेषाला बळी पडलेला कृष्णवर्णीय फ्लॉईड आणि सुरू झालेली चळवळ याबाबत त्याच्या ऑफिसच्या CEO शी थेट संपर्क साधला होता. कंपनीने काहीच भूमिका घेतली नाही, कर्मचार्‍यांना कंपनी वर्णद्वेषाला थारा देत नाही अशी खात्री देणारा संदेश पाठवला नाही याची नाराजी कंपनीतील कृष्णवर्णीयामध्ये तसंच इतरांमध्येही आहे हे नजरेला आणून दिलं. कंपनीने आपली चूक कबूल करत सर्वांशी बोलायची तयारी दाखवली. online meeting मध्ये सर्वांनीच आपल्या भावना व्यक्त केल्या. CEO नी आधी याबाबत काही न केल्याबद्दल माफी मागितली आणि नंतर अतिशय भावुक ईमेल पाठवण्यात पुढाकार घेतला. तरुण मुलांना इथल्या प्रश्नांबद्दल किती आत्मीयता आहे याचं प्रत्यय देणारं हे उदाहरण.

फक्त भारतीयच नाही तर एकूणच स्थलांतरित पालकांची इथे जन्मलेली, वाढलेली मुलं त्यांच्या आई - वडिलांच्या भूमिकांची अक्षरश: चिरफाड करतायत. वॉशिंग्टन डी. सी. मधल्या निदर्शनात माझ्या मुलाने आणि त्याच्या मित्रमैत्रिणींनी भाग घ्यायचं ठरवलं तेव्हा आम्हाला पालक म्हणून चिंता होती कोरोना विषाणूच्या संसर्गाची पण फ्लॉईडच्या मृत्यूने तरुण पिढीच्या मनातलं वादळ, व्यवस्थेबद्दलचा प्रक्षोभ रस्त्यावर आला आहे. या देशाचे नागरिक असूनही तटस्थ भूमिका घेणारे स्थलांतरित, त्यामुळे मुलांशी होणारे वादविवाद यातून सर्वांनाच आपापल्या मानसिकतेचा सखोल विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. जे होतंय ते पाहताना, ऐकताना जितकी काळजी वाटते तितकाच तरुण पिढीच्या संवेदनशीलतेचा अभिमान!

या चळवळीत इथली दुसरी पिढी सक्रिय झाल्यामुळे नकळत लक्षात येत राहतं की सर्वांच्याच मनात हा वर्णभेद नाही म्हटलं तरी आहेच. नेटफ्लिक्सने खास यूट्यूबवर प्रसिद्ध केलेल्या भागात हसन मिनाजचं प्रभावी भाषण नक्कीच विचार करायला लावणारं आहे. तो म्हणतो, ’फिरताना, धावताना, झोपलेले असताना, दार उघडताना सतत मृत्यूची भिती कृष्णवर्णीयांना भेडसावत असते. एशियन्सना प्रसिद्ध कृष्णवर्णीयांचा प्रचंड अभिमान आहे पण कृष्णवर्णीयांशी तुमची मैत्री नसते. घरात कुणी सावळ्या रंगाचं असेल तर तुम्ही त्यांना अगदी सहज कल्लू म्हणता, दाक्षिणात्य लोकांचा उल्लेख ’कल्लू’ करता.’ बहुतांशी घरात, प्रत्येक व्यक्तीला आहे तसं स्वीकारायला पाहिजे असे धडे देतानाच कधीतरी पालकांनी मुलांना कृष्णवर्णीयांपासून सावध राहण्याचाही इशारा दिलेला असतो. पालकांच्या दुहेरी भूमिकेला मुलं आव्हान द्यायला लागली आहेत. त्यांचा ढोंगीपणा त्यांच्या लक्षात आणून द्यायला लागली आहेत. फ्लॉईडच्या मृत्यूनंतर त्याचे तीव्र पडसाद अनेकांच्या घरातून उमटतायत, लेखणीतून व्यक्त होतायत.

फ्लॉईडच्या मृत्यूआधी, 2016 साली फॅलॉन्डो कॅस्टिओच्या बाबतीत घडलेल्या अशाच घटनेने ही युवा पिढी प्रचंड अस्वस्थ होती ती पालकांच्या वागण्यातून नकळत दिसणार्‍या वर्णद्वेषाने, त्यांच्या तटस्थ भूमिकेमुळे. मुलांना या विषयावर पालकांशी बोलणं अवघड जात होतं, वाद होत होते त्यामुळे पालकांशी संवाद कसा साधावा हे कळत नव्हतं त्यातूनच पत्रांची कल्पना जन्माला आली आणि Letters For Black Lives Project ही कल्पना रुजली. सुरुवातीला फक्त एशियन अमेरिकन्स मुलांचा समावेश असलेल्या या पत्रांमध्ये आता आफ्रिका, युरोप, कॅनडातील तरुणांचाही समावेश आहे. अनेक भाषांमध्ये या पत्रांचा अनुवाद झाला आहे. 2016 नंतर पुन्हा एकदा या पत्रांना उजाळा दिला जात आहे. त्यावेळच्याच कळकळीने मुलं पालकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत. या सार्‍या पत्रांचा सारांश असा आहे.

प्रिय, काका, काकू, मावशी, आत्या,
तुम्हाला कदाचित कृष्णवर्णीय मित्रमैत्रिणी नसतील, तुमचे सहकारी कृष्णवर्णीय नसतील पण आमचा जन्म इथेच झालेला आहे, आमचे अनेक मित्रमैत्रिणी, सहकारी कृष्णवर्णीय आहेत आणि या देशात त्यांना जी वागणूक मिळत आहे ते पाहून आम्हाला खूप भिती वाटते आणि त्यांची अतिशय काळजी वाटते. पोलिसांच्या हातून जेव्हा जेव्हा कृष्णवर्णीय व्यक्ती मारली जाते तेव्हा नकळत तुम्ही त्या व्यक्तीलाच दोषी ठरवता. यात तुमचा दोष नाही कारण माध्यमातून कृष्णवर्णीयांची हीच प्रतिमा आहे. चोर, गुन्हेगार! ’आम्ही या देशात आलो ते स्थलांतरित म्हणूनच आणि स्थिरावलोही; मग कृष्णवर्णीयांना हे का जमत नाही?’ हा प्रश्न कधी तुम्ही विचारला आहे तर कधी न बोलूनही तुमच्या कृतीतून हे व्यक्त होतं. म्हणूनच आज आम्हाला, इथे जन्मलेल्या, वाढलेल्या मुलांना काय वाटतं ते तुम्हाला सांगायचं आहे.
’आम्ही घरातून बाहेर पडतो तेव्हा निश्चिंत असतो, मनात फार धाकधूक नसते, पोलिस अडवतील, घरी परत येऊ की नाही अशी शंका नसते पण आमच्या कृष्णवर्णीय मित्रमैत्रिणींच्या बाबतीत तसं होत नाही. बहुतेकांचे पूर्वज गुलाम होते आणि अजूनही तशीच वागणूक त्यांना मिळते, बदल झाला आहे तो स्वरूपात. घर बांधण्यासाठी कर्ज मिळत नाही, मतदानाचा हक्क नाकारला जातो, शिक्षणापासून वंचित राखलं जातं. कृष्णवर्णीय या व्यवस्थेचे अद्यापही गुलामच आहेत. तुम्ही या देशात आलात, स्थिरावलात. कितीतरी वेळा या व्यवस्थेचा तुम्हालाही त्रास झालेला आहे. गरिबी, आतंकवाद, रोगराई, गुन्हेगारी अशा कितीतरी गोष्टींसाठी या ना त्या कारणाने तुम्हालाही दोषी ठरवलं गेलं. तुम्ही हे पचवलंत ते आमच्या उज्ज्वल भवितव्याच्या अपेक्षेने. आता आम्हाला तुमची साथ हवी आहे, तुमच्या हातात हात घालून आम्हाला कृष्णवर्णीयांचा लढा पुढे न्यायचा आहे. आपण सारेच या देशात सुखाने राहू. जसा तुमच्या मनात कृष्णवर्णीयांबद्दल ग्रह असतो तसाच इतरांच्या मनात तुमच्या - आमच्याबद्दल हे तुमच्या कसं लक्षात येत नाही? माध्यमं तुमच्या उच्चारांची नक्कल करतात, आम्हाला शाळेत चिडवलं जातं, विमानतळांवर अडवलं जातं. कृष्णवर्णीय समजून भारतीय लोकांना झालेला त्रास तुम्ही बघितला आहेच. सुरेशभाई पटेलांना कृष्णवर्णीय समजून पोलिसांनी केलेली मारहाण कोण विसरेल? झाली का कारवाई पोलिसांवर याबाबत? या अशा घटना कृष्णवर्णीयांना रोजच्याच झाल्या आहेत तरी तुम्ही तटस्थ का? कदाचित आपल्यावरही ही वेळ येईल हे का विसरता? याला खीळ घालायची असेल तर आता या अल्पसंख्याकांच्या लढ्यात तुम्हीही सहभागी व्हायला हवं.

कितीतरी घरांमधून या पत्रांनी, तरुण मुलांनी पालकांचे डोळे उघडले, दृष्टिकोन बदलला. क्विनटेरोने जेव्हा फेसबुकवरून आपल्या मित्रमंडळींना निदर्शनासाठी आवाहन केलं तेव्हा, ’All lives matter' असं सांगत तिच्या आई - वडिलांनी तिला मूर्खात काढलं. विरोध केला. वीस डॉलर्सच्या नोटेवरून एका माणसाच्या मानेवर 8 मिनिटं पोलिस गुडघा टेकून बसू शकतो यामागे असलेली पार्श्वभूमी तिच्या पालकांना समजून घ्यायची नव्हती, समजत नव्हती. मोर्च्यासाठी तिने घेतलेल्या पुढाकाराला पालकांनी विरोध केल्यावरही तिने मागे न हटण्याचा निर्धार केला. नाईलाजाने तिच्या संरक्षणासाठी म्हणून तिची आईही अखेर मोर्चात सामील झाली. कृष्णवर्णीयांची भाषणं ऐकताना त्यांची वेदना तिच्या काळजाला भिडली. तिसर्‍या दिवशी तर क्विनटेरोचे वडीलही त्या दोघींबरोबर गेले आणि शेवटच्या दिवशी तिच्या आईने कृषवर्णीयांसमोर स्वत:हून भाषण केलं. स्वत:मध्ये झालेला बदल, एक आई म्हणून आपले कसे डोळे उघडले गेले हे सांगताना ती गहिवरली, ऐकणार्‍यांनाही अश्रू आवरणं कठीण गेलं.

वॅग आणि झॅगने निदर्शनात सामील व्हायचं आहे असं सांगितलं तेव्हा चायनाहून स्थलांतरित झालेल्या बार्टेकने तीव्र शब्दांत मुलांची कानउघडणी केली. मुलांनी त्यांचा निर्धार स्पष्ट केल्यावर तर बार्टेकने घर सोडून जाण्याचीच धमकी दिली. मुलं तरीही गेलीच. बार्टेकच्या अंगाचा तिळपापड झाला पण तिथे पोलिसांनी सुरू केलेल्या अश्रूधुराच्या बातम्या यायला लागल्यावर बार्टेक मुलांना परत आणण्यासाठी धावला. इतकंच नाही तर बार्टेकने मुलांकडून कृष्णवर्णीयांचा लढा, त्यांची भूमिका समजून घेतली.

इथे जन्मलेल्या, वाढलेल्या मुलांनी इथल्या समस्यांबद्दल आपल्या पालकांनी पावलं उचलावी, ठाम भूमिका घ्यावी याचा आग्रह कृतीतून दाखवायला सुरुवात केली आहे. पालकांनी मुलांना समजून घेऊन त्यांना साथ द्यायला हवी नाहीतर मुलं एकट्याने लढा द्यायला तयार आहेतच पण मुलांना जसं आपल्या आई - वडिलांना आपला अभिमान वाटावा ही आस असते तसंच आपल्यालाही मुलांच्या नजरेतला आपल्याबद्दलचा आदर भावतोच हे विसरून चालणार नाही.