Monday, October 16, 2023

एका लग्नाची गोष्ट

 

झाले बुवा एकदाचे लेकाचे दोनाचे चार हात. लेकाने आम्हाला जेव्हा फोनवर लाजत लाजत सांगितलं, 

"आई तू माझ्या मागे लागली होतीस ना लग्न कर म्हणून... ऐकलं आणि हृदय थबकलं, धडधडलं, काय-काय झालं. तोंडून शब्दच फुटेना.

तो म्हणाला,

"लग्न म्हटलं की इतकी का घाबरतेस? मी छान पाकिस्तानी मुस्लिम मुलीशी लग्न करणार आहे." आता हृदय नाही तर कमीत कमी फोन तरी खाली पडायला हवा होता पण सगळं जागच्याजागीच राहिलं. मला ऐकलेले किस्से मात्र आठवले. मुलगी कोण वगैरे न विचारता आधी मी त्याला म्हटलं.

"रात्रीचा घराबाहेर पडू नकोस. दार नीट लाव." मुलाला यात आई काहीतरी वेगळंच बोलतेय असंही वाटलं नाही इतकं ते त्याच्या सवयीचं होतं. तो घाबरला नाही म्हणून मीच घाबरत म्हटलं.

"अरे, त्या मुलीचे भाऊ येतील तुला मारायला नाहीतर तिचे वडील गुंड पाठवतील."

"आऽऽऽई" हा स्वर म्हणजे वादळापूर्वीची शांतता.

"बरं मग तिला पण तेच सांगू का? तुम्हीपण पर्णिकाला नाहीतर गुंडांना पाठवणार आहात का?"

"आम्ही आणि पर्णिका काय 'तसले' वाटलो  काय?" विचारलं आणि लक्षात आलं आपण त्या कोणा मुलीच्या घरच्यांना ’तसल्या’ त टाकलं. मग मी त्याचं एकदम अभिनंदनच केलं. शिकली आहे ना त्याची खात्री केली कारण आमच्यावेळी आई-वडील असंच म्हणायचे, कोणीही आणा पण शिक्षण झालेलं असलं पाहिजे. विचारता विचारता अजून एक लक्षात आलं.

"अरे, ते लोक जबरदस्तीने धर्म बदलतात. तू तुझा धर्म बदललास तर आम्हाला मेलास." हे जरा नाट्यमय झाल्यामुळे नाटकाची तालीम असल्यासारखा प्रॉम्प्टर (मराठी शब्द?) म्हणजे नवरा ओरडला. 

"कोणी कोणाला मेलेलं नाही. होऊन जाऊ दे." मग आम्ही मुलीला भेटायला रवानाच झालो. सहा तास गाडी चालवत पोचलो, भेटलो. भावी सासु म्हणून तिच्यावर प्रभाव टाकायला एका घोटाऐवजी दोन घोट अमृत घेतलं आणि ते जे चढलं आणि तरुणांना लाजवेल इतका तरुणपणा माझ्यात घुसला त्यावरुन आमच्या सुनबाई सासुबाईंचा धसकाच घेणार की काय असं मी सोडून उरलेल्या ३ जणांना वाटलं.

आता ही तशी गुप्त गोष्ट होती. लेक जोपर्यंत मेहविशला मागणी घालत नाही तोपर्यंत चुपचाप. दोन - तीन वर्षांनी झालं, करशील का लग्न?, हो करेन प्रकार आणि आम्ही उत्साहाने सार्‍या जगाला सांगितलं. इथून पुढे खरं नाट्य. ३ वर्षात न पडलेले सारे प्रश्न इतरांना पडले, त्यांचे प्रश्न रोज एक या धर्तीवर ऋत्विककडे पोचले.

"अरे, निकाह असा होतंच नाही. कबुल, कबुल, कबुल म्हटलंस की झालास तू मुसलमान." लेकही आता या सार्‍याला सरावला असावा.

"आमचा काझी मॉडर्न आहे." आता ही काय स्पर्धा होती का पण मी म्हटलं 

"आमचे गुरुजी आयआयटीत शिकलेले आहेत (कापसे गुरुजी, बरोबर ना?)

"म्हणजे?"

"काळजी करु नकोस. धर्मांची सरमिसळ होऊ देणार नाहीत दोघं. घेतील ते काळजी."

"आई, काळजी मी करत नाही. तुझे मित्रमैत्रिणी, नातेवाईक करतायत." भानावर आणायला पुत्र तयारीत.

"तुझ्या मुलांची नावं काय ठेवणार?" लेक प्रश्नपत्रिका सोडवायच्या तयारीतच.

"आम्हाला मुलं होतीलच हे तुम्हाला काय माहित?" 

"आगाऊ, असं उत्तर पोचवू का?"

"बरं, पुढचा प्रश्न. मुलांच्या धर्माचं काय?" 

"असा प्रश्न विचारतात लोक?" त्याला आश्चर्यच वाटत होतं पण मला ज्या प्रश्नाचं आश्चर्य वाटत होतं तो मी त्याला आधी सांगितला.

"अरे, मेहविशचं नाव बदलणार का असंही विचारतायत."  

"आई, असल्या भानगडीत पडू नकोस हा. तिच तुझं नाव बदलेल." लेकाने सासु - सूनेचे प्रेमळ संबंध कसे ताणले जातील ते डोळ्यासमोर आणलं.

"अरे माझं नावपण बदलू दिलं नव्हतं मी. तिचं बदलायचा विचार करणारी मी कोण?" हे मी माझं मलापण विचारलं. उत्तर मिळालं नाही. कोणाची नावं आडनावं आपण बदलायची नाहीत एवढंच कळलं.

आता माझी मुसलमान मैत्रीण सरसावली,

"कबुल, कबुल, कबुल शिवाय निकाह होतंच नाही आणि ते म्हटलं की धर्म बदललाच..." मला एकदम मुलगा नमाज पढतानाच दिसायला लागला. मग सरसावून आम्ही मुलांच्या ’मॉडर्न’ काझीची मुलाखत घेतली. सगळं आलबेल असल्याची खात्री केली. मुलांनीपण आमच्या गुरुजींची मुलाखत घेतली. सगळं आलबेल असल्याची मेहविशची खात्री झाली. तरीपण निकाहच्यावेळी दोनचार गुप्तहेर ठेवायचे आणि कबुल हा शब्द ऐकला की.... इथे गाडी अडली. काय करायचं ते ठाऊक नव्हतं पण वेळ पडली तर गुरुजी आहेतच असा ’फक्त’ बायका करतात तसा फार पुढचा विचार करुन टाकला. नवर्‍याने नेहमीप्रमाणे उगाच फालतू गोष्टीत वेळ घालवतेस सूर लावला. 

तर अशा अनेकांना पडलेल्या असंख्य प्रश्नांची उत्तरं सोडवत, कोणी कोणाचे धर्म न बदलता, नाव - आडनाव न बदलता ऋत्विक जोगळेकर आणि मेहविश जमाल बोहल्यावर चढले. चढताना बुरखा आणि मुंडावळ्या विसरले. बुरखा कोणालातरी आठवला म्हणून काहीक्षण आला, मुंडावळ्या पिशवतच राहिल्या तरी दोघांचे चार हात झाले. त्याला देशाच्या कानाकोपर्‍यातून आमचे आणि मुलांचे मित्रमैत्रिणी हजर राहिले, भारतातले आमचे नातेवाईक अगत्याने आले आणि हे कार्य सफळ संपन्न झाले. 


Monday, September 18, 2023

बातमी गोळीबाराची


बातमी गोळीबाराची
चुकचुकून नित्यक्रमाला लागण्याची
खात्री असते हे आपल्यापासून दूर असण्याची!
पण कधीतरी वेळ येतेच
सरावलेल्या मनाचा तोल ढवळून निघण्याची!

घडत होतं सारं लेकिच्या विद्यालयात
उज्ज्वल भविष्याच्या प्रांगणात!
डोळ्यासमोर जीव उभे
भितीच्या छायेत हादरुन गेलेले!
प्रांगणात पडलेले, घायाळ झालेले
मनाच्या, शरिराच्या चिंध्या उडालेले!
मिटून घेतले डोळे, खुपसलं डोकं तळव्यात
पोटच्या गोळ्याला जणू धरुन बसले हातात!

बातमी आली,
सगळ्या मुलांना खोलीत सुरक्षित बंदिस्त केल्याची
लेकरांचा जीव खोलीत कोंडून ठेवलेला, भितीने गुदमरलेला
पालकांचा  श्वास अडकलेला, लेकरांच्या जीवात गुंतलेला!

कितीतरी घरात ही अशी परिस्थिती
बाहेर विद्यालयाच्या गर्दी पत्रकारांची, पोलिसांची!
चर्चा सगळीकडे ’ब्रेकिंग न्यूजची’!
अक्राळविक्राळ होतो पोटातला गोळा
जेव्हा बळी पडतो प्राध्यापक लेकिला माहित असलेला! 

एक शिरशिरी उभ्या अंगातून
लेकीच्या भावविश्वाचा तडा घ्यावा कसा सांधून!
सुकून जातो गळ्यातला आवंढा
तरी वाटतं रडावं ढसाढसा
सगळं काही आलबेल, कळायला लागतात दोन तास
एकच गेला जीव या विचाराचा होतो अतोनात त्रास!
आपण काळजीने त्रस्त
लेक ओठ मिटून घट्ट!
वाट पाहायची तिने मोकळं व्हायची
मनातल्या भावना व्यक्त करायची! 

आणि...

पुन्हा एकदा त्याच जात्यातून तसंच धान्य दळलं जातं
पुन्हा मुलं कोंडली जातात, श्वास अडकतात!
फक्त होत नाही जिवितहानी
तेच समाधान बाळगायचं मनी!
यावेळी मात्र लेक बोलते
म्हणते, रोज मरे त्याला कोण रडे!
पण भिती आम्हाला खरंच वाटते
सावध राहायचा क्षीण येतो
कशाला गं माणूस असं करतो!

तीन तासांच्या अंतरावर असलेल्या
लेकराला मारावी वाटते घट्ट मिठी!
कुशीत ठेवावं अलगद जपून
द्यावं आश्वासन सुरक्षिततेचं भविष्याचे पंख छाटून!

कळत नाही कशी करावी ही वृत्ती नष्ट

अन पसरतील पंख मुलं निर्धास्त - मुक्त!


(पर्णिकाच्या महाविद्यालयात २८ ऑगस्टला आणि नंतर १२ सप्टेंबरला गोळीबाराच्या घटना घडल्या. मुलं अशा घटनांना तोंड देताना सावरल्यासारखी वाटत असली तरी त्यांच्या मनावरचं भितीचं सावट पटकन नाहीसं होत नाही आणि भावनिकदृष्ट्या त्यांना जाणवलं नाही तरी परिणाम होत असतातच. पर्णिका आणि तिथे शिकणार्‍या सर्वच मुलांचा विचार मनात येऊन उमटलेले शब्द)