Showing posts with label कविता. Show all posts
Showing posts with label कविता. Show all posts

Saturday, March 17, 2012

आस

कुणीतरी म्हणालं,
सांभाळ आता तुझ्या बाबाना
बाई गेल्यावर खचतो माणूस
माझं उदास हसु,
मनातला डोंब फूटून
तांडव घालायला लागलेले आसू
दडवले शब्दांच्या मखरात,
म्हटलं,
असं कसं होईल
त्याच्या मायेची पाखर
आणखी काही वर्ष तरी राहिल

ती गेली तेव्हाच मी का नाही गेलो
दचकून पाहिलं बाबाकडे
वाटलं,
घट्ट मारावी मिठी
आई गेली आत्ताच, तू नको जाऊ
शब्दाच्या आजूबाजूला
घुमायला लागलं पारव्यासारखं,
कुणाचंतरी  म्हणणं
बाई गेल्यावर खचतो माणूस....

खरचं का रे तसं झालं...
खचलास का रे बाबा तू?
केलास ना पुरा तुझाच ध्यास
ती गेली त्याच वाटेवर टाकलंस पाऊल
लेकींसाठी नाहीच ना अडला पाय

कधीतरी का होईना,
कुणाचंतरी म्हणणं खोटं का नाही ठरलं
आई गेल्यावर, बाबा तुला आमच्यासाठी रहायला
का नाही जमलं?


Saturday, March 5, 2011

स्वप्न

रोज एकेक स्वप्न
विसावतय मनाच्या कोप‍र्‍यात
म्हटलं,
सवडीनं हाताळेन एकेक
पण तसं कधी घडलंच नाही
वाटतं,
देवून टाकावीत सारी स्वप्न
जश्शीच्या तशी दुसर्‍याला
पण नकोच,
मी हल्ली एकेक स्वप्न निळ्याशार आभाळात सोडते
जसं,
खूप आवडीने धरलेल्या फुलपाखराला
मुक्त श्वास घेण्यासाठी सोडतो
तसं.