Thursday, January 3, 2013

बदल

महाविद्यालयीन काळात  तावातावाने मारलेल्या गप्पा, मांडलेले विचार आणि त्यातून निर्माण झालेली ही कविता. कविता 'पाडण्याचा' छंद होता त्या काळातली. आज कित्येक वर्ष उलटली तरी सगळं जैसे थे च आहे असं वाटायला लावणारी.

तुम्हाला खोटं वाटेल
पण हल्ली सारं जगच बदललंय
सगळं कसं छान, छान होत चाललंय
माणूस माणसाप्रमाणे वागतोय
देश उन्नतीकडे झेपावतोय!
माणुसकीचाही पूर आलाय
सार्‍या देशाचा नूरच बदललाय
आदर्शवाद अस्तित्वात आलाय
बलात्कार, खून, भ्रष्टाचार हे शब्दच
मुळी नष्ट झाले आहेत
मी म्हटलं ना,
तुम्हाला हे खोटं वाटेल
तसंच झालंय,
समोरचा  माणूस 
विचित्र नजरेने पाहतोय,
कुणापाशी तरी कुजबुतोय
ही वेडी अशीच फिरत असते
अक्रीतासारखं बडबडत राहते!

Friday, December 14, 2012

काय चाललं आहे हे...

एका तरुण मुलाची आई त्याच्या बंदुकीच्या गोळीला बळी पडते. तिथून तो ती ज्या शाळेत शिकवत असते त्या प्राथमिक शाळेत जातो. आईच्या वर्गातले चिमुकले जीव बंदुकीच्या गोळीने टिपतो. कोण विचारणार जाब या कृत्याचा? आणि कुणाला? जाब विचारायला तो मुलगाही या जगात नाही, त्याची आईही. आता आम्ही फक्त चर्चा करायच्या यव करायला हवं आणि त्यव करायला हवं....

असं काही झालं की आठवतं ते १९९९ मधील लिटलटन कोलोरॅडो येथील घटना. दोन विद्यार्थ्यांमुळे जीवाला मुकलेली माध्यमिक शाळेतील १२ मुलं. २००७ साली तरुण माथेफिरुच्या गोळ्यांना बळी पडलेली व्हर्जिनिया टेकमधील ३२ तरुण मुलं आणि अशाच घटना एकामागून एक, अनेक.  त्यानंतर त्याची कारणमीमांसा शोधली जाते, उपाय शोधले जातात, काही काही प्रत्यक्षात राबवले जातात आणि मग पुन्हा हे असं.....कधी थांबणार आणि कसं?

या जगाचा, जग न बघताच निरोप घेतलेल्या त्या चिमुरड्यांच्या आई वडिलांच्या दु:खाच्या कल्पनेने जीव कालवतो, डोळे आसवांनी चिंब होतात. त्यांना देव हे दु:ख झेलण्याचं सामर्थ्यं देवो हीच प्रार्थना!


http://www.washingtonpost.com/