Thursday, April 19, 2018

नाटक आणि नेपथ्य

"डंख" नाटक ही आमची दहाव्या वर्षाची निर्मिती असेल. गेले ३ महिने नेपथ्यावर अविरत काम चालू आहे ते
पाहताना नकळत मन पहिल्या निर्मितीकडे जातं. २००८ सालाकडे. त्यावर्षी २ एकांकिका केल्या. भिंत एकांकिकेला नेपथ्य काहीच नव्हतं. ३ कलाकार आणि मागे काळा पडदा तर महाभारतासाठी निव्वळ खुर्च्या. शाळेत असल्यापासून एकांकिका स्पर्धा हा जीवनाचा अविभाज्य भाग असल्यासारखंच होतं. कथेतील नाट्य प्रेक्षकांपर्यंत पोचवण्यासाठी नेपथ्याची गरज असते असं कधी वाटलंच नव्हतं ते स्पर्धेतील कलाकारांच्या देहबोलीमुळे. भिंत दाखविण्यासाठी भिंत कधी उभारावी लागली नाही तेच दारं, खिडक्या किंवा इतर गोष्टींबद्दल. सर्वच कलाकार ते आपल्या अभिनयातून साकारायचे. तेच आम्ही पहिला प्रयोग करताना केलं. मिळालेला प्रतिसाद उत्तम होता पण तितकाच बुचकळ्यात टाकणाराही. कितीतरीजणांना एकांकिका म्हणजे सुरुवातीला एकपात्री असेल असं वाटलं होतं आणि नेपथ्य (सेट) नाही ही कल्पना पचवणंही जडच गेलं. लक्षात आलं की नाटक लोकांना परिचयाचं आहे पण एकांकिका या स्पर्धेपुरत्या मर्यादित असल्याने त्याबद्दल माहिती नसावी. मग आम्हीपण म्हटलं, त्यात काय  बांधू थोडी दारं, भिंती, खिडक्या...

पण इतकं सोपं  नव्हतं  हे प्रकरण. मुख्य प्रश्न त्या बांधायच्या कशा, कुणी आणि कधी? एकांकिकेचा सरावच आठवड्यातून एकदा मग नेपथ्याचं काम कधी करायचं? पुढचा अडथळा होता खर्च. एकांकिका/ नाटक करताना फायदा नाही झाला तरी चालेल पण तोटाही नको यावर मी ठाम तर विरेनचा तुला दारं, खिडक्या हव्या आहेत ना घे पाहिजे तितक्या....असा खाक्या.  कलाकार स्वत:चा वेळ देऊन उत्साहाने सहभागी होतात त्यामुळे  कलाकारांना  आणि त्यांच्या जोडीदाराला तिकिटाचा खर्च करायला लावायचा नाही, कार्यक्रम झाल्यावर बाहेर जेवण किंवा DVD द्यायला हवीच असं वाटायचं, कलाकारांच्या मेहनतीची जमेल तेवढी कदर करावी म्हणून. त्याचवेळेस नाट्यगृहही दोन दिवस ताब्यात हवं. एकाच दिवशी कलाकारांवर ताण पडू नये, प्रयोगाला सर्व ताजेतवाने रहावेत या इच्छेपायी. आदल्या दिवशी नेपथ्य उभारणी, ध्वनी - प्रकाशयोजना या तांत्रिक बाजू तपासण्यासाठी तर दुसरा दिवस प्रत्यक्ष प्रयोगाचा. पण नाट्यगृहाचा खर्चही दुप्पट. तिकिटाचे दरही सर्वांसाठी सारखेच ठेवायचे यावरही आम्ही ठाम होतो. त्यामुळे  ना नफा ना तोटा याचा ताळमेळ घालत नेपथ्यही आणायचं म्हणजे मोठी परिक्षाच. पण आमची मित्रमंडळी मदतीला धावून आली नेपथ्याची सुरुवात झाली ती अक्षरश: अर्ध्या भिंतीपासून.

PVC पाईप वापरण्याची कल्पना विजय दरेकरची तर भिंतीची मापं गाडीत बसतील अशी ठेवायचं सुचवलं चैतन्य पुराणिकने.  विरेनच्या मनातली कल्पना कागदावर उतरली आणि आमची मित्रमंडळी कामाला लागली. हळूहळू भिंती, दारं, खिडक्या, जाळीचा चित्रांकित पडदा, मोरी, तयार केलेली झाडं, हरिण, वेगळ्या पद्धतीचं प्रवेशद्ववार.... काय काय रंगमंचावर दिसायला लागलं. त्यामागे कल्पकता आणि अथक मेहनत आहे सुतारकामाची पार्श्वभूमी नसलेल्या सर्वांची, पूर्वी कधीही भिंती न रंगवलेल्यांची. हे करताना अर्थात चुकीच्या भिंती रंगल्या, पाईप तुटले, भिंती हलल्या, वाकड्या झाल्या, कलाकारांना काहीवेळेला जीव मुठीत धरुन रंगमंचावर वावरावं लागलं. पण प्रेक्षकांना सुंदर घरं दिसली. सारा अट्टाहास त्यासाठीच तो फळाला आला प्रत्येकवेळी. आता तर ही मंडळी खरंखुरं घरही बांधतील अशा तयारीत आहेत. यावेळच्या नाटकात आणखी ३ वेगळ्या गोष्टींची भर पडली आहे. काय भर आहे ती प्रत्यक्षातच पाहायला या.

’अभिव्यक्ती’ च्या नेपथ्याचं सारं श्रेय *केरीच्या विजय दरेकर, चैतन्य पुराणिक, अंजली आणि संजय भस्मे, वर्षा आणी नवदीप माळकर, रागिणी आणि विवेक वैद्य तर शार्लटच्या गौरव लोहार, बोस सुब्रमणी, चिराग दुआ, केदार हिंगे, अमोल आणि मेघना कुलकर्णी, अनिता आणि तन्वी जोगळेकर, संजीवनी कुलकर्णी, वेदिका आणि राजीव तोंडे यांना.*

या सर्वांमुळेच ’अभिव्यक्ती’ चं एकांकिका/नाटक म्हणजे उत्तम नेपथ्य ही ओळख आपण निर्माण करु शकलो. त्यांच्याशिवाय हे शक्य नव्हतं. आभार मानणं औपचारिकपणाचं होईल तेव्हा या सर्वांची साथ अशीच कायम राहू दे एवढीच इच्छा.


आमच्या नाटक/ एकांकिकांची झलक पाहण्यासाठी अभिव्यक्ती

संकेतस्थळ  https://marathiekankika.wordpress.com/







Thursday, March 29, 2018

भेट

या वेळच्या भारतभेटीत जवळजवळ ३० वर्षांपूर्वी मनात कोरलेलं चित्र पुन्हा प्रत्यक्षात पाहायला मिळणार याबद्दलची उत्सुकता उत्कट होती. मनात कोरलेलं चित्र बदललेलं असणार हे ठाऊक असलं तरी जे जे आठवतंय ते तिथेच आहे हे पाहताना ते ’वय’ पुन्हा एकदा अनुभवल्यासारखं वाटतं किंबहुना त्यात डुबकीच मारली जाते. त्यावेळेला केलेल्या गोष्टी पुन्हा एकदा कराव्याशा वाटतात आणि लक्षात येतं किती मागे टाकून आलोय आपण हे सारं. असं व्हायला नको. मनाचं बालपण जपायला हवं!

भारत भेटीत हे बालपण पुन्हा आजूबाजूला बागडलं. निमित्त दोन. पूर्वीच्या शेजार्‍यांनी एकत्र भेटणं आणि शाळेचं स्नेहसंमेलन. कधी एकदा पालघरला पोचतोय असं झालं होतं . पोचल्यावर तिथेच जन्मापासून राहणार्‍यांना उतावीळपणे पुन्हा गावदर्शन घडवलं माहितगार आपणच असल्यागत. शाळा, पूर्वीचं घर या रस्त्यांवर काय काय आठवतं, कुठे, कसं जायचं त्याच्या खाणाखुणा सांगितल्या. या खाणाखुणा सांगताना, बघताना एकाचवेळी आनंद होत होता आणि सखेद आश्चर्यही वाटत होतं. झालेले बदल आणि पडझड पाहून!
आम्ही सरकारी क्वार्टर्समध्ये राहणारी सगळी मुलं एकत्र आलो. त्यावेळी कामं करणारे शिपाई, ड्रायव्हरही आवर्जून भेटायला आले सर्वांना. त्यावेळी प्रत्येकजण कसं होतं हे नव्याने उलगडलं. कोण कसं वागायचं, किती भांडायचो, होळीसाठी मालगाड्यातून येणारं गवत घेऊन यायचो, शेण गोळा करत फिरायचो, पाईपमध्ये स्वयंपाक करायचो, १० पैसे देऊन शाळेच्या वसतीगृहात दूरदर्शनवरचे चित्रपट पाहायला जायचो, जत्रेत धुमाकूळ घालायचो, क्रिकेट खेळायचो, टुरींग टॉकीजमध्ये सगळे एकत्र चित्रपट पाहायचो.....काय न काय!

२४ फेब्रुवारी संपूच नये असं वाटत असतानाच उजाडला २५ फेब्रुवारी. या दिवसाची किती आतुरतेने वाट पाहत होते. आर्यन शाळेचं १० वीच्या वर्गाचं गुरु - शिष्य संमेलन. माझ्या मित्र मैत्रीणींनी मनाचा मोठेपणा दाखवून चक्क मला ’पाहुणी’ केलं. कार्यक्रमाचे पैसे भरायला लागणार नाहीत इतकाच अर्थ काढून मी निश्चित्त झाले. प्रत्येकाने आता आपण काय करतो इतकं सांगितलं की झालं म्हटल्यावर तर आणखीनच सुखावले. फार काही बोलावं लागणार नाही याची खात्री झाली. पण शाळेतल्या सवंगड्यांचा भरवसा कुणी देऊ नये हेच खरं हे तिथे गेल्यावर कळलं. मी नुसतीच पाहुणी नव्हते तर प्रमुख पाहुणी होते. शिक्षकांसमोर प्रमुख पाहुणी होणं अवघड वाटलं पण विद्यार्थ्यांची प्रतिनिधी म्हणूण दीप प्रज्वलन केलं. ज्या शिक्षकांना कायम आमच्या उज्वल भवितव्याची चिंता असायची त्यांच्यासमोर आम्ही जवळजवळ ५० जण त्यांच्या कर्माचं फळ म्हणून उभेच ठाकलो. आपल्या विद्यार्थ्यांनी गेल्या ३० वर्षात काय दिवे लावले आहेत याबद्दल शिक्षकांना उत्सुकता होती आणि सुदैवाने आम्ही फार निराशा केली नसावी असं शिक्षकांच्या चेहर्‍यावरचा ओंसडून वाहणारा आनंद दाखवत होता. विद्यार्थी आणि शिक्षक सारेच भारावून गेले एकमेकांच्या भेटीने!

त्यावेळी मुलामुलींनी एकमेकांशी बोलणं फार प्रचलित नव्हतं पालघरमध्ये. त्यामुळे सारे नावापुरतेच वर्गमित्र होते. पण खरं तसं नसणार. बोलणं नसलं म्हणून काय झालं निरीक्षण असतंच ना:-). हे सार्‍यांच्याच एकमेकांशी बोलल्यावर लक्षात येत होतं. त्यावेळच्या पुसटशा ओळखीला जिव्हाळ्याचा रंग चढत होता. गप्पा, हसणं - खिदळणं, आठवणी यात ती सुरेल संध्याकाळ कधी संपली ते कळलंच नाही. परतीच्या वाटेवर मन प्रसन्न होतं, पुन्हा पुन्हा मागे वळून पाहत होतं. ओंजळीत गोळा झालेल्या या क्षणांमध्ये अशीच भर पडू दे, पुन्हा पुन्हा अशा क्षणांची बरसात होऊ दे हीच इच्छा!

पालघरला जायचं त्यामुळे रत्नागिरी झालंच नाही. पण तरी रत्नागिरीच्या आम्ही पुण्यात भेटलो हे काय कमी!

पालघरला जाण्यापूर्वी झालेली कविता

आपण काळाची पानं पुसतोय
मनाचं यौवन जपतोय
अधीरतेचा लंबक हेलकावतोय
मनाचा मोरे थुई थुई नाचतोय!

मन आणि वय शोधतंय बालपण
आठवणींच्या अंगणात आनंदाचे क्षण
गुंफूया मनाच्या माळेत कण न कण
राहू दे बाजूला आता आपलं मोठेपण!

असेच भेटत जाऊ, मैत्र जपत राहू
बालपणाची झूल अंगावर लेऊ
वयाचा प्रवास उलटा करु
मैत्रीची ज्योत पेटती ठेवू!