Saturday, August 1, 2015

व्यक्तिचित्रे

बृहनमहाराष्ट्र वृत्तासाठी लिहीत असलेल्या लेखमालिकेतील हा माझा शेवटचा लेख.

अत्यानुधिक तंत्रज्ञानामुळे संवाद साधणं सोपं आता सहज सोपं होऊन गेलं आहे. परदेशात जाणं, ताबडतोब तिथे रुळणं ही नवलाईची गोष्ट राहिलेली नाही. पण हे झालं हल्ली हल्लीच्या काळात. ज्यांना इथे येऊन दशकं उलटली आहेत त्यांच्यासाठी मधल्या काळातील ही स्थित्यंतरं अचंबित करणारी आहेत. तरीदेखील असं वाटतं की ही प्रगती घडत असताना अनुभवाचं, प्रश्नाचं स्वरुप बदलत गेलं तरी मानवी मन मात्र तेच राहिलं. कधी अनाकलनीय तर  काहीवेळा ठोकताळे मांडता येणारं. प्रत्येकाचे अनुभव आणि प्रश्न वेगळे तसे ते अनुभवण्याचे, प्रश्न सोडवण्याचे मार्गही विविध. या सार्‍याचा वेध घेण्याचा प्रयत्न मी या लेखमालिकेतून केला.

मी अमेरिकेत आले तो काळ आणि आताचा काळ यात खूप फरक आहे. १९९५ च्या दरम्यान भारतात  संपर्क साधण्याचे मार्ग म्हणजे फक्त पत्र आणि फोन. साधारण त्या काळात जे इथे आले त्यांना नक्की आठवत असेल, फोन करायचा तर  MCI किंवा AT&T  हेच दोन पर्याय बहुतांशी उपलब्ध होते. दर मिनिटाला आपण ७५ सेंट खर्च करतोय याचं भान ठेवायला लागायचं. पत्र पाठवलं की पोचायला तीन आठवडे, उत्तर यायला तीन आठवडे. आपल्याकडून भारतातून आलेल्या पत्राला अगदी एक दोन दिवसात उत्तर लिहिलं गेलं तरी तिकडून तसं होईलच याची खात्री नसे. मायदेश सोडून आलेले आपण भावनिक गुंतवणुकीत अधिक गुंतलेले. तिकडे त्यांच्या दैनंदिन जीवनात फारसा फरक पडलेला नसायचा. मला आठवतंय, सासर - माहेरच्या सख्ख्या नातेवाइकांव्यतिरिक्त, मावश्या, मामा, मैत्रिणी झाडून सार्‍यांना तेव्हा मी पत्र लिहीत असे. मग  प्रतिसादाबद्दल आशा - निराशेचा खेळ चालू राही.  हळूहळू इ मेलचा जमाना आला. पण घरातल्या वयस्कर मंडळीना इ मेल कसं वापरायचं कुठे ठाऊक होतं? ते पत्राकडे डोळे लावून बसलेले असत. फोनचे दर स्वस्त झाल्यावर मग मात्र फोन मुळे हळूहळू पत्र लेखन कमी आणि  नंतर जवळजवळ  बंदच झालं. फोननंतर आता स्काइप, फेसटाइम, व्हॉट्सअॲप, गूगल टॉक....अशा अत्यानुधिक तंत्रांनी मात्र क्रांतीच केली. या सार्‍यामुळे आपल्या आयुष्यात झालेल्या बदलांचा मागोवा म्हणजेच ही लेखमालिका होती.

तळ्यात मळ्यात: आधुनिक तंत्रज्ञानामुळे आपण संवाद तर हरवून बसलेलो नाही ना ही जी शंका प्रत्येकाच्या मनात डोकावते त्यावरुन ’तळ्यात मळ्यात’ ची कल्पना सुचली.  दामले कुटुंबांवरचा हा लेख. केतन, मीरा आणि मुलं नानांच्या, केतनच्या वडिलांच्या घरी येतात. आईच्या निधनानंतर आग्रह करुनही अमेरिकेत न आलेल्या वडिलांना भेटायला केतन वर्षभराने भारतात येतो.  केतनच्या मनात नानांना भेटायची अनिवार ओढ  आहे. नानाही त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसलेले.. घरी आल्या या सार्‍याचं प्रतिबिंब प्रत्येकाच्या वागण्यात उमटतं. पण थोड्याच वेळात केतन आणि मुलं आपापले लॅपटॉप, फोन घेऊन बसतात. नानांचा नाराजीचा सूर जाणवतो आणि मीराला त्यांच्या मनातला एकटेपणा तीव्रपणे बोचतो. संपर्कात रहाण्याच्या आधुनिक साधनांबद्दल आनंद मानायचा की प्रत्यक्ष भेटीतली मजा त्यामुळे पटकन संपुष्टात येते याचं दु:ख हा प्रश्न मीराला छळत रहातो आणि निदान त्या क्षणीतरी नानांचा एकटेपणा घालवायचा मार्ग तिला सापडतो. असा या लेखाचा विषय होता. माझी खात्री आहे की अनेकांनी अंशतः तरी हे अनुभवलेलं असणारच. (बृहनमहाराष्ट्र वृत्त: ऑगस्ट २०१३)
मी काय करु?: अर्थाजन आलं की बचतही आलीच. पण याचा कधीकधी अतिरेक होतो आणि आपलेच जीवलग त्यात पोळले जातात हे लक्षातही येत नाही. यावरुनच हा लेख सुचला.
नोकरी करणारी मीना, आपल्या आई वडिलांना दर वर्षी मुलांना सुट्ट्या लागल्या की अमेरिकेत बोलवून घेते. डे केअर, आफ्टर स्कूल हे पर्याय असतानाही पैसे वाचवण्याच्या नादात, आईला आता झेपत नाही, तिची इच्छाही नाही हे जाणवूनही आजी आजोबांचा सहवास मुलांना मिळावा हे निमित्त पुढे करते. लेखातील, मीरा,  तिचे आई - बाबा, मीराचा नवरा, या सार्‍यांनाच प्राप्त परिस्थितीबद्दल पडलेला प्रश्न म्हणजेच, ’मी काय करु?’ (बृहनमहाराष्ट्र वृत्त:  ऑक्टोंबर २०१३)

कृतज्ञ: वर्षानुवर्ष परदेशात राहूनही आपल्या मनाचं पारडं मायभूमीकडे जास्त झुकलेलं असतं. कर्मभूमीचं काय? हे अनेकदा मनात येतं. त्याच विषयावरचा हा लेख.
समाजसेविका असलेल्या इराला अनिकेत जेव्हा भारतातल्या संस्थेला मोठी देणगी द्यायची इच्छा व्यक्त करतो तेव्हा सखेद आश्चर्य वाटतं. मातृभूमीच्या ऋणात रहायला हवंच पण कर्मभूमी विसरु नये हे अनिकेतला पटवून ती द्यायचा प्रयत्न करते.  इरा हे पटवून देते तेव्हा जे जग आपल्या समोर उभं करते ते मला महत्त्वाचं वाटलं. इथेही सारं काही आलबेल नाही आणि आपण ते बदलायला हातभार लाऊ शकतो ह्याचाच दाखला म्हणजे तिचं या क्षेत्रातील काम. हा लेख शारलटमध्ये गेली कितीतरी वर्ष समाजसेवा करणार्‍या मैत्रिणीच्या अनुभवावरून लिहिला. (बृहनमहाराष्ट्र वृत्त: डिसेंबर २०१३)

बोनसाय: महत्त्वाकांक्षी स्त्री आता नवलाची बाब राहिलेली नाही. एकमेकांच्या सहाय्याने आपली महत्त्वाकांक्षा उत्तम रितीने जोपासणारे पती - पत्नीही आता अगदी सहज दिसून येतात. पण तडजोडीची तयारी दोन्ही बाजूने नसते तेव्हा  परिस्थितीच्या चक्रात भरडल्या जाणार्‍या मुलांवर जो परिणाम होतो तो या लेखाचा विषय.
डिपेंडंट व्हिसावर आलेली स्वाती स्वत:च्या शिक्षणाला अमेरिकेत वाव दिसत नाही म्हटल्यावर केदारची इच्छा नसताना मुलाला, मंदारला घेऊन  भारतात ’ट्रायल’ म्हणून  परत जायचा निर्णय घेते. सततच्या वाद - विवाद आणि चर्चेतून ती स्वत:च्या निर्णयावर ठाम रहाते. केदार मात्र अनेक कारणांसाठी अमेरिकेतच रहातो. तो भारतात येण्याची आतुरतेने  वाट पहाणार्‍या  मंदारच्या मनावर, वागणुकीवर होणारा परिणाम म्हणजेच ’बोनसाय’  लेख. (बृहनमहाराष्ट्र वृत्त: फेब्रुवारी २०१४)

इच्छा: मृत्युची सावली पडलेल्या घरातलं शोकदायक वातावरण आणि भेटायला येणार्‍यांचं वागणं याचा होणारा मनस्ताप आपण ऐकलेला, अनुभवलेला असतो. पण घरातलेही काही जीवलगाच्या जाण्याचं दु:ख विसरतात तेव्हाची घरातल्या प्रत्येकाची मानसिक स्थिती दर्शविणारा लेख.
निलेश हा परदेशी रहाणारा आई - दादांचा मुलगा. स्मिता, सुनिल ही त्याची भारतातली भावंडं. अमेरिकेतून दादांच्या निधनानंतर दिवसांसाठी आलेला मुलगा आणि त्याची भारतातील भावंडं यांच्यामध्ये होणारे वाद, दोषारोप, उणीदुणी काढणं पाहून अखेर मुलांची आई फक्त एकच मागणं मुलांकडे मागते. तोच लेख ’इच्छा’. (बृहनमहाराष्ट्र वृत्त: एप्रिल २०१४)

रिंगण: आयुष्यात असे काही क्षण येतात की आपण रिंगणात अडकून पडलो आहोत असं वाटायला लागतं. तशाच एका प्रसंगातून जाताना या लेखातील रमाकांतच्या शोधयात्रेच्या प्रवासाचा वेध म्हणजे हा लेख.
भारतात कायमसाठी परत चाललेला संतोष रमाकांतना भेटायला येतो आणि ३० वर्षाहून अधिक काळ इथे राहिलेल्या रमाकांतचं मन आपल्या अमेरिकेत येण्याच्या निर्णयामागची कारणं शोधायला लागतं. आई - वडिलांची इच्छा? समाजात प्राप्त होणारी प्रतिष्ठा? की स्वत:चाच निर्णय या प्रश्नांचा गुंता सोडवणार्‍या मनाचा शोध म्हणजे म्हणजे ’रिंगण’. (बृहनमहाराष्ट्र वृत्त: जून २०१४)

सीमारेषा: परदेशात मूल वाढवताना कधी ना कधी, मायदेशीच असतो तर हा प्रश्न आणि तिथलं आणि इथलं ही  तुलना कधी उघड उघड तर कधी मनातल्या मनात केली जातेच. गिरीश, श्रावणी त्यांच्या मुलांच्या बाबतीत अशा एका प्रसंगाला सामोरे जातात आणि जर इथे राहिलो नसतो तर, भारतात असतो तर ह्या जर- तर ने श्रावणी  अस्वस्थ होते पण त्यांचा तरुण मुलगा, साकेतच त्यांची अस्वस्थता घालवायला मदत करतो. दोन पिढ्या आणि त्यांची मानसिकता आणि वेगवेगळ्या देशात मूल वाढवणं यावरचा  लेख म्हणजे ’सीमारेषा’. (बृहनमहाराष्ट्र वृत्त: ऑगस्ट २०१४)

दोन ध्रुवांवर - परदेशात गृहीणी असणं कधीकधी किती अवघड होऊन जातं यावर प्रकाश टाकणारा हा लेख.
नोकरी न करणारी सीमा आणि सतत कामाच्या व्यापात अडकलेला निलेश यांच्या संसाराची कथा म्हणजे दोन ध्रुवांवर. परिस्थितीला दोष देता देता, निलेशला दोषी मानणारी, त्याने परिस्थितीतून काढलेल्या मार्गांचा अवलंब करायला नकार देणारी सीमा आणि सीमाला आनंदी ठेवण्यासाठी धडपडणारा पण चुकत जाणारा निलेश. कोंडीत सापडल्यासारखं आयुष्य जगताना त्यांनी स्वत:साठी निर्माण केलेलं स्थान म्हणजेच, ’दोन ध्रुवावर’ हा लेख.  (बृहनमहाराष्ट्र वृत्त: ऑक्टोबर २०१४)

मंडळोमंडळी: भारताच्या बाहेर पडलं की मराठी माणूस एकत्र येतो आणि मंडळाची स्थापना होतेच. या मंडळांवरचा हा लेख. गावोगावी असणार्‍या महाराष्ट्र मंडळात सामील होण्याची प्रत्येक मराठी माणसाची कारणं वेगळी असतात. कधी मुलांसाठी, कधी ओळखी व्हाव्यात म्हणून तर कधी मुलांना, स्वत:ला व्यासपीठ मिळावं या हेतूने मंडळाचं सभासदत्व घेतलं जातं. पण मंडळाचा कारभार आणि लोकांची मानसिकता सर्वत्र सारखीच. राधा नावाच्या एका लहानग्या मुलीच्या, तसंच नाटकवेड्या नरेन आणि मंडळाच्या कार्यकारीणीच्या नजरेतून मंडळांच्या मानसिकतेचा वेध घेणारा लेख ’मंडळोमंडळी’.  (बृहनमहाराष्ट्र वृत्त: डिसेंबर २०१४)

अळवावरचे थेंब: हातातून निसटून गेलेले क्षण अळवावरच्या पाण्यासारखे घरंगळून गेलेले असतात. तसंच आयुष्यातल्या घटनांचंही. त्याच कल्पनेवरचा हा लेख.
प्रणिता आणि तिच्या दोन मुली, तितिशा आणि दिशा.   स्पर्धेच्या युगात त्यांनी मागे पडू नये म्हणून घाण्याला जुंपल्यागत सतत कुठल्या ना कुठल्या गोष्टीत त्यांना अडकवून टाकलेल्या आई - बाबांना या मुलींनी घातलेलं साकडं म्हणजे ’अळवावरचे थेंब’ हा लेख.
(बृहनमहाराष्ट्र वृत्त: फेब्रुवारी २०१५)

धागे: परदेशात रहाताना मायभूमीतील आपल्या जीवलगांशी मुलांची जवळीक रहावी यासाठी आपण अतोनात प्रयत्न करत असतो. आशा - निराशेच्या या खेळात कधीतरी दिसणार्‍या प्रकाशाच्या तिरीपिने हरखून जायला कसं होतं यावरचा हा लेख.
 भारतातल्या नातेवाइकांपासून मुलगा अलिप्त असतो याचा सल बाळगणारे केतकी - सारंग.  नीलला त्यांच्याबद्दल ओढ वाटावी यासाठी वर्षानुवर्ष प्रयत्न करणारी केतकी. अखेर नील महाविद्यालयीन शिक्षणासाठी बाहेरगावी गेल्यावर सगळे मार्ग खुंटल्यासारखे वाटत असतानाच नील अचानक एक सुखद धक्का देतो त्याची कथा सांगणारा लेख म्हणजे, ’धागे’.
(बृहनमहाराष्ट्र वृत्त: एप्रिल २०१५)

Thursday, July 23, 2015

परवाना

काल प्रेमपत्र आलं सरकारचं. हल्ली कुणाची पत्रच येत नाहीत त्यामुळे सरकारचं तर सरकारचं. कुणाला तरी झाली आठवण असं म्हणत नाचवत नाचवत ते पत्र पेटीतून घरात आणलं. चष्मा लावला तरी काय लिहलंय ते दिसेना तेव्हा दार उघडलं. पत्र उन्हात धरलं आणि एकदा थोडं जवळ, एकदा लांब असं करत कुठल्या कोनातून नीट वाचता येईल याचा अंदाज घेत वाचायला सुरुवात केली. हे रामा, डोळ्यांचीच परिक्षा घेणार होते म्हणे. "लायसन्स रिन्यूअल" गाडी चालवण्याच्या परवान्याची मुदत संपत आली. द्या परिक्षा पुन्हा. खुणा ओळखा, डोळे चांगले असल्याची खात्री पटवा. सुतकी चेहर्‍याने ते प्रेमपत्र पुन्हा पुन्हा वाचलं.

परिक्षा म्हटलं की आधीच घाबरगुंडी उडालेली असते आणि द्यायच्या तरी किती या परिक्षा.  सरकारी खात्यातली लोकं आपलं ओझं त्यांच्या खांद्यावर असल्यासारखा चेहरा करुन बसलेली पाहिली की पास होणारेही धाडधाड नापास होत असतील.  या देशात पहिल्यांदा अशी परिक्षा द्यायला गेले तेव्हा कणकवली, रत्नागिरीत दिलेल्या ’परिक्षा’ लक्षात होत्या. 8 आकडा तर काढायचा, आहे काय नी नाही काय असं म्हणत गाडीत बसले. बाजूला परिक्षक दार उघडून बसला आणि मग मात्र  गोंधळ सुरु झाला. एकतर या देशात नवीन, त्याचे उच्चार मला कसे समजायचे आणि मी बोललेलं त्याला कसं समजायचं. मी पेचात पडले. तोही त्याच पेचात असावा. चेहरा हुप्प करुन बसला होता.
’स्ट्रेट’ एका शब्दात दिलेले हुकूम पाळायची मला कधीच सवय नव्हती. संदर्भासहित स्पष्टीकरण असलं तरच जमतं बाई. तो पुढे काही बोलेल याची क्षणभर वाट पाहिली आणि विचारलं.
"स्ट्रेट.. यु मीन आय हॅव टू ड्राइव्ह स्ट्रेट?"
"लेफ्ट..." तो खेकसला. विचारता विचारता पुढे नेलेली गाडी मी घाबरुन एकदम लेफ्टली.
"ब्रेक, ब्रेक." तो माझ्यापेक्षा घाबरला असावा. फाटल्यासारखा ओरडला आणि अमेरिकन माणसाला कसं घाबरवलं या आनंदात मी जोरात ब्रेक दाबला. गाडी कशी कुणास ठाऊक पुन्हा जिथून सुरुवात झाली होती तिथेच आली होती. त्याने धाडकन दार उघडलं. तो श्वास वर खाली करत थोडावेळ तसाच बसून राहिला. धाप लागल्यासारखा. मला कळेना आता उतरायचं की तसंच बसून राहायचं, पास की नापास? त्याच्या लाल झालेल्या चेहर्‍याकडे हळूच पाहत विचारलं.
"आर यू ओके?"
"आय आस्क्ड यू टेक लेफ्ट."
"यस. ॲड आय डिड टेक लेफ्ट."
"थॅक गॉड." मग कशाला भडकला हा माणूस? मी हसून पाहिलं.
"यू डिड नॉट गो टू लेफ्ट लेन." तो गुरगुरल्यागत पुटपुटला.
"फॉर व्हॉट?"
"टू टेक  अ लेफ्ट टर्न..."
"असं जायचं असतं?" चुकून मराठीत विचारलं आणि त्याने खाऊ की गिळू नजरेने माझ्याकडे पाहिलं.
"सॉरी." आता नापास होणार या कल्पनेनं मला धाप लागली. तोपर्यंत त्याची धाप नष्ट झाली होती. तो गाडीतून उतरला. मी त्याच्या मागून मागून. सावित्रीच्या मनात यमाच्या मागून जाताना काय काय विचार येत असतील ते मला आत्त्ता कळत होतं.  आता, ’या पुन्हा’ सांगणार या तयारीतच त्याने दिलेला कागद डोळ्यासमोर धरला.  आनंदाने त्यालाच मिठी मारावीशी वाटली तरी शहाणपणा करुन त्याला अधिक पेचात न पाडता विजयी चेहर्‍याने मी माझा मोर्चा नवर्‍याच्या दिशेने वळवला. आता ही काय दिवे लावणार असा चेहरा करुन तो दूर कुठेतरी कोपर्‍यात लपला होता.

त्यानंतर सरकारला अशी अधूनमधून आठवण होतंच असते. मग व्हा सज्ज पुन्हा परिक्षा द्यायला. करा गोंधळ, निस्तारा असं चालू होतं. चुकीच्या वर्गात गेलो, चुकीचा पेपर लिहिला, चुकीच्या विषयाचा अभ्यास केला, परिक्षा काल आणि आपण आज तिथे गेलो अशी स्वप्न परिक्षा होईपर्यंत पडत राहतात. पुन्हा एकदा शाळेत गेल्याचा अनुभव आमचं हे सरकार देतं ते काय कमी आहे. चला लागा आता तयारीला....

Thursday, July 16, 2015

माझ्या मैत्रीणीची...

नुकतीच श्रीदेवीला, माझ्या मैत्रीणीला नोकरी लागली. ती नोकरीच्या शोधात बरेच महिने होती. नोकरी मिळवण्यासाठी काय काय करु शकतात लोकं याबद्दलचं माझं ज्ञान तिच्या नोकरी संशोधन काळात पीएचडी मिळवण्याइतपत वाढलं.
"आज मुलाखत द्यायला यायची आहे."
"यायची आहे? म्हणजे तुला मुलाखत द्यायला जायचं आहे का?"
"नाही फोनवर आहे ना मुलाखत. नाव माझं पण मुलाखत ती देईल. म्हणून ’यायची’ म्हटलं." हे असं चालतं ही ऐकीव माहीती उदाहरणासकट समोर आल्यावर बसलेला धक्का न दर्शविता मी ’अधिक’ माहितीसाठी बाजारात भाजी घ्यायला गेल्यासारखं विचारलं,
"सध्या काय दर आहे?"
"काम फत्ते झालं तर 500 डॉलर्स." ती ज्या कामासाठी या मुलाखती देत होती तेच मी पण करते त्यामुळे आपणही या ’बिझनेस’ मध्ये घुसून जोडधंदा सुरु करावा का असा विचार मनात चमकून गेला. तो चेहर्‍यावरही दिसला असावा.
"तू देशील का मुलाखत? मला काय तिला द्यायचे ते तुला देईन." माझं पापभीरु मन शहारलंच. असली बेकायदेशीर कामं आम्ही ’मराठी’ लोक करत नाही (?) हे ठसवायला घाईघाईत म्हटलं,
"नको नको, मला नाही अशा मार्गाने पैसे मिळवणं बरं वाटत. आणि तसंही माझ्याकडे भरपूर पैसे आहेत." म्हटलं आणि ती आता मग ते पैसे मला दे म्हणाली तर म्हणून घाबरले.
आधी तिची मुलाखत ती दुसरी देणार म्हणून घाबरले, आता माझ्याकडचे भरपूर पैसे तिने मागितले तर म्हणून पुन्हा घाबरले. माझं हे घाबराघुबरी प्रकरण संपेपर्यंत तिला नोकरी लागलीही. आणि काम करायला ती माझ्याच कार्यालयात रुजूही झाली....

एका दिवसानंतर...
कार्यालयात कसलातरी उग्र दर्प पसरला होता. बरीचजणं काम सोडून त्याची चौकशी करण्याकरता इकडे तिकडे करत होती. सहा सात जण वास सहन होत नाही म्हणून घरुन काम करायची परवानगी मिळवावी का याची चर्चा करण्यात मग्न झाले. थोड्याच वेळात त्यात ते यशस्वीही झाले. कार्यालय ओस पडलं. आम्ही आपले एकदोघं जण टकटक करत संगणक बडवत होतो. एकदम माझ्या लक्षात आलं, कालच नव्याने रुजू झालेली श्रीदेवी कुठे दिसत नाही. हिला आधीच समजलं की काय आज घरुन काम करता येईल म्हणून. आम्ही जेमतेम तिघंजणं उरलो होतो. पोनीटेलला विचारलं,
"श्रीदेवी कुठे आहे?"
"सिरी इज नॉट कमिंग बॅक."
धक्काच बसला.
"का? कालच तर तिचा पहिला दिवस होता. "
"हो, पण नो कम्युनिकेशन स्किल्स म्हणून शी गॉट फायर्ड यस्टरडे ओन्ली." मला तिच्या अशा येण्याचं आणि जाण्याचं प्रचंड दु:ख झालं. आली काय नी गेली काय. घरी गेल्या गेल्या मी तिच्याघरी धावले. खरं तर म्हणायचं होतं, बघ असले उद्योग करावेतच कशाला. नोकरी काय कधी ना कधी मिळालीच असती. केवढी नामुष्कीची गोष्ट आहे ही एकाच दिवसात हायर आणि फायर, उगाचच सार्‍या भारतीयाबद्दल पण मत.... पण नुसतीच लटकलेल्या चेहर्‍याने मी तिच्यासमोर उभी राहिले. तिने माझ्या पाठीवर थोपटलं,
"अगं इतकं काय मनाला लावून घेतेस. मिळेल मला नोकरी. एक दिवसाचा अनुभव माझ्या दृष्टीने खूप मोठा आहे. या एका वर्षाच्या अनुभवामुळे उद्याच एक मुलाखत आहे...."

Wednesday, June 24, 2015

एकांकिका

दरवर्षीप्रमाणे यंदाही एकांकिकांची तयारी जोरात सुरु आहे. पाहायला आलात तर नक्की आवडेल.


वेषांतर:
तामिळनाडू मधील अळमग्गळ नावाचं एक खेडं. जेमतेम पाचशे उंबरठे असलेलं. इथल्या एका पडीक अवस्थेतल्या वाड्यात वेषांतर एकांकिकेतील नाट्य घडतं. वाड्यातील शास्त्रीबुवा मूळचे गोमंतक. उपजिविकेसाठी पार दक्षिणेत येऊन स्थिरावलेले. मराठी भाषिक तरुणींच्या आगमनाने मुलखातलं कुणीतरी भेटल्याचा शास्त्रीबुवांना आनंद होतो. पण हा आनंद क्षणभुंगुर ठरावा अशा घटना घडत राहतात. घडणारं सारं प्रत्येकाच्याच दृष्टीने अकल्पनीय,धक्कादायक. निर्माण झालेल्या वादळाला कसं तोंड देतात या वाड्यातील व्यक्ती?
कलाकार : रणजित गुर्जर, मेघनाकुलकर्णी, सुप्रिया गरुड, मोहना जोगळेकर, बोस सुब्रमणी.

धोबीपछाड – कुस्तीमधला एक डाव. काळ बदलला, साधनं बदलली तसं डावपेचांचं स्वरुप बदललं. रंगमंचावरचा धोबीपछाडही असाच. या डावात कुस्तीपटू आहेतस्वत:ला यम म्हणविणारे दोघं. हे दोघं रंगमंचावरच शड्डू ठोकून उभे ठाकतात. सावित्री- सत्यवान भूमिका करायची की नाही या संभ्रमात पडतात. तेवढ्यातदुसरा यमदूतही उभा ठाकतो. नाटकातलं नाटक रंगायला लागतं. अखेर कोण होतं चितपट? यम की यम? आणि कोण होतं यमदूत…? विनोदी एकांकिका - धोबीपछाड.
कलाकार: संदीप कुलकर्णी, सचिन कुलकर्णी, प्रशांत सरोदे, प्रिती सुळे, चिन्मय नाडकर्णी, गिरीश भावठाणकर.
अधिक माहिती:

Tuesday, June 2, 2015

जागो हिंदुस्तानी

रंगमंचावर  रंग दे बसंती चोला हे गाणं सुरु झालं आणि एका कडव्याला त्यातील गाण्याच्या ओळी म्हणत  गायक रंगमंचावरुन खाली उतरले, मंचावरचे दिवे अंधुक होत गेले आणि उजळलेल्या प्रेक्षागृहात गायकांमधील एक  कलावंत प्रेक्षकांमधील आजींच्या चरणांशी वाकला. आजींनी डोळ्यांमधून ओघळणारे अश्रू पुसत गायकाला आशीर्वाद दिला. आपल्या मनात अढळ स्थान निर्माण केलेली गाणी तितक्याच ताकदीच्या गायकांकडून ऐकण्यात प्रेक्षक रमलेले असतानाच या प्रसंगाने सार्‍यांचीच मनं भारावून गेली. कार्यक्रम होता कोल्हापूरच्या स्वरनिनाद संस्थेचा जागो हिंदुस्तानी.


जागतिकीकरणाने सगळीच समीकरणं बदलली. कोणतंही गाणं इंटरनेटवर आता सहज उपलब्ध आहे. भारतातून सांस्कृतिक कार्यक्रम परदेशात येण्याचं प्रमाणही प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे, नाटक, संगीत, वादन, चित्रपट अशा कार्यक्रमांची रेलचेल चालू असते. सादरकर्त्यांची आणि पाहणार्‍यांची अभिरुचीही बदलली आहे. मग आवर्जून पहावं असं जागो हिंदुस्तानीमध्ये काय आहे? या कार्यक्रमाचं वेगळेपण कशात आहे? जागो हिंदुस्तानीचं यश आहे ते रंगमंचावर निवेदन आणि गायनाच्या साथीने रसिकांना आठवणींच्या राज्यात नेणं, विस्मृतीत जात चाललेल्या घटनांचा हात हाती घेऊन, प्रसंगाना उजाळा देत अलगद त्या काळात नेऊन सोडणं तर काहीवेळा आपल्या ऐकण्यात, माहितीत नसलेला एखादा प्रसंग, घटना डोळ्यासमोर जसा घडला तसा उभा करणं यामध्ये आहे. दोन - अडीच तासाचा हा कार्यक्रम आपल्याला एका वेगळ्या विश्वात नेतो, गत आणि वर्तमान काळाची सैर चालू रहाते ती नव्या - जुन्या गाण्यांच्या साथीने. अभिमान, खेद, हळहळ, चुटपूट, स्फूर्ती, उत्साह अशा सार्‍या भावना या वाटेवर आपल्या सोबतीने येत रहातात आणि एक अविस्मरणीय कार्यक्रम पाहिल्याचं समाधान मनात  तरळत रहातं.
जागो हिंदुस्तानी कार्यक्रमात निवेदक भूषण शेंबेकर आपल्या डोळ्यासमोर प्रत्येक प्रसंग ताकदीने उभा करतात. भूत - वर्तमानाची पानं अलगद उलगडत राहतात. प्रत्येक प्रसंग आपल्या डोळ्यासमोर उभा करण्यात ते यशस्वी होतात. उधमसिंग ह्यांनी पंजाबच्या गव्हर्नर मायकल ओव्हायरची जालियनवाला हत्याकांडाला जबाबदार धरत गोळ्या झाडून हत्या केली. हा प्रसंग ऐकताना उधमसिंगांनी दिलेला कबुलीजबाब ऐकताना आपला उर  अभिमानाने  भरुन येतो. प्लासीच्या विजयानंतरच्या जल्लोषात पराजित हिंदुस्तानी काय करु शकत होते याबद्दल त्या मिरवणुकीत सामील असलेल्या परकीयाचे शब्द ऐकताना चुटपूट लागते, खेद वाटतो. निवेदनातून येणार्‍या या अशा आणि अनेक घटना ऐकता ऐकता  सर्वांच्याच मनात प्रसंगांची गर्दी व्हायला लागते. देशासाठी लढलेल्या, प्राण गमावलेल्या अनामिक वीरांच्या बलिदानाची आठवण येऊन हळहळ वाटते आणि स्वातंत्र्यानंतरच्या कालावधीनंतरचा भारत नजरेसमोर आला की आपण काय काय गमावलं, कुठून कुठे पोचलो ह्याचा हिशोब मन मांडायला लागतं. 

भारत १९९७ साली स्वातंत्र्याचं ५० वे वर्ष साजरं करत असताना निर्माते सुनील सुतार आणि दिग्दर्शक सुरेश शुक्ल यांनी आपल्या स्वरनिनाद या संस्थेतर्फे जागो हिंदुस्तानी चा पहिला प्रयोग रंगमंचावर आणला. आणि त्यानंतर सातत्याने त्यांचे प्रयोग भारतभर चालू आहेत. या कार्यक्रमाला नेपथ्य आहे ते भारतीय ठेव्याचं,  रेखाटनं आहेत ती ऐतिहासिक ठिकाणांची. उत्कृष्ट प्रकाशयोजनेमुळे ह्या रेखाटनांचा ३D परिणाम छान साधला जातो. 

स्वरनिनादने गेले २६ वर्ष सातत्याने गर्जा महाराष्ट्र, देस मेरा रंगीला, गीत बहार, लख लख चंदेरी, शब्द सुरांच्या झुल्यावर असे वेगवेगळे हिंदी, मराठी गीतांचे कार्यक्रम भारतभर सादर केले आहेत.

जागो हिंदुस्तानी हा जो कार्यक्रम सध्या अमेरिकेत चालू आहे त्याचे भारतात आत्तापर्यत सर्वत्र प्रयोग झाले आहेत. वाघा सरहद्दीवरही हा कार्यक्रम झाला आहे याचा प्रामुख्याने उल्लेख करावासा वाटतो. इतकंच नाही तर तुरुंगातील कैद्यांना घेऊन त्यांच्याकडूनच हा कार्यक्रम करुन घेण्याचा आगळावेगळा प्रयोगही स्वरनिनादने यशस्वीरीत्या केला. २ राष्ट्रीय तर २ राज्य पातळीवरच्या पुरस्काराने हा कार्यक्रम सन्मानित झालेला आहे. उत्कृष्ट संगीत, गाणी, नेपथ्य, प्रकाशयोजना असलेला हा दोन - अडीच तासांचा कार्यक्रम आपल्याला खिळवून टाकतो.  गाण्यातील भावना थेट हृदयापर्यंत पोचवणारे समर्थ गायक यात आहेत. आणि सध्याच्या काळातील कार्यक्रमांच्या बदललेल्या स्वरुपाच्या पार्श्वभूमीवर संदेशे आते है, फिर भी दिल है हिंदुस्तानी, बोलो मेरे संग,  भारत के रहनेवाला, ए मेरे वतन के लोगो, सारे जहॉंसे अच्छा, वंदे मातरम अशी एकापेक्षा एक सरस गीतं असलेला हा कार्यक्रम पहाताना आपण वेळेचं भान विसरुन जातो. म्हणूनच म्हणावंसं वाटतं, ध्वनी - प्रकाश - नेपथ्य - गायन - वादन - निवेदनाचा जमलेला सूर म्हणजे जागो हिंदुस्तानी हा कार्यक्रम. प्रत्येकाने एकदा तरी अनुभवून डोळे आणि कान तृप्त करावेत असा!  


BMM वृत्तमध्ये प्रसिद्ध - http://bmmonline.org/sites/default/files/BMM/BMM/2015_6_BMMVrutta_MohanaJoglekararticle.pdf