Showing posts with label कथा. Show all posts
Showing posts with label कथा. Show all posts

Sunday, October 15, 2017

सोबतीचं नाट्य


"आता हातापाया पडून काही होणार नाही. काही बरं वाईट घडलं असतं तर तुझ्या आईला तोंड दाखवायला जागा उरली नसती. आता काही लहान नाहीस तू छाया." सुजाताचा पारा चढला होता. रंगीबेरंगी परकर पोलका घातलेली छाया निर्विकारपणे नखं कुरतडत तिच्यासमोर उभी होती.
"ठोंब्यासारखी काय उभी आहेस? आवर तुझं पटकन." 
"सुजाताई, मी परत सांगते तुला; माजं टकुरं फिरलं म्हनून वंगाल वागले. पुना न्हाई व्हनार. देवाची आन." छायाने गळ्याची शपथ घेतली.
"काय व्हायचं राह्यलं आहे छाया? तुझ्यामुळे त्या गलिच्छ झोपडपट्टीत पाऊल टाकावं लागलं. आयुष्यात अशा जागी कधी पाय ठेवेन असं वाटलं नव्हतं." सुजाता चांगलीच वैतागली होती.
"ताई, झोपडपट्टी इतकी खराब नस्ती." रुसक्या आवाजात  छाया म्हणाली.
"छायाऽऽऽ" सुजाताच्या आवाजातली जरब छायाला जाणवली. मुकाट्याने खोलीत जाऊन तिने स्वत:चे चार कपडे आणि किडूकमुडूक सामान गोळा करुन  पिशवीत कोंबलं. पिशवीचे बंद घट्ट धरुन ती सुजातासमोर उभी राहिली. सुजाताने गडबडीत कापलेल्या केसावरून पुन्हा कंगवा फिरवला. ओठावरून लिपस्टिक फिरवली. अपराधी चेहर्‍याने तिच्याकडे पाहणार्‍या सासुबाईंकडे दुर्लक्ष करत त्यांना काहीही बोलायची संधी न देता ती छायाला घेऊन बाहेर पडली. छाया आणि सासूबाई, दोघींनाही समजावणं म्हणजे दगडावर डोकं फोडून घेण्यासारखं वाटत होतं सुजाताला. तसंही अधिक बोलण्याचं त्राण उरलं नव्हतं आणि इच्छाही. उल्हासच्या ताब्यात छायाला दिलं की ती सुटकेचा श्वास सोडणार होती. पुढे ठरल्याप्रमाणे तो सारं पार पाडेल याची तिला खात्री होती.

उल्हासबरोबर छाया निघाली खरी. पण नक्की काय झालं आणि सुजाताई इतकी वेड्यागत का ओरडत होती तेच छायाला कळत नव्हतं.  वरडली तर वरडली वर उल्लासदादाबरुबर सोडून निगून बी गेली. कशापायी आनलं मग हितं? सुजाताईला  झोपडपट्टीत जावं लागलं तर येवडं नाटक? नाटकीपना लई हाय तिच्यात.  ताई  रुबाबदार हाये. राहती बी असी टेचात की जीव दडपतो. पैका हाये तर उडवती कसा बी.  हापिसीण हाय म्हनं. टकटक करत चाल्ती उंच टाचच्या चपला घालून आनि घरात फटाकफटाक स्लीपर उडवती. केसं इतक्या येलंला सरल करती, सारका चाला हातानी केसाबरुबर. हात कसं दुकत नाय देवजाने.  जितं तितं केस पडत्यात. घानच की. पन त्येचं काय नाय. गरीब मानसं म्हंजी या लोकास्नी घान वाटती.  सारकी नाक दाबत व्हती झोपडपट्टीतून येताना. मनातल्या विचारांना थोपवताना गावाकडे पाहिलेली सुजाताई आता फार बदललेली आहे याची छायाला खात्री पटली.  वैनीबायची मुलगी तर ती अजिबात शोभत नाही या बद्दल मनात शंकाच उरली नाही छायाच्या. शहरातली माणसं एवढ्या तेवढ्याला घाबरतात का हे कोडंही सोडवता येत नव्हतं तिला. बाजूला बसलेल्या उल्हासकडे तिने पाहिलं.  उल्हासदादाच्या बावळटपणाचीही तिला गंमत वाटत होती. सुजाताई आणि उल्हासदादा. डरपोक! त्यांचे त्यावेळचे चेहरे आठवून हसू दाबत राहिली ती कितीतरीवेळ. पण आता तिला वाईट वाटायला लागलं, चिडचीड व्हायला लागली. रडावंसं वाटत होतं. आईच्या आठवणीने छायाच्या डोळ्यांना धार लागली. उल्हासदादासमोर तिला रडायचं नव्हतं आणि ती रडतेय हे कळू पण द्यायचं नव्हतं. ती समोर बघत राहिली.  डोळ्यांतून वाहणारं पाणी आपोआप सुकायला लागलं.  मन थोडं शांत झाल्यावर सुजाताईची सासू महामाया वाटायला लागली छायाला. तिच्यामुळेच तर घडलं सारं. शहरातली माणसं  पराचा कावळा करणं कधी सोडणार तेच तिला समजत नव्हतं.  सुजाताईच्या तापट स्वभावाबद्दलही वैनीबायकडे तक्रार करावी लागणार होती. कळू दे वैनीबायला तिची लेक कशी आहे ती. गेल्या वर्षी गावाहून इथे यायचं पक्कं करायलाच नको असं वाटून गेलं छायाला. बेक्कार माणसं शहरातली. गावीच बरं होतं. मधलं एक वर्ष पुसून ती नांदगावला पोचली.

धो धो पावसात अंगावरचं कांबळं छायाने झटकलं आणि बंधार्‍यातल्या चिखलात हात घातला. भरपावसात दोन तास काम करुन ती वैतागली होती. 
"ए, अगं द्यान कुटे तुजं? वैनीबाय बोलवती बग." आईच्या आवाजाने वाकलेली छाया ताठ झाली.
"कशापायी? तूच जा. मी नाई येनार आता."
"अगो, जा च्या देनार आसल. जा. तू परत आली की मी जाईन." चहाच्या नावानेच छायाला तरतरी आल्यासारखं वाटलं.  पावसाच्या संततधारेमुळे चांगलंच अंधारुन आलं होतं. हवेतला गारवा अंगाला झोंबत होता. पळत पळत ती पडवीत येऊन विसावली. अंगावरचं कांबळं बाजूला ठेवून ओला झालेला चेहरा तिने पुसला. पाण्याच्या थेंबाआडून स्वयंपाकघराच्या पायर्‍या उतरुन येणार्‍या वैनीबाय कडे ती पाहत राहिली. वैनीबायचं टिळ्याएवढं कुंकू तिला फार आवडायचं. आणि नऊवारी साडी नेसावी तर वैनीबायनंच इतकी छान वाटायची तिला वैनीबाय नऊवारीत. वैनीबायच्या प्रसन्न चेहर्‍याकडे पाहिलं शांत वाटायचं. छायाच्या हातात चहा देऊन वैनी बाय बाजूलाच बसली. छायाने फुर्र, फुर्र करत चहा तोंडाला लावला.
"तू बेंगलोर बघितलं आहेस का गं छाया?" बशीतला चेहरा छायाने वर केला.
"हे काय हाय?"
"अगं आपल्या सुजाचं गाव."
"नाई ब्वॉ. मुंबयच्या जवल हाय का?" वहिनींना हसायला आलं.
"छे गं. पण जायचंय का तुला बेंगलोरला? सुजा म्हणत होती छायाला पाठवून दे म्हणून."
"अय्याऽऽ. मी नाई बाई. आनि सुजाताई मला का बोलावती?"
"मदतीसाठी."
"नाई जमायचं वैनीबाय. मी हितंच बरी  हाये. आयेला हाय कोन माज्याबिगर." छाया पुटपुटली.
"तुझ्या आईशीच बोलते मी." छायाने नुसतीच मान डोलवली आणि निमूटपणे ती चहा पीत राहिली. वहिनींनी तिथूनच यमुनाला हाक मारली. यमुना येईपर्यंत पुन्हा चुलीवरचा चहा कपात ओतून त्यांनी गरम दूध टाकलं.
"घे. आभाळ भरुन आलंय आज अगदी." यमुना पुढे चहाचा कप धरत त्या म्हणाल्या.
"आये, वैनीबायला कायतरी विचारायचं हाये म्हनली ती." वहिनी हसल्या.
"अगं. चहा तरी होऊ दे पिऊन तिचा." यमुनाने घाईघाईत चहा ओठाला लावला. चहा पिऊन ती लगबगीने विहिरीपाशी गेली. कठड्यावरचा तांब्या तिने उचलला. पाणी होतंच त्यात. तिने पटकन दोघींचे कप धुऊन टाकले.  धुतलेले कप उलटे करुन कट्ट्यावर  ठेवले. पदराला हात पुसत ती वहिनी बसल्या होत्या तिथल्याच खालच्या पायरीवर टेकली.
"काय म्हनत व्हता वैनीबाय तुमी?" तिने उत्सुकतेने विचारलं.
"छायाला बेंगलोरला पाठव असं म्हणत होते."
"बेंगलोर? म्हंजी?" यमुनाच्या चेहर्‍यावर प्रश्नचिन्ह होतं.
"सुजाताकडे."
" अगोबाई,  सुजाताईचं गाव."
"सुजाता मागे लागली आहे छायाला पाठवून दे म्हणून."
"व्हय की काय. पन कसापायी म्हनायचं?"
"मदत हवी आहे तिला घरकामात."
"अवं दोन मान्सं ती. मदद कसली लागते म्हंते मी." यमुनाला खुदकन हसायलाच आलं.
"तिच्या सासूबाई असतात तिच्याघरी. आमचे जावईबापू सतत देशाच्या बाहेर. सुजापण साहेबीण आहे कुठल्याशा कंपनीत. वेळ कुठे असतो तिला. घरात दिवसभर कुणी असेल तर बरं. सोबत होईल सासुबाईंना असं म्हणतेय ती. पत्र आलंय काल."
"तिकडं राजेस खन्नाचा पिक्चर गावल काय बगायला?"  छायाने उत्सुकतेने विचारलं.
"सुजाता नेईल तुला पिक्चर दाखवायला." वहिनी हसून उत्तरल्या.
"आनि फॅसनची कापडं?"
"ती पण देईल सुजाता तुला. झालं समाधान?" वहिनींनी पुन्हा हसून विचारलं.
"हा. जाती मग मी. आये, आदी मी बगती कसं हाये सुजाताईचं गाव. मग तुला बी घेऊन जाईन." छायाला आता कधी एकदा बेंगलोर गाठतोय असं झालं.  तिने कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती आणि अचानक स्वर्गाचं दार दिसायला लागलं होतं.  तरी पत्रापत्री होऊन सारं ठरेपर्यंत  महिना गेलाच.

शेजारच्या वाडीतल्या जाधवांबरोबर रात्रीच्या गाडीत तिला आईने बसवून दिलं तेव्हा पंधरा वर्षाच्या छायाच्या डोळ्यात उत्सुकता, भिती, आईला सोडून राहण्याच्या कल्पनेनं झालेलं दु:ख सार्‍या भावना एकवटून आल्या.  आई एकटीने कसं निभावेल या शंकेने डोळ्यात अश्रू जमा झाले. अण्णा फणस उतरवताना झाडावरुन पडून वारले त्याला कितीतरी वर्ष झाली. तिला ते आठवतही नव्हते. तिच्या विश्वात ती आणि आई. दोघीच.  वहिनींच्या घरातल्यांचाच आधार होता आणि ती सर्व खूप काळजी घेत मायलेकींची. वहिनींनी तर छायाने शाळेत जावं म्हणून कितीवेळा सांगून पाहिलं होतं. पण छायाला आवड नव्हती शाळेची. वहिनी मागे लागल्या की ती फक्त मान डोलवायची. चार घरची कामं करुन रोजचा दिवस सुखात जात होता मायलेकींचा. अधूनमधून टूरींग टॉकीजचा पिक्चर पाहिला की महिनाभर छाया त्या दुनियेत वावरायची. आता बेंगलोरला भरपूर पिक्चर पाहायचे सुजाताईबरोबर, काम करायचं, गाव फिरायचं, नवीन नवीन कापडं घालायची अंगावर अशी स्वप्न पाहत ती निघाली होती. सुजाताई गावी आली की किती छान गप्पा मारते, चौकशी करते. तिच्याबरोबर राहायचं म्हणजे मजाच.  विचारांच्या या फांदीवरुन त्या फांदीवर उड्या मारणं चालू होतं छायाचं. बेंगलोरला कधी एकदा पोचतोय असं झालं होतं त्याचवेळी किती दिवसांनी परत यायला मिळेल असाही विचार डोकावत होता मनात. सुजाताई वर्षातून एकदा येते हे आठवलं आणि  तिच्याबरोबर येता येईल या खात्रीने ती निश्चिंत झाली.  सुजाताईला सांगितलं तर ती तिच्या आईलादेखील बेंगलोरला आणेल याचाही तिला भरवसा होता.   बेंगलोर आवडलं तर बघू, ठरवू काय करायचं. विचारांचे तुकडे जोडता जोडता हातातलं बोचकं सांभाळत छाया खिडकीला डोकं टेकवून झोपायचा प्रयत्न करत राहिली. बेंगलोरला जायला खूप दिवस लागतात इतकंच ठाऊक होतं. मुंबईला सुजाताई तिला न्यायला येणार होती.  सकाळी जाग आली तेव्हा परळ आलेलं होतं. अधीर नजरेने तिने बाहेर डोकावलं. सुजाताई दिसल्यावर बावरलेल्या नजरेने जाधवांचा निरोप घेऊन ती सुजाताईच्या मागून निघाली. एक दिवस मुंबईत राहून रेल्वेने बेंगलोरला पोचायचं होतं. पण सुजाताताईचा आधार होता त्यामुळे मनावर दडपण नव्हतं.

 छाया बेंगलोरला पोचल्यावर भांबावलीच.  खेडेगावातली छाया उच्चभ्रू वस्तीत येऊन पोचली होती.  भाषेचा प्रश्न होता आणि त्यात येता जाता छायाच्या कानावर इंग्रजीच पडायचं. त्यातल्या त्यात संध्याकाळी खाली गेलं की तिच्यासारख्या गावाकडून आलेल्या मुलींबरोबर मोडक्या तोडक्या हिंदीत ती गप्पा मारायची.  इमारतीच्या रखवालदाराबरोबर गप्पा मारण्याचं तर तिला वेडच लागलं होतं. तेवढाच विरंगुळा. दिवसभर कामापेक्षाही सुजाताच्या सासूच्या बडबडीची तिला कटकट वाटे. सुजाता येण्याच्या वेळेस तिच्या सासुबाईंच्या बडबडीकडे कानाडोळा करायला ती शिकली लवकरच. काहीतरी खुसपट काढून सुजाताची सासू बडबडायला लागली की तिला खूप राग येई. फुटाणा फुटल्यासारखी तीही तडतडायला लागायची. सात जन्म घेतले तरी म्हातारीचं समाधान करणं कठीण असं तिला ठामपणे वाटत होतं.   केर काढायला लागलं की  बसल्या बसल्या हाताने इथून केर काढ, तिथून केर काढ, भाजी चिरायला घेतली की अशी काप न तशी काप, कपडे वाळत घालायला गेलं की आडवे घाल नी उभे घाल सारखं तोंड चालू. कटकट! मग छाया पण काहीतरी खोड काढायची. त्रास द्यायची मुद्दाम. रात्री सुजाता यायच्या वेळेस मात्र छायाचं रुप वेगळं असायचं. आपण ताईच्या सासूची  किती काळजी घेतो हे ती दाखवून द्यायची.  त्यामुळे सासूने छायाबद्दल केलेल्या तक्रारी सुजाता ऐकून घ्यायचीच नाही. सुजाता सासूवर डाफरली की छाया मिष्कील नजरेने पाहत राहायची. पण आज मात्र अती झालं. सकाळपासून पिरपिर आणि चुका दाखवणं त्यात त्या तिच्या कपड्यांवर घसरल्या.
"छाया, जरा कपड्याचं भान बाळग." सुजाताच्या सासूबाईंनी रेडिओचा आवाज कमी केला. त्यांच्यासमोर तांदूळ निवडत बसलेल्या छायाच्या उघड्या पडलेल्या गुडघ्यांकडे नजर टाकत त्या म्हणाल्या.
"काय जालं? तुमी आनि मी. हाय कोन दुसरं हितं?" पटकन कपडे नीट करत छाया गुरकावली.
"तसं नाही. सवय होते. तरुण वय आहे तुझं. जपावं  स्वत:ला."
"सुजाताई स्लिवलेस घालून जाती की कामाला. तिला न्हाय काय सांगत तुमी."
"सुजाताईचं तू मला नको सांगू. पायरी सांभाळून राहावं माणसानं." छायाने नाक मुरडलं तशा त्या आणखी चिडल्या. "आणि बघावं तेव्हा बाहेर पळत असतेस. काय खाणाखुणा चालू असतात गं तुझ्या त्या रखवालदाराबरोबर?" छायाने चमकून पाहिलं.
"कोन रखवालदार?" निर्विकार चेहरा करत तिने विचारलं. त्या काहीच बोलत नाहीत हे पाहून पुढे छायाच म्हणाली, "तुमची नजरच वंगाल तर मी काय करु?"
"चार शहाणपणाच्या गोष्टी सांगतेय तुला. ऐकायंचं की नाही तू ठरव. पण अशीच वागत राहिलीस तर सुजाताला सांगून गावी पाठवून देते तुला." सुजाताच्या सासूबाई समजुतीने सांगत होत्या पण छाया भडकली.
"ए, ऐकून घेती म्हनून लई शानपना कराय लागली तू. " छायाने तांदळाचं ताट दाणकन फरशीवर आपटलं आणि ती त्यांच्या अंगावर धावून गेली.
"काय करशील गं तू? अक्कल नाही काडीची आणि मला तोंड वर करुन बोलतेस?" सुजाताच्या सासूबाईंनी तिचा हात घट्ट धरला. मनगट लाल झालं छायाचं. सुजाताने हजारवेळा बजावूनही त्यांना शांत राहता येईना.  छायाही त्यांच्या डोळ्याला डोळा देऊन उत्तरं देत राहिली.  दोघी कडाकड भांडत राहिल्या. कुणीतरी दार जोरात वाजवलं आणि चपापून दोघी शांत झाल्या.
"दार उघड." सुजाताच्या सासूबाईंनी हुकूम सोडला. पाय आपटत छायाने दार उघडलं आणि दारात कोण आहे हे ही न बघता ती जिन्याच्या दिशेने निघाली. पायर्‍या उतरेपर्यंत तिचा श्वास फुलला होता. इमारतीच्या खाली उतरल्यावर फाटक जोरात उघडून बंद करुन ती रस्त्यावर आली. आता? क्षणभर रस्त्यावरची कुठली दिशा पकडावी या संभ्रमात ती तशीच थांबली. तिडीक आल्यासारखी समोरची रिक्षा तिने थांबवली.
"राजिंदरनगर"  दाणदिशी ती रिक्षात बसली. इमारतीत काम करणार्‍या खूप मुली तिथे राहतात एवढंच माहीत होतं छायाला. तिच्या मनातला संताप खदखदत होता.
"साली, रोजची कटकट. मरत पन  न्हाय लवकर..." मनातले विचार बाहेर आले असावेत. रिक्षावाला आरशातून मागे बघायला लागला.
"पुडं बग." छाया वसकन ओरडली. रिक्षावाल्याला काही कळलं नाही तरी पटकन त्याने  नजर वळवली. छाया रस्त्याच्या दोन्ही बाजूने मागे पडणार्‍या गर्दीकडे बघत राहिली. ’थेरडीचं तोंड बघणार नाही पुन्हा.’ गार वारा अंगावर झेलत तिने मनात पक्कं केलं तसं तिला बरं वाटलं. पण संतापाने का कशाने डोळ्यातून पाणी गळायला लागलं होतं. रिक्षा गचकन थांबली तशी ती भानावर आली.
"काय जालं दादा?" गोंधळून तिने विचारलं.
"राजेंन्द्रनगर आलं. कुठं जायचं आहे? पत्ता काय आहे?" राजेन्द्रनगर म्हटल्यावर ती उतरली. पुढचं ऐकायला ती थांबलीच नाही तसंही तो माणूस कानडीत  बोलत होता. ती त्याच्याकडे पाठ करुन चालायला लागली. रिक्षा घाईघाईत बाजूला उभी करुन रामण्णा तिच्यामागे धावले.
"मुली, अगं पैसे दे. इथपर्यंत आणलं तुला." छायाने मागे वळून पाहिलं नाही. रामण्णांनी धावत येऊन तिचा हात पकडला. तिने मान वळवून पाहिलं. तिच्या डोळ्यातलं पाणी पाहून रामण्णा गडबडले.
"काय झालं? हरवली आहेस का बेटी? कुठे जायचं, कुठून आलीस?" छाया नुसतीच त्यांच्याकडे पाहत राहिली. एक अक्षर कळत नव्हतं.
"इथे जवळच  पोलिसठाणं आहे. तिथे सोडतो मी तुला. पोलिस मदत करतील." छायाला फक्त पोलिस हा शब्द कळला आणि रामण्णांचा हात झिडकारुन ती पळायला लागली. आजूबाजूला जमलेल्या लोकांना रामण्णा काय झाले ते सांगत होते तोपर्यंत छाया लांबवर पोचली होती. काही सुचत नसल्यासारखी ती भरकटत फिरत राहिली. वाटेत एका दुकानाच्या आडोशाला बसून तिने गुडघ्यात डोकं खुपसलं. रडावंसं वाटत होतं. आई पाहिजे होती. नाहीतर सुजाताई तरी. आता तिला घरी परत जावंसं वाटायला लागलं. पण सुजाताईच्या सासूबद्दल भिती दाटून आली. सुजाताईला एव्हाना काय झालं ते कळलं असेल. ती घरी आली असेल. भिरभिर्‍या नजरेने ती इकडे तिकडे पाहत राहिली.  रस्त्यावरची गर्दी, गाड्या, कानडी भाषा कान किटायला लागले छायाचे. किती वेळ गेला कुणास ठाऊक. तास, दोन तास... ती तशीच बसून राहिली. हातापायातलं त्राण गेल्यागत. राजेन्द्रनगरात ती पोचली होती. आता तिला एखाद्या तरी मैत्रिणीला गाठायचं होतं. उठावसं वाटत होतं तरीही ती हलली नाही. येणारी जाणारी माणसं बघत राहिली. त्या तेवढ्या माणसात कुठेतरी तिला रामबहादूर दिसला. आनंदाने उडी मारावी असं वाटत होतं छायाला. उठलीच ती. धावत जाऊन तिने त्याला गाठलं.
"तू इकडे?" त्यालाही आश्चर्य वाटलं.
"तू राजिदंरनगर मदी रातोस?" त्याने मान डोलवली. पण ती या भागात कशी ते त्याला समजत नव्हतं.
"तू मला गावाकडं जानार्‍या गाडीत बसवून देसील?" तिने हळूच विचारलं. रामबहादूरच्या ती घरुन निघून आली आहे हे लक्षात आलं.
"भांडलीस?" त्याने विचारलं. तिने उत्तर दिलं नाही. रडायलाच यायला लागलं तिला. रामबहादूर गडबडला.
"छाया, रस्त्यावर नको रडूस. असं करु, तुला भूक लागली असेल ना? समोरच्या हाटेलात जाऊ चल." त्याच्या आपुलकीच्या स्वराने तिला अजून मोठ्यांदा रडावंसं वाटत होतं. पण डोळे पुसत ती त्याच्या मागून चालत राहिली. इडली, डोसा पोटात गेल्यावर तिला बरं वाटलं.
"चल, जाऊ या?" तिला कधी एकदा नांदगावला परत जाऊ असं झालं होतं.
"तुझी गाडी रात्रीची असेल. आणि मुंबईपर्यंत जाशील इथून. तिथून पुढे कशी जाणार?" रामबहादूरलाही नीट काही ठरवता येत नव्हतं.
"मी गाडी येईस्तो थांबती ना तितंच. मुंबयला पोचले की बगीन माजं मी कसं जायचं गावी ते. पन इतं नाही रानार मी."
"ऐक माझं. मॅडमला मी सांगतो काहीतरी. घरी सोडतो मी तुला. तिथून दुसर्‍या बिल्डिंगकडंकडं जाईन. रात्री तिथं ड्युटी आहे."
"मग आदी मला गाडीत बसव आनि जा."
"तुझ्या मॅडमला कळलं तर माझी नोकरी गेलीच समज." त्याला हे नसतं झेंगट कसं दूर करायचं ते कळत नव्हतं.
" तिला नाय कलनार पन मला गावीच जायाचं हाय." छाया ठाम होती.
"कामावर सांगून यायला लागेल. न सांगता आलो तर नोकरी जाईल."
"मी पन येते." ती त्याच्याबरोबर निघाली. त्याने आपल्या कामाच्या जागी आज रात्री येणार नसल्याचं सांगितलं आणि पुन्हा रस्ता पकडला. मुंबईला जाणार्‍या गाड्या सगळ्या रात्रीच्या. दहानंतर.   अजून पाच सहा तास कुठे काढायचे? विचार करुन त्याने तिला खोलीवर न्यायचं ठरवलं. पण लगेच त्याच्या डोळ्यासमोर खोलीतलं दृश्य आलं. नेहमीप्रमाणे दोन - चार जणं पडीक असणार तिथे आजूबाजूच्या खोपटातली. काय करायचं? गाडीची वेळ होईपर्यंत थांबण्यासारखं ठिकाण त्याला आठवेना. खोलीवर पोचलो की बघू असा विचार करत तो छायाबरोबर चालत राहिला. आज पहिल्यांदाच तो असा एखाद्या मुलीबरोबर चालला होता. उगाचच काहीतरी पराक्रम गाजवल्यासारखं वाटत होतं त्याला. छाती ताठ करुन खूशीत गप्पा मारत तो छायाबरोबर चालायला लागला.  गल्लीबोळातून चालताना छायाचा नकळत होणारा स्पर्श त्याला आवडायला लागला. एक दोनदा त्याने उगाचच तिच्याशी जवळीकही केली. छाया सुजाताच्या सासूच्या तक्रारीमध्ये इतकी गर्क होती की तिला त्याने जाणूनबुजून केलेला स्पर्श जाणवलाही नाही.  रामबहादूर मात्र आता अस्वस्थ व्हायला लागला. छायाला एकदम जवळ घ्यावं असंच वाटायला लागलं त्याला. मनातल्या विचारांना थारा न देण्यासाठी तो झपाझप पावलं टाकत चालायला लागला. छाया मागे राहिलेली लक्षातच आलं नाही त्याच्या. पळतपळत छायाने त्याला गाठलं आणि त्याचा हात पकडला तसा तो थांबला. छायाच्या स्पर्शाने अंगातून वीज गेल्यासारखं वाटलं त्याला. 

घरुन फोन आल्याचं तिच्या सेक्रेटरीने सांगितल्यावर सुजाताला आश्चर्यच वाटलं. सासूबाई कधीच फोन करत नसत. काय झालं असेल? गडबडीने तिने फोन घेतला.
"अगं, छाया गेली घरातून निघून."
"बाहेर गेली असेल. येईल. इतक्या का घाबरताय तुम्ही?" सुजाताने त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पण त्या श्वासही न घेता सांगत राहिल्या.
"रागावून गेली आहे ती सुजाता. मी दोन तास वाट पाहूनच फोन करतेय तुला. तू ये बाई घरी." सुजाताने  फोन ठेवला आणि ती निघालीच. तिला सासूचा राग आला.  ’नवरोजींनी इथे मला ठेवलंय आईच्या दिमतीला स्वत: गर्क  परदेश वार्‍या करण्यात. येता जाता छायाचा उद्धधार चालू असतो. गेली असेल डोकं शांत करायला. येईल. आणि शोधायचं तर कुठे शोधायचं आता तिला आणि कसं?’ मनातल्या मनात तिने सासू, नवरा दोघांना शिव्या घातल्या. पण छाया घरी येणं महत्वाचं होतं. वाट चुकली तर सांगताही नाही येणार तिला परत कसं घरी जायचं ते याची सुजाताला खात्री होती.  आणि काही बरंवाईट झालं तर कोणत्या तोंडाने ती यमुनाकाकूंना, छायाच्या आईला तोंड दाखवू शकली असती? काहीतरी करणं भाग होतं. तातडीने. विचार करुन तिने उल्हासला बरोबर घेतलं. उल्हास आणि ती कंपनीत एकत्रच लागले होते आणि तेव्हापासून चांगले मित्रही झाले होते एकमेकांचे.  तो चटकन निघाला सुजाता बरोबर.
"आधी घरी जाऊ. कदाचित आली असेल घरी ती. तिला बेंगलोर नवखं आहे अजूनही. जाणार नाही लांब. " उल्हासचं म्हणणं  सुजाताला पटलं.  तिची गाडी होतीच. तरी पोचायला अर्धा तास लागला. छाया आलेली नव्हती. सासूबाईंकडे रागाचा कटाक्ष टाकत सुजाता शेजारच्या घरांची दारं ठोठवायला लागली. तिथे काम करणार्‍या मुलींकडून छायाबद्दल काही कळेल अशी  अपेक्षा होती. कुणीतरी रामबहादूरचा उल्लेख केला. घाईघाईत सुजाता खाली गेली. उल्हास आधीच तिथे चौकशी करत होता.  रामबहादूरला आज सुटी होती. तो दुसरीकडेही कुठेतरी काम करतो एवढंच चौकीवरचा माणूस सांगू शकला. त्याच्या घराचा पत्ता चौकीदाराने कागदपत्रातून शोधून दिला. उल्हास आणि सुजाता राजेंन्द्रनगरशी पोचले. वाटेत जाताना प्रत्येक वळणापाशी सुजाता गाडी थांबवायला लावत होती. कुठेतरी रस्त्यातच कदाचित सापडेल. फिरत असेल इकडेतिकडे असं तिला वाटत होतं. सुजाता बेचैन व्हायला लागली. छायाने काय कपडे घातले आहेत तेही तिला आठवेना. छायाच्या अंगयष्टीची, साधारण तिच्यासारखेच कपडे घातलेली प्रत्येक मुलगी तिला छाया वाटत होती. पण गाडी राजेन्द्रनगरपाशी पोचली तरी वाटेत कुठे छाया नजरेला पडली नाही. सुजाताने आजूबाजूचा गलिच्छपणा पाहिला आणि छाया रामबहादूर बरोबर इथे येईल हे तिला पटेनाच. खेडेगावात शुद्ध हवेत वाढलेली मुलगी होती ती. पण आता विचार करण्यात अर्थ नव्हता. गाडी राजेन्द्रनगरच्या बाहेर उभी करुन गल्लीबोळातून कसंबसं त्यांनी रामबहादूरची खोली शोधली. आजूबाजूच्या नजरा दोघांवर रोखलेल्या होत्या. दोघांनाही अवघडल्यासारखं झालं होतं पण विचार करायची वेळ नव्हती. रामबहादूर आणि छाया दिसल्याशिवाय चैन पडणार नव्हतं. दोघं  खोलीशी पोचले.  दार उघडंच होतं. आता दोघं तिघं जोरजोरात गप्पा मारत होते. समोर रिकाम्या बाटल्या पडलेल्या होत्या. त्यातलाच एखादा रामबहादूर असेल असं वाटलं उल्हासला. पण तिथेही तो नव्हता. खोलीतलं कुणीच धड काही सांगू शकतील अशा अवस्थेत नव्हतं. तो आणखी कुठे काम करतो त्या ठिकाणाचा पत्ता मिळवायला हवा होता.  दोघं दिसेल त्याला  विचारत राहिले. अखेर कुणीतरी तो मिळवला. उल्हास आणि सुजाता तिथे पोचले तर तो तिथून अचानक निघून गेलेला. का, कुठे याबद्दल काही समजलं नाही तरी आता असली तर छाया त्याच्याचबरोबर असेल याबद्दल दोघांनाही खात्री पटली होती. पण  रामबहादूरला कुठे शोधायचं हा पेचच होता. सुजाता आणि उल्हास दोघंही थकले होते. जरा बर्‍या दिसणार्‍या हॉटेलमध्ये जाऊन  काहीतरी पोटात ढकलायचं त्यांनी ठरवलं. रस्त्यावर नजर ठेवता येईल असं हॉटेल निवडून ते दोघं अस्वस्थपणे बसून राहिले. बराचवेळ  गर्दी निरखित राहिले. छाया दिसेल असं उगाचच वाटत होतं सुजाताला. पण रस्त्यावरच्या गर्दीत छाया ओळखू येणं कठीणच होतं. सासूबद्दलची नाराजी ती उल्हाससमोर व्यक्त करत राहिली. उल्हास निमूटपणे सुजाताला तिच्या भावना व्यक्त करु देत होता. तासाभराने दोघं तिथून बाहेर पडले.  परत रामबहादूरच्या गल्लीत पाऊल टाकायची इच्छा नव्हती. पण तो परत आला असण्याची शक्यता होती. त्याच्या खोपटापाशी पोचेतो वाटेत दारु पिऊन बरळणारी, आरडाओरडा करणारी माणसं,  गटारातलं सांडपाणी, येता जाता इथेतिथे थुकणारी पोरं नकोच वाटत होतं पण इलाज नव्हता. तोंडावर हात दाबत, घाणीत पाय पडणार नाही याची काळजी घेत  दोघं खोलीशी पोचले. आतून जोरजोरात हसण्याचा आवाज येत होता. मगाचीच असतील सगळीजणं की आला असेल रामबहादूर परत? हळूच उल्हासने वाकून पाहिलं आणि त्याच्या अंगावर काटा आला. खोलीतली तरुण मुलगी छायाच असणार हे त्याच्या लक्षात आलं. छायाची नजर आणि तिच्याशी लगट करणारे चार पुरुष! उल्हासच्या शरीरातून भितीची लहर आरपार गेली.  मागून डोकावणार्‍या सुजाताने त्याच्या खांद्यावर हात ठेवला तसं तो गरकन वळला. सुजाता छायाला हाक मारेल नाहीतर आत शिरेल ह्या कल्पनेनेच त्याचं धाबं दणाणलं. त्याने सुजाताला हाताने बाजूला खेचलं. भिंतीशी पाठ करुन तो कुजबूजला.
"तिला हाक मारु नकोस. सोडणार नाहीत ते तिला. अंगावर धाऊन येतील आपल्या."
"अरे पण काही तरी करायला हवं ना. मुर्ख मुलगी. काडीची अक्कल नाही." सुजाता पुटपुटली.
"भरपूर प्यायलेली आहे ती."
"बेभान झाल्यासारखी वागतेय." सुजाताच्या मनात छायाच्या वागण्याची चीड साठत चालली होती.
"काय करायचं? तिला तिथून सोडवायचं कसं?" छायाला तिथून तातडीने बाहेर कसं काढायचं याच विचारात होता उल्हास.
"पोलिसांकडे जाऊ या?" इतकी सोपी गोष्ट सुचली कशी नाही याचं आता तिला आश्चर्य वाटलं.
"पोलिसांना घेऊन येईपर्यंत काय होईल कुठे ठाऊक आहे आपल्याला? आत्ताच लांडग्यांसारखे तिच्या अंगाशी झोंबतायत. तिला पाजली  आहे भरपूर. शुद्ध हरपल्यासारखी बरळतेय ती." दोघं काही न सुचल्यासारखे आत मध्ये डोकावून पाहत होते. दारासमोरुन येणार्‍या जाणार्‍यांच्या नजरा अंगाला बोचत होत्या ते वेगळंच. आतमध्ये चाललेला गोंधळ तिथे राहणार्‍या लोकांना नवीन नसावा. आजूबाजूच्या झोपड्यातून भांडणांचे, बरळण्याचे आवाज येतंच होते. पण सुजाता आणि उल्हास सारखी माणसं तिथं येणं त्यांच्यासाठी नवीन होतं. सुजाताला तिच्यावर खिळणार्‍या नजरा देहाची चाचपणी करतायत असंच वाटत होतं. अंगावरचा शर्ट सहजासहजी झाकताही येत नव्हता. ओढणी असती तर बरं असं तिला प्रकर्षाने जाणवायला लागलं.  दोघांची बेचैनी वाढत होती. नक्की काय करायचं ते उलगडत नव्हतं. अखेर इकडे तिकडे पाहत धाडसी निर्णय घेतला सुजाताने. उल्हासला हाताने बाजूला करुन ती आत धावली. छायाच्या कपड्यांशी चाळा करणार्‍या चौघांना काही कळायच्या आत तिने छायाला खेचलं. जोरात ओरडत ती छायाला बाहेर काढू पाहत होती. छाया काही न कळल्यासारखी तिथेच उभी राहिली. तोपर्यंत उल्हास आत आला. त्या एवढ्याशा खोलीत इतकं माणसं मावतही नव्हती. तारवटलेल्या डोळ्यांनी सगळेजण सुजाताकडे पाहत होते. उल्हासने सुजाताला दाराच्या बाहेर ढकललंच. तिच्या दिशेने येणार्‍या रामबहादूरला पोटात त्याने गुद्दा हाणला. रामबहादूरचा तोल गेला. दोघं स्वत:चा तोल सांभाळत त्याला सावरायला पुढे झाले. तिसरा उल्हासच्या अंगावर धावून आला. उल्हासने स्वत:ला कसंतरी त्यांच्या तावडीतून सोडवलं आणि तो खोलीच्या बाहेर पडला. झोपडीच्या बाहेरच वाहणार्‍या गटारात त्याचा पाय जाताजाता वाचला. छायाला घट्ट धरुन धडधडत्या काळजाने सुजाता बाहेर उभी होती. रामबहादूर बरळत बाहेर आला आणि त्याने छायाचा हात पकडला.
"तिला मी गाडीत बसवून देणार आहे. सोडा तिला." सुजाताचा पारा चढला. पण सुजाताने काही करण्यापूर्वीच उल्हासने रामबहादूरचा शर्ट पकडत सणसणीत ठेवून दिली.  रामबहादूर गाल चोळत राहिला तसं तोच हात खेचून सुजाताने पिरगळला.
"बेशरम. तुला कळतंय का काय करतो आहेस तू? नोकरी गेलीच आता तुझी. तुरुंगाची हवा खायला पाठवते थांब तुला." सुजाताचे डोळे आग ओकत होते. झोपडपट्टीतली माणसं जीन्समधली बाई रामबहादूरचा हात पिरगळते आहे हे बघून फिदीफिदी हसत जमा झाली होती. पण हळूहळू उल्हासला त्या घोळक्याची भिती वाटायला लागली. थोबाडीत खाल्लेल्या रामबहादूरचा खाऊ का गिळू आविर्भाव त्याला अस्वस्थ करायला लागला. त्याच्या बाजूला येऊन उभे राहिलेले त्याचे मित्र आणि तो आता शांत राहणार नाहीत असं त्याला राहून राहून वाटत होतं. आपल्यासारखी दोन पांढरपेशी माणसं क्षणात नष्ट करायला या लोकांना वेळ लागणार नाही असं त्याला वाटायला लागला. पन्नास साठ चेहरे नाकेबंदी केल्यासारखे खुणावत होते. काही झालं तर मुंगीसुद्धा सहज बाहेर पडू शकणार नाही इतकी गर्दी तिथे होती आणि ती देखील झोपडपट्टीत राहणार्‍यांचीच. त्यात दोघांचा निभाव लागणं निव्वळ अशक्य होतं. छाया चाललेला गोंधळ विस्फारीत नजरेने नुसताच पाहत होती. घाबरुन, गोंधळून. इंग्रजीचा आधार घेत सुजाताला तिथून निघायला हवं असं तो परोपरीने सांगत होता पण सुजाता ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती.  रामबहादूरने सुजाताचा हात झटकला आणि तो उल्हास समोर तोल सावरत उभा राहिला.
"साहेब, माझ्या थोबाडीत मारली हे चांगलं नाही केलं तुम्ही. ह्या मॅडमना सांगा, पुरुषाची जात आहे माझी. त्यांनी नाही मला शहाणपणा शिकवायचा. माझी चूक नाही. ही पोरगीच माझ्याकडे आली. गलती हो गयी. माफ कर दो. नौकरी से मत निकालो साब मुझे. आपही बताओ मॅडमको. जेल मे नही जाना है मुझे. मै तो उसे कल ले के आनेवाला था...." उल्हासने मान डोलवली. पण सुजाताला राहवलं नाही.
"कल? पळून आलेल्या मुलीला रात्रभर ठेवणार होतास?  तुझ्याबरोबरच्या दारु प्यायलेल्या त्या धटिंगणाबरोबर? आणि काय चाळे चालले होते रे तिच्या अंगाशी?" उरलेले तिघं फिस्सकन हसले.
"मॅडमऽऽ"  किंचाळत रामबहादूर सुजाताच्या अंगावर धावला. उल्हास चिडलाच सुजातावर.
"सुजाता, पाऊल उचल पटकन. क्षणभरही थांबून चालणार नाही. ऐकलं नाहीस तो काय म्हणत होता. सगळे अंगावर धाऊन आले तर मेलोच समज आपण. आता आणखी कसली भर पडायला नको." सुजाताला उल्हासचं ऐकायचं नव्हतं पण गोंधळ वाढत चालला होता. आणखी काही घडण्याच्या आत निघणं भाग होतं. रामबहादूरकडे नजर टाकून छायाचा हात धरुन सुजाता निघाली. छायाला उभं आडवं फोडून काढावं छायाला असं वाटत होतं. संतापाने तिच्या अंगाची लाही लाही झाली होती. घरी पोचलं की सासूबाईंवर तोंडसुख घ्यायचं, सोसायटीत रामबहादूरची तक्रार नोंदवायची की पोलिस चौकीत आताच छायाला घेऊन जायचं अशा विचारांचं चक्र सुरु झालं तिच्या मनात. गल्ली, बोळ तुडवता तुडवता पोलिसांकडे न जाण्याचं तिने निश्चित केलं. एकदा पोलिसांकडे गेलं की छायाला ते प्रकरण संपेपर्यंत इथेच राहावं लागेल हे तिला कळत होतं आणि यानंतर एक क्षणही तिला छायाची जबाबदारी नको होती. छायाला नांदगावला ताबडतोब परत पाठवायचं एवढंच तिचं ध्येय होतं.  उल्हासला ती पुन्हा गळ घालणार होती. छायाला नांदगावला पोचतं करायचं. कसंही, आजच, लगेचच!  - मोहना.

Tuesday, November 1, 2016

नशीब

’अनुराधा’ दिवाळी अंकातील कथा संपादकांच्या परवानगीने इथे प्रसिद्ध करीत आहे.  श्री. व सौ, कथाश्री, साहित्य सहयोग, प्रसाद, सामना या भारतातील तसंच अमेरिकेतील ज्योती, अभिरुची, बुकगंगा श्रवण दिवाळी अंक यात माझ्या कथा प्रसिद्ध झाल्या आहेत. नक्की वाचा ही विनंती.




नशीब

व्यंकट आणि लता दिङ्मूढ अवस्थेत बसून राहिले. वकिलांच्या शब्दावर विश्वास ठेवायचा की नाही तेच त्यांना ठरवता येईना. दहा लाख डॉलर्स! मिळालेल्या पैशांचा आनंद मानायचा की भळभळणारी जखम पैशाच्या उबेखाली झाकून टाकायची? वकील निघून गेले तरी कितीतरी वेळ काही सुचत नव्हतं दोघांना.
"मिलियन डॉलर्स." व्यंकट खाली मान घालून पुटपुटला.
"काय करायचे रे हे पैसे घेऊन? काय करायचे ह्या पैशांचं? काही अर्थ आहे का यात? कशाला खटला भरला आपण? साध्य काय झालं? खरंच कुणी शिकलं धडा की आपल्या जखमेवर केलेली मलमपट्टी आणि त्यांच्या सुटकेचा मार्ग हा? अपार्टमेंटचं व्यवस्थापन ढिसाळ आहे, सिक्युरिटी कंपनीला धडा शिकवायला हवा असं वकिलांनी सांगितलं आणि आपणही लगेच तयार झालो. असं कुणी काही शिकत नाही.  पुढचं सगळं टाळायचं म्हणून वकिलांची मध्यस्थी आणि हा पैसा. मला नकोय हा पैसा. मला नकोय.  खरंच नको." लता धाय मोकलून रडायला लागली. व्यंकटने तिला घट्ट धरलं. एकमेकांच्या मिठीत दोघंही कितीतरी वेळ हमसाहमशी रडत राहिले. ते तीन दिवस आणि त्यानंतर वेगवेगळ्या अर्थी बदललेली सार्‍यांचीच आयुष्य. आजच्या ह्या बातमीने निकराने गाडून टाकलेल्या त्या तीन दिवसांच्या अक्राळविक्राळ आकृत्या त्यांच्यासमोर नाचायला लागल्या.

 स्निग्धाच्या ओढीने लता घाईघाईने दार वाजवायला गेली आणि दार एकदम उघडलंच. मागोमाग आलेल्या व्यंकटकडे लताने आश्चर्याने पाहिलं.
"तू आईंना बजावून सांगितलं होतंस ना कुणीही आलं तरी दार उघडायचं नाही म्हणून?" लताच्या प्रश्नावर काही उत्तर न देता व्यंकटने दार लोटलं. शांतता. नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं घडत होतं. एरवी दार उघडायला हसतमुखाने आई समोर यायची. आईच्या कडेवरुन स्निग्धा त्या दोघांकडे झेप घ्यायची. आई गेली कुठे? व्यंकट आईला हाका मारतच आतल्या खोलीत जाण्यासाठी वळला आणि लताच्या किंचाळीने तसाच मागे फिरला. स्वयंपाकघरात थरथर कापत उभ्या असलेल्या लताला सावरत त्याने आत नजर टाकली आणि व्यंकटही थिजल्यासारखा उभा राहिला.
"९११" फिरव. ताबडतोब लता. आईचा श्वास चालू आहे अजून. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आईला तो जिवाच्या आकांताने हलवित राहिला. तिने डोळे उघडावे, त्याच्याकडे पाहावे यासाठी आटोकाट प्रयत्न करत राहिला. स्निग्धा घरात नाही हे देखील तो विसरला. आई, त्याची आई जिवंत आहे एवढी खात्री हवी होती त्याला.  लताचे पाय जड झाल्यासारखे झाले. शरीराला, मनाला ढकलत तिने कसेबसे आकडे फिरवले. पलिकडच्या माणसाला काय झालंय ते कसंबसं सांगत  स्निग्धाला हाका मारत या खोलीतून त्या खोलीत ती फिरत राहिली. शोधत राहिली. पलंगाखाली, दारामागे, कपाटांच्या आत जिथे जिथे स्निग्धा जाऊ शकते त्या त्या जागा ती पुन्हा पुन्हा पाहत होती. स्निग्धाला जोरजोरात हाका मारत होती. काही क्षणात इमारती बाहेर गाड्यांचे आवाज, भोंगे वाजायला लागले. रुग्णवाहिका आली.  वैद्यकीय मदत तातडीने उपलब्ध झाली. व्यंकटच्या आईसमोर कोंडाळं झालं. जे काही तातडीचे उपचार करता येतील ते केले गेले पण रुग्णालयात हलवण्याअगोदरच व्यंकटच्या आईने अखेरचा श्वास घेतला. मृत्यू नैसर्गिक नव्हता त्यामुळे शवचिकित्सा होणार. व्यंकटच्या आईला त्याच रुग्णवाहिकेतून शवचिकित्सेसाठी नेलं लता, व्यंकटला आईच्या मृत्यूचा शोक करायलाही सवड नव्हती. दहा महिन्याची स्निग्धा घरातून नाहीशी झाली होती,  व्यंकट, लता पोलिसांच्या प्रश्नांना सामोरं जात होते.  त्यांच्याबद्दल माहिती विचारता विचारता त्या दोघांचा यात काही हात नाही ना याची चाचपणी झाल्यावर स्निग्धाच्या नाहीसं होण्याबद्दल,  त्यांना कुणाचा संशय आहे याबाबत प्रश्न सुरु झाले. एकमेकांच्या आधाराने जमेल तशी उत्तरं  देत होते दोघं. जे झालं ते इतकं अनपेक्षित होतं की दोघांनाही पटकन कोणतीही गोष्ट धड सांगता येत नव्हती. मनातले विचार बाजूला ठेवून तर्कसंगत उत्तरं देणं कठीण पडत होतं. दारात उभ्या राहिलेल्या रघू आणि कोमल ला पाहिलं आणि आपलं असं कुणीतरी सोबत आहे या विश्वासाने दोघांच्याही चेहर्‍यावर स्मितरेषा उमटली. पोलिसांच्या परवानगीने दोघं आत येऊन बसले. त्या दोघांनीही जी काही माहिती होती ती द्यायचा प्रयत्न केला.  स्निग्धाचा शोध तातडीने घेतला जाईल याचं आश्वासन देत पोलिस निघून गेले. आणि अर्धवट राहिलेलं काम पुन्हा करायला उठल्यासारखं लता उठली. पुन्हा पुन्हा त्याच सगळ्या जागा ती शोधत राहिली. स्निग्धाला हाका मारत राहिली. व्यंकटला तिची अवस्था पाहवत नव्हती. हताश होऊन ती सोफ्यावर पायाची जुडी करुन बसली. आणि जोरजोरात रडायला लागली. व्यंकट तिला सावरायला पुढे झाला पण ओंजळीत तोंड लपवून लता रडत राहिली.
"व्यंकट तुझी आई गेली रे. कुणीतरी मारलं त्यांना. आपल्या मुलीला सांभाळण्यासाठी आल्या होत्या त्या. आता कसं तोंड दाखवायचं  आपण तुझ्या बाबांना? तुझी आई गेली व्यंकट, तुझी आई गेली..." लताच्या बाजूला बसून व्यंकटने तिच्या खांद्याभोवती हात टाकले. लताने आपलं डोकं त्याच्या छातीवर टेकलं. दोघं रडत राहिले.
"लता आईला परत नाही आणत येणार. पण स्निग्धाला शोधायला हवं. ताबडतोब. तिला काही झालं तर मी नाही जिवंत राहू शकणार. लता आपण शोधू आपल्या पिल्लाला. चल ऊठ लता. रडत नको बसू. नाहीतर मीच पडतो बाहेर. काहीतरी करायला हवं लता. काहीतरी करायला हवं." लताचा हात धरुन त्याने तिला उठवलं. ती न बोलता त्याच्या मागून चालायला लागली. रघू आणि कोमलने त्यांना थांबवलं. आता इतक्या रात्री कुठे शोधणार होते ते स्निग्धाला. पण काहीतरी करायला हवं होतं. दहा महिन्यांची मुलगी आपली आपण बाहेर पडणं शक्य नाही. कुणी नेलं असेल तिला? का? रात्री कुठे शोधायचं? व्यंकटच्या आईचा देह कधी मिळेल ताब्यात? देहाचं पुढे काय? प्रश्न असंख्य होते आणि कुणालाच उत्तरं  सापडत नव्हती. कशाचंच  त्राण लता, व्यंकटमध्ये उरलं नव्हतं.  रघूने पुढाकार घेतला. व्यंकटच्या ओळखीच्यांना तो कळवणार होता. भारतातल्या नातेवाईकांशी कोमल संपर्क साधणार होती. व्यंकटच्या आईचे अंत्यसंस्कार  इथे की भारतात करायचे ते ठरवायचं होतं. अमेरिकेतच करायचे तर नक्की काय करायचं हे देखील शोधावं लागणार होतं. व्यंकटच्या ओळखीपैकी, नाहीतर आपल्या समाजाचं मंडळ करेल मदत असा विचार करत रघू आणि कोमल उठले. बाजूचंच घर होतं त्यांचं. ते दोघं काय करणार आहेत ते रघूने नीट समजावून सांगितलं. दोघांनी ऐकलं, त्यांच्या लक्षात आलंय याची खात्री करुन ते निघून गेले तसं व्यंकट आणि लता डोळ्यावर हात घेऊन आडवे पडून राहिले. कधीतरी थकव्याने दोघांचे डोळे मिटलेही. सकाळी जाग आली ती दारावर बसणार्‍या धक्क्यांनी.

रघू आणि कोमल चहा घेऊन आले होते. स्निग्धा नसताना आपल्याला झोप लागली तरी कशी या विचाराने व्यंकट, लताला  अवघडल्यासारखं झालं पण रघू, कोमलचं लक्ष नव्हत. कोमलने चहा पुढे केला. दोघं पटकन तोंडावर पाणी मारुन आले.  चहा पिऊन होईपर्यंत रघू अस्वस्थपणे हातातल्या कागदांशी चाळा करत राहिला.
"कसले कागद रे?" व्यंकटने चहा पिता पिता विचारलं.
" बाहेर होते दाराच्या."
"पाहू?" व्यंकटने हात पुढे केला पण रघूने ते कागद दिले नाहीत.
"चहा होऊ दे." व्यंकटने काही न बोलता मुकाट्याने चहा संपवला आणि रघूने कागद पुढे केले. व्यंकटच्या चेहर्‍यावरचा रंगच उडाला. लता काळजीने पुढे झाली.
"काय आहे?"
"स्निग्धाला कुणीतरी ओलीस ठेवलंय. ५०,००० डॉलर्स मागतोय. चिठ्ठी तुझा नावाने आहे." लताने कागद हिसकावलाच.
"काय म्हणतोय हा माणूस? संध्याकाळी मला एकटीला पैसे घेऊन बोलावतोय. पोलिसांना कळवलं तर स्निग्धा हाती लागणार नाही असं लिहिलंय यात." लता रडायलाच लागली.
"तू रडू नकोस गं." व्यंकट चिडून म्हणाला. त्याच्या मनावरचा ताण प्रचंड वाढला होता. लताने मान खाली घातली. दोघं अस्वस्थ, सैरभैर झाले. काय करायचं तेच कळेना. शेवटी रघूने म्हटलं.
"मी पोलिसांना फोन करतो." कोमलने दचकून पाहिलं.
"पोलिसांना कळवू नका म्हटलंय त्यात."
"असं करुन कसं चालेल?" रघू कोमलवर वैतागला.
"पोलिसांना कळवायचं नाही म्हटलं तरी ५०,००० डॉलर्स आणायचे कुठून? आणि मी लताला एकटं पाठवणार नाही. कुठे यायचं पैसे घेऊन तेही लिहिलेलं नाही." व्यंकटला परिस्थिती कशी हाताळायची तेच कळेनासं झालं होतं. रघू  आणि व्यंकट  पर्याय पडताळत राहिले.
"आपल्या मागे का हे सगळं? आपलं कुणाशी वैर नाही. श्रीमंत आहोत म्हणायचं तर तेही नाही. भाड्याच्या घरात राहतोय. सगळं विकलं तरी ५०,००० हजार डॉलर्स कसे उभे करणार? कोण असेल ह्या मागे? आणि आईंना का मारलं त्यांनी? " लताला तिच्या मनातल्या शंकाची उत्तर हवी होती. व्यंकटला तिच्या कोणत्याच प्रश्नांना उत्तर द्यायची इच्छा होत नव्हती.
"कुणीतरी भुरटा चोर असणार. आईंनी विरोध केला म्हणून भडकला असेल." रघूने अंदाज बांधला.
"भुरटा चोर खून करेल?" व्यंकटची विचारशक्ती  गोठली होती. काहीतरी विचारायचं म्हणून त्याने विचारलं.
"त्याने स्वयंपाकघरातली सुरी वापरली याचा अर्थ त्याच्याकडे सुरी नव्हती."
"स्निग्धा?" लताच्या मनातला प्रश्न कोमलने विचारला.
"आईंना मारल्यावर स्निग्धा दिसली असणार."
"हं." लता विचार करत राहिली. एव्हाना बातमी सर्वत्र पसरली होती. ओळखीच्या लोकांची रीघ लागली.  माध्यमांचे प्रतिनिधी संपर्क साधायचा प्रयत्न करत होते. भारतातले नातेवाईक काळजीत होते. व्यंकटच्या आईचा देह शवचिकित्सेनंतर कधी  ताब्यात मिळणार ते कळत नव्हतं.  ५०,००० डॉलर्स आजच्या आज उभे करायचे. कुणाकडे हे बोलायचं की नाही हेच दोघांना ठरवता येईना. दोघांना खाजगी बोलण्यासाठी जागाच नव्हती इतकी त्या छोट्याशा घरात गर्दी होती. वेळ टळायच्या आधी काहीतरी ठरवायला हवं होतं. अखेर व्यंकटने निर्णय घेतला. त्याने पोलिसांना सारं सांगून टाकायचा निर्णय घेतला.

पोलिस हातातलं पत्र पुन्हा पुन्हा पाहत होते. ५०,००० डॉलर्स घेऊन लताने कुठे यायचं ते लिहिलेलं नव्हतं त्यामुळे पैसे घेऊन जाण्याचा प्रश्नच नव्हता. हाती लिहिलेलं पत्र असतं तर हस्ताक्षराचा शोध सुरु करता आला असता पण तेही शक्य नव्हतं. पोलिसांनी लता आणि व्यंकटला शांत राहण्याचा दिलेला सल्ला त्या दोघांना पटत नव्हता.  त्या माणसाने पुन्हा संपर्क केला तरच काही प्रकाश पडण्याची शक्यता वाटत होती. तो दिवस वाट पाहण्यात गेला. लता आणि व्यंकटचा जीव घुसमटत होता. असहाय्यताने घेरलं होतं.  पैशाची मागणी करुनही स्निग्धाला ओलीस ठेवणारा माणून संपर्क का साधत नाही ते कळत नव्हतं. पत्रामुळे तपासणीच्या चक्राची दिशाही बदलली. दोघांच्या परिचयातल्या व्यक्तींवर  पोलिसांनी लक्ष केंद्रित केलं. मुख्य कारण होतं त्या पत्रात असलेला लताचा उल्लेख. लतिकाला ’लता’ म्हणून ओळखणारी मोजकीच मंडळी होती.  पोलिस निघून गेले.
"आपण इथून बाहेर पडू या थोडावेळ? माझा जीव घुसमटतोय व्यंकट."
"चल." व्यंकटने मुकाट्याने पायात चप्पल सरकवल्या. जिने उतरुन दोघं खाली आले. वाट फुटेल त्या दिशेने चालत राहिले. इमारतीच्या बाहेर पडले. डोळ्यातलं पाणी पुसत लता म्हणाली,
"तुझी आई गेली याचं दु:ख करायलाही सवड नाही रे आपल्याला. काय झालं असेल आपल्या पिलाचं? आपण पैसे दिले नाहीत म्हणून मारुन टाकलं नसेल ना त्या दुष्टाने?" व्यंकटने लताचा हात घट्ट पकडला.
"असं बोलू नकोस ना लता."
"किती वेळा पाहिलंय आपण बातम्यांमध्ये. मुलांना मारतातच रे. नाही कुणी जिवंत ठेवत."
"काय बोलतेस हे लता." व्यंकटने लताला जवळ घेतलं. त्याच्या शर्ट तिच्या अश्रूंनी चिंब भिजला. तिची समजूत घालता घालता तोही रडत राहिला. आजूबाजूला काळोखाचं साम्राज्य पसरलं होतं. आसपास चिटपाखरुही नव्हतं. त्या काळोखात व्यंकटने टाहो फोडला.
"माझी आई गमावली मी लता. आई गेली माझी. पुन्हा कधी दिसणार नाही ती. अमेरिकेत आणलं मी तिला म्हणून किती खूश होती आणि काय झालं हे. कुणी केलं." लताचा जीव गलबलला. ती थरथर कापायला लागली.
"व्यंकट माझा जीव घुसमटायला लागलाय. मला नाही जगता येणार स्निग्धाला काही झालं तर. वाचवा रे तिला, कुणीतरी वाचवा." लताने तिथेच फतकल मारली. व्यंकटला आता स्वत:चाच राग यायला लागला होता. कुठे शोधायचं स्निग्धाला? पोलिसांना फोन केला नसता तर त्या माणसाचा फोन आला असता?  फोन केलेला कळलं असेल त्याला? त्याने खरंच स्निग्धाला मारलं असेल? रडत बसलेल्या लताला व्यंकटने हात धरुन उठवलं,
"लता, मला माफ कर गं. मी फोन करायला नको होता पोलिसांना. तूच सांग मी काय करु. तूच सांग." व्यंकटनेच धीर सोडलेला बघितल्यावर लताने स्वत:ला सावरायचा प्रयत्न केला. ती स्निग्धा मिळेल असं त्याला पुन्हा पुन्हा सांगत राहिली. त्याच्या आणि स्वत:च्या मनाची समजूत घालत राहिली.  दोघंही पुन्हा घराच्या दिशेने चालायला लागले.

रघूच्या घराबाहेर गर्दी पाहून व्यंकटला आश्चर्यच वाटलं. गर्दीला बाजूला करत तो आत गेला. मागोमाग लता. पोलिस कोमल आणि रघूला प्रश्न विचारत होते.
व्यंकटच्या लक्षात आलं. पोलिसांनी आता त्यांच्या मित्रमैत्रिणींवर लक्ष केंद्रित केलं होतं. पोलिस कुणालाही सोडणार नाहीत. आधी आमच्यावर, आता मित्र मंडळीवर संशय मनातल्या मनात पुटपुटत तो पोलिस काय प्रश्न विचारतात ते ऐकत राहिला.
लता आणि व्यंकटशी त्यांची ओळख कशी झाली, किती दिवस ओळखतात असे प्रश्न चालू होते. व्यंकटच आता पोलिसांच्या त्याच त्याच प्रश्नांना कंटाळला होता. लता  व्यंकटचा हात हातात धरुन रघूवरच्या प्रश्नांची सरबत्ती ऐकत होती. लताने त्याचा हात दाबला आणि तो दचकला. त्याने तिच्याकडे पाहिलं. तिने कोमल काय म्हणतेय ते ऐकण्याची खूण केली.
"हो. त्या दिवशी व्यंकट आला नव्हता घरी दुपारी जेवायला."
"नेहमी येतात?"
"हो." कोमलच्या उत्तरावर रघूने तिला थांबवलं.
"काम जास्त असेल तर नाही येता येत."
"पण जेवायला येतोसच तू घरी."
"नाही. कधीकधी नाही जमत."
"रघू?" कोमलने रघूकडे आश्चर्याने पाहिलं. रघू उठलाच तिथून.
"मी आलोच." तो घाईघाईने दरवाज्याच्या दिशेने निघाला.
"असं नाही जाता येणार तुम्हाला. चौकशी संपलेली नाही."
"मला वेगळं काही सांगायचं नाही. कोमलने सांगितलं त्यापेक्षा वेगळं सांगण्यासारखं माझ्याकडे काही नाही."
"असं असेल तर तुम्हाला ठाण्यात यावं लागेल." तिथे असलेल्या पोलिसापैंकी वरिष्ठ म्हणाले आणि रघूचा तोल सुटला.
"हो. हो. मी मारलं व्यंकटच्या आईला. झालं समाधान? मी मारलं त्या दोघींना. पकडा मला. पकडा." वेड्यासारखा त्या लहानश्या खोलीत तिथल्या तिथे फिरत ओरडत राहिला.
"मी मारलं रे, मी मारलं तुझ्या आईला. स्निग्धाला सुद्धा. मला नव्हतं मारायचं दोघींना." रघू व्यंकट समोर उभा राहिला. व्यंकट दगडासारखा उभा होता. आपल्याला काय वाटतंय हेच त्याला कळेना. सार्‍या जाणिवा गोठून गेल्या होत्या. लताच्या डोळ्यापुढे काळोखी आली. कोमल धाय मोकलून रडायला लागली. पोलिसांनी व्यंकटसमोर माफी मागणार्‍या रघूला बाजूला घेतलं. त्याच्या हातात बेड्या ठोकल्या. आणि व्यंकट धावला. त्याने थाडथाड रघूच्या थोबाडीत मारल्या. आयुष्यात कधीही न दिलेल्या शिव्या त्याने रघूला घातल्या. शिव्या घालता घालता तो रघूला मारत राहिला. पोलिसांनाही बोटाच्या इशार्‍यावर थांबवलं त्याने आणि रघूला मारता मारता तो एकदम  पाया पडला.
"रघू, तू खोटं बोलतोयस मित्रा. हो ना? स्निग्धा कुठे आहे ते दाखव रे मला. कृपा कर आणि मला स्निग्धा आणून दे परत. तू खरंच मारलंयस का रे स्निग्धाला? का रे तू असं केलंस. का? का? माझ्या आईला मारलंस, मुलीचा जीव घेतलास.  आता मी कसा जगू? लताला काय सांगू. मित्र ना रे तू माझा...." व्यंकट बोलत राहिला. थिजलेल्या नजरेने रघू त्याच्याकडे पाहत राहिला. पोलिसांनी महत्प्रयासाने व्यंकटला बाजूला केलं.  कोमल रघूच्या हातात बेड्या घालून नेणार्‍या पोलिसांच्या मागून धावली. व्यंकट आणि लता एकमेकांच्या आधाराने आपल्या घरात परत गेले.

"रघू? रघूने खरंच मारलं असेल?" लता उत्तर नसलेला  प्रश्न व्यंकटला पुन्हा पुन्हा विचारत राहिली.
"मला माझी स्निग्धा आणून दे रे आताच्या आता." लता हट्टाला पेटली. पण तिची विनवणी व्यंकटपर्यंत पोचत नव्हती. व्यंकटच्या मनात विचारांचा, भावनांचा कल्लोळ माजला होता.
"स्निग्धा किती छान राहायची रे त्याच्याकडे. मित्र ना तो आपला. का केलं त्याने असं?" लताने व्यंकटकडे पाहत हताश स्वरात विचारलं.
"पण खरंच केलं असेल त्याने असं की काहीतरी गफलत होतेय?" मनात घोळत असलेला प्रश्न व्यंकटने जोरात विचारला आणि लता चमकली. हा विचार मनाला शिवलाच नव्हता. पण आता तिलाही वाटायला लागलं, स्निग्धाला नाही मारणार रघू. तो हे असं अघोरी कृत्य करणार नाही.  दोघंही त्या दिशेने विचार करायला लागले.
"स्निग्धाला काही झालं नसेल. पोलिसांचा गोंधळ झाला असेल. शोधतील पोलिस तिला." दोघं एकमेकांना समजावत राहिले.
"स्निग्धाला कसं मारेल तो? मुलीसारखीच होती ती त्याला."
"रात्रंदिवस आपल्याबरोबर आहेत दोघं."
"रघूच तर सगळं करतोय."
"पण रघूने का घेतला आरोप स्वत:वर?" लताने विचारलं आणि दोघांनाही जाणवलं आपण स्वत:चं फसवं समाधान करतोय. स्निग्धाला त्याने मारलंय हे मन स्वीकारत नाही त्यामुळे तो निरपराधी आहे असं पटवतोय आपणच एकमेकांना. दोघांच्याही लक्षात आलं की रघूने त्या दोघांना एक क्षणही एकटं सोडलेलं नाही. पोलिसांच्या हालचाली, घडामोडी सारं काही इत्यंभूत माहिती आहे त्याला. दोघं मुक झाले. इतका मोठा विश्वासघात ज्याला मित्र म्हणवतो त्यानेच करावा हे पटवून घ्यायलाच जमत नव्हतं दोघांना. आतल्या आत दोघंही तुटून गेले. आणि  व्यंकट ताडकन उठला. कोमलच्या दारावर रघूला तुडवून काढल्यासारख्या लाथा मारल्या त्याने. तांबारलेल्या डोळ्यांनी कोमलने दार उघडलं. व्यंकटच्या बाजूला येऊन उभ्या राहिलेल्या लतासमोर कोमल उभी राहिली.
"मला खरंच यातलं काही म्हणजे काही माहीत नाही. रघू जेवायला आला नाही हे खरं पण तो काम होतं म्हणून येऊ शकला नाही. मी बोलले होते त्याच्याशी. तो तिथेच होता. त्याचा नाही ह्यात हात. माझा तर कशाशी काहीही संबंध नाही." कोमलच्या रडण्या ओरडण्याने आजूबाजूची दारं उघडली गेली. व्यंकट आणि लता न बोलता पुन्हा घरात येऊन बसून राहिले. इतका मोठा घात रघूने  का केला असेल? कसा ठेवायचा विश्वास कुणावर यापुढे? कोमल खरंच अंधारात असेल? स्निग्धा कुठे आहे? काय जाब देईल रघू पोलिसांना? कधी कळेल नक्की काय झालं आणि का? का? का केलं रघूने हे पाशवी कृत्य?

रघू पोलिसांसमोर बसला होता.  त्याचा कबुलीजबाब समोरच्या यंत्रात बंदिस्त होणार होता. आता हा खेळ संपवायचा होता त्याला. काय ठरवलं आणि काय झालं, सगळं कबूल करुन त्याला स्वत:च्या डोक्यावरुन गेले ३ दिवस आलेलं प्रचंड दडपण उतरवायचं होतं. त्याने बोलायला सुरुवात केली.
"दुपारी मी व्यंकटच्या घरी गेलो. स्निग्धाच्या आजीने दार उघडलं. हातातली सुरी रोखून मी त्यांना मागे व्हायला सांगितलं. घाबरुन त्या स्वयंपाकघरात गेल्या. स्निग्धा सोफ्यावर होती. मी तिला उचलल्यावर आजी मध्ये आल्या. आजींना माझा  कुणालाही दुखावण्याचा हेतू नाही असं जीव तोडून सांगत होतो मी. मला फक्त स्निग्धा हवी होती. पण त्या मध्ये आल्या. ती माझ्या डाव्या हातात होती. मी आजींना उजव्या हाताने मागे करायला गेलो. स्निग्धा हातातून पडली. तिला सावरायला मी डाव्या बाजूला वाकलो त्यामुळे हातातली सुरी सपकन आजींच्या गळ्यावरुन फिरली. त्या खाली पडल्या. मी स्निग्धाला सावरलं. आजींची अवस्था पाहून मी घाबरलो तेवढ्यात स्निग्धा रडायला लागली. खिशातला रुमाल मी तिच्या तोंडात कोंबला. मी स्निग्धाला घेऊन आतल्या खोलीत गेलो. तिथली हाताला आली ती बॅग घेतली आणि त्यात स्निग्धाला ठेवलं. बॅग पूर्ण बंद केली नाही मी. मला स्निग्धाला मारायचं नव्हतं. मी तिथून बाहेर पडलो. आणि आमच्या इमारतीच्या आवारातल्या व्यायामशाळेत गेलो. तिथे कुणी नव्हतं. कधीच कुणी नसतं.  बाजूची खोली रिकामी असते तिथली. तिला तिथे खोलीत बाकड्याखाली ठेवलं. बाहेर पडलो आणि स्निग्धासाठी दूध घेतलं. पुन्हा तिला ठेवलं होतं तिथे गेलो. पण स्निग्धाचा श्वास थांबला होता. स्निग्धा तिथेच आहे. कुणीतरी आणा रे तिला. कुणीतरी आणा. बघा रे ती जिवंत आहे का. बघा ना लगेच." रघूने श्वासही न घेता काय घडलं ते सांगितलं. गेल्या तीन दिवसातलं मनावरचं प्रचंड ओझं उतरलं होतं. आता त्याला कशाचंच काही वाटत नव्हतं. मान खाली घालून तो बसून राहिला.  त्याचा कबुलीजबाब ध्वनिमुद्रित झाला होता. तेवढ्यात रघूने विनंती केली.
"माझ्या मित्राला निरोप द्यायचा आहे." पोलिस काही न बोलता त्याचं बोलणं ध्वनिमुद्रित करत राहिले.
"माझ्या हातून चूक घडली. मला कुणालाच मारायचं नव्हतं. मला हवे होते फक्त ५०,००० डॉलर्स.  मित्रा, मला माफ कर. मी कर्जबाजारी आहे रे. जुगाराच्या व्यसनाने मी कर्जबाजारी झालोय. ते कर्ज फेडायचा हाच मार्ग दिसला मला. अचानक दिसला. तुम्ही दोघं कमावता. मुलीसाठी सहज द्याल ५०,००० असं वाटलं रे. फार विचारच केला नाही मी. स्निग्धासाठी तुम्ही काहीही कराल हे ठाऊक होतं मला. मला कुणालाच मारायचं नव्हतं. खरं सांगतो कुणालाच मारायचं नव्हतं.  मला माफ कर व्यंकट आणि लता. मला माफ करा..."

Thursday, October 27, 2016

समाधान

'कथाश्री' च्या दिवाळी अंकात माझी कथा. या कथेशी माझं घट्ट नातं आहे. ही कथा माझ्या आईवर आहे. तिचं लहानपण, तो काळ आणि काही घटनांचा खोलवर झालेला परिणाम. परिस्थिती बदलत जाते तशी माणसंही. त्यातूनच आपलं आपण स्वत:ला शोधायचं, जपायचं, समाधान मानायचं. तीच ही कथा - ’समाधान’. खाली काही भाग तुमच्यासाठी. पण अंक मिळवून नक्की वाचा. मला आणि अर्थातच माझ्या आईला खूप आनंद होईल.

"मी तयार आहे. चल ना." ठेवणीतला फ्रॉक घालून कमू गीताईसमोर आली आणि तशीच थबकली. काळ्याभोर केसांवर अबोलीचा गजरा माळलेली गीताई आरशात स्वत:ला निरखीत होती. आरशातलं तिचं ते प्रतिबिंब कमूला इतकं आवडलं की गीताईला मागून मिठीच मारावी असं वाटून गेलं. पण ती गीताईला पाहत खिळल्यासारखी उभी राहिली.
पाहणार आहोत ठाऊक आहे का?"
"मीनाकुमारीचा परिणीता." कमूने नुसतीच मान डोलावली. तिला कोणता पिक्चर याच्याशी काहीही देणघेणं नव्हतं. पिक्चर पाहून आलं की तिचा दुसरा दिवस खूप छान जाई. घरातली सगळी मुलं तिला घेरुन टाकत. सगळ्यांना गोष्ट ऐकायची असे. त्यातली गाणी तर कमूची लगेचच पाठ झालेली असत. ती गायचीदेखील सुरेल. गोष्ट, गाणं यात कमूचा दिवस खूप छान जायचा. गीताई बरोबर दर आठवड्याला पिक्चरला जायची कमू आतुरतेने वाट पाहायची.


"बांध ना वेण्या तुझ्या रिबीनीने. का मी बांधून देऊ?""नको." कमू पळालीच तिथून. जिन्याच्या पायर्‍या धाडधाड चढत कमू खोलीत गेली. काळोख्या खोलीची खिडकी तिने गडबडीने उघडली आणि कोपर्‍यात ठेवलेल्या पत्र्याच्या ट्रंकमधला छोटासा आरसा आणि फणी बाहेर काढली. केळ्याच्या दोराने बांधलेल्या वेण्या तिने घाईघाईने सोडल्या. बराचवेळ ती त्या रिबीनी कुरवाळत राहिली. पुन्हा पुन्हा केस विंचरुन तिने वेणी घातली. लाल रिबीनीने बांधलेल्या वेण्यांकडे डोळे भरुन पाहत राहिली. या दोन रिबीनी तिच्या हक्काच्या होत्या. या पूर्वी तिने एकदाच तिच्या केसांना रिबीन बांधली होती. ती सुद्धा चोरुन. घरात सगळ्यांकडे रिबीनी होत्या. त्यातलीच कुणाचीतरी तिने हळूच आपल्या केसांना बांधून पाहिली होती. आज प्रभाने आणलेल्या रिबीनी मात्र तिच्या होत्या. स्वत:च्या.


"आत्या, अगं पाहतेस काय अशी. मी पास झाले. पाऽऽस झाले. आता प्रभा मला पोस्टात नोकरी लावून देईल. द्यायलाच हवी तिने. देईल ना गं?"
"देईल हो. अगदी नक्की. हे बघ आधी साखर ठेव देवाजवळ. चल मीच ठेवते." सुधाआत्याने कमूचा हात धरुन स्वयंपाकघरात नेलं. फडताळातला साखरेचा डबा काढून वाटीत साखर घेतली आणि त्या तिला माजघरात घेऊन गेल्या. देवाजवळ साखर ठेऊन दोघी हात जोडून उभ्या राहिल्या.

"आलास. वाट पाहून पाहून डोळा लागला कमूचा." पलंगावर झोपलेल्या कमूच्या डोक्यावर हात फिरवीत आबा बसले. सुधाने लगबगीने खोबर्‍याच्या वड्या पुढे केल्या.
"नको, खाऊनच आलो." आबा नुसतेच कमूच्या डोक्यावर हात फिरवीत बसून राहिले.
"थोडं बोलायचं होतं तुझ्याशी."
"बोल." सुधा काय बोलणार ह्याची कल्पना आलीच आबांना. त्यांच्या स्वरातला निरुत्साह जाणवूनही सुधाने बोलायचं ठरवलं.



Wednesday, October 26, 2016

वेगळी

श्री. व सौ. दिवाळी अंकात माझी ’वेगळी’ कथा प्रसिद्ध. अंक विकत घेऊन, शेजार्‍यापाजार्‍यांकडून आणून (परत द्यायला न विसरता), वाचनालयात जाऊन काहीही करुन मिळवा पण वाचाच :-).





-)



Monday, April 4, 2016

सावट

(अनुराधा दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेली कथा)

प्रथमला निरोप द्यायला चित्रा दारात येऊन उभी राहिली. तो फाटकातून बाहेर पडेपर्यंत ती तिथेच थांबली.
मनात बरीच कामं घोळत होती. प्रथम आता दोन तीन दिवस
येणार नाही म्हणजे निवांतपणा होता. शांतपणे राहिलेलं काम हातात घेता येणार होतं.  दार लोटून ती आत जाणार तेवढ्यात फाटकाच्या दिशेने परत येत असलेल्या प्रथमकडे तिचं लक्ष गेलं. पटकन पायर्‍या उतरत ती पुढे झाली.
"काय रे? काही राह्यलं का?"
प्रथमने तिचे दोन्ही हात हातात घेतले. त्याच्या नजरेतल्या व्याकुळपणाने तिचाच जीव घुसमटल्यासारखा झाला.
"प्रथम?" ती पुटपुटली.
"चित्रा, शक्य झालं तर मला माफ कर." झटकन मान फिरवून तो पुन्हा वळला. ती तशीच उभी राहिली. गोठल्यासारखी. हे काय नवीन? प्रथम काय म्हणाला? माफ कर? का पण? ओढणी सावरत ती फाटकाच्या दिशेने धावली. पण उशीर झाला होता. प्रथमची गाडी धुरळा उडवीत नाहीशी झाली होती. अंगातलं त्राण गेल्यागत ती मागे वळली. प्रथमच्या शब्दांचा काही केल्या अर्थ लागत नव्हता. फोन करावा? की तो येईपर्यंत वाट पाहायची? त्याचं बाहेर काही? दुसरा संसार? मूल? तिला त्याचा रागच आला. हे काय, माफ कर म्हणे. काहीतरी तुटक बोलून डोक्याला भुंगा लावून द्यायचा.

ती वेगाने प्रथमच्या खोलीत शिरली. टेबलावरचे कागद उलट सुलट करून त्यातून काही मिळतंय का शोधत राहिली. हातात येईल तो कागद पाहून ती  भिरकावून देत होती. विचारांच्या नादात खोलीत झालेला कागदांचा पसाराही तिच्या लक्षात आला नाही.  टापटिपीच्या बाबतीत काटेकोर असणारी चित्रा उन्मळून गेल्यासारखी खोलीतल्या कागदांवर स्वत:ला झोकून देत हमसून हमसून रडत राहिली. काहीवेळाने तिची तीच स्वत:ला सावरत  उठली. खोलीचं दार बंद करुन पसारा नजरेआड टाकत  दिवाणखान्यात आली. निरर्थक इकडे तिकडे पाहात राहिली. तिचं लक्ष कोपर्‍यातल्या टेबलाकडे गेलं. तिने दागिन्यांच्या नक्षीचे नमुने ठेवले होते त्यावर व्यवस्थित ठेवलेला लिफाफा उठून दिसत होता. चित्राला हसायला आलं. चित्राच्या हातात  सहजासहजी पडावा या हेतूने त्याने तिच्या कामाच्या जागी तो लिफाफा ठेवला होता. तिने मात्र त्याच्या खोलीचा नक्षाच बदलून टाकला. तिचा अंदाज खरा होता तर. प्रथमला लेखणीचा आधार घ्यावा लागला होता. म्हणजे पुढचं सारं तिला शंका आली होती तसंच? कधी लिहिलं असेल त्याने हे पत्र? माफ कर म्हणाला म्हणजे काहीतरी अस्वस्थ करणारंच असणार.  त्याची मनोवस्था जाणवली कशी नाही? तिने घाईघाईने पत्र उघडलं. उभ्या उभ्या वाचायला सुरु केलेल्या पत्रातल्या ओळी तिच्या नजरेसमोर अंधुक व्हायला लागल्या. चित्रा खुर्चीचा आधार घेत बसली. अंदाज चुकला म्हणून आनंद मानायचा की जे घडत होतं ते थांबवायचा प्रयत्न करायचा? खरंच होतं ते तिच्या हातात? तिचं तिलाच  समजेना. पण मन मात्र घडत असलेल्या, घडून गेलेल्या घटनांचा,  प्रसंगांचा आपोआप पुन्हा धांडोळा घ्यायला लागलं.

चित्रा पुस्तकात  डोकं खुपसून बसली होती. कथेतले प्रसंग अगदी डोळ्यासमोर उभे राहत होते. एकदम कुणीतरी पुस्तक ओढलं तसं तिने दचकून पाहिलं. प्रथम वैतागून तिच्याकडे पाहत होता.
"किती हाका मारायच्या चित्रा?"
"लक्षातच आलं नाही." ती एकदम ओशाळून म्हणाली.
"चल ना, भटकून येऊ या कुठेतरी." रविवारची दुपारची निवांत झोप काढून तो ताजातवाना झाला होता. तिला खरं तर घेतलेली गोष्ट वाचून पूर्ण करायची होती. पण तिने मोडता घातला नाही. पुस्तक बाजूला ठेवून ती उठली. स्वत:चं आवरुन प्रथम बरोबर निघाली. बाहेर पडल्या पडल्या प्रथमला कुणी ना कुणी ओळखीचं भेटत राहिलंच. चेहर्‍यावर स्मित हास्य ठेवून चित्राही प्रत्येकाबरोबर होणार्‍या त्याच्या गप्पा ऐकत होती. प्रथम गपिष्ट तर चित्रा तशी अबोलच. त्याचं धबधब्यासारखं कोसळत राहणं तिला मनापासून भावायचं, त्याच्या लोकसंग्रहाचं कौतुक वाटायचं. ती कौतुकाने त्याच्या प्रत्येकाशी होणार्‍या गप्पा कान देऊन ऐकत होती. रहदारीचा भाग काही वेळात संपून दृष्टीक्षेपात येणारा गडनदीचा पूल गप्पागोष्टींमुळे नजरेत यायला दहा पंधरा मिनिटं लागली. तो दिसायला लागल्यावर मात्र कधी एकदा पुलाच्या कठड्याला टेकतो असं होऊन गेलं चित्राला. प्रथमच्या बरोबरीने ती चालत असली तरी आता तिला त्या पुलाचीच ओढ लागली. नदीजवळच्या पुलाजवळ येऊन दोघं उभे राहिले. पुलाखालून वाहणार्‍या गडनदीच्या पाण्याकडे चित्रा पाहात राहिली. नदीच्या पाण्याचा  आणि पाठीमागून रस्त्यावरुन जाणार्‍या एखाद्या गाडीचा आवाज इतकंच काय ते संगतीला आहे असं वाटत होतं. कितीतरी वेळ ती तशीच उभी होती. प्रथमने तिच्या तंद्रीचा भंग केला,
"उभ्या देवापर्यंत जाऊ या?" वाहणार्‍या पाण्याचा खळखळाट, डाव्या हाताला वळत गेलेल्या रस्त्यावर झाडामधून नजरेला पडणारी पण झटकन नाहीशी होणारी एखादी सायकल, आणि मध्येच संध्याकाळच्या येणार्‍या प्रकाशाची तिरीप डांबरी रस्त्यावर पडून काहीतरी चकाकल्यासारखा भास हे सारं अनुभवण्यात  ती गुंग होती. प्रथमच्या शब्दांनी ती भानावर आली.
"चालेल." ती लगेच वळून चालायला लागली. प्रथमच्या हातात हात गुंफून मावळतीचा प्रकाश अनुभवत  संथपणे चालत राहिली.
"काय काय येतं नाही नजरेच्या टप्प्यात या पुलावरुन? गडनदी, हळवलला जाणारा रस्ता, आर्यादुर्गेचं देऊळ. मला आवडतं हे दृश्य पाहायला. पण पुलावरुन भरधाव वेगाने जाणार्‍या गाड्यांची भिती वाटते. फार जोरात चालवतात." तिने नुसतीच मान हलवली. प्रथमनेही गप्पा मारण्याची इच्छा आवरली आणि शांतपणे तो तिच्याबरोबरीने चालत राहिला.

गर्द झाडीच्या रस्त्यावरुन पायवाटेवरुन थोडं आत चालत गेलं की विस्तीर्ण वृक्षांच्या सावलीतला उभा देव तिला  आजूबाजूच्या वातावरणात गूढता निर्माण करणारा वाटायचा. पायाखालच्या पानांची सळसळ, लांबवरुन ऐकू येणारी एखादी हाक, नदीच्या आसपास  कपडे धुण्याचा येणारा अस्पष्ट धपधप आवाज असं सगळं कानावर झेलत दोघं तिथल्या भल्या मोठ्या शीळेवर बसले. हाताच्या अंतरावर शांतपणे  वाहणार्‍या गडनदीच्या पाण्याकडे दोघं मूकपणे पाहत राहिले.
"तुला पश्चाताप होतोय का चित्रा?" अचानक प्रथमने विचारलं. तिने गोंधळून त्याच्याकडे पाहिलं.
"कशाबद्दल?"
"या आडगावात येऊन राहिल्याचा." चित्राने हसून मानेने नकार दिला.
"नक्की?" त्याने पुन्हा विचारलं.
"नाही रे. पश्चाताप कसला. तुला आवडतंय ना मग झालं तर."
"हेच, हेच मला आवडत नाही तुझं. मला आवडतं म्हणून तू करतेस का सारं?"
"नाही, असंच काही नाही."
"तू आनंदी  दिसत नाहीस. चित्रा, मला ठाऊक आहे तुला यायचं नव्हतं रत्नागिरी सोडून. माझ्यासाठी म्हणून आलीस तू. खरं ना?"
ती काहीच बोलली नाही.
"इतका त्याग, कुढेपणा बरा नव्हे चित्रा."
"अरे, काहीतरीच काय बोलतोस?"
"मन मारुन तू काही करावंस अशी माझी इच्छा नाही. मी हे पहिल्यापासून सांगतोय. पण तुझ्या मनाचा थांगच लागत नाही कधीकधी."
काही न बोलता चित्राने त्याच्या हातात हात गुंफला.
"तुझं काहीतरीच. आणि आता आलोय इथे आडबाजूला तर बसू या नं निवांत.  डोळे मिटून इथला शांतपणा अंगात अलगद झिरपू द्यावा असं वाटतंय. आपणही ह्या शांततेचा, गूढतेचा भाग व्हावा असं काहीसं." तिने त्याच्या खांद्यावर मान टेकून डोळे मिटलेच. तो ही नाईलाज झाल्यासारखा संथ वाहणार्‍या पाण्यावर नजर खिळवून बसून राहिला. एकमेकांना चिकटून बसलेल्या त्या दोघांची मनं मात्र दोन दिशेला भरकटली होती. प्रथमच्या मनात चित्राला बोलतं कसं करायचं याचा विचार चालू होता तर चित्राच्या डोळ्यासमोर कणकवलीला कायमचं यायचं ठरायच्या आधीचे दिवस तरळत होते.

त्या दिवशी कणकवलीहून तो आला संध्याकाळी. चित्राने नुकतंच काही दागिन्यांचं काम पूर्ण केलं होतं. त्यातली रंगसंगती, आकार ती पुन्हा पुन्हा निरखून पाहत होती. दुबईतल्या व्यावसायिकाला दागिने आवडले तर वर्षभर पुरेल इतकं काम हाताशी येणार होतं. ते काम तिलाच मिळेल याची तिला खात्री होती. थोडेफार बदल सुचवले तर ते करायची तयारी तिने मनात आधीच केली होती. आता फोटो काढून पाठवून द्यायचं एवढंच राहिलं होतं. प्रथम आल्या आल्या उत्साहाने ती बांगडी आणि हाराची नक्षी दाखवणार  तितक्यात घरात शिरल्या शिरल्या तोच म्हणाला.
"चित्रा, खूप दिवसांपासून मनात काही घोळतंय. तुला केव्हा वेळ असेल तेव्हा बोलूया."
"महत्वाचं आहे? त्याच्या स्वरातला गंभीरपणा  तिला जाणवला. तिने हातातले नक्षीचे कागद आणि दागिने बाजूला ठेवले.
"अगदी तसंच नाही. पण थोडी धाकधूक, शंका आहे मनात. तुझ्याशी बोलता बोलता मलाच उत्तरं सापडत जातात."
"मग बोल की आत्ताच. आहे वेळ मला. पण निदान हात पाय धू, काहीतरी खाऊन घे. यमुनाबाईंना सांगू का काहीतरी करायला?"
"नको. निघायच्या आधी खाल्लंय."
"ठीक आहे." चित्राने यमुनाबाईंना त्याचं सामान आत नेण्याची खूण केली आणि ती बसली.
"मी कणकवलीला कायमचं जायचं ठरवतोय." एक क्षणभर चित्राला तिचे कान लाल झाल्यासारखे वाटले. पण स्वत:ला सावरुन तिने विचारलं,
"असं अचानक? म्हणजे कधी ठरलं तुझं? आणि माझं काय?" तिच्या स्वरात शांतपणा असला तरी नकळत आवाज किंचित उंचावलाच. पण तिचं तिलाच  जाणवल्यासारखं ती म्हणाली,
"नाही म्हणजे शेवटी तू विचार करुनच काय ते ठरवलं असशील म्हणा."
"आबा थकलेयत. विश्वासू माणसाच्या शोधात आहेत पण मलाच वाटायला लागलंय मीच घ्यावं आता हातात काम." तिच्या चेहर्‍यावरचे भाव निरखीत प्रथम बोलत होता,
"म्हणजे कुणाचाच तसा आग्रह नाही.  अजून एखादं वर्ष रेटतील ते कारभार सुरळितपणे. पण कामं स्वीकारुन बसले आहेत.  फक्त कणकवलीतली नाही तर आजूबाजूच्या गावातली. त्यांच्यासारखं काम कुणी करत नाही अशी ख्याती आहे ना त्यांची. आपल्या दृष्टीने साध्या नावाच्या पाट्या बनवायच्या असल्या तरी त्यात कलात्मकता पाहिजेच यावर ठाम आहेत ते. खरं सांगायचं तर हातात घेतलेलं काम झेपेल की नाही या विचाराने त्यांच्या मनावरचा ताण वाढतोय असं जाणवलं मला. तसाही मी अधूनमधून मदतीला जात असतोच. मग तिथेच बस्तान हलवलं तर? माझ्याशिवाय आहे कोण त्या दोघांना? आणि मुख्यं म्हणजे तू पण त्यांना काही कल्पना देऊ शकशील."
चित्रा काही बोलली नाही. एकदा वाटलं आपल्या कामाचं कारण पुढे करावं. पण कशाला? त्याबाबतीत काय करता येईल हे तिलाही ठाऊक होतंच की. पण त्याने हे ठरवूनच टाकलं आहे की तो विचारतोय? तिच्या मनातलं कळल्यासारखं प्रथम हसला.
"मी काही ठरवलेलं नाही. पण आज परत येताना जो अस्वस्थपणा आला त्यातून मोकळं व्हायचं होतं मला. तुझं म्हणणं ऐकायचं होतं. जो निर्णय घेऊ तो दोघांनी मिळून घेतलेला असेल. मी म्हणतोय म्हणून ते झालं पाहिजे असा माझा मुळीच अट्टाहास नाही. आणि लगेच काही ठरवायचं आहे असंही नाही. तू विचार कर. मग बोलूच आपण. जे माझ्या कामाच्या बाबतीत तेच तुझ्याही. तुझं काम सुदैवाने तिथेही करु शकतेस." त्याने तिच्या केसावर थोपटल्यासारखं केलं. आतून यमुनाबाईंची ताटं वाढल्याची हाक ऐकू आली तसं दोघंही उठलेच.

नकार द्यायचा? रत्नागिरीतलं सुरळीत आयुष्य सोडून पुन्हा घडी बसवायला जायचं कणकवलीला? तो जसा त्याच्या आई वडिलांचा विचार करतोय तसा मलाही माझ्या करायला नको का? आई तर एकटी राहतेय. कधी ना कधी आपल्याकडे येऊन राहायचा विचार तिच्या मनात डोकावला तर? येईल ती कणकवलीला? का जाईल बाबांकडे? पण नाही म्हणणं इतकं खरंच सोपं आहे? त्याच्या मनात जायचं असेलच तर मग वाद, भांडणं सुरु होतील. टोक गाठलं जाईल. म्हणजे अजून पर्यंत तसं कधी झालेलं नाही. समजूतदार आहे प्रथम. पण आई, वडिलांसाठी तो हा निर्णय घेतोय आणि आपण नाही म्हणायचं? उगाचच अडवण्यात काय अर्थ? ती एकदम लहान मुलीसारखी रडायला लागली. मुंबईच्या घरातल्या एक खणी खोलीत असल्यासारखा तिचा जीव गुदमरायला लागला. त्या खोलीत वावरणारे आई, बाबा दिसायला लागले. आसपास वावरायलाच लागले ते तिच्या.

"गेंड्याचं कातडं पांघरलंय तुम्ही. किती काही बोललं तरी आपलं तेच खरं." बाबांच्या हातातलं वर्तमानपत्र खेचत आई म्हणाली.
"उत्तर दिलं नाही म्हणजे गेंड्याचं कातडं? तेच तेच ऐकून कंटाळतो म्हणून काही बोलत नाही. "
"बोलू नका हो. करुन दाखवा."
"ते दाखवतोच आहे. तुला दिसत नाही त्याला मी काय करु?" दोघांचे आवाज वाढायला लागले तसं तिथेच अभ्यास करत बसलेल्या चित्राने वहीत  जोरजोरात काहीतरी खरडायला सुरुवात केली. आईने तिच्या पाठीत  धपाटा घातला, हातातली वहीदेखील ओढली.
"चित्रा, काय हे गिरमिट करुन टाकलं आहेस. आणि किती जोर लावायचा तो. वही फाटेल." चित्रा तिथून पळालीच.  स्वयंपाकघरात जाऊन तिने पाण्याचं भांडं तोंडाला लावलं. घशाला पडलेली कोरड गेली तरी पडद्याच्या आडून ऐकू येणार्‍या आवाजांनी तिच्या काळजाचे ठोके वाढले. ओट्याच्या बाजूला कोपर्‍यात भिंतीला टेकून ती शरीराचं मुटकुळं करुन बसली. आई इतकी का चिडते? बाबा सगळं शांतपणे ऐकत राहतात. बाबा नक्की काय चुकीचं करतात म्हणून दोघांचे सारखे वाद होतात? खरं तर नेहमी आईच त्यांच्यावर चिडते. याचा अर्थ तेच चुकत असणार. आई चिडली की  तेही वाद घालतात. आई ऐकून घेत नाही हे लक्षात आलं की  दारामागच्या खुंटीवर अडकवलेला शर्ट घालून निघून जातात. आई ते दाराबाहेर पडेपर्यंत बडबड करत राहते. आताही चित्राला माहीत होतं त्याचक्रमाने सारं पार पडलं. चित्रा आई स्वयंपाकघरात कधी येईल त्याची वाटच पाहत होती. तिने आल्याआल्या  प्रश्न विचारायला सुरुवात केली.  न चिडता, आदळआपट न करता आई तिच्याकडे पाहत राहिली. रोजच्या वागण्यापेक्षा आईचं हे वागणं वेगळं होतं. ती  चित्राच्या बाजूला येऊन बसली आणि गुडघ्यात डोकं खुपसून रडायला लागली. चित्रा बावचळली. आईला रडताना ती प्रथमच पाहत होती. ती एकदम शांत झाली. मोठं होत तिने आपल्या आईला कुशीत घेतलं.
"रडू नको ना." स्वत:चे डोळे पुसत चित्रा आईला समजावीत होती. चित्राच्या केविलवाण्या चेहर्‍याकडे पाहात आईने  अश्रू रोखले. काही न बोलता ती तशीच बसून राहिली.
"तू बाबांवर का चिडतेस? मला नाही आवडत."
"माझं चिडणं डोळ्यावर येतं. त्यांचं वागणं नाही दिसत कुणाला."
"काय करतात ते?"
"पिल्लू, तू फार लहान आहेस गं. नाही समजायचं तुला आता काही."
"सांग ना."
"तुझे बाबा कोणतीही गोष्ट गंभीरपणे घेत नाहीत म्हणून चिडते मी."
"म्हणजे?"
"हे बघ, आजोबा मदत करतात आपल्याला. त्यांच्यावर अवलंबून राहावं लागतं. तु्झे बाबा दर दोन चार वर्षांनी वेगवेगळ्या कल्पना मनात घेऊन नवीन काहीतरी व्यवसाय करायला निघतात.  एकाचवेळी दोन तीन गोष्टी. त्यासाठी पैसे गुंतवावे लागतात. धंद्यात पैसा खेळता ठेवायला लागतो हे मान्य. पण हाताशी पैसा नसताना दुसरं काहीतरी सुरु करायचं कशाला?" चित्राला काडीचंही समजलं नाही. पण तरी तिने विचारलं.
"बाबा सांगतात आजोबांकडून पैसे आणायला?"
"नाही. जाऊ दे. तुला नाही समजायचं." आईने विषय संपवला. चित्राचा  गोंधळ आणखीनच वाढला. तिने बाबा नाहीतर आजोबांनाच आईच्या म्हणण्याचा अर्थ विचारायचं ठरवलं.

पण ठरवलं तरी तसं झालं नाही. बाबा खूप उशीराच यायचे घरी. त्यात हल्ली हल्ली आणखी उशीर व्हायला लागला होता. आले की  इतके कसल्यातरी विचारात असायचे की समोर जायलाच भिती वाटायची चित्राला.  बर्‍याचदा चित्रा झोपेतून जागी व्हायची ती दोघांच्या आवाजाने.  आजही तसंच झालं. मात्र आईच्या ऐवजी बाबांच्या आवाजाने ती दचकून उठली. आणि तशीच पलंगावर बसून राहिली. पडद्याच्या आडोशातूनही बाबा काय बोलतायत ते स्पष्ट ऐकू येत होतं.
"घरी आलो की तुझं सुरु. तुझ्या करवादण्याने सतत भेदरल्यासारखी वागत असते चित्रा. मी तिच्यासाठी गप्प बसतो. "
"खरं वाटेल कुणाला." आई खिजवल्यासारखी हसली. म्हणाली,
"माझा शब्द खाली पडू देत नाही तुम्ही."
"वाटतं ते सांगायचा प्रयत्न करतो. पण तुझं चालूच राहतं. मग गप्प बसतो. पण  सततची धुसफुस, भांडणं, वाद याचा चित्रावर परिणाम होतोय ते कसं लक्षात येत नाही तुझ्या?"
"इतकी काळजी आहे तर ही वेळच येऊ न देण्याची खबरदारी का नाही घेतलीत? सगळे धडे मला."
"मी काही केलं तरी तुला समाधान मिळायला हवं ना."
"समाधान मिळेल असं कर्तुत्व गाजवा की. कुणी नको सांगितलंय."
"अगं बाई, तुझ्या या अशा बोलण्याचं सतत दडपण असतं माझ्या मनावर. दोन तीन व्यवसाय एकावेळी मी नीट सांभाळतो तरी सतत टोचून बोलतेस. बरं आपल्याला काही कमी आहे का? नाही. पण एकहाती तू मागशील तेवढी रक्कम ताबडतोब हजर करता येत नाही या एकाच मुद्यावर सतत कटकट असते तुझी. व्यवसायात पैसा फिरता राहतो हे कितीवेळा तुला सांगायचं तेच समजत नाही."
"तो फिरता पैसा पुरवावा लागतो माझ्या वडिलांना."
"मी गेलोय कधी त्यांच्याकडे मागायला? गेलोय कधी?"
"तुम्ही नसाल गेला. पण वापरता ना त्यांनी दिलेले पैसे."
"मी वापरत नाही. तुझ्याकडे असतात ते पैसे. मी घेऊ नको सांगूनही तू घेतेस. पुन्हा सांगतोय, माझ्या अंगात संसार चालवण्याची धमक आहे."
आई काही बोलली असली तरी चित्राच्या कानापर्यंत ते पोचलं नाही. पण एकदम ओरडण्याचा आणि रडण्याचाच आवाज यायला लागला. कधी नव्हे ते बाबा तारस्वरात ओरडत होते.
चित्रा घाबरुन थरथरायला लागली. तिला बाबांच्या कुशीत शिरावंसं वाटत होतं. ती जवळ असली की बाबा एकदम शांत होतात ते ठाऊक होतं तिला. पण बाबांचा इतका चढलेला आवाज ती पहिल्यांदाच ऐकत होती. ती तशीच बसून राहिली. बाजूची चादर तिने अंगावर ओढून घेतली. भिंतीला टेकून ती कानावर आदळणारे शब्द झेलत राहिली. कितीवेळ गेला कुणास ठाऊक पण आई खासकन पडदा बाजूला करुन बाहेर आली.  कपाट उघडून तिने आतल्या साड्या बाहेर फेकायला सुरुवात केली. चित्राच्या मुसमुसण्याचा आवाज कानावर पडला तसं तिच्याकडे न पाहताच आई ओरडली,
"ऊठ लगेच. आपल्याला जायचंय इथून."
"कुठे जायचंय?"
"आजोबांकडे."
"बाबा पण येतायत?"
"नाही. एकही प्रश्न विचारु नकोस आता. कृपा कर."  चित्रा बाबांच्या दिशेने धावली. बाबा खुर्चीत मान खाली घालून बसले होते. तिने त्यांच्या गळ्याला घट्ट मिठी मारली. त्यांनीही तिला आवेगाने जवळ घेतलं.
"मला नाही जायचं आजोबांकडे." ते काही न बोलता तिला थोपटत राहिले. आई पायात चप्पल घालून दारात उभी राहिली तसं बाबांनीच चित्राला खूण केली. तेही उठले.
"जाऊ नकोस. उद्या शांतपणे बोलू आपण. इतक्या रात्री आलेलं पाहून घाबरतील घरातली." आई सरळ पायर्‍या उतरायला लागली तसं बाबाच त्या दोघींबरोबर खाली आले. रिक्षा थांबवून दोघींना बसवून देत ते तिथेच उभे राहिले.
"तुम्ही उद्या मला न्यायला या बाबा. शाळा चुकवायची नाहीये मला." रिक्षा सुरु झाली तसं तिने बाहेर डोकं काढत  रडत म्हटलं. बाबांनी मान डोलावली. आईने हाताने तिला आत ओढलं आणि ते घर कायमचं सुटलं.

बाबा न्यायला येतील या आशेवर होती चित्रा. तिला वाटलं तसं बाबा आलेही दुसर्‍यादिवशी. पण तिच्याकडे लक्ष देण्याच्या मन:स्थितीत कुणीच नव्हतं. बाबा सतत आजोबांशी काहीतरी बोलत होते. आई मध्ये पडली की आवाज चढत होते. आजी मात्र तिला तिथे फिरकूच देत नव्हती.  त्या दिवशी चार पाच तास तरी असेच गेले असावेत. निघायच्या आधी बाबा तिला भेटले ते आता ती इथेच राहील, तिची शाळा बदलेल पण ते तिला भेटत राहतील हे सांगण्यापुरतं. बाबा गेल्यानंतर कितीतरी दिवस आईने रडून काढले. चित्राचंही नवीन शाळेत लक्ष लागत नव्हतं. ती शाळेतून आली की पुस्तकात डोकं खुपसून बसे. गोष्टींमध्ये जीव रमवायचा प्रयत्न करी. मनात आई, बाबांबद्दलचा राग साठत चालला होता. तो वागण्यातही डोकावायला लागला. उलट उत्तरं, निष्काळजीपणा हे नित्याचं झालं. कधी घरकोंबड्यासारखं वागायचं तर कधी शाळेतल्या वाचनालयात जितक्या उशीरापर्यंत बसता येईल तितका वेळ  तिकडेच काढायचा. वाचनालयात झालेल्या ओळखीतून बाहेर उंडारत रहायचं. विचित्र वळणावर चित्राचं आयुष्यं खेचलं गेलं.  घरातलं वातावरणही बदललं. सुरुवातीला रडून दिवस काढणारी आई, आजोबांच्या व्यवसायात मदत करायला लागली. बराचसावेळ ती तिकडेच घालवे. चित्रामधलं लक्ष काढून घेतल्यासारखं वागत असली तरी चित्राच्या सार्‍या गरजा भागवत होती ती, मागेल ते देत होती. फक्त तिचं मन जाणून घ्यायचा प्रयत्न आईकडून होत नव्हता. लेकीसाठी वेळ देता येत नव्हता. बाबा अधूनमधून उगवत. तिला घेऊन बाहेर जात. बाहेर जेवण, आइसक्रीम ती जे मागेल ते मिळे. चित्राला आत्तापर्यंत जे मिळालं नव्हतं ते विनासायास हजर होत होतं, म्हटलं तर भौतिक सुख कधी नव्हे ते आपणहून चालून येत होतं. पण अधूनमधून मिळणारा सुखाचा घास तेवढ्यापुरता आवडला तरी आई, बाबांच्या सहवासाला ती आसुसली होती. प्रत्येकवेळी बाबा सोडायला आले की तिला वाटायचं, सगळ्यांनी मिळून पहिल्या घरी जावं. पुन्हा तिथल्या शाळेत जावं, मैत्रिणींना भेटावं. पण आई, बाबा स्वतंत्ररीत्या कितीही तिला पाहिजे ते द्यायचा प्रयत्न करत असले तरी एकत्र आले की  वाद विवादाच्या फैरी झडत. आता यात आजोबांचाही समावेश झाला होता. आजी या सगळ्याला कंटाळली आणि एक दिवस नेहमीचं नाटक सुरु झाल्या झाल्या तिने चित्राला बोलावलं.
"हिच्या समोरच ठरवा काय करणार आहात पुढे. फार झाली ओढाताण तिची. इथे येऊनही वर्ष होऊन जाईल. दोन्ही डगरीवर पाय देऊन उभं राहणं दोघांनीही थांबवा." काही वेळ कुणीच काही बोललं नाही. मग बाबाच म्हणाले,
"चित्रा, तुझ्यावर अन्याय होतोय याची कल्पना आहे. माफी तरी कुठल्या शब्दांनी मागू? पण याला अंत नाही. आतापर्यंत म्हटलं तर आम्ही दोघंही प्रयत्न करत राहिलो. पण प्रेम, तडजोड यापेक्षा अहंकार वरचढ झालाय. या क्षणी माघार कुणीही घेतली तरी ती तात्पुरतीच असेल. प्रत्येक वेळच्या यातनामरणापेक्षा एकदाच सोक्षमोक्ष लागणं उत्तम. आमचे मार्ग इतके बदलले आहेत की ते पुन्हा एकत्र येतील असं वाटत नाही." बाबांचं बोलणं समजायला कठीण जात असलं तरी त्यातला अर्थ चित्राला व्यवस्थित कळला. घटस्फोट. आई - बाबा घटस्फोट घेणार. तिला रडावंसं वाटत होतं. पण घरातल्या मोठ्यांसमोर रडण्यात अपमानही वाटत होता. ती बाबांच्या नजरेला नजर देत तशीच बसून राहिली. आईने काही न बोलता चित्राचा हात हातात धरला. चित्राने तो झिडकारलाच. धावत ती आजीच्या खोलीत शिरली. धाडकन पलंगावर अंग टाकून रडत राहिली. पाठीवर फिरत असलेल्या हातानेच आजी खोलीत आल्याचं तिला कळलं. हळूहळू ती शांत झाली.
"वेगळे होणार का गं आई बाबा?"
"तेच या परिस्थितीत योग्यं नाही का चित्रा? वर्षभर वाट पाहिली. पण काही बदलेल असं वाटत नाही. घरी तेच इथे येऊनही तेच. कुणालाच सुख नाही."
"आजी, माझ्या संसारात मी नाही असं वागणार. ही वेळच येऊ देणार नाही. का असं वागतात गं दोघं? माझं चुकलं की ओरडायचे, मला फटके मिळायचे लहान असताना. ठाऊक आहे ना?"
"हो."
"मला पण दोघांवर आरडाओरडा करावंसं वाटतंय. फटकावून काढलं पाहिजे दोघांनाही."
"चित्रा..." आजीच्या स्वरातला कठोरपणा जाणवला तशी चित्रा गप्प झाली.
"कुणाचं आणि काय चुकलं, चुकतंय ही चर्चा निरर्थक आहे. टाळी एका हाताने वाजत नाही हेच खरं. पण यातून सर्वांनाच मार्ग काढायचा आहे. तुझी आई, आजोबांना मदत करेल. तिला आता स्वत:च्या पायावर उभं राहणं जितकं गरजेचं आहे तितकीच आवश्यकता तुझं वागणं बदलण्याची आहे चित्रा."
"मी काय केलं? चुकतंय ते त्या दोघाचं."
"त्यांच्या चुकीची शिक्षा तू त्यांना भरकटल्यासारखं वागूनच द्यायला हवी असं आहे का?"
"पण मी..."
"लहान नाहीस तू आता. तुला चांगलं कळतंय मला काय म्हणायचं आहे ते." चित्रा काही न बोलता बसून राहिली. आजी उठून पुन्हा बाहेर निघून गेली. पण नाकारायचं म्हटलं तरी आजीचं बोलणं तिला पटत होतं. निदान स्वत:च्या आयुष्याचा ताबा तिने स्वत:च घ्यायला पाहिजे होता. पण म्हणजे काय करायचं? ती जास्तीत जास्त आजीच्या आसपास घालवायला प्रयत्नपूर्वक शिकली.  विस्कटलेली घडी  सुरळीत व्हायला चार पाच वर्ष लागली. प्रत्येकाची दिशा वेगळी असली तरी निदान मार्ग हाती गवसले होते. इथपर्यंत पोचेतो सर्वांनीच बरंच काही गमावलं होतं त्यामुळे आता हातातून काही निसटू न देण्याची खबरदारी मन आपोआप घ्यायला शिकलं होतं. आजीच्या पंखाखाली चित्राला सुरक्षित वाटत असतानाच अचानक आजी गेली. काहीही हासभास नसताना गेलेल्या आजीचं जाणं चित्राला पचवणं फार जड गेलं. पण जाता जाता आजीने विस्कटलेली घडी पुन्हा नीट बसवून दिली होती. चित्राही प्रयत्नांची पराकाष्ठा करुन ती घडी आता विसकटू देणार नव्हती. बाबा अधूनमधून घरी येत राहिले. आले की आजोबांशी बोलत बसायचे. आईच्या स्वतंत्र बाण्याचं कौतुक करायचे. थकल्या डोळ्यांनी आजोबाही बाबांच्या यशाचं कौतुक करायचे. आई फारशी बोलत नसली तरी बाबा आले की तिचा चेहरा खुलायचा. गुण दिसायला, कर्तुत्व पटायला खरंच लांब जावं लागतं एकमेकांपासून? चित्राच्या घराबाबतीत तरी निदान तसं झालं होतं. पाहताना चित्राला वाटायचं, आजी हवी होती. खूश झाली असती. हल्ली हल्ली तर तिला वाटायला लागलं होतं आई, बाबांनी पुन्हा एकत्र यावं. नाहीतरी आता किती छान जमतं दोघांचं. मनातला विचार ओठावर येईतो आजोबांनी आजीच्या वाटेवर पाऊल टाकलं.  आता तर चित्राला आईला बाबांच्या आधाराची खरी गरज आहे असं प्रखरतेने वाटत होतं. शेवटी एकदा धाडस करुन तिने विषय काढला.
"बाबा, आता तुम्ही इकडेच का राहत नाही? आईला मदत हवीच आहे तिच्या कामात." आईने आश्चर्याने चित्राकडे पाहिलं.
"अगं काय बोलतेयस तू चित्रा? तुझ्या बाबांना वाटेल मीच बोलले हे तुझ्याशी. कुठून हे वेड घेतलंस?"
"वेड? नाही गं. मला तीव्रपणे वाटलं तेच करतेय. आई, मला तुम्ही दोघंही हवे आहात गं. आता काही मी लहान नाही. लवकरच शिक्षणही संपेल माझं. जुने दिवस आठवते तेव्हा तुमच्या दोघांचं वागणं, माझं तुमच्याबरोबर बदलत गेलेलं नातं हे जसं लक्षात येतं तसं त्यावेळची तुमची मन:स्थिती,  तुमच्या दोघांची ओढाताण हे मला आता कळतं.  बाबांच्या मनातलं कायमचं एक अपराधीपण आणि तुझं सततचं वैतागलेपण. कोण बरोबर, कोण चुक याचा हिशोब या नात्यात नाहीच करता येत. तुम्ही वेगळं व्हायचं ठरवलंत त्याची नक्की कारणं माहीत नसली तरी अंदाज आहे मला. दोघांची बाजूही आता समजू शकते मी.  नात्याचा ताण तुम्हाला झेपला नाही हेच खरं. घटस्फोट झाल्यावर, दूर गेल्यावर कसं सगळं सुरळीत झालंय. तुमचं तुम्हालाही हे जाणवलं असेलच ना? तुमच्या दोघांच्या वागण्याची झळ मला लागत होतीच, तुम्हालाही ते समजत असणारच. बाबा, तुम्ही माझ्या वाट्टेल त्या मागण्या पूर्ण करायचात ते त्यावेळेस आवडायचं मला.  आई, तुला वेळ द्यायची इच्छा असूनही जमायचं नाही आणि त्यामुळे आणखीनच चिडचिड व्हायची तुझी. त्या त्या वेळेस राग यायचा पण आता तुम्ही एकमेकांना समजून घेताना दिसता ना, तेव्हा सगळं विसरुन जावंसं वाटतंय. आणि  आई, मी इथून गेले की तू अगदी एकटी पडशील गं." चित्रा आईकडे पाणावलेल्या डोळ्यांनी पाहात राहिली. पोटच्या मुलीमध्ये आलेलं प्रौढपण पाहता पाहता आईच्या चेहर्‍यावर हसू उमटलं,
"तुझं तू जमवलं आहेस का कुठे? ते सांगण्यासाठी हा मार्ग?" चित्रा गडबडीने म्हणाली.
"नाही गं. म्हणजे ते ही सांगायचं आहेच. पण आत्ता जे बोलले नं मी ते खरंच आतून आतून जाणवलेलं मला. आजी, आजोबा गेल्यानंतर तुमच्यातला सुसंवाद जाणवतो, आवडतो मला म्हणून मी मागे लागले आहे."
"बरं, बरं, आता मुद्यावर या." बाबा हसून म्हणाले.
" हो, प्रथमशी तुमची भेट कधी घालून देऊ ते दोघांनी सांगा मला." चित्रा पुटपुटली.
"हं, आता खरं बाहेर पडलं. चित्रा, प्रथमला भेटूच आम्ही. पण आमचं दोघाचं पुन्हा एकत्र येणं अशक्य आहे बेटा. आहे तेच चालू राहणं योग्यं. आता तुझी आई काय, मी काय पुन्हा लग्न करु असं वाटत नाही. पण तुटलेला संसार, मनं  सांधताना जी कसरत करावी लागते त्याची तयारी नाही माझी. तुझी आई आता माझी मैत्रीण आहे. ती तशीच राहू दे. त्यातच जास्त सुख आहे. हे माझं मत. तुझ्या आईला काय वाटतं ते नाही ठाऊक मला."
"अगदी तेच म्हणणं आहे माझं." दुजोरा देत आई म्हणाली.
"आता पुन्हा हा विषय नको. प्रथमला केव्हा आणते आहेस भेटायला? त्याच्याबद्दल ऐकायला आवडेल आम्हाला." प्रथमचं नाव काढल्यानंतर चित्रा त्या दोघांची झालेली भेट, त्याच्या घरची मंडळी या बद्दल बोलण्यात रंगून गेली.

प्रथमला चित्रा घरी घेऊन आली आणि तो मग येतच राहिला. शिक्षण पूर्ण होऊन, स्वत:च्या पायावर उभं राहिल्यावर लग्न होईतो मध्ये तीन चार वर्ष गेली. लग्न झाल्यावर मुंबई सोडून रत्नागिरीला जायचं आहे हे ठाऊक असूनही प्रत्यक्ष वेळ आली तेव्हा चित्रा थोडीशी भांबावली पण वाटलं तितकं रत्नागिरीत स्थिर होणं जड गेलं नाही. रत्नागिरीला येऊन दोन वर्ष झाली आणि प्रथमने कणकवलीला स्थायिक व्हायचा निर्णय घेतला. अर्थात तिच्याच संमतीने. कणकवलीला येऊनही वर्ष झालं होतं. प्रथमच्या आई, बाबांनी त्या दोघांचा संसार स्वतंत्र राहिल याची काळजी घेतली होती. गावातच पण वेगळा संसार होता दोघांचा. असं सगळं सुरळीत चालू आहे असं वाटत असतानाच प्रथमने असं का करावं? लाल झालेले डोळे चोळत ती त्याने लिहिलेलं पत्र पुन्हा वाचायला लागली.

प्रिय चित्रा,
गेलं वर्षभर मी झगडतोय. नक्की काय करावं ते समजत नाही. तुझ्याशी बोलायचं धाडस नाही म्हणून हे पत्र. पत्र लेखन बरं असतं. एकतर्फी असतं. मनातलं सारं लिहिता येतं.  चेहर्‍यावरचे भाव निरखीत शब्द बदलावे लागत नाहीत. जे शब्द मी अनेकदा ओठावर येऊनही गिळून टाकले ते इथे लिहितोय. लिहिताना तुझा चेहरा समोर येतोय. तुला माझ्या शब्दांमुळे किती धक्का बसेल याची कल्पनाही करवत नाही. पण मला वाटत नाही आपलं जमेल.  मला कल्पना आहे मी किती दुखावतोय तुला. जे आपल्या दोघांच्या बाबतीत कधीही होऊ नये याची तू आपल्या संसारात दक्षता घेत आलीस त्याच परिस्थितीत मी तुला ढकलतोय. मला ठाऊक आहे, तुझ्या आई वडिलांचा घटस्फोट झाला त्या वाटेवर कधीही पाऊल टाकायचं नाही असा तुझा निर्धार आहे पण त्या निर्धाराचं सावट  आपल्या संसारावर पडतंय हे लक्षातच आलं नाही तुझ्या. खूप प्रयत्न केला मी. पण आहे या परिस्थितीत बदल होईल असं वाटत नाही. तू स्वत:ला हरवून बसली आहेस चित्रा. म्हणजे तसं सगळं छान आहे.  पण जिथे मतभिन्नतेचा प्रश्न येतो तिथे सारं बदलतं. मतभेद होताच कामा नयेत याची काळजी घेण्याचा तुझा खटाटोप असतो. विचार करतो तेव्हा वाटतं, तुझ्या आई, वडिलांच्या सततच्या वाद विवादाला कंटाळली होतीस तू. त्याचाच हा परिणाम असेल का? म्हणजे तसं तू कधी सांगितलं नाहीस त्यामुळे कदाचित ठरवून नसेलही होत तुझ्याकडून पण वाद टाळतेस तू हे अगदी स्पष्ट जाणवतं. एक दोन वेळा मी विचारलंही तुला कारणांबद्दल. पण धड उत्तर नाही देता आलं तुला. कुठल्याही निर्णय प्रक्रियेत मला तुझा सहभाग हवाय. नुसतं हो ला हो नको चित्रा.  आपण एकमेकांचे जोडीदार आहोत. तू माझी गुलाम नाहीस. लग्न झालं म्हणून प्रत्येक गोष्टीला मान तुकवलीच पाहिजे असं कुणी सांगितलं तुला? गेल्या दोन वर्षात एकही गोष्ट मला आठवत नाही ज्याला तू विरोध केलायस. तुझ्या डोळ्यात नाराजी उमटते पण ती तू शब्दात व्यक्त होऊ देत नाहीस. असं का? मी नाना तर्‍हेने हे तुझ्यापाशी खरं तर बोललोय. कितीतरी वेळा अगदी सष्टपणे. असं वागू नकोस म्हणून बजावलं आहे, समजावलं आहे. जर माझं ऐकायचं असंच ठरवलं आहेस तर मग हे का ऐकत नाहीस? भांड ना कडकडून माझ्याशी. आवडेल मला. कितीतरी वेळा तू वाद घालावास म्हणून मी निरर्थक विधानं केली पण आपल्या दोघांमध्ये वादाला जागाच द्यायची नाहीस हे तुझ्या मनात पक्कं ठसलेलं आहे. चुकीचं आहे ते. सांगून सांगून थकलो मी आता. दोन माणसं एकत्र आली की  तडजोड करावी लागतेच पण त्यालाही मर्यादा असते. अस्तित्व हरवून गेलेली कळसूत्री बाहुली नकोय मला चित्रा. हाडामांसाचं माणूस हवंय. चिडणारं, रडणारं, हट्ट करणारं, वेळ प्रसंगी कान उपटणारं. आणि नेमकं तेच या लग्नाने मी हरवून बसलोय आणि म्हणूनच चित्रा, मला वेगळं व्हायचंय. मला घटस्फोट हवाय.

चित्राने हातातल्या कागदाचा बोळा केला. रडत रडत ती ओट्याच्या बाजूला कोपर्‍यात  गुडघ्यात डोकं घालून बसली. मुंबईच्या घरातल्या एक खणी खोलीत असल्यासारखा तिचा जीव गुदमरायला लागला. चुरगळलेल्या कागदाचा बोळा तिने थरथरत्या हाताने पुन्हा उघडला. ज्या शब्दाला आयुष्यात कधीच थारा नाही असा विश्वास होता चित्राला तोच शब्द तिच्या डोळ्यासमोर पुन्हा नाचत होता, प्रथमचा पत्रातून उतरलेला आवाज पुन्हा पुन्हा कानावर आदळत होता. घटस्फोट. मला घटस्फोट हवाय!

Tuesday, November 11, 2014

पाश


(मी जवळून अनुभवलेल्या सत्यघटनेवर आधारित कथा . ही कथा मायबोलीच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली आहे.)

"पैकं भरून टाका सायबांचं."

दरडावलेला आवाज ऐकून शरद सावध झाला.
"कोण बोलतंय? आणि हळू बोला. ओरडू नका."

"आमदार निवासात वस्तीला व्हता नवं तुजा भाव. त्यो पैका भरून टाक पटकिनी आसं म्हनतोय मी."

"एकेरीवर येऊ नका आणि आधी कोण बोलताय ते सांगा. माझा भाऊ आमदार निवासात राहत नाही."

"राहात व्हऽऽऽता. तुज्याकडं जो आकडा येईल त्यवडा पैका भरून टाकायचा. 'माजा काई संबंद न्हाई' आसं म्हनायचं नाय. कललं? कललं का नाय तुला मी काय बोलून राह्यलो त्ये?"

"हे बघा, मी पोलिसांकडे तक्रार नोंदवतो तुमची. बसा मग खडी फोडत, म्हणजे समजेल."

"तू माला धमकी द्याया लागला व्हय? आँ? मला धमकी देतो काय? गपगुमान सांगितलं त्ये कर. आन् हा, तुज्या पोराबालांना जपून रहाया सांग. नाय म्हंजी कदी कुनाला अपघात व्हायाचा येकादा. आता येल काय सांगून येतीया व्हय?"

शरदनं फोन आपटला आणि संतापानं तो तिथल्या तिथे येरझारा घालत राहिला. काही सुचेना तसं बाजूला पडलेलं वर्तमानपत्र त्यानं पुढ्यात ओढलं. डोळे अक्षरांवरून फिरत होते पण मनात धमकीचे शब्द घुमत होते, दादाबद्दल विचार येत होते. दादानं लावला असेल का कुणाला तरी हा फोन करायला? दादाची इतकी दुर्दशा खरंच कशी झाली आणि कधी? घरातल्याच माणसांना छळून, त्रास देऊन हा काय साध्य करतो आहे?

त्याच्याचमुळं अकाली प्रौढत्व आलं माथी. कायमचं. मोठ्या मुलाच्या ज्या काही जबाबदार्‍या दादानं निभावायच्या त्या येऊन पडल्या अंगावर. काही आपसूक, काही स्वत:हून ओढवून घेतलेल्या. आणि आतातर अगदी दादाचीसुद्धा. नातं नाकारलं तरी ते बंध तोडता येत नव्हते. त्याची कर्मं निस्तरतानाही काचलेला दोर पूर्ण तुटू नये असंच वाटत राहिलं कायम. उसवलेले धागे जोडणं चालूच राहिलं. पाश नाकारताच आले नाहीत. पण आज दादानं टोक गाठलं. नाही जमणार आता. दादाच्या वागण्याचे रागलोभ वाटण्यापलीकडे त्याचं वागणं जात चाललं आहे. याच मुलाचं घराण्याचा कुलदीपक म्हणून काय कौतुक व्हायचं. त्यात तो परदेशी गेलेला पहिलाच मुलगा तळेकरांच्या घरातला. त्या काळी, जवळजवळ चाळीस वर्षांपूर्वी.

धोपेश्वरची घाटी चढून येणार्‍या दादाकडे अंगणात उभं राहून घरातली सगळी मुलं उत्सुकतेनं पाहत होती. घाटी चढून आलं की जेमतेम आठ-दहा घरांची वाडी. शेजारीपाजारी सगळे तळेकरच. असं ना तसं काहीतरी प्रत्येकाशी नातं एकमेकांचं. सगळ्यांच्याच घरांमधून उत्सुक नजरा बाहेर खिळल्या होत्या. पांढरंशुभ्र धोतर नेसून आप्पा व्हरांड्यात लाकडी दांड्याला धरून उभे होते. सुनेची आणि लेकाची वाट पाहणार्‍या आप्पांच्या चेहर्‍यावर प्रसन्न हसू होतं. माई हातात मीठमोहर्‍या घेऊन उभी होती. वैजू नवीन फ्रॉक घालून मिरवीत होती. दादा आणि वहिनीची पुसटशी आकृती लांबवरून दिसली. मुलं पायर्‍या उतरून अंगणात नाचायला लागली, दादाच्या नावानं त्यांनी आरोळ्या ठोकायला सुरुवात केली. "अरे, दम धरा रे पोरांनो", असं दटावणीच्या स्वरात पुटपुटत आप्पा पुढे झाले. कपाळावर आडवा हात धरून डोळ्यावर येणारं ऊन लपवीत घाटीच्या दिशेने पाहत राहिले. दादावहिनी गड्याच्या मागून धापा टाकत चढ चढत होते. गड्याच्या डोक्यावर दोन-तीन बॅगा एकावर एक चढवलेल्या आणि दोन हातात दोन पिशव्या अडकवलेल्या. सामानाकडे पाहायचं की दादा आणि वहिनीकडे तेच मुलांना समजेनासं झालं होतं. बरीच वर्षं परदेशात राहिलं की रंग गोरा होतो असं सगळ्यांनी ऐकलं होतं. सहा वर्षांनी दोघं भारतात येत होते. दादावहिनीला भेटायला, पहायला सगळेच उतावळे झाले होते.

दोघं अगदी दाराशी येईपर्यंत उत्सुक डोळे त्यांच्यावर रोखले होते. वैजू उगाचच लाजत वहिनीच्या बाजूला जाऊन उभी राहिली. रमाकांत मोठाले डोळे करून दादाकडे पाहत होता. माईने मीठमोहर्‍या ओवाळून टाकल्यावर दोघं आत आली. हातपाय धुऊन त्यांचा चहा होईपर्यंत दोघांच्या हालचालींचा वेध घेत सगळी कसंबसं इकडेतिकडे करत राहिली. चहाचे कप खाली ठेवल्या ठेवल्या दोघांभोवती घर जमा झालं.

वहिनी बॅगा उघडून आणलेल्या भेटवस्तू ज्याच्या त्याच्या हाती सोपवत होती. वैजू तिच्यासाठी आणलेले सुंदर फ्रॉक पाहून हरखली. रमाकांत, शरदसाठी शर्ट आणि घरासाठी रेडिओ. माई, आप्पा रेडिओ लावून बसले. नवीन कपडे घालून सगळी मुलंही त्याभोवती कोंडाळं करून बसली. थोड्याच दिवसांत नव्याची नवलाई संपली पण रेडिओची मात्र सर्वांना इतकी सवय झाली की सकाळच्या बातम्या, संध्याकाळचे कार्यक्रम, रात्रीच्या श्रुतिका, भाषणं - काही ना काही ऐकायला सगळेजण रेडिओभोवती रोज कोंडाळं करून बसायला लागले. दादा आणि वहिनी धोपेश्वरला असेपर्यंत कॅनडाबद्दल किती आणि काय ऐकू असं होऊन गेलं होतं सार्‍यांना. तिकडच्या हिमवृष्टीबद्दल तर कोण कुतूहल होतं सगळ्यांच्याच मनात. दादावहिनींनी कॅमेर्‍यात बंदिस्त केलेले क्षण पाहताना सगळे रंगून गेले. कॅनडाचं चित्र प्रत्येकानं दादावहिनीकडून ऐकलेल्या वर्णनांनी आपापल्या मन:पटलावर रेखाटलं, कायमचं बंदिस्त केलं.

दादा परत आला होता तो कायमचा. पुन्हा कॅनडात न जाण्याचं ठरवून. आता तो कोल्हापूरला स्थायिक होणार होता. आल्या आल्या त्यानं रमाकांत, वैजू, शरद यांच्याबद्दलचे बेत ठरवायला सुरुवात केली. शरद शिक्षणासाठी रत्नागिरीला होताच. वैजूचं लग्न आणि रमाकांतचा महाविद्यालयीन खर्च दादा करणार होता. माईआप्पांनी धोपेश्वर सोडावं, कोल्हापूरला यावं असा आग्रहच त्यानं धरला, तो मात्र आप्पांनी पूर्ण केला नाही. ते दोघं धोपेश्वरलाच राहिले.

दोन-तीन वर्ष भर्रकन गेली. शरद शिक्षण संपवून कमवायला लागला. चिपळूणला स्थायिक झाला. वैजूचं लग्न झालं, रमाकांतचं शिक्षण पूर्ण होऊन तोही नोकरीला लागला. माईआप्पा खूश होते. अधूनमधून दादाकडे, शरदकडे जाऊन रहात होते. या सगळ्याला खीळ बसली ती वैजूच्या आलेल्या पत्रानं.

आप्पांचा त्या पत्रावर काही केल्या विश्वास बसेना. येऊन जाऊन तर होते सारेजण दादाकडे. मग कधी शंका कशी आली नाही? आणि आता आतातर दादा आला होता कॅनडाहून. तो इथे स्थिर झाला, भावंडांनाही त्यानंच मार्गी लावलं, आता प्रपंचातून मुक्त व्हायचं असे मनसुबे रचत असताना हे काय अचानक? परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा ते सुचेना तसं माई, आप्पा पत्र घेऊन चिपळूणला आले. आजही ते पत्र शरदला जसंच्या तसं आठवत होतं.


ती. आप्पा आणि माई,
शि. सा. न. वि. वि.
माझं पत्र पाहून आश्चर्य वाटेल. कितीतरी दिवस येऊन जायचा विचार करते आहे पण जमलं नाही. या वेळेला पत्र लिहिणं अवघड वाटतं आहे. तुमच्या मनाला त्रास होईल असं काही लिहू नये असं वाटतंय पण इलाज नाही. दादाबद्दल लिहायचं आहे. कशी सुरुवात करू आणि काय लिहू तेच समजत नाही. वहिनीनं मला चांगलंच तोंडघशी पाडलंय.

मध्यंतरी दुकान अगदीच चालेनासं झालं होतं. पुढे काय ह्या चिंतेत असतानाच हे कोल्हापूरला कामाकरता गेले होते, तेव्हा दादाची भेट झाली. बोलण्याबोलण्यातून आमच्या परिस्थितीचा अंदाज आला दादाला. दादानं मदतीचं आश्वासन दिलं. मध्ये एकदा तो ओणीला येऊन गेला. वहिनीदेखील आली होती. सकाळी येऊन संध्याकाळी परत गेले दोघं. वहिनी निघताना म्हणाली की मी जर माझे सोन्याचे दागिने दिले तर ती तीन महिन्यात दुप्पट करून देईल. मला आश्चर्यच वाटलं पण तिनं मला अगदी सविस्तर पटवून दिलं. ती हे कसं करणार आहे त्याबद्दल सांगून उदाहरणं दिली. विचार करून मी आधी एक सुंकलं होतं ना माझं शाळेत असल्यापासूनचं, ते दिलं. म्हटल्याप्रमाणे दुप्पट सोनं मला तिनं अगदी महिन्याभरातच दिलं. तीच आली होती घेऊन. मी तिलाच ते सोनं विकून पैसे घेतले. खूप आनंद झाला. दुकानाला मदत झाली ना! जाताना मी तिला माझे लग्नातले दागिने दिले. जवळजवळ सात तोळे सोनं. चौदा तोळे सोनं मिळेल ते आधीसारखंच वहिनीलाच विकायचं, त्या पैशामुळे दुकान फार पटकन उभं राहील पुन्हा, असा विचार केला.

आज या गोष्टीला सहा महिने होऊन गेले. मी तिला पत्रं पाठवून थकले. प्रत्येक पत्राचं उत्तर येतं लगेच. त्यात असतात भरघोस आश्वासनं, माझ्याबद्दलची चिंता, वहिनी मला कशी मदत करतेय त्याबद्दलची खात्री. माझ्या मनात भीतीनं घर केलं आहे. ह्यांना मी हे अजून सांगितलेलं नाही. आप्पा, हे लिहितानाच माझ्या डोळ्यांसमोर तुमचा चेहरा येतोय. मी ह्यांना का नाही सांगितलं हा प्रश्न पडलाय ना तुम्हाला? वहिनीनं चार-चार वेळा बजावून सांगितलं होतं की तिने हा व्यवसाय नव्यानेच सुरू केला आहे, नवखी आहे ती यामध्ये, त्यामुळे लगेच कुठे बोलू नये मी. 'काम झाल्याशिवाय कुणाकडेही, अगदी ह्याच्यांकडे देखील बोलू नकोस' असं पुन्हा पुन्हा तिने सांगितलं त्यामुळे मी गप्प राहिले. आता मी काय करू? सगळे मार्ग संपल्यासारखे वाटतायत. वहिनीला मी हेदेखील लिहिलं होतं की दुपटीचं वगैरे जाऊ देत. तू मला फक्त माझे दागिने परत कर. आता जानेवारी जवळ आला आहे. संक्रांतीला अंगावर दागिने दिसले नाहीत तर ह्यांच्या लक्षात येणारच. काय उत्तर देऊ मी? दादालासुद्धा लिहिलं मी पत्र. तो म्हणतो तुझी वहिनी शब्द पाळेल. एवढंच दरवेळेस. मला सांगा नं काय करू मी?

तुमची,
सौ. वैजू.

पत्र वाचून शरदलाही आश्चर्य वाटलं, धक्का बसला. आप्पांशी बोलून त्यानं लगेच हालचाली करायला सुरुवात केली. रमाकांतला पत्र पाठवून कोल्हापूरला यायला सांगितलं. शरद आणि रमाकांत एकदमच कोल्हापूरला जाऊन पोचले. वैजूही ओणीहून कोल्हापूरला आली. सर्वांना अचानक पाहून दादावहिनीला आश्चर्य वाटलं पण खूप आनंदही झाला. काय करू नं काय नको असं होऊन गेलं. त्यांच्या आनंदात तिघांना सहभागी होणं जमत नव्हतं आणि दागिन्यांचा विषय काढणं अवघड वाटत होतं.

शेवटी दोन-तीन दिवस गेल्यावर दुपारची जेवणं झाली आणि रमाकांतनं विषय काढला.

"दादा, आम्ही खरंतर एका कामासाठी आलो आहोत तुझ्याकडे."
"अरे, मग इतका वेळ वाट कशाला पाहिली? आल्या आल्या सांगायचं ना."
"वहिनीनं वैजूला तिचे दागिने दुप्पट करायचं वचन दिलं होतं."
"बरोबर. ती करणारच आहे ते. काय गं?"
"हो, म्हणजे आज करतेच मी ते काम." वहिनीनं हसून उत्तर दिलं.
"नक्की काय करणार आहेस तू वहिनी? असे दागिने दुप्पट वगैरे नाही करता येत."
"येतात. कॅनडात होतो आम्ही तेव्हापासून एका माणसाला ओळखत होतो. तोही इथे आला आहे कायमचा. मी माझेही दागिने घेतले आहेत ना दुप्पट करून त्याच्याकडून."
"आम्ही दोघं येतो बरोबर. त्या माणसाची भेट घडवून दे." रमाकांत म्हणाला.
"मी जाऊन येते आज आणि कधी भेटायला येऊ ते विचारते. वेळ ठरवून गेलेलं बरं."
"फोन कर ना. दोन-दोन खेपा कशाला? नाहीतर एकत्रच जाऊ आपण." शरदला वहिनीचा उत्साह पाहून चीड येत होती.
"नाही, मला त्या बाजूला मैत्रिणीकडे जायचं आहे. आधी विचारून ठेवते तो माणूस घरी कधी असेल ते आणि मग जाऊ एकदम."
सगळे गप्प राहिले. वैजूनं मात्र वहिनीबरोबर जायचा हेका धरला पण नाना कारणं देत तिलाही थोपवलं वहिनीनं.

वहिनी आणि दादा एकदमच बाहेर पडले. वैजू, रमाकांत, शरद दिवसभर त्यांची वाट पाहत घरात बसून. कंटाळलेल्या, वैतागलेल्या शरदनं वैजूवर आगपाखड केली.
"तू काय अक्कल गहाण टाकली होतीस का दागिने देताना? असे दुप्पट होऊन मिळाले खरंच तर सगळ्या जगानं हेच नसतं का केलं?"
"चुकलं माझं. पण गरज आहे रे पैशांची आम्हाला. वहिनी, दादा मला फसवतील अशी पुसटशी शंकादेखील आली नाही."
"मुळात या दोघाचं हे काय चालू आहे? दागिने दुप्पट करून वहिनीला काय मिळत असेल? पैसे? किती? आणि करायचा काय असा मिळवलेला पैसा? इतकी वर्ष कॅनडात होते तर आर्थिक परिस्थिती व्यवस्थित असणारच ना?" रमाकांतला दादा आणि वहिनी असं का करत आहेत तेच कळत नव्हतं.

"त्यांनाच विचारायला हवं. दोघांनींही काढता पाय घेतलेला दिसतोय. संध्याकाळ व्हायची वेळ आली. आपण बसू भजन करत." शरदला दादाची भयंकर चीड येत होती.

दार वाजलं तसं वैजू उठली. दोघं आले असावेत परत असंच वाटलं तिघांना.
"तळेकर पाहिजे होते." दारात अपरिचित गृहस्थ उभे होते. बरोबर एक स्त्री. बायको असावी.

"ते नाहीत घरी. काही काम होतं?" शरद पुढे झाला.
"तुम्ही कोण?"
"मी भाऊ त्यांचा. कोण आलं होतं म्हणून सांगू दादाला?"
"आम्ही आत आलो तर चालेल का? तुमच्याशी बोललं तर..."
"या ना." शरद बाजूला झाला तसं ते जोडपं आत आलं. अस्वस्थ हालचाली करत उभं राहिलं. रमाकांतने दोघांना बसायचा आग्रह केला.
"सांग आता त्यांना, काय झालं ते. म्हणजे आम्ही काही तुमच्या भावाची तक्रार करत आहोत असं नाही पण..." ते गृहस्थ खुर्चीवर बसत म्हणाले.
"माझा स्वेटर, जॅकेट, पर्स बनविण्याचा व्यवसाय आहे. तळेकर वहिनी म्हणाल्या, तिकडे कॅनडात याला खूप भाव मिळेल. २०,००० रुपयांचा माल तयार करून मागितला. १०,००० रुपये दिले. उरलेले पंधरा दिवसांत देते असं सांगून सगळा माल घेऊन गेल्या. पैसे अजून आलेच नाहीत. चांगल्या ओळखीच्या म्हणून मी असा माल दिला. नाहीतर चुकूनसुद्धा पैसे मिळाल्याशिवाय मी काही हातात ठेवत नाही. फसवलं हो चांगलंच."
"इतक्या चकरा मारल्या हिने. दारच उघडत नाहीत. रोज रडत घरी येते. सुरुवातीलाच मला विचारलं असतं तर ओळख पाळख बाजूला ठेव म्हटलं असतं. कंटाळून शेवटी मी आलो आज. तुम्ही नसता तर सरळ पोलिसचौकीत जाणार होतो."
शरदनं त्यांचं नाव, फोन नंबर लिहून घेतला. दादाला निरोप देण्याचं आश्वासन दिलं तसं ते दोघं निघून गेले.

"चला, वैजू तू एकटीच नाहीस अडकलेली यात समाधान मान आता. आहेत तुझ्यासारखी मूर्ख माणसं." रमाकांत म्हणाला तशी वैजू चिडली.
"रम्या, तू जास्त शहाणपणा करू नकोस. मी चुकले हे मान्य केलंय ना. आता काही मदत करता येते ते पाहणार आहेस की मला मूर्ख ठरवण्यात आनंद मानणार आहेस तू?"
"हे दोघं कॅनडाला जाऊन हेच कौशल्य शिकून आले की काय?" शरदच्या प्रश्नावर रमाकांत हसला.
"स्मगलिंग तर नसतील ना करत? त्यात कुठेतरी फसले असतील. आता सगळं निस्तरायला पैसे पाहिजेत. मग घाला टोप्या अशा ज्याला त्याला."
"काय असेल ते असेल. पण सख्ख्या बहिणीला असं लुबाडायचं? वहिनीतर इतकी प्रेमळ. दादापेक्षा ती जवळची वाटायची. कधी शंका पण आली नाही ती फसवेल अशी." वैजूला आता रडायलाच यायला लागलं होतं.
"बोलून पाहू दादा आणि वहिनीशी दोघं एकत्र असताना. त्यांना पैशाची मदत हवी असेल तर ती करू. पण थांबवा म्हणावं हे आता. आज ते जोडपं आलं. अजून कुणाला फसवलं असेल तर? तळेकरांच्या नावाला चांगलंच काळं फासणार हा दादा." शरदचा संताप संताप होत होता.

संध्याकाळी काळोख पडता पडता दोघं घरी आले. शरद वाटच पाहत होता.
"दादा, अरे काय हे. सकाळी बाहेर पडलेला तू. आत्ता परत येताय दोघं. काय दागिने घडवून आणलेत की काय?"
"हे बघ शरद, चिडू नकोस तू. उद्यापर्यंत वैजूचे दागिने देतो परत. मग तर झालं?"
"अरे, आज आणणार होतास ना? आता उद्यावर गेलं. कोणाकोणाच्या तोंडाला अशी पानं पुसली आहेस रे?"
"कुणाच्याही नाही. असे भलते सलते आरोप करू नकोस."
"एक जोडपं येऊन गेलं मगाशी. त्यांनी जे सांगितलं त्यावरून तरी तसंच वाटलं."
"कोण आलं होतं?" वहिनीच्या चेहर्‍यावर प्रश्नचिन्ह होतं.
"वैजूसारखं आणखी कुणीतरी. फसलेलं तुझ्या गोड बोलण्याला."
"शरद, आम्ही कुणालाही फसवलेलं नाही. देणार आहोत वैजूचे दागिने." वहिनीनं शरदच्या कडवट स्वराकडे दुर्लक्ष करत म्हटलं.
"कधी? किती दिवसांनी? वैजूला पैशाची नड आहे हे माहीत असूनही दागिने घेतलेत. आणि दादा, तू पण वहिनीला सामील आहेस का?"
"सामील? आम्ही काही कुणाला फसवण्याचा घाट घातलेला नाही. उद्या वैजूचे दागिने करू परत." दादानं शांतपणे सांगितलं.
"आणि त्या जोडप्याचे पैसे?"
"त्यांची काळजी तुला कशाला? बोलेन मी त्याच्यांशी आणि देईन त्यांचे पैसे त्यांना. खरंच दुप्पट दागिने दिसले की स्वत:चे घेऊन येऊ नका म्हणजे झालं."
"काय वेड लागलेलं नाही आम्हाला. वैजूचे दागिने परत मिळेपर्यंत आम्ही रहातो इथेच." रमाकांत ठामपणे म्हणाला. वहिनी एकदम रडायलाच लागली.
"तू कशाला रडतेस वहिनी? आम्ही राहू नये इथे असं वाटतंय का?" रमाकांतला वहिनीच्या अचानक हुंदके देऊन रडण्याचं कारणच समजेना.
"रहा रे. घरचीच तर आहात सगळी. पण आपलीच माणसं आपल्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाहीत याचं वाईट वाटलं. घरातलेच असं वागतात मग बाहेरच्यांनी टोकलं तर काय नवल. एक हे तेवढे माझ्या बाजूनं ठाम उभे आहेत." डोळ्याला पदर लावत वहिनी पुन्हा रडायला लागली तसा शरदचा तोल ढळला.

"दादा तुझ्या बाजूनं उभा आहे की तुला सामील ते कळायचं आहे वहिनी. आणि स्वत:च्या नणंदेला लुबाडलंस तेव्हा विसर पडला का तुला आपल्या माणसांचा? कमाल आहे, गेली सहा वर्ष घरात, नातेवाइकांमध्ये कोण कौतुक चालायचं तुमच्या परदेशी असण्याचं. आमच्या दृष्टीनं तुम्ही दोघं हीरो होता आणि परत आल्यापासून काय चालवलंय हे तुम्ही? तळेकरांच्या नावाला काळिमा नाही फासलात म्हणजे मिळवली."

"शरऽऽऽद!" दादा जोरात ओरडला तसा शरद एकदम गप्प झाला.
"काळिमा फासला म्हणे! काळिमा फासायला तळेकरांच्या घरातल्यांनी काय अटकेपार झेंडे फडकवले आहेत?"
"नाही, अटकेपार झेंडे नाही लावलेले पण अब्रूचे धिंडवडे निघतील असंही कुणी वागलेलं नाही आत्तापर्यंत. ते तू करणार असं दिसत आहेच. नाहीतर वहिनी."
"गप्प बस रे. मोठी वहिनी आहे ती तुमची! आणि काय सारखं तिला बोलताय दोघं? वैजूचे दागिने आहेत ना, मग त्या दोघी बघतील काय ते. मोठा भाऊ, वहिनी म्हणून आदर दाखवायचा सोडून बोलताय आपलं तोंडाला येईल ते." दादा तडतड करत तिथून उठला.

चार दिवस राहूनही दागिने परत मिळाले नाहीत. शरद, रमाकांतचा वहिनी आणि दादाच्या साळसूदपणामुळे अंगाचा तिळपापड होत होता, वैजूच्या मुळूमुळू रडण्याचा वैताग यायला लागला होता. शेवटी तिघं आपापल्या मुक्कामी रवाना झाले. शरद मात्र चिपळूणला न जाता धोपेश्वरला गेला. जे काही कोल्हापूरला घडलं ते त्यानं माईआप्पांच्या कानावर घातलं. कितीतरी वेळ शरद काय सांगतो आहे त्यावर आप्पांचा विश्वास बसेना. ते निराश झाले. हताश होत रेडिओवर चालू असलेलं मंद संगीत बटण पिरगाळीत त्यांनी खाडकन बंद केलं.

"मसणात घाला ह्या दादाने आणलेल्या गोष्टी. फॉरेनात जाऊन हेच शिकून येतात की काय? माझ्या हयातीत आपल्या घरातलं आजपर्यंत कुणीही असं वागलेलं नाही. शरद, आता सगळा भरवसा तुझ्यावर. तूच सांग काय करायचं? नाहीतर असं करू. जमिनीचा एक तुकडा विकून टाकतो. वैजूकडे जाऊन परिस्थितीबद्दल स्पष्ट बोलतो. जावईबापूंची मी वैजूच्या वतीनं माफी मागतो. तिच्या स्त्रीधनाचे पैसे देऊ आपण जावईबापूंना. उपयोगही होईल दुकानासाठी. बाकी उरतील ते दादाकडे देऊ."

बोलता बोलता आप्पा थांबले. क्षणभर विचार करून म्हणाले, "नको, त्याच्या हातात नको द्यायला पैसा. त्याच्याबरोबर जाऊ प्रत्येकाच्या घरी. झाल्या प्रकाराची माफी मागू आणि देणं देऊन टाकू. पण लोकांचे शिव्याशाप नको रे आपल्याला. इतकी वर्ष सचोटीने काढली. दादानं धुळीला नको मिळवायला आपलं नाव."

"अहो, आपण दोघं जाऊ या का कोल्हापूरला? काहीतरी अडचणीत सापडले असणार दोघं. तुम्ही धीर द्या. आधार देऊ याची खात्री द्या. मग बोलतील पोरं, मोकळी होतील."

माईच्या बोलण्यावर शरदनं मान डोलावली.
"पहा प्रयत्न करून. आम्ही हरलो. काही नाकारतही नाही आणि परतही देत नाही. तुमच्याशी बोलतील कदाचित मोकळेपणानं." कोल्हापूरला कधी जायचं ते ठरवून शरद चिपळूणला गेला.

ठरल्याप्रमाणे चार दिवसांनी माईआप्पांना घेऊन तो कोल्हापूरला पोचला. दादा हरखलाच दोघांना पाहून. बरोबर शरदला पाहिल्यावर मात्र त्याला कल्पना आली. पण तसं जाणवू न देता त्यानं तिघांचं स्वागत केलं. माईआप्पा अवघडून बसले.

"माई, तुमच्याच घरी आला आहात. आता एक-दोन महिने मस्त आराम करा. आप्पा, तुमच्यासाठी ढीगभर पुस्तकं आहेत वाचायला. वेळ कसा जाईल ते समजणार नाही. रंकाळा आपल्या घराच्या अगदी जवळ आहे. आजच घेऊन जाईन म्हणजे रोजच्या रोज चक्कर मारायला जाता येईल तुमचं तुम्हाला." दादानं हक्कानं सांगितलं. पुन्हा तेच. दोघं इतकी लाघवीपणाने बोलत होती की विषय कसा काढावा तेच माईआप्पांना कळेना.

चहाचा घोट घेत शेवटी आप्पा म्हणाले, "बाबा रे, आम्ही विश्रांतीसाठी नाही आलेलो. तुमचं दोघांचं जे काही चाललं आहे ते ऐकून राहावलं नाही म्हणून आलो. काय ऐकतोय मी दादा तुम्हा दोघांबद्दल? हे बघ, कशात काही अडकला असशील तर सांग लगेच. मी येण्यापूर्वी जमीन विकण्यासाठी गिर्‍हाइक पाहून आलेलो आहे. किती पैसे देणं आहेस?"

"शरदनं चांगलं काम केलेलं दिसतंय. काय रे, इथून गेलास ते धोपेश्वर गाठलंस ना? कशातही अडकलेलो नाही आम्ही. सगळं व्यवस्थित होईल. तुम्ही काळजी करू नका. वैजूला तिचे दागिने लवकरच देऊ कबूल केल्याप्रमाणे." पुन्हा पुन्हा वहिनी आणि दादानं आश्वासन दिलं. शेवटी माईआप्पांनी विश्वास टाकला आणि काही दिवस कोल्हापूरला विश्रांतीसाठी रहाण्याचंही ठरवलं. शरद चिपळूणला परत आला.

ती माईआप्पांची शेवटची खेप बहुधा कोल्हापूरची. त्यानंतर दादा आणि वहिनीनं कोल्हापूरच सोडलं. माईला दादाचा ठावठिकाणा शोधून काढायचा ध्यास लागलेला. आल्यागेल्याला ती दादाबद्दल विचारत राही. धोपेश्वरला आलेल्या देणेकर्‍यांच्या तगाद्यांनी आप्पा खचले, अचानक दहा वर्षांनी म्हातारे दिसायला लागले, एकेकाची देणी फेडत राहिले. शरद आणि रमाकांत आपल्या परीने त्यांना कधी विरोध करत राहिले, तर कधी न रहावून मदत.

त्या दिवशी गणपतीच्या निमित्तानं सारे जमले होते. पाच दिवस म्हटलं तर कसे गेले हेही समजलं नाही. आरास रचण्याची गडबड, बेंबीच्या देठापासून ओरडून आरत्या म्हणण्याचा खटाटोप, संध्याकाळी चहा पिऊन झाल्यावर रवळनाथाच्या दर्शनाला जाणं, पडवीत पत्त्यांचा अड्डा जमवणं असं सगळं चालू असलं तरी प्रत्येकाच्या मनात विचारांची खळबळ होती. विसर्जन झालं, जेवणं आटोपली आणि सुपारी कातरत आप्पा अंगणातल्या बाजेवर पायाची घडी घालून बसले. एकेक करून सगळीच आजूबाजूला येऊन बसली. माईंनी दुधाचा कप आप्पांच्या समोर धरला.

"घर अगदी भरून गेल्यासारखं झालं हो आज. छान वाटलं. दादा आला असता तर जिवाला शांतता लाभती." बाजूच्या पायरीवर टेकत माई म्हणाल्या.

"आम्ही सर्व आहोत त्यात आनंद मान ना माई." वैजू म्हणाली तसं आप्पांनी चमकून तिच्याकडे पाहिलं.

"नाहीतर काय? त्या दादाला नाही कुणाची फिकीर आणि हिचा आपला सतत दादाच्या नावाचा जप. आप्पा, अनायसे माईनेच विषय काढला आहे दादाचा तर माझ्या मनातलं बोलतेच आता." वैजूचा स्वर, आवेश पाहून ती आता आणखी काय सांगणार या शंकेनं आप्पांचा जीव धास्तावला. सगळेचजण शांत झाले.
"आप्पा, दादा तुमचा मुलगा आहे, त्यासाठी तुमचा जीव तुटणार हे ओघानं आलंच पण जमिनीचा एक तुकडा विकू म्हणता म्हणता फक्त एक तुकडाच तुमच्यासाठी शिल्लक राहिला असं होऊन जाईल. मी माझ्या दागिन्यांवर कधीच पाणी सोडलंय. माझ्या घरच्यांचीही तुम्ही काळजी करू नका. घेतले का ह्यांनी पैसे तुम्ही घेऊन आलात तेव्हा? पण आता हे अपराधीपण सोडा. त्या दोघांच्या वागण्याला स्वत:ला जबाबदार धरू नका. दादावहिनीने काहीही संबंध ठेवलेला नाही आपल्याशी तर का तुम्ही त्यांची देणी फेडताय? आधी वाईट वाटायचं पण तुम्ही असे परिस्थितीला शरण जाताय ते बघून राग येतो आता मला. काढून टाका ना आपल्या आयुष्यातून दादाला आता. खूप झालं. भोगला एवढा त्रास पुरे झाला." वैजू काकुळतीने विनवीत होती. गणपतीच्या निमित्तानं सारी भावंडं जमली होती ती ह्या विषयाचा सोक्षमोक्ष लावायचा ठरवूनच.

"आपलेच दात आपलेच ओठ, पोरी. तुझ्या घरचे मोठ्या मनाचे. पण बाकीच्यांचे तळतळाट आपल्या घराण्याला नकोत म्हणून करतोय हे सारं."
"कशाला पण? सगळीकडे तुमचं किंवा आमचं नाव-पत्ता देणार हा दादा पण त्याचा ठावठिकाणा कळू देतोय का? आणि आपल्या परीनं आपण केले प्रयत्न. आता बास." शरद न रहावून बोलला.
"मध्ये दोघं माझ्याकडे रहायला आली होती." रमाकांतच्या बोलण्यावर सगळ्यांनीच चमकून त्याच्याकडे पाहिलं.
"हो, खरं सांगतोय. मलाही दया आली. रहायला जागा नाही. रेल्वेस्टेशनवर झोपतो रात्री असं वहिनी डोळ्यात पाणी आणून सांगत होती. रहावलं नाही मला."
"अरे, मग आहेत कुठे आता? घेऊन यायचंस ना दोघांना." माईच्या स्वरातला ओलावा जाणवला तसा वैजूचा राग उफाळून आला.
"हेच. आपलं हळवेपण घात करतं आहे आपला आणि त्यांचाही. आता इतकं बोलले मी, एवढं ऐकते आहेस आणि तरी निघालीस लगेच धोपेश्वरला बोलवायला. तू सुद्धा कमाल केलीस रमाकांत. कशाला ठेवून घेतलंस?"
"अगं, सख्खा भाऊ आहे तो आपला. वहिनीनं खूप लाड केले आहेत आपले आपण लहान असताना. ते सगळं आठवलं म्हणून एक-दोन दिवस रहा म्हटलं पण त्याआधी शरदशी बोललो."
"हो. मी पण म्हटलं राहू दे. पण तिथेही पुन्हा रंग दाखवलेच त्यांनी आपले."
"काय केलं?" आप्पांच्या आवाजाला कंप सुटला.
"रमाकांतच्याच घरातलं सामान चोरीला जायला लागलं."
"हद्द झाली दादापुढे. हे आपलंच रक्त आहे ना हो?" आप्पांच्या आवाजातली असहायता शरदचं काळीज चिरून गेली.
"रमाकांतनं मग त्यांना तिथून जायला भाग पाडलं." शरदनं पटकन म्हटलं.
"आता कुठे आहेत?" माईने विचारलं आणि रमाकांत चिडला.
"कमाल आहे माई तुझी. तोंडाला काळं फासलं आपल्या. आपण सारेच निस्तरतो आहोत त्यांचे उद्योग. आप्पांवर तर कफल्लक व्हायची वेळ आणली आहे त्यानं आणि तरी माई, तुला ते कुठे आहेत ह्याची चिंता पडली आहे?"

"ओरडू नकोस रे असा. आत्ता वैजूनं फटकारलं. आता तू. चुकलंच माझं. पोटचा गोळा आहे रे बाबांनो शेवटी. येते माया आड. विचार करत रहाते, बाबा काय चुकलं आमचं? पाठवायला नको होतं की काय परदेशात? आणि काही चुकलं असेल तर मग तुम्ही सगळी कशी व्यवस्थित आहात? कितीतरी वेळा वाटतं, की तो गुंतला ह्यात त्याच्या बायकोमुळे. पण मग हा गप्प का रहातो ते समजत नाही. कुठल्या जन्माचं पाप भोगतो आहोत आम्ही कोण जाणे. अब्रूनं राहिलो आतापर्यंत आणि आता काय वेळ आणली आहे या मुलानं. पण नाळ नाही रे तुटत. काळजी वाटते, प्रश्न पडतात. पुन्हा हे विचारायची भीती. चिडता ना तुम्ही सगळेच. तुम्हाला आमच्या पोटातलं ओठावर आणलं त्याचा इतका त्रास होत असेल तर आता नाही हो नाव काढायची दादाचं." माईनं एकदम पड खाल्ल्यावर कुणाला काय बोलावं ते सुचेना. पण रमाकांतनंच सूत्रं हातात घेतली.

"खरंच आता सोडा त्याचं नाव. तुम्हालाच त्रास होतो. मानसिक, आर्थिक दोन्ही बाजूंनी. आणि वहिनीला एकटीला का दोष देता? आपला तो बाब्या असं नका करू. यामध्ये दोघांचाही तितकाच हात आहे. जे काही चाललं आहे त्यावरून आपलंच नाणं खणखणीत असल्याचा दावा करण्यात काही अर्थ नाही. आपल्याला माहीत होता तो हा दादा नाही. किती खेपा मारल्या, दोघांना बोलतं करायचा प्रयत्न केला. वहिनीच्या माहेरच्यांनी पण काय कमी प्रयत्न केले का? पण दोघंही दाद देत नाहीत. एखाद्याला चिखलात रुतायचंच असेल तर नाही गं बाहेर काढता येत माई. आपलाच पाय त्यांच्याबरोबर खोलात जातो, चिखल अंगावर उडायला लागतो..."

रमाकांतचं बोलणं तोडत आप्पा म्हणाले, "मी बोलत नाही म्हणून चिडता. ती बोलते म्हणूनही तिच्यावर चिडता. काय असं वागता रे आमच्याशी? आता एकदा आमची दोघांची बाजू सांगूनच टाकतो. दादाबद्दल सांगता, तक्रारी करता तेव्हा अपराधी वाटतं, त्रास होतो. वाटतं, आपल्या ह्या दिवट्यामुळं बाकीच्या मुलांना का हा त्रास, व्याप? भाऊ झाला म्हणून तुम्ही किती आपलं नुकसान करून घ्यायचं? आता खरंच कंटाळा आला आहे या परिस्थितीचा. रात्ररात्र डोळा लागत नाही. विचार पाठ सोडत नाहीत. रक्तातूनच आलं आहे की काय हे असं वागणं या शंकेनं आपल्या घरात कुणी असं पूर्वी वागलं होतं का याची मन सतत चाचपणी करत रहातं. बाहेर तोंड दाखवायची तर सोयच राहिलेली नाही. कुठेही गेलं की दादाची चौकशी असतेच नातेवाइकांच्या घोळक्यात. आपल्या अगदी जवळच्या नातेवाइकांना तो कुठल्याशा देवळापाशी भेटायला बोलावतो आणि ते जातात. बरं त्यांना दोष काय देणार? त्यांना काही ह्या गोष्टींची झळ लागलेली नाही. त्यानं बोलावलं, भेटावंसं वाटलं म्हणून गेलो भेटायला म्हणतील. खाजवून खरूज काढल्यासारखं करतात रे. फाजील उत्सुकता दिसते बोलण्यातून, डोकावते डोळ्यांतून. आव मात्र असतो काळजीचा. थकलो आता. तुम्हीच सांगा काय करायचं ते." आप्पा बोलायचं थांबले. शरद आणि रमाकांतनं एकमेकांकडे नजर टाकली.

"मी आणि रमाकांतनं खूप विचार केलाय याबाबतीत. असं वाटतंय की वर्तमानपत्रात देऊन टाकायचं, आमचा ह्या व्यक्तीशी काही संबंध नाही म्हणून."
"अरे, काहीतरीच काय. नको रे इतकं टोक गाठायला." वैजूलाच रहावलं नाही.
"मग रहा तसेच. ज्यालात्याला त्या नालायकाचा पुळका. अरे, बघायला या. माझं घर अक्षरश: धुऊन काढलं आहे दोघांनी. आता माझा जम बसला आहे तर लग्न कर म्हणून मागे लागली होतीस ना माई? तुमच्या मोठ्या चिरंजीवांनी सगळं घर खाली केलं आहे. आता पुन्हा जमवाजमव करेपर्यंत कुठला करतो आहे लग्नाचा विचार. एक दिवस जरा बाहेर गेलो तर ट्रक आणून सगळं सामान न्यावं ह्या दोघांनी? सख्ख्या भावाला लुबाडतात, तुझं वाटोळं केलं, आप्पांवर या वयात कफल्लक व्हायची वेळ आली, नातेवाइकांमध्ये, ओळखीपाळखीच्या लोकांमध्ये मान खाली घालावी लागते विषय निघाला की. कुणी नवीन माणूस समोर आलं की भीती वाटते, दादा याचं काही देणं तर लागत नाही ना अशी शंका येते. आणि तू म्हणते आहेस टोक गाठायला नको. ठरवा मग तुम्ही काय करायचं ते नाहीतर बसा देणी फेडत, नशिबाला बोल लावत." रमाकांतचा स्वर टिपेला पोचला.

वाद, चर्चा, चिडचीड होऊन शेवटी रमाकांतनं दादाशी तळेकरांच्या घरातील कोणत्याही व्यक्तीचा काही संबंध नाही, असं निवेदन वर्तमानपत्रात दिलं. त्यादिवशी धोपेश्वरच्या तळेकरांच्या घरात सुतक असल्यासारखं वातावरण होतं. शरदला याची कल्पना असल्यामुळे तो मुद्दाम दोन-तीन दिवस रहायला आला होता. ते वर्तमानपत्र हातात घेऊन रडणार्‍या माईची समजूत घालणं कठीण झालं त्याला.

"माई, आपण सर्वांनी एकत्र मिळून घेतलेला हा निर्णय आहे."
"हो, मला मेलीला मत आहे कुठं! तुम्ही बोलायचं, मी मान डोलवायची. पण असं निवेदन देऊन संबंध संपत नाही पोरांनो. खरं सांगा, संपतो असा संबंध?"
आप्पांनी बायकोकडे नजर टाकली.
"कायदेशीरदृष्ट्या संपतो. त्याच्या कुठल्याही वागण्याला, फसवणुकीला आपण जबाबदार नाही. जमिनीच्या व्यवहाराला त्याच्या स्वाक्षरीची गरज नाही, आपलं जे काही आहे त्यातला वाटा त्याला मिळणार नाही."
"जीव गुंतला आहे त्याचा संबंध कसा संपवायचा?" डोळ्यात येणारे अश्रू लपवीत माईंनी विचारलं.
"आपला जीव गेला की." कठोर स्वरात आप्पा उत्तरले.
"अहो, असं काय बोलता?"

"खरं तेच सांगतो आहे माई. थोडीथोडकी नाही, जवळजवळ पंधरा वर्ष तरी झाली असतील दादाशी संबंध तुटून. जो येतो तो त्याची देणी फेडण्यापुरता. आता एक लक्षात ठेवा. त्याचं नांवही काढू नका. एकदातरी आला का आपल्याला भेटायला तो? दुखलंखुपलं विचारायला? कुणीतरी सांगतं आपल्याला, दादरला दिसला होता, पुण्यात आला होता. इकडे जाऊन भेटून आलो त्याला. आता इतक्या ठिकाणी हा जातो मग आपल्याला भेटावं असं वाटू नये त्याला एकदाही? आता तर घरात फोनही आलाय. फोन करावासा नाही वाटला. आता आपण पिकली पानं याची जाणीव असेलच ना त्यालाही. तोच पोचला आता पन्नाशीला."

"घाबरत असेल हो शरदला, रमाकांतला. वैजूला तोंड दाखवायची लाज वाटत असेल."
"वैजूला फसवलं तेव्हा घाबरला नाही तो? आणि आपल्याला भेटायला आला तर काय आपण लगेच सर्वांना बोलावून घेणार आहोत? म्हणावं तर पोलीसही त्याच्या मागावर नाहीत. संबंध संपले हेच अंतिम सत्य आहे. दोघं कुठेतरी आहेत, आपले आपण जगतायत यावर आता समाधान माना. आणि एक करा. येताजाता मुलांसमोर दादाची चौकशी करू नका. रागावतात मुलं. त्यांना वाटतं, ती इतकं करतात आपल्यासाठी, दादाच्या गुन्ह्यांवरही सतत पांघरूण घालतात आणि आपण मात्र त्याचीच आठवण काढत रहातो."

धमकीचा फोन आल्यापासून हातात धरलेल्या वर्तमानपत्रातली अक्षरं पुसट होत हे सारे प्रसंग ठळकपणे चित्रित होत होते शरदच्या मनात. आप्पांनी दादाचं नाव आता या घरात पुन्हा काढायचं नाही असं माईला बजावून सांगितलं त्यानंतर काही दिवसांनी दोघंही त्याच्याकडे चिपळूणला कायमचे वास्तव्याला आले. आणि खरंच निश्चय केल्यासारखं दोघांनी पुन्हा दादाच्या नावाचा उल्लेखही केला नाही. या ना त्या मार्गानं रमाकांतनं पोचवलेल्या निरोपामुळे एकदा अखेर आप्पांशी बोलायला म्हणून दादाचा फोन आला. आप्पा, माईंशी निदान एकदा तरी त्यानं बोलावं म्हणून चालवलेली धडपड होती ती भावंडांची. पण आप्पांनी त्याच्याशी बोलायलाच नकार दिला. माईची इच्छा असावी पण आप्पांना घाबरुन तिनं नाही म्हटलं असावं असंच वाटलं होतं तेव्हा सर्वांना. आप्पा गेल्यानंतर किती वेळा सगळ्यांनी तिला दादाला शोधायचा प्रयत्न करायचा का विचारलं होतं. पण त्यालाही तिनं ठाम नकार दिला. माईच्या शेवटच्या क्षणी घरातल्या प्रत्येकाला वाटत होतं ती दादाची चौकशी करेल, म्हणजे तशी तिनं ती करावी अशी प्रत्येकाचीच अपेक्षा होती. पण तिनं मौनव्रत धारण केलं. का केलं असेल तिनं असं? जात्या जिवाला एक तपाहून अधिक काळ नजरेलाही न पडलेल्या मुलाची चिंता असणारच. बाकी मुलांचं जीवन फुललं, बहरलं आणि एकाचं अकाली भरकटलं त्याचाच विचार तिच्या मनी अखंड राहिला हे नक्की. मग का नाही तिनं ते व्यक्त केलं? केवळ इतर मुलांचा धाक? त्यांना दुखवू नये ही इच्छा? की आयुष्याच्या अशा पायरीवर ती उभी होती जिथे आता फक्त मृत्यू समीप होता, पैलतीर डोळ्यांना खुणावत होता? त्यापुढे इतरांचं अस्तित्व पुसट होत गेलं असावं? हा प्रश्न आता अनुत्तरीतच रहाणार हे नक्की असलं तरी शरदचं हृदय अधूनमधून कासावीस करून टाकी.

आणि आज हे नव्यानं सुरु झालेलं धमकीचं सत्र. कधी नव्हे तो एक हताशपणा शरदला वेढून गेला. आप्पा म्हणाले होते, दादाशी काही संबंध राहिला नाही निवेदन दिल्यानंतर आपल्या बाजूनं. पण हे झालं आपलं. त्याच्या बाजूनं काय? त्याच्या दृष्टीनं आपण सर्व भावंडंच आहोत अजून. त्याच्या स्वार्थासाठी का होईना तो अप्रत्यक्षरीत्या आपल्याला घट्ट धरुन आहेच. पन्नाशी पार केली तरी याचे उद्योग निस्तरायचं नशीबातून सुटत नाही. आता आणखी किती दिवस, वर्षं हे असंच चालू रहाणार या विचारानं शरदच्या कपाळावरच्या आठ्या गडद झाल्या.

पुन्हा फोन वाजला तसा तिरमिरीत शरद उठला. पलीकडच्या माणसाला बोलायची संधीही न देता ओरडला.
"बंद करा धमक्यांचे फोन करणं. किती पैसे दिले आहेत तुम्हाला त्या तळेकरांनी आमची झोप उडवण्यासाठी?"
"अरे शरद, मी रमाकांत बोलतोय."
"तू आहेस होय. मला वाटलं..."
त्याचं वाक्य तोडत रमाकांत म्हणाला, "धमकीचा फोन. हो ना?"
"तुला कसं कळलं? का तुला पण आला होता?"
"म्हणूनच तुला केला लगेच. कुणीतरी गावठी भाषेत बोलत होतं. आमदार निवासाचे पैसे भरा, भावाला सांगा मुलाबाळांची काळजी घ्या. रस्त्यात एखादा अपघात... असं काही बाही बोलत होता तो माणूस."
"कळलं. मी बोलतो तुझ्याशी नंतर. ही कधीची उभी आहे. माझा चढलेला आवाज ऐकून घाबरली असेल."
"बरं ठेवतो मी. पण मुलांशी बोलून घे. समजावून सांग त्यांना." रमाकांतने फोन ठेवला.

"रमाकांत होता. त्या आधी धमकीचे फोन. दादानं आता मात्र टोक गाठलं आहे. मुलांना अपघात होऊ शकतो अशी गर्भित धमकी देतोय. स्वत:चं धाडस नाही. भाडोत्री गुंडांचा पर्याय वापरतोय मूर्ख." शैलाकडे बघत शरदनं काय घडतंय ते सांगून टाकलं. शैला घाबरुन बसलीच बाजूच्या दिवाणावर.

"तुम्ही पैसे भरून टाका. उगाच नसती डोकेदुखी नको."

"किती वेळा भरू पैसे? आणि हे काय शेवटचं आहे का? तो किंवा मी गेलो की मगच संपणार हे सगळं असं दिसतंय. या ना त्या मार्गानं दादाचे उद्योग निस्तारतो आहोत आपण सगळेच. कितीतरी वर्षं. त्याच्या काळजीनं खंगून आप्पामाई गेले, आम्ही भावंडही असेच भरडत रहाणार त्याची किंवा आमची अखेर होईपर्यंत. थकत चालले आहेत आता देह आणि मनही. पण ही दादाची थेरं काही बंद होत नाहीत."

"अपघाताची धमकी, मुलांना काही होईल हे पहिल्यांदाच आहे. ती दोघं कोणत्या थराला जाऊ शकतील याची निशाणीच म्हणायला हवी ना ही?"
"अशा धमक्यांना आपण भीक घातली तर हे दुष्टचक्र कधी संपणारच नाही. काहीतरी करायला हवं आता निर्वाणीचं."
"अहो, तरुण मुलं आहेत आपली. दादाला धडा शिकवायला जाल आणि एक म्हणता एक होऊन जायचं. आणि हे बघा, मी सांगून ठेवते तुम्हाला एकदाच आणि शेवटचं. या तुमच्या भानगडीतून माझ्या मुलांना काही झालं तर कुणालाच माफ करणार नाही मी. कळलं ना?" शैला एकदम रडकुंडीला आली.
"अगं, मला तरी आवडेल का आपल्या मुलांना काही झालं तर? पोकळ धमक्या आहेत एवढंच म्हणायचं होतं मला."
"आणि त्या तशा नसतील तर?" शरद एकदम गप्प झाला. असा विचारच डोकावला नव्हता मनात. शैलाच्या शब्दांनी शरदच्या अंगावर काटा आला.
"परत फोन येऊ दे. विचारतोच त्याला कोण पैसे देतं आहे फोन करून धमक्या देण्यासाठी. आणि हा दादा... समोर तर येऊ दे कधी. नाहीसाच करून टाकेन." शरदचे डोळे संतापानं रक्त साकळल्यासारखे लाल झाले. दोघं एकमेकांकडे बघत विचारात गुंतून गेले. बराचवेळ. आणि अचानक शरदनं दचकून फोनकडे पाहिलं. फोन पुन्हा एकदा वाजत होता…