Monday, July 14, 2014

गवतकाप्याची गोष्ट

रॉजर  गेल्या गेल्या मला एकदम उत्साहच चढला.  इस्टोरी भन्नाट होती त्याची. घाईघाईत मुलाला फोन लावला,
"अरे एका कैद्याची ओळख झाली."
"तू काय तुरुंगात आहेस?" लेकानेही अधूनमधून मी सुट्टीसाठी तुरुंगात जात असेनच या खात्रीने विचारलं.
"तो आला होता घरी."
"आता तुझी कैद्यांशी मैत्री? आई, तू लिहितेस हे मान्य पण विषय मिळावेत म्हणून हे असं...."
"पुरे रे. आधी ऐक तर."  मी त्याला माळीबुवांची गोष्ट सांगायला सुरुवात केली.  त्या आधी थोडी पार्श्वभूमी सांगते. काय आहे, सध्या आम्ही वर्षाच्या कराराने कुणी आमचं अंगण हिरवंगार राखेल का याच्या शोधात आहोत. त्यामुळे येऊन जाऊन घरी भावी माळी टपकत  असतात.

"वर्षाचा करार केलात तर १२०० डॉलर्समध्ये गवत कापेन."
"नाहीतर?"  कुणी ’तर’ म्हटलं की लगेच  ’नाहीतर’ आठवतोच. त्यामुळे पटकन आलंच ते तोंडून.
"१७०० डॉलर्स "  आमचे कदाचित होऊ पाहणारे भावी माळीबुवा म्हणाले. १२००  डॉलर्स म्हटल्यावरच माझ्या डोळ्यासमोर चित्र विचित्र गवत फिरायला लागलं होतं. १७०० म्हटल्यावर विचारक्रियाच गोठली.  गवत कापायचं, वाढवायचं, पुन्हा कापायचं आणि यासाठी १२०० डॉलर्स? पुन्हा कापण्याआधी ते वाढवायला कितीतरी पिंप पाण्याचे फवारे मारायचे ते वेगळेच. डोळे गरागरा फिरवू की नुसतंच ’या राईट’ म्हणून खोडसाळ हसू चेहर्‍यावर आणू या विचारात मी तशीच उभी राहिले. तेवढ्यात नवरोजींनी पायावर कुर्‍हाड मारली.
"खत पाणी, जंतूनाशक फवारे, बी बियाणं, फुल झांड..." डोक्याला फेटा गुंडाळून, बैलगाडीत बसायला तयार असलेला एखादा शेतकरीच उभा आहे बाजूला की काय असं वाटलं. पुन्हा पुन्हा बघून खात्री करुन घेतली. मग खेकसले,
"अरे थांब ना. तूच कशाला त्याला  सगळी कल्पना देतोस?"  मराठीतून ओरडले पण इंग्लिश माळ्याला हावभाव आणि स्वराची भाषा समजलीच. चेहर्‍यावर निरागस हसू आणत तो म्हणाला,
"ये समदं करावं लागतं ताई...आनी बी हाये."
"आता काय?" त्या आनी बी बरोबर पैसे पण आलेच.  ते आकडे १२०० डॉलर्स मध्ये की १७०० डॉलर्स मध्ये  वाढवू? आमच्याकडे  नवर्‍याला खर्चात पडायची घाई असते. उकरुन उकरुन व्यावसायिकाला याचा दर, त्याचा दर विचारायचा, त्याचा वेळ घ्यायचा, आपला खर्च करायचा. ते झालं की मौनव्रत धारण करायचं. किती चाट खिशाला असा चेहरा करुन बसायचं. तो एकदा बसला की उठत नाही आणि ऐकलेलं सारं विसरुन गेल्यावर पुढे कृती होत नाही हे सवयीने कळल्यामुळे मीच घोडं पुढे दामटवते.
"इतके पैसे जाणार असतील तर आपणच का नाही करत ही कामं?" एकदम त्याचा चेहरा खुलतो.
"तसं काही ते कठीण नसतं. करु मग आपणच."
यातला ’आपण’ म्हणजे ’फक्त तू’ असतो.  बायकोसाठी क्वचित प्रसंगी दाखविला जाणारा हा आदर कशासाठी असतो हे कळायला मला खूप वर्ष लागली. मी आपली मग काय तर सगळे नुसते लुबाडायला बसले आहेत. करु आपणच असं म्हणत मान डोलावते, आणि मग ती सगळी कामं करता करता, मान काय अख्खं शरीर डुगडुगायला लागतं.

आणि आपणच करायचं हे तर  वेगवेगळे माळीबुवा सगळ्या कामाचा खर्च सांगा मग ठरवतो कुणाला काम द्यायचं ते असं करुन कशाला बोलावून ठेवलेले? त्यात कोण, कशाला, कधी यात गोंधळ. आता एकच काम वेगवेगळे माळी किती डॉलर्समध्ये करतील हे विचारायचं असताना, याची कामाची यादी चढत्या फोडणीसारखी प्रत्येकासाठी वेगळीच. ती काय बायको आहे हे पण करुन टाक म्हणून सांगायला? पैसे वाढणारच ना? मग तुलना कशी करायची? त्यात दरवेळेला आधीच जाहीर करायचं आम्हाला स्वस्तातल्या स्वस्तात करायचं आहे काम. हे एकदा का त्या माळीबुवांना समजलं की ते दुप्पट दर सांगणार आणि मग स्वस्त करणार इतकं साधं समीकरण, पण लक्षात कोण घेतो?

तर एकेक किल्ला ढासळत  असतानाच रॅंडी माळीबुवावर मात्र आम्ही खुश झालो.
"काय ते ज्ञान." नवरा म्हणाला,
"काय तो उत्साह." मी टाकलं आपलं असंच; पटकन माळी  ठरावा म्हणून.
"खरं आहे पण आपल्या चेहर्‍यावरचे भाव बघून हे लोक आकडे टाकतात, मागे घेतात, फिरवतात." जुगार खेळत असल्यासारखा नवरा बोलला. पण आता मला रॅंडी हातातून जाऊ द्यायचा नव्हता.
"हो पण हा नाही तसा वाटला. एकूणच खूप कमी पैशात करायला तयार झाला आहे. चांगला दिसतोय." मला अगदी काम झालंच सारखा उमाळा आला. तेवढ्यात दार वाजलं.  दारात आंडदांड माणूस उभा. अजून एक माळी? मी तसं विचारणार तेवढ्यात तोच म्हणाला,
"आत्ता तुमच्या घरासमोर लाल रंगाची गाडी उभी होती."
"हो, पण..." (बरं मग? तुला काय करायचं आहे?)
"कोण होता तो?"
"पण तुम्ही कोण?"
"त्या माणसाचं नाव काय?"
"कुठल्या?"
"लाल गाडीतल्या." रॅंडी रॅंडी जप चालला होता आमचा. पण या माणसाचा आविर्भाव पाहून ते नाव काही केल्या आठवेना.
"रॉय"
"नक्की?"
"नाही म्हणजे..."
" रॅडींच गं." र, रा ने सुरु होणारी सगळी नावं नवर्‍याला एकदम प्रिय. रॅंडी, रॉडनी....मराठीतल्या शिव्या दिल्यासारखं वाटतं त्याला ही नावं घेताना.
"रँडीऽऽऽ" पुन्हा आपला उगाचच नारा ठोकला त्याने आतून.
"तुम्ही फसले जावू नये म्हणून सावध करायला आलो आहे." आता मात्र नवरोजी उठले. आयुष्यात बायको आल्यानंतर एक फसवणुक झाली होतीच, आता आणखी नको रे बाबा या आवेगात बाहेअर आले.  रॅंडी महाशय सुरुवातीला थोडं काम करतात, मग सामानासाठी पैसे घेऊन जातात ते पुन्हा येतच नाहीत, अधूनमधून तुरुंगांच्या फेर्‍या करुन आले आहेत. अशी रॅंडीची कर्मगाथा रॉजरने सांगितली. पण तुम्ही कोण? तुम्हाला कसं कळलं रॅंडी आमच्याकडे आला आहे हे प्रश्न मनात येण्याआधी लक्षात आलं,
च्यक, च्यक. कसली संधी फुकट घालवली. तुरुंगातून सुटून आलेल्या माणसाबरोबर आपण बोललो, बागेत फिरलो आणि एक, एक फोटो नाही घेतला फेसबुकवर टाकायला? रे कर्मा माझ्या.  हे बोलले असते नवर्‍याजवळ तर माझ्या ’फेस’ चं काय झालं असतं कुणास ठाऊक.

रॉजर गेल्या गेल्या मला एकदम उत्साहच चढला.  घाईघाईत मुलाला फोन लावला,
"अरे एका कैद्याची ओळख झाली."
"तू काय तुरुंगात आहेस?" लेकानेही अधूनमधून मी सुट्टीसाठी तुरुंगात जात असेनच या खात्रीने विचारलं.
"हो घरी कंटाळा आला की जाते तिकडे."
"हा हा हा. काय विनोद मारलास. पण सांग पुढे. " मग मी त्याला माळीबुवांची  पूर्ण गोष्ट सांगितली.
"यात खूप लुप होल्स आहेत."
"मराठी, मराठी." एक जरी इंग्लिश शब्द वापरला की आमच्या घरातलं हे घोषवाक्य आहे. ते मी घाईघाईने पूर्ण केलं.
"अगं, तो जो हितकर्ता आला होता तो तरी खरा कशावरुन?"
 रहस्यकथेची सुरुवात... मी मनात म्हटलं आणि चिरंजीव काय म्हणतात ते ऐकत राहिले. बोलणं थांबलं तेव्हा न रहावून शंका विचारली,
"तू अर्थतज्ञ होणार आहेस की वकील?" माझ्या या कुजकट प्रश्नाचा वास त्याला आलाच.
"विषय काय आहे आई? माझं उज्वल भवितव्य की कैदी?" चिरंजीवांनी तावातावाने वाद घालायला सुरुवात केली.
तो थोपवता थोपवता नाकीनऊ येतायत  तेवढ्यात त्याला अचानक त्या कैद्याचा पुळका आला.
"त्याची नीट माहिती काढा, तुरुंगातून सुटून त्याला खूप वर्ष झाली असतील, नंतर काही गुन्हा केला नसेल तर त्याची चुक त्याला कळली  आहे. त्याला संधी मिळालीच पाहिजे. आपणच असं वागून पुन्हा त्यांना गुन्हेगारीकडे वळवतो. समाज सुधारणार कसा मग?"
तू आहेस ना, तू सुधार. सारखी सारखी सगळी कामं तुम्ही बापलेक माझ्यावर काय सोपवता हे मनातल्या मनात पुटपुटत मी म्हटलं,
"अरे पण मला फक्त माळी हवा आहे रे. फक्त एक माळीऽऽऽऽऽऽऽ " माझ्या आवाजात घायकुती, रडकुंडी सारं काही होतं.
"मिळेल, मिळेल गं आई. तू नीट चौकशी कर आणि कैद्याचा माळी बनव."
कैद्याचा माळी? तो कसा बनवायचा? पण त्याचं तोंड बंद करायला मी  म्हटलं.
"बनवते."
फोन ठेवला तर नवरा बसला होताच.
"काय झालं?"
"कैद्याचा माळी बनवायचा आहे."
मुलाशी बोलून झाल्यावर ही नेहमी असं का बोलते असा चेहरा केला त्याने.
"आपल्याला नक्की कोण हवं आहे? माळी? कैदी? कैद्याचा माळी बनवायचा की माळ्याला कैदी करायचं? का हे दोन स्वतंत्रच ठेवायचे? पण मग कशासाठी? नाहीतर आपली आपणच करायची का ही कामं?" माझ्या प्रश्नांच्या सरबत्तीवर नवर्‍याने  नेहमीचं शस्त्र उगारलं. मौन व्रत धारण केलं.

आणि तितक्यात दार वाजलं तसं अजून एका नव्याने आलेल्या माळ्याचं स्वागत करायला मी धावले...

Sunday, June 15, 2014

आठवणी

शाळा, नाटकाचा सराव, मैदानावरचे खेळ
यातून अभ्यासाला नसायचा वेळ
पण भाऊ तुम्ही होतात,
अभ्यास राहिला आहे म्हणून गलितगात्र झाल्यावर
तुम्ही पुरा केलात!
हातात ठेवायचात वही
म्हणायचात,
घ्या हे, लिहलं आहे, तुझं काम केलं आहे
आता निघा...!

कधी चिडायचात, खोटं बोललो की ओरडायचात
कामं टाळली की वैतागायचात
पण चला, बॅडमिंटन खेळू या म्हटलं की तयारीतच असायचात!

भारतात आलं की जाऊन येऊ कुठेतरी म्हणून
फिरायला जायचे दौरे काढायचात,
तुमच्या गडगडाटी हसण्याने घर  भरल्यासारखं व्हायचं
आनंदाचं झाड घरातच रुजल्यासारखं वाटायचं!

तुम्ही म्हणाला असतात,
वा, वा लक्षात ठेवलंस का सगळं
आता पोरांना नको सांगूस
नाहीतर बसवतील बाबाला अभ्यासाला
मिळतील शिव्या सासर्‍याला! :-).

भाऊ, तुमच्या आठवणींसाठी ’फादर्स डे’ ची आवश्यकता नाहीच तरी त्या दिवसानेच मला माझ्या भावना शब्दात मांडता आल्या. सगळ्या बाबांना शुभेच्छा - आजचा दिवस मुलांसमवेत अगदी ’धम्माल’ दिवस व्हावा प्रत्येकाचा. 

Wednesday, June 4, 2014

रिंगण

"ओळख राहू दे. या आमच्याकडे मुद्दाम." संतोषने हातात हात घेऊन प्रेमभराने थोपटला तसं रमाकांतना हसायला आलं.
"आता कुठलं येणं होतं आहे तिकडे. आत्ता आतापर्यंत येत होतो त्यालाही झाली चार वर्ष. पण आलोच तर भेटेन नक्की." संतोषच्या पाठीवर थाप मारून ते म्हणाले आणि विमलकडे पाहिलं न पाहिल्यासारखं करत पाणी प्यायला म्हणून उठले. पाणी प्यायचं निमित्त. संतोषच्या निर्णयाने आलेला अस्वस्थपणा रमाकांतना पाण्याच्या घोटाबरोबर गिळता आला तर पाहायचा होतं.

संतोष निघून गेला तसं पाठीमागे हात बांधून उगाचच ते येरझार्‍या मारत राहिले.  थकलेल्या शरीरात अचानक जोर आल्यासारख्या त्यांच्या फे‍र्‍या चालू होत्या. विमलपुढे मनाची घालमेल व्यक्त करावीशी वाटत होती, पण शब्द जुळवता येत नव्हते. विचार सैरावरा पळत होते ते धरून कोणत्या शब्दात मांडावेत तेच रमाकांतना कळत नव्हतं. असं कधी झालं नव्हतं. रमाकांतांसारखा व्यवहारी, हिशोबी माणूस भावनेत अडकला नव्हता आणि त्याचा सार्थ अभिमान बाळगत असताना अचानक हे काय होतं आहे ते त्याचं त्यांना समजेनासं झालं होतं. विमलताई त्यांच्या येरझार्‍याकडे शून्य नजरेने पाहत होत्या. त्यांची अस्वस्थता त्यांना कळत असली तरी हृदयापर्यंत पोचत नव्हती. त्यांच्याही मनात संतोषचेच विचार घोळत होते.
"हल्ली खूप जण परत जायला लागली आहेत भारतात. संतोष बघ, पंधरा वर्षांनी चंबूगबाळं आवरून निघाला आहे. मुलांना आजी आजोबांचा सहवास लाभावा, मुलीचं शिक्षण मायदेशी व्हावं या इच्छेने." विमल ताईंनी ओळखलं, संतोषने त्या दोघांचाही आजचा ’दिवस’ व्यापून टाकला आहे.
"चौतीस वर्ष होतील आपल्याला इथे. आता जावंसं वाटतं आहे परत? कायमचं?" स्वत:च्या आवाजात नकळत ओलावा निर्माण झाल्यासारखं वाटलं विमलताईंना.
"नाही. इथे का आलो हा प्रश्न पडला आहे."
"आत्तापर्यंत परत का जायचं नाही यावर बोलत राहायचात तास न तास.  इथलंच पारडं कसं जड आहे ते पटवून द्यायचात. मग आता हा प्रश्न का पडला आहे इतक्या वर्षांनी?"
"बर्‍यांचदा येतो हा प्रश्न मनात आणि दरवेळेला उत्तर वेगळं येतं. म्हणजे आपण आपल्या सोयीने उत्तरं शोधतो, त्यालाच बरोबर समजतो. पण आजच्या उत्तराने देहाला, मनाला अस्वस्थपणाने घेरलं आहे."
"संतोषने भारतात परत कायमचं जायचं ठरवलं आहे ते ऐकून?"
"तो एक निमित्त. ओळखीचा, आवर्जून भेटायला येणारा त्यामुळे आता पुन्हा भेट होईल न होईल म्हणून वाटतंच वाईट. पण हल्ली ही तरुण मुलं परत जाण्याचा निर्णय घेतात, तो पार पाडतात तेव्हा हा प्रश्न मनाला छळत राहतो. मध्यंतरीच्या काळातही जायचं म्हणा कुणी ना कुणी असा निश्चय करून. पण बरीच जण यायची परत एक दोन वर्षात. आपण हसायचो या मुलांना पण  कौतुकही वाटायचं, निदान प्रयत्न करून तरी पाहिला त्यांनी म्हणून. आणि ते परत आले की बरं वाटायचं आपला परत न जाण्याचा निर्णयच बरोबरच याची खात्री पटायची."
"मग आताच का अस्वस्थ झाला आहात?"
"आता ही मुलं जातात ती नाही येत परत. सगळं बदललं आहे म्हणतात, ज्या साठी आपण या देशात आलो ती  सगळी सुखं भारतात मिळतात आणि इथेही पूर्वीसारखी परिस्थिती राहिली नाही म्हणे. नोकरीची शाश्वती नाही, सतत प्रवास हे इथेही करायचंच तर मग भारतात निदान इथे मिळत नाही ते सुख अनुभवता येतं.  आई, वडील, भावंडांचा सहवास मिळतो. मुलांना आजी, आजोबांचा लळा लागतो. कधीतरी वर्षातून बोलावलं भेटीला, राहिले एक दोन महिने इतक्या तुटपुंज्या सहवासावर तहान नाही भागवावी लागत. नातेवाइकांच्या भेटीही लग्न, वाढदिवस अशा निमित्तानं होत राहतात. आणि मुलांना आपल्या संस्कृतीत वाढवल्याचं समाधानही मिळतं. ऐकलंस की तूही. संतोषच सांगत होता ना आपल्याला."
"संस्कृती?" विमलला एकदम हसू आलं. संस्कृती टिकवत असलो काही प्रमाणात तर आपणच टिकवतो आहोत इथे हे म्हणणं टाळलंच त्यांनी. उगाच विषयात विषय आणि डोक्याला आणखी एक भुंगा नको.
"हे पाहिलं की वाटतं गं, आता आपले तर परत जायचे मार्ग बंद झाले. आठवतंय, बाबा गेले तेव्हा अचानक सगळ्या वर्षांचा हिशोब मांडावासा वाटत होतं काही दिवस. भूतकाळ, भविष्यकाळाचं गणित सुटता सुटेना. आईने एकटंच तिकडे रहायचं ठरवलं तेव्हाही जीव तुटला होता पण आजच्यासारखं निराशेच्या गर्तेत लोटणारं उत्तर नव्हतं समोर आलं." विमलला रमाकांतच्या विचारांच्या दिशेचा प्रयत्न करूनही अंदाज येत नव्हता.
"बाबा, आई, बहिणी....एकेक करत सर्वांनी निरोप घेतला.  या देशात आयुर्मान जास्त आहे. कधी जुने फोटो काढून बसलो की वाटतं मीच खड्यासारखा उरलो आहे या सर्वांमधून. आता करायचं काय परत जाऊन? उरलंय काय तिथे? त्यामुळे  मन थांबतं ते इथे का आलो या प्रश्नावर."
रमाकांत हे वेगळंच काहीतरी बोलत होते. नेहमीचे काथ्याकूट झालेले विषय नव्हते. पण  हा विषयच कशाला हवा, आता राहिले आहेत कितीसे दिवस की अमेरिका, भारत करत राहायचं असं म्हणावंसं वाटत असूनही त्या मुकाट रमाकांतांचं मोकळं होणं झेलत राहिल्या.

"शाळेत असताना घरात परदेशात गेलेल्या नातेवाइकांचं कौतुक ऐकलेलं. सुभाषकाका कॅनडात होता. बाबांचा मामेभाऊ. कधीतरी चार पाच वर्षांनी यायचा भारतात. तो आला की घरी दारी, नातेवाइकांमध्ये तोच विषय. तिकडून आणलेल्या भेटी, त्याच्या मुलांचं अडखळत बोललेलं मराठी, फॉरेन रिटर्न म्हणून जळी स्थळी होत असलेलं कौतुक... तो आला की वाटायचं, जायला पाहिजे आपणही परदेशात. परत आलो की काय ऐट असते. त्या वेळेस कॅनडा, अमेरिका नाहीतर दक्षिण आफ्रिका नाहीच तर मग इंडोनेशिया हे देश ठरलेले."
"हो आमच्याकडेही होतं या फॉरेन रिटर्न मंडळीचं कौतुक. पण मला नाही कधी वाटलं की त्या कौतुकासाठी जावं परदेशात आपणही."
"मला ध्यासच लागलेला. आजूबाजूलाही डॉक्टरांच्या नावासमोर दिसायच्या ना परदेशातल्या पदव्या. कधी नुसतं सर्दी, खोकला झाला म्हणून तपासायला जायचं तरी बाबा म्हणायचे, एफ. आर. सी. एस. आहे. म्हणजे काय ते ठाऊक नव्हतं. पण त्यांच्या डोळ्यात जो आदर डोकावायचा ना एफ. आर. सी. एस. बद्दल तो पाहून वाटायचं, मी पण गेलो परदेशात तर काय अभिमान वाटेल बाबांना. बाबा कधी बोलले नव्हते तसं पण मी गृहीत धरलं. आलो जिद्दीने इथे. यशस्वी झालो. आणि सुभाष काकाला भाव असायचा तोच अनुभवला कितीतरी वर्ष भारतात गेलो की. येता जाता कौतुक."
"हे सगळं ठाऊक आहे मला. खूप वेळा बोललो आहोत. पण संतोषने भारतात परत जाण्याचं ठरवलं आणि इतकी अस्वस्थता आली तुम्हाला?"
"गुदमरतो जीव मला नक्की काय साध्यं करायचं  होतं याचं उत्तर शोधताना. इथे आल्यानंतर नुसतेच परत जायचे बेत करीत राहिलो मुलं मोठी होईपर्यंत. मुलं आता इथेच राहणार हे स्वीकारल्यावर परत न जाणंच कसं शहाणपणाचं होतं हे पटवत राहिलो. स्वत:ला, इतरांना. हळूहळू तर हा विषयही मागे पडत गेला. तसंही ते फार सोपं नव्हतं; निदान त्या वेळेस तरी. म्हणजे कुणी परत जायचं धाडस करायलाच धजत नव्हतं. पण संतोषसारखी परत जाणारी वाढली आहेत आता. तेव्हा वाटायला लागतं, मी का आलो इथे? तिथेच राहिलो असतो तर कदाचित परदेशात गेलो नाही ही एक खंत राहिली असती पण तेवढा एकच सल, दु:ख राहिलं असतं. आता... आणि इतकं करून प्रश्न पडतो की मी इथे आलो ते नक्की माझं स्वप्न होतं की बाबांची इच्छा मी पुरी केली? पण बाबा तर कधीही एका शब्दाने म्हणाले नव्हते मी परदेशात जावं म्हणून."

हळव्या झालेल्या रमाकांतकडे विमलताई पाहत राहिल्या.  देश सोडून जाणारा कधी ना कधी या कोड्यात गुरफटतोच. स्वत:ला शोधत राहतो, तपासत राहतो. पण हा देशच मला माझा वाटतो असं म्हणणार्‍या रमाकांतच्या मनात आजच का हे दाटून यावं ते त्यांना समजत नव्हतं. त्यांनी नाही का हा विषय मनाच्या अगदी आतल्या कोपर्‍यात हलवून अडगळीत टाकून दिला होता. कधी साफसफाई केल्यासारखी त्या त्यावरची धूळ झटकायच्या, पण मनातल्या मनात. स्वत:लाच बजावल्यासारखं त्या इथेच राहण्याच्या निर्णयाचं समर्थन करायच्या. आता इतक्या वर्षांनी तिच कारणं खरी आहेत असंही वाटायला नव्हतं का लागलं? मग आज हे का? कशासाठी. त्यांच्या नजरेतला प्रश्न कळल्यासारखं रमाकांत उत्तरले.
"मला समजत नाही ते हेच की मी माझं स्वप्न पूर्ण करत होतो की बाबाचं? का समाजाचं?"
"समाजाचं?"
"सुभाष काकाच्या कौतुकामुळे मी पाऊल टाकलं ते  न कळलेल्या वाटेवर, अज्ञाताच्या दिशेने. ती वाट कुठे संपते याचा विचारही डोकावला नाही कधी. पण मी आनंदी वाटसरू होतो, स्वप्न पाहणारा, ती पुरी करण्याचा ध्यास घेतलेला. माझं होत असलेलं कौतुक, आई, बाबांना माझा वाटणारा अभिमान, नातेवाईक, मित्र, शेजार्‍या पाजार्‍यांच्या डोळ्यातला हेवा या रिंगणात मी नकळतपणे कधीतरी फिरायला लागलो आणि पार अडकलोच. त्यातून जाग यायला इतकी वर्ष लागली. आणि आज  काहीतरी कायमचं निसटून गेल्यासारखं वाटतं आहे, कळेनासं झालं आहे की जे स्वप्न मी पुर्ण केलं ते नक्की होतं तरी कुणाचं?

बृहनमहाराष्ट्र मंडळाच्या अंकाच्या लेखमालिकेतील हा ५ वा लेख होता : -
http://www.bmmonline.org/sites/default/files/BMM/BMM/BMM_Newsletter_June2014.pdf

Thursday, April 24, 2014

हुश्शऽऽऽ पार पडल्या एकांकिका!

हुश्शऽऽऽ पार पडल्या एकांकिका आमच्या. मस्त झाल्या. गेले ४ महिने सराव, सराव, सराव..., नेपथ्य, संगीत नियोजन, प्रेक्षागृह आरक्षण, तिकिट विक्री, जाहिरात एक ना अनेक कामांची न संपणारी यादी.... अभिनय आणि दिग्दर्शन याची हौस हेच एकमेव कारण या सगळ्या धडपडीचं. माझ्याबरोबरीने नवराही दरवर्षी शिकला आहे  यात ’उडी’ मारायला. या प्रवासात असे अनुभव येत रहातात की कधीकधी  प्रश्न पडतो का करतो हे सारं? पण रंगमंचावर गेलं, कार्यक्रम यशस्वी झाला की सारे प्रश्न, अनुभव, अडचणी यावर मात करते ही नशा आणि पुढच्या बेतांचं नियोजन सुरु होतं.

मागे वळून पहाताना जाणवतं, या निमित्ताने ’माणसं’ कळतात, अगदी खर्‍या अर्थाने. आपल्याला कळलेली ’माणसं’ अशी वागू शकतात याचे धक्के बसतात तर कधी अनपेक्षितपणे सामोरा आलेला माणसातला चांगुलपणा भारावून टाकतो.

आम्ही चार महिने सगळे शनिवार, रविवार पूर्णपणे एकांकिकेसाठी मोकळे ठेवतो. कलाकारांना वेळ, तारखा सर्व आधीच कळवून, हे सगळं जमणार असेल तरच काम करायचा विचार करा असंही सुरुवातीलाच सांगितलेलं असतं. तरीही...

कलाकारांनी स्वत:ला विसरुन व्यक्तिरेखेला न्याय द्यावा, पण तसं होतं नाही. मला हे जमणार नाही, शोभणार नाही असा ’मी’ पणा येतो तेव्हा वाटतं...लेखकाची वाक्य परस्पर बदलून टाकणं, नवीन घुसवणं हे तर इतक्या सहज करतात ना सगळी.

दिग्दर्शन करताना आमची एक अट तसं म्हटलं तर जाचक पण शिस्त पाळायची तर आवश्यक. ती म्हणजे वेळ पाळणं. ठरल्या वेळेला सराव सुरु करायचा आणि दिलेल्या वेळेला संपवायचा. एखादा कलाकार उशीरा आला तर त्याचा त्यादिवशीचा तिथपर्यतचा भाग गेला. ब‍र्‍याचदा वाईटपणा येतोच आमच्या वाट्याला या नियमाबद्दल. मजेची गोष्ट म्हणजे, लवकर येणारे उशीरा येणार्‍यांबद्दल तक्रार करतात पण ती तणतण फक्त आमच्यासमोर. उशीरा येणार्‍यांना प्रत्यक्ष सांगायला कुणी धजावत नाही, वाईटपणा नको म्हणून. तिथे आम्ही असतोच :-) . पण  वेळ पाळणं  जमायला हवं हे ’माणसांना’ कधी समजणार?

भारतात काम करताना कलावंतही खूप आणि संस्थाही खूप, कशाचीच वानवा नसते. पण परदेशात जे हाती येतं त्याच्यांबरोवर काम करावं लागतं. फार कमीजणांना खर्‍या अर्थी ’अभिनय’ करण्याचा अनुभव असतो. इथे आल्यावर अचानक त्यांना आपल्यातली ’कला’ जाणवलेली असते, अधूनमधून देवळातल्या रंगमंचावर केलेलं काम, इतक्या अनुभवावरुन, चला रंगमचांवर वावरायची तर भिती नाही ना, मग करु आपण तयार असा दृष्टीकोन ठेवून आम्ही त्यांच्याबरोबर काम करायला सुरुवात करतो. पण त्यांचा तो तेवढाही अनुभव त्यांच्यादृष्टीने ’रग्गड’ असतो, त्या आत्मविश्वासामुळे  अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागते.

तरीही दरवर्षी रंगदेवतेच्या आशीर्वादाने सारं छान पार पडलं की जो आनंद होतो तो अवर्णनीय.

खालच्या दुव्यावर फोटो पहायला विसरु नका. लवकरच व्ही. डी. ओ. क्लिप्स टाकेन.

http://marathiekankika.wordpress.com/