Saturday, November 26, 2011

तिने काय करावं?

कोणे एके काळी ती त्याला गाडीत भेटली. तो त्याच्या गावी गेला होता. ती मैत्रिणीबरोबर परत येत होती. तिच्या हातात डायरी. दोघी कविता वाचनात मग्न. तो अधुनमधुन डोकावत असला  डायरीत, तरी तिला त्याची कल्पना नव्हती. त्या दोघींचं जगच निराळं होतं. एकदम त्याने डायरीच मागितली वाचायला. नाही कसं म्हणणार?
"डायरी आहे."
"हो, तीच मागतोय." त्याने धीटपणे म्हटलं.
"कविता आहेत. बाकी विशेष काही नाही."
"त्याच वाचायच्या आहेत."
"आवडतात?" असं म्हणत तिने त्याच्या हातात डायरी सुपूर्द केली. तो वाचत राहिला. त्या गप्पांमध्ये रंगून गेल्या.
मुक्कामाला डायरी परत घेत तिने निरोप घेतला. तो वळून वळून पाहत राहिला. दोघी हात हलवत निघूनही गेल्या.

आणि एकदम त्याने तिला पत्रच पाठवलं. एक नाही दोन. म्हणजे त्याला माहीत नव्हतं की त्याचं पत्र तिला मिळालं आहे की नाही म्हणून हे दुसरं पाठवलेलं.

’आपली ओळख अगदी निसटती. स्पर्धेच्या गोंधळातली, बक्षीस विजेत्यांच्या गर्दीतली. तुझ्या कविता खूप भावल्या. कवितेनं किती जवळ आणलं आपल्याला. तुझ्या चेहर्‍यावर बक्षिसाचा आनंद ओसंडून वहात होता. मी तुझ्या हास्याच्या सरीत न्हाऊन निघत होतो. तुला त्याची जाणीवही नव्हती. मग गाडीतही भेटलो. म्हणजे मुद्दाम वाकडी वाट करून मी त्या गाडीत शिरलो. किती सहजतेने निरोप घेतलास. मला मात्र, खूप वेळ काहीतरी हरवल्याची जाणीव होत राहिली. घरी आल्यावर अगदी आठवणीने पत्र धाडलं. डायरीत होता तुझा पत्ता. पोचलंच नाही का ते तुला? की एवढं धाडस आगाऊपणाचं वाटलं? पत्रासोबत काव्यंमालेचा अंकही जोडला होता नमुना म्हणून. खूप दिवस उत्तराची वाट पाहिली. मग वाटलं, काहीतरी सापडल्यासारखं वाटत होतं पण चिमटीत येतायेताच निसटून गेलं. जाऊ दे, नशिबातच नाही म्हणायचं, दिवसामागून दिवस लोटले. कधीमधी तुझी आठवण सतावत राहिली. पण पुन्हा लिहायचं धाडस कसं होणार? काल खूप बेचैन होऊन समुद्रावर भटकत राहिलो. कंटाळून परत आलो तर ’काव्यमाला’ दाराच्या फटीतून आत आलेली. जरा वैतागानेच अंक उघडला. तू ’सोबत’ घेऊन आली होतीस. मन चिंब चिंब झालं. पुन्हा एकदा तीच सहजता. तीच निरागसता बरसून गेली. आठवणीतली वीज चमकून गेली.  अशीच सरीमागून सरीसारखी धावत ये. चिंब चिंब भिजवत राहा. तुला आवडणार नाही कदाचित, पण मनात अंकुरलं, खूप लिहावंसं वाटलं म्हणून लिहिलं.’

खरं तर पहिलं पत्र मिळालं होतं. नशीब, घरात कुणी न फोडता ते तिच्या ताब्यात आलं होतं. नमुन्याच्या अंकातला पत्ता पाहून तिने आपली कविता लगेच पाठवूनही दिली होती. समजलं असेल का ते त्याला? पत्राला मात्र उत्तर पाठवलं नव्हतं. चेहराही आठवत नाही त्या मुलाला कशाला लिहायचं पत्र?
तिला आवडलं ते पत्र पण तो कोण हे काही केल्या लक्षात येईना. कविता, काव्यंस्पर्धा हा तर तिचा जीव की प्राण. बक्षिसं, मित्रमैत्रिणींचा सततचा घोळका, स्पर्धांमधल्या ओळखी. कोण असेल हा? काही दिवस ती त्या प्रश्नात रमली आणि नंतर विसरलीही. त्याच्या धाडसाला अनुत्तरित प्रतिक्रियेने पूर्णविराम मिळाला.

वर्ष लोटली.  ती सुखासमाधानात न्हाऊन निघालेली. कवितेच्या दुनियेतून संसारात, नोकरीच्या व्यापात रमलेली. फेसबुकचा जमाना आला आणि जुन्या ओळखी शोधण्याचं वेड  लागलं. काही नावं आठवली काही कुठून कुठून शोधून काढली. त्यातलाच एक तो. त्याचं अडगळीत पडलेलं पत्र सापडलं आणि तिला वाटलं तेव्हा नाही पण आता तरी त्याचा चेहरा पाहावा. शोधलंच मग तिने त्याला. त्याच्या नावासारखी तीन चार नावं होती. काय लिहिणार प्रत्येकाला? कधीतरी कुठेतरी झालेली आपली ओळख (एकतर्फी) असं तूच म्हणाला होतास, पत्र पाठवली होतीस दोन तो तूच का? त्याने लिहिलेल्या पत्रातल्या काही ओळी पण लिहाव्यात म्हणजे कदाचित आठवेल ते त्यालाही. तिने तसं केलं आणि त्याचं उत्तर आलं. तो तोच होता. त्याला अद्याप आठवत होतं सारं काही. तिच्याकडे आठवण्यासारखं काही नव्हतंच. पण त्याचा चेहरा पाहायची उत्सुकता होती. फोटोच नव्हते पण फेसबुकवर. असं कसं म्हणणार नं की टाक बुवा तुझे फोटो. कोण होता तो माझ्या प्रेमात पडलेला ते पहायचं आहे. ती मग गप्प राहिली. तू कुठे, मी कुठे झालं आणि तो म्हणाला, मी येतो तुझ्या गावात कधीतरी. बापरे, मग आता त्याला काय घरी ये म्हणायचं? नवर्‍याला काय सांगायचं?  तिने बरेच दिवस उत्तरच पाठवलं नाही त्याला.

आणि एक दिवस त्याचा फोन आला. ’कुठून शोधला याने नंबर?’ भेटायला येतो म्हणाला.  तिने नवर्‍याला थोडंफार सांगितलं, म्हणजे गाडीत ओळख, त्याने कवितेचा पाठवलेला अंक असं वरवरचं. नवरा म्हणाला मग जेवायलाच बोलाव. अनोळखी माणसाला एकदम जेवायला बोलवायचं? काय बोलायचं? पण उत्सुकतेपोटी तिने ते केलं. मनात कुठेतरी प्रश्न होता. तेव्हा उत्तर पाठवलं असतं तर आयुष्याला वेगळं वळण लागलं असतं का? स्वत:च्या संसाराची बेरीज वजाबाकी मनातल्या मनात करून झाली. सगळं आलबेल होतं. पण  तो काय करतो? त्याचा संसार? तिला स्वत:चीच लाज वाटली. आता इतक्या वर्षांनी असा विचार मनात तरळून जावा. जाऊ दे. त्याला एकदा येऊन तर जाऊ दे, मग नाही संपर्क ठेवायचा.

तो आला आणि तिला तो मुळ्ळीच आवडला नाही. म्हणजे पहिला प्रभाव वगैरे म्हणतात ना तो काही पडला नाही तिच्यावर. त्यावेळेस उत्तर पाठवलं नाही ते किती बरं झालं. येताना कवितांचं बाडच घेऊन आला होता. कवितांवर कविता वाचत राहिला. नवरा कामाचं निमित्त काढून उठलाच तिथून. जाता जाता तिच्याकडे मिश्किलपणे हसून पाहायला तो विसरला नाही. ती ऐकत राहिली. ओढून ताणून छान, मस्त म्हणत राहिली. तीन चार तासांनी तो गेला. पुढच्यावेळेस आणखी कविता आणतो म्हणाला.

गेल्यानंतर त्याचा फोन आला, फेसबुकवरून तो पत्र पाठवत राहिला. तिने आता काय करावं? म्हणजे पत्रांना उत्तर नाही पाठवत ती पण तो तिच्या गावात येतो. पुढच्या वेळेस कवितांचं बाड घेऊन आला आणि घरी येतो म्हणाला तर...? काय करायला हवं तिने? सुचवाल एखादा मार्ग?

5 comments:

  1. आपली कवितांची बाडं त्याला पाठवत रहावीत.

    ReplyDelete
  2. हा, हा हा साधक, म्हणजे मग तो घरी यायचं नाव काढणार नाही का :-)?

    ReplyDelete
  3. म्हणून फेसबुकपासून लांब रहाव!

    ReplyDelete
  4. me wachla lekh tenva mala asa watla ki tine kay karava hey ticha tharla aahe kasa karawa ha ticha prashna aahe.(kunala hi na dukhawta)which is not possible now.mhanje jenva tini tya patracha paathpurava kela tenva ti kay wichar karat hoti..alternate aayushya kasa asta hey imagine karawasa tila watla,she fell for that temptation and does not want to face the "leftover" part of it.she will have to do it and sooner the better...she cannot break that poor guy's heart once again:) (From Facebook)

    ReplyDelete
  5. ihave one question in my mind, jar to khup smart and handsome asta tar tila tya kavita avadalya astya ka? ani mag paschattap zala asta ka ki teva apan ka nahi tyala contact kela? yacha tine vichar karun pahava and if still not likning his kavita then spashtapane sangave pan changlya shabdat , tyala hurt na karta

    ReplyDelete

तुम्हाला माझ्या लिखाणाबद्दल काय वाटतं हे जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल. एखादी छोटीशी प्रतिक्रिया लिहणा‍र्‍याला खूप उत्साह देते. मग कळवाल ना मला तुम्हाला काय वाटलं वाचून ते? तुमच्या प्रतिक्रियेने मला कदाचित आणखी विषय सुचतील, सुधारणेला वाव मिळेल आणि मुख्य म्हणजे आपली ओळख होईल.