Showing posts with label वृत्तपत्र लेखन. Show all posts
Showing posts with label वृत्तपत्र लेखन. Show all posts

Thursday, July 25, 2024

बेघरांना हटवा

 आजच्या महाराष्ट्र टाईम्समध्ये आलेला लेख    

   

अमेरिकेतल्या काही राज्यात प्रशासन जिथे - जिथे बेघर लोकांच्या वस्त्या आहेत तिथे - तिथे कायदेशीर कारवाईचा फलक लावते आहे. पोलिस प्रत्यक्ष जाऊन बेघर लोकांना आपला मुक्काम तीन दिवसांच्या आत हलवण्याची सूचना करत आहेत. कारण? कारण आहे उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय. २८ जूनला उच्च न्यायालयाने बेघरांना रस्त्यावर थारा नाही, तसे आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाईचे आदेश जारी केले आहेत. कारवाई म्हणजे काय तर त्यांना न परवडणारा दंड ठोठावला जाणे किंवा त्यांची एक महिन्यासाठी तुरुंगात रवानगी. हे कारवाई करण्याआधी बेघर नागरिकांना सूचना मिळते पण त्यांनी निवाराछ्त्राचा आसरा घेणं अपेक्षित आहे. कितीतरी बेघर लोक निवारा केंद्रात राहायला जाण्याऐवजी रस्त्यावर राहणं पसंत करतात. निवार्‍याला न जाण्याची अनेक थक्क करणारी कारणं आहेत त्यातलं मुख्य कारण आहे, प्रतिक्षा यादी. त्यामुळे आला आदेश, गेलं निवाराछात्रात असं होत नाही. राहायला जागा नाही म्हणून रस्त्यावर तंबू ठोकणार्‍या लोकांकडून दंड भरण्याची अपेक्षा करणं उचित आहे का? दंडांचे पैसे भरायला मुळात त्यांच्याकडे पैसे कसे असणार? असे असंख्य प्रश्न या निर्णयाने उभे केले आहेत. उद्यानात आणि रस्त्याच्याकडेला टाकलेले तंबू शहराच्या सौदर्याला, आरोग्य आणि सुरक्षिततेला हानीकारक आहेत. करदात्यांच्या पैशातून उभारलेल्या सोयिसुविधांचा लाभ नागरिकांना घेता येत नाही, उद्यानं बेघर लोकांच्या वस्त्या झाल्यामुळे लोक उद्यानात फिरकत नाहीत.  त्यांना त्यांच्या सुरक्षिततेची खात्री अशा भागांमध्ये वाटत नाही अशी दुसरी बाजू उच्च न्यायालयाचा निर्णय योग्य वाटणारे मांडतात तर काहीजणांच्या मते राहायला जागा नाही म्हणून शिक्षा सुनावणं हा त्या व्यक्तीच्या अस्तित्वावरच घाला घालणारा हा निर्णय आहे. जिथे बेघर लोकांची संख्या जास्त आहे अशा नऊ राज्यात या निर्णयाची अमंलबजावणी होईल. या निर्णयाबद्दल अर्थातच राज्याराज्यातल्या महापौरांच्या, सामान्यजनतेच्या संमिश्र प्रतिक्रिया आहेत. मुळात हा खटला आहे तरी काय ज्यासाठी  प्रशासनाला उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागले?


२०१८ साली ऑरेगन राज्यातील ग्रॅटपास शहरात सत्र न्यायालयात ऑरेगन कायदा केंद्राच्यावतीने बेघर लोकांसाठी खटला दाखल केला गेला. कायद्याने सार्वजनिक ठिकाणी झोपणे दंडनीय आहे पण शहर निवारा पुरवू शकत नसेल तर त्यांनी कुठे जायचं आणि घटनेनुसार असा नियम अवैध आहे असा मुद्दा उपस्थित करण्यात आला. हा खटला होता ब्लेक या नागरिकाच्यावतीने. ग्रॅटपासमध्ये दहा वर्ष स्वत:चं घर नसल्याने, भाड्याने घर घेणं परवडत नसल्याने ब्लेक बेघर होता. अधूनमधून सरकारतर्फे चालवणार्‍या जाणार्‍या तात्पुरत्या निवार्‍याचा तो आधार घेत होता. तात्पुरतं निवारा केंद्र ही नोकरी असणार्‍या पण भाड्याचं घर न परवडणार्‍या किंवा बेरोजगार व्यक्तींना अल्पमुदतीने मिळू शकतं पण काही प्रमाणात भाडं तर द्यावं लागतंच तसंच दोन वर्षात स्वत:च्या पायावर उभं राहणं अपेक्षित असतं. ब्लेक या निवार्‍याचा आधार घेत होता पण तिथे तो टिकू शकला नाही. उद्यानं आणि रस्त्याच्याकडेला झोपण्यावरुन त्याला अनेकदा दंड ठोठावण्यात आला. ब्लेकसारखे त्या भागात जवळजवळ सहाशे निराधार नागरिक होते जे सरकारच्या कडक नियमात पोळून निघाले होते. साधारण चाळीसहजार वस्ती असलेल्या या गावात रात्री रस्त्यावर झोपलेल्या माणसाला चादर, उशी  वापरण्यावर बंदी घालण्यात आली आणि उलटसुलट मतप्रवाहांचं गावात वादळ उठलं . गावातील या सर्व निराधार व्यक्तींचा प्रतिनिधी म्हणून ब्लेकला निवडण्यात आलं. ब्लेकद्ववारा ऑरेगन कायदा केंद्र या संस्थेमार्फत  खटला दाखला करण्यात आला. २०२० साली ब्लेकचं निधन झालं आणि त्याच्याजागी ग्लोरिया जॉनसन आणि जॉन लोगन यांची बेघरांची प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली. शासनातर्फे असलेल्या निवाराकेद्रांमध्ये समाधानकारक परिस्थिती आढळून न आल्यामुळे त्यावर लक्ष केंद्रित करावं, केंद्रांची संख्या वाढवावी तसंच बेघरांना शिक्षा ठोठावलं जाणारं कलम काढून टाकावं याला सत्र न्यायालयाने अखेर समंती दिली तरी हा खटला पुढे चालूच राहिला. ग्रॅटपास शहर प्रशासनाने उच्च न्यायालयाकडे धाव घेतली.


बेघरांचेही सामान्यत: दोन प्रकार असतात. निवारा केंद्रात राहणारे आणि निवारा केंद्र नाकारुन रस्त्यावर जीवन जगणारे. मुळात कितीतरीजण सर्वसामान्य जीवन जगणारी माणसं असतात पण घरभाडं परवडत नाही म्हणून त्यांच्यावर ही वेळ आलेली असते. नातेवाईकांची मदत मिळणं कठिण होतं कारण सर्वचजण साधारण त्याच आर्थिक स्तरातले असतात. काहीवेळा मादक पदार्थाच्या आहारी गेल्यामुळे घरात थारा मिळत नाही. सरकारच्या ताब्यात असलेल्या युवकांना सज्ञान झाल्यावर म्हणजे अठरा वर्षांनंतर निवारा केंद्रात राहता येत नाही त्यामुळे ही तरुण मुलं रस्त्यावर येतात आणि त्यानंतर सर्वसामान्यांसाठी असलेल्या निवारा केंद्रात जाण्याची त्यांची इच्छा उरलेली नसते. बर्‍याच निवारा केंद्रातून सकाळी बाहेर पडल्यानंतर संध्याकाळी परत आल्यावर जागा असेलच असं याची शाश्वती  नसते. सेवाभावी संस्था अशी केंद्र चालवतात पण त्याठिकाणचे नियम बेघरांना जाचक वाटतात. धार्मिक पाया असणार्‍या काही केंद्रात तुम्ही पाऊल टाकलं की तीस दिवस इतरांच्या संपर्कात राहण्याची बंदी असते, रोज दोनवेळा चर्चमध्ये जाणं बंधनकारक असतं तसंच नोकरी असेल तर पगारातील दहा टक्के रक्कम ही केंद्र घेतात. कितीतरी केंद्रात ठराविक वेळेनंतर परत आलात तर प्रवेश नाकारला जातो. रात्री उशिरापर्यंत काम करणार्‍या लोकांना अशा केंद्रांचा निवारा घेता येत नाही.


संपन्न देशात गरीबी नसते असं आपण गृहीत धरतो पण अमेरिकेत ३३६,७५१,०६१ मिलियन लोकसंख्येपैंकी सध्या ६,५३,१०० इतकी रस्त्यावर तंबू ठोकून राहणार्‍यांची संख्या आहे.  गेल्या एका वर्षात १२ टक्क्यांनी बेघरांची संख्या वाढली आहे ती कोविड काळानंतर झालेल्या महागाईमुळे. २००७ नंतर प्रथमच ही संख्या इतकी वाढली. उच्च न्यायालयाने दिलेला हा निर्णय काही राज्यांपुरताच मर्यादित आहे तसंच त्या त्या राज्याला  निर्णयाची अमंलबजावणी किती कठोरपणे करायची याची मुभा आहे. नियमाची कठोरपणे अमंलबजावणी झाली तर बेघर लोक देशोधडीला लागतील, या गावातून त्या गावात भ्रमंती त्यांच्या वाट्याला येईल आणि काही हालचाल केली नाही तर उद्यान, रस्ते अशा सार्वजनिक जागांवर बेघरांनी आक्रमण केल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आपल्याच शहरातील उत्कृष्ट नियोजन करुन बांधलेल्या उद्यान, रस्त्यावर फिरकणं मुष्किल होईल. प्रश्न गुंतागुतींचा आहे. प्रशासनाने योग्य ते बदल करुन निवारा केंद्र पुरवणे हा मार्ग असला तरी बर्‍याच राज्यांच्या म्हणण्यानुसार त्यांची तेवढी क्षमता नाही. आता ९ राज्य या निर्णयाची अमंलबजावणी करताना काय पावलं उचलतात हे पाहाणं हे महत्वाचं ठरेल. 


https://marathi.indiatimes.com/editorial/article/us-supreme-court-decision-on-homeless-special-report/articleshow/112005896.cms

Wednesday, June 26, 2024

अमेरिकन स्त्रीमन

 महाराष्ट्र टाईम्सच्या रविवारच्या विश्वभानमधील हा माझा दुसरा लेख.


"यू इंडियन विमेन ऑलवेज हॅव शोल्डर टू लिन ऑन..." माझ्याबरोबर काम करणारी टिना जेव्हा असं मला म्हणाली तेव्हा क्षणभर राग आला, हिचं काय जातंय असं म्हणायला, आम्हाला इथे आहे कोण नवर्‍याशिवाय हा विचार मनात डोकावला. तिचं बोलणं खटकलं पण नंतर माझं मलाच जाणवलं किती खरं होतं तिचं बोलणं. प्रत्येक गोष्टीत आपण नवर्‍यावर किती अवलंबून राहतो, सगळीकडे नवर्‍याला गृहीत धरतो हे  तीव्रतेने जाणवलं. मीच नाही तर माझ्या इतर मैत्रिणीही. कोणी गाडी चालवत नाही म्हणून जोडीदारावर अवलंबून, कोणाला इंग्रजी बोलायची सवय नाही म्हणून जिथे जायचं तिथे नवरा बरोबर पाहिजे,  बॅकेंच्या व्यवहारातलं, आंतरजालावरुन बिलं भरण्याच्या कामातलं कळत नाही म्हणून ते नवरा करेल हे गृहित धरणार्‍या स्त्रिया डोळ्यासमोर तरळून गेल्या. ती जे बोलली तोही प्रसंग असाच. झालं होतं असं, कामावर जाताना माझ्या गाडीचा टायर फुटला. तातडीची सेवा कोण पुरवणार? नवरा. मी आधी नवर्‍याला फोन केला. तो म्हणाला,

"मी कसा येऊ काम सोडून? तू AAA ला (American Automobile Association) फोन कर. अर्ध्या तासात येतील ते आणि देतील तुला टायर बदलून." मुकाट्याने टायरचा खडखडाट करत मी गाडी कामाच्या जागी नेली. AAA ला फोन करता करता नवर्‍याच्या नावाने टिनाकडे कुरकूर केली. तिला माझ्या कुरकूर करण्याचं तर आश्चर्य वाटलंच पण टायर बदलता येत नाही याचंही. AAA यायच्या आधीच तिने मला स्वत:हून टायर तर बदलून दिलाच पण तो कसा बदलायचा हे शिकवलंही. ही माझी अमेरिकेतल्या स्वतंत्र आणि स्वातंत्र्य उपभोगणार्‍या स्त्रीची पहिली ओळख. तोपर्यंत चेहरा रंगवून, उंच टाचांच्या चपला घालून ’टकटक’ करत चालणारी अत्याधुनिक स्त्री एवढंच माझं ज्ञान होतं इथल्या स्त्रीबद्दल. जसजशी मी टिनाच्या जास्त जवळ जात गेले, इतर स्त्रियांशी परिचय होत गेला तसंतसं  इथल्या कितीतरीजणींचं आयुष्य समजत गेलं. सर्वसाधारण आपला समज असतो की अमेरिकेत लोक शिकत नाहीत, हुशार नसतात पण ती हुशार नसतात म्हणून शिकत नाहीत असं नसतं तर शिक्षणाचा खर्च परवडत नाही हे बहुतेकवेळेला कारण असतं. शालेय शिक्षण सरकार मोफत पुरवत असलं तरी महाविद्यालयीन शिक्षणाचा भार सामान्यांच्या आवाक्यापलिकडचा असतो. टिनाचंही तेच. नोकरी करुन पैसे साठवून जेव्हा तिने पुढचं शिक्षण घेतलं तेव्हा तिची चाळीशी उलटून गेली होती, लग्न मोडलं होतं पण जिद्दीने शिक्षण पूर्ण करुन ती चांगल्या नोकरीला लागली. १२ वी नंतर नोकरीला सुरुवात आणि त्याकरता स्वतंत्र राहण्याची सवय, त्यामुळे निर्णय घेण्याची क्षमता अंगी येणं, कोणत्याही प्रसंगाला तोंड देता येण्याची तयारी असणं अशा गोष्टी आपसूकच तिच्या अंगी आल्या होत्या आणि माझ्यासारख्या आर्थिक स्वातंत्र्य असलं तरी एवढ्यातेवढ्या गोष्टींसाठी इतरांवर, विशेषत: जोडीदारावर अवलंबून असणार्‍या स्त्रिया तिने पाहिल्या असणार आणि त्यावरुन तिने ते विधान केलं असणार. ही माझ्या आयुष्यात आलेली आणि मनातल्या कल्पनांना छेद देणारी पहिली अमेरिकन स्त्री. 

आमच्या शेजारची मेरी केली, जिला आम्ही मेरीआजीच म्हणतो. तिनेही माझ्या मनातल्या अमेरिकन स्वातंत्र्य आणि त्या अनुषगांने येणार्‍या, मी कल्पना केलेल्या सार्‍या गोष्टींना अक्षरश: सुरुंग लावला. तिची ओळख झाल्यावर येताजाता चार गोष्टी बोलायला ती थांबायला लागली, सातासमुद्रापलिकडे असणार्‍या आईची मला आठवण येत असेल म्हणून अधूनमधून स्व:त केलेला एखादा पदार्थ आणायला लागली. आमच्या घरातल्या सर्वांचे वाढदिवस समजल्यावर प्रत्येकाच्या वाढदिवसाला मेरीआजीकडचा केक येणारच. तिच्या गृहिणीपणात ती मनापासून रमलेली होती तरी वागण्याबोलण्यातला ठामपणा तिचा आत्मविश्वास जाणवून द्यायचा. आमच्या मुलांसाठी ती आजी झाल्याचं आम्हाला अप्रुप होतं ते आश्चर्यात आणि कायमच्या कौतुकात बदललं जेव्हा तिच्या सुनेने अचानक जगाचा निरोप घेतला तेव्हा तिने उचललेल्या पावलाने. पासष्टी पार केलेल्या मेरीने जुळ्या नाती आणि नातू यांची जबाबदारी अंगावर घेतली. नुसती घेतलीच नाहीतर मुलांना शिस्त, प्रेम लावून त्यांचा अभ्यास घेणं, तिघांच्या वेगवेगळ्या  छंदवर्गांना न कंटाळता नेणं, आडनिड्या वयातल्या समस्या सोडवणं हे सारं पार पाडलं. तिची होणारी धावपळ, दगदग पाहून आम्ही चुकचुकायचो, तिला लागेल ती मदत करायची तयारी दर्शवायचो पण तीन मुलांना मोठं करणं हे एकमेव ध्येय तिने उराशी जपलं आणि यशस्वीरित्या पार पाडलं. अमेरिकन लोक स्वत:पलिकडे विचार करत नाहीत, नात्याशी त्यांची बांधिलकी नसते अशा ज्या काही भारतातून येताना समजूती होत्या त्या गळून पडणारी अशीच उदारहरणं सातत्याने आम्ही आजूबाजूला बघत आलो आणि आपण ऐकीव गोष्टींवर पूर्ण समाजाला एकाच पारड्यात तोलतो हे वारंवार जाणवत गेलं.

आमच्या मुलीच्या जन्माच्यावेळी भारतातून माझ्या आई - वडिलांना येणं शक्य झालं नाही तेव्हा आमच्या भारतीय मित्रमैत्रिणींबरोबर मेरीआजी आणि शेजारची टॅमी हार्वी या दोन्ही कुटुंबाने मदतीचा हात पुढे केला. इतकंच नाही तर  महिनाभर सराव करुन बारशाला कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाळ घ्या म्हणत दोन्हीकडच्या आजीआजोबांची भूमिका आनंदाने पार पाडली.

याचा अर्थ इथे सगळंच आलबेल आहे असा नक्कीच नाही. वर्णद्वेषाचा कितीतरीजणांना अनुभव येतो, कामाच्या ठिकाणी अतिशय वरच्या ठिकाणी पोचणं सोपं नसतं, काही साध्यासाध्या पण आपल्याला खटकणार्‍या गोष्टीही भरपूर आहेत. आपल्याकडे जसं डब्यातून कोणी काही दिलं तर आपणही त्यात काहीतरी भरुन पाठवतोच तशी या लोकांची पद्धत नाही. डबे रिकामेच परत येतात. दारात उभं राहून तासनतास गप्पा मारतील पण बोलतोच आहोत तर या की आत असं तोंडदेखलंही म्हणत नाहीत. अर्थात व्यवस्थित आमत्रंण देऊन बोलावतात किंवा त्यांना काही खाद्यपदार्थ द्यायचे तर देतात हा भाग आलाच.

या देशातली माणसं उमजत गेली तितकंच त्यांच्यातला उत्साह, वयाचा बागुलबुवा न करता कार्यरत राहणं, आवडीनिवडी जपणं यातून आम्हीही बरंच शिकलो. त्यामुळेच थोडसं स्थैर्य आल्यावर अभिनयाची मूळ आवड उफाळून आली.  कणकवलीच्या नाथ पै एकांकिकांमधून मिळवलेली अभिनयाची बक्षिसं, रत्नागिरीच्या जिज्ञासा संस्थेतून गाजवलेल्या स्पर्धांच्या आठवणी स्वस्थ बसू देत नव्हत्या. त्यातूनच ‘अभिव्यक्ती’ या नाट्यसंस्थेची निर्मिती झाली. २००८ सालापासून आम्ही इथल्या व्यावसायिक नाट्यगृहात दरवर्षी नाटक/एकांकिका करतो. मी लिहिलेल्या एकांकिकेचे प्रयोग इथे इतर राज्यातही लोकांनी केले आहेत. मराठी भाषेची आवड असल्यामुळे मी मराठी शिकवायला सुरुवात केली. वर्ग आंतरजालावर (online) असल्यामुळे गावातल्या मुलांसह, इतर राज्यातून आणि देशांतूनही मुलं माझ्याकडे मराठी शिकत आहेत. याबरोबरच वयाच्या एका टप्प्यावर कर्मभूमी आणि मातृभूमीचं देणं फेडण्याची भावना इथल्या संस्कृतीमुळे आमच्या मनात निर्माण झाली. इथे शाळेपासूनच मुलांमध्ये सामाजिक जाणीवा प्रगल्भ केल्या जातात. त्यातून इथली मुलं समाजकार्यात जोमाने काम करायला लागतात आणि बहुतांशी शिक्षण संपल्यावरही करत राहतात. मुलांचं पाहून आमच्यासारखे कितीतरीजण जितकं जमेल तशी आर्थिक, शारीरिक सेवा दोन्ही देशांसाठी द्यायचा प्रयत्न करतात.

१९९५ साली आम्ही अमेरिकेत आलो, तेव्हा हा देश आमच्यासाठी ‘परदेश’ होता. मुळं रुजवणं कठीण वाटत होतं, आत्तासारखी संपर्काची आधुनिक साधनं नव्हती. १५ दिवसांनी भारतात फोन व्हायचे. पत्र पाठवलं की उत्तराची आतुरतेनं वाट पाहण्यात ३ आठवडे जायचे पण हा परका देश ‘आपला’ कधी होऊन गेला, तेच समजलं नाही. आता परदेश हा शब्दप्रयोगच मला चुकीचा वाटतो. स्वत:चा देश, परदेश कसा असेल? त्यामुळेच मी भारताला मातृभूमी आणि अमेरिकेला कर्मभूमी असं मानते. भारतात कुणी अमेरिकेबद्दल ऐकीव माहितीवर तारे तोडले की आम्ही ख-या परिस्थितीची जाणीव तळमळीनं करून देतो आणि इकडे आमच्या सहकार्‍यांनी, अमेरिकेन मित्र-मैत्रिणींनी भारताबद्दल काही शेरे मारले की त्याच कळकळीनं गैरसमज दूर करण्याच्या प्रयत्नाला लागतो. दोन्ही देश आमचेच. एक कर्मभूमी, दुसरी मातृभूमी!

Wednesday, June 19, 2024

लोलक

महाराष्ट्र टाईम्सच्या आजच्या विश्वभान पुरवणीतील माझा

लेख.

लग्न ठरल्यावर ’काय बुवा आता एकदम अमेरिका’ असं जो तो ज्या अप्रुपाने म्हणायचा त्याचंच अमेरिकेपेक्षाही मला जास्त अप्रुप वाटायचं. लग्न ठरताना नवर्‍याच्या नोकरीमुळे अमेरिकेत जायला मिळेल हे कळलं तेव्हा मला भारत सोडायचा नाही हे मी ठामपणे सांगितलं होतं. दोन वर्षच जायचं आहे म्हटल्यावर अर्थातच अमेरिका बघायला मिळेल असं जो - तो म्हणायला लागला आणि अमेरिकेत जायचं नाही या एकाच कारणाकरता  हटून न बसता बघावी तरी ही अमेरिका असं मलाही वाटायला लागलं. लग्न झालं आणि वर्षभरातच नवर्‍याला कामानिमित्त अमेरिकेला जायची संधी चालून आली. अमेरिकेबद्दल  उत्सुकता होती तशीच छुपी भितीही. तिथे जाऊन करायचं काय,  निभाव कसा लागेल ही शंका अधूनमधून डोकं वर काढत होती. अमेरिकेबद्दल माहिती होती ती पुस्तकी, ऐकीव. शाळेतल्या भूगोलात शिकलेली माहिती आणि आपली माणसं आहेत भरपूर तिकडे हेही ऐकलेलं. एवढ्या तुटपुंज्या बळावर १९९५ साली २ वर्ष अमेरिकेत राहायचं म्हणून अमेरिकेला जाणार्‍या विमानात आम्ही बसलो.

नापा कौंटीतल्या सॅन्टारोझा नावाच्या गावात पाऊल ठेवलं तेव्हा कोकणातल्या एखाद्या निसर्गरम्य खेड्यात आल्यासारखं वाटलं पण जेमतेम ८ - १० भारतीय कुटुंबच गावात आहेत समजल्यावर कितीतरी प्रश्न मनात उभे राहिले. गजबजलेल्या गावातून, घरातून, मित्रमैत्रिणींच्या घोळक्यातून कोणीतरी शिक्षा दिल्यासारखं एका कोपर्‍यात मुकाट बस सांगितल्यासारखी अवस्था सुरुवातीला अनुभवली. कायद्यानुसार मला काम करता येणार नव्हतं हे इथे येताना ठाऊक होतं आणि दोनच वर्ष म्हणून त्याबद्दल काही वाटलं नसलं तरी इथे आल्यावर मात्र वेळ अंगावर यायला लागला. आठवड्यातून एकदा या ८-१० कुटुंबाच्या भेटींनी माणसांत मिसळण्याचं समाधान अपुरं वाटायला लागलं, संध्याकाळी मुलाला बाबागाडीत टाकून २-२ तास निर्मनुष्य रस्त्यावर फिरायला जाणं कंटाळवाणं व्हायला लागलं, घरी परत आलं की आई - वडील, भावंडांच्या, मित्रमैत्रिणींच्या आठवणींनी संध्याकाळ उदासवाण्या जायला लागल्या.  

भारतात मी अभिनय, लेखन यात मग्न असायचे, त्याबरोबर आकाशवाणीत हंगामी निवेदिका म्हणून काम करायचे. यातलं इथे फक्त लेखन शक्य होतं. मला दिसणारी अमेरिका कधी हलक्याफुलक्या लेखांतून तर कधी तात्कालिक प्रसंगांवरील लेखनातून मी मान्यवर वृत्तपत्र, मासिकं यातून लोकांपर्यंत पोचवत होते पण तरी चैन पडत नव्हतं. इथे राहायचं तर या समाजात आपण मिसळलं पाहिजे असं वाटायचं पण मार्ग सापडत नव्हता. मार्ग दाखवला रोजच्यारोज दारात फुकट येणार्‍या  वर्तमानपत्रातल्या जाहिरातींनी. त्यातूनच  सरकारतर्फे माफक दरात चालवल्या जाणार्‍या छंदवर्गाबद्दल कळलं.  जाजम विणण्याचा तो वर्ग म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या इंग्रजीची कसोटी होती. आम्हाला दोघींना एकमेकींच्या इंग्रजीचा एक शब्दही समजत नव्हता. ’I don't understand what you are saying' हेच दोन - तीन वेळा ऐकलं की समजत होतं पण आमची दोघींची चिकाटी दांडगी. वर्गात पूर्ण झालं नाही म्हणून मी तिच्या घरी जाऊन जाजम विणलं आणि जसंजसे उच्चार कळायला लागले तसंतसं अमेरिकन लोकांमध्ये मिसळण्याचं वेडच लागलं. त्यांच्या स्वभावाचे पैलू जाणून घ्यायला आवडायला लागलं.  

पाहता पाहता २ वर्ष उलटली. त्याचवेळी नव्या नोकरीच्या संधीही चालून येत होत्या. काय करावं समजत नव्हतं.  गावाकडून शहराकडे गेलेला माणूस जसा तिथंच गुंततो तसं होत असावं. आमचंही तेच झालं. मला नेहमी वाटतं की, हे सारे निर्णय त्या-त्या वेळच्या परिस्थितीप्रमाणे घेतले जातात. पैशाचा मोह सोडवत नाही, सोयीसुविधांची सवय होते, भारतात आर्थिक मदत करायची असते, बसत चाललेली घडी विस्कटणं नको वाटायला लागतं, मिळालेली संधी गमवायची नसते, हुशारीचं या देशात चीज होतं हा विश्वास वाढायला लागलेला असतो. प्रत्येकाची कारणं म्हटलं तर सारखीच किंवा म्हटलं तर खूप वेगळीही असतात. काहींना सासरच्या माणसांशी संबंध ठेवायचे नसतात तर काहींना अमेरिकेत राहतो म्हणजे स्वर्गाला हात पोचले असं वाटत असतं. आपण कल्पनाही करू शकत नाही इतकी अविश्वसनीय पण त्या- त्या कुटुंबाच्या दृष्टीनं सगळीच कारणं महत्त्वाची असतात आणि कशासाठी? पोटासाठी हे  मुख्य कारण तर असतंच असतं.

इथे राहण्याची जशी सवय होत गेली तशी नवर्‍याच्या नोकरीमुळे वेगवेगळ्या राज्यात फिरण्याचीही सवय झाली. हळूहळू भारतात महाराष्ट्रापुरतं मर्यादित असलेलं अनुभवविश्व व्यापक झालं. महाराष्ट्रातल्याच वेगवेगळ्या भागातल्या, भारतातल्या इतर राज्यातल्या लोकांशीही मैत्री व्हायला लागली. विचारातला संकुचितपणा कमी व्हायला लागला. देश आपला वाटायला लागला. इथल्या प्रवाहात सहभागी होण्यासाठी लागणा-या शिक्षणाचे वेध लागले. 

वयाच्या तिशीनंतर पुन्हा महाविद्यालयात पाऊल टाकायचं या विचारानंच बेचैन व्हायला झालं होतं. अस्वस्थ मनानं वर्गात प्रवेश केला आणि क्षणात तो पळालाही. माझ्या आई-वडिलांच्या वयाचे विद्यार्थी पाहून मी अगदीच बालवयात महाविद्यालयात आल्याची खात्री झाली आणि एक वेगळाच आत्मविश्वास आला. नंतर शिक्षक आणि विद्यार्थी यांमुळे तो टिकलाही. इथल्या शिक्षणाचा ढाचा वेगळा आहे. प्रात्यक्षिकांवर भर, विषय समजण्याला महत्त्व, शिस्तीपेक्षा मित्रत्व, अडचणींना उपयोगी पडण्याचा प्रयत्न अशा काही गोष्टी विशेष नमूद कराव्याशा वाटणार्‍या. अजूनही एक आठवण मनात ताजी आहे. मुलाला सांभाळणारी मुलगी येऊ शकली नाही तेव्हा शेवटचा पर्याय म्हणून मुलगा माझ्याबरोबर आला तर चालेल का असं मी स्मिथना घाबरतच विचारलं.  त्यांनी तात्काळ होकार भरला. मुलाला घेऊन वर्गात पाऊल ठेवलं आणि  स्मिथनी प्रथम आज आपल्या वर्गात एक छोटा दोस्त आला आहे अशी मुलाची सर्वांना ओळख करुन दिली. ६ वर्षांच्या माझ्या मुलानं लाजतलाजत ‘हाय’ केलं. वर्ग होता महाविद्यालयाचा आणि मुलं होती वय वर्ष १८ ते ६५ च्या आसपास. तो दिवस त्याच्यासाठी आणि माझ्यासाठीही कायमचा स्मरणात राहिला.

शिक्षण चालू असतानाच नोकरीसाठी लागणारी कागदपत्रं आली. मी शिकताशिकता बदली शिक्षिकेची नोकरी करायचं ठरवलं. रितसर प्रक्षिक्षण घेऊन मी कामाला सुरुवात केली. तिथेही उच्चार ही अडचण होतीच. छोटी, छोटी मुलं गोष्ट ऐकताना एकदम चिडीचूप बसत याचं मला खूप आश्चर्य वाटायचं. इतकी आज्ञाधारक? पण लवकरच ते कोडं सुटलं. मी बोललेलं त्यांना काही कळतंच नव्हतं म्हणून ती मुकाट बसून राहायची. मग ओठांच्या हालचालींवरुन कसं समजतं हे मीच त्यांना शिकवल्यावर त्यांना माझं बोलणं समजायला लागलं. दुसरी अडचण म्हणजे मला सुरुवातीला सगळी मुलं सारखीच वाटायची.  एकदा खेळाच्या तासाहून परत येताना मी वेगळीच मुलं घेऊन आले. अर्थात मला कळलं नव्हतंच. मुलंच म्हणाली, ‘यु आर नॉट अवर टिचर.’ आता? त्यांची शिक्षिका शोधून ती मुलं तिच्या ताब्यात दिली आणि भांबावलेली माझी मुलं मी परत आणली. आता सारं गमतीचं वाटतं, पण तेव्हा गडबडून आणखी गोंधळ घातला जायचा.

आम्ही  इथं आलो त्या काळात भारतातून इथं येणा-यांची संख्या तुलनेनं कमी होती त्यामुळे स्थानिकांनाही आमच्यासारख्यांची सवय पटकन होत नव्हती.  आता इथं येणा-या तरुण मुलांना जागतिकीकरणामुळे अशा अडचणी येत नाहीत.  पिढीपिढीमध्ये पडलेला फरकही  ठळकपणे जाणवतो. काही ठरवून लवकरच परत जातात तर काही भारत सोडायचा या विचारानंच आलेले असतात. भारतातली तरुण पिढी  ‘जिप्सी’ होत चालली आहे असं वाटतं कारण यांच्यासाठी कोणता देश हे महत्त्वाचं राहिलेलं नाहीच. कर्तृत्वाला वाव मिळवण्याची,  कामाची, फिरण्याची, संधी त्यांना महत्त्वाची वाटते . पूर्वीच्या मानानं हे सहजसाध्यही आहे. याचं कारण तंत्रज्ञान, संपर्कात राहण्याची साधनं, बदललेला भारत, सुधारलेली आर्थिक स्थिती हे असावं आणि पालकांची बदललेली दृष्टीही. मला आठवतंय जेव्हा आमची मनःस्थिती दोलायमान होती, तेव्हा दोन्हीकडच्या पालकांनी आम्हाला ‘तुमच्या भवितव्याचा विचार करून निर्णय घ्या’ असा सल्ला दिला होता. इथं येणा-या तरुण मुलांचे पालक मात्र मुलांना परदेशातच राहा असा सल्ला देतात. परिस्थिती आणि कारणं अशीही बदलत जातात हे आजूबाजूची स्थित्यंतरं पाहताना, भूतकाळात डोकावताना जाणवतं.

मनुष्य जिथं जातो तिथं आवडीनिवडी जपत मुळं रुजवतो. आपलं असं काहीतरी टिकवण्याची धडपड करतो, नवीन गोष्टी स्वीकारतो. तरुण वयात आपण कुठं आहोत याला खरंच फार महत्त्व दिलं जात नाही आपल्याकडूनच. आमचंही तेच झालं. उत्साह होता, आव्हानं पेलण्याची ताकद होती, स्वत:ला सिद्ध करण्याची खुमखुमी होती. आपण कोणत्या देशात आहोत हे महत्त्वाचं नव्हतंच. जीवलगांची दोन वर्षांनी होणारी भेट त्या वेळेस पुरेशी वाटायची.  इथंच स्थायिक होण्याचा निर्णय घेताना नक्की काय विचार असावा ह्याचा विचार केला तर एकच एक मुद्दा निश्चितच सांगता येणार नाही.  पैसा आणि आराम ह्या दोन गोष्टींसाठी मायदेश सोडतात असं भारतात म्हटलं जातं पण तेही कारण नाही. खूप सा-या कारणांचा एकत्रित परिणाम म्हणजे हे स्थलांतर असं म्हणेन मी. हे सर्वांच्याच बाबतीत होत असावं. आम्ही भारत सोडताना तात्पुरताच सोडला होता मग तरीही आम्ही इथंच का राहिलो, या प्रश्नाचं एकच एक असं ठोस  उत्तर आम्हाला अजूनही सापडलेलं नाही असंच म्हणावं लागेल.

Thursday, July 22, 2021

अंतराळ भरारीचे कोंदण

 ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांच्या ब्लू ओरिजिन कंपनीच्या प्रवासी यानाचा अवकाशातील ११ मिनिटांचा
प्रवास अनेकार्थांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे.  वॉली फंक ही ८२ वर्षांची स्त्री अंतराळवीर आणि नेदरलॅडचा १८ वर्षीय ऑलिव्हर डेमेन. सर्वात वयस्कर आणि सर्वात तरुण अंतराळवीर. जेफ आणि मार्क बेजोस या बंधूसमवेत या दोघांनी अंतराळ सफर केली. 

वॉली फंक नासाच्या (National Aeronautics and Space Administration)  पहिल्या १३ स्त्री अंतराळ प्रवासाच्या प्रशिक्षणार्थीपैकी एक. मर्क्युरी १३ या नावानेही या स्त्री अंतराळवीरांची ओळख आहे. या स्त्रियांनी विविध चाचण्यांतून स्वतःला सिद्ध केलं. काहीवेळा पुरुष अंतराळ प्रशिक्षणार्थींनाही त्यांनी  मागे टाकलं. मात्र नासाने कधीही या स्त्री वैमानिकांना अंतराळात जाण्याची  संधी दिली नाही. याबाबत नासाकडे बोट दाखवलं जात असलं तरी हे प्रशिक्षण नासाचं होतं हा गैरसमज असल्याचं म्हणतात. ज्या चाचण्या नासाने अंतराळवीरांसाठी स्वीकारल्या होत्या त्या चाचण्यांचा जनक लवलेस. लवलेसनी पुरुषांइतकीच अंतराळात प्रवास करण्याची  स्त्रीची क्षमता आहे का हे पाहण्यासाठी हे प्रशिक्षण दिलं. शारिरिक, मानसिक, बौद्धिक सार्‍या पातळ्यांवर स्त्रिया पुरुषांइतक्याच अंतराळ प्रवासाला सक्षम आहेत हे  अगणित चाचण्यांच्या आधारे त्यांनी सिद्धही केलं. मात्र नासाने पुढील काही चाचण्यांसाठी लागणारी मदत लवलेसनी विनंती करूनही नाकारली. नासाने स्त्रियांना अंतराळात पाठवण्याचा विचारच केला नव्हता त्यामुळे लवलेसना माघार घ्यावी लागली.   

या प्रशिक्षणात समाविष्ट झालेल्या स्त्रियांचं अंतराळ प्रवासाचं स्वप्न धुळीला मिळाल्यावर त्यांनी आपल्या प्रवासाचा मार्ग बदलला. प्रत्येकीने वेगवेगळ्या क्षेत्रात  पाऊल टाकलं. वॉली फंकनी जग फिरून येण्याचं ठरवलं. काही वर्षांनी त्या वैमानिक झाल्या, विमान चालवण्याचं प्रशिक्षण देऊ लागल्या आणि अखेर अपघातग्रस्त विमानांच्या तपासणीचं आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने येणार्‍या अडचणींचा अभ्यास करून त्यावर सरकारला उपाय सुचवण्याचं काम त्या करू लागल्या. आतापर्यंत १९,६०० तास त्यांनी उड्डाण केलं आहे तर ३,००० वैमानिकांना प्रशिक्षण दिलं आहे. 

१९६१ साली नासाने स्त्रियांचा विचारही अंतराळकक्षेत जाण्यासाठी केला नव्हता त्यामुळे वॉली फंक आणि तिच्याबरोबरीने प्रशिक्षणात भाग घेतलेल्याचा प्रवास सुरू होण्याआधीच संपला. अखेर नासातर्फे १९८३ साली  सॅली राइड अंतराळात प्रवास करणारी पहिली स्त्री ठरली तरी १९९५ पर्यंत यान चालवण्याची जबाबदारी स्त्रियांवर नासाने सोपवली नाही. एलिन कोलिन्स ही पहिली स्त्री जिने यान चालवलं. एलिनने वॉली फंक आणि इतर स्त्री अंतराळवीरांना या उड्डाणांच्यावेळी आमंत्रित केलं होतं. तब्बल ६० वर्षानंतर वॉली फंक यांचं अंतरिक्षात झेपावण्याचं स्वप्न साकार झालं ते न्यू शेफर्ड यानामुळे आणि जेफ बेजोसनी प्रवासासाठी आमंत्रित केल्यामुळे!

ऑलिव्हर डेमेन या नेदरलॅडच्या १८ वर्षांच्या मुलाला अनपेक्षितपणे ही संधी मिळाली. ब्लू ओरिजिन कंपनीने तिकिटाचा लिलाव बारा जूनला जगभरात सुरू केला आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. १५९ देशांतून ७,६०० लोकांची अंतराळात जाण्यासाठी वाट्टेल तितके पैसे मोजण्याची तयारी होती. बोलीचा आकडा वाढत गेला आणि २८ दक्षलक्ष डॉलर्सला  तिकीट विकलं गेलं. ऑलिव्हर यानंतरच्या यानातून अंतराळात जाणार होता पण आयत्यावेळेला ज्या माणसाने तिकिट जिंकलं त्या ग्राहकाने वेळ जुळत नसल्याने माघार घेतली आणि ऑलिव्हरची वर्णी या पहिल्यावहिल्या प्रवासी यानात लागली. अंतराळात जाणारा सर्वात तरुण मुलगा म्हणून त्याचं नाव नोंदलं गेलं.

उरलेल्या दोन प्रवाशात स्वतः जेफ बेजोस आणि त्यांचा भाऊ मार्क बेजोस.  अपोलो ११ हे यान चंद्रावर गेल्याला जुलै महिन्यात ५२ वर्ष झाली. हाच मुहूर्त साधून आज या व्यावसायिक यानाने यशस्वी अंतराळ प्रवास पार पाडला. या अंतराळप्रवासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी अॲमेझॉनचा राजीनामा देणार्‍या जेफ बेजोससाठी आजचं उड्डाण यशस्वी उद्योगाची मुहूर्तमेढ रोवल्याची चिन्ह आहेत. आता लवकरच पुन्हा हे यान अंतरिक्षात झेपावेल. अंतरिक्षात झेपावण्याची तुमचीही इच्छा असेल तर तुम्हाला फक्त $200,000 किंवा थोडेसे जास्त पैसे भरावे लागतील.

या मोहिमेबद्दल अर्थातच टिकेचं वादळही उठलं आहे. २०२० च्या अध्यक्षीय निवडणूकीला उभ्या राहिलेल्या बर्नी सॅन्डर्सनी आपली नाराजी आधीच तीव्र शब्दात व्यक्त केली आहे. ’पृथ्वीवरच्या सर्वात श्रीमंत गणल्या जाणार्‍या अमेरिकेसारख्या देशात लोकांना रोजच्या उदरनिर्वाहाची भ्रांत आहे, वैद्यकिय उपचार घेण्याकरता त्यांच्याकडे पैसे नाहीत पण त्याचं कुणाला काय? जगातली  श्रीमंत व्यक्ती अंतरिक्षात झेपावली आहे. अब्जाधीशांनी करही तेवढाच भरला पाहिजे.’ अशा अर्थी त्यांनी ट्विट केलं आहे.

बेजोसना मात्र भविष्यकाळाकडे नागरिक आणि प्रजातीचा दृष्टिकोन ठेवून म्हणून पाहण्याची आवश्यकता वाटते. आज आपण जे करतोय तो पुढच्या पिढीसाठी अंतरिक्षात काम करण्याचा पाया असेल आणि पृथ्वीवरच्या समस्या त्यामुळे काही प्रमाणात सुटतील असं त्यांना वाटतं.

२० जुलैच्या यशस्वी अंतराळ सफरीनंतर नवं क्षेत्र जेफना खुणावत असलं तरी जेफ बेजोसना तीव्र स्पर्धेलाही तोंड द्यावं लागणार आहे याची चिन्ह कधीच दिसू लागली आहेत. स्पेसएक्सचे इलॉन मस्क, व्हर्जिन गलॅक्टिकचे रिचर्ड ब्रॅनसन यांनी आधीच एक पाऊल पुढे टाकलेलं आहे.  गेल्याच आठवड्यात रिचर्ड ब्रॅनसननी अवकाशात झेप घेतली होती. तेही त्यांच्यावर होणार्‍या टिकेला तोंड देताना, त्याचं ध्येय मंगळावर मनुष्यवस्तीला हलवण्याचं असल्याचं सांगतात. मनुष्य हा एकाच ग्रहावरचा प्राणी असता कामा नये असं त्यांना वाटतं. 

आणि आजच ब्लू ओरिजिनाने  तिकिटविक्रीतून आलेल्या २८ दशलक्ष डॉलर्सपैकी १९ दशक्षलक्ष डॉलर्स अंतराळ संबंधित सेवाभावी संस्थांना देण्याचं जाहीर केलं आहे. यातील एक संस्था आहे अॲस्त्राफिमेना (AstraFemina) इथे संशोधन आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील स्त्रिया एकत्रितपणे काम करून मुलींपुढे आदर्श उभा करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. 

ब्लू शेफर्ड अंतरिक्षात झेपावून ११ मिनिटात परतही आलं. त्यातून प्रवास केलेल्या चौघांना एका अविस्मरणीय अनुभवाची सफर घडली. सर्वसामान्यांना थेट प्रक्षेपणाचा आनंद अनुभवता आला.  कितीही टिका झाली तरी आता गर्भश्रीमंतांना अंतराळाचा रस्ता खुला झाला आहे हे नाकारण्यात अर्थ नाही. आपल्यासारख्या सर्वसामान्यांनी अशावेळी ८२ वर्षाच्या  वॉली फंकला तिच्या अथक प्रयत्नांचं, चिकाटीचं फळ ६० वर्षांनी का होईना मिळालं यात आनंद मानायला हवा, साजरा करायला हवा, वय हा नुसता आकडा आहे हे खर्‍या अर्थी सिद्ध करणार्‍या या तरुणीला मानाचा मुजरा आणि पुन्हा पुन्हा अंतराळात झेपावण्याच्या तिच्या कामनेला पूर्तीची सदिच्छा!

सकाळमधील लेखाचा दुवा:

https://www.esakal.com/global/jeff-bezos-space-trip-11-minutes-know-details-ssy93





Saturday, July 11, 2020

आत्मसन्मानाची लढाई - सकाळ - सप्तरंग पुरवणी

कृष्णवर्णीय फ्लॉईडच्या पोलिसांकडून झालेल्या निर्घृण हत्येनंतर वर्णद्वेषविरोधी  निदर्शनांनी अमेरिका पेटून उठली. विशेषत: इथे वाढलेल्या स्थलांतरितांच्या मुलांनी, दुसर्‍या पिढीने पालकांना त्यांच्या तटस्थ भूमिकेचा विचार करायला भाग पाडलं आहे. स्थलांतरितांची ही दुसरी पिढी (आमची मुलं) कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही त्यांच्या कृष्णवर्णीय मित्रमंडळीना पाठिंबा देण्यासाठी  निदर्शनात भाग घेत आहेत, कृष्णवर्णीय संस्थांना मदत करत आहेत आणि त्याचवेळी पालकांना जाहिर पत्र लिहून, त्यांच्या भूमिकेला विरोध करत  याविषयावर बोलायला, विचार करायला उद्युक्त करत आहेत. त्याच विषयावरचा  लेख आहे.
                                                        

’स्पिरिट रॉक’ या शब्दातच त्याचा अर्थही सामावला आहे. ’ब्लॅक लाइव्ज मॅटर’ चळवळीला पाठिंबा दर्शविण्यासाठी माझ्या मुलीच्या शाळेत काही मुलांनी शाळेतल्या या दगडावर सुंदर संदेश लिहिले. जितक्या तळमळीने मुलांनी हे संदेश लिहिले तितक्याच पटकन त्यावर फुल्या मारून त्या संदेशाला, चळवळीला विरोध दर्शविण्याचीही खुमखुमीही कुणीतरी दाखवली. ’ब्लॅक’ खोडून तिथे ’ब्लु’ लिहिलं गेलं. प्राचार्यांनी या घटनेवर कडक टीका केली. मुलांवर कडक कारवाई केली जाईल असा इशारा दिला. यानंतर मात्र वेगळंच घडलं. ज्या प्राचार्यांनी तीव्र शब्दात मुलांना समज दिली त्यांनाच ’वर्णद्वेषी’ विधानं केल्याबद्दल निलंबित करण्यात आलं. पालक म्हणून आम्हाला अर्थातच धक्का बसला. मनात वादळ उठलं. आपल्या मुलांना ज्या शाळेत पाठवतो तिथले प्राचार्यच वर्णद्वेषी आहेत या वस्तुस्थितीने मन धास्तावलं. इतक्या वेळा कारणाकारणाने ऐकलेली प्राचार्यांची भाषणं आठवत राहिली, त्यांचे विचार आपल्याला परिचित आहेत हा भ्रमच होता की काय अशी शंका यायला लागली. त्यातही प्राचार्य निर्दोष आहेत असं सांगणारा एक गटही त्यांच्या बाजूने घोषणा देत उभा राहिला आणि त्याचवेळी निदर्शनं करणारा!

कृष्णवर्णीय फ्लॉईड पोलिसांच्या निघृणपणामुळे मृत्युमुखी पडला आणि अमेरिकेत वर्णद्वेषाविरोधी निदर्शनांचा उद्रेक उसळला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही संसर्गाचा विचारही न करता लोक रस्त्यावर उतरले यावरूनच त्याच्या तीव्रतेची जाणीव होत राहते. गावागावात या घटनेचे पडसाद उमटणं साहजिकच होतं. फक्त त्याच्या स्वरूपाची कल्पना कुणालाच नव्हती. भारतीय पालक नेहमीच अशाबाबतीत मुलांना सबुरीचा सल्ला देतात, स्वत: तटस्थ राहतात पण यावेळी स्थलांतरीतांच्या तरुण मुलांनी पालकांना नवी दृष्टी दिली. पालकांना त्यांच्या भूमिकेचा विचार करायला भाग पाडलं.

काही दिवसांपूर्वीच माझ्या मुलाने वर्णद्वेषाला बळी पडलेला कृष्णवर्णीय फ्लॉईड आणि सुरू झालेली चळवळ याबाबत त्याच्या ऑफिसच्या CEO शी थेट संपर्क साधला होता. कंपनीने काहीच भूमिका घेतली नाही, कर्मचार्‍यांना कंपनी वर्णद्वेषाला थारा देत नाही अशी खात्री देणारा संदेश पाठवला नाही याची नाराजी कंपनीतील कृष्णवर्णीयामध्ये तसंच इतरांमध्येही आहे हे नजरेला आणून दिलं. कंपनीने आपली चूक कबूल करत सर्वांशी बोलायची तयारी दाखवली. online meeting मध्ये सर्वांनीच आपल्या भावना व्यक्त केल्या. CEO नी आधी याबाबत काही न केल्याबद्दल माफी मागितली आणि नंतर अतिशय भावुक ईमेल पाठवण्यात पुढाकार घेतला. तरुण मुलांना इथल्या प्रश्नांबद्दल किती आत्मीयता आहे याचं प्रत्यय देणारं हे उदाहरण.

फक्त भारतीयच नाही तर एकूणच स्थलांतरित पालकांची इथे जन्मलेली, वाढलेली मुलं त्यांच्या आई - वडिलांच्या भूमिकांची अक्षरश: चिरफाड करतायत. वॉशिंग्टन डी. सी. मधल्या निदर्शनात माझ्या मुलाने आणि त्याच्या मित्रमैत्रिणींनी भाग घ्यायचं ठरवलं तेव्हा आम्हाला पालक म्हणून चिंता होती कोरोना विषाणूच्या संसर्गाची पण फ्लॉईडच्या मृत्यूने तरुण पिढीच्या मनातलं वादळ, व्यवस्थेबद्दलचा प्रक्षोभ रस्त्यावर आला आहे. या देशाचे नागरिक असूनही तटस्थ भूमिका घेणारे स्थलांतरित, त्यामुळे मुलांशी होणारे वादविवाद यातून सर्वांनाच आपापल्या मानसिकतेचा सखोल विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. जे होतंय ते पाहताना, ऐकताना जितकी काळजी वाटते तितकाच तरुण पिढीच्या संवेदनशीलतेचा अभिमान!

या चळवळीत इथली दुसरी पिढी सक्रिय झाल्यामुळे नकळत लक्षात येत राहतं की सर्वांच्याच मनात हा वर्णभेद नाही म्हटलं तरी आहेच. नेटफ्लिक्सने खास यूट्यूबवर प्रसिद्ध केलेल्या भागात हसन मिनाजचं प्रभावी भाषण नक्कीच विचार करायला लावणारं आहे. तो म्हणतो, ’फिरताना, धावताना, झोपलेले असताना, दार उघडताना सतत मृत्यूची भिती कृष्णवर्णीयांना भेडसावत असते. एशियन्सना प्रसिद्ध कृष्णवर्णीयांचा प्रचंड अभिमान आहे पण कृष्णवर्णीयांशी तुमची मैत्री नसते. घरात कुणी सावळ्या रंगाचं असेल तर तुम्ही त्यांना अगदी सहज कल्लू म्हणता, दाक्षिणात्य लोकांचा उल्लेख ’कल्लू’ करता.’ बहुतांशी घरात, प्रत्येक व्यक्तीला आहे तसं स्वीकारायला पाहिजे असे धडे देतानाच कधीतरी पालकांनी मुलांना कृष्णवर्णीयांपासून सावध राहण्याचाही इशारा दिलेला असतो. पालकांच्या दुहेरी भूमिकेला मुलं आव्हान द्यायला लागली आहेत. त्यांचा ढोंगीपणा त्यांच्या लक्षात आणून द्यायला लागली आहेत. फ्लॉईडच्या मृत्यूनंतर त्याचे तीव्र पडसाद अनेकांच्या घरातून उमटतायत, लेखणीतून व्यक्त होतायत.

फ्लॉईडच्या मृत्यूआधी, 2016 साली फॅलॉन्डो कॅस्टिओच्या बाबतीत घडलेल्या अशाच घटनेने ही युवा पिढी प्रचंड अस्वस्थ होती ती पालकांच्या वागण्यातून नकळत दिसणार्‍या वर्णद्वेषाने, त्यांच्या तटस्थ भूमिकेमुळे. मुलांना या विषयावर पालकांशी बोलणं अवघड जात होतं, वाद होत होते त्यामुळे पालकांशी संवाद कसा साधावा हे कळत नव्हतं त्यातूनच पत्रांची कल्पना जन्माला आली आणि Letters For Black Lives Project ही कल्पना रुजली. सुरुवातीला फक्त एशियन अमेरिकन्स मुलांचा समावेश असलेल्या या पत्रांमध्ये आता आफ्रिका, युरोप, कॅनडातील तरुणांचाही समावेश आहे. अनेक भाषांमध्ये या पत्रांचा अनुवाद झाला आहे. 2016 नंतर पुन्हा एकदा या पत्रांना उजाळा दिला जात आहे. त्यावेळच्याच कळकळीने मुलं पालकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत. या सार्‍या पत्रांचा सारांश असा आहे.

प्रिय, काका, काकू, मावशी, आत्या,
तुम्हाला कदाचित कृष्णवर्णीय मित्रमैत्रिणी नसतील, तुमचे सहकारी कृष्णवर्णीय नसतील पण आमचा जन्म इथेच झालेला आहे, आमचे अनेक मित्रमैत्रिणी, सहकारी कृष्णवर्णीय आहेत आणि या देशात त्यांना जी वागणूक मिळत आहे ते पाहून आम्हाला खूप भिती वाटते आणि त्यांची अतिशय काळजी वाटते. पोलिसांच्या हातून जेव्हा जेव्हा कृष्णवर्णीय व्यक्ती मारली जाते तेव्हा नकळत तुम्ही त्या व्यक्तीलाच दोषी ठरवता. यात तुमचा दोष नाही कारण माध्यमातून कृष्णवर्णीयांची हीच प्रतिमा आहे. चोर, गुन्हेगार! ’आम्ही या देशात आलो ते स्थलांतरित म्हणूनच आणि स्थिरावलोही; मग कृष्णवर्णीयांना हे का जमत नाही?’ हा प्रश्न कधी तुम्ही विचारला आहे तर कधी न बोलूनही तुमच्या कृतीतून हे व्यक्त होतं. म्हणूनच आज आम्हाला, इथे जन्मलेल्या, वाढलेल्या मुलांना काय वाटतं ते तुम्हाला सांगायचं आहे.
’आम्ही घरातून बाहेर पडतो तेव्हा निश्चिंत असतो, मनात फार धाकधूक नसते, पोलिस अडवतील, घरी परत येऊ की नाही अशी शंका नसते पण आमच्या कृष्णवर्णीय मित्रमैत्रिणींच्या बाबतीत तसं होत नाही. बहुतेकांचे पूर्वज गुलाम होते आणि अजूनही तशीच वागणूक त्यांना मिळते, बदल झाला आहे तो स्वरूपात. घर बांधण्यासाठी कर्ज मिळत नाही, मतदानाचा हक्क नाकारला जातो, शिक्षणापासून वंचित राखलं जातं. कृष्णवर्णीय या व्यवस्थेचे अद्यापही गुलामच आहेत. तुम्ही या देशात आलात, स्थिरावलात. कितीतरी वेळा या व्यवस्थेचा तुम्हालाही त्रास झालेला आहे. गरिबी, आतंकवाद, रोगराई, गुन्हेगारी अशा कितीतरी गोष्टींसाठी या ना त्या कारणाने तुम्हालाही दोषी ठरवलं गेलं. तुम्ही हे पचवलंत ते आमच्या उज्ज्वल भवितव्याच्या अपेक्षेने. आता आम्हाला तुमची साथ हवी आहे, तुमच्या हातात हात घालून आम्हाला कृष्णवर्णीयांचा लढा पुढे न्यायचा आहे. आपण सारेच या देशात सुखाने राहू. जसा तुमच्या मनात कृष्णवर्णीयांबद्दल ग्रह असतो तसाच इतरांच्या मनात तुमच्या - आमच्याबद्दल हे तुमच्या कसं लक्षात येत नाही? माध्यमं तुमच्या उच्चारांची नक्कल करतात, आम्हाला शाळेत चिडवलं जातं, विमानतळांवर अडवलं जातं. कृष्णवर्णीय समजून भारतीय लोकांना झालेला त्रास तुम्ही बघितला आहेच. सुरेशभाई पटेलांना कृष्णवर्णीय समजून पोलिसांनी केलेली मारहाण कोण विसरेल? झाली का कारवाई पोलिसांवर याबाबत? या अशा घटना कृष्णवर्णीयांना रोजच्याच झाल्या आहेत तरी तुम्ही तटस्थ का? कदाचित आपल्यावरही ही वेळ येईल हे का विसरता? याला खीळ घालायची असेल तर आता या अल्पसंख्याकांच्या लढ्यात तुम्हीही सहभागी व्हायला हवं.

कितीतरी घरांमधून या पत्रांनी, तरुण मुलांनी पालकांचे डोळे उघडले, दृष्टिकोन बदलला. क्विनटेरोने जेव्हा फेसबुकवरून आपल्या मित्रमंडळींना निदर्शनासाठी आवाहन केलं तेव्हा, ’All lives matter' असं सांगत तिच्या आई - वडिलांनी तिला मूर्खात काढलं. विरोध केला. वीस डॉलर्सच्या नोटेवरून एका माणसाच्या मानेवर 8 मिनिटं पोलिस गुडघा टेकून बसू शकतो यामागे असलेली पार्श्वभूमी तिच्या पालकांना समजून घ्यायची नव्हती, समजत नव्हती. मोर्च्यासाठी तिने घेतलेल्या पुढाकाराला पालकांनी विरोध केल्यावरही तिने मागे न हटण्याचा निर्धार केला. नाईलाजाने तिच्या संरक्षणासाठी म्हणून तिची आईही अखेर मोर्चात सामील झाली. कृष्णवर्णीयांची भाषणं ऐकताना त्यांची वेदना तिच्या काळजाला भिडली. तिसर्‍या दिवशी तर क्विनटेरोचे वडीलही त्या दोघींबरोबर गेले आणि शेवटच्या दिवशी तिच्या आईने कृषवर्णीयांसमोर स्वत:हून भाषण केलं. स्वत:मध्ये झालेला बदल, एक आई म्हणून आपले कसे डोळे उघडले गेले हे सांगताना ती गहिवरली, ऐकणार्‍यांनाही अश्रू आवरणं कठीण गेलं.

वॅग आणि झॅगने निदर्शनात सामील व्हायचं आहे असं सांगितलं तेव्हा चायनाहून स्थलांतरित झालेल्या बार्टेकने तीव्र शब्दांत मुलांची कानउघडणी केली. मुलांनी त्यांचा निर्धार स्पष्ट केल्यावर तर बार्टेकने घर सोडून जाण्याचीच धमकी दिली. मुलं तरीही गेलीच. बार्टेकच्या अंगाचा तिळपापड झाला पण तिथे पोलिसांनी सुरू केलेल्या अश्रूधुराच्या बातम्या यायला लागल्यावर बार्टेक मुलांना परत आणण्यासाठी धावला. इतकंच नाही तर बार्टेकने मुलांकडून कृष्णवर्णीयांचा लढा, त्यांची भूमिका समजून घेतली.

इथे जन्मलेल्या, वाढलेल्या मुलांनी इथल्या समस्यांबद्दल आपल्या पालकांनी पावलं उचलावी, ठाम भूमिका घ्यावी याचा आग्रह कृतीतून दाखवायला सुरुवात केली आहे. पालकांनी मुलांना समजून घेऊन त्यांना साथ द्यायला हवी नाहीतर मुलं एकट्याने लढा द्यायला तयार आहेतच पण मुलांना जसं आपल्या आई - वडिलांना आपला अभिमान वाटावा ही आस असते तसंच आपल्यालाही मुलांच्या नजरेतला आपल्याबद्दलचा आदर भावतोच हे विसरून चालणार नाही.

 



Tuesday, May 14, 2019

होरपळ बालमनांची


"तू बातमी ऐकली असशील म्हणून फोन केला." मैत्रिणीचा फोन आला तेव्हा मी गाडी चालवत होते.  रेडिओवरआमच्या गावातल्या, शार्लटमधील विद्यापीठातल्या गोळीबाराबद्दलची बातमी सुरु झाली आणि पोटात गोळाच आला.  तेवढ्यात मैत्रिणीचा फोन आला. तिची मुलगी तिथेच शिकायला आहे. ती सुखरुप असल्याचं कळलं आणि जीव भांड्यात पडला. आजूबाजूची, ओळखीच्यांची  मुलं तिथे शिकायला त्यामुळे नक्की काय झालं ते कळेपर्यंत, सर्वांची खुशाली कळेपर्यंत चैन पडणार नव्हतं. विद्यापीठाच्या आवारात जायला - यायला ताबडतोब बंदी घातली होती. बंदी उठेपर्यंत विद्यार्थीवर्ग आपापल्या वर्गात होता. घरी मुलांनी खुशालीचे  टेक्स्ट केल्यानंतर फोन बंद होते. एका धाडसी मुलाच्या कृतीमुळे या हल्ल्यात कमी जिवितहानी झाली. दोन जण जिवाला मुकले तर चारजण जखमी झाले. या दोनजणापैंकी एक होता रायली होवेल. रायली जिवाची पर्वा न करता मारेकर्‍यावर चालून गेला. स्वत:च्या जिवाचं मोल देत रायलीने मारेकर्‍याला जमिनीवर लोळवलं, तिथे असलेली इतर मुलं रायलीच्या मदतीला धावली. पडलेल्या मारेकर्‍याला त्यांनी धरुन ठेवलं. पण पडता पडता मारेकर्‍याने झाडलेल्या गोळीत रायली मृत्यूमुखी पडला. २१ वर्षाच्या रायली होवेलच्या कौतुकास्पद कामगिरीबद्दल बोलताना प्रत्येकाचेच डोळे भरुन येतात, शब्द अपुरे पडतात. पळा, लपा किंवा धैर्याने मारेकर्‍याचा सामना करा ही तीन सूत्र हिंसेला तोंड देण्याच्या प्रशिक्षणात मनावर बिंबवली जातात. यातील रायलीने निवडलेल्या पर्यायाचं त्याच्या आई - वडिलांना आश्चर्य वाटत नाही तसंच त्याला ओळखणार्‍या सर्वांनाच.  त्याच्या कामगिरीचा सन्मान करण्यासाठी सरकारनेही उचित पाऊल उचललं. सरकारी इतमामात गावी परतलेल्या रायलीच्या पार्थिवाची वाट पाहत नागरिक दोन तास  साश्रू नयनांनी उभे होते. 


अमेरिकेन जनतेपुढील ही समस्या गावागावात प्रत्येक घराच्या दारासमोर उभी आहे. आपल्या गावात, शाळेत असा प्रकार होणार नाही हा निव्वळ भ्रम राहिलेला आहे. UNCC मधील घडलेल्या घटनेआधी काही महिने आधी माझ्या मुलीच्या शाळेतला हा प्रसंग. ७ वीत शिकणार्‍या एका भारतीय विद्यार्थ्याने वर्गातल्या बाकावर लिहिलं. "I’ll get the guns by Thursday. Pitch in $200 for 5 Swisses." मुलांनी खोटं बोलणं, मारामारी करणं, इतरांना चिडवणं, वर्गातल्या बाकांवर, भिंतींवर मुलामुलींची नावं लिहिणं एवढीच मजल या वयात मुलं गाठतात असं गृहीत धरणं कालबाह्य झाल्यासारखं ही वाक्य वाचताना वाटलं होतं. या भारतीय विद्यार्थ्याने लिहिलेल्या या संदेशाचं  कुणीतरी छायाचित्र घेतलं आणि बातमी सर्वत्र पसरली. मुलाची चौकशी सुरू झाली. गंभीर स्वरूपाची हरकत असेल तर मुलांना तीन दिवस शाळेत यायला मनाई केली जाते पण त्याच दरम्यान  फ्लोरिडा राज्यातील  शाळेत घडलेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे या प्रसंगाचे पडसाद तीव्र होते त्यामुळेच परिणामही. मुख्याध्यापकांनी झालेल्या घटनेची पोलिसांकडून चौकशी होऊन जास्तीत जास्त शिक्षा सुनावली जाईल याची ग्वाही दिली. त्याचाच परिणाम म्हणून ३ दिवस शाळेत न येण्याच्या शिक्षेवर न थांबता या मुलाला सुधारणागृहात दाखल केलं गेलं. या मुलाची पुढची शैक्षणिक प्रगती गोठल्यासारखीच आहे.  सुधारगृहाचा ठप्पा लागल्यावर त्याच्याकडे पाहण्याची दृष्टी बदलली जाणार, त्याला मिळणारी वागणूक बदलणार, महाविद्यालयीन प्रवेश ही तर पार पुढची गोष्ट झाली. ही आम्ही जवळून पाहिलेली घटना. अशावेळेस  पालकांना मन घट्ट करुन अशी परिस्थिती उद्भवली  तर काय करायचं यावर मुलांशी बोलावं लागतं. मुलांच्या डोळ्यातले, मनातले प्रश्न वाचताना आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देताना नको वाटतं, जीव तुटतो.   कुणी कुणाचा जीव कसं घेऊ शकतं या निरागस प्रश्नाला उत्तर देताना या  कोवळ्या मनांना, अजाण मुलांना आपण अकाली  प्रौढत्वाकडे वळवतोय ही जाणिव वेदनादायी असते. पण या काळाचं हे वास्तव आहे. अशा घटना आणि मुलांवर होणारी कारवाई याचं प्रमाण शाळांतून खूप मोठं आहे. दुर्देवी घटनांची नक्कल मुलांना का करावीशी वाटत असेल? मुलं माध्यमातून या गोष्टी पाहत असतात, ऐकत असतात त्याचा नकळत मनावर परिणाम होत असावा का? असंच आपणही करावं असं वाटत असेल का?  शाळांना सातत्याने घडणार्‍या अशा घटनांमुळे यावर कडक कारवाई करणं भागच आहे . पण विद्यार्थ्यांना गंमत म्हणून केलेल्या उद्योगाच्या परिणामाची कल्पना तरी असेल का?  अशा घटना घडल्या की मन विषण्ण होतं. नानाविध उपायांची चर्चा होते. शिक्षकांच्या हातात बंदूका सोपवायला हव्यात या अंतिम निष्कर्षालाही बर्‍यांचदा खूपजणं  येतात.  पण शिक्षकांनी शिकवायचं की बंदूक चालवायला शिकून मुलांच्या सुरक्षिततेचीही काळजी करायची हा प्रश्नही त्याबरोबर येतोच.

मुळात मुलांच्या हातात बंदुका येतातच कशा हा सर्वसामान्य लोकांना पडणारा प्रश्न. कायद्याने वयाच्या १८ व्या वर्षांपर्यंत बंदूक विकत घेता येत नाही. आता तर काही राज्यात २१ ही वयोमर्यादा झाली  आहे पण यातून पळवाटा आहेतच. सर्वेक्षणातून जवळजवळ ६०% विद्यार्थ्यांनी बंदूक पाहिजे असेल तर सहज मिळू शकते अशी कबुली दिली आहे. बर्‍यांचदा घरातील मोठ्या माणसाची बंदूक मुलांच्या हातात पडते.  कधी हातात आलेल्या बंदुकीचा सहज वापर केला जातो. कधी मानसिक विकृतीमुळे बंदूक वापरली जाते तर काही वेळेला केवळ बढाई मारण्यासाठी शाळेत मुलं बंदूक आणतात. बर्‍याचदा आधीच कुणाच्यातरी लक्षात येतं आणि त्यांच्या हातातील बंदूक काढून घेतली जाते. कारवाई होते. पण जेव्हा असं होत नाही तेव्हा कितीतरी निष्पाप कळ्या उमलण्याआधीच संपतात. अंदाधुंद गोळीबार करुन ही मुलं काय साध्य करतात हा जसा प्रश्न आहे तसंच पूर्वी झालेल्या गोळीबारांचा पद्धतशीर अभ्यास करुन हिंसेची तीव्रता कशी वाढेल याचं व्यवस्थित नियोजन करण्याची  मुलांची मानसिकता चिंताजनक आहे. २००७ साली व्हर्जिनिया पॉलीटेक्निक मध्ये झालेल्या गोळीबारात ३२ मुलं आणि त्यांचे काही शिक्षक मारले गेले. या मुलाने आधीच्या गोळीबाराचा सखोल अभ्यास केला होता आणि अधिक मुलांचे बळी जाण्यात ती मुलं कुठे कमी पडली हे पाहून त्याप्रमाणे नियोजन करण्याची काळजी घेतली होती.

२०१२ साली सॅंडीहूक  प्राथमिक शाळेतली २० चिमुरडी मुलं आणि ६ शिक्षक अशाच गोळीबाराला हकनाक बळी पडले. पण यावेळेस जे झालं ते केवळ पुरेशी काळजी घेऊनही नविन आणि त्यादिवशी वर्गावर असलेल्या बदली शिक्षिकेला याबद्दल माहिती नसल्याने कारण जशी गोळीबाराची संख्या वाढली आहे त्याप्रमाणेच अशा परिस्थितीत काय पावलं उचलायला हवीत त्यासाठी केल्या जाणार्‍या प्रयत्नांचीही. याही शाळेत प्रशिक्षण दिलं होतंच. पण ज्या वर्गातील मुलं बळी पडली त्यातील एका वर्गात  शिक्षिका नविन होती. काहीतरी विपरीत घडतंय ही सूचना मिळताच तिने वर्गाचं दार  लावण्याऐवजी प्रथम  मुलांना बाकड्याखाली लपवलं. त्यानंतर दार बंद करायला ती गेली तोपर्यंत बंदूकधारी मुलाने दार उघडलं. मुलं कुठे आहेत या त्याच्या प्रश्नावर तिने वर्गात कुणी नाही हे उत्तर दिलं. त्या मुलाने तिच्यावर  गोळी झाडली आणि लपलेल्या चिमुरड्यांचा भयाने थरकाप उडाला.  मुलं सैरभैर झाल्यासारखी धावली. आणि बंदूकधारी मुलाने अंदाधुंद गोळीबार केला. काही मुलांचा जीव वाचला काहींनी जीव गमावला.  दुसर्‍या वर्गात फक्त त्यादिवशी शिकवण्यासाठी आलेली शिक्षिका होती. दुर्देवाने तिच्याकडे दाराला कुलूप लावण्यासाठी किल्ली नव्हती. प्रशिक्षणातील सर्व बाबी योग्यं तर्‍हेने अमलात आणल्यामुळे इतर वर्गातील मुलं सुरक्षित राहिली आणि या दोन वर्गातील बहुतेक मुलांचा अंत झाला.

अशा घटना आता दैनदिन जीवनाच्या घटक होऊ लागल्या आहेत पण याची सुरुवात झाली ती २० एप्रिल  १९९९ साली  कोलोरॅडो राज्यातील लिटीलटन कोलंबाईन हायस्कूल मध्ये दोन तरुणांनी अंदाधुंद केलेल्या गोळीबारात १३ मुलं मारली गेली तर ३० हून अधिक जखमी झाली तिथून. या नंतर अनेक राज्यात शाळांना अशा प्रसंगांना सामोरं जायला लागलं आहे, लागत आहे. जिथे जिथे जिवितहानीचं प्रमाण जास्त आहे त्या घटनांची माहिती माध्यमातून लोकांपर्यंत पोचली, त्याची चर्चा होत राहिली. आत्तापर्यंत ७००० हून अधिक मुलं यात बळी पडली आहेत. यावर उपाय शोधण्याचे अथक प्रयत्न चालूच आहेत. बंदुकांवर नियंत्रण आणणं हा महत्वाचा उपाय NRA नॅशनल रायफल असोसिएशनच्या  वर्चस्वामुळे आणि त्यात गुंतलेल्या सर्वांच्या हितसंबंधामुळे  दरवेळी मोडीत निघतो. पोटचे जीव गमावल्यावर पालक पेटून उठतात, कायद्यात बदल करण्यासाठी धडपडतात. त्यांना सर्वसामान्य साथ द्यायचा प्रयत्न करतात. यात भर पडली आहे विद्यार्थ्यांची.  मुलंही आता जाब विचारायला लागली आहेत, विरोधाची पावलं उचलत आपला आवाज मोठ्यापर्यंत पोचवण्याचा  प्रयत्न करत आहेत. त्याचं उदाहरण म्हणजे, March of Our Lives. गेल्यावर्षी विद्यार्थ्यांनीच सुरु केलेली ही संघटना त्यांच्या पिढीला ज्या असुरक्षिततेला तोंड द्यावं लागतंय ते बदलण्याचा निश्चय करुन प्रयत्न करत आहे. मागच्यावर्षी फ्लोरिडा राज्यातील डग्लस शाळेत घडलेल्या दुर्देवी घटनेतून या लढ्याची सुरुवात झाली आहे.   सरकारने या समस्येवर पावलं उचलावीत यासाठी विद्यार्थी जिवाचं रान करत आहेत.  शस्त्र नियंत्रण कायद्यात बदल आणि शस्त्र विक्री अगोदर त्या व्यक्तीची पूर्ण चौकशी. या दोन मुख्य मागण्या पुर्‍या होत नाहीत तोपर्यंत ही चळवळ चालूच ठेवण्याचा विद्यार्थ्यांचा निर्धार आहे March of Our Lives ची अलिकडची  चित्रफित हृदयद्रावक  आहे. या चित्रफितीत एका कार्यालयात गोळीबाराला तोंड कसं द्यायचं त्याचं प्रशिक्षण सुरु होताना दाखवलं आहे.  प्रशिक्षणासाठी तज्ज्ञ म्हणून निमंत्रित केलेली व्यक्ती पाहून कर्मचार्‍यांना जसा धक्का बसतो तसाच चित्रफित पाहणार्‍यालाही. ती तज्ज्ञ व्यक्ती आहे, शाळकरी मुलगी!   ही छोटी मुलगी प्रौढांना गोळीबाराला तोंड द्यायला काय करायचं ते  सांगताना दाखविली आहे.  शेवट होतो त्या मुलीच्या शिक्षिकेने सांगितलेल्या खालील ओळींनी.

"Lockdown, lockdown let's all hide,

Lock the doors and stay inside,

Crouch on down, don't make a sound,

And don't cry or you'll be found."

जनरेशन लॉकडाऊन असं या चित्रफितीचं नाव आहे.


अमेरिकन शालेय जीवनात, अभ्यास आणि विविध विषयांचं ज्ञानार्जन  हा जसा अविभाज्य भाग आहे तसं हिंसेला तोंड देण्याचं प्रशिक्षण हा विषयही आता अनिवार्य झाला आहे. चुकीच्या हातांमध्ये बंदूक पडू नये याबाबात कायदा करण्याऐवजी राजकारणी मुलांना प्रशिक्षण मिळत आहे यातच समाधान मानत आहेत. बाह्य घटकांकडे बोट दाखवताना जी मुलं या मार्गावर पाऊल टाकतात त्यांचे पालक मुलांची मनं ओळखायला कमी पडत आहेत ते का,  त्या मुलांचे शिक्षक, मित्रमैत्रिणी यांनाही अशा मुलांच्या मनांचा थांगपत्ता लागत नाही तो का याकडेही लक्ष देणं भाग आहे. या समस्येवर  नक्की उपाय काय हे काळच ठरवेल पण तोपर्यंत किती बालमनं यात होरपळून निघणार, किती आपल्या जीवाला मुकणार हाही प्रश्न अनुत्तरीतच राहणार!

Thursday, November 8, 2018

Sunday, February 28, 2016

सुपरबोल

(सुपरबोल. दरवर्षी हा खेळ खेळाइतकाच किंबहुना खेळापेक्षा इतर कारणांनीही गाजतो. गेल्या आठवड्यात

रविवारी खेळला गेलेला सुपरबोलही याला अपवाद नाही. सुपरबोलचं हे ५० वं वर्ष. मध्यांतरातील कार्यक्रमासाठी गायलेली बियॉन्से या वेळेला वादाच्या भोवर्‍यात अडकली आहे
.)

फूटबॉल या खेळाच्या विजेतेपदासाठी दरवर्षी होणारी चुरस म्हणजे सुपरबोल. राष्ट्रीय फूटबॉल संघटनेत (NFL) असलेले ३२ संघ दोन गटात विभागलेले आहेत. ते राष्ट्रीय  फूटबॉल संघ (NFC) आणि अमेरिकन फूटबॉल संघ (AFC) या नावाने ओळखले जातात. दरवर्षी सप्टेंबर ते डिसेंबर महिन्यात हे संघ सुपरबोलपर्यंत पोचण्यासाठी खेळतात. आणि फ्रेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या रविवारी अंतिम फेरीपर्यंत पोचलेले दोन संघ विजेतेपदासाठी लढतात.  फेब्रुवारी महिन्याचा  पहिला रविवार ’सुपरबोल सन्डे’ म्हणूनच ओळखला जातो. या ७ फेब्रुवारीला लढत होती कॅरोलायना पॅंन्थर आणि डेनवर ब्रॉन्को या दोन संघामध्ये.

हा खेळ जितका खेळासाठी प्रसिद्ध आहे तितकाच अनेक कारणांसाठी. काहींना खेळाची आवड म्हणून तर काहीजण केवळ जाहिरातीसाठी सुपरबोल पाहतात. मध्यांतरात होणार्‍या कार्यक्रमाचं आकर्षण असणारा वर्गही खूप मोठा आहे. मायकल जॅक्सन, मॅडोना, व्हीटनी ह्युस्टन अशा एकाहून एक नामवंत कलाकारांनी या वेळेला आपले कार्यक्रम सादर केले आहेत.

या वेळेला होते ब्रुनो मार्स, कोल्डप्ले आणि पॉपसिंगर बियॉन्से. बियॉन्से आणि तिच्या सहकारी नर्तिकानी घातलेल्या पोशाखावरून, गाण्यातील शब्दांवरुन सध्या हवा तापलेली आहे. आफ्रिकन - अमेरिकन नागरिकांनी स्वत:च्या हक्कासाठी दिलेल्या लढ्यातील  एक चळवळ म्हणजे ब्लॅक पॅन्थर्स चळवळ. बियॉन्से आणि सहकारी नर्तिकांचा काळ्य़ा रंगाचा पेहराव आणि टोपी या दोन्ही गोष्टी त्या चळवळीतील कार्यकर्त्यांसारख्या होत्या,  नृत्यातून मालकम एक्स या मानवी हक्कासाठी जागरुक असलेल्या आफ्रिकन - अमेरिकन नेत्याबद्दलचा आदर साकारला, तसंच नृत्यातील  मुठी वळवून उंचावलेले हात म्हणजे ’ब्लॅक पॉवर सॅल्यूट’ ची आठवण करुन देण्याचा प्रयत्न होता. १९६८ च्या ऑलिम्पिकमध्ये पदक वितरणाच्या वेळेला  अमेरिकन राष्ट्रगीत सुरु झाल्यावर आफ्रिकन - अमेरिकन विजेत्यांनी मुठी उंचावल्या होत्या तशाच या नृत्यात वापरल्या गेल्या.  बियॉन्सेने सादर केलेल्या नृत्यानंतर चालू झालेल्या या चर्चेत भर पडली ती सुपरबोलच्या आधी म्हणजे शनिवारी बियॉन्सेने तिच्या चाहत्यांसाठी उपलब्ध करुन दिलेल्या  ’फॉरमेशन’  हे शीर्षक असलेल्या गाण्याने. या गाण्यातून  आफ्रिकन - अमेरिकन लोकांवर पोलिसांकडून केले जाणारे अत्याचार थांबवावे असं सुचविण्यात आलं आहे. ते दाखविताना एक छोटा मुलगा रस्त्यावर पोलिसांच्या समोर हाताने थांबण्याची खूण करत उभा आहे असं दाखविलं आहे आणि पोलिसांच्या मागे असलेल्या भिंतीवर ’स्टॉप शूटिंग अॲट अस’ हे वाक्य दिसतं. गाण्यात, पाण्यात बुडणार्‍या पोलिसांच्या गाडीवर बियॉन्से बसलेली दिसते.  या गाण्यातून बियॉन्सेने पोलिसांची प्रतिमा  धुळीला मिळवली असा तिच्यावर आरोप होत आहे. जे पोलिस तिला, जनतेला संरक्षण देतात त्यांची बदनामी अशारितीने करुन बियॉन्सेने काय साधलं असं लोकांना वाटतं.  वर्णभेदाविरुद्ध विरोध दर्शविण्याची सुपरबोल ही योग्यं जागा नाही या मताच्या लोकांनी राष्ट्रीय फूटबॉल संघटनेच्या कार्यालयावर मोर्चा नेण्याचं निश्चित केलं आहे.

या आधी सुपरबोलच्या इतिहासात गाजलेला प्रसंग म्हणजे  जॅनेट जॅकसन आणि जस्टीन टिंम्बरलेक यांच्या गाण्याच्या वेळेला घडलेली घटना. जस्टीन टिंम्बरलेकच्या हातून ’रॉक युवर बॉडी’ गाणं म्हणताना जॅनेटने घातलेलं जॅकेट चुकून ओढलं गेलं, फाटलं आणि त्यामुळे वक्षस्थळ उघडं पडलं. लाखो लोकांनी हा प्रसंग दूरदर्शनवर पाहिला. वार्डरोब मालफंक्शन म्हणून कुप्रसिद्ध झालेला हा किस्सा कितीतरी महिने वादळ उठवणारा ठरला किंबहुना सुपरबोल म्हटलं की प्रथम या प्रसंगाचीच आठवण आज १२ वर्ष होऊन गेली तरी लोकांच्या मनात ताजी होते. या प्रसंगाची परिणिती म्हणून कोणत्याही कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण बंदच झालं. असे अनपेक्षित लाजिरवाणे प्रसंग टाळण्यासाठी  थेट प्रक्षेपण म्हणून जे आपण पाहतो ते काही क्षणानंतर दाखविलेलं दृश्य असतं. हा प्रसंग ज्यांनी दूरदर्शनवर पाहिला नाही त्यापैकी एक होते जावेद करीम. २००४ साली तो प्रसंग पुन्हा पाहण्यासाठी काही मार्गच नव्हता. आणि नक्की काय घडलं याचं कुतूहल असलेल्या जावेद आणि त्यांचे मित्र स्टीव्ह आणि चॅड यांच्या मनात लोकं स्वत:च चित्रीकरण अपलोड करु शकतील असं संकेतस्थळ निर्माण करण्याची कल्पना आली. या कल्पनेचं मूर्त्य रुप म्हणजेच यु ट्युब. एकाच प्रसंगाने प्रसारमाध्यमामध्ये घडलेले हे २ मोठे बदल!

 सुपरबोल जसा अशा घटनांनी गाजतो तितकाच तो प्रसिद्ध आहे जाहिरातींमुळे. सुपरबोल प्रक्षेपणाच्या दरम्यान  जाहीरात झळकण्यासाठी कंपन्यांना ३० सेकंदांसाठी जवळजवळ ३० लाख डॉलर्स मोजावे लागतात. ’ क्रॅश द सुपरबोल’ अशी स्पर्धाही फ्रिटो ले ही चिप्स उत्पादक कंपनी घेते. २०१६ हे या स्पर्धेचं शेवटचं वर्ष होतं. डोरीटो चिप्सच्या जाहीरात स्पर्धेत हातात कॅमेरा आणि कल्पना असलेल्या कुणालाही भाग घेता येत होता. शेवटच्या वर्षात कंपनीने विजेत्याला हॉलिवूडमध्ये प्रवेश मिळवून देण्याचीही जबाबदारी उचलली आहे. २००६ पासून सुरु झालेल्या या स्पर्धेत २०१३ पासून जभभरातून  कुणीही भाग घेऊ शकत होतं.  आलेल्या जाहिरातीतील कमीत कमी १ जाहिरात या खेळादरम्यान दाखविण्य़ाची हमी कंपनीची. त्याव्यतिरिक्त युएसए टुडे च्या सर्वेक्षणात सर्वात जास्त गुण मिळालेल्या जाहिरातीला ४ लाख ते १० लाख डॉलर्सचं बक्षीसही कंपनीकडून मिळत होतं. या अखेरच्या वर्षी ४५०० स्पर्धकांनी यात भाग घेतला. त्यातील ५० स्पर्धकांनी उपांन्त्यपूर्व फेरी गाठली. उपांन्त्यफेरीतील ३ स्पर्धकांपैकी विजेती ठरली ती ’डोरीटोज डॉग्ज’ जाहीरात. ३ कुत्र्यांना डोरिटो चिप्स खायची इच्छा असते आणि ती ते कशी पुरी करतात ते विनोदीपद्धतीने दाखवलेली ही जाहिरात. अवघ्या १००० डॉलर्समध्ये पूर्ण झालेल्या जाहीरीतीने जेकब चेसला हॉलिवूड मध्ये प्रवेश तर मिळालाच पण त्याचबरोबर १० लाख डॉलर्सही.

युएसए टुडे च्या सर्वेक्षणानुसार व्यावसायिक जाहिरातींमध्ये या वर्षी हंडे कंपनीने बाजी मारली. गाडी आणि गाडीतील अत्याधुनिक यंत्रणेची जाहिरात करणार्‍या  जाहीरातीत मुलगी तिच्या मित्राबरोबर पहिल्यांदाच बाहेर जात आहे. वडील आग्रहाने नवीन हंडे गाडीची किल्ली मुलाच्या स्वाधीन करतात. गाडीमधील ’कार फाईंडर’ मुळे गाडी कुठे आहे ते वडिलांना कळत राहतं आणि त्या त्या ठिकाणी  ते पोचतात, दोघांना ’एकांत’ मिळूच देत नाहीत अशी ही जाहिरात. मुलगा कंटाळून थोड्याच वेळात मुलीला घरी सोडतो. आणि बाबा मुलीला विचारतात, ’मग काय केलं तुम्ही आज?’ आणि जाहिरातीचा शेवट होतो - ’बिकॉज डॅड गोट  डू व्हॉट डॅड गोट टू डू’ या वाक्याने. सुपरबोल मध्ये दाखविल्या गेलेल्या जाहिरातीत विनोद, प्राणी आणि सेलिब्रेटी ह्या ३ गोष्टींचा वापर प्रामुख्याने केलेला होता.

सुपरबोल म्हटलं की जाहिराती, वादग्रस्त घटना जितक्या महत्त्वाच्या तितकेच प्राणीही. दरवर्षी प्राणीही ही स्पर्धा कोण जिंकेल याचा अंदाज वर्तवायला पुढे सरसावतात. एका प्राणी संग्रहालयातील माकडांनी म्हणे त्यांच्यासमोर ठेवलेल्या चिठ्ठ्यांतून कॅरोलायना पॅन्थर लिहिलेला कागद उचलला तर दुसर्‍या प्राणिसंग्रहालयात कासवं संथगतीने मार्गक्रमणा करत ब्रान्को पर्यंत पोचली.  टेडी बेअर नावाच्या साळूचे  फेसबुकवर ४५००० चाहते आहेत तर यु ट्यूबवर २४००० अनुयायी. साळूचे आत्तापर्यंत ४ पैकी ३ अंदाज अचूक ठरले. यावेळीही डेनवर ब्रान्को जिंकतील हा साळूचा अंदाज खरा झाला.

या सगळ्यात सर्वसामान्यांनी तरी का बरं मागे राहावं? पैजा मारण्याची चढाओढ सुपरबोलच्या वेळी खेळात रंगत भरते. कुठला संघ जिंकेल यावरच पैजा मारण्याइतके लोक अल्पसंतुष्ट नाहीत. या वर्षी सुपरबोल होता कॅलिफोर्नियामध्ये. तिथे भूकंप होईल का, बियॉन्से कार्यक्रम सादर करेल तेव्हा कोणत्या रंगाच्या चपला घालेल, खेळ दूरदर्शनवर दाखविला जात असताना शहराला अभिमान असलेला असलेला गोल्डन गेट पूल कितीवेळा दाखवला जाईल, पेटन मॅनिंग निवृत्ती जाहीर करेल का, केली तर ते सांगताना त्याच्या डोळ्यात अश्रू तरळतील का असे  प्रश्न घेऊन एकापेक्षा एक पैजा मारल्या गेल्या. या पैजांमुळे काही काही वेळा कंटाळवाणा होऊ लागलेल्या खेळातही रंगत यायला लागते. तसंही कुणाच्या मनोरंजनाची काय साधनं असतील हे ज्याचं त्यानेच तर ठरवायचं.

आता राहता राहिले खेळाडू. कोणत्याही गोष्टीत यश मिळविण्यासाठी प्रत्येकाकडे ’लाभदायक’ म्हणून काहीतरी गोष्ट असतेच. दोन्ही संघातील खेळाडू याला अपवाद नाहीत. कुणी काळ्या रंगाचे बूट घालतं तर कुणी खेळताना च्युईंगम चघळतं, ते कडक राहिलं तर आपण जिंकणार अशी त्या खेळाडूला खात्री वाटते.

एक ना अनेक... सुपरबोल आणि त्याचे हे असे भन्नाट किस्से! आता काही काळ बियॉन्से प्रकरण चघळायचं आणि नंतर वाट पाहायची ती पुढच्या वर्षीच्या सुपरबोलची. का? अर्थात या सार्‍याच कारणांकरिता...

मोहना प्रुभुदेसाई - जोगळेकर
mohanajoglekar@gmail.com


Tuesday, February 9, 2016

ट्रम्प नावाचं बेफाम वादळ

राजकारणावर तज्ञ व्यक्ती अभ्यासपूर्ण लिहितात, बोलतात तसंच  सर्वसामान्यही या विषयावर जिव्हाळ्याने,
हिरीहिरीने मत प्रदर्शित करतात. बहुतांशी सर्वांचं  राजकारणाबद्दल स्वतंत्र आणि ठाम मत असतं आणि प्रत्येकाला ते हक्काने मांडायलाही आवडतं.  अगदी हेच सध्या अमेरिकेतील निवडणुक उमेदवारांच्या बाबतीत चालू आहे.  ओबामांची ८ वर्षाची कारकीर्द आता संपणार आहे. ८ नोव्हेंबर २०१६ ला अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष निवडून येतील. रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक पक्षातील अंतिम उमेदवार कोण ते फेब्रुवारी ते जून या दरम्यान  निश्चित होईल. सध्या वेगवेगळ्या राज्यातील उमेदवारांमध्ये होणार्‍या चर्चासत्रातून कोणता उमेदवार कोणत्या राज्यात पुढे आहे याची चाचपणी सुरु आहे. सुरुवातीला डेमोक्रॅटिक पक्षातून हिलरी क्लिंटन निवडणुकीला उभ्या राहणार आहेत का नाही याची प्रचंड उत्सुकता जनमानसात होती, त्यांनी तो निर्णय घेतल्यावर  इतर उमेदवारातून अंतिमत: त्यांची निवड होईल का या प्रश्नाची चर्चा व्हायला लागली आणि अचानक सर्वांचा रोख वळला तो  रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डॉनल्ड ट्रम्प यांच्याकडे.

रिपब्लिकन पक्षांमधून जेब बुश (माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांचे बंधू) यांच्यासह ११ उमेदवार या चुरसीमध्ये सामील झालेले आहेत. हिलरी क्लिंटन यांच्या विरुद्ध यातील समर्थपणे कोण उभं ठाकतं याबद्दल उलट - सुलट मतप्रदर्शन होत असतानाच डॉनल्ड ट्रम्पनी रिंगणात उडी मारली. त्यांनी ही उडी घेतली ती बहुधा मैदान गाजवण्याच्याच इराद्याने.  विरुद्ध असला तरीही डेमोक्रॅटीक पक्ष डॉनल्ड ट्रम्पवर खूश आहे. कारण? डॉनल्ड ट्रम्प तोंड उघडतात ते चौफेर फटकेबाजी करण्यासाठीच.  त्यामुळे रिपब्लिकन पक्षातील इतर उमेदवारांकडे कुणाचं लक्षच जात नाही. त्यांची मतं, योजना जनतेच्या मनात फार काळ रेंगाळत नाहीत कारण डॉनल्ड ट्रम्प सनसनाटी विधान करुन स्वत:कडे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी होतात. या चौफेर फटकेबाजीतील ताजं  उदाहरण म्हणजे बेकायदेशीर रित्या मेक्सिकन लोकांनी अमेरिकेत प्रवेश करु नये म्हणून सीमेवर भिंत बांधण्याची त्यांनी केलेली घोषणा. या घोषणेने अमेरिकेत खळबळ माजली. मेक्सिकन जनतेत अर्थातच असंतोष पसरला.  काहीजण खूष झाले तर काहींना डॉनल्ड ट्रम्प ’... तारे तोडतायत’ असं वाटलं. प्रत्येकाला या भिंत बांधणीबद्दल आपलं  मत व्यक्त करावंसं वाटायला लागलं.  अगदी प्राथमिक शाळेत जाणारा विद्यार्थीही या  घोषणेने पेचात पडला. या मुलाने लिहिलेला  निबंधच त्याच्या शिक्षिकेने प्रसिद्ध केला. हा छोटा मुलगा म्हणतो,
"मला स्वप्न पडलं की डॉनल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष होणार नाहीत पण ते झाले तर आशियाई, मेक्सिकन आणि आफ्रिकन लोकांना त्यांच्या देशात परत जावे लागेल.  या देशात फक्त १२००० लोक राहतील. बरेच भारतीय अभियंते (इंजिनिअर) आहेत. ते इथे नसतील तर तंत्रज्ञान नसेल. आणि तंत्रज्ञान नसेल तर नेटफ्लिक्स नसेल. अशा देशात आवडेल राहायला तुम्हाला? अर्थात नाही!"  गमतीचा भाग सोडला तरी डॉनल्ड ट्रम्प ही वल्ली चर्चेचा विषय होण्यात यशस्वी झाली आहे.

कोण आहेत हे ट्रम्प? यशस्वी उद्योजक आणि करोडपती!  दूरदर्शनवरच्या त्यांच्या  ’अॲप्रेंटीस’ या कार्यक्रमामुळे ते घराघरात पोचले.  १६ ते १८ व्यावसायिक या कार्यक्रमात भाग घेतात, स्वत:ला सिद्ध करण्यासाठी.  प्रत्येक भागाच्या शेवटी ट्रम्प त्यातील एकाला काढतात तेच  ’यू आर फायर्ड’ म्हणत. हे त्यांचं वाक्य खूप प्रसिद्ध झालं तसा त्यांचा एक घाव दोन तुकडे हा खाक्याही. निवडणुकीच्या रिंगणातही ते मांडत असलेली विधानं लोकांकरता एकाचवेळी खळबळजनक, धक्कादायक तशीच मनोरंजकही आहेत .

ट्रम्प त्यांच्या बोलण्याने लोकांची करमणूक करतात त्याचवेळी एखाद्या गटाला नाखूष. मेक्सिकन लोकांनी अमेरिकेत प्रवेश करु नये म्हणून सीमेवर भिंत बांधायचं ते जाहिर करुनच ते थांबले नाहीत तर त्याचबरोबर  मेक्सिकन अमली पदार्थ या देशात आणतात, त्यांच्यामुळे या देशातले गुन्हेगार वाढतात आणि ते बलात्कारी आहेत असं त्यांना वाटतं. काही मोजकेच सभ्य मेक्सिकन या देशात आहेत असं म्हणून त्यांनी मेक्सिकन लोकांचा रोष ओढवून घेतला आहे. मेक्सिकन जनते नंतर ते मुसलमानांवर ताशेरे झोडतात. जोपर्यंत अमेरिकन नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अंधातरी आहे तोपर्यंत मुसलमान लोकांना अमेरिकेत येण्यासाठी बंदी घालावी या विधानाने अमेरिकेत तर खळबळ माजलीच पण ब्रिटीश सरकारला ट्रम्पना ब्रिटनमध्ये प्रवेश करण्यास बंदी आणावी की काय असं वाटून गेलं. देशाच्या भविष्याच्या बाबतीत त्यांच्या योजना ह्या अशा आहेत पण त्या पूर्णत्वाला कशा जातील या बाबत निश्चित आराखडा त्यांच्याकडे नाही त्यामुळे वास्तवापासून फारकत घेतल्यागत त्यांची योजना आणि विधानं आहेत असं मानलं जातं. हे कमी असल्यासारखं रिपब्लिकन पक्षातर्फे उभे असलेले ट्रम्प राजकारणातील व्यक्तींना वेळोवेळी आपण पैसे दिल्याचं अभिमानाने सांगतात आणि त्यांना पाहिजे ती कामं  देखील या व्यक्ती त्यामुळे करतात याचा दाखला देतात. हिलरी क्लिंटनना पैसे दिल्याचे ते मान्य करतात तेव्हा ट्रम्प यांचं कोणतं काम हिलरीनी केलं असेल असा साहजिकच प्रश्न मनात येतो. त्यावर ते सांगतात की मी हिलरीना लग्नाला हजर राहण्याचं आमंत्रण दिलं आणि विरुद्ध पक्षातील असूनही हिलरी ते नाकारु शकल्या नाहीत.

हल्लीच आयोवा येथील रिपब्लिकन पक्षाच्या वाद - विवाद सभेत सहभागी होण्याचं नाकारत त्यांनी मोठा जुगार खेळला आणि तो जिंकलाही. आयोवा येथील वाद - विवाद हा उमेदवारांसाठी अतिशय महत्वाचा मानला जातो. कारण तेथील प्राथमिक निवडणुक जिंकणारा उमेदवार राष्ट्राध्यक्ष होतो असा बर्‍याच वेळा आलेला अनुभव. पण इथे येण्याचंच त्यांनी  नाकारलं ते मेगन केली या स्त्री वार्ताहारामुळे. आधीच्या एका वाद - विवादात  मेगनने त्यांच्याशी संवाद साधताना म्हटलं, की ते राजकीय व्यक्तींप्रमाणे तोलून मापून न बोलता त्यांना जे वाटतं ते बोलतात यामुळे लोकप्रिय आहेत पण कधीकधी हे बोलणं हिनपातळीकडे झुकतं. हे स्पष्ट करताना त्यांचे स्त्रियांबद्दलचे उद्गगार मेगननी त्यांना ऐकवले. त्यांनी स्त्रियांना डुक्कर, कुत्री आणि आळशी म्हटल्याची मेगननी आठवण करुन दिली. त्याला प्रत्युत्तर देताना डॉनल्डनी प्रसारमाध्यमातील रोझी ओडानल्डबद्दलच आपण तसं म्हटलं आहे असं सांगितलं. पण ते खरं नाही आणि सर्वच स्त्रियांबद्दल त्यांचं तसं मत असल्याचं मेगन यांनी ठामपणे सांगितल्यापासून डॉनल्डनी मेगन यांच्याशी कोणत्याही पद्धतीने संपर्क येऊ न देण्याचं ठरवलं. त्याचीच परिणिती म्हणून आयोवा मध्ये पुन्हा एकदा मेगन केलीच प्रश्नकर्त्या असणार हे समजल्यावर या चर्चासत्राला हजर न राहण्याचा निर्णय घेतला. ट्रम्प यांच्या अनुपस्थितीत आयोवा येथील रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांचा  वाद - विवाद किती लोकं पाहतील? ट्रम्पनी ते नसल्याने लोकांचा या वाद - विवादामधला रस नाहीसा होईल असं म्हटलं आणि प्रत्यक्षात तसं झालंही. गेल्या उन्हाळ्यात रिपब्लिकन पक्षातील उमेदवारांचं वाद - विवाद सत्र २४ मिलियन लोकांनी पाहिलं तर आयोवातील वाद - विवाद  सत्र फक्त १३ मिलियन लोकांनी. कहर म्हणजे आयोवातील ही वाद - विवाद सभा जिंकली कुणी या प्रश्नाचं उत्तर पाहता निवडणूक पूर्व गोष्टी किती मनोरंजक आहेत याची खात्री पटते. सर्वसामान्यांच्या मते हा वाद - विवाद खर्‍या अर्थी जिंकला तो मेगन केलींच्या कृत्रिम पापण्यांनी!

ट्रम्प हे इतकं वादग्रस्त व्यक्तिमत्व असूनही ते लोकप्रियतेच्या शिखरावर  सातत्याने का आहेत आणि खरंच ते राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात असं कितीजणांना वाटतं? ते लोकप्रिय आहेत ते त्यांच्या वक्तव्यांमुळे. लोकांची प्रचंड करमणूक त्यांच्या उद्गगारांनी होत असल्यामुळे आता ट्रम्प काय बोलणार या प्रतीक्षेत लोक असतात. राजकारणाशी काडीचाही संबंध नसताना ते राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात असंही मानणारे असंख्य आहेत. त्यांना पाठिंबा असणार्‍यांच्या मते ते उत्तम व्यावसायिक आहेत त्यामुळे व्यवस्थापनचा उत्कृष्ट अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. डॉनल्ड राष्ट्राध्यक्ष झाले तर सीमेवर नुसतीच भिंत  बांधणार नाहीत तर त्याचा खर्च मेक्सिकन सरकारकडून घेण्याचा त्यांचा मानस आहे यामुळेही जनता खूष आहे. ते व्यावसायिक असल्याने नोकर्‍या निर्माण करण्याचा दांडगा अनुभव देशाचा कारभार हाकताना नक्कीच कामी येईल, या देशात नोकर्‍यांची उपलब्धता वाढेल याची खात्री अनेकांना आहे. त्यांच्या कंपनीचं अनेकवेळ दिवाळं निघूनही त्यातून ते बाहेर आले याचाच अर्थ ते पुनर्बाधणी करु शकतात.  ते राष्ट्राध्यक्ष झाले तर व्हाईट हाऊस मधील कामात गर्क होतील आणि वेळेच्या अभावी त्यांचा आता कंटाळवाणा झालेला ’अॲप्रेंटीस’ कार्यक्रम बंद करावा लागेल अशी स्वप्न पाहणारेही काहीजण आहेत.

घोडामैदान फार लांब नाही. रिपब्लिकन पक्ष त्यांना राष्ट्राध्यक्ष पदासाठी उमेदवारी देतो की नाही ते लवकरच कळेल. ८ वर्षापूर्वी रिपब्लिकन पक्षातील सारा पेलन नावाच्या वादळाने देशात खळबळ माजवली होती. याच सारा पेलन डॉनल्ड ट्रम्पना पाठिंबा देत त्यांच्या पाठीशी नुकत्याच उभ्या राहिल्या आहेत. एका वादळाची दुसर्‍या वादळाला साथ. आता डॉनल्ड ट्रम्प नावाचं हे वादळ आणखी कोणाकोणाला झोडपतं ते पाहत राहायचं. दुसरं काय!

http://www.loksatta.com/lekha-news/popular-donald-trump-1199210/

Wednesday, January 27, 2016

लॉटरी!



अमेरिकेत गेल्या आठवड्यापासून सरकारी लॉटरीच्या आकड्यात ती अद्याप न जिंकल्याने भर पडत चालली
आहे तशीच ती विकत घेणार्‍यांच्या संख्येतही. १.५ बिलियन डॉलर्स!  लागली लॉटरी तर? फक्त २ डॉलर्समध्ये मिळणार्‍या एका तिकिटाला जिंकण्याची शक्यता किती? तर २९० मिलियन तिकिटातून एक. तरी दरवर्षी जवळ जवळ ७० बिलियन लोक लॉटरी तिकिट खरेदी करतात. या वेळेलाही प्रत्येकाला आपणही जिंकू शकू असा विश्वास वाटायला लागलाय. बातम्या पाहताना आम्हीदेखील घरात लॉटरी लागली तर काय करु याचे बेत करुन टाकले. लहानपणी वडील दर महिन्याला लॉटरीचं तिकीट घ्यायचे. कधी ५० रुपयांच्या वर लॉटरी लागली नाही तरी महाराष्ट्र राज्य लॉटरीचं तिकीट घरात यायचं. रोज लॉटरीच्या बातम्या पाहून आज आपणही तिकीट आणूया असा बेत करुन टाकला. पण लॉटरी जीवनात आनंद घेऊन येते की  शेवटी आनंद हा मानण्यावर हेच खरं?

अमेरिकेत, पॉवर बॉल आणि मेगा मिलियन ही  लॉटरींची दोन मोठी नावं. १९९२ साली सुरु झालेला पॉवरबॉल कमीत कमी ४० मिलियनचा तर १९९६ सालापासून सुरु असलेली मेगा लॉटरीची  कमीत कमी रक्कम १५ मिलियन डॉलर्स  असते. पॉवर बॉलचं १ तिकिट २ डॉलर्सला तर मेगा मिलियनच्या एका तिकिटाची किंमत १ डॉलर. सध्या कुणाकडेच विजेते आकडे नसल्याने पॉवरबॉलची रक्कम वाढत चालली आहे. दर बुधवारी आणि शनिवारी निकाल जाहीर होतो. ६९ चेंडूमधले ५ आकडे जुळले तर तुमचं नशीब उजळतं. पण त्या व्यतिरिक्त असणारा आणखी १ चेंडू तुमचं आयुष्य बदलून टाकणारा ठरतो. या भाग्यशाली चेंडूवरचा आकडा आणि उरलेले ५ आकडे तंतोतंत जुळले की झालात तुम्ही मिली किंवा बिलि नअर.

देशात विकली जाणारी सगळीच्या सगळी तिकिटं विकत घेतली तरीही लॉटरीतून तुम्हाला फायदाच होऊ शकतो इतकी मिळणारी लॉटरीची रक्कम जास्त आहे. सर्व तिकिटांची किंमत आहे ५८४ मिलियन डॉलर्स आणि यावेळची लॉटरी आहे ९३० मिलियन डॉलर्सची.  अडचण इतकीच की इतकी सगळी तिकिटं विकत घेणं एखाद्या व्यक्तीला शक्यच नाही. पूर्ण देशात तिकिट विक्री होते. प्रत्येक ठीकाणाहूनची सर्व तिकिटं घेणं निव्वळ अशक्य. तरीही फेब्रुवारी १९९२ मध्ये काही  कंपन्यांनी एकत्र येऊन हे करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला ज्यात सर्वांना मिळून २.५ मिलियन डॉलर्सचीच तिकटं विकत घेता आली. पण लॉटरीसाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवल्या गेल्याच.  अशीच एक घडली २००५ साली. पॉवरबॉलच्या लॉटरीचे ११० लोकांचे ५ आकडे तंतोतंत जुळले आणि  जवळजवळ २० मिलियन डॉलर्सही या ११० जणांना मिळाले. काहीतरी गोंधळ असल्याची शंका अधिकार्‍यांना आली. आणि लवकरच त्याचं रहस्यही उलगडलं. न्यूयॉर्क मधील वोनटोन कंपनीने त्यांच्या बिस्किटांतून (फॉरच्यून कुकीज) ६ आकडे नशीबवान म्हणून वितरित केले होते आणि प्रत्यक्षात ते खरंच तसे निघालेही. पाच आकडे तर जुळले. जर सहावा आकडाही जुळला असता तर ह्या ११० लोकांना बिलिनिअर होण्याची संधी लाभली असती. बिस्किटांतला ६ वा आकडा होता ४० आणि लॉटरीमधील आकडा होता ४२.

मात्र आत्तापर्यंत जितक्या लोकांना लॉटरी लागली त्यातील फार कमी जणांनी ती खर्‍या अर्थी उपभोगली. बाकीच्यांना लॉटरीबरोबर आलेले ताण - तणाव झेपले नाहीत. अनपेक्षित धनलाभाने आयुष्यं खर्‍या अर्थी बदलतं. कधी सुखी जीवनाच्या मार्गावर पाऊल पडतं तर कधी हा पैसा डोकेदुखी होऊन जातो. अचानक तुमचं आयुष्य प्रकाशझोतात येतं. असंख्य समाजसेवी संस्था, उपचारांसाठी आर्थिक मदतीची अपेक्षा असणार्‍या रोग्यांचे नातेवाईक, गुंतवणुकीसाठी गळ घालणार्‍या कंपन्यां असे कितीतरी फोन वेळी अवेळी घणघणायला लागतात, कधीही न पाहिलेल्या नातेवाइकांचा जीवनात अलगद शिरकाव होतो, मित्र - मैत्रीणींची जवळीक नको तितकी वाढायला लागते. अशी एक ना अनेक उदाहरणं.

२००५ साली लॉटरी जिंकल्यावर लुईसने आपली स्वप्न पूर्ण केली. नवीन घर घेतलं. दाराशी नवीन गाडी आली. लुईसच्या नवर्‍याने, किथने बेकरीतली नोकरी सोडली आणि दिवस अंगावर यायला लागला. मन रमविण्यासाठी तो दारुकडे वळला. व्यसनाधीन झाला. दारुच्या व्यसनातून तो प्रयत्नपूर्वक बाहेर तर पडला पण जेम्स नावाच्या अनोळखी गृहस्थाने  नफ्याचं आमिष दाखवीत वेगवेगळ्यात धंद्यात त्याला पैसे गुंतवायला भाग पाडलं. त्याने गुंतवलेले सगळे धंदे नामशेष झाले. हातातला पैसा संपला तसा पुन्हा तो दारुकडे वळला. आत्तापर्यंत साथ देणारी त्याची पत्नीही कंटाळून वेगळी झाली. बेकरीतील कामगाराचं साधंसुधं जीवन पैसा आल्यावर रसातळाला गेलं आणि आलेल्या ताणातून, दारुने केलेल्या शारीरिक हानीमुळे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने किथचं २०१० साली निधन झालं.

केली रॉजरने ३ मिलियन डॉलर्सची लॉटरी जिंकल्या जिंकल्या नातेवाईक आणि मित्र मैत्रिणींवर गाडी, घर अशा महागड्या भेटवस्तूंचा वर्षाव केला. कपडे, सुंदरतेचा हव्यास बाळगत त्या पायी केलेल्या अतोनात उधळपट्टीतून  हाती आलेला पैसा केव्हा वाहून गेला  ते केलीला समजलंही नाही. मित्र - मैत्रिणींना आनंद मिळावा ही तिची इच्छा असली तरी लवकरच प्रत्येकजण तिच्या पैशावर डोळा ठेवून तिच्याशी मैत्री करत आहेत असं तिला वाटायला लागलं. आलेल्या अनुभवांनी निराश होत दोनवेळा आत्महत्येचा प्रयत्नही तिने केला आणि अखेर सर्व पैसा गमावल्यावर आता मोलकरणीची कामं करणारी केली लॉटरीपायी आलेले अनुभव विसरुन आनंदी जीवन जगण्याची इच्छा व्यक्त करते.

५५ वर्षाच्या कत्रांटदार कंपनीचे अध्यक्ष असलेल्या व्हिटेकरनी ३१५ मिलियन डॉलर्सची लॉटरी जिंकली तेव्हाच त्यातील बरीचशी रक्कम देणगी, ट्रस्ट यासाठी राखली इतकंच नाही तर जिथून त्यांनी हे तिकिट घेतलं होतं त्या दुकानातील कर्मचारी स्त्रीलाही त्यांनी घर, गाडी आणि रोख रक्कम दिली. असं असताना मग काय चुकलं? व्हिटेकर मित्र - मैत्रिणींसमवेत आनंद साजरा करायला वेगवेगळ्या क्लबमध्ये जायला लागले, दारुच्या अधीन झाले, जुगाराचा नाद लागला. मुलीला, नातीला वेळोवेळी आवश्यकता नसताना ते पैसे देत राहिले आणि त्यांच्याबरोबरीने त्या दोघी अमली पदार्थांच्या आहारी गेल्या.  त्यातच दोघींनी आपला जीव गमावला.  सुखासीन आयुष्य जगणार्‍या व्हिटेकर कुटुंबाचं आयुष्य लॉटरीच्या पैशांनी धुळीला मिळालं.

३१ मिलियन डॉलर्सची लॉटरी अब्राहमनी जिंकली. सुरुवातीची ३ वर्ष  सुखसमाधानातही गेली. पण अचानक एके दिवशी त्यांचा मृतदेह सापडला. त्यांचा खून करणार्‍या स्त्रीला अटक झाल्यावर अब्राहमनी लॉटरी जिंकल्यावर त्यांच्याशी मैत्री करुन जवळजवळ २ मिलियन डॉलर्सला त्यांना लुबाडल्याचं आणि नंतर मारल्याचं कबूल केलं. शिकागो येथील उरुज खानही  लॉटरी लागल्यानंतर महिन्याभरात मॄतावस्थेत सापडले. भारतातून आलेल्या खान कुटुंबाचं जीवन सुखी म्हणावं असंच. उरुजना असलेला लॉटरीचा नाद सोडल्यास. लॉटरी लागल्यावर मिळालेल्या पैशाचं काय करायचं याबद्दल त्यांच्या कुटुंबात वाद - विवाद होते आणि त्यातूनच त्यांना विष घालून मारण्यात आलं असावं अशी शंका असली तरी त्यांच्या मारेकर्‍याचा शोध अद्याप लागलेला नाही.

बिलींच्या आयुष्यानेही लॉटरीमुळे वेगळ्या मार्गावर वाटचाल सुरु केली. मोठ्या घरात राह्यला जायचं घरातल्या सर्वांचंच स्वप्न पूर्ण झालं. बायको, मुलांना नवीन गाड्या घेऊन देता आल्या. इतकंच नाही नातेवाइकांनाही त्यांनी खूश ठेवलं. कुणालाही मदतीची गरज असली की रोख पैसे देण्याची त्यांची तयारी असे. लवकरच त्यांच्या लक्षात आलं की प्रत्येकालाच त्यांची गरज आहे आणि इतक्या सर्वांना एकट्याने पुरं पडणं निव्वळ अशक्य. पण ते जमेल तशी मदत करत राहिले. पत्नीबरोबर सतत दुसर्‍यांना अशी पैशाची मदत करण्याबद्दल त्यांचे वाद व्हायला लागले आणि अखेर लॉटरी जिंकल्यावर केवळ दीड वर्षात निर्माण झालेल्या ताण तणावांनी आपलं जीवन संपवून त्यांनी सगळ्याला पूर्ण विराम दिला.

अर्थात लॉटरीचा पैसा व्यवस्थित गुंतवून, आपला दिनक्रम व्यवस्थित सांभाळणारीही माणसं अनेक आहेत. एमा आणि ल्युक त्यातलेच एक. ल्यूक आणि एमा मॅकडोनल्ड मध्ये काम करता करता प्रेमात पडले पण स्वतंत्र घरासाठी दोघांचा एकत्रित पगारही पुरेसा नसल्याने पालकांच्या घरीच त्यांना राहावं लागत होतं. मिलियन डॉलर्सची लॉटरी लागल्यावर नोकरी सोडायची नाही हा निश्चय काही काळापुरता टिकला. पण मुलाबरोबर वेळ घालवण्याला दोघांनी प्राधान्य दिलं, त्याचबरोबर नोकरीचा राजीनामा. पण काही दिवसातच सहकारी, नोकरी यांच्या आठवणीने चैन पडेनासं झालं. ल्यूकने पुन्हा जुन्याच जागी नोकरीला सुरुवात केली. लॉटरी पैशावर मिळणारं व्याजंही त्या दोघांच्या पगारापेक्षा जास्त होतं पण दैनंदिन जीवन न बदलता लॉटरीच्या पैशाचा आनंद उपभोगणं दोघांना जास्त सुखावह वाटलं.

रॉबिनसनने लॉटरी जिंकल्यावर शाळेतील शिक्षकांमुळे प्रेरित होऊन मुलांसाठी कार्यशाळा उभी करण्यासाठी लॉटरीतील बरीचशी रक्कम देऊ केली. आज २० वर्षानंतर ती कार्यशाळा उत्तमरीत्या चालविली जात आहे. बर्‍याच जणांनी मुलांच्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी पैसे गुंतवले तर काहीजणांनी आपल्याला लॉटरी लागली आहे हे काही महिने इतरांना कळू न देता पुढचे ताण टाळण्याचा प्रयत्न केला.  बहुतेकांनी सामाजिक जाणिवेने आपल्याला मिळालेल्या रकमेतील बरेच पैसे देणगी म्हणून देण्याला प्राधान्य दिलं.  थोडक्यात काही जण आधीही आनंदी होतेच. श्रीमंतही झाले. मनाने होतेच आता आर्थिक दृष्ट्याही.

खरंच पैशाने आयुष्यात आनंदाचा शिरकाव होतो का? यावर झालेल्या संशोधनातून असं सिद्ध झालं आहे की पगारवाढ झाली की नक्कीच सुखात भर पडते पण एका विशिष्ट वाढीनंतर त्याचा फारसा परिणाम जाणवत नाही. किंबहुना पैशाने सुख विकत घेता येत नाही ह्याचाच पैशाचा ओघ स्वत:कडे वळल्यावर बहुतेकांना शोध लागतो.

आणि तरीही आपण लॉटरी लागली तर... हे स्वप्न पाहणं विसरत नाही!

 

पूर्वप्रसिद्ध - लोकसत्ता - चतुरंग पुरवणी - http://www.loksatta.com/lekh-news/lottery-1192070/

Saturday, January 16, 2016

ग्लोबल कोकणी - अमेरिकन मंचावर...

(लोकमतच्या वर्धापन दिनानिमित्त प्रसिद्ध झालेल्या ग्लोबल कोकणी विशेषांकातील माझा लेख.)

"आय हॅव टू पिक अप द रोल." वाटेत घोकून घोकून पाठ केलेलं वाक्य म्हटलं आणि विक्रेतीच्या चेहर्‍यावरचे गोंधळलेले भाव बघून मी बावचळले.
"रोल?" तिने चमत्कारिक उच्चारात विचारलं.
"यस." मी तोंड वेडंवाकडं करत उच्चार केला. गोर्‍यांशी बोलताना तोंड थोडं वाकडं केलं की आपल्या फ्लाइंग राणीच्या वेगाला जरा खीळ बसते आणि आपण काय बोलतोय ते त्यांना समजतं असा एक फंडा कुठूनतरी माझ्या डोक्यात शिरला होता. तो वापरायची ही पहिली संधी. माझं तोंड बराचवेळ वाकडंच राहिलं पण तिला काही रोल म्हणजे काय ते समजेना. कुठून ही दुर्बुद्धी सुचली कोण जाणे.  या देशात पाऊल टाकलं आणि आठवड्याच्या आत रोल आणायला बाहेर. काय करणार? विमानतळापासून फोटो काढायला सुरुवात केली होती. विमानातल्या  संडासाचंही अप्रूप होतं २० वर्षापूर्वी. रोल पटकन संपलाच त्यामुळे. आता फोटो भारतात पाठवून देण्याची घाई. तरी नवरा म्हणत होता,
"जरा टी. व्ही. बघ थोडेदिवस. त्या टी. व्ही. तली माणसं जशी बोलतात ना तशीच बोलतात ही सगळी. त्यांचं कळायला लागलं तरी आपलं बोलणं त्यांना कळणं हे पण लढाईवर जाण्यासारखंच असतं. तेव्हा सबुर!" पण नवर्‍याचं न ऐकणं हा पत्निधर्म निभावत मी आखाड्यात उतरले. आता रोल, रोल करता करता नवराच काय, माझी  शाळाही आठवली. कणकवलीच्या एस. एम. ज्युनिअर महाविद्यालयात शुक्ल सर इंग्रजी बोला, इंग्रजी बोला म्हणून कानीकपाळी ओरडायचे तो सल्ला ऐकला नाही याचा पश्चाताप व्हायला लागला. अखेर माझ्या आणि विक्रेतीच्या मध्ये असलेल्या अभेद्य भितींतून म्हणजे काचेच्या लांबलचक टेबलावरुन बोट दाखवत, खाणाखुणा करत तिच्या पाठीमागे असलेल्या मोठ्या कपाटातल्या वरतून चौथ्या रांगेतल्या कप्प्यात असलेला कॅमेरा तिला दाखविण्यात मी यशस्वी झाले. मग तो कॅमेरा हातात धरुन, फोटो काढण्याची कृती करत, रोलची जागा दाखवण्याचा कार्यक्रम पार पडला. अखेर तिला मला काय हवंय ते समजलं आणि ती आनंदातियाशाने किंचाळली,
"यु मीन फिल्म?" आता मी गोंधळले. ही लोकं रोलला फिल्म म्हणतात? पण तोंड वाकडं करत बोलण्याची माझी खुमखुमी थंडावली होती. आता ती जे काही देईल ते रोल म्हणून वापरायला मी तयार होते. रोल घेऊन घरी आले आणि नवर्‍याला म्हटलं,
"शाळेत शिक्षकांचं ऐकायला हवं होतं रे."
"आम्ही ऐकायचो." त्याचा शांतपणा ढळला नाही.
"मी माझ्याबद्दल बोलतेय."
"बरं, बरं पण इतकं का भाग्यं उजळलं शिक्षकांचं?"
"हे बघ, तुला माहितीच आहे. माझं काही तुझ्यासारखं शिकण्याचं माध्यम इंग्रजी नव्हतं. मराठी माध्यमातून शिकलेली, कोकणात जन्मलेली, वाढलेली मी."
"तू पालघरला होतीस ना? ते कुठे कोकणात?"
"तू म्हणजे ना. काही वर्ष होतो रे पालघरला. पण जन्म कणकवलीचा, प्राथमिक शिक्षण देवरुखच्या भोंदे शाळेत, उच्चमाध्यमिक कणकवलीच्या एस. एम. हायस्कूलमधून आणि त्यानंतर कणकवली महाविद्यालयात.  महाविद्यालयीन आणि उच्चमहाविद्यालयीन रत्नागिरीला गोगटे जोगळेकर महाविद्यालयात. फक्त माध्यमिक शिक्षण पालघरच्या आर्यन एज्युकेशन मध्ये. म्हणजे अमेरिकेत यायच्या आधीचं आयुष्य जवळजवळ कोकणातच गेलं ना?"
"पण हे तू मला का ऐकवते आहेस?"
"कधी वाटलंच नव्हतं ना  परदेशात येईन म्हणून. इंग्रजी हीच बोलण्याची भाषा होऊन जाईल याची कल्पनाही केली नव्हती. तुझ्याबरोबर म्हणून या देशात पाऊल टाकलं पण तिकडे जशी माझी स्वत:ची ओळख होती आकाशवाणी, लेखन, अभिनय या माध्यमातून  तशीच इथेही ती व्हायला हवी असं वाटतं. पण सुरुवात उच्चारांपासून आणि इंग्रजी बोलण्याच्या आत्मविश्वासाच्या अभावापासून होतेय ना म्हणून वाटतंय ऐकायला हवं होतं शिक्षकांचं. आम्हाला इंग्रजीचे शिक्षक नेहमी म्हणायचे अभ्यासापुरतं इंग्रजी शिकू नका. ते वापरा, बोला. कुठेही तग धरता येईल त्यामुळे. आज ते पटलं."
"तुझ्या शिक्षकांना कळवून टाक हे. बरं वाटेल त्यांना. आणि इतकं काही कठीण नाही इंग्रजीची सवय करणं. जमेल तुला." त्याने विषय संपवला. माझ्या मनात मात्र बराचवेळ अमेरिकेला येईपर्यतचा काळ फेर धरत राहिला.

वेगवान आयुष्य मागे पडून अचानक शांतपणाने प्रवेश केला होता. नव्या देशाची, नवीन जगाची अपूर्वाई होती तशीच इथे कसं रुळणार याची धास्तीही. H4 वर आल्याने नोकरी करता येणार नव्हती, काही शिकायचं म्हटलं तर त्या त्या राज्यात किमान १ वर्ष राहिल्यानंतरच शिक्षणाचा खर्च कमी होऊ शकत होता. २ च वर्ष भारतीय कंपनीने पाठवलं होतं तर फारशी कशाची चिंता न करता हे नवं जग अनुभवावं असंही वाटत होतं. शेवटी सुरुवातीला तेच केलं. हातात लेखणी होती. रत्नागिरी आकाशवाणीसाठीचं लेखन, रत्नभूमीसाठी महाविद्यालयीन जीवनात चालवलेलं ’तरुणाई’ सदर, आमचं दिनांक साठी केलेलं लेखन आणि अधूनमधून सकाळ, रत्नागिरी टाईम्स, साप्ताहिक सकाळ, लोकसत्ता तसंच विविध मासिकांमधून लिहिलेले लेख, कविता, कथा या बळावर अमेरिकेतले अनुभव वेगवेगळ्या स्वरुपात कागदावर उतरायला लागले. १९९५ च्या काळात लेखन पोस्टाने किंवा तत्कालिक घडामोडींवरील लेख वर्तमानपत्रांना फॅक्सने पाठवणे हे दोनच मार्ग होते. लिहिण्यासारखं खूप होतं. त्यात दिवस पुरेनासे झाले. दरम्यान नवर्‍याच्या नोकरीमुळे भटकंतीही चालू होती. अमेरिकेतल्या राज्याराज्यामधलं जीवन म्हटलं तर एकसारखंच पण तरीही किती वेगळे पैलू असलेलं आहे ते जाणवायला लागलं. अमेरिकन मित्र, मैत्रीणींबरोबरच इतर देशातल्या लोकांशीही  मैत्री व्हायला लागली. भारतात महाराष्ट्रापुरतं मर्यादित असलेलं अनुभवविश्व व्यापक झालं. लेखनातून व्यक्त होत राहिलं. त्याचाच परिपाक म्हणजे,  उन्मेष प्रकाशनाने प्रसिद्ध केलेला ’मेल्टिंग पॉट’ हा कथासंग्रह, ज्याला कोमसापचा उत्कृष्ट कथासंग्रहाचा पुरस्कार प्राप्त झाला. पाहता पाहता २ वर्षांची आणखी काही वर्ष झाली आणि अजून काही वर्ष इथेच राहायचं ठरल्यावर नोकरीचे आणि इथल्या प्रवाहात सामील होण्यासाठी  लागणार्‍या शिक्षणाचे वेध लागले. संगणकीय शिक्षणाला तेव्हाही तेवढंच महत्व होतं पण ते आवडेल की नाही याची खात्री नव्हती त्यामुळे आधी छोटे छोटे कोर्स करुन अंदाज घ्यायचं ठरवलं. वयाच्या ३० शी नंतर पुन्हा महाविद्यालयात पाऊल टाकायचं आणि तेही पूर्णपणे परक्या देशात या विचारानेच अस्वस्थपणा आला होता. अस्वस्थ मनाने वर्गात प्रवेश केला आणि क्षणात तो पळालाही. माझ्या आई - वडिलांच्या वयाचे विद्यार्थी पाहून मी अगदीच बालवयात महाविद्यालयात आल्याची खात्री झाली आणि एक वेगळाच आत्मविश्वास आला. नंतर वर्ग शिक्षक आणि विद्यार्थ्यांमुळे तो टिकलाही. इथल्या शिक्षणाचा ढाचा वेगळा आहे. प्रात्यक्षिकांवर जास्त भर असतो, पाठांतरापेक्षा विषय समजण्याला महत्त्व आणि शिस्तीपेक्षा मित्रत्वाचा मार्ग स्वीकारला जातो. एकमेकांच्या अडचणी ओळखून त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जातो. त्यासंदर्भात अजूनही एक आठवण मनात ताजी आहे.
मुलाला सांभाळणारी मुलगी त्या दिवशी येऊ शकली नाही तेव्हा शेवटचा पर्याय म्हणून मुलगा माझ्याबरोबर आला तर चालेल का असं मी मिस्टर स्मिथना घाबरत घाबरत विचारलं. तात्काळ त्यांनी होकार भरला. मुलाला घेऊन वर्गात पाऊल ठेवलं आणि मिस्टर स्मिथनी माझ्याकडे हसून पाहिलं. तिथेच थांबायला लावलं.
"आज आपल्या वर्गात एक छोटा दोस्त आला आहे." पूर्ण वर्गाला मिस्टर स्मिथनी माझ्या मुलाची ओळख करुन दिली. ६ वर्षाच्या माझ्या मुलाने लाजत लाजत ’हाय’ केलं. वर्ग होता महाविद्यालयाचा आणि मुलं होती वय वर्ष ३० पासून ७५ च्या आसपास. तो दिवस त्याच्यासाठी आणि माझ्यासाठीही कायमचा स्मरणात राहिला

शिक्षण चालू असतानाच नोकरीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्र आली.   मी शिकता शिकता बदली शिक्षकांची तात्पुरती नोकरी करायचं ठरवलं. त्या वेळेला शिक्षकांची आवश्यकता आहे असं सतत टी. व्ही. वर आवाहन असायचं. म्हटलं, जमलं तर करुन पाहू.   मुलगा म्हणाला,
"आई, तू  शिकवणार शाळेत जाऊन?"
"मग? शिकलेली आहे मी भारतात."
"पण तुला नाणी कुठे येतात ओळखता?"
"तुला कुणी सांगितलं?"
"मी क्वार्टर मागितलं की तू एकेक नाणं काढून त्याच्यावरचं चित्र बघतेस, चित्र कुणाचं ते कळत नाही तुला."
"हे बघ, गांधीजी असतात का त्या नाण्यावर? नाही ना? मग कसं ओळखणार रे?"
"पण मग कशाला बघतेस चित्र?"
"उद्योग नाही म्हणून. पुढे बोल."
"क्वार्टर म्हणून डाईम देतेस असं सांगत होतो."
"भारतातली नाणी आणून दे मला. बघ किती पटकन ओळखते ते. तू अभ्यासाला बस आता."
त्याला घालवला खरा, पण शिकवायला सुरुवात केल्यावर इथली शिक्षणपद्धती, शिकवण्यातील पद्धतशीरपणा, प्रयोग, वेगळेपणा याचा सुखद अनुभव घेतानाच काही गमतीदार प्रसंगही घडले.

शाळेचा पहिलाच दिवस. दुसरीचा वर्ग. मार्च महिन्यातला सेंट पॅट्रीक डे.
गोष्ट वाचून दाखवायची होती. तसं सुरळीत चाललं होतं. Leprechaun इथे गाडी अडली. उच्चार लेप्रचॉन की लेप्रचन? का काहीतरी वेगळाच. मी  एकदा हा एकदा तो, दोन्ही उच्चार करत गाडी हाकली. घरी येऊन म्हटलं आज लेपरचनची गोष्ट सांगितली. मुलाचं आपलं खुसखुस, खुसखुस.
"हसू नको. नीट सांग काय ते."
"लेप्रीकॉन आहे ते" वर म्हणाला,
"तू माझ्या वर्गावर येऊ नको. घरीच शिकव मला काय असेल ते."
त्याच्या नाही पण दुसर्‍या वर्गांवर जाण्याची माझी चिकाटी दांडगी. दुसर्‍या दिवशी गेले तर संगीताचा वर्ग.  मराठीतही संगीताचा गंध नसताना एकदम इंग्रजीत संगीत कसं शिकवायचं?
मी कार्यालयात गेले. माझे थरथरणारे हात, भेदरलेला आवाज याने काही फरक पडला नाही,
"आज वेळ मारून ने. उद्या कुणालातरी आणतो आम्ही."
उडालेच, बदली शिक्षकाचं माझं हे काम वेळ मारून नेणं होतं?  मेलं, घरी तसंच, इथेही तेच. कुणाला म्हणून किंमत नाही माझ्या कामाची... आलीया भोगासी!
त्यानंतर रोज रात्री इंग्लिश गाणी शिकण्याचा सपाटा लावला मी घरी कारण दुसर्‍या दिवशी आणखी कुणाला तरी न आणता वेळ मारुन न्यायला त्यांनी मलाच तिथे ठेवलं. शाळेने माझी सलग पंधरा दिवसासाठी संगीत शिक्षिका म्हणून नेमणूक करून टाकली. पोरं कितपत शिकली देवजाणे पण मला बरीच गाणी यायला लागली आणि नवरा, मुलगा दोघांना जी काही इतर गाणी येत तीही विसरले ते दोघं. नवरा तर म्हणाला,
"तसा मी बरा कमावतोय की, तुला खरंच गरज आहे का गाणीबिणी शिकवण्याची?" मी उत्तर न देता मोठ्याने गाणं म्हणत राहिले आणि आगळेवेगळे अनुभव घेत  ३ वर्ष शिक्षक म्हणून कार्यरत राहिले.

दरम्यान हातात पदवी आली होती. जिथे शिकत होते तिथेच आधी इंटर्नशिप करुन वेब प्रोग्रॅमर म्हणून स्थिर झाले. महाविद्यालयात असलेले जवळजवळ १८० वेगवेगळे विभाग आणि त्यांची संकेतस्थळं तयार करणं, अद्ययावत ठेवणं हे आमच्या गटाचं काम. कार्यालयात सर्वांना नावानेच संबोधण्याच्या प्रथेमुळे आपसूकच जवळीक निर्माण होते.  एकमेकांना सांभाळून, अडीअडीचणी ओळखून मार्ग काढणं महत्वाचं मानलं जातं. कोणत्याही कामाचं व्यवस्थित नियोजन,  कागदावर सारा आराखडा करणं हे सुरुवातीला फार कंटाळवाणं वाटायचं पण त्याचमुळे ठरल्याप्रमाणे काम  पार पाडलं जातं आणि त्याचा दर्जाही उत्तम राखता येतो हे लक्षात आलं आणि तेच अंगवळणीही पडलं.

एकीकडे नोकरी बरोबरच लेखनही चालू असतानाच अभिनयाची मूळ आवड स्वस्थ बसू देत नव्हती. कणकवलीच्या नाथ पै एकांकिकांमधून आधी शालेय गटातून, नंतर बागेश्री संस्थेतून काम करुन मिळवलेली अभिनयाची बक्षिसं, रत्नागिरीच्या जिज्ञासा संस्थेतून गाजवलेल्या अनेक स्पर्धांच्या आठवणी स्वस्थ बसू देत नव्हत्या. त्यातूनच ’अभिव्यक्ती’ या नाट्यसंस्थेची निर्मिती झाली. दरवर्षी व्यावसायिक रंगमंच भाड्याने घेऊन दोन एकांकिकाचं सादरीकरण सुरु झालं. दिग्दर्शन, अभिनय, नेपथ्य, काहीवेळा एकांकिका लेखन, जाहीरात, तिकीट विक्री अशा सगळ्या बाजू नवर्‍याच्या आणि माझ्या मुलांच्या मदतीने  तसंच येथील स्थानिक कलाकारांच्या मदतीने सांभाळत गेली ८ वर्ष दरवर्षी इथे एकांकिका सादर करतोय. त्याला मराठी प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद उत्साह वाढवणारा आहे.

मागे वळून पाहताना जाणवतं ते हेच की परक्या देशात १९९५ च्या आसपास मुळं रुजवणं सोपं नक्कीच नव्हतं. आतासारखी संपर्काची आधुनिक साधनं नव्हती. १५ दिवसांनी भारतात फोन व्हायचे. पत्र पाठवलं की ३ आठवडे आतुरतेने उत्तराची वाट पाहण्यात जायची. पण हा परका देश ’आपला’ कधी होऊन गेला तेच समजला नाही. भारतात कुणी अमेरिकेबद्दल ऐकीव माहितीवर तारे तोडले की तळमळीने आम्ही खर्‍या परिस्थितीची जाणीव करुन देतो आणि इकडे आमच्या सहकार्‍यांनी, अमेरिकेन मित्र, मैत्रिणींनी भारताबद्दल काही शेरे मारले की त्याच कळकळीने गैरसमज दूर करण्याच्या प्रयत्नाला लागतो. दोन्ही देश आमचेच. एक कर्मभूमी, दुसरी मातृभूमी!

Monday, October 12, 2015

काळीज कुरतडणारी वेदना


"आर यू ख्रिश्चन?" या प्रश्नावर ज्यांनी माना डोलवल्या, उभे राहिले त्यांच्यावर "गुड, विदीन अ मिनिट यु विल सी गॉड" असं म्हणत त्या तरुणाने गोळ्या झाडल्या. ऑरेगन राज्यातील एका आडगावातील कम्युनिटी कॉलेजमधील अनेक तरुण जीव नाहक प्राणाला मुकले. या वर्षात विद्येच्या आवारात घडलेली ही ४५ वी घटना. दरवेळेसारखाच पुन्हा एकदा ’गन कंट्रोल’ हा विषय चघळला जाईल ते पुढची घटना घडेपर्यंत. मोजणंही कठीण होऊन जावं इतक्यांदा हे असे प्रसंग घडतायत या देशात. दरवेळेला भयभीत चेहर्‍याची मुलं शरण आल्यासारखी दोन हात डोक्याच्या मागे धरुन आवाराच्या बाहेर पडतात. पोलिस, ॲम्युबलन्सेस, प्रसारमाध्यमांसमोर हमसाहमशी रडणारे तरुण जीव आणि पोटच्या जीवांच्या काळजीने धावत पळत पोचलेले पालक हे असं दृश्य दुर्देवाने वारंवार पाहायला मिळतं. दरवेळेला कुणाच्यातरी माथेफिरुपणामुळे निष्पाप मुलांना, त्यांच्या शिक्षकांना प्राण गमवावा लागतो. धक्कादायक म्हणण्याच्या पलिकडे गेलं आहे हे.
शाळांमध्ये होणार्‍या गोळीबारांबद्दल चर्चा सुरु झाली की हमखास ती पोचते १९९९ सालापर्यंत. २० एप्रिल १९९९ साली कॉलोरॅडो राज्यातील लिटीलटन कोलंबाईन हायस्कूल मध्ये दोन तरुणांनी अंदाधुंद केलेल्या गोळीबारात १३ मुलं मारली गेली तर ३० हून अधिक जखमी झाली. ह्या घटनेने देश हादरला पण त्या आधी आणि नंतरही सातत्याने हे सत्र चालूच आहे. २००७ साली व्हर्जिनिया पॉलिटेक्नीक मध्ये झालेल्या गोळीबारात ३२ मुलं आणि शिक्षक मारले गेले. या घटनांचा गाजावाजा जास्त झाला कारण मृत्यू पावलेल्या मुलांची संख्या. इतर ठीकाणी बळी गेलेल्यांची संख्या कमी असली तरी शाळेत होणार्‍या गोळीबारांच्या संख्येत वाढच होत चालली आहे. वर उल्लेख केलेल्या घटनांचे पडसाद हळूहळू हवेत विरतायत तोच २०१२ साली सॅंडीहूक प्राथमिक शाळेतली २० चिमुरडी मुलं आणि ६ शिक्षक अशाच गोळीबाराला हकनाक बळी पडले. या घटनेने सारा देश सुन्न होऊन गेला. त्यानंतर म्हणजे, १ ऑक्टोबर २०१५ ला घडलेला हा वर्षभरातला ४५ वा गोळीबार. प्रत्येकवेळेला मारेकर्‍यांने हे का केलं असावं याचा शोध, सोशल नेटवर्कवरचा मारेकर्‍याचा वावर, त्याने वेळोवेळी व्यक्त केलेली मतं, फोटो यावरुन बांधला जाणारा अंदाज यालाही अंत नाही. यात भर म्हणून आता कधी गोळीबार करणार्‍या मुलांच्या पालकांना, त्यांचं आपल्या मुलांवर नियत्रंण नाही म्हणून, सरकारला, शाळा मुलांचं रक्षण करु शकली नाही म्हणून, काही ठीकाणी शाळेतील कर्मचार्‍यांना, सरतेशेवटी आता बंदूक उत्पादक तसंच २५ कंपन्यांना चित्रपट आणि संकेत स्थळांवर खेळल्या जाणार्‍या खेळांमुळे मुलं हिंसकतेचा मार्ग चोखाळतात म्हणून काही पालकांनी कोर्टात खेचलं आहे. या सार्‍यातून अशा घटनांना आळा घातला जाऊ शकेल असा मार्ग खरंच सापडणार आहे की त्यातही स्वत:च्या फायद्याचा रंग आहे हे उमजणं आतातरी कठीण आहे. काळच ते ठरवील. दरवेळेला अशा घटनांची कारणमीमांसा शोधण्याचा प्रयत्न होत राहतो. निघालेल्या निष्कर्षातून उपायाची अमंलबजावणी किती वेळा होते हा भाग वेगळा. राजकारणाचे रंग इतके गडद आहेत की त्यातून ’गन कंट्रोल’ सारखे सर्वसामान्यांच्या दृष्टीने सहजसाध्य असणारे उपाय किती जणांचे बळी गेल्यावर होणार ते राजकारणीच जाणोत. तोपर्यंत हे असे प्रसंग वारंवार सर्वांच्या वाट्याला किती दिवस येत राहणार याचाच विचार मन कुरतडत राहणार. ह्याच पार्श्वभूमीवर गोळीबार करणार्‍या काही तरुणांच्या आई - वडिलांच्या मनाचा प्रसारमाध्यमांनी घेऊ पाहिलेला वेध महत्वाचा ठरावा.
कोलंबाईन हायस्कूल मधील गोळीबार करणार्‍या डिलनच्या आई - वडिलांनी त्या घटनेनंतर जवळ जवळ १५ वर्षांनी ’फार फ्रॉम द ट्री’ या पुस्तकासाठी अॲड्रुयु सोलोमनला मुलाखत दिली. प्रसारमाध्यमांनी वेळोवेळी संपर्क साधूनही इतके दिवस मौन बाळगलेल्या सुझनने अखेर आपलं मन मोकळं केलं. गुन्हा करणार्‍या मुलांच्या पालकांकडे सर्वात प्रथम दोषी म्हणून पाहिलं जातं. पालक म्हणून या मुलांचे आई - वडिल काय करत होते असं म्हटलं जातं. डिलनची आई सुझन यावर सांगते, की जेव्हा कोलंबाईन शाळेत गोळीबार झाला तेव्हा डिलनच्या मित्राचा, डिलनचा पत्ता लागत नाही हे सांगण्यासाठी फोन आला. त्यावेळेस आपला मुलगाच यात सहभागी असेल अशी पुसटशी शंकाही मनाला शिवली नाही. पण सुझन घरी येईपर्यंत घराला पोलिसांनी वेढा घातला होता. हताशपणे या सार्‍याला सामोरं जाताना इतक्या जणांच्या मृत्यूला आपला मुलगा कारणीभूत ठरला यावर विश्वास ठेवणं सुझनला कठीण जात होतं. डिलनबद्दल सांगताना ती म्हणते, ’चार चौघांच्या मुलांसारखाच तोही वाढला. किंबहुना त्याची ओळख हुशार मुलगा म्हणूनच होती. जी गोष्ट करेल ती मन लावून करणारा मुलगा होता तो. वडिलांबरोबर तास न तास बुद्धीबळ खेळणं हा त्याचा आवडता छंद. पालक म्हणून आमच्या समोर कधीच कोणतीही आव्हानं त्याने उभी केली नाहीत. व्हिडीओ गेम्स, स्वत:च्या खोलीत तास न तास काढणं हे जी इतर मुलं या वयात करतात तेच तोही करत होता. एकमेव प्रसंग होता तो, कधीतरी रात्री त्याने आणि एरिकने रस्त्याच्या कडेला उभी असलेली गाडी उघडल्याचा. त्याची शिक्षाही त्याने भोगली होती. मात्र त्यावरुन तो हे टोक गाठेल किंवा ही त्याच्यातील विक्षिप्तपणाची लक्षणं आहेत अशी शंकाही आली नाही.’
डिलनच्या या कृत्यानंतर सुझनच्या मनात कितीतरी वेळा आत्महत्येचा विचार डोकावून गेला. तिचं बाहेर जाणं बंद झालं, नोकरीवर पुन्हा रुजू होऊनही कामातलं लक्ष उडालं. तिच्या वेळी अवेळी रडण्याने आजूबाजूच्या लोकांची अवस्था अवघड होऊन जाई. ते जाणवत असूनही तिला जोरजोरात रडावंसं वाटे. आडनाव सांगण्याचीही शरम वाटायला लागली. रेडिओ, टीव्ही लावण्याचं बळ गेलं. आपल्या मुलाने असं करावं यावर विश्वास ठेवणं जितकं कठीण जात होतं तितकाच पालक म्हणून डिलन आणि एरीकचे आई - वडिलच गुन्हेगार आहेत असा प्रसार माध्यमांतून आळवला जाणारा सूरही सुझनचं काळीज भेदून टाकत होता. मुलाखतकर्त्याला ती सांगते, ’माझं मुल गमावल्याचा शोकही मी करु शकत नव्हते अशी अवस्था होती. काय चुकलं माझं? लाड केले जास्त की फार जास्त स्वातंत्र्य दिलं? नक्की काय चुकलं की त्याने असं वागावं? पालक म्हणून आमचं काय चुकलं ह्या प्रश्नाचं उत्तर कधीच मिळणार नाही का? हे कृत्य करण्याच्या थोडे दिवस आधी मी त्याचा हात तळव्यात धरुन माझं त्याच्यावरचं प्रेम व्यक्त केलं होतं, आई म्हणून त्याचा अभिमान वाटतो हे सांगायला विसरले नव्हते. याचाच विपरित परिणाम झाला असेल? माझ्या अपेक्षांना तो पुरा पडणार नाही हे तर त्याच्या मनाने घेतलं नसेल? खूप विचार करते तेव्हा आता मनातल्या मनात मीच त्याची क्षमा मागते कारण, कदाचित त्याला माझ्या मदतीची गरज असेल हे ओळखण्यात मी अपयशी ठरले.’ हे सांगून त्या गोळीबारात बळी पडलेल्या काही पालकांनी संपर्क साधला तो क्षण गहीवरुन टाकणारा असल्याचं ती सांगते. या गोळीबारात ठार झालेल्या मुलांच्या आई - वडिलांनी जेव्हा त्यांची भेट घेतली तेव्हा गहिवरलेल्या डिलन आणि एरिकच्या आई - वडिलांनी मुलांनी आपल्याला मुर्ख बनवल्याची भावना व्यक्त केली.

सॅंडी हुक प्राथमिक शाळेत गोळीबार केलेल्या घटनेतला गुन्हेगार होता अॲडम लान्झा. याच्या बाबतीत मात्र त्याचे वडिल त्याचं वेगळेपण नमूद करतात. लहानपणी लक्षात न आलेलं अॲडमचं वेगळेपण तो माध्यमिक शाळेत जायला लागल्यावर जाणवायला लागलं. काहीतरी चुकत होतं. अॲडम एक्कल कोंडा व्हायला लागला, नजर टाळायला लागला. त्याची झोप हरवली. शाळेत येऊन गोळीबार करणार्‍यापूर्वी स्वत:च्या आईला ठार मारणार्‍या अॲडम बाबत पालक म्हणून त्याची आई कमी पडली हे मात्र ते अमान्य करतात. अॲडम वडिलांबरोबर राहत नसला तरी अॲडमच्या आईने त्याच्यावर उपचार व्हावेत म्हणून प्रयत्न केला होता. मात्र आपल्याला उपचाराची गरज आहे हे मान्यच नसणार्‍या अॲडमचा उपचारांना दिला जाणारा प्रतिसाद उत्साहवर्धक नव्हता. मानसोपचार तज्ञांकडे त्याने कधीच मोकळेपणाने आपल्याला काय वाटतं ते सांगितलं नाही. यामुळेच पालक म्हणून आपण काही निराळं करु शकलो असतो हे त्यांना मान्य नाही. या सार्‍याचा वडिल म्हणून झालेल्या परिणामाबद्दल ते म्हणतात, ’रात्री खूपदा एकच स्वप्न पडतं. ज्यात दाराच्या पलिकडे कुणीतरी संतप्त नजरेने आपल्याकडे पाहतंय असं वाटतं. त्या चेहर्‍याकडे पाहिल्यावर माझी गाळण उडते. विचार केल्यावर लक्षात येतं की दारात उभा असलेला तो चेहरा अॲडमचा असतो आणि अॲडमच्या हातून प्राण गमावलेल्या मुलांचं मी प्रतिनिधित्व करत असतो. त्यामुळे माझी भितीने गाळण उडते. ’
वरील २ उदाहरणं सोडल्यास आत्तापर्यंत शाळेच्या आवारात घडलेल्या गोळीबाराच्या घटनांतून गुन्हेगारांचे पालक फारसे बोलते झालेले दिसत नाहीत. जे झाले ती घरं आपल्यासारखीच मध्यमवर्गीय वातावरणाची वाटतात. ते सांगतात त्यापेक्षा खरंच काही पालक म्हणून ते वेगळं करु शकले असते असं वाटत नाही. मग ही मुलं अशी का वागतात या प्रश्नाची उकल तशीच राहते. मुलांच्या कर्मांचं ओझं वाहण्याखेरीज पालकांसाठी अशाने काही पर्यायच उरत नाही. मग नक्की प्रतिबंध तरी कसा करणार या गोष्टींना? बंदूक नियत्रंण? मानसिक विकृतीचा वेळीच शोध आणि त्यावर त्वरित योग्यं उपचार? सळसळत्या तरुणाईला अयोग्यं मार्गाकडे जाण्यापासून रोखणं? मुलांमध्ये होत असलेल्या सुक्ष्म फरकाचीही नोंद घेऊन त्यांना बोलतं करणं? प्रश्नांच्या जंजाळातून खात्रीलायक नसले तरी हे काही मार्ग दिसतात. प्रश्न आहे तो त्या मार्गावर पाऊल टाकण्याचा. कधी होणार हे, कोण करणार आणि कसं?


लोकसत्तेच्या, ११ ऑक्टोबरच्या ’लोकरंग’ मध्ये हा लेख प्रसिद्ध झाला आहे.   दुवा:काळीज कुरतडणारी वेदना