Showing posts with label लोकसत्ता. Show all posts
Showing posts with label लोकसत्ता. Show all posts

Sunday, February 28, 2016

सुपरबोल

(सुपरबोल. दरवर्षी हा खेळ खेळाइतकाच किंबहुना खेळापेक्षा इतर कारणांनीही गाजतो. गेल्या आठवड्यात रविवारी खेळला गेलेला सुपरबोलही याला अपवाद नाही. सुपरबोलचं हे ५० वं वर्ष. मध्यांतरातील कार्यक्रमासाठी गायलेली बियॉन्से या वेळेला वादाच्या भोवर्‍यात अडकली आहे.)

फूटबॉल या खेळाच्या विजेतेपदासाठी दरवर्षी होणारी चुरस म्हणजे सुपरबोल. राष्ट्रीय फूटबॉल संघटनेत (NFL) असलेले ३२ संघ दोन गटात विभागलेले आहेत. ते राष्ट्रीय  फूटबॉल संघ (NFC) आणि अमेरिकन फूटबॉल संघ (AFC) या नावाने ओळखले जातात. दरवर्षी सप्टेंबर ते डिसेंबर महिन्यात हे संघ सुपरबोलपर्यंत पोचण्यासाठी खेळतात. आणि फ्रेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या रविवारी अंतिम फेरीपर्यंत पोचलेले दोन संघ विजेतेपदासाठी लढतात.  फेब्रुवारी महिन्याचा  पहिला रविवार ’सुपरबोल सन्डे’ म्हणूनच ओळखला जातो. या ७ फेब्रुवारीला लढत होती कॅरोलायना पॅंन्थर आणि डेनवर ब्रॉन्को या दोन संघामध्ये.

हा खेळ जितका खेळासाठी प्रसिद्ध आहे तितकाच अनेक कारणांसाठी. काहींना खेळाची आवड म्हणून तर काहीजण केवळ जाहिरातीसाठी सुपरबोल पाहतात. मध्यांतरात होणार्‍या कार्यक्रमाचं आकर्षण असणारा वर्गही खूप मोठा आहे. मायकल जॅक्सन, मॅडोना, व्हीटनी ह्युस्टन अशा एकाहून एक नामवंत कलाकारांनी या वेळेला आपले कार्यक्रम सादर केले आहेत.

या वेळेला होते ब्रुनो मार्स, कोल्डप्ले आणि पॉपसिंगर बियॉन्से. बियॉन्से आणि तिच्या सहकारी नर्तिकानी घातलेल्या पोशाखावरून, गाण्यातील शब्दांवरुन सध्या हवा तापलेली आहे. आफ्रिकन - अमेरिकन नागरिकांनी स्वत:च्या हक्कासाठी दिलेल्या लढ्यातील  एक चळवळ म्हणजे ब्लॅक पॅन्थर्स चळवळ. बियॉन्से आणि सहकारी नर्तिकांचा काळ्य़ा रंगाचा पेहराव आणि टोपी या दोन्ही गोष्टी त्या चळवळीतील कार्यकर्त्यांसारख्या होत्या,  नृत्यातून मालकम एक्स या मानवी हक्कासाठी जागरुक असलेल्या आफ्रिकन - अमेरिकन नेत्याबद्दलचा आदर साकारला, तसंच नृत्यातील  मुठी वळवून उंचावलेले हात म्हणजे ’ब्लॅक पॉवर सॅल्यूट’ ची आठवण करुन देण्याचा प्रयत्न होता. १९६८ च्या ऑलिम्पिकमध्ये पदक वितरणाच्या वेळेला  अमेरिकन राष्ट्रगीत सुरु झाल्यावर आफ्रिकन - अमेरिकन विजेत्यांनी मुठी उंचावल्या होत्या तशाच या नृत्यात वापरल्या गेल्या.  बियॉन्सेने सादर केलेल्या नृत्यानंतर चालू झालेल्या या चर्चेत भर पडली ती सुपरबोलच्या आधी म्हणजे शनिवारी बियॉन्सेने तिच्या चाहत्यांसाठी उपलब्ध करुन दिलेल्या  ’फॉरमेशन’  हे शीर्षक असलेल्या गाण्याने. या गाण्यातून  आफ्रिकन - अमेरिकन लोकांवर पोलिसांकडून केले जाणारे अत्याचार थांबवावे असं सुचविण्यात आलं आहे. ते दाखविताना एक छोटा मुलगा रस्त्यावर पोलिसांच्या समोर हाताने थांबण्याची खूण करत उभा आहे असं दाखविलं आहे आणि पोलिसांच्या मागे असलेल्या भिंतीवर ’स्टॉप शूटिंग अॲट अस’ हे वाक्य दिसतं. गाण्यात, पाण्यात बुडणार्‍या पोलिसांच्या गाडीवर बियॉन्से बसलेली दिसते.  या गाण्यातून बियॉन्सेने पोलिसांची प्रतिमा  धुळीला मिळवली असा तिच्यावर आरोप होत आहे. जे पोलिस तिला, जनतेला संरक्षण देतात त्यांची बदनामी अशारितीने करुन बियॉन्सेने काय साधलं असं लोकांना वाटतं.  वर्णभेदाविरुद्ध विरोध दर्शविण्याची सुपरबोल ही योग्यं जागा नाही या मताच्या लोकांनी राष्ट्रीय फूटबॉल संघटनेच्या कार्यालयावर मोर्चा नेण्याचं निश्चित केलं आहे.

या आधी सुपरबोलच्या इतिहासात गाजलेला प्रसंग म्हणजे  जॅनेट जॅकसन आणि जस्टीन टिंम्बरलेक यांच्या गाण्याच्या वेळेला घडलेली घटना. जस्टीन टिंम्बरलेकच्या हातून ’रॉक युवर बॉडी’ गाणं म्हणताना जॅनेटने घातलेलं जॅकेट चुकून ओढलं गेलं, फाटलं आणि त्यामुळे वक्षस्थळ उघडं पडलं. लाखो लोकांनी हा प्रसंग दूरदर्शनवर पाहिला. वार्डरोब मालफंक्शन म्हणून कुप्रसिद्ध झालेला हा किस्सा कितीतरी महिने वादळ उठवणारा ठरला किंबहुना सुपरबोल म्हटलं की प्रथम या प्रसंगाचीच आठवण आज १२ वर्ष होऊन गेली तरी लोकांच्या मनात ताजी होते. या प्रसंगाची परिणिती म्हणून कोणत्याही कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण बंदच झालं. असे अनपेक्षित लाजिरवाणे प्रसंग टाळण्यासाठी  थेट प्रक्षेपण म्हणून जे आपण पाहतो ते काही क्षणानंतर दाखविलेलं दृश्य असतं. हा प्रसंग ज्यांनी दूरदर्शनवर पाहिला नाही त्यापैकी एक होते जावेद करीम. २००४ साली तो प्रसंग पुन्हा पाहण्यासाठी काही मार्गच नव्हता. आणि नक्की काय घडलं याचं कुतूहल असलेल्या जावेद आणि त्यांचे मित्र स्टीव्ह आणि चॅड यांच्या मनात लोकं स्वत:च चित्रीकरण अपलोड करु शकतील असं संकेतस्थळ निर्माण करण्याची कल्पना आली. या कल्पनेचं मूर्त्य रुप म्हणजेच यु ट्युब. एकाच प्रसंगाने प्रसारमाध्यमामध्ये घडलेले हे २ मोठे बदल!

 सुपरबोल जसा अशा घटनांनी गाजतो तितकाच तो प्रसिद्ध आहे जाहिरातींमुळे. सुपरबोल प्रक्षेपणाच्या दरम्यान  जाहीरात झळकण्यासाठी कंपन्यांना ३० सेकंदांसाठी जवळजवळ ३० लाख डॉलर्स मोजावे लागतात. ’ क्रॅश द सुपरबोल’ अशी स्पर्धाही फ्रिटो ले ही चिप्स उत्पादक कंपनी घेते. २०१६ हे या स्पर्धेचं शेवटचं वर्ष होतं. डोरीटो चिप्सच्या जाहीरात स्पर्धेत हातात कॅमेरा आणि कल्पना असलेल्या कुणालाही भाग घेता येत होता. शेवटच्या वर्षात कंपनीने विजेत्याला हॉलिवूडमध्ये प्रवेश मिळवून देण्याचीही जबाबदारी उचलली आहे. २००६ पासून सुरु झालेल्या या स्पर्धेत २०१३ पासून जभभरातून  कुणीही भाग घेऊ शकत होतं.  आलेल्या जाहिरातीतील कमीत कमी १ जाहिरात या खेळादरम्यान दाखविण्य़ाची हमी कंपनीची. त्याव्यतिरिक्त युएसए टुडे च्या सर्वेक्षणात सर्वात जास्त गुण मिळालेल्या जाहिरातीला ४ लाख ते १० लाख डॉलर्सचं बक्षीसही कंपनीकडून मिळत होतं. या अखेरच्या वर्षी ४५०० स्पर्धकांनी यात भाग घेतला. त्यातील ५० स्पर्धकांनी उपांन्त्यपूर्व फेरी गाठली. उपांन्त्यफेरीतील ३ स्पर्धकांपैकी विजेती ठरली ती ’डोरीटोज डॉग्ज’ जाहीरात. ३ कुत्र्यांना डोरिटो चिप्स खायची इच्छा असते आणि ती ते कशी पुरी करतात ते विनोदीपद्धतीने दाखवलेली ही जाहिरात. अवघ्या १००० डॉलर्समध्ये पूर्ण झालेल्या जाहीरीतीने जेकब चेसला हॉलिवूड मध्ये प्रवेश तर मिळालाच पण त्याचबरोबर १० लाख डॉलर्सही.

युएसए टुडे च्या सर्वेक्षणानुसार व्यावसायिक जाहिरातींमध्ये या वर्षी हंडे कंपनीने बाजी मारली. गाडी आणि गाडीतील अत्याधुनिक यंत्रणेची जाहिरात करणार्‍या  जाहीरातीत मुलगी तिच्या मित्राबरोबर पहिल्यांदाच बाहेर जात आहे. वडील आग्रहाने नवीन हंडे गाडीची किल्ली मुलाच्या स्वाधीन करतात. गाडीमधील ’कार फाईंडर’ मुळे गाडी कुठे आहे ते वडिलांना कळत राहतं आणि त्या त्या ठिकाणी  ते पोचतात, दोघांना ’एकांत’ मिळूच देत नाहीत अशी ही जाहिरात. मुलगा कंटाळून थोड्याच वेळात मुलीला घरी सोडतो. आणि बाबा मुलीला विचारतात, ’मग काय केलं तुम्ही आज?’ आणि जाहिरातीचा शेवट होतो - ’बिकॉज डॅड गोट  डू व्हॉट डॅड गोट टू डू’ या वाक्याने. सुपरबोल मध्ये दाखविल्या गेलेल्या जाहिरातीत विनोद, प्राणी आणि सेलिब्रेटी ह्या ३ गोष्टींचा वापर प्रामुख्याने केलेला होता.

सुपरबोल म्हटलं की जाहिराती, वादग्रस्त घटना जितक्या महत्त्वाच्या तितकेच प्राणीही. दरवर्षी प्राणीही ही स्पर्धा कोण जिंकेल याचा अंदाज वर्तवायला पुढे सरसावतात. एका प्राणी संग्रहालयातील माकडांनी म्हणे त्यांच्यासमोर ठेवलेल्या चिठ्ठ्यांतून कॅरोलायना पॅन्थर लिहिलेला कागद उचलला तर दुसर्‍या प्राणिसंग्रहालयात कासवं संथगतीने मार्गक्रमणा करत ब्रान्को पर्यंत पोचली.  टेडी बेअर नावाच्या साळूचे  फेसबुकवर ४५००० चाहते आहेत तर यु ट्यूबवर २४००० अनुयायी. साळूचे आत्तापर्यंत ४ पैकी ३ अंदाज अचूक ठरले. यावेळीही डेनवर ब्रान्को जिंकतील हा साळूचा अंदाज खरा झाला.

या सगळ्यात सर्वसामान्यांनी तरी का बरं मागे राहावं? पैजा मारण्याची चढाओढ सुपरबोलच्या वेळी खेळात रंगत भरते. कुठला संघ जिंकेल यावरच पैजा मारण्याइतके लोक अल्पसंतुष्ट नाहीत. या वर्षी सुपरबोल होता कॅलिफोर्नियामध्ये. तिथे भूकंप होईल का, बियॉन्से कार्यक्रम सादर करेल तेव्हा कोणत्या रंगाच्या चपला घालेल, खेळ दूरदर्शनवर दाखविला जात असताना शहराला अभिमान असलेला असलेला गोल्डन गेट पूल कितीवेळा दाखवला जाईल, पेटन मॅनिंग निवृत्ती जाहीर करेल का, केली तर ते सांगताना त्याच्या डोळ्यात अश्रू तरळतील का असे  प्रश्न घेऊन एकापेक्षा एक पैजा मारल्या गेल्या. या पैजांमुळे काही काही वेळा कंटाळवाणा होऊ लागलेल्या खेळातही रंगत यायला लागते. तसंही कुणाच्या मनोरंजनाची काय साधनं असतील हे ज्याचं त्यानेच तर ठरवायचं.

आता राहता राहिले खेळाडू. कोणत्याही गोष्टीत यश मिळविण्यासाठी प्रत्येकाकडे ’लाभदायक’ म्हणून काहीतरी गोष्ट असतेच. दोन्ही संघातील खेळाडू याला अपवाद नाहीत. कुणी काळ्या रंगाचे बूट घालतं तर कुणी खेळताना च्युईंगम चघळतं, ते कडक राहिलं तर आपण जिंकणार अशी त्या खेळाडूला खात्री वाटते.

एक ना अनेक... सुपरबोल आणि त्याचे हे असे भन्नाट किस्से! आता काही काळ बियॉन्से प्रकरण चघळायचं आणि नंतर वाट पाहायची ती पुढच्या वर्षीच्या सुपरबोलची. का? अर्थात या सार्‍याच कारणांकरिता...

मोहना प्रुभुदेसाई - जोगळेकर
mohanajoglekar@gmail.com


Tuesday, February 9, 2016

ट्रम्प नावाचं बेफाम वादळ

राजकारणावर तज्ञ व्यक्ती अभ्यासपूर्ण लिहितात, बोलतात तसंच  सर्वसामान्यही या विषयावर जिव्हाळ्याने,
हिरीहिरीने मत प्रदर्शित करतात. बहुतांशी सर्वांचं  राजकारणाबद्दल स्वतंत्र आणि ठाम मत असतं आणि प्रत्येकाला ते हक्काने मांडायलाही आवडतं.  अगदी हेच सध्या अमेरिकेतील निवडणुक उमेदवारांच्या बाबतीत चालू आहे.  ओबामांची ८ वर्षाची कारकीर्द आता संपणार आहे. ८ नोव्हेंबर २०१६ ला अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष निवडून येतील. रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक पक्षातील अंतिम उमेदवार कोण ते फेब्रुवारी ते जून या दरम्यान  निश्चित होईल. सध्या वेगवेगळ्या राज्यातील उमेदवारांमध्ये होणार्‍या चर्चासत्रातून कोणता उमेदवार कोणत्या राज्यात पुढे आहे याची चाचपणी सुरु आहे. सुरुवातीला डेमोक्रॅटिक पक्षातून हिलरी क्लिंटन निवडणुकीला उभ्या राहणार आहेत का नाही याची प्रचंड उत्सुकता जनमानसात होती, त्यांनी तो निर्णय घेतल्यावर  इतर उमेदवारातून अंतिमत: त्यांची निवड होईल का या प्रश्नाची चर्चा व्हायला लागली आणि अचानक सर्वांचा रोख वळला तो  रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डॉनल्ड ट्रम्प यांच्याकडे.

रिपब्लिकन पक्षांमधून जेब बुश (माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांचे बंधू) यांच्यासह ११ उमेदवार या चुरसीमध्ये सामील झालेले आहेत. हिलरी क्लिंटन यांच्या विरुद्ध यातील समर्थपणे कोण उभं ठाकतं याबद्दल उलट - सुलट मतप्रदर्शन होत असतानाच डॉनल्ड ट्रम्पनी रिंगणात उडी मारली. त्यांनी ही उडी घेतली ती बहुधा मैदान गाजवण्याच्याच इराद्याने.  विरुद्ध असला तरीही डेमोक्रॅटीक पक्ष डॉनल्ड ट्रम्पवर खूश आहे. कारण? डॉनल्ड ट्रम्प तोंड उघडतात ते चौफेर फटकेबाजी करण्यासाठीच.  त्यामुळे रिपब्लिकन पक्षातील इतर उमेदवारांकडे कुणाचं लक्षच जात नाही. त्यांची मतं, योजना जनतेच्या मनात फार काळ रेंगाळत नाहीत कारण डॉनल्ड ट्रम्प सनसनाटी विधान करुन स्वत:कडे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी होतात. या चौफेर फटकेबाजीतील ताजं  उदाहरण म्हणजे बेकायदेशीर रित्या मेक्सिकन लोकांनी अमेरिकेत प्रवेश करु नये म्हणून सीमेवर भिंत बांधण्याची त्यांनी केलेली घोषणा. या घोषणेने अमेरिकेत खळबळ माजली. मेक्सिकन जनतेत अर्थातच असंतोष पसरला.  काहीजण खूष झाले तर काहींना डॉनल्ड ट्रम्प ’... तारे तोडतायत’ असं वाटलं. प्रत्येकाला या भिंत बांधणीबद्दल आपलं  मत व्यक्त करावंसं वाटायला लागलं.  अगदी प्राथमिक शाळेत जाणारा विद्यार्थीही या  घोषणेने पेचात पडला. या मुलाने लिहिलेला  निबंधच त्याच्या शिक्षिकेने प्रसिद्ध केला. हा छोटा मुलगा म्हणतो,
"मला स्वप्न पडलं की डॉनल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष होणार नाहीत पण ते झाले तर आशियाई, मेक्सिकन आणि आफ्रिकन लोकांना त्यांच्या देशात परत जावे लागेल.  या देशात फक्त १२००० लोक राहतील. बरेच भारतीय अभियंते (इंजिनिअर) आहेत. ते इथे नसतील तर तंत्रज्ञान नसेल. आणि तंत्रज्ञान नसेल तर नेटफ्लिक्स नसेल. अशा देशात आवडेल राहायला तुम्हाला? अर्थात नाही!"  गमतीचा भाग सोडला तरी डॉनल्ड ट्रम्प ही वल्ली चर्चेचा विषय होण्यात यशस्वी झाली आहे.

कोण आहेत हे ट्रम्प? यशस्वी उद्योजक आणि करोडपती!  दूरदर्शनवरच्या त्यांच्या  ’अॲप्रेंटीस’ या कार्यक्रमामुळे ते घराघरात पोचले.  १६ ते १८ व्यावसायिक या कार्यक्रमात भाग घेतात, स्वत:ला सिद्ध करण्यासाठी.  प्रत्येक भागाच्या शेवटी ट्रम्प त्यातील एकाला काढतात तेच  ’यू आर फायर्ड’ म्हणत. हे त्यांचं वाक्य खूप प्रसिद्ध झालं तसा त्यांचा एक घाव दोन तुकडे हा खाक्याही. निवडणुकीच्या रिंगणातही ते मांडत असलेली विधानं लोकांकरता एकाचवेळी खळबळजनक, धक्कादायक तशीच मनोरंजकही आहेत .

ट्रम्प त्यांच्या बोलण्याने लोकांची करमणूक करतात त्याचवेळी एखाद्या गटाला नाखूष. मेक्सिकन लोकांनी अमेरिकेत प्रवेश करु नये म्हणून सीमेवर भिंत बांधायचं ते जाहिर करुनच ते थांबले नाहीत तर त्याचबरोबर  मेक्सिकन अमली पदार्थ या देशात आणतात, त्यांच्यामुळे या देशातले गुन्हेगार वाढतात आणि ते बलात्कारी आहेत असं त्यांना वाटतं. काही मोजकेच सभ्य मेक्सिकन या देशात आहेत असं म्हणून त्यांनी मेक्सिकन लोकांचा रोष ओढवून घेतला आहे. मेक्सिकन जनते नंतर ते मुसलमानांवर ताशेरे झोडतात. जोपर्यंत अमेरिकन नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अंधातरी आहे तोपर्यंत मुसलमान लोकांना अमेरिकेत येण्यासाठी बंदी घालावी या विधानाने अमेरिकेत तर खळबळ माजलीच पण ब्रिटीश सरकारला ट्रम्पना ब्रिटनमध्ये प्रवेश करण्यास बंदी आणावी की काय असं वाटून गेलं. देशाच्या भविष्याच्या बाबतीत त्यांच्या योजना ह्या अशा आहेत पण त्या पूर्णत्वाला कशा जातील या बाबत निश्चित आराखडा त्यांच्याकडे नाही त्यामुळे वास्तवापासून फारकत घेतल्यागत त्यांची योजना आणि विधानं आहेत असं मानलं जातं. हे कमी असल्यासारखं रिपब्लिकन पक्षातर्फे उभे असलेले ट्रम्प राजकारणातील व्यक्तींना वेळोवेळी आपण पैसे दिल्याचं अभिमानाने सांगतात आणि त्यांना पाहिजे ती कामं  देखील या व्यक्ती त्यामुळे करतात याचा दाखला देतात. हिलरी क्लिंटनना पैसे दिल्याचे ते मान्य करतात तेव्हा ट्रम्प यांचं कोणतं काम हिलरीनी केलं असेल असा साहजिकच प्रश्न मनात येतो. त्यावर ते सांगतात की मी हिलरीना लग्नाला हजर राहण्याचं आमंत्रण दिलं आणि विरुद्ध पक्षातील असूनही हिलरी ते नाकारु शकल्या नाहीत.

हल्लीच आयोवा येथील रिपब्लिकन पक्षाच्या वाद - विवाद सभेत सहभागी होण्याचं नाकारत त्यांनी मोठा जुगार खेळला आणि तो जिंकलाही. आयोवा येथील वाद - विवाद हा उमेदवारांसाठी अतिशय महत्वाचा मानला जातो. कारण तेथील प्राथमिक निवडणुक जिंकणारा उमेदवार राष्ट्राध्यक्ष होतो असा बर्‍याच वेळा आलेला अनुभव. पण इथे येण्याचंच त्यांनी  नाकारलं ते मेगन केली या स्त्री वार्ताहारामुळे. आधीच्या एका वाद - विवादात  मेगनने त्यांच्याशी संवाद साधताना म्हटलं, की ते राजकीय व्यक्तींप्रमाणे तोलून मापून न बोलता त्यांना जे वाटतं ते बोलतात यामुळे लोकप्रिय आहेत पण कधीकधी हे बोलणं हिनपातळीकडे झुकतं. हे स्पष्ट करताना त्यांचे स्त्रियांबद्दलचे उद्गगार मेगननी त्यांना ऐकवले. त्यांनी स्त्रियांना डुक्कर, कुत्री आणि आळशी म्हटल्याची मेगननी आठवण करुन दिली. त्याला प्रत्युत्तर देताना डॉनल्डनी प्रसारमाध्यमातील रोझी ओडानल्डबद्दलच आपण तसं म्हटलं आहे असं सांगितलं. पण ते खरं नाही आणि सर्वच स्त्रियांबद्दल त्यांचं तसं मत असल्याचं मेगन यांनी ठामपणे सांगितल्यापासून डॉनल्डनी मेगन यांच्याशी कोणत्याही पद्धतीने संपर्क येऊ न देण्याचं ठरवलं. त्याचीच परिणिती म्हणून आयोवा मध्ये पुन्हा एकदा मेगन केलीच प्रश्नकर्त्या असणार हे समजल्यावर या चर्चासत्राला हजर न राहण्याचा निर्णय घेतला. ट्रम्प यांच्या अनुपस्थितीत आयोवा येथील रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांचा  वाद - विवाद किती लोकं पाहतील? ट्रम्पनी ते नसल्याने लोकांचा या वाद - विवादामधला रस नाहीसा होईल असं म्हटलं आणि प्रत्यक्षात तसं झालंही. गेल्या उन्हाळ्यात रिपब्लिकन पक्षातील उमेदवारांचं वाद - विवाद सत्र २४ मिलियन लोकांनी पाहिलं तर आयोवातील वाद - विवाद  सत्र फक्त १३ मिलियन लोकांनी. कहर म्हणजे आयोवातील ही वाद - विवाद सभा जिंकली कुणी या प्रश्नाचं उत्तर पाहता निवडणूक पूर्व गोष्टी किती मनोरंजक आहेत याची खात्री पटते. सर्वसामान्यांच्या मते हा वाद - विवाद खर्‍या अर्थी जिंकला तो मेगन केलींच्या कृत्रिम पापण्यांनी!

ट्रम्प हे इतकं वादग्रस्त व्यक्तिमत्व असूनही ते लोकप्रियतेच्या शिखरावर  सातत्याने का आहेत आणि खरंच ते राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात असं कितीजणांना वाटतं? ते लोकप्रिय आहेत ते त्यांच्या वक्तव्यांमुळे. लोकांची प्रचंड करमणूक त्यांच्या उद्गगारांनी होत असल्यामुळे आता ट्रम्प काय बोलणार या प्रतीक्षेत लोक असतात. राजकारणाशी काडीचाही संबंध नसताना ते राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात असंही मानणारे असंख्य आहेत. त्यांना पाठिंबा असणार्‍यांच्या मते ते उत्तम व्यावसायिक आहेत त्यामुळे व्यवस्थापनचा उत्कृष्ट अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. डॉनल्ड राष्ट्राध्यक्ष झाले तर सीमेवर नुसतीच भिंत  बांधणार नाहीत तर त्याचा खर्च मेक्सिकन सरकारकडून घेण्याचा त्यांचा मानस आहे यामुळेही जनता खूष आहे. ते व्यावसायिक असल्याने नोकर्‍या निर्माण करण्याचा दांडगा अनुभव देशाचा कारभार हाकताना नक्कीच कामी येईल, या देशात नोकर्‍यांची उपलब्धता वाढेल याची खात्री अनेकांना आहे. त्यांच्या कंपनीचं अनेकवेळ दिवाळं निघूनही त्यातून ते बाहेर आले याचाच अर्थ ते पुनर्बाधणी करु शकतात.  ते राष्ट्राध्यक्ष झाले तर व्हाईट हाऊस मधील कामात गर्क होतील आणि वेळेच्या अभावी त्यांचा आता कंटाळवाणा झालेला ’अॲप्रेंटीस’ कार्यक्रम बंद करावा लागेल अशी स्वप्न पाहणारेही काहीजण आहेत.

घोडामैदान फार लांब नाही. रिपब्लिकन पक्ष त्यांना राष्ट्राध्यक्ष पदासाठी उमेदवारी देतो की नाही ते लवकरच कळेल. ८ वर्षापूर्वी रिपब्लिकन पक्षातील सारा पेलन नावाच्या वादळाने देशात खळबळ माजवली होती. याच सारा पेलन डॉनल्ड ट्रम्पना पाठिंबा देत त्यांच्या पाठीशी नुकत्याच उभ्या राहिल्या आहेत. एका वादळाची दुसर्‍या वादळाला साथ. आता डॉनल्ड ट्रम्प नावाचं हे वादळ आणखी कोणाकोणाला झोडपतं ते पाहत राहायचं. दुसरं काय!

http://www.loksatta.com/lekha-news/popular-donald-trump-1199210/

Wednesday, January 27, 2016

लॉटरी!

अमेरिकेत गेल्या आठवड्यापासून सरकारी लॉटरीच्या आकड्यात ती अद्याप न जिंकल्याने भर पडत चालली आहे तशीच ती विकत घेणार्‍यांच्या संख्येतही. १.५ बिलियन डॉलर्स!  लागली लॉटरी तर? फक्त २ डॉलर्समध्ये मिळणार्‍या एका तिकिटाला जिंकण्याची शक्यता किती? तर २९० मिलियन तिकिटातून एक. तरी दरवर्षी जवळ जवळ ७० बिलियन लोक लॉटरी तिकिट खरेदी करतात. या वेळेलाही प्रत्येकाला आपणही जिंकू शकू असा विश्वास वाटायला लागलाय. बातम्या पाहताना आम्हीदेखील घरात लॉटरी लागली तर काय करु याचे बेत करुन टाकले. लहानपणी वडील दर महिन्याला लॉटरीचं तिकीट घ्यायचे. कधी ५० रुपयांच्या वर लॉटरी लागली नाही तरी महाराष्ट्र राज्य लॉटरीचं तिकीट घरात यायचं. रोज लॉटरीच्या बातम्या पाहून आज आपणही तिकीट आणूया असा बेत करुन टाकला. पण लॉटरी जीवनात आनंद घेऊन येते की  शेवटी आनंद हा मानण्यावर हेच खरं?

अमेरिकेत, पॉवर बॉल आणि मेगा मिलियन ही  लॉटरींची दोन मोठी नावं. १९९२ साली सुरु झालेला पॉवरबॉल कमीत कमी ४० मिलियनचा तर १९९६ सालापासून सुरु असलेली मेगा लॉटरीची  कमीत कमी रक्कम १५ मिलियन डॉलर्स  असते. पॉवर बॉलचं १ तिकिट २ डॉलर्सला तर मेगा मिलियनच्या एका तिकिटाची किंमत १ डॉलर. सध्या कुणाकडेच विजेते आकडे नसल्याने पॉवरबॉलची रक्कम वाढत चालली आहे. दर बुधवारी आणि शनिवारी निकाल जाहीर होतो. ६९ चेंडूमधले ५ आकडे जुळले तर तुमचं नशीब उजळतं. पण त्या व्यतिरिक्त असणारा आणखी १ चेंडू तुमचं आयुष्य बदलून टाकणारा ठरतो. या भाग्यशाली चेंडूवरचा आकडा आणि उरलेले ५ आकडे तंतोतंत जुळले की झालात तुम्ही मिली किंवा बिलि नअर.

देशात विकली जाणारी सगळीच्या सगळी तिकिटं विकत घेतली तरीही लॉटरीतून तुम्हाला फायदाच होऊ शकतो इतकी मिळणारी लॉटरीची रक्कम जास्त आहे. सर्व तिकिटांची किंमत आहे ५८४ मिलियन डॉलर्स आणि यावेळची लॉटरी आहे ९३० मिलियन डॉलर्सची.  अडचण इतकीच की इतकी सगळी तिकिटं विकत घेणं एखाद्या व्यक्तीला शक्यच नाही. पूर्ण देशात तिकिट विक्री होते. प्रत्येक ठीकाणाहूनची सर्व तिकिटं घेणं निव्वळ अशक्य. तरीही फेब्रुवारी १९९२ मध्ये काही  कंपन्यांनी एकत्र येऊन हे करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला ज्यात सर्वांना मिळून २.५ मिलियन डॉलर्सचीच तिकटं विकत घेता आली. पण लॉटरीसाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवल्या गेल्याच.  अशीच एक घडली २००५ साली. पॉवरबॉलच्या लॉटरीचे ११० लोकांचे ५ आकडे तंतोतंत जुळले आणि  जवळजवळ २० मिलियन डॉलर्सही या ११० जणांना मिळाले. काहीतरी गोंधळ असल्याची शंका अधिकार्‍यांना आली. आणि लवकरच त्याचं रहस्यही उलगडलं. न्यूयॉर्क मधील वोनटोन कंपनीने त्यांच्या बिस्किटांतून (फॉरच्यून कुकीज) ६ आकडे नशीबवान म्हणून वितरित केले होते आणि प्रत्यक्षात ते खरंच तसे निघालेही. पाच आकडे तर जुळले. जर सहावा आकडाही जुळला असता तर ह्या ११० लोकांना बिलिनिअर होण्याची संधी लाभली असती. बिस्किटांतला ६ वा आकडा होता ४० आणि लॉटरीमधील आकडा होता ४२.

मात्र आत्तापर्यंत जितक्या लोकांना लॉटरी लागली त्यातील फार कमी जणांनी ती खर्‍या अर्थी उपभोगली. बाकीच्यांना लॉटरीबरोबर आलेले ताण - तणाव झेपले नाहीत. अनपेक्षित धनलाभाने आयुष्यं खर्‍या अर्थी बदलतं. कधी सुखी जीवनाच्या मार्गावर पाऊल पडतं तर कधी हा पैसा डोकेदुखी होऊन जातो. अचानक तुमचं आयुष्य प्रकाशझोतात येतं. असंख्य समाजसेवी संस्था, उपचारांसाठी आर्थिक मदतीची अपेक्षा असणार्‍या रोग्यांचे नातेवाईक, गुंतवणुकीसाठी गळ घालणार्‍या कंपन्यां असे कितीतरी फोन वेळी अवेळी घणघणायला लागतात, कधीही न पाहिलेल्या नातेवाइकांचा जीवनात अलगद शिरकाव होतो, मित्र - मैत्रीणींची जवळीक नको तितकी वाढायला लागते. अशी एक ना अनेक उदाहरणं.

२००५ साली लॉटरी जिंकल्यावर लुईसने आपली स्वप्न पूर्ण केली. नवीन घर घेतलं. दाराशी नवीन गाडी आली. लुईसच्या नवर्‍याने, किथने बेकरीतली नोकरी सोडली आणि दिवस अंगावर यायला लागला. मन रमविण्यासाठी तो दारुकडे वळला. व्यसनाधीन झाला. दारुच्या व्यसनातून तो प्रयत्नपूर्वक बाहेर तर पडला पण जेम्स नावाच्या अनोळखी गृहस्थाने  नफ्याचं आमिष दाखवीत वेगवेगळ्यात धंद्यात त्याला पैसे गुंतवायला भाग पाडलं. त्याने गुंतवलेले सगळे धंदे नामशेष झाले. हातातला पैसा संपला तसा पुन्हा तो दारुकडे वळला. आत्तापर्यंत साथ देणारी त्याची पत्नीही कंटाळून वेगळी झाली. बेकरीतील कामगाराचं साधंसुधं जीवन पैसा आल्यावर रसातळाला गेलं आणि आलेल्या ताणातून, दारुने केलेल्या शारीरिक हानीमुळे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने किथचं २०१० साली निधन झालं.

केली रॉजरने ३ मिलियन डॉलर्सची लॉटरी जिंकल्या जिंकल्या नातेवाईक आणि मित्र मैत्रिणींवर गाडी, घर अशा महागड्या भेटवस्तूंचा वर्षाव केला. कपडे, सुंदरतेचा हव्यास बाळगत त्या पायी केलेल्या अतोनात उधळपट्टीतून  हाती आलेला पैसा केव्हा वाहून गेला  ते केलीला समजलंही नाही. मित्र - मैत्रिणींना आनंद मिळावा ही तिची इच्छा असली तरी लवकरच प्रत्येकजण तिच्या पैशावर डोळा ठेवून तिच्याशी मैत्री करत आहेत असं तिला वाटायला लागलं. आलेल्या अनुभवांनी निराश होत दोनवेळा आत्महत्येचा प्रयत्नही तिने केला आणि अखेर सर्व पैसा गमावल्यावर आता मोलकरणीची कामं करणारी केली लॉटरीपायी आलेले अनुभव विसरुन आनंदी जीवन जगण्याची इच्छा व्यक्त करते.

५५ वर्षाच्या कत्रांटदार कंपनीचे अध्यक्ष असलेल्या व्हिटेकरनी ३१५ मिलियन डॉलर्सची लॉटरी जिंकली तेव्हाच त्यातील बरीचशी रक्कम देणगी, ट्रस्ट यासाठी राखली इतकंच नाही तर जिथून त्यांनी हे तिकिट घेतलं होतं त्या दुकानातील कर्मचारी स्त्रीलाही त्यांनी घर, गाडी आणि रोख रक्कम दिली. असं असताना मग काय चुकलं? व्हिटेकर मित्र - मैत्रिणींसमवेत आनंद साजरा करायला वेगवेगळ्या क्लबमध्ये जायला लागले, दारुच्या अधीन झाले, जुगाराचा नाद लागला. मुलीला, नातीला वेळोवेळी आवश्यकता नसताना ते पैसे देत राहिले आणि त्यांच्याबरोबरीने त्या दोघी अमली पदार्थांच्या आहारी गेल्या.  त्यातच दोघींनी आपला जीव गमावला.  सुखासीन आयुष्य जगणार्‍या व्हिटेकर कुटुंबाचं आयुष्य लॉटरीच्या पैशांनी धुळीला मिळालं.

३१ मिलियन डॉलर्सची लॉटरी अब्राहमनी जिंकली. सुरुवातीची ३ वर्ष  सुखसमाधानातही गेली. पण अचानक एके दिवशी त्यांचा मृतदेह सापडला. त्यांचा खून करणार्‍या स्त्रीला अटक झाल्यावर अब्राहमनी लॉटरी जिंकल्यावर त्यांच्याशी मैत्री करुन जवळजवळ २ मिलियन डॉलर्सला त्यांना लुबाडल्याचं आणि नंतर मारल्याचं कबूल केलं. शिकागो येथील उरुज खानही  लॉटरी लागल्यानंतर महिन्याभरात मॄतावस्थेत सापडले. भारतातून आलेल्या खान कुटुंबाचं जीवन सुखी म्हणावं असंच. उरुजना असलेला लॉटरीचा नाद सोडल्यास. लॉटरी लागल्यावर मिळालेल्या पैशाचं काय करायचं याबद्दल त्यांच्या कुटुंबात वाद - विवाद होते आणि त्यातूनच त्यांना विष घालून मारण्यात आलं असावं अशी शंका असली तरी त्यांच्या मारेकर्‍याचा शोध अद्याप लागलेला नाही.

बिलींच्या आयुष्यानेही लॉटरीमुळे वेगळ्या मार्गावर वाटचाल सुरु केली. मोठ्या घरात राह्यला जायचं घरातल्या सर्वांचंच स्वप्न पूर्ण झालं. बायको, मुलांना नवीन गाड्या घेऊन देता आल्या. इतकंच नाही नातेवाइकांनाही त्यांनी खूश ठेवलं. कुणालाही मदतीची गरज असली की रोख पैसे देण्याची त्यांची तयारी असे. लवकरच त्यांच्या लक्षात आलं की प्रत्येकालाच त्यांची गरज आहे आणि इतक्या सर्वांना एकट्याने पुरं पडणं निव्वळ अशक्य. पण ते जमेल तशी मदत करत राहिले. पत्नीबरोबर सतत दुसर्‍यांना अशी पैशाची मदत करण्याबद्दल त्यांचे वाद व्हायला लागले आणि अखेर लॉटरी जिंकल्यावर केवळ दीड वर्षात निर्माण झालेल्या ताण तणावांनी आपलं जीवन संपवून त्यांनी सगळ्याला पूर्ण विराम दिला.

अर्थात लॉटरीचा पैसा व्यवस्थित गुंतवून, आपला दिनक्रम व्यवस्थित सांभाळणारीही माणसं अनेक आहेत. एमा आणि ल्युक त्यातलेच एक. ल्यूक आणि एमा मॅकडोनल्ड मध्ये काम करता करता प्रेमात पडले पण स्वतंत्र घरासाठी दोघांचा एकत्रित पगारही पुरेसा नसल्याने पालकांच्या घरीच त्यांना राहावं लागत होतं. मिलियन डॉलर्सची लॉटरी लागल्यावर नोकरी सोडायची नाही हा निश्चय काही काळापुरता टिकला. पण मुलाबरोबर वेळ घालवण्याला दोघांनी प्राधान्य दिलं, त्याचबरोबर नोकरीचा राजीनामा. पण काही दिवसातच सहकारी, नोकरी यांच्या आठवणीने चैन पडेनासं झालं. ल्यूकने पुन्हा जुन्याच जागी नोकरीला सुरुवात केली. लॉटरी पैशावर मिळणारं व्याजंही त्या दोघांच्या पगारापेक्षा जास्त होतं पण दैनंदिन जीवन न बदलता लॉटरीच्या पैशाचा आनंद उपभोगणं दोघांना जास्त सुखावह वाटलं.

रॉबिनसनने लॉटरी जिंकल्यावर शाळेतील शिक्षकांमुळे प्रेरित होऊन मुलांसाठी कार्यशाळा उभी करण्यासाठी लॉटरीतील बरीचशी रक्कम देऊ केली. आज २० वर्षानंतर ती कार्यशाळा उत्तमरीत्या चालविली जात आहे. बर्‍याच जणांनी मुलांच्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी पैसे गुंतवले तर काहीजणांनी आपल्याला लॉटरी लागली आहे हे काही महिने इतरांना कळू न देता पुढचे ताण टाळण्याचा प्रयत्न केला.  बहुतेकांनी सामाजिक जाणिवेने आपल्याला मिळालेल्या रकमेतील बरेच पैसे देणगी म्हणून देण्याला प्राधान्य दिलं.  थोडक्यात काही जण आधीही आनंदी होतेच. श्रीमंतही झाले. मनाने होतेच आता आर्थिक दृष्ट्याही.

खरंच पैशाने आयुष्यात आनंदाचा शिरकाव होतो का? यावर झालेल्या संशोधनातून असं सिद्ध झालं आहे की पगारवाढ झाली की नक्कीच सुखात भर पडते पण एका विशिष्ट वाढीनंतर त्याचा फारसा परिणाम जाणवत नाही. किंबहुना पैशाने सुख विकत घेता येत नाही ह्याचाच पैशाचा ओघ स्वत:कडे वळल्यावर बहुतेकांना शोध लागतो.

आणि तरीही आपण लॉटरी लागली तर... हे स्वप्न पाहणं विसरत नाही!

पूर्वप्रसिद्ध - लोकसत्ता - चतुरंग पुरवणी - http://www.loksatta.com/lekh-news/lottery-1192070/

Monday, October 12, 2015

काळीज कुरतडणारी वेदना


"आर यू ख्रिश्चन?" या प्रश्नावर ज्यांनी माना डोलवल्या, उभे राहिले त्यांच्यावर "गुड, विदीन अ मिनिट यु विल सी गॉड" असं म्हणत त्या तरुणाने गोळ्या झाडल्या. ऑरेगन राज्यातील एका आडगावातील कम्युनिटी कॉलेजमधील अनेक तरुण जीव नाहक प्राणाला मुकले. या वर्षात विद्येच्या आवारात घडलेली ही ४५ वी घटना. दरवेळेसारखाच पुन्हा एकदा ’गन कंट्रोल’ हा विषय चघळला जाईल ते पुढची घटना घडेपर्यंत. मोजणंही कठीण होऊन जावं इतक्यांदा हे असे प्रसंग घडतायत या देशात. दरवेळेला भयभीत चेहर्‍याची मुलं शरण आल्यासारखी दोन हात डोक्याच्या मागे धरुन आवाराच्या बाहेर पडतात. पोलिस, ॲम्युबलन्सेस, प्रसारमाध्यमांसमोर हमसाहमशी रडणारे तरुण जीव आणि पोटच्या जीवांच्या काळजीने धावत पळत पोचलेले पालक हे असं दृश्य दुर्देवाने वारंवार पाहायला मिळतं. दरवेळेला कुणाच्यातरी माथेफिरुपणामुळे निष्पाप मुलांना, त्यांच्या शिक्षकांना प्राण गमवावा लागतो. धक्कादायक म्हणण्याच्या पलिकडे गेलं आहे हे.
शाळांमध्ये होणार्‍या गोळीबारांबद्दल चर्चा सुरु झाली की हमखास ती पोचते १९९९ सालापर्यंत. २० एप्रिल १९९९ साली कॉलोरॅडो राज्यातील लिटीलटन कोलंबाईन हायस्कूल मध्ये दोन तरुणांनी अंदाधुंद केलेल्या गोळीबारात १३ मुलं मारली गेली तर ३० हून अधिक जखमी झाली. ह्या घटनेने देश हादरला पण त्या आधी आणि नंतरही सातत्याने हे सत्र चालूच आहे. २००७ साली व्हर्जिनिया पॉलिटेक्नीक मध्ये झालेल्या गोळीबारात ३२ मुलं आणि शिक्षक मारले गेले. या घटनांचा गाजावाजा जास्त झाला कारण मृत्यू पावलेल्या मुलांची संख्या. इतर ठीकाणी बळी गेलेल्यांची संख्या कमी असली तरी शाळेत होणार्‍या गोळीबारांच्या संख्येत वाढच होत चालली आहे. वर उल्लेख केलेल्या घटनांचे पडसाद हळूहळू हवेत विरतायत तोच २०१२ साली सॅंडीहूक प्राथमिक शाळेतली २० चिमुरडी मुलं आणि ६ शिक्षक अशाच गोळीबाराला हकनाक बळी पडले. या घटनेने सारा देश सुन्न होऊन गेला. त्यानंतर म्हणजे, १ ऑक्टोबर २०१५ ला घडलेला हा वर्षभरातला ४५ वा गोळीबार. प्रत्येकवेळेला मारेकर्‍यांने हे का केलं असावं याचा शोध, सोशल नेटवर्कवरचा मारेकर्‍याचा वावर, त्याने वेळोवेळी व्यक्त केलेली मतं, फोटो यावरुन बांधला जाणारा अंदाज यालाही अंत नाही. यात भर म्हणून आता कधी गोळीबार करणार्‍या मुलांच्या पालकांना, त्यांचं आपल्या मुलांवर नियत्रंण नाही म्हणून, सरकारला, शाळा मुलांचं रक्षण करु शकली नाही म्हणून, काही ठीकाणी शाळेतील कर्मचार्‍यांना, सरतेशेवटी आता बंदूक उत्पादक तसंच २५ कंपन्यांना चित्रपट आणि संकेत स्थळांवर खेळल्या जाणार्‍या खेळांमुळे मुलं हिंसकतेचा मार्ग चोखाळतात म्हणून काही पालकांनी कोर्टात खेचलं आहे. या सार्‍यातून अशा घटनांना आळा घातला जाऊ शकेल असा मार्ग खरंच सापडणार आहे की त्यातही स्वत:च्या फायद्याचा रंग आहे हे उमजणं आतातरी कठीण आहे. काळच ते ठरवील. दरवेळेला अशा घटनांची कारणमीमांसा शोधण्याचा प्रयत्न होत राहतो. निघालेल्या निष्कर्षातून उपायाची अमंलबजावणी किती वेळा होते हा भाग वेगळा. राजकारणाचे रंग इतके गडद आहेत की त्यातून ’गन कंट्रोल’ सारखे सर्वसामान्यांच्या दृष्टीने सहजसाध्य असणारे उपाय किती जणांचे बळी गेल्यावर होणार ते राजकारणीच जाणोत. तोपर्यंत हे असे प्रसंग वारंवार सर्वांच्या वाट्याला किती दिवस येत राहणार याचाच विचार मन कुरतडत राहणार. ह्याच पार्श्वभूमीवर गोळीबार करणार्‍या काही तरुणांच्या आई - वडिलांच्या मनाचा प्रसारमाध्यमांनी घेऊ पाहिलेला वेध महत्वाचा ठरावा.
कोलंबाईन हायस्कूल मधील गोळीबार करणार्‍या डिलनच्या आई - वडिलांनी त्या घटनेनंतर जवळ जवळ १५ वर्षांनी ’फार फ्रॉम द ट्री’ या पुस्तकासाठी अॲड्रुयु सोलोमनला मुलाखत दिली. प्रसारमाध्यमांनी वेळोवेळी संपर्क साधूनही इतके दिवस मौन बाळगलेल्या सुझनने अखेर आपलं मन मोकळं केलं. गुन्हा करणार्‍या मुलांच्या पालकांकडे सर्वात प्रथम दोषी म्हणून पाहिलं जातं. पालक म्हणून या मुलांचे आई - वडिल काय करत होते असं म्हटलं जातं. डिलनची आई सुझन यावर सांगते, की जेव्हा कोलंबाईन शाळेत गोळीबार झाला तेव्हा डिलनच्या मित्राचा, डिलनचा पत्ता लागत नाही हे सांगण्यासाठी फोन आला. त्यावेळेस आपला मुलगाच यात सहभागी असेल अशी पुसटशी शंकाही मनाला शिवली नाही. पण सुझन घरी येईपर्यंत घराला पोलिसांनी वेढा घातला होता. हताशपणे या सार्‍याला सामोरं जाताना इतक्या जणांच्या मृत्यूला आपला मुलगा कारणीभूत ठरला यावर विश्वास ठेवणं सुझनला कठीण जात होतं. डिलनबद्दल सांगताना ती म्हणते, ’चार चौघांच्या मुलांसारखाच तोही वाढला. किंबहुना त्याची ओळख हुशार मुलगा म्हणूनच होती. जी गोष्ट करेल ती मन लावून करणारा मुलगा होता तो. वडिलांबरोबर तास न तास बुद्धीबळ खेळणं हा त्याचा आवडता छंद. पालक म्हणून आमच्या समोर कधीच कोणतीही आव्हानं त्याने उभी केली नाहीत. व्हिडीओ गेम्स, स्वत:च्या खोलीत तास न तास काढणं हे जी इतर मुलं या वयात करतात तेच तोही करत होता. एकमेव प्रसंग होता तो, कधीतरी रात्री त्याने आणि एरिकने रस्त्याच्या कडेला उभी असलेली गाडी उघडल्याचा. त्याची शिक्षाही त्याने भोगली होती. मात्र त्यावरुन तो हे टोक गाठेल किंवा ही त्याच्यातील विक्षिप्तपणाची लक्षणं आहेत अशी शंकाही आली नाही.’
डिलनच्या या कृत्यानंतर सुझनच्या मनात कितीतरी वेळा आत्महत्येचा विचार डोकावून गेला. तिचं बाहेर जाणं बंद झालं, नोकरीवर पुन्हा रुजू होऊनही कामातलं लक्ष उडालं. तिच्या वेळी अवेळी रडण्याने आजूबाजूच्या लोकांची अवस्था अवघड होऊन जाई. ते जाणवत असूनही तिला जोरजोरात रडावंसं वाटे. आडनाव सांगण्याचीही शरम वाटायला लागली. रेडिओ, टीव्ही लावण्याचं बळ गेलं. आपल्या मुलाने असं करावं यावर विश्वास ठेवणं जितकं कठीण जात होतं तितकाच पालक म्हणून डिलन आणि एरीकचे आई - वडिलच गुन्हेगार आहेत असा प्रसार माध्यमांतून आळवला जाणारा सूरही सुझनचं काळीज भेदून टाकत होता. मुलाखतकर्त्याला ती सांगते, ’माझं मुल गमावल्याचा शोकही मी करु शकत नव्हते अशी अवस्था होती. काय चुकलं माझं? लाड केले जास्त की फार जास्त स्वातंत्र्य दिलं? नक्की काय चुकलं की त्याने असं वागावं? पालक म्हणून आमचं काय चुकलं ह्या प्रश्नाचं उत्तर कधीच मिळणार नाही का? हे कृत्य करण्याच्या थोडे दिवस आधी मी त्याचा हात तळव्यात धरुन माझं त्याच्यावरचं प्रेम व्यक्त केलं होतं, आई म्हणून त्याचा अभिमान वाटतो हे सांगायला विसरले नव्हते. याचाच विपरित परिणाम झाला असेल? माझ्या अपेक्षांना तो पुरा पडणार नाही हे तर त्याच्या मनाने घेतलं नसेल? खूप विचार करते तेव्हा आता मनातल्या मनात मीच त्याची क्षमा मागते कारण, कदाचित त्याला माझ्या मदतीची गरज असेल हे ओळखण्यात मी अपयशी ठरले.’ हे सांगून त्या गोळीबारात बळी पडलेल्या काही पालकांनी संपर्क साधला तो क्षण गहीवरुन टाकणारा असल्याचं ती सांगते. या गोळीबारात ठार झालेल्या मुलांच्या आई - वडिलांनी जेव्हा त्यांची भेट घेतली तेव्हा गहिवरलेल्या डिलन आणि एरिकच्या आई - वडिलांनी मुलांनी आपल्याला मुर्ख बनवल्याची भावना व्यक्त केली.

सॅंडी हुक प्राथमिक शाळेत गोळीबार केलेल्या घटनेतला गुन्हेगार होता अॲडम लान्झा. याच्या बाबतीत मात्र त्याचे वडिल त्याचं वेगळेपण नमूद करतात. लहानपणी लक्षात न आलेलं अॲडमचं वेगळेपण तो माध्यमिक शाळेत जायला लागल्यावर जाणवायला लागलं. काहीतरी चुकत होतं. अॲडम एक्कल कोंडा व्हायला लागला, नजर टाळायला लागला. त्याची झोप हरवली. शाळेत येऊन गोळीबार करणार्‍यापूर्वी स्वत:च्या आईला ठार मारणार्‍या अॲडम बाबत पालक म्हणून त्याची आई कमी पडली हे मात्र ते अमान्य करतात. अॲडम वडिलांबरोबर राहत नसला तरी अॲडमच्या आईने त्याच्यावर उपचार व्हावेत म्हणून प्रयत्न केला होता. मात्र आपल्याला उपचाराची गरज आहे हे मान्यच नसणार्‍या अॲडमचा उपचारांना दिला जाणारा प्रतिसाद उत्साहवर्धक नव्हता. मानसोपचार तज्ञांकडे त्याने कधीच मोकळेपणाने आपल्याला काय वाटतं ते सांगितलं नाही. यामुळेच पालक म्हणून आपण काही निराळं करु शकलो असतो हे त्यांना मान्य नाही. या सार्‍याचा वडिल म्हणून झालेल्या परिणामाबद्दल ते म्हणतात, ’रात्री खूपदा एकच स्वप्न पडतं. ज्यात दाराच्या पलिकडे कुणीतरी संतप्त नजरेने आपल्याकडे पाहतंय असं वाटतं. त्या चेहर्‍याकडे पाहिल्यावर माझी गाळण उडते. विचार केल्यावर लक्षात येतं की दारात उभा असलेला तो चेहरा अॲडमचा असतो आणि अॲडमच्या हातून प्राण गमावलेल्या मुलांचं मी प्रतिनिधित्व करत असतो. त्यामुळे माझी भितीने गाळण उडते. ’
वरील २ उदाहरणं सोडल्यास आत्तापर्यंत शाळेच्या आवारात घडलेल्या गोळीबाराच्या घटनांतून गुन्हेगारांचे पालक फारसे बोलते झालेले दिसत नाहीत. जे झाले ती घरं आपल्यासारखीच मध्यमवर्गीय वातावरणाची वाटतात. ते सांगतात त्यापेक्षा खरंच काही पालक म्हणून ते वेगळं करु शकले असते असं वाटत नाही. मग ही मुलं अशी का वागतात या प्रश्नाची उकल तशीच राहते. मुलांच्या कर्मांचं ओझं वाहण्याखेरीज पालकांसाठी अशाने काही पर्यायच उरत नाही. मग नक्की प्रतिबंध तरी कसा करणार या गोष्टींना? बंदूक नियत्रंण? मानसिक विकृतीचा वेळीच शोध आणि त्यावर त्वरित योग्यं उपचार? सळसळत्या तरुणाईला अयोग्यं मार्गाकडे जाण्यापासून रोखणं? मुलांमध्ये होत असलेल्या सुक्ष्म फरकाचीही नोंद घेऊन त्यांना बोलतं करणं? प्रश्नांच्या जंजाळातून खात्रीलायक नसले तरी हे काही मार्ग दिसतात. प्रश्न आहे तो त्या मार्गावर पाऊल टाकण्याचा. कधी होणार हे, कोण करणार आणि कसं?


लोकसत्तेच्या, ११ ऑक्टोबरच्या ’लोकरंग’ मध्ये हा लेख प्रसिद्ध झाला आहे.   दुवा:काळीज कुरतडणारी वेदना

Thursday, October 3, 2013

मी काय करु...


"अहो, मीनाचा फोन होता."
वर्तमानपत्रातलं डोकं बाहेर न काढता अण्णांनी हुंकार दिला.
"उन्हाळ्याच्या सुट्टीत बोलावते आहे." अण्णांनी फक्त वर्तमानपत्र थोडं बाजूला करत वत्सलाबाईंकडे नजर टाकली.
"नाही, म्हणजे मुलांना सुट्टी लागली आहे ना. त्याच्यांकडे लक्ष द्यायला कुणीतरी पाहिजे म्हणत होती."
"वत्सला, हे नवीन आहे का तुला? दरवर्षी जातोच की आपण तिकडे मुलावर लक्ष पाहिजे म्हणून. आणि तुम्ही दोघंही आहात इथे तर छोटीला पण काढते पाळणाघरातून म्हणाली असेल."
"काय करायचं मग? आता झेपत नाही ही उस्तवारी. म्हणजे सुरुवात प्रवासापासूनच होते. कल्पनेनंच नको वाटतं." दुखरे पाय चोळत त्या तिथेच टेकल्या.
"नाही जमणार सांग. तिकडे असतात चांगली पाळणाघरं आणि काय ते त्यांचे समरकॅम्प पण असतात त्यात घाल म्हणावं मोठ्याला."
"सांगितलं. खूप महाग पडतं म्हणे ते. भारतात पाठवून देते मुलांना. एखादी दिवसभराची बाई लाव, पैसे देईन म्हणते आहे."
"काय नालायक मुलं आहेत ही. पैसे फेकले आमच्या तोंडावर की झालं. त्याचं सगळं केलंच आपण. आता पार साता समुद्रापलिकडे जाऊन बसली आहेत. उन्हाळ्यात तिथे जाऊन त्यांच्या मुलांना सांभाळायचं.  इथे आम्हाला कोण सांभाळणार? झाली म्हणावं आमची देखील वयं आता.  दे तो फोन इकडे. मीच सांगतो तिला." वत्सलाबाई उठल्या नाहीत. म्हणता म्हणता एक घाव दोन तुकडे करतील. ते सांधायला पुन्हा सगळी मानसिक शक्ती घालवायची ती आपण.  अण्णांनीही परत वर्तमानपत्रात डोकं खुपसलं.  वत्सलाबाईंच्या मनाला थकव्याने एकदम वेढा घातला.

मीनाच्या वागण्याचं त्यांना राहून राहून आश्चर्य वाटत होतं. आता हे दरवर्षीचं झालं होतं. जून महिना जवळ आला की त्या अस्वस्थ व्हायच्या. मीनाचा फोन घेऊच नये असं होऊन जायचं. पण किती ठरवलं तरी सगळं त्याचक्रमाने घडायचं. अडीच तीन महिन्यांनी भारतात परत यायला निघताना प्रत्येकवेळी त्या तिथून येताना बजावून नाही का यायच्या,
’आता पुढच्या वेळेस तुझी तू सोय बघ गं बाई. नाही हो झेपत आम्हाला हा प्रवास, पुन्हा घरीही तशी दिवसभर उठबस होते ना, त्यांने अगदी थकून जायला होतं.’ त्यांना सगळी वाक्य जशीच्या तशी आठवली. पण दरवेळी उगाच मुलीचं मन कशाला दुखवा, नातवंडाचं मायेने कोण करणार म्हणून परदेशवारी व्हायचीच. पण हल्ली हल्ली मनात एक सल दाटून यायला लागला होता.  वाटायचं,  मायेने करतो आहोत त्याचा फायदा तर घेत नाही ना ही? जिथे तिथे हिशोबाने वागणं, त्यापुढे आमच्या त्रासाची, दुखण्याखुपण्याची पर्वा वाटत नाही की डोळ्यावर कातडंच ओढून बसली आहे?  एक वर्ष अण्णांचीच तब्ब्येत बरी नव्हती तेव्हा जमलं नाही जायला, तर मोठ्याला दिलं पाठवून इकडे. काय धावपळ उडाली. मीना म्हणते तशा बायका थोड्याच मिळतात आजकाल. मिळाल्या तरी त्यांची  तंत्र सांभाळावी लागतात. शेवटी नाशिकच्या लेकीला बोलवून घ्यायला लागलं. तिने केलं सगळं पण गरज पडली की तिचाच कसा उपयोग होतो ते सांगायला विसरली नाही.  दरवर्षी मीनाच्या मदतीला झेपत नसताना का धावता हा नेहमीचा प्रश्न विचारायलाही विसरली नाहीच.


मुली मोठ्या होत असताना दुसर्‍याचा विचार करायला शिका हे मनात रुजवायचं राहूनच गेलं का?  कधी कुठल्या कामाला हात लावू दिला नाही, अडचणी कळू दिल्या नाहीत ते अभ्यासात अडथळा नको म्हणून. पण त्यामुळेच सगळं  विनासायास मिळतं, आपल्या मनासारखंच झालं पाहिजे हीच सवय लागली. स्वत:पुरतं पाहिलं की संपलं असं वागणं, विशेषत: मीनाचं. काय चुकलं आपलं? मुलींनी स्वावलंबी बनावं एवढंच होतं मनात. पण ते करता करता रोवलं गेलेलं महत्वाकांक्षेचं रोपटं आडवं तिडवं फोफावलं. मीनाच्या धिटाईचं, हुशारीचं कौतुक करता करता ती म्हणेल ती पूर्व असंच होत गेलं.  त्याचा फायदा ती तिच्या नकळत घ्यायला शिकली असं तर झालं नाही ना? ती कर्तृत्ववान निघाली. इंजिनिअर होऊन स्वत:च्या हिमतीवर परदेशात शिक्षणासाठी गेली. पण हे एवढंच पुरे असतं? कर्तृत्ववान बनविता बनविता माणूस  घडवायचं राहूनच गेलं का?. कुणाची चुक? का घरोघरी हे असंच होतं? त्याचं त्यानाच ठरवता येईना.

"चहा करतोय मी माझ्यासाठी. तुला हवा आहे का?" अण्णांनी  विचारलं तशा त्या विचारांतून बाहेर आल्या.

>>>
"काय झालं? येते आहे का मग तुझी आई?" मयुरेशच्या प्रश्नावर मीना काहीच बोलली नाही.
"त्यांचं नक्की होत नसेल तर आईला पाहतो जमतंय का."
"आता तिला विचारलं आहे ना. तिचं कळू दे. मग बघू."
"पण हो, नाही काहीतरी म्हणाल्या असतील ना?"
"काही बोलली नाही. कंटाळते हल्ली ती दरवर्षीच्या प्रवासाला."
"तुझा पण अट्टाहास का तुझ्याच आईला बोलावण्याचा?"
"निश्चिंतं राहता येतं मग. तुझी आई आली की तिच्यावर जास्त ताण पडू नये याची काळजी घेण्याचाच ताण येतो माझ्या मनावर."
"हे अतिच तुझं.  बघ, तुझं तू ठरव. परत माझे आई, बाबाच करतात असं ऐकवू नकोस म्हणजे झालं." तिने नुसतीच मान उडवली. मयुरेशने आठवड्याचे कपडे यंत्रात धुवायला टाकले तसं भाजी चिरता चिरता तिचं मनंही एका लयीत मागे पुढे होत राहिलं.
खरं तर आईने मागच्या वेळेस बजावून सांगितलं होतं पुन्हा नाही यायला जमणार म्हणून. पण मग करायचं काय? आजी आजोबा आले की किती खुश असतात दोघं. आता आणखी थोडी वर्ष. मोठी झाली की रहातीलच एकटी. समर कॅम्प, पाळणाघर दोन्हीचा खर्च खूप.  पुन्हा पैशांनी प्रेम थोडंच मिळतं? आई आली की तिच्या हातचे चविष्ट पदार्थ पण मिळतात चाखायला. पण मागच्यावेळेला आईने एका मैत्रीणीकडेच बोलून दाखवलं, झेपत नाही असं सांग म्हणे आमच्या वतीने मीनाला. तिने तेव्हा मैत्रीणीलाच म्हटलं होतं,
’नको सांगू मला. मनाला लागून राहतं.’ मैत्रीण गप्प बसली. आईचा राग आला होता.  खरंच त्यांना इतकं नको वाटतं इकडे यायला? मुलांचं जबाबदारीने, प्रेमाने त्यांच्याइतकं कोण करणार? आणि दोन महिन्याचा तर प्रश्न. भारतात गेले की आरामच आराम. पोळ्या करायला, भाज्या चिरायला बाई आहे, दोघंच्या दोघं तर असतात.  इथे निदान आमचा सहवास मिळतो, अधूनमधून फिरवून आणतोच की दोघांना. बाहेर जातो जेवायला. तिकीटाचा खर्च तर मी करुच देत नाही  म्हणजे आई, बाबांची तयारी असते पण मी बोलावलं आहे तर मी थोडीच करु देईन. मीही नोकरी करते तर एवढं तर हक्काने करु शकतेच. मग तरीही आई, बाबा का नाही खुश? आईला मुळी कशात समाधानच नाही. आणि बाबा. ते म्हणजे एकदम रोखठोक.  चिडले की तोफ. स्पष्ट बोलून मोकळे.  मागे एकदा म्हणाले होतेच की भारतात त्यांचे मित्र त्यांना बेबीसीटर म्हणून चिडवतात. दुर्लक्ष करा म्हटलं तर म्हणाले, पण ते खरंच आहे ना?

 काय खरं, काय खोटं तेच समजेनासं झालं आहे.  आणि आता इतक्या उशीरा कुठे नावं नोंदवणार समरकॅम्पमध्ये, जागा शिल्लक नसणारच.  चिरलेली भाजी फोडणीला टाकत तिने कॅलेंडर पाहिलं. आई, अण्णाचं किती तारखेचं  आरक्षण करणं  सोयीचं पडेल याचा विचार करत मीनाने  त्यांचा नंबर फिरवायला सुरुवात केली.



Tuesday, August 6, 2013

तळ्यात मळ्यात


(बृहनमहाराष्ट मंडळ वृत्तांतात (BMM Vrutta) माझ्या दरमहिन्याआड प्रसिद्ध होणार्‍या लेखातील १ ला 
लेख.)

भल्यामोठ्या बॅगा  पेलत, धापा टाकत तिसर्‍या मजल्यावरच्या दारासमोर दामले कुटुंब उभं होतं. इमारतीसाठी लिफ्ट  नाही याचा पुन्हा एकदा केतनला वैताग आला. पण आत्ता नानांना भेटायची आतुरता जास्त होती. केतनने अधीरतेने दरवाज्याची घंटा दोन तीन वेळा वाजवली.
"अरे आलो आलो लेकांनो. दम धरा जरा." नानांचा दमदार आवाज दाराच्या फटीतून बाहेर ऐकू आला तसा केतन खूश झाला.
"तीच ऐट आहे बघ बाबांच्या आवाजात. खणखणीत आवाज एकदम. वय फिरकलेलंच नाही त्यांच्या आजूबाजूला." मीराकडे पाहत केतन म्हणाला. मीरा नुसतीच हसली. तोपर्यंत नानांनी दार उघडलं होतं. केतन त्यांच्या मिठीत अलगद सामावला. मीरा आणि मुलं कौतुकाने ती भेट पाहत होते. आवाज खणखणीत असला तरी नानाचं थकलेपण मीराच्या नजरेतून सुटलं नाही. ती तिथेच नमस्कारासाठी वाकली. नाना एकदम खूश झाले,
"सुखी भव." मीराला मनापासून आशीर्वाद देत नातवंडांच्या पाठीवर त्यांनी कौतुकाची  थाप मारली.  अरे, आत तर या आधी असं म्हणत दारापासून नाना बाजूला झाले.

आत पाऊल टाकलेली  मीरा नुसतीच खोलीकडे पाहत राहिली. पसारा, नुसताच पसारा सर्वत्र. जागा मिळेल तिथे काही ना काही पडलेलं होतं.   गरम गरम चहाचा कप आयता मिळावा, थोडा वेळ निवांत पडावं असं तिला मनापासून वाटत होतं. केतनच्या हट्टाखातर  माहेरी, मुंबईत न थांबता मिळेल त्या विमानाने ती सगळी सुरतला पोचली होती. तिथून गाडीने नवसारी. समोरचा पसारा पाहून हे आवरल्याशिवाय विश्रांती घेणं आपल्याला जमणार नाही हे तिला ठाऊक होतं. टापटिपीचं विलक्षण वेड असलेल्या नानी गेल्यावर घराची झालेली अवस्था पाहून तिचा जीव गलबलला. तिच्या चेहर्‍यावरचे भाव निरखीत नाना म्हणालेच,
"मीरा बेटा, तू नको लक्ष देऊ पसार्‍याकडे. ब्रम्हचार्‍याची मठी अशीच असायची. त्यातून ताराबाईंना बोलावलं होतं साफसफाई करायला, पण अजून जमलेलं दिसत नाही त्यांना यायला. येतील. तुम्ही आधी बसा रे बाबांनो. मी चहा टाकतो फक्कडसा." नानांची लगबग पाहून केतन हसला.
"नाना, तुम्हीच बसा. आता सून आली आहे ना दिमतीला. तीच करेल  तुमच्यासाठी फक्कडसा चहा."
शहाणाच आहे, स्वत: करावा की इतकं आहे तर...मनातले विचार मनातच दाबून ती घाईघाईने चहा करायला वळली. डायनिंग टेबलावर टाचणी ठेवायला जागा नव्हती. एकीकडे टेबला आवारायला घेत तिने चहाचं आधण ठेवलं.
चहा पिता पिता सगळी नानांशी गप्पा मारायला बसली. नानींच्या आठवणीने गहिवरली. गेल्या वर्षी नानी अचानक गेल्या, त्यातून नाना, केतन अजूनही सावरले नव्हते. नानां आता एकटेच राहत होते. पंचाऐंशी ओलांडलेल्या नानाचं  आपल्याकडे येऊन न राहणं मुलांना नापसंत असलं तरी मीरा समजू शकत होती. जिथे सारं आयुष्य गेलं ते सोडून कुठे जायचं या वयात? आणि स्वत:चं घर तीच आपली हक्काची कुटी.

बापलेकाच्या गप्पा रंगल्या होत्या.  मुलंही संभाषणात सहभागी झाली.   प्रवासाची चौकशी झाली, कोण फोन करतं, कोण कोण भेटतं, लग्न, मुंजीत कुणाच्या भेटी झाल्या, नातेवाईक, शेजारी पाजारी सगळे कसे आहेत असे काही ना काही विषय निघत राहिले. गप्पांना अंत नाही असं वाटत असतानाच हळूहळू संभाषण मंदावलं. मुलं तिथून उठली. केतन संगणका समोर जाऊन बसला. मीरा आणि नानाच तिथे राहिले तसं मीराला राहवलं नाही.
"नाना, ठाऊक आहे तुम्ही नाहीच म्हणाल; पण चला नं आमच्याबरोबर. कबूल नाही केलंत तरी घराची दशा पाहून तुमचीही अवस्था कळते आहे मला."
"नको बेटा अशी गळ घालूस. ती असताना येत होतोच ना अधूनमधून. आता नवसारी सोडून कुठे जावंसं नाही वाटत. तू म्हणते आहेस यातच सारं काही आलं. आता काही जास्त दिवस उरलेले नाहीत माझे."
म्हणूनच...असं म्हणावंसं वाटलं तिला पण डोळ्याच्या कडेला जमू पाहणारे अश्रू लपवीत ती उठलीच,
"थोडावेळ पडते. ताराबाई नाही आल्या तर जेवणाचं बघावं लागेल नं...." असं काहीसं पुटपुटत.

पलंगावर पडल्यापडल्या ती विचारात गढून गेली. डोळा लागतो आहे असं वाटतानाच फोन वाजला तसं आपसूकच तिचं लक्ष त्या बोलण्याकडे वळलं.
नानांच्या लेकीचा फोन असावा,
"दादा कॉम्प्युटरवर करतोय काहीतरी. मीरा पडते म्हणाली जरा. मुलं? त्याचं फोनवर  काहीतरी चालू आहे." नणंदेने काय विचारलं त्याचा अंदाज तिला नानांच्या उत्तरावरून येत होता.
"नाही, नाही. झाल्या की गप्पा गोष्टी. पंधरा वीस मिनिटं. हो, मग प्रत्येकजण लागला आपापल्या उद्योगांना. मी? मी काय करणार? बसलो आहे नेहमीसारखा." नानांच्या आवाजात तक्रारीचा सूर मिसळला. मीराला उगाचच अपराधी वाटलं. जेमतेम अर्धा तास संमेलन भरल्यासारखा गोंधळ होता हॉलमध्ये. संभाषणातले विषयच संपल्यावर नुसतं समोरासमोर बसून करायचं काय? आल्याआल्या जो उत्साह असतो, भेटण्याची अनिवार ओढ असते त्याची पूर्तता झाली की काय उरलं? उरलेले दोन आठवडे आता तेच. चहा घेत, जेवताना थोडंफार काही बोलणं होणार, भेटायला येतील कुणी ना कुणी, थोडंफार फिरणं, खरेदी. ती तिच्या आई, बाबांकडे राहायला जाणार. एक दोन दिवस तिच्या माहेरी केतन येऊन राहणार. पुन्हा नवसारीत काही दिवस आणि मग संपला मुक्काम. केतनला नानांची ओढ आणि तिला माहेरची या एकाच कारणाने भारतभेट होते. इथे येऊन रोजची फक्त पाच दहा मिनिटं आपण एकमेकांशी बोलणार की संपलं. हे असं का व्हायला लागलं आहे? असं नव्हतं पूर्वी. किती पत्र लिहायची ती दोन्ही घरी. लिहिलेल्या पत्रांच्या उत्तराची दोघंही आतुरतेने वाट पाहायचे. केतन तर रोज संध्याकाळी मराठी गाण्याच्या कॅसेट लावून बसायचा, आठवणीत रमायचा. आलटून पालटून पंधरा दिवसांनी दोघांपैकी एकाच्या घरी फोन करून त्यांनाच एकमेकांना खुशाली कळवायला सांगायची. दोन अडीच वर्षांनी गेलं की मनात साचलेलं सारं उतू जायचं, आनंदाला उधाण यायचं. गप्पा,  तास न तास, दिवस दिवस रंगायच्या, शेजारी पाजार्‍यांबद्दलच्या उखाळ्यापाखाळ्या, नातेवाइकांची ख्याली खुशाली ऐकणं, भारतातल्या घडामोडी यात आला दिवस कसा संपायचा तेही कळायचं नाही. कधी संपलं हे सारं?

इंटरनेट आलं, इ मेलचा जमाना सुरू झाला, पण त्याचं सूत काही वृद्ध मंडळीशी जमत नव्हतं.  दोन्हीकडून फोन करणं सोपं, स्वस्त झालं तेव्हा समीकरणं बदलली. वरचे वर फोन व्हायला लागले. मग पत्र मागे पडली. फोनवर रोजची ख्यालीखुशाली, पाककृत्या, जेवणाचे बेत... सगळं बोलणं होऊन जाई.  स्काइप आलं तसं आयुष्याला नवीन वाटा फुटल्या,
"बरं झालं बाई, आपण दोन्हीकडे कॉम्प्युटर घेऊन देऊ,  आई, बाबां, नानांना पाहिल्याचं समाधान मिळेल." दोन्हीकडची म्हातारी माणसं आपल्याला हे नवीन तंत्र कसं जमेल या धाकधुकीत असतानाच कॉम्प्युटर थडकला देखील.  इमारतीतली उत्साही मुलं आजी आजोबांना मदत करायला सरसावली. हळूहळू ते तंत्रही साधलं आणि मग अमेरिका - भारत अंतराची दरी बुजून गेली.

पण  दीड दोन वर्षांनी इथे आल्यावर बोलायला, गप्पांचे फड जमायला काही उरलंच नाही. काय सांगू, काय नकोची असोशी राहिली नाही. सगळं फोन, स्काइपने आधीच पोचलेलं एकमेकांकडे. प्रत्यक्ष भेटीचा आनंद काही क्षण मग उरलेला वेळ नाना म्हणाले तसा. खरंच काय गमावलं आणि काय मिळवलं आहे आपण? नक्की कुठल्या गोष्टीत सुख जास्त होतं की ते मानण्यावर शेवटी? पत्र, अधूनमधून फोन आणि मग चातकासारखी वाट पाहत  दीड दोन वर्षांनी झालेली भेट,  गप्पांनी भरलेला, आठवणींनी भिजलेला प्रत्येक दिवस की रोजच्या घाईगडबडीत एक दोन मिनिटं ’आवाज’ ऐकायला म्हणून केलेला फोन, रविवारी कामं उरकता उरकता स्काइपवरचं दर्शन आणि मग ही अशी भेट.  नानांना, आई, बाबांना यातलं खरंच काय आवडत असेल? वाटत असेल त्यांना की चाललंय हेच ठीक, मुलाबाळांची खुशाली रोजच्या रोज कळते, दर आठवड्याला गावातच असल्यासारखं पाहायला मिळतं, गप्पा नाही रंगल्या इथे आल्यावर तरी आजूबाजूला असणारं त्याचं अस्तित्वच पुरेसं आहे की अधूनमधून केलेले फोन, भावनेने ओथंबलेली पत्र आणि भेटायला आले की सतत आजूबाजूला घुटमळणं, किती बोलू न काय करू असं होऊन जाणं. काय भावत असेल नक्की त्यांना? विचारावं...? नकोच.

मीरा विचारात गढून गेली. बराचवेळ. अचानक पर्याय सापडल्याच्या आनंदात ती उठली. नानांचा भरल्या घरातला एकटेपणा पुसून टाकायचं तिने मनाशी पक्कं केलं. पत्ते खेळायला सर्वांना बसवयाचंच असं ठरवून ती  उत्साहाने बाहेरच्या खोलीत डोकावली.

हा लेख लोकसत्तेच्या ’चतुरंग’ पुरवणीतही प्रसिद्ध झाला आहे. दुवा - http://www.loksatta.com/chaturang-news/story-of-nana-and-his-family-219898/





Tuesday, March 13, 2012

क्षितीज - भाग १०

 टेक्सास राज्यातल्या विद्यापीठाकडून त्याचा अर्ज स्विकारल्याचं पत्र आलं आणि त्याची धांदलच उडाली. आईचा थोडा हिरमोड  झाल्यासारखा झाला. जवळपासच्या विद्यापीठांमध्ये त्याने अर्ज केले होते तिथेच प्रवेश मिळाला असतातर जाणं येणं सोयीचं झालं असतं, असं तिला वाटत होतं. आता टेक्सास म्हणजे विमानप्रवासाशिवाय मार्गच नाही. त्याचाच दुसरा अर्थ सारख्या सारख्या भेटीही  नाहीत. पण नेहालाही तिथेच प्रवेश मिळाल्याचं समजल्यावर दोघांच्याही आईबाबांना फार बरं वाटलं. दोन्ही मुलांना आता एकटेपणा वाटणार नव्हता. किंबहुना एकमेकांच्या सहवासात आपली आठवण रहिली तरी खूप असही त्यांच्या मनात येवून गेलं.

एकेक करुन सगळं आवरलं आणि त्याला अगदी मनापासून वाटलं यावेळेस तरी आईला सांगायला हवं तिच्या पत्रांबद्दल. तो  धाडधाड जिने उतरत अर्ध्यावर आलादेखील तिला सांगायला. पण एकदम त्याने विचार बदलला. तशीच दमदार पावलं टाकत तो त्याच्या खोलीत शिरला. टेबलावर पडलेला कागद त्याने उचलला आणि कोर्‍या कागदावर शब्द उमटायला लागले.

’प्रिय आई  ......’


शुभम आज कॉलेजसाठी निघणार. खरं तर तिला खूप वाटत होतं त्याची तयारी करावी, बरोबर खायचे पदार्थ करुन द्यावेत.  त्याच्या आवडत्या चकल्या तिने आधीच केल्या होत्या. पण आणखी काय करायचं? स्वतःची तयारी तोच करत होता. लहान असताना छोट्या छोट्या गोष्टींसाठी तिच्यावर अवलंबून असणार्‍या शुभमने आधीच घोळ न घालण्याबद्दल बजावलं होतं. गेल्या आठवड्यात त्याला पत्र लिहायचं राहूनच गेलं. खरं तर तिला प्रचंड काळजी वाटायला लागली होती ती त्याच्या सेलफोनच्या वापराची. बातम्यांमध्ये हल्लीच तिने ऐकलं होतं की हे देखील एक व्यसनच आहे. आणि शेवटी आजार म्हणूनच त्याच्याकडे पहावं  लागणार अशी चिन्ह आहेत इतकी मुलं, मोठी माणसही सेल फोनचा वापर करतात. कधीही शुभमला पहा, कानात कायम हेडफोन नाहीतर फोनवर बोलणं चालू.  एकदोनदा तिने शुभमला सांगायचा प्रयत्न केलाही. पण त्याचं नेहमीसारखच.
"कुठे वापरतो मी इतका?"
"तास न तास गाणी ऐकत असतोस सेलफोनवर. नाही तर मग गाणी डाऊनलोड करणं चालू असतं कॉम्प्युटरवरुन. ते नाही तेव्हां मित्रमंडळींशी गप्पा."
"पण  अभ्यासात प्रथम श्रेणी आहे की कायम"
"अभ्यासाचा आणि एखाद्या गोष्टीचं व्यसन असण्याचा काय संबंध आहे, शुभम?"
"व्यसन कुठे?"
"नाहीतर काय? त्यादिवशी एकदिवस तुझा फोन मागितला वापरायला तर किती कटकट केलीस. मला लागतो, मी वापरतो, धावायला गेलं तर तुम्हाला फोन कसा करु? कुणाशीच गप्पा मारता येणार नाहीत. कारणच कारणं."
"हो पण त्याला व्यसन काय म्हणतेस? खरी तर कारणं आहेत सगळी."
तिने मग तो नाद सोडून दिला. शब्दा शब्दाचे खेळ करण्यापेक्षा त्याला पत्र लिहलेलं चांगलं. टेक्सास विद्यापीठाकडून प्रवेश मिळाल्याचं कळल्यानंतर घरात गडबडच उडाली. पत्र लिहायचा विचार बाजूला राहिला. शुभमने जेव्हा क्रिमिनल टेक्नॉलॉजीमध्ये (गुन्हा अन्वेषण तंत्रज्ञान) पदवी घ्यायचं ठरवलं तेव्हां ती नाराज झाली होती. शुभमचा मेडिकलचा ओढा कळल्यावर जेवढी ती खूष  होती तितकीच त्याच्या बदललेल्या बेताने ती निराश झाली. माहेरी, सासरी शुभम पहिला होणारा डॉक्टर याच कल्पनेत ती गेली तीन चार वर्ष रमली होती. पण हेही खरं होतं की शुभमच्या आवडीने त्याला काय करायचं ते त्याने ठरवावं याबद्दल पालक म्हणून दोघांची भूमिका ठाम होती. शेजारी आलेल्या नेथनच्या उदाहरणाने तो हेलावून गेलेला तिला जाणवलं होतच पण त्यासाठी तो  त्याचं क्षेत्रच बदलेल याची अपेक्षा नव्हती. पण एकदा ते स्विकारल्यानंतर दोघांनी त्याचं कौतुक केलं, पाठिंबा दिला.

तिला काय काय आठवत राहिलं. तो लहान होता तेव्हां त्याच्या शाळेच्या आंतरराष्ट्रिय सोहळ्यात तिने मागे लागून त्याला  घालायला लाववेला कुडता पायजमा. शाळेत पोचल्यावर रडून रडून त्याने तो बदलायला लावला तेव्हां झालेली तिची चिडचिड. रस्त्यावर दिसलेलं जंगली कासव. दोघांनी ते कासव  घरी आणलं. पण कायद्याने कासव घरात ठेवता येत नाही हे समजल्यावर त्याला जवळच्या तळ्यात परत सोडावं लागलं. हिरमुसल्या शुभमची समजूत घालण्याचा तिने केलेला आटापिटा, सायकलवरुन  पडल्यावर कपाळाला घालावे लागलेले टाके, शुभमचा गोल्डफिश गेल्यावर प्रथमच माणसंही मरतात ह्या सत्याला स्विकारताना  त्याला झालेला त्रास. कधी खोटं बोलल्याबद्दल, कधी दिलेल्या वेळेत घरी परत न आल्याबद्दल, वेळोवेळी त्याला मिळालेल्या शिक्षा,  आणि बाकिच्या मुलांप्रमाणे निन्टेंडो, गेमबॉय असले खेळ दिले नाहीत तेव्हां सगळ्यांना सगळं मिळतं, प्रत्येकाकडे ह्या गोष्टी असतात असं म्हणत त्याने केलेलं आकांडतांडव. तिला आत्ताही हसायला आलं. त्यावेळेस शांतपणे तिने  तू त्या सगळ्यांकडे  खेळायला जातोस तेव्हां वापरतोसच की त्या गोष्टी असं म्हटल्यावर 'दॅट्‌स्‌ नॉट फेअर' म्हणत दाणदाण पाय आपटत केलेला त्रागा...  त्यावेळेस  तू त्यांच्याकडेच जाऊन रहा, पहा ती लोकं दत्तक घेतात का, असं म्हटल्यावर तो गप्प झाला होता. कधीतरी शुभमने  स्वतःच अशा गोष्टी नव्हत्या म्हणून त्याला लागलेलं वाचनाचं वेड मान्य केलं तेव्हां तिला मनस्वी आनंद झाला होता. त्यानंतर  पुस्तकाचं जग हा मायलेकातला मोठा दुवा बनला. आत्ताही तिला खात्री होती की फोन करुन अगदी टेक्सासमधूनही तो त्याने  वाचलेल्या पुस्तकाबद्दल चर्चा करेल. पण आता त्याच्या भेटी सुट्टीतच. घर अगदी सुनंसुनं होवून जाणार तो गेल्यावर. कल्पनेनेच  आत्ताही ते भलं मोठं घर तिला अंगावर आल्यासारखं वाटायला लागलं. तिचे डोळे पाणावले. पाखरांना पंख फुटल्यावर ती उडणार हे  सत्य स्विकारणं भाग असलं तरी जीव कासावीस व्हायचा थोडाच थांबतोय?

आज पाच वाजताचं विमान होतं त्याचं. तयारी झाल्यावर तो गप्पा मारायला खालीच येवून बसला. त्याचा बाबा आणि तो बराच  वेळ टेक्सास बद्दलच बोलत बसले. शुभमचा उत्साह पाहिल्यावर तिने प्रयत्नपूर्वक आपली अस्वस्थता दूर सारली.
"तू बॅग नीट भरलीस ना?"
"अगं भरली गं."
"नंतर आठवतं तुला, हे राहिलं, ते राहिलं. यावेळेस परतही येता येणार नाही राहिलं म्हणून."
"घेईन मी तिकडे विकत."
"मग काय? बोलायलाच नको."
"सायकल नाही ना नेता येणार माझी?"
"नाही. आणि इतक्यात विकत पण घ्यायची नाही. कॅम्पसमधल्या कॅम्पसमध्ये कशाला लागेल?"
"बरं नाही घेणार मी विकत"  शुभमने फारसा वाद घातला नाही.
"रोज रात्री फोन करायचा." बाबाने असं म्हटल्यावर शुभमला हसायला आलं.
"पण तुम्ही तर म्हणता मी फार जास्त वापरतो फोन"
"कामासाठी वापरायला कुठे मना करतो आम्ही? आणि आम्हाला रोज रात्री फोन करायचा म्हणजे तुझ्या दृष्टीने कामच की."
"यु आर राईट." शुभमने असं म्हटल्यावर सगळ्यांनाच हसायला आलं.
आई-बाबाला घट्ट मिठी मारत त्याने दोघांचा निरोप घेतला. एअरपोर्टवर ती त्याला सोडायला जाणार नव्हती. दारापाशी उभं राहून हात हलवताना डोळ्यातलं पाणी बाहेर ओघळू नये म्हणून ती आटोकाट प्रयत्न करत होती. तितक्यात गाडीपाशी पोचलेला शुभम परत आला.
"तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं होतं."
"आय लव्ह यू म्हणणार आहेस का इकडच्या पद्धतीने?" तिने कसनुसं हसत विचारलं.
"नाही, माझ्या खोलीत एक खोका आहे. तो जपून ठेव. मी नंतर कधीतरी तो नेणार आहे."
ती पुढे काहीतरी विचारणार तितक्यात  बाबाची जोरदार हाक आली.
"चल पळतो मी. बाय मॉम, आय लव्ह यू मॉम." तो हात हलवत निघून गेला.
दार बंद करत ती त्याच्या खोलीकडे वळली. पलंगा खाली  पडलेला खोका तिने अतीव उत्सुकतेने ओढला आणि तिला आनंदाश्रु आवरेनासे झाले. शुभमने लिहलेलं पत्र त्यावर चिकटवलेलं होतं. तिला लिहलेलं पत्र. उतावळेपणाने तिने पत्र  उघडलं.

* * * * * * * * * * * * * * * * * * * *
प्रिय आई,
मराठीत पत्र लिहतोय मी. खूप चुका असतील पण माझं मराठी पत्र पाहून तुला झालेला आनंद माझ्या  डोळ्यासमोर येतोय. मी कधीच तुला सांगितलं नाही पण तुझ्या प्रत्येक पत्राची मी फार आतुरतेने वाट पाहिली. नेहानेही. कधीतरी तू पत्र लिहायची नाहीस तेव्हां फार बेचैन व्हायला व्हायचं. एकदा तर मुद्दाम भांडण कर म्हणजे आई पत्र लिहेल असं नेहाने सुचवलं होतं. बाय द वे, बाबाकडून मला 'ता. क.', 'चि.', 'सौ.' अशा शब्दांचे अर्थ समजले. कुठलीही गोष्ट फार जास्त स्पष्ट करत राहतो तो, त्यामुळे समजलं नाही असं होतच नाही. तुझे शाळेतले दिवस तर फारच छान होते. तू लिहायला कशी लागलीस ते नंतर लिहलं नाहीस. पण मी बाबाला विचारलं. तो म्हणाला तुझा निबंध एकदा शाळेतल्या भिंतीवर लावला होता. वर्गात सरांनी वाचून  दाखवला आणि त्यांनी सांगितलं की इतकी वर्ष शिक्षक म्हणून काम केलं पण पहिल्यांदाच निबंधाला पैकीच्या पैकी गुण दिले. त्यानंतर मग तू लिहायला लागलीस. हाच प्रसंग लिहणार होतीस ना तू शिक्षकांमुळे विद्यार्थी कसे घडतात ते सांगताना? पण अशा  कितीतरी गोष्टी लिहशील म्हटलस आणि विसरलीस बहुधा. का मी विचारेन म्हणून वाट पहात होतीस? या गोष्टी विसरलीस की काय असं विचारावसं वाटायचं पण असही वाटायचं की पत्र वाचण्यात जी मजा आहे ती वेगळीच. एकदा का मी तुला विचारलं असतं की मग बाकिच्या पत्रांबद्दलही बोललो असतो आपण. मला नेमकं तेच नको होतं. तू लिहलेली सगळी पत्र मी या खोक्यात  जपून ठेवली आहेत. ती तशीच ठेव. मला ती माझ्या मुलांसाठी ठेवायची आहेत.... हं हं, हसू नकोस काय माझे बेत म्हणून. तुझ्या पत्रांमुळे माझ्यात किती बदल झालाय याची तुला कल्पनाही करता येणार नाही. प्लीज सगळी पत्रं जपून ठेव. कितीदातरी मी ती  परत परत वाचतो. आत्ताही मला ती घेवून जाता आली असती पण कधीतरी तुला कळायला हव्यात नं पत्रांबद्दल, माझ्या भावना.  पुढच्या वेळेस नेईन मी. प्रॉमिस कर की त्या पत्रांच्या गट्ठ्यात भर पडलेली असेल. नाहीतर असच का नाही करत? तू मला चक्क  पोस्टानेच का नाही  पत्र पाठवत? हसु आलं ना मी ई मेलच्या जमान्यात पोस्टाने पत्र पाठव म्हणतोय. अगं, मलाही तुम्ही जशी आतुरतेने पोस्टमनची वाट पहायचात तसं करुन बघायचं आहे. पाठवशील ना?
                                                                                                                                                                                      तुझा,
                                                                                                                                                                                           चि. शुभम

ता. क. : लव्ह यु मॉम. लव्ह यु मॉम, लव्ह यु मॉम .......... आय नो! बाबा म्हणेल, 'शुभम! असं लव्ह लव्ह व्यक्त करत नाही होत प्रेम; यु हॅव टू फीऽऽऽल द लव्ह'. पण तू म्हणतेस तसं रोज नाही तरी कधीतरी सांगितलं तर काय बिघडलं, इथल्या लोकांसारखं? खरं ना?
* * * * * * * * * * * * * * * * * * * *
तिच्या हातातलं पत्र डोळ्यातल्या अश्रुंनी ओलचिंब झालं होतं. खोक्यातलं एकेक  पत्र काढत तिनेच लिहलेल्या त्या पत्रांवर ती मायेने अलगद हात फिरवत राहिली.



समाप्त

पूर्वप्रसिद्धी ’व्हिवा’ लोकसत्ता

Wednesday, March 7, 2012

क्षितीज - भाग 9

 शुभम खिन्न मनाने खिडकीतून मागच्या अंगणातलं ते झाडाजवळचं बाकडं न्याहाळत होता. अपघात झाल्यानंतर सहा महीने ते बाकडं त्याचा विसावा झाला होता. घरातल्यांचा राग आला, खूप थकवा आला, निराशा झाली की, आणि आनंद झाला तेव्हां देखील तिथेच तो बसायचा. दुसरीत असताना त्याने त्याच्या प्रिय माशाला, ’बेट्टा’ला, तो मेल्यानंतर  बाजूलाच पुरलं होतं.  शुभमने त्या ठिकाणी लावलेल्या रोपट्याचं मोठं झाड झालं होतं. आज त्याला एकीकडे कॉलेज जीवनाची उत्सुकता, काहीशी भिती, दडपण होतं आणि या घराचा आता निरोप घ्यावा लागणार म्हणून आलेली अस्वस्थता. शुभम शर्टांच्या घड्या करुन व्यवस्थित बॅगेत भरत होता. सगळं लहानपण या घरात गेलेलं. आणि आई-बाबा हा तर गृहित धरलेला त्याच्या आयुष्याचा भाग होता. तेच तर काळजी घ्यायचे त्याची. जमेल एकट्याने रहायला?

विचारांचं चक्र मनात गरगर फिरत होतं पण हात नकळत एकेक काम आटपत होते. कपडे भरता भरताच बाजूला पडलेला पुस्तकांचा ढीग त्याला खुणावत होता.  सगळी पुस्तक वाचनालयात आईलाच परत करावी लागणार. या पुस्तकांनी त्याला आईच्या खूप जवळ आणलं होतं. शाळेत  ऐकलेलं, शिक्षकांनी सांगितलेलं पुस्तक याबद्दल तो बोलला की आई आवर्जून ते पुस्तक वाचनालयातून आणायची. शुभमही झपाटल्यासारखा वाचायचा. अभ्यासाच्या व्यापात वेळ मिळाला नाही की कधी गाडीत, कधी जिन्यात असं करुन पुस्तक कधी संपायचं ते कळायचही नाही. आईलाही तो गोष्टीत खेचून घ्यायचा. तीही उत्साहाने ऐकायची, पुढे काय होत असेल त्याचा अंदाज  व्यक्त करायची. त्यामुळेच त्यालाही प्रत्येक पुस्तकं कधी वाचून संपवतोय असं व्हायचं. आता हे सगळं संपणार होतं. पुढच्या  आठवड्यात तो कॉलेजसाठी बाहेर पडणार होता. कुणाला सांगणार आता गोष्टी? नेहाला गोष्टींमध्ये  रस नव्हता. ती कवितात रमणारी. बाबाही 'बोअर नको करुस, पटकन संपव'  म्हणायचा. त्यातून आईने त्याला लिहलेली पत्र! आता लिहेल आई  पत्र? आत्तापर्यंत त्याने तिच्या पत्रांचा पुसटसा उल्लेखही कधी केला नव्हता. आईला गोष्ट सांगताना, गप्पा मारताना कितीतरी वेळा  त्याला तिला सांगावसं वाटायचं की तूही फार छान लिहतेस. तू का नाही अशा गोष्टी लिहीत? पण जणू तिची पत्र ही त्याची  खाजगी मालमत्ता होती. तोंडातून शब्दच फुटायचा नाही. कदाचित आईने विचारलं असतं तर तो बोललाही असता पण तिनेही कधी एका शब्दाने विचारलं नाही. त्याच्या घशात कड दाटून आले. आई, नेथन आणि रहस्यकथा यानीच तर डॉक्टर व्हायचा ध्यास  सोडून टाकावसा वाटला की काय? गेली चार वर्षं कार्यानुभव म्हणून वैद्यकीय क्षेत्रातील वेगवेळ्या विभांगाचीच त्याने चाचपणी केली  होती. आणि प्रत्यक्षात त्यालाही शक्यता न वाटलेलं क्षेत्र त्याने निवडलं. सगळं तसं अचानकच बदललं होतं. गेल्या काही  आठवड्यातल्या घडामोडींची तो उजळणी करत राहिला.

हायस्कुलचं शेवटचं वर्ष. बारावी. शुभमने कितीतरी ठिकाणी कॉलेज प्रवेशाचे अर्ज भरायचे ठरवले होते. ज्या शाखांसाठी अर्ज कराल  त्याला अनुसरुन त्याच्याबरोबर लिहावे लागणारे निबंध. या निबंध लिहण्याच्या प्रकारातून बरीच मुलं लेखक होतील असच त्याला  वाटायला लागलं होतं. चार वर्षात त्याने दर मे महिन्याच्या सुट्टीत वेगवेळ्या क्षेत्रात काम करुन पाहिलं होतं. माध्यमिक शाळेत  असतानाच केलेला वैद्यकीय क्षेत्राची ओळख करुन देणारा पंधरा दिवसाचा कॅम्प त्याला आठवला. सगळ्या विभागांची तोंडओळख  तेव्हां झाली. त्यावेळेस मिळालेल्या कितीतरी गोष्टी त्याने अजून जपून ठेवल्या होत्या. कॅलक्युलेटर, कंम्पास पेटी, मॅग्नेटिक पॅड  ..... नववीत गेल्यावर हॉस्पिटलमध्ये घेतलेला कार्यानुभव. आत्ताआत्तापर्यंत होईन तर डॉक्टरच म्हणणार्‍या शुभमचं मत अचानक बदललं. त्याला क्रिमिनल जस्टीस टेक्नॉलॉजीने (गुन्हा अन्वेषण तंत्रज्ञान) वेड लावलं.
गेल्या वर्षी शेजारच्या घरात आलेला नेथन हेच  त्याचं मुख्य कारण होतं. नेथनला बाबा नव्हते. आई किरकोळ कामं करत चार मुलांचं कसंबसं भागवत होती. घर म्हणजे, हाऽ कचरा. भावंडांची खडाजंगी. एकदा चढे आवाज ऐकून कुणीतरी पोलिसांना बोलावलं आणि ती सगळी भावंडं विखुरली गेली. घराची विकट अवस्था आणि मुलांकडे दुर्लक्ष या कारणाने आईकडून चारी भावंडं सरकारने जबरदस्तीने ताब्यात घेतली. कायद्याने त्यांचा ताबा सरकारकडे होता. आता अशी मुलं स्विकारतील त्यांच्या घरी रहायचं. गेल्या  तीन वर्षात नेथन दोन तीन घरात राहून आता  शेजारच्या घरी आला होता. त्याची त्यांच्या भावडांबरोबर भेट दुर्मिळ झाली. आई कोर्टाच्या पायर्‍या झिजवून थकून गेली होती. दुखावलेला, संतप्त, बेफिकीर नेथन फुटबॉलसारखा वेगवेगळ्या घरात टोलावला जात होता. सतत बदलल्या जाणार्‍या  पालकांना स्विकारायचा अयशस्वी प्रयत्न करत होता. कधीतरी त्याच्याशी बोलण्याची वेळ यायची तेव्हां म्हणायचा,
"आम्ही कुणीच काही गुन्हा केला नव्हता. ना आईने, ना भावंडांनी. तरी ही वेळ का आली आमच्यावर? का, का असं झालं? मी  घरात मोठा पण मला काहीच करता आलं नाही" जेमतेम तेरा वर्षाचा नेथन स्वतःला मोठा समजत होता.  नेथनने बेसबॉल, बास्केटबॉल खेळायला यावं म्हणून शुभमने केलेल्या प्रयत्नांना त्याने दादच दिली नाही. त्याचं लहानपण त्याला सोडून गेलं होतं. मनात दडलेली भिती सतत फणा काढून उभी राही. या घरात त्याचं वागणं आवडलं नाही तर पुन्हा रवानगी दुसर्‍या घरी. शुभमला वाटायचं या यंत्रणेतच काहीतरी बदल करायला हवा. असं दुसर्‍यांच्या घरी जबरदस्तीने रहाण्याऐवजी त्याच मुलांच्या घरची  परिस्थिती बदलायचा का प्रयत्न करत नाहीत? मुलांना काय हवय, कुठे रहायचं ते का नाही विचारत? त्याचं मन, भावना नको का जाणून घ्यायला. ह्याचाच परिपाक म्हणून त्याने गुन्हा अन्वेषण मध्ये पदवी घ्यायचं ठरवलं. त्याने हा विचार नेहाला बोलून  दाखवला तेव्हां तिला धक्काच बसला.
"नेथनमुळे वाटतय तुला हे. पण खरच त्या विषयाची आवड आहे का ते कसं कळणार तुला आता. इट्‌स्‌ टू लेऽट टू ट्राय समथिंग लाईक धिस."
"आवड आहे की नाही हा प्रश्नच नाही. तू पहायला हवस नेथनला. किती एकलकोंडा झालाय तो. आमचे शेजारी अथक प्रयत्न  करतात त्याने सर्वांशी मिळून मिसळून वागावं, हसतमुख रहावं म्हणून. पण हा कायम निर्विकारच. कुठल्याही भावना चेहर्‍यावर येवूच देत नाही. त्यामुळे त्यानांही समजत नाही काय करावं. मग शेवटी त्यांनी त्याला परत पाठवलं तर? खूप भिती वाटते मला या विचाराने. नेथनला हे समजावून सांगितलं पण तो बदलतच नाही."
"अरे पण त्यासाठी तू तुझं वैद्यकीय शाखेचं स्वप्न सोडणार?"
"स्वप्न म्हणजे काय गं? इतर क्षेत्रं तशी फारशी माहित नसतात. आपणच डोक्यात घेवून बसतो काहीतरी. डॉक्टर, इंजिनिअर होणार म्हटलं की कोण कशाला नाही म्हणतय? त्यामुळे तेच मनात रहातं. पण लेट मी पुट धिस इन अनदर वर्डस्‌. नाऊ धिस  इज माय ड्रीम. आय वाँट टू मेक अ चेंज इन सिस्टिम अँड दीज किड्‌स्‌."
"एल ओ एल." नेहाने पटकन टाईप केलं.
"हसतेस काय, तुला नाहीच कळणार एखाद्या गोष्टीसाठी वेडं होणं म्हणजे काय."
"अरे तू दीज किड्‌स्‌ म्हटलस म्हणून हसतेय मी. तू काय असा मोठा माणूस झालायस का? आणि वेडं होणं म्हणजे काय ते  माझ्यापेक्षा कुणाला कळणार चागलं? झालेय की मी तुझ्यासाठी वेडी."
त्याने हसर्‍या चेहर्‍याचं चिन्ह (स्माईली फेस) पडद्यावर ओढलं.
"तू जर आता हे करायचं ठरवलयस तर मग माझं काय?"
"तुझं काय? तू जाऊ शकतेस की मेडिकलला."
"अरे हो, ते कळतय रे मला. पण मग आपली स्वप्नं? दोघांनी एकत्रच शिकायचं ठरवलं होतं ना?"
"अगं मी नुसतं म्हणतोय. अर्ज केले की ते स्विकारले गेले पाहिजेत ना."
"आणि तुझा सगळा कार्यानुभव आहे तो मेडिकलचा."
"हो, म्हणूनच थोडीशी धाकधुक वाटतेय. त्यामुळे मी मेडिकेलसाठीही अर्ज भरणार आहे. ते तर आपण एकत्रच भरु. म्हणजे माझं  नाही झालं क्रिमिनल जस्टीसचं तर निदान मेडिकलला एकत्र असू."
"आय होप सो. "
"आणि मी क्रिमिनलला आणि तू मेडिकलला असं असलं तरी कदाचित एकाच युनिव्हर्सिटीत मिळेलही प्रवेश. कॅम्पस असतील  वेगळे. पण मग भेटूच की आपण. आणि तू म्हणतेस तसं दगडी चौथर्‍यावर झाडांच्या सावलीत गप्पा मारु"
"खरच तसं झालं तर बरच. बेस्ट लक शुभम."
"बेस्ट लक टू यु टू नेहा."

त्यानंतर त्याने घरात सांगितलं होतं. आई-बाबा दोघांनाही थोडसं आश्चर्य वाटलं पण कुणीच नाकं मुरडली नाहीत. कदाचित नेथनचं  जितंजागतं उदाहरण समोर होतं म्हणून? त्याने त्यावर फारसा विचारच केला नाही. मेडिकललाच गेलं पाहिजे म्हणून मागे लागले  नाहीत हेच  खूप होतं. शाळेत म्हणतात की भारतीय मुलांचे आईवडीलच त्यांनी काय करायचं, व्हायचं ते ठरवतात. पण तो काय किंवा नेहा काय दोघांच्याही आईवडिलांनी त्यांना पुरेपुर स्वांतंत्र्य दिलं होतं.  स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही हे ही वारंवार बजावायला विसरले नव्हतेच म्हणा ते. आता फक्त वाट पहायची होती...



क्रमश:
पूर्वप्रसिद्धी ’व्हिवा’ लोकसत्ता


Friday, February 24, 2012

क्षितीज - भाग 8

बसने जाणं जसं शुभमला आवडत होतं, तसचं कधी एकदा ड्रायव्हिंग शिकतो असंही झालं होतं. लवकरच दोन्ही गोष्टीतलं नावीन्य संपलं. सवय झाली. कधी गाडी, कधी ड्रायव्हिंग असं चालू झालं, त्यालाही आता वर्ष होवून गेलं. आज मात्र ड्रायव्हिंग शिकायलाच नको होतं असं वाटत होतं.

'कशाला शिकलो ड्रायव्हिंग असं झालय. हात मोडलेला, पाय मोडलेला अशा अवस्थेत किती दिवस घरी रहावं लागणार आहे  कुणास ठाऊक. मला एका हाताने टाईप करणंही कठीण जातय.' शुभमने नेहाला टेक्स्ट केलं. त्यानंतर मात्र त्याच्यात त्राणच राहिलं नाही. वीस वर्षापर्यंत मेंदू तातडीच्या प्रसंगात निर्णय घेण्याएवढा विकसित झालेला नसतो हे, आईने सांगितलेलं तज्ञाचं मत खरं असावं असं आज त्याला प्रथमच वाटत होतं. हायस्कुलमधलं हे शेवटचं वर्ष. दोन महिने उरलेले त्यानंतर कॉलेज. गॉश! परीक्षा, मार्कस्‌, कॉलेज प्रवेश.....  सगळं घरात बसून कसं पार पडणार? थकल्या मनाने त्याने खुर्चीवरच मान मागे  टेकवली पण दृष्टीसमोर चार दिवसापूर्वी घडलेला अपघातच येत राहिला.
अकरावीपर्यंत काही केल्या त्याला ड्रायव्हिंगची संधी घरातून मिळाली नव्हती. शाळेतच शिकून घेता येतं म्हणून तो गाडी दहावीतच शिकला. पण घरची गाडी मिनतवार्‍या करुनही मिळत नव्हती. अगदी क्वचित फार हट्ट केला की जवळच्या रस्त्यावर एक चक्कर टाकायला मिळे तेवढच. गाडी शिकल्यापासून इथे तिथे जायलाही त्याला गाडीशिवाय पर्याय नाही असच वाटायला लागलं  होतं. दरवेळेला कशाला आई-बाबाला आणणं पोचवणं याचा त्रास? दोघांना पटवायचा अयशस्वी प्रयत्नही केला शुभमने. शेजारचा सॅम काय टेचात स्पोर्ट कार चालवातो. त्याच्या नाकावर टिच्चून त्याला आपली गाडी भरधाव, खचकन ब्रेक दाबून, व्हि सिक्स इंजिनचा आवाज करत चालवायची होती. शेवटी बारावीत गेल्यावर आईच्या जुन्या गाडीवर समाधान मानावं लागलं.
वर्ष बरं गेलं, आणि चार दिवसापूर्वी, शनिवारी सकाळी तो मित्राकडे जायला म्हणून घराबाहेर पडला. फार लांबही नव्हतं घर. रोजचाच रस्ता. गाडीचा वेगही कमीच होता. शनिवारची सकाळ. त्यामुळे फारशा गाड्या नव्हत्याच रस्त्यावर. गाडीत लावलेल्या  रेडिओवरच्या गाण्यात शुभम रंगला होता. डावीकडे वळायचा सिग्नल अजून पिवळा होता. तो लाल व्हायच्या आधी आपण गाडी  वळवू असाच अंदाज बांधला शुभमने. थोडासा वेग वाढवत त्याने गाडी वळवली. आणि काय होतय ह्याची जाणीव होईपर्यंत  समोरुन आलेली गाडी त्याच्या गाडीच्या उजव्या बाजूवर आदळली. त्याचं अनुकरण करत मागून आलेली गाडीही धाडदिशी त्याच्या गाडीच्या मागच्या भागावर आदळली. सीटबेल्ट घातलेला असूनही शुभमच्या मानेला जोरदार हिसडा बसला. बाजूने आदळलेल्या गाडीमुळे खिडकीच्या फुटलेल्या काचाही उजव्या गालात रुतल्यासारख्या वाटल्या.  सगळ्या गाड्या कर्कश्य आवाज करत थांबल्या. त्याने हात हलवायचा प्रयत्न केला खरा. पण हात हलेना. पायातूनही प्रचंड कळा येत होत्या. मागून आपटलेल्या गाडीचा ड्रायव्हर तोपर्यंत मदतीसाठी धावला होताच. समोरुन आपटलेल्या गाडीतल्या माणसांनाही लागलं असावं. शुभमच्या डोक्यातलं विचारचक्रही  थांबलच. ऍम्ब्युलन्स, फायर ब्रिगेडचे आवाज कानात घुमायला लागले तेव्हां कुणीतरी सेलफोनवरुन ९११ ला कॉल केल्याचं त्याला  जाणवलं.  शुभमला अतीव वेदनेने गुंगीच आली. जाग आली ती हॉस्पिटलमध्येच. हातापायाला प्लॅस्टर आणि समोर बसलेले आई-बाबा.
"कसं वाटतय?" आईच्या आवाजातला हळुवारपणा जाणवून त्याला एकदम रडायलाच यायला लागलं. 
"बाकीच्या गाडीतली माणसं कशी आहेत?" मनातल्या मनात प्रार्थना करत त्याने प्रश्न केला. तरुण मुलांच्या निष्काळजीपणाने  हकनाक बळी गेलेल्या माणसांच्या किती कथा त्याने ऐकल्या होत्या. आपल्यामुळे कुणावर तशी वेळ येवू नये याचं भान त्याला तशाही अवस्थेत होतं. 
"सगळी ठीक आहेत. मागच्या गाडीतल्या माणसाला फार लागलेलं नाही. समोरुन जी गाडी आदळली त्यातल्या बाईंनाही सुदैवाने फारसं लागलेलं नाही. एक हात थोडासा सुजलाय तेवढच. पोलिसांना तुझ्याशी बोलायचं आहे. विमा कंपनीच्या माणसांनाही काही प्रश्न विचारायचे आहेत. या गोष्टी लगेचच कराव्या लागतात. तेव्हां जे आठवत असेल ते आणि काय असेल ते खरं सांगून टाक."  बाबा आणि आईच्या आश्वासक वागण्याने त्याला डोक्यावरचं प्रचंड ओझं क्षणभराकरता का होईना उतरल्यासारखं वाटलं. पुढच्या  दोन दिवसात बर्‍याच गोष्टी घडल्या. पोलिसांचे अगणित प्रश्न, विमाकंपनीने झटकन वाढविलेला विमा, त्या दोन गाड्यातली माणसं  कोर्टात तर खेचणार नाहीत ना, ही भिती तर होतीच. या चार दिवसात त्यापैकी कुणाचा फोन आला नव्हता. पण बर्‍याचदा नंतर मान दुखतेय, पाठीला मुका मार बसला या कारणांनी पैसे काढण्याचा प्रयत्न करतात असं कालच त्याची भेटायला आलेली  मित्रमंडळी सांगत होती. आई किंवा बाबा काहीच कसं बोलले नाहीत? त्याला आश्चर्य वाटलं.
 दोन दिवसांनी घरी आल्यावर त्याच्या खोलीत दोघं येवून बसले होते. तेव्हां त्यांनी विचारलेले प्रश्न त्याच्या डोळ्यासमोर नाचले.
"तू सेलफोन वर नव्हतास ना बोलत?" आईने थेट मुद्यालाच हात घातला.
त्यालाही झाल्या प्रकारामुळे दोषी वाटत होतच. नेहमीचा आक्रमकपणा कुठेतरी लोपला होता. 
"नाही. मी गाडी चालवताना कधीच सेलफोन नाही गं वापरत. तुम्ही रोज बाहेर पडायच्या आधी आठवण करुन देताच की."
"तरी खात्री करुन घ्यायला हवीच. टेक्स्टिंग नव्हतं ना चाललेलं?" बाबाने पुढचा प्रश्न विचारला. त्याने नुसतीच नकारार्थी मान  हलवली.
"लाल सिग्नलवर डावीकडे वळवलीस गाडी?"
"नाही. पिवळ्यावर." हळुच तो उत्तरला.
"अरे पण किती वेळा सांगितलय की सिग्नल पिवळा होतय असं दिसलं की थांबायचं. भलतं धाडस करायचं नाही. अवघे काही  सेकंद नाहीतर मिनिटं वाचतात, पण ते वाचवायला जाताना काय घडू शकतं ते पाहतोयस ना?"
"आय ऍम रिअली सॉरी. चुकलं माझं" थोडावेळ तो गप्पच राहिला. विचारावं की नको या संभ्रमातच त्याने विचारलं.
"कुणी 'सू' (खटला) नाही ना करणार आपल्याला? माझे मित्र म्हणत होते की पैसे उकळायला पाहतात मानेचं, नाहीतर पाठीचं  दुखणं सुरु झालं म्हणून."
"अजूनतरी नाही. त्या समोरुन येणार्‍या गाडीतल्याच बाई सेलफोन वर बोलत होत्या बहुतेक. पण खटला होण्याची शक्यता नाकारता नाही येत.  ते बघू आपण नंतर. आत्तातरी तुझा अभ्यास, परीक्षा हे सगळं कसं पार पडणार हे पाहायला हवय." दोघांनीही त्याला धीर देत  म्हटलं. त्याला ड्रायव्हिंगबद्दल हजार सूचना करणारी, बडबडणारी आईही शांत होती. त्यामुळे तर शुभमला अधिकच दोषी वाटत होतं. चूक असून किंवा नसूनही वाढलेला विम्याचा हप्ता डोळ्यासमोर नाचत होता. त्याच्या लायसन्सवर आलेले पॉईंट्‌स्‌ अस्वस्थ  करत होते. त्यात आणखी हे कोर्ट प्रकरण नको उद्भवायला. या पेक्षा गाडी नसतोच शिकलो इतक्या लवकर तर? उगाचच त्याला  वाटत राहिलं. तो त्याच्या बाजूला निशब्द बसलेल्या आई बाबांकडे काही न बोलता पहात राहिला. हळूहळू औषधांचा प्रभाव शरिरावर जाणवायला लागला. डोळ्यावर झापडच आली त्याच्या. गाढ झोप लागली. कधीतरी आईने त्याच्या उशीच्या बाजूला चिठ्ठी ठेवली.

* * * * * * * * * * * * * * * * * * * *
पिल्या,

असा झोपून राहिलेला, थकलेला, वाद न घालणारा शुभम पाहणं फारसं सोपं नाही. मला तुझ्या चेहर्‍यावरुनच कळतय की तुला  फार अपराधी वाटतय. झालं ते झालं. आता त्याची चर्चा करण्यात, उगाळण्यात काय अर्थ आहे. थोडक्यात निभावलं यात समाधान  मानायचं. नववीतच सगळी मुलं शिकतात म्हणून तुलाही शिकायचं होतं ड्रायव्हिंग तेव्हां आम्ही मना केलं होतं ते याच कारणासाठी. टेक्स्टिंग, सेलफोनचा वापर आणि मद्यपान करुन केलेल्या ड्रायव्हिंगमुळे किती अपघात झालेले ऐकले आहेत. आणि आपण कितीही व्यवस्थित चालवली गाडी तरी बाकीचे कशी चालवतायत ते आपल्या हातात कुठे असतं? ह्याच मुळे फार सावध  रहावं लागतं गाडी चालवताना. तुझ्या शाळेतल्याच पाच मुलांची ती शोकांतिका आठवतेय ना? झाडावर आदळून गाडी उलटी पालटी  झाली. गेलीच ना सगळी मुलं त्यात? आजही त्या रस्त्यावरुन जातो आपण तेव्हां गवतावर रस्त्याच्या बाजूला त्यांच्या स्मृतीसाठी  लावलेल्या काठीवरचा फलक, नाहीतर क्रॉस असलेले दांडे, अधूनमधून तिथे दिसणारी ताजी फुलं पाहिली की तुला ती  मुलं आठवतात. मला ताजी फुलं तिथे ठेवणार्‍या त्यांच्या जिवलगांचं दुःख व्याकुळ करतं. सेलफोनचा वापर, मद्यपान ह्या गोष्टींवर नियंत्रण ठेवता येईल. पण तुम्हा मुलांचा मेंदू लहान वयामुळे तातडीच्या प्रसंगात निर्णय घेवून कृती करण्या एवढा विकसित झालेला  नसतो त्याचं काय करायचं रे? आणि हे अभ्यासाने सिद्ध झालेलं सत्य आहे. तुला घडलेला हा अपघात म्हणजे डोळे उघडणारा धडा असेल अशी अपेक्षा करु का? 

तुझी आई 

ता. क. : तु वाचतोस का रे माझी पत्रं? तुझ्या वागण्यातून वाचत असावास असं वाटतं तरी. म्हणजे बदलत चाललेला, समंजस असा काहीसा वाटतोस तू हल्ली. हे वाढत्या वयामुळे, माझ्या एकतर्फी पत्रलेखनांने की दोन्हीमुळे?
क्रमश:
पूर्वप्रसिद्धी ’व्हिवा’ लोकसत्ता: 

ओ ड्यूऽऽड लेखमालिका

Friday, February 17, 2012

क्षितीज - भाग 7

"उद्या आम्ही इथून परत निघणार. आय जस्ट कॅन्ट वेट टू टॉक टू यु.  ’सी यु', असं म्हणता येत नाही कारण तसं आपण फारसं  भेटतच नाही. पण आता मी आल्या आल्या कार्यानुभवाच्या निमित्ताने भेटता येईल." रात्री गच्चीत झोपल्या झोपल्या शुभमने साता समुद्रापलीकडे असलेल्या नेहाला टेक्स्टिंग केलं.  भारताबद्दल त्याला तिच्याशी खूप बोलायचं होतं. या खेपेला शुभमने सिंहगड पाहिला. अपेक्षाभंगच झाला.  पैसा आणि इच्छेचा अभाव हे एकच कारण?. सगळे नुसतं म्हणतात भारतात हे नाही, ते नाही पण प्रत्यक्षात बदलासाठी कुणी काही करत नाहीत. भारतातल्या अनेक गोष्टीबद्दल मनात विचारांचा घोळ सुरू होता. नेहाशी बोललं की दिशा मिळेल?
शुभम परत आल्यावर मूलभूत प्रश्नालाच नेहाने हात घातला.
"आवडतं तुला भारतात जायला?"
"ठाऊक नाही. कदाचित कॉलेज झाल्यावर नोकरीसाठी म्हणून आवडेलही काही दिवस तिथे जाऊन राहायला. पण आपण राहतो ते गाव म्हणजेच माझं जग वाटतं मला. इथून मी नाही जाणार कुठे. तुला आवडतं भारतात जायला?" शुभमने तिलाच उलट विचारलं.
"अं? नाही रे. वाट्टेल ते  प्रश्न विचारतात कुणीही. पहिला प्रश्न, बॉयफ्रेंड आहे का तुला? चौथी पाचवीत होते तेव्हाच हे विचारलेलं कुणीतरी. जसं काही जन्म झाल्या झाल्या अमेरिकेत प्रत्येकाला बॉयफ्रेड असतो, आणि गल्लो गल्ली लोकं चुंबनच घेत असतात असं वाटतं  त्यांना. सगळ्या नातेवाईकांना भेटायला जायचं प्रकरण असतच. मनासारखं कुठे वावरता येतं तिकडे?. अंग पूर्ण झाकलं जायला हवं, तोकडे कपडे नकोत, मेकअप नाही करायचा.....  काय तर म्हणे चांगल्या नजरेने पाहत नाहीत रस्त्यावर. आणि खरंच किती टक लावून बघतात. दे रिअली मेक मी नर्व्हस."
"याबद्दल खूप ऐकलंय आईकडून. मुलींना पाहून जीभ पण फिरवतात ओठावरून. आई म्हणते बाकी काही नाही तरी या गोष्टींपासून सुटका मिळवायची तर यावं अमेरिकेला. इकडे घालतात तसे कपडे, फॅशन भारतात करतात पण अमेरिकेत असे कपडे घातल्यावर कुणाच्या नजरा वारंवार वळत नाहीत, कुणी  जीभ  चाटत नाही हे विसरतात भारतातली लोकं. मी आता खरं सांगायचं तर आईच्या पत्राची वाट पाहतोय. तुला सांगितलं ते आईशी गप्पा मारताना तिलाही सांगितलंय. मला नक्की ठाऊक आहे की ती यासंदर्भात लिहेलच."
* * * * * * * * * * * * * * * * * * * *
शुभंब्या,
तुझ्याकडून भारताबद्दल नकारार्थी ऐकलं की त्रास होतो. त्यातून तुझं राहतं गाव म्हणजेच तुला तुझा जग वाटतं हे ऐकलं की तर फारच अस्वस्थता येते. पण ते मान्यं करणं भाग आहेच. या देशातच तू वाढलेला, पालक भारतीय आणि दर दोन वर्षांनी महिनाभर भारतात घालवलेले दिवस एवढ्यावर आमचा देश तुला तुझाही वाटावा असं वाटण्याचा अट्टाहास आम्ही तरी का करावा? तरीही तुझी निरीक्षणशक्ती आणि बोलण्यातून सकारात्मक गोष्टी ऐकल्या की बरं वाटतं. तुला भारतातल्या मुलांसाठी काहीतरी करावंसं वाटतंय ही फारच चांगली गोष्ट आहे. खूप मुलांच्या बाबतीत असं झालं आहे. त्यांना कधी ना कधी तरी आपली मुळं शोधावीशी वाटतात. इथल्या मुलांप्रमाणे, जग फिरायचं या संकल्पनेतून आपल्या मायभूमीचं अंतरंग पाहायचं भान येतं. ही मुलं कोणत्या ना कोणत्या संस्थेतून भारतातल्या खेड्यापाड्यातलं जीवन पाहायला म्हणून जातात आणि मग जातच राहतात. तिथलं काम आवडतं  म्हणून, शांत, तणावविरहित जीवनाचा अनुभव घ्यावासा वाटतो म्हणून आणि शहरीजीवनापलीकडच्या आपुलकीचं, माणुसकीचं सहजदर्शन सुखावतं म्हणून. तुझ्या सुदैवाने कितीतरी गट, संस्था तुला मार्ग दाखवायला आहेत. आणि मुंबई, पुणं म्हणजे महाराष्ट्र नव्हे हे ही यातून तुझ्या लक्षात येईल, आणि माझ्या दृष्टीने एवढं जरी झालं तरी खूपच.  चला आता पुन्हा आपलं रहाटगाडगं सुरू. उद्या पहिल्यांदाच बसचा प्रवास करणार आहेस नं? कार्यानुभवाचा अनुभव हॉस्पिटलमध्ये येईल, तसाच बसच्या प्रवासाचाही अनुभव वेगळाच वाटेल. संध्याकाळी सांगशीलच कसं वाटलं बसने जाणं ते.
तुझी आई
* * * * * * * * * * * * * * * * * * * *
बसचा प्रवास, एकट्याने. सकाळी सहा वाजता धडधडत्या मनाने शुभम थांब्यावर उभा होता. एकटाच. कुणीच नव्हतं तिथे. बापरे, बसने जातच नाही की काय कुणी. बाबाची परत फिरलेली गाडी थांबवावी असं त्याला वाटून गेलं. तेवढ्यात हिरव्या रंगाची बस फुसफुसा आवाज करत थांबली.
ड्रायव्हरने केलेल्या गुड मॉर्निंगला त्यानेही तोंडातल्या तोंडात पुटपुटत प्रतिसाद दिला आणि झुलपं उडवीत तो बसला. बसला म्हणजे काय चक्क उडालाच. इंटरनेट! बसमध्ये इंटरनेटची सोय. वॉव, आता अर्ध्यातासाचा प्रवास क्षणभरात संपेल. एकदा बस बदलून परत अर्धा तास. त्यातही असेलच म्हणा इंटरनेट. पण त्याची ही नशा फार वेळ टिकली नाही. बाजूच्या माणसाने त्याला काहीतरी विचारलं आणि मग गप्पाच सुरू झाल्या. गाडीत म्हटलं तर माणसं पाच सहाच होती. त्यात मध्ये एक 'देसी' मुलगाही चढला. सायकल घेऊन थांबला होता तो. सायकल लावली त्याने बसच्या मागे. नेहमी एकच बस पकडत असावेत सर्वजण. प्रत्येकजण एकमेकाला ओळखत होता. त्यात आज शुभमची भर. त्याच्याशी ओळख करून घ्यायला सर्वांनाच उत्सुकता होती. शुभमलाही प्रचंड कुतूहल होतं. इतकी वर्ष आई-बाबाच सोडायचे कुठेही. त्याचा असा हा पहिला प्रवास. काय करू आणि काय नको असं झालं होतं शुभमला.
हॉस्पिटलमध्ये गेल्यावर मात्र त्याचा उत्साह निवळला.
"कुठून या फंदात पडलो असं झालंय. तुला आवडतंय हे व्हॉलेंटियरिंग?" नेहा त्याला कॅफेत भेटली तेव्हा तो चिडलेलाच होता.
"काय झालं?"
"शस्त्रक्रिया बघायला मिळेल असं वाटलं होतं. तेवढं सोडून बाकी सर्व करतोय. वैताग नुसता !"
"अरे पहिलाच आठवडा आहे आपला. मिळेल बघायला एखादीतरी शस्त्रक्रिया. आणि आपला रुबाब बघ ना. स्क्रब, हॉस्पिटलचा पोशाख, आयकार्ड... डॉक्टर झाल्यासारखंच वाटत नाही का तुला?"
"हं" त्याने नुसताच हुंकार दिला, तिचं म्हणणं पटल्यासारखा.   दोन महिन्याच्या सुट्टीतला हा कार्यानुभव. केवढी धडपड केली होती शुभमने त्यासाठी. पाचशे मुलांतून दोनशे मुलं निवडणार. त्यासाठी लिहिलेला निबंध, मुलाखत, हा अनुभव निश्चितच कॉलेज प्रवेशासाठी उपयोगी पडणार होता. आज तो वैतागला तरी सगळाच काही आनंद नव्हता. डॉक्टर्स थोडेसे फटकूनच वागतात असं वाटलं तरी टीनाने, तिथल्या रिसेप्शनिस्टने, त्याच्यासाठी मुद्दाम राखून ठेवलेला केक त्याला आठवला. तिने खाऊन टाकलेलं त्याचं चॉकलेट. त्याला आत्ताही हसायला आलं. टीना म्हणाली होती. तुझीच चूक ती, का ठेवलंस ते चॉकलेट उघड्यावर. मला खूप आवडतं, म्हणून मी खाऊन पण टाकलं. डॉक्टर मंडळीपेक्षा ही लोकं जवळची वाटली. तो थोडासा शांत झाला. नेहालाही इथेच काम करायला मिळालं होतं हे सुखदायक होतच. तिची भेट फक्त सगळे मित्र मैत्रिणी एकत्र जेवायला हॉस्पिटलच्या कॅफेत भेटत होते तेव्हाच. पण तेही त्याच्या दृष्टीने खूप होतं. तो परत खुलल्यासारखा झाला.
"ऑऽसम, बाय द वे मी बसने येतो इकडे."
"आवडतं?"
"मग? खूप स्वतंत्र झाल्यासारखं वाटलं. नाहीतर एवढे मोठे झालो तरी आई-बाबावर अवलंबून राहावं लागतं. बस मस्त आहे. एकदा बदलायला लागते. तिथे जरा भिती वाटते. फारशी वस्तीच नाही त्या भागात. पण बसमध्ये चक्क इंटरनेटची सोय आहे आणि सायकल लावायला पुढे स्टँडपण. रिअली कूल."
"माणसं होती का? आय मीन गर्दी." सर्वांनाच त्याच्या बस प्रवासाचं कुतूहल होतं.
"अर्धी बस भरलेली. त्यात माझा व्हॉलेंटियर चा शर्ट बघून ड्रायव्हर विचारत होता काय करावं लागतं तिथे काम करायचं तर? त्याला सोळा वर्षाची मुलगी आहे. मी माहिती तर सांगितलीच पण एक जास्त अर्जही होता माझ्याकडे तोही दिला.
"मग ड्रायव्हर खुष का एकदम?"
"यस्‌. आणि एक सीक्रेट." बाकीचे मित्र तिथे नाहीत असं बघून पटकन त्याने नेहाला सांगितलं.
"बोलू नकोस कुणाला. माझं आणि ड्रायव्हरचं संभाषण ऐकत होता एक माणूस. ते सिस्को कंपनीचे डायरेक्टर आहेत बहुधा. त्यांनी सांगितलं की त्यांच्या कंपनीत पण असं कार्यानुभवाचं काम करता येतं. मी त्याचं कार्ड घेतलंय. पुढच्या वर्षी करता येईल. बाकी कुणाला सांगणारच नाहीये मी. तू येऊ शकतेस अर्थात."
"नक्कीच, माझं तेच तर स्वप्न आहे. जितक्या ठिकाणी एकत्र राहता येईल त्या गोष्टी करायच्या. आपण एकाच कॉलेजात शिकत असू. संध्याकाळी तिथल्या हिरवळीवर गप्पा मारु, एकत्र अभ्यास करू. खरं तर माझ्या शाळेत मैत्रिणी चिडवतात मला की कसली स्वप्न पाहतेस. हायस्कूल संपलं की नवीन मित्र मिळेल तुला. पण मला तुझं आणि माझं नातं टिकवायचं आहे.
"मला पण. दोघांनीही यशस्वी व्हायचं. स्पर्धांमध्ये एकत्र भाग घ्यायचा." आजूबाजूचे कॅफेत बसलेले डॉक्टर्स, नर्स, इतर लोकं उठायला लागले तसे सगळेच जण भानावर आले. निघता निघता तो म्हणाला,
"मी ठरवलंय. झालोच डॉक्टर तर असं नाही वागायचं हाताखालच्या लोकांशी. मुख्य म्हणजे हसतमुख राहायचं, टिनासारखं. इतर लोकं कामं सांगतात तेही उपकार केल्यासारखं, त्यामुळे काम झाल्यावर कौतुक बाजूलाच राहिलं." सगळ्यांनी माना डोलवल्या. आता आपापल्या विभागात जाऊन काम करायला हवं होतं. या सुट्टीत कार्यानुभवाचे १०० तास तरी भरायलाच हवेत. चांगल्या कॉलेजासाठी ते तास फारच उपयुक्त आहेत याची प्रत्येकाला जाणीव होती.

घरी आल्यावर अपेक्षाभंगाची नाराजी शुभमच्या चेहर्‍यावर पसरलेली होतीच. कटकट, चिडचिड चालू होती. त्याच्या चिडण्याची, कुरकुरीची सवय असल्यासारखं कुणी फारसं लक्ष दिलं नव्हतं. रात्री झोपायच्या आधी वाचायला पुस्तक उघडताच आईचं नवीन पत्र हातात आलं. चिडचिड कुठल्या कुठे पळाली.
* * * * * * * * * * * * * * * * * * * *
चि. शुभम,

 संध्याकाळी वैतागलास आल्याआल्या. तुला मी म्हटलं बसच्या प्रवासाची कटकट होत असेल तर सोडू आम्ही तुला. पण तुझा राग होता तो हॉस्पिटलमधल्या लोकांवर. त्यात मी तुला म्हटलेलं, 'वेलकम टू रिअल लाईफ' ते रुचलं नाही कदाचित.
तुम्ही मुलं हॉस्पिटलमध्ये इतकी मदत करता त्याचं कौतुक तिथल्या कर्मचार्‍यांना वाटत नाही याचं फार दुःख वाटतंय तुला. पण तिथेच टीनासारखीही माणसं असतात हे विसरू नकोस. यातून एक चांगला निर्णय घेतलास आणि तो कायमचा लक्षात  ठेव. तू म्हणालास ना की जर तू डॉक्टर किंवा एखादा मोठा माणूस झालास, तर हाताखालच्या लोकांशी असं वागणार नाहीस, तेच  म्हणतेय मी. या कार्यानुभावाच्या निमित्ताने घडलेली आणखी एक चांगली गोष्ट. तू बसने जायला लागलास.
भारतात आम्ही सहज चालत, नाहीतर सायकलीने, बसने कुठेही फिरायचो तुमच्या वयाचे असताना. या देशात ते शक्य नाही. रस्ता माणसांसाठी नसतोच इथे. पुन्हा मोठी शहरं सोडली तर बसची सोय तरी कुठे आहे? त्यातूनही असली तरी किती पालक मुलांना बसने जायला देतात? तू  बसने जायचं ठरवलंस तेव्हा थोडीशी धाकधूक होतीच. पण मला माहीत आहे तू खूष होतास, उपदेशाचा एक डोस कमी झाला. नाहीतर आम्ही तुला सोडतो-आणतो सगळीकडे याची तुला किंमत नाही हे कधी ना कधीतरी ऐकावं लागलेलं आहेच. तो भाग सोडला तरी कुठेतरी स्वतंत्र झाल्याची जाणीव पण सुखदायक वाटते. खरं ना? मला तू बसमधले अनुभव सांगतोस ना ते आवडतात ऐकायला.
तुझं निरीक्षण बरोबर आहे. बसमधली, हॉस्पिटलमधली सर्वसामान्य परिस्थितीतली माणसंही समाधानी वाटली ना तुला, त्या डॉक्टर लोकांपेक्षा? फार ताण तणाव नसले की माणसं खुष असतात, हे तुला बघायला मिळतंय हे चांगलंच झालं. तू म्हणालास तसं कधीतरी खरंच आपण सगळे एक चक्कर टाकू बसने. पंधरा वर्षापूर्वी इथे आलो तेव्हा घरात गाडी यायच्या आधी बसने फिरायचो आम्ही. कितीवेळ उभं राहायला लागायचं थांब्यावर. तेव्हा भारतात सहजासहजी मिळणार्‍या वाहनांचं मोल समजलं. नंतर गाडी आल्यावर बसने जायचा कधी प्रसंगच आला नाही इतक्या वर्षात. पण तुझ्या नजरेतून ऐकायला मिळणारा बस प्रवास आणि बसमधले प्रवासी फारच रंगतदार वाटतायत. तुझ्या वयाच्या मुलांनाही त्यांच्या आई-वडिलांनी हा अनुभव द्यायला हवा असं नाही वाटत तुला? त्यांची शोफरगिरी वाचेल आणि मुलांसाठी एक नवीन अनुभवविश्व. तू सांगायला हवस तुझ्या मैत्रमित्रणींना. कदाचित त्यांनाही वाटेल बसच्या प्रवासाचं आकर्षण आणि मग त्यांच्यामुळे त्यांच्या पालकांना. आता तू खर्‍या अर्थी स्वतंत्र व्हायला लागला आहेस. गाडी चालवायला शिकणं हे त्यातलं मोठं पाऊल

                                                                                                                                     तुझी
                                                                                                                                                  सौ. आई
                             
ता. क. : आज मुद्दाम चि. आणि सौ. शब्द वापरले आहेत. काळाच्या ओघात हे शब्द नष्टच होतील, पत्रलेखनातून. बघ तुला उत्सुकता  वाटली तर सांगेन त्याचा अर्थ.
                                                                                               

क्रमश:

पूर्वप्रसिद्धी - लोकसत्ता-व्हिवा- "ओऽऽऽड्यूड" लेखमालिका








Friday, February 10, 2012

क्षितीज - भाग 6

आई-बाबांचा कुजबुजल्यासारखा आवाज वाटला तसे त्याने कान टवकारले. जॉनीचं नाव ऐकल्यावर मात्र त्याचं डोकंच उठलं. तो एकदम समोर येऊन उभा राहिला. शुभमने बाबाच्या हातातला कागद हिसकावला. जॉनीने आजूबाजूच्या घरांच्या पत्रपेटीवर अडकवलेल्या जाहिरातीचा तो कागद होता. घाईघाईने त्याने ती जाहिरात वाचली.
"अरे पण तुम्ही मला कामं करूच देत नाही आणि सारखं सांगता, जॉनी शू पॉलिश करतो, जॉनी लॉन मोविंग करतो (ग्रास  कटिंग), जॉनी ग्रोसरी स्टोअरमध्ये काम करतो, जॉनी हे करतो आणि जॉनी ते करतो...."
"पण तुला काय झालं एवढं चिडायला?" शुभमने त्या दोघांचं बोलणं ऐकलं असेल अशी त्यांना शंकाही आली नव्हती. बाबाला मुळी  त्याचा राग कळेचना.
"काय झालं म्हणजे? सारखं तुमचं चालू असतं जॉनी पुराण. जॉनीला शेजारी पाजारी लॉन मोव्ह करताना पाहिलं की लगेच त्याचे  वडील किती मोठ्या कंपनीत मॅनेजर आहेत तरी इथल्या मुलांना कमीपणा वाटत नाही पॉकेटमनीसाठी अशी कामं करताना, यावरच चर्चा."
"त्यात काय चुकीचं आहे पण? चांगली गोष्ट आहे ती."
"मग मला पण करू देत की. तुम्ही म्हणता ना अमेरिकेत आल्यावरच कोणत्याही गोष्टींची लाज वाटू न देता काम करायचं हे शिकायला मिळालं. मग मला का नाही करू देत? अं? का? का नाही करू देत? तिथे लगेच 'देसी' होता तुम्ही." शुभमचा फुटाणा  ताडताड फुटत होता.
"देणार आहोत ना. एखादा महिना तरी ग्रोसरी स्टोअरमध्ये काम करायचा अनुभव हवाच. थोड्याशा पैशांसाठी किती श्रम करावे  लागतात, हे कळायलाच हवं तुला." शुभमच्या रागाचा फुगा एकदम फुटलाच. त्याला बाबाकडून अशा शरणागतीची अपेक्षाच  नव्हती. तितक्यात आईने सूत्रं ताब्यात घेतली.
"त्याचा अर्थ असा नाही की लगेच या सुट्टीत तू काम करशील. पण तसं करू शकतोस एवढंच म्हणायचंय आम्हाला."
"म्हणजे नाहीच ! मला वाटलंच, एवढ्या पटकन कसं काय मान्य केलंत. मी निदान घरचं लॉन मोविंग करतो या सुट्टीत. त्याच्या मोबदल्यात तुम्ही पैसे मलाच द्या."
"पण घरचंच काम करायला तुला पैसे कशाला हवेत?"
"बरं नको देऊस पैसे. खूष?" कुठून पैसे मागितलं असं त्याला झालं.
ती पुढे काही बोलायच्या आत थांब, थांब करत त्याने स्पष्ट  केलं.
"पण प्लीज तुझं सुरू करू नकोस. तोंडपाठ आहे ते मला. मी स्वयंपाक करते, भांडी घासते, कपडे घड्या करते, तुमच्या वेळा  सांभाळते,  त्याचे कोण देतंय पैसे....  सांग म्हणणार होतीस ना? होतीस ना?"
"शुभम पुरे आता, नाहीतर  आपल्याला आजचं जेवण पैसे दिले तरी मिळणार नाही." बाबाने वातावरण हलकं करायचा प्रयत्न  केला.
"मी जातोच आता इथून."
"पैसे तर नाही मिळणार, पण एक मार्ग आहे तुला माझ्याकडून तुझ्या आवडत्या गोष्टी मिळवायचा."
"कुठला?" शुभमने उत्सुकतेने विचारलं.
"सांगितलेलं काम लगेच करायचं. पाच मिनिटांनी, नाहीतर दिवसभरात कधीतरी करेन. झोपायला जायच्या आधी झाल्याशी कारण  अशी आश्वासनं नकोत."
"करतो की मी कामं घरातली."
"हो करतोस ना पण ती वेळेवर करण्याबद्दल म्हणतेय मी."
"काय मिळेल पण आवडीचं?"
"ज्या ज्या दिवशी कामं वेळेत पूर्ण होतील त्या दिवशी तुझ्या आवडीचा पदार्थ जेवणात मिळेल."
"वे कूल ! डील?"
"हो."
"बघ हं तिरामिसू, बाकलावा, गुलाबजाम, काजुकतली .... मी यादीच करतो. चालेल?"
शुभम आणि बाबा दोघांनीही एकमेकाला टाळी दिली. गोडखाऊ बापलेकांना आत्ताच मिष्टान्न समोर दिसायला लागली होती.  तावातावाने सुरू झालेल्या संभाषणाचा सुखद शेवट, त्याचा विश्वास बसेना.
* * * * * * * * * * * * * * * * * * * *
शुभम्या,
 आज भांडणाचाच मूड होता तुझा. आम्ही म्हणजे तमाम 'देसी', मुलांना पॉकेटमनीसाठी नोकर्‍या करायला देत नाही त्याचं एकच कारण रे, तुमचा अभ्यास. असं वाटतं की करू शकतो आम्ही तुमचं शिक्षण तर कशाला अशी कामं करायला लावायची. इथली जीवनशैली वेगळी आहे, उपभोगतेला जास्त महत्त्वं आहे, त्यामुळे अमेरिकन पालकांचं बचतखातं तसं रिकामंच असतं. मुलांना पुढच्या शिक्षणासाठी  नोकरीशिवाय पर्यायच नसतो. कितीतरी लोकं बरीच वर्ष नोकर्‍या करतात, कॉलेजसाठी पैसा जमवतात आणि तिशीनंतर कॉलेज  करून पस्तिशीच्या दरम्यान स्थिरावतात. दहावी बारावीपर्यंत शिक्षण मोफत होतं पण त्यानंतर इथल्या मुलांचं शाळा सोडण्याचं,  महागडं कॉलेज शिक्षण, हेच तर मुख्य कारण असतं ना? पण पुढे शिकण्याची जिद्द ज्यांच्याकडे आहे ते त्यासाठी किती प्रयत्न  करतात ते आपण पाहतोच. मला मान्यं आहे की जॉनीचे बाबा त्याचं शिक्षण करणार आहेत आणि तरी तो लहान सहान कामं  करून पैसे मिळवायची धडपड करतो.  तुला तसं करावंसं वाटतं याचं कौतुकही वाटतं. फक्त घरातली कामं ही वाटूनच घ्यायला  हवीत, त्यासाठी पैसे द्या, हे म्हणणं चुकीचं नाही का वाटलं तुला? पण ठीक आहे. सौदा गोड पदार्थावरच मिटला. या निमित्ताने माझं पाककौशल्य क्वचित दिसण्याऐवजी रोज रोज दिसेल म्हणा. त्यासाठी अर्थात तुलापण कामं वेळेवर करायला शिकावं लागेल हे विसरू नकोस. मी  नाही करू शकले सगळे पदार्थ तरी आता आपण जाणार आहोतच भारतात तेव्हा आजी कौतुकाने करून घालेल तुला.  थोडेच दिवस राहिले आहेत सुटी सुरू व्हायला. मला तरी  कधी एकदा भारतात जातोय असं झालंय. तुलाही माझ्यासारखं वाटावं अशी इच्छा असली तरी अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे हे समजतंय मला.
                                                                                                                                           तुझी आई
                                                                                                                                       
क्रमश:

पूर्वप्रसिद्धी - लोकसत्ता-व्हिवा- "ओऽऽऽड्यूड" लेखमालिका