Showing posts with label अनुभव. Show all posts
Showing posts with label अनुभव. Show all posts

Wednesday, July 1, 2020

माझी कथा सुव्रत जोशीच्या आवाजात storytel app वर.

सुव्रत जोशी - माझ्या शटलकॉक कथेचं ध्वनिमुद्रण कसं केलं त्याबद्दल बोलताना. कथा पूर्ण ऐकायला सभासदत्व घ्यावं लागेल पण सुरुवातीचा एक महिना सभासद न होता वाचता येईल. अतिशय वाजवी दरात मराठी आणि इंग्रजी साहित्याचा खजिना storytel वर आहे. प्रसिद्ध लेखकांचं साहित्य प्रसिद्ध कलाकारांच्या आवाजात.

It's time to put your headphones on and listen to Shuttlecock! If you follow this link, you get the first 30 days for free:

https://www.storytel.com/signup…


This offer is only valid if you haven't tried Storytel before.


                                          ------------------------------

शटलकॉक! म्हटलं तर सत्य, म्हटलं तर काल्पनिक अशी ही कथा आहे. यातली पात्र मी पाहिलेली आहेत. कथेतलं सर्व जसच्यातसं घडलेलं आहे का? नक्कीच नाही. आपण जे ’जर - तर’ म्हणत असतो तो कथेचाही एक अपरिहार्य भाग असतो.

माझ्या कथेतल्या या व्यक्तिरेखा भारतातल्या मित्रमैत्रिणींना अमेरिकेतल्या एका वेगळ्या यंत्रणेची, जगाची ओळख करून देणार्‍या आहेत. नक्की ऐका आणि ऐकून अभिप्राय द्यायला विसरू नका.

Monday, May 4, 2020

शरद पोंक्षेंशी गप्पा

शरद पोंक्षेंशी गप्पा मारणं हा एक 'अनुभव' होता.
हल्ली कोणताही कार्यक्रम जास्तवेळ ऐकत/पाहत नाहीत म्हणून आम्ही ४५ मिनिटं ठरवली होती पण नंतर कितीतरीजणांनी कळवलं की फार पटकन संपली मुलाखत, यातच सारं आलं. नाही का?
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या सर्वाना सकारात्मकतेची कास धरायला हवी हे ठाऊक आहे आणि त्याची जाणीव होते जेव्हा शरदनी सकारत्मकतेने कर्करोगांशी लढा दिला ते ऐकताना, मालिकांचं बदललेलं रूप, भाषा याबद्दल काय वाटतं, चुकीचं मराठी वापरलं गेलं की त्यांच्यासारख्या सुजाण कलाकारांना काय वाटतं, त्याबाबत ते काय करतात, नथुराम आणि सावरकर यावरून त्यांना तीव्र विरोध सहन करावा लागलेला आहे अशावेळेस त्यांच्या घरच्यांची काय भूमिका असते अशा माझ्या आणि मृदुलाच्या अनेक प्रश्नांना त्यांनी दिलेली उत्तरं, मारलेल्या गप्पा खरंच ऐकण्यासारख्या आहेत. सुरूवात आणि शेवट त्यांनी म्हणून दाखविलेल्या संवादानी आहे. पाहायला आणि ऐकायला हवं असं आहे सारं. नक्की पाहा, आपल्या मित्रमैत्रीणींना कळवा (Like and Share).


Thursday, April 30, 2020

चतुरस्त्र व्यक्तिमत्व - अभिनेते शरद पोंक्षे यांच्याशी गप्पा - FB Live

चतुरस्त्र व्यक्तिमत्व - अभिनेते शरद पोंक्षे यांच्याशी महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून शुक्रवारी म्हणजेच १ मे या दिवशी, मृदुला जोशी-पुरंदरे आणि मी गप्पा मारणार आहोत - ग्लोबल नाका - FB Live.

दिनांक - १ मे - शुक्रवार.
  • भारत - रात्री ८:०० 
  • अमेरिका-(EST) सकाळी १०:३०
  • लंडन- दुपारी ३:३० 
  • दुबई- संध्याकाळी ६:३० 
  • सिंगापूर - रात्री १०:३० 
गप्पा ऐकायला, तुमचे प्रश्न विचारायला ग्लोबल नाक्यावर या, तुमच्या मित्रमैत्रिणींना बोलवा, पसंती दाखवा (Like, Share करा)

Thursday, March 26, 2020

कथा, श्रुतिका, FB - Live

माझ्या आवाजतल्या काही कथा, अध्यक्षीय भाषण, श्रुतिका तसंच नुकतंच केलेलं अभिवाचन - FB - Live.

https://marathivarga.com/mp3/

Tuesday, October 22, 2019

झाशीची राणी आणि शाबासकी

"या आपल्या झाशीच्या राणी." जाधवसरांनी जोरजोरात टाळ्या वाजवल्या म्हणून सगळ्या वर्गानेही वाजवल्या. गुरु सांगतील ती पूर्वदिशा त्यामुळे टाळ्या का वाजवतोय ते कळलं नाही तरी आम्ही टाळ्या वाजवत राहिलो. सरांनी खूण करून मला बोलावलं. अतीव आनंदाने मी उभी राहिले. बाकड्यामधून बाहेर आले. बाकड्यांच्या मधल्या अरुंद गल्लीतून वाट काढत किल्ला लढवल्याच्याच आवेशात सरांजवळ पोचले. मागचा फळा म्हणजे किल्ला असल्याचा भास मला होत होता. त्यापुढे उभं राहून ’मेरी झॉंसी नही दूंगी’ अशी घोषणा केली की आठवत नाही कारण पुढच्या क्षणाला झाशीची राणी ढळाढळा अश्रुपात करत, बाकड्यांमधून सैरावैरा धावत, खालीमान घालून लाकडी आसनात शिरली. जाधवसरांनी गुरुजीपणाचा किल्ला असा काही लढवला की झाशीच्या राणीचं पानिपत झालं. सरांनी आपला वाक्बाण सोडला.
"या आपल्या झाशीच्या राणी. चाचणी परीक्षेला ४ ते ७ धड्यांचा अभ्यास करायचा होता पण यांना ९ व्या धड्यातली झाशीची राणी आवडली आठवली आणि ती उत्तरपत्रिकेत आली. शाबास! त्यांच्या या अतुलनीय पराक्रमासाठी मी भोपळा देऊन त्यांना सन्मानित केलेलं आहे." मुलांनी पुन्हा जोरदार टाळ्या वाजवल्या. या वेळेस प्रत्येकाला आपण टाळी का वाजवतोय ते ठाऊक होतं. आणि प्रत्येकजण तो आनंद लुटत होतं. मी सोडून. अचानक हाती आलेल्या भोपळ्याचं आणि झाशीची राणी या पदवीचं काय करावं ते कळेना.

पूर्वीपासून माझं एक होतं. उत्तर चुकीचं लिहिलं तरी चालेल, जागा मोकळी सोडायची नाही. शिकवणच तशी होती. काही म्हणता काही फुकट घालवायचं नाही. जन्मापासून हेच ऐकत आल्यावर काय बिशाद काही फुकट घालवण्याची, त्यामुळे उत्तराची जागा फुकट घालवणं अशक्यप्राय. प्रश्नपत्रिकेतपण असायचंच ना, ’मोकळ्या जागा भरा.’ विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर येत नव्हतं. नुकतीच ओळख झालेली झाशीची राणी अंगात भिनलेली. ती मला इतकी भावली होती हे सरांना समजावं इतक्या निरपेक्ष हेतूने मी तिच्याबद्दल लिहून ’मोकळी जागा’ भरली. विद्यार्थी परीक्षेला नसलेले धडेही आधीच वाचतात, नुसते वाचून थांबत नाहीत, काय वाचलंय ते लक्षात ठेवतात, मोकळ्या जागा त्याने भरून टाकतात या सगळ्याचं खरंतर सरांनी कौतुक करायला हवं होतं की नाही?

त्यादिवसापासून मी अख्ख्या शाळेची ’झाशीची राणी’ झाले. कुणीही, कधीही मला त्या नावाने हाक मारायचं. झाशीच्या राणीसारखाच पराक्रम खर्‍याअर्थी गाजवणं आता भाग होतं. कार्यक्षेत्र वेगळी असली म्हणून काय झालं.
"जाधवसरांना इतिहासात १०० पैकी १०० गुण मिळवून दाखवले तरच नावाची झाशीची राणी." अशी घोषणा आधी मी मनातल्यामनात केली. गुण मिळवण्यासाठी अभ्यास करावा लागतो हा मोठा अडथळा त्यात होता. पण आता गत्यंतर नव्हतं. येताजाता कुणी ’झाशीची राणी’ म्हणून चिडवलं की झेंडा हातात धरल्यासारखं उभं राहून घोषणा द्यायला लागले. शाळेतली ती घोषणा लहानश्या गावात लवकरच पसरली, घरीही पोचली. आईने एकदा आठवण करून दिली.
"झाशीच्या राणी अभ्यासाला बसून इतिहास कधी घडवणार?" मी परीक्षा लढवायला घेतली. परीक्षा लढवायचीच तर अंतिम ध्येय वार्षिक परीक्षा हे नक्की केलं. येता - जाता इतिहास उगाळला आणि अखेर परीक्षा ’सर’ केली. इतिहास या विषयात १०० पैकी १०० गुण मिळवले.

"या आपल्या झाशीच्या राणी." जाधवसरांनी पुन्हा एकदा जोरजोरात टाळ्या वाजवल्या म्हणून सगळ्या वर्गानेही वाजवल्या. या वेळेस प्रत्येकाला टाळ्या वाजवण्याचं कारण ठाऊक होतं.  सरांच्या जवळ जाऊन उभी राहिले. सरांनी कौतुकाने पाठीवर शाबासकीची थाप मारली. ही थाप आज इतक्या वर्षानंतरही मला जशीच्यातशी आठवते आणि त्याची आठवण करून द्यायला कुणी ना कुणी असतंच. म्हणजे होतं असं, दर काहीवर्षांनी मला कुणीतरी भेटतं ते हमखास विचारतं,
"तू जाधवसरांची विद्यार्थिनी होतीस ना?" माझी त्या व्यक्तीशी ओळखही नसते पण मला ताबडतोब कळतं.
"हो. मी त्यांची झाशीची राणी." मी हसून सांगते.
"तुझ्या जिद्दीचं फार कौतुक करतात सर." बोलणार्‍याच्या स्वरातूनच मला कळतं की सरांना माझं किती कौतुक होतं. फक्त जाधवसरांनाच नाही सगळ्याच सरांना. या प्रसंगानंतर दोन वर्षांनी माझ्या दुसर्‍या शिक्षकांनी वर्गात शिरायच्या आधीच खिंडीत गाठल्यासारखं दारात अडवलं होतं.
"तुझ्याबद्दल मी पैज मारली आहे."
"ओ?" एवढाच उद्गगार निघाला माझ्या तोंडून.
"हे बघ, ११ वीत तास चुकवायचे, बंडखोरपणा करायचा, शिक्षकांविरुद्ध भाषणं ठोकायची हे सगळं समजू शकतो मी. शिक्षकांना तू हुशार आहेस हे ठाऊक आहे पण अभ्यासात लक्ष घातलं तर. १२ वीत काय दिवे लावणार असा प्रश्न पडलाय त्यांना. तू काही घोषणा करायच्याआधी मीच करून टाकली आहे. तेव्हा लागा अभ्यासाला आणि मिळवा गुण चांगले. तुझ्यामुळे मी पैज हरलो तर फार वाईट वाटेल मला." सरांनी दरवाजा अडवल्यामुळे मी त्यांच्या बाजूने अंग वाकडंतिकडं करत वर्गात जाऊन बसले. सगळ्या शिक्षकांनी ’कट’ केला आहे हे दिसतच होतं. पुन्हा एकदा परीक्षा ’सर’ करणं आलं हे दिसतंच होतं. वैतागत सरांनी पैज हरायला नको म्हणून पुन्हा अभ्यासाला लागले.

दुसरी शाबासकी मिळवायची होती पण पहिल्या शाबासकीने ’इतिहास’ घडवला.

Thursday, June 27, 2019

कथाकथन - अध्यक्षीय भाषण

कथाकथन या विषयावर माझे चार (?) शब्द.

माझ्या मराठी शाळेच्या संकेतस्थळावर भाषण आणि कथाकथन ’ऐकता’ येईल - https://bit.ly/2FBThrw

कथाकथन हा शब्द खर्‍याअर्थी आपल्या रोजच्या आयुष्यात सतत आपल्या आजूबाजूला घोटाळत असतो. एखादा प्रसंग, किस्सा बोलता बोलता आपण सांगतो ते खरंतर कथाकथनच आहे फक्त त्याचं स्वरुप छोटं - मोठं असू शकतं. तुम्ही ती गोष्ट, किस्सा किती रंगवून सांगता यावर त्या कथनाची रंगत अवलंबून असते. यामुळेच कथाकथन हा प्रकार अस्तित्वात आला असावा. जो मुळात आपल्या सर्वांच्याच अंगात भिनलेला आहे. विचार केलात तर लक्षात येईल की तसं म्हटलं तर आपण ही भूमिका रोजच निभावत असतो. कधी यशस्वीरित्या तर कधी धडपडत. त्याचंच विस्तारित स्वरुप कथाकथन.

कथाकथन म्हटलं की मला एक प्रसंग नेहमी आठवतो. साधारण १९९१ मधली ही गोष्ट आहे.  माझे वडील जिल्हापरिषदमध्ये कार्यकारी अभियंता  होते. गणपत्तीनिमित्त कार्यक्रम असावा बहुतेक. गिरीजा किर, वि. आ. बुबा या दोघांच्या कथाकथनाचा. ऑफिसच्या आवारातल्या गॅरेजमध्ये कार्यक्रम होता. आता नवल वाटतं, गॅरेजमध्ये कार्यक्रम होता त्याचं. हौसेपोटी गाड्या हलवून कर्मचार्‍यांनी छानसं व्यासपीठ उभारलं होतं. जिल्हापरिषदचे सारे कर्मचारी आणि जवळपासची लोकं कार्यक्रमाला हजर होती. गॅरेजच्या समोर गर्दी करुन रस्त्यावरच सगळे बसलेले. आमच्या क्वार्टर्स समोरच होत्या. घराच्या पायरीवर पथारी पसरुन कार्यक्रम पाहायला आम्ही बहिणी, आई बसलो. आपापल्यापरीने सगळे जय्यत तयारीत होते.  पण कार्यक्रम काही सुरु होईना. हळूहळू कुजबूज सुरु झाली. वि. आ. बुवा बसलेले दिसत होते. गिरीजा कीरांची वाट पाहत असणार. तेवढ्यात ऑफीसमधलं कुणीतरी आमच्या घराच्या दिशेने यायला लागलं. वडिलांकडे असणार म्हणून सरकून आम्ही त्यांना आत जायला जागा करुन दिली. पण ते म्हणाले.
"मोहना तुझ्याशी बोलायचंय." गोंधळून मी पाहतेय तेवढ्यात ते म्हणाले,
"गिरीजाताई काहीकारणास्तव येऊ शकत नाहीत. तू कर आज कथाकथन. वि. आ. बुवा आलेले आहेत. तुझं आणि त्यांचं कथाकथन करु." गिरीजा कीरांच्या जागी मी? त्यांचं आभाळमाया पुस्तक मी वाचलं होतं. भारावून गेले होते आणि प्रचंड उत्सुकतेने त्यांची वाट पाहात होते. त्याऐवजी मी करायचं कथाकथन? माझी पुंजी फार थोडी होती. स्पर्धांमधली बक्षिसं आणि गणपतीउत्सवात रत्नागिरीकरांसमोर केलेलं कथाकथन. त्यावेळेस महाविद्यालयातले आम्ही तिघं चौघं या स्पर्धांमध्ये आघाडीवर होतो त्यामुळे जिकडे तिकडे गोष्टी सांगायला असायचो.  पण आज मला एकट्याने कथाकथन करायचं होतं तेही गिरीजा किर यांच्या जागी. हातापायला कापरं सुटलं. पण जिल्हापरिषदेचा कर्मचारीवर्ग कुठूनकुठून आलेला. गर्दी झालेली. कार्यक्रम रद्द करता येणार नव्हता कारण वि. आ. बुवा आलेले होते. पण ते एकट्याने पूर्ण कार्यक्रम सादर करु शकत नव्हते.  वि. आ. बुवांची एक कथा झाली आणि मी उभी राहिले. गिरीजा कीरांच्या ’मित्रा’ कथेने मला अनेक बक्षिसं मिळवून दिली होती. त्याच कथेन सुरुवात केली.  माझ्या शब्दांची गाडी धाडधाड करत सुटली. कथा सुरु कधी झाली आणि कधी संपली तेच कळलं नाही इतका वेग होता त्या कथेला. त्यावेळेला मी नुकतीच आकाशवाणीत निवेदिका म्हणून काम करायला सुरुवात केली होती. दुसर्‍यादिवशी आकाशवाणीत कार्यक्रमाला आलेल्या कुणीतरी माझ्या कथाकथनाची नक्कल करुन दाखवली त्यावेळेस सुटलेल्या गाडीची कल्पना आली....पण प्रसिद्ध लेखिकेच्या जागी, प्रसिद्ध लेखकासमवेत आयत्यावेळी केलेलं हे कथाकथन होतं. तर बघा, नकळत तुमचेही कान टिपत होते ना माझं बोलणं? हेच तर असतं कथेचं कथन.

आमची पिढी मोठी झाली ती व. पु. काळे, पु. ल. देशपांडे, शंकर पाटील, द. मा. मिरासदार यांच्या कथाकथनाच्या कॅसेट ऐकत. ही नावं मी सांगतेय तेव्हा लक्षात येतं की यामध्ये स्त्री कथाकथनकार नाहीत. का? खरं सांगायचं तर फार विचारच केला नव्हता कधी. पण आज कथाकथन या विषयावर बोलायचं आहे म्हटल्यावर हे प्रकर्षाने जाणवतंय. स्त्री कथाकथनकार होत्या, त्यांचे कार्यक्रम होत होते पण कॅसेट रुपात आलेले पुरुष कथाकथनकार जास्त होते. मला आठवतंय, व. पु. काळेंची शिष्या मुग्धा चिटणीसचं कथाकथन त्यावेळेस आमच्यासारख्या महाविद्यलयीन विद्यार्थ्यांमध्ये प्रिय होतं. निलम प्रभु यांच्या ’पप्पा’ कथेच्या सादरीकरणाला कोण विसरेल? पण त्यांचं हे कथाकथन व. पु. काळेंबरोबर होतं. स्वतंत्रपणे केलेलं नव्हतं. तरीही आज इतक्या वर्षांनीही पप्पा कथेमधील ती आणि नानासाहेब देशमुख यांचा विसर पडत नाही. दत्तक मुलगी आणि नानासाहेब यांच्या आयुष्यातील गुंतागुंत निलम प्रभु इतक्या प्रभावीपणे आपल्यापर्यंत पोचवतात की ही कथा काळजात घर करुन बसते. कथा सांगणं हे कौशल्य आहे यात कथा निवड आणि श्रोता महत्वाचा. आपल्यासमोरचा वयोगट, त्यांची आवड - निवड हा मोठा भाग त्यात आलाच पण कोणत्याही कथेत ’कथा’ असायला हवी. रंजकता हवी. थोडक्यात ज्या कथेला उत्तम सुरुवात, मध्य आणि शेवट असेल अशा कथेत श्रोता रंगतो. कथाकथन करताना प्रेक्षकांचा अंदाज घेत आयत्यावेळी बदल करता आले पाहिजेत. हे सोपं नाही पण कठीणही नाही. अनुभवाने जमणार्‍या या गोष्टी आहेत.  कथाकथन सादर करताना खूपजणांचा गोंधळ उडतो. कथेतील पात्रांचे आवाज बदलायचे असतात असा समज असतो. पण प्रत्यक्षात तुम्ही स्त्री, पुरुष असा आवाजात बदल न करता, आवाजात चढ - उतार करुन ते पात्र डोळ्यासमोर उभं करायचं असतं. ते केलं नाही, तर त्याचं स्वरुप एकपात्री प्रयोग असं होतं.

अजूनही स्त्री कथाकथनकार म्हटलं की मुग्धा चिटणीस, निलम प्रभु, गिरीजा कीर  ही काही नावं ठळकपणे आठवतात. २० वर्षाहून अधिक काळ भारताबाहेर असल्याने नविन नावं मला ठाऊक नाहीत किंवा कानावर पडलेली नाहीत. हा विचार मनात आला की वाटतं, जर खरंच एकूणच कथाकथन हा प्रकार कमी झाला असेल तर तो माध्यमांच्या बदलामुळे झाला असावा. गोष्टी सांगणार्‍यामधे मुळात गोष्टी वाचण्याची आवड बहुतेकवेळा असतेच. पण इतर माध्यमांच्या प्रभावामुळे वाचन कमी झाल्यामुळे कथाकथन कमी झालं असावं.  वाचनाची आवड हा मुद्दा बाजूला ठेवला तर आपलं किंवा इतरांचं लेखन आपण कथाकथनाने दुसर्‍यांपर्यंत पोचवू शकतो. न वाचणारी मंडळीही गोष्टी उत्साहाने ऐकतात.  हाच विचार घेऊन मी माझ्या मेल्टिंग पॉट आणि नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ’रिक्त’ कथासंग्रहाबाबत केला. कथाकथनाचे कार्यक्रम केले. त्यामुळे माझ्या कथा मी श्रोत्यांपर्यंत पोचवली आणि त्यामुळे पुस्तकाबद्दलही उत्सुकता निर्माण झाली. लेखक म्हणून हेच तर हवं असतं ना आपल्याला? लेखकाला आपलं किंवा आपल्याला आवडलेलं इतरांचं लेखन इतरांपर्यंत पोचावं असं वाटत असतं. त्यासाठी कथाकथन हा उत्तम मार्ग आहे असं मला वाटतं.

पूर्वी कथाकथनाचे कार्यक्रम होत असत. कॅसेटस निघत असत. आता समाजमाध्यमं  बदलली आहेत. काळानुसार बदलत  लोकापर्यंत पोचण्याचे मार्ग आपण शोधले पाहिजेत. किंबहुना कथा लोकांपर्यंत पोचवण्याचे मार्ग आता अधिक सुलभ झाले आहेत. ते वापरणं आपल्याच हातात आहे. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे storytel. भारतात storytel app ला छान प्रतिसाद मिळतोय. त्याद्ववारे अनेक पुस्तकं आपण आता ऐकू शकतो. podcast हा दुसरा मार्ग. यासाठी आपण पट्टीचे कथाकथनकार नसलो तरी ऑडॅसिटीसारखी अॲप्स वापरुन आपल्या आवाजाला चढ उतार देता येतात.  youtube आहेच. ही सारी माध्यमं अशी आहेत की बसल्या जागी मराठी भाषिकांपर्यंत तुम्ही जगाच्या कानाकोपर्‍यात पोचू शकता. लेखक एकत्र येऊन असे कार्यक्रम  प्रत्यक्ष किंवा यामार्गे सादर करु शकतात. अगदी घरगुती स्वरुपात कथाकथनाचे कार्यक्रम करता येतील. वाचनालयात कथाकथन करता येईल. कथा ऐकायला कुणालाही आवडतं. सादरकर्त्याला आपली कथा उत्तम प्रकारे लोकांसमोर पोचवण्यासाठी कथाकथन करणं शिकलं पाहिजे. यासाठी सध्याच्या माध्यमांचाच उपयोग कसा करायचा हे आव्हान लेखकांनी झेललं पाहिजे. व्यक्तीगतपातळीवर किंवा एकत्रितपणे!

मार्ग बदलले तर लेखकांना आणि कथाकथनाला दिवस चांगले येतील अशी आशा, अपेक्षा करुन मी थांबते. पुन्हा एकदा यानिमित्ताने कथाकथनाबद्दल विचार करायला आणि तुमच्यासमोर माझे विचार मांडायला संधी दिल्याबद्दल मोहन कुलकर्णी यांची मी आभारी आहे. धन्यवाद.

Tuesday, February 26, 2019

संवाद

२८ वर्ष महाराष्ट्रात राहिलेली, मराठी माध्यमात शिकलेली आई आणि जन्माने अमेरिकन, फक्त घरातच मराठीशी संबंध येणारी १४ वर्षांची तिची लेक यांच्यामधील ’प्रेमळ’ संवाद.

आई: तुमच्या जनरेशला हे कळणं कठीण आहे.
लेक: पिढीला.
आई: ओ.के. पिढीला.
लेक: ठीक आहे.
आई: तुझा प्रॉब्लेम काय आहे? काही बोलायला गेलं की मध्येमध्ये अडवतेस. लिंक लागत नाही.
लेक: मला कुठली अडचण नाही. (प्रश्न/समस्या असे वाक्यानुरुप योग्य बदल करत) नाही. तू मला मराठी शिकवलंस पण तुला इंग्रजी शब्द वापरलेस म्हणून अडवलं की चिडतेस आणि विसरतेस.
आई: कळलं. पण खरंच इरीटेट व्हायला होतं.
लेक: वैतागायला होतं. तुमच्या पिढीचंच कळत नाही आई मला. तुम्हीच कुठली भाषा नीट बोलत नाही. किती इंग्रजी शब्द.

संभाषणाचा अंत: लेक आईचं मराठी बघून हताश. तणतण करत स्वत:च्या खोलीत प्रस्थान. आई आपला वारसा पुढच्या पिढीकडे सोपवला जाणार आहे या जाणीवेने लेकीकडून मराठीची उजळणी करायला नाईलाजाने तयार.

लेकीची तमाम मराठी इंग्रजी बोलण्यार्‍यांसाठी सूचना: इंग्रजीला मराठी शब्द सुचत नसेल तर वाक्य बदलून दुसर्‍या शब्दाचा वापर करायचा. सोप्पं आहे. जमेल तुम्हालाही.

Saturday, December 29, 2018

पुस्तकं आमची...

यात माझं ’रिक्त’ पुस्तक आहे याचा आनंद वेगळाच.


Friday, December 7, 2018

जॉर्डन, इस्त्राइल आणि आम्ही

देश, शहरं पायी धुंडाळले की चांगले समजतात हा कधीतरी पाजलेला ’डोस’ मुलांनी आता आम्हाला पाजायला सुरुवात केली आहे. ती चालतात, नवरा त्यांच्यामागोमाग त्यांना गाठत राहतो आणि मी सर्वांना गाठण्यासाठी शर्यतीत भाग घेतल्यासारखी धावते. त्यामुळे दोन - एक - एक अशा क्रमात आमची चांडाळचौकडी इस्त्राइल, जॉर्डन, तुर्कस्थानात नुकतीच फिरुन आली. धावताना मला प्रत्येकवेळी फेसबुकवर जी मित्रमंडळी 5 k, 10 k असे चढत्या भाजाणीसारखे आकडे फोटोसह टाकत असतात त्यांची आठवण येत होती. कशाला त्या शरिराला इतकं दमवतात असं पुटपुटत पण त्यांच्याकडूनच स्फुर्ती घेत मी मुलांना गाठण्यासाठी पळापळ चालूच ठेवली. तीन देश असे फिरलो (धावलो) आम्ही ८ दिवसात. नशीब, शार्लटहून तिथे पोचायला विमान होतं!

मे महिन्यात लेकाने म्हटलं,

"इस्राइलला जायचं का?"

"कशाला? मरायला?" मी भेदरून विचारलं. पुढची १० मिनिटं  ऐकीव माहितीवर विधानं करायची नाहीत असं ऐकवण्यात आलं. मध्येच मी, मी तुझी आई आहे की तू माझा बाबा असं विचारून त्याला गोंधळवलं. पण गाडी पुन्हा मुद्द्यावर आणण्यात तो पटाईत.  बसल्याबसल्या इस्राइलबद्दल इतकं ऐकलं की त्याला म्हटलं,

"आता कशाला जायला हवं तिकडे?" त्याने फोनच बंद केला. पण हुकुमाप्रमाणे मी ’चालायला आणि सायकल हाणायला’ सुरुवात केली. मे महिना ते सप्टेंबर रोज. ऑक्टोबर महिना थंडी, थंडी करत वाचवला.  ८ दिवस होणारी तंगडतोड झेपायला हवी म्हणून प्रवासाच्या ६ महिने आधी दरवर्षी हे चक्र सुरू.  करता करता १४ नोव्हेंबर येऊन ठेपला.

दिवस पहिला: वॉशिंग्टन डी. सी. ते इस्तांबूल थेट विमान होतं.  पुढच्या २ तासाच्या विमानासाठी १० तास थांबणार होतो. त्यापेक्षा गाडीने पोचलो असतो या माझ्या वक्तव्यावर घरातल्यांनी फक्त नेत्रकटाक्ष टाकला. मुलगा म्हणाला,

"आई, आपल्याला दुसर्‍या गावाला नाही दुसर्‍या देशात पोचायचंय." तर काय झालं असं सवयीने येणारं वाक्य गिळलं आणि इस्तांबूल पालथं घातलं. फिरता फिरता प्रवासी कुठले ते ओळखून त्यांच्या भाषेत पुकारा करत खायला बोलावण्याची इथल्या माणसांची कुशलता अचंबित करत होती. नमस्ते, नमस्ते झालं तसं आम्हीही खूष होऊन आत शिरलोच. दर पाच मिनिटांनी आतून  मातीचं छोटं भांडं,  ठेवणी घेऊन कुणीतरी येत होतं.  ज्वाळेवर वर - खाली करत हातातल्या हुंडीचं  झाकण अलगद फोडून छोट्या मातीच्या भांड्यात शिजवलेली गरम गरम  भाजी ताटात ओतत होते.  आम्हीही तेच मागवलं. चविष्ट भाजी होती.

दिवस दुसरा: इस्तांबूलहून जॉर्डनला (अमान)  पहाटे पोचलो. डोळ्यावरची झोप उडवली उबर चालकाने. रस्त्यावर शुकशुकाट असला तरी गाडी जबाबदारीने चालवतोय म्हणेपर्यंत चालवता, चालवता त्याने आपला फोन काढला, फोन मांडीवर ठेवून, त्यात डोकं खुपसून गाडी चालवायला लागला. ’रस्ता समोर आहे, डोकं वर कर’ हे ’गूगल’ करून त्याला सांगेपर्यंत तो दिवा हिरवा असतानाच थांबला. दुसर्‍या दिवशी आम्हालाच गाडी चालवायची होती. या देशात हिरव्यावर थांबायचं की काय अशा प्रश्नचिन्हांकित चेहर्‍याने एकमेकांकडे पाहत राहिलो. चालकाचा चेहरा वर होईपर्यंत दिवा हिरव्याचा पिवळा, लाल आणि परत हिरवा झाला. अचानक  आमचा चालकही जागा झाला. सुटलाच मग तो. त्याने आम्हाला घरापाशी आणल्यावर आम्ही सुटलो. पैसे दिल्यावर सुटे पैसे काही त्याने परत केले नाहीत त्यामुळे एरवी सढळ हस्ते ’टिप’ देणार्‍या मुलाचं अमेरिकनत्व जागं झालं. आता मी नाही देणार त्याला आणखी पैसे असं छातीठोकपणे मराठीत त्याने जाहीर केलं. आपली भाषा दुसर्‍याला कळत नसली की पटकन परक्या देशात ’हुशार’ व्हायला होतं.

 संध्याकाळी गावात चक्कर टाकली. रस्त्यावर स्त्रिया फारश्या दिसल्या नाहीत. तिथल्या किल्ल्याकडे जाताना भाषेचा गोंधळ होताच. पण पोचलो. भारतीय म्हटल्यावर तिथे काम करणारे खूश झाले. हिंदी सिनेमाचे संदर्भ देत राहिले. कुणीही कुठून विचारलं की नवर्‍याचं सुरू, "मुळचे  भारतीय आता अमेरिकेत..." अमेरिकेच्या ’गन’ संस्कृतीवर ताशेरे ऐकल्यावर आम्ही त्याचं ’अमेरिका’ बंद करून टाकायचा प्रयत्न केला. पण तो दोन्ही देशाचा अभिमानी नागरिक त्यामुळे जिकडे तिकडे भारत - अमेरिका चालूच राहिलं. झालं असं, किल्ल्यावरून मशिदीत गेलो. मशिदीत प्रवेश करण्यासाठी दुकानातून जावं लागतं.  तिथे मशिदीत जाण्यासाठी स्त्रियांसाठी असलेला अबया घालायला लावतात, दूध नसलेला तरीही चविष्ट चहा अतिशय आग्रहाने पाजतात.  वस्तू बघता बघता एका तलवारी समोर आलो. विक्रेते दोन तरुण मुलं होती. कुठून आलात विचारल्यावर  भारत - अमेरिका झाल्याझाल्या तो मुलगा म्हणाला,

"तुमच्या देशात आमच्या तलवारींचा चांगला ’बिझनेस’ होईल. नाहीतरी सर्रास बंदुका वापरता तुम्ही." त्यानंतर असेच काहीतरी विनोद केले त्याने. कर्मभूमीची ही प्रतिमा पचवणं कठीण गेलं. शेवटी अमेरिकेची ही गंभीर समस्या आहे हे सांगितल्यावर त्या मुलांनी विनोद थांबवले. पण  त्या मुलांच्या मनातल्या अमेरिकेच्या प्रतिमेचं दर्शन दु:खदायक होतं.

दिवस तिसरा: भाड्याची गाडी करून पेट्राच्या दिशेने प्रवास. चार तासांचा प्रवास आहे. डेड सी बघायचा असल्यामुळे गावातून गेलो. नाहीतर तीन तासात पोचता येतं. गावातून म्हणजे अक्षरश: गल्लीबोळातून. अमान सोडल्यावर नंतर तर वाळवंटच. पहाटेची वेळ असल्यामुळे आमची एकमेव गाडी रस्त्यावर. डेड सी खरंच ’डेड’ होत चालला आहे. मिठाच्या लाद्या तयार झाल्या आहेत. त्यावरून आरामात चालता येत होतं. मिठागरच झालं आहे.  डेड सी ने निराशा केली. जितकं वाचलं, ऐकलं होतं तेवढं विशेष काही वाटलं नाही. पेट्राची रात्र मात्र रंजक ठरली. ज्याचं घर होतं त्याचा मेव्हणा गप्पा मारायला आला. तो बेडूविन जमातीचा. त्याने उत्साहाने त्याच्या लग्नाची ’स्टोरी’ सांगितली. १६ व्या वर्षी त्याने वडिलांना लग्न करायचं आहे हे आपल्या मनाचं गुपित सांगितलं. त्याला आवडणार्‍या मुलीच्या घरी या मंडळींनी जाऊन मागणी घातली. मुलीला द्यायची रक्कम मोठी होती. वर्षभर मुलगा पैसे जमवत राहिला. जेव्हा जेव्हा मुलीला भेटावंसं वाटायचं तेव्हा तेव्हा दोन्ही घरातली माणसं एका खोलीत जमत. दोघांनी सर्वांच्यासमोरच बोलायचं. वर्षाने लग्न झालं. ’स्टोरी’ संपवत म्हणाला,

"आता लवकरच दुसरं लग्न करणार आहे."

त्याच्या पहिल्या लग्नाच्या ’स्टोरी’ त आम्ही इतके गुंतलो होतो की दुसर्‍या लग्नाचा विचार मानवेना. बोलणंच खुंटलं. तसं उठता उठता सकाळी नाश्ता करून द्यायचं कबूल करत तो गेला. ठरल्याप्रमाणे सकाळी ७ वाजता येऊन त्याने चविष्ट नाश्ता केला. शाकशुक नावाचा पदार्थ, ऑलिव्ह्ज, हमस आणि नान. नान सगळीकडे गार द्यायचे. सांगितल्यावर गरम करून दिलं. भारतीयांना चहा आवडतो म्हणून त्याने आमच्यावर बिनदूधाच्या चहाचा माराच केला. पण मन लावून खाऊ पिऊ घातलं.  नाश्त्याने तृप्त होऊन पेट्रा पाहायला बाहेर पडलो. बाहेर पडताना खिडकीतून पाहिलं तर सगळीकडे बैठे एकावर एक ठेवल्यासारखे ठोकळ्यासारखे दिसणारे डोंगर. छायाचित्र काढली पण प्रत्यक्ष दिसतात तसे फोटोत नाही येत.

दिवस चौथा: पेट्रा सुंदरच आहे. निवांत फिरायचं असेल तर हातात दोन - तीन दिवस हवेत . दगड कोरून बांधलेलं हे पुरातत्त्व वास्तुकलेचं उत्कृष्ट दर्शन आहे.  आम्ही एकच भाग केला. जाऊन येऊन तीन तासांच्यावर पायपीट. एवढं केलं तरी पूर्ण पेट्राच्या बांधणीची कल्पना येते. घोड्यावरून गुहेच्या दारापर्यंत जाता येतं. पुढे बग्गीतून. साधारण तासाभराने ट्रेझरीची इमारत लागते. त्या पुढे गाढवांची सत्ता. असं का या प्रश्नाचं उत्तर लवकरच मिळालं.  आतमध्ये एक दोन ठिकाणी खायची प्यायची व्यवस्था आहे. त्या मालकाशी गप्पा मारल्या. त्यावरून समजलं की  आताचं पेट्रा हे बेडूविन जमातीचं निवासस्थान. इथल्या गुहांमध्येच ते राहत. पेट्रा पर्यटनस्थळ करायचं ठरल्यानंतर या जमातीला उदरनिर्वाहाचं साधन म्हणून इथेच काम किंवा व्यवसाय करण्याची मुभा दिली गेली. राहण्यासाठी स्वतंत्र वस्ती उभारली गेली. यामुळेच जॉर्डन सरकारच्या हद्दीत घोडा आणि बग्गी तर पुढे गाढव असा नियम आहे. हे सांगतानाच त्याच्या गुहेत सलमानखानच्या चित्रपटाचं चित्रीकरण झालं, तो इथे राहायला होता वगैरे माहिती  त्याने दिली. आम्ही काही धन्य धन्य होऊन फोटो काढले नाहीत त्या जागेचे. कदाचित नाट्यकलावंत किंवा लेखकाचे पाय त्या जागेला लागले आहेत हे कळलं असतं तर काढले असते :-). गाढवावर बसा म्हणून कुणी मागे लागलं नाही पण घोडेवाल्यांनी मात्र पिच्छा पुरवला. आणि गिर्‍हाईक पकडण्यासाठी आपापसात हुज्जतही घातली.

दिवस पाचवा: पेट्रापासून  दोन तासाच्या अंतरावर वादीरम.  वाळवंटातल्या मोकळ्या रस्त्यावर गाडी चालवताना आपण चित्रपटात एकच गाडी वाळवंटातून बराचवेळ मार्गक्रमणा करताना बघतो तसंच वाटत होतं. गाडीसमोर एक उंटही डुलत डुलत आला. आमचं आश्चर्य ओसरुन फोटो काढायचं सुचेपर्यंत त्याने रस्ता ओलांडलाही. वादीरमचं सौंदर्य अविस्मरणीय आहे. नजर टाकू तिकडे लालसर रंगाची वाळू, वाळूचे डोंगर आणि प्रचंड मोठाल्या शिळा. सुरुवातीला उंटावरून सैर केली. आधी उंचाला उंट धप्पकन खाली बसला तरी तो उंचच होता. कसंबसं त्याच्या पाठीवर स्थानापन्न झाल्यावर असा काही उठला की तोल सावरता सावरता मुष्किल. मुलाचा उंट तर इतका खादाड की जरा काही त्याला  हिरवं दिसलं की थांबलाच. मुलगा आपल्यासारखाच आणखी एक प्राणीही आहे म्हणून खूष झाला. माझा आणि मुलीचा उंट एकामागोमाग होते. माझा उंट सारखा मुलीशी ’लगट’ करे. त्याची लगट आणि तो बाजूला व्हावा म्हणून माझा आरडाओरडा एकाचवेळी चालू होता. मुलगी उतरुन चालायला लागेल की काय असं वाटायला लागलं. त्यात कुठल्या भाषेत आरडाओरडा केला की उंटाला आणि त्याच्या माणसाला कळेल हा प्रश्न होताच. घाबरुन उंट पळत सुटला तर काय घ्या. शेवटी सहस्त्र खाणाखुणा आणि वेगवेगळ्या उच्चारात तेचतेच उंटवाल्याला न कळणारं बोलत राहिले. अखेर त्याचा बंदोबस्त झाला. त्याची दोरी अधिक गुंडाळली  आणि उंटाचं  तोंड मुलीच्या आसपास पोचेनासं झालं. उंटावरुन उतरल्यावर  जीपमध्ये. बर्‍याच ठिकाणी भल्या मोठ्या शिळा चढायच्या होत्या, अरुंद खडकांवर पाय टाकत डोंगरांचं टोक गाठायचं होतं. निमुळत्या फटींमधून देह आत सरकवायचे होते. बर्‍याच कसरती पार पाडल्या. रात्री मुक्कामासाठी तंबूत, तिथेच कापडी भोजनालयात वाळूत भट्टी पेटवून केलेल्या जेवणावर सर्वांनीच ताव मारला. जेवण, गप्पा आणि हुक्का. रात्री इतर काहीच उद्योग नसल्याने भोजनालयाचं विश्रांतीगृह झालं.  नॉर्वे, जपानहून आलेल्या लोकांशी गप्पा झाल्या. पण बरेचसे हुक्कातच गर्क होते. आम्ही आपले चहा रिचवत होतो.

दिवस सहावा: वादीरमहून इस्राइल. पुन्हा वाळवंटच. वाहतूक जवळवळ नाहीच. मी गाडी चालवायला लागल्यावर वाटेत लागणार्‍या लहान गावातल्या नजरा आश्चर्याच्या होत्या.  आकाबाला  गाडी परत केली. आकाबा मोठं शहर आहे. गाडी परत करून पायी समुद्रावर चक्कर मारून आलो. तिथून इजिप्त, सौदी आणि इस्राइल  असे समुद्रापलीकडे असलेले तीन देश दिसतात. ज्यांच्याकडून गाडी भाड्याने घेतली होती त्यांनी जॉर्डनच्या हद्दीशी सोडलं. जॉर्डनमधून इस्राइलमध्ये प्रवेश. इस्राइलमध्ये गेलात तर अरब राष्ट्रात प्रवेश नाही या अरब राष्ट्रांच्या खाक्याला प्रत्युत्तर म्हणून इस्राइल पासपोर्टवर  शिक्का न मारता एक कागद हातात ठेवतात.

दिवस सातवा: इस्राइलमध्ये तेलवीवला आलो. बाहेर पडल्यावर तिथली हसतमुख कर्मचारी मदतीला तत्पर होती. उबर न करता त्यांचं तिथलं अॲप डाऊनलोड करायला लावून तिने टॅक्सी बोलवायला लावली. टॅक्सीलासुद्धा तिने ती उभी होती तिथपर्यत यायला लावलं. ती आम्हाला तिथून हलूच देत नव्हती. सुरुवातीला मदतीचा प्रयत्न वाटला पण नंतर तेच वागणं खटकलं. शेवटपर्यंत कारण कळलं नाही पण सुरक्षितता हे कारण असावं.  तेलवीववरुन जेरुसलम. धार्मिक स्थळ.  भक्तांची गर्दी अतोनात तेवढीच बंदूकधारी सैनिकांचीही. रस्त्यावर, लोकल, मॉल सर्वत्र. २० - २५ वर्षाची सैन्यातील मुलं - मुली बंदूक (स्टेनगन्स) घेऊन वावरताना पाहिलं तेव्हा सुरुवातीला विचित्र दडपण आलं मनावर. उगाचच कुणी हल्ला तर करणार नाही ना अचानक या दृष्टिकोनातून माझीच टेहळणी सुरू झाली. पण काहीवेळातच बंदूकामध्ये वावरायची  ’सवय’ झाली.

’वेस्टर्न किंवा वेलिंग वॉल’ हे ज्यू लोकांचं प्रार्थनास्थळ आहे. स्त्रिया आणि पुरुषांसाठी दोन वेगवेगळे भाग आहेत. अंगभर कपडे असणं आवश्यक आहे. भिंतीवर डोकं टेकून लोक इथे रडतात ते रोमनांनी ’टेंपल’ उद्धस्त केल्याचा निषेध म्हणून. तसंच आपल्या इच्छा लिहिलेल्या चिठ्ठ्या भितींतल्या फटीत लोक ठेवतात. याच आवारात असलेलं ज्यू आणि मुस्लिम लोकांचं ’टेंपल माऊंट/डोम ऑफ रॉक’ बाहेरुनच बघता येतं मुस्लिमाखेरीज इतर धर्मीयांना आत प्रवेश नाही.  आम्ही सहज एका स्थानिक जोडप्याला आत जाण्यासाठी काय करावं लागेल विचारलं. दोघांमधला पुरुष आत जाता येणार नाही यावर ठाम होता तर स्त्री अशा निर्बंधांना काय अर्थ म्हणून त्याच्याशी वाद घालत होती. अर्थात नियमापुढे ती काय करणार? पण दोघांच्या मनोवृत्तीतला फरक पाहताना गंमत वाटली. हा सगळा भाग फिरून झाला की बाजारातच बाहेर पडायला होतं. तिथेही जागोजागी बंदूकधारी सैनिक.  जेरुसलमहून पॅलिस्टाईनची हद्द अवघी अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे.  पॅलिस्टिनियन सतत हद्दीवरून दगडफेक करत असतात असं ऐकलं. आम्ही सगळा धोका पत्करून जायचं ठरवलं. पॅलिस्टाईनियनना जेरुसलममध्ये सहजासहजी येता येत नाही. फक्त शुक्रवारी त्यांना जेरुसलममध्ये येता येतं. पण जेरुसलमहून तिकडे जाणार्‍या गाड्या सारख्या सुटत असतात. गाडी खचाखच भरलेली होती. रस्त्यावरही तोबा गर्दी वाहनांची. पुण्याची आठवण झाली. आम्हाला जेमतेम निम्मं अंतर जायलाच २ तास लागले. अजून दोन तास पोचायला लागतील असं बसमध्ये कुणीतरी सांगितलं. परत येताना ’तपासणी’ चक्र असणारच होतं. सगळा विचार करून आम्ही अर्ध्यावर उतरून हळहळत परत फिरलो.

दिवस आठवा: परतीचा. तेलवीव ते इस्तांबूल, इस्तांबूल ते वॉशिंग्टन डी. सी. डी. सी. ते शार्लट.

गाडी चालवताना आठ दिवस पुन्हा पुन्हा शब्दांतून रंगत होते. ठिकाणं, माणसं, खाणं... वेगवेगळे अनुभव पोतडीत जमा झाले. आमच्यासारख्या खादाडखाऊ लोकांची या देशात मजा आहे.  चिकन श्वॉरमा, बाकलावा, मलाबी, शाकशुक एक ना अनेक.  परत येताना पुढच्यावेळेला कोणत्या देशात जायचं  आणि काय खायचं याबद्दल चर्चा रंगली आणि  या प्रवासाची सांगता झाली.

























Thursday, October 4, 2018

अक्कलखाती गेलेले पैसे परत कसे मिळवायचे?

आता अक्कलखात्यात गेले हे समजलं हेच खूप झालं. परत कसले मिळवताय असं म्हणाल तुम्ही. पण मिळवायचेच आहेत. प्रश्न पैसे गेल्याचा नाही फसवणूक झाल्याचा आहे. तर झालं असं,

गेली दोन वर्ष लमार नावाचा इसम आमचं गवत कापायला येतो. महिन्याचे पैसे मी त्याला एकदम देते. हल्ली हल्ली गवत वाढलेलं नसतानाही तो कापत होता. गवत नसेलच तर कापणार कसं हा प्रश्न मला पडतो लमारला नाही. त्यादिवशी अचानक यंत्राचा आवाज आला आणि भूकंप झाल्यासारखी मी दार उघडून बाहेर धावले. माझा वेगच इतका होता की लमारच्या हातातलं यंत्र धाडकन थांबलंच. तरी मी त्याला पुन्हा थांबवलं,
"थांब, थांब. गवत वाढलेलं नाही." लमारने मला वेड लागल्यासारखं माझ्याकडे पाहिलं आणि एक कोबीच्या गड्ड्यासारखा वाढलेला गड्डा दाखवला."
"हे गवत नाही. रान आहे. " मीपण त्याला वेड लागलंय असा चेहरा करत सांगितलं. दोघं वेडे एकमेकांकडे पाहत राहिले काहीवेळ. तो काही बोलत नाही हे पाहून मीच म्हटलं,
"एका झुपक्यासाठी तू अख्खी माती कापणार? गवत नाहीच वाढलेलं तर मातीच कापू असं ठरवून येतोस की काय? काय बुवा ही माणसं! पैशासाठी कापा आम्हाला." मी मनात बोललेलं त्याला समजलं. तो म्हणाला,
"ठीक आहे. मी पुढच्या आठवड्यात येतो." तो गेला आणि लमारला कसं झापलं, थांबवलं हा माझा पराक्रम मी घरात जाहिर करुन टाकला, आता तुमच्यापर्यंत पण पोचवतेय. उकळायला बघतात नुसते. थांबवलं नाही तर फसलातच तुम्ही वगैरे स्वगतं घरात आठवडाभर चालली आणि नंतर सुरु झाली प्रतिक्षा. गवत वाढवाढ वाढलं पण लमारचा मुखचंद्रमा नाहीसा झाला तो झालाच. पुन्हा अवतरलाच नाही आमच्या अंगणात.

आता...?
त्याला भरपूर निरोप पाठवले. लेखी. म्हणजे SMS हो. मग फोन केले. लमार महाशय फोन उचलत नाहीत म्हटल्यावर नवर्‍याला गळ घातली. त्याने
"तू असे आधीच कसे पैसे दिलेस?" एवढा एक प्रश्न विचारुन दुर्लक्ष केलं. त्यावर मी चार वाक्य ऐकवायला गेले.
"प्रत्येकवेळेला ४० डॉलर्सचा चेक नाहीतर रोख देत बसायचं?. तसं केलं असतं तर एकदम का देत नाहीस म्हटलं असतंस." पुढची दोन पूर्ण व्हायच्या आत,
"लमारमुळे आणखी एक वादाला निमित्तच सापडलं तुम्हाला" असा शेरा मारुन मुलगी आपल्या खोलीत निघून गेली. मग लमारशी बोलण्याऐवजी नवर्‍याने त्याला SMS धाडून दिला. तो कसला उत्तर देतोय. असे १५ दिवस गेले मग अनोळखी फोन वापरुन फोन केला आणि नवर्‍याच्या हातात दिला. लमारने हा फोन ताबडतोब उचलला. कोण बोलतंय कळल्यावर तो कसा अपघातात जायबंदी झालाय. येतोच पुढच्या आठवड्यात असं सांगत त्याने माझ्या नवर्‍याची समजूत घातली. इतकी की काही मदत हवी आहे का असं माझा नवराच त्याला विचारायला लागला. मी आपली इकडे १२० डॉलर्सच्या खाणाखुणा करत. फोन ठेवल्यावर नवरा म्हणाला,
"अपघातात जायबंदी आहे. जाऊ दे. उपचाराला होतील त्याला पैसे ते. सोडून दे."
"लमारला सोड तू. आम्हाला देतोस का तू सहज सोडून.." वगैरे मला अर्थात काढणं भागच होतं. ते झाल्यावर मी समजूतीने म्हटलं,
"पण तो खरंच जायबंदी आहे का ते शोधून काढ आधी. त्याने मला फसवलंय. अनोळखी फोन कसा उचलला? सरळसरळ थापा मारतोय." तो थापा मारतोय की नाही यावर आम्ही घनघोर चर्चा केली. मग श्रमपरिहार म्हणून मस्त बाहेर जेऊन आलो.

पुन्हा लमारची प्रतिक्षा सुरु. काही दिवस वाट पाहून काल त्याला निरोप पाठवला.
"BBB कडे तक्रार करते तुझी. सोशल मिडीयावर वाभाडे काढते तुझे." आता हे वाभाडे नक्की कसे काढायचे? लमारला ओळखणारं आहे कोण इथे :-).

जाऊ दे झालं. इतकं लिहिल्यावर उगाचंच १२० डॉलर्स मिळाले असं वाटायला लागलंय. म्हणजे काय तुमच्यापैकी कुणीतरी काय केलं की अक्कलखात्यात गेलेले पैसे परत मिळवण्याची युक्ती सांगेलच. नाही का?

Thursday, April 19, 2018

नाटक आणि नेपथ्य

"डंख" नाटक ही आमची दहाव्या वर्षाची निर्मिती असेल. गेले ३ महिने नेपथ्यावर अविरत काम चालू आहे ते
पाहताना नकळत मन पहिल्या निर्मितीकडे जातं. २००८ सालाकडे. त्यावर्षी २ एकांकिका केल्या. भिंत एकांकिकेला नेपथ्य काहीच नव्हतं. ३ कलाकार आणि मागे काळा पडदा तर महाभारतासाठी निव्वळ खुर्च्या. शाळेत असल्यापासून एकांकिका स्पर्धा हा जीवनाचा अविभाज्य भाग असल्यासारखंच होतं. कथेतील नाट्य प्रेक्षकांपर्यंत पोचवण्यासाठी नेपथ्याची गरज असते असं कधी वाटलंच नव्हतं ते स्पर्धेतील कलाकारांच्या देहबोलीमुळे. भिंत दाखविण्यासाठी भिंत कधी उभारावी लागली नाही तेच दारं, खिडक्या किंवा इतर गोष्टींबद्दल. सर्वच कलाकार ते आपल्या अभिनयातून साकारायचे. तेच आम्ही पहिला प्रयोग करताना केलं. मिळालेला प्रतिसाद उत्तम होता पण तितकाच बुचकळ्यात टाकणाराही. कितीतरीजणांना एकांकिका म्हणजे सुरुवातीला एकपात्री असेल असं वाटलं होतं आणि नेपथ्य (सेट) नाही ही कल्पना पचवणंही जडच गेलं. लक्षात आलं की नाटक लोकांना परिचयाचं आहे पण एकांकिका या स्पर्धेपुरत्या मर्यादित असल्याने त्याबद्दल माहिती नसावी. मग आम्हीपण म्हटलं, त्यात काय  बांधू थोडी दारं, भिंती, खिडक्या...

पण इतकं सोपं  नव्हतं  हे प्रकरण. मुख्य प्रश्न त्या बांधायच्या कशा, कुणी आणि कधी? एकांकिकेचा सरावच आठवड्यातून एकदा मग नेपथ्याचं काम कधी करायचं? पुढचा अडथळा होता खर्च. एकांकिका/ नाटक करताना फायदा नाही झाला तरी चालेल पण तोटाही नको यावर मी ठाम तर विरेनचा तुला दारं, खिडक्या हव्या आहेत ना घे पाहिजे तितक्या....असा खाक्या.  कलाकार स्वत:चा वेळ देऊन उत्साहाने सहभागी होतात त्यामुळे  कलाकारांना  आणि त्यांच्या जोडीदाराला तिकिटाचा खर्च करायला लावायचा नाही, कार्यक्रम झाल्यावर बाहेर जेवण किंवा DVD द्यायला हवीच असं वाटायचं, कलाकारांच्या मेहनतीची जमेल तेवढी कदर करावी म्हणून. त्याचवेळेस नाट्यगृहही दोन दिवस ताब्यात हवं. एकाच दिवशी कलाकारांवर ताण पडू नये, प्रयोगाला सर्व ताजेतवाने रहावेत या इच्छेपायी. आदल्या दिवशी नेपथ्य उभारणी, ध्वनी - प्रकाशयोजना या तांत्रिक बाजू तपासण्यासाठी तर दुसरा दिवस प्रत्यक्ष प्रयोगाचा. पण नाट्यगृहाचा खर्चही दुप्पट. तिकिटाचे दरही सर्वांसाठी सारखेच ठेवायचे यावरही आम्ही ठाम होतो. त्यामुळे  ना नफा ना तोटा याचा ताळमेळ घालत नेपथ्यही आणायचं म्हणजे मोठी परिक्षाच. पण आमची मित्रमंडळी मदतीला धावून आली नेपथ्याची सुरुवात झाली ती अक्षरश: अर्ध्या भिंतीपासून.

PVC पाईप वापरण्याची कल्पना विजय दरेकरची तर भिंतीची मापं गाडीत बसतील अशी ठेवायचं सुचवलं चैतन्य पुराणिकने.  विरेनच्या मनातली कल्पना कागदावर उतरली आणि आमची मित्रमंडळी कामाला लागली. हळूहळू भिंती, दारं, खिडक्या, जाळीचा चित्रांकित पडदा, मोरी, तयार केलेली झाडं, हरिण, वेगळ्या पद्धतीचं प्रवेशद्ववार.... काय काय रंगमंचावर दिसायला लागलं. त्यामागे कल्पकता आणि अथक मेहनत आहे सुतारकामाची पार्श्वभूमी नसलेल्या सर्वांची, पूर्वी कधीही भिंती न रंगवलेल्यांची. हे करताना अर्थात चुकीच्या भिंती रंगल्या, पाईप तुटले, भिंती हलल्या, वाकड्या झाल्या, कलाकारांना काहीवेळेला जीव मुठीत धरुन रंगमंचावर वावरावं लागलं. पण प्रेक्षकांना सुंदर घरं दिसली. सारा अट्टाहास त्यासाठीच तो फळाला आला प्रत्येकवेळी. आता तर ही मंडळी खरंखुरं घरही बांधतील अशा तयारीत आहेत. यावेळच्या नाटकात आणखी ३ वेगळ्या गोष्टींची भर पडली आहे. काय भर आहे ती प्रत्यक्षातच पाहायला या.

’अभिव्यक्ती’ च्या नेपथ्याचं सारं श्रेय *केरीच्या विजय दरेकर, चैतन्य पुराणिक, अंजली आणि संजय भस्मे, वर्षा आणी नवदीप माळकर, रागिणी आणि विवेक वैद्य तर शार्लटच्या गौरव लोहार, बोस सुब्रमणी, चिराग दुआ, केदार हिंगे, अमोल आणि मेघना कुलकर्णी, अनिता आणि तन्वी जोगळेकर, संजीवनी कुलकर्णी, वेदिका आणि राजीव तोंडे यांना.*

या सर्वांमुळेच ’अभिव्यक्ती’ चं एकांकिका/नाटक म्हणजे उत्तम नेपथ्य ही ओळख आपण निर्माण करु शकलो. त्यांच्याशिवाय हे शक्य नव्हतं. आभार मानणं औपचारिकपणाचं होईल तेव्हा या सर्वांची साथ अशीच कायम राहू दे एवढीच इच्छा.


आमच्या नाटक/ एकांकिकांची झलक पाहण्यासाठी अभिव्यक्ती

संकेतस्थळ  https://marathiekankika.wordpress.com/







Tuesday, May 9, 2017

पेरुला चला!

"विमान कंपन्यांचा ताबाच घेते आता मी." लालबुंद चेहर्‍याने मी जाहीर केलं.
"कशाला?" तितक्याच शांतपणे नवरोजींनी विचारलं.
"त्यांना सुधारायला." धुसफुसत मी उत्तर दिलं. मुलगा  विनोद झाल्यासारखा खो खो हसला.
"बाबाचा ताबा तुझ्याकडेच आहे की. तो कुठे सुधारला?"
"प्रयत्नांती परमेश्वर बाबा, प्रयत्नांती परमेश्वर." लेकराच्या विधानाने गहिवरलेच मी. माझं दु:ख पोटच्या मुलाने जाणलं होतं. मी लगेच माझा मनसुबा खुला केला.  "तुझ्या बाबांच्या बाबतीत करतेय तेच विमान कंपन्यांच्या बाबतीत.  सुधारण्याचा प्रयत्न. वेळा पाळायला शिका म्हणावं. रद्द करतात विमानं. पेरुला निघाले होते. बसते आता घरीच पेरु खात."
"कसले पी. जे. करतेस गं. आणि पेरु नाही परु." माझ्या शब्दांच्या विमानाला लेकीने खीळ घातली.
"pe पे, ru रु. पेरुऽऽऽ. मला माझं ब्रिटीश इंग्रजी सोडायला लावू नकोस." ब्रिटीश इंग्रजीच्या ढालीकडे दुर्लक्ष करत मुलांनी बॅगेकडे मोहरा वळवला.
"आई, जरा कमी कपडे घे. परु तुला नाही बघणार. तू परु बघायला चालली आहेस." नवर्‍याने भले शाब्बासचा कटाक्ष मुलाकडे टाकला.
"फेसबुकवर फोटो टाकायचे असतात. एकाच कपड्यातले किती काढणार?" एवढंसुद्धा कसं कळत नाही असा चेहरा करुन मी उत्तरले.
"तू तुझे फोटो पोस्ट करणार आहेस की परुचे?" मुलगा फीस करुन हसला आणि सूड म्हणून मी दोन चार कपडे अजून कोंबले. मुलाच्या हातात बॅग सोपवली आणि अखेर पेरुला पोचलो.

एक वर्ष, आठवड्यातून एक तास शाळेत शिकलेल्या स्पॅनिशच्या बळावर लेक स्पॅनिशवर प्रभुत्व मिळवल्यासारखी स्पॅनिश  फाडायला सज्ज झाली. आम्ही आमच्या फोनमधल्या गुगल भाषांतरकाराला तयारीत राहायला सांगितलं. पण पेरुकर आम्हाला परके मानायला तयारच होईनात. रंग, रुप सारं एकच आणि स्पॅनिश न बोलता habla English, habla English का करतोय तेच त्यांना कळेना. महाराष्ट्रीयन लोकांना इंग्रजी फाडताना पाहिलं की माझा चेहरा होतो तसा त्यांचा होत होता.
"तू नो सबेस एसपॅनोअल?" काय बोलतायत ते नाही समजलं तरी, ’मेल्यांना मातृभाषेचं वावडं, फोडून काढायला पाहिजे’ इत्यादी भाव त्यांच्या चेहर्‍यावर स्पष्ट झळकत. आपल्यातलं कोण स्पॅनिश दिसतं म्हणून आमच्या नजरा एकमेकांवर रोखल्या जात. मग चौघातलं कुणीतरी घाईघाईत पुढे सरसावायचं,
"वुई इंडियन, वुई इंडियन....यू नो ताजमहाल, करी, बॉम्बे नाऊ मुंबाय...." अख्ख्या देशाचं चित्र एका वाक्यात उभारायची घाई उडायची. ते देखील पूर्ण वाक्य न बोलता एकेक शब्द, हातवारे पद्धतीने. यामुळे समोरच्याला न येणारी भाषा येऊ शकते हा पक्का समज काही क्षणातच त्याच  वेगात स्पॅनिश बोलून समोरचा  खोडून काढे. कोण, काय बोलतंय, सांगतंय याचा कुणालाच ताळमेळ लागत नाही म्हटल्यावर हातातले फोन कार्यरत.  ’गुगल ट्रान्सलेटर’ एकमेकांशी ’संवाद’ साधायला लागायचे.  ती यंत्र तरी मेली धड कुठे बोलतात. एका यंत्राचं बोलणं दुसर्‍या यंत्राला कळत नव्हतं.
"ही यंत्र म्हणजे आपल्या दोघांसारखी आहेत." न राहवून मी नवर्‍याला म्हटलं. नवर्‍याने आधी गडबडून नजर टाकली माझ्याकडे. मला काय म्हणायचं आहे हे लक्षात आल्यावर त्या नजरेचा त्याने रागीट कटाक्ष केला. पण स्पॅनिश माणसाची ही गोड बाई काय बोलली याबद्दलची उत्सुकता चाळवली असावी. यंत्रावर लिहून, हातवारे करत, ओठ हलवत तो विचारत राहिला. मी माझं यंत्र काढलं, मंजूळ आवाजात बोलणं ध्वनिमुद्रित केलं. स्पॅनिश मध्ये कधी नव्हे ते नीट भाषांतरही झालं असावं कारण स्पॅनिश माणूस खो खो हसला.
"आमच्या देशात पण असंच असतं. " त्याने उत्साहाने यंत्राकरवी माझ्यापर्यंत त्याचा आनंद पोचवला. लेक गोंधळली.
"गुगल ट्रान्सलेटर नवरा- बायकोसारखे कसे असतील?"
"अगं आहेत. तुझ्या बाबाला नाही का मी विचारते एक आणि तो उत्तर दुसरंच देतो. तसंच आहे या यंत्रांचं." स्पॅनिश माणसाला झालेल्या आनंदाने मलाही उकळ्या फुटत होत्या.

पेरुत असेपर्यंत हे असंच चालू होतं. मुखदुर्बळ नवरोजी यंत्राद्ववारे संभाषण साधण्यात इतके रमले की नंतर नंतर तर  इंग्रजी येणार्‍या माणसासमोरही स्पॅनिश फाडायला लागले. त्याच्याबरोबर आम्हीही. आमचं वेगवान स्पॅनिश झाल्यावर ’प्लीज स्पीक इंग्लीश’ असं ऐकलं  की स्पॅनिशचा धुव्वा उडाल्यासारखं वाटायचं. एका वाक्यासाठी लागलेली पाच मिनिटं धारातीर्थीच पडायची.  आमचं वाक्य एकच असायचं, मग पाच मिनिटं कशी लागायची? समोरच्याला समजत नाही म्हटल्यावर एकच वाक्य आम्ही चारही जण वेगवेगळे उच्चार काढून बोलायचो. ते समजलं नाही की वाक्यात हातवारे मिळवले जायचे.  आधी संवाद, मग पार्श्वसंगीत असं चढत्या क्रमाने नाटक रंगल्यासारखं दृश्य साकारलं जायचं.  प्रेक्षकही मदतीला धावायचे. नाट्यात सहभागी व्हायचे. एकच वाक्य सर्व परिणामासहित सादर व्हायचं. आणि समोरच्या व्यक्तीने इंग्लिश, इंग्लिश म्हणून त्यावर पडदा पाडला की इंग्रजीही पडद्यामागे दडी मारायचं इतकं स्पॅनिश मुरत चाललं होतं अंगात.  ट्रम्पची अमेरिका सोडून मुक्काम इथेच हलवू इतकं स्पॅनिश यायला लागलं पण तोपर्यंत आमचे पेरुमधले दिवस संपले आणि आम्ही परत मुक्कामाला पोचलो.

तर तुम्हीही घ्या थोडं पेरु दर्शन.












Monday, February 27, 2017

मराठी

"ही माझी अमेरिकन आई." माझ्या आईची मी शेजारच्या मेरीशी ओळख करुन दिली तेव्हा  प्रश्न पडला की आई आता हिच्याशी कसं बोलेल? इंग्रजी समजलं तरी बोलण्याची सवय नाही आणि प्रयत्न केला तरी तिचं बोलणं उच्चारामुळे मेरीला समजणार कसं? पण आई तिच्याशी मराठीतच बोलली. खूप बोलली. आमच्या मुलीच्या बारशाला फक्त कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या हे घोकून घोकून शिकलेल्या मेरीचं मराठीचं ज्ञान इतकंच. त्यामुळे आई बोलली त्यातलं मेरीला काय समजलं असेल अशा संभ्रमात मी असतानाच मेरी माझ्याकडे पाहून हसली. म्हणाली,
"युवर मॉम इज हॅपी दॅट आय ॲम हिअर फॉर यू.  ॲड शी इज नॉट वरीड अबाऊट यू नाऊ. इज दॅट राईट?" माझी आई जे काही बोलली त्याचं भाषांतर करायची आवश्यकताच भासली नाही. ४० शी पार केलेल्या मुलीची काळजी घ्यायला सांगणार्‍या आईकडे आणि ती घेण्याची हमी देणार्‍या मेरीकडे मी डोळ्यातले अश्रू आवरत पाहत राहिले. आईच्या आत्मविश्चासाचंही अमाप कौतुक वाटलं. तिला हिंदी, इंग्रजी समजत असलं, येत असलं तरी बोलायची सवय नव्हती पण त्यामुळे तिचं पार साता समुद्राकडे येऊनही अडलं नाही. या आधीही तसं ते कधीच कुठे अडलं नाही हे आधी कधी जाणवलं नव्हतं इतक्या प्रकर्षाने त्या क्षणी जाणवलं. तिला काय म्हणायचं ते ती व्यवस्थित मराठीतच बोलून समोरच्यापर्यंत पोचवायची आणि महत्त्वाचं म्हणजे त्याबद्दल कुठलाही न्यूनगंड न बाळगता.

आम्हा भावंडाचं लहानपण मात्र आम्हाला इंग्रजी माध्यमात घाला म्हणून  आई - वडिलांच्या मागे लागण्यात गेलं. वडिलांची नोकरी बदलीची. जिथे जाऊ तिथे इंग्रजी माध्यमाच्या शाळा असतीलच असं नाही त्यामुळे ते शक्यच नव्हतं आणि असतं तरी त्यांनी घातलं असतं की नाही कुणास ठाऊक.  इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालं नाही याची खंत बाळगत आता चाळीशीच्या आसपास असणारी एक अख्खी पिढी मोठी झाली.  आपल्याला नाही जमलं ते पोटच्या गोळ्यांना करायला लावावं या अलिखित नियमाचं पालन करत मुलांना आवर्जून आम्ही इंग्रजी माध्यमात शिकवलं. घरी बोलतातच की मराठी निदान शाळेत तरी शिकू देत इंग्रजी,  स्पर्धेच्या जगात मागे पडायला नको, उत्कर्ष कसा होईल, मुलांना ’व्यवहाराची’ भाषा आलीच पाहिजे हाच ध्यास आमच्या पिढीने जोपासला. मराठीची कास मुलांच्या हाती लागू दिलीच नाही.  आमच्या सारखे पालक बरेच आहेत  हे कळलं तेव्हा वेळ टळून गेली होती.  इंग्रजी माध्यमात न शिकल्याने काही फरक पडत नाही हे कळायलाही खूप काळ गेला.  पण हे लक्षात येईपर्यंत तसं खूप नुकसान आमचं आम्ही केलंच भरीला आमच्या मुलांचंही.  आम्ही शिकलो, नोकर्‍यांना लागलो, मराठी तर येतच होतं पण इंग्रजीही उत्तम जमायला लागलं.  इतकंच नाही तर मराठी आणि इंग्रजी, दोन्ही साहित्याचा उत्तम आस्वादही आमची पिढी घेऊ शकते ह्या गोष्टीचं महत्त्व आता समजतंय.  इंग्रजी माध्यमांच्या मुलांची ओढ इंग्रजी साहित्याकडे झुकलेली दिसते. मराठी साहित्य वाचण्याकडे त्यांचा कल कमी आढळतो. पण आमच्यासारखे पालक मुलांना इंग्रजी माध्यमात घालून खूश होते. आता मुलांची उत्तम प्रगती होईल, आत्मविश्वासामुळे यशाचं शिखर गाठतील, आमच्यासारखी खंत बाळगावी लागणार नाही याच आनंदात आम्ही मशगूल होतो. ज्यांच्या पालकांना इंग्रजी येत नव्हतं  ते तर आपल्या मुलांचं इंग्रजी ऐकताना हुरळून जात होते. पण नुसती इंग्रजी  भाषा येऊन यशाचं शिखर गाठता येत नाही किंवा आयुष्य सार्थकी लागत नाही हे कळलंच नाही कुणाला. मुलांना इंग्रजीतूनच शिकवायचं ह्या विचारसरणीची चूक आधी घराघरांना भोवली मग समाजाला. घरी बोलतातच की मराठी असं म्हणताना, घरातही मराठी बोलताना इंग्रजी शब्दांमध्ये अधूनमधून चवीला काजू, बेदाणे असल्यासारखे मराठी शब्द यायला लागले.  घरोघरच्या ह्या चुकीची  फळं समाजाला भोगायला लागली. वास्तवाचं भान येईपर्यंत मराठी शाळा हळूहळू बंदही पडायला लागल्या. ज्या चालू आहेत त्यांची परिस्थिती गंभीर आहे. या परिस्थितीत मुलांना मराठी शाळांमध्ये घालायचं म्हटलं तरी अवघड परिस्थिती झाली. त्यामुळे शिक्षणाचं माध्यम इंग्रजीच झालं.  मराठी बोलायचं तर इंग्रजीतून विचार करुन त्याचं भाषांतर व्हायला लागलं.  कुणाला जपून राहा असं सांगण्याऐवजी काळजी घे असं टेक केअरचं शब्दश: भाषांतर सर्रास वापरात आलं. मराठीचं स्वरुपच बदललं. राडा होईल घरी अशी वाक्य मालिकांमधून सर्रास ऐकायला लागली, जीव तळमळण्याऐवजी तडफडायला लागला. प्रसारमाध्यमांनी इंग्रजी मिश्रित मराठी आणि चुकीचं मराठी रुढ केलं. तेच दैनंदिन जीवनात वापरलंही जाऊ लागलं. भावना पोचल्याशी कारण, भाषेच्या शुद्धतेचं काय इतकं ही विचारसरणी बळावली. अखेर मराठीचा, मराठीचा योग्य वापर करण्याचा आग्रह धरणार्‍यांनी शरणागती पत्करली.  काळाबरोबर बदललेल्या मराठीशी जुळवून घ्यायला हवं असं म्हणत चुकीचं, इंग्रजी मिश्रित मराठी मनातल्या मनात सुधारुन घ्यायला ही माणसं शिकली.

आणि एक वेळ अशी आली की मराठी नष्टच होणार की काय अशी भिती मनात निर्माण व्हायला लागली, वाढली. इतकी वाढली की  ती मराठी ’दिन’ झाली.  दिवस साजर्‍या करण्याच्या आपण सुरु केलेल्या नवीन प्रथेत  एक दिवस ’मराठी’ ला मिळाला. राज्यसरकारही यासाठी पुढे सरसावलं आणि तो दिवस ठरला २७ फेब्रुवारी!  जागतिक मराठी भाषा दिन. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जयंतीच्या दिवशी  २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात यायला लागला. कोण हे कुसुमाग्रज आणि जयंती म्हणजे? असा  इंग्रजी माध्यमातल्या मुलांना प्रश्न पडला. तो सोडविण्याची जबाबदारी तर आता आपण उचलायलाच हवी. नाही का? इथे अमेरिकेत आमच्यासारखी अनेकजण आपली मातृभाषा मुलांना यावी, ती त्यांनी टिकवावी, वापरावी यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत. माझ्याकडे मराठी शिकायला येणार्‍या विद्यार्थ्यांना मराठी दिनाबद्दल सांगितलं तेव्हा असा दिवसही असतो याचंच नवल वाटलं मुलांना. कुसुमाग्रज ठाऊक नव्हते पण त्यांच्याबद्दल प्रचंड उत्सुकता मात्र होती. त्या उत्सुकतेमुळे माझ्या  आशा पल्लवित झाल्या आहेत.  मराठी भाषा दिन म्हणजे आपली भाषा समजणं, बोलता येणं इतका मर्यादित अर्थ नाहीच. नसावा. मुलांना कुसुमाग्रजांच्या कवितांची ओळख करुन द्यायची, त्यांचं साहित्य वाचून दाखवायचं असं ठरवून टाकलं. कदाचित यातून मराठी साहित्याबद्दल त्यांची उत्सुकता वाढेलही. आवड निर्माण होईल. व्यक्त होण्यासाठी मराठी लेखन प्रपंचही मांडतील कदाचित कुणी एखादं त्यातलं. होईल खरंच असं? की भ्रामक आशावाद?  आपल्याच हातून दुसरीकडे वळलेली ही वासरं  येतील पुन्हा कळपात? आमच्या पिढीने मुलांना जसं इंग्रजीकडे वळवलं तसंच पुन्हा मराठीकडे आणण्याचं कामंही आम्हीच करु शकतो हे नक्की. आपापल्या पिलांना मराठीच्या मार्गावर आणायचं घेईल कुणी मनावर? जमेल? नक्कीच. मनात आणलं तर होऊ शकतं हे आणि शेवटी कितीतरी गोष्टी आपल्याच हातात असतात. नाही का? -  मोहना प्रभुदेसाई जोगळेकर

Monday, January 9, 2017

सिद्ध

"तुला स्वत:ला सिद्ध करायला कधी मिळालंच नाही. आता हा प्रसंग म्हणजे संधी समज." तिची अगदी जवळची नातलग म्हणाली. दचकून तिने मुलांकडे पाहिलं. मुलांचं लक्ष नव्हतं की त्यांनी तसं दर्शविलं कुणास ठाऊक. ती मान खाली घालून अश्रू पुसत राहिली. "नवर्‍याने अचानक जगाचा निरोप घेणं ही आपल्यासाठी संधी?" तिला त्या नातलग बाईचा रागच आला. वेळ काळाचं भान ठेवत नाही माणसं. कुठे, काय बोलावं याचा काहीतरी पोच? पण त्या विधानाने तिच्या मनात घर केलंच. हळूहळू तिला तिचा नवरा खलनायक वाटायला लागला. तो तसा होता की नाही हा प्रश्न वेगळा पण तिचीच नातेवाईक त्याचं जाणं एक संधी म्हणून बघ म्हणतेय म्हणजे... आजूबाजूला सांत्वनाला आलेले काय बोलतायत याकडे तिचं लक्ष लागेना. आयुष्याचा पंचनामा मनातल्या मनात तिने सुरु केला. नवर्‍याने कधीही कोणत्याच बाबतीत अडवलं नव्हतं हेच तिला प्रकर्षाने जाणवलं. पण मग त्या नातलग बाईने असं का म्हणावं? आपल्याला स्वतंत्र ओळख नाही हे सुचविण्यासाठी? तिच्या मनाने कारण शोधण्याचा चंगच बांधला. त्याला दोष द्यायचाच तर तिला एक कारण मिळालंही. नवर्‍याने जसं कशाला कधी अडवलं नव्हतं तसं तिच्यातले गुण हेरुन प्रोत्साहनही दिलं नव्हतं. ते करायला हवं होतं त्यानं. तिचं विश्वच मुळी, त्यांना आवडतं, त्यांनी म्हटलं म्हणून, त्यांना नाही चालणार या भोवती होतं हे त्या बाईच्या वक्तव्यामुळे तिला ठळकपणे जाणवलं. तिने त्या बाईकडे पाहिलं. बाई उत्साहाने आजूबाजूच्या लोकांना नवरा गेल्यानंतर अवकाश सापडलेल्या स्त्रियांची उदाहरणं देत होती. काहीजणं ’अचानक’ गेलेल्या माणसांची यादी काढण्यात मग्न होती. तर काहीजणं हे असं ’अकाली’ जाणं कसा टाळता आलं असतं याचा उहापोह करण्यात. कानावर सगळं पडत होतं पण मनापर्यंत संधी या शब्दाव्यतिरिक्त काही झिरपत नव्हतं. स्वत:ला सिद्ध करुन पाहावं असं खरंच तिला वाटायला लागलं. पण काहीक्षणच. तिच्या त्या एका कृतीने तिचा नवरा खर्‍या अर्थी ’खलनायक’ झाला असता. नवरा गेल्यावर अवकाश सापडलेली स्त्री म्हणून तिची नवी ओळख निर्माण झाली असती. पण नवर्‍याच्या हयातीत तिने जसं सारं काही त्याच्यासाठी केलं तसंच पुन्हा एकदा करावंसं वाटायला लागलं तिला. नाहक नवर्‍यावर खलनायकाचा शिक्का बसू नये म्हणून गेलेल्या नवर्‍यासाठी स्वत:ला सिद्ध करायची संधी न साधण्याचं तिने निश्चित केलं. ------मोहना प्रभुदेसाई जोगळेकर

Tuesday, November 29, 2016

मंतरलेली चैत्रवेल

आम्ही १० डिसेंबरला सादर करणार आहोत त्या नाटकाची, ’मंतरलेली चैत्रवेल’ ची झलक.
एक झंझावत. झोडपलं गेलेलं घर आणि त्या पडझडीत स्वत:चं रहस्य जपत वावरणारी माणसं. आपापल्या  रहस्याला कवटाळून बसलेली. या माणसाच्यासहवासात बाहेरच्या व्यक्तींचा प्रवेश होतो आणि ती देखील या रहस्याचा एक भाग बनून जातात. प्रत्येकाचं आयुष्य बदलून जातं. गुंतागुंत वाढत जाते. कसा सोडवतात हा गुंता  ही सारीजणं? काय होतं अखेर?...रहस्यमय, उत्कंठावर्धक नाटक!




सरावाची झलक




यापूर्वीच्या आमच्या एकांकिकांची झलक पाहण्यासाठी दुवा

https://marathiekankika.wordpress.com/


Monday, November 21, 2016

आत्ता चोर आला होता!

खरंच! झालं काय मी मुलाशी फोनवर बोलत होते. नाटकाच्या नेपथ्याचं काम गॅरेजमध्ये चालू आहे म्हणून सायकली घराच्या पुढच्या व्हरांड्यात ठेवल्या आहेत. सोफ्यावर बसलं की व्हरांडा खिडकीतून दिसतो. एक तरुण मुलगा घराच्या दिशेने येताना दिसला. म्हटलं, आता हा दार वाजवेल. कुठलं काय तो सरळ सायकलींच्या दिशेने गेला. आमच्या तीन सायकली तो हात लावून पाहत होता.  मी फोनवर कुजबूजत्या आवाजात म्हटलं,
"थांब थांब कुणीतरी सायकल चोरतंय." मुलाला  ते नीट ऐकू जाईना. पण सायकली जायच्या आधी दार उघडणं भाग होतं.  तो मुलगा पटकन वळला.
"काय करतोयस?" मी ओरडून विचारलं.
"काही नाही." हे म्हणजे कुठल्याही प्रश्नाला माझी मुलं उत्तर देतात तसं वाटलं मला. शाळेत काय शिकवलं? ’काही नाही’ पद्धतीचं.
"काही नाही कसं?"
"माझी सायकल चोरीला गेली आहे. यातली कुठली माझी आहे  ते पाहत होतो." तो मुलगा म्हणाला.
"या आमच्या सायकली आहेत."
"तुम्ही चोर आहात असं नाही म्हणत मी." चोराच्या उलट्या बोंबा या म्हणीचा खरा अर्थ त्या क्षणी मला समजला.
"सायकल तुझी नाही ना याची खात्री करायची होती तर तुला दार वाजवायला काय झालं?"
"चुकलं माझं." केसाची झुलपं उडवत तो तरुण मुलगा आला तसा निघून गेला.

आमचं हे संभाषण चालू असताना पुत्ररत्न फोन तसाच धरुन होते. थरथरत्या स्वरात मी  ’हॅलो’ म्हटलं. म्हणजे आताच एका चोराला मी पळवून लावलं होतं. हातापायाला कंप सुटलेला. पण खूश होते. चोर कसा पळाला मला घाबरुन म्हणून.
"अगं आई, तो चोर बाहेर होता तर तू माझ्याशी का कुजबूजत का बोलत होतीस?"
"त्याला ऐकू गेलं असतं ना?" मी कुजबूजले. अजून चोरातच गुंतले होते.
"त्याला कळायलाच हवं ना आता कुणीतरी आहे. तो गेला ना. बोल मोठ्याने आता." मुलगा खिजवल्यासारखा म्हणाला.
"बरं, बरं...अरे तुझ्याएवढा आहे. त्याची सायकल हरवली म्हणत होता." मला जरा त्या चोराचा कळवळा यायला लागला होता.
"माझ्या वयाचा आहे तर कॉलेज किंवा कामावर का नाही तो?"
"तू मलाच काय बडबडतोस. मी नाही विचारलं त्याला." माझी चिडचीड जाणवून त्याने समजूतीने घेतलं.
"आणि पोलिसांना फोन करते सांगायचं ना त्याला."
"आता गेला तो. दिसतोय. बोलवून सांगू का?"
"आई..."
"मग? कोणत्याही बर्‍यावाईट प्रसंगाला तुम्ही उपस्थित नसता. तू असा फोनवरुन भाषण देणार. तुझा बाबा समोर उभं राहून. सतराशेसाठ सूचना तुमच्या."

तेवढ्यात वरती नवर्‍याला काहीतरी गडबड झाली असावीच याचा अंदाज आला. थोडीफार वाक्यही ऐकली असावीत त्याने. तो धाडधाड खाली आला.
"तुला फोडणीला टाकल्यासारखा मी लागतोच का? जिथे तिथे माझं नाव घुसडवतेस. आणि  फोटो काढायचास ना त्याचा. पोलिसाना देता आला असता लगेच. लक्ष ठेवतात मग ते."
"सुचलं नाही. घाबरले होते. पण थांबा तुम्ही दोघं. तू फोनवर थांब तसाच. आणि तू तिथेच जिन्यावर राहा." एकाला समोर आणि एकाला फोनवर बजावलं. दोघंही स्तब्ध झाले.
"काय करायचा बेत आहे तुझा?" बापलेकाने एकाचवेळी तोच प्रश्न विचारला.
"मी धावत जातेय त्या मुलाच्या मागून. त्याला पुन्हा चोरी करायला बोलावते. मग एकाने पोलिसांना फोन करा, दुसर्‍याने फोटो काढा..."

चला, हे लिहून झालं. आता खरंच बघते तो मुलगा कुठपर्यंत पोचलाय :-)

Saturday, March 19, 2016

जाडी

शाळेच्या मित्रमैत्रींणींची whatsapp वर चर्चा रंगली होती. शाळेत असताना कोण कसं जाड होतं आता कश्या शेटाण्या झाल्या आहेत अशा अर्थी. यात एकमेकींची वजनावरुन खिल्ली उडविणार्‍या मुलीच जास्त होत्या. अर्थात शाळेत अमकी तमकी कशी धष्टपुष्ट होती असं म्हणणारे मुलगेही होते. मला मात्र राहून राहून ज्यांच्या वजनावरुन ह्या गप्पा चालल्या आहेत त्यांना काय वाटत असेल असं वाटत होतं. हे आत्ता घडलेलं ताजं उदाहरण. पण आजूबाजूला सतत तेच दिसतं आणि अस्वस्थ व्हायला होतं. मध्ये  एकदा रेल्वेत आमच्यासमोर एक जोडपं बसलं होतं. पती  पत्नीची चेष्टामस्करी करत होता. त्याच्या मुलांना तो म्हणाला,
"तुमची आई म्हशीसारखी सुटली आहे." मी चमकून पाहिलं. पण त्या पुरुषाची मुलं आणि बायको सर्वांनाच ह्या शेर्‍यामध्ये विनोद जाणवला. सगळेच हास्यात बुडाले होते.

आपल्याकडे जाडीवरुन विनोद सर्रास केले जातात आणि मला ते नेहमी खटकतात. कधी कधी वाटतं असं वाटणारी मीच एकटी आहे. पण अशा विनोदामुळे
⦁ ती व्यक्ती बारीक होण्याच्या प्रयत्नात असेल तर अशा वक्तव्यांनी निराश होईल किंवा
⦁तिची/त्याची अंगकाठीच तशी असेल. बारीक असण्यापेक्षाही आरोग्यं संपन्न असणं जास्त महत्वाचं नाही का?
⦁आणि मुख्य म्हणजे तिच्या किंवा त्याच्या बारीक असण्याची तुम्हाला का चिंता? पाहून घेतील ना त्यांचं ते. अशा क्रुर विनोदातून विरंगुळा शोधणारी माणसं  संवेदना शून्य वाटतात मला. तुम्हाला काय वाटतं की तुम्हीही त्याच जातीतले?

Saturday, January 16, 2016

ग्लोबल कोकणी - अमेरिकन मंचावर...

(लोकमतच्या वर्धापन दिनानिमित्त प्रसिद्ध झालेल्या ग्लोबल कोकणी विशेषांकातील माझा लेख.)

"आय हॅव टू पिक अप द रोल." वाटेत घोकून घोकून पाठ केलेलं वाक्य म्हटलं आणि विक्रेतीच्या चेहर्‍यावरचे गोंधळलेले भाव बघून मी बावचळले.
"रोल?" तिने चमत्कारिक उच्चारात विचारलं.
"यस." मी तोंड वेडंवाकडं करत उच्चार केला. गोर्‍यांशी बोलताना तोंड थोडं वाकडं केलं की आपल्या फ्लाइंग राणीच्या वेगाला जरा खीळ बसते आणि आपण काय बोलतोय ते त्यांना समजतं असा एक फंडा कुठूनतरी माझ्या डोक्यात शिरला होता. तो वापरायची ही पहिली संधी. माझं तोंड बराचवेळ वाकडंच राहिलं पण तिला काही रोल म्हणजे काय ते समजेना. कुठून ही दुर्बुद्धी सुचली कोण जाणे.  या देशात पाऊल टाकलं आणि आठवड्याच्या आत रोल आणायला बाहेर. काय करणार? विमानतळापासून फोटो काढायला सुरुवात केली होती. विमानातल्या  संडासाचंही अप्रूप होतं २० वर्षापूर्वी. रोल पटकन संपलाच त्यामुळे. आता फोटो भारतात पाठवून देण्याची घाई. तरी नवरा म्हणत होता,
"जरा टी. व्ही. बघ थोडेदिवस. त्या टी. व्ही. तली माणसं जशी बोलतात ना तशीच बोलतात ही सगळी. त्यांचं कळायला लागलं तरी आपलं बोलणं त्यांना कळणं हे पण लढाईवर जाण्यासारखंच असतं. तेव्हा सबुर!" पण नवर्‍याचं न ऐकणं हा पत्निधर्म निभावत मी आखाड्यात उतरले. आता रोल, रोल करता करता नवराच काय, माझी  शाळाही आठवली. कणकवलीच्या एस. एम. ज्युनिअर महाविद्यालयात शुक्ल सर इंग्रजी बोला, इंग्रजी बोला म्हणून कानीकपाळी ओरडायचे तो सल्ला ऐकला नाही याचा पश्चाताप व्हायला लागला. अखेर माझ्या आणि विक्रेतीच्या मध्ये असलेल्या अभेद्य भितींतून म्हणजे काचेच्या लांबलचक टेबलावरुन बोट दाखवत, खाणाखुणा करत तिच्या पाठीमागे असलेल्या मोठ्या कपाटातल्या वरतून चौथ्या रांगेतल्या कप्प्यात असलेला कॅमेरा तिला दाखविण्यात मी यशस्वी झाले. मग तो कॅमेरा हातात धरुन, फोटो काढण्याची कृती करत, रोलची जागा दाखवण्याचा कार्यक्रम पार पडला. अखेर तिला मला काय हवंय ते समजलं आणि ती आनंदातियाशाने किंचाळली,
"यु मीन फिल्म?" आता मी गोंधळले. ही लोकं रोलला फिल्म म्हणतात? पण तोंड वाकडं करत बोलण्याची माझी खुमखुमी थंडावली होती. आता ती जे काही देईल ते रोल म्हणून वापरायला मी तयार होते. रोल घेऊन घरी आले आणि नवर्‍याला म्हटलं,
"शाळेत शिक्षकांचं ऐकायला हवं होतं रे."
"आम्ही ऐकायचो." त्याचा शांतपणा ढळला नाही.
"मी माझ्याबद्दल बोलतेय."
"बरं, बरं पण इतकं का भाग्यं उजळलं शिक्षकांचं?"
"हे बघ, तुला माहितीच आहे. माझं काही तुझ्यासारखं शिकण्याचं माध्यम इंग्रजी नव्हतं. मराठी माध्यमातून शिकलेली, कोकणात जन्मलेली, वाढलेली मी."
"तू पालघरला होतीस ना? ते कुठे कोकणात?"
"तू म्हणजे ना. काही वर्ष होतो रे पालघरला. पण जन्म कणकवलीचा, प्राथमिक शिक्षण देवरुखच्या भोंदे शाळेत, उच्चमाध्यमिक कणकवलीच्या एस. एम. हायस्कूलमधून आणि त्यानंतर कणकवली महाविद्यालयात.  महाविद्यालयीन आणि उच्चमहाविद्यालयीन रत्नागिरीला गोगटे जोगळेकर महाविद्यालयात. फक्त माध्यमिक शिक्षण पालघरच्या आर्यन एज्युकेशन मध्ये. म्हणजे अमेरिकेत यायच्या आधीचं आयुष्य जवळजवळ कोकणातच गेलं ना?"
"पण हे तू मला का ऐकवते आहेस?"
"कधी वाटलंच नव्हतं ना  परदेशात येईन म्हणून. इंग्रजी हीच बोलण्याची भाषा होऊन जाईल याची कल्पनाही केली नव्हती. तुझ्याबरोबर म्हणून या देशात पाऊल टाकलं पण तिकडे जशी माझी स्वत:ची ओळख होती आकाशवाणी, लेखन, अभिनय या माध्यमातून  तशीच इथेही ती व्हायला हवी असं वाटतं. पण सुरुवात उच्चारांपासून आणि इंग्रजी बोलण्याच्या आत्मविश्वासाच्या अभावापासून होतेय ना म्हणून वाटतंय ऐकायला हवं होतं शिक्षकांचं. आम्हाला इंग्रजीचे शिक्षक नेहमी म्हणायचे अभ्यासापुरतं इंग्रजी शिकू नका. ते वापरा, बोला. कुठेही तग धरता येईल त्यामुळे. आज ते पटलं."
"तुझ्या शिक्षकांना कळवून टाक हे. बरं वाटेल त्यांना. आणि इतकं काही कठीण नाही इंग्रजीची सवय करणं. जमेल तुला." त्याने विषय संपवला. माझ्या मनात मात्र बराचवेळ अमेरिकेला येईपर्यतचा काळ फेर धरत राहिला.

वेगवान आयुष्य मागे पडून अचानक शांतपणाने प्रवेश केला होता. नव्या देशाची, नवीन जगाची अपूर्वाई होती तशीच इथे कसं रुळणार याची धास्तीही. H4 वर आल्याने नोकरी करता येणार नव्हती, काही शिकायचं म्हटलं तर त्या त्या राज्यात किमान १ वर्ष राहिल्यानंतरच शिक्षणाचा खर्च कमी होऊ शकत होता. २ च वर्ष भारतीय कंपनीने पाठवलं होतं तर फारशी कशाची चिंता न करता हे नवं जग अनुभवावं असंही वाटत होतं. शेवटी सुरुवातीला तेच केलं. हातात लेखणी होती. रत्नागिरी आकाशवाणीसाठीचं लेखन, रत्नभूमीसाठी महाविद्यालयीन जीवनात चालवलेलं ’तरुणाई’ सदर, आमचं दिनांक साठी केलेलं लेखन आणि अधूनमधून सकाळ, रत्नागिरी टाईम्स, साप्ताहिक सकाळ, लोकसत्ता तसंच विविध मासिकांमधून लिहिलेले लेख, कविता, कथा या बळावर अमेरिकेतले अनुभव वेगवेगळ्या स्वरुपात कागदावर उतरायला लागले. १९९५ च्या काळात लेखन पोस्टाने किंवा तत्कालिक घडामोडींवरील लेख वर्तमानपत्रांना फॅक्सने पाठवणे हे दोनच मार्ग होते. लिहिण्यासारखं खूप होतं. त्यात दिवस पुरेनासे झाले. दरम्यान नवर्‍याच्या नोकरीमुळे भटकंतीही चालू होती. अमेरिकेतल्या राज्याराज्यामधलं जीवन म्हटलं तर एकसारखंच पण तरीही किती वेगळे पैलू असलेलं आहे ते जाणवायला लागलं. अमेरिकन मित्र, मैत्रीणींबरोबरच इतर देशातल्या लोकांशीही  मैत्री व्हायला लागली. भारतात महाराष्ट्रापुरतं मर्यादित असलेलं अनुभवविश्व व्यापक झालं. लेखनातून व्यक्त होत राहिलं. त्याचाच परिपाक म्हणजे,  उन्मेष प्रकाशनाने प्रसिद्ध केलेला ’मेल्टिंग पॉट’ हा कथासंग्रह, ज्याला कोमसापचा उत्कृष्ट कथासंग्रहाचा पुरस्कार प्राप्त झाला. पाहता पाहता २ वर्षांची आणखी काही वर्ष झाली आणि अजून काही वर्ष इथेच राहायचं ठरल्यावर नोकरीचे आणि इथल्या प्रवाहात सामील होण्यासाठी  लागणार्‍या शिक्षणाचे वेध लागले. संगणकीय शिक्षणाला तेव्हाही तेवढंच महत्व होतं पण ते आवडेल की नाही याची खात्री नव्हती त्यामुळे आधी छोटे छोटे कोर्स करुन अंदाज घ्यायचं ठरवलं. वयाच्या ३० शी नंतर पुन्हा महाविद्यालयात पाऊल टाकायचं आणि तेही पूर्णपणे परक्या देशात या विचारानेच अस्वस्थपणा आला होता. अस्वस्थ मनाने वर्गात प्रवेश केला आणि क्षणात तो पळालाही. माझ्या आई - वडिलांच्या वयाचे विद्यार्थी पाहून मी अगदीच बालवयात महाविद्यालयात आल्याची खात्री झाली आणि एक वेगळाच आत्मविश्वास आला. नंतर वर्ग शिक्षक आणि विद्यार्थ्यांमुळे तो टिकलाही. इथल्या शिक्षणाचा ढाचा वेगळा आहे. प्रात्यक्षिकांवर जास्त भर असतो, पाठांतरापेक्षा विषय समजण्याला महत्त्व आणि शिस्तीपेक्षा मित्रत्वाचा मार्ग स्वीकारला जातो. एकमेकांच्या अडचणी ओळखून त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जातो. त्यासंदर्भात अजूनही एक आठवण मनात ताजी आहे.
मुलाला सांभाळणारी मुलगी त्या दिवशी येऊ शकली नाही तेव्हा शेवटचा पर्याय म्हणून मुलगा माझ्याबरोबर आला तर चालेल का असं मी मिस्टर स्मिथना घाबरत घाबरत विचारलं. तात्काळ त्यांनी होकार भरला. मुलाला घेऊन वर्गात पाऊल ठेवलं आणि मिस्टर स्मिथनी माझ्याकडे हसून पाहिलं. तिथेच थांबायला लावलं.
"आज आपल्या वर्गात एक छोटा दोस्त आला आहे." पूर्ण वर्गाला मिस्टर स्मिथनी माझ्या मुलाची ओळख करुन दिली. ६ वर्षाच्या माझ्या मुलाने लाजत लाजत ’हाय’ केलं. वर्ग होता महाविद्यालयाचा आणि मुलं होती वय वर्ष ३० पासून ७५ च्या आसपास. तो दिवस त्याच्यासाठी आणि माझ्यासाठीही कायमचा स्मरणात राहिला

शिक्षण चालू असतानाच नोकरीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्र आली.   मी शिकता शिकता बदली शिक्षकांची तात्पुरती नोकरी करायचं ठरवलं. त्या वेळेला शिक्षकांची आवश्यकता आहे असं सतत टी. व्ही. वर आवाहन असायचं. म्हटलं, जमलं तर करुन पाहू.   मुलगा म्हणाला,
"आई, तू  शिकवणार शाळेत जाऊन?"
"मग? शिकलेली आहे मी भारतात."
"पण तुला नाणी कुठे येतात ओळखता?"
"तुला कुणी सांगितलं?"
"मी क्वार्टर मागितलं की तू एकेक नाणं काढून त्याच्यावरचं चित्र बघतेस, चित्र कुणाचं ते कळत नाही तुला."
"हे बघ, गांधीजी असतात का त्या नाण्यावर? नाही ना? मग कसं ओळखणार रे?"
"पण मग कशाला बघतेस चित्र?"
"उद्योग नाही म्हणून. पुढे बोल."
"क्वार्टर म्हणून डाईम देतेस असं सांगत होतो."
"भारतातली नाणी आणून दे मला. बघ किती पटकन ओळखते ते. तू अभ्यासाला बस आता."
त्याला घालवला खरा, पण शिकवायला सुरुवात केल्यावर इथली शिक्षणपद्धती, शिकवण्यातील पद्धतशीरपणा, प्रयोग, वेगळेपणा याचा सुखद अनुभव घेतानाच काही गमतीदार प्रसंगही घडले.

शाळेचा पहिलाच दिवस. दुसरीचा वर्ग. मार्च महिन्यातला सेंट पॅट्रीक डे.
गोष्ट वाचून दाखवायची होती. तसं सुरळीत चाललं होतं. Leprechaun इथे गाडी अडली. उच्चार लेप्रचॉन की लेप्रचन? का काहीतरी वेगळाच. मी  एकदा हा एकदा तो, दोन्ही उच्चार करत गाडी हाकली. घरी येऊन म्हटलं आज लेपरचनची गोष्ट सांगितली. मुलाचं आपलं खुसखुस, खुसखुस.
"हसू नको. नीट सांग काय ते."
"लेप्रीकॉन आहे ते" वर म्हणाला,
"तू माझ्या वर्गावर येऊ नको. घरीच शिकव मला काय असेल ते."
त्याच्या नाही पण दुसर्‍या वर्गांवर जाण्याची माझी चिकाटी दांडगी. दुसर्‍या दिवशी गेले तर संगीताचा वर्ग.  मराठीतही संगीताचा गंध नसताना एकदम इंग्रजीत संगीत कसं शिकवायचं?
मी कार्यालयात गेले. माझे थरथरणारे हात, भेदरलेला आवाज याने काही फरक पडला नाही,
"आज वेळ मारून ने. उद्या कुणालातरी आणतो आम्ही."
उडालेच, बदली शिक्षकाचं माझं हे काम वेळ मारून नेणं होतं?  मेलं, घरी तसंच, इथेही तेच. कुणाला म्हणून किंमत नाही माझ्या कामाची... आलीया भोगासी!
त्यानंतर रोज रात्री इंग्लिश गाणी शिकण्याचा सपाटा लावला मी घरी कारण दुसर्‍या दिवशी आणखी कुणाला तरी न आणता वेळ मारुन न्यायला त्यांनी मलाच तिथे ठेवलं. शाळेने माझी सलग पंधरा दिवसासाठी संगीत शिक्षिका म्हणून नेमणूक करून टाकली. पोरं कितपत शिकली देवजाणे पण मला बरीच गाणी यायला लागली आणि नवरा, मुलगा दोघांना जी काही इतर गाणी येत तीही विसरले ते दोघं. नवरा तर म्हणाला,
"तसा मी बरा कमावतोय की, तुला खरंच गरज आहे का गाणीबिणी शिकवण्याची?" मी उत्तर न देता मोठ्याने गाणं म्हणत राहिले आणि आगळेवेगळे अनुभव घेत  ३ वर्ष शिक्षक म्हणून कार्यरत राहिले.

दरम्यान हातात पदवी आली होती. जिथे शिकत होते तिथेच आधी इंटर्नशिप करुन वेब प्रोग्रॅमर म्हणून स्थिर झाले. महाविद्यालयात असलेले जवळजवळ १८० वेगवेगळे विभाग आणि त्यांची संकेतस्थळं तयार करणं, अद्ययावत ठेवणं हे आमच्या गटाचं काम. कार्यालयात सर्वांना नावानेच संबोधण्याच्या प्रथेमुळे आपसूकच जवळीक निर्माण होते.  एकमेकांना सांभाळून, अडीअडीचणी ओळखून मार्ग काढणं महत्वाचं मानलं जातं. कोणत्याही कामाचं व्यवस्थित नियोजन,  कागदावर सारा आराखडा करणं हे सुरुवातीला फार कंटाळवाणं वाटायचं पण त्याचमुळे ठरल्याप्रमाणे काम  पार पाडलं जातं आणि त्याचा दर्जाही उत्तम राखता येतो हे लक्षात आलं आणि तेच अंगवळणीही पडलं.

एकीकडे नोकरी बरोबरच लेखनही चालू असतानाच अभिनयाची मूळ आवड स्वस्थ बसू देत नव्हती. कणकवलीच्या नाथ पै एकांकिकांमधून आधी शालेय गटातून, नंतर बागेश्री संस्थेतून काम करुन मिळवलेली अभिनयाची बक्षिसं, रत्नागिरीच्या जिज्ञासा संस्थेतून गाजवलेल्या अनेक स्पर्धांच्या आठवणी स्वस्थ बसू देत नव्हत्या. त्यातूनच ’अभिव्यक्ती’ या नाट्यसंस्थेची निर्मिती झाली. दरवर्षी व्यावसायिक रंगमंच भाड्याने घेऊन दोन एकांकिकाचं सादरीकरण सुरु झालं. दिग्दर्शन, अभिनय, नेपथ्य, काहीवेळा एकांकिका लेखन, जाहीरात, तिकीट विक्री अशा सगळ्या बाजू नवर्‍याच्या आणि माझ्या मुलांच्या मदतीने  तसंच येथील स्थानिक कलाकारांच्या मदतीने सांभाळत गेली ८ वर्ष दरवर्षी इथे एकांकिका सादर करतोय. त्याला मराठी प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद उत्साह वाढवणारा आहे.

मागे वळून पाहताना जाणवतं ते हेच की परक्या देशात १९९५ च्या आसपास मुळं रुजवणं सोपं नक्कीच नव्हतं. आतासारखी संपर्काची आधुनिक साधनं नव्हती. १५ दिवसांनी भारतात फोन व्हायचे. पत्र पाठवलं की ३ आठवडे आतुरतेने उत्तराची वाट पाहण्यात जायची. पण हा परका देश ’आपला’ कधी होऊन गेला तेच समजला नाही. भारतात कुणी अमेरिकेबद्दल ऐकीव माहितीवर तारे तोडले की तळमळीने आम्ही खर्‍या परिस्थितीची जाणीव करुन देतो आणि इकडे आमच्या सहकार्‍यांनी, अमेरिकेन मित्र, मैत्रिणींनी भारताबद्दल काही शेरे मारले की त्याच कळकळीने गैरसमज दूर करण्याच्या प्रयत्नाला लागतो. दोन्ही देश आमचेच. एक कर्मभूमी, दुसरी मातृभूमी!