Sunday, June 19, 2016

कवितेला कवितेने उत्तर :-)

(कवी अनामिक पण त्याच्या कवितेला माझं कवितेने उत्तर  :-) आधी त्याची मग माझी कविता. )

प्राणसखी
घरी असलीस म्हणजे सारखे
"हे करा अन ते करा"
पेपर खाली पडला तरी 
"किती हो केला पसारा"
म्हणून म्हटले चार दिवस
जाऊन ये तू माहेरी
निवांत आणि सुखाने
एकटाच राहीन घरी
सोडून आलो तिला मग
आनंदाने काल
काय सांगू मित्रांनो
तुम्हा माझे हाल
सकाळीच उठल्यावर
आधी कचरा काढू
सगळे कोपरे धुंडाळले पण
सापडला नाही झाडू
ठेवला कचरा तसाच म्हटलं
दात घासू बेस्ट
ब्रश तर सापडला पण
कुठे ठेवली पेस्ट
आंघोळीला गारच पाणी
वाटेल म्हटलं छान
टॉवेल राहिला बाहेरच
कुणाला सांगू आण
चह करायला गेलो तर
सापडेना साखर
गॅस काही पटेना
बिघडलेला लायटर
वाटे कटकट तुझी राणि
तू घरी असताना
जीवन सारे सुने वाटे
तू जवळ नसताना
मी जर असेल शिव तर
तू माझी शक्ती
सदा जवळी असावीस तू
हीच आता आसक्ती
सहचारिणी हे प्राणसखे
विनवितो मी गं तुला
जेव्हा कुठेही जाशील तू
घेऊन जा गं मला... 
____________________________________________________
वरच्या कवितेबद्दल सर्व गृहीणींच्या वतीने:
सख्या,
भावल्या तुझ्या भावना
असतोस तू माझ्या मनात
मी कुठेही गेले तरी!
न सांगता जेव्हा शिकशील
तू माझा भार हलका करायला
लागशील कचरा काढायला
वस्तू जागच्या जागी ठेवायला
आपल्या वस्तू आपणच घ्यायला
त्यावेळी आवडेल मला तुझं
स्वावलंबनाच्या झुल्यावर झुलणं
माझ्या खुशीत अशी भर घालणं!
हे जेव्हा करशील
तेव्हा मलाही मिळेल थोडा वेळ
माझ्यासाठी, माझ्या छंदासाठी
आनंदाच्या झुल्यावर उंच झोका घेण्यासाठी!
पुढच्यावेळी मी गेले कुठे
तर येऊ दे कविता अशी
ज्यातून मला कळेल
जमलं तुला सारं
ते सुख असेल न्यारं! - मोहना प्रभुदेसाई जोगेळेकर

1 comment:

तुम्हाला माझ्या लिखाणाबद्दल काय वाटतं हे जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल. एखादी छोटीशी प्रतिक्रिया लिहणा‍र्‍याला खूप उत्साह देते. मग कळवाल ना मला तुम्हाला काय वाटलं वाचून ते? तुमच्या प्रतिक्रियेने मला कदाचित आणखी विषय सुचतील, सुधारणेला वाव मिळेल आणि मुख्य म्हणजे आपली ओळख होईल.