Thursday, January 5, 2017

माणूस

परवा जुन्या मैत्रिणीला भेटलो न्यूयॉर्क मध्ये. आता तिला मैत्रीण म्हणायचं की नाही हे ही समजत नव्हतं. महाविद्यालयातील मैत्री. सुरुवातीला निखळ. नंतर एकमेकांचा सहवास आवडतोय हे समजणं, प्रेमात गुरफटणं...मी घरी सांगून मोकळा झालो. तिने नाही सांगितलं घरी. का ते मी नाही कधी विचारलं. प्रेमात पडलेलो असलो तरी फार वेळ मिळायचाच नाही भेटायला. पण जो काही एकत्र वेळ मिळायचा त्या काळात हळूहळू काही गोष्टी लक्षात येत गेल्या. मला आयुष्य अनुभवायचं आहे. जग फिरायचं आहे. जगातल्या कितीतरी गोष्टी बदलायच्या हे माझं प्रामाणिक स्वप्न आहे. नोकरी एके नोकरी न करता माझ्या शिक्षणाचा उपयोग गरीब वस्तीतल्या मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी करायचा आहे. आणि मी ते करायला सुरुवातही केली आहे. कामावरुन आलो की २ तास मी या मुलांना मार्गदर्शन करायला जातो. माझी आई म्हणते तसं चांगलं माणूस व्हायचं हे ध्येय आहे माझं. माझ्या प्रेयसीला तिच्या शिक्षणाचा पुरेपूर उपयोग करुन पैसा कमवायचा होता. भरपूर काम आणि भरपूर पैसा हे तिचं ध्येय. दोघांची आयुष्याकडे पहाण्याची दृष्टी वेगळी आहे हे समजत गेलं आणि वेळीच वेगवेगळ्या वाटेवरुन जायचं आम्ही ठरवून टाकलं. त्रास झालाच. दोघांनाही. कितीतरी दिवस. मैत्री ठेवायची असं ठरवलं आम्ही. पण प्रत्यक्षात तसं काही झालं नाही. आपोआपच संपर्क तुटला.

काल जवळजवळ २ वर्षांनी आम्ही पुन्हा भेटलो. म्हटलं तर सहज, म्हटलं तर ठरवून. न्यूयॉर्कला अनायसे जाणारच होतो. वेळ होता. भेटू म्हटलं. ती देखील उत्साहाने तयार झाली. या २ वर्षात खरंच आम्हाला जे मनापासून करायचं ते आम्ही करत होतो. पण भेटलो तेव्हा दोघांच्याही मनातही तेच प्रश्न होते. खूप उत्सुकता आणि अस्वस्थता होती. आपापले निर्णय योग्य होते का हे अजमावण्याची. नातं तोडून जे पाहिजे होतं ते खरंच साध्य झालं आहे का? हाच प्रश्न होता एकमेकांच्या नजरेत. कॉफीचे घुटके घेत एकमेकांकडे पहात होतो.
"मला कंटाळा आलाय." ती एकदम म्हणाली. माझा चेहरा खुलला.
"तुला आधीच सांगितलं होतं." मी उत्साहाने म्हणालो. माझा निर्णय बरोबर होता याचा आनंद व्हायला लागला होता मला.
"पैसा मिळतोय. पण जवळजवळ १५ तास काम करते. थकून जाते. दिवस कधी उजाडतो, मावळतो हे ही कळत नाही. हे कसलं रे आयुष्य? सारं बदलावं असं वाटतंय." माझी नजर विजयाची होती.
"तुझं कसं चाललंय?" तिने उत्सुकतेने विचारलं.
"छान. जसं ठरवलं होतं तसंच चालू आहे." आवाजात विजयोन्माद भरलेला. त्यानंतर फिरुन फिरुन आम्ही तेच बोलत होतो. मला राहून राहून तिचं काही फार बरं चाललेलं नाही याचाच आनंद होत होता.

तिथून निघालो आनंदाने आणि काही क्षणात बेचैनीने घेरलं मला. अचानक ती खूश नाही या विचाराने फार वाईट वाटायला लागलं. घरी फोन लावला. सगळं सांगितलं. आई म्हणाली,
"याचा अर्थ तू अजूनही तिच्यात गुंतलेला आहेस."
"छे. याचा अर्थ मी मला वाटायला लागलं होतं तितका वाईट माणूस नाही."
"म्हणजे?"
"माझ्याच नजरेतून मी उतरायच्या आधी सावरलं स्वत:ला."
"चांगलं माणूस बनण्याच्या प्रवासातलं एक छोटं पाऊल टाकलंस. हो ना?"
आईने मला जे व्यक्त करायचं होतं ते एका वाक्यात केलं आणि समाधानाचा श्वास सोडत मी फोन ठेवला! - मोहना प्रभुदेसाई जोगळेकर

7 comments:

  1. छान लिहिलय. सहज सुंदर

    ReplyDelete
  2. प्रत्येकाच्या आयुष्यात कमिजास्त मानाने.. फरकाने अशा गोष्टी घडत असतात . पन फरक एवढाच की त्या व्यक्ति एकमेकांना आयुष्याच्या कोणत्या वळणावर भेटतात त्यानुसार view बदलत जातो . कधी कुणाला त्याचा आनंद होईल कुणाला दुःख ...
    असो पण प्रसंग अगदी Live वाटतो असा लिहिले आहे.

    ReplyDelete

तुम्हाला माझ्या लिखाणाबद्दल काय वाटतं हे जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल. एखादी छोटीशी प्रतिक्रिया लिहणा‍र्‍याला खूप उत्साह देते. मग कळवाल ना मला तुम्हाला काय वाटलं वाचून ते? तुमच्या प्रतिक्रियेने मला कदाचित आणखी विषय सुचतील, सुधारणेला वाव मिळेल आणि मुख्य म्हणजे आपली ओळख होईल.