Showing posts with label अनुभव. Show all posts
Showing posts with label अनुभव. Show all posts

Wednesday, December 2, 2015

नातं

"हा हा म्हणता आला की निघायचा दिवस." खचून भरलेली, करकचून बांधलेली बॅग भितींपाशी ठेवली. एकाच बॅगेचं बंधन घातल्याबद्दल एअरलाईन्सचे मनातल्या मनात आभार मानले. सोफ्यावर टॅबलेटमध्ये डोळे खुपसलेल्या, टेबलावर लॅपटॉपमध्ये जवळ जवळ घुसलेल्या नवर्‍याकडे नजर टाकली. पुन्हा म्हटलं,
"चला, निघणार मी उद्या." आईचं व्याकुळ हृदय, नवर्‍यासाठीची विरहवेदना वगैरे वगैरे सगळं डोळ्यातून दाखवण्याचा प्रयत्न केला. पण माझ्या अभिनयक्षमतेचं कौतुक करायला कुणीच राजी नव्हतं.  मग म्हटलं आवाज ऐकला की नजरा वर वळतील. हुंदके काम बजावतील. काहीतरी विचित्र आवाज ऐकल्यासारखं दचकून दोघांनी वर पाहिलं.
मुलगी घाईघाईने येऊन मिठी मारुन, एक दोन पापे देऊन पुन्हा टॅबलेटकडे वळली. नवर्‍याने तेवढीही तसदी न घेता :-) मान पुन्हा लॅपटॉपमधे टाकली.
"बाहेरच सोडेन एअरपोर्टच्या. का यायला हवं आत?" याचं हे नेहमीचं. कामं उरकायची नुसती.
"बघ, तुल सोयीचं पडेल ते कर." विषय संपवला तरी मला सोयीचं होईल ते तो कसं करेल या विचारात रात्र सरली.

सकाळी सकाळी तिघांनी चेहर्‍यावरच्या खर्‍या भावना लपवित साश्रु नयनांनी एकमेकांना निरोप दिला. मुलीचे, आई नाही तर काय धिंगाणा घालता येईल याचे बेत सुरु झाले असावेत, नवर्‍याच्या ’ आता काय वाट्टेल ते करु’ च्या यादीत काय काय भर पडली कोण जाणे. मी देखील रांधा, तुमचं तुम्ही घ्या, भांडी डिशवॉशरमध्ये विसळून घाला आणि कुणीतरी लावा रे धुतलेली ती भांडी डिशवॉशरमधून असं ठणाणा बोंबलण्याच्या  काढून ह्या माझ्या रोजच्या कामगिरीवरुन मुक्तता मिळाल्याच्या आनंदात विमानतळाच्या दिशेने प्रस्थान केलं. पण ३ -३ माणसांना एकाचवेळी इतकं सुख द्यायला बहुधा एअरलाइनला जड गेलं असावं.
"आजचं विमान रद्द." तीन शब्दांची १ ओळ कितीजणांचं भावविश्व कोलमडून टाकते त्याचं प्रत्ययकारी दर्शन एकमेकांना ताबडतोब झालं.
मुलगी,
"आज जाणार नाहीस तू?" विश्वाचं सारं दु:ख तिच्या आवाजात उतरलं होतं.
नवरा,
"असं करु, दुसरं कुठलं विमान मिळतं का पाहू." आधीच वेगात असलेली गाडी त्याने आणखीन वेगाने पळवायला सुरुवात केली.
"अरे ती काय एस. टी. आहे का? ही नाही तर ती पकडायला?"
"हे बघ, तुझं पुढचं विमान जाणारच आहे. तिथपर्यंत कसं पोचायचं हे पाहायचं आता." नवर्‍याचा कधी नव्हे तो इतका पक्का निर्धार पाहून कौतुकाचं भरतंच आलं मला. ह्या त्याच्या निर्धाराला योग्यं दिशा द्यायला हवी अशी खुणगाठ बांधत मी नुसतीच मान डोलवली. विमानतळावर जाऊन आम्ही आपापल्यापरिने तिथल्या आधीच उद्धट असलेल्या कर्मचारी बाईला जितकं जेरीला आणता येईल तितकं आणायचं काम केलं. पण खिंड काही लढवता आली नाही. माझं निघणं एक दिवस लांबलं ते लांबलंच.
"तुझं आणि विमानाचं नातं असंच आहे. दरवेळेला असं काहीतरी होतं." नवरा कुरकुरला आणि आमची यात्रा पुन्हा घराच्या दिशेने वळली. तिघांची कितीतरी स्वप्न एकाचवेळी भंग केल्याचं पाप  एअरलाईन्सच्या माथ्यावर पुन्हा एकदा पडलं.

घरी आलो तेव्हापासून घरातलं प्रत्येकजण पुन्हा पुन्हा एअरलाईन्सच्या वेबसाईटवर दुसर्‍या दिवशीचं विमान वेळेवर आकाशात झेपावणार आहे याची खात्री खरुन घेतंय. सांगेनच तुम्हाला, मी निघाले की नाही :-)

Monday, October 19, 2015

झलक

 ’वेषांतर’ एकांकिकेची झलक.



वेषांतर: तामिळनाडू मधील अळमग्गळ नावाचं एक खेडं. जेमतेम पाचशे उंबरठे असलेलं. इथल्या एका पडीक अवस्थेतल्या वाड्यात वेषांतर एकांकिकेतील नाट्य घडतं. वाड्यातील शास्त्रीबुवा मूळचे गोमंतक. उपजिविकेसाठी पार दक्षिणेत येऊन स्थिरावलेले. मराठी भाषिक तरुणींच्या आगमनाने मुलखातलं कुणीतरी भेटल्याचा शास्त्रीबुवांना आनंद होतो. पण हा आनंद क्षणभुंगुर ठरावा अशा घटना घडत राहतात. घडणारं सारं प्रत्येकाच्याच दृष्टीने अकल्पनीय,धक्कादायक. निर्माण झालेल्या वादळाला कसं तोंड देतात या वाड्यातील व्यक्ती?  सत्यघटनेवर आधारित एकांकिका.

Friday, September 11, 2015

वेषांतर

नुकत्याच म्हणजे १५ ऑगस्टला दरवर्षीप्रमाणे आम्ही २ एकांकिका सादर केल्या.  मी लिहिलेली  ’वेषांतर’ ही एकांकिका सत्यघटनेवर आधारित आहे. संगीत, प्रकाशयोजना, ध्वनि, नेपथ्य, सशक्त कथा आणि अनुभवी कलाकार या सार्‍याचा सुंदर मिलाफ आणि रसिक प्रेक्षकांनी खचाखच भरलेलं प्रेक्षागृह  यामुळे ४ महिने आम्ही सर्वांनी केलेल्या श्रमांचं सार्थक झाल्यासारखं वाटलं.  तुम्हा सर्वांसाठी ’वेषांतर’ एकांकिकेचे फोटो या दुव्यावर:

 https://marathiekankika.wordpress.com/

Thursday, July 23, 2015

परवाना

काल प्रेमपत्र आलं सरकारचं. हल्ली कुणाची पत्रच येत नाहीत त्यामुळे सरकारचं तर सरकारचं. कुणाला तरी झाली आठवण असं म्हणत नाचवत नाचवत ते पत्र पेटीतून घरात आणलं. चष्मा लावला तरी काय लिहलंय ते दिसेना तेव्हा दार उघडलं. पत्र उन्हात धरलं आणि एकदा थोडं जवळ, एकदा लांब असं करत कुठल्या कोनातून नीट वाचता येईल याचा अंदाज घेत वाचायला सुरुवात केली. हे रामा, डोळ्यांचीच परिक्षा घेणार होते म्हणे. "लायसन्स रिन्यूअल" गाडी चालवण्याच्या परवान्याची मुदत संपत आली. द्या परिक्षा पुन्हा. खुणा ओळखा, डोळे चांगले असल्याची खात्री पटवा. सुतकी चेहर्‍याने ते प्रेमपत्र पुन्हा पुन्हा वाचलं.

परिक्षा म्हटलं की आधीच घाबरगुंडी उडालेली असते आणि द्यायच्या तरी किती या परिक्षा.  सरकारी खात्यातली लोकं आपलं ओझं त्यांच्या खांद्यावर असल्यासारखा चेहरा करुन बसलेली पाहिली की पास होणारेही धाडधाड नापास होत असतील.  या देशात पहिल्यांदा अशी परिक्षा द्यायला गेले तेव्हा कणकवली, रत्नागिरीत दिलेल्या ’परिक्षा’ लक्षात होत्या. 8 आकडा तर काढायचा, आहे काय नी नाही काय असं म्हणत गाडीत बसले. बाजूला परिक्षक दार उघडून बसला आणि मग मात्र  गोंधळ सुरु झाला. एकतर या देशात नवीन, त्याचे उच्चार मला कसे समजायचे आणि मी बोललेलं त्याला कसं समजायचं. मी पेचात पडले. तोही त्याच पेचात असावा. चेहरा हुप्प करुन बसला होता.
’स्ट्रेट’ एका शब्दात दिलेले हुकूम पाळायची मला कधीच सवय नव्हती. संदर्भासहित स्पष्टीकरण असलं तरच जमतं बाई. तो पुढे काही बोलेल याची क्षणभर वाट पाहिली आणि विचारलं.
"स्ट्रेट.. यु मीन आय हॅव टू ड्राइव्ह स्ट्रेट?"
"लेफ्ट..." तो खेकसला. विचारता विचारता पुढे नेलेली गाडी मी घाबरुन एकदम लेफ्टली.
"ब्रेक, ब्रेक." तो माझ्यापेक्षा घाबरला असावा. फाटल्यासारखा ओरडला आणि अमेरिकन माणसाला कसं घाबरवलं या आनंदात मी जोरात ब्रेक दाबला. गाडी कशी कुणास ठाऊक पुन्हा जिथून सुरुवात झाली होती तिथेच आली होती. त्याने धाडकन दार उघडलं. तो श्वास वर खाली करत थोडावेळ तसाच बसून राहिला. धाप लागल्यासारखा. मला कळेना आता उतरायचं की तसंच बसून राहायचं, पास की नापास? त्याच्या लाल झालेल्या चेहर्‍याकडे हळूच पाहत विचारलं.
"आर यू ओके?"
"आय आस्क्ड यू टेक लेफ्ट."
"यस. ॲड आय डिड टेक लेफ्ट."
"थॅक गॉड." मग कशाला भडकला हा माणूस? मी हसून पाहिलं.
"यू डिड नॉट गो टू लेफ्ट लेन." तो गुरगुरल्यागत पुटपुटला.
"फॉर व्हॉट?"
"टू टेक  अ लेफ्ट टर्न..."
"असं जायचं असतं?" चुकून मराठीत विचारलं आणि त्याने खाऊ की गिळू नजरेने माझ्याकडे पाहिलं.
"सॉरी." आता नापास होणार या कल्पनेनं मला धाप लागली. तोपर्यंत त्याची धाप नष्ट झाली होती. तो गाडीतून उतरला. मी त्याच्या मागून मागून. सावित्रीच्या मनात यमाच्या मागून जाताना काय काय विचार येत असतील ते मला आत्त्ता कळत होतं.  आता, ’या पुन्हा’ सांगणार या तयारीतच त्याने दिलेला कागद डोळ्यासमोर धरला.  आनंदाने त्यालाच मिठी मारावीशी वाटली तरी शहाणपणा करुन त्याला अधिक पेचात न पाडता विजयी चेहर्‍याने मी माझा मोर्चा नवर्‍याच्या दिशेने वळवला. आता ही काय दिवे लावणार असा चेहरा करुन तो दूर कुठेतरी कोपर्‍यात लपला होता.

त्यानंतर सरकारला अशी अधूनमधून आठवण होतंच असते. मग व्हा सज्ज पुन्हा परिक्षा द्यायला. करा गोंधळ, निस्तारा असं चालू होतं. चुकीच्या वर्गात गेलो, चुकीचा पेपर लिहिला, चुकीच्या विषयाचा अभ्यास केला, परिक्षा काल आणि आपण आज तिथे गेलो अशी स्वप्न परिक्षा होईपर्यंत पडत राहतात. पुन्हा एकदा शाळेत गेल्याचा अनुभव आमचं हे सरकार देतं ते काय कमी आहे. चला लागा आता तयारीला....

Thursday, July 16, 2015

माझ्या मैत्रीणीची...

नुकतीच श्रीदेवीला, माझ्या मैत्रीणीला नोकरी लागली. ती नोकरीच्या शोधात बरेच महिने होती. नोकरी मिळवण्यासाठी काय काय करु शकतात लोकं याबद्दलचं माझं ज्ञान तिच्या नोकरी संशोधन काळात पीएचडी मिळवण्याइतपत वाढलं.
"आज मुलाखत द्यायला यायची आहे."
"यायची आहे? म्हणजे तुला मुलाखत द्यायला जायचं आहे का?"
"नाही फोनवर आहे ना मुलाखत. नाव माझं पण मुलाखत ती देईल. म्हणून ’यायची’ म्हटलं." हे असं चालतं ही ऐकीव माहीती उदाहरणासकट समोर आल्यावर बसलेला धक्का न दर्शविता मी ’अधिक’ माहितीसाठी बाजारात भाजी घ्यायला गेल्यासारखं विचारलं,
"सध्या काय दर आहे?"
"काम फत्ते झालं तर 500 डॉलर्स." ती ज्या कामासाठी या मुलाखती देत होती तेच मी पण करते त्यामुळे आपणही या ’बिझनेस’ मध्ये घुसून जोडधंदा सुरु करावा का असा विचार मनात चमकून गेला. तो चेहर्‍यावरही दिसला असावा.
"तू देशील का मुलाखत? मला काय तिला द्यायचे ते तुला देईन." माझं पापभीरु मन शहारलंच. असली बेकायदेशीर कामं आम्ही ’मराठी’ लोक करत नाही (?) हे ठसवायला घाईघाईत म्हटलं,
"नको नको, मला नाही अशा मार्गाने पैसे मिळवणं बरं वाटत. आणि तसंही माझ्याकडे भरपूर पैसे आहेत." म्हटलं आणि ती आता मग ते पैसे मला दे म्हणाली तर म्हणून घाबरले.
आधी तिची मुलाखत ती दुसरी देणार म्हणून घाबरले, आता माझ्याकडचे भरपूर पैसे तिने मागितले तर म्हणून पुन्हा घाबरले. माझं हे घाबराघुबरी प्रकरण संपेपर्यंत तिला नोकरी लागलीही. आणि काम करायला ती माझ्याच कार्यालयात रुजूही झाली....

एका दिवसानंतर...
कार्यालयात कसलातरी उग्र दर्प पसरला होता. बरीचजणं काम सोडून त्याची चौकशी करण्याकरता इकडे तिकडे करत होती. सहा सात जण वास सहन होत नाही म्हणून घरुन काम करायची परवानगी मिळवावी का याची चर्चा करण्यात मग्न झाले. थोड्याच वेळात त्यात ते यशस्वीही झाले. कार्यालय ओस पडलं. आम्ही आपले एकदोघं जण टकटक करत संगणक बडवत होतो. एकदम माझ्या लक्षात आलं, कालच नव्याने रुजू झालेली श्रीदेवी कुठे दिसत नाही. हिला आधीच समजलं की काय आज घरुन काम करता येईल म्हणून. आम्ही जेमतेम तिघंजणं उरलो होतो. पोनीटेलला विचारलं,
"श्रीदेवी कुठे आहे?"
"सिरी इज नॉट कमिंग बॅक."
धक्काच बसला.
"का? कालच तर तिचा पहिला दिवस होता. "
"हो, पण नो कम्युनिकेशन स्किल्स म्हणून शी गॉट फायर्ड यस्टरडे ओन्ली." मला तिच्या अशा येण्याचं आणि जाण्याचं प्रचंड दु:ख झालं. आली काय नी गेली काय. घरी गेल्या गेल्या मी तिच्याघरी धावले. खरं तर म्हणायचं होतं, बघ असले उद्योग करावेतच कशाला. नोकरी काय कधी ना कधी मिळालीच असती. केवढी नामुष्कीची गोष्ट आहे ही एकाच दिवसात हायर आणि फायर, उगाचच सार्‍या भारतीयाबद्दल पण मत.... पण नुसतीच लटकलेल्या चेहर्‍याने मी तिच्यासमोर उभी राहिले. तिने माझ्या पाठीवर थोपटलं,
"अगं इतकं काय मनाला लावून घेतेस. मिळेल मला नोकरी. एक दिवसाचा अनुभव माझ्या दृष्टीने खूप मोठा आहे. या एका वर्षाच्या अनुभवामुळे उद्याच एक मुलाखत आहे...."

Wednesday, June 24, 2015

एकांकिका

दरवर्षीप्रमाणे यंदाही एकांकिकांची तयारी जोरात सुरु आहे. पाहायला आलात तर नक्की आवडेल.


वेषांतर:
तामिळनाडू मधील अळमग्गळ नावाचं एक खेडं. जेमतेम पाचशे उंबरठे असलेलं. इथल्या एका पडीक अवस्थेतल्या वाड्यात वेषांतर एकांकिकेतील नाट्य घडतं. वाड्यातील शास्त्रीबुवा मूळचे गोमंतक. उपजिविकेसाठी पार दक्षिणेत येऊन स्थिरावलेले. मराठी भाषिक तरुणींच्या आगमनाने मुलखातलं कुणीतरी भेटल्याचा शास्त्रीबुवांना आनंद होतो. पण हा आनंद क्षणभुंगुर ठरावा अशा घटना घडत राहतात. घडणारं सारं प्रत्येकाच्याच दृष्टीने अकल्पनीय,धक्कादायक. निर्माण झालेल्या वादळाला कसं तोंड देतात या वाड्यातील व्यक्ती?
कलाकार : रणजित गुर्जर, मेघनाकुलकर्णी, सुप्रिया गरुड, मोहना जोगळेकर, बोस सुब्रमणी.

धोबीपछाड – कुस्तीमधला एक डाव. काळ बदलला, साधनं बदलली तसं डावपेचांचं स्वरुप बदललं. रंगमंचावरचा धोबीपछाडही असाच. या डावात कुस्तीपटू आहेतस्वत:ला यम म्हणविणारे दोघं. हे दोघं रंगमंचावरच शड्डू ठोकून उभे ठाकतात. सावित्री- सत्यवान भूमिका करायची की नाही या संभ्रमात पडतात. तेवढ्यातदुसरा यमदूतही उभा ठाकतो. नाटकातलं नाटक रंगायला लागतं. अखेर कोण होतं चितपट? यम की यम? आणि कोण होतं यमदूत…? विनोदी एकांकिका - धोबीपछाड.
कलाकार: संदीप कुलकर्णी, सचिन कुलकर्णी, प्रशांत सरोदे, प्रिती सुळे, चिन्मय नाडकर्णी, गिरीश भावठाणकर.
अधिक माहिती:

Tuesday, June 2, 2015

जागो हिंदुस्तानी

रंगमंचावर  रंग दे बसंती चोला हे गाणं सुरु झालं आणि एका कडव्याला त्यातील गाण्याच्या ओळी म्हणत  गायक रंगमंचावरुन खाली उतरले, मंचावरचे दिवे अंधुक होत गेले आणि उजळलेल्या प्रेक्षागृहात गायकांमधील एक  कलावंत प्रेक्षकांमधील आजींच्या चरणांशी वाकला. आजींनी डोळ्यांमधून ओघळणारे अश्रू पुसत गायकाला आशीर्वाद दिला. आपल्या मनात अढळ स्थान निर्माण केलेली गाणी तितक्याच ताकदीच्या गायकांकडून ऐकण्यात प्रेक्षक रमलेले असतानाच या प्रसंगाने सार्‍यांचीच मनं भारावून गेली. कार्यक्रम होता कोल्हापूरच्या स्वरनिनाद संस्थेचा जागो हिंदुस्तानी.


जागतिकीकरणाने सगळीच समीकरणं बदलली. कोणतंही गाणं इंटरनेटवर आता सहज उपलब्ध आहे. भारतातून सांस्कृतिक कार्यक्रम परदेशात येण्याचं प्रमाणही प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे, नाटक, संगीत, वादन, चित्रपट अशा कार्यक्रमांची रेलचेल चालू असते. सादरकर्त्यांची आणि पाहणार्‍यांची अभिरुचीही बदलली आहे. मग आवर्जून पहावं असं जागो हिंदुस्तानीमध्ये काय आहे? या कार्यक्रमाचं वेगळेपण कशात आहे? जागो हिंदुस्तानीचं यश आहे ते रंगमंचावर निवेदन आणि गायनाच्या साथीने रसिकांना आठवणींच्या राज्यात नेणं, विस्मृतीत जात चाललेल्या घटनांचा हात हाती घेऊन, प्रसंगाना उजाळा देत अलगद त्या काळात नेऊन सोडणं तर काहीवेळा आपल्या ऐकण्यात, माहितीत नसलेला एखादा प्रसंग, घटना डोळ्यासमोर जसा घडला तसा उभा करणं यामध्ये आहे. दोन - अडीच तासाचा हा कार्यक्रम आपल्याला एका वेगळ्या विश्वात नेतो, गत आणि वर्तमान काळाची सैर चालू रहाते ती नव्या - जुन्या गाण्यांच्या साथीने. अभिमान, खेद, हळहळ, चुटपूट, स्फूर्ती, उत्साह अशा सार्‍या भावना या वाटेवर आपल्या सोबतीने येत रहातात आणि एक अविस्मरणीय कार्यक्रम पाहिल्याचं समाधान मनात  तरळत रहातं.
जागो हिंदुस्तानी कार्यक्रमात निवेदक भूषण शेंबेकर आपल्या डोळ्यासमोर प्रत्येक प्रसंग ताकदीने उभा करतात. भूत - वर्तमानाची पानं अलगद उलगडत राहतात. प्रत्येक प्रसंग आपल्या डोळ्यासमोर उभा करण्यात ते यशस्वी होतात. उधमसिंग ह्यांनी पंजाबच्या गव्हर्नर मायकल ओव्हायरची जालियनवाला हत्याकांडाला जबाबदार धरत गोळ्या झाडून हत्या केली. हा प्रसंग ऐकताना उधमसिंगांनी दिलेला कबुलीजबाब ऐकताना आपला उर  अभिमानाने  भरुन येतो. प्लासीच्या विजयानंतरच्या जल्लोषात पराजित हिंदुस्तानी काय करु शकत होते याबद्दल त्या मिरवणुकीत सामील असलेल्या परकीयाचे शब्द ऐकताना चुटपूट लागते, खेद वाटतो. निवेदनातून येणार्‍या या अशा आणि अनेक घटना ऐकता ऐकता  सर्वांच्याच मनात प्रसंगांची गर्दी व्हायला लागते. देशासाठी लढलेल्या, प्राण गमावलेल्या अनामिक वीरांच्या बलिदानाची आठवण येऊन हळहळ वाटते आणि स्वातंत्र्यानंतरच्या कालावधीनंतरचा भारत नजरेसमोर आला की आपण काय काय गमावलं, कुठून कुठे पोचलो ह्याचा हिशोब मन मांडायला लागतं. 

भारत १९९७ साली स्वातंत्र्याचं ५० वे वर्ष साजरं करत असताना निर्माते सुनील सुतार आणि दिग्दर्शक सुरेश शुक्ल यांनी आपल्या स्वरनिनाद या संस्थेतर्फे जागो हिंदुस्तानी चा पहिला प्रयोग रंगमंचावर आणला. आणि त्यानंतर सातत्याने त्यांचे प्रयोग भारतभर चालू आहेत. या कार्यक्रमाला नेपथ्य आहे ते भारतीय ठेव्याचं,  रेखाटनं आहेत ती ऐतिहासिक ठिकाणांची. उत्कृष्ट प्रकाशयोजनेमुळे ह्या रेखाटनांचा ३D परिणाम छान साधला जातो. 

स्वरनिनादने गेले २६ वर्ष सातत्याने गर्जा महाराष्ट्र, देस मेरा रंगीला, गीत बहार, लख लख चंदेरी, शब्द सुरांच्या झुल्यावर असे वेगवेगळे हिंदी, मराठी गीतांचे कार्यक्रम भारतभर सादर केले आहेत.

जागो हिंदुस्तानी हा जो कार्यक्रम सध्या अमेरिकेत चालू आहे त्याचे भारतात आत्तापर्यत सर्वत्र प्रयोग झाले आहेत. वाघा सरहद्दीवरही हा कार्यक्रम झाला आहे याचा प्रामुख्याने उल्लेख करावासा वाटतो. इतकंच नाही तर तुरुंगातील कैद्यांना घेऊन त्यांच्याकडूनच हा कार्यक्रम करुन घेण्याचा आगळावेगळा प्रयोगही स्वरनिनादने यशस्वीरीत्या केला. २ राष्ट्रीय तर २ राज्य पातळीवरच्या पुरस्काराने हा कार्यक्रम सन्मानित झालेला आहे. उत्कृष्ट संगीत, गाणी, नेपथ्य, प्रकाशयोजना असलेला हा दोन - अडीच तासांचा कार्यक्रम आपल्याला खिळवून टाकतो.  गाण्यातील भावना थेट हृदयापर्यंत पोचवणारे समर्थ गायक यात आहेत. आणि सध्याच्या काळातील कार्यक्रमांच्या बदललेल्या स्वरुपाच्या पार्श्वभूमीवर संदेशे आते है, फिर भी दिल है हिंदुस्तानी, बोलो मेरे संग,  भारत के रहनेवाला, ए मेरे वतन के लोगो, सारे जहॉंसे अच्छा, वंदे मातरम अशी एकापेक्षा एक सरस गीतं असलेला हा कार्यक्रम पहाताना आपण वेळेचं भान विसरुन जातो. म्हणूनच म्हणावंसं वाटतं, ध्वनी - प्रकाश - नेपथ्य - गायन - वादन - निवेदनाचा जमलेला सूर म्हणजे जागो हिंदुस्तानी हा कार्यक्रम. प्रत्येकाने एकदा तरी अनुभवून डोळे आणि कान तृप्त करावेत असा!  


BMM वृत्तमध्ये प्रसिद्ध - http://bmmonline.org/sites/default/files/BMM/BMM/2015_6_BMMVrutta_MohanaJoglekararticle.pdf

Wednesday, May 20, 2015

झलक

गेल्या ८ महिन्यांपासून मी मराठी वर्ग घ्यायला सुरुवात केली. खेळ, अभिनय, भेंड्या या  पद्धती वापरुनच मुलांना मराठीची गोडी लावायची हे सुरुवातीपासूनच नक्की केलं होतं. वेगवेगळ्या खेळांमधून शिक्षण हे माझं शिकवण्याचं सूत्र कसोशीने गेले ८ महिने पाळलं त्यामुळेच सुरुवातीला आई - बाबांमुळे आलेली मुलं नंतर नंतर  उत्साहाने स्वत:हून यायला लागली.

मुलांनी रंग, आकडे, वार म्हणून दाखवले. दोन प्रवेश स्वत:च्या कल्पनेने सादर केले. चंपक मधील पंख्याची गोष्ट कधीतरी वर्गात सांगितली होती त्यावरुन मुलांनी मराठीतून अतिशय सुंदर प्रवेश सादर केला. दुसरा प्रवेश  एका विद्यार्थ्याच्या मनातील कल्पना होती. त्या कल्पनेला मूर्त रुप मुलांनीच दिलं. खूप छान वाटलं सर्व मुलांना आत्मविश्वासाने मराठी बोलताना पाहून.  अर्थात पालकांचींही मराठी टिकवण्याची धडपड त्या मागे आहेच. त्यामुळे मुलांचं कौतुक आणि पालकांचे आभार!

या वर्षीच्या शेवटच्या दिवशी मुलांनी आपलं ’मराठी’ त्यांच्या आई - बाबांना दाखविलं.

पर्णिकाने देखील विनोदी किस्से सांगत कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. त्या कार्यक्रमाची ही छोटीशी झलक.



Tuesday, December 2, 2014

लेकाच्या... ची कथा

फोन घणघणायला लागला. लेकाच्या फोनसाठी आम्ही विशिष्ट आवाज निवडला होता. खरं तर लगेच फोन उचलू म्हणून तसं केलं होतं. पण घरचाच तर आहे, करेल परत असं म्हणून कुणीच आजकाल ढिम्म हलत नव्हतं. आज मात्र मी तातडीने उचलला. घरातली बाकीची Thanksgiving च्या सुट्टीबद्दल परमेश्वराचे आभार मानत झोपा काढत होती. मला करण्यासारखं काही नसल्याने आलेला फोन तरी वेळेवर उचलावा म्हटलं.
"आई, अग तो मेला, तो मेला, म्हणजे मी मारलं त्याला ठार." चिरंजीव फोनवर आनंदातिशायाने किंचाळत होते. मेला या शब्दाने थिजल्यासारखं होऊन शब्दच फुटेना माझ्या तोंडून.
"आई..."
"अरे, काय केलंस तू? आणि खिदळतोस काय असा?" मी त्याच्यापेक्षा जोरात किंचाळले. तो आनंदाने, मी घाबरुन.
"आधी शांत हो आई, एकदम शांत. आता सांग. मी कोणत्या मोहिमेवर होतो सध्या?" क्षणभर काही आठवेना. म्हणजे, एखादा तास कसा बुडवायचा, सलग १५ तास झोपायचं, आई, बाबांना, शिक्षकांना शेंडी कशी लावायची, फुकट कुठे काय मिळतं त्याचा मागोवा घ्यायचा अशा महाविद्यालयीन मुलांच्या ज्या मोहिमा असतात त्यातलीच एखादी असणार हे नक्की. पण सध्याची कुठली? चुकीचं सांगितलं की एक व्याख्यान. भूमिका बदलल्या होत्या. पूर्वी मुकाटपणे तो आमचं ऐकायचा, आता आम्ही त्याचं.
"अगं उंदीराला पळता भुई थोडी करुन टाकणार नव्हतो का मी?" माझ्या डोक्यात एकदम उंदीर शिरला आणि त्याची Thanks Giving सुट्टीची मोहिम आठवली.

सुट्टीचा पहिला दिवस:
"आई, आज उंदीर दिसला. ईऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ."
"उंदराला कसला घाबरतोस?" त्याने सोयीस्करपणे विषय बदलला.
"टायलरमुळे झालंय. त्याचीच खोली घाण असते. कुठेही बसून खातो शहाणा. अन्न शोधत येतो मग उंदीर"
"चिरंजीव..." काहीही न बोलता त्याला मला काय म्हणायचं ते कळलं.
"तुझ्या हाताखाली १६ वर्ष राहिलो. काय बिशाद आहे माझी स्वच्छता न ठेवण्याची?" पुढे त्याचं हॅहॅहॅ करुन हसणं.
"चिरंजीव..." पुढचं कळल्यासारखं त्याने पुन्हा विषय थोपवला.
"बरं, बरं ते वेगळं. पण काल स्वयंपाकघराच्या मोरीत सगळं पाणी तुंबलं होतं. मी ते तसंच ठेवलं आणि टायलरला टेक्स्ट केलं. तर तो म्हणायला लागला. तू पालापाचोळा खातोस. पालकचं पान दिसतंय."
"मग?"
"मग काय? मी फक्त पालकचं पान काढलं तिथून. बाकी उरलेलं त्याने स्वच्छ करावं."
"पण तो बाजूच्याच खोलीत होता ना? मग बोलायचं त्याच्याशी."
"हॅ, काहीतरीच काय?"
"नाहीतर बाई किंवा बुवाच का नाही तुम्ही स्वच्छतेसाठी लावत?"
"अगं असं काय म्हणतेयस तू आई॓?" त्याला चांगलाच धक्का बसला.
"रोज एकमेकांना छळण्यापेक्षा ते बरं ना?"
"१६ वर्षात तू काय हे शिकवलं आहेस? आपली कामं आपण करावी असं सांगायचीस तू. आपण कधी बाई लावून घर स्वच्छ नाही केलं. तो घाण करणार आणि बाई मी लावू? काहीहीऽऽऽ."
"अरे..."
"मी नंतर बोलतो."

दिवस दुसरा:
"भारतात असतात का उंदीर?" सध्या उंदीर आमचे दिवस चांगलेच कुरतडत होता.
"असतात की."
"आजोबांकडे होते?"
"हो, दोन चार पाळले होते. मांजरासारखे बसलेले असायचे की."
"आई, तू पण ना. पण आई, आज फक्त मी, उंदीर आणि घर! कल्पनाच चित्तथरारक वाटतेय."
"टायलर?"
"तो गेलाय सुट्टीसाठी. मी शोधून काढलंय तो उंदीर कुठून येत असेल ते.  तो आत येवू नये म्हणून बेकींग सोडा, व्हिनेगरचं मिश्रण एकत्र करुन कापडाचा बोळा भिजवला आणि त्याच्या प्रवेशद्वाराशी खुपसलाय."
"अरे, वासाने मेला तर? कुबट वास येईल."
"नाही तो पळून जाईल. आणि मेला तर कॉलेजला कळवेन. ते करतात व्यवस्था पुढची."

दिवस तिसरा:
"तो मेला, मेला, मी मारला..." इथून पुढे वर लिहिलेलं सारं काही झालं. आता प्रत्यक्ष रणभूमीवर.
"अगं, घरी आलो तर वाट बघत असल्यासारखा दारात होता. याचा अर्थ ते भोक बुजवलं तेव्हा तो आतच होता. त्याला बाहेर पडताच आलं नाही."
"तुझी वाट बघत होता. नमस्कार, चमत्कार झाले की नाही?"
"झाले. मी जोरात किंचाळलो, तो घाबरुन लपून बसला. आम्ही एकमेकांशी असेच बोलतो."
"आला की नाही बाहेर?"
"टायलरच्या टॉवेलखाली लपला. तो पण हुशार. बाहेर आलं की आत्मबलिदान हे ठाऊक होतंच त्याला. १५ मिनिटं आम्ही तसेच एकमेकांच्या समोर. अगदी, मारेन किंवा मरेन असंच ठरवलं होतं मी पण."
"बापरे, पण उंदरानेच तुला मारलं असतं तर?" माझ्या विनोदाकडे, सांगितलेल्या कामाकडे दुर्लक्ष करतो त्याप्रमाणे करत तो म्हणाला.
"आईऽऽ ऐक पुढे. मी हातमोजे चढवले, बुरखा घातला. हातात झाडू होतीच."
"हे सगळं कशासाठी?"
"त्याला मारताना तो अंगावर चाल करुन आला तर? मला त्याचा स्पर्श नको व्हायला ना." उंदराबरोबरच्या लढाईची तयारी जय्यत होती.
"तो टायलरच्या टॉवेलच्या वासानेच अर्धमेला झाला बहुतेक. पडला एकदाचा बाहेर. हाणलं त्याला. पळाला. पुन्हा हाणलं. आणि मेला, मेला एकदाचा. अखेर मारलं मी त्याला." उंदराबरोबरची लढाई चिरंजीव जिंकले होते.
"तो धारातीर्थी पडलेला उंदीर कुठे आहे आता?"
"का? फोटो काढून पाठवू? मग तू फेसबुकवर टाकणार असशील."
"हॅ, काहीतरीच काय?" मी म्हणायचं म्हणून म्हटलं पण कल्पना काही वाईट नव्हती.
"त्याचे अंत्यसंस्कार करणार आहे मी."
"म्हणजे नक्की काय?"
"त्याला टायलरच्या टॉवेलमध्ये गुंडाळणार. पांढरं कापड मिळालंच ना अनायसे. नंतर बाहेर नेऊन कचर्‍याच्या पेटीत त्याला विसावा देणार. त्याचं अंतिम विसाव्याचं स्थान."
"शाब्बास चिरंजीव. असेच पराक्रम गाजवत रहा."
"चल, ३ दिवस झोपलो नव्हतो उंदराच्या भितीने. आता Thanksgiving च्या सुट्टीबद्दल परमेश्वराचे आभार मानतो आणि २ दिवसांनी उठतो." चिरंजीवानी फोन ठेवला. सुट्टीतल्या करमणुकीबद्दल मीही चिरंजीवाचे आभार मानले आणि दिनक्रमाला सुरुवात केली.

Monday, October 13, 2014

चाळीशीतला साक्षात्कार :-)

चाळीशी उंबरठ्यावर (आहेत कुठे आता उंबरठे?) आली तेव्हा ’धडधड’ वाढली होती. तिथपर्यंत पोचणार्‍याला खरं तर स्वत:ला जाणीवच नसते पण आजूबाजूची तुम्हाला ते जाणवून देण्यात फार तत्पर असतात. पण आता कळतंय ही चाळीशी किती लाभदायक असते. खालील फायदे तुम्हीही घेतले असतील किंवा इतर फायदे असतील तर लिहायला विसरु नका. वाटचाल तिथपर्यंत व्हायची असेल तर फायद्याची नोंद घ्या 
• हल्ली अगदी विसरायलाच होतं बाई हा महामंत्र जपत कितीतरी कामं टाळता येतात.
• आज बाहेरच जायचं का जेवायला? जळ्ळी मेली ती चाळीशी, जीव अगदी नकोसा केलाय असं वारंवार म्हणता येतं.
• कोणता ना कोणता अवयव सतत दुखता ठेवून उंटावरुन शेळ्या हाकता येतात. सोफ्यावर बसल्या बसल्या घरातली सर्वजण मुकाट कामं करतायत (त्यांची कारणं वेगळी असतात) हे पहाण्यासाठी चाळीशीच गाठावी लागते.
• फडताळाचं (पॅन्ट्री) दार उघडलं की तिथपर्यंत का पोचलो ते आठवत नाही त्यामुळे आतल्या काहीतरी स्वादिष्ट वस्तूवर तिथेच ताव मारत आधीचं काम विसरुन जाता येतं.
• चिडचिड, थकवा, वैताग, सगळं पोरं आणि नवर्‍यावर काढून झालं की आरामात म्हणता येतं बहुतेक मेनोपॉज सुरु होण्याची लक्षणं. हे सगळं घरातली नेहमी, ’विनाकारण’ करत असते असं म्हणतात, त्याला काहीतरी ’नाव’ दिल्याचा आनंद उपभोगता येतो.
• टी. व्ही. चं रिमोट, बेकींग इन्स्ट्रक्शन, पदार्थांमधले घटक ज्या काही ’बारीक’ अक्षरात लिहलेल्या गोष्टी वाचून करायच्या असतात त्या बिनदिक्कत दुसर्‍यावर चष्मा सापडत नाही म्हणून घालता येतात.

आणि जेव्हा सर्व व्यवस्थित असतं तेव्हा, माझी चाळीशी झाली तरी करतेय, नाहीतर तुमचं साठीला आल्यासारखं सुरु असतं असं खिजवताही येतं...

Thursday, April 24, 2014

हुश्शऽऽऽ पार पडल्या एकांकिका!

हुश्शऽऽऽ पार पडल्या एकांकिका आमच्या. मस्त झाल्या. गेले ४ महिने सराव, सराव, सराव..., नेपथ्य, संगीत नियोजन, प्रेक्षागृह आरक्षण, तिकिट विक्री, जाहिरात एक ना अनेक कामांची न संपणारी यादी.... अभिनय आणि दिग्दर्शन याची हौस हेच एकमेव कारण या सगळ्या धडपडीचं. माझ्याबरोबरीने नवराही दरवर्षी शिकला आहे  यात ’उडी’ मारायला. या प्रवासात असे अनुभव येत रहातात की कधीकधी  प्रश्न पडतो का करतो हे सारं? पण रंगमंचावर गेलं, कार्यक्रम यशस्वी झाला की सारे प्रश्न, अनुभव, अडचणी यावर मात करते ही नशा आणि पुढच्या बेतांचं नियोजन सुरु होतं.

मागे वळून पहाताना जाणवतं, या निमित्ताने ’माणसं’ कळतात, अगदी खर्‍या अर्थाने. आपल्याला कळलेली ’माणसं’ अशी वागू शकतात याचे धक्के बसतात तर कधी अनपेक्षितपणे सामोरा आलेला माणसातला चांगुलपणा भारावून टाकतो.

आम्ही चार महिने सगळे शनिवार, रविवार पूर्णपणे एकांकिकेसाठी मोकळे ठेवतो. कलाकारांना वेळ, तारखा सर्व आधीच कळवून, हे सगळं जमणार असेल तरच काम करायचा विचार करा असंही सुरुवातीलाच सांगितलेलं असतं. तरीही...

कलाकारांनी स्वत:ला विसरुन व्यक्तिरेखेला न्याय द्यावा, पण तसं होतं नाही. मला हे जमणार नाही, शोभणार नाही असा ’मी’ पणा येतो तेव्हा वाटतं...लेखकाची वाक्य परस्पर बदलून टाकणं, नवीन घुसवणं हे तर इतक्या सहज करतात ना सगळी.

दिग्दर्शन करताना आमची एक अट तसं म्हटलं तर जाचक पण शिस्त पाळायची तर आवश्यक. ती म्हणजे वेळ पाळणं. ठरल्या वेळेला सराव सुरु करायचा आणि दिलेल्या वेळेला संपवायचा. एखादा कलाकार उशीरा आला तर त्याचा त्यादिवशीचा तिथपर्यतचा भाग गेला. ब‍र्‍याचदा वाईटपणा येतोच आमच्या वाट्याला या नियमाबद्दल. मजेची गोष्ट म्हणजे, लवकर येणारे उशीरा येणार्‍यांबद्दल तक्रार करतात पण ती तणतण फक्त आमच्यासमोर. उशीरा येणार्‍यांना प्रत्यक्ष सांगायला कुणी धजावत नाही, वाईटपणा नको म्हणून. तिथे आम्ही असतोच :-) . पण  वेळ पाळणं  जमायला हवं हे ’माणसांना’ कधी समजणार?

भारतात काम करताना कलावंतही खूप आणि संस्थाही खूप, कशाचीच वानवा नसते. पण परदेशात जे हाती येतं त्याच्यांबरोवर काम करावं लागतं. फार कमीजणांना खर्‍या अर्थी ’अभिनय’ करण्याचा अनुभव असतो. इथे आल्यावर अचानक त्यांना आपल्यातली ’कला’ जाणवलेली असते, अधूनमधून देवळातल्या रंगमंचावर केलेलं काम, इतक्या अनुभवावरुन, चला रंगमचांवर वावरायची तर भिती नाही ना, मग करु आपण तयार असा दृष्टीकोन ठेवून आम्ही त्यांच्याबरोबर काम करायला सुरुवात करतो. पण त्यांचा तो तेवढाही अनुभव त्यांच्यादृष्टीने ’रग्गड’ असतो, त्या आत्मविश्वासामुळे  अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागते.

तरीही दरवर्षी रंगदेवतेच्या आशीर्वादाने सारं छान पार पडलं की जो आनंद होतो तो अवर्णनीय.

खालच्या दुव्यावर फोटो पहायला विसरु नका. लवकरच व्ही. डी. ओ. क्लिप्स टाकेन.

http://marathiekankika.wordpress.com/




Monday, August 19, 2013

शिर्षकाविना :(

माझ्या मुलाच्या मित्राच्या मैत्रीणीला (Roommate)  भारतात आलेल्या अनुभवाबद्दलचा हा दुवा. त्याचा मित्र त्याला याबद्दल काय वाटतं असं विचारत होता.

वाचल्यावर आधी लाज वाटली, राग आला, आणि मग नुसत्याच आठवणी. शाळा, महाविद्यालय, रस्ते, लोकल, गर्दी  अशा ठीकाणी पचवलेलं सारं आजूबाजूला उभं राहिलं. डोळे मारणं, धक्के देणं, ओठांवरुन जीभ फिरवणं, सहेतूक स्पर्श...  आपलंच तर काही चुकत नाही ना या जाणीवेने त्याबद्दल काही न बोलता मनातच दाबून ठेवलेलं सारं आठवलं.

आपण संस्कारांना महत्त्व देतो. मग अशावेळी हे संस्कार जातात कुठे? की ही सगळी अशिक्षित असं करणारी? पण तसं म्हटलं तर संस्कार आणि सुशिक्षितपणाचं नातं आहे का? नसावं, कारण चांगल्या, चांगल्या घरातल्या, सुशिक्षित मुलाचं, लोकाचं हे असं वागणं असतं. मग हा नक्की कशाचा परिणाम आहे? कसं बदलायचं हे सारं?

Tuesday, June 11, 2013

प्रश्न आणि प्रश्न!

"आता तू कधी येणार भारतात?" भारतात परत जाण्यासाठी निघताना बहिणीने विचारलं
"पाहू, तशी ओढ नाही राहिली आता. आई, भाऊच (वडिल) नाहीत ना." दोघींही एकमेकींच्या भावना समजल्यासारख्या गप्प झालो. उगीचच, आपण बहिणी आहोतच एकमेकींना असलं काही  ती म्हणाली नाही किंवा आता तुम्ही दोघी बहिणी आहात, तुमच्यासाठी येईन असं मी तोंडदेखलं म्हटलं नाही. आई वडिल गेले की इतकं पोरकेपण येतं हे ते गेल्यानंतरच कळावं यासारखं माणसाचं दुर्देव नाही हेच खरं.

बहीणीने विचारला तोच प्रश्न तसा खूप जणं फोनवर विचारतात, आम्ही आहोत ना चा दिलासा देतात. मावश्या, काका, मावस, आते भावडं सगळेच. आई वडिलांनी सगळी नाती जपली, त्याचांच वारसा आम्ही राखला याचा कोण अभिमान आम्हाला. आणि तरीही भारतात केव्हा येणार म्हटलं की ती दोघं नाहीत म्हणून जाऊच नये असं वाटतं तेव्हा दाटून येतो उदासपणा, नैराश्य.

भारताची वारी करुन एखादं वर्ष झालं की पुन्हा तिकडे जायचे वेध लागायचे यापूर्वी. शेवटी भारत मायभूमी आहे, सगळे तिकडेच तर आहेत, इतक्या वर्षानंतर सासर, माहेर असं वेगळं उरतच नाही. हे जे सगळं म्हटलेलं, वाटलेलं, अनुभवलेलं.... विरुन गेलं क्षणात? कुठे गेल्या या भावना का त्या खर्‍या नव्हत्याच? खरंच एखाद्या गोष्टीचं समीकरण बदलून जातं असं कायमचं?

प्रश्न आणि प्रश्न!

Tuesday, April 16, 2013

सांत्वन

मैत्रिणीची आई अचानक गेली.  शब्दांनी सांत्वन होत नाही,  जिवलग परत येत नाही हे खरं असलं तरी आठवणीने फोन केला की त्या व्यक्तीला बरं वाटतं या भावनेने तिला फोन केला. पुन्हा ती भारतात मी अमेरिकेत त्यामुळे इतक्या लांबून मुद्दाम फोन केला यानेच तिला गहिवरून आलं.  म्हटलं,
"अगं करायलाच हवा. किती हक्काने ये जा असायची आमची तुमच्या घरात. काकूंचा हसरा, शांत चेहरा, चविष्ट पदार्थ सगळं अजून ताजं आहे मनात. खूप माणसं जोडली तुझ्या आई बाबांनी. नातेवाइकाचंही येणं जाणं असायचं सारखं तुमच्याकडे. सगळे आले असतील ना?"
तिच्या स्वरात कडवटपणा आला.
"आले गं सगळे. पण कशासाठी हाच प्रश्न पडला."
"म्हणजे?" मला काय बोलावं कळेना.
"अगं कोकणात आले होते ना सगळे. कुणाला तयार सांदणं घ्यायची होती, कुणाला कुळथाचं पीठ,  भाजाणी, कुणीतरी कुणालातरी कितीतरी वर्षांनी भेटलं होतं त्यामुळे गप्पा झोडायच्या होत्या. तिथेच कुणालातरी शिवणाचे नमुने हवे होते. सगळं आमच्यासमोर. आईला जाऊन फक्त काही दिवस झालेले असताना. आम्हाला काय वाटेल हा विचार कुणाच्याच मनात डोकावला नसेल का गं?"

तिने मलाच प्रश्न विचारला. उत्तर नव्हतंच. फार विचार करू नकोस म्हटलं आणि फोन ठेवला. खूप रडले. कळत नव्हतं की मी कशासाठी रडते आहे. काकूंच्या जाण्याच्या दु:खाने, माणसातल्या हरवलेल्या संवेदनशीलतेच्या दर्शनाने की हे असंच चालायचं या कल्पनेने, मनाला आलेल्या हतबलतेने! 



माझ्या चविष्ट जगाला भेट द्यायला विसरु नका.


Tuesday, February 19, 2013

आकाशवाणी

काही वर्षापूर्वी, रत्नागिरीला गेले तेव्हा आवर्जून आकाशवाणीत गेले. सगळ्यांची भेट होईल, जिथे काम केलं ती जागा  पुन्हा पहावी, ’ऑन एअर’ चा लाल दिवा डोळ्यात साठवावा, गप्पा झाडायचो त्या भोजनालयात जाऊन पुन्हा हसावं खिदळावं असं काही बाही मनात होतं. पण अवकळा पसरलेलं ते केंद्र विषादाचा चरा उमटवून गेलं मनावर. मी काम करत असतानाची सगळी जणं कामाच्या वेळा वेगळ्या असल्याने ठरवूनही तिथे एकत्र भेटणं कठीणच होतं.  जिथे हक्काने ’आवाज’ फुटायचा तिथे मनातल्या भावना शब्दाने व्यक्त कराव्याशा वाटल्याच नाहीत.  सरकारी आकाशवाणी केंद्रांची अवस्था आता कशी आहे याची कल्पना नाही, पण सात आठ वर्षापूर्वी फार बिकट होती.
परतीच्या मार्गावर ’आकाशवाणी’ मनात पिंगा घालत राहिलं. पार शाळेच्या उंबरठ्यापाशी घेऊन गेलं.

रात्री साडेनऊला लागणारं कॉफीहाऊस, प्रपंच मालिका, सकाळी सात, दुपारी दिड, संध्याकाळी सात आणि रात्री आठ वाजता लागणार्‍या प्रादेशिक आणि राष्ट्रीय बातम्या.
कॉफी हाऊसमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे, विजय कदम आणि भाग्यश्री जोशी. हसत खेळत युवावर्गांच्या गप्पागोष्टी असायच्या ह्या. प्रपंच मध्ये प्रभाकर पंत, मीना वहिनी आणि टेकाडे भावजी. त्यातल्या मीना वहिनी म्हणजे नीलम प्रभु (करुणा देव), आवाज आणि उच्चारांचा त्यांच्या इतका प्रभावी वापर केलेलं कुणी पाहिलं नाही मी अद्यापपर्यंत.  त्यांनी केलेल्या  एका श्रुतिकेतील मुलगी, मध्यमवयीन आणि वृद्ध स्त्रीचे आवाज ऐकून मला कितीतरी दिवस दुसरी नीलम प्रभु व्हायचं होतं :-).

जुन्या आठवणींबरोबर आकाशवाणीत काम करत असतानाचेही दिवस पिंगा घालत राहिले. ज्या जगाचं आकर्षण होतं त्या जगात डोकावयला मिळालं. काम करायला मिळालं. सुरुवातीला आकर्षण होतं ते आकाशवाणीची गाडी पहाटेच्या कामाच्या वेळेला न्यायला घरी येते त्याचं. कुण्णीतरी अगदी मोठ्ठं झाल्यासारखं वाटायचं गाडीत बसताना. आकाशवाणीत पोचलं की कार्यक्रम काय काय आहेत ते पहायचे, पटापट निवेदन लिहायचं आणि कार्येक्रमाचं सारं सामान घेऊन स्टुडिओत. खाक खुक करुन आवाज नीट आहे ना हे पाहिलं की पहिल्या कार्यक्रमाची तबकडी घालून ठेवायची. आणि मग ’ऑन एअर’ चा लाल दिवा कधी लागतोय त्याकडे नजर ठेवून बसायचं. एकदा का तो दिवा लागला की आपले आपण, म्हणजे  काही गोंधळ होईपर्यंत. तसा तो व्हायचाही अनेकदा. आवाजात चढ उतार आणत सगळं काही बोलून झालं की अचानक गडबडीने तंत्रज्ञ आत घुसायचे. बटनं चुकीची दाबल्यामुळे किंवा न दाबताच बोलल्याने श्रोत्यांनी काहीही ऐकलेलं नसायचं. मग, माफ कराही अशा झोकात यायचं की काही तरी फार मोठं श्रोत्यांना सांगतोय असा आव यायचा त्यात.

निवेदकांमध्ये आपापसात स्पर्धा असायची ती सूर मनी रंगती आणि आपली निवड हा संगीताचा कार्यक्रम सादर करताना. अस्सं काही निवेदन असायचं ना प्रत्येकाचं. एकतर श्रोत्यांकडून वाहवा मिळावी हा हेतू आणि कार्येक्रम अधिकार्‍यांकडून मिळणारी श्रेणीही महत्तवाची.
एक आठवण कायमची मनात रुतली आहे. गाणं होतं, ती गेली तेव्हा.... दोन ओळी ऐकून पूर्ण गाणं काय आहे याचा अंदाज घ्यायचा आणि निवेदन लिहायचं. ती गेली तेव्हा पाऊस निनादत होता.... या गाण्याला माझं निवेदन होतं ते प्रेयसी प्रियकराला भेटून निघाली आहे अशा अर्थीचं. वयाच्या २१, २२ वीशीचा हा परिणाम. निवेदन संपलं, गाणं सुरु झालं. आणि हातापायातलं त्राणंच गेलं. ती आई होती म्हणूनी.... ऐकलं आणि काय गोंधळ केला आहे ते लक्षात आलं. कहर म्हणजे, एकाच गाण्याकडे निवेदक किती वेगळ्या दृष्टीने बघू शकतो याचं श्रोत्यांना कौतुक वाटलं होतं.

आकाशवाणी रत्नागिरीहून मुंबईला गेले. कामावर हजर होण्यापूर्वी साहेबांची भेट घ्यावी म्हणून त्यांच्या खोलीत गेले. टेबलाची रचना विचित्र होती की माझा गोंधळ उडाला होता कुणास ठाऊक. खोलीत कुणीच नव्हतं. मी एका खुर्चीवर बसले. थोड्यावेळाने साहेब आले. मी उठून उभी राहिले आणि हात जोडून नमस्कार केला. पुन्हा बसले. ते आपले उभेच. काहीतरी चुकतय असं वाटत होतं पण काय ते कळत नव्हतं. काही वेळ असं बोलणं झालं आणि मी म्हटलं,
"सर, तुम्ही बसा ना." ते म्हणाले,
"तुम्ही माझ्या खुर्चीवर बसला आहात."
"ऑ?" विजेचा धक्का बसल्यासारखी उठले. मुंबई आकाशवाणीची सलामीची भेट झडली ती अशी.

एकदा कोणतातरी कार्येक्रम ध्वनिमुद्रित केला होता. चुकून त्यावर आणखी एक कार्यक्रम टेप केला. मग पुन्हा त्या कलाकारांना बोलवून ध्वनिमुद्रण, मुंबईसारख्या ठीकाणी पुन्हा सर्वांना एकत्र आणण्यासाठी केलेली शाब्दीक कसरत अजूनही आठवते.

एक ना अनेक प्रसंग काही हसवणारे, महान कलाकारांची भेट झाल्याचा आनंद मिळवून देणारे, काही हातपाय गाळणारे तरीही सगळे मंतरलेले...


(इंद्रधनु - तुझ्या पोस्टमुळे या आठवणींना उजाळा मिळाला. धन्यवाद.)

Tuesday, February 12, 2013

माझंही मत...

मुलाबरोबर दिल्लीच्या ’त्या’ घटनेबद्दल बोलत होते. तो एक वर्षाचा असल्यापासून आम्ही भारताबाहेर आहोत त्यामुळे म्हटलं तर तो अभारतीयच पण मुळ भारतीय असल्याचा अभिमान बाळगत तो भारत कसा बदलायला हवा या गुंगीत खूपवेळा असतो. जी वेडी स्वप्न १७ वर्षाचे असताना आम्ही पाहिली तेच आता त्याचं वय, त्यामुळे तोही तेच करतो आहे हे कळतं तरी थोडी वादावादी, तू भारतात रहात नाहीस, तुला तिथली परिस्थिती माहित नाही वगैरे आल्यावर तो म्हणाला,
"तो तुझा देश आहे तसा माझाही."
"अरे पण आम्ही जन्मलो, वाढलो तिथेच. पंचवीशीनंतर पडलो बाहेर."
"पण मी भारताबद्दल बराच अभ्यास केला आहे. तिथल्या चालू घडामोडी माहित असतात मला."
या चर्चेतून तो म्हणाला,
"ठीक आहे. मला काय वाटतं ते मी माझ्या ब्लॉगवरच लिहतो."
"बरं" म्हणून तो विषय संपला.

त्यानंतर कधीतरी त्याच्या मनातले विचार इथे उमटले. त्याने लिहलेली ही पोस्ट, इंग्लिशमध्ये. वाचून आपली मतं त्याच्याच ब्लॉगवर नोदवलीत तर आनंद होईल.

हा त्याच्या ब्लॉगचा दुवा - http://www.chicagoindy.com/2013/01/thoughts-on-2012-delhi-gang-rape.html

तसंच कुणाला ठाऊक आहे का इंग्लिश ब्लॉग कुठे जोडता येतात जसे आपण मराठी जोडले आहेत तसे?

Tuesday, January 22, 2013

मुलांना घरातील कामाचे पैसे...?

सगळ्या मैत्रींणी जमलो होतो. मुलांवरुन बोलताना एकजण म्हणाली,
"मी मुलांना प्रत्येक कामाचे पैसे देते. थोड्या पैशात किती कामं होतात."
"म्हणजे किती आणि कोणती कामं?" माझं कुतुहुल जागृत झालं.
"डिशवॉशरमधली भांडी लावली की ५० सेंट, केर नेऊन टाकला की २५ सेंट, स्वत:ची खोली आवरली की ७५सेंट अशी छोटी छोटी किती कामं असतात  घरात."
पहिला विचार मनात तरळला तो सुट्टे पैसे खूप ठेवायला लागत असतील मग :-) हा. नंतर हेवा वाटला तो स्वत:ची खोली आवरल्याबद्दल पैसे मिळतात  पठ्ठ्यांना याचा आणि  शेवटी प्रश्न पडला की त्या पैशाचं तिसरी चौथीतली ही मुलं करणार काय? एकदा का पैसे हातात आले की त्यांना काय पाहिजे ते घेणासाठी ती हट्ट करणारंच. त्यावर ती म्हणाली.
"हो ना, दुकानात गेलो की  गोळ्या, नाहीतर बबलगम घेतात मुलं त्या पैशातून."
"कष्ट करुन मिळवलेल्या पैशांनी हे घ्यायचं म्हणजे तू चुकीची सवय लावतेयस असं नाही वाटत?"
"नाही. गोळ्या, बबलगम रोज खाणं बरोबर नाही हे तर माहितच आहे त्यांना. हळूहळू पैसे अशा गोष्टींवर खर्च करु नयेत हे ही कळेल."
"मग ती पण तुला पैसे देतात?"
"कसले?"
"तू जेवण करतेस रोज त्याच्यांसाठी, शाळेसाठी डबा देतेस, गाडीने इकडे तिकडे नेतेस.... खूप मोठी यादी होईल."

 मैत्रीणीचं म्हणणं आपली कामं होत असतील तर या गोष्टीचा बाऊ करण्यात अर्थ नाही. पैसे देऊन आपण त्यांना स्वावलंबन शिकवतो, ते कसे वापरायला हवेत याचं शिक्षण देतो.

माझं म्हणणं, ही जी कामं आहेत ती मुलांनी घर त्याचंही आहे या भावनेतूनच, स्वत:ची कामं स्वत:च करायला हवीत या जाणीवेतून किंवा आई, बाबांना मदत म्हणून करायला हवीत, पैसे मिळतात म्हणून नाही. आणि ती भावना पालक म्हणून आपणच त्यांच्या मनात रुजवली पाहिजे. तुम्हाला काय वाटतं?

Monday, January 14, 2013

फेसबुक हे असं...

फॅमिली डॉक्टरकडे गेले होते,  सगळ्या फॅमिलीला घेऊन. निघताना, गाव सोडतोय म्हटल्यावर डॉक्टर म्हणाल्या,
"कीप इन टच"
"तुम्ही फेसबुकवर आहात का?" संपर्कात रहायचं तर तेच प्रभावी साधन आहे  हा त्यामागे माझा विचार.
डाव्या, उजव्या हाताला असलेल्या दोन्ही मुलांच्या रागीट्ट नजरा टाळण्यासाठी डॉक्टरांवर दृष्टी केंद्रीत केली. नाही म्हणजे मुलीने  एकदा विचारलं होतं,
"आई, तू ऑफिसचं काम फेसबुकवर करतेस का?" आणि नवरा, मुलाचं  ठाम मत आहे की फेसबुकचं व्यसन आहे मला.
तर डॉक्टरांनी फेसबुक म्हणजे निव्वळ वेळखाऊ, रिकामटेकड्यासाठी कसं आहे ते सांगायला सुरुवात केली. मी आपलं,
या, या...राईट....यस, यस....पण आम्ही पण कामधंदे करुनच फेसबुक वापरतो, किंवा ते करता करता वापरतो....असे अस्फुट उदगार काढत किल्ला लढवायचा प्रयत्न केला. तो त्यांच्या आवाजापुढे, ठाम मतांपुढे पडला.

पण खरंच फेसबुक हे आयुर्विम्याला जसा पूर्वी पर्याय नव्हता तसंच आहे की नाही? जगातल्या सगळ्या बातम्या फेसबुकवर वाचता येतात. वर्तमानपत्रं त्यापुढे किस झाड की पत्ती. बातम्या वाचून कोपरखळ्याही मारता येतात. आवडलं आवडलं करत शेजार्‍या पाजार्‍यांच्या घरात घुसता येतं, त्यांच्या जगात, त्यांना आवडलेल्या कुणाच्याही घरात डोकावता येतं, म्हणजे परदेशात रहाताना भारतातला जो ’जिवंतपणा’ आपण ’मिस’ करत असतो तो बसल्या जागी एका उंदराच्या साथीने अनुभवता येतो. लोक एखादंच असं वाक्य टाकतात ’पोस्ट’ म्हणून की लहानपणी कोडं सोडवायला सरसावयचो तसं काय म्हणायचं असेल बरं या पोस्टमधून असं म्हणत कोडं सोडवण्याची मज्जा अनुभवता येते. राजकिय मतभेद वाचून  इतकी करमणूक होते की आपलं मत काय होतं तेच विसरायला होतं. आजारी पडलेल्याला हमखास उपाय सुचवता येतात, पाककृत्या कळतात.  कोण कुणाकडे कुणाबरोबर कधी गेलं होतं त्याचा सुगावा लागतो. एक ना अनेक किती गुण गावेत या फेसबुकचे?

थोडक्यात डोक्याला खूप खुराक देतं हे फेसबुक. आपलं व्यक्तिमत्वं अगदी चतुरस्त्र होऊन जातं...
फेसबुक हे असं, पूर्वी आयुर्विम्याला पर्याय नव्हता तसं...

Friday, January 4, 2013

सीमारेषा

महाविद्यालयीन जीवनाबद्दल गोष्टी चालल्या होत्या लेकाशी. त्याचं हे पहिलं वर्ष आमच्यापासून दूर रहाण्याचं.
"मुलं दारु, सिगरेट पितात/ओढतात का तिकडे?" दोन तीन महिने मनात असलेला प्रश्न चाचपडल्यासारखा बाहेर आला. तो हसला अवघडल्यासारखा. पुढच्या प्रश्नाची कल्पना त्याला आधीच आली असावी.
"हो."
"सर्रास?"
"ते मला नाही माहित."
"हं"
" मी पण असतो का त्यात असं विचारायचं आहे ना तुला? मग विचार ना तेच."
मी हसून म्हटलं,
"एकदम तुझा पारा चढायला नको ना म्हणून साधारण चित्र काय आहे ते विचारावं असं वाटलं."
"क्वचित. म्हणजे एक दोनदा थोडीशी घेऊन बघितली आहे."
माझा चेहरा पाहण्यासारखा झाला.
"सिगरेट?" न रहावून विचारलंच
"अजिबात नाही."
माझी चुळबुळ, अस्वस्थपणा वाढला असावा.
"आई, मी प्रामाणिकपणे सांगतोय. सगळीच मुलं करतात हे पण आई वडिलांना खरं सांगत नाहीत."
"अच्छा" म्हणून मी ते संभाषण संपवलं.

एक दोन दिवस अस्वस्थतेत गेले. हे चांगलं नाही वगैरे उपदेश कसा करायचा किंवा करायचा की नाही या विचारात.
"मला एक समजत नाही की तुम्ही पालक दारु पिऊ नका, लग्नाशिवाय शारिरिक संबंध येता कामा नयेत असा धोशा लावता पण मुलांना मोह टाळता आलाच नाही तर त्यांनी काय करायचं ते सांगत नाही."
"म्हणजे?"
"पिण्याचे परिणाम काय काय होऊ शकतात, एकावेळी कमीत कमी म्हणजे नक्की किती घ्यावी, सवयीचं व्यसनात रुपांतर कसं होऊ शकतं, ते झालं तर त्याचे शरिरावर होणारे परिणाम. किंवा गाडी चालवू नका, जो गाडी चालवणार असेल तो दारु पिणार नाही याची दक्षता घ्या, शारिरिक संबंधाबद्दल काळजी घेतली नाही तर काय होऊ शकतं. त्यातून निर्माण होणारे रोग अशा कितीतरी गोष्टी तुम्ही सांगत नाही. आम्हाला महाविद्यालयात ही माहिती देण्यासाठी खास तास आणि परिक्षा असते."
मी फक्त ऐकत होते. महाविद्यालयांची जागरुकता आवडली याबाबतची.
"तू काळजी करु नकोस. मला हे असं करायला वेळच मिळत नाही."
"तू म्हणतोस ते खरं आहे. पण तू आत्ता सांगितलंस तसं करणं म्हणजे पालकांना, आपण अशी माहिती देऊन मुलांना उत्तेजन तर देत नाही ना असंही वाटतं."
"पण नुसतं दारु पिऊ नका, मादक पदार्थांच्या आहारी जाऊ नका असं सांगून तरी काय उपयोग? का ते माहित असलं की मुलं जास्त विचार करतील ना या गोष्टी करताना?"

मी काही बोलले नाही. मुलांशी बोलताना मित्रमैत्रीण व्हावं पण त्याचवेळी पालक म्हणून त्यांनी आपल्याला आदर दाखवावा ही जी आपली अपेक्षा असते त्यातली सीमारेषा इतकी धुसर आहे की ती केव्हाही भंग पावेल असं वाटतं खूपवेळा.

Friday, December 14, 2012

काय चाललं आहे हे...

एका तरुण मुलाची आई त्याच्या बंदुकीच्या गोळीला बळी पडते. तिथून तो ती ज्या शाळेत शिकवत असते त्या प्राथमिक शाळेत जातो. आईच्या वर्गातले चिमुकले जीव बंदुकीच्या गोळीने टिपतो. कोण विचारणार जाब या कृत्याचा? आणि कुणाला? जाब विचारायला तो मुलगाही या जगात नाही, त्याची आईही. आता आम्ही फक्त चर्चा करायच्या यव करायला हवं आणि त्यव करायला हवं....

असं काही झालं की आठवतं ते १९९९ मधील लिटलटन कोलोरॅडो येथील घटना. दोन विद्यार्थ्यांमुळे जीवाला मुकलेली माध्यमिक शाळेतील १२ मुलं. २००७ साली तरुण माथेफिरुच्या गोळ्यांना बळी पडलेली व्हर्जिनिया टेकमधील ३२ तरुण मुलं आणि अशाच घटना एकामागून एक, अनेक.  त्यानंतर त्याची कारणमीमांसा शोधली जाते, उपाय शोधले जातात, काही काही प्रत्यक्षात राबवले जातात आणि मग पुन्हा हे असं.....कधी थांबणार आणि कसं?

या जगाचा, जग न बघताच निरोप घेतलेल्या त्या चिमुरड्यांच्या आई वडिलांच्या दु:खाच्या कल्पनेने जीव कालवतो, डोळे आसवांनी चिंब होतात. त्यांना देव हे दु:ख झेलण्याचं सामर्थ्यं देवो हीच प्रार्थना!


http://www.washingtonpost.com/