Sunday, June 23, 2013

बस थांबा

"आई, पट्टा काढू?"
"काढ."
"पण पोलिस आला तर?"
"मग नको काढू."
"पण मला काढायचा आहे."
"कर बाई तुला काय करायचं असेल ते." नेहमीप्रमाणे संभाषणाच अंत.
मी गाडी बसथांब्याजवळच्या सायकल लेनमध्ये थांबवली होती. बसथांब्यावरुन लेकाला आणायचं होतं. जवळपास गाडी थांबवायला जागा नव्हती त्यामुळे हा पर्याय. पण खात्री नव्हती असं थांबवणं कायदेशीर आहे की नाही, तितक्यात.
"आई, पण पोलिसानी पकडलं तर?"  लेक पट्ट्याबद्दल विचार करत होती, मी चुकीच्या जागी  गाडी थांबवली आहे त्याचा.
"बघू. खोटं बोलावं लागेल."
"पण तसं करायचं नसतं, खरं सांगितलं तर  देतील तुला सोडून. तू मला तसंच सांगतेस ना की खरं सांग, मी ओरडणार नाही."
वास्तवात आयुष्य इतकं सरळ नाही वगैरे सांगत बसले असते तर दोन तासांची निश्चिंती. पुन्हा लेकीसमोर नाईलाजाने का होईना पण कधी कधी खोटं का बोलावं लागतं याचे धडे देणं म्हणजे जरा अतिच. तरीही घोडं दामटवत म्हटलं,
"ते नंतर बोलू. फक्त वेळ आलीच तर त्याच्यांसमोर तू खोटं का सांगते आहेस असं म्हणू नकोस."

नाराजीने तिने हुंकार भरला. या सगळ्या यातायातीपेक्षा कुठेतरी लांबवर नेऊन थांबवावी असा विचार करते आहे तोच बाजूला गाडी उभी राहिली. कोण थांबलं अगदी असं चिकटून म्हणून पहाते तोच गाडीवर रंगीबेरंगी दिवे चमकायला लागले आणि माझ्या डोळ्यांसमोर काजवे. आता दोनसे अडिचशे डॉलर्सचा भुर्दंड, घरी नवरा त्याला पोलिसांनी गाठल्यावर मी केलेल्या सरबत्तीचा सूड घेणार, मुलगी, तरी आईला मी म्हणतच होते.... सुरु करणार आणि मी, त्यावेळेस काय केलं असतं तर बरं झालं असतं असं म्हणत सगळ्यांची डोकी काही दिवस खाणार.  सगळ्या विचारांनी एकाच वेळी डोक्यात गर्दी केली. खरं तर त्या रंगीबेरंगी दिव्यांकडे मस्त पाहत बसावसं वाटतं एरवी, म्हणजे ते दुसर्‍यांचा पाठलाग करत असतात तेव्हा, पण आत्ता नुसते अंगावर धावून येत होते. सगळे विचार मनात खोलवर दडपून खिडकीतून बाजूच्या खिडकीत पाहिलं. चेहर्‍यावरची घाबरगुंडी गॉगलमुळे लपली असावी.
"गाडी बंद पडली आहे का?"
"नाही नाही." काय कारण द्यावं या विचारात मी फक्त एकाचवेळी तोंडाने आणि मानेने नाही नाही करत राहिले.
"मग काय झालं आहे?" पोलिस नावाच्या बागुलबुवांनी शांतपणे विचारलं.
आधी ते दिवे बंद करा ना असं म्हणावसं वाटत होतं. पोटात गोळा आला आहे भितीने असं सांगावसं वाटत होतं त्याऐवजी शब्द   बाहेर पडले,
"पायात एकदम गोळा आला म्हणून थांबले आहे दोन मिनिटं." असं कसं सुचलं अचानक? मला खोटं बोलायला जमलं या आनंदात माझा चेहरा घरातल्यांचा पचका झाल्यावर खुलतो त्यापेक्षा कितीतरीपटीने खुलला. खोटं पचलं तर आणखी तो आणखी खुलणार हे निश्चित, मग कदाचित त्या चमचमत्या दिव्यांपेक्षा माझाच चेहरा चम चम चमकणार... एकदम काळजी वाटली. म्हटलं, मग पायात गोळा आला आहे असं वाटणारच नाही पोलिसमहाशयांना. केविलवाणा चेहरा करत पाय बाहेरुन दिसत नसला तरी हलवून, आई गं, ओ, अं, ऊ...असे वेगवेगळे आवाज काढत कण्हत राहिले. पोलिसांनाही तशी घाई नसावी. शांतपणे  पूर्ण शब्द कधी बाहेर येतात याची वाट पहात ते बसून.
"मी दोन मिनिटं थांबते इथेच."  आता कण्हणं पुरे असं वाटल्यावर चेहर्‍यावर पृथ्वीवरचं सगळं दु:ख एकवटलं.
"बरं बरं. कितीही वेळ थांबा. पायात गोळा ठेवून गाडी चालवू नका."  चमचमणारे दिवे मालवून पोलिस महाशय मार्गाला लागले.

"आई, माझा श्वास थांबला."
"काय?...." थरथरणारे हात, पाय  स्थिर करत घाबरुन मागे बघितलं.
"पोलिस बघून. आणि ते काका तुला घेऊन गेले तर म्हणून."
लेकिचा श्वासच थांबल्याने मी खोटं बोलले ते तिच्या लक्षात आलं नव्हतं. नाहीतर इथे भूमिका उलट्या होऊन अर्धा तास खोटं का बोलू नये ह्याचे धडे आईला लेकिकडून. ते टळलं या विलक्षण आनंदाने मी गाडी भरधाव सोडली.  एखाद्या अतिमहत्वाच्या व्यक्तीला जायला जागा देतात त्याप्रमाणे रस्त्यावर माझी एकट्याचीच गाडी आहे असं वाटत होतं, कसले आवाज नाहीत, आजूबाजूला कुणी नाही. शांतता एकदम. दोनशे डॉलर्स वाचले, खोटं पचलं, लेकिला  खोटं बोलले हे कळलं नाही...  आनंद नुसता मनात उसळी मारत होता.

 घरी पोचले आणि लक्षात आलं. मी लेकाला आणायला तिथे गेले होते. गाडीत तो नव्हताच. पुन्हा गाडी वळवली. परत जाताना मात्र या वेळेला सुटले पण मागच्यावेळेस एकदा (नव्हे दोनदा) पोलिसांनी कसं पकडलंच ते आठवत राहिलं.

Tuesday, June 11, 2013

प्रश्न आणि प्रश्न!

"आता तू कधी येणार भारतात?" भारतात परत जाण्यासाठी निघताना बहिणीने विचारलं
"पाहू, तशी ओढ नाही राहिली आता. आई, भाऊच (वडिल) नाहीत ना." दोघींही एकमेकींच्या भावना समजल्यासारख्या गप्प झालो. उगीचच, आपण बहिणी आहोतच एकमेकींना असलं काही  ती म्हणाली नाही किंवा आता तुम्ही दोघी बहिणी आहात, तुमच्यासाठी येईन असं मी तोंडदेखलं म्हटलं नाही. आई वडिल गेले की इतकं पोरकेपण येतं हे ते गेल्यानंतरच कळावं यासारखं माणसाचं दुर्देव नाही हेच खरं.

बहीणीने विचारला तोच प्रश्न तसा खूप जणं फोनवर विचारतात, आम्ही आहोत ना चा दिलासा देतात. मावश्या, काका, मावस, आते भावडं सगळेच. आई वडिलांनी सगळी नाती जपली, त्याचांच वारसा आम्ही राखला याचा कोण अभिमान आम्हाला. आणि तरीही भारतात केव्हा येणार म्हटलं की ती दोघं नाहीत म्हणून जाऊच नये असं वाटतं तेव्हा दाटून येतो उदासपणा, नैराश्य.

भारताची वारी करुन एखादं वर्ष झालं की पुन्हा तिकडे जायचे वेध लागायचे यापूर्वी. शेवटी भारत मायभूमी आहे, सगळे तिकडेच तर आहेत, इतक्या वर्षानंतर सासर, माहेर असं वेगळं उरतच नाही. हे जे सगळं म्हटलेलं, वाटलेलं, अनुभवलेलं.... विरुन गेलं क्षणात? कुठे गेल्या या भावना का त्या खर्‍या नव्हत्याच? खरंच एखाद्या गोष्टीचं समीकरण बदलून जातं असं कायमचं?

प्रश्न आणि प्रश्न!

Tuesday, April 16, 2013

सांत्वन

मैत्रिणीची आई अचानक गेली.  शब्दांनी सांत्वन होत नाही,  जिवलग परत येत नाही हे खरं असलं तरी आठवणीने फोन केला की त्या व्यक्तीला बरं वाटतं या भावनेने तिला फोन केला. पुन्हा ती भारतात मी अमेरिकेत त्यामुळे इतक्या लांबून मुद्दाम फोन केला यानेच तिला गहिवरून आलं.  म्हटलं,
"अगं करायलाच हवा. किती हक्काने ये जा असायची आमची तुमच्या घरात. काकूंचा हसरा, शांत चेहरा, चविष्ट पदार्थ सगळं अजून ताजं आहे मनात. खूप माणसं जोडली तुझ्या आई बाबांनी. नातेवाइकाचंही येणं जाणं असायचं सारखं तुमच्याकडे. सगळे आले असतील ना?"
तिच्या स्वरात कडवटपणा आला.
"आले गं सगळे. पण कशासाठी हाच प्रश्न पडला."
"म्हणजे?" मला काय बोलावं कळेना.
"अगं कोकणात आले होते ना सगळे. कुणाला तयार सांदणं घ्यायची होती, कुणाला कुळथाचं पीठ,  भाजाणी, कुणीतरी कुणालातरी कितीतरी वर्षांनी भेटलं होतं त्यामुळे गप्पा झोडायच्या होत्या. तिथेच कुणालातरी शिवणाचे नमुने हवे होते. सगळं आमच्यासमोर. आईला जाऊन फक्त काही दिवस झालेले असताना. आम्हाला काय वाटेल हा विचार कुणाच्याच मनात डोकावला नसेल का गं?"

तिने मलाच प्रश्न विचारला. उत्तर नव्हतंच. फार विचार करू नकोस म्हटलं आणि फोन ठेवला. खूप रडले. कळत नव्हतं की मी कशासाठी रडते आहे. काकूंच्या जाण्याच्या दु:खाने, माणसातल्या हरवलेल्या संवेदनशीलतेच्या दर्शनाने की हे असंच चालायचं या कल्पनेने, मनाला आलेल्या हतबलतेने! 



माझ्या चविष्ट जगाला भेट द्यायला विसरु नका.


Friday, March 22, 2013

दिवस

"आज आपण रेस्टॉरंट ’डे’ करुया?" माझ्या प्रश्नावर आणि थंड गॅसकडे नजर टाकत घरात वेगवेगळ्या प्रत्तिक्रिया उमटल्या,
मुलगी आनंदाने चित्कारली. मुलाने स्मार्ट फोनवर सगळ्यात महागडं रेस्टॉरंट शोधायला सुरुवात केली. नवरा निर्विकार नजरेने पहात राहिला. नजर निर्विकार असली तरी मन नसतं. त्यामुळे त्या नजरेतला छुपा भाव मला कळलाच.
’कमाल आहे, सरळ सांगावं ना जेवण केलेलं नाही. हे ’डे’ वाढवण्याचं काय खुळ, एकदा सुरु झाला म्हणजे दर आठवड्याला हा ’रेस्टॉरंट डे’ असेल. आधीच भारंभार दिवस लक्षात ठेवावे लागतात.’ त्याच्या मनातले भाव समजल्यासारखं म्हटलं, अरे आज ना ... मासिकाच्या संपादकाचं पत्र आलं आहे,
’दर महिन्याला कोणतातरी ’दिवस’ येतो. तर पुढच्या वर्षीसाठी वेगवेगळ्या ’दिवसां’ वर लिहाल का? असं विचारलं आहे.’
"मग? तू आधीच लिहून ठेवले होतेस ना सगळ्या दिवसांवर लेख?"
"हो, पण मला एन. पी. आर. मुळे एक नवीन दिवस कळला आहे."
बापरे हा शब्द तोंडातून बाहेर न काढण्याचा शहाणपणा त्याच्याकडे आहेच, तो नुसतं,
"अच्छा" म्हणाला. तेवढ्या बळावर मी तो दिवस कोणता ते सांगून टाकलं.
"अरे आज कवी दिवस आहे. म्हटलं कवी दिवस आणि रेस्टॉरंट डे एकत्र करु. म्हणजे माझी कविता वाचून दाखवता येईल, तुम्हाला खाण्याचा आनंद, मला श्रोते मिळाल्याचा. नंतर त्यावर लिहिताही येईल."
"आई, मरु दे आज नकोच रेस्टॉरंट." मुलीने एकदम माघारच घेतली.
"पिझ्झा मागवतो मी. आम्ही दोघं राहू घरी. भांडणार नाही. तू आणि बाबा जा रेस्टॉरंटमध्ये. बाबाला निवांत ऐकता येईल कविता तुझी." पोटाची व्यवस्था करत सुपुत्राने पळ काढला. नवर्‍याचा चेहरा पहाण्यासारखा झाला. त्याने सोफ्यावर बसकण मारली आणि बोटाने आकडेमोडच सुरु केली एकदम.
’मदर्स डे, फादर्स डे, महिला डे, शिक्षक डे, व्हॅलेनटाईन डे, आता हा कवी डे...’ त्याची बोटं अपुरी पडली तर? मुलीने आपलीही बोटं लागलीच तर असावीत म्हणून त्याच्यासमोर धरुन ठेवली. त्या धक्क्यातून तो सावरला थोड्यावेळाने. पण कोडं पडल्यासारखा म्हणाला,
"हा असा एकेकच दिवस का साजरा करतात या प्रत्येक नावाने. त्यादिवशी जे प्रेम, आदर, कौतुक सगळं व्यक्त करतो आपण त्या त्या ’दिवस’ असलेल्या व्यक्तीचं ते रोज  आपल्या वागण्यात दिसलं तर काय बहार येईल ना? म्हणजे मग ही भानगडच उरणार नाही."

"भानगड म्हणजे काय रे? आणि बहार म्हणजे?" मुद्दा सोडून दुसरंच काहीतरी उकरण्यात दोन्ही पोरं वस्ताद. मी मात्र रेस्टॉरंट मध्ये वाचायची कविता पुन्हा एकदा डोळ्याखालून घातली. रेस्टॉरंट डे नाही झाला तरी घरातल्या घरात कवी डे तरी...

Wednesday, February 27, 2013

मॉन्स्यु (?) लझार (Monsieur Lazhar)


 चित्रपटाची सुरुवात होते ती माध्यमिक शाळेतला विद्यार्थी सायमन मधल्या सुट्टीनंतर इतर मुलांच्या आधी वर्गाच्या दिशेने जात आहे या दृश्याने. वर्गाचं दार उघडण्यापूर्वी त्याचं लक्ष दाराच्या आयताकृती काचेतून आत जातं आणि धक्कादायक दृश्यांने तो क्षणभर जागीच खिळतो.  गळफास लावून आत्महत्या केलेली वर्गशिक्षिका. सायमन सुन्न मनाने भिंतीला पाठ टेकून उभा राहतो, घंटा वाजायला लागते तेव्हा  सैरभैरपणे धावत सुटतो. कॅमेरा स्थिर असतो, आपण फक्त सायमनच्या पावलांचे आवाज ऐकत रहातो. त्यानंतर दिसतात ती मैदानातून परत आलेली मुलं, त्यांच्या शिक्षिका त्यांना वर्गात न जाण्याच्या देत असलेल्या सूचना आणि पुन्हा बाहेर जाणारी मुलं. ॲलिस मात्र या गोंधळातूनच हळूच दाराच्या फटीतून आत डोकावते.  पुन्हा एकदा गळफास लावून घेतलेली शिक्षिका आपल्याला दिसते. लांबून. तिचा चेहरा पूर्ण चित्रपटात कधीही दाखवलेला नाही.

शाळा या दु:खद घटनेतून  बाहेर येण्यासाठी मार्ग शोधत रहाते. भिंतीना नवा रंग दिला जातो.  मुलांनी मोकळेपणे बोलावं म्हणून शाळेतर्फे  मानसोपचारतज्ञाची नेमणूक होते.  दरम्यान, आत्महत्या केलेल्या मार्टिनच्या जागी कुणाला नेमावं या पेचात असतानाच बशिर लझार वर्तमानपत्रात बातमी वाचून बदली शिक्षकाच्या जागेसाठी  शाळेत येतात.  शाळेत घडलेल्या आत्महत्येच्या प्रसंगानंतर काम करायला यायलाही कुणी धजावत नसतं त्यामुळे त्वरित, फारसा विचार न करता लझारची नेमणूक होते.

शिक्षक म्हणून शांत, प्रामाणिक असलेले लझार  आणि ’त्या’ वर्गातल्या मुलांचे सूर मात्र  जुळत नाहीत. फ्रेंच उच्चारातील फरकामुळे अडचणी येत रहातात. त्यातच शिक्षक, पालक सारेच झालेल्या घटनेबद्दल मौन बाळगून आहेत. वर्गातही याबाबत बोलू नये अशा लझारना सूचना आहेत. मुलाने केलेल्या खोडीबद्दल लझारनी मारलेल्या हलक्याश्या टपलीबद्दल त्यांना कोणत्याही कारणासाठी मुलांना स्पर्श न करण्याची ताकिद प्राचार्याकडून मिळते.

मार्टिनच्या आत्महत्येचा परिणाम  प्रत्येकावर झालेला आहे. लझारना मुलांनी मन मोकळं करावं असं वाटतं.  शेवटी या विषयाबद्दल ’ब्र’ ही न काढण्याची सूचना धुडकावून मुलांना बोलायला उद्युक्त करण्याचे प्रयत्न जारी राखतात, मात्र सहशिक्षिकेने सुचवूनही स्वत:च्या जीवनाबद्दल मौन बाळगतात.

 वर्गातली सगळीच मुलं अस्वस्थ आहेत.  सक्त ताकिद असूनही लझार मुलांना ’बोलतं’ करतात. मुलं म्हणतात,
 "प्रत्येकाला वाटतं मार्टिनच्या आत्महत्येने आमच्या मनावर परिणाम झाला आहे पण खरं तर मोठ्यांच्या मनावरच तो तसा झाला आहे."
ॲलिसच्या भावना आपल्यालाही गलबलून टाकतात. हिंसा या विषयाबद्दल बोलताना अचानक  ती म्हणते,
"ही तीच शाळा आहे की जिथे मिस मार्टिनने स्वत:ला गळफास लावून घेतला. कधी कधी वाटतं, मिस मार्टिननी त्यांच्या कृतीने चुकीचा संदेश  का दिला आम्हाला? आम्ही चुक केली की शिक्षा मिळते तशी मला मिस मार्टिनला शिक्षा द्यावीशी वाटते चुकीची गोष्ट केल्याबद्दल. पण आता ती कशी देणार?" ती बोलत असताना सायमन अस्वस्थ होत जातो.
लझारना ॲलिसचे मनोगत पूर्ण शाळेत प्रसिद्ध करावंसं वाटतं, पण प्राचार्यांना मात्र ॲलिसच्या मनोगतात उद्धटपणाची झाक दिसते. मार्टिनचा अनादर वाटतो. लझार म्हणतात,
"कोणालाही जीवन संपवाव असं वाटतं यासारखी दु:खद घटना नाही आणि  शिक्षकी पेशा असलेली व्यक्ती त्यासाठी शाळा निवडते ह्याबद्दल मनात विषाद दाटून येतो. शाळेत गळफास लावून मुलांच्या बाबतीत मिस मार्टिनने जे केलं तो अनादर आहे. मुलांच्या भावविश्वाचा केलेला अनादर."

 सायमनचं वागणंही विचित्र होत चाललेलं आहे. त्याला शिक्षा करावी की नाही यावर शिक्षक, प्राचार्य कुणामध्येही एकमत नाही. लझार, मिस मार्टिनच्या कृतीमुळे सायमन अस्वस्थ आहे, त्याच्या मनावर या घटनेचा विपरीत  परिणाम झाला आहे हे कळकळीने पटवून द्यायचा प्रयत्न करतात पण याबाबत कुणीही त्यांच्याशी सहमत नाही. काही काळाने सायमनच्या  वागण्यातल्या विसंगतीचा उलगडा होतो तेव्हा मुलं किती पटकन स्वत:ला परिस्थितीबद्दल दोष देतात, जबाबदार धरतात ते पाहून हेलावून जायला होतं.

 लझारना शेवटी ती शाळा सोडून जाण्यासाठी भाग पाडलं जातं. अगदी ताबडतोब. का...? मुलांचा निरोप घेण्याची त्यांची विनंती प्राचार्य नाईलाजाने मान्य करतात. काय होतं या शेवटच्या प्रसंगात? का आग्रह असतो  लझार यांचा विद्यार्थ्यांचा निरोप घेण्याचा ...?

फिलीप फलारड्यू लिखित आणि दिग्दर्शित फ्रेंच भाषेतील हा चित्रपट आहे. युरोपमधील विनोदी कलाकार म्हणून ओळखल्या जाणार्‍या फेलाग या नटाने लझारची भूमिका केली आहे. तर सोफी नेलसी आणि एमलिन निरॉन या दोन मुलांनी ॲलिस आणि सायमनच्या भूमिका सुंदररित्या साकारल्या आहेत.

परकिय भाषेतील भाषांतरीत संवाद वाचताना चित्रपटातील दृश्य पुढे सरकून जातं म्हणून चित्रपट पहाण्याची उत्सुकता वाढावी इतपत ही  कथेची ओळख.


(हा चित्रपट नेटफ्लिक्स वर आहे)

Tuesday, February 19, 2013

आकाशवाणी

काही वर्षापूर्वी, रत्नागिरीला गेले तेव्हा आवर्जून आकाशवाणीत गेले. सगळ्यांची भेट होईल, जिथे काम केलं ती जागा  पुन्हा पहावी, ’ऑन एअर’ चा लाल दिवा डोळ्यात साठवावा, गप्पा झाडायचो त्या भोजनालयात जाऊन पुन्हा हसावं खिदळावं असं काही बाही मनात होतं. पण अवकळा पसरलेलं ते केंद्र विषादाचा चरा उमटवून गेलं मनावर. मी काम करत असतानाची सगळी जणं कामाच्या वेळा वेगळ्या असल्याने ठरवूनही तिथे एकत्र भेटणं कठीणच होतं.  जिथे हक्काने ’आवाज’ फुटायचा तिथे मनातल्या भावना शब्दाने व्यक्त कराव्याशा वाटल्याच नाहीत.  सरकारी आकाशवाणी केंद्रांची अवस्था आता कशी आहे याची कल्पना नाही, पण सात आठ वर्षापूर्वी फार बिकट होती.
परतीच्या मार्गावर ’आकाशवाणी’ मनात पिंगा घालत राहिलं. पार शाळेच्या उंबरठ्यापाशी घेऊन गेलं.

रात्री साडेनऊला लागणारं कॉफीहाऊस, प्रपंच मालिका, सकाळी सात, दुपारी दिड, संध्याकाळी सात आणि रात्री आठ वाजता लागणार्‍या प्रादेशिक आणि राष्ट्रीय बातम्या.
कॉफी हाऊसमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे, विजय कदम आणि भाग्यश्री जोशी. हसत खेळत युवावर्गांच्या गप्पागोष्टी असायच्या ह्या. प्रपंच मध्ये प्रभाकर पंत, मीना वहिनी आणि टेकाडे भावजी. त्यातल्या मीना वहिनी म्हणजे नीलम प्रभु (करुणा देव), आवाज आणि उच्चारांचा त्यांच्या इतका प्रभावी वापर केलेलं कुणी पाहिलं नाही मी अद्यापपर्यंत.  त्यांनी केलेल्या  एका श्रुतिकेतील मुलगी, मध्यमवयीन आणि वृद्ध स्त्रीचे आवाज ऐकून मला कितीतरी दिवस दुसरी नीलम प्रभु व्हायचं होतं :-).

जुन्या आठवणींबरोबर आकाशवाणीत काम करत असतानाचेही दिवस पिंगा घालत राहिले. ज्या जगाचं आकर्षण होतं त्या जगात डोकावयला मिळालं. काम करायला मिळालं. सुरुवातीला आकर्षण होतं ते आकाशवाणीची गाडी पहाटेच्या कामाच्या वेळेला न्यायला घरी येते त्याचं. कुण्णीतरी अगदी मोठ्ठं झाल्यासारखं वाटायचं गाडीत बसताना. आकाशवाणीत पोचलं की कार्यक्रम काय काय आहेत ते पहायचे, पटापट निवेदन लिहायचं आणि कार्येक्रमाचं सारं सामान घेऊन स्टुडिओत. खाक खुक करुन आवाज नीट आहे ना हे पाहिलं की पहिल्या कार्यक्रमाची तबकडी घालून ठेवायची. आणि मग ’ऑन एअर’ चा लाल दिवा कधी लागतोय त्याकडे नजर ठेवून बसायचं. एकदा का तो दिवा लागला की आपले आपण, म्हणजे  काही गोंधळ होईपर्यंत. तसा तो व्हायचाही अनेकदा. आवाजात चढ उतार आणत सगळं काही बोलून झालं की अचानक गडबडीने तंत्रज्ञ आत घुसायचे. बटनं चुकीची दाबल्यामुळे किंवा न दाबताच बोलल्याने श्रोत्यांनी काहीही ऐकलेलं नसायचं. मग, माफ कराही अशा झोकात यायचं की काही तरी फार मोठं श्रोत्यांना सांगतोय असा आव यायचा त्यात.

निवेदकांमध्ये आपापसात स्पर्धा असायची ती सूर मनी रंगती आणि आपली निवड हा संगीताचा कार्यक्रम सादर करताना. अस्सं काही निवेदन असायचं ना प्रत्येकाचं. एकतर श्रोत्यांकडून वाहवा मिळावी हा हेतू आणि कार्येक्रम अधिकार्‍यांकडून मिळणारी श्रेणीही महत्तवाची.
एक आठवण कायमची मनात रुतली आहे. गाणं होतं, ती गेली तेव्हा.... दोन ओळी ऐकून पूर्ण गाणं काय आहे याचा अंदाज घ्यायचा आणि निवेदन लिहायचं. ती गेली तेव्हा पाऊस निनादत होता.... या गाण्याला माझं निवेदन होतं ते प्रेयसी प्रियकराला भेटून निघाली आहे अशा अर्थीचं. वयाच्या २१, २२ वीशीचा हा परिणाम. निवेदन संपलं, गाणं सुरु झालं. आणि हातापायातलं त्राणंच गेलं. ती आई होती म्हणूनी.... ऐकलं आणि काय गोंधळ केला आहे ते लक्षात आलं. कहर म्हणजे, एकाच गाण्याकडे निवेदक किती वेगळ्या दृष्टीने बघू शकतो याचं श्रोत्यांना कौतुक वाटलं होतं.

आकाशवाणी रत्नागिरीहून मुंबईला गेले. कामावर हजर होण्यापूर्वी साहेबांची भेट घ्यावी म्हणून त्यांच्या खोलीत गेले. टेबलाची रचना विचित्र होती की माझा गोंधळ उडाला होता कुणास ठाऊक. खोलीत कुणीच नव्हतं. मी एका खुर्चीवर बसले. थोड्यावेळाने साहेब आले. मी उठून उभी राहिले आणि हात जोडून नमस्कार केला. पुन्हा बसले. ते आपले उभेच. काहीतरी चुकतय असं वाटत होतं पण काय ते कळत नव्हतं. काही वेळ असं बोलणं झालं आणि मी म्हटलं,
"सर, तुम्ही बसा ना." ते म्हणाले,
"तुम्ही माझ्या खुर्चीवर बसला आहात."
"ऑ?" विजेचा धक्का बसल्यासारखी उठले. मुंबई आकाशवाणीची सलामीची भेट झडली ती अशी.

एकदा कोणतातरी कार्येक्रम ध्वनिमुद्रित केला होता. चुकून त्यावर आणखी एक कार्यक्रम टेप केला. मग पुन्हा त्या कलाकारांना बोलवून ध्वनिमुद्रण, मुंबईसारख्या ठीकाणी पुन्हा सर्वांना एकत्र आणण्यासाठी केलेली शाब्दीक कसरत अजूनही आठवते.

एक ना अनेक प्रसंग काही हसवणारे, महान कलाकारांची भेट झाल्याचा आनंद मिळवून देणारे, काही हातपाय गाळणारे तरीही सगळे मंतरलेले...


(इंद्रधनु - तुझ्या पोस्टमुळे या आठवणींना उजाळा मिळाला. धन्यवाद.)

Thursday, February 14, 2013

वयाची ऐशीतैशी...

मंडळाचा कार्यक्रम छान रंगला. आलेल्या पाहुण्यांना पुष्पगुच्छ देण्यासाठी तरुण कार्यकत्याने मीनलच्या नावाचा पुकारा केला,
"आता मी मीनलताईंना विनंती करतो...."
मीनलच्या आजूबाजू्ला असलेल्या आम्ही मीनलताई म्हटल्यावर फिस्सऽऽऽ करुन हसलो. ती पण पदर फलकावित, ताईऽऽ काय..., किती स्वत:ला लहान समजायचं ते असं काहीसं पुटपुटत पुष्पगुच्छ देण्यासाठी गेली.
मीनल परत येऊन बसल्यावर ताई, माई, अक्का असे विनोद करुन झाले. आणि मग मनात तेच घोळत राहिलं.

घरी आल्याआल्या मेकअप पुसला. चेहरा खसखसा धुवून न्याहाळते आहे तोच लेक डोकावली.
"किती निरीक्षण करते आहेस स्वत:चं."
"अगं पिल्लूऽऽऽ..."
"इऽऽऽऽऽऽऽऽ, पिल्लू काय गं, मी काय आता लहान आहे का?"  पिल्लूला पंख कधी फुटतील याची घाई.
"अगं केस पांढरे झाले आहेत का काय ते पाहते आहे."
" ग्रेसफुली एजिंग आई, ग्रेसफुली एजिंग. पांढरे केस चांगले दिसतात, कशाला ते रंग बिंग लावायचे?."
"ए, ते  ग्रेसफुली एजिंग नट्यानांच शोभतं हं. म्हणजे सगळे उपाय करायचे, उपाशी तपाशी राहून शरीर थकवायचं पण तरी वय वाढणं काही थांबवता येत नाही की असं म्हणायचं.  वा  रे वा (इथे मी मुलीला ओरडते तशी त्या अदृश्य अनामिक नटीला ओरडले). आणि केस पांढरे होण्याचा आणि वयाचा काही संबंध नसतो." आपल्या दु:खावर आपणच  मलमपट्टी केलेली बरी.

"बरं, तुला इमेल आलं आहे बघ. ’पंखा’ आहे तुझा. लिहलय, मला ’अहो, जाहो’ नका म्हणू, मी तुमच्यापेक्षा लहान आहे." दु:खावर मीठ चोळणार्‍या त्या वाक्याने मी मुलीला, माझं इ मेल तू कशाला वाचतेस हे ही विचारायला विसरले.
"ह्यांना कसं काय कळतं कोण जाणे, मी मोठी आणि त्या लहानच असणार ते." लेक ढिम्म उभी बघून मला चेव चढला. " आमचं मेलं सगळं जगासमोर मांडलेलं. तरी बरं, संकेतस्थळांवर फोटो पाळण्यात असतानाचे टाकले आहेत. उभं राहून फोटो काढायचा तर एक पाय पुढे धरुन तो काहीसा वाकवून, मग पोट आत घेऊनच उभी राहते. या कसरती कमी म्हणून की काय चीजऽऽऽ म्हणताना नुकत्याच दि्सायला सुरुवात झालेल्या डोळ्याच्या बाजूच्या  एक दोन (?) सुरकुत्या दिसणार नाहीत असं हसायचं. इतकं करुन्ही  कशा या बायका माझं वय काढतात, स्वत:ला लहान समजतात?"  एखादी शोकांतिका समोर घडत असल्यासारखा चेहरा झाला असावा माझा.
"अगं आई तू लिहतेस ना, त्यातून कळतं तुझं वय. म्हणजे मुलांच्या वयाचे उल्लेख असतात ना त्यावरुन."
मोट्ठा शोध लागला असं वाटलं, चला यापुढे लेखनातून मुलं वगैरे बाद एकदम. खूप आनंद झाला समस्या शोधून उपाय केल्याचा म्हणजे  ’सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही......’  संपल्यासारखं वाटलं. पण काही क्षणच. प्रश्न पडला, मग मी लिहू तरी काय? माझी ही इतकी ’गुणी’ मुलंच तर सातत्याने विषय पुरवत असतात भलतंसलतं वागून माझ्या लेखनाला. माझ्या विनोदाचं मर्मस्थानच नष्ट केल्यासारखं होईल अशाने. तितक्यात लहान मुलाची समजूत घातल्यासारखी मुलगी म्हणाली.
"पण खरं तर तू आहेस त्यापेक्षा पाच वर्षानी लहान दिसतेस ते त्यांना कसं माहित असणार ना? ते वाचक आहेत प्रेक्षक नव्हेत."
"खरंच? म्हणजे काय वय वाटत असेल गं माझं?" उत्तर काय येतं याची धाकधूक होती परिक्षेला बसल्यासारखी.  पण त्यातून तरुन निघाल्याचा आनंद वाढवतील ती आपली मुलं कसली.  गणिताची बोंब असल्यासारखा लेकीचा हिशोब चुकला. माझ्या वयातली पाच वर्ष कमी होण्याऐवजी दहा वाढली. माझ्या एकाचवेळी पडलेल्या, लटकलेल्या, रागावून लाल झालेल्या चेहर्‍याकडे पाहून धोक्याचा इशारा तिने अलगद झेलला. विषयाचं तोंड दुसरीकडे फिरवण्याचा चतुरपणा ती वडिलांकडून शिकली आहेच.

"आई, तुझं बाई काही समजत नाही.  इकडे सर्वांनी तुला अगं तुगं करावं असं वाटतं, पण आपण मागच्यावेळी पुण्यात दुकानात गेलो होतो....."
ती काय विचारणार ते लगेच कळलं. पोरगासा दुकानदार.

"इकडे ये." हातातली थप्पी दाखवत तो म्हणाला. नुकत्याच मिसरुड फुटलेल्या मुलाकडून,  ए......ऐकल्यावर  मस्तक फिरलंच.
"मी काही शाळकरी पोरगी नाही. तुम्ही अगं तुगं का करताय?" फुत्कारत प्रश्न टाकला. तो हसला.
"नाही, जीन्समध्ये असलं कुणी की अहो, जाहो नाही करायचं असं बाबांनी बजावलं आहे." कुठे गेला तो तुझा बाबा हा प्रश्न  मी न विचारताही त्याने  जोखला.
"बाबा संध्याकाळी येतात दुकानात."
भरपूर कपडे पाहायचे पण घ्यायचं काहीच नाही. मी मनोमन बदला घ्यायचा ठरवलं आणि तस्संच केलंदेखील.
दोन पौंड वजन कमी केल्यासारखा आनंद झाला बदला घेतल्यावर. त्या आनंदात तरळत नवथर उत्साहात दुकानाच्या पायर्‍या उतरले. आत्ताही चेहर्‍यावर तसे भाव आले असावेत.
"आई...." मुलीने लक्ष वेधलं.
"अगं ते वेगळं. म्हणजे बघ कंडक्टर, रोजच्या कामवाल्या आजी, भाजीवाली सगळे कितीही मोठे असले तरी त्यांनी आपल्याला अगं तुगं करुन कसं चालेल?"
"असंही असतं? आमच्या इंग्लिशमध्ये सगळ्यांसाठी सारखाच नियम असतो."
"हं... ते वेगळं." उत्तर न सुचून पुन्हा ते वेगळं चा सूर पकडला मी.

सध्या माझी मोहीम सगळ्या ब्लॉग ना भेटी द्यायच्या, खालच्या कॉमेंट्स वाचायच्या आणि खुषीने उड्या मारायच्या अशी आहे. म्हणजे प्रत्येकजण या अनुभवातून कधीना कधी जातोच तर हे समाधान त्या खुषीच्या उड्यांमागे.
काही ब्लॉगर्सची आधीच विनंती असते ’अगं/ अरे’ म्हणायची, नाहीतर काही ठीकाणी
मला कृपया ’अहो’ म्हणू नका,  ’सर काहीतरीच वाटतं बुवा’ अशी आर्जवे,
त्याला छोट्यांनी
’नाही तुम्ही मोठे आहात/मोठ्या आहात, मी लहान आहे’  ची जोडलेली पुष्टी. मग ब्लॉगर्सचा प्रश्न
’तुला कसं कळल’
’पोस्ट वाचून.....’ वाचकाचं उत्तर.

रोज भेटणारी कितीतरी माणसं, त्यांनी आपल्याला ’अगं तुगं, अरे’ केलेलं चालत नाही आपल्याला, पण ब्लॉगवरच्या कधीही न पाहिलेल्या मंडळीना मात्र आपला आग्रह किंवा अधूनमधून भेटणार्‍या मैत्रीणींच्या मैत्रीणींनी ही आपल्याला अगं तुगं करावं ही अपेक्षा.... एकूणच लहानांना मोठं व्हायचा ध्यास, मोठ्यांना लहान म्हणवून घ्यायचा सोस आणि लहानांना आपण कित्ती ’ज्युनिअर’ हे ’सिनियर्स’ ना ठणकावून सांगायची घाई..........कीती ही गुंतागुत?

Tuesday, February 12, 2013

माझंही मत...

मुलाबरोबर दिल्लीच्या ’त्या’ घटनेबद्दल बोलत होते. तो एक वर्षाचा असल्यापासून आम्ही भारताबाहेर आहोत त्यामुळे म्हटलं तर तो अभारतीयच पण मुळ भारतीय असल्याचा अभिमान बाळगत तो भारत कसा बदलायला हवा या गुंगीत खूपवेळा असतो. जी वेडी स्वप्न १७ वर्षाचे असताना आम्ही पाहिली तेच आता त्याचं वय, त्यामुळे तोही तेच करतो आहे हे कळतं तरी थोडी वादावादी, तू भारतात रहात नाहीस, तुला तिथली परिस्थिती माहित नाही वगैरे आल्यावर तो म्हणाला,
"तो तुझा देश आहे तसा माझाही."
"अरे पण आम्ही जन्मलो, वाढलो तिथेच. पंचवीशीनंतर पडलो बाहेर."
"पण मी भारताबद्दल बराच अभ्यास केला आहे. तिथल्या चालू घडामोडी माहित असतात मला."
या चर्चेतून तो म्हणाला,
"ठीक आहे. मला काय वाटतं ते मी माझ्या ब्लॉगवरच लिहतो."
"बरं" म्हणून तो विषय संपला.

त्यानंतर कधीतरी त्याच्या मनातले विचार इथे उमटले. त्याने लिहलेली ही पोस्ट, इंग्लिशमध्ये. वाचून आपली मतं त्याच्याच ब्लॉगवर नोदवलीत तर आनंद होईल.

हा त्याच्या ब्लॉगचा दुवा - http://www.chicagoindy.com/2013/01/thoughts-on-2012-delhi-gang-rape.html

तसंच कुणाला ठाऊक आहे का इंग्लिश ब्लॉग कुठे जोडता येतात जसे आपण मराठी जोडले आहेत तसे?

Tuesday, January 22, 2013

मुलांना घरातील कामाचे पैसे...?

सगळ्या मैत्रींणी जमलो होतो. मुलांवरुन बोलताना एकजण म्हणाली,
"मी मुलांना प्रत्येक कामाचे पैसे देते. थोड्या पैशात किती कामं होतात."
"म्हणजे किती आणि कोणती कामं?" माझं कुतुहुल जागृत झालं.
"डिशवॉशरमधली भांडी लावली की ५० सेंट, केर नेऊन टाकला की २५ सेंट, स्वत:ची खोली आवरली की ७५सेंट अशी छोटी छोटी किती कामं असतात  घरात."
पहिला विचार मनात तरळला तो सुट्टे पैसे खूप ठेवायला लागत असतील मग :-) हा. नंतर हेवा वाटला तो स्वत:ची खोली आवरल्याबद्दल पैसे मिळतात  पठ्ठ्यांना याचा आणि  शेवटी प्रश्न पडला की त्या पैशाचं तिसरी चौथीतली ही मुलं करणार काय? एकदा का पैसे हातात आले की त्यांना काय पाहिजे ते घेणासाठी ती हट्ट करणारंच. त्यावर ती म्हणाली.
"हो ना, दुकानात गेलो की  गोळ्या, नाहीतर बबलगम घेतात मुलं त्या पैशातून."
"कष्ट करुन मिळवलेल्या पैशांनी हे घ्यायचं म्हणजे तू चुकीची सवय लावतेयस असं नाही वाटत?"
"नाही. गोळ्या, बबलगम रोज खाणं बरोबर नाही हे तर माहितच आहे त्यांना. हळूहळू पैसे अशा गोष्टींवर खर्च करु नयेत हे ही कळेल."
"मग ती पण तुला पैसे देतात?"
"कसले?"
"तू जेवण करतेस रोज त्याच्यांसाठी, शाळेसाठी डबा देतेस, गाडीने इकडे तिकडे नेतेस.... खूप मोठी यादी होईल."

 मैत्रीणीचं म्हणणं आपली कामं होत असतील तर या गोष्टीचा बाऊ करण्यात अर्थ नाही. पैसे देऊन आपण त्यांना स्वावलंबन शिकवतो, ते कसे वापरायला हवेत याचं शिक्षण देतो.

माझं म्हणणं, ही जी कामं आहेत ती मुलांनी घर त्याचंही आहे या भावनेतूनच, स्वत:ची कामं स्वत:च करायला हवीत या जाणीवेतून किंवा आई, बाबांना मदत म्हणून करायला हवीत, पैसे मिळतात म्हणून नाही. आणि ती भावना पालक म्हणून आपणच त्यांच्या मनात रुजवली पाहिजे. तुम्हाला काय वाटतं?

Monday, January 14, 2013

फेसबुक हे असं...

फॅमिली डॉक्टरकडे गेले होते,  सगळ्या फॅमिलीला घेऊन. निघताना, गाव सोडतोय म्हटल्यावर डॉक्टर म्हणाल्या,
"कीप इन टच"
"तुम्ही फेसबुकवर आहात का?" संपर्कात रहायचं तर तेच प्रभावी साधन आहे  हा त्यामागे माझा विचार.
डाव्या, उजव्या हाताला असलेल्या दोन्ही मुलांच्या रागीट्ट नजरा टाळण्यासाठी डॉक्टरांवर दृष्टी केंद्रीत केली. नाही म्हणजे मुलीने  एकदा विचारलं होतं,
"आई, तू ऑफिसचं काम फेसबुकवर करतेस का?" आणि नवरा, मुलाचं  ठाम मत आहे की फेसबुकचं व्यसन आहे मला.
तर डॉक्टरांनी फेसबुक म्हणजे निव्वळ वेळखाऊ, रिकामटेकड्यासाठी कसं आहे ते सांगायला सुरुवात केली. मी आपलं,
या, या...राईट....यस, यस....पण आम्ही पण कामधंदे करुनच फेसबुक वापरतो, किंवा ते करता करता वापरतो....असे अस्फुट उदगार काढत किल्ला लढवायचा प्रयत्न केला. तो त्यांच्या आवाजापुढे, ठाम मतांपुढे पडला.

पण खरंच फेसबुक हे आयुर्विम्याला जसा पूर्वी पर्याय नव्हता तसंच आहे की नाही? जगातल्या सगळ्या बातम्या फेसबुकवर वाचता येतात. वर्तमानपत्रं त्यापुढे किस झाड की पत्ती. बातम्या वाचून कोपरखळ्याही मारता येतात. आवडलं आवडलं करत शेजार्‍या पाजार्‍यांच्या घरात घुसता येतं, त्यांच्या जगात, त्यांना आवडलेल्या कुणाच्याही घरात डोकावता येतं, म्हणजे परदेशात रहाताना भारतातला जो ’जिवंतपणा’ आपण ’मिस’ करत असतो तो बसल्या जागी एका उंदराच्या साथीने अनुभवता येतो. लोक एखादंच असं वाक्य टाकतात ’पोस्ट’ म्हणून की लहानपणी कोडं सोडवायला सरसावयचो तसं काय म्हणायचं असेल बरं या पोस्टमधून असं म्हणत कोडं सोडवण्याची मज्जा अनुभवता येते. राजकिय मतभेद वाचून  इतकी करमणूक होते की आपलं मत काय होतं तेच विसरायला होतं. आजारी पडलेल्याला हमखास उपाय सुचवता येतात, पाककृत्या कळतात.  कोण कुणाकडे कुणाबरोबर कधी गेलं होतं त्याचा सुगावा लागतो. एक ना अनेक किती गुण गावेत या फेसबुकचे?

थोडक्यात डोक्याला खूप खुराक देतं हे फेसबुक. आपलं व्यक्तिमत्वं अगदी चतुरस्त्र होऊन जातं...
फेसबुक हे असं, पूर्वी आयुर्विम्याला पर्याय नव्हता तसं...

Friday, January 4, 2013

सीमारेषा

महाविद्यालयीन जीवनाबद्दल गोष्टी चालल्या होत्या लेकाशी. त्याचं हे पहिलं वर्ष आमच्यापासून दूर रहाण्याचं.
"मुलं दारु, सिगरेट पितात/ओढतात का तिकडे?" दोन तीन महिने मनात असलेला प्रश्न चाचपडल्यासारखा बाहेर आला. तो हसला अवघडल्यासारखा. पुढच्या प्रश्नाची कल्पना त्याला आधीच आली असावी.
"हो."
"सर्रास?"
"ते मला नाही माहित."
"हं"
" मी पण असतो का त्यात असं विचारायचं आहे ना तुला? मग विचार ना तेच."
मी हसून म्हटलं,
"एकदम तुझा पारा चढायला नको ना म्हणून साधारण चित्र काय आहे ते विचारावं असं वाटलं."
"क्वचित. म्हणजे एक दोनदा थोडीशी घेऊन बघितली आहे."
माझा चेहरा पाहण्यासारखा झाला.
"सिगरेट?" न रहावून विचारलंच
"अजिबात नाही."
माझी चुळबुळ, अस्वस्थपणा वाढला असावा.
"आई, मी प्रामाणिकपणे सांगतोय. सगळीच मुलं करतात हे पण आई वडिलांना खरं सांगत नाहीत."
"अच्छा" म्हणून मी ते संभाषण संपवलं.

एक दोन दिवस अस्वस्थतेत गेले. हे चांगलं नाही वगैरे उपदेश कसा करायचा किंवा करायचा की नाही या विचारात.
"मला एक समजत नाही की तुम्ही पालक दारु पिऊ नका, लग्नाशिवाय शारिरिक संबंध येता कामा नयेत असा धोशा लावता पण मुलांना मोह टाळता आलाच नाही तर त्यांनी काय करायचं ते सांगत नाही."
"म्हणजे?"
"पिण्याचे परिणाम काय काय होऊ शकतात, एकावेळी कमीत कमी म्हणजे नक्की किती घ्यावी, सवयीचं व्यसनात रुपांतर कसं होऊ शकतं, ते झालं तर त्याचे शरिरावर होणारे परिणाम. किंवा गाडी चालवू नका, जो गाडी चालवणार असेल तो दारु पिणार नाही याची दक्षता घ्या, शारिरिक संबंधाबद्दल काळजी घेतली नाही तर काय होऊ शकतं. त्यातून निर्माण होणारे रोग अशा कितीतरी गोष्टी तुम्ही सांगत नाही. आम्हाला महाविद्यालयात ही माहिती देण्यासाठी खास तास आणि परिक्षा असते."
मी फक्त ऐकत होते. महाविद्यालयांची जागरुकता आवडली याबाबतची.
"तू काळजी करु नकोस. मला हे असं करायला वेळच मिळत नाही."
"तू म्हणतोस ते खरं आहे. पण तू आत्ता सांगितलंस तसं करणं म्हणजे पालकांना, आपण अशी माहिती देऊन मुलांना उत्तेजन तर देत नाही ना असंही वाटतं."
"पण नुसतं दारु पिऊ नका, मादक पदार्थांच्या आहारी जाऊ नका असं सांगून तरी काय उपयोग? का ते माहित असलं की मुलं जास्त विचार करतील ना या गोष्टी करताना?"

मी काही बोलले नाही. मुलांशी बोलताना मित्रमैत्रीण व्हावं पण त्याचवेळी पालक म्हणून त्यांनी आपल्याला आदर दाखवावा ही जी आपली अपेक्षा असते त्यातली सीमारेषा इतकी धुसर आहे की ती केव्हाही भंग पावेल असं वाटतं खूपवेळा.

Thursday, January 3, 2013

बदल

महाविद्यालयीन काळात  तावातावाने मारलेल्या गप्पा, मांडलेले विचार आणि त्यातून निर्माण झालेली ही कविता. कविता 'पाडण्याचा' छंद होता त्या काळातली. आज कित्येक वर्ष उलटली तरी सगळं जैसे थे च आहे असं वाटायला लावणारी.

तुम्हाला खोटं वाटेल
पण हल्ली सारं जगच बदललंय
सगळं कसं छान, छान होत चाललंय
माणूस माणसाप्रमाणे वागतोय
देश उन्नतीकडे झेपावतोय!
माणुसकीचाही पूर आलाय
सार्‍या देशाचा नूरच बदललाय
आदर्शवाद अस्तित्वात आलाय
बलात्कार, खून, भ्रष्टाचार हे शब्दच
मुळी नष्ट झाले आहेत
मी म्हटलं ना,
तुम्हाला हे खोटं वाटेल
तसंच झालंय,
समोरचा  माणूस 
विचित्र नजरेने पाहतोय,
कुणापाशी तरी कुजबुतोय
ही वेडी अशीच फिरत असते
अक्रीतासारखं बडबडत राहते!

Friday, December 14, 2012

काय चाललं आहे हे...

एका तरुण मुलाची आई त्याच्या बंदुकीच्या गोळीला बळी पडते. तिथून तो ती ज्या शाळेत शिकवत असते त्या प्राथमिक शाळेत जातो. आईच्या वर्गातले चिमुकले जीव बंदुकीच्या गोळीने टिपतो. कोण विचारणार जाब या कृत्याचा? आणि कुणाला? जाब विचारायला तो मुलगाही या जगात नाही, त्याची आईही. आता आम्ही फक्त चर्चा करायच्या यव करायला हवं आणि त्यव करायला हवं....

असं काही झालं की आठवतं ते १९९९ मधील लिटलटन कोलोरॅडो येथील घटना. दोन विद्यार्थ्यांमुळे जीवाला मुकलेली माध्यमिक शाळेतील १२ मुलं. २००७ साली तरुण माथेफिरुच्या गोळ्यांना बळी पडलेली व्हर्जिनिया टेकमधील ३२ तरुण मुलं आणि अशाच घटना एकामागून एक, अनेक.  त्यानंतर त्याची कारणमीमांसा शोधली जाते, उपाय शोधले जातात, काही काही प्रत्यक्षात राबवले जातात आणि मग पुन्हा हे असं.....कधी थांबणार आणि कसं?

या जगाचा, जग न बघताच निरोप घेतलेल्या त्या चिमुरड्यांच्या आई वडिलांच्या दु:खाच्या कल्पनेने जीव कालवतो, डोळे आसवांनी चिंब होतात. त्यांना देव हे दु:ख झेलण्याचं सामर्थ्यं देवो हीच प्रार्थना!


http://www.washingtonpost.com/

Tuesday, December 11, 2012

लग्नाविना सहजीवन

भारताबाहेर राहणारी शनिवारी संध्याकाळी बर्‍यांचदा जेवायला एकत्र भेटतात तेव्हा हमखास कुणीना कुणी नुकतंच मायदेशातून परत आलेलं असतं. चर्चेचा ओघ, माघारी सोडून आलेला भारत आता किती बदलला आहे इकडे वळतो. तिथला चंगळवाद, वेष, मुलाचं वागणं आणि हल्ली हल्ली ’लिव इन रिलेशनशिप - लग्नाविना सहजीवन’. 

एकंदरीत आत्तापर्यंत होणार्‍या या चर्चांमधून हे जसं सुप्रीम कोर्टाने मान्य केलं आहे तसंच समाजमान्यही झालं आहे असं वाटत होतं, पण अगदीच कुणी कसं माहीत नाही आपल्याला असं सहजीवन असणारे असाही एक प्रश्न मनात डोकावायचा. 

काल दिवाळी २०१२ चा लोकसत्ता वाचला आणि मनात खूप शंका निर्माण झाल्या लग्नाविना राहणार्‍यांच्या मुलाखती वाचून. लेखात आधीच नमूद केलं आहे की अपरिहार्यता हे बहुतेकाचं कारण आहे लग्नाविना सहजीवनाचं. घटस्फोट घेतल्यानंतर पुन्हा त्या फंदात पडायला नको अशी माणसं ही व्यवस्था स्विकारतात किंवा मग पहिल्या लग्नापासून फारकत मिळत नसल्याने नाईलाजाने एकत्र रहाणारी. मुलाखतीतील बहुतांशी सर्वांची नावं बदलली आहेत, अशी जोडपी आपण विवाहीत आहोत असंच सांगतात असाही उल्लेख आहे. 

बहुतेक वेळा पाश्चात्यांचं अनुकरण म्हणूनही अशा रुजू पाहणार्‍या प्रथांवर खापर फोडलं जातं. पण अमेरिकेत तर लग्न करायचं की नाही हे ठरविण्यासाठी दोघं एकत्र रहात असतात आणि कधी ना कधी ती लग्न होतात, म्हणजे लग्नाशिवाय सहजीवन सुरु करायचं हा हेतू नसतोच. लग्नासाठी जोडीदार योग्यं आहे की नाही हे अजमावण्यासाठी हे सहजीवन सुरु होतं. या देशात जेव्हा घटस्फोटाचं प्रमाण वाढलं तेव्हा निर्माण झालेला हा पर्याय आहे. 

मग भारतातील लग्नाविना सहजीवनामागे अपरिहार्यता हेच कारण असेल तर तो लग्नसंस्थेला खरंच पर्याय आहे का?

Wednesday, September 26, 2012

उल्लंघन

"चलायचं?" शांत रस्त्यावर त्याचा दमदार आवाज त्यालाच घुमल्यासारखा वाटला.
"हो, तू सामान घेतलंस ठरल्याप्रमाणे?"
"कमॉन यार, फक्त एक रात्र. उद्या सकाळी परत येतोय आपण." ब्रायनने बेफिकीरपणे उत्तर देत सायकल दामटली. दोघांनीही शर्यंतीत भाग घेतल्यासारखा सायकलचा वेग वाढवला. गप्पांच्या नादात किती अंतर पार केलं ते लक्षात आलं नव्हतं, पण हळूहळू हिरव्यागार झाडीत दडलेल्या काळ्याभोर रस्त्यावरची वर्दळ कमी होत गेली. दोघांच्या सायकली  टपरी सारख्या दिसणार्‍या दुकानासमोर  थांबल्या तेव्हा पाय भरुन आले होते. वाफाळलेल्या कॉफीने ब्रायनच्या चेहर्‍यावर तरतरी आली.
"तू मरगळल्यासारखा वाटतो आहेस. झेपतोय ना प्रवास?" क्रिसला त्याने टोकरलं.
"मी ठीक आहे. आई, बाबा दोघांचा विरोध होता रात्री राहायला. त्यांना दुखावलं की काय असा विचार करत होतो."
"जाऊ दे ना. आई, बाबा करायचं वय आहे का आपलं. सब बकवास है यार. तू सरळ मजा करायला शीक ना."  ब्रायनने बोलता बोलता हाताने टपरीसमोर पडलेला मिठाईचा कण टिचकीने लांब उडवला.
"निघू या? बराच पल्ला गाठायचा आहे." क्रिसने ब्रायनच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं.

पाच हजार फूट उंचीवरच्या माहिती विभागात पोचायला त्यांना तासभर लागला. तिथं पोचल्यावर दोघांचंही भान हरपलं. दोघंही तिथल्या रखवालदारानं टोकेपर्यंत अंधारलेपण अंगावर घेत राहिले. जंगलाची माहिती देणारी सगळी कागदपत्र हातात घेत ते एकेक पायर्‍या उतरायला लागले. खाली पोचेपर्यंत मिट्ट काळोख पसरला होता. वरती घेतलेल्या आणि माहितीपत्रकात मिळालेल्या माहितीवरून अंधारात मुकाटपणे दोन सायकली वाट काटत राहिल्या. अधूममधून सायकली थांबवून बॅटरीच्या प्रकाशझोतात ते नकाशा बघून खात्री करुन घेत होते. सायकलीवर नकाशा पसरुन ठेवताना होणारा आवाजही तिथली शांती ढवळून टाकतो आहे असं वाटत होतं. त्या भयाण शांततेत झाडांची सळसळ, मध्येच उमटणारे विचित्र आवाज दोघांच्या मनातली शंका ठळक करत होते. पण काही न बोलता अनामिक आशेवर ते पुढे सरकत होते.
"आपण रस्ता चुकलोय क्रिस." दुखणार्‍या मांड्यांवर हात ठेवत अखेर ब्रायनने अस्वस्थपणाचा शेवट केला.
"चौथ्यांदा नकाशा बघून बदललेली पायवाट आहे ही. तुला वाटत होतं जोपर्यंत रस्ता दिसतोय तोपर्यत चुकलेलो नाही. पण आपण भरकटलोय. आत्तापर्यंत डांबरी सडक होती. मातीचा रस्ता, पायवाटा तुडवायला सुरुवात करुनही बराच वेळ झालाय." ब्रायन आपलं म्हणणं पटवून देत राहिला.
"मला भिती वाटतेय." क्रिसने एकदम हातातली सायकल सोडून पायवाटेवर बसकण मारली.
"दमायलाही झालंय प्रचंड."  ब्रायनने बॅटरीचा प्रकाशझोत क्रिसच्या चेहर्‍यावर टाकला.
 "अरे तोंडावर कसला उजेड टाकतोस. बाजूला कर ना आधी." क्रिसच्या चिडचिडलेल्या स्वराची पर्वा न करता ब्रायनने आवाज चढवला.
"तुझं लक्ष दुसरीकडे वळवायचा प्रयत्न करत होतो." ब्रायन उगाचच गडगडाटी हसला. क्रिस त्याच्याकडे पाहत राहिला. का हसतोय हा वरवर आणि इतकं खोटं?  प्रश्न त्याच्या ओठावर येण्याआधीच ब्रायनचं वागणं बदललं. तो अस्वस्थ झाला. दोन्ही हातात डोकं धरुन तो मटकन खालीच बसला.  म्हणजे यालाही भितीने घेरलंय तर. वरवर तर  शूरपणाचा, बेफिकीरपणाचा आव आणतो आहे... मनातले विचार व्यक्त न करता  क्रिसने सूत्र हातात घेतली.
"परत जाऊया त्या माहिती विभागात. तो रखवालदार करेल मदत आपल्याला." ब्रायनला क्रिसची कल्पना एकदम पसंत पडली. किती सोपा मार्ग होता इथून बाहेर पडण्याचा. त्याचा चेहरा उजळला. अंगात उत्साह संचारला. सायकलींची चाकं उलट्या दिशेने मार्गक्रमणा करायला लागली.
"हा रात्रीचा अंधार, रातकिड्यांची किरकिर, झाडांच्या काळ्याकभिन्न सावल्या आणि त्यातून मनात निर्माण होणारे चित्र विचित्र आकार. भीती नाही वाटत अशा वातावरणात?" काळोखाचा भेद घेत ब्रायनने विचारलं.
 उत्तर न देता क्रिसने पाण्याची बाटली तोंडाला लावली.
"भुताची गोष्ट  ऐकायची आहे तुला? सांगू?" ब्रायनने आवाजात घोगरेपणा आणत विचारलं.
खटकन ब्रेक दाबत क्रिसने सायकल थांबवली. वेगानं सायकल हाणणार्‍या ब्रायनच्या सायकलीचा कॅरियर पकडत त्याने सायकल थांबवली. ब्रायनला उतरण्याचाही अवधी न देता क्रिस त्याच्या पोटात गुद्दे हाणत राहिला.
"अरे, अरे मजा करत होतो जरा." कशीबशी स्वत:ची सुटका करत ब्रायन सायकलवरुन उतरला. त्याने क्रिसचे हात घट्ट धरले.
"मला भिती वाटते काळोखाची." ब्रायनच्या खांद्यावर डोकं टेकवत क्रिस हृदयाची धडधड संथ करत राहिला.
"मला पण. मी माझी अस्वस्थता तुझी मजा करुन घालवत होतो. तू एवढा घाबरशील असं नव्हतं वाटलं. चल, छोड दे.  सायकली दामटवूया परत."
दोघं न बोलता निघाले. क्रिसला स्वत:च्या भित्रेपणाची शरम आतल्या आत जाळत राहिली. बोलायचं नाही असं ठरवलं असलं तरी त्याला राहावलं नाही.
"तुला आठवतंय ब्रायन? आपण कम्युनिटी हॉलमध्ये बॅडमिंटन खेळायचो.  दिवे गेले तो पहिला प्रसंग माझ्या मनातून गेलेला नाही अद्याप. तेव्हाच माझ्या लक्षात आलं अंधारात जीव दडपतो माझा. छातीवर प्रचंड ओझं असल्यासारखं वाटतं. क्षणात दिवे आले नसते परत तर संपलाच असता खेळ."
ब्रायनचा काहीच प्रतिसाद मिळाला नाही. मनातली भिती मनातच दाबून ठेवत स्वत:ला गप्प ठेवण्याचा तो कसोशीने प्रयत्न करत राहिला. विचारांना वेगळी दिशा द्यायचा प्रयत्न करत क्रिसही शांतपणे सायकल चालवत राहिला.

"थांबू या इथेच. मी पाऊलही पुढे टाकू शकत नाही." ब्रायन झाडाखाली कोसळलाच. क्रिसने मुकाटपणे पाण्याची बाटली त्याच्यासमोर धरली. पण ब्रायनच्या रागाचा उद्रेक झाला.
"भेदरट नुसता. एकत्र यायलाच नको होतं. स्वत:चा जीव घाबराघुबरा करायचा, बरोबर इतरांनाही सतावायचं."
"उगाच मला दोष देऊ नकोस. तूच घाबरला आहेस माझ्यापेक्षा." क्रिस सायकलला टेकून उभा राहिला.
"काय करायचं आता?" तिरसटलेल्यासारखा ब्रायन ओरडला.
"सेल फोन वापर." त्याच्या बोलण्याकडे लक्ष न देता क्रिसने सुचवलं.
"मठ्ठ मुला. एवढी सोपी गोष्ट मी केली नसेन का? बॅटरी संपली आहे केव्हाच."
रागाच्या भरात त्याने फोन भिरकावला.
"फेकतोस काय फोन?" क्रिस फोन उचलायला वळला. पण अचानक अंगात काहीतरी संचारल्यागत ब्रायन धावत पुढे गेला आणि त्याने पुन्हा फोन दूर फेकला. क्रिस बेचैन होत माघारी परतला. ब्रायनचं वागणं त्याला आश्चर्यचकित करत होतं, बुचकळ्यात टाकत होतं.
"तू दमला नाहीयेस ब्रायन. माझ्यापेक्षाही घाबरला आहेस आणि ते नाकारण्याचा प्रयत्न म्हणून मला दूषणं देतो आहेस. मी उगाचच तुला धाडसी समजत होतो." क्रिसला आपलं निरीक्षण नोंदवल्यावाचून राहवेना.
"मानस शास्त्रज्ञ समजतोस स्वतःला? आयला, इतकी वर्ष आपण एकमेकांना जीवलग दोस्त म्हणवतो आणि एक रात्र एकत्र काढणं जमत नाही. दोषारोप आणि अवगुणांची चिकित्सा चालली आहे नुसती. झोप आता." ब्रायनने त्याचं म्हणणं एकदम उडवूनच लावलं.
"मला वाटत होतं त्यापेक्षा फार वेगळे आहेत आपले स्वभाव." क्रिसला झोप येत नव्हतीच पण खूप बोलावं असंही वाटत होतं.
"चल काही तरीच. दहा वर्षातली ओळख एकदम कशी बदलेल?" ब्रायनने क्रिसचं म्हणणं धुडकावून लावलं.
"माणसाची खरी ओळख कठीण प्रसंगात होते." तितक्याच शांतपणे क्रिस उत्तरला.
"बकवास बंद कर आणि मुकाट्याने झोप बाबा आता तू. परत जायचा रस्ता सापडणं मुष्कील झालं आहे. माहिती विभागापर्यंत परत कसं पोचायचं ते कळेनासं झालं आहे. आता कुठे अडकलो आहोत ते माहीत नाही. इथेच झोपू आणि सकाळी उठून बघू पुढे काय करायचं ते."
ब्रायनने संभाषण संपवलंच. एकदा निर्णय झाल्यावर दोघांची थकलेली गात्रं क्षणात विसावली.

सकाळी जाग आली ती क्रिसला. घोरत पडलेल्या ब्रायनची झोपमोड न करता उजेडाची चाहूल घेण्याचा तो प्रयत्न करत राहिला. फर्लागभर इकडे तिकडे भटकूनही गर्द झाडीशिवाय काहीही दृष्टीला पडेना तसं त्याला परतावंच लागलं.
"कुठे आहोत आपण?" डोळे चोळत ब्रायन एव्हाना उठून बसला होता.
"जंगलात हरवलोय. उंच झाडांशिवाय काहीच दिसत नाही नजर टाकू तिकडे."
ब्रायनला एकदम वास्तवाची जाणीव झाली, त्याचबरोबर भूकेचीही.
"काहीतरी पोटात ढकलायला हवं. आपल्या घरातली माणसं लागली असतील का तपासाला?"
"तंबू ठोकून त्यात आहोत असाच समज झाला असेल. आज संध्याकाळपर्यत घरी पोचलो नाही तर शोधाशोध सुरु होईल." थकल्या स्वरात क्रिस म्हणाला.
ब्रायन ताडकन सावरुन बसला.
"मी आवरतो माझं आणि मग तू एक दिशा पकड, मी दुसर्‍या दिशेने जातो. कुणीतरी एक पडूच जंगलाच्या बाहेर आणि मग मदत मिळवून दुसर्‍याच्या मदतीला परत येऊ."
"नको, नको. तसं नको करायला. आत्ता आपण एकत्र आहोत. एकमेकांना धीर देऊ शकतो. एकेकटे पडलो की पुन्हा एकमेकांना शोधणंही कठीण जाईल." क्रिसने त्याचा पर्याय धुडकावून लावला.
"तू इथं राहा. मी पुढे पाहून येतो." ब्रायनने तयारी दर्शविली.
"नाही. एकत्रच राहायचं आपण." क्रिसच्या ठाम स्वराने ब्रायन वैतागला.
"कुठलाच मार्ग पटत नाही तुला. कर तुला काय करायचं ते." रागारागाने त्याने येरझार्‍या घालायला सुरुवात केली. काहीतरी तोंडात टाकण्यासाठी त्याने पिशवी उलटसुलट केली. त्यात खायला काही सापडेना तसा त्याचा पारा चढला. गोल गोल फिरवत त्याने जोरात पिशवी आपटली.
"माझ्या थर्मासमध्ये दोन घोट आहेत कॉफीचे." क्रिसला त्याचं वाक्यही पुरं करु न देता ब्रायनने थर्मासच तोंडाला लावला. सगळी कॉफी संपली तसा तो भानावर आला. क्रिसचे आभार मानण्याचं सोडाच त्याला एखादा घोट ठेवण्याचंही त्याला सुचलं नव्हतं.
"तुला विचारलंच नाही  मी. भुकेपुढे कोसळलायच होतं मला." पुढे काय बोलावं तेच त्याला सुचेना. क्रिस हसला.
"चल, ताजातवाना झाला असशील तर  मार्गक्रमणेला सुरुवात करु."

चालता चालता दोघं एकमेकांना माहीत असलेल्या गोष्टीच पुन्हा पुन्हा सांगत होते. नाही म्हटलं तरी दहा वर्ष ते शेजारीच वाढले होते. पण तरी क्रिसचा अतिव्यवस्थितपणा, व्यवहारी दृष्टिकोन याव्यतिरिक्त त्याची फारशी ओळख नव्हती असं वाटत होतं ब्रायनला. एकत्र दंगामस्ती, मित्रमैत्रिणी सगळ्या वरवरच्या विषयातूनही त्यांना आपण जवळचे मित्र आहोत असं वाटायचं. क्रिसचं प्रसंगावधान, हुशारी आज प्रथमच ब्रायनच्या लक्षात येत होती. ब्रायनच्या वागण्याचं सुप्त आकर्षण असणार्‍या क्रिसला त्याचा उतावळेपणा आणि बेजबाबदार वृत्ती इथे आल्यावरच लक्षात आली. त्याच्या या स्वभावामुळे परिस्थितीवरील ताबा सुटू शकतो या  विचाराने क्रिसला घेरलं होतं.
"तू अजून जातोस मानसोपचारतज्ज्ञाकडे?" अचानक क्रिसने विचारलं.
"सहा महिन्यातून एकदा. आईने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्या वेळेस आठवड्यातून एकदा जात होतो. आमच्या सुखी कौटुंबिक जीवनाचं चित्र तिनं पायदळी तुडवलं त्याचा राग मनात धुमसत होता. वाटायचं, बाबासारखा नवरा, तीन मुलं सगळं सुरळीत असताना आईला काय गरज होती असा वेडेपणा करण्याची?"
"ते कोडं शेजारीपाजारी अजून सोडवतायत. सगळ्यांना वाटायचं तुझ्या बाबाचं प्रकरण असावं बाहेर, पण ते तसे नाहीत हेही जाणून  होते सारे. त्यामुळे आत्महत्येच्या प्रयत्नाचं खरं कारण कधी कुणाला कळलंच नाही. तुझी आईपण सहा महिन्यात पूर्वीसारखी हसती खेळती झाली. साराही बर्कलेला गेली ना पुढच्या शिक्षणासाठी?" क्रिसने कितीतरी वर्ष मनात असलेला प्रश्न विचारला. ब्रायन काही क्षण नुसताच क्रिसकडे पाहत राहिला.
 "तेच कारण होतं आईच्या आत्महत्येच्या प्रयत्नाचं."
"म्हणजे?" क्रिसला त्याच्या बोलण्याचा अर्थ उलगडेना.
"सारावर तिच्या मैत्रिणीच्या वडिलांनी बलात्कार केला होता. पण ती स्वत:च्या कोशात राहिली. सुगावाही लागू दिला नाही तिने. तिच्या मनात गावातून बाहेर पडायचं एवढा एकच विचार घोळत होता. बर्कलेला प्रवेश मिळाला तो आईच्या आत्महत्येच्या प्रयत्नाच्या आधी." क्रिसला संकोचल्यासारखं झालं. असं काही झालं असेल या शक्यतेचा विचारही त्याच्या मनात आला नव्हता.
"ब्रायन, तू मला हे सगळं सांगितलं नाहीस तरी चालेल रे. मला कळतंय तुला किती त्रास होतो आहे सांगताना." घाईघाईने क्रिसने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला.
"कुणाला तरी कधी ना कधी तरी सांगितलंच असतं ना. मी देखील कोंडून ठेवलं आहे सगळं मनात. ज्या दिवशी बर्कलेच्या प्रवेशाचं साराने सांगितलं त्याच वेळेस बलात्काराचंही. बाबा एकदम पेटून उठले. आई दु:खाने काळवंडली आणि मी भावनेच्या भोवर्‍यात अडकलो. निराशेचे झटकेच यायला लागले. सतत मनाला अस्वस्थपणाने घेरलेलं असतं. तो लपवताना निष्काळजीपणा पांघरावा लागतो. जीव गुदमरतो. फार फार थकवा येतो, मनाने, शरिराने दुर्बळ होऊन जायला होतं अगदी. साराने आपल्या मनातलं दु:ख सांगण्याएवढं जवळचं मानलं नाही, त्यामुळे करण्यासारखं काही उरलं नाही या रागाने बाबांनी साराशी अबोला धरला. परिस्थिती इतकी ताणली गेली की आत्महत्येनंच या सगळ्याचा शेवट होईल असं आईच्या मनाने घेतलं."
"बापरे, मला कल्पनाही करवत नाही." क्रिसच्या शब्दातून हळुवारपणा ओथंबत होता.
"त्यातून आई वाचली आणि बाबांनी तिला पुन्हा हसतंखेळतं केलं. आता मीही तसा ठीक आहे." अचानक मनावरचा ताण ओसरल्यावर ब्रायनला थकवा आला. त्याने मातीत अंग टाकलं.
"तब्बल दोन तास सायकली दामटवल्या आपण." क्रिसही तिथेच टेकला.
"भूक लागली आहे जबरदस्त. तुझ्याकडे उरलय काही?"
"संपलय सगळं." क्रिसच्या स्वरात निराशा होती.
"काहीतरी कर रे बाबा. तीन दिवस झाले. पोटात अन्नाचा कण नाही गेलेला. पाण्यावर किती दिवस काढायचे? एक वहाळ शोधायला दोन तास. मला नाही जमणार हे. मारुन टाक तू मला. मारून टाक एकदाचं." अचानक क्रिसचे हात जबरदस्तीने ब्रायनने आपल्या गळ्याभोवती आवळून घेतले, गुंतवले. क्रिस भडकला.
"मुस्काट फोडून टाकेन तुझं. शांत हो बघू आधी तू. काय हा वेडेपणा. किती उतावळेपणा करतोस."
हमसाहमशी रडत ब्रायन बाजूला झाला. दोघं एकमेकांशी एक शब्द न बोलता पडून राहिले. पाचदहा मिनिटात ब्रायनचा डोळा लागला.  थोडावेळ क्रिस विचार करत राहिला. कधीतरी आपसूक तोही झोपला.

रात्री अपरात्री केव्हातरी झोपेत ब्रायन चाळवला. उठून बसला आणि रडायलाच लागला. जीवघेणी शांतता दोघांच्या मध्ये रेंगाळली.
"क्रिस मी आता एक पाऊलही पुढे टाकू शकत नाही. तूही दमला आहेस ते ठाऊक आहे मला. पण मानलं तुला. तुझ्या इतकी सहनशक्ती माझ्यात नाही."
बोलता बोलता ब्रायनचं पोट ढवळून निघालं. पोट दाबून तो तिथून बाजूला झाला. उलटीची भावना येत असूनही त्याला कोरडा खोकला येत राहिला. बराचवेळ. क्रिस न बोलता ब्रायनच्या पाठीवर थोपटत राहिला.
"तू निघ मला सोडून. नाही तर इथेच मरु आपण." खोकला थांबला तसं ब्रायन क्रिसला विनवीत राहीला.
"तू विश्रांती घे म्हणजे असे विचार डोकावणार नाहीत. तुला सोडून कसा जाईन मी? आपण असं करु, ही जागा मुक्कामाची म्हणून ठरवू. तू इथेच थांब. मी मदत मिळवण्याचा प्रयत्न करतो. नाहीच तर परत इथेच भेटू. तू हलू नकोस." क्रिसच्या बोलण्यावर विचार करण्याचीही क्षमता ब्रायनमध्ये उरली नव्हती. तो निपचीत पडून राहिला. ब्रायनचा डोळा लागल्यावर क्रिस उठला. एकाकी, मदतीच्या आशेवर वणवण फिरत राहिला. पिशवीत कोंबलेल्या छोट्या आरशाच्या प्रतिबिंबाने लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत राहिला. पण प्रकाशाची तिरीपच झाडांमधून आत येत नव्हती तिथे त्या आरशाचा काय उपयोग? पाय रेटत, थकलेल्या देहाने तो मुक्कामाच्या ठिकाणी परतला. ब्रायन निपचीत पडून होता. क्रिसच्या मनातलं ब्रायनच्या बेदरकारपणाचं सुप्त आकर्षण आता त्याच्याबद्दलच्या करुणेत बदललं. तो तसाच बसून राहिला. त्या रात्री चारपाच वेळा ब्रायनला उलट्या झाल्या. त्याचं पोटही खराब झालं. अन्नपाण्यावाचून उकिरडा झालेल्या त्या जागेवरुन ब्रायनला अक्षरश: ओढत, फरफटत त्याने बाजूला नेलं.

दोघांचाही डोळा लागेना. गलितगात्र अवस्थेत रात्र कशीबशी पार पडली. डोळा लागतोय असं वाटत असतानाच क्रिस दचकून जागा झाला ते ब्रायनच्या गदगदा हलवण्याने. तेवढ्या श्रमानेही ब्रायन परत कोसळला. अडखळत त्याच्या तोंडातून कसेबसे बाहेर पडले.
"क्रिस, माझा जीव घे, मदत कर मित्रा. मारुन टाक, मारुन टाक रे मला. पाय धरतो तुझे पण असा जिवंत नाही राहू शकत मी."
"काय बोलतोस हे ब्रायन?" क्रिस हवालदिल होऊन रडायला लागला.
"तू शांतपणे विचार कर क्रिस. इथून जंगलाबाहेर आता शोधपथकाशिवाय पडूच शकत नाही आपण. तुझ्यावरही मर्यादा पडतायत माझ्यामुळे. माझी औषधंच वाचवू शकतात मला. पण ती इतक्यात मिळण्याची शक्यता नाही. असातसा मरणारच आहे तर तूच यातनांतून सुटका कर माझी. तुलाही माझ्या अडथळ्याशिवाय रस्ता शोधणं सोपं पडेल."
क्रिसने जीर्ण झालेल्या ब्रायनला घट्ट आलिंगन दिलं.
"दोस्ता तुझा उतावळेपणा बोलतोय हा. भलतंच काही तरी सांगू नकोस. आपल्या शोधाला सुरुवात झालेली असेलच. अजून दोन तीन दिवस असेच काढू शकतो आपण. नंतर रुग्णालयातच हलवतील आणि तब्येती सुधारतील."
ब्रायनच्या नजरेला नजर देत क्रिसने त्याच्या आशा वाढवण्याचा क्षीण प्रयत्न केला. तो थोडासा शांत झाल्यावर क्रिस उठलाच. काही करुन त्याला जंगलाच्या बाहेर पडायचं होतं. मदत मिळवायची होती. पायात जोर नसला तरी पावलं भरभर टाकण्याचा तो प्रयत्न करत होता.
’खरंच ब्रायनला मारावं लागलं तर?" क्रिसच्या अंगावर मनात डोकावलेल्या या विचारानेच काटा आला. दहा वर्ष संगतीत असलेल्या मित्राला आपण असा  कायमचा निरोप द्यायचा?
ब्रायनच्या अवस्थेवरुन एखादाच दिवस आणखी असं वाटत होतं. मग कशाला जीव घ्यायचा? नैसर्गिकपणे जे होईल ते होईल. पण हाच शेवट असेल तर यातनातून तरी सुटका होईल त्याची माझ्यामुळे.  कधी किडामुंगीलाही न दुखावलेल्या क्रिसच्या छातीचे ठोके कल्पनेनंच ढोलकी बडवल्यासारखे कानात आपटायला लागले. तो तसाच  माघारी पळत सुटला. घसा कोरडा पडलेल्या, घामाघूम क्रिसला आता हृदयविकाराचा झटका स्वत:लाच येईल असं वाटत होतं.
"फार लांब नाही गेलो. तुझ्याबद्दलच्या विचारांनीच शीण आला. काळजीने धावत आलो परत." क्रिसच्या जवळ जाऊन तो गुडघ्यावर बसला. ब्रायनच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहायला लागल्या.
"तुझ्यासारखा मित्र लाभला मला. नशिबवान आहे मी. कृपा कर मित्रा. सोडव मला यातनातून. खुनाचा आरोप नाही यायचा तुझ्यावर. सांगूच नको कुणाला काय घडलं ते. दूर दूर निघून जा. ऐक माझं." इतकं बोलतानाही ब्रायनला धाप लागत होती. शब्द ओठातून बाहेर पडताना अडखळत होते.
क्रिसच्या कानावर एकेक शब्द आदळत होता. पण नजर शून्याचा वेध घेत होती. त्याचा हात कधी खिशात गेला हेही त्याला कळलं नाही. खिशातली छ्प्पनसुरी एका झटक्यात त्याने ब्रायनच्या हाताच्या शिरेत घुसवली. मनगटातून रक्ताची धार लागली. आधीच जीर्ण झालेल्या त्या कुडीने क्षणात विसावा घेतला.

तांबारलेल्या नजरेने क्रिस गोठल्यासारखा पाहत राहिला. जोरात किंचाळावंसं वाटूनही त्याच्या घशातून आवाज फुटेना. तो ब्रायनला गदगदा हलवित राहिला. दु:खाने कोसळला. ब्रायनने सांगितल्याप्रमाणे त्याला तिथून हलवेना. निष्प्राण झालेल्या मित्राची संगत त्याला सोडवेना. सडत जाणार्‍या देहाची भुकेल्या, थकलेल्या मनानं क्रिस राखण करत राहिला.

तब्बल बहात्तर तास गुडघ्यात डोकं खुपसून बसलेल्या क्रिसचा चेहरा बॅटरीच्या प्रकाशझोतात उजळून निघाला.
"ब्रायननेच करायला लावलं हे, त्याच्यामुळेच केलं मी हे कृत्य. मदत हवी होती त्याला. मदत." ब्रायनच्या आई वडिलांच्या नजरेला नजर देत क्रिस  त्याच्या आई वडिलांच्या कुशीत कोसळला.

हातातल्या पाकिटावर ब्रायनच्या घरचा पत्ता लिहीत वडिलांच्या हातात पत्र सोपवलं आणि क्रिसने केविलवाण्या चेहर्‍याने तुरुंगातल्या बाकड्यावर देह टाकला. चेहर्‍यावर आडवा हात टाकून तो तसाच पडून राहिला. पुढे काय हे प्रश्नचिन्ह होतं. कोर्टाचा निकाल त्याच्या हातात नव्हता. आई- वडिलांचे काळवंडलेले चेहरे पाहून  पोटात ढवळून निघत होतं. पण कुठं तरी आपलं मन त्यांना कळल्याच्या खुणा पाहिल्यावर क्रिसच्या मनाला थोडीफार शांतता लाभली.
आता पुढचा मार्ग असेल तसा  स्वीकारण्याची मानसिक तयारी झाली होती क्रिसची. तरीही ब्रायनच्या आई वडिलांनी आपली आणि त्यांच्या मुलाचीही बाजू समजून घ्यावी एवढीच क्रिसची इच्छा होती. ब्रायनचे आई वडील सारी हकिकत ऐकतायत, पत्रातलं अक्षर न अक्षर पुन्हा पुन्हा वाचतायत, त्यांनी क्रिसला, ब्रायनला दोघांनाही समजून घेतलं आहे.  डबडबून आलेल्या डोळ्यांसमोचं अंधुक चित्र भंगता नये इतकाच ध्यास त्याच्या मनाला लागला....

Friday, September 7, 2012

काही गोड तर काही कडू...

"आय   एम एक्स्ट्रिमली ऑफेंडेंड...." तलावाकाठचं घर बघायला आम्ही आत शिरलो आणि  विनसीने माझा दंड पकडला. माझी मान आश्चर्याने तिच्याकडे वळली. तिचा रागाने लालेलाल झालेला चेहरा, शरीराला सुटलेली सूक्ष्म थरथर... आपला गुन्हा काय हेच मला कळेना.
"तुझा मुलगा तुमच्या भाषेत बोलतोय."
’ऑ?’ तो केव्हा मराठी बोलत होता याच विचारात गुंतले क्षणभर. एकदम कोडं सुटलं. मी घाईघाईने म्हटलं,
"तसा काही हेतू नव्हता त्याचा किंवा आमचा कुणाचाच..." हळूहळू ती शांत झाली. विनसी आमची एजंट. घर विकत घ्यायचं ठरल्यावर तिच्याबरोबर फिरत होतो. परदेशात राहत असलो तरी आईशी बोलायचं ते मराठीतच हे ब्रीद वाक्य मुलांच्या मनावर पक्कं ठसलेलं आहे त्यामुळे पोरं मराठीत आणि तिला एकटं पडल्यासारखं वाटू नये म्हणून माझी उत्तरं इंग्लिशमध्ये अशी कसरत गाडीत झाली होतीच. पण अगदी थोडावेळ. म्हणजे सुरुवात व्हायची मराठीतून पण माझं इंग्लिश ऐकल्यावर उरलेलं सारं मुलं इंग्लिशमध्ये बोलायची. पण जे काही बोलणं मराठीत झालं त्याचं पर्यवसान असं होईल याची शंकाही आली नाही. विनसी माझ्यावर उखडलेली मुलाने पाहिलं. आता तो संतापला मनातून. पण आजीच्या वयाच्या माणसाला काही बोलायचं नाही एवढं तारतम्य त्याच्याकडे होतं. मुलीला काय झालं ते कळण्याएवढी ती मोठी नाही. ती तितक्यात काहीतरी मला सांगत आली, मराठीत. काय करावं ते सुचेना, मराठीतूनच तू इंग्लिश बोल हे त्या वेळेला कसं सांगणार? मी घाईघाईत तिला म्हटलं.
"शी डज नॉट लाइक इफ यू स्पीक इन इंग्लिश." मुलीने समजल्यासारखी भाषा बदलली. पुढे तिने दाखवलेली घरं यात्रिकपणेच पाहिली. घर शोधण्याचा उत्साह एकदम बारगळला.
नंतर तिचं क्षमा मागणारं इ मेल आलं. पण त्याला काय अर्थ?

एकीकडे मुलांनी आपली भाषा विसरू नये म्हणून प्रयत्न करायचा, आणि त्याचवेळेस ’फक्त घरी बोला हं मराठी आमच्याशी, बाहेर असलो की आमच्याशी इंग्लिशच बोलायचं’ असं सांगायचं म्हणजे इफ एल्स करून कार्यालयातली प्रोग्रॅमिंगची भाषा वापरल्यासारखंच की. मुलांचा संगणक केल्यासारखं. पुन्हा त्यातून त्यांना इंग्लिशमध्येच बोला म्हटलं की लगेच ती पण अस्त्र घेऊन तयार असतात,
"तूच तर सांगतेस आमच्याशी मराठीतच बोलायचं."
"अरे पण..." स्पष्टीकरण देतानाच वाटत राहतं  कळ दाबली की मराठी किंवा इंग्लिश अशी खेळण्यासारखी अवस्था तर करून टाकत नाही ना आपण त्यांची?.
मुलगा तर अशा वयात,
"हॅ, आता तर मुद्दामच मराठी बोलू आपण तिच्यासमोर. आणि तुम्ही पण ऐकून काय घेता?  ’फायर’ करा ना तिला." इथे अमेरिकन बाणा असतो त्याचा.
"स्पॅनिश बोलणार्‍या लोकांबरोबर काय केलं असतं तिने?  सांगितलं असतं का असं त्यांना?."
"घरं विकायची तर फ्रेंडलीपणा असायला नको का?"
"तिच्या जागी तुम्ही असतात तर तिने नसतं का तुम्हाला ’फायर’ केलं?’

एक ना अनेक मतं. आम्हाला वाटत राहतं, तिला जे सांगायचं ते  सौम्य शब्दात सगीतला असतं तर? तुम्ही घराबद्दल बोलत असाल तर इंग्लिशमध्येच बोला, म्हणजे मलाही समजेल काय मतं आहेत तुमची... असं काहीतरी. तिच्या वयाकडे, मेहनतीकडे पाहून आमचा काही जीव धजावत नाही तिला काही बोलण्याचा किंवा ’फायर’ करण्याचा.  मनातल्या मनात निषेध करत माझं तिच्याबरोबर घर बघणं चालूच राहतं.... आणि अचानक एक दिवस तिचं ईमेल येतं.
"मी सेवानिवृत्त होणार आहे लवकरच. त्याआधी तुम्हाला माझ्या बदली दुसरी एजंट देते. आणि एक लक्षात ठेवा. तुम्ही कस्टमर आहात. आवडली नाही एजंट तर यू कॅन फायर हर.... विनसी"

गेले तीन आठवडे माझा सतरा वर्षाचा मुलगा भारतात आहे. खूप फिरतोय, अंजिठा, वेरूळ, रायगड, बंगळूर, कितीतरी ठिकाणं आणि प्रत्येक ठीकाणच्या नातेवाईकांना भेटतोय. त्याचं कौतुक  होतंय तसंच त्याच्या मराठी बोलण्याचंही. विनसीची समस्या सोडवता आली नाही खरी, पण जेव्हा मराठीच्या कौतुकाची पावती मिळते तेव्हा बरं वाटतं, असं मनात म्हणत मी आपलं नुकतंच माझ्या मावसभावाचं इंग्लिशमधून आलेलं पत्र पुन्हा पुन्हा वाचत राहते.
You should be proud of your boy. Even I am unable to speak Marathi without using english words, however he spoke purely in marathi.Great, hats off to you.

याचसाठी केला होता अट्टाहास, त्याची काही गोड फळे तर काही कडू, एकाच नाण्याच्या दोन बाजू....


Thursday, August 30, 2012

दैनिक ’प्रहार’ मधील माझा लेख

’जिज्ञासा थिएटर्स’ या  रत्नागिरीतील संस्थेसाठी, दैनिक ’प्रहार’ साठी लिहलेले अनुभव. इथे फक्त मी काय केलं ते सांगण्याचं प्रयोजन नाही तर अभिनय, दिग्दर्शन करताना येणारे अनुभव हा महत्वाचा उद्देश आहे. हे अनुभव तुम्हालाही आवडतील ही अपेक्षा.

"अवं असं डोसक्यात राक घालून..."  रंगीत तालमीचे संवाद सुरु होते.  उत्साह, गडबड, हास्य विनोद असं वातावरण होतं. कलाकाराचे संवाद सुरु झाले की थोडीशी शांतता, कुजबुजते आवाज. आत्ताही प्रकाशव्यवस्थेसाठी एक दोन वाक्य प्रत्येक कलाकाराला म्हणायची होती. मी प्रकाशव्यवस्था करणार्‍या माझ्या नवर्‍याला, विरेनला हातवारे करुन सूचना देत होते. तितक्यात माझी तीन वर्षाची मुलगी मला येऊन फक्त बिलगली. बस, तेवढ्याने कलाकाराची तंद्री भंग पावली.
"आय कॅन्ट डू धिस...." रागाने लाल झाले ते. आजूबाजूला कुजबुजणारे, जोरजोरात सूचना देणारे सगळे आवाज बंद पडले. असह्य शांतता वातावरणात पसरली. काय करावं ते सुचेना. प्रसंगावधान राखून विरेनने दुसर्‍या कलाकाराला संवाद म्हणायची सूचना केली. तो कलाकारही शांत झाला. दुसर्‍या दिवशी प्रयोग, आदल्या दिवशी हा प्रकार. रात्रभर एकच प्रश्न मनाला छळत होता.
"कशाला पडतो या फंदात? फायदा तर काहीच नाही. वेळ आली तर आपलाच खिसा सैल सोडायचा, महिनेच्या महिने तन, मन, धन ओतायचं. आणि असा प्रसंग आला की मूग गिळून गप्प बसायचं. कशासाठी हे सगळं?"

दुसर्‍या दिवशी एकांकिका मस्त रंगल्या. पडद्यामागचे, पुढचे कलाकार असे  पिझ्झा खायला बसलो आणि त्या क्षणाला पुढच्या वर्षीच्या एकांकिकेचे बेत सुरु झाले. झालं गेलं सारं विसरुन पुन्हा ताजेतवाने झालो ते पुढच्या एकांकिकेसाठी.  इतकी असते ही नशा? कटु आठवणी पुसट होत पुन्हा पुन्हा त्याच मार्गाला नेणारी? नकळत मन मागे गेलं. नुसता अभिनय करण्याचं समाधान होतं त्या वेळेपर्यंत पोचलं, किंबहुना अभिनय म्हणजे काय हेही कळत नव्हतं तिथे जाऊन उभं राहिलं.  पालक मुलांना वेगवेगळ्या छंद वर्गात घालून पूर्ण गुंतवून टाकत नसत. शाळेतर्फे भाग घ्यायचा, शिक्षक म्हणतील ते करायचं, त्यावेळची ही गोष्ट.

"ऊठ, ऊठ" रात्री कधीतरी स्टेजवर डुलकी काढत बसलेल्या मुलांमधून बाईंनी उठवलं. कुणीतरी कळ दिल्यासारखं धडपडत उठून मी, ’मी ही ही एकटीच नाचते...’ हे गाणं म्हणत नाच केला तो पहिलीत असताना. देवरुखच्या भोंदे शाळेच्या पडवीसमोर पुढे फळ्या वगैरे घालून  वाढवलेलं स्टेज. शाळेतली कार्यक्रम करणारी मुलं मागे रांगेत बसलेली.  सर्वच मुलं रात्र बरीच झाल्याने  डुलक्या काढत होती . नाव पुकारलं  की उठायचं, नाच, गाणं असं काहीतरी उरकायचं आणि परत मागे जाऊन बसायचं...

त्यानंतर आम्ही देवरुखहून वडिलांच्या बदलीमुळे पालघरला आलो.  एक दिवस, मोगरे बाईंनी वर्गातल्या दोघा तिघांना शाळा सुटल्यावर भेटायला सांगितलं. तो दिवस आजही जसाच्या तसा लक्षात आहे. कोणी काय केलं आणि बाई किती ओरडणार हेच विचार मनात घोळवत ’त्या’ वर्गात पोचलो.
"शाळेचा रौप्यमहोत्सव आहे. तेव्हा दहा मिनिटांचा प्रवेश बसवणार आहोत." पालघर ठाणे जिल्ह्यात  गुजरातच्या सीमेवर आहे पण, नाटकांचा प्रभाव अजिबात नाही; निदान तेव्हा तरी नव्हता. त्यामुळे बाई  प्रवेश बसवणार म्हणजे नक्की काय करणार हे ही ठाऊक नव्हतं, अभिनय वगैरे गोष्टी फार दूरच्या. बाई काहीतरी करायला सांगताहेत ते करायचं इतकंच.
आज त्या प्रवेशातले आनंदीबाईचे फोटो पाहताना शाळेच्या मोठ्या मैदानावर उभारलेला रंगमंच, नऊवारी नेसलेली, नथ घातलेली आनंदीबाई, राघोबा, पेशवे  इतकंच डोळ्यासमोर येतं आणि नंतर घरी, शाळेत झालेलं कौतुक. त्यानंतर एखाद्या वर्षाने शाळेत केलेला टिळकांवरचा प्रवेश. मला टिळक केलं होतं आणि खुर्चीवरून उठताना धोतर सुटल्याने टिळक खुर्चीवरच बसून राहिले इतकं आठवतं.

वडिलांची बदली कणकवलीला झाल्यावर चित्र पालटलं. कोकण भाग नाट्यप्रेमी.  एस. एम. हायस्कूलच्या करंबेळकर बाई, लोखंडे आणि साळुंके सरांच्या तालमीत  नाथ पै एकांकिकेसाठी शाळेतर्फे एकांकिका नेत त्यामध्ये भाग घेणं सुरु झालं; तेव्हा स्पर्धेत भाग घेणं, अभिनय करणं त्यासाठी मेहनत घेणं म्हणजे काय ते समजायला लागलं.  पालघरला असं वातावरण कधीच पाहिलं नव्हतं त्यामुळे तर फार अप्रूप होतं या सार्‍या गोष्टींचं. बच्चू बर्वेची अफलातून दिवास्वप्ने, गजरा अशा एकांकिका त्या वेळेस स्पर्धेसाठी शाळेने केल्या. डिंसेबरच्या शेवटच्या आठवड्यात असणार्‍या या एकांकिका स्पर्धांवर स्पर्धकांनी आणि प्रेक्षकांनी असीम प्रेम केलं. जेव्हा जेव्हा अभिनयासाठी  पारितोषिक  मिळालं त्या वेळेस  झालेला आनंद अवर्णनीय होताच,  पण त्याचबरोबर शाळा सुटल्यावरच्या तालमी,  शिक्षकवर्गाने केलेलं कौतुक  हे  फार मोलाचं होतं.

काही वेळेस आनंद आणि निराशेचा अनुभव एकाचवेळी पदरी येतो. अबोल झाली सतारमधील  सविताच्या भूमिकेला नाथ पै एकांकिका स्पर्धेत मला पहिलं बक्षीस मिळालं, आनंद द्विगुणित झाला कारण स्त्री गटात दुसरं तिसरं पारितोषिक कुणालाही मिळालं नव्हतं. पण या आनंदाला गालबोट लागलं ते परिक्षकेच्या शब्दांनी.  एकांकिका, सतारवादक रमेशला झालेल्या अपघातानंतर रुग्णालयात सविता त्याच्यावर होणार्‍या शस्त्रक्रियेची वाट पहात असताना घडते. अपघात झालेल्या रमेशची बायको इतकी नटून थटून, सुंदर साडी नेसून कशी असा प्रश्न परिक्षक बाईंना पडला आणि प्रेक्षागृहात हास्याची लकेर उमटली. दीपक परब एकांकिकेचे दिग्दर्शक. हा दिग्दर्शनाचा भाग आहे, मी वाईट वाटून घेऊ नये असं म्हणत त्यांनी  माझी समजूत घातली. बहुधा परिकक्षकांबरोबरही ते बोलले असावेत. खरी हकिकत अशी होती की सविता रमेशच्या आवडीची साडी नेसून, नटून थटून तयार झालेली असते.  तो रस्ता ओलांडून त्याच्या सतार वादनासंदर्भात आलेल्या बातमीसाठी वर्तमानपत्र आणायला जात असताना ती गॅलरीत उभी असते. रस्त्यापलीकडच्या दुकानात तो वर्तमानपत्र घेतो आणि ते फडकवत भान विसरून रस्ता ओलांडतो. अपघात होतो. आता अश्या वेळेस ती साडी न बदलता असेल तशीच रुग्णालयात पोचणार ना? याचा उल्लेख एकांकिकेत अर्थातच आहे. हा अनुभव माझ्या मनावर खोल रुतून राहिला आणि नकळत तो पुढे उपयोगी पडत राहिला.

 एकांकिकेतल्या कामाचा आनंद घेत असतानाच  अविनाश मसुरेकरांनी बसवलेल्या मंतरलेली चैत्रवेल नाटकात पन्नाशीच्या आसपासच्या स्त्रीची,  अत्यंत करारी, काहीशी क्रुरपणाकडे वळणारी लीलाबाईंची भूमिका केली ती बहुधा अकरावीत असताना. प्रौढ बाईची रंगभूषा केल्यावर वेगळंच वाटायचं. या नाटकाचे खूप ठीकाणी प्रयोग झाले. बहुतेक ठिकाणी प्रयोगाला तुफान गर्दी असायची. गर्दीची नशा उतरली ती मसूर गावात. जेमतेम पाच पंचवीस लोकं भल्या मोठ्या नाट्यगृहात पाहिल्यावर नाटक कुणासाठी करायचं ह्या  चिंतेने सार्‍यानाच घेरलं.
"भरपूर लोकं समोर आहेत असं समजून आपापली भूमिका करायची." स्वत:ची निराशा लपवीत दिग्दर्शकांनी कानपिचकी दिली आणि त्या पाच पंचवीस प्रेक्षकांसाठी प्रत्येक कलाकाराने जीव ओतून काम केलं. खरं तर अविनाशनी सांगितलं त्याची अंमलबजावणी केली.
अपंग मुलीला सांभाळण्याचं काम करण्यासाठी आलेल्या लिलाबाई त्या मुलीचा आत्यंतिक द्वेष करतात. लिलाबाईंच्या कोड्यात टाकणार्‍या वागण्याचं रहस्य उलगडतं ते शेवटी. त्यानंतर लिलाबाईंबद्दल कीव, सहानुभुती वाटायला लागते. पण तोपर्यंत प्रेक्षकांच्या मनातला राग पराकोटीला पोचत असे.
नाटक संपल्यावर मला कुणी ओळखतच नसे याचं थोडंसं दु:ख होई पण तो रंगभूषेचा प्रभाव होता, रंगभूषाकाराला मिळालेली ती दादच. लिलाबाई अशी ओळख करून दिल्यावर आधी आश्चर्य आणि नंतर लिलाबाईंवर दगड टाकावेत असं वाटत होतं शेवटपर्यंत अशा भावना  प्रेक्षक व्यक्त करत. भूमिकेच्या पसंतीची ती वेगळीच पावती होती.

कणकवलीहून रत्नागिरीला आम्ही आलो त्या वर्षी जे. के. फाईल्सच्या ’वर्कर्स’ या सुहास भोळे लिखित आणि दिग्दर्शित एकांकिकेने नाथ पै स्पर्धेत बरीच बक्षिसं मिळवली होती. त्याचवेळेस मलाही अबोल झाली सतार एकांकिकेसाठी स्त्री कलाकारांमध्ये अभिनयाचं प्रथम पारितोषिक मिळालं. यामुळेच रत्नागिरीला आल्याआल्या सुहास भोळेंशी संपर्क साधता आला आणि फक्त दोन महिन्यात त्यांच्या पालखी एकांकिकेतून पुन्हा कणकवलीला स्पर्धेसाठी जाता आलं. नंतर त्यांच्या जिज्ञासा संस्थेतर्फे भिंत, दंगल अशा एकांकिका, प्रतिबिंब नाटक या सर्वाचे स्पर्धांसाठी आणि इतर ठिकाणी असंख्य प्रयोग केले.  बक्षिसं मिळवली. मंतरलेले दिवस होते. दंगलची भूमिका तर आठ दिवसात सुहासनी बसवली होती. शिर्के हायस्कूल मध्ये केलेल्या तालमी, नाटक, एकांकिकेसाठी सर्व कलाकारांनी केलेला प्रवास. गप्पा, गोष्टी, रुसवे फुगवे....मनाच्या कोपर्‍यात दडलेल्या आठवणी उलगडताना हे सारं पुन्हा अनुभवल्यासारखं वाटतं.  वटवट सावित्री, गाठ आहे माझ्याशी, माणूस नावाचं बेट, मोरुची मावशी अशी अनेक नाटकं, अविनाश फणसेकर, श्रीकांत पाटील अशा रत्नागिरीतील नामवंत दिग्दर्शकांबरोबर करता आली.  फणसेकर सरांनी त्यांच्या महाविद्यालयातील विद्यार्थिनींच्या एकांकिकेला दिग्दर्शन करण्याचीही संधी दिली तो दिग्दर्शनाचा पहिला अनुभव.

तेव्हा कधी जाणवलं नव्हतं ते पार साता समुद्राकडे आल्यावर जाणवतं. इतकी वर्ष नुसतं अभिनय करण्याचं सुख पदरी पडलं असं नाही तर सर्वांशी झालेली कायमस्वरुपी मैत्री हा ठेवा मला  मोलाचा वाटतो. यातल्या काही सहकलाकारांबरोबर आज इतक्या वर्षांनीही संपर्क आहे ही जाणीव सुखद आहे.

अमेरिकेत येऊन सतरा वर्ष झाली. सुरुवातीला छोट्य़ा गावात असताना कथाकथन, लेखन यावर अभिनयाची तहान भागवावी लागली.  काही वर्षापासून आम्ही म्हणजे मी आणि माझा नवरा विरेन, ’अभिव्यक्ती’ या आमच्या संस्थेतर्फे व्यावसायिक पातळीवर एकांकिका करतो.  भिंत, महाभारताचे उत्तर रामायण, खेळ, सांगायचं राहिलंच, वेषांतर, भेषांतर या एकांकिका आत्तापर्यंत आम्ही केल्या. अभिनय, दिग्दर्शन, नेपथ्य, रंगभूषा, नाट्यमंदिर आरक्षण, ध्वनी, संगीत, जाहीरात, तिकीट विक्री अशा अगणित बाजू सांभाळणं पार पडलं ते इथल्या मित्र मैत्रिणींच्या मदतीने. हे करत असताना गाठीशी जमते अनुभवाची पुंजी. माणसांचे स्वभाव उलगडत जातात, आपण केलेल्या चुका लक्षात येतात. दिग्दर्शनाची तारेवरची कसरत करताना तर वर उल्लेख केलेल्या सार्या दिग्दर्शकांची कमाल वाटत राहते.

 भारतात संस्था, कलाकार, प्रेक्षक यांची उणीव भासत नाही. परदेशात मोठी शहरं सोडल्यास साधारण १०० - १५० मराठी कुटुंब छोट्या गावांमध्ये असतात. केरीमध्येही तितकीच संख्या आहे.  इथे काम करणार्‍यांचा दृष्टिकोन हौस म्हणून अभिनय करण्याचा असतो. पण तिकिटं लावून प्रयोग करायचं ठरवलं की काय पर्याय? त्यामुळे हौशी कलाकारांकडून व्यावसायिक पातळीची अपेक्षा केली की कुरकुर होत राहते. दिग्दर्शक या नात्याने समाधान होईपर्यंत तो तो प्रसंग झोप उडवून टाकतो.

विनोदी प्रसंगात वाहवत जाऊन आमच्या एका कलाकाराने रंगमंचावर स्त्री कलाकाराशी केलेल्या लगटीने आम्हाला शहाणं केलं. नट रंगभूमीवर गेला की दिग्दर्शकाच्या हातात काही उरत नाही याची विदीर्ण करणारी जाणीव अशा प्रसंगी होते. असं काही घडतं तेव्हा मनात विचार तरळून जातो. त्या वेळेस आमच्या दिग्दर्शकांनाही वेगवेगळ्या प्रसंगाना तोंड द्यावं लागलं असणारच. आशा निराशेचा लपंडाव, कटू गोड प्रसंग हे या खेळाचे अविभाज्य भाग. पण तरीही पुन्हा त्याच उत्साहाने पुढच्या डावाची तयारी सुरु होते. एकदा तोंडाला रंग लागला की....हेच खरं, नाही का?

एकांकिका झलक पहाण्याचा दुवा -   http://marathiekankika.wordpress.com

Wednesday, August 15, 2012

भरारी

मीनाताईंनी जेवणाचा डबा उघडला. मख्खपणे त्यांच्या हालचाली बघत बसलेल्या अनिताकडे त्यांनी एक नजर टाकली. काही क्षण त्या नुसत्याच बारा वर्षाच्या अनिताकडे पहात राहिल्या. केस कसेतरी जेमतेम बांधलेले, तिचे तिनेच विंचरलेले असावेत. कपाळावरची छोटी टिकली. काळासावळा रंग आणि निस्तेज डोळे.स्वतःतच हरवलेल्या हालचाली. ती स्वतःहून काही करणार नाही हे लक्षात आलं तसं मीनाताईंनी पोळीचे तुकडे, थोडीशी भाजी जे काही डब्यात होतं ते काढून समोर ठेवलं.
"अनिता जेवणाची वेळ झाली आहे. बघ तुझ्या डब्यात काय काय आहे, खाणार ना?"
निर्विकार चेहर्‍याने अनिताने पोळीचा तुकडा तोडांत टाकला. तिला पोळीबरोबर भाजी खायला बजावून मीनाताई दुसर्‍या मुलाकडे गेल्या. पुन्हा सगळं त्याच क्रमात झालं आणि त्या आपला डबा आणण्यासाठी वळल्या. धाडकन काहीतरी पडल्याचा आवाज आला. त्यांच्या काळजात धडधडलं. गर्रकन मीनाताईंनी मागे वळून पाहिलं. त्यांनी पाठ फिरवल्या फिरवल्या अनिताने डबा बाकड्यावरुन जोरात ढकलला होता. डब्यातलं अन्न खाली सांडलं. आधीच जेमतेम बांधलेले केस अस्ताव्यस्त झाले होते. पिंजारलेले केस ओढत अनिता तारस्वरात किंचाळत होती. चेहर्‍यावर अतीव आश्चर्य, दु:ख आणि वेदना. धावत मागे होवून मीनाताईंनी अनिताला घट्ट मिठीत धरलं. तिचं डोकं छातीत रुतवलं आणि त्या अनिताला बराचवेळ थोपटत राहिल्या, केसावरुन हात फिरवत राहिल्या. आपल्या स्पर्शाने, मायेने तिची वेदना नाहीशी व्हावी असं त्यांना मनापासून वाटत होतं. हळूहळू सगळं शांत झालं. मीनाताईंनी आजूबाजूला पाहिलं. त्या छोट्याशा खोलीतले दहा, बारा डोळे अनिताकडे रोखून पहात होते.  काय झालं हे आकलन होण्याइतकी जाण नव्हती कुणालाच. त्यामुळे कुणीही अनिताच्या रडण्या, ओरडण्याने घाबरलं नव्हतं की वैतागलं नव्हतं. शारिरीकदृष्टया निरोगी, अव्यंग, पण मनाने कमकुवत, सार्‍या भावनांच्या पलिकडे गेलेली ही मुलं. मीनाताईंच्या हातापायातलं त्राण गेल्यासारखं झालं. या मुलांच्या जगात आपणच वेगळे असल्याच्या भावनेने त्यांच्या हातापायांना सुक्ष्म थरथर सुटली.  एकटेपणाचा विळखा मनातून देहापर्यंत पोचला. थोडावेळ त्या तशाच बसून राहिल्या. मुलंही सारं काही समजल्यासारखी पुस्तकात डोकं खुपसून बसली. सुमाला दारात उभं राहिलेलं पाहिलं आणि त्यांना एकदम आधार वाटला. त्यांच्या चेहर्‍याकडे पहात सुमाने विचारलं.
"पुन्हा तेच?"
"तुला कसं कळलं?"
"तुमचा चेहरा सांगतोय ना."
"हं"
"तुम्ही घरी जा बाई, काही वाटलं तर मी हाक मारेन तुम्हाला."
"नको बसते थोडावेळ. या मुलांसाठी काय केलं की आत्मविश्वास वाढेल त्यांचा तेच कळत नाही. शारिरिकदूष्ट्या सक्षम आहेत हे समाधान मानायलाच हवं. पण त्यांच्या हृदयातल्या वेदनेवर फुंकर घालून आत्मविश्वास कसा जागृत करायचा? जे झालं ते मागे टाकून पुढे व्हायला कसं शिकवायचं तेच कळत नाही. कुठल्यातरी एका घटनेने स्वत्व गमावलेली ही मुलं,"
"आणि पोरकीदेखील" सुमाने असं म्हटल्यावर त्यांनी आश्चर्यानेच तिच्याकडे पाहिलं.
"पोरकी कशानं गं? आई वडिल आहेत, आपणही आहोत की." त्यांना थोडासा रागच आला सुमाचा.
"हो, पण तरी पोरकीच. आई, बाप असूनही पोरकी हे कटु सत्य आहे त्यातलं."
"असं कसं बोलवतं ग तुला?"
"मी फक्त सत्य परिस्थिती सांगतेय बाई. तुम्हाला वाटतं की हे सगळं आपण बदलू शकतो. इतकं सोपं नसतं ते."
"मला माहित का नाही ते. पण सोपं नसलं तरी बदलू शकतो. आणि आपण एकटे थोडेच आहोत. समाजसेवक,  डॉक्टर, सेवाभावी संस्था कितीतरी लोकांच्या मदतीचे हात आहेत. काहीतरी असं सुचायला मात्र पाहिजे की त्यांच्या आत्मविश्वासाची पातळी एकदम उंचावेल. तसं झालं ना की सापडेल त्यांचा त्यांना मार्ग."
सुमाने नुसतीच मान डोलावली. बाईंर्पुढे बोलण्यात काही अर्थ नव्हता. ज्या तळमळीने त्याचं काम चालू असतं, त्या अशा मुलांमध्ये गुंतून जातात त्याला कुठेतरी मर्यादा असायला हवी असं सुमाला  वाटायचं. वेळ आली तर स्वतःचा जीव देतील. फार त्रास करुन घेतात, शरीराला, मनाला. पण सांगणार कोण? स्वतःशीच पुटपुटत सुमा मुलांकडे वळली.

मीनाताई मुलांचे कागद काढून वाचत राहिल्या. प्रत्येक मुलाची म्हटलं तर परिस्थिती वेगळी आणि म्हटलं तर सारखीच.  अंतिम परिणाम एकच. त्यातूनच आपली वाट शोधायची प्रत्येकाची धडपड, कुणीतरी दाखवलेल्या मार्गाने चालायची कसरत. हातात आलेला कागद त्या पुन्हा पुन्हा पहात राहिल्या. झोपडीच्या बाहेर झोपलेल्या सुरेशचं चित्र होतं ते. त्यानेच काढलेलं. त्यांचा जीव गलबलला. त्या छोट्याशा खोलीत सहा सात भावडांसाठी जागा पुरणं अशक्यच. नेहमी कुणी ना कुणी बाहेर झोपणं प्रत्येकाच्या अंगवळणी पडलेलं. दोन्ही पाय गुडघ्याशी घेवून झोपलेला सुरेश. दहा वर्षाचा. आईला मदत म्हणून दुकानात पोछा मारायचं काम करायचा. अनुभवाने बेरड झालेला सुरेश शाळेत तसा व्यवस्थित वागायचा. चित्र तर फार सुंदर काढत होता. पण कधी काही बिनसलं की वागण्यात विचित्रपणा यायचा. आणि ते बिनसायला फार वेळही लागायचा नाही. शिव्यांची लाखोलीच वहायला सुरुवात करायचा तो. सुरुवातीला असं झालं की मीनाताई आणि सुमाला संकोच वाटायचा. बाकिच्या मुलांवर विपरीत परिणाम होईल याची भिती वाटायची. सुमा लागलीच त्याला शाळेच्या आवारात फिरायला न्यायची, त्याच्याशी गप्पा मारायची. तेव्हाच कधीतरी सुमाला त्याच्या वागण्याचं कारण कळलं. आधी वाटलं होतं तो हे असं वागणं, शिव्या घालणं घरातच शिकत असेल. तो अंदाज चुकला होता. दुकानातला त्याचा मालक तो पोछा करायला लागला की उगाचच काहीतरी खुसपट काढून त्याला बडबडायचा, सुरेश काही बोलला की शिव्यांचा भडिमार. हळूहळू मालकाने मारहाण चालू केली. एकदोनदा सुरेशने ते काम सोडूनही दिलं, पण दुसरीकडे लगेच काम मिळालं नाही की पुन्हा नाक घासत तो तिथे जाई. बाकीच्या मुलांची या ना त्या तर्‍हेने अशीच परिस्थिती. मीनाताईंचं मन अनिता या शाळेत आली त्या दिवसाकडे वळलं ...

त्या दिवशी संध्याकाळी त्या घरी आल्या तेव्हा मुलं, नवरा वाटच पहात होते.
"कुठून शाळा सुरु केली आहे असं झालय." नवर्‍याने पुढे केलेल्या चहाचा घोट त्या म्हणाल्या. कुणीच काही बोललं नाही तसं त्याच पुढे म्हणाल्या.
"हे असं मी म्हणते,  ते काही ना काही घडतं तेव्हाच.  आपल्या हातात काही नाही ही भावना काळीज कुरतडून टाकते तेव्हा शेवटी असं वाटायला लागतं.   ही मुलं अशा प्रसंगातून जातात तेव्हा तर आपण नसतोच तिथे, पण आता तरी परिस्थिती बदलता येईल का, मुलांना हसा खेळायला शिकवू का आपण. एक ना अनेक शंका येत राहातात."
"आज काय झालं?" नवर्‍याने नेहमीच्या शांतपणे विचारलं.
"आज दाखल झालेली अनिता, तिचे वडीलच तिच्यावर.... " त्यांचा अठरा वर्षाचा मुलगा भडकलाच.
"बलात्कार म्हणायचं आहे आई तुला?"
"हं" त्यांच्या स्वरातला संकोच त्या हं मधून डोकावत राहिला.
"रस्त्यावर आणून उभं आडवं झोडपून काढायला हवं." त्याचा तो आवेश बघून त्यांना बरं वाटलं. पण नूसतं बोलून काय होणार?
"कशी आहे अनिता? तू बोललीस तिच्याशी?" त्यांच्या सोळा वर्षाच्या मुलीने विचारलं.
"ठीक आहे, एकदम नाही असं बोलता येत. तशी चांगली वागते. पण मध्येच तिला बलात्काराचं आठवतं, मग स्वतःलाच बोचकारत सुटते, मारुन घेते, केस ओढते स्वतःचेच. तिला कसं थांबयाचं तेच कळत नाही."
"आई-वडील कुठे आहेत?"
"नाही माहीत मला. आणि मला वाटतं हा प्रकार खूप दिवस चालला असावा, ती या संस्थेकडे कशी आली ते माहित नाही. पण नेहमीप्रमाणे समाजसेवकांनी आणून सोडलं आपल्या शाळेत. आता अशा मुलांना सांभाळतील त्यांची यादी आहे ना त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे. तोपर्यंत त्यांच्या संस्थेने व्यवस्था केली आहे तिच्या रहाण्याची."
"तुला आमची मदत लागली तर सांग." दोन्ही मुलांनी मनापासून म्हटलं. त्यांनीही मान डोलावली. पण यातलं काही होणार नव्हतं हे त्या जाणून होत्या. मुलं चांगली होती, त्यांना मनापासून आईच्या व्यापात सहभागी व्हायचं होतं. पण आत्ता कुठे त्यांच्या आयुष्याला सुरुवात होत होती. भविष्याचे वेध, महत्वाकांक्षा यातून वेळ मिळाला तरच ती दोघं या कशाचाच पत्ता नसलेल्या, घर हरवलेल्या मुलांसाठी काहीतरी करणार नं. त्यांना तरी कसा दोष देणार? मदतीचा हात पुढे करतायत हेच खूप.  नवरा मात्र त्यांच्या बरोबरीने धडपडत होता.

मीनाताई समाजसेवेची पदवी घेतल्यानंतर वेगळं काहीतरी करण्याच्या कल्पनेने भारुन गेल्या होत्या. या शाळेची कल्पना त्याचीच. अनाथ, अत्याचार झालेल्या मुलांसाठी शाळा. अशा प्रकारच्या शाळा कार्यरत आहेत की नाही याची त्यांना कल्पना नव्हती आणि असल्या तरी एकदा काम सुरु झालं की तिथेही वेगवेगळे प्रयोग सुचतील, मार्ग सापडतील असं त्यांना वाटत होतं.  सर्वसामान्य जीवन जगण्याची संधी अशा मुलांना मिळावी या इच्छेने त्यांना झपाटलं. समाजसेवी संस्थाना भेटून नवर्‍यानेच या शाळेची माहिती, जाहिरात केली. शाळेची जागा म्हणजे घराच्या मागच्या बाजूला असलेली एक खोली. मुलं वाढली की नंतर त्या जागेबाबतचा निर्णय घेणार होत्या.   व्याप वाढतोय असं वाटेपर्यंत मानसोपचारतज्ञ सुमा मदतीला आली, मीनाताईंबद्दल कुठेल्यातरी संस्थेनेच तिला माहिती दिली. एक दोनदा शाळेत येऊन तिने त्यांच्याबरोबर काम करण्याचा निर्णय घेतला. एक, दोन म्हणता म्हणता सहा, सात मुलं होती आता. सगळी मुलं झोपडपट्टीतली. रोजच्या रोज मार खाणारी, शिवीगाळ करणारी, सेवाभावी संस्था मागे लागल्या की अधूनमधून शाळेत जाणारी. आला दिवस काय वाट्टेल ते करुन ढकलणारी. सतरा विश्व दारिद्र्य असलेल्या घरातून त्यांना बाहेर कसं काढणार आणि आई वडिलांना सोडून ती तरी येतील का? जिथे घरातच त्रास होतो त्या मुलांचं काय करायचं? त्यांची कायमची व्यवस्था करता येईल का?  शाळा सुरु झाल्यावर या प्रश्नांच्या अंगाने त्यांनी खूप माहिती जमविली होती. त्यातूनच परदेशातल्या एका संस्थेचं काम त्यांच्या मनात खोलवर रुतलं होतं. सरकारने अशा मुलांचा ताबा घेतला की या संस्थेचं काम सुरु होई. पहिल्या काही दिवसात ते मूल तात्पुरत्या पालकांकडे पाठविलं जाई. नंतर मीनाताईंसारखे समाजसेवक त्या मुलाशी, पालकांशी, मुलाच्या शिक्षकाशी बोलून त्या मुलाने परत त्याच्या पालकाकडे जावं, का त्याचा ताबा इतर कुणाला मिळावा ते ठरवत. मुलाची बाजू कोर्टात मांडत. अशा समाजसेवकांना विशेष समाजसेवक म्हणूनच ओळखतात. मुलाची बाजू मांडणं हेच त्या समाजसेवकाचं काम. त्यासाठी विशेष समाजसेवकाला वकिल, मुख्य समाजसेवक, न्यायाधीश यांच्याबरोबर संवाद साधावा लागे. इतकं सगळं आपल्या देशात करता येईल की नाही याचा त्यांना अंदाज येत नव्हता पण त्यातूनच अशा मुलांना काही दिवसतरी आपलं मानतील असे पालक शोधायची कल्पना मीनाताईंना सुचली. मुलांना वेगळ्या वातावरणाची सवय होईल. त्यामुळे कदाचित मुलं आपलं घर बदलण्याचा प्रयत्न करतील. मानलेले पालक. फार नाही पण थोडीफार लोकं तयारही झाली या निराळ्या प्रयोगासाठी. प्रयोग चालू असतानाच बर्‍याच गोष्टी उमजत जाणार होत्या, तसतसे बदल केले जाणार होते.

अनिता त्यांच्यापुढ्यात काहीतरी घेवून आली तशा मीनाताई तंद्रीतून बाहेर आल्या. आता कशी थोडीशी सावरल्यासारखी वाटत होती, चेहर्‍यावर हलकसं हसू. मीना ताईंना बरं वाटलं. त्यांनी तिच्या डोक्यावर थोपटलं. ती परत अभ्यासाला लागली. सुमाने मुलांचा ताबा घेतला होता, त्यामुळे आता काही काम नव्हतं. प्रत्येक दिवस म्हणजे नवीन परीक्षा. या मुलांचं वागणं समजून घ्यायचा प्रयत्न केला तरी दरवेळी आज अनिताचं जे झालं तस काही झालं की,  परिस्थितीत बदल झालेला कसा  पहायला मिळेल, काय करावं लागेल तो मार्ग शोधण्याचा वेध लागायचा. थोडा निवांत वेळ मिळाला तसं त्यांनी समोरचं वर्तमानपत्र पुढे ओढलं. वाचता वाचता एका बातमीने त्यांचं लक्ष वेधलं. १५ ऑगस्टच्या कार्यक्रमासाठी एका शाळेने पारंपारिक खेळाचं आयोजन केलं होतं. ही स्पर्धा नाही तर फक्त तुमच्या कलागुणांचं कौतुक करण्याचा एक प्रयत्न असंच शीर्षक होतं. आलेल्या अर्जातून ती शाळा ५ शाळा निवडणार होती. हा कार्यक्रम पहायला मान्यवर व्यक्तिंची, प्रयोगशीलतेला महत्त्वं देणार्‍या सन्माननीय पाहुण्यांची उपस्थिती लाभणार होती. मीनाताईंनी ती बातमी पुन्हा पुन्हा वाचली. घ्यावा का यात भाग? शाळा सुटायची वेळ झाली तरी घरी परतताना त्या प्रश्नानेच त्यांचा पुढचा दिवस खिळून ठेवला.

"घ्यायला हवा तुमच्या शाळेने भाग." मीनाताईंच्या मुलाला त्यांची कल्पना एकदम आवडली.
"अरे, पण काय करणार ही मुलं?" शाळेत एकूण मुलं सहा की सात, ती मुलं नक्की काय करु शकतील याचा अंदाज नाही, खात्री तर कशाचीच नाही.
उत्साहाने काही करायला गेलं आणि नेमकं आयत्यावेळी एखाद्याचं काही बिनसलं तर? शाळेत रहावलं नाही म्हणून मुलांना विचारलंच मी. नाच, कथाकथन, गाणं, चित्रकला, कविता एक ना दोन मुलं वेगवेगळे पर्याय सुचवित होती. सुमा विचार करते म्हणाली. पण खरंच जमेल का हे मुलांना?"
"लेझिम किंवा कवायत अशा खेळांचा का नाही विचार करत.  तो सांघिक प्रकार आहे, पुन्हा बोलावं लागणार नाही."  मीनाताईंना हा पर्याय एकदम आवडला. त्यांनी वर्तमानपत्रातून आलेला अर्ज बाहेर काढला.
"संघाचं नाव घालावं लागेल."
"भरारी" मुलगी पटकन म्हणाली. घरातल्या प्रत्येकालाच ते नाव आवडलं.
"गणवेष?" कुणीच काही बोललं नाही.
"झोपडपट्टीतल्या मुलांकडे कुठला आलाय गणवेष." मीनाताईंच्या आवाजातलं दुःख लपलं नाही.
"मुलींसाठी निळ्या रंगाचा फ्रॉक आणि मुलांसाठी पांढरा शर्ट, खाकी पॅट असं लिही." मुलाने उत्साहाने सुचवलं, त्याच्या बाबा आणि बहिणीनेही मान डोलावली.
"काहीतरीच काय? उगाच कशाला खोटं बोलायचं. आणि तेही मुलांच्या शिक्षकांनीच." मीनाताईंना ही कल्पनाच पसंत नव्हती.
"हे बघ, मुलं झोपडपट्टीतली आहेत हे लिहायची आवश्यकता नाही. खास मुलं एवढाच उल्लेख कर. सहानुभूती मिळून तिथे प्रवेश नको घ्यायला. आणि हे टाळायचं तर गणवेष लिहावाच लागेल. आपली प्रवेशपत्रिका स्विकारली जाईलच असंही नाही. स्विकारली गेली तर बघू गणवेषाचं."
काही न बोलता मीनाताईंनी ती तिघं सुचवतील तसा अर्ज भरुन टाकला. सुमाला दाखवून त्यांनी तो अर्ज पाठवायचा निश्चित केलं. त्या रात्री त्यांच्या घरातली, सुमा, शाळेतली मुलं आणि त्या..., एक भलं मोठं कुटुंब एखाद्या कार्याला सज्ज होतय असच वाटत राहिलं त्यांना.  पुढच्या चार पाच महिन्यात करावे लागणारे अथक परिश्रम, मुलाचं मनोधैर्य वाढविण्यासाठी करावी लागेल ती खटपट, लेझिम, कवायतीसाठी लागणारं साहित्य मिळवण्यासाठी घालाव्या लागतील त्या खेपा....बर्‍याच गोष्टीचं समीकरण जुळवावं लागणार होतं. पण मीनाताईंना खात्री  होती. आता मागे फिरायचं नाही हे त्यांनी मनात पक्क केलं.

घरातली सगळी, सुमा आणि मीनाताई भरुन आलेल्या डोळ्यांनी समोर चालू असलेला आपल्या मुलांचा कार्यक्रम पहात होत्या. लेझिम वाजवणार्‍या सुरेश, महेश, अमर बरोबर अनिता, सुरेखा आणि कमल कवायती करत होत्या. मुलांच्या प्रत्येक हालचालींबरोबर त्यांना शाबासकी द्यावी असं वाटत होतं मीनाताईंना. त्यांच्या खुललेल्या चेहर्‍याकडे पहाताना सार्‍या श्रमाचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. अर्ज स्विकारला गेल्यावर मुलांनी धावपळ करुन गणवेष मार्गी लावले. लेझिमही त्यांच्या मुलांनीच कुठूनतरी जमवले होते. टाळ्यांच्या कडकटाने त्या भानावर आल्या. एव्हांना मुलं धावत खाली आली होती.  मुलांच्या लेखी सुमा आणि मीनाताई हेच त्यांचं कुटुंब.  सुमाला आणि त्यांना, दोघांनाही मुलांनी मिठीच मारली. महेश आणि अमरचे आई-वडील आले होते. ते कौतुकाने मुलांच्या बाईंकडे पहात होते. बाकिच्या मुलांचं  कुणीही  नव्हतं. सुमाच  एकेकाला घरी नेऊन सोडणार होती. सुमा मीनाताईंकडे बघत होती.
"छान होती कल्पना यात भाग घेण्याची. तुमच्या मुलाचंही कौतुक करायला हवं" त्या हसल्या.
"हो, त्या दोघांनी मला मदत करायची म्हणून तयारी दाखविली. पण नंतर माझ्याबरोबर घरातले सगळेच गुंतले. तू तर हक्काचीच. मस्त झाला कार्यक्रम. आपले श्रम सार्थकी लागले. मुख्य म्हणजे मुलांनी छान साथ दिली. बघ, गेल्या दोन महिन्यात अनिताला एकदाही झटका आला नाही की सुरेशची शिवीगाळ ऐकू आली नाही."
"याचाच अर्थ अशाप्रकारच्या कार्यक्रमात त्यांना गुंतवायला हवं. आज तर निश्चितच त्यांचा आत्मविश्वास वाढायला मदत झाली आहे. असंच पुढे झालं तर कदाचित सामान्य जीवन जगतीलही ही मुलं. नाही का?" मीनाताईंनी सुमाकडे नुसतच हसून पाहिलं. पुढचा विचार आत्तातरी करावासा वाटत नव्हता. हा क्षण त्यांना मनापासून मुठीत धरुन ठेवायचा होता. घरातल्यांनी जीव ओतून त्यांना केलेल्या मदतीचा अभिमान वाटत होता. इथून त्यांच्या घरीच सर्वांनी जायचं ठरलं होतं.

घरी आल्यावर शाळेतल्या मुलांनी ताबा घेतला. मीनाताईंना मदत करायची स्पर्धाच. त्याही कौतुकाने छोटी छोटी कामं सांगत होत्या. खाता खाता मीनाताईंच्या मुलांनी कार्यक्रमाचं केलेलं चित्रिकरण सर्वांनी एकत्रच पाहिलं. फोटो पाहिले. मीनाताई मात्र मुलांच्या चेहर्‍याकडे पहात राहिल्या. मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याची किल्ली त्यांच्या हाती लागली होती. अपेक्षेप्रमाणे फरक होत गेला, मुलांचा आत्मविश्वास वाढला की खास मुलांच्या शाळेतलं त्याचं शिक्षण संपलं. ही मुलं नेहमीच्या शाळेत जायला लागतील. कदाचित अधूनमधून भेटायला येतील, नाहीतर कधीच फिरकणारही नाहीत. नकोशा भूतकाळाला मनातून पूसूनच टाकतील. नाहीतर खूप वर्षांनी एखाद्या मुलाचं, त्यांची आठवण काढणारं, धन्यवाद देणारं पत्र.... ही त्यांची पहिली मुलं. त्यांना निरोप देणं सोपं नाही जाणार, या मुलांच्या सर्वसामान्य आयुष्याचेही आपण साक्षीदार असायला हवं असं त्यांना तीव्रपणे वाटत होतं. पण ते शक्यं नाही याचीही त्यांना जाणीव होती. मुलं मोठी झाल्यावर सार्‍यांच्या हृदयातलं आपलं स्थान अढळ आहे याची मात्र त्यांना खात्री होती. त्यानी प्रयत्नपूर्वक आपलं लक्ष समोर चालू असलेल्या कार्यक्रमाच्या चित्रिकरणाकडे वळवलं. स्वतःच्या फोटोकडे टक लावून बघणार्‍या अनिताला मायेने जवळ ओढलं. बरोबरच्या प्रश्नाला निकराने त्यांनी बाजूला ढकललं,  पण मनाआड केला तरी त्यांच्या खास मुलांसारखा तोही गळ्यात पडलाच. काय दडलं असेल भविष्यकाळाच्या पोटात...?