Thursday, October 22, 2020

कालचक्र कथा अभिवाचन

या कथेचं अभिवाचन, कलाप्रेमी या रत्नागिरीच्या संस्थेसाठी मी केलं. नक्की पाहा.


Facebook Link - https://www.facebook.com/watch/?v=420637885587514

अमेरिकेसारख्या अतिप्रगत देशात सुधारणाचं वारंही जवळपास पोहोचू न देणारी जवळजवळ २,००,००० लाखांच्यावर लोकवस्ती आहे यावर विश्वास बसेल? पण हे खरं आहे. अमेरिकेतल्या पेनसेलव्हिनिया आणि ओहायो या भागात आमिश/ऑमिश नावाची ही जमात आहे.

आपल्याकडच्या ग्रामीण जीवनाशी थोडंफार साम्य असलेल्या या जमतीच्या चालीरीती फार वेगळ्या आहेत. यामुळेच सर्वसामान्य अमेरिकन आणि पर्यटकांनाही यांचं आकर्षण वाटतं. ’फॉर रिचर ऑर पुअरर’, ’विटनेस’ यासारखे चित्रपट आमिश समाजजीवनांवर बेतलेले आहेत.
साधारण १५१२ च्या दरम्यान युरोपमध्ये होऊ घातलेल्या सुधारणा धर्मांबद्दलही उलथापालथ करणार्या होत्या. शिशुबाप्तिसाविरोधी आणि धर्म व राज्यकर्त्यांचा संबंध नसावा या मतांचा आग्रह धरत १५२५ मध्ये उलरिच त्स्विलग्लीने वेगळा पंथच निर्माण केला. या पंथात सामील होणार्यांना हद्दपार किंवा मृत्यूदंड या मतप्रवाहाला विरोध असणार्या स्थापितांकडून सुनावला गेला. बायबलमध्ये शिशुबाप्तिसामाचा उल्लेख नसल्याने हा पंथ आपल्या विश्वासावर ठाम होता. कठोर परिश्रमावर विश्वास ठेवणारा हा पंथ म्हणजेच आमिश/ऑमिश जमात.
युरोपमधून धर्ममुक्त वातावरणाचा शोध घेत ही मंडळी अमेरिकेत पोचली.
दुसर्या महायुद्धानंर भोवताल बदलला. जनजीवन अत्याधुनिक बनलं पण आमिश तसेच राहिले. अधूनमधून बंडखोरीची उदाहरणं पुढे येत असतात तसंच या लोकांचा तिटकारा करणार्या गटांकडून मारहाण केल्याच्या घटनाही घडत असतात. युरोपमध्ये आता आमिश नाहीत. वाढती कुटुंबसंख्या आणि त्यामानाने कमी पडणारी शेतीची जमीन यामुळे इतर देशांमध्ये हे हळूहळू विखुरले जात आहेत. त्यांच्या विश्वासानुसार, नियमांनुसार त्यांना जगण्याची मुभा मिळावी इतकीच माफक अपेक्षा ते करतात.

Thursday, October 8, 2020

कथा अभिवाचन

 

दुवा - https://www.facebook.com/artistsharmony/

अमेरिकेसारख्या अतिप्रगत देशात सुधारणेचं वारंही
जवळपास पोहोचू न देणारी जवळजवळ २,००,००० लाखांच्यावर लोकवस्ती आहे यावर विश्वास बसेल? पण हे खरं आहे. अमेरिकेतल्या पेनसेलव्हिनिया आणि ओहायो या भागात  आमिश/ऑमिश नावाची ही जमात आहे.

आपल्याकडच्या ग्रामीण जीवनाशी थोडंफार साम्य असलेल्या या जमतीच्या चालीरीती फार वेगळ्या आहेत. यामुळेच सर्वसामान्य अमेरिकन आणि पर्यटकांनाही यांचं आकर्षण वाटतं. ’फॉर रिचर ऑर पुअरर’, ’विटनेस’ यासारखे चित्रपट आमिश समाजजीवनावर बेतलेले आहेत.

साधारण १५१२ च्या दरम्यान युरोपमध्ये होऊ घातलेल्या सुधारणा धर्मांबद्दलही उलथापालथ करणार्‍या होत्या. शिशुबाप्तिसाविरोधी आणि धर्म व राज्यकर्त्यांचा संबंध नसावा या मतांचा आग्रह धरत १५२५ मध्ये उलरिच त्स्विलग्लीने वेगळा पंथच निर्माण केला. या पंथात सामील होणार्‍यांना हद्दपार किंवा मृत्यूदंड या मतप्रवाहाला विरोध असणार्‍या स्थापितांकडून सुनावला गेला. बायबलमध्ये शिशुबाप्तिसामाचा उल्लेख नसल्याने हा पंथ आपल्या विश्वासावर ठाम होता. कठोर परिश्रमावर विश्वास ठेवणारा हा पंथ म्हणजेच आमिश/ऑमिश जमात.

युरोपमधून धर्ममुक्त वातावरणाचा शोध घेत ही मंडळी अमेरिकेत पोचली.‍ दुसऱ्या महायुद्धानंतर भोवताल बदलला.  जनजीवन अत्याधुनिक बनलं पण आमिश तसेच राहिले. अधूनमधून बंडखोरीची उदाहरणं पुढे येत असतात तसंच या लोकांचा तिटकारा करणार्‍या गटांकडून मारहाण केल्याच्या घटनाही घडत असतात. युरोपमध्ये आता आमिश नाहीत. वाढती कुटुंबसंख्या आणि त्यामानाने कमी पडणारी शेतीची जमीन यामुळे इतर देशांमध्ये हे हळूहळू विखुरले जात आहेत. त्यांच्या विश्वासानुसार, नियमांनुसार त्यांना जगण्याची मुभा मिळावी इतकीच माफक अपेक्षा ते करतात.

Thursday, October 1, 2020

रत्नागिरी आर्ट सर्कलच्या कार्यक्रमात माझी कथा आणि मुलाखत - FB Live/Youtube

 रत्नागिरी आर्ट सर्कलच्या कश्ती शेखने वाचक - वसा या कार्यक्रमात माझी ’संकोच’ कथा वाचली. गोष्टीतल्या नायिकेला साजेशीच कश्ती आहे त्यामुळे कथेतली षोडशा आपल्यासमोर उभी राहते. या कथेच्या अभिवाचनानंतर  माझी अर्धा तास - लेखकाचा खास यामध्ये माझी मुलाखत झाली.  ती एक तास चालली.  दिप्ती कानविंदे, नंदिनी आणि कश्ती शेख या तिघींबरोबर गप्पा चांगल्याच रंगल्या. अमेरिकेत येण्यापूर्वी मी रत्न्गागिरी, कणकवली, पालघर, देवरुख या ठिकाणी राहिलेली आहे त्यामुळे गप्पांमध्ये हे विषय होतेच. हा कार्यक्रम फेसबुक Live होता आणि या सर्व गावांतून माझ्या कौतुकासाठी सारी उपस्थित होती यासारखा आनंद नाही.

मी फेसबुक आणि युट्युब दोन्ही दुवे देते. नक्की पाहा. रत्नागिरी आर्ट सर्कल वाचन - वसा कार्यक्रमात अतिशय सुंदर कार्यक्रम महिनाभर सादर करणार आहे त्यांचे चाहते व्हा. मला फेसबुकवर मैत्रीसाठी साद घातलीत तर कृपया तसं कळवा कारण कोण, कुठून आलंय तेच हल्ली कळेना झालंय :-)

Facebook :

संकोच कथा अभिवाचन

https://www.facebook.com/watch/?v=1221566698205763


माझ्या नंदिनी, दिप्ती आणि कश्तीबरोबरच्या गप्पा

https://www.facebook.com/watch/?v=353724962634707


Youttube:

संकोच कथा अभिवाचन

https://youtu.be/XDxOTnoQ3ig


माझ्या नंदिनी, दिप्ती आणि कश्तीबरोबरच्या गप्पा

https://www.youtube.com/watch?v=zwffKXKRCqQ


Saturday, July 11, 2020

आत्मसन्मानाची लढाई - सकाळ - सप्तरंग पुरवणी

कृष्णवर्णीय फ्लॉईडच्या पोलिसांकडून झालेल्या निर्घृण हत्येनंतर वर्णद्वेषविरोधी  निदर्शनांनी अमेरिका पेटून उठली. विशेषत: इथे वाढलेल्या स्थलांतरितांच्या मुलांनी, दुसर्‍या पिढीने पालकांना त्यांच्या तटस्थ भूमिकेचा विचार करायला भाग पाडलं आहे. स्थलांतरितांची ही दुसरी पिढी (आमची मुलं) कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही त्यांच्या कृष्णवर्णीय मित्रमंडळीना पाठिंबा देण्यासाठी  निदर्शनात भाग घेत आहेत, कृष्णवर्णीय संस्थांना मदत करत आहेत आणि त्याचवेळी पालकांना जाहिर पत्र लिहून, त्यांच्या भूमिकेला विरोध करत  याविषयावर बोलायला, विचार करायला उद्युक्त करत आहेत. त्याच विषयावरचा  लेख आहे.
                                                        

’स्पिरिट रॉक’ या शब्दातच त्याचा अर्थही सामावला आहे. ’ब्लॅक लाइव्ज मॅटर’ चळवळीला पाठिंबा दर्शविण्यासाठी माझ्या मुलीच्या शाळेत काही मुलांनी शाळेतल्या या दगडावर सुंदर संदेश लिहिले. जितक्या तळमळीने मुलांनी हे संदेश लिहिले तितक्याच पटकन त्यावर फुल्या मारून त्या संदेशाला, चळवळीला विरोध दर्शविण्याचीही खुमखुमीही कुणीतरी दाखवली. ’ब्लॅक’ खोडून तिथे ’ब्लु’ लिहिलं गेलं. प्राचार्यांनी या घटनेवर कडक टीका केली. मुलांवर कडक कारवाई केली जाईल असा इशारा दिला. यानंतर मात्र वेगळंच घडलं. ज्या प्राचार्यांनी तीव्र शब्दात मुलांना समज दिली त्यांनाच ’वर्णद्वेषी’ विधानं केल्याबद्दल निलंबित करण्यात आलं. पालक म्हणून आम्हाला अर्थातच धक्का बसला. मनात वादळ उठलं. आपल्या मुलांना ज्या शाळेत पाठवतो तिथले प्राचार्यच वर्णद्वेषी आहेत या वस्तुस्थितीने मन धास्तावलं. इतक्या वेळा कारणाकारणाने ऐकलेली प्राचार्यांची भाषणं आठवत राहिली, त्यांचे विचार आपल्याला परिचित आहेत हा भ्रमच होता की काय अशी शंका यायला लागली. त्यातही प्राचार्य निर्दोष आहेत असं सांगणारा एक गटही त्यांच्या बाजूने घोषणा देत उभा राहिला आणि त्याचवेळी निदर्शनं करणारा!

कृष्णवर्णीय फ्लॉईड पोलिसांच्या निघृणपणामुळे मृत्युमुखी पडला आणि अमेरिकेत वर्णद्वेषाविरोधी निदर्शनांचा उद्रेक उसळला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही संसर्गाचा विचारही न करता लोक रस्त्यावर उतरले यावरूनच त्याच्या तीव्रतेची जाणीव होत राहते. गावागावात या घटनेचे पडसाद उमटणं साहजिकच होतं. फक्त त्याच्या स्वरूपाची कल्पना कुणालाच नव्हती. भारतीय पालक नेहमीच अशाबाबतीत मुलांना सबुरीचा सल्ला देतात, स्वत: तटस्थ राहतात पण यावेळी स्थलांतरीतांच्या तरुण मुलांनी पालकांना नवी दृष्टी दिली. पालकांना त्यांच्या भूमिकेचा विचार करायला भाग पाडलं.

काही दिवसांपूर्वीच माझ्या मुलाने वर्णद्वेषाला बळी पडलेला कृष्णवर्णीय फ्लॉईड आणि सुरू झालेली चळवळ याबाबत त्याच्या ऑफिसच्या CEO शी थेट संपर्क साधला होता. कंपनीने काहीच भूमिका घेतली नाही, कर्मचार्‍यांना कंपनी वर्णद्वेषाला थारा देत नाही अशी खात्री देणारा संदेश पाठवला नाही याची नाराजी कंपनीतील कृष्णवर्णीयामध्ये तसंच इतरांमध्येही आहे हे नजरेला आणून दिलं. कंपनीने आपली चूक कबूल करत सर्वांशी बोलायची तयारी दाखवली. online meeting मध्ये सर्वांनीच आपल्या भावना व्यक्त केल्या. CEO नी आधी याबाबत काही न केल्याबद्दल माफी मागितली आणि नंतर अतिशय भावुक ईमेल पाठवण्यात पुढाकार घेतला. तरुण मुलांना इथल्या प्रश्नांबद्दल किती आत्मीयता आहे याचं प्रत्यय देणारं हे उदाहरण.

फक्त भारतीयच नाही तर एकूणच स्थलांतरित पालकांची इथे जन्मलेली, वाढलेली मुलं त्यांच्या आई - वडिलांच्या भूमिकांची अक्षरश: चिरफाड करतायत. वॉशिंग्टन डी. सी. मधल्या निदर्शनात माझ्या मुलाने आणि त्याच्या मित्रमैत्रिणींनी भाग घ्यायचं ठरवलं तेव्हा आम्हाला पालक म्हणून चिंता होती कोरोना विषाणूच्या संसर्गाची पण फ्लॉईडच्या मृत्यूने तरुण पिढीच्या मनातलं वादळ, व्यवस्थेबद्दलचा प्रक्षोभ रस्त्यावर आला आहे. या देशाचे नागरिक असूनही तटस्थ भूमिका घेणारे स्थलांतरित, त्यामुळे मुलांशी होणारे वादविवाद यातून सर्वांनाच आपापल्या मानसिकतेचा सखोल विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. जे होतंय ते पाहताना, ऐकताना जितकी काळजी वाटते तितकाच तरुण पिढीच्या संवेदनशीलतेचा अभिमान!

या चळवळीत इथली दुसरी पिढी सक्रिय झाल्यामुळे नकळत लक्षात येत राहतं की सर्वांच्याच मनात हा वर्णभेद नाही म्हटलं तरी आहेच. नेटफ्लिक्सने खास यूट्यूबवर प्रसिद्ध केलेल्या भागात हसन मिनाजचं प्रभावी भाषण नक्कीच विचार करायला लावणारं आहे. तो म्हणतो, ’फिरताना, धावताना, झोपलेले असताना, दार उघडताना सतत मृत्यूची भिती कृष्णवर्णीयांना भेडसावत असते. एशियन्सना प्रसिद्ध कृष्णवर्णीयांचा प्रचंड अभिमान आहे पण कृष्णवर्णीयांशी तुमची मैत्री नसते. घरात कुणी सावळ्या रंगाचं असेल तर तुम्ही त्यांना अगदी सहज कल्लू म्हणता, दाक्षिणात्य लोकांचा उल्लेख ’कल्लू’ करता.’ बहुतांशी घरात, प्रत्येक व्यक्तीला आहे तसं स्वीकारायला पाहिजे असे धडे देतानाच कधीतरी पालकांनी मुलांना कृष्णवर्णीयांपासून सावध राहण्याचाही इशारा दिलेला असतो. पालकांच्या दुहेरी भूमिकेला मुलं आव्हान द्यायला लागली आहेत. त्यांचा ढोंगीपणा त्यांच्या लक्षात आणून द्यायला लागली आहेत. फ्लॉईडच्या मृत्यूनंतर त्याचे तीव्र पडसाद अनेकांच्या घरातून उमटतायत, लेखणीतून व्यक्त होतायत.

फ्लॉईडच्या मृत्यूआधी, 2016 साली फॅलॉन्डो कॅस्टिओच्या बाबतीत घडलेल्या अशाच घटनेने ही युवा पिढी प्रचंड अस्वस्थ होती ती पालकांच्या वागण्यातून नकळत दिसणार्‍या वर्णद्वेषाने, त्यांच्या तटस्थ भूमिकेमुळे. मुलांना या विषयावर पालकांशी बोलणं अवघड जात होतं, वाद होत होते त्यामुळे पालकांशी संवाद कसा साधावा हे कळत नव्हतं त्यातूनच पत्रांची कल्पना जन्माला आली आणि Letters For Black Lives Project ही कल्पना रुजली. सुरुवातीला फक्त एशियन अमेरिकन्स मुलांचा समावेश असलेल्या या पत्रांमध्ये आता आफ्रिका, युरोप, कॅनडातील तरुणांचाही समावेश आहे. अनेक भाषांमध्ये या पत्रांचा अनुवाद झाला आहे. 2016 नंतर पुन्हा एकदा या पत्रांना उजाळा दिला जात आहे. त्यावेळच्याच कळकळीने मुलं पालकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत. या सार्‍या पत्रांचा सारांश असा आहे.

प्रिय, काका, काकू, मावशी, आत्या,
तुम्हाला कदाचित कृष्णवर्णीय मित्रमैत्रिणी नसतील, तुमचे सहकारी कृष्णवर्णीय नसतील पण आमचा जन्म इथेच झालेला आहे, आमचे अनेक मित्रमैत्रिणी, सहकारी कृष्णवर्णीय आहेत आणि या देशात त्यांना जी वागणूक मिळत आहे ते पाहून आम्हाला खूप भिती वाटते आणि त्यांची अतिशय काळजी वाटते. पोलिसांच्या हातून जेव्हा जेव्हा कृष्णवर्णीय व्यक्ती मारली जाते तेव्हा नकळत तुम्ही त्या व्यक्तीलाच दोषी ठरवता. यात तुमचा दोष नाही कारण माध्यमातून कृष्णवर्णीयांची हीच प्रतिमा आहे. चोर, गुन्हेगार! ’आम्ही या देशात आलो ते स्थलांतरित म्हणूनच आणि स्थिरावलोही; मग कृष्णवर्णीयांना हे का जमत नाही?’ हा प्रश्न कधी तुम्ही विचारला आहे तर कधी न बोलूनही तुमच्या कृतीतून हे व्यक्त होतं. म्हणूनच आज आम्हाला, इथे जन्मलेल्या, वाढलेल्या मुलांना काय वाटतं ते तुम्हाला सांगायचं आहे.
’आम्ही घरातून बाहेर पडतो तेव्हा निश्चिंत असतो, मनात फार धाकधूक नसते, पोलिस अडवतील, घरी परत येऊ की नाही अशी शंका नसते पण आमच्या कृष्णवर्णीय मित्रमैत्रिणींच्या बाबतीत तसं होत नाही. बहुतेकांचे पूर्वज गुलाम होते आणि अजूनही तशीच वागणूक त्यांना मिळते, बदल झाला आहे तो स्वरूपात. घर बांधण्यासाठी कर्ज मिळत नाही, मतदानाचा हक्क नाकारला जातो, शिक्षणापासून वंचित राखलं जातं. कृष्णवर्णीय या व्यवस्थेचे अद्यापही गुलामच आहेत. तुम्ही या देशात आलात, स्थिरावलात. कितीतरी वेळा या व्यवस्थेचा तुम्हालाही त्रास झालेला आहे. गरिबी, आतंकवाद, रोगराई, गुन्हेगारी अशा कितीतरी गोष्टींसाठी या ना त्या कारणाने तुम्हालाही दोषी ठरवलं गेलं. तुम्ही हे पचवलंत ते आमच्या उज्ज्वल भवितव्याच्या अपेक्षेने. आता आम्हाला तुमची साथ हवी आहे, तुमच्या हातात हात घालून आम्हाला कृष्णवर्णीयांचा लढा पुढे न्यायचा आहे. आपण सारेच या देशात सुखाने राहू. जसा तुमच्या मनात कृष्णवर्णीयांबद्दल ग्रह असतो तसाच इतरांच्या मनात तुमच्या - आमच्याबद्दल हे तुमच्या कसं लक्षात येत नाही? माध्यमं तुमच्या उच्चारांची नक्कल करतात, आम्हाला शाळेत चिडवलं जातं, विमानतळांवर अडवलं जातं. कृष्णवर्णीय समजून भारतीय लोकांना झालेला त्रास तुम्ही बघितला आहेच. सुरेशभाई पटेलांना कृष्णवर्णीय समजून पोलिसांनी केलेली मारहाण कोण विसरेल? झाली का कारवाई पोलिसांवर याबाबत? या अशा घटना कृष्णवर्णीयांना रोजच्याच झाल्या आहेत तरी तुम्ही तटस्थ का? कदाचित आपल्यावरही ही वेळ येईल हे का विसरता? याला खीळ घालायची असेल तर आता या अल्पसंख्याकांच्या लढ्यात तुम्हीही सहभागी व्हायला हवं.

कितीतरी घरांमधून या पत्रांनी, तरुण मुलांनी पालकांचे डोळे उघडले, दृष्टिकोन बदलला. क्विनटेरोने जेव्हा फेसबुकवरून आपल्या मित्रमंडळींना निदर्शनासाठी आवाहन केलं तेव्हा, ’All lives matter' असं सांगत तिच्या आई - वडिलांनी तिला मूर्खात काढलं. विरोध केला. वीस डॉलर्सच्या नोटेवरून एका माणसाच्या मानेवर 8 मिनिटं पोलिस गुडघा टेकून बसू शकतो यामागे असलेली पार्श्वभूमी तिच्या पालकांना समजून घ्यायची नव्हती, समजत नव्हती. मोर्च्यासाठी तिने घेतलेल्या पुढाकाराला पालकांनी विरोध केल्यावरही तिने मागे न हटण्याचा निर्धार केला. नाईलाजाने तिच्या संरक्षणासाठी म्हणून तिची आईही अखेर मोर्चात सामील झाली. कृष्णवर्णीयांची भाषणं ऐकताना त्यांची वेदना तिच्या काळजाला भिडली. तिसर्‍या दिवशी तर क्विनटेरोचे वडीलही त्या दोघींबरोबर गेले आणि शेवटच्या दिवशी तिच्या आईने कृषवर्णीयांसमोर स्वत:हून भाषण केलं. स्वत:मध्ये झालेला बदल, एक आई म्हणून आपले कसे डोळे उघडले गेले हे सांगताना ती गहिवरली, ऐकणार्‍यांनाही अश्रू आवरणं कठीण गेलं.

वॅग आणि झॅगने निदर्शनात सामील व्हायचं आहे असं सांगितलं तेव्हा चायनाहून स्थलांतरित झालेल्या बार्टेकने तीव्र शब्दांत मुलांची कानउघडणी केली. मुलांनी त्यांचा निर्धार स्पष्ट केल्यावर तर बार्टेकने घर सोडून जाण्याचीच धमकी दिली. मुलं तरीही गेलीच. बार्टेकच्या अंगाचा तिळपापड झाला पण तिथे पोलिसांनी सुरू केलेल्या अश्रूधुराच्या बातम्या यायला लागल्यावर बार्टेक मुलांना परत आणण्यासाठी धावला. इतकंच नाही तर बार्टेकने मुलांकडून कृष्णवर्णीयांचा लढा, त्यांची भूमिका समजून घेतली.

इथे जन्मलेल्या, वाढलेल्या मुलांनी इथल्या समस्यांबद्दल आपल्या पालकांनी पावलं उचलावी, ठाम भूमिका घ्यावी याचा आग्रह कृतीतून दाखवायला सुरुवात केली आहे. पालकांनी मुलांना समजून घेऊन त्यांना साथ द्यायला हवी नाहीतर मुलं एकट्याने लढा द्यायला तयार आहेतच पण मुलांना जसं आपल्या आई - वडिलांना आपला अभिमान वाटावा ही आस असते तसंच आपल्यालाही मुलांच्या नजरेतला आपल्याबद्दलचा आदर भावतोच हे विसरून चालणार नाही.

 



Wednesday, July 1, 2020

माझी कथा सुव्रत जोशीच्या आवाजात storytel app वर.

सुव्रत जोशी - माझ्या शटलकॉक कथेचं ध्वनिमुद्रण कसं केलं त्याबद्दल बोलताना. कथा पूर्ण ऐकायला सभासदत्व घ्यावं लागेल पण सुरुवातीचा एक महिना सभासद न होता वाचता येईल. अतिशय वाजवी दरात मराठी आणि इंग्रजी साहित्याचा खजिना storytel वर आहे. प्रसिद्ध लेखकांचं साहित्य प्रसिद्ध कलाकारांच्या आवाजात.

It's time to put your headphones on and listen to Shuttlecock! If you follow this link, you get the first 30 days for free:

https://www.storytel.com/signup…


This offer is only valid if you haven't tried Storytel before.


                                          ------------------------------

शटलकॉक! म्हटलं तर सत्य, म्हटलं तर काल्पनिक अशी ही कथा आहे. यातली पात्र मी पाहिलेली आहेत. कथेतलं सर्व जसच्यातसं घडलेलं आहे का? नक्कीच नाही. आपण जे ’जर - तर’ म्हणत असतो तो कथेचाही एक अपरिहार्य भाग असतो.

माझ्या कथेतल्या या व्यक्तिरेखा भारतातल्या मित्रमैत्रिणींना अमेरिकेतल्या एका वेगळ्या यंत्रणेची, जगाची ओळख करून देणार्‍या आहेत. नक्की ऐका आणि ऐकून अभिप्राय द्यायला विसरू नका.

Monday, May 4, 2020

शरद पोंक्षेंशी गप्पा

शरद पोंक्षेंशी गप्पा मारणं हा एक 'अनुभव' होता.
हल्ली कोणताही कार्यक्रम जास्तवेळ ऐकत/पाहत नाहीत म्हणून आम्ही ४५ मिनिटं ठरवली होती पण नंतर कितीतरीजणांनी कळवलं की फार पटकन संपली मुलाखत, यातच सारं आलं. नाही का?
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या सर्वाना सकारात्मकतेची कास धरायला हवी हे ठाऊक आहे आणि त्याची जाणीव होते जेव्हा शरदनी सकारत्मकतेने कर्करोगांशी लढा दिला ते ऐकताना, मालिकांचं बदललेलं रूप, भाषा याबद्दल काय वाटतं, चुकीचं मराठी वापरलं गेलं की त्यांच्यासारख्या सुजाण कलाकारांना काय वाटतं, त्याबाबत ते काय करतात, नथुराम आणि सावरकर यावरून त्यांना तीव्र विरोध सहन करावा लागलेला आहे अशावेळेस त्यांच्या घरच्यांची काय भूमिका असते अशा माझ्या आणि मृदुलाच्या अनेक प्रश्नांना त्यांनी दिलेली उत्तरं, मारलेल्या गप्पा खरंच ऐकण्यासारख्या आहेत. सुरूवात आणि शेवट त्यांनी म्हणून दाखविलेल्या संवादानी आहे. पाहायला आणि ऐकायला हवं असं आहे सारं. नक्की पाहा, आपल्या मित्रमैत्रीणींना कळवा (Like and Share).


Tuesday, March 31, 2020

इटुकल्या पिटुकल्या गोष्टी

माझ्या मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी  सांगितलेल्या माझ्या गोष्टी -  FB - Live




आजोबा
 'चष्मा आण, पाणी दे. चहा कर.आजोबा दिसेल त्याला पकडतात. कामांची रेल्वेगाडी सोडतात. आई म्हणते, नाचवतात सगळ्यांना.
मी त्यांना  काम सांगितलं की मात्र ओरडतात,
 'हातपाय आहेत ना? स्वत:ची कामं स्वत: करायची' असं म्हणतात आणि आरामखुर्चीत डुलत बसतात.
मी आज खोलीत लपून बसलो. कामांची रेल्वेगाडी आजीने हाकली.  आजोबा गेले. मी हळूच विचारलं.
"गेले का जमदग्नी?"
"कोण जमदग्नी? बाहेर ये." आजोबा खेकसले. मी घाबरलो.  आजोबा होते की इथेच. मी पळणार होतो पण आजोबांनी मला धरून आणायला आजीला पाठवलं असतं.
"बाहेर ये." आजोबा परत जोरात ओरडले. मी बाहेर आलो.
"कोण जमदग्नी?" आजोबांनी डोळे वटारुन विचारलं.
"आजी तुम्हाला जमदग्नी  म्हणते.  जमदग्नी म्हणजे काय?" आजोबानी मला उत्तर दिलं नाही. ते  आजीवर वसकन ओरडले.  आजी आहे कुठे? आजी तिथे नव्हतीच.  नेहमी मी पळतो. आज आजी पळाली.
पण मला कुणीतरी सांगा ना,  जमदग्नी म्हणजे काय?
                                      -----------------------------------------
 भगदाड

"उठ गं" आईचा आवाज चढला.
"झोपले की उठवतेस. उठले की झोपवतेस." मी कुरकुरले.
"लाडात येऊ नकोस." ती चिडली. निघून गेली.  मी उगाच भिंतीवर पाय मारला. इकडच्या भिंती पोकळ. भगदाडच पडलं. मी घाबरले.
"काय झालं?" आईने खालून जोरात विचारलं
"पुस्तक पडलं."  मी भगदाड झाकलं. त्यावर उशी ठेवली. धावत खाली गेले.
"खरं सांगितलं की तू ओरडत नाहीस ना?"
"काय केलंस?" आई चिडली. मी गप्प.
"सांग. नाही ओरडणार." नाईलाजाने आई म्हणाली.
तिला मी खोलीत नेलं. भगदाड दाखवलं.
"?" आईचं तोंड उघडंच राहिलं. ती मटकन बसलीच.  चिडली, बडबडायला लागली.
"तू ओरडणार नव्हतीस." मी रडायला लागले.
"मी ओरडत नाहीये." ती ओरडत म्हणाली.
मोठी माणसं! बोलतात एक, वागतात वेगळं. मोठी माणसं! 
-----------------------------------------
मजा
 एकदा मजा झाली. आईने न सांगता मी सगळं केलं. दात घासले, आंघोळ केली. नाश्ता कटकट न करता खाल्ला, गृहपाठ केला. एकदम शहाण्यासारखी वागले. आईला धक्काच बसला. बाबाला वाटलं मला अक्कल आली.
दादा म्हणाला,
"काहीतरी गडबड आहे." तो  गडबड शोधायला खोलीत गेला.  माझ्या, त्याच्या. परत आला.
"काय रे? काय उद्योग केले आहेत कार्टीने?" आईने विचारलं.
"काही नाही." तो पुटपुटला. मी दादाची फजिती झाली म्हणून टाळ्या वाजवल्या. तेवढ्यात बाबा दादाचं चित्र घेऊन आला. मी घाबरले. आईच्या मागे लपले.
"पिकरुने काढलंय?" आईने विचारलं.
"नाही. दादाचं नाव पुसलं..." बाबा म्हणाले.
"म्हणजे?" आईला काही कळलं नाही.
"चित्र कुणी काढलं?" बाबानी विचारलं.
"मी काढलं." दादा म्हणाला.
"नाव कुणाचं दिसतंय?" बाबानी विचारलं. दादाने नीट पाहिलं.
"माझं नाव पुसून हिने तिचं घातलं."  दादा किंचाळला.
"म्हणून शहाण्यासारखी वागत होती." आई पुटपुटली. दादाने मला ढकललं,  केस ओढले.  मी पुन्हा बेअक्कल झाले.  भोकाड पसरलं.

-----------------------------------------
थोबाडीत
 आमच्याकडे मायाताई काम करते. उशीरा येते. कधीकधी येतच नाही. आजही तिचा पत्ता नव्हता.
"एक लगावणार आहे तिच्या." आई म्हणाली. दार वाजलं.  मायाताई आली.
"आई, तुझ्या एक लगावणार आहे." मी तिला सांगितलं. मायाताई थांबलीच नाही. पळाली.
आईने माझ्या एक लगावली. मी कोपर्‍यात रडत बसलो.
"नको तेव्हा नको ते बोलतेस. तुझ्या बाबांसारखं."
"मग त्यांना लगाव." बाबा आला आणि कोपर्‍यात बसला.
"त्याला लगाव ना." मी पुन्हा म्हटलं. आई हसली आणि तीही कोपर्‍यात येऊन बसली.
या मोठ्या माणसांचं काही समजत नाही. आई - बाबांनी  मला जवळ घेतलं.
"मायाताईची भांडी बाबा घासणार आहे." आई म्हणाली
"म्हणजे?" मला काहीच कळत नव्हतं.
"अरे, तू बाबांना लगाव म्हणालास ना?"
"हो."
"मग बाबांनी भांडी घासली की झालं."
आई ना. नेहमी कोड्यात बोलते.
तुम्हाला कळलं का? कळवाल का याचा अर्थ?







Monday, March 23, 2020

पोस्ट

"बॅग भर." बहिणीने हुकूम सोडला.
"पोस्टात जायचं आहे ना? मग बॅग कशाला?" माझ्याकडे सहानुभूतिपूर्वक नजर टाकून दोघी बहिणी हसल्या,
"पोस्टाचा कारभार विसरलेली दिसतेयस. भर बॅग तू. कळेलच तुला"
"३ दिवसांचे कपडे भर. बाकीचं मी बघते." बहिणाबाईंचा झपाटा पाहून मी बॅग भरली.
"चलाऽऽऽऽ" तिने आरोळी ठोकली. चाकाची बॅग, पत्र्याची बॅग आणि एकावर एक भलेमोठे डबे रचलेला, जेवणाचा डबा घेऊन बाहेर पडलो.

घराच्या बाहेर पाऊल टाकलं. बाहेर पडल्या पडल्या चार - दोन रिक्षा सामानाकडे वळून बघत बघत रिकाम्याच नाहीशा झाल्या. अखेर एक थांबला.
"ताई, येवढालं सामान आणि तुम्ही तिघी, कोनी बी थांबनार नाय."
"तुम्ही थांबलात ना." रिक्षा भुर्रकन निघायच्या आधी आम्ही सामानाला आत कोंबलं. एका बहिणीला सामानावर बसवलं आणि आम्ही दोघी मांड्या घालून स्थानापन्न झालो. रिक्षावाला खदखदा हसला.
"दात काढायला काय झालं?" बहीण करवादली.
"सेल्फी काढा आनि टाका फेसबुकवर. लई भारी पिक्चर येईल."
ट्रंकेवर बसलेल्या बहिणीला सेल्फीची कल्पना एकदम आवडलीच. पण चालत्या देहाचा कोणताही भाग हलवता येणार नाही इतके घट्ट आम्ही बॅगांच्या आसपास अडकलो होतो.
"द्या मी काढतो."
"तुम्ही रिक्षा चालवा हो." तिघींमधली कुणीतरी एवढ्या जोरात खेकसली की त्याची रिक्षा, शिक्षा झाल्यासारखी हवेत उडाली आणि एकदम पोस्टासमोरच थांबली.
आखडलेले हातपाय आधी रिक्षातून बाहेर टाकत, आमची अंगंही बॅगांसकट बाहेर पडली.

चाकवाली बॅग विमानतळावर चालवल्यासारखी मी खडे असलेल्या रस्त्यावर चालवली. त्यामुळे निर्माण झालेल्या सुमधुर पार्श्वसंगीताच्या साथीने पत्र्याची बॅग सावरत आम्ही पोस्टात झोकदार ’’एंट्री’ घेतली. आणि रामा रामा.... पोस्टातली तोबा गर्दी पाहून एकदम विमानतळावर आल्यासारखं वाटलं.
"इथेही इतकी गर्दी?" माझ्या प्रश्नाला उत्तर न देता बहीण तरातरा पत्र्यांची बॅग घेऊन आत जायला निघाली.
"अगं, अगं..." करत आम्ही दोघी तिच्या मागे. गिर्‍हाईक आणि कर्मचार्‍यांच्या मधला अभेद्य दरवाजा तिने मोडला आणि पोस्टाच्या कर्मचार्‍यासमोर बॅग आपटली. त्या आवाजाचा शून्य परिणाम म्हणून कर्मचार्‍याची नजर संगणकावर खिळलेलीच राहिली. त्यामुळे संगणकात आहे तरी काय ही माझी उत्सुकता चाळवली. मी घाईघाईत चष्मा शोधून, डोळ्यावर चढवून त्याला काय दिसतंय ते मलाही दिसेल का म्हणून पाहायला लागले. एवढ्यात लक्षात आलं, काचेच्या पलीकडे उभी असलेली माणसं आमच्याकडे पाहत होती, आम्ही कर्मचार्‍याकडे आणि कर्मचारी संगणकाकडे. म्हणजे थेट कुणीच कुणाकडे पाहायचं नाही असा नियम आहे की काय पोस्टात?
"बॅग उघड." बहीण म्हणाली. नक्की कुणी बॅग उघडायची हे न कळल्याने मी म्हटलं,
"बॅग उघड." तेवढ्यात दुसरी बहीण पण तेच म्हणाली. कुणीच बॅग उघडेना तसा तो कर्मचारी ओरडला,
"बॅग उघडा." बहीण एकदम घाबरून खाली बसली. तिने बॅग उघडली.
"विजेचं बील, पत्ता, पासपोर्ट, आधारकार्ड, पॅन कार्ड....." मोठी यादी सांगत होती, छोटी एकेक कागद पुढे करत होती. आता त्या बॅगेचं रहस्य उलगडलं. अर्ध्या तासाने संगणकातून डोकं बाजूला काढून आम्ही पत्र्याच्या ट्रंकेतून काढलेल्या कागदपत्रावर त्याने नजर टाकायला सुरुवात केली.
"साक्षीदार आणा."
"ही आहे ना." माझ्याकडे दोघींनी सराईतासारखं बोट दाखवलं.
"या नाही चालणार."
"का नाही चालणार?" मी बुचकळ्यात. तेवढ्यात बहीण म्हणाली,
"अहो, मागच्यावेळी नात्यातला साक्षीदार चालला की."
"आता नाही चालणार. तुम्ही बाहेर इतके उभे आहेत त्यातल्या आणा कुणाला तरी."
"आमच्या कुणी ओळखीचं नाही त्यात."
"चालतंय."
"चालतंय काय? आम्हाला नाही चालणार." तिघींपैकी कुणाचा तरी आवाज चढला.
"हे बघा, हे पण चालणार नाही." सप्पाट स्वर.
"काय चालणार नाही?" हळूहळू आमचे आवाज वेगवेगळ्या टिपेला पोचले.
"हेऽऽऽ" कागदाच्या चळतीतला कुठलातरी कागद फलकावत कर्मचारी उत्तरला. दोन्ही बाजूने वणवा पेटल्यासारखंच झालं. पोस्ट कर्मचारी आणि ३ गिर्‍हाइकं यांची तिथे जी काय तोंडातोंडी सुरू झाली ती झाली. मला धड काहीच माहीत नाही त्यामुळे आपण फक्त २ बहिणींची बाजू घ्यायची या निकराने मीही पोस्ट लढवायला घेतलं.
"ओ, मी लिहिते हा प्येपरात. थांबा आता तुमच्याबद्दल लिहितेच." कर्मचार्‍याच्या चेहर्‍यावरची माशीही हलली नाही.
"पुरे तुझ्या त्या लिखाणाचं कौतुक. काहीतरी लिहिशील आणि आपलं काम होणार असेल तर तेही व्हायचं नाही." बहिणीने हाताला धरून मला मागे ओढत म्हटलं. पण कर्मचार्‍याच्या हातात कोलीत मिळालं होतं. त्याने असहकार पुकारायचं नेहमीचं धोरण तेवढ्याच उत्साहाने पुन्हा राबवलं.
"मी काही करू शकत नाही. तुम्ही पोस्टमास्तर कापश्यांना भेटा. ते म्हणतील तसं करू."
"भेटतोच. २ महिन्यापूर्वी हेच काम होतं तेव्हा ही कागदपत्र चालली. साक्षीदार म्हणून बहीणही चालली. तुम्ही ना गिर्‍हाईकाला अडवायचं कसं हेच बघता. हे आणा, ते आणा, ते नाही, हे चालायचं नाही. आधीच नीट सांगा ना सगळं. आणि दर २ दिवसांनी नियम बदलतात कसे? अं, कसे हो बदलतात तुमचे नियम? सांगा कशाला गुंतवायचे आम्ही पैसे तुमच्या पोस्टात? सरकारला मदत करायला जावी तर नखरेच हजार सरकारी कर्मचार्‍यांचे ..." निर्विकार कर्मचार्‍याने त्याची निर्विकार नजर पुन्हा संगणकावर खिळवली त्यामुळे पुढची वाक्य फेकायला आम्ही कापश्यांकडे पोचलो.

तीन बायका एकदम आत आल्याने हल्ला झाल्यासारखे आधी कापशे बावचळले. पण पटकन चेहर्‍यावरचे सारे भाव पुसत त्यांनी आमच्याकडे पाहिलं. तो निर्विकारपणा शेवटपर्यंत तसाच राखलाही. एव्हाना बाहेरची हजारो गिर्‍हाईकं आणि पोस्टातले कधीही न हसणारे कर्मचारी कामं टाकून ’शिणेमा’ बघायला मिळाल्याचा आनंद लुटायला लागले. आम्ही हातातले अनेक कागदपत्र नाचवीत, हवेत उडवल्यासारखं करत तर कधीकधी त्यांच्यासमोरच्या टेबलावर ठेवत, आपटत आम्हाला विकासपत्राचे पैसे मिळायलाच हवेत हा आमचा हक्क तावातावाने पटवून दिला. कापश्यांनी तोडीसतोड विरुद्ध भूमिकेत शिरत, शांतपणे ’त्या’ कर्मचार्‍याला बोलावलं,
"साहेब, मागच्यावेळेला आपण ॲडजेस्ट केलं ते करायलाच नको होतं..." ॲडजेस्ट हा शब्द ऐकला आणि आम्ही तिघी वेगवेगळ्या तर्‍हेने उखडलो. मला नक्की काय चालू आहे ते कळत नसलं तरी आम्ही भारत देशाचे प्रामाणिक सक्षम नागरिक (बहिणी) असल्याने कुणालाही काही ’ॲडजेस्ट’ करायला लावत नाही हे पक्कं ठाऊक होतं. मी बिनदिक्कत प्रामाणिक सक्षम नागरिकाची बाजू मांडली.
"आम्ही नव्हतं तुम्हाला ॲडजेस्ट करायला सांगितलं. हेच कागद आहेत असं तुम्हीच म्हणाला होतात." याच अर्थी उरलेल्या दोघींनी तोंडसुख घेतलं तसं कर्मचारी त्याच्या साहेबांकडे मदतीच्या अपेक्षेने पाहत राहिला. कापशेंना एकदम पोस्टाचं कामकाज आमच्यामुळे कमीतकमी २ तास थांबल्याचं जाणवलं असावं. ते म्हणाले.
"लगेच करतो तुमचं काम" क्षणभर सन्नाटाच. भांडायचे बरेच मुद्दे तसेच राहिले होते आमचे. आणि मुख्य म्हणजे आम्हाला तिघींना एकमेकींशी न भांडता तिसर्‍याशी एकत्रित भांडता येतं याचाही साक्षात्कार झाला होता त्यामुळे इतक्यात भांडण संपून कसं चालेल?
"अहो असं काय? एकदम असं कसं काम होईल? थोडं लांबवा ना." आम्ही तिघी काकुळतीलाच आलो.
"छे, छे झालंच बघा. लगेच देतो तुमचा चेक. बाहेरुन घ्या." त्यांनी प्रकरण संपवलंच. चाकातली हवा गेल्यासारख्या आम्ही बाहेर आलो. भानावर आल्यावर, बघे आपापल्या कामाला लागण्याआधी आतल्या आणि बाहेरच्या बघ्यांकडून ५-५ रुपये करमणूक आकार देता का असा खडा सवला टाकला. ज्यांना आम्ही खरोखरीच त्यांची करमणूक केली असं वाटलं त्यांनी त्याचं मोल जाणलंही. बहिणीकडे पैसे दिले,
"हे काय?"
"जाताना रिक्षाच्या भाड्याला होतील. कसली करमणूक झाली आज लोकांची. त्यांनी पण हसत हसत दिले पैसे." रिक्षाचे पैसे वाचल्याच्या आनंदात बहीण म्हणाली,
"तू राहा रांगेत उभी."
"बरं. पण तुम्ही दोघी काय करणार?" असं विचारेपर्यंत चाकाची बॅग उघडून त्यातली सतरंजी तिने अंथरलीही एका कोपर्‍यात. दुसर्‍या बहिणीने डब्याची झाकणं उघडली. माझ्याकडे बघून दोघी म्हणाल्या.
"गेल्या दोन्ही वेळेला तू नव्हतीस. चार चार दिवस यावं लागत होतं. दिवसभर इथेच. त्यामुळे अशी व्यवस्था करावी लागते." हे त्या दोघी सांगतायत तेवढ्यात एका माणसाने घाईघाईने त्यांच्यासमोर थर्मास उघडला,
"घ्या आमचंही आत्ताच झालंय. ताक आहे." पोस्टातल्या सुखदु:खाच्या गोष्टी करत मग तो तिथेच बसला. आपापला नंबर ठेवून त्या दोघींभोवतीचं पोस्टातल्या गिर्‍हाइकांचं कोंडाळं बदलत होतं.

पुढच्याला लागणारा किमान अर्धा तास पाहिल्यावर माझा नंबर ठेवून मध्येच मीही जेवून आले. शेवटी अखेर पोस्ट ’सर’ झालं. काम झालंच च्या समाधानात मी विजेत्यासारखी काचेच्या अलीकडे. पलीकडे कर्मचारी कसलेतरी आकडे लिहिण्यात मग्न. त्यात उजवीकडची विकास पत्र आणि डावीकडची ज्येष्ठ नागरिक पाटी सतत डोळ्यासमोर.
"किती वेळ लागेल हो अजून?" कर्मचार्‍याने आठ्या घालून का होईना चक्क माझ्याकडे पाहिलं.
"हे बघा. इथे लिहिलं आहे विकास पत्र आणि इथे ज्येष्ठ नागरिक. विकास पत्राची वाट पाहत पाहत ज्येष्ठ नागरिक व्हायची वेळ होईल. इतके तास उभी आहे मी इथे." हा असा विनोद पहिल्यांदाच ऐकल्यासारखा तो कर्मचारी जोरात हसला आणि धनादेश हातात येण्याआधीच मी पोस्टातला कर्मचारी हसला या धक्क्याने खाली कोसळले.

Friday, January 31, 2020

संकोच

"तोच तोच विनोद तू मला का सांगतेस?" आईवर मी चिडले आणि दाणदाण पाय आपटीत
माझ्या खोलीत आले. खोलीचं दार धाडकन बंद केलं.
"दार मोडेल. हळू आपट." घ्या, माझ्या रागापेक्षा आईला दाराची काळजी. पुन्हा एकदा दार उघडून जोरात आपटावं असं वाटलं मला; पण तसं केलं तर संपलंच. आईची बडबड जी चालू होईल ना ती थांबणं कठिण. मी पलंगावर अंग टाकलं आणि माझा राग हळूहळू शांत होत गेला. हो, आता मी चौदा वर्षांची आहे तर आई गेल्यावर्षीपासून तिच्या कामाच्या ठिकाणी पोनीटेलने केलेला विनोद सांगते दरवेळेस. कधी मला, कधी सर्वांना. इतकी लाज आणते ना. सगळे हसतातही तिच्या या विनोदावर. मूर्ख नुसते. आजही तेच म्हणाली,
"पोनीटेल म्हणतो तसं तुला एका पिंपात घालायला पाहिजे आणि १९ वर्षांची झालीस की बाहेर काढू." हेच, दरवेळेस हेच. मग मी वर लिहिलंय ते म्हटलं आणि पुढे पुस्ती जोडली.
"त्यापेक्षा तुला पिंपात ठेवते आणि मी १९ वर्षांची झाले की बाहेर काढते." संपलं. खरं तर मी हे मनातच म्हणते नेहमी पण वर्षभर ऐकून एकदम आलंच तोंडून बाहेर. खरं सांगू? मला खो, खो हसायला येतंय आता म्हणजे मी कल्पना करतेय की आईला खरंच पिंपात टाकलं तर? एकवेळ मी राहीन पडून कितीही वर्ष पिंपात पण आई? छे, आतून पिंपाच्या झाकणावर बडवत बसेल, ’मला बाहेर काढा, काढा’ म्हणत. पिंपाला भोकं मात्र ठेवायला हवीत. श्वास घेता यायला हवा नं आणि भोकातून ठेव म्हणावं पूर्ण घरावर लक्ष. पण ते जाऊ दे. आमची खरी समस्या ही नाहीच. ही होती त्यावरची प्रतिक्रिया. मी हे असंच बोलते याला कारण आहे माझी आई. या पोनीटेलच्या सहवासाचा तिच्यावर परिणाम झालाय आणि तिच्यामुळे माझ्यावर.  आई पोनीटेलकडे काम करते.  तिथेच तिचा हा पोनीटेल काहीतरी पाचकळ विनोद करतो आणि आईला ते आवडतात. पोनीटेल हे त्याचं नाव नाही. तो पोनीटेल बांधतो म्हणून आई त्याला पोनीटेल म्हणते. माझ्या प्रत्येक प्रश्नावर, अडचणीवर आईकडे एकच उपाय, पिंपात टाकणे. जाऊ दे. पिंपाबद्दल खूप झालं.

सरळच सांगायचं तर माझा बाबा ही आमची समस्या. नाही, नाही माझा बाबा मला छळत नाही, त्रास देत नाही. उगाच कान टवकारू नका. मला ठाऊक आहे तुम्ही वाचताय पण मला वाटतंय की मी तुम्हाला सांगतेय, तुमच्याशी बोलतेय म्हणून म्हटलं, कान टवकारू नका. हे असं होत चाललंय माझं. आईसारखं. आई मला म्हणते मी विषय भलतीकडे नेते पण मी तिच्याकडूनच हे शिकले आहे पटतच नाही तिला.  तर मुद्दा असा आहे की मला असं वाटतं, माझ्या बाबाचं माझ्यावर प्रेम नाही. कदाचित तुम्हालाही पुढे मी जे सांगणार आहे त्यावरून ते लगेच पटेल, खात्री होईल.

माझ्या आईने बाबाशी लग्न केलं त्याला १० वर्ष झाली. चार वर्षांची होते मी. बाबाला त्याची आधीची दोन मुलं आहेत. मुलगे. आई त्यांना टोणगे म्हणते म्हणून मीही इथे आता त्यांना टोणगेच म्हणेन. माझ्या आईचं आणि बाबाचं, दोघांचीही ही दुसरी लग्न आहेत. पहिल्या जोडीदाराशी पटलं नाही म्हणून घटस्फोट घेऊन केलेली. माझे आई - बाबा का वेगळे झाले हे लहान असताना मला माहीत नव्हतं. दोन - दोन बाबा माझे लाड करतात याचा आनंद जास्त होता. तेच टोणग्यांचं. त्यांना दोन आया लाड करायला. एका गावात नसल्यामुळे दुसर्‍या बाबाशी कधीतरीच भेट व्हायची त्यामुळेही सर्व सुरळीत चाललं असावं किंवा आम्ही सर्वच लहान होतो त्यामुळे जाणही तितकीच. काय कारणं असतील ती असतील पण  मी मोठी होत असताना सगळं व्यवस्थित चालू होतं. कधीतरी वाढत्या वयाबरोबर वास्तव कळलं असेल. नातेवाईक आणि आजूबाजूची माणसं असतातच तुमच्या मनाचा तळ ढवळून काढायला असं आई म्हणते. काय असेल ते असेल पण गेल्या वर्षापासून मला जाणवायला लागलं की बाबा पूर्वीसारखा नाही वागत माझ्याशी. फक्त माझ्याशीच.  टोणग्यांशी त्याचं वागणं मला जास्त प्रेमाचं, जवळीक साधणारं वाटतं. आईला सांगावंसं वाटत होतं पण मी ते टोणग्यांनाच ऐकवलं. दोन्ही टोणगे माझ्यापेक्षा मोठे आहेत. दोन आणि तीन वर्षांनी. त्यांनी शांतपणे ऐकलं. एक टोणगा म्हणाला,
"तुझ्या मनाचे खेळ आहेत. उगाच काहीतरी डोक्यात भरवून घेतेस स्वत:च्या आणि आमच्या डोक्याला त्रास देतेस." दुसरा टोणगा म्हणाला,
"असेल. तसंही ते तुझे बाबा नाहीतच ना?" मला एकदम रडायलाच यायला लागलं. हेच असेल का खरं कारण? आतून कळलेलं का मला म्हणून इतक्या पटकन रडायला आलं? मला आता माझ्या स्वत:च्या बाबाकडे जावं असं वाटायला लागलं. आतापर्यंत खरंच असं कधी वाटलं नव्हतं पण जर माझ्या  बाबाला मी त्याची रक्ताची मुलगी  नाही म्हणून प्रेम वाटत नसेल तर कशाला राहायचं मी इथे? फक्त आई हवी म्हणून? तो विचार तिने करावा. हा तिढा ती सोडवू शकत नसेल तर तिच्यासाठी माझी किंमत तितकीच असा अर्थ मी काढलाय. मी रडता रडता विचार करत होते त्या वेळात टोणगे एकमेकांशी भांडायला लागले. ते तुझे बाबा नाहीतच असं एका टोणग्याने म्हणणं हे दुसर्‍या टोणग्याला क्रूरतेची परिसीमा असं काहीतरी असतं ना तसं वाटलं त्यामुळे त्यांची चांगलीच जुंपली. मी रडायचं विसरून त्यांच्या भांडणात सामील होणार तितक्यात आई डोकावलीच.
"काय चाललंय?" तिला आम्ही तिघं एकत्र असलो की भांडतो असंच वाटतं. भांडण सोडवताना ती आमच्या अंगावर  खेकसून सुरुवात करते,
"काय चाललंय?" तिने पुन्हा खेकसून विचारलं.
"ती रडतेय." दोघांमधलं कुणीतरी पुटपुटलं.
"ते दिसतंय मला. कुणामुळे रडतेय असं विचारतेय मी." कुणीच काही बोललं नाही. मला मजा बघायची होती पण माझ्या रडण्यामुळे टोणग्यांना बोलणी खावी लागणार असतील तर जाणं भाग होतं. मी रडत-रडत माझ्या खोलीत जाऊन बसले. मग वाटायला लागलं, माझी आई वागते का टोणग्यांशी चांगलं? त्यांना काय वाटत असेल? त्यांना जावंसं वाटत असेल का त्यांच्या आईकडे कायमचं? डोकं भणभणायला लागलं. या घरातून पळून जावं असंही मनात यायला लागलं. पण कुठे जाऊ? कसं जायचं? नुसतंच पळायचं की गरजेपुरतं सामान घ्यायचं बरोबर? रस्त्यावर राहिले तर सुरुवातीला लागेल इतकं? कोण देईल अधिक माहिती? एकही पळून गेलेली मैत्रीण किंवा मित्र आठवेना. काय करू खरंच? शेवटी एका मैत्रिणीलाच सांगितलं. तिला सांगायला थोडीशी भिती वाटत होती. तिने तिच्या आईला सांगितलं तर माझ्या आईला सांगणारच ना ती. पितळ उघडं पडेल लगेच. मैत्रीण म्हणाली,
"तू तुझ्या बाबांशीच बोल ना नाहीतर आधी आईशी बोल."
"नाही बोलायचं मला त्या दोघांशी या विषयावर." मैत्रीण माझ्यासारखीच आहे ती तटकन म्हणाली,
"मग जा पळून."
"कुठे जाऊ त्याचं उत्तर दे. तू येतेस माझ्याबरोबर? मजा येईल. नाहीतर पळायला मदत तरी कर."
"मूर्ख आहेस. तुझ्या भावाचं बरोबर आहे. काहीतरी डोक्यात भरवून घेतेस. ते काढ. वेगळा चष्मा घाल डोळ्यावर."
"आणि काय करू?"
"अगं जसा आपला दृष्टिकोन तसं समोरचं दिसतं असं तुझ्याच आईकडून ऐकलंय मी खूपदा."
"ते काय लक्षात ठेवतेस तू? पोनीटेलकडे काम करता करता ती पोनीटेलचे सल्ले आणि विचार स्वत:च्या नावावर खपवते." तिला उडवून लावलं मी पण नंतर खरंच मी बदलायला हवं का असं वाटायला लागलं. पण म्हणजे मी नक्की करायचं काय? बदल मला झेपेल? मुळात बाबा सांगतो ते मी करते, त्याच्याशी उगाच वाद घालत नाही; हे मी का सांगतेय कारण आईला वाटतं मी वाद घालण्यात फार पटाईत आहे. सत्य असं आहे की मी वाद घालायला सुरुवात करते ते त्यांच्यामुळेच. कोणत्याही विषयावरची या दोघांची मतं ऐकली की धक्काच बसतो मला. या मोठ्या लोकांची विचित्र मतं फारच विचित्र आहेत. मागासलेले नुसते. असा कसा विचार करतात? अविश्वसनीय. त्यांची मतं, म्हणणं सगळंच चुकीचं असल्यामुळे खोडून काढणं भाग असतं.  मी मतं खोडून काढायला सुरुवात केली की आई थांबवते. तेवढं सोडलं तर मी नीट वागते, शाळेत काय झालं ते सांगते, त्याच्या कामातही मदत करते लहर आली की. तोही ऐकतो सगळं, करतोही सारं माझ्यासाठी पण ’आय लव्ह यू’ म्हटलं की जबरदस्ती ’आय लव्ह यू टू’ म्हणतो. कधीकधी तर उत्तर न देताच निघून जातो. हे फक्त माझ्याशी. आईशी आणि टोणग्यांशी त्याचं वागणं नेहमीसारखंच आहे. एकदा न राहवून मी विचारलंच त्याला,
"बाबा, मी आवडत नाही का तुला?"
"आवडतेस." फोनमधली मान वरदेखील काढली नाही त्याने. ’आम्ही हेच केलेलं चालत नाही तुम्हाला’ असं पुटपुटत मी टक लावून त्याच्याकडे बघत राहिले. त्याची मान वर झाली नाही.
"आम्हाला व्याख्यान ऐकवता फोनमध्ये डोकं खुपसलं की." मी जोरात म्हटलं. तो वैतागला.
"बोल." कपाळावर आठ्या घालत त्याने माझ्याकडे पाहिलं.
’स्वत:च्या टोणग्यांकडे बघतोस का असा कधी? सारखं ’आय लव्ह यू चालू असतं.’ मी मनातल्या मनात धुमसत होते. प्रत्यक्षात गप्प राहिले. निघूनच गेले तिथून. जाताना तो किती वाईट आहे याची उजळणी केली मनात. मला माझा बाबा माझ्यावर प्रेम करत नाही हे लक्षात आल्यापासून त्याच्या सगळ्या वाईट सवयी अगदी प्रकर्षाने जाणवायला लागल्यात. उठसूठ ढेकर देत असतो, एकदा शिंकायला लागला की झालं; थांबतच नाही. लहान असताना आम्ही सगळे मोजायचो शिंका. आता दिलं सोडून. कळकट बनियन आणि चिटुकली चड्डी आणि पादणं...शी, शी, शी काय सांगतेय मी हे. माझ्या वयाला शोभत नाही पण इतकी चिडलेय मी की हे सगळं जगाला ओरडून सांगायची माझी तयारी आहे. मला माझा बाबा ’कूल’ पाहिजे पण त्याला काय फरक पडतोय. मुळात तो मला त्याची मुलगी समजतच नाही त्यामुळे कशाला माझ्यासाठी तो त्याच्या सवयी बदलेल? आता काहीतरी करायला हवं. आहे हे स्वीकायरायचं इतकंच उरलंय की काय माझ्या हातात? का सापडेल मला मार्ग?

"मला माझ्या बाबाकडे जायचं आहे कायमचं राहायला." मी आईसमोर जाऊन उभीच राहिले. मला वाटलं आता स्फोट होईल. तसं झालं नाही. चला, म्हणजे आईसुद्धा बाबाला सामील. ही ब्याद कधी टळते असं हिलाही वाटतंय की काय? माझे डोळे भरून आले. आई शांतपणे म्हणाली,
"तू तुझ्या बाबाकडेच आहेस. खूळ काढून टाक हे डोक्यातून."
"खूळ? मला हे सांगतेस तसं बाबाशी बोललीस का?"
"बोलले."
"मग?"
"मग काय? त्याला नाही वाटत तसं."
"त्याने ते मला सांगायचं ना? दुसरं म्हणजे तोंडाने बोलून काय उपयोग, वागण्यात दिसायला हवं."
"तू विचार हे त्याला. नाहीतर असं करू आपण सगळे बसू आणि बोलू. हल्लीच घेतलं आहेस तू हे काहीतरी तुझ्या मनात."
"आधी कळलं नव्हतं. उशिरा आलं लक्षात."
"असं कसं अचानक बदलेल? तुझा दृष्टीकोन बदललाय. बाबाच्या प्रत्येक कृतीत तू अर्थ शोधायला सुरुवात केली आहेस हल्ली."
"टोणग्यांवर तू तरी करतेस का प्रेम? ती तुझी थोडीच आहेत." मी अगदी तिच्या मर्मावर बोट ठेवलं. माझंच चुकलं म्हणत राहते. आता कर विचार माझ्या प्रश्नावर.
"बास हं. अती झालं हे." त्या दोघांना टोणगे म्हणण्याचा अधिकार तिचाच असल्यासारखं आई चिडली आणि नेहमी बोलते तसं तेच तेच परत बोलत राहिली. आईला उसकवलं म्हणून मला बरंच वाटलं. घरातल्या सर्वांना असाच त्रास द्यायचं मी ठरवलंय. तिची ’टेप’ थांबल्यावर मी म्हटलं,
"टोणग्यांवर तू प्रेम करतेस का हा प्रश्न चिडण्यासारखा नाही तर स्वत:च्या मनात डोकावून पाहायला हवं असं वाटण्यासारखा आहे. माझ्या मनात हे खूळ आलंय तसं त्यांच्या मनातही येऊ शकतं ना?"
"येऊ शकतं पण मला नाही वाटत ती दोघं तुझ्याइतकी चक्रम आहेत." आईने संभाषण थांबवलंच.
आमच्या घरातलं वातावरण माझ्या या खुळामुळे बदललं असं प्रत्येकालाच वाटतंय. आई तर हवालदिल झाली. इतकी वर्ष त्या दोघांनी एकमेकांची मुलं आपली मानली, भेदभाव केला नाही आणि आता हे काय भलतंच? असं तिला वाटत होतं. बाबा तर घरातच टिकेनासा झाला. माझ्याशी बोलायचीही त्याची तयारी नव्हती. मी प्रयत्न केला तेव्हादेखील तेच उत्तर.
"तुझ्या मनातल्या खेळांना मी काही करू शकत नाही. चार वर्षांची होतीस तू या घरात आलीस तेव्हा. त्या क्षणापासून मी तुला माझीच मुलगी समजतो. आता ते सारखं कसं दाखवून द्यायचं मला ठाऊक नाही आणि इच्छाही नाही." तो हुप्प होऊन माझ्याकडे बघत राहिला. मला वाटलं त्याचे गाल ओढावे आणि कुशीत शिरावं पण माझ्या भावनांना खूळ म्हणणार्‍या लोकांचा मला आता प्रचंड राग यायला लागलाय. बाबाच काय, कुणीच माझ्यावर प्रेम करत नाही असं  वाटतंय. मला आता या विषयावर कुणाशीही बोलायचंच नाही. तशी आता किती वर्ष राहिली आहेत या घरातून बाहेर पडायची. शिक्षण संपलं की यांचा संबंध संपला. माझी मी कमावेन आणि खाईन पण या माणसांचं तोंड पुन्हा बघायचं नाही. मनातल्या मनात मी दृढनिश्चय केला तेवढ्यात आई आली. नको तेव्हा ती टपकतेच नेहमी.
"चल. लगेच निघायचं आहे."
"कुठे?"
"तू चल तर खरी." आईने जवळजवळ मला फरफटतच घराबाहेर काढलं. काय करणार आहे ही माझं? एकदा एखाद्याचं प्रेम उडालं की माणूस कुठल्याही थराला जातो...!


"तुझी आई मला तुझ्याबद्दल रोज सांगते." आईने मला पोनीटेलसमोर आदळलं. मी रागाचा कटाक्ष आईकडे टाकून निर्विकारपणे पोनीटेलकडे पाहत राहिले.
"ऐकलंस का?" त्याने मृदू स्वरात विचारलं.
"ऐकलं. तुमच्याबद्दलपण ती आम्हाला रोज सांगते." कुसकटपणे मी म्हटलं.
"अरे वा. चांगलंच बोलते ना?" मी उगाचच द्विअर्थी मान हलवली, त्याला त्याचा काहीच फरक पडला नाही.
"पिंपाचा विनोद सांगते. पाठ झालाय आमचा." मी तसं रागानेच म्हटलं हे पण ते दोघं आयुष्यात पिंपाचा विनोद पहिल्यांदा ऐकल्यासारखे हसले. मी ढिम्म. अखेर पोनीटेल म्हणाला,
"हे बघ. मला सगळं ठाऊक आहे त्यामुळे आधी उपाय काय ते सांगतो मग तू तुझं म्हणणं सांग. उलट्या पायर्‍या चढू." मी काहीच बोलले नाही तसं त्याने उलट्या पायर्‍या चढायला सुरुवात केली.
"तू आता किती वर्षांची झालीस?"
"चौदा." गुरकावल्यासारखं मी उत्तर दिलं.
"तुझी पाळी कधी सुरू झाली?" मी आईकडे डोळे मोठे करून पाहिलं. माझ्या पाळीशी माझ्या समस्येचा काय संबंध? आई शांत होती म्हणून नाईलाजाने उत्तर दिलं.
"गेल्यावर्षीपासून."
"म्हणजेच तुझ्या शरीरात बदल होत चालले आहेत. यौवनावस्था म्हणतात याला."
"शिकलेय शाळेत." हेच ऐकायला आले की काय इथे? म्हणजे माझ्या वागण्याला मीच जबाबदार. चिडणं, आक्रस्ताळेपणा, निराशा असं काय काय होतं म्हणे या वयात त्यामुळे या बदलाशी जुळवून घेताना काही प्रश्न निर्माण होऊ शकतात असं शाळेत शिकलेलं भलंथोरलं वाक्य पाठ झालंय. हे इतकं सगळं सांगण्याऐवजी दोन शब्दांत मी उत्तर दिलं.
"तू शिकली आहेस पण तुझा बाबा नाही. त्यामुळे तुला जे वाटतंय त्याला तू जबाबदार नाहीस. तुझ्या आईला वाटतंय तसं हे खूळ नाही." पोनीटेल काय म्हणतोय ते कळलंच नाही मला क्षणभर. प्रकाश पडला तसं मला खुर्चीतल्या खुर्चीत टुणकन उडी मारावीशी वाटली. उडी मारली नाही पण माझा चेहरा खुलला.
"बाबाचं प्रेम नाही हे बरोबर आहे ना?"
"नाही. ते साफ चुकीचं आहे पण तुझे बाबा तुझ्याशी जे वागतायत ना त्याचं कारण तुझं वय आहे."
"अं?" पोनीटेल सल्लागार आहे हे ठीक पण इतकं गहन कशाला बोलायचं? माझ्या चेहर्‍यावरचे भाव वाचत तो म्हणाला,
"तुझ्या बाबाला तुझ्या शरीरातल्या होणार्‍या बदलामुळे थोडंसं अवघडलेपण आलंय. त्याचं तुझं रक्ताचं नातं नाही हेही कारण असेल पण तेच एक कारण असेल असं म्हणता येणार नाही. सख्ख्या नात्यातही हे होतं. नकळत होतं. मला खात्री आहे तुझ्या बाबाला स्वत:लाही हे कळलेलं नसेल."
"खरंच? म्हणून तो चार हात दूर राहत असेल माझ्यापासून? तुम्ही त्याला सांगाल समजावून?" मला आत्ता याक्षणी बाबाला इथे आणावं असं वाटत होतं.
"ते येणार नाहीत कारण ते तुझ्यावर प्रेम करतात यावर ते ठाम आहेत. ही समस्या नसून हे तुझ्या डोक्याने घेतलेलं खूळ आहेत हेच त्यांच्या मनाने घेतलंय."
"मी जाते लगेच घरी. तुम्ही जे सांगितलंत ते सांगेत." मी उतावीळ झाले.
"नको. लगेच नको. आधी मी सांगतो ते अमलात आणू. नंतर हा बदल तुझे बाबा कसा स्वीकारतात ते पाहा. एकदा का तुझं मन शांत झालं की जे आपण बोललो ते सांग तुझ्या बाबांना. चालेल?" पहिल्यांदाच मला पोनीटेलने स्वत:च्या तोंडून पिंपाचा विनोद पुन्हा सांगितला तरी चालेल असं वाटलं. मी आनंदाने पोनीटेल सांगेल ते करायचं ठरवलं. येताजाता बाबाला, ’आय लव्ह यू’ स्वत:हून पुढाकार घेऊन  म्हणायचं अगदी लगेच ठरवलं. माझी तक्रार तीच होती ना की तो कधीही स्वत:हून हे म्हणत नाही. यापुढे मी ’आय लव्ह यू’ म्हणून थांबणार नाही, त्यालाही उलट म्हणायला लावेन. पोनीटेल म्हणाला, ’पुरुषांना भावना  व्यक्त करणं जमत नाही. ते तुमच्यासाठी सतत काही ना काही करत राहतात. तेच त्याचं प्रेम असतं. ते एकदा ओळखता आलं की झालं.’  मला ते पटलं. आतापर्यंत त्याने माझे सगळे लाड पुरवले. मला शाळेत तोच सोडतो, अभ्यास घेतो, माझं जगाबद्दलचं ज्ञान वाढावं म्हणून माहिती देतो, पुस्तकं भेट देतो...अशा अनेक गोष्टी करतो. आता फक्त त्याला प्रेम बोलून दाखवायला शिकवायचं होतं. आता तुम्ही म्हणाल, तुझ्या बाबांचं प्रेम आहे हे कळलं हे खूप नाही का? खरं आहे पण मला आवडतं प्रेम व्यक्त केलेलं, शब्दांनी व्यक्त केलेलं प्रेम! मुलीचा इतका हट्ट बाबाने पुरवला तर बिघडतं कुठे? मी मोठी होतेय, माझ्या शरीरात बदल होतायत यामुळे त्याच्या नकळत तो माझ्यापासून दूर जात असेल तर पोनीटेलने सांगितलेलं काम अगदी सोपं होतं.  माझ्या मनावरचा ताण एकदम नाहीसा झाला. कधी नव्हे ती आई मला आवडली आणि पोनीटेलही. पोनीटेलचा निरोप घेऊन मी आईसह घरी निघाले. घरी गेले की मी बाबाला घट्ट मिठी मारणार आहे. हो, हो. पोनीटेलने हळूहळू पावलं टाकायला सांगितली आहेत ते आहे लक्षात. बाबा नक्कीच अवघडून जाईल माझ्या मिठीमुळे पण मला आता कारण कळलंय ना त्यामुळे मला राग न येता हसायलाच येईल. तो चिडेल पण होईल सवय  आणि जाईल त्याचं अवघडलेपण.  माझ्या नजरेसमोर दिसतंय मला  दृष्य. आता मी अगदी उतावीळ आहे झाले आहे. एका नविन बदलासाठी माझ्या बाबाला तयार करायला. नव्याने आमचं नातं रुजवायला!

माझा मराठीचा बोल (मामबो) दिवाळी अंक २०१९ मध्ये प्रसिद्ध.

Friday, January 24, 2020

जपानला आमचं ’काबूकी’

जपानला ’पारंपरिक’ घरात राहू असं नवरा म्हणाला आणि माझ्या पोटात गोळा आला. कोकणातलं ’पारंपरिक’ घर आठवलं. शरीरधर्मासाठी रात्री अपरात्री जायची वेळ आली तर ’परसा’कडे जीव मुठीत धरून जाणं, कटकटी शरीररक्षक भावंडं सोबतीला नेणं, कंदिलाच्या उजेडात सावल्यांच्या खेळांनी जीव गेल्यागत होणं असं सगळं डोळ्यासमोर आलं.

जापनीज पारंपरिक घरात शिरलो आणि एवढंसं घर आमच्या चार देहांनी व्यापून टाकलं. बॅगा जमिनीवर इतस्त:त तोंडं उघडून विखुरल्या. इकडे तिकडे नजर टाकली आणि माळ्यावर जाण्यासाठी अरुंद जिना दिसला. मी वर जायचंच नाही असं ठरवून टाकलं पण इलाज नव्हता. झोपायची व्यवस्था वर होती.
"एवढ्याशा पायर्‍यांवर जपान्यांची पावलं मावतात कशी?" वर जाताजाता खाली गडगडणार नाही याची दक्षता घेत मी चढता चढता हवेत प्रश्न भिरकावला. माझ्या प्रश्नांना, ’वाट्टेल ते विचारत राहते’ म्हणून कुणी उत्तरंच देत नाही त्यामुळे प्रश्न हवेत विरतात. हाही विरला. तोल सावरत वर पोचले तितक्यात खाली काहीतरी गडबड उडाली. बापलेकात काहीतरी जोरदार चर्चा चालू होती. थोड्यावेळाने दोन्ही मुलं ’जॉगिंग’ ला बाहेर पडली. कपडे दोघांनी मोजके आणले होते पण धावायचे शूज हमवत आणायला दोघं विसरले नव्हते. माझं बरोबर उलट होतं. मुलांच्या नादिष्टपणाबद्दल मी ताशेरा झोडणार तेवढ्यात बेल वाजली आणि नंतर फक्त आय कॉल पोलिस, नो ओपन डोअर असं मोडकंतोडकं इंग्रजी कानावर यायला लागलं. क्रियापदं गाळली की भाषा समजायला सोपी असं आपल्याला वाटत असतं त्यामुळे नवरा इंग्रजीची मोडतोड करण्यात मग्न होता आणि बाहेरचा माणूस स्वत:ची भाषा सोडायला तयार नव्हता. मला खाली जावंसं वाटत होतं पण तो अरुंद जिना! उतरायला जायचं आणि बाहेरचा, दार फोडून आत येऊन मला खिंडीत गाठायचा त्यापेक्षा मी वरुनच आरडाओरडा करणं ’सेफ’ होतं. एकदम सगळे चित्रपटच डोळ्यासमोर यायला लागले आणि विविध मथळे. जपानमध्ये दोन अमेरिकन नागरिकांचा मृत्यू, दोन बेपत्ता, दोन ओलिस... काय न काय. आमचा काटा काढला की मुलं...?

"मी ९११ ला फोन करते." दाराबाहेरून जापनीज आणि दाराआडून इंग्रजी रंगलं होतं त्यात माझा मराठी सूर मिसळला. तेवढ्यात लक्षात आलं आपण जपानमध्ये आहोत. भारत जपानच्या जवळ . शाळेत असताना पाहिलेली वन शून्य शून्य मालिका आणि शिवाजी साटमच आठवायला लागले. भारत की अमेरिका? कोण येईल ताबडतोब? तोपर्यंत काय करायचं? लहानपणी माळ्यावर आडवं झोपून जिन्याच्या दांड्यांतून खाली पाहत बसायचो तसंच इथे अंग टाकलं आणि ’ऑखो देखा हाल’ पाहायला सुरुवात केली.
निघाला नवरा दरवाज्याच्या दिशेने, आता दार उघडणार, तो आत येणार...
"अरे दाराजवळ जाऊ नकोस त्याच्याकडे बंदूक असली तर?"
"ही काय अमेरिका आहे?" तेवढ्यातही नवर्‍याला बंदुकांचा वापर जास्त कुठे होतो ते लक्षात होतं.
"आहे कोण?"
"सिक्युरिटी गार्ड आहे म्हणतोय." जपानला आम्ही इतके महत्त्वाचे वाटतोय? पालथं पडल्यापडल्या मी मान अभिमानाने ताठ केली.
"उघड ना दार." बॉडी गार्ड वगैरेसारखे चित्रपट डोळ्यासमोर तरळले. उत्तर नाही. कॅमेर्‍यासमोर नवर्‍याला तो माणूस दिसत होता. बाहेरुन तो स्वत:चा बिल्ला दाखवत होता आणि आतून नवरा गुगल ट्रान्सलेटरगत बोलत होता. गुगलने भाषांतर केलं की समोरच्या चेहर्‍यावरचे जे भाव असतात ना ते बघण्यासारखे असतात, अगदी युरेका युरेकासारखे भासतात पण इथे भरवश्याच्या म्हशीला टोणगा म्हणतात तसं मानवी गुगलचं चालू होतं. अखेर नवर्‍याने दार उघडायचा निर्णय घेतला. मी खोलीचं दार शोधायला धावले.
"वरती का धावतेयस तू?" नवर्‍याला वरच्या धावपळीचा हेतू समजत नव्हता.
"दार सापडत नाही." तो काहीच बोलला नाही. जपान्यांच्या अद्ययावत तंत्रज्ञानाची चुणूक देशात प्रवेश केल्यावरच दिसली होती त्यामुळे कुठलं बटण दाबलं की काय सुरू होईल, काय पडेल आणि काय वर जाईल ही धास्ती होती. ज्याअर्थी दार भिंतीत नाही त्याअर्थी ते कुठूनतरी येत असणार... माझा अगदी साधा बेत होता. ’बाहेरचा माणूस आत आला की नवरा त्याच्या तावडीत सापडणार किंवा तो नवर्‍याच्या.’ (हे विधान तुम्ही कुठल्याही अर्थी घेऊ शकता) आपण वर दार लावायचं, चादरीच्या आत शिरून मुलांना फोन करायचा, ९११, १०० ला फोन करून त्यांच्यामार्फत जपानी तातडीची मदत मागवायची. हाय रे दैवा... दारच सापडत नव्हतं त्यामुळे चित्रपटातून जे पाहिलं ते करता येत नव्हतं. अशावेळेस जे होतं तेच झालं. नवर्‍याने दार उघडलं. दमदार पावलांनी कुणीतरी आत शिरलं. आता फक्त निरव शांतता आणि त्या दमदार पावलांचा आवाज. मी श्वास रोखून पालथी पडून खालचं दृश्य पाहत राहिले. ती दमदार पावलं नजरेच्या टप्प्यातून पटकन नाहीशी झाली त्यामुळे ’चेहरा’ दिसलाच नाही. खाली जाण्याचं धाडस नव्हतं. नवर्‍याचं काय होणार ते कळत नव्हतं. काही क्षण सुनसान शांतता, नंतर कुजबूज... झटापटीचे आवाज ऐकू येत नाहीत म्हटल्यावर मी माझा ’आवाज’ काढला.
"आहे तरी कोण? असा कसा आलाय तो घरात?"
"तो खरंच सिक्युरिटी गार्ड आहे आणि त्याच्या ऑफिसामध्ये घंटा वाजली."
"घंटा वाजली? आपण आल्यावर? कशी? त्याला विचार इथे कसं काही वाजलं नाही आणि तू त्याच्यापासून लांब राहा. अचानक हल्लाबिल्ला करेल."
"मी काही विचारणार नाही. माझ्या लक्षात आलं आहे काय झालंय ते."
"काय झालंय?"
"तो जावू दे मग सांगतो तुझ्या मुलांचे प्रताप."
"तू वेळोवेळी मुलांना असं टोलवू नकोस हा. कधी ती तुझी असतात कधी माझी. हे बरं आहे तुझं; सोयीप्रमाणे चालू ठेवतोस. आपल्या मुलांचे प्रताप म्हण."
"तू इथेही भांडायला आली आहेस का? प्रश्न मुलं कुणाची हा नाही प्रश्न त्यांच्या प्रतापाचा आहे." आता तो माणूस कोण यापेक्षा मुलांचे प्रताप काय असतील हा प्रश्न मोठा होता. मुलांचे प्रताप त्यांना दाखवल्यावर शांत बसणार्‍यातली आमची मुलं नाहीत. ती काही झालं तरी तुमचंच कसं चुकलं होतं आणि तुमच्यामुळेच आम्ही हे प्रताप केले असं पुराव्यानिशी सिद्ध करतात आणि पुढचं सहकार्य नाकारतात. जपान दौरा आताच सुरू झाला होता तो बापलेकाची वादावादी सुरू झाली की या घरातच संपण्याची लक्षणं मला दिसायला लागली होती. सगळा दौरा मुलाने आखला होता आम्ही फक्त त्याच्या मागून मागून फिरणार होतो त्यामुळे त्याने संप पुकारला की झालं.

तो माणूस गेला आणि दार वाजलं. मुलं आली होती...

"अरे काय गोंधळ घालून गेलास तू." नवरा पुत्ररत्नावर डाफरला पण रत्न थेट शौचालयात घुसलं.
"हे जपानी ग्रेटच आहेत." तो आतून ओरडला. सोबतीला वुईऽऽ आऽ ऊऽ undefined...आवाज.
"चित्कारू नकोस आतून. घाणेरडा. शौचालयात काय केलं जपान्यांनी ग्रेट व्हायला?" इथेही तो दाराच्या आत आम्ही दाराच्या बाहेर. ’दार’ सगळीकडे आहेच.
"अगं सगळं धुतलं जातंय आपोआप."
"ईऽऽ त्यात काय. भारतात असंच असतं. इको फ्रेंडली."
"भारतात एक दांडी पिचकारी सोडते इथे पिचकार्‍या येतायत. आई, पाणी पण गरम. तू पण बघ." ग्रेट जपान्यांनी शौचालय हा अत्यानंदाचा विषय केलेला दिसत होता.
"तू बाहेर येऊन तुझा ’ग्रेटपणा’ ऐक." जपान्यांच्या प्रचंड प्रभावाखाली शौचालय, आय मीन पुत्ररत्न बाहेर आलं.
"तुझ्यामुळे आज ’सिक्युरिटी गार्ड’ आला." तुझ्यामुळे आपल्या घराण्याला काळं फासलं गेल्याचा नवऱ्याचा आविर्भाव.
"हा बल्ब कशाला काढलास?" नवरा पुन्हा टांगल्या गेलेल्या बल्बकडे तावातावाने हातवारे करत विचारत होता.
"तुला दाखवायला."
"बल्ब काय बघायचा? मी तुला सांगत होतो तो बल्ब नाही."
"तेच. तो बल्बच आहे हे दाखवायला काढला." पुत्ररत्नाला गोंधळ काय झाला तेच समजत नव्हतं.
"गाढवा, त्यातच काहीतरी होतं मग. तो गार्ड सतराशेसाठ वेळा बल्ब हातात घेऊन मांत्रिकासारखं पुटपुटत होता. गडबडीने वर लावला त्याने परत."
"तो बल्ब नाही? जपानी ग्रेटच आहेत." रत्न उत्सुकतेने परत बल्बकडे गेलं. जीवाच्या कराराने नवर्‍याने त्याला थांबवलं.
तो बल्बच आहे हे मान्य केलं असतं तर तो वरच राहिला असता आणि पुढचं रामायण टळलं असतं असं दोन रत्नांनी आम्हाला पटवून दिलं आणि ’आमचं चुकलं’ असं म्हणून आम्ही पुढच्या ’काबूकी’ ला (नाट्याला) जन्माला घालायला निघालो. बाहेर पडण्याआधी शौचालयात जाऊन कमोडवर न बसता मी उभ्या उभ्या सगळी बटणं दाबून काय काय होतं ते पाहिलं. एका बटणाने एक धातूची नळी बाहेर आली. दुसऱ्याने धबधब्यासारखं सार्‍या बाजूंनी पाणी, तिसर्‍याने सीट गरम... स्वत:साठी यातलं काही वापरण्याचं धाडस नव्हतं कारण एकदा विमानात एक बाई बसली आणि तिने बटण दाबल्यावर तिचा पार्श्वभाग आत खेचला जाऊन ती अडकली (या घटनेत ’तो’ ही असू शकतो याची नोंद घ्या) हे ऐकलेलं मनावर इतकं ठसलं होतं की कशाला कुठे भलत्या ठिकाणी अडका. नवर्‍या मुलांबरोबर सतत अडकल्यागत होत असतं तेवढं पुरे असा सुज्ञ विचार मी केला.

जपानी ग्रेटच आहेत असं म्हणत मी ही शौचालयाबाहेर आले आणि आम्ही पॅलेसच्या दिशेने वळलो. पॅलेसशी पोचलो म्हणजे मला आणि नवर्‍याला वाटलं होतं की आपण महालापाशी आलोय. मुलाला तेवढ्यात ऑस्ट्रेलियातून जपान पाहायला आलेल्या त्याच्या मैत्रिणीच्या मैत्रिणी भेटायला आल्या. ’आई वडिलांपासून सुटका हवी असेल तर कॉफी प्यायला ये’ असा त्याला त्यांनी मेसेज केला होता. तो आम्हाला विनोद म्हणून दाखवून तो कॉफी प्यायला गेला. मुलगी गुगल पादाक्रांत करत होती. तिच्यामागे आम्ही. नवर्‍याने ’ नक्की कुठे आलोय ते कुणालातरी विचारू का?’ असा क्षीण स्वरात प्रश्न विचारला पण गुगल सोडून कुणाला विचारणं सभ्य माणसाचं लक्षण नसतं. मुलीने जोरात नकारार्थी मान हलवली.
आम्ही महालाच्या प्रवेशद्वाराशी पोचलो. महाल बघायची लांबलचक रांग बघून राजाचाच महाल तो, नक्कीच प्रेक्षणीय असणार याची खात्री पटली. चालायला लागलो.
"हे काय? बाहेरुन भिंती बघायला इतकं चालायचं? महाल कुठे आहे?" लोकं आपले चित्कार काढून फोटो काढत होते. कशाचे काढत होते काय माहीत. मी सुद्धा दोनचारवेळा फोनच्या कॅमेर्‍याचं बटण दाबलं. बटणं दाबण्याची सवयच झाली होती इकडे आल्यापासून.
"इथे राजा राहतो?" हळूहळू माझा संशय वाढत चालला होता कारण आजूबाजूला फक्त झाडं दिसत होती आणि माणसं. हीऽऽऽ गर्दी!
"मी म्हैसूरचे महाल बघितले आहेत. आपले राजे श्रीमंत होते. हे भिंतीच दाखवणार असतील तर मी नाही चालणार दोन दोन तास." मी संप पुकारला. जागोजागी त्यांचे कर्मचारी उभे होते त्यांना बाहेर पडायचं आहे म्हणून खाणाखुणा करून सांगायला लागले. मी थकले आहे हे दाखविण्यासाठी अभिनय कौशल्य पणाला लावून मान टाकली. कर्मचारी घाबरली. तिला वाटलं मी ’हे राम’ म्हणते की काय इथेच. तसं नाही हे हातवार्‍यांची झटापट झाल्यावर तिला कळलं.
जापनीज पंधरा वाक्य तिने म्हटल्यावर मराठीत ’बाहेर पडता येणार नाही’ हा अर्थ मला समजला.
"असं कसं बाहेर पडता येणार नाही. हे काय मला महालात नेऊन नजरकैदेत ठेवणार आहेत की काय?" मी नवर्‍याला चिडून विचारलं. त्याने खांदे उडवले. पुन्हा हसरा चेहरा करत मला बाहेर का पडायचं आहे त्याच्या खाणाखुणा मी सुरू केल्या. या वेळेला मी दाखविण्यासाठी उजव्या हाताने मी माझ्या छातीवर दोनदा थोपटलं, मग दमले आहे हे दाखवण्यासाठी गुडघ्यावर वाकत थोडंसं बसल्यासारखं केलं. माझी शारीरिक कसरत पाहून माझ्या मुलीने कधीच पळ काढला होता. नवरा मुकाट उभा होता. माझी कसरत समजून घ्यायला वॉकीटॉकी वरून बोलावून तिने कर्मचार्‍यांची पलटण हजर केली, जापनीजमध्ये माझ्या खाणाखुणांची चर्चा झाली. काहीतरी निष्कर्ष निघाला असावा. हातांचे पंजे उंचावत मला अख्ख्या पलटणीने थांबायला सांगितलं. इतके पंजे बघून तसंही घाबरून कुणीही थांबलंच असतं. पलटण ज्या दिशेने बघत होती त्या दिशेने पाहत आम्ही उभे होतो. त्यानंतर जे काही येताना दिसलं त्याने तोंडातून शब्द फुटेना. हसतमुख चेहर्‍याने जापनीज कर्मचारी एक व्हिल चेअर घेऊन माझ्या दिशेने येत होता. व्हीलचेअर नको मला फक्त बाहेरचा रस्ता दाखवा हे सांगणार कसं? तेच सांगताना ही व्हीलचेअर आली होती. यानंतर अॅऺब्युलंन्सच आणतील. तो नाद सोडून जपानी ग्रेटच आहेत आणि आपल्याला हे आधीच का सुचलं नाही असं म्हणत मी मला त्या व्हीलचेअरमध्ये कोंबलं. नवरोजी ती कशी चालवायची याचे धडे द्यायला सरसावले. पुढेमागे राजाच्या संग्रहात, ’मोहनाने वापरलेली व्हीलचेअर’ जमा होईल असा ऐवज असल्यागत मी तिची मजा लुटत महाल म्हणून जे काही बाहेरुन दिसत होतं ते पाहिलं. गर्दीत माझीच एक चारचाकी होती. लोक काही बघण्यासारखं नसतानाही थांबायचे मध्येच. खुर्चीतून उतरताना ’व्हीलचेअर’ महिम्यामुळे उगाचच उठता येत नाही, काहीतरी दुखतंय वगैरे भाव चेहर्‍यावर आपोआप यायला लागले होते. नवरा म्हणाला,
"तू धडधाकट आहेस. गैरसमजातून मिळाली आहे ही खुर्ची तुला."
"होतं असं कधीकधी. आता ती मी सोडणार नाही." महाराष्ट्रातलं राजकारण डोळ्यासमोर येऊन मी जाहीर केलं.

महालयात्रा संपली आणि आम्ही पाहिलेला तो ’महाल’, महाल नव्हताच हे समजलं. नुकताच तिथे राजाचा शपथविधी झाला होता ते ठिकाण होतं.
"तरी मी सांगत होते हे ’बार्न’ सारखं वाटतंय." अगदीच ’गोठा’ म्हणणं कठीण गेलं म्हणून मी ’बार्न’ उपाधी दिली. माझ्या तणतणीकडे दुर्लक्ष करत सगळ्यांनी आई व्हीलचेअरमध्ये कशी बसली यावरच दिलखुलास चर्चा केली आणि जपानी लोकांनी आता इंग्रजी शिकायचं मनावर घ्यायला हवं हे राजाला सांगायचा मी निर्धार केला.

आमच्या ’काबूकी’ त सिक्युरीटी गार्ड, व्हीलचेअरने आतापर्यंत भूमिका केल्या आता येणार होती थरारक चित्रपटात घडते तशी धावती ट्रेन थांबवण्याची एक घटना...


महालातून थेट फलाटावर. माझा रथ (व्हीलचेअर) तिथेच सोडावा लागला. आमची ट्रेन येईपर्यंत उभ्या असलेल्या ट्रेनकडे बघत होतो. जपान्यांनी शांतपणे आतल्यांना उतरू दिलं मग स्वत: एकामागोमाग एकच आत शिरले. कडक शिस्तीत. कुणी हे बाळकडू पाजलं? मास्तर की आई? दार बंद झालं, ट्रेन सुरू झाली आणि सुरू झाला थरार! काचेच्या खिडकीवर हाताचा पंजा आला, मागून तोंडावरचं फडकं (मास्क) नजरेत भरलं आणि शेवटी रडणार्‍या, ओरडणार्‍या मुलीचा चेहरा. काय चाललंय हे कळायच्या आत फलाटावर कुठुनशी एक मुलगी धावत आली आणि ’स्टॉप द ट्रेन’ असं जोरात किंचाळत, रडत ट्रेनच्या मागून पळायला लागली. कुणालाच काय गोंधळ आहे तो कळेना आणि ट्रेन कशी थांबवायची तेही. सगळे ’आ’ वासून उभे. धावणार्‍या मुलीने पळता पळता उडी मारून वाटेतल्या खांबावरचं बटण दाबलं. स्टेशनचा गजर वाजायला आणि लाल दिवे चमकायला लागले. ट्रेन हळूहळू थांबली. प्लॅटफॉर्म सोडून गेलेली ट्रेन मागे कशी आणणार हे कळेना. तणाव, उस्तुकता, धास्ती...! अमेरिकन मुलगी रडत रडत गार्डकडे गेली काहीतरी हातवारे झाले, ट्रेन पुढे गेली.
"पुढच्या स्टेशनवर उतरवतील. तिची बहीण असणार. चुकून चढली. व्हॉट धिस गर्ल डिड इज रॉग. " थरारनाट्यातल्या चुका मुलाला दिसत होत्या. सरकारी यंत्रणेचा अपव्यय, फोनचा उपयोग, जपानी शिस्तीला बाधा, उशीर झाला त्याबद्दल त्यांना माफी मागावी लागणार या काळजीने मुलगा त्रस्त आणि फलाटावर गाडी थांबवायचं बटण असतं या आनंदात मी मग्न. त्याची तणतण ऐकत अमेरिकन नागरिकांचा गोंधळ जपानी लोकांनी रांग न मोडताच ’आ’ वासून पाहिला होता त्यात मी पुन्हा सामील झाले.

आमची ट्रेन आली. बसल्याबसल्या टी. सी. दारात उभा राहिला. वाकला. बापरे, प्रवेश करताना विनम्र अभिवादन करायचं असतं की काय? तो वाकला म्हणून मीपण वाकायला उठले तर मुलीने हात धरून खाली ओढलं.
"तू काय वाकतेस?" ती बडबडणार तेवढ्यात चहावाली आली. वाकली. जपानी येताजाता नमस्काराला कंबरेत वाकतात हे ठाऊक होतं. मला काही प्रतिनमस्कार केल्याशिवाय चैन पडेना. मुलीने पकडायच्या आत मी उठून वाकले तशी चहावाली गडबडली. परत परत वाकायला लागली म्हणून मीही. नवरा पुटपुटला,
"आम्हाला चहा हवाय. बस आता." मी बसल्यावर चहावालीने दीर्घ श्वास घेतला आणि घाईघाईत तिची हातगाडी हाकत पळाली. नवरा तिच्यामागून चहा, चहा करत... जपानी नागरिकांचा अमेरिकन नागरिकांनी करमणूक करण्याचा विडाच उचलला होता. त्यांचा ’आ’ वासलेलाच!

जपानी लोक मदतीला अतिशय तत्पर. स्वर्गाचा रस्ता विचारला तर स्वर्ग दाखवायला ते जातीनिशी येतात. प्रश्न असतो कुठला रस्ता विचारतो आहोत ते त्यांना कळण्याचा. ते झालं की तुमचं काम फत्ते. नवर्‍याचा उत्साह दांडगा. त्याला जपान्यांच्या ’स्टाईल’ मध्ये बोलायला आवडायला लागलं होतं. मॅक्क - दोनाल्द, कित्ती - कॅत्त समजायला लागलं होतं. त्यांच्या पद्धतीचं नवर्‍याचं इंग्रजी सुरू झालं की मुलं माझ्याकडे कटाक्ष टाकायची. बाबाच्या गुगल क्षमतेवरच्या अविश्वासाला मुलाने "पॉवर स्ट्रगल" नाव दिलं. म्हणाला,
" मी गुगल केलंय. मुलांच्या हातात सत्ता जायला लागली की होतं असं." महालाच्या नुसत्या भिंती पाहून हा परिणाम. पूर्ण महाल पाहिला असता तर? अचानक मुलगा आग्रह करकरून नवर्‍याला ’विचारायला’ पाठवायला लागला. मी कटाक्ष टाकला तेव्हा म्हणाला,
"त्याला ’बिझी’ ठेवतोय." जपानी लोकांना नवर्‍याच्या तावडीत सोडून मुलं मोकाट.

सगळे देश मला रत्नागिरी आणि राजापूरसारखे वाटतात त्यातून जपान कसं सुटणार? हवाईला मला जिथेतिथे राजापूर दिसलं होतं. परुला कोकणातले गडगे आणि देवरुखची साडवली. नवर्‍याला ज्यात त्यात दिल्ली. आताही
"रत्नागिरीला आल्यासारखं वाटतंय." बांबू जंगलात आल्यावर मी म्हटलं.
"दिल्ली अगदी असंच."
"दिल्लीला बांबू?" विचारेपर्यंत मुलगा वैतागला,
"कोणत्याही देशात एकाच ठिकाणी तुम्हाला रत्नागिरी आणि दिल्ली कशी दिसते?" यावेळी मुलगा इतकं पुटपुटून थांबला नाही. जितक्यावेळा आम्ही मध्ये ’भारत’ आणू तितक्यावेळा तो आमच्याकडून एक डॉलर घ्यायला लागला. तसं त्याने ट्विटही केलं. आमच्याकडून मिळालेल्या पैशात ’सोलो’ जपान ट्रीप पुन्हा होईल म्हणाला.

तर असं हे आम्ही अनुभवलेलं जपान. बांबूच्या जंगलात पोचण्यासाठी प्रवाशांच्या अलोट गर्दीतून मार्ग काढावा लागला, एकदा मुलाला चकवून बसने जाण्याऐवजी टॅक्सी केली तर टॅक्सीवाल्यानेच ’बस’ ने जाणं कसं स्वस्त हे पटवून दिलं. तासभर उभं राहून बसचा प्रवास केला तेव्हा भारतातल्या एस. टी. त उभं असल्यासारखंच वाटलं. देवळात आम्ही लग्नांवर लग्न पाहिली. सुरुवातीला करवल्या आल्या म्हणून घाईघाईत फोटो काढले तर तितक्याच घाईत भटजीबुवा परत जाऊन दुसर्‍या जोडीला घेऊन येत राहिले. लग्न चालूच! नवर्‍याने जपानी पोषाख केलेल्या सुंदर्‍यांबरोबर कधी नव्हे ते उत्साहाने माझे फोटो काढले. मुलगा इथे चोर्‍या होत नाहीत म्हणाल्यावर स्टेशनवर ’आपण ह्यांना पाहिलंत’ का चे फोटो काढून आम्ही त्याला दाखवले. माऊंट फूजीचं दर्शन बुलेट ट्रेनमधूनच घेतलं पण तेही अप्रतिम वाटलं. अणूसंहारातही तग धरलेलं झाड पाहून गलबलून आलं, अजूनही जपून ठेवलेली भग्न इमारत पाहून अस्वस्थ व्हायला झालं.

दरवर्षी या आठ दिवसांची आम्ही सगळेच आतुरतेने वाट पाहत असतो. एकत्र फिरतो, भांडतो, रुसतो, एकमेकांची काळजी घेतो, मुलांच्या लहानपणच्या आठवणींना उजाळा देतो, मिठ्या मारतो आणि आठ दिवसांनी नित्यनेमाला सुरुवात होते ती पुढच्यावर्षी कुठला देश याचे मनसुबे रचत.

(मी विनोदी चष्म्यातून ’जपान’ तुमच्यासमोर मांडलं पण जपानी माणूस मला प्रचंड आवडला. भाषेची अडचण असूनही त्यांची मदत करण्याची तत्परता आपल्याला अवघडूनच टाकते इतक्या आपुलकीने ते मदत करतात. फसवणूक कुठेही होत नाही. एका टॅक्सीवाल्याने तर आम्हाला जास्त चालायला लागू नये म्हणून गल्लीबोळातून गाडी नेऊन ठिकाणाच्या अगदी जवळ नेऊन सोडलं.)


Monday, October 28, 2019

आंतरजालीय दिवाळी अंक - माझी कथा - संकोच

मराठी माणसाचा नादिष्टपणा काय करायला लावेल ते सांगता येत नाही. मामबोकरांच्या (माझा मराठीचा बोल)डोक्यात अंकाचं ’खूळ’ तीन वर्षापूर्वी आलं. पहिले दोन अंक ’आपले आपण’ सदरात मोडणारे होते. यावर्षी  ’आंतरजालीय अंक’ काढायचं ठरलं. 
अंक वाचनीय आहे. भारत आणि अमेरिकेतल्या लिहित्या हातांचं दर्जेदार साहित्य या अंकात आहे. तुम्हाला तिथली अक्षरं वेगळ्या दुनियेत घेऊन जातील याची खात्री वाटते. वाचा आणि प्रतिक्रिया नोंदवून आमचा उत्साह वाढवा. - https://www.mambodiwali.com

या अंकासाठी मदत करत असताना नकळत आठवण झाली ’अस्मिता’ त्रैमासिकाची. केरीमध्ये राहत असताना ’अस्मिता’ नावाचं त्रैमासिक आम्ही काढायचो. या उत्साहाच्या परिणीती म्हणजे, आज तिथल्या नगरवाचनायात शेकड्यांनी मराठी पुस्तक उपलब्ध आहेत. 
या अंकातील माझ्या कथेत लहान मुलीचं विश्व आहे. तिच्या नजरेतून तिला दिसणारे तिचे सावत्र वडील आहेत. दोघांच्या नात्यातला भावनिक गुंता हलक्याफुलक्या स्वरुपात सोडवला आहे. हा प्रवास सुखद वळणापाशी कसा पोचतो त्याची ही कथा... वाचताय ना? वाचून तिथे प्रतिसाद नोंदवायला विसरु नका:

Tuesday, October 22, 2019

झाशीची राणी आणि शाबासकी

"या आपल्या झाशीच्या राणी." जाधवसरांनी जोरजोरात टाळ्या वाजवल्या म्हणून सगळ्या वर्गानेही वाजवल्या. गुरु सांगतील ती पूर्वदिशा त्यामुळे टाळ्या का वाजवतोय ते कळलं नाही तरी आम्ही टाळ्या वाजवत राहिलो. सरांनी खूण करून मला बोलावलं. अतीव आनंदाने मी उभी राहिले. बाकड्यामधून बाहेर आले. बाकड्यांच्या मधल्या अरुंद गल्लीतून वाट काढत किल्ला लढवल्याच्याच आवेशात सरांजवळ पोचले. मागचा फळा म्हणजे किल्ला असल्याचा भास मला होत होता. त्यापुढे उभं राहून ’मेरी झॉंसी नही दूंगी’ अशी घोषणा केली की आठवत नाही कारण पुढच्या क्षणाला झाशीची राणी ढळाढळा अश्रुपात करत, बाकड्यांमधून सैरावैरा धावत, खालीमान घालून लाकडी आसनात शिरली. जाधवसरांनी गुरुजीपणाचा किल्ला असा काही लढवला की झाशीच्या राणीचं पानिपत झालं. सरांनी आपला वाक्बाण सोडला.
"या आपल्या झाशीच्या राणी. चाचणी परीक्षेला ४ ते ७ धड्यांचा अभ्यास करायचा होता पण यांना ९ व्या धड्यातली झाशीची राणी आवडली आठवली आणि ती उत्तरपत्रिकेत आली. शाबास! त्यांच्या या अतुलनीय पराक्रमासाठी मी भोपळा देऊन त्यांना सन्मानित केलेलं आहे." मुलांनी पुन्हा जोरदार टाळ्या वाजवल्या. या वेळेस प्रत्येकाला आपण टाळी का वाजवतोय ते ठाऊक होतं. आणि प्रत्येकजण तो आनंद लुटत होतं. मी सोडून. अचानक हाती आलेल्या भोपळ्याचं आणि झाशीची राणी या पदवीचं काय करावं ते कळेना.

पूर्वीपासून माझं एक होतं. उत्तर चुकीचं लिहिलं तरी चालेल, जागा मोकळी सोडायची नाही. शिकवणच तशी होती. काही म्हणता काही फुकट घालवायचं नाही. जन्मापासून हेच ऐकत आल्यावर काय बिशाद काही फुकट घालवण्याची, त्यामुळे उत्तराची जागा फुकट घालवणं अशक्यप्राय. प्रश्नपत्रिकेतपण असायचंच ना, ’मोकळ्या जागा भरा.’ विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर येत नव्हतं. नुकतीच ओळख झालेली झाशीची राणी अंगात भिनलेली. ती मला इतकी भावली होती हे सरांना समजावं इतक्या निरपेक्ष हेतूने मी तिच्याबद्दल लिहून ’मोकळी जागा’ भरली. विद्यार्थी परीक्षेला नसलेले धडेही आधीच वाचतात, नुसते वाचून थांबत नाहीत, काय वाचलंय ते लक्षात ठेवतात, मोकळ्या जागा त्याने भरून टाकतात या सगळ्याचं खरंतर सरांनी कौतुक करायला हवं होतं की नाही?

त्यादिवसापासून मी अख्ख्या शाळेची ’झाशीची राणी’ झाले. कुणीही, कधीही मला त्या नावाने हाक मारायचं. झाशीच्या राणीसारखाच पराक्रम खर्‍याअर्थी गाजवणं आता भाग होतं. कार्यक्षेत्र वेगळी असली म्हणून काय झालं.
"जाधवसरांना इतिहासात १०० पैकी १०० गुण मिळवून दाखवले तरच नावाची झाशीची राणी." अशी घोषणा आधी मी मनातल्यामनात केली. गुण मिळवण्यासाठी अभ्यास करावा लागतो हा मोठा अडथळा त्यात होता. पण आता गत्यंतर नव्हतं. येताजाता कुणी ’झाशीची राणी’ म्हणून चिडवलं की झेंडा हातात धरल्यासारखं उभं राहून घोषणा द्यायला लागले. शाळेतली ती घोषणा लहानश्या गावात लवकरच पसरली, घरीही पोचली. आईने एकदा आठवण करून दिली.
"झाशीच्या राणी अभ्यासाला बसून इतिहास कधी घडवणार?" मी परीक्षा लढवायला घेतली. परीक्षा लढवायचीच तर अंतिम ध्येय वार्षिक परीक्षा हे नक्की केलं. येता - जाता इतिहास उगाळला आणि अखेर परीक्षा ’सर’ केली. इतिहास या विषयात १०० पैकी १०० गुण मिळवले.

"या आपल्या झाशीच्या राणी." जाधवसरांनी पुन्हा एकदा जोरजोरात टाळ्या वाजवल्या म्हणून सगळ्या वर्गानेही वाजवल्या. या वेळेस प्रत्येकाला टाळ्या वाजवण्याचं कारण ठाऊक होतं.  सरांच्या जवळ जाऊन उभी राहिले. सरांनी कौतुकाने पाठीवर शाबासकीची थाप मारली. ही थाप आज इतक्या वर्षानंतरही मला जशीच्यातशी आठवते आणि त्याची आठवण करून द्यायला कुणी ना कुणी असतंच. म्हणजे होतं असं, दर काहीवर्षांनी मला कुणीतरी भेटतं ते हमखास विचारतं,
"तू जाधवसरांची विद्यार्थिनी होतीस ना?" माझी त्या व्यक्तीशी ओळखही नसते पण मला ताबडतोब कळतं.
"हो. मी त्यांची झाशीची राणी." मी हसून सांगते.
"तुझ्या जिद्दीचं फार कौतुक करतात सर." बोलणार्‍याच्या स्वरातूनच मला कळतं की सरांना माझं किती कौतुक होतं. फक्त जाधवसरांनाच नाही सगळ्याच सरांना. या प्रसंगानंतर दोन वर्षांनी माझ्या दुसर्‍या शिक्षकांनी वर्गात शिरायच्या आधीच खिंडीत गाठल्यासारखं दारात अडवलं होतं.
"तुझ्याबद्दल मी पैज मारली आहे."
"ओ?" एवढाच उद्गगार निघाला माझ्या तोंडून.
"हे बघ, ११ वीत तास चुकवायचे, बंडखोरपणा करायचा, शिक्षकांविरुद्ध भाषणं ठोकायची हे सगळं समजू शकतो मी. शिक्षकांना तू हुशार आहेस हे ठाऊक आहे पण अभ्यासात लक्ष घातलं तर. १२ वीत काय दिवे लावणार असा प्रश्न पडलाय त्यांना. तू काही घोषणा करायच्याआधी मीच करून टाकली आहे. तेव्हा लागा अभ्यासाला आणि मिळवा गुण चांगले. तुझ्यामुळे मी पैज हरलो तर फार वाईट वाटेल मला." सरांनी दरवाजा अडवल्यामुळे मी त्यांच्या बाजूने अंग वाकडंतिकडं करत वर्गात जाऊन बसले. सगळ्या शिक्षकांनी ’कट’ केला आहे हे दिसतच होतं. पुन्हा एकदा परीक्षा ’सर’ करणं आलं हे दिसतंच होतं. वैतागत सरांनी पैज हरायला नको म्हणून पुन्हा अभ्यासाला लागले.

दुसरी शाबासकी मिळवायची होती पण पहिल्या शाबासकीने ’इतिहास’ घडवला.

Wednesday, October 16, 2019

कसब

पन्नाशीच्या पुढची लोकं सतत, ’मागे वळून बघताना...’ असं म्हणत असतात. नुकतीच पन्नाशी पार केली असल्याने मलाही मागे वळून बघावंसं वाटायला लागलं. चष्मा न घालताही बरंच काही दिसायला लागलं... नुसतं दिसून काय उपयोग, मागे वळून पाहिलेल्याचं पुढे काय झालं हे ही महत्वाचं,

माझी आई अप्रतिम गायची आणि मला माझ्या आईसारखं व्हायचं होतं म्हणून मी गाणं शिकायला सुरुवात केली. आमच्या गुरुंनी थेट ओंकार प्रधाननेच सुरुवात केली. मला ते गाणं इतकं आवडलं की नकळत मी ते वेगवेगळ्या पद्धतीने गाऊन पाहायला सुरुवात केली. गुरु म्हणाले,
"तुझा आवाज छान आहे पण जी चाल शिकवलेली असते त्याच चालीत गायला पाहिजे." मी प्रयत्न करत राहिले, नविन चालींची भर पडत राहिली. माझ्या गुरुंनी माझ्यासमोर हात टेकल्यासारखा गळा टेकला. गाण्याचा वर्गच बंद करून टाकला. तेव्हापासून माझं ’गाणं’ राहिलं आहे.

गाता गळा बंद व्हायच्या आधी थै, थै थक करत पाय थिरकत होते. सगळ्या मैत्रिणी कथ्थक शिकायला जायच्या. आमची एक मैत्रीण तिच्या घरी गेलं की कथ्थकचा सराव आम्हाला बघायलाच लावायची. मी बदले की आग घेऊन कथ्थक शिकायला जाणं सुरू केलं. आल्या मैत्रिणी की कर कथ्थक असं करायचा माझा डाव होता. पण माझ्या दाणदाण पदरवाला गुरु इतक्या वैतागल्या की त्यांनीही तो वर्ग लवकरच बंद केला आणि मी फक्त मैत्रिणीचं कथ्थक बघत राहिले.

ट्रेकिंग करायचं होतं पण, ’गप्पा मारत राहिलीस की चढायचं विसरतेस’ असं म्हणत माझ्यामुळे मित्रमैत्रिणींनी स्वत:चं ट्रेकिंग बंद केलं. त्यांची कुठलीशी संस्था होती ती बंद पडली. घ्या, पाद्र्यांना पावट्याचं निमित्त.

याला काही दशकं झाली आणि ’बकेट लिस्ट’ आली. मलाही वाटायला लागलं त्यात काहीतरी टाकावं. बॉलीवूड नाच शिकायला घातलं स्वत:लाच. पहिल्या तासाची जाहिरात घरात, पूर्वी रिक्षातून फिरत ओरडून करायचे तशी आठवडाभर केली. घरातले तीन जीव मुठीत धरून माझा नाच पाहायला सज्ज झाले. नंतर वेळेवर नाहीसे व्हायला लागले, लपायला लागले.

लपायच्या, नाहीसं व्हायच्या जागा संपल्यावर ’पण माझी गुरु शिकवते तेव्हा मी मस्त नाचते. घरी आल्यावर जमत नाही.’ ही नृत्याच्या अगोदरची धून कानावर आदळली की मुलं आणि नवरा नेत्रकटाक्ष टाकायला लागले. आता मला नाचायला यायला लागलं होतं त्यामुळे कुठे का टाकेनात कटाक्ष म्हणून नित्यनेमाने देवदर्शनाला गेल्यासारखं मी नाचायला जात होते. निदान या गुरुला तरी माझ्या तालासुराचं ज्ञान जाणवलं या आनंदात होते. एक दिवस दुकानाला टाळा. नवरा म्हणाला,

"तू कितीजणांचे व्यवसाय धोक्यात आणतेस. भारतात तेच इथेही तुझा हाच उद्योग?" मला अगदी गदगदून आलं त्यामुळे आता काही करायचं राहिलं आहे का? असं कुणी विचारलं की माझं उत्तर असतं,

’लोकांचे छोटे छोटे उद्योग मी त्यात शिरले तरी चालू ठेवण्याचं कसब शिकायचं राहिलं आहे ते एकदा जमलं की झालं.’

Thursday, September 5, 2019

प्रेमाची, गोंधळाची, हेव्याची, वयाची ही गंमत- जंमत; पण या सार्‍याची सूत्र एक नाही, दोघांच्या हातात जातात आणि सुरु होते धरपकड.

तारीख: शनिवार, २१ सप्टेंबर
वेळ:दुपारी ३.३० ते ६:००
स्थळ:  Matthews Play House,
100 W McDowell St, Matthews, NC 28105
  Directions
कलाकार प्रवेशानुक्रमे- पर्णिका जोगळेकर, समीर चौधरी, मोहना जोगळेकर, अतुल रिसवडकर, चिन्मय नाडकर्णी, दीप्ती ओक.

जाहिरात: वेदिका तोंडे, मूळ कल्पना:आनंद वाकणकर. छायाचित्र: नितीन पटवर्धन. रंगभूषा: कश्मिरा वानखेडकर, रुपाली नाडकर्णी. प्रकाश योजना: शंतनु निलावर. 
गायक: दीप्ती ओक, संदीप कुलकर्णी. नृत्यदिग्दर्शन: कश्मिरा वानखेडकर, श्रेया इनामदार.
संगीत नियोजन: विरेन जोगळेकर, गीता गुर्जर. नेपथ्य:विरेन जोगळेकर, गौरव लोहार, शंतनु निलावर.